☆ विठू माझा लेकुरवाळा…. संत जनाबाई☆ रसग्रहण… सौ शालिनी जोशी ☆
☆
विठू माझा लेकुरवाळा l संगे गोपाळांचा मेळा ll
निवृत्ती हा खांद्यावरी l सोपानाचा हात धरी ll
पुढे चाले ज्ञानेश्वर l मागे मुक्ताई सुंदर ll
गोरा कुंभार मांडीवरी l चोखा जीवा बरोबरी ll
बंका कडियेवरी l नामा करांगुळी धरी ll
जनी म्हणे गोपाळा l करी भक्तांचा सोहळा ll
– संत जनाबाई
संत जनाबाईंचा देवाचे भक्तावरील वात्सल्य व प्रेमाचे वर्णन करणारा हा अभंग आहे. दासी जनी, नामयाची दासी, जनी नामयाची तर कधी नुसतं जनी ही अशी जनाबाईंची नाममुद्रा. या विठ्ठलाचे अनेक रूपे जनाबाईच्या अभंगातून व्यक्त होतात. तोच त्यांचा मायबाप, सखा, सांगाती झाला होता.
या अभंगात गुणगान करताना जनाबाई विठ्ठलाला लेकुरवाळा करून टाकतात. सर्व संतांना अंगाखांद्यावर खेळवणारी बाळे करून त्या विठ्ठलाला संसारात गुंतवितात. त्याला मातृभाव देतात. विठ्ठलाची विठाई होऊन तो साऱ्यांचे कुशल मंगल पाहतो. आषाढी कार्तिकीला आईच्या भेटीला आतूर होऊन सर्व भक्त पंढरपूरला जमा होतात. माऊलीच्या अवतीभवती करतात. मातृकाविठाई त्यांचे लाड करते. निवृत्तीला खांद्यावर घेते. तर सोपानचा हात धरते. ज्ञानेश्वर पुढे चालतात. त्याने उजळलेल्या मार्गावरून मुक्ताई चालते. गोरा कुंभार मांडीवर बसतो. चोखा बरोबर चालतो. मग बंकाला कडेवर घेते. तर नामाचा हात धरते. अशा प्रकारे प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे ही माऊली आधार देते.
अठरा पगड जातीचे हे भक्त. पण जात, पंथ भक्तीच्या आड आला नाही. नामस्मरण हाच धर्म आणि विठ्ठल ही जात. त्या माऊलीच्या छत्राखाली सर्व एकत्र आले. पंढरपूरला आपल्या माहेरी ते जमतात. चंद्रभागेत स्नान, वाळवंटात फेर, फुगड्या, आनंदाने भजन करत, नाचत, नामस्मरणात दंग होतात. हा सगळा भक्तीचा सोहळा होऊन जातो. एकात्मतेचेच हे प्रतीक. विठाई आनंदाने पाहते. तिच्यासाठी हा सोहळाच असतो.
खरं पाहता विठ्ठल वेगळा नाही. संतांच्या रूपात येऊन तोच लिला दाखवतो. संत हेच देव. प्रत्यक्ष भगवंतच जगाच्या कल्याणासाठी संतांचे रूप घेऊन अवतरतात. हे जनाबाईंना या अभंगातून सांगायचं आहे. त्यासाठी त्यांनी लेकुरवाळ्या विठ्ठलाचे रूपक केले. हा लेकुरवाळा विठ्ठल मराठी भावकाव्यात अजरामर झाला.
संत जनाबाई नामदेवांपेक्षा मोठ्या होत्या. सर्वच संतांचा सहवास जनाबाईंना घडला. त्यामुळे विठूमाऊलीला संतांच्या मातेच्या रूपात त्या पाहतात. म्हणून संताना विठोबाच्या अंगाखांद्यावर खेळताना पाहण्याची कल्पना सुचली. त्यांच्यासाठी तो भक्तीचा सोहळा झाला. प्रपंच करूनही परमार्थ करता येतो हेच या रूपकातून जनाबाईंना सुचवायचे असावे.
राधिका ताईंची ही कविता वाचल्यानंतर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या कवितेची नायिका एक ज्येष्ठ,अनुभव संपन्न, आयुष्यातील अनेक चढ-उतार पाहिलेली आणि त्या चढ- उतारांवर सतत पतीची साथ लाभलेली अशी आहे. पती-पत्नी हे नातेच असे आहे की संसाररथाची ती दोन चाकेच जणू. सुरुवातीच्या काळात ही चाके नवीन असल्यामुळे ती फार जोमाने, जोशाने चालतात परंतु हे नाते जसजसे जुने होत जाते तसतसे ते अधिक दृढ झाले तरी तो पहिला जोश राहत नाही आणि दोघांत बऱ्याचदा अगदी क्षुल्लक कारणांवरूनही वाद होत राहतात. या कवितेची नायिका अशीच या टप्प्यावर आलेली आहे आणि तिच्या भावनांचा, संवेदनांचा आविष्कार म्हणजेच पुन्हा एकदा ही कविता.
1) कुठे हरवला तेव्हाचा तो प्रितीचा रंग सारा
आयुष्याला सोसत नाही वृक्ष कोरडा वारा
आयुष्याच्या या टप्प्यावर कवितेतील नायिका काहीशी उदास अंतःकरणाने बसली आहे. तिच्या मनात येते की तेव्हाची तारुण्यातील ती प्रिती कुठे बरे हरवली? आता हे आयुष्य अगदीच रुक्ष, कोरडे वाटत आहे. त्यातील सगळे रंगच फिके, पुसट होऊन गेले आहेत.
2) संवाद नसे शब्द मधुरता हरवली कशी कोठे
तेव्हा वाटे मौनात बरे.. नसते वादळ मोठे
आता आम्हा दोघांत काही संवादच उरला नाही. कारण काही बोलायला गेले तर एकेका शब्दावरून नुसते वादच होतात. तेव्हा अशा वादळांपेक्षा मौनातच राहणे बरे, काहीच बोलायला नको.
3) ढग काळे ते दाटले नभी मिटोनि गेले तारे
जलधारांनो तुम्ही आपुले आनंद गीत गा रे
काळ्या ढगांनी आभाळ भरून आले, की अंधार दाटून येतो, आणि चमचमणारे तारे ढगाआड विरून जातात. नायिकेच्या मनाची अवस्था अशीच मळभ आलेल्या नभासारखी काळोखी झालेली आहे. परंतु ती स्वतःला धीर देते आणि म्हणते की अंधारलेल्या आकाशातून जशा पावसाच्या सरीवर सरी आनंदाने टप टप कोसळत असतात त्याचप्रमाणे मला माझे आनंद गीत गात राहिलेच पाहिजे.
या ठिकाणी कवयित्रीची सकारात्मक वृत्ती वाचकांचेही औदासिन्य निश्चितच कमी करते.
4) असा कसा तो गंध गोडवा विरोनि गेला आता
परत एकदा जुळवू आपण बेसुरातला भाता
पुन्हा एकदा तिला आपल्या नात्यातला, सहवासातला दरवळ निघून गेल्याची खंत वाटत आहे. परंतु या बेसूर झालेल्या संवादिनीचा ( जीवनाचा) भाता आपण सुरात जुळवू शकतो याचा तिला भरवसा वाटतो. तिच्या वृत्तीतील सकारात्मकता पुन्हा जागृत होते.
5) वाटा ओल्या होत्या तेव्हा नरम किनारी वाळू
त्या वाळूतले सदन आपुले वचनांना मग पाळू
तारुण्यातील नात्यात प्रेमाचा ओलावा होता आणि त्या ओलाव्यात आपला संसार एकमेकांना दिलेली वचने पाळत कसा अगदी दृष्ट लागण्यासारखा होता. नायिकेला वाटते की तोच ओलावा आजही असावा आणि तीच वचने आपण वर्तमानातही पाळावी.
6) मावळतीला भास्कर जातो अज्ञानाच्या देशी
निरोप त्याला दोघे देऊ प्रेम स्मृतींच्या वेशी
आता आपला अस्तकाल समीप आला आहे, सूर्य मावळून दूर देशी जातो, कुठे जातो ते अज्ञात आहे. आपलेही तसेच आहे. इथून आपण कुठे जाणार माहित नाही, परंतु निदान निरोप घेताना तरी त्या मधुर गतस्मृतींच्या वेशीवर आपण दोघांनी उभे राहण्यास काय हरकत आहे?
7) नको दुरावा या वळणाशी त्या नात्यांच्या गाठी
जपूया तशा जशाच होत्या बेधुंद मनासाठी
नायिका तिच्या पतीला आर्जवून सांगते आहे की आता या वळणावर आपल्या दोघात दुरावा नको रे! आपल्या नात्याच्या या गाठी जशा होत्या तशाच आपण जपूया, त्या सैल नको पडायला. त्यावेळी बेधुंद मनाने जसे आपण हातात हात घालून जगलो तसेच आताही जगू या ना!
संसार म्हटला की ॲडजस्टमेंट आली असे आपण नेहमीच म्हणतो. तसेच स्त्रीलाच ती करावी लागते असेही आपण म्हणतो. ही कविता वाचल्यावर हे अगदी सोळा आणे सत्य आहे याची जाणीव होते. नायिका दोघातील नात्यांचा दुरावा दूर करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे.
लवंगलता या मात्रा गण वृत्तातील ही कविता कुठेही सूट न घेता राधिकाताईंनी यथायोग्य शब्दांचा वापर करून अगदी सहज लिहिली आहे. यातील काळ्या ढगांनी दाटलेले नभ, बेसूर भाता, ओल्या वाळूतले सदन वगैरे उपमा व उत्प्रेक्षा या अलंकारयुक्त शब्दांनी कवितेला एक प्रकारचे चैतन्य प्राप्त झाले आहे यात शंका नाही.
कवितेची सुरुवात उदासीन असली, तरी पुढे पुढे ती सकारात्मकता निर्माण करणारी असल्यामुळे आभाळाचे मळभ दूर करणारी आणि नंतर लख्ख प्रकाशाने उजळविणारी अशीच वाटते.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, या कवितेतील नायिका ही समाजातील अशा कित्येक जोडप्यांचे प्रतिनिधित्व करणारी आहे आणि आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसून ते दोघे एकमेकांसाठीच असतात हा बोध देणारी आहे.
जाणिवांचे भान असलेली, परिस्थितीविषयीची सत्यता व असत्यता बुद्धीच्या निकषावर तपासून पाहणारी एक सजग, विवेकी, विचारी व अत्यंत प्रगल्भ कवयित्री म्हणून आश्लेषाताई महाजन सुपरिचित आहेत. त्यांची “निर्मात्याचे वर्तुळ” ही कविता वाचनात आली. आणि मी खरोखर अंतर्बाह्य हलले, हेलावले व त्या “वर्तुळाच्या” आवर्तनाच्या प्रत्ययात हरवले देखील! ! जाणीवांना व भावनांना विचाराची जोड देऊन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब वाटावे अशी ही कविता..
“निर्मात्याचे वर्तुळ” या वेधक, अतिशय समर्पक व सूचक काव्यशीर्षकामुळे कवितेच्या विषयाची थोडी कल्पना येवू शकते.. वाचकाच्या सजग दृष्टिकोनाला आवाहन झाल्याने एक विशिष्ट भावविचार मनात उमटतो. त्यामुळे कविता वाचल्यावर आशयाचे सुस्पष्ट आकलन ही होते. कदाचित कवयित्रीला हेच अपेक्षितही असावे..
अगाध विश्वाच्या
अनाकलनीय संरचनेचा
अज्ञात निर्माता असावास तू…
हे विश्व अगाध म्हणजेच अमर्याद, गहन आहे. याचा आरंभ व अंत शोधणे महा कर्मकठीण आहे. किंबहुना ते सर्वथैव अशक्य ही आहे. या विश्वाच्या अनाकलनीय अर्थात आकलनाच्या पलीकडे असलेल्या संरचनेचा निर्माता “तो”असावा अशी सामान्यतः मनोधारणा आहे. संचरना या अत्यंत अर्थपूर्ण शब्दातून विश्वातील अनेक प्रणाली, त्यातील विविध घटकांची व्यवस्था याकडे लक्ष वेधले आहे. विश्व निर्मिताना हे असे व असेच का असावे, त्यातील कार्यकारण भाव, त्याचे परिणाम, दुष्परिणाम, त्याचा समतोल इत्यादी विचारांची दखल घेणारा “तो” निर्माता कदाचित तू असावास असे कवयित्रीला वाटते आहे. हा विचार वास्तवाला, सत्याला धरुन आहे. जग निर्माण करताना त्याने अनेक गोष्टींचा विचार केला आहे हे कळते, प्रकर्षाने लक्षातही येते. “तो” जो कोणी आहे तो अज्ञात आहे हे मात्र नक्की…
कदाचित या शब्दातून कुठलेही ठाम मत वा विचार मांडलेला नाही. कारण अजूनही या विषयावर शास्त्रीय आधारावर कुठलीच गोष्ट पूर्णतःसिद्ध झालेली नाही. अर्थात ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्याही पलीकडे काहीतरी आहे हे निश्चित. अतिशय अर्थपूर्ण व मोजक्या शब्दातून त्या निर्मात्याविषयीची भावना प्रभावीपणे मांडली आहे.
हे वास्तव या कवितेचा आधार आहे. कविता केवळ कवी कल्पना नाही.. अगाध, अनाकलनीय, अज्ञात या “अ”ने सुरू होणाऱ्या शब्दांचा वापर कवितेला साहित्यिक सौंदर्य प्रदान करतो.
चराचरातील गुंतागुंतीमधील
संगती-विसंगतीचा डाव मांडणारा
बुद्धिमान सूत्रधार बहुदा तू….
चराचरातील, वातावरणातील व त्यातील घटकांच्या गुंतागुंतीच्या, क्लिष्ट वर्तनाचा, त्यातील संगती व विसंगतीचा डाव मांडणारा बुद्धिमान सूत्रधार तू आहेस असे प्रतिपादन कवयित्रीने केले आहे. खरोखरच अशा पद्धतीचा रंजक व त्याचवेळी कल्पनेच्याही पलीकडे काही आहे ही भावना जागृत करून आगळा वेगळा डाव मांडणारा हा सूत्रधार नक्कीच अतिशय बुद्धिमान, कल्पक असणार हे निर्विवाद.. “बहुदा” या शब्दातून परत कुठलेही मत वा भूमिका ठामपणे मांडलेली नाही. कारण कवितेतील आशयाला हीच भूमिका योग्य आहे. मानवी जीवन व सृष्टीचे, चराचराचे जीवन यात खरोखरच अनेकदा सुसंगती दिसून येत नाही. तसेच त्यातील गुंतागुंत अनाकलनीय भासते.
विवेकी तर्काला आव्हान देत
नियतीला लीलया नाचवणारा
बिलंदर खेळिया भासतोस तू…
कवयित्रीला विवेकी बुद्धीप्रामाण्याला, तर्काला आव्हान देणारा, ठरणारा व नियतीलाही लीलया नाचवणारा हा बिलंदर खेळाडूच भासतो. हे विश्व जणू एक भास आहे या अर्थाने भास शब्दाची योजना अर्थपूर्ण आहे. खरोखरच बुद्धीच्या निकषावर बुद्धी वापरून कितीही शोध घ्यायचा प्रयत्न केला तरी या निर्मात्याविषयीचे गूढ अजूनही आपल्या आवाक्यात आलेले नाही. परंतु त्याचवेळी आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडवणारा “कुणीतरी” आहे ही जाणीव सतत होत असते. लीलया शब्दातून या घटना अगदी सहजतेने घडत असतात हे कळते. तसेच त्याची ही “लीला” आहे हे लक्षात येते. नाचवणारा म्हणजे खरोखर शब्दशः अगदी कळसूत्री बाहुली प्रमाणे स्वतःच्या इशाऱ्यांवर, बोटांवर नाचवणारा, खेळवणारा हा अपेक्षित भाव ध्यानात येतो. त्याने हा खेळ मांडला आहे ही भावना अधोरेखित करताना त्याला खेळिया संबोधले आहे. बिलंदर या शब्दातून अपेक्षित लबाड, धूर्त, लुच्चा, ठक, फसविणारा या सर्व अर्थाचे भाव अगदी सुयोग्य व प्रभावी पद्धतीने व्यक्त होतात.
पण युगांपासून तुझ्या निराकाराला
आकार देऊ पाहणारा,
तुझ्या अमूर्ततेला गोचर करू धजणारा
माणूसच तर आहे हाडामासाचा,
हे ज्ञात आहेच की तुला…!
वास्तवाला धरून असलेले हे निर्मात्याच्या अस्तित्वा विषयीचे मत मांडून झाल्यानंतर कवयित्री स्वतःच्या बुद्धीला पटणारे विचार व्यक्त करताना म्हणते की या अदृश्य, अगम्य, निराकार अस्तित्वाला रूपाचे रुप देवू पाहणारा, देणारा तसेच अमूर्ततेला गोचर करू धजणारा, भासमान अस्तित्वाला आपल्या भावनेतून, विचारातून व कल्पनेतून युगानुयुगांपासून आकार देणारा हाडामासाचा माणूसच आहे. व हे सत्य अर्थातच तुलाही ज्ञात आहेच ही जाणीव स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. कारण माणसाला निर्मिणारा व त्याला बुद्धी देवून त्याच्या हातून काही घडवून आणणारा हा तोच निर्माता आहे या वास्तवाकडे अगदी सहजतेने निर्देश केला आहे.
“अमूर्त” म्हणजे जी गोष्ट थेट इंद्रियांद्वारे जाणली जात नाही. निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी हेच सत्य आहे. गोचर रूप म्हणजे इंद्रियांद्वारे होणारे ज्ञान, प्राप्त होणारा अनुभव. अदृश्य निर्माणकर्ता व त्याचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न माणूस पंचंद्रियांनी निरंतर करीत आहे. “धजणारा” या शब्दातून माणूस जे काही करतो आहे ते धारिष्ट्य आहे ही बाब जाणवते. अर्थात तो या अदृश्य निर्मात्याला पूर्णपणे जाणून घेऊ शकलेला नाही, शकणार नाही. त्याच्या रूपाला आकार देण्याचे सामर्थ्य त्याच्यात नाही. युगानुयुगे या शब्दामुळे हा प्रयत्न सतत चालू आहे, त्यात माणसाला न लाभलेले यश व या प्रयत्नातील फोलपणा जाणवतो.
तुला अनुभवताना त्या माणसातूनच
आरपार पाहते मी पल्याडचे निर्गुण!
त्यावेळी लगडून आलेल्या मानव्याशी- तदाकार होतात निर्मम भाव.
या विचारांच्या पार्श्वभूमीवर व अनुभूतींच्या टप्प्यावर कवयित्री म्हणते की त्या अमूर्ततेला “अनुभवताना”, त्याविषयी जाणून घेताना कवयित्री माणसातूनच, त्याच्या अस्तित्वातूनच”आरपार” पाहते. “आरपार” या शब्दाचे महत्त्व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. दृष्टिकोनातील पारदर्शकता जाणवते. कुठलेही भ्रम, पूर्वग्रहदूषित वा पूर्वाधारित मते जाणीवपूर्वक बाजूला सारली आहेत. ती पाहते… काय पाहते तर पल्याडचे निर्गुण… पैलतीरावर असणारे, जाणवणारे, भासणारे गुणरहित आकारहिन “त्याचे” अस्तित्व.. अर्थातच हे अमूर्ततेचे, “निर्मात्याचे वर्तुळ”,
“वलय” परत अमूर्ततेला पोहोचवते, भिडते. पण त्याला स्पर्श करता येत नाही. गुणांचे दिव्यत्व व त्याचे प्रकाशमान आणि प्रकाशदायी अस्तित्व महत्त्वाचे.. निर्गुणाची ही भक्ती म्हणजे सामान्य भक्तीची पुढील पायरी समजली जाते. त्यामुळे लगडून आलेल्या मानव्याशी कवयित्रीचे निर्ममभाव तदाकार होतात. “लगडून “मधे “लगटून” शब्दाचा भाव जाणवतो. जवळ असणे, भरभरून येणे असा भावार्थ. तसेच संख्येतील अधिकाचे प्रमाण अपेक्षित आहे. कवयित्रीच्या मनात भावना भरभरून दाटून येतात. या भावना मानव्य अर्थात मानव, मानवी रुपाशी, जीवनाशी संबंध जोडतात. एकूणच धर्म, संस्कृती, संगीत, इतिहास, तत्त्वज्ञान, कला, संस्कृती या सर्वांगीण व सर्वंकष बाबींविषयी, त्यातील सत्याशी तदाकार पावतात, एकरूप होतात, समरस होतात. त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या स्व-रूपासम भाव मनात निर्माण होतो. उदाहरणार्थ तदाकार ब्रह्म.. बहरुन आलेल्या या भावना निर्मम आहेत. निर्मम या शब्दातून माया, ममता, प्रेम व आसक्ती नसणारा तसेच अहंकार विरहित भाव जाणवून दिला आहे. अर्थातच मानवी जीवनाशी संबंधित असलेले मोह माया हे विचार बाजूला होतात.
मूर्ती पाहताना शिल्पीच मोहवतो अधिक मला!
छिन्नी मारताना ठिबकलेल्या –
त्याच्या घामाचा गंधच भुरळ घालतो…
मनात विचारांचे आवर्तन तसेच त्यातील परिवर्तन घडत असताना, अनुभवत असताना त्याविषयीचे उदाहरण कवयित्रीने दिले आहे. मूर्ती पाहताना ती घडवणारा शिल्पीच तिला अधिक भावतो, मोहवितो. याचे प्रमुख कारण तो त्या मूर्तीचा निर्माता, जनक आहे. तो त्याच्या कल्पनेने, कलेने, कष्टाने मूर्तीमध्ये सजीवता आणि भाव ओतण्याचा प्रयत्न करतो. छिन्नी मारताना त्याने घेतलेल्या श्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ते कष्ट करत असताना ठिबकलेल्या घामाचा गंध तिला भुरळ घालतो. अर्थात केवळ दैववादी असण्यापेक्षा कर्मयोगाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे हे कळते. “ठिबकणे” या शब्दातून एखादी क्रिया हळूहळू घडणे हा भाव, ही भावना व्यक्त होते. कर्मयोग आचरताना हा विचार मनात असावा. निरंतर कर्म करत राहावे असा दृष्टिकोन लक्षात येतो. अशा कर्मयोगातून मिळालेला, लाभलेला समाधानाचा, कीर्तीचा गंध हा आयुष्यात जास्त महत्त्वाचा आहे हे जाणवून दिले आहे. कवयित्रीची कर्मयोगावरील ही निष्ठा मनाला स्पर्शून जाते व आपल्यालाही विचार करायला लावते.
तू विश्व निर्माण केले असले तरी –
तुला पुन्हा मानवानेच चित्रांकित केले…!
वर्तुळाच्या ह्या अंत्यबिंदूपाशी
काही क्षण तरी मी स्थिरचित्त होते…
त्या अज्ञात शक्तीने जरी विश्व निर्माण केलेले असले तरी त्याला पुन्हा चित्रांकित करण्याचे काम मानवानेच केले आहे. त्याला दृश्य स्वरूप देऊन चित्रमय रूप पुन्हा मानवानेच दिले आहे. त्यामुळे ज्या मानवाची निर्मिती त्या अज्ञात निर्मात्याने केली त्याचे अदृश्य स्वरूप दृश्य रुपात
निर्माण करण्याचे काम त्यानेच निर्माण केलेला माणूस करतो. अशा पद्धतीने हे वर्तुळ पूर्ण होताना त्याच्या अंत्यबिंदूपाशी असे कवयित्रीचे बावरे, गोंधळलेले मन काही क्षण का होईना स्थिरचित्त होते. या सर्व अनुभूतीतून ती तिच्यापुरता निष्कर्ष काढते. जणू तिला या सर्व वैश्विक पसाऱ्याचा खराखुरा अर्थ समजला आहे. यातील गोष्टींविषयीची अनाकलनीयता, गहनता क्षणभर का होईना बाजूला सरली आहे, त्यातली दुर्बोधता दूर झाली आहे. अर्थात कवयित्री हे स्पष्टपणे मान्य करते की ही अवस्था, भावावस्था केवळ क्षणभरच टिकते आणि पुन्हा पुन्हा मानवी मन सगुण रूपाकडे धाव घेते. तिला झालेला हा भावनिक साक्षात्कार तात्पुरता असतो व परत व्यावहारिक गोष्टींकडे तिचे मन ओढ घेते व त्यात गुंतते.
म्हणूनच तू आणि तुला सगुण करणारा
माणूस,
ह्या ‘दोन्ही निर्मात्यांना’
मी निःशब्द नमन करते…
विवेकी मनाने केलेला वैचारिक ऊहापोह तिला एका ठोस निष्कर्षाप्रती घेऊन जातो. आणि म्हणून ती त्या अज्ञात निर्मात्याला आणि त्याच्या निर्गुण निराकार रूपाला सगुणरूप देणारा माणूस… अशा या दोन्ही निर्मात्यांना ती नि: शब्द नमन करते. दोघां प्रतीची तिची भावना महत्त्वाची आहे. नि:शब्द म्हणताना तिच्या जवळील शब्दसंपदा ही अनुभूती वर्णन करण्याकरता अपुरी पडते आहे हे ती प्रामाणिकपणे कबूल करते. ही भावना केवळ हृदयातून जाणवण्याचीच आहे हे लक्षात येते आणि सरते शेवटी कर्मयोगावरील श्रद्धा ठेवून जगणे आणि अज्ञात निर्मात्याकडे त्याच श्रद्धेने पाहणे व त्याप्रती विनीत असणे ही भावना वाचकाच्या मनातही जागी होते. निर्गुण व सगुण रूपाप्रती नतमस्तक होणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.
तसं पाहिलं तर आयुष्यात क्षणोक्षणी अज्ञात शक्ती विषयीची भावना मनात येत असते. त्याचवेळी बुद्धीच्या जोरावर आपण सर्व काही करू शकतो ही मानवाच्या मनात असलेली भावना किती फोल आहे हे लक्षात येते. कुठलीतरी अज्ञात शक्ती आहे हे मानावे असा विचार प्रबळ होतो. पण अशा वेळी “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” अशी हतबलतेची, विवशतेची आंधळी श्रद्धा उपयोगाची नाही. प्रयत्नांची जोड देत कर्म करत राहणे हेच मानवी जीवनाचे सार आहे. अतिशय सुयोग्य, अर्थपूर्ण, अर्थवाही शब्दांतून कवयित्रीने ही सार्वत्रिक भावना कवितेत मांडली आहे. विचार मांडताना योजलेल्या शब्दांमधील, शब्दांतील अर्थ कवितेतील आशयाला पुष्टी देतो. एक सुंदर वैचारिक, व्यावहारिक व प्रामाणिक अनुभवाचा आनंद देणारी ही कविता…
☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
काव्यानंद
सांज ये गोकुळी सावळी सावळी
जेंव्हा दिवस संपून रात्र होण्यास सुरवात होणार असते, त्या वेळी म्हणजेच संध्याकाळी वातावरणात एक गूढता निर्माण होते. उन्हे कलत असतानाच आकाशात रंगीबेरंगी रंगाची उधळण होत असते आणि अशा वेळी अंधारून यायला सुरवात होते… दिवसाच्या प्रकाशात जेंव्हा रात्रीचा अंध:कार मिसळला जात असतो, तेंव्हा निर्माण होणारा सावळा रंग कवी सुधीर मोघे यांना ही मोहवून गेला आणि सांज ये गोकुळी.. सावळी सावळी! .. या सुंदर गाण्यांचे नादमय शब्द त्यांच्या लेखणीतून प्रसवले.
एकच शब्द जेंव्हा दोनदा कवितेत वापरला जातो, तेंव्हा होणारा नाद हा कानाला सुखावतो. या गाण्यात ही सावळी सावळी… या पुन्हा पुन्हा येणार्या शब्दांनी जो नाद निर्माण केला आहे, तो नाद आशा ताई यांनी आपल्या आवाजात इतक्या अप्रतिम पणे सादर केला आहे की, हे गाणे ऐकताना आपण अगदी नकळत या गाण्यावर डोलत राहतो. आणि या गाण्यातील शब्दांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर अक्षरश: उभे राहते. संगीताच्या सुरांचे बादशाह श्रीधर फडके यांनी पूर्वा कल्याण रागात या गीताला आशा ताई यांचा आवाज देताना गाण्याला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. आशा ताई यांनी सुरवातीचा जो आलाप घेतला आहे, त्या आलापातच त्यांनी संपूर्ण गाणे जिंकले आहे. हे गाणे “ वजीर ” या चित्रपटामध्ये अश्विनी भावे या अभिनेत्रीवर चित्रीत केले गेले आहे.
सांज ये गोकुळी
सावळी सावळी
सांवळ्याची जणू साउली! ..
या कडव्यात गीतकार सुधीर मोघे यांना संध्याकाळच्या वातावरणात पसरणारी संध्याछाया ही जणू काही सावळ्या कृष्णाचीच सावली भासते! … किती सुंदर उपमा! .. त्या सावळ्या कृष्णाची सावळी छाया.. या सावळ्या वातावरणात अवघे वातावरण हे कृष्णमय होऊन गेले आहे आणि कृष्णाच्या गायी या संध्यासमयी गोधुळ उधळवत निघाल्या आहेत.. ( गायी जेंव्हा संध्याकाळाच्या वेळेस आपल्या घरी जायला निघतात, तेंव्हा त्यांच्या खुरांनी जी धूळ उडते, तिला गोधुळ म्हणतात ) त्या उडणार्या गोधुळी मुळे आधीच सावळ्या झालेल्या वातावरणात पायवाटा ही गोधुळीमय झाल्या.. या रंगाला कवी सुधीर मोघे श्यामरंग असे नाव देत पुढे लिहितात…
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यांसवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी…
गोधुळ उडवत गाई निघाल्या आणि त्यांच्या सोबत पाखरांचे थवे ही आपल्या घरट्याकडे परतू लागले आहेत… अशा सावळ्या संध्याकाळच्या रंगात देवळात वाजणार्या घंटेचा नाद ऐकू येतो आणि सुंदर असे हे वर्णन या गीतात ऐकताना आपल्या डोळ्यासमोर सावळ्या श्रीकृष्णाची हातात मुरली धरलेली सावळी छबी उभी राहते! ..
वातावरणात भरून राहिलेल्या या सावळ्या रंगात दूर दिसणार्या उंचच उंच अशा पर्वतांच्या टोकांवर सावळा रंग हा असा झाकोळला गेलेला आहे की, ती पर्वतांची रांग जणू काही काजळाची रेघ दिसत आहे आणि वातावरणातल्या सावळ्या रंगामुळे समोर असलेल्या डोहात पडलेले पांढरेशुभ्र चांदणे ही सावळे होऊन गेले आहे. आणि हे सर्व कवी आपल्या शब्दांत साकारताना म्हणतात….
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली! ….
कवी सुधीर मोघे यांच्या शब्दांतली गूढता इथे जाणवते. सावळ्या रंगात रंगून जाताना अवघे विश्व सावळे म्हणजे कृष्णमय होऊन गेले आहे ही त्यांची कल्पना कृष्णप्रेमाची ओढ दर्शविते.
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा..
मंद वार्यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी…
सांजेच्या सावळ्या रंगात आता अंधाराला पान्हा फुटत आहे, म्हणजेच आता अंधाराचे साम्राज्य वाढत चालले आहे. आणि सावळ्या रंगाच्या श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगात अवघे विश्व रंगून ते ही कान्हामय होऊन गेले आहे… संध्याकाळी सुटलेला हा मंद गार वारा हलकेच सुटला आहे आणि झाडापानातून वाहणार्या वार्याचे सूर हे सावळ्या श्रीकृष्णाच्या सावळ्या साउलीच्या वातावरणात त्या सावळ्या श्रीकृष्णाच्याच बासुरीतूनच वहात येताना अमृताच्या ओंजळीत सामावून जात आहेत, अशी सुंदर कल्पना या गीताच्या ओळींत सुरमय केली आहे.
स्वप्नं, महत्त्वाकांक्षा, ध्येयंं, नव्या वाटा, नवी क्षितिजे यांची आस बाळगणं त्यासाठी झोकून देणं या सर्वांसाठी लागते चिकाटी, जिद्द मनोबल. या दिशेचा मार्ग सरळ, सोपा नसतो. खाचखळग्यांचा, काट्याकुट्यांचा असतो. स्वप्नपूर्तीच्या मागे लागणाऱ्यांना भवतालचे अनेक घटक सतत मागे खेचत असतात, उणीवांवर बोट ठेवून मानसिक खच्चीकरण करत असतात, या सर्वांवर मात करून अंतप्रेरणेने चालत राहणं, ध्येयपूर्तीचा टप्पा गाठणं यासाठी प्रचंड मनोधैर्य लागतं.
A WILL WILL FIND A WAY
किंवा
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे एक ना एक दिवस यश दारात उभे राहते आणि त्या वेळेचा जो आनंद असतो त्याला सीमा नसते. अनेक घटिकां-पळांच्या तपस्येचं ते फळ असतं आणि त्या क्षणी “आपण हे करू शकलो, हे मिळवू शकलो” ही भावना कृतार्थ करते. जगणं सार्थ झालं असं समाधान लाभतं. याचसाठी केला होता अट्टाहास हा भाव उत्पन्न होतो.
याच अर्थाचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे मी कृतार्थ जाहले हे सुंदर गीत! या गीताचा आपण आज रसास्वाद घेऊया.
☆ मी कृतार्थ जाहले ☆
☆
स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥ध्रु॥
*
चिमणीला पदरातिल गरुडपंख लाभले
उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले
देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ॥१
*
दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती
साथ लाभता मना निग्रहा नसे भीती
संकल्परूप माझे या वांच्छनेस लाभले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।२
*
नाही अहंकार कधी दंभ ना स्पर्शले
सेवेतुनि जगताच्या कर्मफला जाणिले
अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले
यशोमन्दिरात आज मी कृतार्थ जाहले।३
☆
कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)
हे एक यशोगीत आहे. एक आनंदगीत आहे. साफल्याची भावना व्यक्त करणारे हे सुरेख शब्दातले गीत आहे. पूर्ततेचा आनंद, हर्ष आणि त्यानंतर येणारा कृतार्थतेचा भाव हे गीत वाचताना जाणवतो. एका यशप्राप्त कन्येचे मनोगत या गीतात व्यक्त केलेले आहे.
स्वप्न माझ्या मनात मूर्त साकारले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले।ध्रु।
ध्रुवपदात कवितेतल्या आनंदमयी भावना जाणवतात. आनंद कसला तर स्वप्नपूर्तीचा. “अजी मी ब्रह्म पाहिले” सारखाच, त्याच तोडीचा आनंद गीतातल्या या कन्येला झालेला आहे. ती म्हणते,
“आज माझं कित्येक वर्षं मनात बाळगलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे आणि या यशाच्या शिखरावर मला कृतार्थ झाल्याचे समाधान लाभत आहे. ”
ध्रुवपदाच्या या ओळीतला यशोमंदिर हा शब्द खूपच लक्षवेधी आहे. यशाचे मंदिर किंवा यशाचे द्वार म्हणजे जणू काही मंदिरच. यशाला दिलेली ही मंदिराची उपमा फारच पवित्र, मंगलमय आणि सूचक वाटते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या यशाची ती ग्वाही देते.
चिमणीला पदरातिल गरुड पंख लाभले
उंच घेऊनी भरारी राज्य नभी थाटले
देवी साम्राज्याची भाग्य मला लाभले
यशो मंदिरात आज मी कृतार्थ जाहले. १
इतके दिवस मी लहान होते. पंखात माझ्या ताकद नव्हती. उडण्याचे सामर्थ्य नव्हते. म्हणून ते मिटलेल्या अवस्थेत होते पण माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला की जणू काही उंच गगनात सहजपणे भरारी मारणाऱ्या गरुडाचे पंखच मला लाभले आणि हे जग मी माझ्या मुठीत बंदिस्त करू शकले. जगाला माझं अस्तित्व मान्य करावंच लागलं. कर ले दुनिया मुट्टी मे हे माझं स्वप्न जणू काही पूर्ण झालं. माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरेत मला आता आदर, अभिमान आणि आश्वासकता दिसत आहे. हेच मला हवं होतं आणि ते मी मिळवलं म्हणून माझा जन्म सार्थ झाला असे आता वाटत आहे. ”
हे संपूर्ण कडवं रूपकात्मक आहे. गरुडपंख लाभले या शब्दरचनेत आत्मविश्वास, आत्मनिर्भरता याचा मनोमन उगम झाल्याचा अर्थ अभिप्रेत आहे. कवीने योजलेल्या या रूपकात्मक शब्दातून जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवण्याचा अभिमान जाणवतो. “गुलामगिरीच्या शंखला तोडून उच्च स्थानावरचे माझे स्वतःचे असे एक राज्य निर्माण करण्यात मला यश लाभले आहे” हा विश्वास जाणवतो.
देवी साम्राज्याची या शब्दातून तिने रोवलेल्या विजयपताकेचा विलक्षण अभिमान आणि भाग्य ती उपभोगीत आहे हे दिसतं. आजपर्यंत जिला पायाची दासी मानलं जात होतं तिला देवीचं स्थान मिळालं. एका सक्षम सबल रूपात ती नव्याने अवतरली.
दुर्गम गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती
साथ लाभता मना निग्रहा नसे भीती
संकल्प रूप माझीया वांच्छनेस लाभले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले २
“यश तर पदरी आलंच पण मागे वळून पाहताना जाणवत आहे की या यशाचा मार्ग सोपा नव्हता. अवघड होता. सरळ नव्हता! वळणावळणाचा होता. एखाद्या असाध्य डोंगराचे शिखर गाठण्यासारखेच होते ते. अत्यंत साहसाचा हा मार्ग होता पण तरीही अंतर्मनाची कुठेतरी विलक्षण साथ होती, मनात जिद्द होती, चिकाटी होती, एक दुर्दम्य आशावाद आणि निग्रहही होता ज्यामुळे मनात दाटलेल्या भीतीवर मी मात करू शकले, निर्भय बनले. स्वशक्तीचा, स्वसामर्थ्याचा वेध घेऊ शकले आणि त्याच बळावर माझ्या या संकल्पांना, इच्छेला एक निश्चित असा आकार मिळू शकला. खरोखरच आज मी धन्य झाले.”
गिरीशिखराप्रति ही शब्दयोजना इथे अगदी चपखल आहे. कुठलाही डोंगर ओलांडणं हे अत्यंत साहसाचं आणि आव्हानात्मक असतं. उरी बाळगलेली स्वप्नं सत्यात उतरवणं हे येर्या गबाळ्याचं कामच नव्हे तर त्यासाठी गिरीशिखरावर पोहोचण्याइतकं सामर्थ्य हवं. . हे अधोरेखित करणारी ही शब्दयोजना वाचकाला नक्कीच भावते. या ओळींमध्ये वीरश्री जाणवते. वीर रसाचा इथे भावाविष्कार झालेला अनुभवास येतो.
गिरीशिखराप्रति मार्ग कठीण हो किती
साथ लाभता मना निग्रह नसे भीती
यात अनुप्रास आणि यमक हे दोन्ही अलंकार अतिशय सुंदरतेने गुंफले आहेत.
नाही अहंकार कधी दंभ मना स्पर्शले
सेवेतूनी जगताच्या कर्मफला जाणिले
अर्पण जीवन सारे विश्वपदी वोपिले
यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ३
“मला जे हवं होतं ते मिळवताना माझी मानसिकता मात्र संतुलित होती. मी माझ्या मनाचा तोल कधीही ढळू दिला नाही. माझ्या ध्येयमार्गावरून जाताना मी कुणालाही तुच्छ लेखले नाही. मी कुणीतरी इतरांपेक्षा वेगळी आहे असा अहंकार बाळगला नाही. कुठल्याही ढोंगीपणाचा बुरखा पांघरला नाही उलट एका सेवाभावाने मी जगताच्या जीवनातला अज्ञानांधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. मी- ची ओळख पटवताना मी समाजाच्या जीवनप्रवाहाला कधीही अव्हेरलं नाही. त्यातूनच ठेचकाळत, शिकत, शिकवत, समजावत, पटवत शांततेच्या, अहिंसक मार्गाने मी माझ्या कष्टाचे फळ मिळवले आणि माझे स्वप्न पूर्ण केले. स्वप्नपूर्ती नंतरही माझे पाय सदैव जमिनीवरच ठेवले. यशाने मी हुरळून गेले नाही. भले मी मनस्वी आनंदले असेन पण त्याची नशा किंवा धुंदी मी माझ्या मनावर येऊ दिली नाही. अखेर कोsहं या भावनेने मी एक निमित्तमात्र असे समजून समर्पित भावानेच या यशाकडे, तृप्त मनाने आणि प्रातिनिधिक स्वरूपात पाहते.”
या गीतातला हा शेवटचा चरण अतिशय अर्थपूर्ण आहे, संदेशात्मक आहे. आनंद होणं ही सर्वसाधारण सामान्य भावना आहे. ती एक सहज अशी अभिव्यक्ती आहे पण त्याचा अवास्तव आकार न होऊ देणे हे सामान्यातले असामान्यत्व आहे आणि याच असामान्यत्वाचा पाठपुरावा कवीने या शेवटच्या चरणात जाता जाता सहज केला आहे.
वोपिले हा शब्द ज्ञानेश्वरी ची आठवण करून देतो आणि त्या शब्दातला गोडवा सांभाळून या गीतातल्या ओळीत तो अगदी बेमालूमपणे सहज गुंफलेला जाणवतो.
वोपिले म्हणजे अर्पिले, देऊन टाकले या अर्थाने इथे तो योजला असावा.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याच अर्थाचा बोध करणाऱ्या या शेवटच्या काव्यपंक्ती आहेत.
विश्वपदी वोपिले हा खूप विस्तारित, उदात्त अर्थांचा शब्दसमूह आहे. “ जिथून मिळालं तिथेच अर्पिलं” हा भाव तिथे आहे. “माझं यश हे आता माझ्यापुरतं मर्यादित नाही तर या यशामुळे जे सामर्थ्य, जी ताकद मला लाभली आहे त्याचा सुयोग्य उपयोग या विश्वासाठीच मी करेन. ” हा व्यापक निर्धार त्यात जाणवतो.
विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो।।
असा एक अव्यक्त दडलेला अर्थ या गीतात व्यापून राहिलेला आहे.
जे गीत एका सामान्य कन्येच्या यशोनंदाने सुरू होते ते गीत सहजपणे एका विश्वरूपी संदेशात रूपांतरित होते. केवळ १४ ओळीत डॉक्टर श्रोत्रींनी साधलेला हा महान अर्थ वाचकाला एका वेगळ्याच विचारप्रवाहात घेऊन जातो. धन्य तो कवी! धन्य त्याची शब्दलीला!
या संपूर्ण गीताची यशोमंदिरात आज मी कृतार्थ जाहले ही एक टॅगलाईन आहे आणि या टॅगलाईनला, या ओळीला साजेसा प्रत्येक चरणातला तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द …लाभले— वोपिले हे अतिशय लयबद्ध वाटतात. .
यश कोणते, यश कसले याचा स्पष्ट अथवा विशिष्ट असा उल्लेख या गीतात नाही. यश कोणतेही असू शकते. आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अगदी कोणतेही …. पण या गीतातला एक अंतर्गत भाव जाणवतो तो हा की कुठल्याही स्त्रीचे यश, तिची स्वप्नपूर्ती आणि पुरुषाचे यश– सामाजिक फुटपट्टीने मोजले तर त्यात महत् अंतर असते. पुरुषांपेक्षा एखाद्या स्त्रीला तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो संघर्ष करावा लागतो तो अधिक आव्हानात्मक आणि अवघड असतो. कुठेतरी कवीने या स्त्री संघर्षाचा सन्मान आणि दखल घेतल्यामुळे एका स्त्रीच्या भूमिकेतून मला त्याचे मूल्य अधिक वाटते हे निःसंशय …
☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
#विशेष कविता रसग्रहण उपक्रम#
…आज मी तात्यांची म्हणजेच कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा शिरवाडकरांची, आगगाडी व जमीन ही कवितेच रसग्रहण करत आहे.
सन 1942 साली पहिला प्रसिध्द झालेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल 1938 नि स्थल पुणे अस दिलेल आहेत.
तात्यांनी अहि-नकुल,हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम, शेवटचे पान ,आव्हान,कुतूहल, भक्तिभाव, बालकवी ,आणि आगगाडी व जमीन या सारख्या कविता लिहिल्या…त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकरांनी अर्ध्यदान स्वरुपात प्रस्तावाना लिहली आहे .ते म्हणतात त्यांची प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही,ती चमचम करणारी बिजली आहे,आपली कविता ही मुरली नाही,ती तरवार आहे याची योग्य जाणीव त्यांना आहे.या तरवारीला कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मुठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे,त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागिणीच होईल. आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे…
☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’ ☆
☆
नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन
पायाशी लोळत विनवी नमून- 2
*
धावसी मजेत वेगात वरून
आणिक खाली मी चालले चुरुन !
*
छातीत पाडसी कितीक खिंडारे
कितीक ढाळसी वरून निखारे ! 2
*
नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू बेहोष होऊन.
*
ढगात धुराचा फवारा सोडून
गर्जत गाडी ती बोलली माजुन- 2
*
दुर्बळ ! अशीच खुशाल ओरड
जगावे जगात कशाला भेकड !
*
पोलादी टाचा या छातीत रोवून
अशीच चेंद्त धावेन ! धावेन ! 2
*
चला रे चक्रानों,फिरत गरारा
गर्जत पुकारा आपुला दरारा !
*
शीळ अन कर्कश गर्वात फुंकून
पोटात जळते इंधन घालून ! 2
*
शिरली घाटात अफाट वेगात
मैलांचे अंतर घोटात गिळीत !
*
उद्दाम गाडीचे ऐकून वचन
क्रोधात इकडे थरारे जमीन ! 2
*
“दुर्बळ भेकड !”त्वेषाने पुकारी
घुमले पहाड घुमल्या कपारी !
*
हवेत पेटला सूडाचा धुमारा
कोसळे दरीत पुलाचा डोलारा ! 2
*
उठला क्षणार्ध भयाण आक्रोश
हादरे जंगल कापले आकाश
*
उलटी पालटी होऊन गाडी ती
हजार शकले पडली खालती ! 2
☆
या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरल सरल दोन भाग पडलेले दिसतात. पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसतेय.. तू अशी धाड धाड दाण दाण करत तूही पोलादी चाक माझ्या अंगावरुन नेऊ नकोस त्याने माझ्या मातीचा ,आजूबाजूच्या परिसरसराची धूळधाण होते.शिवाय तू अशी जोशात जातेस तेव्हा ते जळते लालभडक निखार्यानीं अंग अंग पोळून निघते. तूला जायाला मज्जाव करत नाही पण तुझ्याइतकी सशक्त नाही.तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर.माझं अस्तित्व टिकल तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे. या ठिकाणी जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतींनिधीचे प्रतीक दाखवले आहे. मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकांचा व्यवसाय अव्यहात टिकेल अन्यथा…
तर उत्तरार्धात आगगाडी जमिनीच्या विणविणीची अवहेलना करते. दुर्बल भेकड म्हणून तिचा अवमान करते.पायाची वाहाण पायीच बरी असते. आपल्या उद्दाम, सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते. प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुत्कारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते. मालक वर्ग कामगार वर्गाची एनकेण प्रकारे पिळवणूक करत राहतो. कामगरांच्या सुख्दुखाशी त्याच काहीएक देण घेण नसत.
आणि शेवटी अन्यायाने,अपमानाने,कष्टाने त्रस्त झालेली जमीन सूडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खींडितला पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुरमीत असलेलली पण बेसावध आगागडीचा अपघात होतो.मोठी जीविहहाणी बरोबर साधनसंपत्तीचा सर्वनाश होतो. कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप,दंगल,क्रांतीचा,बंड करून उठतो आणि मालकाला दे धरणीमाय करून सोडतो. भांडवलशाही विरूध्द समाजवादाची लढाईच चित्रचं या कवितेत दाखवलेले दिसते.
कुसुमाग्रज हे मानवतेचे कवि आहेत.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही ,तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.विषमता,पिळवणूक,गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजनसमाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरुपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.
आगगाडी व जमीन या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यांच्यामध्ये जणूकाही शर्यतच लागली आहे !दलितवर्गावर होणार्या जुलूमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे.क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानव जात सुखी होईल हा भोळा आशावाद दुर्बल ठरतो आणि क्रांतीचे निशाण हातात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. ‘हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम,बंदी आणि आगगाडी व जमीन या तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला आहे.त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या ध्यासाचे चित्रण करते, अश्याप्रकारच्या सर्व कवितांतून कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकत आहेत असेच मला वाटत राहते…
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र… कवी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ☆
जयोस्तुते
*
जयोस्तुते श्री महन्मंगले शिवाs स्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे
*
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तू ची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी
*
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्य तू ची
स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट होशी
*
मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते
*
हे अधम रक्त रंजिते सुजन पुजिते
श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते
*
तुझं साठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरत भूमीला दृढालिंगना कधी देशील वरदे
*
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीट आला
होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला
सुधा धवल जानवी स्त्रोत तू का गे त्यजिला
स्वतंत्रते भगवती ss
या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्परोज घे ताजे वेणीला
*
ही सकल संयुता, अमुची माता, भारती असता
का तुवा ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्याची दासी झाली
जीव तळमळे, का तू त्यजिले उत्तर याचे दे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम् वंदे
☆
– स्वा. विनायक दामोदर सावरकर.
☆ स्वतंत्रतेचे स्तोत्र ☆
स्वा. सावरकरांच्या अनेक उत्कृष्ट कवितांमधूनही ही कविता मला अतिशयच आवडते. मोराचा पिसारा ज्याप्रमाणे सुंदर रंग लेवून मोराचा बाज खुलवितो, त्याचप्रमाणे आशयसौंदर्य, भाषासौंदर्य व काव्यसौंदर्याने मराठी भाषेचा बाज खुलविणारी तसेच छंदबद्ध, वृत्तबद्ध व लयबद्ध असलेली ही कविता मला फारच आवडते.
स्वा. सावरकरांचे विचारधन म्हणजे शुद्ध, निखळ सौंदर्य! त्याला आणखी आशयघनता देऊन आणि विविध अलंकारांनी नटवून त्यांनी ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे. देशप्रेमाची तीव्र भावना व उपजत बुद्धिमत्ता यामुळेच त्यांना हे शक्य झाले आहे.
आपण काव्यार्थाचा आस्वाद घेऊ या. कवितेकरता घेतलेली मध्यवर्ती कल्पना अतिशय सुंदर रितीने त्यांनी आपल्यापुढे मांडली आहे.
आपण आपल्या संस्कृतीत जलदेवता, अग्निदेव, वरुणदेव मानले आहेत. त्यांचा कोप होऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करत असतो. हीच कल्पना डोळ्यापुढे ठेऊन, स्वतंत्रतेलाच देवी मानून, तिने पारतंत्र्यातून भारतमातेला मुक्त करावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे स्तोत्र लिहिले आहे.
आपण बघतोच की घरात कर्त्या पुरुषाची हुकूमशाही असली, वागण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसले तर सगळ्यांचाच जीव गुदमरतो. परकीय सत्तेच्या अंमलाखाली पूर्ण देशच त्याकाळी गुदमरला होता. त्यातून सुटकेसाठीच्या इच्छेच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत.
” हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले”
हेच त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट आहे.
अशाच देशभक्तिच्या उदात्त आशयसौंदर्यानी युक्त अशी ही कविता आहे. शब्दसौंदर्य व इतरही अलंकारांनी नटलेल्या कवितेचे वर्णन करायला खरं म्हणजे माझ्यासारखीचे शब्दच अपुरे पडतील.
जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य खुलायला स्वातंत्र्य अत्यावश्यक असते, हे किती सुंदर कल्पना व शब्दांचा मेळ घालून या कवितेत त्यांनी मांडले आहे बघा…..
स्वातंत्र्यामधे काय सामावलेले नसते?म्हणूनच स्वातंत्र्य-देवीला आळवतांना ते म्हणतात….
“राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती!श्रीमती राज्ञी तू त्यांची”
हे स्वातंत्र्यदेवते!आमच्या राष्ट्राचे मूर्तीमंत चैतन्य तूच आहेस. पारतंत्र्यात असल्याने, तुझी अनुपस्थिती असल्याने साहाजिकच ते चैतन्यच आज हरवले आहे. तसेच नीती आणि संपत्ती यांची देखील तू राणी आहेस. कारण नीतिमत्ता काय?किंवा संपत्ती काय ? जो आपल्याला पारतंत्र्यात ठेवतो त्याच्या मर्जीवरच अवलंबून असते.
स्वातंत्र्यदेवते! तू कशी आहेस? तर…
“परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी”
परवशतेचा काळ म्हणजे एक अंधःकारमय पर्व, या पर्वात मिळालेले थोडीशीही स्वातंत्र्याची आशा म्हणजे पर्वणीच!ही आशा म्हणजेच जणू लखलखणारी चांदणीच!जी आपल्याला आकर्षित करू शकते. योग्य प्रतिमान वापरून ‘चमचम’ ‘लखलखशी’ सारख्या शब्दांनी काव्याचे माधुर्य वाढतेच व ते वाचणे म्हणजे आपल्यालाही आनंदाची पर्वणीच!
प्रत्येकच कडव्यात मांडलेल्या एकापेक्षा एक सुंदर कल्पना म्हणजे शब्द आणि विचार यांचा अपूर्व संगमच! उपजत बुद्धिमत्ता व सुंदर कल्पना यांचे दुग्ध-शर्करा मिश्रणच!हे काव्यरसाचे मिश्रणच रसपाना साठी आपल्या समोर ठेवले त्यांनी. रसपान करतांना त्यांच्या आर्त शब्दांचे घोटही आपल्या मनाला भिडतात.
पूढे ते लिहितात…
“गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली”
हे कडवे वाचतांना तर एक अपूर्व शब्दचित्रच आपल्यापुढे डोलते. गालावरच्या लालिमायुक्त सौंदर्याचे
फूल केव्हा विलसेल? गालावरच्या सुंदर फुलाची लाली मुक्त विहार करणार्या व्यक्तिच्या गालावरच विलसू शकेल. गालावरचे फूल किंवा फुलांचेच गाल ही एकमेकांवरच्या प्रत्यारोपाची भ्रांतिमान कल्पना एक अपूर्व शब्दमाधुर्य निर्माण करते. ते फक्त रसिकांनाच जाणवू शकते, व्यक्त करणे कठीणच!
पुढे देवीला किती अर्थपूर्ण विशेषणे लावतात बघा….
“तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूची”
हे स्वातंत्र्यदेवते! सूर्याचे तेज तथा सागराचे गांभीर्यही तूच आहेस. अतिशय तेजस्वी असूनही ग्रहण लागल्यावर तो तेजोहिनच होतो. ग्रहण सुटल्यावरच त्याला परत पूर्वीचे तेज प्राप्त होते. सागराच्या गंभीरतेचा अर्थ तरी काय आहे?उथळ किनार्यावर, आपल्या मनातली खळबळ, लाटांच्या स्वरुपात धडकवण्याचे स्वातंत्र्य घेऊनच आतल्या खोल समुद्राला गंभीरतेचे सौंदर्य प्राप्त होते नं!विचारस्वातंत्र्य नसतांना मांडलेल्या तत्त्वज्ञानाला काय अर्थ आहे?ते ही परतंत्रच असते. आणिबाणीत स्वराज्यात देखील आपण ते अनुभले आहेच.
त्यांची स्वातंत्र्याबद्दलची ओढच इतकी जबरदस्त होती की त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या कल्पना सहजस्फूर्तच वाटतात. भारतीय तत्त्वज्ञानातील कल्पनांचा आधार घेऊन पुढे ते म्हणतात….
“मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती”
मोक्ष आणि मुक्ति तरी काय?तुझीच म्हणजेच स्वातंत्र्याचीच रूपे! इतकेच नाही तर या जगात जे काही उत्तम! उदात्त! आणि नितांत सुंदर आहे त्याला ‘तुझा’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा’ परीसस्पर्श असतोच! कारण राजकीय दडपशाही असेल तर कुठलाही योग्य विचार, तत्त्वज्ञान मांडण्याचे स्वातंत्र्यच कुठे असते?पृथ्वी गोल आहे आहे हे सिद्ध करू शकत असला तरी शास्त्रज्ञाला ते मांडायचा अधिकार राजसत्तेच्याच मर्जीवर!
म्हणूनच दुर्गामाता, कालीमातेप्रमाणेच अधम अधम लोकांच्या रक्ताने रंगलेल्या व चांगल्या लोकांचे पूजन करणार्या देवतेला ते सांगतात….
“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण चराचर शरण”
स्वातंत्र्यासाठी जगण्याची इच्छा असणारी पूर्ण चराचर सृष्टी तुलाच शरण जाते, तुला मिळवण्याचीच धडपड करत असते. म्हणूनच आम्हा सगळ्या भारतवासीयांतर्फे मी तुला प्रार्थना करतो की आम्हाला अलिंगन द्यायला तू लवकर ये”.
” सकल चराचर शरण चराचर शरण”
अनुप्रासयुक्त ओळी मधून नादमाधुर्याबरोबरच आशयही द्विगुणीत होतो. अलंकाराचे सौंदर्य जपतांना अर्थाची ओढाताण कुठेही होत नाही या काव्यात!आशयासोबत अलंकार रत्नजडीत दागिण्यांप्रमाणे मिरवतात या कवितेत.
यानंतरच्या कडव्यात तर त्यांचा सूर अतिशयच हळवा व लाडिक झाला आहे. ते म्हणतात….
“हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का वीट तुला आला”
प्रत्यक्ष भगवान शंकरालाही कैलास पर्वतावर रहाण्याचा मोह झाला आणि तुला मात्र येथे क्रीडा करायला देखील यावेसे वाटत नाही?
यानंतरची कल्पना बघा किती सुंदर आहे! ते म्हणतात, जान्हवीचा सुधाधवल स्त्रोत अप्सरांना देखील सरसे करण्याला आवडतो. भारतभूमीला ‘सुवर्णभूमी’ म्हटल्या जाते. या सुवर्णभूमीत रहायला काय कमी पडले तुला?हवं तर कोहिनूरचे ताजे पुष्प वेणीत माळायला घे पण इथे वास्तव्याला लवकर ये. पूर्वीप्रमाणेच आमच्यावर प्रेम कर. माझ्या सकलगुणसंपन्न मातेसाठी, तुला प्राप्त करण्यास यश मिळावे म्हणून मी माझ्या शब्दांची आरती करतोय तुझी!
खरंच! या शब्दप्रभूने किती आंतरिक तळमळीने व सुंदर शब्दात आळवणी केली आहे या स्तोत्राद्वारे!
मम्मटाने काव्यप्रकाशात काव्याच्या रसास्वादासाठी अनेक निकष व अलंकारांचे वर्णन केले आहे. स्वा. सावरकरांनी देखील अर्थालंकार व शब्दालंकारांची पखरण करीत, उत्तमोत्तम कल्पना व प्रतीमांच्या आधारे काव्याची एक मनोहर यात्रा या कवितेद्वारे आपल्याला घडवली हे आपण बघितलेच. काव्यात गेयता असेल तरच एखादे सुंदर काव्य संदेशासकट लोकांपुढे सादर होते. मधुकर गोळवलकरांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत लतादिदींनी आपल्या मधुर आवाजात गाऊन अजरामर केले आहे. अर्थातच स्वा. सावरकरांची किर्ती म्हणजे ‘स्वयमेव मृगेंद्रता!
मम्मटानी काव्यप्रकाश मधे म्हटले आहे..
“काव्यं यशसेsर्थकृते, व्यवहारविदे, शिवेतरक्षतये,
सद्यःपरनिवृत्तये, कांतासंमिततयोपदेशयुजे”
काव्य यश, पैसा, कल्याणकारी, वाचल्याबरोबर आनंद देणारे, पत्नी व मित्राप्रमाणे योग्य मार्गदर्शन करणारे असावे.
देशासाठी घरादाराची होळी झालेल्या या देशभक्ताला अर्थप्राप्तीची अभिलाषा कधीच नव्हती.
पारतंत्र्यरूपी अमंगलाचा नाश व्हावा व देशाचे कल्याण व्हावे हेच यातून सूचित होते. सद्यः परिस्थितीत लोकांपुढे कार्याचे उद्दिष्ट काय असावे याचा परिपाठच या स्तोत्राने घालून दिला आहे.
त्यांच्या काव्याचे गाण्यामधून जे सुंदर रुपडे रसिकांपुढे येते ते हे गीत रसिक आपसुकच गुणगुणतात व नंतर त्यांच्याही मनात सावकरांइतकी नसली तरी अंशतः का होईना, देशभक्तिची भावना जागृत होते. त्यातूनच देशाने वेळोवेळी पुकारलेल्या आव्हानांना आपण एकत्र येऊन प्रतिसाद देतो. कानीकपाळी अोरडून सांगितलेल्या भाषणापेक्षा सुंदर काव्यातून निर्माण होणारी जागृती नक्कीच दीर्घकाळ परिणामकारक ठरते.
कुठलाही भाव मनात नसतांना ‘जयोस्तुते’ हे भावपूर्ण गीत कानावर पडते त्यावेळी गाण्यातील एकेक शब्द रसिकांच्याही मनात घर करून रहातो. त्यावेळी उरलेले असते ते गाण्याचे शुद्ध, सात्त्विक स्वरुप! आणि ते आपल्याला आनंदाची वारंवार प्रचिती आणून देत असते.
या काव्यात संस्कृतप्रचुर शब्द असूनही काव्याची मधुरता कुठेही कमी होत नाही. तसेच मला तरी असे वाटते की पहिल्यांदा वाचतांना काव्य थोडे कठीण वाटले तरी पुन्हा वाचतांना काव्य दुर्बोध वाटत नाही. मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेतल्यानंतर अनेक शब्दांचा अर्थ आपल्यापुढे आपोआप उलगडत येतो. कुठलेही कठीण शब्द उगाच मधे आल्यासारखे बोचत नाहीत. उलट हवा तो आशय व्यक्त करणारे व काव्याची गोडी वाढवणारेच वाटतात. ऐकणार्या प्रत्येकाला, तो कुठल्याही प्रकारच्या पारतंत्र्यात असला तरी हे गीत स्वातंत्र्याची ओढ लावल्याशिवाय रहाणार नाही. हेच या काव्याचे मोठे यश आहे असे मला वाटते.
☆ योगी… कवयित्री – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण.. श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
माणसाचा आणि निसर्गाचा काहीही संबंध नाही असे समजणारी माणसे समाजामध्ये आहेत. पण ती माणसे हे विसरुन जातात की माणूस हाच मुळी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. आपला प्रत्येक सण, उत्सव किंबहुना आपली संस्कृतीच निसर्गावर आधारलेली आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे कवी, कवयित्री, चित्रकार यासारख्या कलाकाराला स्वतःच्या आयुष्याकडे पाहतानाही निसर्ग हा आठवतोच! निसर्गातील प्रतीके वापरुन मानवी जीवनाचा अर्थ व्यक्त करणारी अनेक काव्ये, साहित्यकृती आपण वाचल्या आहेत. अशीच एक रुपकात्मक कविता वाचनात आली. ती म्हणजे कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांची ‘ योगी ‘ ही कविता.
सौ राधिका भांडारकर
☆ योगी ☆
☆
मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला आनंद होतो
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळू त्याचा
वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो
मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा…
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ सरते
ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले
विलग पानांचा होतो पाचोळा
वार्यावर उडतो कचरा सोनसळा
वृक्ष होतो बोडका
तरी भासतो योग्यासारखा
गळणार्या पर्णांना निरोप देताना
उभा ताठ, ना खंत ना वेदना
कर्मयोगी निवृत्तनाथ
ऋतुचक्राशी असे बद्ध
एकाकी हा कातरवेळी
संवाद करी पानगळी
हा शिशिर सरेल
पुन्हा वसंत फुलेल
नव्या जन्मी नवी पालवी
हिरवाईने पुन्हा नटेल. .
~ राधिका भांडारकर
‘योगी’ ही एक रुपकात्मक कविता आहे. माणसाचं जगणं समजावून सांगण्यासाठी निसर्गातील वृक्षाचा रुपक म्हणून उपयोग करुन घेतला आहे. कविता जसजशी वाचत जावी तसतसं लक्षात येत की हे सगळं मानवी जीवनाला लागू होतय. सुरुवातीला कवयित्री म्हणते,
“मातीतल्या बीजाला
अंकुर फुटतो
धरणीला आनंद होतो
पावसाचे शिंपण होते
अन् रोप उलगडते
हळुहळू त्याचा
वृक्ष होतो
तो बहरतो, फुलतो, फळतो
आनंदाची सर्वत्र पखरण करतो”
बाळाला जन्म दिल्यावर मातेला होणारा आनंद आणि बीजाला अंकुर फुटल्यावर मातीला होणारा आनंद — मातेला होणारा असो किंवा मातीला होणारा आनंद असो — त्या आनंदाची अनुभूती एकाच प्रतीची नाही का ? सृजनशीलतेचा आनंद अगदी एकसारखाच आहे. पुढे पाऊस पडतो. पाणी मिळत जातं आणि रोप उलगडते. आई तरी याशिवाय वेगळं काय करते ? संगोपनाच्या मेघातून मायेचा वर्षाव होतो आणि मूल मोठं होत जातं, नाही का ? कवितेत पुढे म्हटल्याप्रमाणे रोपाचा जसा वृक्ष होतो तसे त्या बाळाचेही रुपांतर पूर्ण व्यक्तीमध्ये होते. वृक्षाने सर्वांगाने बहरावे त्याप्रमाणे माणूसही त्याच्यावर होणार -या संस्कारांमुळे पूर्ण विकसित होतो. त्याच्या कर्तृत्वाने फुलतो, कर्माची फळे मिळवत जातो आणि आनंदाची, सौख्याची पखरण करतो–एखाद्या वृक्षाप्रमाणेच!
निसर्गाचा जो नियम वृक्षाला लागू, तोच नियम माणसालाही लागू होतो. (कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाहीच). यापुढील काव्यपंक्ती,
“मग आयुष्याचा तो क्षण येतो
पानगळीचा. . .
एक एक पान गळू लागते
फांदीला सोडून धरणीवर उतरते
त्याचवेळी आभाळाची ओढ
सरते. “
या काव्यपंक्ती काय सुचवतात पहा. वृक्षांची पानगळ सुरु होते. पूर्ण बहरलेला वृक्ष एक एक पान गाळू लागतो आणि निष्पर्ण होऊ लागतो. त्याचे वैभव ओसरते. ही पानगळ असते त्या वृक्षाच्या आयुष्यातील उतरणीचा, संकटाचा काळ असतो. माणसाच्या आयुष्यातही संकटे येतात. माणूस काही काळ खचून जातो. वैभवाला, प्रगतीला उतरती कळा लागते. कवयित्रीने पुढे म्हटल्याप्रमाणे ” आभाळाची ओढ सरते “. म्हणजे नवीन काही करण्याची, पुढे जाण्याची, आभाळ कवेत घेण्याची उमेद रहात नाही. त्यापुढील काव्यपंक्ती
“ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले”
या ओळी हेच सांगतात की ज्या मातीतून पाने वर वर आली त्याच मातीत पानगळीच्या निमित्ताने ती पाचोळा होऊन खाली पडत आहेत, वृक्षापासून अलग होत आहेत. म्हणजे जिथे वैभव मिळाले तिथेच ते सोडून देण्याची वेळ येते. बघता बघता वृक्ष बोडका होतो. फक्त शुष्क फांद्या दिसू लागतात. पानगळ होत असताना तो निमुटपणे सहन करत एखाद्या कर्मयोग्यासारखा, खंत, खेदाच्या पलीकडे जाऊन ताठपणे उभा असतो. जी पाने गळून गेली त्याबद्दल दुःख नाही. उलट ऋतूचक्राशी असलेले नाते समजून घेऊन पानझडीचा शिशिर संपण्याची वाट पहात उभा असतो. कारण त्याला माहित असतं, पुढे वसंत येणार आहे. पालवी फुटणार आहे. नवी पाने येणार आहेत. पुन्हा हिरवाईने नटायचे आहे. आभाळाकडे झेप घ्यायची आहे.
मानवी जीवनाचे यापेक्षा वेगळे काय आहे ? संकटांचा ऋतू आला की सुखाची पानगळ सुरु होते. प्रगती थांबली की काय असे वाटू लागते. हे सगळं यश, वैभव इथेच सोडून जावं लागणार की काय ? अशीही भावना होऊ लागते. पण… पण तरीही माणूस डगमगत नाही. कारण त्यालाही जीवनचक्राचे नियम माहित होतात. दुःखाचे वादळ आले तरी त्याला वावटळ समजून अंगावर घेतले पाहिजे. कारण पुढे सुखाचा वसंत येणार आहे याची खात्री असते. हा विश्वास त्याला कुठून मिळतो ? निसर्गातूनच! असा एखादा वृक्ष दिसू लागतो पुनःपुन्हा बहरणारा आणि त्याच्या मनाच्या मातीतही उमेदीचे अंकुर फुटू लागतात. मानवी जीवन आणि निसर्ग यांच हे अतूट नातं कवयित्रिने अगदी अचूकपणे टिपले आहे.
कवितेत वापरलेले ‘कर्मयोगी निवृत्तीनाथ’ हे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. कारण कर्म करुनही त्याचे फळ मिळाले नाही किंवा मिळालेले फळ निसटून गेले तरी मनाची शांती ढळू न देता जो निवृत्त होतो तोच खरा कर्मयोगी आणि निवृत्तीनाथ ! वृक्षाच्या प्रतिकातून मानवी जीवनावर सहजपणे भाष्य करताना कवितेला झालेल्या या आध्यात्मिक विचारांच्या स्पर्शामुळे कविता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचते. आयुष्यातील चढउतार पचवायची ताकद ख-या कर्मयोग्यातच असते. निवृत्त होऊनही नव्या जन्मीच्या हिरवाईची वाट पाहणारा जीवनाविषयीचा आशावाद, सकारात्मकता या कवितेतून दिसून येते.
“ज्या मातीतून उगवले
तिथेच परतीची पाऊले”
या ओळी वाचताना “माती असशी, मातीत मिसळशी” किंवा “तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, माती सांगे कुंभाराला” या काव्यपंक्तींची आठवण येतेच. एकच विचार प्रत्येक कवी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने कशा पद्धतीने मांडत असतो हे अशा काव्यांतून स्पष्ट होते.
वृक्षाच्या अंगी असलेले कर्मयोगीत्व जर माणसाने अंगिकारले तर त्याचं जीवनही पुनःपुन्हा प्रगतीच्या, वैभवाच्या हिरवाईने बहरून येईल असा सुप्त संदेश देणारी ही कविता एक सुंदर निसर्ग काव्याचे रुप घेऊन आपल्यासमोर सादर केल्याबद्दल कवयित्री सौ. राधिका भांडारकर यांना मनःपूर्वक धन्यवाद!
रसग्रहण – सुहास रघुनाथ पंडित
सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हेचि दान देगा देवा… कवी : संत तुकाराम ☆ रसग्रहण – सौ. वृंदा गंभीर☆
☆
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी..
नलगे मुक्ति धन संपदा. संतसंग देई सदा..
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी..
हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा
जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात देवा एक दान दे किंवा वरदान दे तुझा विसर कधी पडू देऊ नको.
मानव जन्म आला कि व्याप हाल अपेष्टा आल्याचं संसार आलाच कष्ट आलेच… संसारात गुंतून न राहता तुझी आठवण कायम असू दे तुझे गोड नाम मुखात असू दे दुसरं काही नको…
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा
देवा तुझे नाम अमृताहून गोड आहे तुझ्या नामात शक्ती आहे तुझे नाम म्हणजे सत्य आहे. योग्य मार्ग आहे तेंव्हा देवा तुझा विसर पडू देऊ नको.
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी
तुझे गुण मी आवडीने गाईन सत्कर्म करत राहील तुझे नाम अतिप्रिय आहे तुझं विस्मरण मी कधी होऊ देणार नाही देवा तू नेहमीच स्मरणात असावास म्हणून मी तुझे गोड गुणगान गात राहील.
घरादार मुलं बाळ धन संपदा जोडण्यापेक्षा मी पुण्य जोडत राहील धन जमा करण्याच्या नादात तुझा विसर पडतो तुझे कार्याचा विसर पडतो.
मानव जन्म मिळून पण जीवनाचे सार्थक करता येत नाही नाशिवंत सुखाच्या मागे धावून शाश्वत सुख विसरतो शाश्वत सुख तुझ्या नामात आहे म्हणून मी तुझ्या नामाशी जोडला जाणार आहे.
जीवनात अध्यात्मिक सुख पाहिजे कलियुगात भौतिक सुखाच्या मागे लागून दुःख प्राप्त होतं आणि तुझा विसर पडतो.
मला हे सुख नको आहे मला शाश्वत सुख जोडायचं आहे.
न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा
मला धन नकोय मुक्ती नकोय संतांची संगत हवी आहे.
मुक्ती मिळाली तर मी तुझ्या पासून लांब जाईल मला पुन्हा पुन्हा मानव जन्म दे मी तुझे गुणगान गाईल तुझी सेवा करत राहील.
तुझी सेवा घडावी म्हणून मला संतांची संगत दे संत सहवासात राहूदे * गुरु असावा महाज्ञानी गुरु महाज्ञानी असेलतर जीवनात मार्ग सापडतो म्हणून संत संगत दे…
सुसंगतीने सुविचार प्राप्त होतात तर कुसंगतीने जीवन बरबाद होतं.
संगत जशी असेल तसं जीवन घडत असतं. जीवन सार्थकी लावायचे असेलतर संत संग आवश्यक आहे.
देवा, हे पांडुरंगा मला फक्त संत संग दे धन नको मुक्ती नको भक्ती दे.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावेआम्हीसी
तुकाराम महाराज म्हणतात आता सुखाने जाऊदे गर्भातून तुझी सेवा करण्यासाठी आलो होतो आता तुझी सेवा झाली माझे कार्य संपले आहे. तेंव्हा देवा मला आनंदात स्वर्गसूख मिळूदे जिथे फक्त तुझे चरण असतील.
“गर्भात असताना सोहंम सोहंम जप होतो, बाहेर आल्यावर कोहम कोहम सुरु होतं.
कोहम, म्हणजे का आणलंस तू इथे मला का दूर केल तुझ्यापासून ही आर्त हाक असते बाळाची.
म्हणून महाराज म्हणतात गर्भवासी होतो आता सुखाने स्वर्गवासी होऊ दे शेवटचा दिवस गोड व्हावा