☆ तुका म्हणे – नसे तरी मनी नसो… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
नसे तरी मनी नसो /
परी वाचे तरी वसो //१//
*
देह पडो या चिंतनी /
विठ्ठल नाम संकीर्तनी //२//
*
दंभ स्फोट भलत्या भावे /
मज हरिजन म्हणवावे //३//
*
तुका म्हणे काळातली /
मज सांभाळील हरि //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
मनात जरी नसले तरी नसुदे. पण मुखात तरी देवाचे नाव कायम असुदे. देवाचे नामस्मरण, चिंतन करत असताना मृत्यू आलेला केव्हाही चांगलाच. जगाकडून मला मोठे म्हणवून घेण्यचा बिलकुल सोस नाही. कुणीतरी
मला बडा म्हणावे हा दांभिक पत्ताही मजकडे नाही. लोकानी मला मी फक्त देवाचा म्हणून ओळखावे तेवढीच अभिलाषा आहे. आता काही जरी असले तरी काही काळाने देव माझा प्रतिपाळ करेल याची मला खात्री आहे. मनात देवाचा, परमात्म्याच्या, अध्यात्माचा विचार येणे हे खरेतर अवघडच वाटते. पण आशा वेळी तरी तोंडाने किमान हरिनाम तरी घ्यावे. त्यामुळे तरी थोडे हरिनाम संकीर्तन घडेल. अशा चिंतनात असतानाच मृत्यू आलेला चांगला. भ्रमनिरास करणा-या या लौकिक जगातल्या दांभिक असणा-या मोठेपणाच्या मागे लागू नये. लोकांनी हा देवाचा आहे असे म्हणावे. जगात आपली ओळख अशी असावी. तेवढेच पुरेसे आहे. तुम्ही एकदा देवाचे झालात की देवही तुमचा सांभाळ करण्यास बांधील होऊन जातो.
☆ तुका म्हणे… सत्य साचे सारे.. – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
सत्य साचे खरे / नाम विठोबाचे बरे//१//
येते तुटती बंधने / उभय लोके कीर्ती जेणे // २//
भाव ज्याचे गाठी / त्यास लाभ उठाउठी //३//
तुका म्हणे भोळा / जिंकू जाणे कळिकाळा // ४//
– संत तुकाराम.
*
आपल्या मुखाने विठोबाचे नाव सतत घेणे हेच खरे सत्य आहे. त्यामुळे आपल्यावर लादली गेलेली कोणतीही बंधने उरत नाहीत. ज्याच्या मनी भक्तीभाव आहे त्याला सर्व गोष्टींचा अगदी सहजासहजी लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात साधाभोळा असणारा माणूस कळिकाळालाही त्यामुळे जिंकू शकतो.
देवाचे नामस्मरण हे जगातले एकमेव सत्य आहे. व्यक्तीला एकदा का त्याची गोडी लागली की इतर कोणतीही बंधने त्या व्यक्तीला बांधू शकत नाहीत. असा माणूस लौकिक सुखदुःखात गुंतून पडत नाही. त्यामुळे सगळीकडे आपोआपच त्याची चांगली कीर्ती पसरू लागते. त्यांचे जगणे समृध्द झाल्याचा अनुभव येतो. त्याला कुठलीच उणीव भासत नाही. असा माणूस दिसायला साधाभोळा दिसतो पण त्याच्याकडे कळिकाळालाही जिंकण्याचे सामर्थ्य असते. ते सामर्थ्य पुढे येवढे वाढते की तो प्रत्यक्ष यमधर्मावरही विजय मिळवतो. त्याला कधीच मृत्यूचे भय वाटत नाही.
☆ तुका म्हणे – माप म्हणे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
माप म्हणे मी मविते/
भरी धनी ठेवे रिते //१//
देवा अभिमान नको/
माझे ठायी देऊ सको//२//
हाती सूत्र दोरी/
तुका म्हणे त्याची दोरी //३//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
फक्त मोजत रहाणे हेच कोणत्याही मापाचे काम असते. त्या मापाला भरून ठेवणे किंवा रिकामे ठेवणे हे त्या मापाच्या मालकाच्या मालकाच्या हातात असते. कारण त्या मापाचा मालक दुसराच कोणी तरी असतो. तसा माझा देव हाच माझा मालकही आहे. म्हणूनच तुकाराम महाराज देवाला मला अभिमान येऊ देऊ नका अशी विनवणी करतात.
आपल्या जगण्याची आणि जीवनाची दोरी देवाच्याच हातात आहे. हा सर्व मोठेपणा देवाचाच आहे. आपल्याकडे कर्तृत्वाचे सामर्थ्य देणारा किंवा न देणारा परमेश्वरच आहे. म्हणूनच माप भरणे किंवा ते रिकामे ठेवणे हे त्याच मालकाच्या इच्छे प्रमाणे घडते. ही वस्तुस्थिती मी ओळखून आहे. म्हणूनच मला कर्तेपणाचा अभिमान येऊ देऊ नकोस. हा सर्व तुझाच अधिकार आहे. मी फक्त तुझ्या हातातील खेळणे आहे. आपल्या जीवनाचे असे सूक्ष्म आवलोकन करून तुकाराम महाराज परमेश्वर चरणी नतमस्तक होतात.
☆ तुका म्हणे… – विश्वव्यापी माया ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
विश्वव्यापी माया /
तिने झाकोळली छाया //१//
सत्य गेले भोळ्यावरी/
अविद्येची चाली थोरी //२//
आपुलेची मन /
करी आपना बंधन //३//
तुका म्हणे देवा /
तुम्ही कोंडी ही उगवा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
आपल्या भोवती असणारे सगळे जग मायेने व्यापलेले आहे. त्याच मायेने सत्यरूपी सूर्यालाही झाकोळून टाकले आहे. सत्य आता फक्त भोळ्याभाबड्यांकडे शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सुविद्येला वाईट दिवस आलेत व कुविद्येला चांगले दिवस आले आहेत. पण हे ओळखायला आपले ओढाळ मनच आपल्याला आडकाठी करत आहे. हे असे का होत आहे हे एक न उलगडणारे कोडे होऊन बसले आहे. ते कोडे देवा आता तुम्हीच उलगडून दाखवा.
अलौकिक सुख व आनंद यांनाच आपण माया म्हणतो. या मायेतच सगळे जग बुडून गेले आहे. त्यामुळे नेमके सत्य म्हणजे काय याकडे आपले लक्षच जात नाही. पण ज्याचे लक्ष त्याकडे आहे त्याचा समाजात मोठा प्रभाव आहे असेही दिसत नाही. म्हणूनच या जगावर प्रभाव आहे तो खोट्या विद्येचा. हे ओळखण्यासाठी सक्षम असणारे आपले मन व बुद्धी आपल्याला हे समजून घेऊ देत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज देवाला हे कोडे सोडवण्याची विनंती करतात.
☆ तुका म्हणे… जन मानवले वरी – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
जन मानवले वरी बाह्यात्कारी /
तैसा मी अंतरी नाही झालो //१//
*
म्हणऊनि पंढरीनाथा वाटतसे चिंता /
प्रगट बोलता लाज वाटे //२//
*
संत ब्रम्हरूप जाले अवघे जन /
ते माझे अवगुण न देखती//३//
*
तुका म्हणे मी तो आपणासी ठावा /
आहे बरा देवा जैसा तैसा //४//
– संत तुकाराम.
*
लोक मला जितका खरा मानतात
तितका मी अंतःकरणातून खरा नाही. त्या मुळे मलाच माझी काळजी वाटते. आणि तसे उघडपणे बोलायची लाजही वाटते. संत मंडळींना सगळेजणच परमेश्वरा सारखे दिसतात. ते माझ्या आत असलेल्या वाईट गोष्टी पहात नाहीत. पण परमेश्वराला मी आतून कसा आहे आणि बाहेरून कसा आहे हे नक्कीच माहीत आहे. तोच हे सर्व काही जाणतो.
संत मंडळी सर्वाना परमेश्वर स्वरूप मानतात. ते आपल्यातल्या चांगल्या गोष्टी पहातात. वाईट गोष्टी कडे दुर्लक्ष करतात. पण आपले आपनच प्रमाणीक न्यायाधीश झालो तर आपण कसे आहोत हे आपल्याला कळून येते. पण आपण आपल्याला जाणून घेणे सोपे काम नाही.
☆ तुका म्हणे… एक मन तुझ्या – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला /
वाटता ते तुला येईल
कसे //१//
म्हणऊनि दृढ धरी
पांडुरंग/
देहा लावी संग प्रारब्धाचा //२//
*
तुका म्हणे ऐसे जाणावे
उचित/
तरी सहज स्थिर येईल
कळो //३//
– संत तुकाराम.
*
रसास्वाद:
तुझ्याकडे तुझा देह आणि त्यात वसणारे तुझे मन हेच एकमेव भांडवल आहे. ते तुला इतराना कसे काय वाटता येईल. म्हणूनच तू पांडुरंगा चरणी लीन होऊन त्यालाच फक्त दृढ विश्वासाने धरून ठेव. तुझ्या देहाला त्याच्या प्रारब्धाच्या वाट्याला आलेले भोग भोगून देत. ही महत्वाची बाब तुला नेमकेपणाणे कळली तर जीवनाला लाभणारी स्थिरता म्हणजे काय ते तुला कळून येईल. तुकाराम महाराजांचे हे स्वानुभव कथन आहे.
उसने अवसान आणून बाहेरून रूप बदलले. पण मनाकडून मनातली कुठलीच बाब त्यागली गेली नाही. हा मला आलेला नेहमीचा अनुभव आहे. माझ्या मनाला काही जागृती आली आहे हे माझ्या स्वप्नात ही येत नाही. मी सगळेच सोईस्करपणे विसरून जातो. माझ्या संसारात रमलेले माझे मन संसारातून, प्रपंचातून कधीच बाहेर निघत नाही. ते नेहमीच मी चालवलेल्या व्यवसायात गुंतून पडते, तेथेच रमते. पण मी जगाला दाखवण्यासाठी चांगुलपणाचे छानसे सोंग मात्र घेतलेले आहे.
तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे माझी स्थिती वरून किर्तन आतून तमाशा अशी झाली आहे.
जन्मभर केलेल्या चिंतनाने मनातील चिंताच नष्ट झाली आहे. त्याच्या मुळे चंचल असनारे मन शांत झाले आहे. आता हे असेच पुढे ही चालायचे. आता मौन पाळायचे आत्मबल प्राप्त झाले आहे. जे काही करण्यासारखे होते ते सर्व केले. बोलण्यासारखे जवळ काही राहिलेले नाही. मनात संभ्रमच उरला नाही. भोग भोगण्याचे मनाचे भोगही आता लांब गेलेत. ते परत येणारच नाहीत. मी स्थितप्रज्ञ झालो आहे. म्हणून आता त्यागाला ही त्यागले आहे.
तुकाराम महाराजांनी आपली मनस्थिती येथे कथन केली आहे.
ही मनस्थिती तपसाधनेच्या पराकोटीच्या अवस्थेने प्राप्त होते. चिंतन मनाने कोणतीही चिंता चिंताच वाटत नाही. मन, तन स्थितप्रज्ञ होऊन जाते. कोणाशी काहीही बोलण्याची आणि चर्चा करण्याची उर्मीच नष्ट होते. उरतो तो फक्त चिंतनाचा आत्मानंद. मग उरत नाहीत कोणतेच प्रश्न.
मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठानच्यायूट्यूब चैनलवर वर्षभर सातत्यपूर्ण विविध नामांकित कवी कवयित्रींच्या कवितांचे उत्कृष्ट रसग्रहण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कविता रसग्रहण पुरस्कार तसेच मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान आयोजित विशेष राज्यस्तरीय युट्युब काव्य सादरीकरण स्पर्धेत*तृतीय क्रमांक * असे दोन पुरस्कार आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. रेणुका मार्डीकर यांना प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ✒️💐🌹
🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸
आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य आणि रसग्रहण
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
काव्यानंद : पुरस्कार प्राप्त रसग्रहण
☆ शतकांच्या यज्ञातून उठली… कवी : शंकर वैद्य ☆ रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(मनस्पर्शी साहित्य प्रतिष्ठान आयोजित विशेष राज्यस्तरीय युट्युब काव्य सादरीकरण स्पर्धेत पुरस्कार प्राप्त कविता आणि रसग्रहण)
☆
☆ मूळ कविता – शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला – कवी – शंकर वैद्य ☆
☆
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला
*
शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलुख सारा
दिशा दिशा भेदिक धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला
*
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजिवन प्राणांचे
हे रूप शक्तीयुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला
*
गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्ष जयजयकार
*
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज
*
शिवछत्रपतींचा जय हो
श्री जगदंबेचा जय हो
या भारतभूमीचा जय हो
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
☆
☆रसग्रहण : सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
शंकर वैद्य यांचा जन्म ओतुर महाराष्ट्र येथे जून 15, 1928 साली झाला. जुन्नरला प्राथमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य आधी नागपूर नंतर पुणे व शेवटी मुंबई असे ते नोकरीनिमित्त अध्यापन करत राहिले. त्यांचा कालस्वर हा पहिला काव्यसंग्रह अत्यंत सोपे आणि सहज सुंदर शब्द हे त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, कवी लेखक समीक्षक अशा विविधांगी भूमिकांसोबतच ते उत्कृष्ट वक्ते आणि प्रभावी सूत्रसंचालक म्हणून ज्ञात होते.
प्रवासी पक्षी या कुसुमाग्रज यांच्या व कवी मनमोहन यांच्या आदित्य काव्यसंग्रहाचे संपादन शंकर वैद्य यांनी केले. शंकर वैद्यांच्या पत्नी सरोजनी यादेखील प्रतिभाशाली कवयित्री व चरित्र लेखिका होत्या. त्यांच्या मुलाचे नाव निरंजन.
शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे इत्यादी अनेक त्यांच्या गाजलेल्या कविता
शंकर वैद्य यांची गाजलेली पुस्तके
आला क्षण गेला क्षण हा कथासंग्रह
कालस्वर हा कवितासंग्रह
दर्शन हा कवितासंग्रह
शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार
कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मास्टर दिनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार
मुग्ध रसिल्या कवितेचे धनी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते कवी शंकर वैद्य. शंकर वैद्य यांच्या वृत्तीतला समतोल आणि अनाग्रही स्वभाव त्यांनी कधी सोडला नाही. परंपरेतील सत्वशीलतेचा कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता बदलत्या काळातील कवितेशी कुठे सांधा जुळविता येईल याचा त्यांनी चिंतनशील वृत्तीने वेध घेतला होता. वास्तवाचे भान ठेवून सशक्त सौंदर्यवादी काव्यधारेची उपासना करणारे शंकर वैद्य हे कवी होते.
बीज अंकुरते कसे
नाजुकल्या वेदनांनी
मुळे पृथ्वीच्या धमन्या
होता वृक्ष ये फुलोनी
लागे मातीच्या इर्षेला
नव्या जन्माचा डोहाळा
तिचा जीव वृक्षातून
रंग गंधात व्यक्तला
नव बदलाची जाणीव असणारा कवी म्हणून शंकर वैद्यांना ओळखले जाते.
आई दिसली, उभी उंच सरस्वती
देवळातल्या चाफ्याची उंच माळ तिच्या हाती
हात वर धरलेला, तरी माळ रुळे पायी
अधांतरी चांदण्यात कशी ती चालत जाई
यासारख्या ओळीतून आपल्या आईला रेखाटत हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असणारे कवी शंकर वैद्य म्हणजे विविध भाववृत्ती आपल्या कवितेतून सहजगत्या पकडणारे कवी म्हणून साहित्य वर्तुळात, काव्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध होते. कवितेची कोवळीक जपणारे कविवैद्य यांनी कधीच आपल्या कवितेत आक्रमकपणा आणला नाही. शंकर वैद्य हे मराठी कवितेतलं एक वेगळंच रसायन होतं. पाडगावकर झगमगता माणिक असतील तर वैद्य म्हणजे माजघरातील मंद दिव्याची वात होते. मराठीतील सर्व वृत्तं आणि छंद त्यांना ज्ञात होते.
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला
अनेक शतकांच्या या महायज्ञातून उठलेली एक केशरी ज्वाला म्हणजे आपले शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज. केवळ एका पूर्व दिशेला नव्हे तर दहा दिशांमधून आज अरुणोदय झाला आहे. शिवछत्रपतींना पाहण्यासाठी दहाही दिशा उजळल्या आहेत. हे स्वराज्य जिथे शिवप्रभूंची केवळ नजर फिरताच सारा मुलुख उभा राहतो. राजांनी इशारा करताच दिशा दिशांनी हातात तलवारी घेऊन इथला मावळा गनिमांवर तुटून पडतो.
शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
दिशा दिशा भेदित धावल्या खड्गांच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला
हे तुफान स्वातंत्र्याचे आहे. हे उधाण आहे शिवरायांप्रति स्वराज्याप्रति अभिमानाचे. हे वादळ आहे जे धर्मासाठी स्वातंत्र्यासाठी उग्र विजांचे लोळ होऊन आलेले आहे. या उग्र विजांमुळे तममय अशा गनिमांचे तट कोसळले आहेत. चिरा चिरा ढळला आहे.
कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे सर्व शक्तीयुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला
आज या सह्याद्रीच्या कडेकपारीतून विजयाचे गान घुमू लागले आहे. अनेक वर्ष आलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे इथली भूमी मृतवत झाली होती पण आज या भूमीत स्वराज्य स्थापन करून माझ्या शिवाजीराजांनी पुन्हा नवे प्राण फु़ंकले आहेत. पुन्हा ही भूमी तेजोमय झाली आहे. रायगडावर माझ्या राजाचा राज्याभिषेक होणार आहे. खडा चौघडा वाजू लागला आहे. शिंगांच्या ललकारीवरती भगवे झेंडे अभिमानाने फडकत आहेत. शिवराय हे माझ्या देशाचे भाग्य आहेत. ते मृतवत झालेल्या स्वराज्यात प्राण फुंकणारे जीवन देणारे प्राणांचे संजीवन आहेत. शक्ती आणि युक्तीच्या बळावर स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती हे देवरूप आहेत. शिवाजीराजा नावाचा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला आहे आणि हा सारा मावळ प्रांत तेजोमय झाला आहे.
गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज
शिवछत्रपतींचा जय हो
श्री जगदंबेचा जय हो
या भारतभूमीचा जय हो
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला
सप्त नद्याच्या जलाने शिवरायांना स्नान घालून गागाभट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला. शिवराय जेव्हा सिंहासनारूढ झाले तेव्हा अधीर अशा सर्व स्वराज्याच्या हृदयातून शिवरायांचा जयजयकार होऊ लागला.
प्रौढप्रताप पुरंदर- हे शिवाजी महाराजांना महान शौर्य आणि विशिष्टतेचे व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाते. जे युद्धातील त्यांच्या पराक्रम व प्रतिष्ठेला उजागर करते. क्षत्रिय कुलावतंस- यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराज क्षत्रिय योद्धा होते जे परंपरीकपणे भारतीय समाजात योद्धा भूमिका आणि कुलिनतेशी संबंधित असतात. सिंहासनाधीश्वर- याचा अर्थ सिंहासनाचा स्वामी असा होतो जो शासक आणि राजा म्हणून या पदासाठी अगदी सुयोग्य असतो. महाराजाधिराज- याचा अर्थ राजांचा राजा असा होतो जो राज्यकर्त्यांमध्ये त्याचे वर्चस्व दर्शवितो. महाराज श्रीमंत ही एक सन्माननीय पदवी आहे जगामध्ये श्रीमंत म्हणजे श्रीमंत किंवा थोर असे आदरयुक्त दर्जा दिला जातो. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचे पूर्ण नाव आहे श्री हा आदर्श उपसर्ग आहे व छत्रपती म्हणजे राजा किंवा सम्राट की जय याचा अर्थ विजय असो. छत्रपतींचा जगदंबेचा व भारत मातेचा जयजयकार कवींनी प्रस्तुत कवितेचा शेवट करताना केला आहे ज्या जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले, त्या भारतभूचे ते सुपुत्र होते, त्यांचा जयजयकार असो अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक सहा जूनला रायगडावर झाल्यावर जय जय कारातून शतकांच्या विजयी माला उजळल्या त्याची स्मृती म्हणून आज ही शंकर वैद्यांची कविता शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला ही मी रसग्रहणासाठी घेतली आहे.
शेवटी शिवरायांना वंदन करून माझ्या कवितेच्या चार ओळींनी समारोप करते.
☆ विठू माझा लेकुरवाळा…. संत जनाबाई☆ रसग्रहण… सौ शालिनी जोशी ☆
☆
विठू माझा लेकुरवाळा l संगे गोपाळांचा मेळा ll
निवृत्ती हा खांद्यावरी l सोपानाचा हात धरी ll
पुढे चाले ज्ञानेश्वर l मागे मुक्ताई सुंदर ll
गोरा कुंभार मांडीवरी l चोखा जीवा बरोबरी ll
बंका कडियेवरी l नामा करांगुळी धरी ll
जनी म्हणे गोपाळा l करी भक्तांचा सोहळा ll
– संत जनाबाई
संत जनाबाईंचा देवाचे भक्तावरील वात्सल्य व प्रेमाचे वर्णन करणारा हा अभंग आहे. दासी जनी, नामयाची दासी, जनी नामयाची तर कधी नुसतं जनी ही अशी जनाबाईंची नाममुद्रा. या विठ्ठलाचे अनेक रूपे जनाबाईच्या अभंगातून व्यक्त होतात. तोच त्यांचा मायबाप, सखा, सांगाती झाला होता.
या अभंगात गुणगान करताना जनाबाई विठ्ठलाला लेकुरवाळा करून टाकतात. सर्व संतांना अंगाखांद्यावर खेळवणारी बाळे करून त्या विठ्ठलाला संसारात गुंतवितात. त्याला मातृभाव देतात. विठ्ठलाची विठाई होऊन तो साऱ्यांचे कुशल मंगल पाहतो. आषाढी कार्तिकीला आईच्या भेटीला आतूर होऊन सर्व भक्त पंढरपूरला जमा होतात. माऊलीच्या अवतीभवती करतात. मातृकाविठाई त्यांचे लाड करते. निवृत्तीला खांद्यावर घेते. तर सोपानचा हात धरते. ज्ञानेश्वर पुढे चालतात. त्याने उजळलेल्या मार्गावरून मुक्ताई चालते. गोरा कुंभार मांडीवर बसतो. चोखा बरोबर चालतो. मग बंकाला कडेवर घेते. तर नामाचा हात धरते. अशा प्रकारे प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे ही माऊली आधार देते.
अठरा पगड जातीचे हे भक्त. पण जात, पंथ भक्तीच्या आड आला नाही. नामस्मरण हाच धर्म आणि विठ्ठल ही जात. त्या माऊलीच्या छत्राखाली सर्व एकत्र आले. पंढरपूरला आपल्या माहेरी ते जमतात. चंद्रभागेत स्नान, वाळवंटात फेर, फुगड्या, आनंदाने भजन करत, नाचत, नामस्मरणात दंग होतात. हा सगळा भक्तीचा सोहळा होऊन जातो. एकात्मतेचेच हे प्रतीक. विठाई आनंदाने पाहते. तिच्यासाठी हा सोहळाच असतो.
खरं पाहता विठ्ठल वेगळा नाही. संतांच्या रूपात येऊन तोच लिला दाखवतो. संत हेच देव. प्रत्यक्ष भगवंतच जगाच्या कल्याणासाठी संतांचे रूप घेऊन अवतरतात. हे जनाबाईंना या अभंगातून सांगायचं आहे. त्यासाठी त्यांनी लेकुरवाळ्या विठ्ठलाचे रूपक केले. हा लेकुरवाळा विठ्ठल मराठी भावकाव्यात अजरामर झाला.
संत जनाबाई नामदेवांपेक्षा मोठ्या होत्या. सर्वच संतांचा सहवास जनाबाईंना घडला. त्यामुळे विठूमाऊलीला संतांच्या मातेच्या रूपात त्या पाहतात. म्हणून संताना विठोबाच्या अंगाखांद्यावर खेळताना पाहण्याची कल्पना सुचली. त्यांच्यासाठी तो भक्तीचा सोहळा झाला. प्रपंच करूनही परमार्थ करता येतो हेच या रूपकातून जनाबाईंना सुचवायचे असावे.