बाळंत या शब्दाचाचं अर्थ मुळात बाळ तरी, नाही तर अंत तरी असा आहे.
गर्भात आकाराला आलेला जीव पूर्ण रुपात साकारताना मांडलेला जीवाचा आकांत म्हणजे बाळंतपण.
बाळंतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म.
बाईपणातून आईपणात रूपांतर होणारी अत्युच्च पातळी म्हणजे बाळंतपण.
बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांची तीव्रता असते तरी किती..? तर ४३ डेल इतकी… म्हणजे माणसाची २० हाडे फ्रॅक्चर झाल्यानंतर जितक्या वेदना होतात माणसाला तितक्या वेदना बाळंतपणात सहन कराव्या लागतात बाईला.
दुःखातून जन्म पावणाऱ्या वेदना वाहतात नेहमी दुःखाचा भार… पण इथं असतं उलटं…
वेदनेतून सुख जन्माला येतं आणि शेवटी मानते ती या वेदनांचेचं आभार.
वेदना कोणाला हवीहवीशी वाटेल…?
परंतू कितीही असह्य असल्या तरी तिला त्या हव्याहव्याशा वाटतात.
वेदना नको म्हणून कुठलीही बाई नाकारत नसते कधीच बाळंतपण.
मरणयातना भोगून पुन्हा मिळणार असते तिला जिवंतपण.
वेदनेचं नी बाळंतपणाचं नातं असतं अतूट.
सोसत नसते तरी सोसते…अनावर किंकाळी फुटत असते.
व्याकुळ होते…कासावीस होते भान हरपून जात असते.
आणि जीवन मरणाच्या मधली झुंज बाई देत असते.
शेवटी बाळ तरी…नाही तर अंत तरी.
इतक्या अटीतटीची निकराची झुंज असते बाळंतपण म्हणजे.
कित्येक बाया बाळंतपणात आई होताना गेल्या आहेत हे जग सोडून… मागे एखादं गोंडस बाळ ठेऊन.
कित्येक आया आजही भोगताहेत बाळंतपणानंतरच्या कळा अजून.
पण नसते कधीच भीती तिच्या मनात अशा दुर्दैवी घटनांची.
किती मोठा त्याग असतो ना बाईचा…आई होण्यासाठी… शरीरासोबत जीवाचं समर्पण देते ती यासाठी.
शेवटी अनंत यातनेचा वेदनेचा अंत पाहणाऱ्या सहनशीलतेचा सामना करून होते ती बाळंत..
टाकते सुटकेचा निश्वास…देते एका जीवाला श्वास…जणू ओतते आपला जीव त्या जीवात.
हाडामासाचं जिवंत-साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण.
बाळ जन्म घेतो आणि बाईचाही आई म्हणून जन्म होतो.
सोपं नाही आई होणं ते दिव्य पार करावं फक्त बाईनं.
आईपणाच्या अंगावर फुटणारा पान्हा.. आणि छातीला बिलगून दूध पिणारा तान्हा…
आहे ना हा अद्भुत आणि अद्वैत नात्याचा नमुना..
बाईलाच आईपणाची का हो असते चाहूल..?.. वेदनेचा हा भोगवाटा बाईच्याच का वाट्याला ?
तिच्याच वाट्याला निसर्गानं का हे बाळंतपण दिलंय..?.. निसर्गानं नवनिर्मितीचं आणि सृजनशीलतेंच सौख्य एक मातीच्या आणि दुसरं मातेच्या पदरी घातलंय.
मातीच्या आणि मातेच्या नावात एका वेलांटीचा फरक आहे असं म्हणतात. .. खरंय ते…
☆ असा शिष्यवर होणे नाही…☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆
पुण्यातील धनकवडीचे योगी शंकर महाराज यांनी १९४७ साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वामध्ये विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटचे दर्शन करण्यासाठी फिरवले. आणि पदमावतीला आणले. तेथेच जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होती.
जसा जसा अंधार पडायला लागला होता, तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी गेले. कारण त्या काळी १९४७ साली त्या धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणी इतर जंगली प्राणी होते… त्यामुळे ‘ महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले. त्यांचे शरीर आपण विधीवत पुरले. आता आपले काम झाले. शेवटी आपला पण संसार आहे,’ असा विचार करत हळूहळू सर्व जण निघून गेले.
रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांच्या समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता.
त्या शिष्याने विचार केला की, जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर?
…आपल्या लाडक्या गुरूच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य, तेथून घरी परत गेलाच नाही.
रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भिता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला… काय त्या शिष्याचे धाडस बघा.
तुम्ही जर फक्त एकच रात्र एकटे एखाद्या जंगलात.. जेथे रानटी कुत्रे व इतर जंगली प्राणी आहेत, त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की, त्या शिष्याने काय धाडस केले होते.
दुसरे दिवशी सकाळी त्याने विचार केला की, आता आपल्याला महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला. तो तेथेच थांबला.
त्या शिष्याने एक दोन दिवस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे महाराजांच्या समाधीची राखण करत राहीला.
त्याबद्दल त्याला कोणी दरमहा पगार देत नव्हते. की खायला अन्न ही देत नव्हते. पण त्याला कशाचीच अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार नव्हते की, चार पैसे मिळणार नव्हतेच. पण केवळ गुरू वरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरूच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो तेथेच थांबला होता.
भूक लागली की, त्या जंगलात दुरवर कोठे तरी चार पाच घरे होती, त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे, आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे. सात आठ दिवस झाले. इकडे त्या शिष्याची बायको, नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली. तिला काळजी पडली की, आपला नवरा घरी का आला नाही? कुठे गेला? ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधी जवळ आली. तर तिने पाहिले की, आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे. तिने नवऱ्याला घरी परत येण्यासाठी विनवले. पण त्या शिष्याने घरी परत यायला नकार दिला.
आपला नवरा आता ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्याच्याबरोबर समाधीजवळच राहण्याचा निर्णय घेतला. त्या गुरूवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधीभोळी बायको, तिने विचार केला की, जेथे माझा नवरा राहील तेथेच मी पण रहाणार.
… ती घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली. दोघांनी तेथेच छोटीशी झोपडी उभी केली. आणि तेथेच राहू लागले….. आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी करणारी त्याची वेडी पतिव्रता बायको.
उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणुन त्याने छत्री दिवसभर धरली, तर पावसाळ्यात पाण्याचे लोटच्या लोट यायचे. तेथे त्या काळी भरपूर उतार होता. त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून, तो वेडा शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागावर आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून वेगाने येणारे पाण्याचे लोट, त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले, पण गुरूच्या समाधीला काही होऊ दिले नाही.
…. आणि असे एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वर्षे !
काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. त्यांनी पाहिले की, तो शिष्य समाधीची राखण कशी करत आहे ते? मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले. वरून पत्रा टाकला.
हळूहळू काळ बदलला. तेथे जंगल कमी होऊन माणसे रहायला आली.
पंचवीस वर्षानंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे. ते मंदिर उभे राहिले.
कशाचीच अपेक्षा न करता आपल्या गुरूच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य होता ……
प.पू .बाबुराव रूद्रकर !
हा लेख जे वाचत आहेत त्यांना पदमावतीचा सातारा रोडवरील महाराज यांची समाधी असलेला मठ माहीत असेल. पण त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण करणाऱ्या बाबुराव रूद्रकर यांचा ‘ रूद्र शंकर मठ ’ भारती हॉस्पिटलजवळ आहे. हे माहित नसेल.
जी माणसे शंकरमहाराज यांना नावे ठेवतात, त्यांनी या रूद्कर यांच्या पंचवीस वर्षाच्या सेवेचा जरूर विचार करावा. शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते. त्यांनी खुप चमत्कार केले. ते चमत्कार रूद्रकर यांनी स्वतः पाहिले. अनुभवले. रूद्रकर यांच्या लक्षात आले की, हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे. यांच्याकडे दैवी शक्तीचे अस्तित्व आहे. म्हणूनच रूद्रकर यांनी शंकर महाराज यांना गुरू मानले. आणि त्यांच्या समाधीची पंचवीस वर्षे राखण केली.
बाबुराव रूद्रकर यांनी १९८५ मध्ये आपला देह ठेवला.
धन्य ते गुरू शंकर महाराज आणि धन्य ते शिष्य बाबुराव रूद्रकर ….
असा गुरू होणे नाही.. आणि असा गुरूवर अफाट प्रेम करणारा शिष्यही होणे नाही.
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मला अश्रु देशील का ?” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला. “उद्या सकाळी वृध्दाश्रमाला भेट द्यायला येता का ?”
“ओके “! मी ही तयार होतोच. नाहीतरी बरेच दिवसांपासून वृद्धाश्रम बघायचं होतं.
सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते असे बरेच काही घेतले. आत शिरताच तिथली मंडळी खूष झाली. ” हाय हिरो ! ” हाय चिकण्या”!! अशा हाका सुरू झाल्या. सगळे वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरुन बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरं देत होता. हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.
त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती. पंचाहत्तर एक वय असेल तिचे, पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते. डोळ्यातही वेगळीच चमक होती.
” ओय बुढी, कैसी हो ?” बंड्याने तिला पाहताच आरोळी ठोकली.
” नालायका आहेस कुठे ? तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय “? तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले.
बंड्या हसत हसत तिच्या मिठीत शिरला. माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले. मी खाली वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच नको नको म्हणत तिने व्हीलचेअर मागे घेतली.
” ही माझी मैत्रीण. थोडी म्हातारी दिसतेय, पण लय खोडकर. एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा. मेल्यावर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे, म्हणून सहन करतोय तिला,” असे बोलून बंड्या हसला.
” काही मिळणार नाही तुला माझ्याकडून. मरणावर टपलाय माझ्या. डायबिटीस आहे हे माहीत असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी. माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी”, तिने जोरात उत्तर दिले.
आश्चर्यचकित झालेला माझा चेहरा पाहून दोघेही हसू लागले. मग ती सांगू लागली, “मी जयमाला. पेशाने शिक्षिका, विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी. एका शाळेतून प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. घरात नवरा आणि मी, मुलगा हुशार होता म्हणून बाहेर गेला आणि तिकडचीच गोडी लागली आणि तिकडचाच झाला. आज कुटुंबाबरोबर सुखात आहे. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली पंचवीस वर्षे संसार केला, पण माझ्याइतके आयुष्य नाही लाभले तिला. पाच वर्षांपूर्वी तीही एका छोट्या आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली. त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि दोन वर्षांपूर्वी तेही गेले .
मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली. परदेशातून पैसे पाठवत राहिला. मलाही हे गुडघ्याचे आजारपण सुरु झाले आणि ही व्हिलचेअर माझ्या नशिबात आली. माझ्या असल्या अवस्थेमुळे कुठलीच बाई टिकत नव्हती. मुलगी गेल्यावर जावयाने पण संबंध तोडले. मुलाला इकडे यायची इच्छा नाही. खूप निराश झाले होते मी.
शेवटी मुलाने नाइलाजाने वृध्दाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला. इथे आल्यावर अवती भवती सर्व असायचे, पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही. तेव्हढ्यात बंड्या भेटला. तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार करतात. देवा…. ! असेही लोक असतात तर समाजात. मग हे लोक मला आपले वाटू लागले.
हा बंड्या नेहमी हसरा. याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे, असेच वाटते. कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर, पण डोळ्यांत दुःख दिसत नाही. पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला. मी म्हणाले, मला डायबिटीस आहे, तर म्हणाला, “असे किती वर्ष जगायचे आहे तुम्हाला ? पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्बेतीची काळजी करत जगणे. मरण लवकर येऊ दे म्हणता आणि तब्बेतीची काळजी घेता, खा गप्प, तेवढीच वर्ष कमी होतील. मन मारून जगू नका, आणि मीच येणार आहे तुम्हाला पोहचवायला” . त्याचे हे प्रवचन एकून दिवसभर हसत होते.
त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले. आता फक्त प्रसन्न रहाणे, स्वतःवर हसणे एवढेच मला माहितीय.”
त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो.
मी म्हटले ” हो. हा असाच आहे, मीही याला कधी गंभीर बघितले नाही “.
“बंड्या आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने मला एक गिफ्ट देशील ?” तसा बंड्या हसला.
“च्यायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का ? काय पाहिजे ग तुला ? तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार. दिवस ही करू का ?”
“नको. दिवस नको करुस, फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी ? आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे ? तुला मी मित्र मानते, पण तूही रडणार नाहीस याची खात्री आहे मला. म्हणून नाइलाजाने आज तुझे अश्रू मागतेय, देशील का रे ?”
अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरलाच, एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला. मी ही अस्वस्थ झालो.
“च्यायला! म्हातारे, काहीही मागतेस!”, असे म्हणत बंड्याने तिचे हात हातात घेतले.थोडा वेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योद्ध्यासारखा खोलीच्या बाहेर पडला. पण डोक्यात “तुझे अश्रु मागते” हे शब्द फेर धरून नाचत होते…
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈