मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कसं आहे ना? 

एक कागदाचं पान असतं…!!

 ‘श्री’ लिहिलं, की पूजलं जातं …

 प्रेमाचे चार शब्द लिहिले, की जपलं जातं…

काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं…

 

एक कागदाचं पान असतं…!!

 

कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं…

कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं…

कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं…

आणि कधी तर  निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं…

 

एक कागदाचं पान असतं….!!

 

जे लेखकाच्या लेखणीला हात देतं…

जे चित्रकाराच्या  चित्राला साथ देतं…

जे व्यापाऱ्याच्या  हिशोबाला ज्ञात ठेवतं…

आणि हो, वकिलांसोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं…

 

एक कागदाचं पान असतं…..!!

 

पेपरवेट ठेवला, की एकदम गप्प बसतं…

काढून घेतला, की  स्वच्छंदी फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं…

 

एक कागदाचं पान असतं…..!!

 

ज्यावर बातम्या छापल्या, की वर्तमानपत्र बनतं…

प्रश्न छापले, की  प्रश्नपत्रिका बनतं…

विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…

तर कधी आदेश~संदेश लिहिले, की तेच टपालही बनतं…

 

एक कागदाचं पान असतं….!!

 

 माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं…!!

 

एक कागदाचं पान असतं…!!

जन्माला आला तर birth certificate असतं

निधन पावला तर Death certificate असतं

 

एक कागदाचं पान असतं ——–

– अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆`

? वाचताना वेचलेले ?

☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

प्रिय सखी, 

माझे  मनोगत पत्राद्वारे व्यक्त करते कारण भेट दुरापास्त झालीय. 

आधी थोडी प्रस्तावना —

मनोगत म्हणजे विचार शेअर करणे, पुष्कळ वेळा आपल्याला मनमोकळेपणाने  काही  सांगायचं असतं ,कधीकधी समोरासमोर सांगणं अवघड असतं. अर्थात समोरासमोर मनातले विचार, भावना सांगताना ,मांडताना वाटतं हा शब्दांचा गैरअर्थ तर काढणार नाही, दुखावला तर जाणार नाही .हिरीरीने मुद्दा मांडताना कधीकधी वाद वाढत जातात आणि रूपांतर भांडणात होते. अशा वेळेस कागदावर उतरलेले शब्द जास्त प्रभावी ठरतात .पत्राद्वारे व्यक्त केलेले मनोगत जितके रंजक असू शकते तितके ते भावनाप्रधान, मनापर्यंत पोचणारे  देखील असते. असो. प्रस्तावना पुरे.

मध्यंतरी आपला ग्रुप जमला होता .हसणं खिदळणं गप्पाटप्पा अनेक विषय हाताळून  झाले .प्रवास, बालपण, गमती जमती, वाचन, देव ,सत्संग वगैरे वगैरे. हळूहळू पुरुष राजकारणावर आणि आम्ही मैत्रिणी कुकिंग या आवडत्या विषयावर आलो. टिप्सची देवाण-घेवाण झाली. मला एक गंमत वाटते, हे पुरुष राजकारणावर  इतके हिरीरीने मुद्दे मांडत असतात, यांचा सगळा आवेश चार भिंतीतच. कोण चूक कोण बरोबर– काहीच कळत नाही. पण खरं सांगू,  राजकारण हे मला थोडीफार माहिती असण्याइतपतच मर्यादित आहे. कितीही राग आला, वाईट वाटलं तरी माझी धाव कुंपणापर्यंतच.  मग कशाला वाफ दवडवा.  

सध्या सत्संग, देव देव यांचे प्रस्थ पण फारच वाढले आहे. सारखे उपदेशानुरुप मेसेजेस. अरे चांगलं बोला, चांगलं वागा ,चांगला विचार करा– हाच खरा सत्संग– माझ्या घरातच देव आहे अशी श्रद्धा बाळगणं हेही तितकेच महत्वाचे 

नं ! तासन्तास रांगेत उभे राहून मंदिरात जायचं ,देव दिसतो न दिसतो तोच  हकालपट्टी. दान पेटीत पटकन दान करायचे– त्यापेक्षा सत्पात्री दान करावं .विशेषतः विद्यार्थी वर्गाची मला गंमत वाटते. चार-पाच तास रांगेत उभा राहून कधीकधी अनवाणी सिद्धिविनायक किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, त्यापेक्षा तोच वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावला तर जास्त उपयोगी नाही का पडणार ! 

—-हळूहळू गप्पांचा ओघ आजच्या पिढीवर आला आणि ठेवणीतलं वाक्य ‘ आमच्या वेळेस असं नव्हतं ‘, या समेवर येऊन थांबला. 

तुला काय वाटतं , आजची पिढी म्हणजे नातवंडं फार हुशार आहेत ,चौकस आहेत. माहितीची महाद्वार दररोज उघडत आहेत, त्यामुळे जास्तच डोळस होण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सांगितली तर पटकन विश्वास ठेवणार नाहीत ,  प्रश्न विचारतील समजून घेतील आणि मगच ते काम करतील

आपल्या पिढीत असं नव्हतं. एखादी गोष्ट सांगितली तर ती बरोबरच असेल, मग ती करायची, प्रश्न विचारायचे नाहीत   असा अलिखित नियम— अर्थात यामुळे आपलं काही वाईट झालं नाही, बिघडलं नाही.  पण आता माहितीच्या कक्षा इतक्या रुंदावल्यात आणि  सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध होत आहे. 

आपण नाही का गं  एखादं औषध आणलं की त्याचे कंटेंट्स, साईड इफेक्ट याचा शोध घेतो. मग ही तर पुढची पिढी यांची चौकसवृत्ती जरा जास्तच. 

खरं सांगू,  आता नात्याची चौकट बदलली आहे .आधी नात्याचा पाया भावनेवर उभारलेला होता. आता माहिती हा नात्याचा पाया झाला आहे. काळाचा महिमा.

माझी या पिढीबद्दल तक्रार नाही. पण यांच्या खर्चिक वृत्तीबद्दल जरा प्रश्नचिन्ह आहे. हातात मुबलक पैसा असल्याने मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आहेत. या पिढीला आपल्यापेक्षा खूप टेन्शन्स, प्रेशर आहेत. सगळ्यांची तारेवरची कसरतच आहे. या सर्व गोष्टींशी लढता-लढता जीवनात अनावश्यक आहारांचा कधी शिरकाव झाला आणि तो अमर्यादित कधी झाला हे लक्षातच आले नाही किंवा येत नाही. जंक फुडचा अतिरेक आणि त्यात स्विगी ,झोमॅटो यासारख्या सुविधा आळशीपणात भर घालत आहेत .वाचन संस्कृतीचा ओघ कमी होतोय. असो, धिस इज लाईफ.

शंकराचार्यांच्या गुरूने दिलेला ,’ कोणत्याही परिस्थितीत आनंदात रहा ‘ हा मंत्र आत्मसात करायचा प्रयत्न करून तर बघू या.

मी माझं मन छान मोकळं केलं. अगं मैत्रिणी असतातच कशाला — गुपितं आणि मनातले विचार व्यक्त करायलाच 

ना ! चल लवकर  भेटूया.—– बाय . 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विचारांचे आऊटपुट… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ विचारांचे आऊटपुट…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

आपण जो जो विचार करतो तो आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होत असतो…… त्यामुळे त्याच विचाराचे आऊटपुट आपल्याला मिळत असते…

हे माझ्याने होणार नाही असे म्हणण्याचा अवकाश…. अंतर्मन तुम्हाला तसेच आऊटपुट देऊन ते तुमच्या हातुन कधीच होऊ देणार नाही अशी व्यवस्था करते….

किंवा, मला नशापाणी केल्याशिवाय चैन पडत नाही, त्याशिवाय झोप येत नाही असले विचार केल्यावर अंतर्मन तसेच फळ आपल्याला बहाल करत असते….

अमकी एखादी गोष्ट मी सहजच करुन दाखविन असे विश्वासाने म्हणण्याचा अवकाश….. मग ती गोष्ट कितीही अवघड असो….अंतर्मन ती गोष्ट सहजच करुन दाखवते…. 

हा अंतर्मनाचा चमत्कार होय…. 

अण्णा हजारेंनी जे विश्वासाने उपोषण चालवले आहे, त्या साऱ्या गोष्टीत त्यांचे अंतर्मनच त्यांच्या पाठीशी आहे… 

हा अंतर्मनाचा मोठ्ठा चमत्कार आपण व सारे जग पाहतच आहे…

आपण सतत नकारात्मकच विचार करत आलो आहोत व आपल्या मुलाबाळांनाही आपण असेच नकारात्मक पणेच वागवत आलो आहोत………  

हे तुझ्या हातून होणारच नाही…

तू अजून बच्चा आहे…. 

असले धंदे करुन काय  तुझे पोट भरणार आहे का…. 

तू अगदी बावळटच आहेस ….. गधा आहेस…. तुला अक्कल नाही… 

उगाच मोठ्या मोठ्या गप्पा मारु नकोस…

तुला कवडीचे ज्ञान नाही….

उगाच बकवास करु नकोस……

मुर्ख कुठला…तुझी  लायकी नाही…. 

मोठे झाल्यावर कळेल तुला….

मुकाट्याने तुझा अभ्यास कर….

नको तो उपदव्याप  करु नको…त्यात तुला यश येणार नाही….

उगाच मोठेपणाचा आव आणू नकोस…..

वगैरे बोलून आपण आपल्या पाल्यास अगदी नकारात्मक विचारांचा असा नेभळट करुन टाकतो….. 

त्यांचे अंतर्मन आपण अंकुरीत होण्याच्या अगोदरच कोमजून टाकतो…. 

मग त्याला तसेच आऊटपुट मिळाल्यास नवल नाही….

 

मित्रांनो… 

असे काही करु नका… 

मुलांना तेजस्वी व कणखर मनाचे घडवण्यात आपलाच सहभाग असला पाहिजे… 

कारण आपला पाल्य खूप काळ आपल्या संपर्कात असतो, त्याला मनाने समृद्ध व बलवान बनवा…

त्याला देशाचे कणखर नागरिक बनवा… 

त्याचे अंतर्मन बलवान कसे होईल याकडे लक्ष द्या…

आपल्या चिमुकल्याला अंतर्मन जागृतीच्या साधना करायला सांगा….

जप तप, तीर्थाटण आदिंपेक्षा अंतर्मन कसे जागृत होईल याकडे लक्ष द्या… 

त्याच्या हातून काहीही वाईट होणार नाही हे ही आवर्जून पहा…

 

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जमलं तर बघा… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ जमलं तर बघा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

कोणतीही गोष्ट न चिडता,न रागावता, न ओरडता समोरच्याला सांगणे ज्याला जमलं त्याला आयुष्य आनंदाने जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोप्पं आहे. पण त्याला न दुखावता ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे.

निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते ,प्रकाश आला की अंधार निघून जातो— तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात.

 जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे .आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे- कारण तेव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय ,आणि कोण सावरायला येतंय. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचे असते.आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत.

आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब ,सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.

माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो ,माणूस कपडे बदलतो, माणूस पक्ष/गट बदलतो तरी तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय, आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठे होत चाललोय. 

प्रेम “माणसावर” करा- त्याच्या “सवयींवर” नाही. “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही. “विसरा” त्याच्या “चुका”, पण त्याला नाही . –कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…

 हे सगळे फक्त समजदार  लोकांसाठी आहे,कारण जे लोक पावला पावलावर बदलतात ते लोक कधीच बदलत नाहीत . 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नातं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नातं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

वेळेनुसार माणसं बदलतात..त्यांची  priority बदलते.

नातं बदलतं.. नात्यातले संदर्भही बदलतात.

कधी वेड्यासारखी जीव लावणारी माणसं अचानक अनोळखीसारखी वागायला लागतात.

आपल्याला गृहीत धरल्या जातं.. टाळल्या जातं.

 

हेच त्या नात्यातलं सगळ्यात नाजूक वळण असतं.

इथेच नात्यातले अपघात होतात.

 

कधी कधी वाटतं 

समोरच्याच्या आयुष्यातलं आपलं अस्तित्व आपल्याला ठरवता आलं असतं तर..? 

पण दुर्दैव…असं नाही करता येत.

 

अशावेळी कोण चुकलं यापेक्षा काय चुकलं हे बघावं.

कारण एकमेकांच्या चुका शोधतांना उत्तर तर सापडतं पण माणसं हरवतात.

आपण फक्त अवघड झालेलं सोपं करण्याचा प्रयत्न करावा.

एकदा…दोनदा…..तीनदा…..

आपण आतून संपत नाही तोपर्यंत..करतच रहावा.

 

आणि या सगळ्याला 

अपवाद असलेलं एखादं नातं असतंच …

जे शेवटपर्यन्त कधीच बदलत नाही.

आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर असं कुणीतरी येतं आपल्या आयुष्यात… 

जे घट्ट मिठी मारून सांगतं… 

आयुष्य खूप सुंदर आहे…आणखी थोडं जगुयात ना !

आपल्याला सोपं करतं,

आपल्याला समजून घेतं. 

आपण कायम खास असतो त्यांच्यासाठी.

 

बस तेच मनापासून जपावं 

इतकंच असतं आपल्या हातात —— 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 24 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 24 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३५.

जिथं मन मुक्त असेल, माथा उन्मत्त असेल,

ज्ञान मुक्त असेल,

 

घरांच्या क्षुद्र भिंतींनी जगाचे तुकडे झाले नसतील,

सत्याच्या गाभाऱ्यातून शब्दांचा उच्चार होईल,

 

अथक परिश्रमांचे हात

 पूर्णत्वाप्रत उंचावले जातील,

 

मृत सवयींच्या वालुकामय वाळवंटात

बुध्दीचा स्वच्छ झरा आटून गेला नसेल,

 

सतत विस्तार पावणाऱ्या विचार

आणि कृती करण्याकडेच

तुझ्या कृपेने मनाची धाव असेल,

 

हे माझ्या स्वामी, त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गात

माझा देश जागृत होऊ दे.

 

३६.

माझ्या ऱ्हदयातील दारिऱ्द्य्याच्या

मुळावर घाव घाल

 

सुख आणि दुःख आनंदानं सोसायची

शक्ती मला दे.

माझं प्रेम सेवेत फलद्रूप करण्याची शक्ती दे.

 

गरिबापासून फटकून न वागण्याची अगर

धनदांडग्या मस्तवालासमोर शरण न जाण्याची

शक्ती मला दे.

 

दैनंदिन क्षुद्रतेला ओलांडून उंच जाण्याची

शक्ती मला दे आणि

प्रेमभावनेनं तुझ्या मर्जीप्रमाणं तुला शरण

जाण्याची शक्ती मला दे.

इतकीच माझी प्रार्थना आहे!

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळ जुना होता…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

? वाचताना वेचलेले ?

☆ काळ जुना होता…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

काळ जुना होता

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोक शरीर झाकण्याचा प्रयास करायचे

आज कपड्यांचे भंडार आहेत,

तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता, रहदारीची साधने कमी होती.

तरीही कुटुंबातील लोक

भेटत असत .. 

आज रहदारीची साधने भरपूर आहेत.

तरीही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.

आजची मुलगी ही

शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता, लोकं

गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे

आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

खेळण्यांचा तुटवडा होता.

तरी शेजारची मुलं

एकत्र खेळायची .

आज खूप खेळणी आहेत,

मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

रस्त्यावरील प्राण्यांना सुद्धा

भाकरी दिली जायची

आज शेजारची मुलंही

भुकेली झोपी जातात

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

*

काळ जुना होता,

शेजारच्या व आपल्या घरी

नातेवाईक भरलेले असायचे

आता परिचय विचारला तर–

आज मला शेजाऱ्याचे नावही माहीत नाही.

समाज सुसंस्कृत झाला आहे.—–

 

संग्राहिका – माधुरी परांजपे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.

त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे 100 वर्ष जुने लिचीचे झाड होते.

 त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.

काही काळानंतर घराचे नूतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.

त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि हाँगकाँग येथील, वास्तुशास्त्राचे तज्ञ मानले जाणारे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.

काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे. मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.

घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मूल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले.  त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता.  तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले -” दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?”

ते मोठ्या सहजतेने म्हणाले, “ मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..”

मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की “ तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.”

घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, ” जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ थांबू शकतो का? “

मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की,  ” कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.”

मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, ” या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही.”

त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले – का?

मास्टर काओ – ” जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील – ते ठिकाण , ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय पवित्र-आनंददायी-फलदायी असेल “.

— मित्रांनो, आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.

जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.

आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा “वास्तू”सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.

संग्राहक : सुनीत मुळे 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अंधार कशामुळे होतो हे कळत नसलेल्या आदी मानवाला रात्र असह्य वाटायची, पण अगदी एक प्रहरात डोळा लागलेला असताना त्याला पक्षाची किलबिल ऐकू यायची, आकाशात पूर्वेला कुणीतरी रंगाचं दुकान थाटलेले असायचं.

काळी रात्र विराट जात असल्याने घाबरलेला आनंदून जायचा. आनंदाने उमाळे फुटत असतानाच सूर्य उगवून लख्ख दिसायचा.

नवा दिवस , एक नवी उमेद , जणू पुनर्जन्म…या उत्साहलेल्या मनाच्या निर्मळ माणसाने सूर्याला नाव दिले मित्र…………अनुभवातून, निसर्गाच्या भव्य रूपातून प्रसवलेली सृजनता.. त्याच्या एकटेपणाचा शाप दूर करणारा नभोमंडलातला प्रदीप्त आप्तज……….किती सुंदर नाव दिले त्या सूर्याला. मित्र….प्रकाश असतो सतेज आणि सतिश ….     …… त्याच्याविना आयुष्य फक्त अंधार…………मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा………

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वृद्ध व्यक्तीचा मेंदू ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वृद्ध व्यक्तीचा मेंदू ☆ संग्राहक – श्री माधव केळकर☆

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे संचालक असा युक्तिवाद करतात की वृद्ध व्यक्तीचा मेंदू सामान्यतः विश्वास ठेवण्यापेक्षा जास्त व्यावहारिक असतो.  या वयात, मेंदूच्या उजव्या आणि डाव्या गोलार्धांचा परस्परसंवाद सुसंवादी बनतो, ज्यामुळे आपल्या सर्जनशील शक्यतांचा विस्तार होतो.  म्हणूनच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये तुम्हाला अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आढळू शकतात ज्यांनी नुकतेच त्यांचे सर्जनशील क्रियाकलाप सुरू केले आहेत.

अर्थात, मेंदू आता तारुण्यात होता तितका वेगवान राहिलेला नाही.  तथापि, तो लवचिकता प्राप्त करतो .  म्हणून, वयानुसार, आपण योग्य निर्णय घेण्याची अधिक शक्यता असते आणि नकारात्मक भावनांना कमी सामोरे जावे लागते.  मानवी बौद्धिक क्रियाकलापांची शिखरे वयाच्या ७० च्या आसपास होतात, जेव्हा मेंदू पूर्ण ताकदीने कार्य करू लागतो.

कालांतराने, मेंदूतील मायलिनचे प्रमाण वाढते, हा एक पदार्थ जो न्यूरॉन्समधील सिग्नलचा जलद मार्ग सुलभ करतो.  यामुळे, बौद्धिक क्षमता सरासरीच्या तुलनेत 300% वाढतात.

हे देखील मनोरंजक आहे की 60 वर्षांनंतर, एखादी व्यक्ती एकाच वेळी 2 गोलार्ध वापरू शकते.  हे आपल्याला अधिक जटिल समस्या सोडविण्यास अनुमती देते.

मॉन्ट्रियल विद्यापीठातील प्राध्यापक मोंची उरी यांचा असा विश्वास आहे की वृद्ध माणसाचा मेंदू कमी ऊर्जा वापरणारा मार्ग निवडतो, अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी फक्त योग्य पर्याय ठेवतो . विविध वयोगटांचा समावेश करून एक अभ्यास करण्यात आला.  चाचण्या उत्तीर्ण करताना तरुण लोक खूप गोंधळलेले होते, तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी योग्य निर्णय घेतला.

आता, 60 ते 80 वयोगटातील मेंदूची वैशिष्ट्ये पाहू. ते खरोखर गुलाबी आहेत.

वृद्ध व्यक्तीच्या मेंदूची वैशिष्ट्ये.

  1. तुमच्या सभोवतालचे सर्वजण म्हणतात त्याप्रमाणे मेंदूतील न्यूरॉन्स मरत नाहीत.जर एखादी व्यक्ती मानसिक कार्यात गुंतली नाही तर त्यांच्यातील संबंध फक्त अदृश्य होतात.
  2. भरपूर माहितीमुळे विचलित होणे आणि विस्मरण होणे उद्भवते.म्हणूनच, तुमचे संपूर्ण आयुष्य अनावश्यक क्षुल्लक गोष्टींवर केंद्रित करणे आवश्यक नाही.
  3. वयाच्या 60 व्या वर्षापासून, व्यक्ती, निर्णय घेताना, तरुण लोकांप्रमाणे एका वेळी एकच गोलार्ध वापरत नाही, परंतु दोन्हीचा वापर करते.

निष्कर्ष: जर एखादी व्यक्ती निरोगी जीवनशैली जगत असेल, हालचाल करत असेल, व्यवहार्य शारीरिक हालचाली करत असेल आणि पूर्णपणे मानसिकरित्या सक्रिय असेल, तर बौद्धिक क्षमता वयानुसार कमी होत नाही, ती फक्त वाढते , वयाच्या 80-90 व्या वर्षी शिखरावर पोहोचते .

त्यामुळे म्हातारपणाची भीती बाळगू नका.  बौद्धिक विकासासाठी प्रयत्न करा.  नवीन हस्तकला शिका, संगीत बनवा, वाद्य वाजवायला शिका, चित्रे रंगवा ! नृत्य शिका ! जीवनात रस घ्या, मित्रांना भेटा आणि संवाद साधा, भविष्यासाठी योजना करा, शक्य तितका उत्तम प्रवास करा.  दुकाने, कॅफे, शो मध्ये जाण्यास विसरू नका.  एकटे गप्प बसू नका, ते कोणासाठीही विनाशकारी आहे. :” सर्व चांगल्या गोष्टी अजूनही माझ्या पुढे आहेत !” या विचाराने जगा. 

स्रोत: न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन.

ही माहिती तुमच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या 60, 70 आणि 80 च्या दशकातील मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना त्यांच्या वयाचा अभिमान वाटेल 

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares