मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

(वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.) इथून पुढे —

त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे  मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.

आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहू शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे  पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.

आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावनाज बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात  घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन  जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.

जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.

दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.

आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं. 

आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती  ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.

हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.       

आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा  सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून  गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,

           कबीरा जब हम पैदा हुए 

           जग हॅंसे हम रोये 

           ऐसी करनी कर चलो 

           हम हॅंसे जग रोये |

या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे.

आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.

प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.

              माहेरच्या पायरीला

                 टेकविला माथा 

              जिने जीवनविद्येची

                 शिकविली गाथा ||

— समाप्त —

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

“माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वा”चा विचार करीत असताना “घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे”  या प्रसिद्ध भावगीताप्रमाणे माझी अवस्था  झाली. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व घरातच असताना का शोधाशोध करायची ? या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जन्मापासून माझे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेले आहे.  “जिच्यामुळे माझे अस्तित्व ते प्रभावी व्यक्तित्व” म्हणजे माझी आई माझी. माझी आई ती. मालतीबाई बाळकृष्ण देव ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील सुप्रसिद्ध वकील श्री. आप्पासाहेब देव यांची पत्नी. आई म्हणजे एक अतिशय कणखर, प्रभावी, हुशार, आदर्श व्यक्तिमत्व होतं. गोरी, उंचीपूरी, लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर गजरा किंवा वेणी, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि मोजके ठसठशीत दागिने घातलेली आई एकदम भारदस्त, रूबाबदार दिसायची‌.

आईचं माहेर दहिवडी. सातारा जिल्ह्यातील नामवंत वकील श्री. बापूराव कुबेर यांची ती सर्वात धाकटी कन्या मुक्ताबाई. ती खूप लहान असतानाच मातृसुखाला वंचित झाली. पण आजोबांनी अतिशय डोळसपणे तिला वाढवले. ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे’त आईचे शिक्षण झाले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्या. उत्तम हार्मोनियम वाजवायला शिकली. वस्तीगृहातील कामांमुळे अनेक कौशल्यं शिकत स्वावलंबी बनली.

लग्नानंतर आई  वाईला आली. तिथून दीड-दोन वर्षात १९४८ साली माळशिरसला  बिऱ्हाड केले. आई माहेरी अगदी लाडाकोडात वाढलेली. तिथे खूप सुबत्ता पण होती. तरीही माहेरचं ऐश्वर्य सोडून ती आपल्या संसारात मनापासून रमली. सुरुवातीच्या काळातली दगदग, त्रास, कष्ट तिने आनंदाने सोसले. आनंदी सहजीवनाची ही पायाभरणी होती. हळूहळू संसाराची घडी बसत गेली. गावाजवळच्या  शेतात घरही झाले. पण तिथे लाईट यायला मात्र १९७० साल उजाडावे लागले. तोपर्यंत कंदीलाची सोबत होती. सर्व कामे घरातच करावी लागत. आजच्यासारखे तयार काहीच मिळायचे नाही. जात्यावर दळायचे, चुलीवर स्वयंपाक. दिवसा कामाच्या व्यापातून सवड नाही मिळाली तर रात्री जागून फराळाचे करायचे. आई अतिशय सुगरण. सर्व फराळाचे पदार्थ, रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करायची.

खरंतर आई अतिशय कलासक्त होती. अनेक गोष्टींमध्ये ती पारंगत होती. प्रत्येक गोष्ट  ती अगदी मनापासून करायची. तिला फुलांची खूप आवड होती. गजरा, वेण्या करून सर्वांना देण्याची भारी हौस. स्वतः अंबाड्यावर वेणी घातल्याशिवाय ती कधी बाहेर जायची नाही. आई आणि फुलाचा गजरा हे समीकरण अजूनही सर्वांना आठवते. घरी रवा पिठी काढून  उत्तम शेवया करायची. चिरोटे तर अगदी अलवार व्हायचे. क्रोशाचे विणकाम, मण्याची तोरणं, वायरच्या पिशव्या बनवायची. त्या त्या काळातल्या प्रचलित गोष्टी ती शिकत, करत गेली. पण कोणतीही गोष्ट आखीव रेखीव करण्यात तिचा हातखंडा होता. स्वयंपाक करताना अगदी कोशिंबीर असो, भाजी असो, पोळ्या भाकरी असो नाहीतर पक्वान्न ते अगदी पद्धतशीर निगुतीनेच झाले पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा. घाई गडबडीने गोष्टी ‘उरकणे ‘हे तिला मान्यच नव्हते. त्यामुळे स्वयंपाकाची नेहमी पूर्वतयारी सज्ज असायची.  

कोणतीही नवीन गोष्ट  शिकण्याची भारी हौस. वयाच्या ७०व्या वर्षी क्राॅसस्टिचचे विणकाम तर ७५ व्या वर्षी पोतीच्या मण्यांचे दागिने करायला शिकली. अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवली. शेवटपर्यंत तिच्या मनातलं हे उस्फुर्तपण जागं होतं.

शिस्त हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कसलाही कंटाळा न करता वेळच्यावेळी कामे करी. कोणतीही लहान मोठी गोष्ट गरजेला ऐनवेळी हातात हजर असे. आई कधीच दुर्मुखलेली किंवा अव्यवस्थित नसायची. नेहमी नीटनेटके आवरून उत्साही, आनंदी असायची. सर्व कामे चटाचट उरकून पोथी वाचे, आवडीचे काम करत असे. वर्तमान पत्र वाचून राजकीय, सामाजिक गोष्टींबाबत सजग असायची.

आपल्या बोलक्या स्वभावामुळे तिने खूप माणसे जोडली होती. स्मरणशक्ती चांगली त्यामुळे नावे, इतर संदर्भ लक्षात राही. त्यामुळेच ती वैयक्तिक संवाद छान साधू शके. त्यातूनच जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. कुणाच्याही आनंदात ती चटकन सामील व्हायची आणि दुःखात मदतीला जायची. त्यामुळे लोकंही तिला खूप मानत असत. माणसं जोडण्याची आईची ही कला शिकण्यासारखी आहे.

संसारात तिलाही अडचणी, संकटं आली‌.पण ती कधी  खचली नाही. कायम वडिलांच्या साथीला खंबीरपणे उभी राहिली. वडील सोलापूर जिल्ह्यातले निष्णात वकील होते. पण सुरुवातीचे दिवस खूप दगदगीचे होते. वकिली व्यवसाय वाढवण्यासाठी आईने खूप मदत केली. एसटीची सोय नसल्याने खेडेगावातून आलेले पक्षकार रात्री मुक्कामाला रहात. त्यांना स्वतः बनवून जेवण देई. दिवसाही कुणी ना कुणी पंगतीला असेच. यातूनच अनेकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले. 

आई वडील श्रद्धाळू, भाविक होते. खूप गोष्टींवरची त्यांची श्रद्धा डोळस होती. गावातल्या मारुतीरायाला अनेकदा तिने दिवे लावण्याचा नेम केला होता. याचे नक्की फळ तिला काय मिळाले हे सांगता येणार नाही. पण तिला मानसिक बळ नक्की मिळायचे. त्यासाठी गावात चालत जाणे, वेळ पाळणे आवश्यक होते. चालण्याने व्यायाम व्हायचा. यामागे काहीतरी नेम केला की हातून देवाची सेवा नियमितपणे होते हे विचार सूत्र होते. यातून मन प्रसन्न राहायचे हे मात्र खरे. 

आई वडीलांची पांडुरंगावर खूप श्रद्धा होती. दोघांनाही वारीची आवड होती. आईने ३०-३२ वर्षे तर वडिलांनी १७ – १८ वर्षे वारी केली. वारीला जाऊन आल्यावर आपला दृष्टिकोन बदलतो. गरजा कमी होतात हे आई वडिलांच्या वागण्यातून जाणवायचे. आईने सुरवातीला ओढगस्त सोसली तशीच अगदी भरभराट पण उपभोगली. पण कसला हव्यास नव्हता. आहे त्यात आनंद मानायची समाधानी वृत्ती होती.

मला गाण्याची आवड लागली ती आई वडीलांमुळेच. दोघांचेही आवाज छान होते. आईच्या तर परीक्षा झालेल्या होत्या. घरी पेटी, तबला, मृदुंग होता. दर गुरुवारी भजन होत असे. दारापुढच्या ओट्यावर रात्री जेवणानंतर आमच्या सगळ्यांच्या गाण्यांनी रंगलेल्या खूप चांदरात्री आठवतात.

यातूनच माझी शब्दांशी, सुरांशी मैत्री झाली. वडीलांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सर्व भाषा उत्तम अवगत होत्या. प्रचंड पाठांतर होते. त्यांचे वक्तृत्व ओघवते आणि लिखाणात शारदेचा वरदहस्त लाभलेला होता. हीच शब्दांची ओढ, लिखाणाचे थोडे कसब मला त्यांच्याकडून लाभले हे माझे मोठे भाग्य आहे. वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली. 

क्रमशः भाग पहिला 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

तीन महिन्याच्या बाळाला  दाईपाशी ठेवून कामावर जाणाऱ्या आईला 

दाईनं विचारलं ~ “ काही राहून तर नाही ना गेलं ?  पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?

— आता ती कशी हो, हो म्हणेल ?

पैशापाठी पळता-पळता,  सगळं काही मिळविण्याच्या महत्वाकांक्षेपोटी —

ती जिच्यासाठी एवढा आटापिटा करतेय —  तीच तर राहून गेलीय !

 

लग्नात नवऱ्यामुलीस सासरी पाठवताना –  लग्नाचा हाॅल रिकामा करून देताना 

मुलीच्या आत्यानं विचारलं ~ “ दादा, काही राहून तर नाही गेलं ना ? चेक कर जरा नीट..!

— बाप चेक करायला गेला, तर वधूच्या खोलीत काही फुलं सुकून पडलेली दिसली.

— सगळंच तर मागं राहून गेलंय…. २१ वर्षे जे नाव घेऊन आपण जिला लाडानं हाक मारत होतो,

… ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि …. त्या नावापुढे आतापर्यंत अभिमानानं जे नाव लागत होतं, 

— ते नावही आता तिथंच राहून गेलंय.

 

“ दादा, बघितलंस ? काही मागे राहून तर नाही ना गेलं ?”

— बहिणीच्या या प्रश्नावर, भरून आलेले डोळे लपवत बाप काही बोलला तर नाही, 

पण त्याच्या मनात विचार आला~

—  सगळं काही तर इथंच राहून गेलंय .!

 

मोठी मनिषा मनी बाळगून मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,

– आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.

नातवाच्या जन्मावेळी मोठ्या मुश्किलीनं तीन महिन्यांचा  व्हिसा मिळाला होता,

– आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~ “ बाबा सगळं काही चेक केलंय ना ?—

काही राहून तर नाही ना गेलं ?” 

— काय सांगू त्याला, की आता…. “आता राहून जाण्यासारखं  माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!”

 

सेवानिवृत्तीचे दिवशी पी.ए. नं आठवण करून दिली ~

— “ चेक करून घ्या सर ..! काही राहून तर नाही ना गेलं ?”

– थोडं थांबलो, आणि मनात विचार आला, “ सगळं जीवन तर इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.

— आता आणखी काय राहून गेलं असणार आहे?”

 

स्मशानातून परतताना ….. मुलानं मान वळवली पुन्हा एकदा, चितेकडे पाहण्यासाठी …

—   पित्याच्या चितेच्या भडकत्या आगीकडे पाहून त्याचं मन भरून आलं.

—  धावतच तो गेला — पित्याच्या चेहऱ्याची एक  झलक पाहण्याचा असफल प्रयत्न केला….

—  आणि तो परतला…….  मित्रानं विचारलं ~-  “ काही राहून गेलं होतं कां रे ?”

—    भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~  “ नाही , काहीच नाही राहिलं आता — आणि जे काही राहून गेलंय,

ते नेहमीच माझ्या सोबत राहील !”

 

एकदा… थोडा वेळ काढून वाचा—कदाचित …जुना काळ आठवेल, डोळे भरून येतील, आणि

– आणि आज मन भरून जगण्याचं.. कारण मिळेल   ..

 

मित्रांनो !  कुणास ठाऊक ? केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल….. 

 

— असं काही होण्याआधी सर्वांना जवळ घ्या, 

              त्यांच्या पाठीवर हात फिरवा.

              त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या

              जेणेकरुन काही राहून जाऊ नये ..!!!                                      

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आयुष्याचं सार्थक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ आयुष्याचं सार्थक … ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

आज मी माझ्या घराला विचारलं की मी तुझ्यात कसा राहू? म्हणजे मला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल !

माझ्या रहात्या खोलीनेच मला अगदी अचूक उत्तर दिलं.

सीलिंग म्हणालं – माझ्यासारखं उंच स्वप्न डोळ्यापुढे असू दे !

पंखा म्हणाला – डोकं शांत ठेवायला शीक !

घड्याळ म्हणालं – नेहेमी वेळेचं भान असावं !

कॅलेंडर म्हणालं – स्वत:ला कायम अप् टु डेट ठेवायला शीक !

पैशाचं पाकिट म्हणालं – भविष्यासाठी बचत करायला हवी !

आरसा म्हणाला – आपल्या मनाचं प्रतिबिंब निरखून बघ !

दरवाजा म्हणाला – मनाच्या दारांना कड्या-कुलुपं नकोत !

खिडकी म्हणाली – दृष्टी व्यापक असेल तर सृष्टी नीट कळेल आणि सौख्याची वृष्टी होइल !

भिंती म्हणाल्या – संकट काळातही ताठ उभं रहाता आलं पाहिजे !

खुंटी म्हणाली – कुठचेही प्रश्न लोंबकळत ठेवायचे नाहीत !

फरशी म्हणाली – पाय नेहेमी जमिनीवर असावेत !

एवढं सगळं ऐकल्यावर नाही म्हटलं तरी थोडा उडालोच !

उदासपणे बेडकडे बघितलं.

बेड म्हणाला – डोकं पिकेल तुझं. आता एक उशी घे आणि सरळ ताणून दे ! त्यानं सौख्य मिळेल आणि आयुष्याचं सार्थकही होईल. बाकी सगळी मोहमाया आहे !!!

© सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जुन्या मैत्रिणी, नवीन आठवणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ जुन्या मैत्रिणी, नवीन आठवणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

दोन दिवसापूर्वी अचानक जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. ‘आपल्याला ८ फेब्रुवारी २०२३ बुधवारी जायचे आहे.’ पाठोपाठ दुसऱ्याही मैत्रिणीशी बोलणे झाले. कधी,कुठे अशा प्रश्नांना वावच नव्हता. इतकी वर्षे सहल, खेळ, शाळा या सर्वांचे नियोजन करणे चालूच होते. मग मी ठरवले होते आता आपण सहलीला मैत्रिणी नेतील तिकडे जायचे.आणि बुधवार सकाळपासूनच आश्चर्याचे सुखद धक्के मिळू लागले. अगदी रिक्षा,बस हे सर्व अगदी वेळेवर आणि उत्तम स्थितीत असणारे हजर झाले.आणि जसजसे एकेक मैत्रीण गाडीत चढत होती तसतसे आश्चर्य वाढतच होते. कारण जुन्या (खूप वर्षापूर्वीच्या) मैत्रिणी नव्याने भेटत होत्या. एकमेकींची विचारपूस करत, गळाभेट घेत असताना सगळ्या आनंदात ठिकाण कधी आले कळलेच नाही.

मग तर अगदी बालपणच गवसले. एकमेकींची थट्टा, मस्करी, विनोद सुरू झाले. झोके खेळणे, नाचणे, गाणी म्हणणे, ट्रॅक्टर राईड, बोटिंग, सुग्रास जेवण, उत्तम नाश्ता…  सगळेच खूप एन्जॉय केले. अगदी सगळे आयते पुढ्यात येत होते. आणि साऱ्याजणी वय, दुखणी, केसातील चांदी, जबाबदारी, नातवंडे, सगळे विसरून मस्त हसत, खिदळत होत्या.

आजच्या १० तासांच्या मैत्रिणींच्या सहवासाने अगदी सगळ्यांनाच नवीन ऊर्जा नक्कीच मिळाली. आणि जुन्या मैत्रिणींची नवीन परिपक्व ओळख झाली.

त्या सर्व मैत्रिणींना, सर्वांना घरापासून घरापर्यंत पोहोचवणारे उत्कृष्ट नियोजन, सुखरूप नेऊन घरापर्यंत आणणारे चक्रधर ( ड्रायव्हर ) आणि दगदग धावपळ यातून निवृत्त होऊन सेवानिवृत्तीचे आयुष्य नव्याने सुरू करणाऱ्या माझ्या परिपक्व मैत्रिणी ….या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद !

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंद्रधनुष्य… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ इंद्रधनुष्य… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उन्हाळ्याचे दिवस ! काही दिवस अशा कडक उन्हाचे संपल्यावर वळिवाची चाहूल लागली. एकदम अंधारूनच आले, आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला ! आला आला तो पाऊस म्हणेपर्यंत बाहेर टप टप गारांची बरसात होऊ लागली. पांढऱ्या शुभ्र गारांनी अंगण भरले. किती वेचू असं मनाला झालं ! 

उन्हाळ्यातला पहिला पाऊस ! तापलेली तृषार्त जमीन पाणी पिऊन घेत होती ! मातीचा सुगंध सगळीकडे दरवळला होता. अंगणात छोटी मुले मस्त भिजून गारा वेचत आनंदाने बागडत होती. ते पाहून आपण उगीचच मोठे झालो असं वाटत होतं ! हवेतला लोभस गारवा खूपच सुखद होता. अर्ध्या पाऊण तासात सगळं वातावरण बदलून गेले. अशी हवा पडली की, मला गच्चीत जाऊन त्या निसर्गाकडे बघत राहावं असं वाटे !

आकाशाकडे पाहिलं आणि मस्तपैकी इंद्रधनुष्य डोळ्यासमोर दिसू लागले ! सहज मनात आलं आणि आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखे दिसू लागले. आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे इंद्रधनुचा एक एक रंग आहे. पावसाच्या थेंबावर सूर्याचे किरण पडले की आकाशाच्या पटलावर आपल्याला इंद्रधनुष्य दिसते ,तसेच आयुष्याच्या या टप्प्यावर मला भूतकाळ इंद्रधनुष्यातील रंगांसारखा दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आपल्या अवस्था इंद्रधनुष्यातील रंगांसारख्या वाटतात…

ता –    तान्हेपण, जन्माला आलेल्या बाळाचा तांबूस वर्ण आयुष्याची सुरुवात दाखवतो.

ना –     नेणतेपण, छोटे बाळ आपल्या पायावर उभे राहते.. बोबडे बोल बोलू लागते पण ते अजाण असते. नुकत्याच उगवलेल्या बाल रवी सारखे त्याचे दिसणे असते!

पि –    पौगंडावस्था, साधारणपणे आठ ते पंधरा वयातील मुले जी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात.. अजून   कळीचे फुल व्हायचे असते. जीवनाविषयी प्रचंड कुतूहल दाखवणारी जिज्ञासू वृत्ती या वयात असते..

हि –  हिरवेपणा, हे तर सुजनाचे, तारुण्याचे प्रतीक! प्रत्येकाचा हा काळ नवनिर्मितीचा, पूर्णत्वाकडे नेणारा काळ असतो. आयुष्यातील कर्तृत्वाचा हा काळ माणसाला सर्वात जास्त आवडतो.

नि –   तारुण्याचा जोश उतरू लागतो आणि जाणीव होते ती निवृत्तीची! एकंदर आयुष्याचा विचार केला तर हा प्रवास उतारा कडे नेणारा असतो..

पा –    वाढत्या वयाची दृश्य खूण म्हणजे पांढरे केस! ते आपल्याला जाणवून देतात की किती पावसाळे पाहिले आपण! अनुभवाच्या संचिताची शिदोरी घेऊन ही वृद्धत्वाकडे वाटचाल चालू असते.

जा –   जाता जीव शेवटी शिवाकडे विलीन होणार या सत्याची जाणीव होते आणि तो खऱ्या अर्थाने जन्म ते मृत्यूपर्यंतच्या दीर्घ प्रवासाचा आढावा घेतो.

अशा या इंद्रधनुष्यी जीवनात आपण कालक्रमणा करीत असतो. प्रत्येक अवस्था तितकीच महत्त्वाची आणि मोहक असते. जीवनाचा आस्वाद घेत हा मनुष्य जन्म चांगल्या कामासाठी व्यतीत करून पुन्हा अनंतात  विलीन करणे हेच त्या इंद्रधनुष्याचे काम ! त्याची वक्रता जीवन क्रम दाखवते. लहानपणापासून ते मध्यापर्यंत वाढत जाणारी ही कमान उतरत्या क्रमाने जाते, ती जीवा शिवाची भेट होण्याची उतरती रंगसंगती दाखवत ! 

पहिल्या पावसाच्या मातीच्या गंधाने भरलेल्या त्या वातावरणात माझं मन इंद्रधनुष्यी बनलं होतं ! विविध विचारांच्या रंगात गंधात न्हाऊन गेलं होतं !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -2… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -2… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

( मग मी काय केलं त्या लिंबाच्या अर्ध्या भागावर पाणी घातलं आणि पिळल्याची अ‍ॅक्टिंग केली.. वेळ साधली गेली.) इथून पुढे — 

रेसिपीज् हाताळणं हा माझा डाव्या हातचा मळ. त्यामुळे त्यातले काहीही प्रश्न समोर आले तरी मी लीलया सोडवतो. पण माणसाला कसं हाताळायचं आणि त्यातूनही ते जर सेलेब्रिटी असतील तर झालंच! या लढाईला तोंड देताना मात्र खरंच माझ्या तोंडचं पाणी पळालेलं असतं! कित्येक सेलेब्रिटींना अक्षरश: चमच्यानंसुद्धा ढवळता येत नाही. त्यांच्याकडून कॅमेऱ्यासमोर पदार्थ करून घेणं मुश्कीलच नाही कित्येकदा अशक्य असतं! त्यांना साहित्यातला मसाला कुठला आणि धणे-जिरे पावडर कोणती हेही समजत नाही. अशा वेळी मी तुम्हाला मदत करतो, असं म्हणत मलाच कॅमेऱ्यासमोर सगळं साहित्य सांगावं लागतं, पदार्थात घालावं लागतं. हे कमी काय म्हणून काही वेळा या सेलेब्रिटींना लगेच जायचं असतं. आता पदार्थ शिजून होईपर्यंत तर वाट बघायलाच हवी ना! कॅमेरा बंद केला की लगेच त्यांचं मोबाइलवर बोलणं, घडय़ाळ्यात बघणं सुरू होतं. मग एकदा आम्ही शक्कल लढवली चक्क बंद कॅमेरा त्यांच्यापुढे उभा करून शूटिंग सुरू असल्याचा आभास निर्माण केला म्हणजे त्यांना घडय़ाळ्यात बघायला फुरसतच मिळाली नाही किंवा मग शो सुरू असताना ते भान सुटल्यासारखे नुसतेच बोलत राहतात, तेही कोणत्याही विषयावर. अशा वेळी त्यांना परत मुख्य विषयाकडे वळवून गप्पा सुरू करायच्या हेही कसबच असतं!

एकदा तर एका हास्य अभिनेत्याने कमालच केली होती. तो येणार म्हणून सेटवरचं वातावरण एकदम उत्साही होतं. पण तो आलाच मुळी मरगळलेल्या चेहऱ्यानं. त्याला बघून क्षणभर मीच गोंधळलो की, आपण ज्याची वाट बघत होतो तो हाच का नक्की? पण विचार केला, दमला असेल म्हणून त्याला चहा दिला, जरा निवांत बसू दिलं आणि मग मेकअपला सुरवात केली. पण त्याची कळी खुलेना. शेवटी तसंच शूटिंग सुरू केलं. पदार्थ मीच दाखवला. तो चांगला झाला पण वातावरण जसं रंगायला पाहिजे ना तसं रंगलंच नाही. का तर म्हणे त्याला टेन्शन आलं होतं! अशा वेळी त्याला सतत बोलतं ठेवून, एकीकडे रेसिपी सांभाळून, सगळं कसं छान आहे, असंच शूटिंगच्या वेळी चेहऱ्यावर दाखवणारा शेफ एक उत्तम अभिनेताही असतो हे मान्य कराल ना!

कधी-कधी मात्र खरंच परीक्षा असते. सगळं शूटिंग संपल्यावर लक्षात येतं की एक पदार्थ कमी झाला आहे! आता? अजून एक पदार्थ तर दाखवायलाच हवा. शूटिंग संपलं म्हणून बॅक किचन आवरलं जातं. त्यामुळे हाताशी ना रसद असते ना कोणी मदतनीस. असंच एकदा दिवाळी रेसिपी शूटिंगच्या वेळी घडलं होतं. पॅकअप झाल्यावर कळलं की एक पदार्थ कमी पडतो आहे. बॅक किचन बंद झालं होतं. सेटवर तेल, मसाला, कणिक, मीठ वगरे दोन/चार आधीच्या रेसिपीमधले पदार्थ होते तितकेच. रात्रही इतकी झाली होती की दुकानं उघडी असण्याची शक्यताही नव्हती. इतकं टेन्शन आलं की विचारू नका. त्याच टेन्शनमध्ये कणिक आणि रवा भिजवला तो चांगलाच घट्ट झाला. आता पुढे काय करायचं या विचारानं हाताशीच असलेल्या किसणीवर तो गोळा किसू लागलो. बघितलं तर त्याचा चुरमुऱ्याच्या आकाराचा मस्त कीस पडत होता. गंमत तर पुढेच आहे.. तो कीस छान तळला गेला, तरतरून फुलला. मग मलाही हुरूप आला. सेटवर जितके मसाल्याचे पदार्थ होते ते सगळे एकत्र केले आणि त्या तळलेल्या चिवडय़ावर टाकले. तो माझा रव्याचा चिवडा इतका फेमस झाला की एका नामांकित कंपनीने तो माझ्याकडून विकत घेऊन बाजारात देखील आणला!

शूटिंगप्रमाणेच माझा कॅटिरगचा व्यवसाय होता तेव्हा किंवा मी फूड फेस्टिव्हल किंवा लाइव्ह शोज् करतो तेव्हाही, काही वेळा अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं की वाटतं इथे आपलं सगळं कसब पणाला लागलंय. जर यातून नाही तरलो तर कायमची नामुष्की. अशाच एका भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं होतं ते महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाच्या वेळी. मी पाच फूट बाय पाच फूटचा पराठा केला होता हे त्यांना समजल्यावर त्यांनी अशीच मोठय़ा आकाराची पुरणपोळी करा, असं फर्मान काढलं. पण पराठा करणं वेगळं आणि पुरणपोळी करणं वेगळं. पुरणपोळी तव्यावर पडली की पुरण पातळ होऊ लागतं आणि ती उलटणं जड होतं. शिवाय पराठा पुरणपोळीच्या तुलनेत हलकाही असतो. तरीही मी पोळी केली. तव्यावरही टाकली. पण आता ती उलटायची कशी? तवा तर एकदम तापलेला होता तसंच आजूबाजूचं वातावरणंही उत्साहानं तापलेलं होतं, राज ठाकरेंसह सगळे टक लावून बघत होते. पोळी उलटता नाही आली आणि जळली तरी नामुष्की आणि उलटताना पडून तुटली तरी नामुष्की. पोटात गोळा येणं..घशाला कोरड पडणं..जे जे काही म्हणून होतं ते सगळं माझं झालं होतं. तरीही चेहऱ्यावर काही दिसू द्यायचं नव्हतं. पण इथे माझी, माझ्या आई-वडिलांची पुण्याईच कामी आली आणि पोळी न जळता, न तुटता उलटली जाऊन मस्त खमंग पुरणपोळीचा रेकॉर्ड मला पूर्ण करता आला! ही खरी दृष्टिआड सृष्टी!

खरं तर यापुढे काही सांगण्यासारखं नाहीच पण पुरणपोळीच्या गंभीर किश्शानंतर एक गमतीदार किस्सा सांगतो. आम्ही केटरिंगची काम घ्यायचो तेव्हा एका लग्नाच्या वेळी जेवणखाण सगळं उरकलं. भांडी, उरलेला शिधा वगरे सगळं टेम्पोमध्ये लोड झालं आणि टेम्पो गेला सुद्धा. फक्त आमच्या चहासाठी एक स्टोव्ह दोन भांडी, थोडं दूध, चहा पावडर, थोडीशी साखर इतकंच सामान मागे होतं. इतक्यात वधूमाय धावत आली, काय तर म्हणे वरमायेला चहा हवाय. झालं लेकीच्या सासूचं मागणं म्हणजे पूर्ण करायलाच हवं! आम्ही चहा करून दिला. तो कप घेऊन त्या बाई तशाच परत माघारी. का तर म्हणे त्यांना चहा अगोड लागतोय, आणखी साखर हवी. गंमत म्हणजे साखर सगळी संपलेली. मग मी तो कप हातात घेतला. त्यात एक चमचा घातला. तो कप घेऊन वरमायेकडे गेलो आणि म्हणालो, ‘बघा चव, साखर पुरेशी आहे का?’ आणि त्या बाईंनाही चक्क साखर पुरेशी वाटली!

या अशा अनुभवांनी मला खूप शिकवलंय. मात्र यापुढे माझा शो बघताना प्रत्येक वेळी मी मीठच टाकतोय ना किंवा साखरच घालतोय ना, असे प्रश्न मनात येऊ देऊ नका! आणि घरी असले प्रयोगही करू नका! हे असं ‘चिटिंग’ प्रत्येक वेळी नाही करावं लागत आणि कुणाला खायला द्यायच्या पदार्थात तर ते करणं कुठल्याच शेफला कधीच शक्य नाही ! तेव्हा एन्जॉय खाद्यायात्रा !

– समाप्त – 

लेखक : शेफ विष्णू मनोहर

संग्रहिका  : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा भिमा! तू माऊली माझी!… ☆ डॉ. स्वप्ना लांडे ☆

डॉ. स्वप्ना लांडे

परिचय 

पीएच.डी. – “महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निबंधांतील स्त्रीविषयक चिंतनाचा तौलनिक अभ्यास”

अधिव्याख्याता – य. च. मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र एल.आर.टी. कॉलेज अकोला

सचीव – महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मंगरूळपीर,जि.वाशिम

स्थानिक तक्रार समिती अध्यक्षा – (कामाच्या ठिकाणी स्त्रियांची होणारी लैंगिक छळवणूक कायदा २०१३)

स्तंभलेखिका – दै.मातृभूमि २०१९-२०

विभागीय महिला संपर्क प्रमुख – (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

लेखन- अनेक दिवाळी अंकांमध्ये तसेच शैक्षणिक मासिकांत लेखन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘लढा ‘ हे मुखपत्र असलेल्या मासिकात एक वर्ष लेखन.  अकोला आकाशवाणीवर मुलाखती आणि व्याख्याने.स्त्री सक्षमीकरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर व्याख्याने,गेल्या पाच वर्षांपासून ग्रंथोत्सवात वक्ता म्हणून सहभाग.महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यावर प्रात्यक्षिकांसह व्याख्याने,अनेक वृत्तपत्रांत प्रासंगिक लेखन, मासिके यांत लेखन.

? मनमंजुषेतून ?

☆ बा भिमा! तू माऊली माझी!… ☆ डॉ. स्वप्ना लांडे ☆ 

“भिमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे”

असं वामनदादा कर्डक म्हणून गेलेत. दि. १४ एप्रिल १८९२ रोजी क्षितीजावरील लाली एक निराळाच संदेश घेऊन आली. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, मानववंश शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, धर्मशास्त्रज्ञ, समाज क्रांतिकारक …. आणखी काय अन् किती सांगावं! 

या सर्वांसोबत आणखी महत्त्वाचं …. ‘ बा भिमा! तू समस्त स्त्री वर्गाची माऊली आहेस. इतकं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्त्वानं इतक्या छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्यावं लेकीच्या ! इतके सन्मानाचे जिणे  बहाल करावे ! सारं विस्मयकारकच … !  केवळ आईच करू शकते हे. जशी एखादी पुरोगामी आई लेकीला विचारांचे धन देते ना, छान समजाऊन पण सांगते, अगदी तस्सं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब लग्न झालेल्या आपल्या लेकींना सांगतात, ” लग्नानंतर पत्नी पुरुषाची समान अधिकारी असलेली गृहिणी असली पाहिजे, ती नवऱ्याची गुलाम असता कामा नये.”  लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामाप्रमाणे वागविल्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल, त्यावेळी तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची शक्यता असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे, हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलांच्या संगोपनाचा भार स्त्रीलाच होतो. तेव्हा मुले केव्हा आणि किती होऊ द्यावयाची हा निर्णय तिचाच असला पाहिजे. राष्ट्र संकल्पनेचे आधुनिक प्रारूप घडवायचे तर स्त्रियांनाही समान अधिकार, आर्थिक सक्षमता आणि वेळ आल्यास कुटुंब नावाची रचना जाचक ठरू लागल्यास विभक्त होण्याचे अधिकार असणे गरजेचे आहे, असे बाबासाहेब म्हणत. स्त्रियांच्या प्रगतीच्या आड त्यांची लग्ने येतात, हे बाबासाहेबांनी हेरले होते. म्हणूनच “मुलींची लग्ने लवकर करून वैवाहिक जीवन त्यांच्यावर लादू नका.” तसेच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा मुलींना अधिकार असावा असे ते म्हणत.

भारतीय स्त्री हजारो वर्षे अज्ञान दारिद्र्य, देवभोळेपणा ,अंधश्रद्धा यांच्या दुष्टचक्रात अडकलेली होती. स्त्रीला माणूस म्हणून जगता यावं याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य पणाला लावले. मनुस्मृती नावाचे अधर्मशास्त्र जाळून, मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातीची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद , त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे मग ते आपोआप बंड करतील, या आंबेडकरांच्या विधानातील गृहीत हे सबंध मानवमुक्तीच्या सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत तत्त्व होते. जोवर या देशातील प्रत्येक व्यक्ती ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क प्राप्त करू शकत नाही, तोवर या देशात एकात्मता निर्माण होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच या देशातील स्त्रीला तिच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन, देशाच्या विकासात तिचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे भारतीयांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेब म्हणतात, “आईबाप मुलाला जन्म देतात कर्म देत नाहीत असे म्हणणे ठीक नाही. आईबाप मुलांच्या आयुष्याला वळण लावू शकतात. ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपल्या मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर, आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल.

मनुस्मृतीने चातुर्वर्ण्याची निर्मिती करून माणसामाणसांमध्ये उच्च-नीचतेचे बीज पेरले. स्त्रियांच्या बाबतीत तर मनुस्मृतीने अतिशय कठोर कायदे केले होते. त्यामुळे तिला जगणेही असे झाले होते. मनुस्मृतीने स्त्रियांच्या बाबतीत घेतलेली भूमिका कमालीच्या असंस्कृतपणाची आहे. धर्म कोणताही असो पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आजही गैरसमज आहेत. परंतु स्त्रीच्या प्रगतीवर मानव जातीचे हित अवलंबून आहे, हे बाबासाहेबांना माहीत होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचे रणसिंग फुंकले. रमाईंना पाठविलेल्या एका पत्रात ते म्हणतात, “स्त्रियांच्या उन्नती व मुक्तीसाठी लढणारा मी एक योद्धा आहे.” दिनांक २७ डिसेंबर १९२७च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस जवळजवळ पाच हजार स्त्रियांची सभा बाबासाहेबांनी घेतली होती. स्त्री व पुरुष यांनी मिळून समाजाच्या, संसाराच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पडण्यास त्यांना फार अवधी लागेल. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले, तर त्यांना त्या कामात लवकर यश प्राप्त होईल. याच सभेत बाबासाहेबांनी दलित स्त्रियांच्या राहणीमानाबद्दल प्रबोधन केले. मुला-मुलींना शिक्षण देण्यास सांगितले. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर दिला. दि. २० जुलै १९४२ साली नागपूरला दलित स्त्रियांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत वीस पंचवीस हजार स्त्रिया उपस्थित पाहून बाबासाहेबांना आनंद झाला. ते म्हणाले “स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो.”

परंपरागत कायद्यांनी अमानुष परंपरांनी जखडलेली स्त्री बाबासाहेबांनी संविधानात विकासाचे स्थान दिल्याबरोबर शिक्षण क्षेत्रात नव्हे, तर आतापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करू लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अभेद्य असे एक सुरक्षा कवच तयार केले. ते म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करीत जाणे होय आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रासाद बांधल्यासारखे होय. हिंदू सहितेला मी हे महत्त्व देतो. बाबासाहेबांनी हे उद्गार हिंदू कोड बिलाच्या मसुद्यावरील सर्वसाधारण चर्चेच्या वेळी काढलेले आहेत. हिंदू कायद्याच्या संहितीकरणाविषयीच्या विधेयकाला बाबासाहेबांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व होते. कारण त्यायोगे स्त्रियांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाला आळा बसून त्या अधिक सक्षम बनतील असा त्यांना विश्वास होता. या कायद्याला बराच विरोध झाल्याने बाबासाहेबांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. आज स्त्रीला घटस्फोटानंतर कायद्याने  स्त्रीधन वापस मिळते, वारसाहक्काने संपत्तीचा हिस्साही मिळतो. तिच्या जीवनाला एक प्रकारचे बाबासाहेबांनी स्थैर्य करुन दिले. पण बहुजन स्त्री काय करते? देवाच्या कृपेने माझं सर्व चांगलं झालं म्हणून, वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीचा काही भाग  देवाच्या पेटीत देणगी म्हणून टाकते. पण ज्या पित्याने  आपल्या प्रकृतीची चिंता न करता, आपल्या सर्व लेकींसाठी अहोरात्र झटून कायदा केला, प्रसंगी मनस्तापही सहन केला. हिंदू कोड बिल संपूर्ण मान्य केले नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याचा बहुजन स्त्रीला विसर पडावा ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती ! आज जेव्हा मी स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे पाहते, अनेकींचे संसार चांगल्या रीतीने फुललेले पाहते, तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांनी डोळ्यांत अश्रू गर्दी करतात आणि नकळत मी नतमस्तक होते.”बा भिमा! कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळयांतले पाणी नव्याने वहावे.”

©  डॉ. स्वप्ना लांडे

अकोला. 

मो ७५०७५८११४४. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ होंगे कामयाब … ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

सिंहगड एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला प्रवास करत होतो. बहुधा रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने, आज दादरनंतर गाडीला बऱ्यापैकी कमी गर्दी होती. दादर स्टेशनलाच समोरच्या सीटवर एक चाळीस पंचेचाळीस वर्षांचा माणूस येऊन बसला. त्याने माझ्याकडे बघून एक general स्मितहास्य केलं, मीही प्रत्युत्तर दिलं. 

सर्वसाधारण दिसणारा माणूस, पण थोडासा खंगल्यासारखा दिसणारा. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद थुईथुई नाचत होता. प्रचंड खुश दिसत होता तो. अर्थात संपूर्ण अनोळखी माणसाला आपण कसं विचारणार, “का हो, एवढे खुश का आहात ?”

तो, डोळे मिटून, स्वतःशीच गाणं गुणगुणत होता. आणि हळूहळू तो स्वतःच्याच भावविश्वात एवढा रममाण झाला की, त्याच्या नकळत, तो ते गाणे मोठ्याने म्हणू लागला. गाणं होतं – “होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.”

आजूबाजूचे सगळे आधी आश्चर्याने – कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागले. मग कोणीतरी त्याच्या सुरात सूर मिसळला, मग आणखी एकाने, आणखी एकाने. आम्ही सगळे “होंगे कामयाब” म्हणत होतो. अंगावर शहारा येत होता. प्रत्येकालाच सगळ्या ओळी ठाऊक होत्या असं नाही. पण त्याला ते गाणं पूर्ण पाठ होतं. जणू अनेक वर्षे तो हे गाणं म्हणत होता. त्याने ओळ म्हणायला सुरुवात केली, की बाकीचेही त्याला साथ देत होते. वातावरण नुसतं भारावून गेलं होतं. 

गाडीची गती हळू हळू कमी होऊ लागली. स्टेशन येत होतं. गाणं संपलं. त्याने डोळे उघडले. आम्ही सगळे उभे राहून गाणं म्हणत होतो. गाणं संपल्यावर उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होतो.

तो अवघडला, संकोचला. मग तोही उठून उभा राहिला. रंगमंचावर, कलाकार अथवा जादूगार, प्रयोगानंतर जसा कुर्निसात करतात तसा त्याने सगळ्यांकडे बघत लवून कुर्निसात केला आणि म्हणाला, ” मी आज खूप खूश आहे. आत्ताच टाटा हॉस्पिटलमधून येत आहे. Today is my first cancer free day. आज माझा कॅन्सर पूर्णपणे निघून गेल्याचं, मी कॅन्सरवर मात केल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. आज मी माझ्या मुलाबाळांकडे, बायकोकडे गावाला परत जाणार आहे. Thank you all for joining in.”

गाण्यामागचं कारण समजल्यावर गाण्याची अर्थपूर्णता आणखीनच वाढली, त्यानं हेच गाणं का म्हटलं तेही कळलं. आमच्या टाळ्यांचा जोर वाढला, आणि कॅन्सरवर मात करणारा तो योध्दा ताठ मानेने गाडीतून उतरून निघून गेला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ OUTLET —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ OUTLET —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  हिटलरने शेवटी आत्महत्या केली !……..

सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.

मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूतनं नैराश्यातून आत्महत्या केली.

-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल (आमटे) करजगी आपलं जीवन संपवतात. 

-आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ……..

पाण्यात शांतपणे पोहणारे बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात…… माणूस वरवर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असू  शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय…?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक अध्यात्मिक गुरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात -) त्याचंही अगदी भैयु महाराजांसारखं झाले.)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet ? तर होय !!!

— कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir …मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?—  मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध…वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा….  हे केव्हाही सोपं नाही का.?

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट म्हणजे परिवार आणि मित्र !—– 

— हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!

काळजी घ्या…. सोडून गेल्यावर “ᴍɪss ʏᴏᴜ” म्हणण्यापेक्षा,  सोबत आहे तोपर्यंत “ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares