एखाद्या घरातून भरपूर पाहुणचार घेऊन आपण बाहेर पडावं आणि चालू लागताना अचानक त्या घरातल्या एखाद्या लहान मुलाने शुकशुक करून हात हलवावा, पुन्हा या म्हणावं, तसं पुस्तकातल्या काही पात्रांच्या बाबतीत घडतं.
साधारण तीन दिवसांपूर्वी पारखा ही भैरप्पांची कादंबरी वाचली. त्यावरती सविस्तर लेखही लिहून झाला. त्यातल्या काळिंगा या पात्राला खरमरीत पत्र लिहून झालं. तरीसुद्धा यातली तैय्यवा मला शुकशुक करू लागली. खरंतर पुस्तक वाचतानाच तिनं तिच्याकडे माझं लक्ष वेधून घेतलं होतं. म्हणजे दर वेळेस मला लेखक जेव्हा एखादा पात्र व्यंग असलेलं जन्माला घालतो मग ते व्यंग कुठल्याही स्वरूपाचं का असेना तेव्हा मला कुतूहल वाटतं. असं वाटतं की दुसऱ्या एखादा पात्राचं कर्तृत्व उठावदार दिसण्यासाठी किंवा त्याला जास्त न्याय मिळवून देण्यासाठी हे पात्र लेखकाने कमकुवत बनवलं असेल का? आणि मग त्या कथानकाचं वाचन चालू असतानाच माझ्या मनात एका दुसऱ्या पातळीवरती एकूण त्या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं नातं बघता डिसेक्शन चालू होतं.
थोडक्यात ह्या पात्राचा या पात्राशी संबंध नसेल तर अमुक एक पात्र इतकं उठावदार झालं असतं का? त्याचा एवढा प्रभाव पडला असता का? त्याचं महत्व जाणवलं असतं का? असा एक विचार माझ्या मनात सुरू होतो. पात्रांची जैविक आणि भावनिक गुंतवणूक मला खुणावू लागते. कथानक आपलं आपल्या वळणवळणाने पुढे जातं राहतं. पुस्तक वाचून मग नंतर त्याच्यावरती लिहून काम करून झाल्यानंतरही डिसेक्शन मोड पुन्हा डोक्यात सुरूच राहतो.
त्यावेळेला काही पात्रांवर अन्याय झालाय असं नकळत वाटून जातं, पण एक साहित्य निर्मिती ही एक कलाकृती आहे आणि ती विकली जाणंही गरज आहे ही गोष्ट जर मानली तर ती आकर्षित होण्यासाठी अशा क्लृप्त्या या लेखकाला कराव्या लागतात हे जाणल्यानं त्याबद्दल हळहळ वाटण्या पलिकडे काही करता येत नाही. परंतु अशी काही पात्रं मनाच्या तळाशी ही राहतातच.
आता यातल्या तैय्यवा या पात्राच्या बाबतीत मला असंच वाटलं ही खरंतर या कादंबरीतील नायकाची आई आहे पण तिला मुकी दाखवली आहे. आणि त्यामुळे अर्थातच तिचे संवाद नाहीत परंतु तिचे संवाद नसतानासुद्धा अप्रत्यक्षपणे ती सगळ्या घटनांशी कशी जोडलेली आहे आणि तिच्यावरती कसा वेगळ्या वेगळ्या प्रकारे जगण्यानेच नियतीनेच अन्याय केला आहे हे जाणवत राहतं. भैरप्पांच्या लेखनाची ही एक कमाल मला इथे जाणवते की एखादं व्यंग असलेलं पात्र सबंध कथानकामध्ये कुठे ना कुठे अदृश्य स्वरूपात स्पर्शत राहतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कादंबरी वेगळी वाटू लागते.
तर अशी वेगवेगळी पात्र त्यांची व्यंग किंवा त्यांची ताकद घेऊन येतात आणि त्या कादंबरीला एक वेगळंच स्वरूप देतात. हा विचार करून नंतर पुन्हा ती कादंबरी वेगळ्या दृष्टीने बघण्यात एक वेगळीच मजा असते. असं बघायला लागलं तर कादंबरीचा खरा नायक किंवा खरा खलनायक कुणीच नाही असे वाटू लागतं आणि या दृष्टिकोनातून कादंबरी काही काळाने तटस्थपणे पाहता येते पण तरीही तिचा आनंद तसाच घेता येतो.
एक वाचक म्हणून नंतर असंही वाटतं की आपलं आयुष्य असंही पाहता यायला हवं. पण ते जमत नाही ही खंत मात्र प्रत्येक वेळी जाणवते.
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री अंजली गोखले यांनी लिहिलेले “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” हे माहितीपूर्ण पुस्तक ‘विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग’ यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे.
आपल्या समूहातर्फे अंजलीताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन आणि यापुढील त्यांच्या अशाच समृद्ध साहित्य-सेवेसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 💐
🌸🌼🌸
आजच्या “ मनमंजुषा “ सदरात वाचू या.. ‘ हे पुस्तक का लिहावेसे वाटले ‘याबद्दलचे अंजलीताईंचे मनोगत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ स्वामी विवेकानंदांवरचे पुस्तक मला का लिहावेसे वाटले… ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆
☆
स्वामीजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेनेच या पुस्तकाचे लिखाण पूर्णत्वाला जाऊ शकले.
ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंद या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद करताना स्वामी विवेकानंदांचा संदर्भ आला.
अमेरिकेतील एका छोट्या गावामध्ये सहा सात वर्षाची मुले खेळत असतात. जवळच छोटासा टॅंकअसतो. थोडावेळ खेळ झाल्यानंतर मुलांची दंगामस्ती, त्यानंतर भांडणे होतात. एक मुलगा आपल्या लहान भावाला पाणी भरलेल्या टॅंक मध्ये ढकलून देतो. तो मुलगा बु डायला लागतो आणि त्याच क्षणी त्याचे लक्ष आकाशाकडे जाते. तिथे त्याला झगझगता प्रकाश दिसतो आणि त्यामध्ये एक आश्वासक चेहराही दिसतो. त्याचवेळी पाण्यामध्ये त्याच्या हाताला एक काठी लागते आणि मित्र त्याला ओढून घेतात आणि त्याचा जीव वाचतो..
त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी तो मुलगा आपल्या आईबरोबर शिकागो येथे चाललेला असतो. त्यात वेळी त्याला समोर तसाच झुक झुकता प्रकाश पुन्हा दिसतो आणि तोच आश्वासक चेहरा असलेली व्यक्ती पण दिसते. तो त्यांच्याकडे जायचे ठरवतो तेवढ्यात ती व्यक्ती पायऱ्या चढून एका मोठ्या हॉलमध्ये जाते. तोही त्या हॉलमध्ये जातो आणि पाहतो तो हॉल गच्च भरलेला असतो आणि त्या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरलेली असते.
केशरी फेटा आणि अंगभर केशरी कपनी घातलेली ती व्यक्ती म्हणजे भारतामधून आलेले स्वामी विवेकानंद होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर तो त्यांना शेक हँड करून यावे असे मनाशी ठरवतो. त्यांच्या जवळून जाताना त्याच्या मनात येते की आपल्याला असे मोठे गुरु पाहिजेत. यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळावे. तो जवळ गेल्यावर स्वामीजी त्याच्याकडे पाहून त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,, ” अरे मी तुझा गुरु नाही. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये जे तुला चांदीचा पेला देतील, ते तुझे गुरु असतील.”
25-30 वर्षांनी त्या व्यक्तीला, भारतातूनच आलेल्या परमहंस योगानंदानी चांदीचा पेला दिला.
.. हा प्रसंग वाचल्यानंतर मी थक्क होऊन गेले. अशा द्रष्ट्या, दैवी शक्ती लाभलेल्या स्वामीजींची आपण पूर्ण ओळख करून घ्यावी, त्यांचे विचार समजून घ्यावेत, असे मी नक्की केले. आणि त्यांची पुस्तके वाचण्याचा सपाटा सुरू केला. अशी मोठी पंधरा-सोळा पुस्तके वाचल्यानंतर सोप्या भाषेत स्वामीजींवर पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले आणि त्यातून तयार झाले ” हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद “हे स्वामीजींवरील पुस्तक.
…. स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे आणि जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली केली, तसेच होते स्वामीजी. त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले तसेच घडले स्वामीजी.
…. सद्गुरु रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या पट्ट शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी.
…. आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी.
…. आपल्या मातृभूमी बरोबर सगळ्या जगाच्या हितासाठी झटले स्वामीजी.
…. ” हे विश्वची माझे घर ” म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची
अक्षरशः आहुती दिली ती स्वामीजींनी.
…. फक्त भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड येथेही हिंदुध्वज रोवून तो ध्वज फडकवला तो स्वामीजींनी.
अशा स्वामीजींचे सर्व पिढीला आदर्श असेच आहे.
म्हणूनच – –
“हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद”हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे आणि आचरणात आणावे असे मला मनापासून वाटते.
आवड : भ्रमण, (21 देश बघीतले) नाटकात काम करणे, अभिवाचन, कार्यक्रमाचे संचालन, निवेदन, शाळेत समुपदेशात्मक भाषण देणे. पुणे येथे स्थाईक. तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
मनमंजुषेतून
☆ माणुसकीचा धर्म म्हणजेच तर देवधर्म! ☆ सुश्री संध्या बेडेकर☆
सध्या वारीमय वातावरण. किती वाट बघतो या दिवसांची. या भव्य दिव्य उत्सवा ची. महाराष्ट्रातील एका पारंपरिक सोहळा. पंधरा दिवस चालणारा हा उत्सव. लोकांचे थवेच्या थवे पंढरपूर मार्गी चालताना दिसतात. पालखी प्रस्थान सोहळा बघण्यासारखा असतो. जागोजागी त्यांचे स्वागत, त्यांची व्यवस्था बघणारे सेवेकरी सज्ज असतात. ‘फूल नाही फूलाची पाकळी’ समजून, आपली सेवा म्हणून, लोक श्रध्दाभावाने साधारण जनमाणूस हे सर्व करतो. स्वतः ला धन्य समजतो. मी वारी करू शकत नाही. तेव्हा जेवढं जमेल तेवढं करावे, अशा विचाराने मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. •••
पंढरपूर वारी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण. विठ्ठलाचा नामगजर, माऊली माऊली चा उदघोष आसमंतात दुमदुमतो. ही वेळ म्हणजे जणू काही वातावरणाचे शुध्दीकरणच चालू आहे असे वाटते. बातम्या वर्तमानपत्रात अनेक माहिती, घटना ऐकून, प्रमूख पाहुण्यांचे विचार वाचून / ऐकून आपल्याही विचारांत परिवर्तन नकळत होते. नकळत हात जोडले जातात. थोड्या प्रमाणात का होईना घर गृहस्थीतून बाहेर पडून मनात वेगळे विचार येतात. वारीला जाता आलं नाही म्हणून लोकांची तगमग बघून त्यांच्या श्रद्धेचा अंदाज येतो. ••••
माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे रोज मी अनेकदा आभारही मानते. मला खूप साग्रसंगीत पूजा करता येत नाही. म्हणजे अगदी साधी रामरक्षा म्हणताना सुद्धा माझे लक्ष इथे तिथे जाते. त्या पाच मिनिटांत पाचशे विचार मनात येतात. मला नेहमी वाटतं जर भक्तांची देवासमोर लाइन लावली तर माझा नंबर कुठे लागेल बरं?? बहुतेक सगळ्यात शेवटचे स्थान मिळेल का मला?? ••••
मी वारी करू शकत नाही हे मला चांगले माहीत आहे. माझी शारीरिक शक्ती कमी झाली आहे. किंवा भक्तित तेवढी शक्ति नसावी. मला जमणार नाही असे मात्र वाटते. आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे देवधर्म करावा. असे मी खूपदा ऐकलंय. वाचलंय. मी माझ्या करिता हाच नियम पाळते. ••••
माझ्या आजीचे एक वाक्य माझ्या मनावर बिंबलेले आहे, ते म्हणजे, •••• आजी म्हणायची, ••••
” मी माणुसकी चा धर्म पाळते. ” तो धर्म मी लक्षपूर्वक, विचार पूर्वक पाळू शकते. माझ्या सहवासात येणाऱ्या लोकांशी चांगले वागायचे. जमेल तेवढी मदत करायची. हेच माझं आयुष्यातील ध्येय मी ठरवून टाकले आहे. मलाही आजीचे हे विचार, म्हणणे पटले. ••••
खरच लक्ष देऊन बघीतल तर माझ्या आजूबाजूला खूप माऊली दिसतात. पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. पण माझ्या आजूबाजूला बऱ्याच माऊलींचे दर्शन मला रोज घडते. मला रोज दूधाची पॅकेट घरपोच देणारा ‘अजिंक्य’, मला घर कामात मदत करणारी ‘कविता ‘, ‘मंदाताई ‘, माझ्या घरचा कचरा घ्यायला येणाऱ्या ‘मावशी ‘. रोज न चूकता आपले काम व्यवस्थित पार पाडतात. सर्वांनी कोरोनाच्या कळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून आमची सेवा केली. मला या नेहमी सांगतात ••••”काकू स्वतः ला जपा. बाहेर निघू नका. काळजी घ्या. “••••
नाइलाजाने काम करायला घरा बाहेर निघणाऱ्या या माऊली, स्वतः रोज रिस्क घेऊन बाहेर पडतात, तरीही दुसऱ्यांचा विचार करतात. दुसऱ्यांची काळजी घेतात. देवाच्या रूपात असणाऱ्या या माऊलीचे मला रोज दर्शन होते. फक्त पंढरपूर वारी काळातच नाही तर नेहमीच या सर्व माऊली, माझे सख्खे शेजारी माझ्या आजूबाजूला आहेत. हे सर्व माझ्या extended family चेच मेंबर्स आहेत.. •••••
देवाला बघीतले नाही. पण देवाचे representative बरेच दिसतात. कोरोना काळात तर माणसातल्या देवाचे दर्शन झाले. जिव्हाळ्याचे ॠणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं नाही. माझे व यांचे पूर्व जन्मीचे काही तरी संबंध नक्कीच असावेत. आपणही नेहमी त्यांच्या समाधानाचा हिस्सा असावं. समस्यांचा नाही. त्यांच्या बद्दल आदर असावा. ••••
ही माझ्या’ contact ‘मधे असणारी सर्व मंडळी माझ्या ‘connection’ मधे पण आहे. जीवाभावाचे नाते आहे आमचे. माझा त्यांच्या शी संपर्क आहे, संवाद आहे. आम्ही एकमेकांना समजतो. जाणतो. ••••
हा माणुसकीचा धर्म पाळला तर देवधर्म झाला का?? ••••
आपल्या आजूबाजूला समाधान, आनंदी वातावरण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा एक चांगला संसर्गजन्य रोग आहे जेवढा पसरेल तेवढा चांगला. •••••
“We rise by lifting others “.
म्हणतात ना, •••••
“मधुर संबंध ज्ञान और पैसेसेभी बड़ा होता है। जब ज्ञान और पैसा विफल हो जाता है, तब मधुर संबंध से स्थिति संभाली जा सकती हैं ।”•••••
‘जाssदू’… असं म्हटलं की सगळ्यांनाच गंमत वाटते. या कलेचे सगळ्यांनाच आकर्षण असतं. जादू हा शब्दही आपण कितीतरी ठिकाणी वापरतो. उदाहरणार्थ ‘तिच्या बोलण्यात जादू आहे’, ‘त्यांच्या लेखनाची जादू वेगळी आहे’, ‘उसकी नजर मे जादू है! ’, ‘जादूss तेरी नजर’ हे गाणं तर खूपच फेमस झालं होतं. आपण अगदी लहान मुलाला सुद्धा डाव्या हातातील वस्तू उजव्या हातात पटकन घेऊन ‘बघ माझ्या हातातून वस्तू गायब झाली आणि ती मी आता हवेतून काढतो’ म्हणून हात वर करून लगेच दुसऱ्या हातातून पहिल्या हातात घेतो आणि ते पोर अचंबित होतं. ती खरं तर आपली हातचलाखी असते. मग या हातच्या चलाखिचीच पुढे ‘जादू’ नावाची कला झाली आणि ते करणारा जादूगार!!
आपल्या कल्पनेच्या पलीकडे एखादी गोष्ट करून आपल्याला अचंबित करणारा तो जादूगार. जादूचा कार्यक्रम म्हणलं कि लहान मुलं, मोठी माणसं सगळीच त्याकडे आकर्षित होतात. जादूगाराचा स्टेजवरचा वावर, त्या पाठीमागचं म्युझिक, त्याचे हातवारे, सगळे सुंदर असतं… आमच्या लहानपणी सर्वात प्रसिद्ध जादूगार होते.. ‘जादूगार रघुवीर! ’ जादूगार रघुवीर यांचे डोळे निळे होते. ते अतिशय गोरे पान असे कुठल्यातरी जादुई दुनियेतून आल्यासारखे दिसायचे. सोलापूरला त्यांचे थियेटर कार्यक्रम होत होते. ते माझ्या वडिलांचे मित्र. थियेटर कार्यक्रम संपले की ते आमच्या घरी राहायला येत. त्यापूर्वी ते लॉजला उतरत. ते आले की त्यांचं सगळं जादूचं सामान आमच्या घराच्या गॅलरीमध्ये लावलं जाई.
सोलापुरात त्यांचा कार्यक्रम असला की त्या दिवशी सकाळी डोळे बांधून फटफटीवरून गावात फेरफटका मारणे हाच त्यांचा पहिला कार्यक्रम असायचा. त्यांच्या मार्गावर दुतर्फा अनेक लोक जमलेले असायचे. डोळे बंद करून डोळ्यावर पट्टी बांधून ते ‘फटफटी’ म्हणजे आत्ताची ‘मोटरसायकल’ चालवताना आमच्या घरापाशी आले की थांबत. वडिल त्यांना तिथे हार घालत आणि मग पुढचा फेरफटका… या सकाळच्या कार्यक्रमामुळे त्यांचा सगळा शो फुल होत असे. त्यांच्या सामानात एक कळशी होती. एक कार्यक्रम झाला कि ती कळशी पालथी करायचे आणि म्हणायचे, ‘‘आता थोडा वेळ गंगेची प्रार्थना करूया, गंगेची प्रार्थना” असे म्हंटल्या बरोबर कळशीतून पाणी पडायचे. आमच्या घरी आल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘तुला काय देऊ बेटा? ” मी म्हणाले, ‘‘तुमची कळशी द्या. आम्हाला खालून पाणी आणावे लागते. ” त्यावर ते इतके हसले आणि म्हणाले, ‘‘अगं बाळ ती जादूची कळशी आहे. तुला दिल्यावर मी कार्यक्रम कसा करू? तू माझ्याकडे जादू शिक. मग मी तुला ती देईन. ” तेंव्हापासून जादू शिकावी असे मला वाटू लागले.
पुढे इंद्रजीत नावाचे एक जादूगार आमच्या वडिलांसह कार्यक्रम करीत असत… त्यांनी मला काही जादूचे कार्यक्रम शिकवले आणि मी ते स्टेजवर अत्यंत सफाईने करत असे. पुढे वळसंगकर नावाचे सोलापुरातील एक सॅनिटरी इन्स्पेक्टर होते त्यांच्याकडे जादूचे सर्व सामान होते आणि ते कार्यक्रम करीत असत. त्यांनी मला जादूचे सर्व कार्यक्रम शिकवले आणि जादूचे सामानही दिले. पुढे मी त्याचा एक तास स्टेजवर कार्यक्रम करीत असे… त्यामध्ये रिकाम्या पिशवीतून वस्तू काढणे, रिकाम्या गोलातून वस्तू काढणे, आकडे ओळखणे असे बरेच कार्यक्रम होते. दोरी तोडून जोडणे…. या कार्यक्रमांमध्ये मी प्राविण्य मिळवले होते, माझे वक्तृत्व ही छान होते. कागद खाऊन पूर्ण कागद काढणे.. अशा कार्यक्रमांमुळे लोक अचंबित होत. माझे वडील आणि मी एक कार्यक्रम करत असू… माझ्या तोंडावरती पूर्ण पांघरूण असे. वडील स्टेजवर एका माणसाला बोलवून कोणताही आकडा लिहिण्यास सांगत. मग दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी आकडा कोणताही असे आणि तो मी तोंडावर पांघरूण असताना ओळखून दाखवत असे… हा कार्यक्रम एका इलेक्शन प्रचारासाठी झाला. आठ उमेदवार उभे होते. आठही जणांच्या नावाने लोकांनी आकडे लिहिले. आठही बरोबर आले. दुसऱ्या दिवशी मतदान झाले. संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आले. त्यांनी आमचाच गावात मोठा सत्कार ठेवला…… अशी जादूच्या कार्यक्रमाची आठवण माझ्याकडे आहे…
मुख्य म्हणजे या कलेमुळे रेल्वे प्रवास करताना, कुठे एकत्र बसलो की सहज एक दोन कार्यक्रम करून लोकांना आकर्षित करून घेता येत असे. त्यामुळे अनेक मित्र भेटले, ओळखी वाढल्या! ….. पुढे मग मी ‘बी. एड’ झाले. शाळेत नोकरीला लागले आणि कार्यक्रम करणे बंद झाले. या गोष्टीला जवळजवळ २० वर्ष झाली होती. एके दिवशी एक जादूगार गृहस्थ कार्यक्रम करण्यासाठी शाळेत आले होते. कार्यक्रमाला परवानगी मिळावी म्हणून ते शाळेच्या सचिवांची वाट बघत होते आणि तिथे बसलेल्या लोकांसमोर त्यांनी एक जादूचा प्रयोग करून दाखवला होता…. ‘दोरीचे तुकडे करून जोडणे’… त्या चार-पाच बायका खूप आश्चर्यचकित झाल्या. इतक्यात मी तिथे गेले आणि मी त्यांना म्हणाले, ‘‘त्यात काय? मी सुद्धा करू शकते’’… मी खरं अगदी गमतीने म्हणाले होते परंतु त्यांना जरा राग आला. ते म्हणाले, ‘‘असं..! मग घ्या की दोरी आणि करून दाखवा”… मी दोरी हातात घेतली. ज्या बाईंना कापायला सांगितली होती त्यांच्याकडून ती कापून घेतली. एक मंत्र म्हणला आणि दोरी एकसंघ त्यांना उलगडून दाखवली…. सगळेच आश्चर्यचकित. म्हणजे तो जादूगार सुद्धा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, ‘‘तुम्हाला कसं येतंय? ”… मी त्याला म्हणलं, ‘‘जिस स्कूल में आप अभी पढ रहे हो, उस स्कूल के हम प्रिन्सिपल रह चुके है! ” मग मी त्याला सांगितलं की, मी जादूचे प्रयोग कुणाकडे शिकले आणि असे अनेक कार्यक्रम मी स्टेजवर केले आहेत. आमच्या स्टाफला हे माहीत नव्हते. ते सगळेच आश्चर्यचकित झाले. ते जादूगार म्हणाले, ‘‘सॉरी मॅडम, मला खरंच वाटलं नाही तुम्ही असं काही कराल म्हणून”…. मी म्हणलं, ‘‘नाही तुम्हाला दुखण्याचा माझा हेतू नव्हता. आपण कलावंत आहात… केवळ गंमत म्हणून मी हे केले….! ”
जादूच्या कलेमध्ये पुढे हातचलाखी संपून अनेक यंत्रवत गोष्टींचा समावेश झाला. या क्षेत्रातही अनेक दिग्गज मंडळींनी काम केले. आता तर वाराणसीच्या गंगेमध्ये असंख्य दिवे एकावेळी लावणारा जादूगार मी पाहिला आहे. या क्षेत्रात अनेक दिग्गज काम करीत आहेत. जादूगार किती मोठा आहे, लहान आहे याला महत्त्व नाही. आपल्या प्रत्येकाला या छोट्या छोट्या कार्यक्रमाचेही आकर्षण असतेच आणि आपल्याला ते सगळेच कार्यक्रम आवडतात.
जादूच्या या कलेमध्ये माणसाच्या मनोरंजना बरोबर त्याचे कुतूहल जागृत करण्याची एक मोठी ताकद आहे, इतके मात्र खरे! या सगळ्यात एक गंमत म्हणजे जादूचे मंत्र फार छान असतात.. त्यातला एक मंत्र मला नेहमीच आवडतो ‘‘हाय अल्या रम्या कुल्हा फाट्या फुल्ला. आईदु जालदू आई बला तालदु छूssssss! ” आहे की नाही मस्त आणि सोपा सुद्धा. चला तर मग…. हा मंत्र नंतर पाठ करा आणि रोज सकाळी पाच वेळा म्हणण्याचा सराव करा. ‘जादू’ अपने आप हो जायेगा..!
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काल एकाच्या तोंडून वारीतील गोष्ट ऐकली.. खूप आवडली. गृहस्थ वारीला निघाले. चालण्याची सवय नाही. पण तो माहोलच असा असतो आणि अंतःकरणातली पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ…. हे काही जाणवत नाही. असे म्हणतात की पांडुरंग वारकऱ्यांच्या पायावरून रात्री हात फिरवतो आणि त्याचं दुखणं गायब… असेलही खरं किंवा ती त्यांची श्रद्धाही असेल…! तर हे वारकरी गृहस्थ रस्त्याने निघाले आणि अचानक चप्पल तुटली. लंगडत चालायला लागले. आपल्या दिंडीबरोबरचा स्पीड जमेना. खरडत खरडत तसेच निघाले. आसपास चप्पल दुरुस्त करणारा दिसेना. चप्पल हातात घेऊन मोकळ्या पायाने चालणं कधीच माहीत नव्हतं.. घरात सुद्धा चप्पल घालणारी मंडळी. पण पांडुरंग कृपेने एक माणूस त्यांना रस्त्यावर दिसला की जो चप्पल दुरुस्त करून देत होता. गृहस्थ तेथे थांबले आणि त्याच्याकडे जाऊ लागले इतक्यात तोच म्हणाला, ” काय माऊली चप्पल तुटली का? आत्ता दुरुस्त करून देतो आणा इकडे” आणि पाच मिनिटात त्याच्या कलाकुसरीने चप्पल दुरुस्त झाली आणि त्यांनी त्याच्यासमोर ठेवली. गृहस्थ म्हणाले,
” किती पैसे झाले? ” चप्पल शिवून येणारा तो चांभार म्हणाला, ” छे छे माऊली याचे कसले पैसे? पैसे मी घेत नसतो” त्यावर ते गृहस्थ म्हणाले, “ अरे तुझा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, तू माझी चप्पल शिवून दिली त्या बदल्यात मी तुला पैसे देतोय. अगदी बरोबर आहे ना हे फुकट कोणाचा घेऊ नये बाबा.. “! त्यावर तो चप्पल शिवणारा म्हणाला, “छे! छे!! बाबा मी फुकट देतच नाही तुम्हाला. या बदल्यात मी तुम्हाला माझे एक काम सांगणार आहे तेवढं करा “…
“बोल बाबा काय तुझं काम आहे? “गृहस्थ म्हणाले.
तो म्हणाला, “ काही नाही आता चाललाय तुम्ही वारीला तर पांडुरंगापर्यंत माझी एक प्रार्थना पोचवा”..
ते म्हणाले, “ठीक आहे पोहोचवतो.. काय प्रार्थना करू त्याला सांगा”…
“म्हनाव रांजणगावच्या सोपानला वारीसंगं चालत यायचे आहे, पण ते या जन्मी शक्य नाही. त्याला म्हणावं पुढल्या जन्मी तरी पाय दे देवा म्हणजे पाई चालत तुझ्या वारीला येईन”…..
समोरचा माणूस अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागला… त्याच्या पायावर एक फडके होते त्यांनी ते किंचित सरकवले आणि त्याला दिसलं की या माणसाला दोन्ही पाय नाहीत……. गृहस्थांचे डोळे वाहू लागले. ते म्हणाले, “हो ही तुझी प्रार्थना मी पांडुरंगापर्यंत नक्की पोहोचवेन आणि मी सुद्धा तुझ्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करेन.. “
राम कृष्ण हरी म्हणून त्याला हात जोडीत तो माणूस पुढे निघाला… डोळे भरून वाहत होते… पांडुरंगाच्या वारीत पुढल्या जन्मी येण्याची ओढ असलेला तो पाय नसलेला तरुण पोरगा त्यांच्या नजरेसमोरून हालत नव्हता आणि मग त्यांनी आपल्या दोन्ही पायावरून हात फिरवला दोन्ही हात जोडले आणि ते म्हणाले, “भगवंता केवढी असीम कृपा आहे तुझी आमच्यावर की आम्हाला तू धड धाकट शरीर दिले आहे. यासाठी तुझे रोज रोज आभार मानायला हवेत. यापेक्षा खरोखर वेगळे काही मागणीच असता कामा नये.. आता या शरीरात दुसऱ्याच्या वेदना जाणणारे मन दे इतकेच मी मागेन”….
वाहणारे डोळे त्यांनी पुसले आणि तो पुढे चालू लागला…!
राम कृष्ण हरी!!!!!
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ज्योत से ज्योत… लेख क्र. ५ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
शाळेत नवीन शिक्षिका घेण्यासाठी मुलाखती होत्या. मुलाखती चालू असताना त्यांचे चेहरे वाचायला मला खूप आवडतं. सगळ्यांमध्ये वाचनाची आवड फार अभावानेच आढळली. एकीने तर “मृत्युंजय”च्या लेखनाचं श्रेय रणजीत देसाईंना देऊन टाकलं. एकंदरीत उत्तरंही फारशी आशादायक नव्हती.
“प्रेमा मोरे” (नाव बदललेले आहे) या नावापुढे असलेल्या शैक्षणिक पात्रतेवर माझी नजर गेली. बारावी सायन्स ७८% गुण, डीएड ७८% टक्के गुण.
माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितल्यावर ती बसली. सगळेजण प्रश्न विचारत होते. मी मात्र तिचं निरीक्षण करत होते. शांत व सोशिक चेहऱ्यामागे काहीतरी दडलंय हे जाणवत होतं.
मी एकदम तिला म्हटलं, “तू स्वखुशीने या पेशाकडे वळली नाहीस. हो ना? “
त्यावेळी तिचे डोळे पाण्याने भरून आले. माझा कयास बरोबर होता. तिला शास्त्र शाखेतच, विशेषतः गणितात संशोधन करण्याची इच्छा होती.
परंतु घरच्यांचे म्हणणे – “आपल्या खानदानात मुली जास्त शिकल्या नाहीत. जास्त शिकून काय करायचंय? त्यापेक्षा शिक्षिका हो. हीच नोकरी बरी शिकण्यात उगाच वर्षे कशाला वाया घालवायची?”
त्या मुलीचा कावराबावरा चेहरा, तिची होणारी घुसमट, शिक्षणाची तिला असलेली आस – सगळी सगळी मला जाणवत होती.
मी तिला म्हटलं, “अग, तुला शिकायचंय ना? मग थोडा आग्रह धर, हट्ट कर. तुझं मत बाबांना पटवून दे. तू अजून वीस वर्षाचीसुद्धा नाहीस. उगाचच नोकरी आणि पैशाच्या मागे लागू नकोस. तुमच्या खानदानात इतकं कोणी शिकले नाही म्हणतेस, तर खूप शिकण्याचा पहिला मान तू पटकव. इतर मुलींसाठी तू नवीन वाट तयार कर. कोणी काहीही म्हटलं, तरी तुला काय वाटतं ते ठामपणे मांडायला शिक. एक स्त्री असलीस, तरी तुलाही तुझी मते मांडण्याचा अधिकार आहे, हे विसरू नकोस. आगाऊपणा कर असं म्हणणार नाही मी, पण नम्रपणे स्वतःचा विचार तर मांडायला शिक. “
माझं बोलणं चालू होतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने काही न बोलताही तिच्यातील असहाय्यता मला जाणवत होती.
“काही आर्थिक अडचण असेल तर मी तुला मदत करते. त्यासंबंधी हवं तर मी तुझ्या वडिलांशी बोलते. पुढील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर त्याचीही सोय करते, ” असे अनेक पर्यायाने तिच्यासमोर ठेवले.
“बाई, मी तुम्हाला नंतर येऊन भेटते, ” असं म्हणून ती गेली.
नवीन शैक्षणिक धोरणात आम्हाला अभ्यासाला असलेले “महिला सबलीकरण”, “महिला सक्षमीकरण” असे विषय नजरेसमोर आले. खरंच आहेत का आजच्या महिला सक्षम? आहेत का महिला सबला? आजच्या सुशिक्षित समाजातही जर असे चित्र असेल तर निरक्षरांच्याबद्दल तर विचारच करायला नको.
मुलांच्या प्रवेशाच्या वेळी असे अनेकदा आढळून येते की “मुलगा आहे ना बाई, म्हणून त्याला इंग्रजी माध्यमात घातलाय. पण ही मुलगी आहे ना, म्हणून तिला इथे मराठी माध्यमात प्रवेश घेतोय”. अशा पालकांशी माझे नेहमीच वादविवाद होतात. कुठे गेली ती स्त्री पुरुष समानता? अशा वेळी कितीही शांत राहायचा प्रयत्न केला तरी ते काही शक्य नसतं.
नंतर काही दिवसांनी मात्र प्रेमाचा फोन आला. तिने साठे कॉलेजला ऍडमिशन घेतली होती. ती पुढे शिकणार होती. हे सर्व तिने वडिलांना व्यवस्थित पटवून दिले होते आणि हे सर्व माझ्यामुळे घडले असं तिला वाटत होतं म्हणून धन्यवाद देण्यासाठी तिने मला फोन केला होता.
पण खरं सांगू का? प्रत्येकात असा निखरा राखेखाली दडलेलाच असतो. फुंकर घालण्याचं काम फक्त आपण करायचं.
खूप बरं वाटलं. माझ्या बोलण्यामुळे का होईना, ती धीट झाली, स्वतःला जे वाटतं ते बोलू शकली. “खूप शिक आणि इतरांनाही अशीच धीट बनव”, असं फोनवर सांगितलं आणि माझे डोळे टिपले.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्या दिवशी मी उतरलो. गाडीत बसून किशोर गुंजाळच्या घराकडे निघालो. गाडीच्या बाहेर चारही बाजूंनी माझी नजर भिरभिरत होती. मी पाहत होतो, तेव्हाच्या औरंगाबादमध्ये असतानाचे वातावरण आणि आता औरंगाबादचे नाव बदललेले संभाजीनगर, यात खूप मोठा बदल झाला होता. शहर सोडून आज २० वर्ष झाली, तरी आजही संभाजीनगरमध्ये, इकडे रामनगर पासून ते तिकडे विद्यापीठापर्यंत प्रत्येक भागात कुणी ना कुणी माणूस ओळखीचा होताच होता. त्या प्रत्येक भागात आपल्या हक्काचे, ओळखीतले एक घर होतेच. संभाजीनगरमधले ते दिवस प्रचंड संघर्षाचे होते, तरीही आनंद खूप होता. आज संभाजीनगरच्या त्या प्रत्येक क्षणाची मला आठवण येत होती.
किशोरच्या घरी तयार होऊन, मी किशोरला घेऊन विद्यापीठात निघालो. विद्यापीठाच्या गेटसमोर गाडी उभी करून आम्ही बाबासाहेबांच्या चरणांवर मस्तक टेकवले. गाडीत बसून आता आम्ही कमानीमधून विद्यापीठात प्रवेश करणार, इतक्यात किशोर मला एकदम म्हणाला, ‘अरे संदीप, त्या माणसांमध्ये बसलेले ते व्यक्ती, मला पुरी सर वाटतात. ‘
किशोरच्या तोंडातून पुरी सरांचे नाव ऐकल्या-ऐकल्या माझा चेहरा एकदम प्रफुल्लित झाला. मी गाडीची काच खाली केली. बाहेर पाहतो तर काय! त्या सगळ्या माणसांमध्ये मोठमोठ्याने हसणारी ती व्यक्ती तिच होती. पुरी सर म्हणजे आमचे सुरेश पुरी सर.
किशोरने गाडी बाजूला घेतली. मी गाडीतून खाली उतरलो. जिथे पुरी सर होते, तिथे आम्ही पोहचलो. पुरी सरांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. मी खाली वाकल्यावर पुरी सरांनी मला वर उचलले. मी कोण आहे, हे पाहत त्यांनी माझा चेहरा न्याहाळला. मी कोण, हे लक्षात आल्यावर सर माझ्याकडे पाहत एकदम ओरडले, ‘अरे संदीप, इकडे कुणीकडे?’ असे म्हणून त्यांनी मला आलिंगन दिले.
सर माझी मिठी कधी सोडणार असे पाहणाऱ्यांना नक्की वाटत असणार. त्यातल्या काहींना आमचे प्रेम माहिती होते. ज्यांना माहिती नव्हते, त्यांना ते प्रेम समजून सांगणे शक्य नव्हते. २००२ ते २००८ हा अवघा सहा वर्षांचा काळ म्हणजे पुरी सरांच्या सहवासातला सुवर्णकाळ होता. त्या सहवासातूनच आयुष्याची खरी पायाभरणी झाली.
पुरी सरांनी माझी मिठी सोडली. तिथे असलेल्या प्रत्येकाला माझी ओळख करून देताना पुरी सर म्हणाले, ‘हा माझा विद्यार्थी संदीप काळे. मुंबईला असतो. मोठा पत्रकार आहे आणि अनेक पुस्तके त्याच्या नावावर आहेत. पत्रकारांसाठी याने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून जागतिक स्तरावर काम सुरू केले आहे’.
माझा कौतुक सोहळा काही केल्या सर थांबवत नव्हते. मी सरांना म्हणालो, ‘सर, आता बस्स झाले’.
माझ्याकडे शांतपणे बघत पुरी सरांनी त्यांचे बोलणे थांबवले. मग झालेल्या शांततेची कोंडी फोडताना सर पुन्हा तिथे असलेल्या सर्वांची मला ओळख करून देत होते. सर्व सरांचे विद्यार्थी होते. प्रत्येक जण मला परिचय करून देताना सांगत होते, ‘सरांनी माझे शिक्षण पूर्ण केले. ‘ ‘सरांनी माझे लग्न लावून दिले. ‘ कुणी नोकरीचे सांगत होते, कुणाला प्रेस टाकून दिली, असे सांगत होते. प्रत्येक जण सरांविषयी भरभरून बोलत होते.
तिथे असणारे समीर वाघमारे म्हणाले, ‘मी सांगतो तो विषय साधारण तीस वर्षांपूर्वीचा आहे. वडील लोकांची रोज मजुरी करायचे. त्या रोज मजुरीतून माझ्या दोन बहिणी आणि माझ्या जगण्याचा प्रश्न कसाबसा सोडवला जायचा. मी मित्रासोबाबत विद्यापीठात शिकायला आलो. रोजचा खर्च बघून बापाने लगेच परत ये असा निरोप पाठवला. मी ठरवले होते, परत जायचे नाही. पुरी सर सर्व विद्यार्थ्यांना मदत करायचे, योग्य तो मार्ग दाखवायचे, हे मी कित्येक वेळा पहिले होते. मी माझी अडचण पुरी सरांना सांगितली. मला जवळ घेत पुरी सर म्हणाले, ‘नको काळजी करू, चांगला आभ्यास कर. मी आहे ना तुझ्या सोबत’. तेव्हा जो सरांनी पाठीवर हात ठेवला, तो आजपर्यंत कायम आहे’.
समीर अजून उत्साहाने बोलत म्हणाले, ‘मला तो प्रसंग अजून आठवतो. गावाकडून वडील गेल्याचा निरोप आला. आई अगोदरच मरण पावली होती. मी पुरी सरांना बाबा गेल्याचे सांगायला घरी गेलो. सरांना निरोप देण्याऐवजी सरांच्या गळ्यात पडून खूप रडलो.
मी घरी जाण्यासाठी निघालो खरा, पण पैसे नसल्यामुळे बापाचे अंत्यसंस्कार करायचे कसे? हा प्रश्न माझ्या समोर होता. दुसर्या क्षणी मनात विचार आला, पुरी सरांना पैसे मागावे का? पण दुसरे मन म्हणाले, किती मागायचे पैसे सरांना?
मी थोडा शांतपणे विचार करून निघालो. थोडे पुढे गेल्यावर मी मागे पाहिले, तर दुसरे कपडे घालून पुरी सर माझ्यासोबत माझ्या गावी निघाले होते. माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांचा सर्व खर्च त्यावेळी पुरी सरांनी केलाच. शिवाय आयुष्यभर वडिलांसारखे माझ्यामागे उभे राहिले. आता काय, बायको मोठ्या हुद्यावर आहे. दोन्ही मुले डॉक्टर. नागपूरला घर, गावाकडं घर, कशाचीही कमी नाही’.
समीर पुरी सरांचा हात हातात घेत म्हणाला, ‘आता एकच कमी आहे, ती म्हणजे पुरी सरांचा सहवास मिळत नाही. ‘
समीरच्या बोलण्याने तिथे असणारे सारेच भावुक झाले होते. तिथे असणाऱ्या प्रत्येकाची पुरी सर यांना घेऊन एक वेगळी स्टोरी होती. त्या स्टोरीचे नायक पुरी सर होते.
मला वाटायचे पुरी सरांनी जे माझ्यासाठी केले, ते कुणासाठी केले नाही. पुरी सर माझ्या जवळचे आहेत, माझ्याएवढे ते कुणाच्याही जवळचे नाहीत. पण तसे नव्हते. तिथे असणाऱ्या प्रत्येकासाठी पुरी सर यांनी पाठीराख्या बापाची भूमिका बजावली होती. माझ्याएवढेच त्या सर्वांचे पुरी सर तेवढेच जवळचे होते.
आम्ही पुरी सरांना (9423148863) भेटलो, त्या दिवशी पुरी सरांच्या संतोष कांबळे नावाच्या विद्यार्थ्याच्या मुलीचे लग्न होते. लग्नानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरली ती पुरी सरांची भेट. लग्न लागले आणि त्यानंतर पुरी सर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मस्त झाडाखाली गप्पा मारत बसले होते.
अनेक ठिकाणी प्राध्यापक म्हणून सेवा करणारे प्रा. सुरेश पुरी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विभागातून प्रोफेसर तथा विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. पत्रकारिता आणि जनसंपर्क या दोन्ही क्षेत्रांत पुरी सरांचे विद्यार्थी पावलोपावली आढळतील. ते विद्यार्थी त्यांनी घडवलेले, उभे केलेले, मोठी मदत केलेले, मोठा आधार दिलेले. ‘काय त्या माणसाची किमया’ होती, कसे शब्दात सांगायचे.
गरज सरो आणि वैद्य मरो, असे पुरी सरांच्या विद्यार्थ्यानीही केले नाही. ‘मी तुम्हाला मदत केली, तुम्ही इतरांना मदत करा, आपला जन्म इतरांना देण्यासाठी झाला आहे’, हा कानमंत्र पुरीसरांच्या मुशीतून तयार झालेल्या प्रत्येकाने अंगीकारला. आम्ही पुरी सरांचे विद्यार्थी आहोत, असे अभिमानाने सांगणाऱ्या पुरी सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांना आयुष्यभर जपले. ‘पुरी बाबा’ म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या काळजाचा तुकडा असलेले पुरी सर. असे शंभरामध्ये एखादेच शिक्षक असतील, ज्यांनी विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम केले. त्यांचे प्रचंड प्रेम मिळवले.
पुरी सरांच्या नावाने त्यांच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, पुरस्कार, पुस्तकप्रेम यासारखे अनेक उपक्रम राबवले. या मातृह्रदयी माणसात काय जादू होती काय माहीत! जो विद्यार्थी त्यांच्या सहवासात यायचा, तो त्यांचाच व्हायचा.
आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही, जिथे पुरी सरांनी घडवलेले विद्यार्थी नाहीत. असे प्रामाणिक गुरुजी आपल्या अवतीभोवती शंभर किमीवर असले, तरी आमच्याकडे दूर होत चाललेले गुरुशिष्याचे नाते अजून संस्कारित होईल. माझ्या मनात असा उगाच विचार सुरू होता.
पुरी सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गप्पांमध्ये विद्यापीठात असलेल्या कामाचा वेळ आता संपला होता. पुरी सर यांना घेऊन जावे, काकूंना भेटावे, या उद्देशाने मी पुरी सरांना माझ्या गाडीत बसवले. गुलमंडीच्या भाजी मार्केटजवळ पुरी सरांनी गाडी उभी करायला सांगितली. त्यांच्याजवळ असलेल्या काळ्या छोट्या बॅगेतून त्यांनी दोन पिशव्या काढल्या. सरांनी अवघा बाजार पायाखाली घातला. हातातल्या दोन पिशव्या मालाने भरून घेतल्या. सर आले आणि गाडीत बसले. दोन्ही भरलेल्या पिशव्यांकडे पाहत मी पुरी सरांना म्हणालो, ‘सर, आताही घरी सामान घेऊन जाताय, घरचे काम करताय, कमाल आहे!’
माझ्या बोलण्यावर पुरी सर एकदम हसले. दूध डेअरीपासून पुरी सरांनी गाडी त्रिमूर्ती चौकात घ्यायला लावली. बंजारा कॉलनीत एका घरासमोर आमची गाडी थांबली. सरांनी मला आतमध्ये यायला सांगितले. दोन पिशव्यांमधील उरलेली पिशवी सरांनी हातात घेतली. आम्ही त्या घरात प्रवेश केला. त्या घरात एक जोडपे लिखाणाचे काम करीत होते. पुरी सरांना पाहून ते दोघेही त्यांच्याकडे धावत आले. त्यांनी पुरी सरांना नमस्कार केला. पुरी सरांनी त्यांच्या हातात असलेली बॅग त्या घरात असलेल्या महिलेच्या हाती दिली.
पुरी सरांनी त्या दोघांसोबत गप्पा मारताना त्यांचा परिचय करून दिला. थोड्या वेळात आम्ही उठलो आणि बाहेर येऊन गाडीत बसलो. गाडीत बसल्यावर पुरी सर त्या जोडप्यांबाबत म्हणाले, ‘ते जोडपे विद्यापीठात शिकायचे. दोघांची जात वेगळी. त्यामुळे दोघांनाही घरच्यांनी नाकारले. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले, पण झाले असे की कोरोनाच्या काळात दोघांचीही नोकरी गेली. तेव्हापासून आजपर्यंत नोकरी शोधण्याचे काम सुरू आहे. मी दर आठवड्याला संजू आणि नीलिमाकडे येऊन त्यांना बाजार देण्याचे काम करतो’. असे बोलून पुरी सर एकदम शांत बसले.
मी विद्यापीठात असतानाचा तो काळ मला एकदम आठवला. त्या वेळी रोज दोन चार मुलांना पुरी सरांकडून मदत व्हायची. आर्थिक आणि सामाजिक अडचणींमधून मार्ग काढायचा कसा, यावरचे सोल्युशन एकमेव पुरी सर असायचे. अगोदर त्यांचा स्वतःचा पगार, मग मुलांचा पगार सर्व वाटून पुरी सर मोकळे व्हायचे. आलेल्या पीएफच्या पैशातून चार पैसे म्हातारपणाची काठी मजबूत करण्याऐवजी पुरी सरांनी विद्यार्थ्यांना उद्योग टाकून देणे पसंत केले. आम्ही बोलत बोलत घरी पोहचलो.
घराखाली काकू झाडांना पाणी टाकत होत्या. मला पाहून काकू एकदम चकित होत म्हणाल्या, ‘कसे काय बाबा आज तुम्हाला दिवस उजाडला?’ असे म्हणाल्या. आम्ही घरी वरती गेलो, तर काय, वरती नेहमीप्रमाणे मुलांची पंगत सुरू होती. माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुरी सर आणि पुरी काकू आणि विद्यापीठामधले ते घर आले, ज्या घरात बाराही महिने पंगत बसलेली असायची. दरवर्षी त्या पंगतीची लांबी वाढतच जायची. ती प्रथा आज पुरी सर सेवानिवृत्त होऊन कित्येक वर्ष लोटली, तरी अजून सुरूच होती. मग काय पुरी काकूने मला आणि सरांना दोघांनाही ताट वाढले.
जेवण झाल्यावर पुन्हा एकमेकांचा परिचय आणि त्यातून पुन्हा नवनवीन किस्से, नवे विषय. त्या मुलांच्या आयुष्यासाठी त्यांनी केलेले काम. पुरी सर आणि पुरी काकू दोन्ही माणसे काय अफलातून आहेत!
मी पुरीसर यांना म्हणालो, ‘सर, तुम्ही ही सारी धावपळ करून थोडा वेळ स्वतःसाठी काढा’.
त्यावर सर हसत हसत म्हणाले, ‘आरे, स्वतःसाठी वेळ काढायला आणि ऐटीत जगायला मी काय पाटणूरचा पाटील आहे का?’
आम्ही कोणीही सरांना जर खूप गंभीरपणे काही सांगायला गेलो तर, ते सारे सांगितलेले ते गमतीत घेतात. कसे सांगायचे त्यांना? आयुष्यभर पुरी सरांनी इतरांचा विचार केला. त्यांनी स्वतःविषयी जरा जरी मोह ठेवला असता, तरी त्यांचे आयुष्य सोनेरी क्षणांनी दिपून गेले असते, पण पुरी सरांनी अखंड मानवतेचा विचार समाजमनात खोलवर रुजवला, तो टिकवला, वाढवला. हजारो विद्यार्थी पुरी सरांनी उभे केले. त्यांना मोठे केले.
असे अनेक पुरी सर आपल्या आजूबाजूला असणे आवश्यक आहे, बरोबर ना.. !
काही दिवसांपूर्वीच माझ्या एका शालेय मैत्रिणिने मला विचारले, ” मला ना तुझ्या बाबतीत नेहमीच एक प्रश्न पडतो. मी तुझं लेखन अगदी आवडीने वाचत असते म्हणूनच एक प्रश्नही विचारते. तू एका प्रसिद्ध साहित्यिकाची मुलगी, लहानपणी तुझ्या घरातलं वातावरणही साहित्य कलेसाठी पोषक असलेलं, तू आर्ट्सला न जाता सायन्स साईडला गेलीस, रसायनशास्त्र घेऊन पदवीधर झालीस, आता तू लिहितेस आणि लेखिका म्हणून तुझी ओळखही आहे पण तुझ्या या क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेल्या बँकिंग क्षेत्रात तू कशी काय गेलीस? तुझ्या कलाप्रेमी मनाला ही व्यापारी पद्धतीची आकडेमोड कधीच रुक्ष आणि निरस वाटली नाही का? तू आयुष्याची ३०/४० वर्षे या क्षेत्रात रमलीसच कशी?”
खरं सांगू का? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही. प्रवाहाबरोबर मी वाहत गेले असं म्हणूया फार तर. जे हवं ते मिळालं नाही म्हणून जे मिळालं ते स्वीकारलं असाही अर्थ कोणी काढला तरी तो अगदीच चुकीचा नाही पण माझ्या मैत्रिणिने असा थेट प्रश्न विचारून माझ्या मनाला थोडं विचलित केलं मात्र पण तरीही माझ्या मनात याविषयी कुठलाही सल नाही, कसलीही घुसमट नाही, तक्रारही नाही किंवा इथल्या ऐवजी तिथे असते तर माझं आयुष्य किती वेगळं आणि अधिक उंचीवरचं असतं अशी रुखरुखही नाही पण जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा माझ्याच बद्दल मी एक निष्कर्ष काढते की, मुळातच माझा स्वभाव आनंदी राहण्याचा आहे. सतत तक्रारी, नाराजी किंवा कुढत बसण्याचा माझा स्वभावच नाही. स्वतःला रमवून घेण्याचं एक तंत्र मला ईश्वरानेच दिलं असावं म्हणून असेल कदाचित पण माझ्या एकंदर प्रोफाईलशी पूर्णपणे भिन्न असलेल्या बँकिंग क्षेत्रात मी अगदी छानपणे स्वत:ला सामावून घेतलं हे खरं आहे. खरं म्हणजे याच क्षेत्रात माझ्यातल्या लेखनगुणांना भरपूर खाद्य मिळाले, प्रेरणा मिळाली. तोपर्यंत मी छोटे, मोठे लेख, कथा लिहितच होते. माझ्या कथा मुंबई आकाशवाणीवरून प्रक्षेपितही होत होत्या. आकाशवाणीच्या माननीय लीलावती भागवत यांनी मला सतत लिहितं ठेवलं. तसं म्हटलं तर माझ्या लेखनासाठी माझे आद्य गुरु म्हणजे माझे वडील ज. ना. ढगे हेच होते. ते तत्त्वज्ञ होते. थिअॉसॉफिस्ट होते. अर्थात त्यांच्या लेखनाचे विषय सर्वथा वेगळे, आध्यात्मिक बैठकीचे होते. मी मात्र नेहमीच हलकं फुलकं लेखन करत होते. पपा तेव्हा मला म्हणायचे, ” वाचन हा लेखनाचा मूळ पाया आहे आधी वाच मग लिही. ”
अनुराधा मासिकातून माझ्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यावेळी सुप्रसिद्ध लेखिका सौ गिरिजा कीर या अनुराधाच्या संपादक होत्या आणि त्यांनीही माझ्या लेखनाला नेहमीच मनापासून दाद दिली. वेळोवेळी दुरुस्त्याही केल्या. शुद्धलेखनाच्या चुका होऊ नयेत म्हणून त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एक गुरू शिष्याचं नातं होतं.
“ तू नक्कीच चांगली लेखिका होऊ शकशील” असा विश्वास त्यांनी माझ्यात उत्पन्न केला हे निश्चित पण तोपर्यंत माझं जग लहान होतं. काहीसं संकुचित होतं. एका छोट्या वर्तुळात असलेल्या जीवनाशी माझी ओळख होती. त्या पलीकडे बघण्या इतपत माझी दृष्टी विस्तारली नव्हती पण मी बँकेत नोकरी करायला लागले आणि माझं विश्वच बदलून गेलं. आतापर्यंत भेटलेली माणसं, त्यांच्याशी माझं असलेलं नातं या एकाच भिंगातून मी जगाला पहात होते ते मात्र नोकरी करायला लागल्यापासून नक्कीच बदललं. एखाद्या शोभायंत्रातून बदलणारी असंख्य चित्रं पहावीत ना तशी मला माणसं दिसायला लागली. या माझ्या मानसिक बदलाला आणखी एक महत्त्वाची व्यक्ती कारणीभूत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध “नाट्यकर्मी रत्नाकर मतकरी. ”
योगायोगाने माणसं भेटतात, त्यांच्यात मैत्री होते आणि नकळत त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकत राहतो.
बँक ऑफ इंडियात असताना रत्नाकर मतकरी आणि मी एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करत होतो. ते वरिष्ठ अधिकारी होते. सुरुवातीला इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलताना मला दडपण यायचं पण हळूहळू कामाच्या व्यतिरिक्त व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांवर, चांगल्या चित्रपटांवर, वाचलेल्या मराठी इंग्रजी पुस्तकांवर मनमोकळ्या गप्पा आमच्यात होऊ लागल्या. एका अत्यंत बुद्धिमान आणि साहित्याची परिपूर्ण जाण असलेल्या व्यक्तीपाशी मी माझी मतं बिनदिकत मांडू शकत होते आणि तेही तितक्याच आस्थेने ऐकत यामध्ये “मला खूप समज होती” असं नव्हे तर ते खूप साधे होते. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीशी ते संवाद साधू शकत होते हा त्यांचा मोठेपणा होता कारण त्या वेळेपर्यंत त्यांनी नाटककार म्हणून खूप नावलौकिक मिळवलेलाच होता. स्वतःची बालनाट्य संस्था स्थापित केली होती आणि “अलबत्या गलबत्या”, ” कळ लावणाऱ्या कांद्याची कहाणी” वगैरे सारखी त्यांची अनेक बालनाट्ये रंगभूमीवर गाजत होती.
एक दिवस माझ्या टेबलवर पडलेल्या काही कागदांवर मी लिहिलेली एक कथा त्यांनी सहजच वाचली आणि त्यांनी स्वतःहून मला आवर्जून सांगितले, ” चांगले लिहितेस. तुझ्याकडे विचार आहेत पण हे तोकडं आहे, अपुरं आहे. त्यासाठी तू प्रथम स्वतःला घडवण्याचा प्रयत्न कर. ” “म्हणजे कसा?” लेखिका होण्याची माझी महत्वाकांक्षा नव्हती, स्वप्नंही नव्हतं. मला फक्त लिहायला आवडायचं एवढंच म्हणून मी हा प्रश्न विचारला.
“हे बघ आपल्या भोवती जे घडत असते ना त्याकडे जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न केलास तर तुला कथानकं मिळतील. आपल्याला भेटणारी कुठलीही व्यक्ती ही बिनमहत्वाची नसते हे लक्षात ठेव. शिवाय तुझं वाचनक्षेत्र आणि निरीक्षण क्षेत्र वाढव. ”
माझ्यासाठी हा सल्ला नेहमीच खूप मोलाचा ठरला. स्वतःला बाहेर काढून जग कसं बघायचं हे त्यांनी मला शिकवलं. त्यांच्या लोककथा ७८, अरण्यक सारख्या नाटकांची संहिता केवळ त्यांच्यामुळेच मला वाचायला मिळाली आणि त्यावर त्यांनी जेव्हा माझा अभिप्राय मागितला तेव्हा मनातून मी फार आनंदले होते पण अभिप्राय हे निमित्त होतं. ही नाट्यसंहिता कशी निर्माण झाली त्या मागचं कारण आणि विचार महत्त्वाचा होता आणि तेव्हापासून मी वर्तमानपत्रातल्या बातम्या फक्त बातम्या म्हणून वाचण्यापेक्षा त्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करू लागले. मी किती आणि कशी घडले मला माहीत नाही पण माझ्यात ही प्रक्रिया सुरू करणारे माझे खरे गुरु हे रत्नाकर मतकरी होते आणि त्यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते.
एकदा मी त्यांची “शाळेचा रस्ता” ही गूढ कथा वाचली आणि मी अक्षरश: झपाटून गेले होते. त्यावेळी त्यांना मी म्हटलं होतं, “तुमच्यासारख्या गूढकथा मला कधीच लिहिता येणार नाहीत.”
तेव्हा ते म्हणाले होते, ” कधीही कुणासारखं लिहिण्याचा प्रयत्न करूच नये. तू तुझ्यासारखंच लिही. तुझी ओळख तुझ्याच लेखनातून निर्माण कर. ” हे त्यांचे बोलणेही फार महत्त्वाचे ठरले. आमची वाचक लेखक मैत्री अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकली हे विशेष. ते जाण्याच्या आठ दिवस पूर्वीच आम्ही फोनवर मनसोक्त गप्पा केल्या होत्या. त्याही वेळेला त्यांनी मी सध्या काय वाचते, लिहिते याची चौकशी केली आणि मी कोणती पुस्तके वाचायलाच हवीत हे आवर्जून सांगितले होते.”
म्हणूनच म्हणते माझ्या बँकेतल्या नोकरीने मला हे सद्भाग्य प्राप्त करून दिले. मी त्यानंतरही अनेक वर्ष बँकेच्या निरनिराळ्या शाखांतून आणि कक्षांंतून नोकरी केली. त्या क्रेडिट डेबिट च्या जगात मला अनेक स्तरांवरची भली- बुरी स्वार्थी -निस्वार्थी, उदार- संकुचित, श्रीमंत- गरीब, निरनिराळ्या जातीची धर्मांची अनेक माणसे भेटली. या माणसांना टिपण्याचा आणि त्यांच्या जीवनात अदृश्यपणे डोकावण्याचा मी प्रयत्न करत राहिले आणि त्यायोगे माझे लेखन विकसित होत गेलं. एकाच ठिकाणी “अनेक माणसं भेटण्याचं एकमेव स्थान म्हणजे बँक” हे माझ्यापुरतं तरी एक महत्त्वाचं समीकरण आहे आणि every credit has a debit या महत्त्वाच्या बँकिंग लाॅ ने मला मानवी जीवनाचं वेगळंच गणित सोडवायला दिलं म्हणून मी तिथे रमले.
दोन दिवसांपूर्वी काही कामाकरता शनिवार पेठेत गेलो होतो. मार्केटमध्ये फिरता फिरता एका स्टेशनरी दुकानापाशी पाय थांबले. डोक्यात विचार आला एक इंग्रजी टू मराठी डिक्शनरी विकत घ्यावी. म्हणजे रोजचा इंग्रजी पेपर वाचताना काही शब्द अडले तर पटकन डिक्शनरी मध्ये अर्थ बघता येईल. आणि रोज चार नवीन इंग्रजी शब्द पाठ करायचे असे पण ठरवून करता येईल.
इंग्रजी शब्दांचा अर्थ गुगल वरती पण बघता येतो, पण पेपर वाचताना / आंघोळ करताना / जेवताना / देवपूजा करताना / बाहेर वॉकिंग करायला जाताना / बायकोशी गप्पा मारताना, मी मोबाईल कधीच जवळ ठेवत नाही.
दुकानात गेलो आणि डिक्शनरी बद्दल विचारले. दुकानदारानी दोन डिक्शनरी दाखवल्या. दोन्हीची जाडी साधारण सारखीच होती, पण एकाची किंमत 150 आणि दुसरीची किंमत 75.
दुकानदार म्हणाले की 150 किंमत आहे ती आपली नेहमीची डिक्शनरी आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळे शब्द बघायला मिळतील. आणि 75 किंमत आहे ती डिक्शनरी नेपोलियनची आहे. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये Impossible हा शब्द दिसणार नाही. बाकी सगळे शब्द दिसतील.
माझ्या मनात विचार आला डिक्शनरी मध्ये इम्पॉसिबल शब्द पण नक्कीच पाहिजे कारण कधी पेपर मध्ये impossible शब्द आला, तर त्याचा अर्थ बघायला डिक्शनरी पाहिजेच ना.
मी 75 ची डिक्शनरी हातात घेतली आणि बघायला लागलो.
डिक्शनरी च्या मुखपृष्ठावर नेपोलियन चा फोटो होता आणि खाली लिहिलेले होते –
ही नेपोलियनची डिक्शनरी आहे त्यामुळे यामध्ये Impossible हा शब्द नाही. कारण Impossible म्हणजे अशक्य.
नेपोलियन म्हणायचे –
जगामध्ये काहीही अशक्य नसते.
आणि हे साधण्याकरता प्रयत्न या शब्दाशी मैत्री करा,
मदत माग मदत तयार आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा,
ईश्वराचे नामस्मरण सतत सुरू ठेवा..
मी विचार केला – Impossible हा शब्द डिक्शनरी च्या आत ‘I’ या पानावर नसला, तरी काही हरकत नाही, कारण जरूर पडली तर पहिल्या पानावर या शब्दाचा अर्थ मला नक्कीच बघता येईल.
मी लगेच 75 रुपये दिले आणि डिक्शनरी घेतली.
दुसऱ्या दिवसापासून इंग्रजी पेपर उघडताना मी रोज डिक्शनरी बाजूला ठेवायला लागलो. आणि त्यामुळे रोजच डिक्शनरीच्या मुखपृष्ठावरचे आपोआपच वाचण्यात यायचे की – जगामध्ये काहीही अशक्य नसते. आणि हे साधण्याकरता प्रयत्न या शब्दाशी मैत्री करा, मदत माग मदत तयार आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा, आणि ईश्वराचे नामस्मरण सतत सुरू ठेवा..
मला अगदी रोज या वाचण्याचा खूप फायदा होत आहे. आणि त्यामुळे रोजच्या, या न त्या कारणावरून – हे मला जमणार नाही, हे कसं करता येणार, हे शक्यच नाही, वगैरे वगैरे असे विचार मनामध्ये आता कधीच येत नाहीत.
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी लगेच शक्य होतात, काही वेळा, थोडा वेळ लागतो. आपण न थांबता प्रयत्न चालू ठेवले, तर कधी दोन दिवस लागतात, कधी आठवडा लागतो, कधी जास्त पण वेळ लागतो, पण ठरवलेले काम होते हे मात्र पक्के.
अमुक अमुक मला करता येणार नाही असे आता मला कधीच वाटत नाही आणि त्यामुळे मन कायम उत्साही राहते.
चला तर मग, आपण सगळेचजण नेपोलियन यांचे स्मरण करून त्यांचे बोधवाक्य वाक्य – नथिंग इज इम्पॉसिबल, आपल्या आंतरमनामध्ये कोरूया, आणि मनामधल्या / स्वप्नामधल्या निरनिराळ्या आघाड्यांवरती विजय मिळवूया, आणि नेहमीच मिळवत राहूया….. आणि तो पण आनंदात आणि हसत खेळत.