मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “रिचार्जिन्ग.. मनाचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

काही गोष्टी ‘मन’ रिचार्ज करतात.

झालं असं की…

ऑफिसच्या कामानिमित्त खूप वर्षांनी बालपण जिथं गेलं त्या भागात जाण्याचा योग आला. दहावीत असताना घर बदललं त्यानंतर इच्छा असूनही तिथं जाता आलं नाही आणि ऑफिसमुळे अनपेक्षित संधी मिळाली.

काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. ताबडतोब शाळेजवळ गेलो. खूप वर्षांनंतर ‘शाळा’ पाहताना आठवणींची एकेक फोल्डर उघडली. ‘मन’ पुन्हा शालेय दिवसात रमलं. मोबाइलच्या आवाजानं वास्तवात आलो. भुकेची जाणीव झाल्यावर तिथल्या प्रसिद्ध भेळेची आठवण झाली. ते दुकान अजूनही चालू असेल की नाही असा विचार डोक्यात आला. ‘जाऊन बघू’ म्हणत निघालो. बालपणी पायी तुडवलेल्या गल्ली, बोळातून जाताना भन्नाट फिलिंग होतं. दहा मिनिटांत पोचलो. चक्क दुकान चालू होतं. आजूबाजूला आकर्षक बोर्ड, लखलखाट असलेल्या दुकानांच्या रंगबिरंगी गर्दीत साधा बोर्ड असलेलं भेळेचे दुकान लक्ष वेधून घेत होतं. गाडी पार्क करून दुकानात गेलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास वीसेक वर्षांनी आलेलो तरीही सगळं जसच्या तसं, पंधराजण बसतील एवढीच जागा, पन्नास वर्षाच्या वाटचालीविषयीची कात्रणं भिंतीवर लावलेली. सोबतच गिऱ्हाईकांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी आदेशवजा विनम्र सूचनांचा बोर्ड, तिथंच तीन प्रकारच्या भेळीचं मेनूकार्ड, लाकडी बाक, जुन्या धाटणीचं टेबल, त्यावर चिंचेच्या पाण्याचा स्टीलचा तांब्या आणि शेजारी हिरव्या चटणीचं भांडं, समोरच भेळ करण्याच्या तयारीत मश्गुल मालक, गंमत वाटली लहान असताना यायचो तेव्हाही दुकानात कामगार नव्हते आताही नाही. सगळी कामं मालक आणि कुटुंबीयच करत होते. आवडीच्या भेळेची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर ‘वाह!! ’ आपसूक तोंडातून निघाले. अजूनही ‘चव’ तशीच. यत्किंचितही बदल नाही. चिंचेचं पाणी, चटणी घेतली आणि उदरभरणात गुंग झालो. मन तृप्त झालं. तीन भेळ पार्सल घेतल्या. बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो तेव्हा तिशीतले मालक आपल्या मुलाला ‘भेळ’ बनवायला शिकवत होते.

“वा, भेळ वारसा पुढच्या पिढीकडे.. ”मी बोलल्यावर मालक फक्त हसले.

“खूप वर्षापूर्वी तुमच्या वडीलांना असंच शिकवताना पाहिलं होतं. ”तिथल्या फोटोकडे बोट दाखवत म्हणालो.

“म्हणजे तुम्ही!! ”

“इथली भेळ एक रुपयाला मिळायची तेव्हापासून खातोय. नऊवारीतल्या आजी काउंटर सांभाळायच्या आणि पांढरा पायजमा, हाफ शर्टातले वडील सगळी कामं करायचे. आता तुम्ही आणि नंतर हा छोटा.. पिढी बदलली पण चव नाही. वा!! तात्पुरतेपणाला महत्व असलेल्या काळात वारसा जपला जातोय हे महत्वाचं. छान वाटलं. खूप शुभेच्छा!! ”खुष झालेल्या मालकांनी हातात श्रीखंडाची वडी ठेवली. त्यांच्यासोबत छानपैकी सेल्फी घेऊन निघालो. जुनं जाऊन नवीन येणं हे निसर्गाचं चक्र. आयुष्यही तसंच चालू असतं पण काही परंपरा, वास्तु, ठिकाणं हे पुन्हा जुन्या काळात घेऊन जातात. भेळीच्या निमित्तानं अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. मस्त वाटलं. घरी पोचलो तरी मन आठवणीतच रेंगाळलेलं.

वास्तव विसरायला लावणारी अशी ठिकाणं असतात. जिथं पद, प्रतिष्ठा, अहं काही आडवं येत नाही. अशा ठिकाणी वेळ काढून भेट द्या. भारी वाटेल.

“दिल ढूंढता हैं, फिर वही फुरसत के रात दिन…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”निर्णय” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “निर्णय” ☆ संध्या बेडेकर ☆

I am not afraid to start again.

Restart is always better than regret.

लवकरच भाऊंजींचा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे.

हा समारंभ भव्य दिव्य करायचा, असा निश्चय ताईंच्या मुलांनी केला. त्यानुसार अमेरिकेत बसून त्यांनी प्लानिंग केले, बाबांच्या सर्व जवळच्या मित्र मैत्रिणींना whats app वर पत्रिका पाठवली, आग्रहाचे आमंत्रण दिले.

भाऊजी म्हणाले,

अरे! मी सहजच एक पुस्तक लिहिले. त्यात खूप काही भारी असं नाहिये. खूप वर्षांनी रिकामा वेळ मिळाला. आणि मुख्य म्हणजे दुसर काही भारी करण्यासारखी परिस्थिती नव्हती. अरे! एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची गरज नाही.

लोक पुस्तक बघून/ वाचून म्हणतील 

खोदा पहाड, निकली चुहिया.

आयुष्याचा मोठा काळ नोकरी करण्यात गेला. त्या काळात घर, संसार नोकरी मुलांची देखभाल, त्यांचे शिक्षण हेच लक्ष्य होते. ती माझी जबाबदारीच होती.

माझी नोकरी चांगली होती. नोकरी नंतर हातात पैसाही होता/आहे. माझी जगभर/ भारतभर फिरायची हौस मी पूर्ण केली. अजून फिरायचे ही होतेच.

रिटायर्डमेंट नंतर आपला Active period किती असेल? 5 वर्ष 10 वर्ष हे आपल्याला माहीत नसतं. तेंव्हा माझा हा पीरियड मी छान utilize केला.

नंतर अचानक एका annual checkup मध्ये या सर्व गोष्टींवर फुल स्टॉप लागला.

यावेळेस आमचा आस्ट्रेलिया चा टूर ठरला

Tickets booking झाल. तेथूनच अमेरिकेत मुलांकडे जायच, हा ही प्रोग्राम ठरला. असा एक लांबलचक कार्यक्रम निश्चित झाला.

आता 6/8 महिने दुसर्या देशात रहायचे म्हणजे, वाढत्या वयाबरोबर थोडे टेंशन येतच. टूर तयारीत दूर दूर पर्यंत विचार करून, शरीराच्या प्रत्येक अवयवाचा विचार करून, संभावित आजापणांची यादी आणि त्यावर औषध डोॅक्टरकडून लिहून घेणे, हा तयारीचा अति आवश्यक भाग असतो. म्हणजे कपडे कमी चालतात पण औषध नाही. बाहेरच्या देशात आजारी पडण हे खूप खर्चिक काम आहे.

तसही डोक्टरच्या तोंडून 

तुम्ही बिनधास्त जा काही प्रॉब्लम नाही हे शब्द ऐकले की उत्साह आणि हिम्मत दोन्ही वाढते. annual checkup is must.

खरतर हेच ऐकायला म्हणून आज चेक अपला गेलो.

ECG बघून डोॅक्टर म्हणतात,

देशमुख सर, यावेळेस जरा कठीनच वाटतय. जायलच हवय का अमेरिकेला?

तुमचा ECG जरा…

आणि आमच्या Active life मध्ये speed breaker आला. त्या speed breaker वर white stripes आम्हाला काही दिसत नव्हत्या. म्हणजे तस काही जाणवत नव्हत. काही ध्यानीमनी पण नव्हत. जशी आपली कार speed breaker वर पांढर्या रेघा नसल्या की jump करते ना, तसच काहीस डोॅक्टरांच बोलण ऐकून आमच झाल.

आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतच राहिलो.

क्षणात मनात अनेक प्रश्न? आज तर संपूर्ण आयुष्य उलट-पुलट झाल की काय? अस वाटल. दोघांच्या नजरेत काळजी, अनेक प्रश्न, भांबावलेल्या अनेक विचारांचा गोंधळ, बरोबर एकमेकांना सांभाळायचा प्रयत्न, स्पष्ट दिसत होता.

खरतर या विषयावर सर्व जेष्ठांनी कधी न कधी चर्चा केलेली असते. आता वय झालय. छोटे मोठे सिग्नल मिळतही असतातच. कोणा दुसर्याचे आजारपण बघून / ऐकून आपल्या मनात अनेक विचार येतातच.

पण प्रत्यक्ष परिस्थितीला जेंव्हा सामोरे जाव लागत, तेंव्हा मात्र mental status काही वेगळच असत. विचारांच द्वंद चालू होत. विचारांचा कोणता धागा पकडावा? म्हणजे मन शांत होईल हे कळत नाही.

बराच वेळ वरवरून शांतता दिसत असली तरी, आत भयंकर वादळ आलेल असत।. डोळ्यातील अश्रू रोकण्याचा निश्फळ प्रयत्न चालू असतो.

भाऊजी म्हणाले,

अग! चांगलच झाल ना. वेळेवर कळल. आजकाल advance टेक्नोलॉजी आहे. सर्व ठीक होईल. आधी टूर कंपनीला आणि मुलांना मी कळवतो. नंतर माझ्या मित्राला जोशीला कळवतो. आता त्याची मदत लागणारच आहे. भाऊंजींनी परिस्थितीला normal करायचा प्रयत्न केला. तसही कुठून तरी सुरवात करण आवश्यकच होत.

त्यानंतर डोॅक्टर च्या visits, second opinion, अनेक Tests, मुलांचे फोन, त्यांची काळजी, भारतात यायची त्यांची धडपड/घाई. हे सर्व सांभाळायच होतच.

शेवटी 

आम्ही बघतो, गरज पडली तर तुम्हाला सांगू, मग या.  यावर बोलण थांबावाव लागल.

म्हणतात ना,

Life does not go where you plan, it goes where it is written to be.

Anyways हळुहळु नवीन उद्भवलेल्या परिस्थितीशी समझौता झाला.

भाऊंजींची treatment सुरू झाली. दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या.

आता बोलण्याचे विषय मनात येणारे विचार वेगळेच होते. पैशाचे टेंशन जरी नसले तरी मनात हिशेब होतच होता.

बरोबरच महत्वपूर्ण कामांची लिस्ट ही होतीच. तेही पूर्ण करायचे आहे.

म्हणतात ना,

Situation will teach you the real meaning of life.

आता restrictions, limitations ही आलेच. औषधपाणी वाढलय. जीवन शैली बदलायची गरज आहे.

पुन्हा एकदा आयुष्याचे alignment  करण आवश्यक आहे.

एक Pause घेऊन दोघांनी आपले दैनंदिन जीवन डोॅक्टर च्या सल्ल्याने

Rethink, Redesign Reorganize करून Reset केले.

आम्ही दोघे त्यांच्या supporting team मध्ये होतोच. तरी त्यांची लढाई त्या दोघांनाच लढायची होती.

बरोबर आहे

Every pain gives you a lesson, and every lesson changes the person. .

आज ताईच्या नजरे समोरून मागचा दीड दोन वर्षाचा काळ सिनमाच्या फ्लॅश बॅक सारखा गेला.

ताई म्हणाली,

या आधी खूप फिरत होतो. खूप पैसे खर्च केले. आज त्या आठवणी enjoy करतोय.

आज कुठेतरी वाचलेल एक वाक्य आठवल,

When you r travelling, you r not spendig money, but you r buying memories.

आज पटलय.

आता भाऊजींचा morninng walk, थोड्याबहूत exercises सुरू झाल्या.

मनातील चलबिचल, गोंधळ, अचानक बदलेल आयुष्य. अस्वस्थता यावर लगाम लावायला म्हणून, आपल्या विचारांना दिशा द्यायच्या उद्देशानने भाऊंजीनी लिहायला सुरवात केली आणि एका छान पुस्तकाचा जन्म झाला.

मी काल, आज आणि उद्या

खरय 

Things will not go as planned, but sometimes even unplanned things can be beautiful.

वादळातून मार्ग काढायला शिकावेच लागेल. वर्तमान परिस्थिती चा विचार करून भविष्याची रूपरेखा आखण ज्याला जमत त्यालाच आयुष्याचे गणित समजलंय अस म्हणता येईल.

आजारपण कोणी बाजारात विकत घ्यायला जात नाही. पण नशीबात जे आहे ते मान्य करावेच लागेल. आणि प्रसंगानुसार निर्णय पण घ्यावेच लागतील.

म्हणतात ना

जिंदगी किस्मतसे चलती है साहब,

दिमागसे चलती तो बिरबल बादशाह होता.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘अभिजात संगीत’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘अभिजात संगीत’ ☆ श्री दिवाकर बुरसे

संगीत ही खरे तर स्वर्गीची कला!

सृष्टी निर्मितीसवेच ब्रह्मदेवाने हिची निर्मिती केली. नारद, नंदी, भरत आदि महामुनींनी अत्यंत कठीण परिश्रम करून ती भूतलावर आणली, आम्हा सामान्य मानवांना उपलब्ध करून दिली.

केवळ सात सुरांचा सारा खेळ!

या सप्त-सूरसरितांच्या संगमातून साकारला हा संगीताचा अथांग रत्नाकर. त्यात किती राग, किती रागिण्या. कशी त्यांची रूपे, कसे त्यांचे रंग, गंध, आकार… साजिरे गोजिरे!

सात सूर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनंत राग – रागिण्या.

… यांच्यातून साकारते एक नादब्रह्म! म्हणूनच पूर्वीच्या वाग्गेयकारांनी, ऋषिमुनींनी या संगीताची प्रतिष्ठापना केली परमेश्वराच्या पवित्र मंदिरातून.

… पण खरं तर हे सूर चराचर व्यापूनही चार अंगुळेभर उरलेच आहेत, अगदी ब्रह्मतत्वासारखे! म्हणूनच ऋषीमुनींनी –

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मना ।

नादब्रह्म तदानन्दमद्वितीयमुपास्महे ॥

– – असे म्हणत त्याची उपासना केली. ईश्वरप्राप्तीचा एक वेगळा मार्ग त्यांना गवसला.

स्वरमाध्यमातन उभे राहणारे हे स्वरविश्व अमूर्त अरूप आहे. आपल्या परीने ज्याने त्याने ते समजून, जाणून घ्यायचेय, अनुभवायचेय.

– – ज्याला ते जसे भावले तसे त्याने ते व्यक्त केले. कुणी शिल्पातून, कुणी रंगरेषांच्या तर कुणी शब्दांच्या माध्यमातून!

मी सुद्धा एक असाच प्रयत्न केलाय…..

अभिजात भारतीय संगीताची उत्पत्ती…

(Evolution of Indian Classical Music)

*

वाद्य, नृत्य अन् गीत मिळोनी होते संगीत कला 

ही स्वर्गीची ठेव लाभली दैवे मनुजाला।। ध्रु।। 

*

प्रथम दिले ब्रह्म्याने संगीत भोळ्या सांबाला 

त्याने दिधले सरस्वतीला, तिने नारदाला 

यक्ष, किन्नरा, गंधर्वांना, नंदी अन् भरताला 

तिथून पातले भूलोकाला, अम्हा मानवाला।।१।। 

*
निद्रा मुद्रेतून उमेच्या “रुद्रवीणा” जन्मली 

डौलदार चालीतून तैशी “नृत्यकला” प्रकटली 

कृद्ध शिवाच्या पद घातातुनी “तांडव” आकारले

चार दिशांतुनी चार राग हे तसेच निर्मियले।।२।। 

*

पूर्व दिशेतुनि उठला “भैरव”

” हिंडोलाचे” पश्चिम वैभव 

दक्षिणेतूनि “दीपक” उमटे

“मेघ”, “श्री”चे कौतुक वाटे

उमे निर्मिला ” कौशिक” पश्चात 

संगीत हे जणू वेदच साक्षात! ।।३।। 

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खरं तर आपण खुनी आहोत…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “खरं तर आपण खुनी आहोत…☆ श्री जगदीश काबरे ☆

नदीला आपण “देवी” म्हणतो आणि मग —

तिच्याच कुशीत टाकतो आपल्या श्रद्धेचा कचरा.

निर्माल्य…फुलं, हार, अगरबत्त्यांची राख—

ज्यांना आपण पवित्र म्हणतो

तेच तिच्या श्वासात हळूहळू विष मिसळत जातात.

दुधाचे टँकर येतात भावनेच्या उन्मादात

पांढऱ्या प्रवाहात ओतलेलं दूध

क्षणात बदलतं कुजलेल्या दुर्गंधीत.

देवाला अर्पण करताना

आपण विसरतो नदी पोट भरून खात नाही,

ती वाहते… आणि आपणच तिच्या प्रवाहात

रासायनिक दुधाचे विषारी नाग सोडतो.

पणत्या, दिवे— प्रकाशाचा उत्सव म्हणे…

पण त्या तेलकट ज्योती पाण्याच्या पृष्ठभागावर

मरणासन्न तवंग निर्मितात 

मग त्या तवंगाखाली मासे गुदमरून मरतात.

राख, अस्थी, विधी… मोक्षाच्या आशेने

आपण मृत्यूही नदीवर सोपवतो.

पण त्या राखेत फक्त शरीर नाही,

तर प्रदूषणाचे कणही असतात—

जे तिच्या अंगावर जखमा कोरतात.

त्याहीपेक्षा जास्त निर्दयी असतो

आपला “विकास”!

सांडपाणी कारखान्यांचं, शहरांचं,

घराघरातलं घाणेरडं पाणी

सरळ तिच्या कुशीत सोडलं जातं.

जणू ती नदी नाही,

तर एक न संपणारं गटार आहे.

नदीकाठची झाडं तोडून

आपण तिची सावलीच काढून घेतो,

तिचं श्वसन रोखतो,

तिच्या काठांना सिमेंटने कैद करतो

एका नाल्यात रूपांतरित होऊन वाहणारी नदी

आता श्वास गुदमरलेली रेषा बनते.

आणि आपण म्हणतो— “ही देवी आहे! ”

देवी?

देवीला आपण असं मारतो का?

देवीला आपण घाण, रसायनं, मृत्यू अर्पण करतो का?

धर्माच्या नावाखाली विनाश लपवण्याची युक्ती

म्हणून आपण पूजा करतो, पण जपणूक नाही.

आणि शेवटी—

हेच पाणी आपल्या नळातून येतं,

आपल्या शरीरात जातं,

आपल्या रक्तात मिसळतं…

आणि आपणही हळूहळू

स्वतःलाच संपवत राहतो.

नदी मरत नाही. पण ती मरते तेव्हा

आपणच मरतो.

पण आपल्याला अजूनही वाटतं,

आपण भक्त आहोत.

खरं तर आपण खुनी आहोत.

आणि नदी आपल्या श्रद्धेची

सर्वात मोठी बळी.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतीचा क्षण… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ परतीचा क्षण…  ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

परतीचा क्षण मनुष्याला नकोसा असाच वाटतो, नाही का?

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात परतीचा प्रसंग कधीकधी रोज किंवा आयुष्यात एकदा तरी नक्कीच येतो…

आयुष्यात उपभोगलेले सुखदुःखाचे क्षण सोडून परतीचा प्रवास सुरू करणे, प्रत्येकाला जमतेच असे नाही…

काही लोकं जाण्याआधीच आपल्या परतीच्या प्रवासाची भौतिक आणि मानसिक तयारी करून ठेवतात…

त्यामुळे त्यांना यातून बाहेर पडणे सोपे जाते…

या सर्वाचे एका वाक्यात सार पुढील एका वाक्यात सांगता येईल…

बॅग भरून तयारी असावी…

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर

(त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी. एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.)

इथून पुढे – – 

मला पुढे १९०० साली, सांगलीला डी. एड्. कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर मी एम. ए. झाले. याच सुमाराला आम्ही आमचं स्वतंत्र छोटंसं घरकुल माधवनगरलाच मांडलं होतं. आमच्या लग्नाला दहा वर्षं झाली. आणि प्रकृतीने ‘अमोल’ ठेवा आमच्या पदरात टाकला. आता प्रश्न होता, नोकरी सोडायची की काय? पाळणाघर, किंवा मुलाला सांभाळायला बाई, ही मानसिकता घरात, समाजात तितकीशी रुजलेली नव्हती. प्रश्न होता, त्यावेळी नोकरी सोडली, तर चारसहा वर्षांनी, मुलाची सातत्याने देखभालीची गरज संपल्यावर, पुन्हा खात्रीपूर्वक नोकरी मिळेलच, याचा काय भरवसा? माझ्या शेजारणीने माझ्या नोकरीच्या वेळात मुलाला सांभाळायचे कबूल केले, आणि माझ्या सासुबाईंनी आणि यांनी दोघांनीही मुलाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि माझी नोकरी अखंडितपणे चालू राहिली. नोकरीच्या वेळा बांधील असतात. धंद्याचं तसं नसतं. यांचा यंत्रमागावर कापड काढून देण्याचा व्यवसाय होता. तो माधवनगरातच होता. त्यामुळे गरजेप्रमाणे ते वेळ काढू शकत होते आणि तसा त्यांनी काढलाही. मुलाला वाढवताना आम्ही दोघांनी बरोबरीने जबाबदारी उचलली. यांनी कांकणभर जास्तच उचलली.

नोकरी, घरकाम, छोट्याचं संगोपन या सा-यात दिवस कधीच संपत असे. माधवनगरात तेव्हा पाण्याची खूप टंचाई होती. आजही आहेच. त्या वेळी चार-पाच दिवसातून एकदा पाणी यायचं. ते थोडंच असायचं. पिण्यापुरतं यायचं. बाकी वापराला विहिरीचं पाणी असे. पाणी ओढण्याचं काम यांनी स्वखुषीने स्वीकारलं होतं. बाजारहाटही ते करत. त्यामुळेच स्वयंपाक-पाणी, धुणं-बिणं सगळं उरकून मला नोकरीसाठी वेळेवर जाणं शक्य होत होतं. नोकरी म्हटली की तिथल्या जबाबदा-या, कर्तव्यं आलीच. अमोल दहा महिन्याचा असताना त्याला घरी ठेवून मला प्रशिक्षणासाठी दहा दिवस सातारला जावं लागलं होतं. पण यांनी सासूबाईंच्या मदतीने कोणताही गाजावाजा, गवगवा न करता मुलाला सांभाळलं. जाऊबाई, पुतणे-पुतण्या ही मंडळी पण होतीच!

मुलगा चार वर्षाचा झाला आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी म्हणून सांगलीला बि-हाड केलं. तिथे त्याच्याबरोबर माझंही अनुभवक्षेत्र वाढत – विस्तारत गेलं. आवडी-निवडी जपायला, जोपासायला संधी मिळाली. कार्यक्रमातला सहभाग वाढला. श्रोता-प्रेक्षक म्हणून जाताना मुलाला बरोबर घेऊन जाणं, निदान पहिली काही वर्षं तरी अपरिहार्य होतं. जमेल तेवढं ऐकायचं. पाह्यचं. कविसंमेलन, व्याख्यानं, कथाकथन इ. मध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असे, तेव्हा मुलगा लहान असताना यांनी बघितलं. एक बरं होतं. या सा-या कार्यक्रमांत माझा सहभाग असावा, याबद्दल आमचं एकमत झालं. दुमत असतं तर… जाऊ दे. तो विचारच नको.

सांगलीला आल्यावर मला मिळणारा अवकाश वाढला असला तरी मला सुचतंय म्हणून आज बाकीची कामं बाजूला राहू देत. मी लिहीत बसते. एवढा आवाका मला कधीच लाभला नाही. घर, स्वयंपाक-पाणी, नोकरी-चाकरी संभाळून जमेल तसं आणि तेवढंच माझं लेखन झालं. मी वलयांकित लेखिका नव्हते, हेही त्यामागचं कारण असू शकेल. माझ्या घरकामात नाही, तरी मुलाच्या संगोपनात यांचं सहाय्य नक्कीच होतं.

आता घरकामात नाही असं म्हणतानाही बाजारहाट तेच करायचे हे मला कबूल करायलाच हवं. सगळ्यांत महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्यावरचा पहिला चहा हेच करायचे आणि आल्या-गेल्यांना अगदी आवर्जून सांगायचेसुध्दा! मग मी म्हणायची, ‘सकाळी गाडीत एकदा पेट्रोल भरलं की गाडी दिवसभर न कुरकुरता चालू राहते… ’

नोकरीच्या काळातही एक आठवण आवर्जून नोंदवाविशी वाटते. मिरज तालुक्यातील प्रौढ साक्षरांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिच्यात माझा समावेश होता. हे काम रात्री प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झाल्यावर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावी जाऊन करायचं असे. सुमारे महिना-दीडमहिना हे काम चाललं. घरी यायला कधी कधी बारा वाजून जात. मलाच कानकोंडं होई. पण या मुद्यावरून यांनी कधी खळखळ केली नाही.

आता हे सगळं वाचताना कुणालाही वाटेल तुम्ही तुमच्याबद्दल खूप लिहिलंत. त्यांच्याबद्दल काय? तर ते त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांना हवं तसं जगत होतेच! हवं ते करत होते. पुरुष असल्यामुळे त्यांना त्यांचा अवकाश जन्मत: प्राप्त झाला होता. मलाही त्यांनी काही प्रमाणात तो प्राप्त करून दिला. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट.

सांगली आकाशवाणीवरून ‘प्रतिबिंब’ ही श्रुतिकामाला सुमारे दहा-बारा वर्षं प्रसारित होत होती. त्यातील शंभर तरी श्रुतिका मी लिहिल्या असतील. श्रोत्यांनाही त्या पसंत पडत असल्याचं कळत होतं. ते संवाद, त्यातील वाद-विवाद आमच्या घरातल्या संवाद-विवादातून लिहिलेले असत. त्याला थोडी झिलई, चकचकीतपणा मी माझ्या लेखनातून दिलेला असे, एवढंच!

माझ्या लेखनाचा महत्त्वाचा स्त्रोत यांच्या वाणीतूनही अनेकदा उगम पावलेला आहे, तो असा! श्रुतिका ऐकल्यावर माझी एक मैत्रीण मुग्धा आपटे मला म्हणाली होती, ‘आमच्या घरात आम्ही जे बोलतो, ते तुला कसं कळतं? ’ मी म्हटलं, ‘घरोघरी गॅसच्या शेगड्या… दुसरं काय? ’

याचा अर्थ माझी वाटचाल अगदी मऊ मखमलीवरून झाली, असं मुळीच नाही. रेशमी काटे अनेकदा टोचले. अधून मधून बाभळीच्या काट्यांनीही रक्तबंबाळ केलं. भांड्याला भांडं अनेकदा लागलं. नुसता नाद नव्हे, खणखणाटही झाला.

लोकगीतातील ग्रामीण स्त्री आपल्या नव-याच्या रागाला इंगळ्या इस्तुवाची उपमा द्यायची आणि आपण गोड बोलून चतुराईनं कसं ‘विसावण’ घालतो, याचं वर्णन करायची. मला असं विसावण घालणं कधी जमलं नाही. पण यांना जितक्या लवकार राग यायचा, तितक्याच लवकर तो निवायचाही. मग उगीचच काही तरी बोलून, हसवून ते वातावरणातला ताण दूर करतात. इच्छा नसतानाही मग मला फस्सकन हसू येतं. ‘तुझं नि माझं जमेना… ’ असं अनेकदा म्हणता म्हणताच, ‘परि तुझ्यावाचूनि करमेना… ’ याही सार्वकालिक सत्याचा प्रत्यय येतो.

– समाप्त – 

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर

माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं? ’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.

यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय? ’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ. इ. ’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या… ’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये… ’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं… ’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!

त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,

‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ

चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं…’

‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,

‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’

‘तेच तर आम्ही म्हणतो…’

सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.

‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’

मी त्यांना थांबवत म्हणते.

‘आमच्या घरात नेहमीच घडत माझ्या इच्छेप्रमाणे

जेव्हा एकमत असेल तेव्हा

आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे

दुमत असेल तेव्हा…’

क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ! ’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!

विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.

घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. ‘माय स्पेस’ किंवा ‘माझा अवकाश’ याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.

मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी. एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून उरलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी. एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.

– क्रमशः भाग पहिला 

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्ञान आणि अनुभव – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ज्ञान आणि अनुभव – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

मानवाच्या आयुष्यात ज्ञान आणि अनुभव हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

‘केवळ पुस्तक वाचून, शिकून आपण ज्ञानी होऊ शकतो, पण त्या ज्ञानाचा खरा अर्थ कळण्यासाठी अनुभवाची गरज असते.’ 

– – या वाक्यातील गाभा हाच आहे की, शब्द समजणे आणि त्यांचा अर्थ जाणणे यात फरक असतो.

ज्ञानी व्यक्ती शब्दांचे अर्थ, त्यामागील विचार आणि सिद्धांत समजू शकते. ती अनेक गोष्टी वाचते, ऐकते आणि शिकते. परंतु, अनुभवाशिवाय हे ज्ञान काहीसे अपूर्ण राहते. कारण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट अनुभवतो, तेव्हाच त्या शब्दांना खरी खोली आणि अर्थ प्राप्त होतो.

– – उदाहरणार्थ;दुःख हा शब्द प्रत्येकाला माहित असतो. पण ज्याने खरोखर दुःख अनुभवले आहे, त्यालाच त्या शब्दाचा खरा अर्थ कळतो. तसेच आनंद, प्रेम, संघर्ष हे शब्दही अनुभवातूनच अधिक स्पष्ट होतात. त्यामुळे अनुभव हे ज्ञानाला पूर्णत्व देतात.

आजच्या काळात अनेक लोक माहितीच्या आधारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण जीवनातील चढ-उतार, संकटे आणि संघर्ष यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्या ज्ञानाला खरी किंमत मिळत नाही. अनुभव आपल्याला अधिक संयमी, समजूतदार आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच, आयुष्यात केवळ ज्ञान मिळवण्यावर भर न देता अनुभव घेण्यालाही तितकेच महत्त्व द्यायला हवे. कारण ज्ञान आपल्याला मार्ग दाखवते, पण अनुभव आपल्याला चालायला शिकवतो. आणि या दोन्हींच्या संगमातूनच खरे शहाणपण निर्माण होते.

मित्रांनो काळजी घ्या….

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’  ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ सोलापुरातील ‘आवाज की दुनिया’ ☆ शीला पतकी 

सोलापूरची खरी ओळख गिरणगाव म्हणून होती. आता एकही गिरणी शिल्लक नाही हा भाग वेगळा पण गावाची सुरुवातच मुळी गिरणीच्या वाजणाऱ्या भोंग्यान व्हायची. जुनी गिरणी, लक्ष्मी विष्णू, जाम मिल, फुटाणे गिरणी म्हणून पण एक होती. अशा गिरण्यांच्या भोंग्याच्या आवाजाने गावाला जाग येत असे. गिरणीत पाळी बदलली की भोंगा वाजायचा तोच अख्या गावाला घड्याळाच टाइमिंग दाखवायचा. पाचच्या भोंग्यावर पाणी यायचं माणसं उठायची… पाण्याचा आवाज… पाण्याच्या भांड्यांचा आवाज… मग कोणाची आदळ आपट… आणि सोलापुरातील खास विषय म्हणजे नळावरची भांडण…! सरकारी नळ असायचे. त्या नळावर अख्या गल्लीची गर्दी… वाड्यातनही अनेक बिर्हाडामध्ये एखादा नळ… तसं तर पाणी दोन वेळा यायचं… पण वाड्यात 100- 100 माणसं. वरच्या मजल्या वरील लोकांना जिन्यावरून पाण्याच्या घागरी नेऊन पाणी भरावे लागे मोटर वगैरे नव्हत्या.

लाईट जेमतेम संध्याकाळ झाल्यावर तेसुद्धा रात्री नऊ पर्यंत चालू असे. त्यानंतर सगळ्या वाड्याचा लाईट बंद.! अभ्यास करणारी पोरं मग कंदीलावर अभ्यास करत असत अरे आमका पोरगा कंदीलावर अभ्यास करून मोठा झाला… असं काही नाही सगळीच पोर कंदीलावर अभ्यास करत होती. मुन्सिपालटीच्या दिव्यावर म्हणावं तर त्याच्यात संध्याकाळी एक माणूस तेल घालून जायचा त्या तेलावर तो दिवा किती वेळ जळणार मग तेही दिवे मालवून जायचे. अशी ही दिव्याची दिव्य कथा! त्यामुळे सकाळी नळावर भांडण नाही झाल असा दिवस नव्हता अर्थात ती भांडण तात्कालीक असायची. त्याचवेळी संडासला रांगा लागलेल्या. तीन-चार बिराडात एक बाथरूम कॉमन… सगळ्यांची आंघोळीची घाई… भांड्याचा खणखणाट संपेपर्यंत… धुण्याचा धपधपात चालू व्हायचा…

त्यानंतर बटर विकणारी माणसं ओरडत यायची सकाळची ही चहा बटरची सोय झाली की मग एखादा उसsssळ असे ओरडत यायचा. आम्ही मुस्लिम गल्लीत राहत असल्यामुळे म्हणजे काळी मशीद भागात… सहा वाजताच गल्लीत असलेले थोबडे आणि अण्णाप्पा व्हट्टेते चे दुकान उघडून ती मंडळी तयार असायची. थोबड्यांचे दुकान आमच्या वाड्याच्या खालीच असल्यामुळे दुकानाचा एक दरवाजा वाड्याच्या बाहेर आणि दुसरा दरवाजा वाड्यात असा उघडत असे. त्याच्या शेजारीच त्यांच्या दोन खोल्या कधी कधी थोबडे मामाला मदत करायला आम्ही वाड्यातली पोरं जात असू कारण सकाळी गडबड असायची ना सकाळच गिऱ्हाईक आणि वस्तू ठरलेल्या… “मामा दोन बाई छाप दो(म्हणजे चहा पुड्या), एकाने की मसूर डाळ, एक आने का तेल, दो पैसे के फल्या म्हणजे भाजक्या शेंगा, दो पैसे की शक्कर, दो पैसे की मसाला पुडी और चार आणे का जवारी का पीठ”… सगळी यादी थोबडे मामांना तोंडपाठ असायची त्यांचे हात वेगाने काम करायचे मदतीला आम्ही असायचोच एवढ्या कमी पैशात त्या गरीब माणसाची सकाळ भागत होती… हे मला आता विचार करताना लक्षात येतं.!

ही लगबग संपेपर्यंत वाडा थोडा शांत झालेला असायचा एखाद्या घरचा सकाळी सहा वाजता बॅटरीवर लावलेला सकाळचा रेडिओ त्याच्यामुळे अख्ख्या वाड्याची सुरुवात बिस्मिल्ला खानच्या शहानाईने व्हायची… सुधा नरवणे बातम्या देत आहेत… या आवाजाने घरातल्या आया पोरा सोरांना उठायच्या, “उठा रे सुधाताई आल्या सात वाजले” अर्थात आळशी राहिलेल गदळ त्यावेळेला उठायच. चहाचे सुगंध आणि कपबशाच्या मधुर आवाजांचा किणकिणाटात उषःकाल संपलेला असायचा आणि घराघरातून स्टोव्हचे शेगड्यांचे आवाज यायचे. खमंग फोडण्याचे वास तुरीची डाळ आणि भात शिजल्याचा वेगळाच वास ती भाताची रटरट. तो फोडणीचा तडतडाट आणि खमंग वास… आसमंतात भरून राहायचा.. आणि गंध आणि नाद यांच्या आवाजाची जुगलबंदी कानाला सुख द्यायची. पाठोपाठ धपाधपा भाकरी बडवल्याचा आवाज..

कुठेतरी पोरांच पाठांतर. कविता वाचन कुठेतरी पूजेच्या घंटा.. कुठेतरी आरती.. आणि पोरग अभ्यास करीत नाही ऐकत नाही रट्टे खाऊन ओरडण्याचे व्रात्य पोरांचे आवाज. वाड्याच्या प्रत्येक घरात वेगवेगळे काम चालू असायचे. मग शाळेला जायची गडबड पोर सर्व जेवण करून शाळेला निघाली कि अकरा वाजता सुधा जोशी.. कामगार सभेच्या कार्यक्रमाला हजर..! पोरं शाळेला पळाली कि आया जरा मुक्तपणे… दत्त दिगंबर दैवत माझे किंवा असावे घर ते आपले छान किंवा कौसल्याचा राम बाई अशा माणिक बाईंच्या आवाजात गुंगून जायच्या. भाजी फारशी दारावर येत नसे कारण आमच्या गल्लीतच भाजीचे छोटे मार्केट होतं कधीतरी एखादा शेतकरी बैलगाडीवर मेथीच्या पेंड्या घेऊन येत असे आणि दहा नव्या पैशाला एक पेंडी याप्रमाणे तो मेथी विकून गाडी रिकामी करूनच जायचा. त्याचा आवाजाच भारी… “महागाईत सस्ताईची कमाल 10 पैसे 10 पैसे “असे मोठ्या आवाजात ओरडून तो भाजी विकायचा. मध्येच दहीवाला दहीsss म्हणून ओरडून जायचाआणि सकाळचे आवाज संपायचे.

पुरुष मंडळी गिरणीमध्ये.. पोरं शाळेत.. मग बायका मंडळींचच राज्य… त्या बिचाऱ्या सगळ आवरून विश्रांती घेत तोवर सकाळच्या शाळेत गेलेली पोरं परत यायची त्यांची उस्तवारी करायची… थोड्या आडव्या पडल्या की त्यांचं दुपारी निवडण टिपण सुरू कारण त्या काळातल येणार धान्य निवडलेलं नसायचं… तांदळात गारेचे खडे असायचे… ज्वारी गव्हात खडे असायचे… मोहरी तर विचारूच नका.! आता कसं सगळं स्वच्छ निवडलेले मिळते, अगदी रेडी टू कुक! तेव्हा फक्त घरातली बाई रेडी टू कुक असायची.

दुपारचे आवाज वेगळेच असायचे दुपारी बर्फ गोळा.. बुड्डी का बाल… काळी मैना… ए कुल्फी एक डहाळे किंवा काय घोंगडीला रेवड भरायची कायssss असे आवाज करीत तांबड पागोटे आणि खांद्यावर घोंगड आणि हातात लोकरीची टकळी फिरवत रेवड वाला यायचा यायचा(रेवड म्हणजे घोंगड्याच्या टोकाच्या बाजूला घातलेली वीण त्यामुळे त्याचं धागे सुटू नयेत)… त्याबरोबर बोहारणीचा एक आवाज असायचा “काय हाय का जुने कापडं… ” असा टिपेला गेलेला आवाज असायचा मग बाया बापड्यांची तिच्याभोवती गर्दी एक तास मनोरंजन…! जुन्या कपड्यावर केलेल्या खरेदीचा आनंद! त्याच वेळेला खाली.. दिल्ली का लाल किल्ला देखो… आग्रे का ताजमहाल देखो.. असे टाळाचा नाद करीत सिनेमा दाखवणारा माणूस यायचा त्याच्या त्या तिपाईवर एक यंत्र असायचं.. वरच्या बाजूला एक बाहुली… त्याने दोर्या आवळल्या कि ती बाहुली नाचायची समोरच्या डब्याचे झाकण काढून पोरं सिनेमा बघायची… सिनेमा कसला एका पैशात चार-पाच चित्र दाखवायचा मजा होती…

पण चार वाजता गिरणीचा भोंगा व्हायचा कामाला गेलेली माणसं परत येईतो गाव हळूहळू थकत गेलेल असायचं! घरोघरी कंदीलाच्या काचा पुसून संध्याकाळची तयारी व्हायची तुळशी वृंदावनाजवळ दिवे लावायचे. काही घरात आरती व्हायची… काही घरात शुभंकरोती.. वाड्यात खेळणाऱ्या पोरांचे आवाज हळूहळू बंद व्हायचे! रस्त्यावरती मंद प्रकाश… प्रकाशाचा झगमगाट नसल्यामुळे सारा दिवस मिटत आल्यासारखा भासायचा. तोच एका लाकडी ट्रेमध्ये आलेपाक च्या वड्या आणि ढणढण जळणारा दिवा घेऊन ए आले पाक वाला आलेपा ssssकअसे ओरडत एक आलेपाक वाला यायचा आणि हलकेच तो त्या धुरात नाहीसा व्हायचा. तो शेवटचा विक्रेता. बुधवार असेल तर वाड्यातल्या एकमेव कुठल्यातरी रेडिओवर बिनाका गीतमाला ऐकायला मात्र चढाओढ असायची. कुठलं गाणं कुठल्या पायदान वर यायचे याची चर्चा असायची त्या एकमेव घराला.. ” काकू रेडिओचा आवाज थोडा मोठा ठेवा ना “… अशी प्रेमळ सूचनाही केली जायची. साडेआठ वाजताच मशिदीतली अजान व्हायची मग नमाज… नऊ पर्यंत सगळे खाऊन पिऊन अंथरुणावर जायचे नऊच्या दरम्यान सगळे दिवे मालवले जायचे कुठेतरी एखाद्या घरात चिमणी किंवा कंदील लागलेला असायचा कुठल्यातरी घरातून लहान लेकराला झोपवण्यासाठीचा अंगाईचा आवाज, जवळच्या मठातून टाळाचे, भजनाचे, आवाज यायचे.! रस्त्यावरची रहदारी केव्हाच बंद झालेली असायची. रिक्षा गावात नव्हत्या एखाद दुसरी मोटार,… चार दोन टांगे त्यांच्या घोड्याचा टापाचा आवाज… सायकलच्या घंटेची टिंग टिंग… या पलीकडे रस्त्यावर आवाज नव्हते! मग सारा शहर शांत व्हायचं आणि आनंदाने निद्रा देवीच्या आधीन व्हायचे… रात्री क्वचित रस्त्यावर एखाद्या दारुड्याची वेडी वाकडी चाल आणि बरळणं ऐकू यायचं एखाद्या घरात नवरा बायकोला बदडून काढायचा आणि तीही त्याला ठोकायची कारण तो त्यानंतर दारू पिऊन आलेला असायचा एवढे गोड आवाज संपले की दिवस संपला…!

– – – आवाज की दुनिया पूर्णपणे निद्रिस्त व्हायची गिरणगावची सारी दारिद्र्य दुःख दैना त्या परमेश्वराला हात जोडून सांगितली की तो दिवस संपवून जाई आणि सार शहर उद्याच्या आशेच्या किरणाची… पक्षांच्या चिवचिवाटाचीआणि पुनः त्याच आवाजाची वाट पाहत शांत झोपी जायचं आणि मधेच कधीतरी एखाद्या कुत्र्याच केकाटणे चालू राहायचं… रात्रीच्या त्या निरव शांततेचा शेवट रात्री बारा वाजता गस्त घालायला येणाऱ्या रामोशाच्या आवाजाने व्हायचा. तो ओरडायचा जागते रहो ssssजागते रहो ssssआणि गंमत म्हणजे त्या वेळेला सार शहर निद्रा देवीच्या आधीन गेलेल असायचं…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”How are you??” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “How are you??” ☆ संध्या बेडेकर ☆

“How are you??“

किती साधा आणि अगदी सहज विचारला जाणारा प्रश्न?

  • कशा आहात?
  • काय म्हणताय?

 याच अर्थाचे अनेक प्रश्न.

कोणी ओळखीचे भेटल्यावर सहजच विचारल्या जाणारा पहिला प्रश्न. गप्पांच्या सुरवातीचा प्रश्न…

त्याला साजेशी उत्तर…

  • अगदी मस्त,
  • मजेत 
  • I am fine. ,
  • I am doing good,

अशी, generally उत्तर आपल्याला ऐकायला मिळतात. चेहर्यावर हलकेसे स्मित पण दिसते. तरच तर उत्तर आणि चेहर्यावरचे भाव मॅच होतील. नाही का?

काल माझ्या मैत्रीणीच्या आईला आजींना केअर सेंटर मध्ये भेटायला गेले.

Wheel chair वर बसवून एका नर्सने त्यांना लिफ्टमधून खाली हाॅलमध्ये आणले होते. समोर वाहता रस्ता आहे, त्यामुळे संध्याकाळचा वेळेस पेशंटस येथे आणतात. दिवसभर खोलीत गेल्यामुळे त्यांनाही बाहेर चांगले वाटते.

इतर पेशेंट्ना भेटायला येणार्यांशी पण गप्पा होतात.

तेथेच आमच्या सोसायटीच्या Mrs Sharma retired english प्रोफेसर येथे admit आहेत हे मला माहित होत. त्या समोरच दिसल्या. मी विचारल,…

How are you Mam?

Oh! I am fine, doing good, All the doctors and nurses are taking very good care of us. May be in a month or two, I will be kack to my home.

मी त्यांच्या साठी आणलेली फळ त्यांना दिली आणि तेथेच बेंचवर बसून आजीं बरोबर गप्पा मारत होते.

आजींना विचारल? कशा आहात?

आजी हळुच हसल्या. म्हणाल्या…

अग! बघ सध्या हे अस आहे. परावलंबी जीवन जगण चालू आहे. कोणीतरी बसवणार, उठवणार, घेऊन येणार, घेऊन जाणार.

अग! पण यालाही नशीब लागत बर. आता या परिस्थितीत दुसरा उपाय नव्हताच. घरी एकटी राहणे शक्य नव्हतेच. बर आता अनघाचा (मुलीचा) विचार करणे पण आवश्यक आहे. बरेच उपाय/ पर्याय विचार करून, आमलात आणून झाले. मला फक्त माझाच विचार करून चालणार नव्हत. सारासार विचार करून हे option मला पटल. अग! आता केंव्हा आणि कधी डोॅक्टर ची गरज पडेल सांगता येत नाही. पाय अधु झाल्यापासून मला मदतीची गरज लागतेच. आयुष्यात परिस्थितीप्रमाणे नेहमीच तडजोड करत आलोय. नाही का? ही पण अशीच एक तडजोड आहे बघ.

अनघा चा विचार करण ही गरजेचेच आहे तिच्या जीवाची घालमेल कळते मला.

तिची मुल आता 10, वी 12 ला आहेत. तिची नोकरी, घर, मुल सर्वच बघायच. मीच हा option google वर search केला. आणि मी येथे रहायला आले.

आजी म्हणाल्या…

चल मी तुला माझी खोली दाखवते.

खोलीत एक writing table, एक लहान music system, पेन स्टंड, एक फोन holder, room freshner, coloured pencils, drawing book for seniors, family photo, देवाचा फोटो, मैत्रीणींचा गृप फोटो होता. काही पुस्तक ठेवली होती.

म्हणाल्या…

हा बघ माझा संसार. हा IPAD मी नवीन घेतला. सध्या मी on line गीता शिकतेय.

Thank God! पायात शक्ति राहीली नाही, पण डोक मात्र जागेवर आहे.

मला खूप कौतुक वाटल आजींच.

अग! शेजारच्या खोलीत माझ्याच वयाच्या सुमनताई आहेत. झोपूनच असतात. मी मधून मधून त्यांच्याजवळ जाऊन बसते. भजन म्हणते, एखादी गोष्ट वाचून दाखवते. माझा पण वेळ चांगला जातो.

बरोबर आहे…

खुश रहने के तरीके सोचने पडते है। तकलीफे तो खुदही हमें ढूंढ लेती हैं।

 तितक्यात अनघा आलीच. आईला छान भेटली, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जेवली का? झोप लागली का? थोडी विचारपूस झाली. दोन पुस्तक दिली.

अनघा मला म्हणाली झाल्या का गप्पा तुमच्या? अग! आईचे drawing book बघीतलेस का तू? अग! आमची आई म्हणजे चित्रकारच आहे बघ. काय सुंदर कलर्स भरले बघ.

क्षणभर आई मुलीच्या नात्याची अदलाबदल झाली की काय? असच वाटल मला. अनघाने आईच्या डोक्याला तेल लावल. माॅलीश केली. वेणी घातली. तिच्यासाठी आणलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. शेजारच्या सुमन काकूंना भेटून आली.

आजी म्हणाल्या,… अग! आता मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, तिथे लक्ष दे. मी ठीक आहे. आणि फोनवर बोलू की..

थोड्या वेळाने आम्ही दोघी घरी यायला निघालो.

खाली Mrs Sharma ची मुलगी मिनी भेटली. Mrs Sharma तिला म्हणत होत्या, मला घरी घेऊन चल. मला नाही रहायच इथे.

बर! ठीक आहे. डोॅक्टर ने परमिशन दिली की जाऊ आपण घरी. मिनी म्हणाली.

अक्षरशः Mrs Sharma रडतच होत्या.

आम्ही तीघी बरोबरच बाहेर पडलो.

मी मिनी, अनघाच्या चेहर्यावरचे भाव निरखत होते, त्यांच्या मनातील घालमेल समजायचा प्रयत्न करत होते. एक पाय इथे थांब म्हणत होता तर दुसरा पाय घरांकडे जाण्याची घाई करत होता. तिथे नवरा मुल वाट बघत होती.

Past, Present आणि Future चा ताळमेळ बसवायचा त्यांचा प्रयत्न म्हणजे तारेवरची कसरतच. दोघींच्या मनात वेगळच विचार असतील. नाही का?

मिनी म्हणाली…  It is very difficult rather not possible to take care of her at home. 

अनघा म्हणाली,…

Old age is difficult. It totally depends on how they react / respond to it. 

खरय…

It is not bad things happen to good people, I think bad things hapen to everyone, It is the way they respond to situation / problem, make them good people. 

आता घरी गेल्यावर दोघी दुसर बटन on करून दुसरी जबाबदारी पूर्ण करणार.

आज अनघा आणि मिनी आपापल्या आयांचे आणि मुलांचे पालक आहेत. दोन्ही जबाबदार्या जाणून आहेत. प्रत्त्येकाच्या प्रवासात मदत करतायेत.

राहून राहून दोन्हीं आजींची 

How are you?

विचारल्यावर त्यांची उत्तरे मला आठवत होती.

आपली माणस दिसली की आवाज, मनातले भाव, उत्तर सगळच बदलत.

शारिरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती / attitude महत्वाचा. येथे बाई- माणूस, शिकलेली – अशिक्षित याच काहीही देणघेण नसत.

हे प्रत्येकाची सहनशक्ती, समज, acceptance to reality यावर अवलंबून असत.

खरय…

The hardest walk in life is to walk alone. once you accept and understand the reality, it becomes easier. It makes you strong.  

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares