मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सहा ‘भ’ महत्वाचे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सहा ‘भ’ महत्वाचे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

– – 

सहा भ च्या आचरणातून व्यक्तिमत्व विकास – – 

– – प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचे सर्वे भवन्तु सुखिन: हे ध्येय आहे.

– – आई ही कुटुंबाचा आधार आहे आणि तिची कुटुंबातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांना एकत्र घेऊन, सर्वांचा स्वभाव ओळखून आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवणे ही तिची विशेषता आहे. दैनंदिन जीवनात नकळत प्रत्येक आई ६ भ च्या माध्यमातून आपल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवत असते.

– – ६ भ म्हणजे भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन, भ्रमण हे सहा भ आचरणात आणून घरातील आई सक्षम आणि संस्कारित पिढी घडवत असते.

१) भाषा – बोलण्याची शक्ती निसर्गाने मानवाला दिलेलं एक वरदान आहे. आई बाळाशी बोलतांना योग्य शब्दांची निवड करत हसऱ्या चेहऱ्याने, मृदु आवाजात बोलत असते बाळ पण तिचे बारकाईने निरीक्षण करत तसा प्रतिसाद देत मोठे होते. दोन तीन वर्षांचा झाला की तिच्या बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, आदर, विनम्र भाव या सर्वांचा त्याच्यावर कळत नकळत संस्कार होतो.

२) भूषा – भूषा म्हणजे फक्त वेशभूषा एवढंच नसून तो अतिशय व्यापक विषय आहे व जीवनशैलीचा महत्वाचा स्तंभ आहे. वेशभूषेत स्वच्छ कपडे, केसांची पद्धत, गंध, टिळा इ. गोष्टींचा समावेश होतो. आई वडिलांचे निरीक्षण आणि अनुकरणातून या गोष्टी घडतात.

३) भजन – आई सकाळ संध्याकाळ काही मंत्र, स्तोत्र म्हणत असते. त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसतो.

४) भोजन – बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत आई त्याला चिऊ काऊ दाखवत भरवत असते पण त्यानंतर ती त्याला घरातील सर्वांसोबत जेवायला बसवते. एकत्र भोजनाचा संस्कार नकळत घडत जातो.

५) भवन – घरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा, सर्व वस्तू जागेवर ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य असते, आई सर्वांसाठी आदर्श असते. दारात तुळस त्यासमोर रांगोळी, तोरण, घरी गोड धोड बनवत आई आपल्या कुटुंबासह सणवार साजरे करते. एकोपा आणि घरातील वातावरण पवित्र ठेवण्यात तिची भूमिका महत्त्वाची असते.

६) भ्रमण – बाळ वर्षाचे झाले की आई त्याला खेळायला वेगवेगळ्या बागेत घेऊन जाते. आजी आजोबा संध्याकाळी मंदिरात घेऊन जातात, आपल्या गावी घेऊन जातात. तिथल्या लोकांशी ओळखी होतात, त्यामुळे बालवयातच गावाची एक ओढ निर्माण होते.

६) प्रत्येक व्यक्तिचा शून्य ते पाच हा वयोगट अतिशय महत्त्वाचा असतो आणि याच वयोगटात व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व घडत असते. आई ६ भ च्या माध्यमातून आपल्या पाल्याचे संगोपन आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला आकार देते.

… कुटुंबाचे प्रबोधन करतांना आईची भूमिका खूप मोलाची असते, भावी पिढी संस्कारित करणाऱ्या प्रत्येक माऊलीला शतशः नमन.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सहावे सुख…’ – लेखिका : सुश्री शांताबाई शेळके ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सहावे सुख…’ – लेखिका : सुश्री शांताबाई शेळके ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभीष्टचिंतन करतात, त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत, ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.

सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभीष्टचिंतन करणारा म्हणत असतो.

आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच : “जो जे वांछील| तो ते लाहो| प्राणिजात||”

प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.

समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं, ज्याचं त्याचं सहावे सुख वेगळं.

आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत, त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.

पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय, ते माझं सहावं सुख आहे.

छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं, ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.

आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या, तर तेही सहावं सुख असेल. त्याचा शोध आपोआपच लागतो.

खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाड मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.

लेखिका: सुश्री शांता शेळके

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारपणा..  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अनंत केळकर ☆ ☆

? वाचताना वेचलेले ?

 ☆ म्हातारपणा..  कवी : अज्ञात प्रस्तुती : श्री अनंत केळकर ☆

म्हातारपणाला नाव छान

कोणी म्हणे संन्यासाश्रम

कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम

मी म्हणतो आनंदाश्रम

 

म्हातारपणात कसं राहायचं?

घरात असेल तर आश्रमासारखं

आश्रमात असेल तर घरासारखे

कशातच कुठे गुंतायचं नसतं

 

जुन्या आठवणी काढायच्या नाही

‘आमच्या वेळी’ म्हणायचं नाही

अपमान झाला समजायचं नाही

उगाच लांबण लावायची नाही

 

सुखाची भट्टी जमवत जायचं

साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं

रागलोभाला लांब पळवायचं

आनंद सारखा वाटत जायचं

 

म्हातारपणसुद्धा छान असतं

लेन्स इम्प्लांटने स्वच्छ दिसतं

नव्या दातांनी सहज चावता येतं

कानयंत्राने ऐकू येतं

 

पार्कात जाऊन फिरून यावं

क्लबात जाऊन पत्ते कुटावं

देवळात जाऊन भजन करावं

टीव्हीमधल्या सिरियल बघावं

 

मुलांसमोर गप्प बसावं

नातवंडांशी खेळत राहावं

बायकोबरोबर भांडत जावं

मित्रांबरोबर बोलत सुटावं

 

जमेल तेव्हा टूरवर जावं

बायकोचं लगेज सोबत न्यावं

दिलखुलास फिरून घ्यावं

थकलं तिथेच बसून राहावं

 

लायन रोटरी अटेंड करावं

वेळ असेल तर गाणं गावं

एकांतात ठेक्यावर नाचून घ्यावं

पाहिलं कुणी व्यायाम म्हणावं

 

कंटाळा आला झोपून जावं

जाग आली फेसबुक बघावं

बघता बघता घोरत राहावं

टोकलं कोणी व्हाटस्ऍप उघडावं

 

एकटं घरी किचन पाहावं

दुधाची साय गायब करावं

मुलांचा खाऊ टेस्ट करावं

आलं मनात गोडाचं खावं

 

जुना शर्ट घालत राहावं

थोडे केस सावरत राहावं

आरशालाच बोगस म्हणावं

कोणी नसलं तर वाकुली करावं

 

छान रंगवावी सुरांची मैफील

मस्त जमवावी जेवणाची पंगत

सुरेल जुळवावी गप्पांची संगत

लुटत राहावी जगण्याची गंमत

 

स्वाद घेत,दाद देत

तृप्त मनाने आनंद घेत

हळुच आपण असं निघून जावं

जसं पिकलं पान गळून पडावं

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभ दीपावली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शुभ दीपावली… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

*

दीपावली परत जायला निघाली हं, मित्रांनो!

कसं भरून येतंय ना?

बघता बघता आली आणि निघालीसुद्धा!

दिल अभी भरा नहीं. ‘…

न मागता खूप काही देऊन निघालीय!

 

दर वेळेचंच आहे हे असं हिचं!

येते, येते….

आले, आले म्हणायचं…..

उसळत यायचं…..

सगळी दुनिया प्रकाशमय करायची…..

मनामनांत प्रकाश पसरायचा….

उद्यासुंदरच आहे, या भावनेची ज्योत तेवत ठेवायची…..

स्वप्नांना प्रकाशाची वाट दाखवायची….

आणि खोल आतून हळवं करून निरोप घ्यायचा!

तुळशीच्या लग्नापर्यंत थोडी थोडी लांब जात मग दिसेनाशी होते….

पण मनोमनी तेवत राहते…..

आठवणी उजळत ठेवते….

प्रवासाच्या पुढच्या वाटेवर

प्रकाशदीप ठेवून जाते

आपल्यासाठी…..

आम्ही कृतज्ञ आहोत गं तुझे!

 

अंगणात शांत झालेल्या पणत्या उचलल्या जातील

आता उद्यापासून…..

त्यातले तेल- वात संपलेले असले तरी

प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात ती ज्योत तेवतच राहणार आहे…

 

म्हणूनच

जरा तहजीब से बटोरना बुझे दियों को दोस्तो!

इन्होंने अमावस की अंधेरी रात में हमें रोशनी दी थी….

किसी और को जलाकर खुश होना अलग बात है…

इन्होंने तो खुद को जलाकर हमें खुशी दी थी……

 

शुभ दीपावली!

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रीचं झाड – कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्रीचं झाड –  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

मिळतील का हो कुठे

मैत्रीच्या बिया

एक झाड लावावं म्हणतो

अंगणात माझ्या

*

असेल जे सतत

डोळ्यांसमोर माझ्या

सांगेन मग त्यालाच

सुख दु:खाच्या कथा

*

काळजी घेईन त्याची छान

निगुतीनी वाढवेन त्याला

खत-पाणी घालून घालून

जीवही लावेन त्याला

*

रोज फुटेल नवी पालवी

त्याच्या माझ्या नात्याला

फळा-फुलांचे येतील बहर

ऋतूमध्ये मैत्रीच्या

*

तसे असतातच की मित्र खूप

समाजामध्ये आपल्याला

कधी क्वचित येतो पण

मैत्रीमध्ये दुरावा

*

जाईन जेव्हा जवळ त्याच्या

धरेन अलगद फांदीला

तेही देईल आधार तेव्हा

माझ्या उतरत्या खांद्याला

*

बघा कधी तुमच्याही

मैत्रीत आला रुसवा

मैत्रीचं एक झाड

अंगणात तुम्ही रुजवा

*

म्हणूनच विचारतो

कुठे मिळतील

या मैत्रीचा बिया

सगळेच लावू एकेक झाड

अंगणात आपल्या आपल्या 

*

बाजार नको मैत्रीचा

मित्र असावा खात्रीचा

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“गुरुजी, मी कितीतरी पुस्तकं वाचली… पण त्यातलं बहुतेक विसरलोय. मग वाचनाचा उपयोग काय?” एका जिज्ञासू शिष्याने गुरुजींना प्रश्न विचारला.

गुरुजींनी काही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले.

काही दिवसांनी ते नदीकाठी बसले होते. अचानक गुरुजी म्हणाले –

“मला तहान लागली आहे. पाणी आण. पण त्या जुन्या चाळणीत भरून घे.”

शिष्य चकित झाला.

ही कसली विनंती?

चाळणीतून पाणी आणायचं? त्यात तर सगळीकडे छिद्रं आहेत!

पण त्याने वाद केला नाही.

त्याने चाळणी उचलली आणि प्रयत्न सुरू केले.

एकदा.

दोनदा.

पुन्हा पुन्हा…

कधी तो वेगाने धावला,

कधी कोन बदलून पाहिला,

कधी छिद्रं बोटांनी बंद करून पाहिली.

पण काही उपयोग झाला नाही.

एक थेंबही पाणी टिकेना.

शेवटी तो दमून-भागून गुरुजींच्या पायाशी चाळणी ठेवून म्हणाला –

“माफ करा, मी अपयशी ठरलो. हे अशक्य होतं.”

गुरुजी प्रेमाने म्हणाले –

“तू अपयशी झालास नाहीस. जरा चाळणीकडे नीट बघ.”

शिष्याने खाली पाहिलं…

आणि त्याला काही जाणवलं.

ती जुनी, काळी, घाणेरडी चाळणी आता स्वच्छ व चमकदार झाली होती.

पाणी जरी टिकून राहिलं नाही, तरी सतत वाहत राहिल्याने ती चाळणी झळाळून निघाली होती.

गुरुजी पुढे म्हणाले –

“वाचन असंच असतं. तुला प्रत्येक गोष्ट लक्षात राहिली नाही तरी हरकत नाही.

ज्ञान पाण्यासारखं हातातून निसटतं… पण मन मात्र ताजंतवानं होतं.

वाचनाने विचार स्वच्छ होतात,

आत्मा ताजातवाना होतो,

कल्पना प्रफुल्लित होतात.

आणि कळत-नकळत तू आतून बदलत जातोस.”

वाचनाचं खरं उद्दिष्ट म्हणजे स्मरणशक्ती भरून काढणं नव्हे…

तर आत्म्याला स्वच्छ, समृद्ध आणि प्रबुद्ध करणं आहे.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

ही कथा आहे ‘१३ लाख रुपये दहा रुपयांच्या बदल्यात’ची.

एका व्यावसायिकाने नुकतेच दुकान उघडले होते. तेवढ्यात एक महिला आत आली आणि म्हणाली,  “सेठ,  तुमचे दहा रुपये घ्या…! “

व्यावसायिकाने त्या गरीब महिलेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले,  जणू काही त्याची नजर विचारत होती,  “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले? “

बाई म्हणाली,  “काल संध्याकाळी,  मी वस्तू खरेदी केल्या तेव्हा मी तुम्हाला शंभर रुपये दिले. ७० रुपयांचा माल खरेदी केला. तुम्ही मला ३० रुपयांऐवजी ४० रुपये परत दिले. “

 व्यापाऱ्याने दहा रुपये कपाळावर लावले,  नंतर ते परत त्याच्या कॅश बॉक्समध्ये ठेवले आणि म्हणाला,  “मला सांग ताई,  वस्तू खरेदी करताना तू खूप वाटाघाटी करत होतीस. किंमत पाच रुपयांनी कमी करण्यासाठी तू खूप वाद घातलास आणि आता तू हे दहा रुपये परत करायला आली आहेस! ”

महिलेने उत्तर दिले,  “किंमत कमी करून घेणे,  हा माझा अधिकार आहे. पण एकदा सौदा झाला की,  त्या वस्तूचे कमी पैसे देणे हे पाप आहे. “

तो व्यापारी म्हणाला,  “पण,  तू कधी कमी पैसे दिलेस? तू पूर्ण पैसे दिलेस. हे दहा रुपये चुकून तुझ्याकडे गेले. तू ते ठेवले असतेस तर मला काही फरक पडला नसता. ”

ती महिला म्हणाली,  “तुम्हाला काही फरक पडत नसेल. पण माझ्या मनात नेहमीच हा सल असता की,  मी तुमचे पैसे जाणूनबुजून घेतले. म्हणूनच मी काल रात्री ते परत करायला आले होते. पण तुमचे दुकान त्यावेळी बंद होते. “

व्यापाऱ्याने त्या महिलेकडे आश्चर्याने पाहत विचारले,  “तू कुठे राहतेस? ”

ती म्हणाली,  “मी सेक्टर ८ मध्ये राहते. ”

त्या व्यापाऱ्याचे तोंड वासले गेले.

तो म्हणाला,  “तुम्ही ७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात,  मला हे दहा रुपये देण्यासाठी? “

त्या महिलेने सहज उत्तर दिले,  “हो,  मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही,  पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण एखादा माणूस गप्प राहू शकतो,  पण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते. “

हे सांगून ती महिला निघून गेली.

व्यापाऱ्याने ताबडतोब कॅश बॉक्समधून तीनशे रुपये काढले आणि नोकराला म्हणाला,  “तुम्ही दुकान सांभाळा,  मी लवकरच परत येईन. ” तो व्यापारी बाजारातल्या एका दुकानात पोहोचला. दुकानदाराला तीनशे रुपये देत म्हणाला,  “प्रकाशजी,  तुमचे तीनशे रुपये घ्या. काल,  तुम्ही सामान खरेदी करायला आलात,  तेव्हा बिलाचे जास्त पैसे भरले. ”

प्रकाश हसून म्हणाला: ” मी जास्त पैसे दिले होते,  ते मी पुन्हा दुकानात आलो असतो,  तेव्हा तुम्ही ते मला देऊ शकला असता! पण इतक्या सकाळी तुम्ही मला तीनशे रुपये द्यायला आलात.”

व्यापारी म्हणाला,  ” तुम्ही पुन्हा कधी आला असता? तोपर्यंत मी मेलो असतो तर? तुम्हाला माहीत नव्हते की,  माझ्याकडे तुमचे तीनशे रुपये आहेत! बरोबर ना? म्हणूनच ते देणे आवश्यक होते. देव कधी हिशोब मागेल हे मला माहीत नाही… आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात…! “

तो व्यापारी निघून गेला होता.

पण प्रकाशचे मन अशांत होते.

दहा वर्षांपूर्वी त्याने एका मित्राकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. पण पैसे परत करण्याअगोदर त्याचा मित्र मरण पावला.

त्याच्या मित्राच्या कुटुंबाला त्या पैशांची काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच कोणीही ते परत मागितले नव्हते.

प्रकाश लोभात बुडाला होता. म्हणून त्यानेही ते परत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आज त्याच्या मित्राचे कुटुंब गरिबीत जगत होते. त्याची पत्नी लोकांची घरे झाडून,  पुसून मुलांना वाढवत होती. तरीही,  प्रकाशने त्यांच्या पैशावर डल्ला मारला होता.

“देव कधी न्याय मागेल हे मला माहीत नाही.. आणि माझ्या मुलांनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात… ” सेठचे हे शब्द ऐकून प्रकाश घाबरला होता. तो दोन-तीन दिवस तणावात राहिला.

शेवटी,  त्याचा विवेक जागृत झाला. त्याने बँकेतून तेरा लाख रुपये काढले आणि ते देण्यासाठी मित्राच्या घरी गेला.

त्याच्या मित्राची पत्नी घरी होती. ती तिच्या मुलांसोबत गप्पा मारत बसली होती. तेव्हाच प्रकाश आला. तिच्या पाया पडला.

त्या विधवेसाठी,  जी एकेक रुपयासाठी झगडत होती,  १३ लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.

ते पैसे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले.

ती प्रकाशला आशीर्वाद देऊ लागली,  ज्याने प्रामाणिकपणे पैसे परत केले होते!

ही तीच महिला होती जी एका व्यावसायिकाला त्याचे दहा रुपये परत करण्यासाठी दोनदा गेली होती!

कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची देव नक्कीच परीक्षा घेतो. पण तो त्यांना कधीही सोडत नाही. एक दिवस तो नक्कीच न्याय करतो. देवावर विश्वास ठेवा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी केलेली ‘पुलं’ची हजामत  – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी  ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

मी केलेली ‘पुलं’ची हजामत  – लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत ☆ प्रस्तुती :सौ. नीता गडकरी 

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ. विद्यार्थी सहाय्यक समितीचा एक विद्यार्थी दुकानाचे दार उघडून आत आला.

‘ तुम्हाला पु. ल. देशपांडेसाहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ‘

त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून, ‘ सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत ‘- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला.

आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला ‘ हो लगेच निघतो, ‘

असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो.

त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ‘ पुलं’चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता.

‘ राहू द्या हो. माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ‘

त्याच्या या वाक्यातून ‘ पुलं’बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली.

त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी मी केस कापावयास जात असे, तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार, यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी ‘रुपाली’मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ‘ या ‘ म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले.

‘ थोडावेळ बसा. भाई जरा नाश्ता करतो आहे’, असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या.

आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार, याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते.

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो.

इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ‘चंद्रकांत, यांचे केस बारीक करून टाका, ‘ म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहिण्यात गर्क झाल्या.

त्यांचे लक्ष नाही, असे पाहून

‘ फार लहान करू नका,

थोडेच कापा ‘

पुलं माझ्या कानात कुजबुजले.

माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलीकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या.

पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ‘ पुलं-स्वामिनी’ का म्हणतात, याचा अर्थ उमगला.

त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे, त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.

केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ‘ वा छान! ‘ म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सर्वोच्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गुंडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

‘ चंद्रकांत, ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका, ‘ त्यांनी आज्ञा केली.

मला जरा विनोद करावासा वाटला.

मी म्हटलं, ‘ नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ‘ हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ‘

त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ‘ तो काय येशु ख्रिस्त वगैरे आहे की काय? ‘

मी मनात म्हणालो ‘ मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते.

म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता.

शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो,

‘एक आनंदाचं देणं’.

पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे… ‘

लेखक: श्री. चंद्रकांत बाबुराव राऊत

प्रस्तुती:सौ. नीता गडकरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ह्यावर्षी ठरवलं

फराळाची बाहेर ऑर्डरच देऊ

नको ते गुढग्यांचे कुरकुरणे

नको खांद्याचे दुखणे

आणि नकोच ते घामाने निथाळणे

ह्या दिवाळीला अगदी फ्रेश राहू

स्वतःकडे जरा लक्ष देऊ.

*

तेवढ्यात मुलाने काढले फर्मान

आई चिवडा सोडून सगळं बाहेरून आण

म्हटलं, पटकन चिवडा करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नातू लाडाने म्हणाला

ए आजी, तुझे बेसन लाडू वर्ल्डमधे बेस्ट

कशी सांगू त्याला अरे माझी दुखतेय वेस्ट

म्हटलं ठीक आहे. लाडू तेवढे करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नात जवळ आली

तुझीच शंकरपाळी आवडतात, म्हणाली

शंकरपाळ्यांची तयारी केली सुरू

दुधावरच्या सायीला कसं नाराज करू

मनात म्हटलं बाकी सगळं मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात सूनबाई म्हणाली

आई लक्ष्मीपूजनाला करंजीची

तुम्हीच तर सवय लावली

मग काय लागले करंजीच्या तयारीला

घरच्या लक्ष्मीला नाराज करणे परवडेल का मला?

*

शेवटी सगळा फराळ करून झाला

सूनबाईनेही मला खूश करण्याचा चंग बांधला

माझ्यासाठी बॉडी मसाज बूक केला

आणि बघता बघता माझा थकवा दूर पळाला

*

पण खरं सांगू का तुम्हाला

फराळाचे भरलेले डबे बघून मीही झाले तृप्त

आता तुम्हीच सांगा मला

आईला होता येईल का हो कधी अलिप्त?

कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनमोल दैवी दागिने… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अनमोल दैवी दागिने… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

चला विरक्ती आली,

दागिन्याची आसक्ती संपली…

या बाह्य सौन्दर्यापासून आता,

मुक्ती हवीशी वाटू लागली!

 

पण सुंदर दिसण्याचा विचार

डोक्यातून काही जाईना…

आणि दागिन्याची हौस मनाला,

स्वस्थ बसू देईना!

 

मग मी रामाकडे घेतली धाव,

म्हणाले, तूच यातून मला सोडव…

रामा तूच माझा सोनार हो…. आणि

माझे दैवी दागिने घडव!

 

चेहर्‍यासाठी माझ्या घडव

सुहास्याचा दागिना.

मुखावर माझ्या कधी

 न उमटो मनातली विवंचना!

 

कानासाठी माझ्या घडव,

तू असे सुंदर झुबे…

माघारीही माझ्याबद्दल

चांगलंच ऐकू येऊ दे

 

गळ्याभोवती माझ्या

असूदेत सतत

आप्तजनांचे हात

काय करायचेत आता मला,

चंद्रहार आणि पोहेहार?

 

पाटल्या बांगड्या यांनी आजवर,

शोभा वाढवली हाताची…

आता वेळ आलीय,

हात दानाने मोकळे करण्याची!

 

वेळोवेळी सजली माझी

मेखला, कंबरपट्टा यांनी कंबर…

आता तिची खरी शोभा,

ती ताठ आहे तोवर!

 

जोडवी अशी जड घडव,

की पाय जमिनीवरच राहतील…

आता सांग, हे रामा,

हे सारे दागिने केव्हा देशील?

 

दैवी दागिन्याची माझी मागणी,

रामचंद्र सोनारानं नोंदवून घेतली…

“जरा वेळ लागेल” असं म्हणत,

स्वत:ची भूमिका स्पष्ट केली

 

हसतच वदला रामराया…

“अहो, हे दागिने तयार नसतात,

कारण त्यांना तेवढी मागणी नसते..

पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत,

घेणाऱ्या भक्ताची, (पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी,

एवढीच माफक अपेक्षा असते!

 

घडणावळीची काळजी नको,

कारण आम्ही ती घेतच नाही..

रामनाम चालू ठेव

दागिने लवकरच घरपोच होतील.

 

असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं…

खरेतर हाच माझा छंद..

त्यासाठीच मी येथे उभा आहे…

तुझ्या सारख्या अनोख्या भक्तांची वाट पाहत…

 

कारण भक्तांच्या इच्छा पुरविणे

 भक्तांना भयमुक्त करणे..

हेच तर माझे कर्तव्य….

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares