मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कळताच नाही काय करावं! ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

 ? मनमंजुषेतून ?

☆ कळताच नाही काय करावं! ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

आपण आणि आपल्या मागच्या पिढीच्या आचार विचारात फारसं अंतर नव्हतं फक्त बायकांना शिक्षण नोकरी करता आल्यामुळे वैचारीक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पण त्यामुळे मागच्या पिढीला थोडासा बदल स्विकारावा लागला! पण आपल्या पिढीला नव्या पिढीशी जुळवताना रेस मधे धावल्यासारखं पळावं लागतय्! प्रचंड वेगाने ती पुढे चाललीय्!

आपल्या पिढीसाठी हा बदल अतिशय वेगवान आणि वेगळाच आहे!

ममा…. अग कशाला एवढ्या लवकर उठतेस?

खुप केलसं जन्मभर आता आराम कर!

अग….पण तुला ॲाफिस आहे नं नाश्ता देते करून जा! नको मी खाईन ओट्स,फ्रुटस् ते हेल्थ साठी पण चांगले असतात!

कळतच नाही काय करावं ?

ममा……. आज तुला बाहेर जायचं आहे नं?

किती वाजता ते सांग मी गाडी ड्रायव्हर पाठवते! नाहीतर उबर बुक करून देतो

अरे जाईन मी रिक्षा नाहीतर बस ने! तु काळजी नको करूस!

ममा….. घरची गाडी असताना किंवा गाडी अफोर्ड करायची ताकद असताना का तुला बस नाहीतर रिक्षाने जायचय्? आणि ह्यापुढे शहराबाहेर जायचं तर No train travel सरळ फ्लाईटची तिकीटं काढायची!

कळतच नाही काय करावं ?

अरे आज गाण्याचा कार्यक्रम चांगलाच रंगला उशीरच झाला जरा! थांब पटकन् खिचडी टाकते

ममा…….. मुलांसाठी पिझ्जा ॲार्डर केलाय् आणि आपल्यासाठी “थाय” जेवण मागवलय् उगाच घाईगडबड करू नकोस! रिलॅक्स!

कळतच नाही काय करावं?

जरा भाजी घेऊन येते आणि वाण्याला सामानाची यादी पण देऊन येते म्हणजे तो वेळेवर पाठवेल संपत आलय् सगळं आणि येताना मार्केटमधून ताजे मासे पण मिळतात का पहाते!

अहो आई……माझ्याकडे लिस्ट द्या सगळी, “नेचर बास्केट” मधून भाजी, फळं, आणि ग्रोसरी मधून वाण सामान मागवते! २ तासात येईल फिश पण हवं ते सांगा येईल!

अग……  ताजी भाजी फळं मासे बघून आणायला लागतात! असे मागवले तर कसं?

आई……. अहो सगळं ताजंच असतं तिकडून मागवलं तरी! कशाला उगाच घावपळ करताय?

कळतच नाही काय करावं?

जरा बॅंकेत जाऊन येतो रे! एक दोन चेक पण टाकायचं आहेत! बीलं ही भरायची आहेत!

बाबा कॅश ATM मधून काढा आणि बीलं आणि चेक कोणाला द्यायचे ते सांगा Transfer करून टाकतो ! NEFT करतो २ तासात जातील

कळतच नाही काय करावं?

दिवाळी जवळ येतेय् जरा वेळ काढ गं….. पूर्ण घराची साफसफाई करून टाकूया

आई……… अहो हाऊसकिपींगच्या माणसाला बोलवलय् करून जाईल तो ५/६ तासात,  काळजी करू नका!……,,

कळतच नाही काय करावं ?

वाढदिवस होता माझा! म्हटलं साऱ्यांना बोलवून साजरा करूया ! छान स्वयंपाक करते! सगळ्यांच्याच आवडीचा! फोन आला,मॅाम तुझ्या आवडीच्या गाण्याच्या कार्यकर्माची तिकीटं काढली आहेत जा संध्याकाळी! गेले तर,

सारा मैत्रिणींचा गोतावळा तिथे हजर ! त्यानंतर छोट्याश्या हॅालमधे केक कटींग देखील आणि

मेजवानी सुध्दा, सरप्राईज म्हणे!

कळतच नाही काय करावं?

सर्वात कहर म्हणजे सोसायटीत परवा एकजण गेला. कोणि नातेवाईक नाही! अंत्यसंस्कार करायला! मुलाने एका event management कंपनीला फोन केला! भटजी पासून तिरडी, ॲम्बुलंन्स, दाहसंस्कार, ते Death certificate हातात येईपर्यंत सारी व्यवस्था केली त्यांनी!

कळतच नाही काय करावं?

आता कळलंय्, जास्त विचार करायचा नाही !आणि कळून ही घ्यायचं ही नाही! जो दिवस येईल तो सुखात घालवायचा! जुन्या आठवणी आणि जुने दिवस आठवायचे पण ह्या पुढे येणारा दिवस सुखात घालवायचा…….😀😀

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ न ज मा – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मैने राखी नही बांधी। हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना. मी एकदा नजमाला म्हटलं, “नजमा, अगं रोज अंघोळ करून यावं. म्हणजे बरं वाटतं. ती काही बोलली नाही. नंतर सांगायला लागली. “भाभी तुम्हे  नळ छोडे  बराबर पाणी मिलता है। हमे बाहर से, कतार मे  ठहरनेके बगैर  पाणी नही मिलता। पकाना, भांडे, कपडे धोना, साफसफाई, सब के लिए बाहर से पानी  लाना पडता है। बरोबर है ना ?” मलाच डोळे उघडल्यासारखं झालं .घरात जागोजागी नळ असल्याने तिची परिस्थिती कधी लक्षातच आली नाही. फुकट उपदेश करायला काय जातंय, असंच मला वाटायला लागलं.

आता तिची अभ्यासाची गोडी वाढायला लागली होती .शाळेतून आली की, पुन्हा ” शिकवा ” म्हणून दप्तर उघडायची. परीक्षा आणि रिझल्ट ही झाला .नजमाचा  पहिला नंबर आला. शाळेत खूप कौतुक झालं. नाचत नाचत बातमी सांगायला प्रथम माझ्याकडे  आली.आणि    “भाभी, मुझे पहिला नंबर मिला। तुम्हारी वजहसे मिला। मलाही तिच्या इतकाच आनंद झाला. रोज ती जाताना मी तिला सांगायची,” नजमा “म्हणजे “चमकता तारा “तशीच मोठी हो, आणि चमकता तारा होऊन दाखव.

एकदा गणपती उत्सव होता. नजमाचा  धाकटा भाऊ सलीम मित्रांबरोबर, घरात न सांगता, पुण्याला मजा करायला गेला. घरच्यांनी दोन दिवस सगळीकडे शोध घेतला. पण सापडले नाहीत. शेवटी चैन करून पैसे संपले.आणि घरी परत आले. गणपतीचा दिवस होता तो. गणपती बरोबर तो घरी आला, अशा एका भावनेने एक नारळ, उदबत्ती, फुल, आणि केळी अशी सामुग्री घेऊन, नजमा घरी आली. तिच्या  भक्तीभावाचं मला आश्चर्य वाटलं.

दिवाळी जवळ आली. तिचा दिवाळीचा उत्साह दांडगा होता.  “दिवालीमे क्या क्या करेंगे भाभी? मै भी मदद करुंगी। अस तिच पालुपद सुरू होतं. दिवाळी म्हणून तिच्यासाठी, एका नवीन सुंदरशा साडीचा, फ्रील  फ्रॉक मी स्वतः तिला शिवला. मी शिवण  शिवत  असताना, तिचं निरीक्षण असायचं. ‘मला पण शिकवा’ म्हणायची. तिला केसाच्या  पिना,  रिबिनी, बांगड्या, मेहंदी बरच काही आणलं. मला मुलगी नसल्याने मीही मुलीची हौस भागवून घेत होते. दिवाळीत खुष होती ती. आवडेल ते मागून घेऊन फराळ केलान. “हमारे में दिवाली नही रहती, ऐसा सब कुछ नही बनाते।” नजमा आवडीने खात असताना पाहून मलाही समाधान झालं. ज्याला मिळत नाही त्यालाच द्यावं, असं माझं एक तत्त्व होतं. भाऊबीजेच्या दिवशीही तिने दोघा भैयांना ओवाळलन. तिला ओवाळणीत रस नव्हता. भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधात रस होता. एक दिवस अचानक काय झालं कोणास ठाऊक! नजमा  कामाला यायची बंद झाली. आणि तिची आई रूकसाना यायला लागली. पुन्हा पुन्हा विचारलं, नजमाला कुणी काही बोललं का? कुणी रागावलं का? खोदून खोदून विचारलं, तेव्हा रुकसाना ने सांगायला सुरुवात केली .”मुझे गलत समजू नको भाभी। नजमा बडी हो गई है। मै तो दिन भर काम को जाती हूँ। घर मे उसको अकेली रखना कठिन है । एक  सग्गेमेका लडका है । दारू नही पीता। सेंट्रींग का काम करता है। कमाई भी अच्छी है ।आज नही तो कल, शादी करनी है ।मेरे सर का बोज कम हो गया। नजमा 18 साल की नई है, तो शादी करना कानून के खिलाफ है।  बाहर जा के उसकी शादी की। मला मात्र मनोमन वाटत होतं, नजमा– चमकता तारा, ढग आले तरी तेवढ्यापुरता पुसट झाला तरी तो तारा पुन्हा चमकणारच.

नाजमा आज जबाबदार स्त्री झाली होती. माझं शिवण बघत असताना तिला शिवणाची आवड निर्माण झालेलीच होती. तिने शिवणाचा कोर्स केला. बाहेरच शिवण घेता घेता वाढायला लागलं. महिला उद्योजक, मधून कर्ज घेऊन, दोन  शिलाई मशीन घेतलींन. हाताखाली दोन मुली घेतल्यान. आणि उत्तम चाललं होतं .आणि हे सगळं करत असताना तिने मुलांच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. भरपूर कष्ट घेत होती बिचारी.

नजमाचे कष्ट आज फळाला आले. मुलगी सायरा  पहिली आली. मुली बरोबर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ते ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला. आम्हा तिघिंच्याही आनंदाचं, समाधानाच मूल्य वेगवेगळं होतं. आज तेच पेढे घेऊन ती आली होती .डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते .आता ती जबाबदारी स्त्री झाली होती. ती मला पुन्हा पुन्हा सांगत होती, “तुम्हारे कारण मैने यहअच्छा दिन देखा है। मै सदा के लिये तुम्हारी तरक्की मे एहसानमंद हूँ।  सायरा की यश का हिस्सा तुम्हारा भी है।”  तिच्या यशाचे श्रेय ती मलाही देत होती. नजमाला अभ्यासाची गोडी आणि शिक्षणाचे महत्त्व मी पटवलं, आणि तिनं ते मनावर घेऊन सायनाला शिकवलंन. असं तिचं म्हणणं ऐकून, मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटायला लागलं.

आज नजमाची  मुलगी सायरा चमकली. उद्या मुलगाहि चमकेल. मुलांना प्रकाश देणारा तारा –नजमा!! नाव सार्थ करणारी ठरली. जो स्वयंप्रकाशी असतो, तोच दुसर्याला प्रकाश देऊ शकतो. नजमाने तेच केल.      

समाप्त.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ नजमा – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सकाळी कामाला आली की आदल्या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.

नजमाच्या  वडिलांनी, दोन मुलं लहान असताना, बायको वारली म्हणून रुकसानाशी दुसर लग्न केलं. तिलाही दोन मुले झाली. त्यापैकी नजमा ही एक. रुकसाना स्वतःच्या कमाईवर आणि नातेवाइकांच्या मदतीवर संसाराचा गाडा ओढत होती. नजमाचे आंब्बा अध्यात्माच्या मार्गाला लागले होते .दर्ग्यामध्ये सेवेसाठी तिथेच मुक्काम करायचे. तेथे पोटापाण्याचा प्रश्न नव्हता .नजमाची शाळा दर्ग्यापासून जवळच होती. शाळेत गेली की ,तिला आपल्या  आब्बांची आठवण यायची. फार फार लाडकी होती ती  आब्बांची! कधीतरी तिला अब्बाला भेटायची तीव्र इच्छा व्हायची .पण आईला कळलं तर, काय काय शिक्षा मिळतील या विचाराने ती भेटीचा विचार सोडून द्यायची .तिला आपले अब्बा घरी यावेत, असं प्रकर्षानं वाटायचं. पण नाईलाज व्हायचा.

एके दिवशी तिन विचार केला, माझ्याच अब्बाना मी भेटले तर, तो काही अपराध आहे का? का नाही भेटू शकत मी माझ्या अब्बांना?आब्बांच्या आठवणींनी एके दिवशी  ती बेचैन  झाली. शाळेच्या मधल्या सुट्टीत एकटीच गेली आब्बांना भेटायला. दोघांनाही भरभरून आनंद झाला. दुसरे दिवशी सकाळी ही बातमी माझ्यासमोर खुल्लमखुल्ला झाली. मला पुन्हां  पुन्हा म्हणाली, “भाभी, मेरी आम्मीको बताउ नको हं।”एका लहान मुलीला तिच्या लाडक्या वडिलांना भेटायला  सुद्धा गुपचूप जाव लागत,हे पाहून मलाच कसतरी झाल.माझ्या डोळ्यात पाणी आल.हळूहळू दर चार पाच दिवसांनी तिच आब्बांना भेटण सुरु झाल.सकाळी आली की खूष असायची.आणि मग तिचा पाढा सुरू व्हायचा.” भाभी कल ना मै आब्बाको मिलके आई।आब्बाने मुझे एक रुपया दिया। “कधी आब्बा तिच्या आवडीचा पेढा द्यायचे.कधी गुलाबजाम,  कधी बर्फी कधी रुपया दोन रुपये हातावर ठेवायचे. दुसरे दिवशी आली की पैसे जमवायला माझ्याकडे द्यायची. कधीमधी मी त्यात भर घालायची .तिच्या आईला पटवून, तिच्या (नजमाच्या ) नावाने पोस्टात  रिकरिंग सुरू केले .त्याचं कार्डही माझ्याकडेच. इतका आई मुलगी दोघींचाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता.

कधी घरात आब्बांच  नाव काढलेलं आईला आवडायचं नाही. ती आईशी वादावादी करायची. कधी मारही खायची. पण गप्प बसायची नाही. बंडखोर आणि तडफदार होती ती! सकाळी आली की, पाढा सुरु व्हायचा.  “आज मै आम्मीके साथ झगडा करके आयी।  मी—क्यूं? “हां फिर सलीम (धाकटा भाऊ) काम तो नही, पढाईभी नही, सिर्फ दोस्त मिलाके गुल्लीडंडा खेलता रहता है। मै तो काम करती हूँ। आम्मीको  मदद करती हूँ। फिरभी मेरे बारेमे ऐसा बर्ताव क्यूं।उसके लाड प्यार जादा क्यूं? मुझे गुस्सा आता है।” मी दिला समजवायची ” नजमा, अगं आईला उलट बोलू नये . मोठी झाल्यानंतर सासरी अशी बोललीस ,तर आईचा उद्धार होईल.” ती मलाच उलट म्हणायची,” भाभी, चूप बैठने का नही । उनको भी समझना चाहिये।” ती बरोबर होती. अन्यायाविरोधात उभ राहणं हे तिचं तत्त्व होतं. कष्टाळूपणा आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही गुण त्यात पुरेपूर भरले होते.

ती आता आमच्या घरी छान  रुळली होती. सण वार सगळं तिला माहीत झालं होतं. कधी सणावारी आमचा स्वयंपाक उशिरा व्हायचा. मग काम करून जाताना ,ती मला हक्कानं सांगून जायची .”आज बनाया हुआ श्रीखंड, एक वाटी मेरे लिये फ्रिज मे रखो  हाँ भाभी” दुसरे दिवशी तिला ते खाताना बघून मला समाधान वाटायचं. कधी तिला एखादं पक्वान्नं आवडायचं. आणि मग पुरणपोळी, गव्हाची खीर, बासुंदी, खूप दिवसात केली नसल्याचीही मला आठवण करून द्यायची. तिला आता सगळे सणवारही माहीत झाले होते. तिच्या आई पेक्षा माझ्याशी बोलण्यात तिला मोकळेपणा वाटायचा. मला सारखं वाटायचं, तिचे आणि माझे कुठलेतरी ऋणानुबंध असतील नक्की.

राखी पौर्णिमेचा दिवस आला. तिने सकाळी येताना  गुपचुप दोन राख्या आणल्यान. मला हळूच दाखवल्यान. मला म्हणाली,” राजू भैया और विजय भैया ,(आपके दोनो बेटे) को मै बांधने वाली हूँ। मै  उनको भय्या पुकारती हूँ ना। मुझे आरती लगाके देते है क्या? क्या क्या करना मुझे सिखाओ। माझ्या मुलांना बहीण नव्हती. त्या दिवशी नजमाने दोघांना तिलक लावून ओवाळले .ओवाळून राख्या बांधल्यान. मुलं ओवाळणी द्यायला लागली तर, घ्यायला तयार नाही. आणि म्हणते कशी, “ओवाळणीके लिये मैने  राखी नही  बांधी ।हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना।

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ नजमा – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

दुपारची वेळ. हंसत हंसत बुरखा घातलेली कोणीतरी जिना चढून वर आली.प्रथम मी तिला ओळखलेच नाही. तिने चेहर्यावरचा बुरखा काढलान. मग मी तिला ओळखल. अत्यानंदाने तिने माझा हात हातात घेतलान .पण मी  तिला थोड्या लटक्या रागाने म्हटल,”कितने दिन बाद आयी है नजमा। कितने दिनसे तेरी याद करती हूँ।क्या हमारी याद कभी आती नही? नजमा हसत हसत म्हणाली  “ऐसा कैसा  हो सकता भाभी।हर दिनमुझे  तुम्हारी याद आती है।आज मै बहोत खुष हूँ।तुम्हारे लिये पेढे और मिठाई लेके आयी हूँ।यह मेरी बेटी सायरा। स्काँलर्शिप हसिल की है उसने।और उसमे अव्वल आ गयी।और मेरे लिये खुषीकी बात ।मैने सबकुछ खुद उसे सिखाया पढाया। नजमाला आज माझ्याशी किती बोलू आणि किती नको अस झाल होत.नजमाच्या सासरच खटल बरच मोठ होत. त्यातूनही तिने स्वतः अभ्यास करुन सायराचा अभ्यास घेतला होता.तिचा छोटा मुलगा नासिर हाही हुषार होता.दोनच मुलांवर घरातल्यांच्या संमतीने कुटुंब नियोजन केल होत.स्वतःला शिकता आल नाही . पण दोन्ही मुलांना खूप शिकविण्याच तिच स्वप्न होत.तिचा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरुन सरकायला लागला.माझ्या डोळ्यासमोर ती लहान आठ नऊ वर्षाची मध्यम गोरी गिड्डी थोडस नकट नाक दोन वेण्या घालणारी  आणि फ्राँकमधली अशी छोटी नजमा दिसायला लागली. गाव सोडून कामासाठी ,पोटापाण्यासाठी आलेल  कुटुंब काम शोधत होत. नेमक त्याच वेळी मला कोणीतरी कामासाठी हवच होत. योग जुळून आला. आमच्याकडे नजमाची  आई रुकसाना कामाला  यायला लागली. चार दिवसांनी  आईबरोबर नजमाही यायला लागली.आठ दहा दिवसांत रुकसानाला आणखी चार पाच काम मिळाली. आणि मग आमच्या घरी नजमा एकटीच यायला लागली. आईपेक्षा तिचं काम चकाचक नीटस  आणि व्यवस्थित होत. लवकरच तिची आणि माझी छान गट्टी जमली. रोज सकाळी आली की प्रथम केर काढायची. केर काढताना कधीतरी कुठतरी एखाद पैशाच नाण पडलेल दिसल की ती मला हाताला धरून त्या नाण्यापर्यंत घेऊन जायची. दुरुन तर्जनीने  ते नाण पडलेल दाखवायची.तिच्या प्रामाणिकपणाबद्दल माझा तिच्यावरील विश्वास आणखी द्रुढ झाला. केर झाला की भांडी घासायची. नंतर मी तिचा अभ्यास घ्यायची. तिची हुशारी, आकलनशक्ती,आणि शिकण्याची जिद्द बघून मलाही तिला शिकविण्यात हुरूप वाटायला लागला. अभ्यास झाला की मगइथेच तिची पोटपूजा व्हायची. पाच मिनिटाच्या अंतरावर समोरच्या झोपडपट्टीत तिच घर होत. घरी जाऊन दप्तर घेऊन लगेच शाळेत जायची.  नजमा–चमकता तारा! नावाप्रमाणे  लवकरच शाळेत  हुशार विद्यार्थिनी म्हणून चमकायला लागली. कधी निबंध कधी वक्त्त्रुत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. मी ‘तिला शिकविण्यात आपण कुठे कमी पडायच नाही अस ठरवल.बरीच बक्षीस मिळवायला लागली. तिची  आई रुकसानापण खुश झाली होती. शाळेत नजमाला तिच्या मैत्रीणी शिक्षक तिला विचारायचे”नजमा यह सब तुझे कौन सिखाते है? ती उत्तर द्यायची,   ” मै कामको जाती हूँ,ना वो गीता भाभी मुझे सब सिखाती है।”रोज सकाळी कामाला आली कीआदल या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पारावरचा चहा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ पारावरचा चहा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

त्या सगळ्या मैत्रिणी आता निवृत्त झालेल्या। सगळ्या जबाबदार्यातून म्हटले,तर मुक्त झालेल्या। अशीच, ग्रुप मधील उत्साही मनू एकदा म्हणाली, “अग ऐकाना। मला एक मस्त आयडिया सुचलीय। आपण एरवी भेटतो तेव्हा घाईघाई ने भेटतो, निवांत गप्पा होतच नाहीत मी परवा माझ्या नवऱ्या बरोबर अशीच गेले होते तेव्हा एका ठिकाणी मस्त चहा प्यायला. गम्मत म्हणजे, त्या चहा वाल्याने समोर असलेल्या, मोठ्या झाडालाच पार बांधलाय. गुळगुळीत. आणि त्यावर बसवून तो चहा देतो. इतकी मजा वाटली ग. तर आपण निदान  महिन्याने तरी जमूया का.”  सीमा म्हणाली “हो, मला चालेल.”

सगळ्या तयार झाल्या. मनु अगदी आनंदून गेली नवरा म्हणाला, “मनु, आपण जातो ते ठीक, तुझ्या म्हाताऱ्या कसल्या यायला.”

मनु खट्टू झाली. “बघूया आता, ठरवले तर आहे.”

ठरवलेल्या तारखेला, 10 च्या दहा सख्या हजर होत्या. त्यांना त्या पाराची खूप गम्मत वाटली. हॉटेल सारखे बंधन नव्हते तिथे की मागे माणसे खोळंबून उभी आहेत. खूप गप्पा मारल्या आणि निवांत घरी गेल्या. मनु म्हणाली, “बघ बघ प्राची, चेष्टा केलीस ना, पण बघ. सगळ्या ग माझ्या सख्या आल्या न चुकता.” पुस्तकातले डोके वरही न काढता प्राची म्हणाली, “मासाहेबा, जरा रुको तो. आगे आगे देखो, होता है क्या.”

मनूने तिच्या पाठीत धपका घातला म्हणाली, “बाई, नको ग बोलू असे.जमलोय तर जमू दे की.”

प्राची,म्हणाली, “उगीच चिडू नको ग. मागच्या अनुभवावरून म्हणतेय मी.”

नवरा म्हणाला “प्राची आपल्या आई इतका उत्साह नसतो कोणाला. ही जाते जीवाची धडपड करत आणि त्या म्हाताऱ्या सतरा कारणे सांगतील बघ. गप बसा तुम्ही बाप लेक. काही सांगितले, की केलीच चेष्टा. मी सांगायलाच नको होते.”

मनु आत निघून गेली. पुढच्या वेळीही पारावर दहाचा आकडा जमला. मनूला धन्य धन्य झाले. गप्पा झाल्या आणि  निघताना,मनीषा म्हणाली, “ए, सॉरी ग.मला पुढच्या वेळी जमणार नाही यायला का ग मनीषा? आता काय झाले.”

“अग काय होणार। सूनबाई ची deadline आहे बाई.”

मला म्हणाल्या, “बंटी कडे बघाल ना जरा? कसली येणार मी आता मग.”

“काय आई साहेब. गप्पशा. आज कोरम फुल नव्हता वाटते.” प्राचीने विचारलेच.

मनू चिडचिड करत म्हणाली, “ होता,, होता ग बाई. पण पुढच्या वेळी,मनीषा मावशीला जमणार नाही म्हणे.

“अग, देवयानी म्हणाली, सुद्धा. फारच करते हो, ही मनीषा. काय मेलं महिन्यातून एकदा भेटतो, तेही जमू नये का. असो. चला, मी आज भेळ देते सगळ्यांना.”

“किस खुशीमे ग देवी?”

“काही नाही ग. आता जून आलाच. अमेरिकेची हाक आली लेकीची नोकरी, आणि तिच्या पोरांना समर हॉलिडेज. मग काय. आहोतच की आम्ही. विहिणबाईंची आईआजारी आहे मग त्यांना जमत नाहीये. आमचे हे. लगेच उडी मारून तयार.”

“जाऊ ग देवी आपण. तुला का नको असते ग यायला?”

देवी म्हणाली “याना काय होतंय बोलायला। तिकडे गेलो की, नुसते सोफ्यावरबसायचे 24 तास तो, tv आणि मला हुकूम. कामाने कम्बरडे मोडून ग जाते माझे एवंच काय तर, मीही जून पासून रजा बर.”

मनू गप्पच बसली. प्राची आणि नवरा घरीच होते. प्राची म्हणाली, “आज ही मेंबर गळाला वाटते.” आई जवळ येऊन बसली, आणि म्हणाली आई, “कम ऑन. चीअर अप.”

“असे होणारच मॉम. तू का चेहरा पाडून बसतेस. तुझ्या परीने तू खूप केलेस ना ग प्रयत्न सगळ्या जुन्या मैत्रिणी एकत्र याव्या, सुखदुःखाच्या गोष्टी share कराव्या. पण मॉम, लोकांच्या priorities वेगळ्या असतात तुझ्या इतके sincere आणि हृदय गुंतवणारे लोक फार कमी असतात मॉम. म्हणून तुला त्याचा त्रास होतो ग. दे सोडून. इतके दिवस भेटलात, हसलात, मजा केलीत, हेच बोनस म्हण .”

“हे बोलतेय ती प्राचीच का?” मनूने डोळे उघडून नीट बघितले। इतकी कधी समजूतदार आणि mature झाली आपली मुलगी? बॉयकट उडवत,विटक्या  जीन्स  घालणारी, भन्नाट कार चालवणारी, पण लग्नाचे नाव काढले तर खवळून उठणारी, मोठ्या पगाराची नोकरी करणारी आपली मुलगी, इतकी प्रगल्भ आहे? मनूच्या डोळ्यातच पाणी आलं. प्राची म्हणाली, “आई,चल मस्त मूड मध्ये ये तुला एक surprise आहे .छान साडी नेसून तयार हो ग.”

“आणखी काय धक्के देतेय प्राची”, म्हणतमनु साडी नेसून तयार झाली. बेल वाजल्यावर प्राचीने दार उघडले. एक स्मार्ट रुबाबदार तरुण उभा होता.

“आई बाबा, हा निनाद ग माझ्या ऑफिस मध्ये बॉस आहे माझा. तुला आठवतं का ग. मागे म्हणाली होतीस, की आज चहा च्या पारावर एक बाई माझी चौकशी करत होत्या?त्या याचीच आई बर का. मी तुला सोडायला नव्हते का आले, कार ने तेव्हा त्यांनी मला बघितले. या खुळ्या ला तोपर्यंत मला विचारावेसे वाटले नाही. पण याच्या आईनेच माझी माहिती तुझ्या कडून काढली। आधी नुसताच बॉस होता. मागे  निनाद च्या आई उभ्या होत्या. मनु ला अगदी गोंधळल्या सारखे झाले.

“अहो, आत याना. प्राचीच्या आई, प्राचीने आम्हाला तुमच्या चहाच्या पारा बद्दलसगळे  सांगितले आहे बर का. कट्ट्या वरचे तुमचे सभासद कमी होईनात का पण पारावरच्या चहाने तुम्हाला जावई तर झकास मिळवून दिला की नाही।“

मनू ला या सगळ्या योगाचे  अतिशय आश्चर्य वाटले। निनाद च्या आई म्हणाल्या “अहो त्या दिवशी मी आणि हे असेच त्या पारावर चहा प्यायला आलो होतो. तर ही मुलगी तुम्हाला सोडताना दिसली म्हणून पुढच्या वेळी मी मुद्दाम तुमच्या कडून माहिती काढली. आणि केवळ योगायोगानेच निनादच्याच ऑफिस मध्ये ही काम करते, हे समजले. मग काय, निनाद ला विचारले. आणि तो हसत हिला विचारायला तयार झाला. घाबरत होता कसे विचारायचे. ही बिनधास्त आहे फार म्हणून. तर, असा तुमचा चहाचा पार, आपल्या दोघांना पावला म्हणायचा. निनाद प्राची, या रविवारी, आपण सगळ्यांनीच जायचे हं पारावर।” सगळ्यांच्या हसण्याने घर नुसते दणाणून गेले मनूचे।

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुद्ध बीजापोटी… ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

? मनमंजुषेतून ?

☆ शुद्ध बीजापोटी… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“आत्या, परवा  आमच्या ऑफिसमध्ये महिलादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एक आयुर्वेदतज्ञ आल्या होत्या. महिलांना आवश्यक अशी खूप छान माहिती त्यांनी सांगितली. पण त्यांचा एक विचार काही मला पटला नाही. त्या म्हणाल्या की खरं  तर आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार आपण त्यांना जन्माला घालण्यापूर्वीच केला पाहिजे. ही जरा मला अतिशयोक्तीच वाटली.” कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारी, नुकतेच लग्न झालेली माझी भाची पियू बोलत होती. तिच्या हातात कॉफीचा कप देत विषय बदलत मी म्हटले,“ अग पियू, गेल्या आठवड्यात तुझ्याकडून त्या शेवंतीच्या बिया आणल्या होत्या ना त्या या कुंडीत चांगल्या रुजल्याच नाहीत बघ. तुझ्याकडे किती छान बहर आला आहे शेवंतीला!” त्याबरोबर पियू लगेच त्या कुंडीकडे धावली. तिला झाडांचे खूपच वेड होते.  त्या कुंडीत बघत ती म्हणाली,“ अग आत्या, कशा रुजतील बिया? ती माती चांगली वरखाली करायला पाहिजे, त्याला थोडे खत घालायला पाहिजे आणि सूर्यप्रकाश कुठे मिळतोय त्यांना नीट?” मी पटकन हसले आणि पियूला म्हटले,“ किती अचूक निदान केलेस पियू! खरं तर त्या कुंडीत बी लावलेच नाहीये. पण मगाशी तुला ज्या गोष्टीची अतिशयोक्ती वाटत होती ना तेच तुला पटवून द्यायचे होते. चांगली फुले यायला उत्तम बी- जमीन- खत- पाणी- सूर्यप्रकाश इ.इ. सर्व पूर्वतयारीची आवश्यकता असते. मग आपल्याला अपेक्षित असणारा सर्वगुणसंपन्न उत्तम बालक निर्माण करण्याची तयारी पण आधीपासूनच करायला नको?” पियू उत्सुकतेने माझे बोलणे ऐकू लागली.

“ वास्तविक शिशु म्हणजे पूर्ण मनुष्याचे बीजरुपच! मोठया वृक्षाचा पूर्ण विकास छोट्या बीजामधून होतो. आता हेच बघ, तुम्ही एखादा प्रोजेक्ट हातात घेतला की तुमचे नियोजनबद्ध टीमवर्क सुरु होते. तसेच हे टीमवर्क आहे. पती- पत्नी याचे टीमलीडर आहेत आणि त्यांचे मानसिक- शारीरिक आरोग्य, आहार- विहार अशासारखे अनेकविध घटक त्यांच्या टीमचा हिस्सा आहेत. उत्तम शिशु निर्माण करण्यासाठी कोणते घटक कसे उपयुक्त ठरतात त्याची पूर्ण माहिती तुला या https://youtu.be/viCNjJhfsgQ व्हीडिओमध्ये मिळेल बघ.

वास्तविक या विषयावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  आत्ताची सर्वांची दिनचर्या बघितली तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम हे गर्भावर होऊ शकतात. अनियमित झोप, एकाच स्थितीत बराच काळ बसून ड्रायव्हिंग करणे, गर्भनिरोधकाचा अतिरिक्त वापर, शारीरिक श्रम कमी आणि मानसिक ताण अधिक, कॉम्प्युटर- मोबाईल याचा अत्याधिक वापर अशा अनेक घटकांचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो. यातील काही घटक पूर्णपणे टाळणे अशक्य आहे हे मलाही समजते. पण तरीही त्यातून मार्ग कसा काढता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे.

आता तुला प्रश्न पडला असेल की “या सर्वाचा शिशुशिक्षणाशी काय संबंध?” तर मगाशी म्हटले तसे तुला ज्या रंगांची शेवंती हवी होती तो रंग ज्या बीमध्ये आहे असेच बी तू निवडले होतेस ना? मग प्रत्यक्षात आपले स्वतःचे मूल आपल्याला हवे तसे निर्माण होण्यासाठी तसे बीज निर्माण करायला नको? आणि ज्या क्षणी या बीजापासून गर्भनिर्मिती होते तेव्हापासूनच त्याचा “ मी कोण?” चा शोध सुरु होतो. हा शोध म्हणजेच त्याचे शिक्षण आहे. आणि शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर सर्वांगीण विकासाची प्रक्रिया!

“तेव्हा पियूताई, आता तरी ‛जन्मापूर्वीपासून शिशुशिक्षण’ ही अतिशयोक्ती नाही ना वाटत?” पियूला माझे म्हणणे पूर्णपणे पटले होते हे तिच्या चेहऱ्यावरुनच समजत होते. आणि वाचकहो, मला वाटते तुम्हालाही हा विचार नक्कीच पटला असेल यात शंका नाही.

 

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सत्यवती ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : सत्यवती

सत्यवती ही महाभारताची मूळ स्त्री. ती राजा शंतनूची पत्नी, धृतराष्ट्र, पांडू विदुर आणि शुकदेव यांची आजी व कौरव-पांडवांची पणजी होती. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती भगवान वेदव्यास यांची आई होती. तिची जन्मकथा सुद्धा विलक्षण आहे.

पूर्वी सुधन्वा नावाचा एक राजा होता. तो शिकारीसाठी वनात गेला. इकडे त्याची पत्नी रजस्वला झाली. तिने गरुडा कडून ही वार्ता पतीला कळवली. त्याने आपले वीर्य एका द्रोणात भरून तिच्या साठी त्या पक्षाकडून पाठवले. वाटेत एका पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. द्रोणा तले वीर्य यमुनेत पडले. तिथे ब्रम्हा च्या शापामुळे मछली च्या रूपाने अद्रिका नावाची एक मछली होती. पाण्याबरोबर तिने ते वीर्य गिळले. ती गर्भवती झाली. दाशराज नावाच्या निषादाने तिला पकडले व तिचे पोट चिरले. त्यातून एक कन्या बाहेर आली. दाशराजाने ती सुधन्वा कडे नेली. पण तिच्या अंगाला फार घाण वास येत होता म्हणून राजाने स्वीकार केला नाही. दाशराजानेच तिचा सांभाळ केला. त्याने नाव ठेवले सत्यवती. तिच्या अंगाला माशांचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा हे नाव पडले. ती मोठी झाल्यावर होडी चालवण्यास शिकली.

एकदा परशुरामपुत्र पराशर ऋषी यमुनेकाठी आले. मत्स्यगंधाला पाहून ते तिच्या प्रेमात पडले. पण हुशार सत्यवती ने त्यांना नकार दिला. ती म्हणाली तुम्ही ब्रह्मज्ञानी आणि मी निषाद कन्या आपले कसे जमणार? पण पराशर ऋषी ऐकेनात तेव्हा तिने त्यांना तीन अडचणी सांगितल्या.

1) माझ्या अंगाला घाण वास येतो. पराशर ऋषीनी तो नाहीसा करून तिथे सुगंध निर्माण केला. आणि ती योजन गंधा म्हणून प्रसिद्ध पावली.

2) माझा कौमार्यभंग झाल्यावर माझे लग्न कसे होणार?

ऋषीनी  तिला वर दिला मुलाच्या जन्मानंतर तू अक्षत योनी होशील. कुमारिका होऊन तुझे दुसरे लग्न होईल.

3) आपले मीलन दोन्ही किनाऱ्यावरचे लोक बघतील.

ऋषीने दोघाभोवती संपूर्ण होडीवर दाट धुके निर्माण केले.

ते दोघे एका द्वीपा वर गेले. तिथे त्यांचा पुत्र व्यास जन्माला आला.

तो जन्मताच उभा राहिला व बोलू लागला “माते मी तपश्चर्या करण्यासाठी दूर निघून जाणार आहे पण तुला वचन देतो की तू जेव्हा संकटात सापडशील तेव्हा माझे स्मरण कर मी तुझ्यासाठी धावत येईन.”

पराशर ऋषींच्या वरदानामुळे सत्यवती हे सारे विसरून गेली व कुमारिका म्हणून जगू लागली.

एकदा शंतनू राजा तिथे आला. त्याला ती आवडली व त्याने दाश राज कडे लग्नासाठी मागणी घातली. तो म्हणाला तिचीच मुले राज्यावर बसतील व ती राजमाता होईल असे वचन द्या. शंतनू ला देवव्रत नावाचा मुलगा होता. त्यालाच तो राज्यावर बसवणार होता. पण सत्यवतीच्या प्रेमामुळे तो खंगायला लागला. देवव्रताने दाश राजाच्या अटी मान्य करून ब्रह्मचर्य पा पाळण्याचा निर्णय घेतला.

सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन मुलगे झाले. शंतनु च्या मृत्यूनंतर चित्रांगद गादीवर बसला पण एकदा गंधर्वाबरोबर युद्ध सुरू असताना तो मरण पावला. विचित्रवीर्य गादीवर बसला. सत्य वतीने त्याचे लग्न काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी लावून दिले. पण त्याला क्षयरोग झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. सत्यवती ला खूप दुःख झाले पण वंश पुढे चालू ठेवण्यासाठी तिने देव व्रताला लग्न कर असे म्हटले. पण तो म्हणाला माते तुझाच मुलगा राज्यावर बसेल असे मी कबूल केले आहे. तू तुझ्या मुलाला हाक मार. आणि एकाएकी सत्यवतीला पूर्वायुष्य आठवले. तिने व्याकुळ होऊन साद घातली आणि व्यासमुनी धावत आले. वंशवृद्धी साठी व आईची आज्ञा म्हणून त्यांनी नियोग पद्धतीने अंबिके शी संग केला. पण त्यांच्या तेजाने अंबिका खूप घाबरली व तिने डोळे मिटून घेतले. त्यामुळे तिला अंध पुत्र मिळाला. त्याचे नाव धृतराष्ट्र. अंध मुलाला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही असे सांगून सत्य वतीने अंबालिकाशी संग करण्यास सांगितला. पण व्यासांना पाहताच ती पांढरीफटक पडली. अशक्त पांडू जन्माला आला. सत्यवतीने पुन्हा अंबालिका ला गळ घातली. पण तिने आपल्या ऐवजी आपल्या दासीला पाठवले. विदुर जन्माला आला.

सत्यवती हताश झाली. तिने धृतराष्ट्राचे लग्न गांधारी शी लावून दिले. पांडू चे लग्न कुंती आणि माद्री यांच्याशी लावून दिले. शंभर कौरव आणि पाच पांडव यांची ती आजी झाली.

पांडूच्या मृत्यू नंतर ही फारच निराश झाली. व्यास त्रिकालज्ञानी होते. त्यांनी तिला वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यात जाण्यास सांगितले. ती अरण्यात गेली. तिने अन्नत्याग केला. त्यातच तिचा मृत्यू झाला. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व सत्यवती उर्फ योजनगंधा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईपण… डॉ.सोनिया कस्तुरे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  आईपण… डॉ.सोनिया कस्तुरे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

☘️ सहजच जगता जगता

आज 25 फेब्रुवारी अनुजाचा वाढदिवस. या दिवशी 2003 साली मी दूसऱ्यांदा आई झाले. पहिल्यांदा 1998 साली डॉ.प्रेरणाचा जन्म झाला तेव्हा. आईपण हे काय रसायन आहे हे मी गेली 25 वर्षे अनुभवती आहे. पण आईपण सुरु झाल्यापासून मी मला शोधण्याचा प्रयत्न करते. मी मला कायम आई म्हणूनच सापडते. मी माला दवाखान्यात काम करताना शोधले. मी मला माझ्या नात्यात शोधले. मी मला घरात, घरा बाहेर शोधले पण मी मला नेहमी आई म्हणूनच सापडले. आईपण खूप पछाडून टाकतं हे मला इतकं माहितच नव्हतं. आणि आज मुली मोठ्या झाल्या तरीही आईपण थोडं सोडवू पाहते पण अजिबात सुटत नाही.

माझ्या जीवनाला कलाटणी म्हणजे आईपण.  माझ्या जगण्यातला सर्वोच्च अविष्कार म्हणजे आईपण. माझ्या जीवनाचं अतिम सत्य म्हणजे आईपण. माझ्या माणूसपणातील सर्वात रोमांचकारी, अनाकलनीय, सर्वोत्कृष्ट निर्मितीचा आनंद म्हणजे आईपण. प्रेम, विश्वास, जिव्हाळा, निष्ठा, कर्तव्यतत्परता, जबाबदारी, काळजी, समर्पण म्हणजे आई. आईपणात वेदना आणि दुःख अमाप आहे. आई त्या वेदनांचा, दुःखाचा सोहळा उत्सव करते. ही आईपणाला गवसलेली अनोखी शक्ती आणि युक्ती म्हणायला हरकत नाही.

मी अजूनही स्वतःला शोधत राहते पण आई म्हणूनच सापडते. माझ्या दवाखान्यात, माझ्या  कवितेच्या ओळीतही मी आई म्हणूनच सापडते…!

नाही उमगत मी मला अजूनही…!

मला आईपण बहाल केल्याबद्दल मी माझ्या दोन्ही मुलींची ऋणी आहे. माझा जोडीदार या दोघींच्या बाबांचे    नामदेवचे धन्यवाद मानालाच हवेत !

सर्व आईंना मनापासून सलाम !  🙏🏻

  

– डॉ.सोनिया कस्तुरे

9326818354

25/02/2022

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मध्यस्थ… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ मध्यस्थ… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

समिधा माझ्या मुलीची मैत्रीण.

थोडी पुढच्या वर्गात होती समिधा अगदी  निम्न मध्यम  वर्गातलीच म्हणा ना.

समिधा फार हुशार परिस्थितिची जाणीव असलेली आणि समजूतदार होती.

दिसायला तर ती छान होतीच,पण खूप हुशारही होती समिधा.

 समिधाला लहान भाऊही होता, अगदी पाठोपाठचा तोही हुशार होता.

समिधाच्या आईने आम्हाला एकदा हळदीकुंकवाला बोलावले होते.

अगदी साधेसुधे, 3 खोल्यांचे पण नीटनेटके ठेवलेले घर.

त्या स्वत:ही शिकलेल्या होत्या पण घरीच असायच्या.

 समिधा बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये  झळकली. .समिधाला खूप बक्षिसेमिळाली.

तिचे आईवडील पेढे घेऊन आले आमच्या घरी.

समिधा ला इंजिनिअर व्हायचे होते.

बारावीला तिने कसून अभ्यास केला.

तिला सुंदरच मार्क मिळाले आणि  तिला चांगल्या कॉलेज मध्ये सहज मिळाली ऍडमिशन.

लागोपाठ ,तिचा भाऊ समीर ही  होताच.

तिच्या वडिलांची, ओढाताण होत होती दोन्ही मुलांच्या फी, पुस्तके,क्लास ची फी भरताना. पण मुले हुशार होतीच.

समिधा च्या  पाठोपाठ समीरही इंजिनीरिंग ला गेला.

समिधाच्या अंगावर अगदी  साधे तेच तेच ड्रेस असत. पण तिने कधीही तक्रार नाही केली. ज्या कॉलेज मध्ये मुली नुसत्या फुलपाखरा सारखे स्वच्छंदी जीवन  जगतात, मौजमजा करतात, त्याच ठिकाणी समिधा अतिशय  साधी कोणत्याही मोहाला बळी न पडणारी होती.

मला फार कौतुक वाटायचे त्या कुटुंबाचे बघता बघता समिधा इंजिनिअर झाली तिला  कॅम्पस interview होऊन लगेचच जॉब ही मिळाला.

किती आनंदात पेढे घेऊन आली समिधा.

त्या कुटुंबाची मी फॅमिली डॉक्टरही होते.

समिधा जॉईन झाली कंपनीत.

खूप चांगले पॅकेज मिळाले तिला.

पण ती होती तशीच साधी राहिली.

पण हळूहळू,तिच्यात चांगला बदल झालेला दिसू लागला.

छान कपडे,थोडा मेकअप तिचे रूप खुलवू लागला. 

पूर्वी जरा  गंभीरच असलेली समिधा आता हसरी खेळकर दिसू लागली.

मला तिच्या आजीला बरे नव्हते म्हणून घरी visit ला बोलावले होते मी घरात पाउल ठेवले मात्र.

मला घरात लक्षणीय बदल जाणवला घर तेच होते, पण आता उत्तम महाग रंग लावलेला,  ज्या घरात फ्रीझही नव्हता तिथे मोठा फ्रीज,भारी सोफासेट.

घर खूप सुंदर आकर्षक दिसत होते.

भारी कपबशीत मला समिधाच्या आईने चहा दिला पूर्वीचा,जाड कपबशीतला, चहा आठवलाच मला.

लक्षात येण्यासारखे घर बदलले होते।छानच वाटले मला.

पण ही किमया घरात येणाऱ्या समिधाच्या पगाराची होती,हे  माझ्या चाणाक्ष नजरेला समजलेच.

समिधाच्या आईला मीम्हटले, आता छानसा जावई आणा.

हसत हसत हो म्हणेल हिला कोणीही.

कायग, जमवलं आहेस का कुठे नाही हो काकू.  मी सध्या ऑफिस झाले की क्लास लावलाय जावा चा.

बाबा म्हणाले,मग तुला प्रमोशन मिळेल.

मला हे कुठेतरी खटकलेच.

बाबा बेरकी पणे,माझ्याकडे बघत होते.

मी घरी आले पण समिधा चा विचार जाईना मनातून.

तिच्या पेक्षा थोडीच लहान असलेली माझी इंजिनीअर मुलगी, किती मस्त मजेत होती.

तिच्या मित्र मैत्रिणींचा घोळका घरी येतअ सायचा. तिलाही खूप पगार होताच पण  आम्ही कधीही तिला विचारले नाही तीच सांगायची,आई,मी अमुकअमुक इन्व्हेस्टमेंट्स केल्यात  समिधा मला या ना त्या कारणाने भेटत राहिली.

माझा जनसम्पर्क तर खूपच असतो समिधा आली होती, त्याचदिवशी एक बाई औषधासाठी आल्या होत्या छान आहे हो  मुलगी डॉक्टर.

करतेय  का लग्न.

माझा भाचा आहे लग्नाचा. बघा, त्यांनी त्या मुलाची माहिती,पत्ता  मला दिला.

मी उत्साहाने समिधाच्या आईला ती माहिती दिली.

मग बरेच दिवस काही समजले नाही म्हणून मीच  त्या बाईना विचारले त्या म्हणाल्या,अहो,त्या समिधाच्या आईकडून काहीच नाही  आले उत्तर  मला आश्चर्य वाटले.

नेमक्या समिधाच्या आईच दवाखान्यात त्या दिवशी आल्या मी त्यांना विचारले,तरमाझी नजर चुकवत म्हणाल्या,हं हं,ते होय.

अहो पत्रिका नव्हती जमत,  मग नाही गेले बाई मी.

 एक दिवस समिधा एका मुलाला घेऊन माझ्या दवाखान्यात आली.

काकू,हा माझा टीम लीडर आहे, संदीप याला तुम्ही मेडिकल certificate द्याल का .

मुलगा छानच होता .मी लगेच त्याला हवे ते  certificateदिले दुसऱ्यादिवशी समिधा आली थँक्स हं काकू.

मी  म्हटले,ते जाऊं दे ग,

 छान  आहे  की ग  मुलगा.

नुसताच मित्र आहे का आणखी काही.

समिधा हसली, म्हणाली काकू कित्ती चांगला मित्र आहे  माझा तो.

त्याला कशाला नवऱ्यात  बदलायचे.

 काल गेला चीन ला, आता 3 महिने नाही येणार  मी म्हटले,समिधा, चांगला मित्र, चांगला नवराही होऊ शकतो.बघ.

सगळ्या दृष्टीने मला आवडला हा तुझा मित्र.

असेच दिवस पुढे जात होते अचानक एक दिवस,संदीप दवाखान्यात आला म्हणाला,काकू ,थोडे बोलू का. अरे बोल की म्हणाला,मी चीन ला गेलो,तो पर्यंत मला समिधा बद्दल तसे काहीही वाटत नव्हते पण मला समजले की मी तिला खूपच मिस करतोय काकू,मला लग्न करायचंय तिच्याशी 

तुम्ही बोलाल का तिच्याशी

अरे, मी कशाला, तू तिला जा घेऊन तुमच्या ccd मध्ये आणि बिनधास्त विचार

ती नाही म्हणणार नाही बघ

तो म्हणाला, करू असं मी?

अरे करच. ती नक्की हो म्हणेल

 दुसऱ्याच दिवशी दोघेही हसत हसत आले दवाखान्यात.

काय रे मुलांनो, काय म्हणता

समिधा लाजली आणि म्हणाली

काकू, तुम्ही कित्ती बरोबर ओळखलंत

मलाही चैन पडेना, हा 3 महिने नव्हता तेव्हा .

आम्ही लग्न करायचे ठरवलेय.

ती म्हणाली, आई बाबांना आवडले नाही

मी परस्पर लग्न ठरवलेले.

म्हणाली इतकी घाई का करतेस

याहूनही चांगला मुलगा मिळेल की तुला

काकू,मी इतकी अडाणी राहिले नाहीये हो

मलाही माहीत आहे, खूप मुले आईने

माझ्या पर्यंत येऊच दिली नाहीत

पण मी तिला दोष नाही देणार

पण मी आता 27 वर्षाची आहे,

यापुढे

कधी मी लग्न करणार .

मला खात्री आहे, आम्ही या लग्नाने सुखी होऊ

समिधाच्या लग्नाला अर्थातच मी हजर होते

संदीप च्या आईने मला सुंदर साडी दिली

म्हणाली,  तुमच्या मुळे छान सून मिळाली हो आम्हाला

सगळे सांगितलंय आम्हाला संदीप ने

वधुवेशातली सुंदर समिधा आणि तिला शोभणारा जोडीदार बघून मला अतिशय समाधान वाटले.

 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ब्रह्मवादिनी सुलभा☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ब्रह्मवादिनी सुलभा ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : ब्रह्मवादिनी सुलभा

वदिक काळात स्त्रियांना खूप मान होता. मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण पण त्यांना मिळत असे. त्यांचे उपनयन सुद्धा होत असे.  ब्रह्मवादिनी स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळत. विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करत. सुलभा कुमारी संन्यासिनी होती. ती अत्यंत चतुर विद्वान आणि बुद्धिमान होती. प्रधान नावाच्या राजाची ती कन्या. तिने आजन्म ब्रह्मचारी राहून वेद विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास व स्वतंत्र लेखनही केलं. ब्रम्हा यज्ञाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तर्प णात गार्गी ,मैत्रेयी, वाचक्नवी यांच्याबरोबरच सुलभा चे नाव घेतले जाते. ती आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तपअर्जिता, ओजस्वी आणि तेजस्वी स्त्री होती. तिने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक स्वतंत्र आश्रम उभे केले. परकायाप्रवेश याचे ज्ञान तिने मिळवले होते. त्याआधारे ती राजा जनकाच्या शरीरात प्रवेश करून विद्वानांच्या बरोबर शास्त्रशुद्ध चर्चा करत असे. ती सतत प्रवास करून धर्माचा उपदेश आणि प्रसार करत असे. तिला तिच्या योग्यतेचा वर मिळाला नाही म्हणून तिने लग्न केले नाही.

महाभारताच्या शांतिपर्वामध्ये जनक राजा आणि सुलभा यांचा संवाद विस्तारपूर्वक वाचायला मिळतो. तिने आपल्या वाणीचे आठ गुण आणि आठ दोष यावर विशेष अभ्यास केलेला आहे.

तिला एकदा कळले की राजा जनक‌ अहंकारी झाला आहे. तिने त्याला भेट देण्याचे ठरवले. त्याला भेटण्यासाठी  तिने आपल्या योगाच्या बळावर मूळ शरीर टाकून देऊन सुंदर रूप धारण केले. आणि मिथिला  नगरीत आली. भिक्षा मागण्याचा बहाणा करून राजा जनकाच्या समोर आली. राजा जनक तिच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाला त्याने तिचे स्वागत केले. पाय धुवून यथोचित पूजा करून उत्तम जेवण दिले. जनक राजाने विचारले.,”तू ब्राम्हणी संन्यासिनी आहेस का?”सुलभ उत्तरली” मी क्षत्रिय कन्या .योग्य पती न मिळाल्यामुळे   मी लग्न केले नाही. व्रतस्थ  राहते”. राजाने विचारले

“खरे शहाणे कोण?” सुलभा उत्तरली “ज्ञानी माणूस कधीही स्वतःची स्तुती करत नाही तो कमी बोलतो आणि मौनात राहतो.मग तो राजा असो ,ग्रहस्थ असो अथवा संन्यासी असो.” जनक राजाला आपली चूक समजली. तो म्हणाला ,,”सुलभा ,तू माझे डोळे उघडलेस. तू खरी ज्ञानी आहेस. मी तुझे बोलणे लक्षात ठेवून यापुढे वाणीवर संयम ठेवीन.”

अशाप्रकारे महाज्ञानी जनकराजाला वठणीवर आणणारी ब्रह्मवादिनी सुलभा. तिला कोटी कोटी प्रणाम.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares