मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र:- आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज मात्र तुला ते सांगणं मला गरजेचं वाटतंय. “कोणती गोष्ट आण्णा..?)

“तुझा विश्वास नाही बसणार सावू, पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वैपाक मला कधीच आवडायचा नाही. तुझ्या आईच्या हातच्या चवीनं मला लाडावून ठेवलं होतं.तुझ्या वहिनीनं स्वैपाक केला असेल, तेव्हा ती आसपास नसताना, तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं कांहीबाही रांधून मला खाऊ घालायची. आज ती नाहीय. पण कसं कुणास ठाऊक, आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वैपाकाची चव मला वेगळी पण चांगली वाटते. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. हीसुध्दा सगळं मनापासून आणि प्रेमाने करते हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे. फरक आपल्या दृष्टिकोनात असतो सावू. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात. आपण त्यांच्याकडे त्याच आपुलकीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने ती आपली होऊन जातात. नाहीतर मग नातेबंध तुटायला वेळ नाही लागत. एक सांगतो ते कायम लक्षात ठेव. नाती जवळची लांबची कशीही असोत, ती नाजूक असतात. त्यांना ‘हॅंडल वुईथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात. नात्यांचं खऱ महत्व तुझी आई गेली तेव्हा मला समजलं सावू. एकटा, केविलवाणा होऊन गेलो होतो गं मी. पण तुझ्या दादा-वहिनीने मला समजून घेतलं. सांभाळलं. म्हणूनच त्या दुःखातून इतक्या लवकर मी स्वतःला सावरु शकलो.

त्या दोघांवर अचानक टाॅर्चचा प्रकाशझोत पडला आणि दोघेही दचकले.

“गप्पा संपल्या की नाही अजून?” दादाने विचारलं. दादा वहिनी दोघंही त्यांना न्यायला आले होते. तोवर भोवताली  इतकं अंधारून आल्याचं त्याना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अंधारातच बुडून गेलं होतं. पण आण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता. सगळं कसं लख्ख दिसू लागलं होतं. सविता तटकन् उठली. पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारख़ रडत राहिली. ती असं का करतेय दोघांनाही समजत नव्हतं.

“अण्णा काय झालं हिला असं अचानक!” दादानं विचारलं.

तिला काय झालंय ते फक्त आण्णानाच माहीत होतं. पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले.

“काही नाही रे. तिला तिच्या आईची आठवण झाली असेल.  म्हणून तिला बिलगलीय.”

अण्णा बोलले ते अनेकार्थांनी खऱ होतं. निदान आज, या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती जशीए काही. सविता हा क्षण मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती…!!

समाप्त

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग – 3 ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग – 3 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

*तुझी माझी जोडी जमली रे*

‘भाई’वरच्या लेखाला

‘स्मृतीगंध’ फेसबुक पेजवर

३००+ लाईक
५०+ कमेंटस
६०+ शेअर

एवढी *Good news* तरी कुणाला *congratulations* करावस वाटलं नाही, छ्या .

अरे एवढा निराश होऊ नकोस

कोण?

मी तुझा ‘भाई ‘

भाई तुम्ही?   नमस्कार , नमस्कार

हो हो ! अरे तुझा तो लेख फिरत फिरत सुनीता पर्यत पोहोचला. तिने दाखवला म्हणून तुला भेटायला आलो.

भाई आज सिनेमा पण पाहिला ?

हो हो, ते आलंच लक्षात आमच्या तो वरचा ?डायलाॅग ऐकूनच

भाई, खुपच सुरेख सिनेमा. अगदी पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत

‘*आनंदाचे डोही आनंद तरंग’* अशी अवस्था.तुमचे बाबा म्हणायचे ना ‘ *पुरुषोत्तम केवळ आनंद देण्यासाठी आला आहे*’ याचा प्रत्यय प्रत्तेक प्रसंगात खास जाणवत होता आणि ठामपणे ते म्हणाले ‘ *माझं भविष्य चुकणार नाही* ‘ म्हणून

भाई , भविष्य/ पत्रिका हा पण एक आपला आवडता विषय. महाराष्ट्राचा कुंडली संग्रहात *पान नंबर १८० वर ३७९ नंबराची कुंडली आहे प्रसिध्द लेखक,  नाटककार, कवी, संगीतकार पु.ल. देशपांडे यांची*

असं का? वा, वा

भाई, फर्गुसन च्या सरांनी तुम्हाला ‘ *धनुर्धारीत* ‘ तुमच्या आलेल्या विनोदी लेखाचे कौतुक केले आणि मला खुप आनंद झाला

का हो तुम्हाला का?

अहो भाई, आमचा पण “धनूर्धारी ” म्हणून धनू राशीवाल्यांचा Whatsapp  ग्रुप आहे. काहीबाही लिहीत असतो मी त्यावर

उत्तमच म्हणायचे.

भाई, सिनेमात तुम्हाला तुमच्या बाबांनी ” नाथ हा माझा” हे बालगंधर्वाचे गाणे पेटीवर वाजवायला सांगितले. ते पाहून मी ही थेट आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात पोहोचलो.

कुठली शाळा?

ते बघा म्हणजे… सिनेमात तुम्ही विलिंग्डन काॅलेजचा उल्लेख केलाय ना, त्याच *सांगलीतील सिटी हायस्कूल शाळा*.  त्यावेळी आमच्या ‘निलांबरी’ ला ‘वद जाऊ कुणाला शरण ग’ या नाट्यसंगीताला पेटीवर साथ केली होती.

अरे वा, म्हणजे पेटी पण वाजवता का?

हो हो भाई

आणखी काय करता?

काही बाल नाट्यात जसे गाणारा मुलुख, गोपाळदादा, कामं केली आहेत आणि भाई, संस्कृत नाटकात आमच्या प्रसाद,  सुनील बरोबर सम्राट अशोक राजाच्या सेवकाचे काम केले होते.

काय वाक्य होती?

नाही फक्त संस्कृत मधे सम्राट अशोकाची ‘हं हं’  असं म्हणत बाजू घ्यायची

छान,  छान.

कविता, गाणी याबद्दल काही

भाई गाणं म्हणण्याचा एकदाच प्रयत्न केला मागच्यावर्षी कंपनीत कल्चरल कार्यक्रम झाला तेंव्हा.

“हीच आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही प्रार्थना म्हणली.  *पण जमलं नाही नीट*

अच्छा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला जमत पण नाहीत तर.

भाई, चारोळ्यांचा मात्र नुसता पाऊस पाडतो. तो सिनेमात तुम्ही रत्नागिरीला असताना पडतो तसा.

चांगलय की मग

भाई, बेळगावला असतानाचा तुमचा एक प्रसंग आहे सिनेमात. त्यात सुनिता बाईंशी बोलताना तुम्ही म्हणता, पुण्याची मजा नाही. भाई सेम फिलींग. २-३ महिन्यातून एकदा तरी पुण्याला गेल्या शिवाय चैनच पडत नाही बघा. *आता पण एक मित्र बोलावतोय. बघू कसं जंमतय ते*.

भाई, तुम्ही जसं सुनिताबाईंना घाबरायचा असं दाखवलंय ना तसा तो पण बायकोला घाबरतो.  मित्रांची मैफल जमली की चालला  बायको बोलवतीय, रागवेल इ इ कारणे देऊन

अरे वा, अगदी मैफलीत पर्यंतच्या ब-याच गोष्टी जुळत आहेत की आपल्यात.

भाई, गोविंदराव टेंबे, कवी  गोविंदग्रज तुमचे आदर्श
तसा माझा एक मित्र गोंद्या माझा आदर्श. ?

हो का?  गोविंद, गोविंद ??

भाई सिनेमातील वसंतराव देशपांडे, कुमारगंधर्व, भीमसेन जोशी यांची *जुगलबंदी* काय रंगलीय आणि साथीला साक्षात भाई. मैफल संपलेली नाही भाई आत्ता फक्त मध्यांतर  झालयं आणी मध्यांतरानंतर परत केंव्हा मैफल चालू होईल याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतोय भाई.

भाई, त्या आधी एक राहिलं सांगायचं   गदिमांच्या गाण्याच्या एका कडव्याला तुम्ही दिलेली चाल.

*पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे*

भाई, भाई ऐकतात ना?

अहो काय चाललय तुमचं, संध्याकाळ झाली उठा आता. आणि काय बडबडत आहात,  पावसाची रिमझिम. तोंडावर पाणी मारलयं ! उठत नव्हता म्हणून. आणि काय मेलं एक तो

‘भाई’ वरचा लेख व्हायरल झाला तर भाई, भाई करत सुटलेत.??‍♂

भाई, ८ तारखेनंतर भेटू आमची सुनिता हाक मारतीय बहुतेक

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 2☆ श्री अरविंद लिमये ☆

“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. म्हणून म्हटलं. फार अंधार करू नका.”

“आण्णा?” त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले.  आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली. देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.”

“मला आधी का कळवलं नाहीत? आॅपरेशनचं?”

“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय. डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं. तू उगाच काळजी करतेस.”

“आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.

“मी… मी काम असं नाही गं…”

” काहीच करत नाही?”

“तसं म्हणजे करतो आपलं मला जमेल ते… जमेल तसं…”

“का?” तिने तीव्र शब्दात विचारलं.

“का म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम. ते गप्प बसले.

“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला. वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला. तिने तुम्हाला कामं का लावायची?”

“तुला…सारंग बोललेत का हे सगळं?”

“त्याने कशाला सांगायला हवं? आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की. दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या? तेही या वयात? वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते. गॅरेजच्या कामासाठी एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकल वरून एखादातरी हेलपाटा असतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए.. वेडी आहेस का तू? तू..तू तिला यातलं कांहिही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं? दादाशी तरी मी बोलणारच. चांगली खडसावून विचारणाराय”

“सावू… हे बघ, तू रागाच्या भरात कांही बोलशील आणि दूधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल. ऐक माझं.तू लक्ष घालावंस असं खरंच कांही नाहीय..”

हे खरं की खोटं तिला समजेचना. ती अगदी हळवी होऊन गेली. आण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले.

“सावू, काय झालं?” ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून आण्णा विचारात पडले. तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या या हळव्या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही..

“सावू, हे बघ, शांत हो. मी जे सांगतो ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत.त्यांच्या मदतीने सगळी घरकामं तीच करते. सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट दादा बघतो. तुम्ही आज अमुक एक काम करा असं त्या दोघांपैकी कुणीच मला आज पर्यंत कधीच सांगितलेलं नाही. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरी मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर उठून ते काम करू लागला. अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मी माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो”

“आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?”

“ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा मी त्यांना ‘हवं तर मी आणतो’ असं म्हटलं तर तोच ‘साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही’असंच म्हणाला होता. आज शेवटची तारीख होती. मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो. मी जायला नको होतं हे त्या  पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं..”

सविता विचारात पडली हे सगळं असंच असेल? आण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती. ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता.

“सावू, तुला सांगू? तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक. माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची. पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरलीय. सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिनपगारी रजा घेऊन घरी थांबली होती. मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं ‘आपण सावूला बोलून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल’असं. पण तुझी वहिनी ‘इतक्यात नको’ म्हणाली होती. ‘सविताताई आपल्या हुकमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? होईल तितके दिवस मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच’ असं ती म्हणायची. याच बाबतीत नाही सावू, तिने एरवीही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते. त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी.”

सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं.  “माझ्यावरील प्रेमापोटी सावू, आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस. म्हणून तुला हे सगळे सांगावं लागलं. जसा मी तसेच सावू ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज तुला मात्र ते सांगणं गरजेचं वाटतंय.”

“कोणती गोष्ट आण्णा?”

क्रमश:….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 1☆ श्री अरविंद लिमये ☆

रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली. नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती.

“जपून जा. काळजी घे.उगीच त्रागा करू नको. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल” निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरुन आलं. सविता आज पुणे-मिरज बसमधे चढली ती ही अस्वस्थता सोबत घेऊनच.समक्ष जाऊन आण्णाना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. आण्णा म्हणजे तिथे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बर्‍यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरजस्टँडला उतरून सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे.एरवी ती माहेरी जायची ते कांही फक्त आई आणि आण्णांच्या ओढीनेच नव्हतं. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की.पण आजची गोष्ट वेगळी होती.ती निघाली होती  ते तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच.सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हता.

एखाद्या माणसाच्या जाण्यानं,नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन् बदलू शकतात?तिला प्रश्न पडला. आई अचानक गेली तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती. आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आण्णांच्याबद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते.आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता.म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनिअर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आयटी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.अण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.घरी पैशाचा ओघ जेमतेमच असे.तरी स्वतः काटकसरीत राहून आईआण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यांने गॅरेज सुरू केले होते. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही.त्यामुळेच त्याच्या लग्नाचं पहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.पण त्या खेड्यात राहायची त्यांची तयारी नसायची.मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली.ती लग्नाआधी बीएससी झाली होती. हुशार होती. आण्णानीच तिला बी.एड् करायला प्रवृत्त केलं. लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला.असं सगळं कसं छान, सुरळीत होतं. परवापरवापर्यंत तरी तसं वाटलं होतं,पण आई अचानक गेली …आणि ..?

वहिनीला नवीन नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला येई. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती.ती होती तोपर्यंत घरात कसले प्रश्नच नव्हते जसे कांही. तेव्हा घरात भांड्याला भांडं लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते.

आई गेली.तिचं दिवसकार्य सगळं आवरलं  तेव्हाच बदल म्हणून सविता-सारंगने आण्णाना थोडे दिवस बदल म्हणून पुण्याला चला असा आग्रह केला होता. पण ते पुन्हा पुढे बघू म्हणाले न् ते तसंच राहीलं.

आई गेल्यानंतर पुढे दोनतीन महिन्यांनीच दिवाळी होती.चार दिवस आधी फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर  व्हरांड्यातला केर काढू लागले होते.सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले.  थोडे थकल्यासारखेही.पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं.  हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला .आण्णा आणि घरकाम? शक्य तरी आहे का हे?

निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे.त्यांना वाचनाची आवड होती. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता. असं असताना ते न आवडणारी,न येणारी कामं या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का? हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं.तिचं जाऊ दे पण दादा? त्याला कळायला नको?सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते यासाठीच. आण्णांशीच नव्हे,दादावहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच सिटी बसस्टाॅपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक आण्णाच समोरून येताना दिसले.हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते. त्याना त्याअवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम. ती कासावीस झाली.तशीच पुढे झेपावली.

“आण्णा त्या पिशव्या द्या इकडे.मी घेते.” पाच पाच  किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या.सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली.

“सावू…तू..तू इथे कशी?”कपाळावरचा घाम रुमालाने  टिपत त्यांनी विचारले. त्यांच्या थकून गेलेल्या चेहऱ्यावरही आनंद  पसरला एकदम.

“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

“पण असं अचानक?”

“हो.भेटावं असं तिव्रतेने वाटलं.आले.कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू?खूप थकल्यासारखे वाटताय.” तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली. मग सविता काही बोललीच नाही. बसमध्ये सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.

“आण्णा, आपण लगेच घरी नको जायला..”

“का  गं?”

“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.”

“अगं बोल ना. घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”

“नाही…नको”

“लांबचा प्रवास करून आलीयस. ऐक माझं. आधी घरी चल. हात पाय धू. विश्रांती घे. मग बोल. घाई काय आहे एवढी?”

सविताला पुढे कांही बोलताच येईना.

तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.

“सवितताई, हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली. तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या. मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.

“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण  सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.

“मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय”वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली.

“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”

“बरं या”.

“चला आण्णा..”

“आण्णा..? ते कशाला..?”  वहिनी आश्चर्याने म्हणाली.

“का? त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं. तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली. कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.

“तसं नाही सविताताई..”

“मग कसं?” आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.

“तुम्ही जा त्याना घेऊन, पण अंधार व्हायच्या आत परत या ”

सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली. फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.

क्रमश:….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्सल (भाग -2) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ पार्सल (भाग -2) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रेमाच्या या लाल-गुलाबी-निळ्या-पिवळ्या चंद्राला अचानक ग्रहण लागलं. त्यावेळी रोहित सुट्टीवर होता. त्याच्या प्रेमाला पाच महीने झाले होते. कुठल्या तरी पार्टीच्या वेळी मीनाक्षीशी ओळख झाली आणि ही  पहिली भेटच प्रेमाच्या अंतहीन कहाणीचा आरंभ होती. मीनाक्षीने या गोर्‍या-चिट्ट्या, सडसडीत सैनिकापुढे जसा काही आपला जीव आंथरला होता. कॉलेजमधल्या आपल्या मित्रांमध्ये मोठी तोर्‍यात मिरवायची. दररोज तिचा हॉस्टेलचा लॅंड-लाईन रात्री अकरा वाजल्यानंतर तिच्या फौजीच्या येणार्‍या कॉलसाठी आरक्षित असायचा. दर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी आर्ची आणि हॉलमार्क्सच्या कार्डांसोबत लांबच लांब पत्रं पाठवणं मीनाक्षीचा एकमेव उद्योग झाला होता. पहिल्या भेटीनंतर पाच महिन्यांनी रोहितला सुट्टी मिळाली, तेव्हा त्याच्या येण्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली तापणारी संध्याकाळ, मीनाक्षीला थंडगार झुळुकीचा सुखद गारवा देऊन गेली. त्या सुखद गारवयाचा प्रभाव चार दिवसच केवळ राहिला. रेडियो आणि टेलिव्हिजनवर सगळ्या फौजींची सुट्टी रद्द केलेल्याचे संदेश येऊ लागले आणि त्यांना आपआपल्या बटालियनला रिपोर्ट करण्याचे निर्देश मिळाले.

अडीच महीने होऊन गेले होते. फोनवरसुद्धा बोलणं होत नव्हतं. पत्रांचे मात्र ढीग लागत होते. विशेषत: मीनाक्षीची पत्रे. त्याला येणारे रोजचे लिफाफे सगळ्या बटालियनच्या चर्चेचा विषय झाले होते. जेव्हा त्या विशेष मिशनवर जाण्याचं नक्की झालं, तेव्हा नियमांनुसार कमांडिंग ऑफिसरने त्याला काही पत्र लिहून ठेवण्याविषयी सांगितलं. जर मिशनहून परत येणं झालं नाही तर ती पत्रे पाठवली जातील. रोहितने मम्मी आणि मीनाक्षीसाठी एक एक पानभर पत्र लिहून ठेवलं होतं. आता या परतीच्या प्रवासात तो हसत होता. ही पत्रे खूप… खूप वर्षांनंतर तो आपल्या मुला-मुलीला दाखवणार होता.

तीन तासांचा तो प्रवास जेव्हा संपला, तेव्हा सकाळची कोवळी किरणे दूरवर पसरलेल्या त्या वळवंटाला एक वेगळीच चमक प्रदान करत होती. बेसच्या प्रांगणात कमांडिंग ऑफिसर आणि सगळे जवान त्याच्या टीमच्या स्वागतासाठी उभे होते. रोहितला हसू आलं. आत्ता पाचच दिवसांपूर्वी सगळ्यांनी गळ्यात गाळे घालून त्याच्या टीमच्या जवानांना निरोप दिला होता. न जाणे पुन्हा भेट होईल की नाही? कमांडिंग ऑफिसरने पुढे होत रोहीतला गळामिठी घातली आणि म्हणाले, ‘वॉर इज ओवर… बॉय… वेल काम बॅक.’

सगळ्या औपचारिकता संपवून थकला-भागला रोहीत आपल्या टेंटमध्ये… तंबूमध्ये परतला, तेव्हा एक मोठसं पॅकेट चारपाईवर त्याची वाट बघत होतं॰ ते पहाताच थकला-भागला रोहीत एका नव्याच  जोशाने, उत्साहाने भारला गेला. रायफलच्या नळीवर लावलेलं लांब, धारदार बॉनेट, शत्रूवर वार करू शकलं नव्हतं, ते सध्या पॅकेटला लावलेल्या सगळ्या टेप्स उस्कटण्यात व्यस्त होतं आणि पॅकेट उघडताच रोहीतच्या हैराणीला पारावार राहिला नाही. ‘शी हॅज गॉन क्रेजी..ऑर व्हॉट..’ असं बडबडत तो पॅकेटमध्ये असलेल्या वस्तूंकडे एकटक बघत राहिला. त्यात तीन-चार ब्रेडचे डबे, दोन-तीन जॅमच्या बाटल्या, बोर्नविटा आणि कॉम्प्लानचा एक एक जार, मॅगीची खूपशी पॅकेटस आणि चॉकलेट्सचा ढीग. पॅकेटच्या एका कोपर्‍यात एक छोटंसं पत्रही होतं. रडाव्या अक्षरात त्यात लिहीलं होतं,

‘शोना, मला खूप वाईट वाटतं, पाकिस्तानी मीडिया रोज दाखवतेय, इंडियन आर्मीला खायला मिळत नाहीये… तुम्ही लोक रोज फक्त डाळ-भात खाऊन रहाताय. मला माहीत आहे, ही गोष्ट तू मला कधीच सांगणार नाहीस आणि इंडियन मीडिया खरी माहिती देणार नाही. आजपासून मीसुद्धा फक्त डाळ-भातच खायला सुरुवात केलीय. तुझ्यासाठी खाण्याचं काही सामान पाठवते आहे. तुझ्यापर्यंत ते सगळं पोचेल की नाही, मला चिंता वाटतेय. ‘आय अ‍ॅम वेरी वरीड अबाऊट यू! प्लीज संधी मिळेल तेव्हा फोन कर. … आय मिसिंग यू लाइक हेल!’

. . . . . . . . . . .

पत्र वाचून रोमिओ टॅंगोचं गडगडाटी हसणं, त्याच्या तंबूमधून बाहेर पडून सार्‍या बटालियनला आपल्या कवेत घेऊ लागलं.

 

मूळ कथा – ‘पार्सल’ –   मूळ  लेखक – श्री गौतम राजऋषि 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पार्सल (भाग -1) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ पार्सल (भाग -1) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘बेस फॉर रोमिओ टॅंगो…. बेस फॉर रोमिओ टॅंगो…. रिपोर्ट योर स्टेटस, ओवर!’

‘रोमिओ टॅंगो फॉर बेस ऑस्कर किलो, जस्ट थ्री ऑवर्स अवे, ओवर!’

‘बेस फॉर रोमिओ टॅंगो…. वेल डन! आपल्यासाठी एक मोठं पार्सल दिल्लीहून आलय. प्लीज पिकअप ऑन योर वे, ओवर!’

‘रोमिओ टॅंगो फॉर बेस… सेंडर्स डिटेल? ओवर!’

‘बेस फॉर रोमिओ टॅंगो….दिल्लीहून… मीनाक्षी, ओवर!’

‘रोमिओ टॅंगो फॉर बेस…हाऊ बिग पार्सल, ओवर!’

‘बेस फॉर रोमिओ टॅंगो…. ओवर एंड आऊट!’

रोमिओ टॅंगो….उर्फ रोहित ठाकूर… कॅप्टन रोहित ठाकूर, बेसद्वारा अचानक बंद केलेल्या वायरलेस सेटच्या या वार्तालापावर जाम चिडला. ‘अबे, नीट सगळं सांगायचच नव्हतं, तर सांगितलच कशाला पार्सलबद्दल!’ काय पाठवलं असेल बरं मीनाक्षीनं? उत्कंठेनं जसं काही त्याला मरायला होत होतं. तीन तासांची परतीची वाटचाल अचानक त्याला असह्य वाटू लागली. बेस हेडक्वार्टरकडे उडत जावसं वाटू लागलं.  वाटू लागलं की बेसला संदेश पाठवावा की काहीच ठीक नाही इथे… ‘नॉट ऑस्कर किलो ओवर… म्हणजे इथे काही ठीक नाही. ‘लवकरात लवकर एक हेलीकॉप्टर पाठवा. ओवर!’ इकडे त्याच्या बरोबर तुकडीत सामील असलेले जवान त्याची चेष्टा करत होते.

‘काय झालं साहेब, गर्लफ्रेंडचं पार्सल आलं… आय हाय !.. चला साहेब, दुश्मनांशी  सामना नाही झाला, तर काय झालं… आपल्यासाठी गिफ्ट तर आली.’

‘गप्प बसा रे! आधीच मूड खराब झालाय. त्यात आणि तुम्ही मला खेचू नका. बेसमधून बोलणारा कोण ऑपरेटर होता? तिथे पोचलो की त्याची चांगलीच झडती घेतो. एक तर सांगायचच नाही. सांगितलं, तर पूर्णपणे सांगायचं ना! कंबख्त!’ कॅप्टन रोहितची चीड जशी काही त्या वाळवंटातल्या तापलेल्या वाळूशी स्पर्धा करत होती.

‘साहेब, त्याची चूक असेल असं नाही. त्या बिचार्‍याने आपल्याला बरं वाटावं म्हणून सांगितलं असेल. मोठे साहेबसुद्धा ट्रान्समिशन ऐकत असतील, तर त्याला त्यांचा ओरडा खावा लागणारच ना की वायरलेस सेटवर फालतू गोष्टी बोलायच्या नाहीत म्हणून! म्हणून तर त्याने एकदमच ओव्हर एंड आऊट केलं असणार!’ हवालदार किशनने नेहमीप्रमाणे समजुतीची गोष्ट सांगितली, तेव्हा रोहितलाही वाटलं, कदाचित असंच काही तरी झालं असेल.

कॅप्टन रोहितची पंध्रा जणांची तुकडी, पाच दिवसांपूर्वी एका खास मिशनवर निघाली होती पण अचानक त्यांना परत येण्याचा निर्देश मिळाला. हा परत फिरण्याचा हुकूम अगदी निराशाजनक वाटला कॅप्टन रोहितला. या मिशनसाठी कमांडिंग ऑफिसरने, टीम लीडर म्हणून त्याची निवड केली, तेव्हा तो उत्साहाने नुसता रसरसत होता. आपल्या टीमसाठी जवानांना निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला दिले होते. बटालियनच्या उत्कृष्ट जवानांधून चौदा जवानांची तुकडी मिशन पूर्ण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने निघाली. या मिशनच्या सफलतेवर कारगीरवर चालेल्या धमासान युद्धाची दिशा ठरणार होती. मिशनसाठी निघाल्यानंतर तीन दिवसातच दोन्ही राष्ट्रांमध्ये चर्चा झाली आणि आदल्या दिवसापासून युद्धबंदीची घोषणाही झाली.

मिशन बाबतची सगळी माहिती त्याला दिली गेली, त्याच्या कमांडो टीमनी काय काय करायचय हे सांगितलं गेलं, या मिशनच्या सफलतेवर किती किती आणि काय काय निर्भर आहे, हे त्याला सांगितलं गेलं, तेव्हा तो वेगळ्याच नशेत होता. त्याला थोडसं समाधान मिळालं. त्याचे यार- दोस्त, त्याचे किती तरी बॅच मेटस कारागिलवर प्राणांची बाजी लावत असताना तो जेसलमेरच्या या उदास वाळवंटामधे आपल्या बटालियन बरोबर झक मारतोय. रात्रंदिवस, सकाळ – संध्याकाळ ही गोष्ट त्याला टोचत राहयाची. वाटायचं, त्याच्या बटालियनला या पश्चिमी सीमेवर का ठेवलं? त्याच्या बटालियनला या वेळी द्रास किंवा कारागिलला का पाठवलं नाही? मीनाक्षीला तो रोज पत्रातून आपल्या मनातल्या या टोचणीबद्दल लिहायचा आणि त्यावर मीनाक्षीचं खळखळणं… ‘बरं झालं तू कारागिलमध्ये नाहीयेस. जास्त हिरोगिरी दाखवण्याची गरज नाही,’ वगैरे… वगैरे…

 

मूळ कथा – ‘पार्सल’ –   मूळ  लेखक – श्री गौतम राजऋषि 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 5) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 5) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆

पावलांचा आवाज ऐकल्यावर पुस्तक बाजूला सारून सरांनी समोर नजर टाकली. डोक्यावर काळे पांढरे केस. जडावलेला चेहरा काळ्या फ्रेमच्या चष्म्यामुळे अधिकच गंभीर वाटत होता.

विषयाला हात घालण्यापूर्वी सरांना खूश करावं म्हणून अशोकनं विचारलं, “सर, तुम्ही कसे आहात?”

काही क्षण भवेश सर अशोकाच्या चेहऱ्याकडे निरखून पहात राहिले. “मी ठीक आहे, पण मी तुला ओळखलं नाही. कसं ओळखणार? आता वय झालंय माझं! किती विद्यार्थी आले आणि गेले, सगळ्यांचे चेहरे लक्षात राहत नाहीत.”

मी त्यांचा विद्यार्थी आहे, असं सरांना वाटतंय. फारच छान! या खोटया नात्यामुळे माझं काम फत्ते झालं तर बरं होईल.

भवेश सर अजूनही अशोकाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहात होते. हातातलं पुस्तक खाली ठेवून म्हणाले, “अरे, अगदी सुकून गेलाय तुझा चेहरा. पाणी देऊ?”

“हो सर, केव्हापासून तहान लागलीय.”

सर घरात गेले. एक लहान मुलगी, बहुतेक कामवाली असावी, हातात पाण्याची लोटी आणि वाटीत दोन लाडू घेऊन आली. अशोकनं गटागट पाणी पिऊन टाकलं. त्याच्या पाठी सर उभे होते.

“आपल्याला एक विनंती करायची आहे.”

हसून भवेश सर म्हणाले, “विद्यार्थ्यांनं केलेल्या विनंतीला मी नाही म्हणू शकेन का? बोल.”

अशोकनं बॅगेतून दोन पुस्तकं बाहेर काढली.

“ही व्याकरणाची पुस्तकं आम्ही नवीनच प्रकाशित केलीयत. सर, आपण ही पुस्तकं बघता का?”

“ठीक आहे. मी बघतो. तोपर्यंत तू लाडू घे.”

अशोक वरमला. ‘आपला माजी विद्यार्थी’ म्हणून सर किती प्रेम करतायत! आता एकदा पुस्तकं खपली की गंगेत घोडं न्हायलं.

खाऊन झाल्यावर अशोकनं वाटी बाजूला ठेवली आणि हळूच वर पाहिलं. भवेश सर पुस्तक चाळत होते. थोडया वेळानं पुस्तकं बाजूला ठेवत सर म्हणाले, “इतका वेळ आपण बोलतोय, पण मी तुझं नावही विचारलं नाही.”

“अशोक रॉय.”

“अशोक रॉय…’असं मनातल्या मनात पुटपुटल्यावर अचानक भवेश सरांचा चेहरा पडला. काही क्षण गप्प बसल्यावर म्हणाले, “तू आमच्या शाळेतून पास झालास?”

जरा इकडेतिकडे बघितल्यावर अशोक उत्तरला, “हो, सर.”

“किती साली?”

“दोन हजार एक.” सर काहीसे गंभीर झाले. त्यांनी चष्मा काढला.

“येतो सर.” पुस्तकांबद्दल अशोकाला काहीतरी बोलायचं होतं, पण धीर झाला नाही.

“ऐक”

सरांची हाक ऐकून गेटपर्यंत पोचलेल्या अशोकनं चमकून मागे वळून पाहिलं. “सर, आपण मला बोलावलंत?”

“तुझी पुस्तकं आम्ही शाळेकरता घेऊ.”

आनंदातिशयानं अशोकाचे डोळे लकाकले.

“खरंच सर, मी तुमचा आभारी आहे.”

गंभीर आवाजात सर हळूहळू बोलू लागले, “आभार मानायची काही जरूर नाही, पण तू माझ्याशी खोटं बोलतोयस. दोन हजार एक साली आमच्या शाळेतल्या अशोक रॉय नावाच्या एकाच मुलाने माध्यमिक परीक्षा दिली होती. खूप हुशार विद्यार्थी होता तो, पण रिझल्ट लागायच्या तीन दिवस आधी तो बसच्या अपघातात मरण पावला.”

एवढं बोलून भवेश सर क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य हळूहळू लोप पावले आणि त्याची जागा विषण्णतेनं घेतली. “तो अशोक रॉय कोण होता माहितेय का तुला? तो होता माझा एकुलता एक मुलगा.”

क्षणार्धात अशोकाच्या ह्रद्यात एक तीव्र कळ उमटली. त्याला असह्य वेदना जाणवू लागली. तोंडातून शब्द फुटेना. डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या.

समोर भवेश सर उभे होते. आता त्यांचा चेहरा निर्विकार झाला होता. शांतपणे ते म्हणाले, “तू खोटं बोलतोयस, हे समजूनही मी पाठयपुस्तकं का घेतली माहीत आहे? तुझी ओळख खोटी असेल, पण तुझ्या डोळ्यातलं कारुण्य, दिवसभराची वणवण, पोटातला आगडोंब आणि तहानेनं व्याकूळ झालेला तुझा जीव – हे सारं तर खोटं नव्हतं. तुझ्या खोटया ओळखीपेक्षा हे वास्तव अनेक पटींनी दाहक होतं.”

अशोक समोर बघतच राहिला. भवेश सरांच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर ईश्वरचंद्र विद्यासागरांचा फोटो टांगला होता. या वेळपर्यंत अशोकला तो दिसलाच नव्हता. अनिमिष नेत्रांनी तो त्या फोटोकडे बघत राहिला. बघता बघता डोळ्यासमोरच्या सगळ्या गोष्टी दिसेनाशा झाल्या. कुठे काहीही दिसत नव्हतं. हळूहळू ते दोन्ही चेहरे एकमेकात मिसळत एकरूप झालेले त्याला दिसले.

कथा समाप्त

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी sumatijoshi154@gamil.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 4) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 4) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆

सनातनचं कोणतच बोलणं अशोकच्या कानात शिरत नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं, ‘भवेश सर.’ सनातनकडे पहात त्यानं विचारलं, “भवेश सर कसे आहेत?”

“सज्जन आहेत. इतरही शिक्षक आहेत, पण भवेश सर सांगतील, त्याप्रमाणे सगळे शिक्षक वागतात.”

“बंगाली पुस्तकांचा निर्णय ते घेतात का?”

गप्पा मारता मारता दोघेजण मोठया भिंतीची तटबंदी असलेल्या देवळापाशी येऊन पोचले. खूप विशाल देऊळ. चारी बाजूला व्हरांडा. देवळाचा दरवाजा बंद होता. अशोकनं हात जोडले.

“कोणाचं देऊळ?”

“शंकराचं. आमच्या शाळेचे संस्थापक परमेश्वर मझुमदार. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे विद्यार्थी. ते मूळचे याच गावचे, पण कोलकात्याला रहात. तेव्हा इथे एकही शाळा नव्हती. परमेश्वर मजुमदार यांनी स्वत: कमावलेल्या निधीतून वडिलांच्या नावानं देणगी दिली आणि खूप कष्ट करून ही शाळा उभी केली. ते कोलकात्याला मोठया हुद्द्यावर नोकरी करत होते. ती नोकरी सोडून त्यांनी या शाळेची जबाबदारी घेतली. तेव्हा ही शाळा अगदी छोटी होती. शिवाय त्यांनी इथे दवाखाना काढला, देऊळ बांधलं, नदीवर घाट बांधला. अनेक सामाजिक कामात लक्ष घातलं.”

“त्या काळी अशी उदार मनाची अनेक माणसं दिसत असत. आता तशी माणसं कुठायत?”

सनातनने मान डोलावली. ‘खरंच भाऊ तुम्ही बरोबर बोलताय. तेव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारखे आदर्श शिक्षक होते, म्हणून आदर्श विद्यार्थी तयार होत. आता शिक्षकांनी आपली सारी कर्तव्यं सोडून दिलीयत. त्यामुळे बघता बघता त्यांच्याविषयीचा आदर कमी होऊ लागलाय.”

अशोकला सनातनचं म्हणणं पटलं. शिक्षकांविषयीचा गेल्या दोन वर्षातला त्याचा अनुभवही काही खास नव्हता. सगळ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या. विद्यार्थ्यांना धाकदपटशा दाखवून पुस्तकं विकावी लागत. शिक्षक कमिशन घेत. इतकं करून पुस्तकं विकली गेली नाहीत, तर सकाळ संध्याकाळ मालकाची बोलणी खावी लागत. नुकतीच घडलेली एक घटना अशोकला आठवली. एका शाळेत पुस्तकविक्री झाली नाही. तरीही न रागावता त्याला मास्तरांच्या कलानं घ्यावं लागलं होतं. त्या शाळेत शेवटी मास्तरांनीच त्याला धीर दिला, ‘आज शुक्रवार. आज पुस्तकं विकली गेली नाहीत, तरी काळजी करू नकोस. उद्या शनिवार. उद्या माझा तास आहे. सोमवारपासून तुझी पुस्तकं विकली जातील.’

अशोक अवाक झाला. या सुशिक्षित लोकांना काही जादू करता येते की काय? गेल्या एकवीस दिवसात एकही पुस्तक विकलं गेलं नाही आणि आता फक्त तीन दिवसात…!

शनी, रवी, सोम यानंतर मंगळवारी संध्याकाळी पुस्तकांच्या दुकानाचा मालक प्रकाशन संस्थेच्या ऑफिसमध्ये हजर झाला, “सर्व पुस्तकं संपली, आणखी लागतील.”

“असं कसं झालं? मास्तरना जादूटोणा अवगत आहे काय?”

कुत्सितपणे हसत दुकानाचा मालक उत्तरला, “तुम्ही शुक्रवारी शाळेत गेला होतात ना? त्यांच्या प्रेस्टीजला धक्का लागला. कमिशनचे पैसे त्यांनी आधीच घेऊन ठेवले होते आणि पुस्तकांची विक्री करता आली नाही. शनिवारी वर्गात गेल्यावर पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत प्रत्येक मुलाला वेताच्या छडीनं असं मारलं की दुसऱ्या दिवसापासून घाबरत घाबरत मुलं पुस्तकं खरेदी करू लागली.” अशोकला वाईट वाटलं. अपराधीपणाची भावना त्याच्या मनात घर करून राहिली. आज भवेश सरांना भेटताना या आठवणीने त्याच्या मनाचा थरकाप उडाला.

भावविवशतेचं जग तुम्हाला एका विचित्र वळणावर घेऊन जातं. भवेश मास्तरांकडे गेल्यावर आणखी काय करावं लागेल, कोणास ठाऊक!

आपण सरांच्या घरापाशी आलोय’, हे सनातनचे शब्द ऐकून अशोक भानावर आला. “हे भोवताली बाग असलेलं घर आहे ना, तिथेच भवेश सर राहतात. आज घरी सर एकटेच आहेत. सरांची बायको सकाळीच माहेरी गेलीय. तुम्ही खुशाल सरांच्या घरी जा. तुम्हाला काही अडचण येणार नाही. मला दुसऱ्या दिशेला जायचंय.”

रस्त्याच्या कडेला भवेश सरांचं घर. घराच्या चारी  बाजूना मोकळी जागा. घराला मोठा व्हरांडा. चहूबाजूना झाडंझुडपं आणि या सगळ्याला बांबूचं वेष्टण. लहानसं लोखंडी प्रवेशद्वार. कानोसा घेत अशोकनं घरात प्रवेश केला. माणसांची चाहूल लागेना. सगळीकडे शांतता पसरली होती. इकडेतिकडे बघितल्यावर व्हरांडयातल्या खुर्चीवर बसलेली, धोतर नेसलेली, पुस्तक वाचत असलेली एक पाठमोरी आकृती दिसली. पुस्तकामुळे चेहरा नीट दिसत नसला तरी भवेश सरांना ओळखण्यात अशोकची चूक झाली नाही. बॅग खाली ठेवून अशोक हळूहळू पुढे गेला.

क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी sumatijoshi154@gamil.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – स्वामीनिष्ठा ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – स्वामीनिष्ठा ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १४ . स्वामीनिष्ठा

विशालपूर नगरात एक राजा होता. तो शूर  राज्यकर्ता होता. धर्माचे पालन करीत  न्यायानुसार प्रजेचे व राज्याचे संरक्षण करीत होता.एकदा त्याला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या  शत्रूने त्याच्या नगरावर आक्रमण केले.  युद्धात राजाला पराजित व्हावे लागले. या पराजयाचे त्याला अतोनात दुःख झाले. तो  नगराचा त्याग केलेला  व केवळ एकाच मंत्र्याची साथ लाभलेला राजा अरण्यात  आला.   तिथेसुद्धा तो शत्रूच्या भयाने कुठेही अधिक काळ थांबू शकत नव्हता.  काट्याकुट्यातून, तीक्ष्ण दगडांवरून पादत्राणे-विरहित, चालण्यास असमर्थ असलेला, तहान-भुकेने व्याकूळ झालेला, ‘पुढे काय करावे?’ या विचाराने चिंताग्रस्त झालेला तो राजा एका तलावाकाठी विश्रांतीसाठी थांबला. आपल्यावर ओढवलेल्या या घोर संकटातही आपली साथ न सोडता आपल्याबरोबर येणाऱ्या त्या मंत्र्याला पाहून राजाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या व त्याला खूप वाईटही वाटले.

“हे  मंत्रिवर, माझे संपूर्ण राज्य नष्ट झाले. माझे हत्ती, घोडे, रथ, सैन्यही राहिले नाही. माझ्यावर फार मोठे संकट ओढवले आहे. आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाही. पराजित होऊन अशा मरणयातना भोगण्यापेक्षा जलसमाधी घ्यावी किंवा कड्यावरून दरीत उडी घ्यावी किंवा अग्निप्रवेश करावा असे मला वाटत आहे” अशा प्रकारे विलाप करणाऱ्या राजाचे ते बोलणे ऐकून मंत्र्याचे हृदय विदीर्ण झाले.

राजाला दुःखातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने मंत्री म्हणाला, “महाराज, कालवशात आपले राज्य नष्ट झाले तरी मरण पत्करणे हा त्यावर उपाय नाही. तेव्हा मरणाचे विचार मनात येऊ देऊ नका. जे आपले शत्रू आहेत तसेच ह्या शत्रूराजाचे देखील शत्रू असणारच. त्यांच्याशी मैत्री करून, युद्धाची सज्जता करून, शत्रूचा पाडाव करून पुन्हा नवे राज्य स्थापित करा. नष्ट झालेले राज्य पुनश्च प्राप्त होत नाही असे मुळीच नाही. अमावास्येच्या दिवशी चंद्राच्या सर्व कला क्षीण होतात. तोच चंद्र पुन्हा शुक्लपक्षात वृद्धिंगत होतोच ना? अशाच प्रकारे आपलाही उज्ज्वल काळ येणार व परमेश्वराच्या कृपेने आपलेही मनोरथ पूर्ण होणारच!”

मंत्र्याच्या ह्या प्रेरणादायी वचनांनी राजाचे नैराश्य एकदम दूर झाले. तो प्रफुल्लित झाला. योग्य प्रयास करून, सर्व सैन्य एकत्रित करून राजा युद्धासाठी सज्ज झाला. युद्धात शत्रूला नमवून पुन्हा राजपदी आरूढ झाला. त्या मंत्र्यासह त्याने चिरकाळ राजेपद उपभोगले.

तात्पर्य –  राजाच्या पदरी बुद्धिमान व निष्ठावान मंत्री असले तर ते ओढवलेल्या संकटांवर योग्य उपायांद्वारे मात करू शकतात.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 3) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 3) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆

अशोक निराश झाला. प्रकाशन संस्थेच्या मालकांचा – माधवरावांचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. रात्री जेव्हा मी त्यांच्यासमोर उभा राहीन, तेव्हा ते उपहासानं टोचून टोचून बोलतील, ‘चार दिवसात एकाही शाळेत पुस्तकं खपवता आली नाहीत ना? तुम्ही सगळे एकजात कुचकामी. जा आता.’ असं काहीबाही सांगून बॅग खांद्यावर देऊन मला बाहेरचा रस्ता दाखवतील.

समोर उभा असलेला सनातन ओरडला, “चला बाहेर. आता दरवाजा बंद करायचाय.”

जणू काही घडलंच नाही असं दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला अशोकनं. घसा अगदी कोरडा पडला होता, आता आणखी किती पायपीट करावी लागणारेय कोणास ठाऊक?

“इथे कुठे पाणी मिळेल का प्यायला?”

सनातननं निर्विकारपणे उत्तर दिलं, “तीन दिवसांपासून टयूबवेल खराब झालीय. दुरुस्त करावी लागेल.”

“टयूबवेल नाही, माझं नशिबच खराब आहे.”

“कुठून आलात तुम्ही?” काहीशा नरमाईनं सनातनने विचारलं.

“कोलकात्याहून. इथे रामनगर शाळेत आलो होतो. तिथे काम झालं नाही, पण तिथल्या शिपायानं तुमच्या शाळेचं नाव सांगितलं.”

“कसे आलात?”

“नदीच्या काठाकाठानं चालत आलो.”

किती दूरवरून चालत आलाय हा! हा विचार मनात आल्यावर सनातन वरमला.

“एवढं चालल्यावर तहान लागणारच! कळशीत थोडं पाणी शिल्लक होतं. तेही आत्ताच ओतून टाकलं. पाणी नाही, म्हणून तर शाळेला सुट्टी.”

अशोकनं काहीही उत्तर दिल नाही. बॅग घेऊन जिन्यापर्यंत आल्यावर सनातनने विचारलं, “कोणती पुस्तकं घेऊन आलायत?”

“बंगाली व्याकरण. पाचवीपासून दहावीपर्यंतची उत्तम पुस्तकं आहेत.”

कितीतरी शाळांच्या शिपायांनासुद्धा चांगली जाण असते. एकदा प्रयत्न तर करून पाहू या, असा विचार करून अशोकनं विचारलं, “तुम्ही पहाता का ही पुस्तकं?”

“मी शाळेचा शिपाई. मी पाहून काय उपयोग? भवेश सरांबरोबर बोलणी केली पाहिजेत.”

“ते बंगाली भाषा शिकवतात का?”

“हो. या शाळेतले ते सर्वात जुने शिक्षक. परवा आलात की तुम्ही त्यांना भेटा.”

“भवेश सर कुठे राहतात?”

जिन्यावरून उतरता उतरता मध्येच थांबत सनातन म्हणाला, “तुम्ही एक काम करा. इतक्या लांब आलाच आहात, तर भवेश सरांची भेट घेऊन जा. समोरच राहतात ते. आता सर घरीच असतील. मी पाठवलंय, असं सांगायची गरज नाही.”

अशोकला एक चतकोर आशा वाटू लागली. तो पटकन म्हणाला, “तसं काही असलं, तर फारच चांगलं. आज जर काही पुस्तकं देता आली तर बरं होईल. पुस्तकांची माहिती सांगायला हवी असली तर पुढच्या वेळी वर्गात जाऊन सांगीन.”

“मी त्याच वाटेनं घरी चाललोय. तुम्हाला भवेश सरांचं घर दाखवतो.”

दोघं जिन्यावरून खाली उतरले. सनातनने प्रवेशद्वाराला कुलूप घातलं. अशोक शेजारीच उभा होता. उन्हं कलली होती. दमला असला तरी अशोक उल्हासित झाला होता. त्यानं चौकशी केली, “बस स्टॉप इथून किती लांब आहे?”

“मास्तरांच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला रिक्षा मिळेल. चार रुपयात तो तुम्हाला कदमगाछी बस स्टँडवर नेऊन सोडेल. तिथली कितीतरी मुलं आमच्या शाळेत आहेत. वास्तविक हीच या परिसरातली सर्वात जुनी शाळा. यंदा शंभर वर्षे होतील आमच्या शाळेला. आमचे मुख्याध्यापक म्हणत होते, शाळेचा शताब्दी उत्सव मोठया प्रमाणार साजरा करायचाय.”

क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी sumatijoshi154@gamil.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares