मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गावजत्रा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ गावजत्रा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा झाला की महाराष्ट्रातील गावोगावच्या उत्सवांना आरंभ होतो. 

रब्बीची पिके घरी येवून पडलेली असतात. बुरुडाकडून आणलेल्या, गोमयाने अंतर्बाह्य लिंपून उन्हात खडखडीत वाळवून निर्जंतुक केलेल्या धान्यांच्या कणग्यांची पोटे नवधान्यांनी तट्ट भरल्यावर त्यांच्या तोंडी कडुनिंबाच्या पानांचे तोबरे भरून, वर राख आणि शेणांनी ती तोंडे लिंपली जातात. आता अश्विनापर्यंत तोंडे बंद!

उरलेल्या धान्यांच्या खरेद्या-विक्र्या होऊन शेतकऱ्यांच्या कनवटीला चार पैसे खुळखुळू लागतात. सगळीकडे आनंदीआनंद असतो. मुलं, नातवंडांना नवी कापडं, नातींना परकर-पोलकी- गवानं, तान्ह्याला आंगडी, टोपडी, कुंच्या, करगोटं आणि घरधणीन, सुना, लेकींना लुगडी-चिरे-चोळ्या घ्यायच्या असतात. जमलं तर कारभारणीला एखादा सोन्याचा डागही करायची इच्छा असते घरधन्याची. 

गावातील सार्वजनिक ग्रामदैवतांच्या मंदिरात नामसप्ताह आयोजित केले जातात. अखंड नामसंकीर्तनाखेरीज रोज संध्याकाळी वारकरी कीर्तने होतात. आठवडाभर ग्रामस्थ विठूभजनात मग्न राहतात. रामनवमी उत्साहाने पार पडते. हनुमानाचा जन्मोत्सव होतो. रामाला आणि हनुमंताला वाहिलेल्या मोगरा-दवण्याचा सुगंध मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत पुढे आठवडाभर दरवळत असतो. गावभर सुंठवडा वाटला जातो. एकूण मजा असते, आनंदी आनंद असतो.

आमच्या माळशिरस (भुलेश्वर) गावाचा भैरवनाथाचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र बारशीला (चैत्र शु. द्वादशी) असतो. सकाळी सहा वाजता ग्रामदैवत, ‘पुण्याचे वेरुळ’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वराला महाभिषेक, सात वाजता गावातील भैरवनाथाला महाभिषेक केला जातो. दुपारी बारा वाजता पाण्याची कावड नाचवत भुलेश्वरला नेली जाते. नंतर देवाच्या तांदळ्यावर (शिवपिंडीवरील दंडगोलाकार शाळिग्राम) जलधारा धरून अभिषेक केला जातो. रात्री साठेआठला गावात छबिना निघतो. ढोल-लेझिम पथके नाचतात. तरुण देहभान विसरून नाचतात, वाजवतात, नामगजर करतात. महिला, मुली, बालके नवी वस्त्रे लेऊन, नटूनथटून सहभागी होतात.

गावात पारावर, चौकात विविध वस्तू, मिठाया, खेळणी, कपडे, खाद्यपदार्थांची हाटेले इ. फिरत्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटलेली असतात. बाया घोळक्याने बाजारात फिरत, हसंत खिदळत, कलकल करीत खरेदी करीत असतात. एक लेकरु कडेवर, दुसरं बोटाला धरलेलं, तिसरं जरा थोरलं, आईच्या मागून ढकलंत घरंगळंत चालल्यासरखं चाललेलं, गर्दीतून चाँवचाँव करीत वाट काढीत पुढं पुढं जात असतात. लेकरासाठी जिलबी, गुडीशेव, भेळ, गारेगार घेत असतात. 

जत्रेच्या निमित्ताने घरोघरी सोयरेधायरे, व्याही मंडळी, मित्रमंडळी, पाहुण्यांचे आगमन झालेले असते. गोडाधोडाच्या जेवणावळी झडत असतात. आग्रह करकरून वाढले जाते. सारा दिवस धामधुमीत जातो. 

या दोन-चार दिवसाच्या धामधुमीत उपवर किंवा उपवधू कन्या-पुत्रांच्या विवाहासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी, टेहाळणी काही धूर्त, चाणक्ष पालक करून घेतात. आपल्या कुटुंबासाठी सुयोग्य, आनुरूप सून-जावई हेरून ठेवतात. काही व्यवहारी मंडळी जमीन, घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सूतोवाच्य करून ठेतात, जुजबी बोलणी करून घेतात. विवाहाचे आणि जमीन, घर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार नंतर सोईने संपन्न होतात.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे चैत्र शु. त्रयोदशीला घरोघरी सामिष भोजने होतात. दुपारी चिंचेच्या बागात कुस्त्यांचे फड उभे राहतात. पंचक्रोशीतले मल्ल त्यात सहभागी होऊन आपापल्या क्रिडा नैपुण्याचे प्रदर्शन करतात. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यांच्यावर कौतुक म्हणून रेवड्या उधळल्या जातात. उधळलेल्या रेवड्या हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर पोरा-टोरांच्या, प्रेक्षकांच्या उड्या पडतात. मोठ्या तरुणांच्या कुस्त्यांमधे विजेत्याला रोख रकमांची पारितोषिके दिली जातात. हौशी कुस्तीप्रेमी गावकरी पारितोषिकांच्या बोल्या लावतात. उत्तरोत्तर खेळ रंगत जातो. प्रेक्षकांपैकी काही जण विजयी वीरांना खांद्यावर घेऊन नाचवतात, मिरवतात. रात्री पारावरील मोकळ्या मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर एखादे लोकनाट्य (तमाशा) रंगते.

नमन, गण-गौळण, लावणी, बतावणी झाली की मुख्य वगाला आरंभ होतो. ढोल्या विविध ताल व लयकाऱ्या वाजवून ढोलकीवरील आपले प्रभुत्व वारंवार सिद्ध करतो. पायपेटी वादक त्याच्या करामती दाखवतो. नृत्यांगनांचा लयबद्ध पदन्यास, गिरक्या, फिरक्या, मुरक्या, ठुमके आणि अदकारीला प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवून, डोईचे फेटे हवेत उडवून भरभरून दाद देतात. मावशी मजा आणते. सोंगाड्या आपल्या अंगविक्षेपांनी आणि द्विअर्थी शाब्दिक कोट्यांनी धमाल उडवतो, प्रेक्षकांना खळखळून हसवतो. असे हे उत्तरोत्तर रंगलेले लोकनाट्य पहाटे पहाटे संपते. गावकरी पुढील वर्षभर पुरेल येवढ्या आनंदाची साठवण मनात करीत आपापल्या घरी परततात.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

 

??

☆ ✍️ सातत्य… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करावा असे म्हणतात. पण संकल्प हा संकल्प च रहातो हा आपला अनुभव आहे. असे का घडते यावर थोडे चिंतन केले तर जाणवते आपण काही तरी वेगळे करु किंवा काहीतरी वेगळे मिळवू असा मनात विचार करुन आपण संकल्प करतो हे जाणवले. मग काहीतरी विशेष भले ही ते छोटे का असेना करावे असे वाटते इथेच आपली खरी चूक होते. काहीही वेगळे न करता आहे तेच जर सातत्याने केले तरी समाधान मिळते. 

सण समारंभ उत्सव साजरा करण्यामागे आनंद मिळणे ही भावना असते. सणाच्या दिवशी करण्यात येणारी विशेष तयारी ती फक्त एक दिवस न करता दैनंदिन जीवनातच थोडं थोडं करत गेलो तर रोजच तो आनंद मिळणार नाही का? (जर त्या दिवशी तो मिळतो हा अनुभव आहे तर रोजही मिळणारच! ) 

उदा. गुढीपाडवा पहाटे उठणे, रांगोळी काढणे, तुपाचा दिवा लावणे व रामरक्षा या मूलभूत गोष्टी रोज केल्या तर त्याची शिस्त मनाला शरीराला लागेल व रोज व गुढिपाडव्याला मुहूर्तावर गुढी उभारल्यानंतर तो आनंद द्विगुणित होईल. दैनंदिन व नैमित्तिक गोष्टी एकात एक मिसळतील व समाधान सतत मिळेल केवळ सातत्याने!

नैमित्तिक तर करायचेच मुहूर्तावर पण त्यातील मूलभूत गोष्टी करुन त्या शिस्तीत जीवन जगले तर वर्तमानाचाही आनंद घेता येईल. 

आनंद समाधान केवळ एका विशिष्ट क्षणी कसे असेल. 

वर्तमानात जगण्यासाठी सातत्य व शिस्त लागतेच तर त्या मुहूर्तावरील आनंद शाश्वत असेल. 

करचरण कृतं वाक्कयजं कर्मजं वा

।श्रवणनयनजं वा मनसं वपराधं” ।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व ।

जय जय करुणाबद्ध श्रीमहादेव शम्भो ॥

पवित्र विचार, पवित्र वातावरण, दिवा लावणे स्तोत्र म्हणणे या नित्याच्या गोष्टी मनापासून, सतत करत करत नैमित्तिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सहज वागणे शक्य करणे म्हणजे हा संकल्प नसून सहजता ठरेल. ही सहजताच ताण न देता खरे समाधान देणारी ठरू शकते.

आचार्य म्हणतात जे जे कृत्य करू ते सगळे भगवंताच्या साक्षीने केले तर तीच त्याची सेवा ठरते. वेगळं काही करण्याच्या नादात सहजता निसटते व‌ वर्तमानातील आनंद न मिळता संकल्प हा ताण ठरतो व तो पूर्ण होत नाही. 

आचार्य तर म्हणतात ईश्वरसाक्ष जीवन असेल तर निद्रा सुद्धा समाधी ठरेल. यावर मनन केल्यास साधेपणा व नैसर्गिकताच आपले समाधान आहे. 

संकल्प म्हणजे रोजचेच वागणे सहज केले तर वेगळाच अनुभव मिळू शकेल असे वाटते.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी… लेखक : श्री मंगेश दोरके ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी… लेखक : श्री मंगेश दोरके ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

– – सहजीवनाचे नवे ऋतू

– – पंचेचाळीशीनंतरची नवी सप्तपदी – – 

१. पहिले पाऊलः जोडीदाराच्या बदलत्या रूपाचा आणि वयाचा मूक स्वीकार करणे.
२. दुसरे पाऊलः मुले मार्गी लागल्यानंतरच्या रिकाम्या घरट्यात एकमेकांना नव्याने शोधणे.
३. तिसरे पाऊल: जोडीदाराच्या मूक त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि नवे सामायिक छंद शोधणे.
४. चौथे पाऊलः समाजाच्या अपेक्षांतून मुक्त करून हरवलेल्या स्वप्नांना नवे पंख देणे.
५. पाचवे पाऊलः जुने हिशेब सोडून भूतकाळाचे ओझे कायमचे उतरवून ठेवणे.
६. सहावे पाऊल: आजारपणातील निस्वार्थ आधार आणि एकमेकांचा ‘समांतर एकांत’ जपणे.
७. सातवे पाऊल: वेळेचे भान ठेवून कोणत्याही मृगजळामागे न धावता निखळ मैत्री जपणे.

≡ ≡ ≡ ≡ ≡ 

काल माझ्या मावस भावाच्या लग्नाचा मांडव सनईच्या मंगल सुरांनी ओसंडून वाहत होता. होमकुंडातून उसळणाऱ्या पवित्र धुराच्या लोटामुळे माझे डोळे किंचित पाणावले आणि माझी नजर सहजच शेजारी बसलेल्या माझ्या अर्धांगिनीकडे वळली. उकाड्याने तिच्या कपाळावर घामाचे मोत्यांसारखे थेंब चमकत होते. मी खिशातून रुमाल काढला आणि अत्यंत सहजतेचा स्पर्श देत ते टिपले. तिने माझ्याकडे पाहून एक अत्यंत आश्वासक स्मितहास्य केले. समोर सनईचे सूर आकाशाला भिडत होते आणि त्या तरुण जोडप्याने एकमेकांचा हात धरून अग्नीभोवती फेरे घ्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या डोळ्यांत भविष्यातली सोनेरी स्वप्ने होती आणि जग जिंकण्याची एक खळाळती उमेद होती. ते दृश्य पाहताना मला अचानक पंचवीस वर्षांपूर्वीचा माझा तो दिवस आठवला ज्या दिवशी आम्हीही अशीच एकमेकांना वचने देत ती पहिली सप्तपदी घेतली होती.

विशीच्या उंबरठ्यावर घेतलेली ती पहिली सप्तपदी मुळात संसाराचा डोलारा उभा करण्यासाठी होती. त्यात स्वतःचे घर घेण्याची शर्यत होती; मुलांचे भविष्य घडवण्याची धावपळ होती आणि समाजाला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची एक अथांग धडपड होती. पण आज पंचेचाळीशीचा उंबरठा ओलांडताना मला तीव्रतेने जाणवत होते की तो धावपळीचा ग्रीष्म ऋतू आता मागे पडला आहे. आता पैशांची पूर्वीसारखी ओढाताण नाही पण वेळेची आणि शरीराची मर्यादा पावलोपावली जाणवू लागली आहे. त्यामुळे आता मृगजळामागे धावायचे नाही तर थांबून निवांतपणे हा उभा केलेला संसार केवळ साजरा करायचा आहे. त्या क्षणी त्या मंडपाच्या कोलाहलातच मी मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधू लागलो. कोणत्याही अग्नीच्या साक्षीने नाही तर आमच्यातल्या या प्रगल्भ शांततेच्या साक्षीने मी आज स्वतःला आणि तिला संसाराच्या या सांजवेळी एक नवी सप्तपदी देत होतो.

माझे पहिले पाऊल तिच्या बदलत्या रूपाचा आणि वयाचा मूक स्वीकार करण्याचे असेल. तारुण्यातला तो तजेलदारपणा आणि शरीराची ओढ आता ओसरली आहे आणि हे निसर्गाचे सत्य मला हसत हसत स्वीकारायचे आहे. तिचे ते रुपेरी होणारे केस; हसताना डोळ्यांच्या कडेला जमा होणाऱ्या अनुभवांच्या सुरकुत्या आणि शरीराचा वाढलेला डौल या सगळ्या बदलत्या ऋतूंमध्ये मला तिची अभेद्य ढाल बनायचे आहे. पूर्वी तिच्या सुगंधाने मला भुरळ पडायची पण आता रात्री झोपताना सांधेदुखीवर तिने लावून दिलेल्या औषधाच्या वासात मला अधिक सुरक्षित वाटते. तिने विसरलेला चष्मा न रागावता शोधून देण्यापासून ते वयोमानानुसार येणाऱ्या उष्ण झळांमध्ये मी आहे ना हा दिलासा देण्यापर्यंतचा हा आपला नवा बहरलेला रोमान्स असेल.

माझे दुसरे पाऊल या रिकाम्या घरट्यात एकमेकांना नव्याने शोधण्याचे असेल. पहिली सप्तपदी मुलांचे घरटे विणण्यासाठी होती पण आज आपला छावा मोठा होऊन त्याच्या नव्या आकाशात उडून गेला आहे. घर पुन्हा एकदा तसेच रिकामे आणि शांत झाले आहे जसे लग्नाच्या सुरुवातीला होते. पण आता आपण दोघेही काळाच्या प्रवाहात प्रगल्भ झालो आहोत. या रिकाम्या घरात हरवून न जाता आलेल्या या शांततेची कोणतीही भीती न बाळगता मी तिच्या डोळ्यांत माझा तो जुना सखा नव्याने शोधेन. हीच तर खऱ्या प्रेमाची पावती नाही का?

माझे तिसरे पाऊल तिच्या मूक त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि नवे सामायिक छंद शोधण्याचे असेल. गेल्या दोन तपांत तिने स्वतःच्या आवडीनिवडी मारून या घरासाठी जो मूक त्याग केला त्याची जाण मला या वळणावर ठेवायची आहे. संसाराच्या इमारतीचा पाया होताना तिने स्वतःला चंदनासारखे झिजवले आणि त्याची कृतज्ञता केवळ शब्दांत नाही तर माझ्या कृतीत असावी. आता सकाळी उठल्यावर रोजच्या धावपळीऐवजी तिच्या हातात चहाचा गरम कप देणे किंवा बाल्कनीतल्या कुंडीत एकत्र रोपटे लावणे हा आमचा नवा सामायिक छंद असेल. या छोट्या सवयी संसाराची दुसरी इनिंग अधिक सुगंधी करतील.

माझे चौथे पाऊल तिला समाजाच्या अपेक्षांतून मुक्त करण्याचे आणि तिच्या हरवलेल्या स्वप्नांना नवे पंख देण्याचे असेल. आजवर तो संसार आपण केवळ समाजासाठी आणि नातेवाईकांसाठी केला पण इथून पुढचा प्रवास लोक काय म्हणतील या अनामिक भीतीखाली जगायचा नाही. घरात एखादी वस्तू जागेवर नसली किंवा कंटाळा आला म्हणून एखादे काम राहिले तर आता आमच्यात कसलाच अपराधीपणा नसेल. आता आमच्याकडे वेळेची शिदोरी आहे त्यामुळे तिने तिची ती राहून गेलेली सफर करावी; मैत्रिणींसोबत मनसोक्त हसावे किंवा एखादा जुना विसरलेला छंद नव्याने जोपासावा. आयुष्याच्या या दुसऱ्या पर्वात मी माझा पुरुषी अहंकार पूर्णपणे विसरून तिचा सर्वात मोठा चाहता बनेन.

माझे पाचवे पाऊल भूतकाळाचे ओझे कायमचे उतरवून ठेवण्याचे असेल. संसाराच्या पहाटे आपल्या दोघांकडूनही अनेक चुका झाल्या; पैशांच्या ओढाताणीतून झालेले वाद; एकमेकांचे दुखावलेले अहंकार आणि नात्यांमधील कटकटी या सगळ्यातून आपण तावून सुलाखून निघालो आहोत. पण आता उरलेल्या प्रवासात हे जुने हिशेब मला सोबत न्यायचे नाहीत. ज्या गोष्टी आपण बदलू शकलो नाही त्याचे ओझे आता वाहायचे नाही. तिला मनापासून माफ करून आणि स्वतःच्या चुकांची क्षमा मागून एक पूर्णपणे कोरी पाटी घेऊन मला आयुष्याच्या वाटेवर पुढे चालायचे आहे.

माझे सहावे पाऊल आजारपणातल्या निस्वार्थ आधाराचे आणि समांतर एकांताचे असेल. विशीत आपण एकमेकांच्या हातात हात घालून जग जिंकण्यासाठी धावलो पण आता ती जीवघेणी शर्यत उरलेली नाही. ती बाल्कनीत तिच्या पुस्तकात रमलेली असताना आणि मी माझ्या जुन्या गाण्यांत हरवलो असताना आमच्यातली ती अथांग शांतता आम्हाला अधिक जोडेल. हा समांतर एकांत आम्ही जपू. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा औषधांच्या वेळा सांभाळताना किंवा दवाखान्याबाहेर वाट पाहत असताना मी तिचा तोच हात तितक्याच आश्वासकपणे धरेन. तारुण्यातला स्पर्श केवळ आवेगाचा होता पण आताचा माझा स्पर्श हा थेट तिच्या आत्म्याला मायेची ऊब देणारा असेल.

आणि माझे सातवे पाऊल वेळेचे भान ठेवून निखळ मैत्री जपण्याचे असेल. तारुण्यात वाटायचे आपल्याकडे अमर्याद वेळ आहे पण आता जाणवते आहे की आयुष्याच्या पुस्तकातील वाचून झालेली पाने आता उरलेल्या पानांपेक्षा नक्कीच जास्त आहेत. हातातून आयुष्याची वाळू वेगाने निसटते आहे. त्यामुळे आता कोणत्याही मृगजळामागे न धावता उरलेला अमूल्य वेळ मला तिच्यासोबत शांतपणे जगायचा आहे. इथून पुढचा प्रवास केवळ पती आणि पत्नी म्हणून नाही तर दोन अत्यंत जवळचे मित्र म्हणून आपण पार करू. मिळवण्याची धडपड कायमची संपवून या आयुष्याच्या सांजवेळी सूर्य मावळताना मी तिच्या अस्तित्वाचा आणि ती माझ्या प्रवासाची एकमेव आणि सर्वात सुंदर साक्षीदार बनेल.

माझ्या विचारांची तंद्री अचानक तुटली. मंडपात गुरुजींनी शेवटचा मंत्र म्हटला आणि समोरच्या माझ्या मावस भावाने शेवटचा फेरा पूर्ण केला. मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी भानावर आलो. माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या अर्धांगिनीकडे मी पाहिले. ती अत्यंत शांतपणे आणि कौतुकाने तो सोहळा पाहत होती. मी माझा हात हळूच तिच्या मांडीवर विसावलेल्या तिच्या हातावर ठेवला. तिने दचकून माझ्याकडे पाहिले पण माझ्या डोळ्यांतला तो प्रगल्भ आणि आश्वस्त भाव तिने एका क्षणात वाचला. मंडपातल्या त्या अथांग गोंधळातही आम्ही एकही शब्द न बोलता एकमेकांशी खूप काही बोललो होतो. तिने माझ्या हातावरची तिची पकड थोडी अधिक घट्ट केली आणि तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत तृप्त हास्याची लकेर उमटली. कोणत्याही अग्नीची साक्ष न घेताही पंचेचाळीशीनंतरची आमची ही नवी सप्तपदी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती.

लेखक :  श्री मंगेश दोरके

प्रस्तुती : श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो ऐकलंत का जरा! “

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी? “

“आता मला कसं कळणार,  ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते? “

“बरं,  बरं,  कळतात हो मला टोमणे! ते जाऊ दे,  सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय! बोल काय म्हणत होतीस तू? “

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या! “

“काय s s s s? “

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय? शेजारी पाजारी बघायला येतील,  काय झालं म्हणून! “

“अगं मग तू बोललीसच तशी! दसऱ्याला जसं सीमोल्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय? “

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई,  का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल? “

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय? तूच म्हणालीस नां,  की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून? “

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम! “

“अगं मग असं सविस्तर सांग नां,  मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस. “

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत! “

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर! ‘ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां? “

“म्हणजे? “

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही,  तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही? “

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून? ते बरं दिसत का? “

“हो ना,  मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां,  त्यालाच मी ‘इधर का माल… ‘

“कळलं,  कळलं! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे! “

“यात कसलं आलंय सिक्रेट,  ओपन सिक्रेट म्हणं हवं तर! बरं ते जाऊ दे,  तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं. “

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली,  तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे. “

“अगं पण तुला आईनं,  वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना,  मग? “

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात! “

“तेच ते,  अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी ‘ठुशी’ कशाला घ्यायची? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की? “

“नको गं बाई,  हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं. “

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत,  ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत. त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत,  त्या घेऊ या का? “

“अगं बाई,  त्या आणि कुठल्या? “

“प्रेशर कुकर आणि… “

“काय s s s? “

“अगं किती जोरात ओरडलीस? शेजारी पाजारी बघायला येतील ना? “

“अहो तुम्ही बोललातच तसं! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये. “

“अगं खरंच सांगतो,  हा प्रेशर कुकर बोलणारा आहे,  जो नुकताच नवीन आलाय बाजारात! “

“काय सांगताय काय? “

“अगं खरं तेच सांगतोय,  या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत! “

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते? “

“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना,  की हा बोलणारा कुकर आहे म्हणून,  मग त्याच्यात शिट्या कशा होतील? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा! “

“बरं,  मग? “

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one,  two,  three असे आवाज येतील,  त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या. “

“अस्स होय! मग बरंच आहे,  सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या! चालेल मला,  आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे,  पुन्हा कधी तरी बघू! “

“Ok,  मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू,  काय? “

“हो चालेल,  पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात,  ती कुठली? “

“आहे,  म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे. “

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात! “

“असं कोण म्हणत? “

“आम्ही बायकाच! “

“अगदी बरोबर,  पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का! बाकी सगळा उजेडच म्हणायचा. “

“कळलं,  कळलं! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय,  ती दुसरी वस्तू काय आहे ना,  ती बोला चटचट,  मला अजून बरीच कामं पडल्येत! “

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना,  तर नाचायलाच लागशील बघ! “

“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू,  पटकन त्याच नांव… “

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी! “

“का s s य? “

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना,  तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस. बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू! “

“झ ss का ss स ss! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला! “

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी… खरी सोन्याची ठुशी परवडली असती,  पण या दोन नवीन,  त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून,  स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला,  या विचारात पाडव्याला आडवा पडलो!

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ औदुंबर आणि अश्वत्थ… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ औदुंबर आणि अश्वत्थ… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

बालकवींचा औंदुंबर जसा सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे तसा गोविंदाग्रजांचा (राम गणेश गडकरी) *पिंपळ* (अश्वत्थ) परिचित आहे.

पुण्यातील कसबा पेठेतील ‘याज्ञवल्क्य आश्रमा’समोर हा पुराण अश्वत्थ होता. भोवती जडावलेला पार होता. त्यासमोर गडकरी मास्तर रहायचे. त्यांच्या घराच्या खिडकीतून तो पिंपळ दिसायचा.

त्याची सर्व रुपं मास्तरांनी डोळे भरून पाहिली असतील. त्याच्या पर्णांच्या प्रत्येक सळसळीचा अर्थ मास्तरांसारख्या कविह्रदयाच्या प्रतिभावान सारस्वताला कळला असेल. म्हणूनच त्यांना *पिंपळपान* ही सर्वपरिचित हळुवार कविता स्फुरली!

या पिंपळाच्या पारावर हुंदडण्यात माझी बालपणीची अनेक वर्षे गेली. समोरचे ‘येथे राम गणेश गडकरी रहात होते’ अशी पाटी असलेले घर जाता – येता दिसायचे.

कसबा सोडून आता चाळीस वर्षे लोटली आहेत. सगळा भूगोल बदललाय तिथला. दोन महिन्यापूर्वी कसब्यात जाण्याचा प्रसंग आला.

मुलीला बरोबर घेतलं. म्हटलं “चल,  आज तुला एक तीर्थक्षेत्र दाखवणार आहे”.

आवर्जून याज्ञवल्क्य आश्रमात गेलो होतो. तो पिंपळ आणि त्या भोवतीचा पार अजून तसाच असल्याचे दिसले. पिंपळाच्या काही शाखा ढाळल्या होत्या पण बाकी सगळं तसंच होतं.

पारावर विसावलो आणि सवयीप्रमाणे ‘मराठी भाषेच्या शेक्सपियर’च्या घराकडे दृष्टी गेली. आणि हे काय,  ते निळ्या रंगाचं लाकडी घर अदृष्य झालेलं! त्याजागी एक शिमिटाची अधुनिक वास्तू उभी राहिलेली दिसली.

मन हळवं झालं. हळहळलो ते पाहून. विषण्णपणे पारावर बसून राहिलो काही काळ. मी मुलीला मास्तरांचं घर अभिमानानं दाखवणार होतो. डोळ्याच्या कडा पाणावल्या किंचित. बाजूला बसलेल्या मुलीने विचारले,  “काय झालं? ” डोळ्यात काही गेलं का? गाँगल तरी घालायचा. किती प्रदूषण आहे गावात. “

मी तिला काय दाखवणार आता? माझं ‘ते तीर्थक्षेत्र’ उध्वस्त झालं होतं. भविष्यात त्याचा जीर्णोद्धारही होणार नव्हता कधीच!

पुण्यातली अशी अनेक तीर्थक्षेत्रं नगरविस्तारीकरणात काळाच्या उदरात गडप झाली आहेत आणि पुढेही होणार आहेत.

कालच वार्ता वाचली की आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य असलेले सदाशिव पेठेतील खजिना विहिरीजवळील नृसिंह मंदीर रस्ता रुंदिकरणात पाडले जाणार आहे म्हणे.

कालाय तस्मै नमः! 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शुभेच्छांचा दिवा तेवता राहो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “शुभेच्छांचा दिवा तेवता राहो…” ☆ श्री सुधीर करंदीकर

शुभेच्छांचा दिवा तेवता राहो… 

                             “गुढीपाडवा शुभेच्छा”

आज मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे, म्हणजे शालिवाहन शके १९४८ चा पहिला दिवस चैत्र शु १.

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

गुढी पाडव्याला मराठी नवीन वर्षाच्या आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा त्या ३६५ दिवसांकरता असतात. वर्ष सुरु होतांना पहिल्या दिवशी सगळीकडेच शुभेच्छांची भरपूर देवाण घेवाण सुरु असते, त्यामुळे तो दिवस छान जातो.

.. .. .. पण ज्यांना आपण शुभेच्छा दिल्या त्यांचे पुढचे ३६४ दिवस आनंदाचे जाण्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांची काहीच हालचाल नसते. नुसते एक दिवस हॅपी न्यू ईयर म्हणून संपूर्ण वर्ष नक्कीच आनंदाचे जाणार नसते.   

ह्या दिलेल्या आणि घेतलेल्या शुभेच्छा जर आपल्याला वर्षभराकरता फलद्रुप करायच्या असतील, म्हणजे हा शुभेच्छांचा दिवा जर आपल्याला वर्षभर तेवत ठेवायचा असेल, तर आपल्याला त्यात कायम तेल टाकत रहायला पाहिजे, म्हणजे त्याकरता वर्षभर काहीतरी करत रहायला पाहिजे.

आपण स्वतः जर वर्षभर आनंदी असलो तरच आपण इतरांना वर्षभर आनंद देऊ शकतो. आणि त्याकरता खालील सोपे सोपे बदल आपण स्वतःमधे करायचे आहेत –

मला जर कायम आनंदी राहायचे असेल तर हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईन्ड, हीच प्रूव्हन व्दिसूत्री आहे. ही व्दिसूत्री अस्तित्वात उतरवण्याकरता अतिशय सोपे / कुठलाही साईड इफेक्ट नसणारे / खर्च नसणारे, आध्यात्मिक गुरूंनी दिलेले  प्रिस्क्रिप्शन  हे असे आहे – — 

  • १)  रोज स्वत:करता एक तास द्या, त्यामधे –
  • २५ मिनिटे चालणे : मस्त बूट घाला, रंगीबेरंगी कपडे घाला. मोबाईल घरी ठेवा. फिरतांना ‘बिग नो’  टू घरगुती वाद  / नकारात्मक चर्चा.  रमतगमत चालणे – नो वे !  स्विफ्ट चालायचे आहे, ताठ चालायचे आहे.
  • १५ मिनिटे प्राणायाम -. ५ मिनिटे अनुलोम – विलोम,  ५ मिनिटे दीर्घ श्वसन, ५ मिनिटे ओंकार जाप.
  • १० मिनिटे  ध्यान  :  विचारशून्य अवस्थेमधे बसणे
  • १० मिनिटे व्यायाम : आपल्या शरीराच्या सर्व सांध्यांची हालचाल होईल असे अगदी सोपे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. आपण शाळेमध्ये पीटी च्या तासाला करायचो, साधारण तसेच.

आठवड्यातून ५ दिवस केले तर चालेल का ? वगैरे, असे कुठलेही ऑपशन्स याला नाहीत.

२) कळते पण वळत नाही —

‘कळते पण वळत नाही’ या म्हणीतून, या वर्षी आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. म्हणजे जे कळते, त्याला आता वळते करायचे आहे. तब्येत छान राहण्याकरता ‘जंक फुड खाऊ नका’, ‘अति तेलकट-तुपकट खाऊ नका’, ‘साखरेचा अतिरेक टाळा’, हे पण आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं. ज्या ज्या गोष्टींकरता, आपण ही म्हण वापरतो, त्या सगळ्यांना या वर्षी वळते करायचे आहे.

३) आलिया भोगासी असावे सादरं – चित्ती असू द्यावे समाधान —

ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यांचा मनापासून स्वीकार करायचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी असणे, फार महत्वाचे असते. समाधानी माणूसच मनन करू शकतो आणि परिस्थिती बदलू शकतो.

अप्रिय घटनांवर मनन केलं, तर समजू  शकतं, की,  आपलंच ‘असं – असं’ चुकलं होतं, किंवा आपण कुणाची तरी मदत घ्यायला पाहिजे होती. आणि चूक सुधारून पुन्हा आपल्याला घोडदौड सुरु करता येते.   

 ४) संवाद —

घरामध्ये आई-वडील, मुलं-मुली, सासु-सासरे, नवरा-बायको यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असेल, तर घर आनंदी राहतं आणि ओघानीच आपण पण आनंदी राहतो. आणि याकरता जरूर आहे संवादाची.

एकमेकांची विचारपूस करणे, काय हवे-नको ते विचारणे, इतरांच्या चांगल्या कामाचे नेहेमीच मनापासून कौतुक करणे – प्रशंसा करणे, या गोष्टींना या वर्षी महत्व द्यायचे आहे.

५) कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे —-

रोजच्या आपल्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. अशावेळेस, ह्यानी असं कां केलं ? त्यानी असं कां केलं ? हा असं कां वागतो ? वगैरे, काथ्याकूट करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो आणि हातात काहीच येत नाही. ज्ञानी मंडळी सांगतात – कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो. स्वभावाला औषध नक्कीच असते. पण ते  फक्त स्वतःचा स्वभाव बदलण्याकरता  – इतरांचा नाही. मी काय करावं एवढाच सोपा विचार मला करायचा आहे.

६) वर्तमानकाळात रहा —

आपण आपला ५० % वेळ भूतकाळातल्या कडू आठ्वणी उगाळण्यात घालवतो आणि ५० % वेळ भविष्याची काळजी करण्यात घालवतो. त्यामुळे ताणतणाव हेच आपले आयुष्य बनते. मन आणि शरीर यांना बरोबर ठेवणे, यालाच वर्तमानकाळात राहणे असे म्हणतात, यालाच योगसाधना म्हणतात, यालाच ध्यान म्हणतात. ताणतणाव मुक्ती करता हीच आनंदी राहण्याची महाऔषधी आहे.

७) कायम आनंदी चेहेरा —

कायम आनंदी चेहेरा – ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन हिंडणारे भंगारवाले नेहेमीच हसतमुख असतात. चहाची टपरी चालवणारे / रस्यावर झाडलोट करणारे, कायम हसतमुख असतात. मग आपलाच चेहेरा  एरंडेल तेल प्यायल्यासारखा का असतो ?

आपण नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहिलो आणि सकारात्मक-हसतमुख व्यक्तींना जवळ केले, तर हमखास हसतमुख राहता येते. आपल्या आवडीचे छंद, जसे वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, चित्रकला, वगैरे यामध्ये जर आपण रमलो तर आपल्या चेहेऱ्यावर हमखास आनंद फुलतो.

– – – मी जेव्हा समोरच्याला वर्ष आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो, तेव्हा माझा वर्षभर असा रोल असायला पाहिजे, कि, वर्षभर माझ्या प्रत्येक कृतीमधून, मी त्या व्यक्तीला आनंदच दिला पाहिजे. चांगले बोलून आनंद दिला पाहिजे. जरुरीच्या वेळेस मदतीचा हात पुढे करून आनंद दिला पाहिजे. कामासंबंधी विचारपूस करून आनंद दिला पाहिजे. घरच्यांची खुशाली विचारून आनंद दिला पाहिजे. नेहेमी संपर्क ठेवून आनंद दिला पाहिजे. असे वर्षभर करत राहणे, यालाच खऱ्या अर्थानी भरीव / ठोस शुभेच्छा देणे असे म्हणता येईल. हा बदल आपल्याला ह्या वर्षी नक्कीच करायचा आहे.

चला तर मग –  यावेळेस शुभेच्छांची देवाण घेवाण करतांना देणाऱ्यांनी  “ठोस” बनायचे आहे, आणि शुभेच्छा घेणाऱ्यांनी पण  “ठोस” बनायचे आहे. 

नवीन वर्षाकरिता माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि “ठोस” हार्दिक शुभेच्छा ! ! !

हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदानी आणि उत्साहानी भरलेले असो, आणि मंगलमय असो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अंकल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “अंकल…” ☆ श्री मंगेश मधुकर

“तुजसे नाराज नही जिंदगी,हैरान हू मै,परेशान हू मै….”गेले काही दिवस अशी अवस्था झालेली.मन थाऱ्यावर नव्हतं.सगळं व्यवस्थित चाललेलं.फार काही टेंशन नव्हतं तरीसुद्धा खूप उदास वाटत होतं.निराशा दाटलेली. मनापासून आनंद घेता येत नव्हता.यांत्रिकपणे रोजची कामं चाललेली.डॉक्टर मित्राच्या सल्ल्यानुसार तपासण्या केल्या पण रिपोर्ट नॉर्मल आले.विचार करून डोकं फुटायची वेळ आली. म्हणून अंकलना भेटायला गेलो.

“अरे वा,वा,चौथा खांब या”अंकलनी नेहमीसारखं हटके स्वागत केलं. 

“आता हे काय नवीन?”

“अरे तू मीडियावाला ना.लोकशाहीचा चौथा खांब….”

“प्रत्येकवेळी नवनवीन नावं द्यायला कसं सुचतं”

“आई शप्पथ!!मलाही माहीत नाही पण सुचतं आपोआप” डोळे मिचकावत अंकल म्हणाले.

“तुमच्याकडे आलं की छान वाटतं.एकदम मस्त फिलिंग” 

“म्हणूनच बऱ्याच दिवसांनी नव्हे महिन्यांनी भेटतोयेस.”

“इच्छा होती पण कामाच्या गडबडीत जमलं नाही”

“कसा आहेस”अंकलनी विचारल्यावर ओशाळल्यासारखं झालं वास्तविक मी विचारपूस करायला पाहिजे होती पण लक्षातच आलं नाही.आताशा आपण साधेसुधे मॅनर्स देखील विसरत चाललो आहोत.

“मी ठीकयं.तुम्ही कसे आहात.”

“मस्त,मजेत नेहमीसारखा”

“फार पेशंट दिसत नाहीत.”

“आता गर्दी स्पेशालिस्टकडे.आमच्यासारखे जुने डॉक्टर आता आऊटडेटेड.”

“एक विचारू..पर्सनल आहे”

“बिनधास्त”

“तुम्हांला कधीच हताश,कंटाळलेलं पाहिलं नाही.इतकी एनर्जी कुठून आणता.कायम फ्रेश असता. याचं सिक्रेट मलाही सांगा.”

“आयुष्य सोपं केलंय.”

“म्हणजे”

“मला आनंदी रहायला आवडतं म्हणून तसं राहण्याचा प्रयत्न करतो.”

“पण तरीही,त्रास असणारच ना.ते कोणाला चुकलेत”

“त्यालाच तर आयुष्य म्हणतात.समोर येईल ते स्वीकारायचं म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होते.त्यासाठीच काही सवयी मुद्दाम लावून घेतल्यात आणि काही बदलल्या.”

“उदारणार्थ..”

“आपली कुवत,मर्यादा ओळखून वागतो आणि स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकलोय.शक्य तेवढंच काम करतो.महत्वाचं म्हणजे कमी अपेक्षा ठेवतो त्यामुळे फार प्रॉब्लेम निर्माण होत नाही.”

“ऐकायला चांगलं वाटलं तरी प्रत्यक्षात असं वागणं फार अवघडयं.”

“हो पण अशक्य नाही.”

“आजकाल पैसा आहे पण मन शांत नाही असं का?.

“दिखाऊपणाच्या नादात आपणच आयुष्य अवघड करतो.अनेक त्रास स्वतःहून ओढावलेले असतात.मोठ्ठ कर्ज काढून खरेदी करायची आणि ईएमआयची वाळवी मेंदूला लावून घ्यायची.त्याचा तब्येतीवर परिणाम होतो.भरिस भर ताण आणि मोबाईल कायम सोबतीला असल्यानं सतत अस्वस्थ.”क्षणभर अंकल माझ्याविषयीच बोलत आहेत असं वाटलं. 

“पण तुम्हांलाही त्रास झाला असेलच ना.”

“खूप त्रास झाला.धाडस नाही.

अल्पसंतुष्ट,कचखाऊ,पळपुटा,डेरिंग नाही वगैरे वगैरे अशी भरपूर नावं मिळाली.“कुछ तो लोग कहेंगे” म्हणत सोडून दिलं.माझा निर्णय बदलला नाही अर्थात बायकोच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. आता आम्ही आनंदी आहोत. गरजेपुरता पैसा गाठीशी आहे.मुलाच्या संसारात डोकावायला नको म्हणून मुद्दाम वेगळं राहतो.एक रुपयाचं सुद्धा कर्ज नाहीये.रोजचा व्यायाम आणि जिभेवरचा ताबा यामुळं तब्येत उत्तम,जमेल तसं सहलीला जातो.एकूणच मस्त आयुष्य चाललंय.”अंकलचं ऐकून मला त्यांचा खूप हेवा वाटला.

“अजून एक महत्वाचं सांगतो.”

“काय ते..”

“आपले प्रॉब्लेम्स स्वतःलाच सोडवावे लागतात.प्रेमपत्र कितीह सुंदर लिहिलेलं असलं तरी जाहिरारित्या वाचायचं नसतं. तसंच आपले प्रॉब्लेम कितीही मोठे आणि महत्वाचे असले तरी इतर त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही.त्यात आजकाल तर मदत करण्याऐवजी सल्लाच दिला जातो.”

“थोडक्यात काय तर दाढदुखीचा ठणका ज्याचा त्यालाच सहन करावा लागतो.”

“करेक्ट.नेमकं बोललासं.उदाहरण आवडलं”

“तुमच्याकडूनच शिकलोय.हसू नका पण मी सुद्धा मदत मागायलाच आलोय.”

“ते लक्षात आलं.तू मागतोय म्हणून सल्ला देईन पण मान्य करायचा की नाही याचा निर्णय तुलाच घ्यायचाय.माझा आग्रह नाही.” अंकलशी बराच वेळ गप्पा मारल्या.मनातली खदखद मोकळी केल्यावर शांत वाटलं.अंकल काहीच बोलले नाहीत. 

“काही सीरियस”भीती भीत विचारलं.

“काहीही झालं नाहीये.हे मानसिक दुखणं आहे.टेंशन घेऊ नकोस.”

“विनाकारण उदास,निराश का वाटतं.”

“होतं असं.सर्व काही ठीक असलं तरी अनामिक काळजी वाटतेच.खूप विचार करतोस का?”

“हो.”

“विचारांची धुनी कायम पेटलेली.अनावश्यक, संदर्भहीन विचार येतात. स्वतःचाच राग येतो.घुसमट वाढते.शांत झोप नाही.मेंदू कायम सावध.करेक्ट!!”

“असंच होतयं.परफेक्ट निदान केलंत.पक्के मनकवडे आहात.हे कशामुळं?.”

“एकसूरी आयुष्य!!आजच्या भाषेत बोलायचं तर मोनोटोनस लाईफ!!सगळंच वरवरचं,तकलादू,तेच ते अन तेच ते आयुष्य.त्यातही आनंद घेण्यापेक्षा दाखवला जातो.त्यामुळे मन अस्थिर. एकाग्रता फार काळ टिकत नाही.भान हरपून जावं असं घडत नाही.स्वतःची नेमकी आवड,छंद कोणते?हेच समजत नाही.मेंढरांसारखे एकमेकांच्या पाठीमागे फरफटत जाऊन नकली आनंदी घेत राहतो.”

“अगदी खरंय,मी पण तेच करतोय.आवड साफ विरसलोय .”

“आधी त्याचा शोध घे.जे केल्यानं छान वाटतं,मूड चांगला होतो,आनंद मिळतो ते ते सर्व कर.आतापर्यंत घर,संसार,मुलं यांच्यासाठी केलसं.थोडं स्वतःसाठी जग…..आणि आता आज एवढा  डोस बास!!बाकी तू हुशार आहेस.चला”

“मी घरी सोडतो.”

“नको.माझी मर्सिडिज आहे ना” सायकलकडे बोट दाखवत अंकल हसले.मी वाकून नमस्कार केल्यावर  “कल्याणमस्तु!!” असा आशीर्वाद देऊन सायकलवर टांग मारून निघून गेले.पाठमोऱ्या अंकलकडे पाहताना अचानक डोक्यात ट्यूब पेटली लहाणपणी मला सायकल खूप आवडायची. भरपूर चालवली आणि नंतर सायकल सुटली ती कायमचीच.गेल्या कित्येक वर्षात सायकलला हातच लावला नव्हता.ठरलं तर मग…… नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले “ थॅंक्यू अंकल.” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खासियत जुन्या मैत्रीची…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “खासियत जुन्या मैत्रीची” ☆ श्री सुधीर करंदीकर

शाळा / कॉलेज सोडून बरीच वर्ष सरतात. तेव्हाच्या बऱ्याच मित्र / मैत्रिणींचे आपल्याकडे मोबाईल नंबर नसतात त्यामुळे कधी बोलणे नसते आणि भेट पण नसते. त्यातल्या कुणाची अचानक ५० वर्षांनंतर अचानक भेट व्हावी, आणि नुसती नजरानजर होताच त्यांनी एकमेकांना नावासकट ओळखावे, हे शक्यच नाही, असेच सगळे म्हणतील. कारण चेहेऱ्यात बदल झालेला असतो, डोक्याचे केस पांढरे झालेले असतात, माणसांना टक्कल पडलेले असते, आवाजात बदल झालेला असतो, वगैरे वगैरे. पण जुन्या मैत्रीत जर काही खासियत असेल, तर मात्र अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होतात. यावरचा माझा अनुभव वाचायला आवडेल.

– – – – –  

नेहमीप्रमाणे आज सकाळी ८ वाजता एकटाच फिरायला बाहेर पडलो. कोथरुडजवळ मृत्युंजय मंदिरासमोरून फुटपाथवरून जात होतो. अधून मधून इथे भेटणाऱ्या मैत्रिणी मनवा आणि मेघना यांची आठवण झाली. त्या परदेशी गेल्या असल्यामुळे त्यांची भेट होणार नव्हतीच. चहाच्या टपरी जवळ आलो, चहावाल्यांना हात केला, आणि पुढे निघालो. समोरून एक मॅडम येत होत्या.

यांना केंव्हातरी खूप जवळून बघितलंय असं जाणवलं. मॅडम ना पण तसंच वाटलं असावं, असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसले. एकमेकांकडे बघत बघत आम्ही एकमेकांना क्रॉस झालो. दोघं थोडं पुढे गेलो, आणि दोघांनी एकदमच मागे वळून बघितलं. खूप जवळची ओळख आहे असं दोघांनाही जाणवलं.

आणि गंमत म्हणजे आम्ही दोघेही उलटं म्हणजे मागे मागे चालायला लागलो. चालत चालत शेजारी शेजारी आलो आणि हसत हसत आपोआपच एकमेकांशी हात मिळवणी झाली.

आणि दोघे एकदमच म्हणालो

मॅडम : अरे, सुधीर तू…

मी : अरे, छाया तू…

(आम्हाला रस्त्यावर उलटं चालताना बघून जाणारे येणारे पण जरा थबकलेच की हा काय प्रकार आहे.)

दोघे एकदम : ग्रेट सरप्राईज. कॉलेज सोडल्यानंतर म्हणजे ५० वर्षानंतर आज अचानक भेट.

छाया : सुधीर, तुझा एकदम सेम स्मायलींग फेस. नो चेंज

मी : छाया तुझा पण तोच आनंदी चेहरा, नो चेंज

दोघेही : आणि तेच उलटं चालणं. आणि म्हणून तर एकदम ओळखू शकलो ५० नाही ५२ वर्षांनंतर

जुन्या आठवणी आणि गप्पा सुरू होत्या, एवढ्यात बाजूला असलेल्या चहाच्या टपरी चे मालक आले आणि

म्हणाले : दादा, चहा इथेच आणून देऊ, का, दुकानात येऊन घेणार.

मस्त चहा झाला. ५२ वर्षात भेट तर नाहीच आणि एकमेकांचे मोबाईल नंबर माहित नसल्यामुळे कधी फोनवर बोलणे पण नव्हते. भरपूर जुन्या जुन्या म्हणजे कॉलेजमधे ५ वर्ष बरोबर होतो त्या वेळच्या गप्पा सुरू झाल्या. किती वेळ बोलत होतो, हे समजलंच नाही. चहावाले सांगायला आले, दादा ऊन वाढतंय, दुकानासमोर सावलीत खुर्चीवर बसून गप्पा मारा.

दोघंही भूतकाळातून वर्तमान काळात आलो.

पुन्हा असंच भेटायचं ठरलं आणि इथेच भेटायचं ठरलं.

बाय-बाय झालं आणि जुन्या आठवणीं मध्ये रमत रमत आपापल्या मार्गाला लागलो.

घरी गेल्यानंतर ही आगळी वेगळी भेट कॉलेजच्या ग्रुपवर सविस्तर टाकली. आणि माझी पोस्ट वाचून एका कॉलेज मित्राचा मेसेज आला –

तुझी आणि छायाची इतक्या वर्षानंतर अचानकपणे भेट होणे / गप्पा होणे आणि ते पण रस्त्यावरती सहज फिरता फिरता, म्हणजे आश्चर्यच आहे. तू लिहिलेली घटना वाचता वाचता मी पण कॉलेज डेज मधल्या भूतकाळात गेलो. मला चांगलं आठवतंय, कुठलाही पिरियेड संपला, आणि पुढच्या पिरेडला वेळ असला, तर सगळे मुलं मुली क्लास बाहेरच्या मोठ्या पॅसेजमध्ये गप्पा मारत उभे असायचे, काहीजण क्लास रूम मध्ये अभ्यासाचे वाचत असायचे. तू आणि छाया मात्र अशा वेळेस कायम पॅसेज मध्ये उलटे चालत चालत गप्पा मारत असायचे. मला आठवतं पूर्ण कॉलेजमध्ये उलटे चालत गप्पा मारणे ही तुमची खासियत होती.

आज पण तुम्ही दोघांनी उलटे चालून तेच दोघेजण आहात ही खात्री मात्र मस्त करून घेतली. नाहीतर कुणीही दोघांची बऱ्याच वर्षानंतर अचानक भेट होते तेव्हा त्यांचे बोलणे साधारण असे असते –

तुम्ही सुधीर करंदीकर ना! किंवा तुमचं नाव अमुक अमुक आहे ना! तुम्ही भोपाळच्या कॉलेजमध्ये होता ना! अशी सुरुवात होते.

आणि तुमची ५२ वर्षानंतर भेट झाली तेव्हा, डायरेक्ट ओळख पटल्यासारखेच, सुधीर तू … छाया तू… अशी सुरुवात झाली. ग्रेट, सिंपली ग्रेट.

मी पण तिथे असतो तर मजा आली असती. बहूदा गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली असती. आणि चहा वाल्यानी पुढच्या चहाबरोबर ब्रेड पण दिली असती.

भेटत रहा, मजा करा, जुन्या आठवणी कळवत चला…

बाय-बाय.

दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या मित्रांचा व्हाट्सअप वर ग्रुप मिटिंग कॉल आला – माझ्या आणि छायाच्या अचानक भेटीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. आणि ५२ वर्षांनंतर आम्ही एकमेकांना एका क्षणात ओळखले यावर आधी कुणाचाच विश्वास बसत नव्हता. पण कॉलेजच्या आम्ही काय काय गप्पा मारल्या, ते सांगितल्यावर सगळ्यांची खात्री पटली. एक जण म्हणाला मला जरा छाया चा मोबाईल नंबर दे. फोन लावून बघतो ओळखते का मला पण! आणि जरा कॉलेजच्या गप्पा मारू. मज्जा येईल.

मी म्हटलं देतो देतो, आणि लक्षात आलं, काल गप्पांच्या ओघामध्ये, आपण छायाला ती पुण्यात कुठे राहते, पास आउट झाल्यानंतर कुठे नोकरी केली, इथे घरी कोण कोण असतं, आणि मुख्य म्हणजे तिचा मोबाईल नंबर काय आहे, हे सगळेच विचारायला विसरलो होतो.

मित्रांचा आधी विश्वास बसला नाही. पण नंतर त्यांना पटलं की इतक्या वर्षांनंतर जुन्या गप्पां मध्ये रंगल्या नंतर असे होऊ शकते.

आता असेच सकाळी फिरताना छाया कधी भेटते, तिच्याबरोबर रस्त्यावर उलटे कधी चालतो, याच्या मी प्रतिक्षेत आहे.

भेट होणार हे नक्की आणि ती पण मृत्युंजय मंदिराच्या समोरच हे पण शंभर टक्के पक्के.

ही माझी गोष्ट वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये पण तुमच्या शाळेतल्या / कॉलेजमधल्या मैत्रिणीं बरोबरच्या / मित्रांबरोबरच्या आठवणी जाग्या होतील, आणि त्या आठवणींमध्ये तुम्हाला छान रमता येईल, कदाचित माझ्यासारखी अशी अनपेक्षित भेट पण होईल, हे नक्की.

चलो, बाय बाय ….

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज… – ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज…  ☆ राधिका भांडारकर ☆

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज

यांना सविनय दंडवत..

राजा कसा असावा? हा प्रश्न जगात कुणालाही विचारला तर त्याचे उत्तर एकच, ”राजा असावा तर शिवाजी सारखा”.

महाराज! नुसत्या आपल्या नामोच्चाराने आम्ही रोमांचित होतो! शिवरायासारखा एक जाणता राजा या देशात, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, आणि त्याने कधीही विसर न पडणाऱ्या पराक्रमाचा, संस्काराचा, नैतिकतेचा, महान इतिहास घडवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच.

व्हिएतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. पण युद्ध लांबले. अमेरिकेस माघार घ्यावी लागली. व्हीएतनामचा विजय झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांच्या विजयाचे रहस्य विचारले असता, ते उत्तरले,

“युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीती ठरवली. आणि ती ठामपणे राबवली. आणि आम्ही विजयी झालो. ”

पत्रकारांनी विचारले, “तो हिंदुस्थानी राजा कोण? ”

राष्ट्रपती उत्तरले, छत्रपती शिवाजी महाराज. हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केले असते. ”

याच राष्ट्रपतींनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की,

“माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला! ”– — आणि आजही त्यांच्या कबरीवर हे वाक्य वाचायला मिळते.

महाराज असे तुम्ही! जगाचे आदर्श राजे. आपल्याबद्दल म्या पामराने काय आणि किती बोलावे?

शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य आणि शक्तीही. आपल्या नावानेच आमचे हृदय उचंबळते.

पण महाराज आज या पत्राच्या निमित्ताने, एक खेदही व्यक्त करावसा वाटतोय्. आज कुठेतरी आपल्या ऐतिहासिक नावाचा, आदर्शाचा, पराक्रमाचा केवळ दुरुपयोग केला जातोय. स्वार्थी माणसे निमित्त साधून भांडणे, दंगली माजवतात. झुरळ मारायची ही शक्ती नसलेली ही माणसे, केवळ मतांसाठी छाती फुगवून, “आम्ही शिवरायांचे वंशज आहोत! ” अशा आरोळ्या ठोकतात. याचे प्रचंड दुःख होते. मान खाली जाते. लाज वाटते.

महाराज! या अशा रणछोडदासांसाठी मी आपली नम्रपणे क्षमा मागते. आणि यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना ही करते. शिवाजीचे वंशज म्हणून त्यांना खरोखरच अभिमान असेल तर त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करावा. लोकनेता कसा असावा याचे ज्ञान मिळवावे.

आपली,

प्रयत्नपूर्वक आपले आदर्श जपणारी कुणी एक…

©  राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

??

☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

विसाव्या वर्षी अपघातामध्ये दोन्ही पायातली ताकद गमावली. त्यावेळेपासून चालणं फिरणं बंद झालं. वडिलांना वाचनाचा छंद होता. खूप कमी वयात चांगली पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून ग्रामीण साहित्याची गोडी लागली. पुस्तकातील विचारांनी जगण्याची उमेद दिली. सकारात्मक दृष्टिकोन दिला. पाय चालत नाहीत म्हणून लेखणी हाती घेतली. मग वाट मिळाली. हळूहळू लेखणीच पाय बनली. सुरुवातीला मन रितं व्हावं म्हणून लिहीत होतो नंतर ग्रामीण माणसांच्या कथा-व्यथा लिहू लागलो.

सांगलीजवळच्या कर्नाळ या खेडेगावात लहानाचा मोठा झालो. माझ्या कथांचे नायक, नायिका या गावातील कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यातील व्यथा-वेदना काल्पनिक नसून अवतीभवतीच्या व कृष्णाकाठच्या आहेत. हे सगळं अनुभूतीतून आलेलं वास्तवदर्शी लेखन आहे. असं जरी असले तरी या कथा लिहून मी काय फार मोठं काम केलं नाही. उलट मी ज्या शेतकरी कुटुंबात जन्मलो, ज्या मातेच्या पोटी जन्मलो, ज्या मातीतून उगवलो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी कर्तव्य भावनेतून मी लिहितो.

माझ्या ‘सांगावा’ या पहिल्याच कथासंग्रहातील बहुसंख्य कथा नातेसंबंधावर आधारित आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे नात्यामधील वाढलेलं अंतर, हरवलेलं प्रेम, जिव्हाळा, ओलावा, माणूसकी या कथांतून आली आहे. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहामध्ये प्रामुख्याने शेती-शेतकरी या विषयांशी संबंधित कथा आहेत. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतीला पाणी असल्याने सुखी, संपन्न मानला जातो. परंतु या शेतकऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत, त्यांचेही वेगवेगळे प्रश्न आहेत. ते शासनदरबारी मांडण्याचा, इतरांना सांगण्याचा प्रयत्न मी या कथांच्या माध्यमातून केला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, व्यथा-वेदनांबरोबरच काही प्रश्नांची सकारात्म उत्तरे शोधायचा प्रयत्न मी केला आहे.

गाव हा सगळ्यांच्याच आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असतो. आज गाव बदललंय, बदलतंय… गावावर ग्लोबल वॉर्मिंग, माॅल, ढाबा संस्कृती टी. व्ही. , मोबाईल अशी अनेक आक्रमणे आली आहेत. गावात अनेक सेवा, सुविधाही आल्या आहेत. गावातल्या अनेक परंपरा बंद पडल्या आहेत. जुनी अलुतेदारी-बलुतेदारी पार मोडीत निघाली आहे. झाडांची संख्या घटली आहे. देशी गाय, बैलजोडी, कावळे, चिमण्या दुर्मीळ झाल्या आहेत. पण हळूहळू माणूसही माणसांपासून दुरावतोय. मनामनातलं अंतर वाढतंय. भोवतालचं जग आभासी बनतंय. आपण करीत असलेली प्रगती पोकळ वाटतेय… तरीही ही सगळी आक्रमणे पचवून आज गाव कसं उभं आहे. हे गावातील बदल, गावातील अस्सल, इरसाल माणसं आणि जुना गावागाडा ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात आला आहे.

कथेबरोबरच ‘पाय आणि वाटा’ या नावाने माझा एक ललितसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. मला वीस वर्षे पाय होते आणि वीस बाबीस वर्षे मी पायांशिवाय जगलोय. पाय असण्यातलं सुख आणि पाय नसण्याचं दु:ख समान पातळीवर ठेवून हे लेखन करायचा प्रयत्न मी केला आहे. वीस वर्षे पायाने अनुभवलेल्या संवेदना या लेखनात एकवटलेल्या आहेत. त्याबरोबरच मराठी बोलीभाषा टिकल्या पाहिजेत तरच आपली संस्कृती टिकेल या भावनेतून मराठीतील दुर्मीळ बावीस बोलीतील बावीस कथांचे संपादन ‘मायबोली रंग कथांचे’ या अनोख्या पुस्तकात केले आहे. पुस्तके वाचल्यामुळे मी जिवंत राहिलो! लेखनामुळे प्रेरणा मिळाली. पुस्तकांचे, मायमराठीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. हे उपकारांची अल्पशी परतफेड या शब्दांची सेवा करून केला आहे.

माझ्या हालचालींना-लेखनाला मर्यादा आहेत. मला बसून लिहीता येत नाही. एका कुशीवर झोपून रोज दोन पाने मी लिहू शकतो. सातत्याने वीस-पंचवीस वर्षाच्या दीर्घ लेखनातून तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. चांगला वाचक मिळण्याच्या बाबतीत मी नशीबवान आहे. पहिल्या ‘सांगावा’ या कथासंग्रहाच्या पाच आवृत्ती प्रकाशित झाल्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकनेते राजारामबापू पाटील पुरस्कारांसह अनेक पुरस्कार या संग्रहास मिळाले. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यासही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा मानाचा कै. शंकर खंडू पाटील पुरस्कार, माणदेश साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच माझी कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. काॅम. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे, हा माझा सन्मान नसून मी करीत असलेल्या सेवेचा सन्मान आहे. माझ्या पुस्तकांवर मान्यवर समीक्षकांचे चार समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले. अनेक मराठी अभ्यासकांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरांवर शोधनिबंध सादर केले असून एमफीएल, पीएचडी संशोधनासाठीही या साहित्याची निवड झाली आहे. तरीही मी माझ्या कथा लेखनावर अजिबात संतुष्ट नाही. मला सतत वाटत राहते, आपण आणखी चांगली कथा लिहिली पाहिजे.

*****

©  श्री सचिन वसंत पाटील

संपर्क – विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज जि. सांगली, पिन कोड ४१६ ३०४  मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares