मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

चार दिवसांची दिवाळी. धामधूमीत आली आणि गेलीही.

खप्पून, पूर्वतयारी करून केलेले फराळाचे भरले डबे तळाशी गेले. रांगोळीतले रंग भुरकटले. तेलवातीत भिजलेल्या पणत्या गोळा करून ठेवल्या. काही दिवसांनी आकाश कंदीलही उतरवले जातील. ईलेक्ट्रीकच्या माळा गुंडाळून पुढच्या दिवाळीपर्यंत नीटनेटक्या कपाटात ठेवल्या गेल्या.

अंगणातला फटाक्यांचा, धूम्मस वास असलेला कचराही गोळा करुन झाला.

गॅलरीतल्या एका टाईलवर सारवलेला गेरु मात्र होता.

कसा रिकामा, रंगहीन दिसत होता. सकाळी झाडपूस करणारी बाई मला विचारत होती, “अव ताई पुसु का आता हे तांबड..? लई वंगाळ दिसतय्. ”

मी म्हटलं, “पुस बाई. झाली आता दिवाळी. ”

महागाई, प्रदूषण, भ्रष्ट राजकारण, जागतिक युद्धे, संहार या सगळ्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाने आपापली दिवाळी साजरी केलीच. अंधारावर मात करणारा प्रकाशाचाच सण.

धाग्यांच्या गुंतागुंतीत एखादा कलाबुतीचा तार कसा चमकून जातो ना? तशीच या दिवाळीनं चमक आणली.

चार दिवसांचे चार सोहळे.. गायीला घास भरवला, धनाची पूजा केली, लक्ष्मीलाही पूजलं, रूपकात्मक नरकासुराचाही वध केला, ईडा पीडा टळो, बळीचं राज येवो, असा गजर केला, सहजीवनाची आनंद औक्षणे केली, ऑनलाईन भाऊबीजही साजरी केली. तेल, उटणे, सुगंधी साबणांनी स्नानं ऊरकली. रांगोळ्यांनी दार सजले.

फुलांच्या तोरणांनी चौकट नटली.. कोपरा न् कोपरा प्रकाशानं उजळवला. झुमवर सगळं दूरवरचं गणगोत गोळा झालं. व्हर्चुअल फराळ, व्हर्चुअल फटाके, शुभेच्छा, आशिर्वाद. सगळं सगळं ऑनलाईन..

कसं असतं ना, मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते. भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतू नाही बदलत. दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा,

स्नेहबंधनाचा, स्नेहवर्धनाचा सण!!

शिवाय या सणांत निसर्ग, देवदेवता, पशुपक्षी झाडंपानं सार्‍यांचं संवर्धन असतं. आपल्या संस्कृतीत केरसूणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.

यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे. चराचरात लहान थोर असं काही नसतं. मनातली विषमता दूर करुन सार्‍यांना सामावून घ्यायचं असतं. एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय.

मनातल्याच आसुरांचा संहार करायचा. नको लोभ, नको स्वार्थ, नको हिंसा, नको असत्य. , नको द्वेष, नको मत्सर. , असुया. वृद्धी प्रेमाची, स्नेहाची.. परोपकाराची व्हावी.

दिवाळी म्हणून साजरी करायची.

दिवाळी आली, संपली पण जाताना याच जाणीवा देऊन पुन्हा येण्यासाठीच परतली.

कवीवर्य ना. धो. महानोर एकदा म्हणाले होते…

“मोडलेल्या माणसांचे..

दु:ख ओले झेलताना..

त्या अनाथांच्या उशाला..

दीप लावू झोपतांना.. ।।

… दिवाळीची सांगता करताना याच ओळी सोबत रहाव्यात…

शुभ दीपावली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

 मागच्या दोन वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे. मी लिहिलेली ओवाळणीची कविता सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ती कविता लातूरला एका व्यक्तीने वाचली. आणि त्याने मला थेट कॉल लावला. आणि जवळपास तो माणूस दहा मिनिट फक्त हुंदके देत राहिला. हुंदका आवरत तो इतकंच म्हणाला.. ‘ सध्या बोलता येत नाही. संध्याकाळी पुन्हा कॉल करतो. फक्त उचला. ’ …. एवढंच बोलून फोन कट झाला.

…… तर गंमत अशी होती की जमिनीच्या झालेल्या वादातून बहीण आणि भाऊ यांच्यात जवळपास चार वर्षे बोलणं बंद झालेलं होतं. ही कविता त्या भावाने वाचली आणि थेट बहिणीच्या घरी सगळी कागदपत्रे घेऊन गेला. सगळी संपत्ती तिच्या नावावर करायला तयार आहे म्हणाला.. ‘ पण हा रुसवा नको ताई ‘ म्हणून मनमोकळेपणाने रडला. दोघेही भाऊ बहीण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. आणि संध्याकाळी या दोघांनीही मला फोन करून धन्यवाद दिले होते.

…. माझ्या कवितेला मिळालेलं हे फार मोठं बक्षीस होतं.

तीच कविता पुन्हा एकदा आपल्या हवाली करतोय.

☆ ओवाळणी… ☆

ओवाळणीच्या ताटात नोटा

टाकून झाल्यावर…

त्याने तो कागद पुढे केला 

आणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…

ताई इथं तुझी सही हवीय फक्त…

 

तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला

पदराने डोळे पुसत हसत म्हणाली,

आण तो कागद

दादा सही करते

फक्त एक वचन देऊन जा

वर्षभर आला नाहीस तरी चालेल

दर भाऊबिजेला न चुकता येत जा..

 

माय बाप गेलं

आत्ता माहेरही रुसलं आहे..

मातीतल्या नात्याचं नावही

पुसलं आहे..

 

मुलांना चांदोमामाची ती

रोज गोष्ट सांगते..

मुलं झोपी जातात तेव्हा..

तिच्या डोळ्यात जत्रा

माहेरची पांगते..

 

सुखी ठेव देवा भाऊराया माझा

नवस रोज मागते..

किती किती आणि कितीतरी

भावाचं कौतुक सांगते सासरी..

अन तिच्या माहेरात फक्त तिची

वाट पाहते ओसरी…

 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

लेखक / कवी

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपण आहोत तोवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ आपण आहोत तोवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

दिवाळी सुरू आहे. काल नरक चतुर्दशी होती. भल्या पहाटे एका जवळच्या नातेवाईकांचा फोन आला. त्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या, “ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ” आणि लगेचच थोड्या खिन्न स्वरात म्हणाले, ” आता सकाळी लवकर उठणारी, पहाटे अभ्यंग स्नान करणारी बहुधा आपलीच पिढी आहे. कारण मुलांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याचे महत्त्व नाही. त्यांची कारणे वेगळी असतात. “

“बरोबर आहे “मी म्हणालो. त्यांनी फोन ठेवला पण ते जे काही म्हणाले त्यावर माझे मन विचार करू लागले. खरंच, आपणच ती पिढी आहोत जी अजूनही पहाटे उठून उत्साहाने या सगळ्या गोष्टी करते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पाच वाजताच रेडिओवर कीर्तन लागायचे ते ऐकूनच जाग यायची. एक वेगळाच उत्साह असायचा. आपल्याकडे घरात वृद्ध आई असेल तर ती अजूनही आपल्याला लवकर उठवते. आपण सगळे उत्साहाने उठतो. आंघोळीपूर्वी अंगाला सुगंधी तेल लावतो. अंघोळ करताना सुगंधी उटण्याचा खरखरीत स्पर्श अनुभवतो, अंगणात दिवे लावतो, देवघर उजळवतो. घराघरात अजूनही आई-वडील, आजी-आजोबा यांचे प्रेमळ स्वर आणि त्यांच्या पावलांचा नाद ऐकू येतो. देवाला नमस्कार केल्यानंतर त्यांना नमस्कार करतो. मागच्या पिढीने आपल्याला सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाळतो आहोत. पण पुढच्या पिढीचे काय? ते जपतील का या परंपरा?

माझी सौ. मला नेहमी म्हणते, “ अहो, आपण आहोत तोपर्यंत हे सणवार टिकतील. पुढचं काही सांगता येत नाही. ” तिचं म्हणणं खरं आहे. आपली पिढी अजून काही प्रमाणात तरी परंपरा जपते आहे. पण असं वाटतं की आजच्या पिढीसाठी दिवाळी म्हणजे बहुधा ऑफर्स, सेल्स आणि रील्सचा सण!

एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते ती ही की 

नातेसंबंध टिकवून ठेवणारी, संपर्क साधणारी, सणाच्या दिवशी “ तुम्ही कसे आहात? ” हे विचारणारी अजूनही आपलीच पिढी आहे. आपल्या नातेवाईकांशी संबंध जपणं, त्यांचं सुख-दुःख विचारणं हे आपल्याला आपल्या संस्कारांनी दिलं आहे.

पण पुढची पिढी जपेल का हे मायेचे आणि प्रेमाचे हळुवार बंध? ही शंका कधी कधी मनाला बेचैन करते.

आपण अपेक्षा करतो त्यांच्याकडून पण त्यांचीही काही एक बाजू असू शकते. कदाचित त्यांना वेळ मिळणार नाही.

किंवा त्यांना तसं गरजेचं वाटणारही नाही.

कारण त्यांच्या आयुष्यात गती आहे, कामाचा ताण आहे, स्पर्धा आहे. जगण्याची व्याख्या वेगळी होत चालली आहे.

त्यांच्याकडे एकमेकांशी जोडणारं वेगवान नेटवर्क आहे, पण नात्यांचंजाळं विरळ होत चाललं आहे.

आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा डोळ्यांतले भाव बोलतात. फार काही सांगावं लागत नाही. स्पर्शाची भाषा खूप बोलकी असते. पाठीवरचा आश्वासक हात, प्रेमळ मिठी सगळं काही सांगून जातात. पण पुढच्या पिढीची भाषा स्क्रीनवर इमोजीमध्ये व्यक्त होताना दिसते आहे. कधी कधी प्रश्न पडतो की आपले हे संस्कार, परंपरा कायम राहतील का? की हा एक इतिहास बनून जाईल?

पण मी याबाबत आशावादी आहे. काळया ढगाला एक रुपेरी किनार असते. तसाच हा आशावाद! मला वाटतं सगळं नाहीसं होणार नाही. परंपरा आणि नाती दोन्ही हळुवार धाग्यांनी काळाशी जुळत राहतात. आजची पिढी कदाचित वेगळ्या रूपात, वेगळ्या माध्यमातून हे सण साजरे करेल हे नक्कीच. पण जर त्या उत्सवात आपुलकीचा एक दिवा तरी पेटला, तर या आपल्या उज्वल परंपरांचा प्रकाश कमी होणार नाही.

पण फक्त असं म्हणून भागणार नाही. स्वस्थ बसून चालणार नाही. आपण आहोत तोवर ही परंपरा जिवंत ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. ही करताना आपण पुढच्या पिढीला इतकंच सांगायचं की बाळांनो,

सण साजरा करणं म्हणजे फक्त विधी किंवा औपचारिकता नव्हे. सण म्हणजे नात्यांना उजाळा देण्याची, आजच्या भाषेत सांगायचे तर नातेसंबंध रिन्यू करण्याची सुवर्णसंधी आहे. ”

आणि आता ही संध्याकाळ येते आहे. आपण हातात दिवे घेऊन उभे आहोत, त्यांच्या ज्योती अजूनही प्रकाशमान आहेत. हा प्रकाश आपण उपभोगला, आता तो वारसा पुढे द्यायचा आहे. आपल्या हातातील हे दिवे, हा प्रकाश पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचा आहे.

त्यांच्या हातात तो गेला की, आपल्या जगण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

मग आपल्याला म्हणता येईल – 

दिवे लागले रे दिवे लागले 

 तमाच्या तळाशी दिवे लागले…

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगण्याच्या लढाईत जिंकायचं असतं…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ “जगण्याच्या लढाईत जिंकायचं असतं…” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आमच्या इथे नव्या पेठेत कपड्यांची मोठ्ठी बाजारपेठ आहे. घरच्यांसोबत तिथे काल दुपारी गेलो होतो. मी केवळ न्याहाळत उभा होतो नि बाकी मंडळी खरेदी करत होती. तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या एका खेड्यातलं कुटुंब खरेदीसाठी तिथं आलेलं.

थोरला मुलगा विशीच्या आतला, धाकटा शाळकरी पोर आणि शाळकरी मुलगी यांच्यासोबत त्यांचे आईवडील होते.

आईच्या अंगावरची साडी साधारण होती, बापाचे कपडे बिनइस्त्रीचे चुरगळलेले. कॉलर आणि बाहीजवळ विरळ झालेला बुशशर्ट, पँटीचे अल्टर केलेले मार्क रंग फिकट झाल्याने स्पष्ट दिसत होते.

मुलीनेही जेमतेम साधा ड्रेस घातलेला. मोठ्या फुलांची डिझाइन असलेला, अगदी गावाकडच्या बहुतांश मुली घालतात तसा पॉलिस्टर टाईपचा.

धाकट्या शाळकरी मुलाच्या अंगावरचा शर्ट बऱ्यापैकी जुना होता.

विशीतला मुलगा बहुतेक शिकायला परगावी असावा आणि तो दिवाळीसाठी गावी आल्यावर, ते कुटुंब इकडे सोलापूरला खरेदीला आलेलं. त्याचे कपडे ठीकठाक होते, पण तेही जुनेर वाटावे, असेच होते.

त्यांच्याजवळची पिशवी खताच्या पॉलिथिन बॅगची होती आणि तळहात मातकट होते म्हणजे ते शेतकरी कष्टकरी कुटुंब होतं.

मुलगी आईला “आधी साडी घे म्हणत होती”, तर थोरला पोरगा “आधी अण्णांना कपडे घ्या ” म्हणत होता.

धाकटा म्हणत होता, “आधी दादाचे कपडे घ्या. “

बाप म्हणत होता, ‘आधी पोरांचे कपडे मग शांतेसाठी (बहुतेक शांता हे त्या माउलीचे नाव) साडी घेऊ. ‘

कुठलेही कपडे समोर आणून उघडले की ते सगळेच एकमेकांच्या नकळत किंमतीचे लेबल पाहत होते.

किंमतीचे अंक इंग्रजीत होते. मात्र अक्षरओळख सगळ्यांना असावी, त्या किंमतीचे प्रतिबिंब त्यांच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर उमटत होते.

मध्येच आई बोलली की, ‘जरा चांगलेच दाखव बाबा पण इतके महागाचे नको दाखवू!‘

तिने तसे म्हणताच बापाने पोरांच्या नकळत तिचा हात हळूच दाबला नि “असे बोलू नकोस”, म्हणून खुणावले.

ती मौन झाली.

बारकं पोरगं भिरभिरल्या डोळ्यांनी त्या चकचकीत दुकानातल्या सर्व कपड्यांना खिळल्यागत पाहत होतं.

तिथला चकचकाट पाहून मुलगी तर अचंबित होऊन गेलेली.

पुरती स्तब्ध झालेली.

मोठा मुलगा हुशार होता.

त्याने आधी लहान्या बहिणीसाठी ड्रेस पसंत करायला लावला.

धाकट्या भावाच्या पसंतीचा ड्रेस घेतला नि आईच्या मागे लागला, ” साडी पसंत कर! ” ती बाई आवंढे गिळत होती.

मुलांचा बाप मनातल्या मनात आकडेमोड करत होता नि तो कोवळा तरुण डोळ्यातली स्वप्ने गोठवत आईबापाचे डोळे वाचत होता!

त्या डोळ्यात दिसत असलेली कुतरओढ नि त्यांचं अगतिक असणं त्याला सहज वाचता येत होतं! 

पोरगं ऐकेना, म्हटल्यावर त्या माऊलीने नकळत मान मागे घेऊन पदराने डोळयांच्या कडा पुसल्या.

नेमकं त्याच वेळी मुलीने आईला पाहिलं.

तिने काय ते ओळखलं.

“अण्णा मला काय बी नगं!” म्हणून ती बापाला बिलगली!

इतक्या गर्दीतही तो बापमाणूस गहिवरून गेला.

पोरीला कवटाळून तिचे मुके घेऊ लागला! 

त्या क्षणी त्या दुकानात अनेक कुटुंब आणि अनेक माणसं होती, पण त्या सर्वात श्रीमंत कुटुंब ते होतं!

एकमेकांच्या मनातलं ओळखण्याची नि त्याग करण्याची श्रीमंती त्यांच्याकडे होती! 

गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते! 

इच्छांना मुरड घालण्याचे कसब गरीब असणाऱ्यास जन्मतःच असते!

त्या कुटुंबाकडे पाहताना नकळत माझे आई वडील आठवले! 

घरादारासाठी खरेदी करताना स्वतःला कपडे न घेणारे, मुलांसाठी मन मारणारे आईवडील!

जगात कुठल्या बापाचा खिसा कधी रिकामा राहू नये नि कुठल्या आईला तिचे मन मारावे लागू नये!

 कारण याचे शल्य आईवडीलांच्या जाण्यानंतर अणकुचीदार होत जाते! 

तिथे असलेल्या त्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषात आपल्यापैकी कित्येकांच्या वडिलांचे बिंब दडून होते, आणि कित्येकांच्या इच्छा दफन होत्या!

संवेदनशील असणं वाईट असतं! 

अशी माणसं कधी कुठं दिसली, की वाटतं, “आपल्याकडे खूप सारे पैसे असले पाहिजेत म्हणजे आपण यांना सढळ हाताने मदत करू शकू! “

पण सगळीच माणसं अशी मदत घेत नाहीत. कारण ती हतबल असली, तरी हरलेली नसतात. आणि जी माणसं हरलेली नसतात, तीच माणसं नियतीच्या छातीवर पाय देत विजयी होतात! 

हे कुटुंबही त्यांच्या जगण्याच्या लढाईत जिंकायला हवं! 

अजूनही ते कुटुंब नजरेआड होत नाहीये! 

लेखक : श्री समीर गायकवाड

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाडगावकर ऐकतांना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “पाडगावकर ऐकतांना…” ☆ सुश्री शीला पतकी 

माणसं आता शीळ घालत नाहीत आणि हात हातात घालून जात नाहीत. प्रत्येक वाट गोंगाटाच्या रानातून भयाण शांततेकडे जाते. साऱ्यांची मान खाली असते.. डोळे पडद्यावर.. लॅपटॉपच्या बटनावर.. बोटांची ठोकाठोकी….. त्यावर माणसं ताल देत नाहीत कारण त्यांचाच तोल बिघडत असतो.

….. असं सतत असल्यावर माणसं कुठून गाणार ?

…. पाडगावकर माणसं आता गात नाहीत आणि हातात हात घालून जात नाहीत … 

कटूतेचा पाऊस घर सोडून नव्हे फोडून जातो 

विश्वासाचा कणा केव्हाच मोडून जातो 

बाळाचा पापा घ्यायला त्याला वेळ नसतो /

…. पाडगावकर माणस आता गात नाहीत.. हातात हात घालून जात नाहीत … 

पेटलेल्या दंगलीत माणुसकी खाक झाली

 लोकल मधल्या स्फोटात माणसांची राख झाली

तुमच्या माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेला पुरावे लागतात पाडगावकर 

. कुंडीमध्ये फुलं लावणे बंद झाले …. द्वेषांचे मळे फुलवणारे धुंद झालेत

 – – बरं झालं पाडगावकर तुम्ही या जगात नाहीत ….

 …. नाहीतर तुम्ही लावलेल्या कुंडीतील रोप उपटणारे पाहून तुम्हाला दुःख झालं असतं 

खरंच सांगतो पाडगावकर ….

माणसं आता गात नाहीत

हातात हात घालून जात नाहीत

हातात हात घालून जात नाहीत….

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांगता… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ सांगता… डॉ. माधुरी जोशी 

अगदी माहेरी वाड्यात… वाडा संस्कृतीतलं मोकळंढाकळं राहणं… अंगणात धमाल खेळणं…. सगळ्या घरांची दारं मनापासून मोकळी उघडी.. साऱ्या घरांशी जणू नातंच असणं… मग लग्न होऊन सासरी गेल्यावर भाड्याच्या २/३ जागा…. मग १५ वर्षांनी झाला स्वतःचा ओनरशिपमधल्या वाड्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या संस्कृतीतला फ्लॅट… दारं बंद… आणि जरा मनं पण…. असा जागांचा प्रवास झाला खरा…. पण सगळ्या जागा तळमजल्यावर…. म्हणजे उजेड, वारा, ऊन्ह, प्रकाश सगळ्यांना बऱ्यापैकी “उणे” चिन्ह.. तरी जगणं आनंदातच. वर्षं सरकली… हळुहळू गर्दी वाढत गेली… ते शांत निवांत पुणं हळुहळू मिटंत चाललं…. जुने वाडे संपत चालले…. स्थित्यंतरं होत होती. जमवून घेत जगंत होती माणसं… आम्ही तर जन्मापासून आजतागायत याच पुण्याशी घट्ट बांधलेले… आणि असेच असंख्य…. जसजसा काळ बदलला, नोकरीच्या संधी वाढत चालल्या, शिक्षणासाठी संस्था वाढल्या…. आधीच पुणं सुशिक्षित, सुसंस्कृत, कलाप्रेमी, व्याख्यानमाला, नाटक, संगीत महोत्सवाची पर्वणी असणारं…. हवा पाणी ऊत्तम असणारं, हॉस्पिटल, हॉटेल, बाजार…. सगळं मुबलक… आणि खरं म्हणजे सहज घुसता येणारं… स्थिरावता येणारं. अक्षरशः लोंढे वगैरे आकर्षित झाले… आणि वाढली गर्दी, गर्दी, फक्त गर्दी… असंख्य वाहनं… असुरक्षित, अपघात ग्रस्त असं रुपडं झालं… शांत, निवांत पुण्याचं… क्वचित अपघात, चोऱ्या, खून, मारामाऱ्या अशा बातम्या येत.. आता त्या नित्याच्या झाल्या. आजही बाकी खूप सारं चांगलं आहेच पण दुसरी वाईट बाजू फोफावत राहिली नदीवरच्या पाणवेलीसारखी… पाणीच दिसू नाही इतकी गडद, दाट, भयावह..

जगण्याची गरज, पैशांचा मोह, इमारतीचं जुनेपण. त्यातल्या अडचणी…. यातून आधी जुने वाडे जात चालले… मग आता बंगले, जुन्या इमारती… ओळखीचे संपत चालले सगळे… नवीन गर्दीची नवीन भितीदायक भविष्याची चाहूल…. कारण हे आवरणार कसं हा भितीदायक प्रश्न आ वासून जनतेच्या मनात उभा राहतो. नवनिर्मितीची

हीच लाट माझ्या इमारती पर्यंत पण आलीच. मग तोच पाढा… जागा शोधा… सामान आवरा, हलवा, लावा….

इतरांसारखा मी पण हाच पाढा रटला… ते सामानानी खचाखच भरलेलं तात्पुरतं रहायचं घर पाहून दडपणंच आलं. आता सामान लावा हे शेवटचं कडवं…. आणि एक दिवस जवळजवळ सगळं सामान लागलं…. आता दोन अडीच वर्षं इथे मुक्काम…

पण तो इतका… इतका आनंदी अपेक्षिलाच नव्हता…. आधी ही जागा पाचव्या मजल्यावर…. हवा, वारा, उजेड, प्रकाश, ऊन्ह, हिरवाई…. सगळ्यांचं उणे चिन्ह जाऊन अधिक चिन्ह झालं लीलया…. या अपार्टमेंटचं रीसॉर्टच झालं माझ्यासाठी…. जे मी कधीच अनुभवलं नव्हतं ते रोजचं झालं…

रोजचा हलका अबोली सूर्योदय… आधी कोवळं ते हळुहळू तापलेले ऊन्ह… चांदण्यांचं आकाश… चंद्राची रूपं…

पहाटे अलगद प्रकाशमान होणारा अंधार आणि संध्याकाळी अलगद प्रकाश सोबत घेऊन जाणारा सूर्य अन् मग अंधाराचं राज्य… रोज नवीन पेंटिंग्ज… रोज नवीन निसर्ग रूपं… आणि त्या सगळ्याला सुंदर पार्श्वसंगीत अगणित पक्षांच्या स्वरांचं… आजही पहाट घड्याळात होत नाही…. तर ती उमलते त्या सुंदर सुगंधी गार हवेत, त्या अलगद होणाऱ्या प्रकाशात, त्या पक्षांच्या जागेपणात, रात्री अंधारात लपलेल्या आणि पहाटे पुन्हा उघडणाऱ्या हिरव्या रंगात… अशी सुंदर, मोहक, प्रसन्न. आणि मग जाणिवेतून उमलतं.. कानाला तृप्त करतं…

भारद्वाजाचं मंत्रपठण

मोरांच्या आर्त केका

पोपटांचा हा वाद की हाका

आणि कोकीळांचा

चक्क सुरेल गलका

हळुहळू हळुहळू बहरतं झाड

मैफलीत रंगतात सुरेल नाद

मी आहे बरं का इथे

कुठूनशी सांगते

कीर्रर शिळेतून घार

कधी कावळ्यांची भांडणं

कठड्यांवर झाडांवर खारींचं

वेगवान सावध धावणं

मैना साळुंक्यांचा जास्तंच गलका

नुसताच गोंधळ घालणं..

एखादाच हळद्या

एखादाच हमिंग बर्ड

राखून आपलं वैभव

अचानक सुंदर दर्शन

काही ओळखीचे

काही अनोळखी

सुंदर स्वर रंग देतात

भेट सारखी

अचानक आनंदाची येते लाट

आणि देखणी देखणी

होते माझी पहाट

नाही वाहनांचा हॉर्न कर्कश्श

विषारी धूर ही इथे अदृश्य

निवांत निरामय निराळीच शांतता

सृष्टीची सुरेल मैफल सजते

वर येतो सूर्य

आणि अलगद होते

पहाटेची सांगता!!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्पेशल मित्र…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “स्पेशल मित्र…” ☆ श्री मंगेश मधुकर

दिवस-रात्र, ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असलं तरीही कायम सोबत असणारा स्पेशल मित्र.

आज खास त्याच्यासाठी काही – – –.

तसं पहायला गेलं तर मैत्री अनेकांशी असते. कोणी नावापुरतं तर कोणी जिवलग. कोणी नकोसं तर कोणी हवंहवंस. काही स्पेशल तर काही ऑप्शनल – –

….. परंतु ‘तो’ मात्र व्हेरी व्हेरी स्पेशल. एकदम खासमखास.. श्वासासारखा कायम सोबत.

कळायला लागलं, विचार करायला लागलो तेव्हापासून बरोबर.

.. अजून साथ सुटली नाही अन कधी सुटणारही नाही. त्याला वेगळं करूच शकत नाही.

दुधात विरघळलेली साखर बाजूला करता येत नाही. तसंच काहीसं.

… आनंदात ‘तो’ असतो. दु:खात त्याचाच आधार, संकटाच्या वेळी धीर देणाराही तोच. एकटं तर कधीच सोडत नाही. खाजगी, सार्वजनिक, सामाजिक सर्वच विषयांवर त्याच्याशी संवाद चालूच. त्याच्याशी बिनधास्त बोलता येतं. व्यक्त होता येतं. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती असते… अगदी टॉप सिक्रेटही.

… त्याच्याइतकं विश्वासू दुसरं कोणी नाही. त्याच्याबरोबर खोटं बोलता येत नाही.. लपवाछपवी करता येत नाही. प्रत्येकवेळी त्याचं मत घेतलं जातं.

कधी ‘तो’ पटकन निर्णय देतो … तर कधी पर्याय देऊन गोंधळात टाकतो.. कधी बरोबर असतो तर कधी चुकतोसुद्धा.

प्रत्येकाचा असा ‘स्पेशल मित्र’ असतो … हा मित्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही … तर आपलं “मन”

कुठं असतं ते माहिती नाही पण ते असतं हे नक्की. अनेकदा त्याचा उल्लेख होत असतो.

…. खरंतर मन म्हणजे आपली लाइफलाइन. त्याच्याइतकं कोणाशीच प्रामाणिक नसतो त्याला आपण जपतो का? .. तर नाही… त्याला गृहीत धरतो किवा दुर्लक्ष करतो.

.. तरीही ते आपली काळजी घेणं थांबत नाही. आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात.. त्याचा त्रास होतो तेव्हा तेच समजावतं. त्याच्याइतकी आपल्या भल्या-बुऱ्याची काळजी कोणालाच नसते. व्यसनं, वाईट, चुकीच्या गोष्टी याविषयीची जाणीव करत राहतं. आणि तब्येतीची काळजी घेण्यासाठी आग्रह करतं. वेळोवेळी सूचना करतं परंतु आपण कारणं देत सोयीस्कर वागतो. त्रास झाल्यावर पश्चाताप आणि अपराधी वाटतं पण ते तात्पुरतं… आपण काही सुधारत नाही. तब्येतीची हेळसांड करत राहतो 

थोडक्यात, पुन्हा येरे माझ्या मागल्या..

.. तरीही हा आपला “ मित्र” प्रयत्न सोडत नाही.

म्हणूनच,

… इतरांना जपता तसंच याला सुद्धा जपा.

…. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा

…. यात फायदा तुमचाच

आणि.. त्रासही कमी.

! ‘चॉइस इज युवर्स’!

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लक्ष्मी – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “लक्ष्मी – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

संध्याकाळी बाहेर निघाले होते. तर रस्त्याच्या कडेला एक बाई गाठोड सोडत होती. बुटकी तीस पस्तीस वयाची असावी. कॉटनची साडी,  दोन्ही खांद्यावरून पदर घेतलेला,  कपाळावर मोठ्ठ कुंकू…

गाठोड्यातून ती काय काढते हे बघत मी उभे राहिले. तिने गाठोडं सोडलं. त्यात छोट्या आणि मोठ्या केरसुण्या होत्या. त्या तिनी कापडावर नीट मांडून ठेवल्या आणि मला म्हणाली,  

” या ताई पूजेला लक्ष्मी घ्या. माझी बोहनी करा “

दिवाळी जवळ आली की अशा बायका दिसतात. मी थांबले. तिच्याजवळ गेले आणि तिच्याशी गप्पा मारल्या. तळेगाव वरून ती आली होती.

” या दिवसात आम्ही केरसुण्या जास्ती बनवतो. आता इतर वेळी कोणी घेत नाही बघा. पण दिवाळीत पुजायला घेऊन जातात. ” तिने सांगितल.

 तिच्याकडून केरसुणी घेतली. तिच्यावरून हात फिरवला… जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मन साठ वर्ष मागे गेले. पूर्वी घरोघरी केरसुणींनीच केर काढला जायचा. केर काढताना खूप खाली वाकायला लागायचे. तेव्हा सहजपणे हे काम बायका करत असत. सकाळी उठून पहिलं काम घर झाडायचंच असायचं. लगेच बंब पेटवला जायचा. साडेसातच्या आत सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या असायच्या.

संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान परत घर झाडून घ्यायचं. तेव्हा दोन वेळी घर झाडायची पद्धतच होती. जरा उशीर झाला तर घरातले मोठे लगेच रागवायचे…

” दिवेलागणीची वेळ होईल.. अजून झाडून झालं नाही का? “

तेव्हा मोठ्यांचा धाकही होता. अशी वेळ सहसा यायची नाही…

सहज सवयीनुसार कामं केली जायची.

मंडईत केरसुण्या विकणारी एक बाई होती. वर्षानुवर्षे आई तिच्याकडूनच केरसुणी घ्यायची.

या बाईच्या शेतात शिंदीची झाडं होती. त्या स्वतः केरसुणी बांधायच्या. केरसुणी झिजायची पण एक हीर इकडे का तिकडे व्हायचा नाही.

आज त्या ताईंची पण आठवण झाली.

केरसुणीला चुकून पाय लागला तरी तिला हात लावून परत तो हात कपाळाला,  छातीला लावून नमस्कार केला जायचा. एक प्रकारची शिस्त.. वळण रोजच्या जीवनाला होते.

मुख्य म्हणजे तो संस्कारांचा भाग होता. अगदी साध्या गोष्टीतही कृतज्ञता व्यक्त केली जात होती.

घरातला नुसता केरच नाही तर घरातलं दारिद्र्य दूर करणारी ती 

” लक्ष्मी ” म्हणून आजही केरसुणीची पूजा केली जाते.

घरातला केर काढण्यासाठी कुंचे आले आणि केरसुणी वापरातून पार हद्दपार झाली…

माझ्या मनात मात्र अजूनही तिला जागा आहे. घरी आले आणि अनेक आठवणी दाटून आल्या त्यासाठी हे चार शब्द…

या” लक्ष्मीला” माझा मनापासून नमस्कार.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाऊबीज… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ भाऊबीज… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बहिण भावाच्या प्रेमाची ही बीज!

रुजवते मनी वेल तो सौख्याचा! 

आपोआपच असे शब्द मनी उमलतात! एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे दोन जीव- मुलगी आणि मुलगा- नातं घेऊन येतात बहिण भावाचे! ते नातं निभावलं जातं दरवर्षी एकमेकांसाठी आनंद देऊन!

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही दिवस पौराणिक कथांवर आधारित गोष्टींचे! दिवाळीची सुरुवात अभ्यंग स्नानाने शुचिर्भूत होऊन केली जाते आणि लक्ष्मीची पूजा सर्वांनाच आवश्यक असते कारण धनलक्ष्मी शिवाय व्यवहारच होऊ शकत नाहीत!

पण नातेसंबंधांची वृद्धी करणारे सण हे मात्र पाडवा आणि भाऊबीज! पाडवा हा पती-पत्नीतील प्रेमाचा,  आदराचा आणि कुटुंबाला टिकवून ठेवणाऱ्या नात्याचा सण तर भाऊबीज ही बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक!

हे नातं स्त्रीचे माहेराशी असलेले प्रेम टिकवून टिकवून ठेवते.. पौराणिक कथेत यम आणि यमाची बहीण हे भाऊबीजेचे मूळ स्त्रोत असे पाहतो,  पण आता आपण पाहतो ती भाऊबीज वेगवेगळ्या स्वरूपात!

लहानपणी भाऊ-बहीण भांडतात,  खेळतात,  वाढतात,  एका घरात.. तेव्हा हा नातेसंबंध दृढ होतो तो भाऊबीजेने! मला आठवतं तेव्हापासून भाऊबिजेच्या भेटवस्तूची मी अगदी वाट पाहायची. पण बरेच वेळा दिवाळीसाठी घेतलेला एकच ड्रेस,  पहिल्या दिवशी आणि भाऊबीज म्हणूनही तोच पुढे केला जाई.. अर्थात तेव्हा परिस्थितीच तशी होती. जे मिळेल ते आनंदाने घ्यायचं एवढंच माहिती! तरीही माझा भाऊ कौतुकाने चार आण्याची नाणी आधीपासून जमवून ठेवीत असे आणि छान लाल कागदात चॉकलेट सारखी गुंडाळी करून देत असे. तेव्हा त्याने कुठेतरी ऐकले होते की,  1962 सालच्या नाण्यांमध्ये सोनं असतं म्हणून त्याने ती नाणी गोळा केली होती. खरं खोटं देव जाणे,  पण त्यामधून मला त्याची भावना दिसत असे!

अशी ती नवलाईची भाऊबीज भाऊ मोठे झाल्यावर बदलत गेली. दोन्ही भाऊ नोकरीला लागले,  मग दर वर्षी दोन दोन साड्या मिळू लागल्या. पुढे लग्नानंतर ते अप्रूप कमी झाले आणि मुलांच्या भाऊबीज सुरू झाल्या. आते,  मामे,  चुलत अशी भावंडे जमू लागली आणि एकत्र जमून भाऊबीजेचा आनंद घेऊ लागली.

आत्ता मला आठवत आहेत त्या पूर्वायुष्यातील दोन मोठ्या भाऊबीज! भावाचे नाते कसे भक्कम असते ते दाखवणाऱ्या..

कॉलेजच्या काळात मी हॉस्टेलवर राहत होते. दिवाळीच्या सुट्टीत मी आणि माझा मोठा भाऊ आई वडील ज्या ठिकाणी होते तिथे मिळून जात असू. एका वर्षी आम्ही दोघे एसटीने निघालो. पंढरपूर मार्गाने जाताना त्यावेळी बरेच ओढे होते आणि त्या ओढ्यांना पूल नव्हते. दिवाळीच्या दरम्यान त्यावेळी अवकाळी पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहत होते. एसटी ड्रायव्हरने ओढ्यात बस घालायचे धाडस केले नाही. रात्रभर आम्ही ओढ्याकाठी बस मध्ये बसून होतो. सकाळी पाणी थोडे कमी झाले,  म्हणून बस मधील लोक हळूहळू पलीकडच्या तीरावर जाण्यास निघाले.

माझा भाऊ मला म्हणाला,  ‘आपण पलीकडे जाऊ शकतो,  पण तू माझा हात सोडायचा नाही,  तो चांगला पट्टीचा पोहणारा होता. त्याने माझा हात घट्ट पकडून मला बरोबर नेले. मध्ये मध्ये ओढ्यामधील झाडाझुडपांचे काटे बोचत होते,  दगड टोचत होते,  त्यातून मी उंचीने कमी त्यामुळे मधून मधून माझे डोके पाण्याखाली जात होते,  पण आम्ही एकमेकाचा हात सोडला नाही आणि ओढा क्रॉस केला. आता त्या ठिकाणी पूल आहे पण पन्नास वर्षांपूर्वी ही सगळी कसरत भावाबरोबर मी केली. माझ्या मोठ्या भावाची ही मोठ्ठी भाऊबीज माझ्यासाठी होती!

अशीच एक आठवण दुसऱ्या भावाची! आम्ही तेव्हा पाटणला होतो आणि ह्यांची बदलीची ऑर्डर आली. त्या ठिकाणी हजर होण्यास फक्त दहा दिवस हातात होते. यावेळी पाटणहून शिरपूरला (धुळे जिल्हा) जनरल ट्रान्सफर झाली होती. आणि माझे दिवस भरत आले होते..

नववा महिना लागला होता.

दिवाळीचे दिवस होते. त्यामुळे माझा भाऊ भाऊबीजेसाठी फलटण हून पाटणला आला होता. आम्ही तेव्हा बदली आणि माझे बाळंतपण या व्यवधानात होतो. त्याने ते ऐकले. तेव्हा म्हणाला,  ‘ एवढी कशाला काळजी करता,  तिला फलटणला पोचवा. तेव्हा माझी आई त्याच्याकडेच होती. अर्थातच दिवाळीनंतर लगेचच मला फलटणला पोहोचवून हे निश्चिंत मनाने शिरपूरला हजर होण्यासाठी गेले. पुढे आठ दिवसातच माझी डिलिव्हरी होऊन कन्या रत्न झाले! माझ्या भावाची ही मोठी ओवाळणी त्यावर्षी मला होती!

अशा आठवणी मनाच्या कुपीत साठवल्या जातात. आणि ती कुपी उघडली की त्याचा सुगंध दरवळतो.. भाऊबीज हा सण बहिण- भावाच्या नात्याला दृढ करणारा सण आहे. ते नातं मनात कायमच घर करून असतं! अजूनही दिवाळी,  भाऊबीज आली की,  या आठवणी माझ्या मनात अलगद उतरतात आणि पुनः प्रत्ययाचा आनंद देतात!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. १७ – देणाऱ्याचे हात हजार… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. १७ – देणाऱ्याचे हात हजार… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

देणाऱ्याचे हात हजार…

माझ्या वर्गातील ऋजुताच्या (नाव बदललेले) वडिलांचा अपघात झाला होता.

घरची अत्यंत गरिबी. नोकरी नव्हती कारण कंपनी बंद झालेली होती. नाईलाज म्हणून कुठेतरी ताडीच्या दुकानावर रात्री दहा वाजेपर्यंत काम करत. तिथूनच रात्री घरी परत येताना त्यांना अपघात झाला.

पायाच्या हाडांचा चुरा झालेला, पार्ल्याला कूपर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं.

समजल्याबरोबर बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना पाहिलं मात्र, मला भडभडून आलं. परिस्थितीनं माणूस किती अगतिक आणि लाचार बनतो, नाही का! पायात सळी घातल्याने पूर्ण पाय प्लॅस्टरमध्ये आणि पराकोटीचा केविलवाणा चेहरा. खूप वाईट वाटलं.

“ऋजुताची आई कुठे आहे? , ” विचारलं, तर त्या फोन करायला खालच्या मजल्यावर गेल्या आहेत असं कळलं. त्या येईपर्यंत ऋजुताच्या वडिलांशी गप्पा मारत बसले.

पंधरा वीस मिनिटांनी पाय ओढत येणाऱ्या ऋजुताच्या आई दिसल्या. त्यांच्याकडून कळलं की धावपळ करणारे कोणी नव्हते, त्या एकट्याच सगळीकडे पळत होत्या. रात्री वॉर्डमध्ये बायकांना राहण्याची परवानगी नव्हती म्हणून गावाहून त्यांनी भावाला बोलवलं होतं.

त्या स्वतः स्वयंपाकाची कामं करत, तीही बंद झाली होती, कारण त्यांना दिवसभर दवाखान्यात रहावं लागायचं. हे सगळं सांगताना त्यांना आतून येणारे दुःखाचे कढ मला जाणवत होते.

मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला मात्र, त्यांच्या दुःखाचा बांध फुटला.

“काही काळजी करू नका, बाबांना लवकर बरं वाटेल. जीवावरचं पायावर निभावलं म्हणून देवाचे आभार माना. काही मदत लागली तर मला नक्की सांगा, ” असं म्हणून मी पर्समधले पाचशे रुपये काढून त्यांना दिले.

“नको बाई पैसे. तुम्ही स्वतः यांना भेटायला – बघायला हॉस्पिटलमध्ये आलात हेच आमच्यासाठी खूप आहे, ” असं म्हणत त्या पैसे परत देऊ लागल्या.

मी म्हटलं, “काय हो? तुमच्या मोठ्या बहिणीने पैसे दिले असते तर घेतले असते ना? ” 

खरंच, त्यांना पैशांची खूप गरज होती. एरवी मला पैशांचं कौतुक नसतं, पण त्या घटकेला माझ्याजवळ जास्त पैसे असायला हवे होते, असं मला राहून राहून वाटायला लागले.

घरी आल्यावर, सर्वप्रथम मी त्या हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या माझ्या एका माजी विद्यार्थ्याशी संपर्क साधला आणि ऋजुताच्या बाबांना सर्व मदत करायची विनंती केली. त्यानेही आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ती मान्य केली. ते हॉस्पिटलला असेपर्यंत ते रोज त्यांच्याकडे चौकशीला जात असे, औषधे देत असे.

पण त्यांच्या उपचाराच्या खर्चासाठी, तात्पुरते तरी घर चालवण्यासाठी पैशांची काहीतरी तजवीज करणं गरजेचं होतं.

काही विचार करून मी ऋजुताच्या वर्गातील काही निवडक पालकांना भेटायला बोलावलं. भीतभीतच मी ऋजुताच्या वडिलांच्या अपघातांविषयी आणि त्यांच्या घरच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली आणि यथाशक्ती मदतीचं आवाहन केलं.

आमच्या शाळेतल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती सर्वसाधारणच होती. त्यामुळे क्षणभर मला वाटलंही की पालक म्हणतील, “तुम्हाला करायची असेल तर करा तुम्ही मदत, आम्हाला कशाला वेठीस धरता? “

पण मी याही बाबतीत किती भाग्यवान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. “बाई, अशा गोष्टींसाठी आम्हाला हक्कानं बोलवायचंच. आम्ही सगळेच मदत गोळा करू. तुम्ही सांगताय म्हणजे पैसे योग्य पद्धतीनेच वापरले जाणार याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही कोणताही संकोच बाळगू नका. “अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पालकांकडून मिळाली.

आणि हे नुसतं, तोंडदेखलं आश्वासन नव्हतं. पालकांनी पैसे आणून द्यायला सुरुवात केली. पन्नास रुपयांपासून अगदी पाच हजार रुपयांपर्यंत लोकांनी मदत केली.

वेळोवेळी जमा झालेले पैसे ऋजुताच्या आईला देत गेलेच. नंतर आलेले पैसे आणि साडी देऊन, मातृदिनाच्या दिवशी त्यांची ओटी भरावी, आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हास्य, थोड्या प्रमाणात का होईना, त्यांना परत मिळवून द्यावं, हीच इच्छा आहे.

आणि हजारो हातांनी देणाऱ्या माझ्या दानशूर आणि मनाने तितक्याच श्रीमंत असणाऱ्या पालकांमुळे ती नक्कीच पूर्ण होईल.

(ऋजुताच्या वडिलांचे पाय व्यवस्थित सुधारले. आता ऋजुता, आई व वडील सर्व छान आहेत.) 

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares