श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने.. ☆ श्री जगदीश काबरे ☆
दरवर्षी 30 जुलै हा जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक मैत्री दिनाची सुरुवात 1958 साली दक्षिण अमेरिका खंडातील पॅराग्वे देशात झाली. तेव्हा “वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड” नावाच्या एका सामाजिक चळवळीने या दिवसाची कल्पना मांडली. या चळवळीचा उद्देश माणसाच्या मानवतेतील ऐक्य, सहकार्य आणि शांततेला प्रोत्साहन देणे असा होता. या कल्पनेतून 30 जुलै हा दिवस ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. नंतर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे 30 जुलै या दिवसाला ‘जागतिक मैत्री दिन’ म्हणून मान्यता दिली. या दिवसाच्या निमित्ताने विविध देश, धर्म, वंश, आणि संस्कृतीतील लोकांमध्ये परस्पर समज, संवाद आणि ऐक्य वाढवण्यावर भर दिला जातो. मैत्री हे केवळ वैयक्तिक नाते नसून, सामाजिक सलोखा आणि जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी भूमिका या दिवसामागे आहे. भारतात मात्र ’जागतिक मैत्री दिन’ अधिक औपचारिक नसून, प्रामुख्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी तरुणाईत लोकप्रियतेने साजरा केला जातो. त्यादिवशी मित्रांना मैत्रीच्या बंधनाची जाणीव करून देण्यासाठी फ्रेंडशिप बँड देणे, एकमेकांना शुभेच्छा देणे अशी स्नेहपूर्ण परंपरा दिसून येते. जागतिक पातळीवर मैत्रीचा विचार करताना, हा दिवस केवळ नात्यांचा उत्सव न राहता, एक सामाजिक संदेश घेऊन येतो – तो म्हणजे, मैत्री हे शस्त्र नसून सेतू आहे, जो माणसामाणसात आणि समाजासमाजात संवाद, सहिष्णुता आणि शांतता निर्माण करतो.
पण आज नेमकं होतंय असं की, एकीकडे एका क्लिकवर भेटणं होतंय, एका मेसेजवर बोलणं होतंय, पण दुसरीकडे हा संवाद काहीसा खुंटतो आहे. नुसतं लाईक आणि ईमोजी टाकून भावनिक कोरडेपणा येतो. आणि नकळत एक प्रश्न मनात रुंजी घालतो. या डिजिटल जिंदगीत सोशल मीडियाने, इंटरनेटने मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली आहे का? मैत्री फक्त भावनिक चैन नाही तर तिचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात सच्चे मित्र असतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते, तणावाचं प्रमाण कमी होतं आणि आयुष्यमान वाढतं. कारण मैत्रीच्या नात्यातून मेंदूमध्ये ‘ऑक्सिटॉसिन’ आणि ‘डोपामिन’सारखे आनंददायक रसायने स्रावत असतात, जी आत्मीयता, विश्वास आणि आनंदाची भावना निर्माण करतात. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने मैत्रीची व्याख्या आणि व्याप्ती दोन्ही पालटलं. ऑर्कुटपासून सुरू झालेला प्रवास फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटपर्यंत आला. आता इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडीओ कॉल्स आणि सोशल मीडियामुळे मित्रांशी जोडणं क्षणार्धात शक्य आहे. मित्र कितीही लांब असला, तरी व्हॉट्सअपवर एक मेसेज, झूमवर कॉल किंवा स्नॅपचॅटवर स्ट्रीक पाठवला की संपर्कात राहता येतं. भावना व्यक्त करण्यासाठी आता शब्दांपेक्षा इमोजी, मिम्स आणि व्हिडीओ कॉल्स जास्त बोलके ठरतात. मैत्रीतली ही झटपट कनेक्टिव्हिटी आणि नव्या प्रकारे व्यक्त होण्याची पद्धत यामुळे मित्रांचं जग जवळ आलंय, पण त्याच वेळी मैत्रीच्या खोलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
नव्या युगात मैत्रीचे रूपच बदलले आहे. पूर्वी प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री अशक्य वाटायची. मैत्री फुलायला भेटीगाठी, प्रत्यक्ष गप्पा या अनिवार्य होत्या. आता मात्र सोशल मीडियामुळे आपण कुठल्याही कोपऱ्यात असलो, तरी आपल्या मित्रांशी रोजच्या रोज संपर्कात राहू शकतो. अंतरं संपलेली आहेत आणि संवाद अधिक सोपा झालाय. स्टेट्स, स्टोरी यातून त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी थेट न सांगताही कळतात. शाळेतले जुने मित्र, जुने शेजारी कदाचित सोशल मीडिया नसता तर संपर्कात राहिले नसते. शाळा, कॉलेज, ऑफिस मेट, जिम अशा विविध व्हॉटसअप ग्रुपमधून आता गप्पाटप्पा रंगतात. याशिवाय, मिम्स हे मैत्रीत संवादाचं नवं माध्यम बनलं आहे. भावना व्यक्त करणं असो की नर्म विनोद किंवा टोमण्यांची कोपरखळी पानभर शब्दांपेक्षा एक मिम पुरेसं ठरतं.
डिजिटल माध्यमांमुळे मैत्री आता केवळ शेजारपाजार, शाळा-कॉलेज ऑफिसपुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेटमुळे मैत्रीही जागतिक झाली आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी जोडलं जाणं शक्य झालं आहे. विविध विषयांच्या फेसबुक पेजेसवर समान आवडीची माणसं एकत्र येतात, त्यातून मैत्रीची नाती फुलतात. डिजिटल मैत्रीने अशा अनेकांना व्यक्त होण्याची नवी संधी दिली आहे. अंतर्मुख स्वभावाचे किंवा प्रत्यक्ष समोर व्यक्त होण्यात संकोच वाटणारे लोकही आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. शिवाय, इंटरनेटमुळे विविध संस्कृती, भाषा, जगभरचे विचार आणि जगण्याच्या पद्धती यांचा आपल्याला परिचय होतो आणि त्यामुळे मैत्रीचं परिमाणही विस्तारतं. डिजिटल जगात जशी मैत्रीची नवीन दालनं खुली झाली आहेत, तशा काही नव्या समस्यादेखील तयार झाल्या आहेत. कारण बऱ्याचदा प्रत्यक्ष न भेटता झालेली ऑनलाइन मैत्री अनेकदा वरवरची ठरण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, सोबत वेळ घालवतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडतात. आवडीनिवडी, स्वभाव समजतो. आणि मग ‘‘समशील: समव्यसनेषु सख्यम्’’ या उक्तीनुसार मैत्री जुळते.
डिजिटल विश्वात मात्र बऱ्याचदा फक्त चांगलं तेच दाखवलं जात असतं. त्यामुळे स्क्रीनपल्याडची व्यक्ती खरी कशी आहे, याचा अंदाज येणं कठीण होतं. त्यामुळे काही वेळेस नंतर विसंवाद होऊ शकतो. अपेक्षा न जुळल्याने इंटरेस्ट कमी होतो आणि मग अचानक ‘घोस्टिंग’ — म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता संवाद बंद केला जातो. यामुळे नैराश्य आणि गैरसमज होण्याची शक्यता असते. कधी कधी ही डिजिटल मैत्री खोटी निघते. फेक प्रोफाइल्समुळे खोटं व्यक्तिमत्त्व उभं केलं जातं आणि त्यातून आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर प्रकारही घडू शकतात. या पार्श्वभूमीवर, डिजिटल मैत्री पुन्हा नव्याने समजून घेण्याची गरज आहे. मैत्री म्हणजे फक्त मेसेजच्या माध्यमातून कनेक्टेड राहणं नव्हे. मैत्रीत भावनिक जवळीक, पारदर्शकता आणि परस्पर आदर असतो. ती केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टेटस अपडेट्स किंवा रिप्लायवरून समजली जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांशी केवळ चॅटवर विसंबून न राहता, अधूनमधून फोन किंवा व्हिडिओ कॉल करावेत. ख्यालीखुशाली विचारावी, गप्पांचे फड रंगवावेत आणि अर्थातच प्रत्यक्ष भेटींचं स्थान अजूनही अतिशय महत्त्वाचं आहे. डिजिटल साधनं केवळ पूरक ठरावीत, पर्याय नसावीत, हे लक्षात घेणं गरजेचं. म्हणून ऑनलाइन मैत्रीतही काही मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येकजण लगेच रिप्लाय करेलच असं नाही, प्रत्येक संवादात भरभरून भावना व्यक्त केल्याच पाहिजेत असं नाही. ‘शेअर-शेअर’चा खेळ न खेळता मनापासून संवाद साधणं हेच मैत्रीचं खरं रूप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, व्यग्र दिनक्रमातून जरा वेळ बाजूला काढून आपल्या जिवलग मित्रांना प्रत्यक्ष भेटावं. जेव्हा सगळे मित्र एकत्र जमतील, तेव्हा मोबाइल बाजूला ठेवावा.
ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ रॉबिन डनबार यांच्या सिद्धांतानुसार मेंदूतील निओकॉर्टेक्स या भागाचा आकार आणि आपण किती जटिल सामाजिक नातेसंबंध हाताळू शकतो याचा थेट संबंध असतो. परिणामी, मानवी मेंदूच्या आकारानुसार आपण सुमारे १५० स्थिर आणि अर्थपूर्ण नातेसंबंध जपण्यास सक्षम आहोत. डनबार यांच्या मते, आपल्या ओळखींच्या विविध पातळ्या असतात. आपल्याला अधूनमधून गाठभेट होणारे, थोडाफार संवाद असणारे सुमारे १०० – १५० कॅज्युअल मित्र असू शकतात. त्यातून जरा अधिक ओळखीचे, अधिक संवाद साधणारे ३० – ५० जण आपले मित्र ठरू शकतात. पुढे त्यातून १० – १५ जण असे असतात ज्यांना आपण ‘चांगले मित्र’ म्हणू शकतो. यांच्यासोबत विश्वासाचं नातं अधिक गडद झालेलं असतं. आणि या सर्वांतून उरतात काही खास… अगदी कुटुंबासारखे ‘बेस्ट फ्रेंड्स’. डनबार यांच्या मते ही संख्या आहे जास्तीतजास्त पाच. या जिगर के तुकडे बडीज सोबत आपण आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी सुख-दु:ख, खेद-खंत, संघर्ष- स्वप्नं सगळं काही शेअर करू शकतो.
पण डिजिटल मैत्री अनेकदा तोंड दाखवण्याइतकीच होते. आपण ज्या मित्राला ऑनलाइन “बेस्ट फ्रेंड” म्हणतो, त्याच्याशी प्रत्यक्षात अनेकदा महिनोन्महिने भेटही होत नाही. भावनिक संकटांच्या क्षणी त्याचे फक्त फोटो असतात, पण खांदा द्यायला तो नसतो. याउलट, एखादा जुना मित्र जो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, पण प्रत्यक्ष भेटतो, तो खराखुरा सहकारी ठरतो. एकूणच या डिजिटल काळात मैत्रीची व्याख्या बदलली आहे, पण माणसाच्या गरजा बदललेल्या नाहीत. माणसाला अजूनही स्पर्श, सहवास, विश्वास, आणि नजरेतून संवादाची गरज आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर करताना आपण खऱ्या भेटी, एकत्र वेळ घालवणे, आणि खऱ्या अर्थाने नातेसंबंध टिकवणे याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. एक क्लिकवर असलेली माणसे प्रत्यक्षही आपल्या आयुष्यात असतील यासाठी प्रयत्न करणे, हीच डिजिटल मैत्रीची खरी कसोटी ठरते.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


















