मराठी साहित्य – विविधा ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“स्वतःची पायरी ओळखून वागायला शिका !”

असा उपदेश देणारे आणि तो ज्या व्यक्तीला योग्य प्रकारे कळेल असे घेणारे, असे दोघेही सांप्रतकाळी लोप पावलेले आहेत ! त्याला कारणं काहीही असतील, पण हे वाक्य ऐकून घेणाऱ्याला त्या काळी या एका वाक्या मागील शब्दांचा मार इतका जिव्हारी लागायचा, की ती व्यक्ती एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे चांगल्या अर्थाने बंड करून उठे !

हल्ली असा शेलका उपदेश कोणी कोणाला द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण आजकाल सगळ्याच लोकांची मानसिकता वेगळ्याच पायरीवर गेल्यामुळे असं होत असावं ! मुळात वर म्हटल्या प्रमाणे असं कोणी कोणाला बोलायच्या भानगडीत हल्ली पडतच नाही, लोकं लगेच त्याच्या पुढची पायरी गाठून हात घाईवरच येतात आणि ताबडतोब मुद्द्यावरून गुद्यावर ! भांडण तंटा मिटवायची मधली कुठली तरी पायरी असते हे रागाच्या भरात विसरूनच जातात ! मग अशा वेळी त्या तंट्याचे पर्यवसान कशा प्रकारे होतं, हे आपण रोज पेपरात वाचत असतोच ! जसं की, बापाने तरण्या ताठ्या मुलावर हात उचलला, म्हणून रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्या पर्यंतची पायरी गाठली किंवा एखाद्या मुलाने, आपल्या वडिलांनी नवीन मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या जन्मदात्यावरच चाकूने हल्ला करून, नको इतकी टोकाची पायरी गाठलेली असते ! असो !

“अहो काय सांगू तुम्हांला, या वयात सुद्धा मी त्या अमुक तमुक देवळाच्या आठ हजार पायऱ्या चढलो ! अजिबात कसला त्रास म्हणून झाला नाही बघा, सगळी त्याचीच कृपा !”

आपण कुठंतरी घाई घाईत महत्वाच्या कामाला, चाळीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जात असतो आणि आपल्याला एखाद्या पायरीवर उभं करून, चाळीतले अप्पासाहेब आपल्याला हे ऐकवत असतात ! चाळीच्या दोन जिन्याच्या फक्त चाळीस पायऱ्या चढून वर आलेल्या अप्पाना, वरील वाक्य बोलतांना खरं तर धाप लागलेली असते, पण आपण सुद्धा, “हॊ का, खरंच कमाल आहे तुमची अप्पासाहेब, या वयात सुद्धा तुम्ही बाजी मारलीत बुवा !” असं बोलून आपली सुटका करून घेतो !  देव दर्शनाला कोणी किती पायऱ्या कुठे चढाव्या अथवा कुठे उतराव्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न ! मी बापडा उगाच त्यांच्या श्रद्धेच्या पायऱ्यांच्या आड कशाला येऊ ? मग याच अप्पाकडून कधीतरी ऐकलेले “ईश्वर सर्वव्यापी आहे, फक्त तो बघायचा भाव मनी हवा, की त्याचे दर्शन झालेच म्हणून समजा !” हे त्यांचे वाक्य आठवते ! पण मी स्वतःची पायरी ओळखून असल्यामुळे, अप्पासाहेबांना त्यांच्या या वाक्याची आठवण करून देत नाही इतकंच ! उगाच कशाला आपण आपली पायरी सोडून बोला !

“शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये” असा उपदेश पूर्वीचे बुजुर्ग लोकं त्या काळच्या तरुण पिढीला करत ! हे सांगतांना त्यांनी स्वतः किती वेळा, किती कारणांनी कोर्टाची ती पायरी चढल्ये हे सांगण्याचे मात्र शिताफिने टाळत ! एकंदरीतच कोर्टाची पायरी चढण्या मागे कुठलाच शहाणपणा नाही, उलट वेळ आणि पैशाचा नको इतका अपव्यय ती एक पायरी चढल्या मुळे होतो, हे खरं तर त्यांना यातून सांगायचं असावं ! या  सिद्धांता मागची कारणं काहीही असली तरी, काही वेळा काही भांडण तंट्यानी इतकी टोकाची पायरी गाठलेली असते, की ती सोडवण्यासाठी शेवटी दोन्ही वादी आणि प्रतिवादींना ती नको असलेली कोर्टाची पायरी चढल्या शिवाय गत्यंतरच उरत नाही ! मग स्वतःच्या सांपत्तीक पायरी प्रमाणे, ते वादी आणि प्रतिवादी दोन नामांकित वकील करून आपापली केस, कोर्टाच्या कंटाळवण्या पायरीवर सोडवायचा चंग बांधतात ! त्यांना त्यांची कोर्टाची पायरी लखलाभ ! असो !

काही थोर लोकांनी समाजाबद्दलची बांधिलकी जपतांना, स्वतः वेगळ्या अर्थाने पायरीचा दगड बनून, अनेक जणांना यशाच्या शिखरावर बसवलेल आपण पाहिलं असेलच ! अशा प्रकारचा पायरीचा दगड बनणे सर्वांनाच जमतं असं नाही ! त्यासाठी मुळात अशा दगडाची जडण घडणच वेगळ्या प्रकारची झालेली असावी लागते ! अनेक न दिसणारे, छिन्नी हातोड्याचे घाव, अशा दगडांनी आपल्या आत झेलून लपवलेले असतात, याची आपल्या सारख्या सामान्य लोकांना कल्पनाच नसते ! याच घावांना लक्षात ठेवून हे दगड, आपल्या पुढच्या पिढीला असे घाव सोसावे लागू नयेत म्हणून, अनेकांसाठी पायरीचे दगड बनून समाजऋण फेडायच कामं इमाने इतबारे, स्वतः अलिप्त राहून करत असतात ! समाजातील अशा महान व्यक्तींचा हा आदर्श, थोडया फार प्रमाणात जरी आपण डोळयांपुढे ठेवून, आपल्या कुवती प्रमाणे, समाजाच्या कल्याणासाठी छोटीशी का होई ना, पायरी बनायला कोणाला कुठलीच अडचण नसावी असं मला वाटतं ! मंडळी, मला स्वतःला असं वाटून काय उपयोग आहे म्हणा ? शेवटी, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, वैचारिक पातळीवरील पायरीचा प्रश्न आहे ! पण आपण सर्वांनीच, अगदी माझ्यासकट, अशी छोटीशी पायरी होण्याचा प्रयत्न करायला कोणाची हरकत नसावी, असं मला मनापासून वाटतं ! बघा विचार करून !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

१६-०३-२०२२

मोबाईल – 9892561086

ताजा कलम – आता थोडयाच दिवसात आपल्याला “पायरी हा ss पू ss स ss” अशा आरोळ्या कानावर यायला लागतील, तर त्यातील त्या “पायरीवर” पुन्हा कधीतरी !

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ. एस्. आर. रंगनाथन् ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

डाॅ. एस्. आर. रंगनाथन् ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

विज्ञानाचे किंवा शास्त्राचे अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत.पण असेही एक शास्त्र आहे की आपण त्याचा उपभोग घेतो,पण ते शास्त्र आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येत नाही.हे शास्त्र म्हणजे ग्रंथालय शास्त्र.

आज 12ऑगस्ट.हा दिवस  रंगनाथन यांचा जन्मदिवस.हा दिवस भारतात रंगनाथन् दिन म्हणून  साजरा होतो. कारण त्यांना भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते.

शियाली राममृत रंगनाथन् यांचा जन्म 12/08/1892 ला तामिळनाडूत झाला. त्यांनी गणित विषयात एम्.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कोईमतूर, वाराणसी, उज्जैन, दिल्ली विश्वविद्यालय अशा अनेक ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. 1924मध्ये त्यांना मद्रास विश्वविद्यालय पहिले ग्रंथपाल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. 1945 ते 1947 या काळात त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात ग्रंथालय अध्यक्ष व ग्रंथालय शास्त्र अध्यापक या पदावर काम केले. 1962 साली बंगलोर येथे त्यांनी प्रलेखन अनुसंधान व प्रशिक्षण केंद्र या संस्थेची स्थापना केली व अखेरपर्यंत तेथे कार्यरत राहिले. 1965 साली भारत सरकारने त्यांना ग्रंथालय शास्त्रातील राष्ट्रीय शोध प्राध्यापक या पदवीने सन्मानित केले.

ग्रंथशास्त्राविषयी त्यांनी केलेले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. ग्रंथांचे वर्गीकरण करणे, ते सूचीबद्ध करणे हे आज सोपे वाटत असले तरी त्याची सुरुवात रंगनाथन् यांनी केली. पुस्तक शास्त्राविषयी त्यांनी 50 कारणेअधिक पुस्तके लिहिली आहेत. शिवाय एक हजार हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ग्रंथालय प्रशासन, ग्रंथालय शास्त्र, पुस्तकांविषयी कायदे अशा विषयांशी संबंधित पंचवीसहून अधिक  समित्यांचे  अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे व पदाधिकारी म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ग्रंथालयासाठी धोरण ठरवण्यातही त्यांचा सहभाग होता. या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना ग्रंथालय  शास्त्राचे जनक असे म्हटले जाते. 1957 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री ने सन्मानित केले. तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाच्या सल्लागार समितीतही त्यांना स्थान देण्यात आले होते.

ग्रंथाना गुरू मानण्याची आपली परंपरा आहे. पण या गुरूची सेवा कशी करावी याचेही एक शास्त्र आहे. ते आजच्या रंगनाथन्  दिनामुळे आपल्याला समजले आहे. आता हे शास्त्र समजून घेऊन ते आत्मसात करण्याने रंगनाथन् यांचा खरा गौरव होणार आहे.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ ना गी ण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🐍 ना गी ण ! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

रविवार असल्यामुळे, नाष्टा वगैरे करून फुरसतीत दाढी करत होतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तोंड फेसाने माखल्यामुळे बायकोला म्हटलं, “बघ गं जरा कोण तडमडलय सकाळी सकाळी ते !” “बघते !” असं बोलत बायकोने दरवाजा उघडला. “मकरंद भावजी तुम्ही एवढ्या सकाळी आणि ते ही लुंगीवर आणि हे तुमच्या बरोबर कोण आलंय ?” हिचा तो तार स्वर ऐकून मी घाबरलो आणि टॉवेलने तोंड पुसत पुसत बाहेर आलो. “काय रे मक्या, काय झालंय काय असं एकदम माझ्याकडे लुंगीवर येण्या इतकं?” “वारेव्वा, मला काय धाड भरल्ये ? अरे तुलाच ‘नागीण’ चावल्ये ना ? वहिनी म्हणाल्या तसं मोबाईलवर, म्हणून शेजारच्या झोडपट्टीत राहणाऱ्या ह्या ‘गारुडयाला’ झोपेतून उठवून आणलंय, तुझी नागीण उतरवायला !” “अरे मक्या गाढवा नागीण चावली नाही, नागीण झाल्ये मला !” “असं होय, मला वाटलं चावल्ये, म्हणून मी या गारुड्याला घेवून आलो !” मी गारुड्याला म्हटलं “भाईसाब ये मेरे दोस्त की कुछ गलतफईमी हुई है ! आप निकलो.” “ऐसा कैसा साब, मेरी निंद खराब की इन्होने, कुछ चाय पानी….” मी गपचूप घरात गेलो आणि पन्नासची नोट आणून त्याच्या हातावर नाईलाजाने ठेवली. तो गारुडी गेल्यावर मी मक्याला म्हटलं “अरे असं काही करण्या आधी नीट खात्री का नाही करून घेतलीस गाढवा ? आणि नागीण चावायला आपण काय जंगलात राहतो का रे बैला ?” पण मक्या तेवढ्याच शांतपणे मला म्हणाला “अरे जंगलात नाहीतर काय ? ही आपली ‘वनराई सोसायटी’ आरे कॉलनीच्या जंगलाच्या बाजूला तर आहे ! आपल्या सोसायटीत रात्री अपरात्री बिबट्या येतो हे माहित नाही का तुला ?” “अरे हो पण म्हणून…” “मग नागीण का नाही येणार म्हणतो मी ? गेल्याच आठवड्यात बारा फुटी अजगर पकडाला होता ना आपल्या पाण्याच्या टाकी जवळ, मग एखादी नागीण…” शेवटी मी त्याची कशी बशी समजूत काढली आणि त्याला घरी पिटाळलं !

पण मक्या गेल्या गेल्या बायको मला म्हणाली, “आता साऱ्या ‘वनराईत’ तुमच्या या नागिणीची बातमी जाणार बघा !” “ती कशी काय ?” “अहो आपल्या ‘वनराई व्हाट्स ऍप गृपचे’ मकरंद भाऊजी ऍडमिन आणि अशा बातम्या ते ग्रुपवर लगेच टाकतात !” तीच बोलणं पूर होतंय न होतंय तोच आमच्या दोघांच्या मोबाईलवर, एकाच वेळेस मेसेज आल्याची बेल वाजली ! बायकोच भाकीत एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं वाटलं नव्हतं ! तो मक्याचाच व्हाट्स ऍप मेसेज होता ! “आपल्या ‘वनराईत’ बी बिल्डिंगमध्ये राहणारे वसंत जोशी यांना नागीण झाली आहे. तरी यावर कोणाकडे काही जालीम इलाज असल्यास त्यांनी लगेच जोशी यांच्याशी संपर्क साधावा, ही कळकळीची नम्र विनंती !” मी तो मेसेज वाचला आणि रागा रागाने मक्याला झापण्यासाठी मोबाईल लावणार, तेवढ्यात परत दाराची बेल वाजली ! कोण आलं असेल असा विचार करत दरवाजा उघडला, तर वरच्या मजल्यावरचे ‘वनराईतले’ सर्वात सिनियर मोस्ट गोखले अण्णा दारात काठीचा आधार घेत उभे !

“अण्णा, तुम्ही ? काही काम होत का माझ्याकडे ?” “अरे वश्या आत्ताच मक्याचा व्हाट्स ऍप मेसेज वाचला आणि मला कळलं तुला नागीण झाल्ये म्हणून ! म्हटलं चौकशी करून यावी आणि त्यावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे तो पण सांगावा, म्हणून आलो हो !” “अण्णा माझे डॉक्टरी उपाय चालू आहेत, बरं वाटेल एक दोन….” मला मधेच तोडत अण्णा म्हणाले “अरे वश्या ह्या नगिणीवर आलो्फेथीचे डॉक्टरी उपाय काहीच कामाचे नाहीत बरं !” “मग?” “अरे तिच्यावर आयुर्वेदिकच उपाय करायला हवेत, त्या शिवाय ती बरं व्हायचं नांव घेणार नाही, सांगतो तुला!” “पण डॉक्टर म्हणाले, तसा वेळ लागतो ही नागीण बरी व्हायला, थोडे पेशन्स ठेवा!” “अरे पण पेशन्स ठेवता ठेवता तीच तोंड आणि शेपटी एकत्र आली, तर जीवाशी खेळ होईल हो, सांगून ठेवतो !” “म्हणजे मी नाही समजलो ?” “अरे वश्या ही नागीण जिथून सुरु झाल्ये ना ती तिची शेपटी आणि ती तुझ्या कपाळावरून जशी जशी पुढे जात्ये नां, ते तीच तोंड !” “बापरे, असं असतं का ?” “हो नां आणि एकदा का त्या तोंडाने आपलीच शेपटी गिळली की खेळ खल्लास!” “काय सांगताय ? मग यावर काय उपाय आहे म्हणालात अण्णा ?” “अरे काय करायच माहित्ये का, रात्री मूठ भर तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी मूठभर हिरव्यागार दुर्वा आणून त्यांची दोघांची पेस्ट करून त्याचा लेप करून या नागिणीवर लावायचा ! दोन दिवसात आराम पडलाच म्हणून समज !” “अहो अण्णा, पण नागीण आता कपाळावरून केसात शिरत्ये, मग केसात कसा लावणार मी लेप ?” “वश्या तुझ्याकडे इलेक्ट्रिक रेझर असेलच ना, त्याने त्या सटवीच्या मार्गातले केस कापून टाक, म्हणजे झालं !” “अण्णा पण कसं दिसेल ते ? डोक्याच्या उजव्या डाव्या बाजूला रान उगवल्या सारखे केस आणि मधून पायावट! हसतील हो लोकं मला तशा अवतारात !” “हसतील त्यांचे दात दिसतील वश्या ! तू त्यांच हसणं मनावर घेवू नकोस!” “बरं बघतो काय करता येईल ते !” अण्णांना कटवायच्या हेतूने मी म्हणालो. “नाहीतर असं करतोस का वश्या, सगळं डोकंच भादरून टाक, म्हणजे प्रश्नच मिटला, काय ?” “अहो अण्णा, पण तसं केलं तर लोकं वेगळाच प्रश्न नाही का विचारणार ?” “ते ही खरंच की रे वश्या ! तू बघ कसं काय करायच ते, पण त्या सटविच तोंड आणि शेपटी एकत्र येणार नाही याची काळजी घे हो बरीक ! नाहीतर नस्ती आफत ओढवायची !” असं म्हणून अण्णा काठी टेकत टेकत बाहेर पडले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !

मी किचनकडे वळून म्हटलं “अगं जरा चहा टाक घोटभर, बोलून बोलून डोकं दुखायला लागलंय नुसतं !” आणि सोफ्यावर बसतोय न बसतोय तर पुन्हा दाराची बेल वाजली ! आता परत कोण तडमडल असं मनात म्हणत दार उघडलं, तर दारात शेजारचे कर्वे काका हातात रक्त चंदनाची भावली घेवून उभे ! मी काही विचारायच्या आत “ही रक्त चांदनाची भावली घे आणि दिवसातून पाच वेळा त्या नागिणीला उगाळून लाव, नाही दोन दिवसात फरक पडला तर नांव नाही सांगणार हा धन्वंतरी कर्वे !” असं बोलून आपल्या शेजारच्या घरात ते अदृश्य पण झाले! ते गेले, हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकतोय न टाकतोय तर लेले काकू, हातात कसलासा कागदाचा चिटोरा घेवून दारात येवून हजर ! लेले काकूंनी तो कागद मला दिला आणि म्हणाल्या “या कागदावर किनई एका ठाण्याच्या वैद्याच नांव, पत्ता आणि फोन नंबर आहे, ते नागिणीवर जालीम औषधं देतात ! आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्या बरं ! त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते, पण लगेच गुण येतो त्यांच्या हाताचा ! आमच्या ह्यांना झाली होती कमरेवर नागीण, पण दोन दिवसात गायब बघा त्यांच्या औषधी विड्याने ! आणि हो काम झाल्यावर हा पत्त्याचा कागद आठवणीने परत द्या बरं का !” एवढं बोलून लेले काकू गुल पण झाल्या !
मी त्या कागदावरचा नांव पत्ता वाचत वाचत दार लावणार, तेवढ्यात ए विंग मधल्या चितळे काकूंनी एक कागदाची पुडी माझ्या हातावर ठेवली आणि “ही आमच्या ‘त्रिकालदर्शी बाबांच्या’ मठातली मंतरलेली उदी आहे ! ही लावा त्या नागिणीवर आणि चिंता सोडा बाबांवर! पण एक लक्षात ठेवा हं, ही उदी लावल्यावर दुसरा कुठलाच उपाय करायचा नाही तुमच्या नागिणीवर, नाहीतर या उदीचा काही म्हणजे काही उपयोग होणार नाही, समजलं ?” मी मानेनेच हो म्हटलं आणि आणखी कोणी यायच्या आत दार बंद करून टाकलं ! आणि मंडळी घरात जाऊन पहिलं काम काय केलं असेल, तर PC चालू करून त्यावर “Please do not disturb !” अस टाईप करून त्याची मोठ्या अक्षरात प्रिंटरवर प्रिंट आउट काढली आणि परत दार उघडून पटकन बाहेरच्या कडीला अडकवून दार लॉक करून, शांतपणे सोफ्यावर आडवा झालो !

© प्रमोद वामन वर्तक

१२-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र जीवांचे… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ मैत्र जीवांचे… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

  पावसाने पुन्हा आपली बॅटिंग सुरू केली आहे. डोळे मिटून आपला संततधार पडतोय बिचारा..

 त्यामुळे सकाळी उठून बघते तो काय…..

 पाऊस तर सुरूच आणि समोरच्या रस्त्यावर साचलेले पाण्याचे तळे …

 घराच्या जवळ कन्नड शाळा आहे.  सकाळी दोघे जण..६/७ वी मधील असतील…

 खांद्यावर हात टाकून आपल्ं दप्तर भिजू नये याची काळजी घेत… पाऊस पडत असताना सुद्धा… निवांत एका छत्रीतून

, कधी  कधी चालताना पाणी  उडवत असं निघाले होते..

 बाहेरच्या कुठल्याही वातावरणाचा त्यांच्यावर  परिणाम होतच नव्हता …..

छान काही गप्पा रंगल्या होत्या…

मनात आलं…

लहानपण दे गा देवा…मुंगी साखरेचा रवा …..

आणि आठवलं…

 खांद्यावर हात टाकून एकमेकांला टाळी देत मारलेल्या दिलखुलास गप्पा …

कोणी थोडासं कोणी नर्वस वाटलं तर पाठीवर हात मारत.. काय झाले आज??? अशी आपुलकीने केलेली विचारणा..

 एखादं कुणी शांत शांत वाटलं तर  सूर्य कुठे उगवला नक्की .. इकडे शांतता कशी?? असं म्हणत..त्याला/तिला बोलतं करणं..

 कुणाच्या ही नवीन गोष्टी च…  दिलखुलास कौतुक करणं… एकत्र डबा खाणं…

अभ्यास एकत्र करणं..

कुणी चार-पाच दिवस शाळेला नाही आलं तर का आला नसेल अशी काळजी करणं..

 नाही तर सरळ त्याच्या घरी जाऊन बिनधास्त धडकणं…

कंटाळा येईपर्यंत खेळणं…

 असं हे छोट्या छोट्या गोष्टीतून  मोठं मोठं प्रेम दाखवणारं आपलं बालपण आणि त्याच बालपणातील हे

 मैत्री जीवांचे

 

मैत्र जीवांचे…

 किती गोड…

 किती सुंदरता..सहजता..

 लहानपणी कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार.. काळजी  नसताना… झालेली

  दिलखुलास..निरागस अशी ही शाळेतील मैत्री…

 नंतर पुढे कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींशी आपलं सहज सहज  नातं जोडून जाते..

 

 मैत्रीमध्ये सहजता खूप असते आणि त्या मुळे खरंतर सुरक्षित कवच  त्याला  तयार होते..

आणि मैत्री घट्ट होत जाते

 

कॉलेजमध्ये

 मग……

शाळेत असताना पावसात भिजू नये म्हणून ..एकाच छत्रीत २/३जाणारे आपण.. कॉलेजमध्ये मात्र मुद्दाम छत्री घरी विसरून जातो आणि मित्र मैत्रिणीबरोबर त्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटतो…

 ठरवून एखादा तास ऑफ करणं एकमेकाचे नोट्स एकमेकाला देणं..

एखाद्याच्या घरात काही अडचण आली तर सगळ्यांनी मदत करणं..

 कारण कॉलेजला येईपर्यंत तेवढी मॅच्युरिटी आलेली असते..

 बऱ्याच गोष्टींचे अर्थ कळत असतात …

त्यामुळे हसत खेळत तितकाच अभ्यास करत कॉलेजचे मोरपंखी दिवस या मैत्रीच्या धाग्यात पटापट निघून जातात…

 आणि खरं तर या्चमुळे आयुष्य भरासाठी अविस्मरणीय होतात..

आणि मग ..

एखाद्या दुःखात ही डोळ्यात येणारं पाणी लपवलं जातं .. चेहऱ्यावर हसू ठेवत धीर दिला जातो…

 कशासाठी.. आणि कशामुळे..

तर

 आपण मोठे झाल्यावर देखील छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद .. सहजता.. सुरक्षितता ..  प्रेम आपुलकी..  काळजी  एका मोठ्या अव्यक्त नात्यांत मिळतं असते तेच..

 मैत्र जीवांचे.

 

 मैत्री दिन झाला…

खूप सारे मेसेज वाचले..

बघितले..

 मर्यादा नसलेलं तरीही मर्यादेतच राहणार असं हे  सुरेख नातं… सर्वात जवळचं..

 सर्वात जास्त हक्काचं..

 अधिकार हट्ट याबरोबर कर्तव्य ही  जाणणारं.. असं हे अनमोल नातं ….

 मैत्र जीवांचे…

 कधी.. कसं.. कुणाबरोबर जुळून जातं समजत नाही..

आणि मग असे हे मैत्र जीवाचे…

 माणूस आपोआपच आपल्याही नकळत जपू लागतो…

 विचार आचार परिस्थिती  रूप रंग वय असा कुठलाही अडसर यामध्ये नसतोच…

 कधी कधी दोन समांतर रेषा सारख्या जाणाऱ्या व्यक्तीतही मैत्रीचा बंध फार घट्ट असतो… त्याचं कारण एकच की.. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा मोठा आनंद देणार असं हे नातं..

 मैत्र जीवांचे…

 

आजच्या या सोशल मीडियाच्या जगात .. या आभासी दुनियेतही असे प्रामाणिक मनस्वी मैत्रीचे धागे गुंतलेले आपल्याला दिसतात…

ते जपले जातात…

आनंदाची बरसात होतं असताना दुःख अडचणी अलगद बाजूला केल्या जातात….

कशासाठी आणि कशामुळे..

तर तिथे असतात ऋणानुबंध…

आपुलकीने जपलेले…

मैत्र जीवांचे..

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘ हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘वळचण’ म्हणजे एक आडोशाची जागा. अंधारी.., सहज नजरेस न पडणारी.. आणि म्हणूनच सुरक्षित! जुन्या काळातल्या कौलारु घरांच्या उतरत्या छपराचा पुढे आलेला भाग आणि वासा यामुळे निर्माण झालेला हा आडोसा म्हणजेच  ‘वळचण’ ! ही वळचण प्रत्येक घराचाच एक अविभाज्य भाग असायची. उन्हाची काहिली सहन न होऊन पसाभर सावलीच्या असोशीने किंवा अचानक एखादी पावसाची जोरदार सर येताच घरट्याकडे झेप घेण्याइतकी उसंत मिळाली नाही म्हणून पक्षी अतिशय विश्वासाने धाव घ्यायचे ते हाकेच्या अंतरावरच्या अशा कौलारू घरांच्या वळचणींकडेच!

अतिशय शांत जलाशयावर अचानक एखादा खडा पडताच असंख्य तरंग उमटत रहातात. ‘वळचण’ या शब्दाचा मनाला स्पर्श होताच असंच होतं. कधीही सहजासहजी डोकं वर न काढता मनाच्या वळचणीला अंग चोरून पडून राहिलेल्या जुन्या काळातल्या कितीतरी आठवणी त्या स्पर्शाने जाग्या होत मनात त्या जलाशयावर उमटणाऱ्या तरंगांसारख्याच झुलत रहातात.. !

वळचणीला कांही काळापुरतं आश्रयाला येणाऱ्या पक्षांसाठी त्या कौलारु घरांबाहेरची वळचण हा हक्काचा निवारा असायचा कारण त्यांना तिथे घरातली माणसं हुसकून न लावता आवर्जून थारा द्यायची. हा थारा आश्रयाला आलेल्या पक्षाला निश्चिंतता देणारा म्हणूनच सुरक्षित वाटायचा. वळचणीला आलेल्या पक्ष्यांच्या मनात संकोच्यापोटी आलेलं दबलेपण नसायचं आणि घरातल्या माणसांच्या मनातही उपकार करीत असल्याची भावना नसायची. ते नैसर्गिकपणेच आकाराला येत रुढ होत गेलेलं माणूस आणि निसर्ग यांचं आनंदी सहजीवनच होतं. आज मनाच्या वळचणीला विसावलेल्या त्या  काळातल्या असंख्य आठवणी मन:पटलावर जेव्हा तरंगतात तेव्हा त्या सहजीवनातील निखळ आनंदच आज कुठेतरी हरवून गेल्याच्या दुखऱ्या जाणिवेने निर्माण केलेली अस्वस्थता त्या आठवणींमधे अधिकच झिरपत जाते.

त्या आठवणी आहेत वळचणींच्याच पण त्या वळचणी कौलारु घरांच्या उतरत्या छपरांआडच्या वळचणी नाहीयत तर त्या अशा असंख्य कौलारु घरांमधल्या सर्वसामान्य आर्थिक स्तरावरच्या ओढग्रस्त जीवनशैलीतही त्या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या  वळचणींच्या आठवणी आहेत!

घराच्या आडोशाच्या वळचणीने पक्ष्याला दिलेला थारा त्या पक्षासाठी चटके देणाऱ्या उन्हात अचानक आकाशात डोकावणारा एखादा ओलसर काळा ढगच असायचा.. किंवा.. अनपेक्षित आलेली एखादी गार वाऱ्याची झुळूकही ! तोच दिलासा त्या कौलारु घरातल्या घरपणांनी जपलेल्या वळचणी घरी आश्रयाला आलेल्या आश्रितांना अगदी सहजपणे देत असायच्या !

अशा घरांमधे उतू जाणारी श्रीमंती कधीच नसायची. घरात खाणारी पाचसहा तोंडं आणि मिळवणारा एकटा. प्रत्येक घराचं चित्र हे एखाददुसरा अपवाद वगळता असं एकरंगीच. अगदी पै पैचा खर्चही विचारपूर्वक, अत्यावश्यक असेल तरच करायचा हे ठामपणे ठरवून देणारं काटेकोर आर्थिक नियोजन आणि तरीही आपल्या चाहूलीने अस्वस्थता वाढवणारी महिनाअखेर या अशा घरांसाठी नेमेची येणाऱ्या पावसाळ्यासारखी सवयीचीच होऊन गेलेली. अशा घरातल्या बेतासबात शिक्षण झालेल्या गृहिणीही हे दरमहाचं तूटीचं अंदाजपत्रक कौशल्याने सांभाळून त्यातूनही स्वतःच्या होसामौजांना मुरड घालून वाचवलेला एखाददुसरा आणा अचानक येऊ शकणाऱ्या अडीअडचणीसाठीची बेगमी म्हणून धान्याच्या डब्यांच्या वळचणीला सुरक्षित ठेवीत असायच्या.

विशेष म्हणजे अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही या घरांनी स्वतःच्या मनातल्या वळचणींच्या खास जागा गरजूंसाठी आवर्जून निर्माण करुन सातत्याने जपलेल्या असायच्या. शिक्षणाच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या एखाद्या गरीबाच्या मुलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत दूर करायला अशी घरेच त्या मुलाचे आठवड्यातल्या जेवणाचे एकेक दिवस वाटून घेत त्याला वार ठरवून देत. ते शक्य नसेल ती घरे स्वतःच्या घरी त्याची पथारी पसरायला लागणारी वीतभर जागा देत. ठरावीक दिवशी माधुकरी मागायला येणाऱ्या सेवेकऱ्यासाठी घासातला घास काढून अशा घरांमधे एखादा चतकोर माधुकरी घालण्यासाठी आठवणीने बाजूला  काढून ठेवला जात असे.

प्रतिकूल परिस्थितीतही गरजूना आश्रय देणाऱ्या, त्याला आधार वाटावा असा मदतीचा हात देऊ पहाणाऱ्या या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या या जणू कांही वळचणीच्या जागाच तर होत्या !

आज काळ बदलला. घरं बदलली. माणसंही. हळूहळूच पण सगळंच बदलत गेलं. त्याचबरोबर पूर्वीचं जीवनशैलीतच दीर्घकाळ मुरलेलं समाजाप्रती असणाऱ्या गृहित कर्तव्याचं भानही. आज ते नाहीय असं नाही. पण पूर्वी प्रतिकूल परिस्थितीतही घरोघरी आवर्जून जपलेल्या वळचणींसारखं मात्र निश्चितच नाहीय. पूर्वी ते सर्रास असायचं आणि आज ते अपवादात्मकच दिसतं हे नाकारता येणार नाही.

हरवू पहाणाऱ्या हा वळचणींचा थारा नव्या काळानुसार नव्या रुपात  प्रत्येकाने निर्माण करणं न् तो जपणं हे आवश्यक आहे आणि अशक्यप्रायही नाही हे जाणवायला मात्र हवं!

समाजाकडून वर्षानुवर्षे कांही ना कांही रुपात सतत कांहीतरी घेतच आपण मोठे होत असतो. समाजाचे ते ऋण परतफेड करता येणारं नसतंच. तरीही अशा स्वनिर्मित वळचणींच्या रुपाने देणाऱ्याने स्वतःच्या मनात उपकार करीत असल्याची भावना न ठेवता घेणाऱ्यालाही संकोच वाटू नये अशा पध्दतीने हरवू पहाणारा वळचणीच्या आडोशाचा थारा जपणे समाजाप्रती असणारा कृतज्ञभाव व्यक्त करायला पूरकच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 2 ☆ सौ. अमृता देशपांडे  

जन्माला आलेला प्रत्येक जीव पहिलं काय करतो,  तर तो रडतो. बाळाचा पहिला टॅहॅ टॅहॅ ऐकू आला कि तिथे असलेले डाॅक्टर्स,  नर्सेस सह, त्याच्या स्वागतासाठी आतुर झालेले सर्व जण आनंदित होतात. बाळ जन्मानंतर जर पटकन रडलं नाही तर डाॅक्टर्स त्याला उलटं धरून रडेपर्यंत कुल्ल्यांवर चापट्या मारतात.  जेव्हा ते रडून ठणठणाट करू लागतं, तेव्हा स्वच्छता वगैरे साठी नर्सकडे देतात. जन्मानंतर लगेचच बाळाचं रडणं आवश्यक असतं. श्वसनसंस्था स्वच्छ आणि योग्यप्रकारे कार्यरत होण्यासाठी ते अतिशय गरजेचं असतं. पुढच्या दिवसात भूक लागली की रडणं, ओलं ओलं झालं की गार वाटून रडणं हे नैसर्गिक असतं. इतर शारिरीक कार्यसंस्था उदा. पचनसंस्था, मूत्रपिंडाचे कार्य,  रक्तवाहिन्या, सर्व नसा,  अस्थिसंस्था यांची स्थिरता व कार्य सुरळीत होईपर्यंत नवजात बाळाला जपणे आवश्यक असते. हळूहळू सर्व व्यवस्थित सुरू होते,  पण सुरवातीला थोडासा जरी बदल झाला तरी बाळाच्या रडण्यानेच कळते की त्याला काही तरी त्रास होतो आहे. मग त्यावर उपाय करता येतो. एक गोष्ट मात्र खरी कि बाळ अंघोळीच्या वेळी आणि भूक लागली की जेवढं खणखणीत रडतं, तेवढं ते आरोग्यानं अधिक सशक्त होतं.  फक्त आईला समज, धीर, आणि सहनशीलता हवी.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग-२९ परिव्राजक –७.मीरत / मेरठ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग-२९ परिव्राजक –७.मीरत / मेरठ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

 हिमालयातील भ्रमंती, खाण्यापिण्याची आबाळ, कठोर साधना यामुळे स्वामीजींची प्रकृती खालावली. ते अतिशय कृश दिसत होते. तसं अल्मोरा सोडल्यापासूनच अधून मधून त्यांना ताप येत होता. पुरेशी विश्रांती मिळत नव्हती. नीट उपचार मिळाले नव्हते. मिरतचे डॉक्टर त्रैलोक्यनाथ घोष यांच्या उपचाराने आणि पंधरा दिवसांच्या विश्रांतीने स्वामीजींना बरे वाटू लागले. इतर गुरुबंधु पण इथे एकत्र आले. आणि सर्वजण शेठजींची बाग इथे राहायला गेले. शेठजींनी सर्व संन्याशांची आपल्या घरी निवासाची व्यवस्था केली होती. सगळे हाताने स्वयंपाक करीत. बाकी वेळ अध्यात्म चिंतनात जाई.

निरनिराळ्या दिशांना भ्रमण करत असलेले, स्वामीजी, ब्रम्हानंद, सारदानंद, तुरीयानंद, अखंडानंद, अद्वैतानंद, आणि कृपानंद असे सर्व गुरुबंधु वराहनगर मठ सोडल्यानंतर खूप दिवसांनी एकत्र आले होते. त्यामुळे मिरतचे हे वास्तव्य सर्वांनाच आनंद देणारे होते. भजन, ध्यानधारणा, शास्त्रांचे पठन याबरोबर संस्कृत आणि इंग्रजी मधल्या श्रेष्ठ साहित्य कृतींचे वाचन असा त्यांचा कार्यक्रम असे. मेघदूत, शाकुंतल, कुमारसंभव, मृच्छकटिक यांचे वाचन सर्वांनी मिळून केले.

मिरतमध्ये एक ग्रंथालय होतं. तिथून स्वामीजींनी अखंडानंदांना सर जॉन लुबाक यांचे ग्रंथ आणायला सांगितले. त्यानुसार अखंडानंद त्या ग्रंथलयातून रोज एक ग्रंथ घेऊन जात. स्वामीजी तो पूर्ण वाचून काढत आणि लगेच दुसर्‍या दिवशी परत ग्रंथालयात घेऊन जात. तो देऊन लगेच दूसरा ग्रंथ आणायला सांगत. असा रोजचा क्रम पाहून ग्रंथपालाला एक दिवस शंका आली. फक्त वाचनाचा देखावा करण्यासाठी ग्रंथ घेऊन जातात आणि लगेच परत आणून देतात अशी शंका त्यांनी अखंडानंदांकडे बोलून दाखविली, ती स्वामीजीनांही कळली. स्वामीजी त्या ग्रंथपालाला जाऊन भेटले आणि म्हणाले, “मी जे ग्रंथ आता वाचले आहेत त्या बद्दल काहीही आणि कोणताही प्रश्न मला विचारा. आणि काय, त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं स्वामीजींनी लगेच दिली. ग्रंथपाल हे बघून आश्चर्य चकित झाला. आणि अखंडानंद सुद्धा. त्यांनी विचारले तुम्ही इतकं वेगात कसं काय वाचू शकता? स्वामीजी म्हणाले, मी एकेक असा शब्द वाचत नाही. तर, संपूर्ण वाक्य एकदम वाचतो. कधी कधी याच पद्धतीने मी परिच्छेदामागून परिच्छेद वाचतो. एका दृष्टीत तो समजून घेऊ शकतो.”

इथे आपल्या लक्षात येत की, वाचण्यासाठी नुसता वेग नाही तर मन एकाग्र करण्याचे असाधारण सामर्थ्य स्वामीजींकडे होतं. त्यामुळेच ते असं करू शकत होते. म्हणजेच कोणतीही गोष्ट करतांना मनाची एकाग्रता होणं अत्यंत आवश्यक असतं.

इथे मिरतला म्हणजे आजचे मेरठला उद्यानगृहात झालेली राहायची आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था, गुरु बंधूंचा सहवास, ध्यानधारणा आणि अध्यात्म संवाद, उत्तमोत्तम ग्रंथांचा आस्वाद व काव्यशास्त्रविनोद यांचा लाभ. एव्हढं सगळं असताना चिंता कसली? असे त्यांचे दोन महीने अतिशय आनंदात आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारे गेले.

स्वामी तुरीयानंदांनी या आठवणी सांगताना म्हटले आहे, “मिरतच्या वास्तव्यात स्वामीजींनी आम्हाला, साधी चप्पल दुरुस्त करण्यापासून ते चंडीपाठ म्हणण्यापर्यंतचे सारे शिक्षण दिले. एकीकडे वेदान्त व उपनिषदे किंवा संस्कृतमधली नाटके यांचं वाचन चाले, तर दुसरीकडे जेवणातील पदार्थ कसे तयार करायचे त्याचे धडे ते आम्हाला देत.” एके दिवशी त्यांनी स्वत: पुलाव तयार केला होता. इतका स्वादिष्ट झाला होता. आम्हीच तो सारा संपऊ लागलो. तर स्वामीजी म्हणाले, “मी खूप खाल्लेलं आहे. तुम्ही खाण्यात मला समाधान आहे. सगळा पुलाव खाऊन टाका.” तुरीयानंदांनी ही आठवण मिरतला जाऊन आल्यावर पंचवीस वर्षानी काढली आहे. म्हणजे खरच मनावर कोरली गेलेली आठवण आहे.

असे अनेक आणखी सुद्धा अनुभव स्वामीजींनी याही वास्तव्यात घेतले. अनेक प्रकारचे लोक भेटले. आता तब्येत पण सुधारली असल्याने पुन्हा त्यांची परिव्राजकतेची प्रेरणा उफाळून आली, पण हिमालयात आता एकट्याने जाऊ शकणार नव्हते. मग दुसरीकडे जावे असं मनात आलं. पण प्रबळ इच्छा होती ते एकट्याने फिरण्याचीच. कारण श्रीरामकृष्ण यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून पुढची कार्याची दिशा ठरवण्याचं भान सतत त्यांना होतं. त्यांनी सर्व गुरुबंधूंना जाहीर सांगितलं की, आता यानंतर मी एकटाच फिरणार आहे कोणीही माझ्याबरोबर येण्याचा प्रयत्न करू नये. अखंडानंदांना याचं सर्वात वाईट वाटलं. तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही असं त्यांनी म्हणताच स्वामीजींनी समजूत घातली, “गुरुबंधूंचं सान्निध्य हा देखील आध्यात्मिक प्रगतिमध्ये एक अडसर ठरू शकतं. तोही एक मायेचा पाश आहे. तुमच्या बाबतीत तो अधिक बलवान होऊ शकतो.”

आता स्वामीजी दिल्लीला आले. भारताच्या प्राचीन काळापासूनचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. दिल्लीहून ते राजस्थान कडे निघाले. आता खर्‍या अर्थाने ते एकटेच भ्रमणास निघाले. दिल्लीच्या मोगल सत्तेशी झुंज देणारं राजस्थान. प्रत्येक प्रांतातला अनुभव वेगळा, माणसं वेगळी, वातावरण वेगळं. संस्थानाच्या राजधानीत अलवार मध्ये स्वामीजी येऊन दाखल झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘एक सजग प्रवासी..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘एक सजग प्रवासी..!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

आयुष्यात अनेक माणसे आपल्याला भेटतात. त्यातली बरीचशी चटकन् विसरली   जातात. अगदी मोजकीच दीर्घकाळ स्मरणात रहातात. क्वचितच कुणी असं असतं जे अगदी क्षणार्धात जवळून निघून गेले तरी त्याची सावली आपल्याला चिकटून बसावी. माझ्या आयुष्यात विविध व्यक्तीरेखांमधून मला भेटत राहिलेली कलाक्षेत्रातील अशी एक व्यक्ती म्हणजे डाॅ. श्रीराम लागू!

त्यांची मराठी नाटके, त्यातल्या त्यांच्या अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक या तिन्ही महत्त्वाच्या भूमिका, गुजराथी नाटके आणि त्यांच्या भूमिका असलेले असंख्य हिंदी-मराठी चित्रपट हा त्यांच्या कलाक्षेत्रातील पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासवाटेचा विस्तृत पट! एक रसिक म्हणून माझ्या जडणघडणीत वेगवेगळ्या टप्प्यांवर डाॅ. लागूंच्या अनेक भूमिकांनी मला प्रभावितही केलेलं आहे !

त्यांचा मी पाहिलेला ‘पिंजरा हा पहिला चित्रपट. आणि ‘नटसम्राट’ हे पहिले नाटक. या परस्पर वेगळ्या पण सकस आशयाच्या दोन्ही कलाकृतींनी  नाटक-चित्रपटांकडे केवळ करमणूक म्हणून न पहाता आस्वादक म्हणून पहाण्याची नवी दृष्टी मला दिली होती हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते!

नाटक ही त्यांची मनापासूनची आवड. पण ‘ती आपली फक्त आवडच नाही तर तो आपला श्वासच आहे’ हे त्यांना उत्कटतेने जाणवलं ते खूप नंतर. हे जाणवण्याचा तो क्षणच त्यांच्या आयुष्याला नवं वळण देणारा तर ठरलाच आणि मराठी रंगभूमी आणि नाट्यरसिकांच्या दृष्टीने भाग्याचाही!

त्यांना चित्रकार व्हायची इच्छा. वडील स्वतः डॉक्टर. त्यांची  इच्छा न् सल्ला प्रमाण मानून यांनी सायन्स साईडला पुण्याच्या फर्ग्युसन  कॉलेजमधे प्रवेश घेतला. तिथे केमिस्ट्रीचे प्राध्यापक असणारे श्री. भालबा केळकर, आणि फर्ग्युसन ही डाॅ. लागूंसाठी  नाट्यसंस्कार करणारी सुरुवातीची केंद्रेच ठरली!

बी. जे. मेडिकलच्या पहिल्या वर्षी केलेल्या एका नाटकामुळे लहानपणी मनात रुतलेली स्टेजची भीती अलगद निघून गेली. तिथल्या पाच वर्षांत लग्नाची बेडी, भावबंधन सारखी पाच नाटके आणि वीस एकांकिका त्यांनी केल्या. त्याकाळात त्यांच्यावर नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, केशवराव दाते, मामा पेंडसे असे दिग्गज, तसेच अत्रे, गडकरींची नाटके, प्रभातचे चित्रपट, वाचनाची आवड रुजवणारे साने गुरुजी, य. गो. जोशी, फडके-खांडेकर यांचे साहित्य यांचा प्रभाव होता. त्यातून  विकसित होत जाणारी त्यांची अभिरुची पुढे पु. शी. रेगेंच्या कविता आणि जी. ए. कुलकर्णींच्या कथांनी अधिक समृध्द केली. ब्रेख्तच्या  नवनाट्यशैलीने त्यांना नाटकाकडे पहाण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला.

पुण्यात ई एन टी सर्जन म्हणून प्रॅक्टीस सुरु केल्यानंतर मनाच्या विरंगुळ्यासाठी एक हौस, आवड म्हणून सुरु झालेल्या सुरुवातीच्या प्रवासवाटेवरची नाटकेही रुढ वाट सोडून वेगळ्या वाटा शोधणारी होती याची साक्ष देतात ‘वेड्याचं घर उन्हात’ ‘गिधाडे’, ‘आधे-अधुरे’ ही नाटके!

पुढे वैद्यकीय अनुभवासाठी ते न्यूझीलंड, लंडनला गेले तेव्हा अभ्यासूवृत्तीने पहाता आलेल्या पाश्च्यात्य रंगभूमीवरील अनेक नाटके व हाॅलीवूड चित्रपटांनी  त्यांना प्रभावित केले !

त्यानंतर आफ्रिकेत वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झाल्यानंतर मात्र नाटकापासून ते खऱ्या अर्थाने दुरावले. नाटक हा आपला श्वास आहे हे त्या दुरावलेपणाच्या घुसमटीतून त्यांना तिव्रतेने जाणवू लागल्यानंतर त्या अस्वस्थेतून बाहेर पडण्यासाठी  ‘यापुढे आपण फक्त नाटकच करायचे’ हे ठामपणे ठरवून तिथले तीन वर्षांपासूनचे स्थैर्य सोडून ते स्वदेशी परतले. आतल्या आवाजाला तत्पर तरीही विचारपूर्वक दिलेला त्यांचा प्रतिसाद त्यांची निर्णयक्षमता आणि सजगता ठळकपणे अधोरेखित करणारा ठरतो. आणि या वळणावर  सुरु होतो त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास!

इथे आल्यानंतर सहा महिन्यांचा दीर्घकाळ प्रतिक्षा केल्यानंतर त्यांना पहिले व्यावसायिक नाटक मिळाले ते ‘इथे ओशाळला मृत्यू’ !

कदा व्यवसाय म्हणून नाटकच करायचे हे ठरले की तडजोडी आल्याच. पण डाॅक्टरांचं वैशिष्ट्य हे की त्यावेळी प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेचे काशिनाथ घाणेकरांनी मतभेद होऊन सोडलेले ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक जेव्हा मिळाले तेव्हाही ते त्यांनी गरज असूनही हव्यासाने स्विकारले नाही तर स्वतःच्या अटींवरच स्विकारले. काशिनाथ घाणेकरांनी पूर्वी स्टाईलाइज्ड पध्दतीने केलेली आणि प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेली संभाजीची भूमिका त्याच पध्दतीने  साकारण्याचा सोपा मार्ग न स्विकारता स्वतःच्या अभ्यासू, चौकस आणि चिकित्सक पध्दतीने सखोल विचार करुन त्या व्यक्तीरेखेला त्यांनी वेगळा आयाम दिला. दिग्दर्शकाशी चर्चा करुन संभाजीच्या भूमिकेला त्यातल्या मूळ रंगातल्या भडक छटा  कांहीशा सौम्य करीत त्या व्यक्तीरेखेच्या प्रवासाचा नैसर्गिक आलेख निश्चित केला. त्यानंतर लगेच आले ते सुरेश खरे लिखित ‘काचेचा चंद्र’ हे नाटक. या नाटकातील खलनायकी व्यक्तीरेखेच्या क्रूरपणात त्यांनी मुरवलेला थंडपणा प्रेक्षकांच्या अक्षरशः अंगावर येणारा असायचा. माफक अल्पाक्षरी संवादांना भेदक नजरेची साथ देत जिवंत केलेला त्यांचा खलनायक हा तोवरच्या खलनायकांच्या रुढ प्रतिमांना छेद देणारा होता!

च्या सर्वच नाटकांचा आणि भूमिकांचा विस्तृत आढावा इथे अपेक्षित नाही न् शक्यही नाही. हा वेध आहे आयुष्य असो वा कलाक्षेत्र या दोन्ही प्रवासावाटांवरील प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक निर्णय घेताना प्रत्येकवेळी त्यांनी दाखवलेल्या सजगतेचा! हा धागा मनात ठेवून त्यांच्या नाटकांची ‘अग्निपंख’ ‘आकाश पेलताना’ ‘आत्मकथा’ ‘गुरु महाराज गुरु’ ‘दुभंग’ ‘पप्पा सांगा कुणाचे’ ‘प्रतिमा’ ‘प्रेमाची गोष्ट’ ‘नटसम्राट’ ‘हिमालयाची सावली’ ‘कस्तुरीमृग’  ही प्रतिनिधिक नावे जरी पाहिली तरी त्यांची नाटके स्विकारण्यातली सजगता आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा आवाका नक्कीच प्रकर्षाने जाणवेल. रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाची ही दिशा त्यांचं नाटकावरील प्रेम तर दर्शवतेच आणि ते कसे डोळस होते हेही !

नाटकांबरोबरीनेच पुढे पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता, सुगंधी कटृटा, देवकीनंदन गोपाला अशा अनेक चित्रपटांनी त्यांच्यासाठी  रेखलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवासवाटेने त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारे खुली तर केलीच आणि तिथे त्यांचे उत्स्फुर्त स्वागतही झाले!

तिथे सरसकट सगळ्याच भूमिका रुढ अर्थाने दुय्यमच असल्या तरीही अगदी तद्दन व्यावसायिक चित्रपटातल्या अशा छोट्या  व्यक्तीरेखांमधल्यासुध्दा खास रंगछटा शोधून त्यांनी त्या व्यक्तिरेखा लक्षवेधी बनवून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे खास स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच कांही वेगळे, कलात्मक चित्रपट आकाराला येत असताना त्यातील महत्त्वाच्या भूमिकांसाठी सुजाण दिग्दर्शकांनी डाॅ. लागूंचीच आवर्जून निवड केली होती. गांधी, कस्तुरी, गहराई, सौतन, गजब, घरौंदा सदमा, सरफरोश, अनकही यासारख्या इतरही मुख्य प्रवाहाबाहेरच्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका याची साक्ष देणाऱ्या ठरतील.

नाटक आणि चित्रपटक्षेत्रतील प्रदीर्घ वाटचालीत फिल्मफेअर न्  कालिदास सन्मानासारख्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानीतही केलेले आहे.

हिंदी चित्रपटातील कारकिर्द अशी दिमाखात सुरू असताना शूटिंगच्या सलग तारखांमुळे त्यांना जवळजवळ अडीच वर्षे एकही नाटक करता आलेले नव्हते. याबद्दलची अस्वस्थता जशी वाढत गेली तेव्हा पुन्हा एकदा योग्य आणि खंबीर निर्णय घेण्याचा कसोटी पहाणारा क्षण पुढे उभा ठाकला. त्याक्षणीही अंगभूत सजगतेने त्यांनी आतल्या आवाजाला दिलेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद होता. डॉक्टर लागूनी त्या क्षणी तथाकथित यश, प्रसिद्धी आणि पैसा यांच्या मोहात न अडकता  शनिवार-रविवार हे आठवड्यातले दोन दिवस शूटींगसाठी तारखा न देता ते खास मनासारखी नाटके करता यावीत म्हणून राखून ठेवायचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर त्या तारखांचा वापर व्यावसायिक नाटकांसाठी न करता त्या स्वतःच्या ‘रुपवेध’ या संस्थेतर्फे छबीलदासच्या छोट्या रंगमंचावर करायच्या अनेक प्रायोगिक नाटकांसाठी राखून ठेवल्या. त्यांच्या ‘गार्बो’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, उध्वस्त धर्मशाळा, अॅंटिगनी अशी व्यावसायिक विचार बाजूला ठेऊन केलेल्या  नाटकांनी प्रायोगिक रंगभूमी निश्चितच समृध्द केली आहे!

हे सगळं करीत असताना समाजाबद्दलची कृतज्ञता म्हणून ते अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीशी जोडले तर गेलेच आणि त्या समाजाभिमुख कार्यासाठी निधी उभा करण्याकरता ‘सामाजिक कृतज्ञता निधी’च्या माध्यमातून खूप पूर्वी गाजलेली एकच प्याला, लग्नाची बेडी यासारखी अनेक नाटके, विना-मानधन काम करणारे अनेक प्रसिध्द कलाकार सोबत घेऊन लोकांपर्यंत पोचवली. अशा कलाकारांची मोट बांधून प्रत्येक नाटक कष्टपूर्वक बसवून मर्यादीत प्रयोग संख्येचे उद्दिष्ट गावोगावचे अथक दौरे करुन पूर्ण होताच लगोलग दुसऱ्या नाटकाकडे वळणे सहजसोपे आणि सहजसाध्य नव्हतेच. आणि तरीही केवळ सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेने त्यांनी आपला संकल्प दृढ निश्चयाने तडीस नेला होता हे कौतुकास्पदच म्हणायला हवे.

त्यांच्या कलाक्षेत्रातील वाटावळणांचा हा धावता आढावा! समोर येणारं आयुष्य येईल तसं स्विकारुन जगत रहाणारे बरेचजण असतात. येईल ती परिस्थिती सजगतेने विचारपूर्वक स्विकारुन स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारे मात्र मोजकेच असतात. आपला जीवनप्रवास सजगतेने करणाऱ्या अशा दुर्मिळ व्यक्तींपैकीच एक अशा डाॅ. श्रीराम लागू यांच्या कलाप्रवासातील सजग वाटचालीचा यथाशक्ती  घेतलेला हा वेध माझ्यासाठी त्यांच्या नाटक-चित्रपटांइतकंच निखळ समाधान देणारा ठरलाय एवढं खरं!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेध लागले श्रावणाचे… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ वेध लागले श्रावणाचे… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

श्रावणातले दिवसच हिरवे हसरे सुखद!! या श्रावण महिन्याला एक सुगंध आहे.. जाई जुई मोगर्‍याचा दरवळ आहे. सभोवताली दाट हिरवळ आहे. शिवारात पीकांचा डौल आहे.फुटणार्‍या कणसांचा परिमळ आहे. सृष्टी कशी तृप्त तजेलदार आहे. पावसांच्या सरींची शीतल, आनंददायी बरसात आहे. सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि एक प्रकारची प्रसन्न व्यस्तता आहे.. नेमाने येणार्‍या या श्रावणाची इंद्रधनु रुपे मनांत कशी साठलेली आहेत.

श्रावण महिना म्हणजे सणांचा सोहळाच. घराघरात हे पारंपारिक साजरेपण सजते.पारंपारिक पदार्थांचांही  सुगंध वातावरणात भरुन असतो..

खरोखरच श्रावणमासी सुगंधाच्या राशी…

नवविवाहीतांसाठी श्रावणी सोमवारची शिवामूठ, मंगळवारची मंगळागौर .. त्यानिमीत्ताने नटणे मुरडणे.. ठेवणीतल्या पैठण्या आणि अलंकारांचा साज…

श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे सौंदर्याचा, पावित्र्य, मांगल्याचाच वर्षाव..

श्रावणातले सणही किती अर्थपूर्ण!! नागपंचमीच्या नागपूजेतून  सृष्टीच्या चराचराला एक आदराचे स्थान देण्याचीच भावना असते. बहिणभावांच्या प्रेमाचे रक्षाबंधन… कोळी आणि समुद्राचे अतूट नाते सांगणारी नारळी पौर्णीमा. उधाणलेल्या दर्यात नारळ टाकून त्याला पूजण्याचा संकेत किती भावपूर्ण आहे…

सण आणि निसर्ग यांचा भावपूर्ण मेळ साधणारा.. गोकुळअष्टमीच्या गोविंदाइतकं गोजीरवाणं

तर अद्वितीयच!! तो डाळींबाचे दाणे घालून नारळ पोह्यांचा प्रसादकाला … त्याची चवच न्यारी.खरं म्हणजे पिठोरी अमावस्या म्हणजे मातृदिनच. सुरेख आकाराचे पीठाचे दिवे पेटवून माता मुलांना दीपदान देते. त्यांच्या उजळ भविष्यासाठी प्रार्थना करते…

श्रावणातला अत्यंत कृतज्ञतेचा दिवस म्हणजे बैलपोळा..

घराघरात खीर पुरणाचा बेत घडतो. ढवळे पवळे नटतात. सजतात, रंगतात.

बळीराजाची अर्धांगिनी त्यांच्या मुखी औक्षण करुन प्रेमाचा घास भरवते….

खरोखरच श्रावण महिना म्हणजे प्रेम कृतज्ञता..

श्रावण महिना म्हणजे मांगल्य ‘पावित्र्य…

आनदाचे डोही आनंदाचेच तरंग… सौंदर्याचा अजोड अविष्कार…

आषाढ सरतो आणि श्रावण येतो..

सृष्टी नटते. अवखळ झर्‍यांचा नाद घुमतो.

डोंगर माथे ढगांशी गुजगोष्टी करतात.

भिजल्या घरट्यात पक्षी कुचकुचतात..

रानफुले आनंदे डुलतात…

सप्तरंगांची उधळणच होते….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अण्णाभाऊ साठे….साहित्यरत्न.! ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

? विविधा ?

☆ अण्णाभाऊ साठे….साहित्यरत्न.! ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाटेगावी जन्मले.त्यांचा जन्म १ /८/ १९२० साली झाला.

त्यांचे खरे नाव तुकाराम होते. पण टोपण नावाने त्यांना गावातील लोक अण्णा म्हणून हाक मारत.  शाळेत फक्त दिड दिवस गेले तरी ते साहित्यिक सम्राट ठरले. त्यांनी अनेक पोवाडे रचले.ते मजूरवर्गावरील अन्याय सहन करू शकले नाहीत.

   कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केले. वडिलांसोबत मुंबई ला येऊन छोटी मोठी काम केली. त्यांना गिरणीत झाडूवाल्याची नोकरी मिळाली. तेव्हा मजुरांचे कष्टप्रद जीवन जवळून अनुभवले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेते काॅम्रेड डांगे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. तमाशा फडात सुध्दा चुलत भावा बरोबर काम केले.

  लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची निरिक्षण शक्ति जबरदस्त होती.

नेत्यांची भाषणे ऐकून त्यांनी अनेक कथा कांदबऱ्यां लिहिल्या आहेत. आत्मियतेने ते त्यांचे विचार लेखणीतून उतरवत होते.  ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे त्यांना वाटे.

त्यांच्या कथा-कादंबऱ्याचे भारतातच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. जेव्हा ते रशियाला गेली तेव्हा

त्यांनी लिहिलेला १९६१ साली प्रवासवर्णन रशियाचा प्रवास अनुभवावर आधारित होता. नंतर मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले.

विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.*

असे साहित्य रत्न अण्णाभाऊ यांनी १८ /७/१९६९ मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

साहित्यरत्न, साहित्य शिरोमणी अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा…… !!

© सौ. रोहिणी अमोल पराडकर

कोल्हापूर  

भ्रमणध्वनी – 8208890678

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print