सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “९ ऑगस्ट :: आंतरराष्ट्रीय मूलनिवासी (?) दिवस” ☆ सुश्री शोभा जोशी ☆
एखादी गोष्ट आपल्याला वरकरणी खूप छान वाटते. मात्र त्यामागचं सत्य फार भयानक असतं. अगदी हीच गोष्ट या मूलनिवासी (आदिवासी) दिनाच्या बाबतीत आहे. खरं तर ९ आॅगस्ट हा जनजातींसाठी /मूलनिवासींसाठी उत्सवाचा दिवस नसून तो रक्तरंजित इतिहासाचा दिवस आहे, हे त्यामागचं सत्य कळल्यावर पटतं.
९ आॅगस्टचा इतिहास…. १९४२ साली भारतातील व्यापारासाठी, भारताचा मार्ग शोधण्यासाठी निघालेला कोलंबस चुकून अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर जाऊन पोहोचला. त्यावेळी अमेरिकेत ५ मूलनिवासींचे आदिवासींचे आधिपत्य होते. चॅराॅकी, चिकासो, चोक्ताव, मास्कोगी व सेमिनाॅल या त्या प्रमुख जमाती – – – कोलंबसला वाटले, हाच भारत देश आणि हे भारतीय लोक. म्हणून ते रेड इंडियन. विस्तृत क्षेत्रात सुखासमाधानाने नांदणार्या या जमातींच्या सुखाला कोलंबसच्या येण्याने ग्रहण लागले.
व्यापारासाठी निरनिराळी क्षेत्रे शोधणे ही तर गोर्यांची खासियत. या व्यापारवृध्दीच्या मोहापायी ब्रिटिशांनी अमेरिकेत शिरकाव केला आणि तेथील जमातींच्या जमिनी हडप केल्या आणि तिथल्या मूलनिवासींना बेघर केले. गोर्यांनी आपल्या वसाहाती वाढवल्या. हळू हळू चर्चच्या प्रभावाखाली येऊन अमेरिका, न्यूझिलंड, आस्ट्रेलिया या देशांनी अमानुषपणे तेथील मूलनिवासिंना त्याच्या जन्मभूमीतून नष्ट केले.
९आॅगस्ट १६१० या दिवशी अमेरिकेतील पवनहाट युध्द सुरू झाले, गोरे युरोपियन आणि मूलनिवासी यांच्यातील हे युध्द. अर्थातच संख्येने कमी असलेल्या मूलनिवासींचा पराभव झाला. १६१०ते १७७५ या काळात इंग्रजांनी अमेरिकेच्या मूलनिवासींना अनन्वीत अत्याचाराने, अतिशय अमानुष पध्दतीने त्यांना ठार केले. त्यांच्याविरूध्द विश्र्वातील पहिले रासायनिक युध्द केले गेले. त्यात ८०% मूलनिवासिंना तडफडून मारले गेले.
कोलंबसच्या अमेरिकेतील पदार्पणाला ९ आॅगस्ट १९९२ ला ५०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘ कोलंबस डे…. थॅंक्स गिव्हिंग डे ‘ साजरा करण्याची जोरात तयारी सुरू होती. पण तिथे शिल्लक असलेल्या मूलनिवासींनी त्याविरूध्द जोरदार आवाज उठवला. कारण त्यांच्यासाठी तो विनाशकारी दिवस होता. कोलंबसच्या पदार्पणामुळे त्यांच्या सगळ्या जमाती नष्ट झाल्या होत्या. संस्कृती नष्ट झाली होती. ८०% मूलनिवासींचे हत्त्याकांड झाले होते. मूलनिवासींच्या या रोषाला शांत करण्यासाठी अमेरिकेने ‘ इंडिजिनियस पिपल्स डे ‘ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ९ आॅगस्ट हा दिवस ‘ मूलनिवासी /आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. पण संख्येने कमी असले तरी अजूनही हे मूलनिवासी त्याला विरोध करतात. कारण त्यांच्यासाठी हा रक्तरंजित नरसंहार दिवस आहे.
काही शतकानंतर मूलनिवासींनी पुन्हा अन्यायाला वाचा फोडली. त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी, २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाने साळसूदपणे जाहिरनामा काढला. भारताने त्यावर सही केली पण मूलनिवासी ही संकल्पनाच मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. कारण भारतातील सर्व जाती-धर्मांचे, पंथाचे लोक मूलनिवासीच आहेत. आदिवासी नाहीत. (आदिवासी म्हणजे इथले मूळचे रहाणारे व बाकीचे बाहेरून आलेले असा अर्थ होतो. भारतातील सर्व लोक मुळचे इथलेच आहेत. बाहेरून आलेले कोणीच नाहीत. म्हणून ते सर्व मूलनिवासीच आहेत. त्यातील कोणी आदिवासी नाही.) भारतीय राज्यघटनेनुसार जंगलात/वनात वास्तव्य करणार्यांना अनुसूचित जमाती (जनजाती) संबोधले जाते.
भारतातील परिस्थिती- भारतात सुध्दा विविधप्रकारांनी या जमातींवर जनजातींवर ब्रिटिशांनी अन्याय अत्याचार केले आहेत.
– – स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. भारतामध्ये सर्व जनजातींना सन्मानाने वागविले जाते.
भारतातील सर्व मूलनिवासीच आहेत, तरीसुध्दा भारतातील काही देशविघातक शक्ती व गोरे लोक जनजाती व इतर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी, ‘तुम्ही आदिवासी आहात ‘ हे त्यांना ठासून सांगण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना ९ आॅगस्ट हा दिवस ‘ आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करायला लावतात. तरूणांना भडकावतात. तरूणांना वाटते, हा दिवस आपल्या पूर्वजांचा गौरव करण्याचा दिवस आहे. या भावनेने ते तो साजरा करतात. या तरूणांना किंवा हा दिवस साजरा करणार्या इतर लोकांना या षड्यंत्राची कल्पना नाही. पण आता सत्य कळल्यानंतर सर्व जनजातींनी जागृत होणं आवश्यक आहे.
सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




















