मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काॅलेजचे दिवस.. ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ काॅलेजचे दिवस.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

आमच्या वेळी १०+२ अशी शिक्षण पद्धती नव्हती.

अकरावी पर्यंत शाळा असायची.आणि मग काॅलेज जीवन सुरु.

शाळेच्या शेवटच्या वर्षापासूनच काॅलेजचे वेध लागले होते. काॅलेज म्हणजे खूप काहीतरी वेगळं, फुलपाखरी वातावरणाचं, जिथे गणवेष नसतो, खूप स्वातंत्र्य असलेलं म्हणजे मनात आलं तर वर्गात जायचं नाहीतर दांडी मारायची.. आणि दांडी मारली म्हणून कुणी शिक्षा करत नाही. आणि एखादे प्राध्यापक असतीलच जरा कडक तर आपल्या ऐवजी मैत्रीणीने present sir म्हटलं तरी आपला अटेन्डन्स लागतो…. कारण शाळेसारखे तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखणारे शिक्षक नसतात. वगैरे वगैरे अनेक सूरसकथा ऐकलेल्या होत्या. आणि त्याचं अतीव आकर्षण होतं. आणखी एक, माझं शालेय शिक्षण कन्या शाळेत झालं. त्यामुळे आता मुलांबरोबर एकत्र वर्गात बसून शिकण्याची काय निराळी गंमत असते ते अनुभवायला मिळणार होतं.. मनाच्या खोल कोपर्‍यात कुठेतरी चोरटेपणाने येऊनही गेलं,”……भेटला एखादा स्वप्नातला राजकुमार तर…..”

तेव्हां काॅलेजच्या प्रांगणात पाऊल टाकलं तेव्हा या  सगळ्या गंमतकथा घेऊन… शाळेचा तो तास आणि काॅलेजचे ते लेक्चर, पीरेड. शाळेच्या बाई काॅलेजच्या मात्र मिस.

त्या विवाहित असल्या तरी मिसच… इथे मास्तर नव्हते. इथे सर होते. ते आमच्या डोंगरे मास्तरांसारखे हातात काठी अन् ढगळपगळ कपडे घालणारे नव्हते तर छान सुटाबुटात टाय लावलेले असत..

काॅलेजची ती लेडीजरुम… तिथली मजा औरच होती. तिथे लाॅकर्समधे आपलं सामान ठेवायचं… कधी पीरिएड बंक केला तर मैत्रीणीशी केलेल्या खास गुजगोष्टी असायच्या.. कुणी छान गाणं म्हणत असेल तर तिला गाण्याचा आग्रह करायचा..

कधी मिस किंवा सरांंची नक्कल वगैरे….. मजाच वाटायची सगळ्याची… शिवाय कँटीन या संस्थेशी नव्याने ओळख झाली होती.  रेस्टाँरंटमधे खाण्याची संस्कृती नव्हतीच तेव्हां… त्यामुळे मित्रमैत्रीणीं समवेत मुक्तपणे कधी वडा, कधी मिल्कशेक, नाहीतर कोक प्यायला धम्माल वाटायची…..अर्थात पुन्हा हे सर्व पाॅकेटमनीवर अवलंबूनही असायचंच….पाॅकेटमनी हा एक आणखी पाहुणा शब्द…..

आमच्या काॅलेजमधे सुदैवाने रॅगींग हा प्रकार नव्हता.

मुलांच्यात होतं थोडंफार….फिजीक्स लॅबमधे कुठल्यातरी एका प्रयोगात, एका पात्रात वाफ कोंडवून ठेवल्यामुळे, एक बिच्चारा, काॅलेजयुवकाचा झीरो स्मार्टनेस असलेला मुलगा भाजला होता….कुणीतरी मुद्दाम हे कृत्य केले होते हे नंतर कळले……त्यालाच सतावण्यासाठी..

एकेका वर्षानंतर काॅलेजात चांगलेच रूळलो…

अभ्यास,महत्वाकांक्षा,भविष्याचे विचार होतेच,..

सोबत कॉलेजची गेटटुगेदर्स…आंतरमहावाद्यालयीन नाट्यस्पर्धा…त्या तालमी यांचीही खूप मजा, आनंद, भोगला. काही नाती जुळली. काही तुटली.

काॅलेजच्या बोटॅनीकल गार्डन मधे जीवलग मैत्रीणींबरोबर केलेल्या शेअरींगचे क्षण,आजही तसेच्या तसे आठवतात. भावना बोथट झाल्या असल्या तरी त्या क्षणांनी जे दिलं ते अजुन तसंच आहे मनाच्या खणात…

शेवटचं वर्षं मात्र अभ्यासातच गेलं…आयुष्याची दिशा शोधण्याचं ते वर्ष….आता ही सगळीजणं दूर जाणार.. कुठे कधी कोण भेटणार… काही प्रेमी युगुलांची नाती जमलीही होती… जीवनाच्या वाटेवरचे सोबती भेटले होते… त्यांच्याविषयी कौतुकाबरोबर किंचीत असुयेची छटा होती….आपली वाट अजुन एकलीच…पण सोबत सोनेरी स्वप्नं होतीच की…..

पण असे हे काॅलेजचे रंगीन,सुनहरे दिवस कधी संपले ते कळलंच नाही…

त्यादिवशी फेसबुकवर एक फ्रेंड रीक्वेस्ट होती…

फोटोतला चेहरा नाही पटकन् ओळखला. पण नाव स्मरणात होतं…. नंतरच्या मेसेजमधे त्याने लिहीलं होतं, डोळ्यांवरुन मी तुला ओळखलं…. खूप आवडायचे मला……. गंमत वाटली मात्र… पण माझ्या संस्काराने मात्र रोखलं म्हणताना….

मलाही आवडायचास तू…………!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-5 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-5 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कोणतं साल होतं नक्की आठवत नाही,  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची व्याख्याने होती. खासबान मैदानावर.रोज रात्री नऊ वाजता सुरू होत. संपून घरी परत पोचायला साडेबारा व्हायचे. तुफान गर्दी होती. आम्ही सर्वजण जात असू. शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे प्रसंग,  छोटा शिवबा, जिजाबाई,  शहाझीराजे,  तानाजी मालुसरे, सूर्याजी, नेताजी पालकर, औरंगजेब, शाहिस्तेखान, अफझलखान, रोहिडेश्वराची शपथ, आधी लगीन  कोंढाण्याचं…..असे प्रसंग आणि व्यक्तिरेखा हुबेहूब डोळ्यासमोर उभे केले होते. आम्ही अगदी भारावून गेलो होतो.  आजच्या व्याख्यानात ऐकलेला प्रसंग दुसरे दिवशी आम्ही घरी प्रत्यक्ष नाटकरूपाने अभिनय करायचो. खूपच मजा यायची.  जिजाबाई होण्यासाठी माझी आणि बहिणीची अंजूची वादावादी व्हायची. शिवाजी होण्यासाठी दोघं भाऊ, राजू उजू.ची मारामारी व्हायची. मग आम्ही तह केला. व एकेक दिवस वाटून घेतला.

???

सर्वांत शेवटचा दिवस राज्याभिषेकाचा.

राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष घडवून आणला होता. अनेकजण त्यात अभिनय करत होते. जे आम्ही गेले 15 दिवस घरी करत होतो, ते इथं मोठी माणसे आजचा सोहळा करत होती. प्रचंड प्रचंड गर्दी होती. श्री. बाबासाहेब पुरंदरे खास गुलाबी फेटा बांधून व्याख्यान देत होते.स्टेजवर राज्याभिषेकाचा सेट लावला होता. प्रेक्षक श्वास धरून, जीवाचे कान करून ऐकत होते,  डोळ्यांनी अनुभवत होते. काशीहून आलेल्या गागाभट्टानी मंत्रोच्चाराने सप्तसागर, सप्तसरिताचा पवित्र जलाभिषेक केला. राजवस्त्रे,  जिरेटोप  लेवून राजे सिंहासनाजवळ गेले. त्यांनी सिंहासनाला मुजरा केला. पाय न लावता आरूढ झाले.

शिंग- तुता-या निनादल्या. चौघडे ताशांचा गजर झाला. 32 मण वजनाचे सिंहासन  रोमांचित झाले. दणदणीत आवाजात घोषणा झाली,

” गडपती, गजअश्वपती,  भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,  महाराजाधिराज, राजाशिवछत्रपती महाराज की जय!”

जमलेल्या हज्जारोंनी जयजयकार केला. प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून आली होती. जयजयकाराने अवघे खासबाग मैदान दणाणून गेले होते. मैदानाच्या बाहेर हजारो लोक उभे होते. अख्खे कोल्हापूर रात्री साडे बारा वाजता जयजयकार करत होते.

दुसरे दिवशी वर्तमान पत्रात सोहळ्याचे फोटो आणि वर्णन वाचले आणि त्या सोहळ्यात आपल्याला उपस्थित रहायला मिळाले, ही गोष्ट भाग्याची,  अभिमानाची वाटली.

नंतर पुढे महिनाभर आमची शिवचरित्राची नाटके चालू होती.  परिक्षा आली म्हणून ते वेड बाजूला ठेवावं लागलं.

हे नकळत आमच्यात रुजलेले संस्कार आयुष्य भराची शिदोरी ठरले.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महापंचमी रथोत्सव सोहळा ☆ सौ. अर्चना देशपांडे 

 ☆ मनमंजुषेतून ☆ महापंचमी रथोत्सव सोहळा ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆ 

आई जगदंबेचे‌ एक रूप म्हणजे गोव्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवी.

देवीचे मंदीर सुंदर व भव्य असून पोर्तुगीज व भारतीय स्थापत्य रचनेचे उत्तम उदाहरण आहे.

देवालयाच्या गाभाऱ्यात शांतादुर्गा देवीची मनमोहक आणि तेजस्वी मूर्ती आहे. शंकर आणि विष्णू यांचे भांडण मिटवून दुर्गेने त्यांना शांत केले म्हणून तिचे नाव शांतादुर्गा पडले.

शांतादुर्गा देवी संस्थानाचा वार्षिक जत्रा महोत्सव माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध अष्टमी पर्यंत चालतो.

माघ शुद्ध पंचमीला पहाटे ४.३० वाजता देवीची मिरवणूक निघते. या वेळी सागवानी चार मजली रथ फुलांनी सुंदर सजविला जातो  त्यावर विद्युत रोषणाई केली जाते.  ती रोषणाई पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. देवीचे आकर्षक मंदिर व दीपमाळेवरील रोषणाई मुळे शोभा अजूनच‌ वाढते. प्रथम देवळातून  मूर्ती पालखीतून मंदीरासमोर आणली जाते. नंतर  टाळ आणि ताशांच्या गजरात आरती होते.  देवळाला एक प्रदक्षिणा घालून पालखी महारथाजवळ आणली जाते. रथाच्या तिसऱ्या मजल्यावर मूर्ती बसवली‌ जाते व मठाधिपती श्री स्वामींच्या हस्ते नारळ  फोडून महारथ हलवला जातो. सात फुटाहून जास्त व्यास असलेल्या चाकांचा रथ  दोरखंडांनी ओढला जातो. जो तो पुढाकार घेऊन , एकामेकांच्या साथीने  भाविक जन  रथाची  देवळाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात.  ठीक ठिकाणी भाविक रथाला स्पर्श करून श्रद्धेने दर्शन घेतात. प्रदक्षिणा पूर्ण झाली की  सोन्याच्या पालखीतून मूर्ती मंदिरात नेतात पुन्हा मंदिरात आरती होते.

ह्या विलोभनीय दर्शनाने स्थैर्य व शांतता मिळते.

मंदिराची  जागा हरिजनांनी देवस्थानला दिलेली आहे म्हणून षष्ठीला पालखीसोबत आलेल्या हरिजनांचा‌ सत्कार व सन्मान केला जातो.

© सौ अर्चना देशपांडे 

मो.नं‌‌ ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

आई-वडिलांच्या महती विषयी आपण सगळेच जाणून आहोत. त्यांचे आपल्यावर असलेले ऋण आपण वर्णूच शकत नाही. माझ्या बाबतीतही हेच खरे आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की असे आई-बाबा मला लाभले.

माझा जन्म झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच माझ्या चेहऱ्यावर ती प्रतिसाद न आल्याने आईच्या मनात शंकेची आणि काळजी ची पाल चुकचुकली. त्याच वेळी आजीने मात्र अचूक ओळखले आणि माझ्या दृष्टीमध्ये काहीतरी कमी आहे हे तिला जाणवले. त्यानुसार माझ्यावर योग्य ते उपचार सुरू झाले आणि माझी जास्तच काळजी घेतली जाऊ लागली.

मी जसजशी मोठी होऊ लागले, तोपर्यंत मला काहीच कधीच दिसणार नाही हे सत्य आई-बाबांना नक्की समजून चुकले होते. पण मला दृष्टी नाही म्हणजे मी काहीच करू शकणार नाही असा विचार न करता आईने मला असा विश्वास दिला की मी माझ्या बुद्धीच्या जोरावर आणि इतर अवयवांच्या सहाय्याने सर्वकाही करू शकेन. आपली मुलगी पूर्ण अंध असताना ही तिने मला उभारी दिलीआणि स्वावलंबी बनवले. त्यामुळे मी सर्वसामान्य मुलींसारखे वावरू लागले. मोठे होऊ लागले.

नृत्यांगना म्हणून माझी ओळख झाल्यानंतर कार्यक्रम ठिकठिकाणी होत असताना, ड्रेस अप करणे, हेअर स्टाईल करणे, उत्तम मेकअप करणे, निवडक योग्य असे दागिने घालणे, यामध्ये आई इतकी एक्सपोर्ट झाली की केवळ त्याच मुळे बाहेरून ब्युटीशियन बोलावून मेकअप करून घेण्याची मला गरजच भासली नाही आणि आज पर्यंत आमचे हेच रूटीन सुरू आहे.

जशी आईनं मला साथ दिली तशीच शाळेच्या बाबतीत, अभ्यासामध्ये, नृत्य कलेमध्ये, बाबांनी मला योग्य मार्गदर्शन केले. माझ्या शिक्षणावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले. इतकं की मला एक प्रसंग आठवतो. बाबांची शाळा बारा ते साडेपाच होती. काम जबाबदारीचे होते. शाळेत इन्स्पेक्शन चालू होती आणि माझा नृत्याचा क्लास पाच ते सहा या वेळात होता. मधल्या वेळात वेळ काढून मला क्लासमध्ये सोडण्यासाठी बाबा आले आणि त्यांच्या त्यांच्या वेळी साहेबांपुढे फाईलही हजर केली. खरच किती अवघड होते हे काम.

अशा तऱ्हेने समाजातील इतर दिव्यांग मुलांच्या पालकांसमोर माझ्या आई-बाबांनी आदर्श घालून दिला असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नवरा बायकोच्या जोडी तली एकटी बायको राहिली तरी ती घरातल्या काहीना काही कामात रमू शकते. वेळ घालवू शकते. पण विधुर मात्र घरातल्या कामात लुडबूड करू शकत नाही. त्याची कुचंबणाच होते.हल्ली आम्ही जेष्ठ नागरिक असे काही मित्र कोपऱ्यावरच्या बागेत गप्पा मारायला जमतो. आणि वेळ चांगला जातो. पण अलीकडे कोणी ना कोणी गप्पा मारताना तोंड चालवायला काहीतरी आणत असतात. मी घरातल्यांना काही करायला न सांगता, बाहेरच्या बाहेर काहीतरी घेऊन जातो. आणि मग घरी जातानाही सर्वांना घेऊन जातो.

तू खरं तर किती उद्योग करत होतीस. इतकंच नाही तर पै पै करून पैसे साठवत होतीस. का तर म्हातारपणी औषध आणि दवाखान्याला किती लागतील कुणास ठाऊक?असं नेहमी म्हणायचीस. सुजय डॉक्टर  असूनही तुला अस का वाटत होतं काय माहित! सात आठ किलोमीटर अंतरावर त्याचा दवाखाना होता. मला जरा काही झालं की., तू त्याला फोन करून लगेच बोलवायचीस. एकदा त्यांनी तुला सांगितलं की “आई बारीक-सारीक साठी बोलवत जाऊ नको ग दवाखान्यात पेशंट थांबलेले असतात मग गोंधळ होतो” स्वाभिमानी होतीस तू. तब्बेतीसाठी पुन्हा नाही कधी त्याला फोन केलास तू. खरच तुला औषध, उपचार, दवाखाना, डॉक्टर कशाचीच गरज नाही कधी  लागली. झटकन सगळ्यांना सोडून निघून गेलीस. तुझे कष्टाचे पैसे आम्हालाच ठेवून गेलीस. सगळं सगळं आठवत बसतो. आणि बेचैन होतो ग! त्या पैशापेक्षा तू राहिली असतीस तर! पैशापेक्षा तुझी लाख-मोलाची किंमत आज तु नसताना मला पोखरून काढतीय. विधूर‌‌‌ म्हणून मी जीवन कंठतोय.

कितीतरी गोष्टी आठवत बसतो. कितीतरी निर्णयाच्या वेळी माझा नवरेपणाचा अहंकार जागृत व्हायचा. आणि सुनांसमोर लोकांसमोरही मी तुला मापात काढायचो. महिलामंडळासारख्या ठिकाणी अलीकडे कितीतरी स्पर्धांमध्ये तू बक्षीस मिळवून दाखवलीस. अभिनंदनाचा वर्षाव झाला. अभिमान सिनेमातल्या सारखा माझ्या अस्मितेला तडा गेला. तुझ कौतुकही लोकांना सांगायचो. पण ते सांगताना त्यातही कुठतरी मीपणा असायचाच. नवरे पणाचा अहंकार होता तो! एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती,  की कोणासमोर तुला मी बोलायला नको होत. तीच गोष्ट एकटं  असताना सांगता आली असती.  तुला खरं तर माणसांची आवड होती. पण तरीही स्वतंत्र संसाराचीही इच्छा होती.पण ती कधीच पूर्ण झाली नाही. हल्ली कधीतरी जवळच्या संबंधातल्या कोणाकडेतरी कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग येतो.अनेक जण जोडी जोडीने आलेले पाहिले की माझ्या डाव्या बाजूच मोकळं अस्तित्व मला सलत रहात. सगळे तुझी आठवण काढून ते कौतुक करायला लागले की आठवणींचा कढ येतो. आणि त्या बेचैनीला शब्द नसतात.

छोटा सोन्या नातू आजोबांजवळ आला. आजोबांना भूतकाळातून वर्तमानात आणल त्यांनी. आजोबाना  म्हणाला “डोळे मिटा आजोबा. गंमत दाखवतो. आजोबांनी बंडोपंतानी डोळे मिटले. दोन मिनीटात  सोन्याने आजोबांच्या डोळ्यासमोर फोटो  धरला. आणि “आता उघडा डोळे”. आजीचा आणि तुमचा फोटो!  गंमत आहे की नाही ! हा फोटो मी तुम्हाला दाखवायला आणलाय. छान आहे ना? डोळ्याला थोडे कमी दिसत होते पण तरीही ते फोटो कडे पहात राहिले. अस्ताला निघालेल्या सूर्याचा एक सोनेरी तांबूस किरण फोटोवर पडला. आणि तिन्हीसांजातही तो फोटो त्यांना छान दिसला. आजोबांच्या बंडोपंतांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. फुलंल आणि खुलल.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

बंडोपंत आज गॅलरीत आरामखुर्चीत विचारमग्न होऊन शांतपणे बसले होते. नजर शून्यात होती. हे शून्य काय आहे? शून्य तर काहीच नाही. काहीच नाही. मधलं सगळं सगळं पहात बसले होते.

राधा काकू गेल्यापासून बंडोपंत खूपच शांत शांत झाले होते. फारसै कोणाशी बोलत नव्हते. कोणत्याही गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया देत नव्हते. आपलं मतप्रदर्शन करत नव्हते. मूकपणाने निर्विकारपणे घरातल्या सगळ्या घटना त्रयस्थपणे पहात रहायचे.राधा काकूंना जाऊनही आता सहा महिने होऊन गेले. खरंतर सगळं काही मनासारख छान दिसावं असं होत. सुजय डॉक्टर झाला. सुमंत सीए झाला. शिवांगीच लग्न हन तिचा संसार उत्तम चाललाय. काय कमी होत! मोठी उणीव होती. भरुन न निघणारी. एक मोठी पोकळी त्यांना जाणवत होती. आणि त्या पोकळीतल्या शून्यातच ते भूतकाळात गेले. मनाने राधा काकूंशी बोलत राहिले.

आपलं लग्न झालं आणि भरल्या धान्याचे माप ओलांडून तू या घरात आलीस. आणी घराचं रुपडच पालटून गेलं. सरवायची जमीन आणि कौलाच छप्पर असलेल्या आणि अडचणीच्या घरातही न कुरकुरता चार-पाच वर्ष आपण काढली. पण तेही घर फ्लट वाटत होतं.

दिवस जात होते घरातला व्याप बराच होता. आले गेले पाहुणे सगळ्यांना घराचं दार सदैव उघडं होतं. तू मात्र त्या व्यापात बुडून जाऊन हसतमुखानं सगळ्यांचा पाहुणचार आणि स्वागत करत होतीस. इतकंच नव्हे तर हे सगळं करताना प्रत्येकाच्या आवडीनिवडीही पहात होतीस. आणि हे सगळं करत असताना मुलांनाही तू घडवलस. मुलं अभ्यास आणि इतर क्षेत्रातही नावलौकिक मिळवत होती. मी अभिमानाने त्यांचे यश सर्वांना सांगायचो. पण मला मात्र या यशाचा वाटेकरी होता येत नव्हतं. खरोखर त्यांचा अभ्यास इतर स्पर्धा, याबाबत मी कधीच कशात लक्ष घातलं नाही. मी सतत माझ्या मित्र मंडळातल्या कोणाला ना कोणाला जेवायला, चहाला बोलवत असायचो. खरं तर तेव्हा तुला मदत करणं माझं काम होतं. तुझ्या कष्टाची मी कधी कदरच केली नाही. तुझा वाढदिवस असू दे. दिवाळी असुदे.मोठ्या गोष्टींचा किंवा दागिन्यांचा हट्ट तू कधीच केला नाहीस. मोठं खटलं असल्यामुळे परिस्थिती समजून, आहे त्यात समाधान मानत आलीस. अगदी पाणी हवं असलं तरी मी जागेवर बसून मागायचो. खरोखरच मी हाताने कधी चहा केलेलाही मला आठवत नाही. कधी डोकं दुखलं तर मी तुला हक्काने सांगायचो “अगं डोकं दुखतय जरा बाम लावतेस का”? कपाळावरुन तुझा हात फिरला की दुखणं कमी व्हायचं. तुझी तब्येतीची तक्रार कधीच नव्हती. एकदाच तुझं डोकं खूप दुखत होत. मी दाबून द्यायला हव होत. पण बरेच दिवसांनी, जुना मित्र आलाय म्हणून मी निघून गेलो. मला सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. आता माझं डोकं मी कोणाला चेपायला सांगणार? बाम लावून दे, अस कोणाला सांगणार? चेहऱ्यावर दिसल की कोणीतरी गोळी आणून देतात. त्या गोळीबरोबर तुझ्या हाताचा स्पर्श नसतो. अनेकदा अस होत की, मला सगळ्यांशी खूप बोलायचं असतं. पूर्वीच्या आठवणी सांगाव्याशा वाटतात. गप्पांचा मूड येतो. पण प्रत्येकजण आपापल्या कोशात इतका गुंतलेला असतो की माझं सगळं बोलणं एका शांततेत विरून जात. कधीतरी एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण हक्काने कोणाला सांगणार? तुला हक्काने सांगायचो “अगं आजभजी  कर उद्या वडे कर”. पण आता जे काही असेल त्यालाच वडे आणि भजी असच नाव देतो. आणि त्याचाच आस्वाद घेत खातो. तुझ्या हातच्या पुरणपोळीची सर विकतच्या पुरणपोळीला नाही येत ग! तशी पोळी आता मला कधीच नाही मिळणार!

क्रमश:….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांची बदली “कद्रा ” येथे झाली. कारवारच्या पुढे काळी नदीच्या पलीकडे कद्रा हे छोटेसे खेडेगाव. गाव म्हणजे आदिवासी जमात आणि जंगल. तिथले सगळे वर्णन बाबा आम्हाला अगदी रंगवून सांगत असत. बाबांनी सांगितलेल्या त्या आठवणी  बाबांच्या शब्दात मांडल्या आहेत.

“मेडिकल ऑफिसर म्हणून माझं पोस्टिंग कद्रा येथे झालं. कद्रा म्हणजे जवळजवळ जंगलच. तेथील एक छोटीशी वस्ती असलेलं गाव. मनुष्यवस्ती अतिशय विरळ. लांब लांब वसलेल्या छोट्या छोट्या घरांची वसाहत. मी व सौ दोघे 2-3 गाड्या बदलून कद्र्याला पोचलो. गावातील लोकांना हे आलेले जोडपे डाॅक्टर आहेत, हे सहज लक्षात आले. जाॅन कपौंडरने दवाखाना दाखवला. एका ब्रिटिशकालीन बंगल्यामध्ये आमच्या रहाण्याचा इंतजाम केला होता. तो बंगला पाहिल्यावर मधुमती सिनेमातील महालाची आठवण झाली. भले मोठे दरवाजे, काचेची तावदाने असलेल्या चौकोनी मोठमोठ्या खिडक्या,  त्यावर अर्धगोलाकार रंगीत काचा, उंच छतावरून लोंबणारे दिवे, हंड्या, मोठाली दालने, अशा भव्य बंगल्यात रहाणार आम्ही दोघे.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येई. खिडकीतून येणा-या सूर्यकिरणांनी दिवसाची सुरुवात होत असे. सूर्य मावळला की दिवस संपला. घर ते दवाखाना,  दवाखाना ते घर. दुसरे काहीच नाही. इतरही वेळ घालवण्याचे साधन नाही.

आसपास चार घरे सोडली तर इतर सर्व परिसर जंगलच होतं. संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे,  खिडक्या बंद ठेवा अशा सूचना वस्तीवरच्या लोकांनी दिल्याने दिवसाही खिडक्या  उघडण्याची भीती वाटत होती.

एकदा रविवारी सकाळी जाग आली तेव्हा जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ या असा विचार मनात आला.  दरवाजा उघडण्यापूर्वीच घाण वास  यायला लागला.  घरात शोधलं, उंदीर मरून पडलाय की काय? काहीच सापडलं नाही.. तेवढ्यात बाहेर घुर्र घुर्र आवाज आला. हळूच खिडकी  किंचितशी उघडून बघतो तर काय? ? बाप रे!

असा मोठ्ठा पिवळा जर्द पट्टेरी ढाण्या वाघाचं धूड व्हरांड्यात पसरलं होतं.  माझी तर बोबडीच वळली. खिडकी आवाज न करता बंद केली  आत जाऊन बसलो. दर दहा पंधरा मिनिटांनी कानोसा घेत होतो.  सगळा दिवस तो तिथेच होता. संध्याकाळ झाली तसा तो निघून गेला. दुस-या दिवशी जाॅनला सांगितलं तेव्हा तो हसायला लागला.  सायेब, अशेच आसता हंय….

एक दिवस कोवळी उन्हे अंगावर घेत व्हरांड्यात बसलो होतो. अचानक एक. कुत्र्याचं छोटुलं , गुबुगुबु पिल्लू शेपूट हलवत आमच्या जवळ आलं. बराच वेळ ते घोटाळत होतं. त्याला बहुतेक भूक लागली असावी असं समजून सौ ने चतकोर भाकरी दिली त्याला. ती खाऊन पिल्लू तिथेच रेंगाळलं. दुस-या दिवशी दार उघडलं तर पिल्लू हजर! दोनच दिवसात पिल्लू आपलंसं वाटू लागलं. आता रोज दोन्ही वेळी त्याची भाकरीची ताटली तयार असे. सौ ने त्याचं नाव ठेवलं “रघुनाथ”.

आता रोजचा वेळ रघुनाथ बरोबर छान जाऊ लागला. जवळपास फिरायला गेलो तरी रघुनाथ सोबत असेच. आम्हाला एक छान सोबती मिळाला.

एक दिवस अचानक रघुनाथ दिसेनासा झाला. दोन दिवस झाले, याचा पत्ताच नाही. मन अस्वस्थ झाले. जाॅनला विचारले,  तेव्हा तो सहजपणे म्हणाला, कुत्रे दिसत नाही,  तर नक्कीच वाघरानं खाऊन टाकलं असणार.

एवढंसं गोड पिल्लू वाघानं खाल्लं असं ऐकून खूप वाईट वाटलं. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.  मुक्या प्राण्यांची सवय होते. पुढे नित्य व्यवहारात आठवण कमी होत गेली. कालाय तस्मै नमः II

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ जनरेशन गॅप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

खरोखरी ‘जनरेशन गॅप’ अशी काही गोष्ट असते का हो? दोन पिढ्यांच्या मतांतराला हे नाव दिलंय झाले. असो.प्रत्येक पिढीचा कालावधी वेगळा, परिस्थिती वेगळी,अनुभव वेगळे, उपलब्ध साधन सामग्री वेगळी, त्यामुळे गरजा वेगळ्या, राहणीमान वेगळे, विचारसरणी वेगळी, शैक्षणिक पात्रता वेगळी असते. मग नैसर्गिकपणे त्यांच्या वागण्या-बोलण्यात, विचारात फरक असणारच आहे. त्यात वेगळे विशेष ते काय?

काही वर्षांपर्यंत हे बदल तुलनेने खूप सावकाश होत होते. त्यामुळे वर्षानुवर्षे परिस्थिती जवळपास सारखीच, आहे तशीच, असायची. आपण आपल्या आजोबा,पणजोबांचे विचार कौतुकाने सांगायचो. पण आता आधीच्या सोडा, अगदी मागच्या पिढीचे विचारही मागासलेले, बुरसटलेले वाटतात.

कारण आजचा काळ एकदम वेगळा आहे‌. आज दोन पिढ्यांमध्ये एकदम तीन-चार पिढ्यांएवढे अंतर पडलेले जाणवते आणि त्यातली कळीची मेख आहे आजचे प्रगत तंत्रज्ञान.

संगणकाचे आगमन झाले आणि बदलाला वेगाने सुरुवात झाली. त्यात एकदम मोठी भर पडली ती मोबाईलमुळे. आजचा  ‘स्मार्टफोन’ तर जणू बाटलीतला राक्षसच आहे. नवीन पिढी अगदी लहानपणापासून या तंत्रज्ञानात पारंगत होतेय आणि जुन्या पिढीला या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड जातेय. त्यामुळे तर दोन पिढ्यातले अंतर आणखीनच वाढले आहे.

पण गरज माणसाला शहाणे बनवते. पाण्यात पडले की पोहता येते. तसे आत्ताच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेक ज्येष्ठांनी नवीन तंत्रज्ञानाशी छान दोस्ती केली. त्यामुळे आपोआप नव्या पिढीशी पुन्हा जवळीक होऊ लागली आहे. नवी पिढी पण ज्येष्ठांच्या या विद्यार्थीदशेला  स्वत: गुरु बनून कौतुकाने छान प्रतिसाद देत आहे‌. नव्या-जुन्या पिढ्यांची पुन्हा छान गट्टी जमत आहे.

सर्वच आघाड्यांवरील  बदलाने वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक अंतर हे पडणारच आहे. त्यात नवीन सुधारणांनी, तंत्रज्ञानाने जग जास्ती जवळ आले आहे. नोकरी व्यवसायामुळे परदेशी जाऊन राहणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे परदेशी राहणीमान, विचारसरणीचे ही आक्रमण झालेले आहे. तेव्हा नव्या-जुन्यांचा, पाश्चात्य व पौर्वात्य अशा बदलांचा, विचारसरणीचा संयमाने, विवेकाने मेळ घातला की आपोआप संघर्ष टाळता येईल.

अशावेळी दोन्ही पिढ्यांतील लोकांनी दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार केला की त्याची बाजू छान समजते आणि जुळवून घेणे सोपे जाते. म्हणतात ना दुसऱ्याच्या चप्पलेत पाय घातला की, ती नक्की कुठे चावते हे लक्षात येते. तसेच इथेही असते. एकदम कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी दुसऱ्याच्या विचारांचा पूर्ण उलट-सुलट विचार करायला हवा. शेवटी विचार वेगळे असले तरी त्यामागे आपलीच जीवाभावाची व्यक्ती आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. मग आपोआप विचार सोपे होतील आणि संघर्ष टळू शकेल.  मतभेद झाले तरी मनभेद होणार नाही याची काळजी घेता येईल.

नव्या-जुन्यांचा मेळ गुंफणे

हे आपल्याच हातात आहे

एकमेकांना समजून घेणे

हेच दोघांच्याही हिताचे आहे !!

“जगात काय चाललेय हे तुम्हाला माहित नाही. आता पूर्वीचे सगळे विसरा. काळ बदलला आहे.तेव्हा तुम्ही पण जरा काळाप्रमाणे बदला. हे जुने विचार सोडा, “असे नव्यांनी जुन्यांना टाकून बोलू नये‌. त्याच बरोबर,” आम्हाला या सर्व गोष्टी नवीन आहेत‌. थोडा वेळ लागेल जुळवून घ्यायला. आम्ही प्रयत्न करू, तुमच्या कडूनच शिकू. तुम्ही थोडे सांभाळून घ्या,” अशी जुन्या पिढीने पण बदलायची तयारी दाखवायला हवी.

शेवटी जुन्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि नव्यांनी एक पाऊल मागे घेतले, तर हे दोघातले अंतर आपोआप कमी होईल. हातात हात घेत आनंदाने वाटचाल होऊ शकेल. म्हणूनच मला वाटते दोन पिढ्यांच्या मतमतांतरांमुळे ‘वाद’ न होता घर्षणमुक्त ‘संवाद’ होण्यासाठी सोडलेली गॅप म्हणजेच “जनरेशन ” गॅप आहे.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 15 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 15 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

हा माझा नृत्याचा प्रवास सुरू असताना आणि अडचणी मला अजगरा सारख्या तोंड पसरून गिळंकृत करायला बघत असताना माझ्या बाबतीत काही चांगल्या घटनाही घडत होत्या. त्या गोड आणि रमणीय आठवणी मध्ये मला आपल्या वाचकांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. त्या माझ्या आठवणींचे बंध जुळले आहे ते त्या माझ्या ताई,गोखले काकू,श्रद्धा, आई बाबा, टि म वीअनघा जोशी, माझे भाऊ बहिणी, इतर कामात मदत करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, रिक्षावाले काका आणि प्रेक्षक सुद्धा.

ताईंच्या विषयीचे खास गोड आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मी नृत्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात शिकत असताना, बऱ्याच वर्षांनी काय चित्र दिसणार हे मला माहीतही नव्हते. समाजा ची प्रतीक्रीया काय असेल हेसुद्धा माहिती नव्हते. नृत्य सुरू राहील की नाही, आपल्याला जमेल की नाही अशा साशंक मनस्थितीत असताना त्यांनी मला अचानक सांगितले की दिवाळीनंतर असणाऱ्या सुचिता चाफेकर निर्मित कला वर्धिनी तर्फे होणाऱ्या”

नृत्यांकूर “कार्यक्रमात तुला तिश्र अलारपू म्हणजे नृत्यातला पहिला धडा सादर करायचा आहे. पुण्यामध्ये मुक्तांगण या हॉलमध्ये. हे ऐकून मी कावरीबावरी अन गोंधळून गेले. कारण स्वतः ताईंनी माझी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निवड केली होती. तिथे माझे कोणी नातेवाईक नसल्याने ताई मला त्यांच्या माहेरी घेऊन गेल्या. तिथे विश्रांती जेवण करून आम्ही लगेच हॉलवर गेलो. मी नटून-थटून मेकअप रूममध्ये तयार होऊन बसले होते आणि  बाहेरच्या गर्दीतून ताई आल्या. त्यांनी मला टेबल वर बसवलं आणि स्वतः खाली जमिनीवर बसून माझ्या पायांना आणि हातांना सुद्धा अलता लावला आणि तो माझ्या आयुष्यासाठी मोठा सन्मानच होता.

माझा नृत्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि स्वतः सुचेता चाफेकर आणि सर्व पुणेकरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तो दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरला.

त्याच बरोबर भर दुपारी आपले सगळे व्याप बाजूला ठेवून,संसारातील कामे बाजूला ठेवून तीनच्या उन्हामध्ये माझ्या एम ए चा अभ्यास वाचून दाखवणाऱ्या गोखले काकूंना मी कधीच विसरू शकत नाही.

तिच्या कॉलेजचा अभ्यास करता करता माझ्यासाठी एम. ए. च्या लेखनिकाचं काम मनापासून करणारी, मला हसत खेळत साथ देणारी, मला हसवत ठेवणारी, इतर कार्यक्रमांनाही मेकप साठी मदत करणा री श्रद्धा म्हस्कर माझ्यासाठी अपूर्वाई ची मैत्रीण बनली.

टि म वी. मधल्या अनघा जोशी मॅडम त्यांनी मला लागेल ती मदत केली. त्याच बरोबर माझी दुसरी मैत्रीण सविता शिंदे माझी जीवाभावाची मैत्रीण जी मला  फिरायला फिरताना गप्पा मारायला अशी उपयोगी पडली. घरी सुद्धा आम्ही तासनतास गप्पा मारत असू. त्यातून एकमेकींच्या अडचणी समजून आम्ही एकमेकींना मदत ही करत असू.

ज्यावेळी मला घरातून क्लासमध्ये सोडायला कोणी नसेल त्यावेळी आमच्या चौकात ले रिक्षावाले काका बाबांना सांगत असतकी आम्ही शिल्पाला क्लास मध्ये सोडून आणि परत आणून सोडू. बाबा माणसांची पारख करून मला त्यांच्याबरोबर जाऊदेत.

म्हणून माझ्या मनात येतं की माझे खरे दोन डोळे नसले तरी अशा कितीतरी डोळ्यांनी मला मदत केली आहे आणि अशा असंख्य डोळ्यांनी मी जग पाहते आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ परळीचे पुरातन शीव मंदीर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

३१ जाने २० २१ रविवार  रोजी सज्जन गड ला जाताना रस्ता चुकला. गडावर जाण्या ऐवजी परळीला गेलो. तिथे पक्का रस्ता संपल्यावर लक्षात आलं आपण चुकलोय . माघारी फिरलो तर एके ठिकाणी माळावर पडझड झालेले पुरातन शिवमंदीर दिसले. अनेक मंदिर होत. चुकून आलोय तर मंदीर बघूनच जाऊ असं म्हणून मंदिराकडे गेलो. एक मंदिर चांगले होते पण त्याला कुलूप होते. बाहेर डोके नसलेला नंदी होता. तिथेच जवळच उंच स्तंभ होता. नेहमीच्या दीपस्तंभा सारखा नव्हता. हे वेगळेपण. अलीकडे बरीच पडझड झालेलं एक शिवमंदीर होते ते मात्र उघडे होते. गाभाऱ्याच्या वरचा छताचा भाग मोकळा झाल्यामुळे पिंडीवर ऊन पडले होते कळस नव्हताच.  दुरवर आणखी मंदिर होते. बाहेर उत्खनन करून काढलेले बरेच शिल्प शिळा उभ्या करून ठेवलेल्या होत्या . वीरगळ , सतीशिळा होत्या. एक हात असले ल्या अनेक सतीशीळा होत्या. पुरातन काळी हा भाग खूपच वैभवशाली होता असे जाणवत होते.

मंदिराच्या भिंतीवर अनेक प्रकारची कोरीव शिल्प अर्थपूर्ण होती. बाहेर बर्याच शिळा पडलेल्या होत्या. तिथेच बोर्ड लावलेला होता त्यावर लिहिले होते, पांडवकालीन केदारेश्वर मंदीर. परळी. जि. सातारा

परळी गावाच्या शेजारी असूनही खूपच दुर्लक्षित राहिलेले हे अतीसुंदर, पुरातन, वैभवशाली इतिहास सांगणारे असे हे मंदीर एवढे कसे दुर्लक्षित राहिले;  तेही जग प्रसिद्ध अशा सज्जन गडच्या शेजारी असून… याचेच आश्चर्य वाटत होते. इथे उत्खनन होऊन या मंदिराचा इतिहास यावर संशोधन व्हायला हवं असं वाटते.

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares