… पण आमच्यासारख्या सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांसाठी प्रत्येक महिन्याचाच शेवटचा दिवस खास असतो. त्या दिवशी पेंशन बॅंकेत जमा होते ना. म्हणून. महत्वाचा, आनंदाचा, आधार देणारा दिवस.
… आयुष्यभर इमानदारीने काम केल्यानंतर सरकारने दिलेली पोचपावती म्हणजे पेन्शन.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पहाटे पहाटे मोबाइल वर *टिंग* * असा आवाज ऐकला, म्हणजे ती पेन्शन बॅंकेत जमा झाल्याची सूचना असते. एरवी या *टिंग* चां त्रास होतो. हा आवाज अजिबात आवडत नाही. पहाटे पहाटे तर अजिबातच नाही. पण या दिवशी हा आवाज कानाला खूप गोड वाटतो. हा आवाज ऐकायला मन आतुर असत. जीव भांड्यात पडतो.
नेहमीचेच ठरलेले माझे डायलॉग स्वतः बरोबरच सूरू होतात.
बरंय बाई!! दर महिन्यात न चुकता ही पेन्शन येते. किती का असेना, पण आपल्या हक्काचे पैसे मिळतात. किती आधार आहे या पैशांचा.
देवा!! धन्यवाद बाबा तुला. एवढी एक चांगली सोय केली आहेस आमची. मानाने जगता येत. आता आम्ही रिटायर्ड झालेलो असलो, तरी पैसा लागतोच ना. नाही तर अजून किती दिवस नोकरी केली असती??
We are retired from Work असलो तरी, Not retired from Fun.
मार्च महिना तसा मोठाच, लांबलचक. संपता संपत नाही. असं मनाशीच मी म्हंटल. खरं तर आता रिटायर्ड होऊन दहा वर्षे झाली. आता महिना काय आणि वर्ष काय?? सुरू झाले काय आणि संपले काय?? रोजच्या जीवनात काही विशेष बदल होत नाही. तसं बघितलं तर विशेष काही घडलेलही नसत.
उद्या नवीन महिना सुरू होणार म्हणजे सर्वांना घरी येणाऱ्या मावशींना पैसे द्यायचे आहेत. बाकी बिल भरायची आहेत. आता सर्व कामे ‘ on line ‘ होतात, म्हणून दहा मिनिटात सर्वांना पैसे देणे होऊन जाते. उरलेले पैसे आपल्यासाठी पुरेसे असतात. ते पैसे बघता मी सहज म्हणते,
” बहुत पैसे हैं, अपने पास । “
आता काही अगदी पुर्वी सारख राहील नाही. मुलं घरात असताना, त्यांच्या शिक्षणाच्या वेळी, किराण्याची मोठ्ठी यादी तयार होत असे. नोकरी सांभाळून सर्व करताना घरात सर्व सामान व्यवस्थित असलं, तर रोजची कामे सहज सुरळीत होतील, या विचाराने जास्त सामान आणून ठेवणे. हा उद्देश असायचा.
आता घरी दोघेच असल्याने काही सामान नसले तरी चालते. घाई तर अजिबात नसते. बाहेर जाऊ तेंव्हा आणू, तेही लक्षात राहिलं तर.
तेंव्हा आम्हाला असा किती पगार मिळायचा?? त्यात घर खर्च, मुलांची शिक्षण, घराचे हप्ते, सणवार, औषध पाणी यानंतर असे किती पैसे वाचायचे??
बरं!! आता प्रत्येकाचे आयुष्य ‘life span’ ही वाढले आहे. मग पैसा पण जास्त लागणार ना. जमलेला पैसा किती दिवस पुरतो.??
तरी बरं आमच्या सारखे मध्यम वर्गीय लोक मनाने काटकसरीच असतात.
निवृत्ती नंतरच्या काळ ज्येष्ठांसाठी थोडा नाजूकच असतो. पैसा जवळ असला तर स्वतः वर विश्वास राहतो. आधीच मनाने नाजूक अवस्थेतून जात असताना जर त्यांच्या वाट्याला घरच्याच लोकांकडून दुर्लक्ष झाले, तर ही भावना खूप मानसिक त्रास देणारी आहे.
म्हणून ही पेन्शन, हा शेवटचा दिवस महत्वाचा.
आज ३१ मार्च, आज पहाटे *टिंग* काही वाजले नाही. क्षणभर जीव घाबरला. मनात आलं अरे!! काही नवीन सरकारी नियम बदलले तर नाही.??
लगेच लक्षात आलं,
अरे!!! आज 31 St March
“Today is account closing day.”
उद्या किंवा परवा पहाटे टिंग नक्की वाजणार.
आज मोबाईल ने मात्र छान टोमणा मारला.
कमाल का ताना दिया मोबाईल ने
हमेशा मेरे *टिंग* को कर्कश कहने वाले,
आज बड़े बेताब हो रहे हो उसी *टिंग* को सुनने के लिए।
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं…! )
इथून पुढे – –
मेथी गरम तेलात पडली, अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाट बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर ‘छिस्स’ असा आवाज आला. हा आवाज मी अजून विसरलो नाही. विसरूच शकत नाही.
यानंतर तिने पुन्हा उलथन घेतलं, त्याच पदराला पुसलं. भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं. कढईतूनच चिमटीत धरून तिनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी तिच्याकडे नुसता पहात होतो.
माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत म्हणाली, ‘खा ल्येकरा खा. सकाळधरनं उपासी हायस बाबा… ‘
… यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं, मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडूंब भरलं होतं, मनही!
मी सहज पाहिलं. काठवठीत तिच्यापुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकऱ्या मी खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती, डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. मला माझीच लाज वाटायला लागली.
… गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशीपोटी नाही.
चुलीजवळ बसून मला घाम आता होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, ‘मावशी, आता तू काय खाशील? ‘
… आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. गरागरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते, हुंदका येत होता. त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते. त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरचा तिनं घाम पुसला. या पदरातून मला वास आला, शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा, माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा!
या पदरानं मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती.
जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजात टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली.
पदरालाही किती पदर असतात ना? वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो?
… प्रत्येक आई-मुलाचं नातं, पदरापासून सुरु होतं… पदराशी संपतं..! या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य!
आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही.
इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेकानेक फाईव्ह स्टार हॉटेलात राहिलो. जेवलो. मेनूकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी, कोफ्ता, कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. छे!
स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात, पण मायेचा चंद्र नसतो.. चांदणं नसतं. दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे? कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी!
चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून… करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाता दुषित करत नाही. संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच, पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया, तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होऊन जाते.
लोक याच मायाळू मावशीला हडळ म्हणायचे, का तर तिचा चेहरा भेसूर होता.
आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आडाखे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. चेहऱ्यावर रंग लावून कलाकार मंडळी नाटक करतात.
– – पण कोणताही रंग न लावता ‘नाटकं’ करतात काही मंडळी, त्यांना काय म्हणावं?
– – एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाहीत, भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतात. याला काय म्हणायचं?
– – ज्यांना आपण आयुष्यभर ‘चुकीची माणसं’ समजत असतो, तेच आपल्याला कधीतरी ‘बरोबर अर्थ’ समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय?
– – दुसऱ्याच्या चुका या चुका, पण आपल्या चुका म्हणजे ‘अनुभव’ असं कौतुकान सांगणाऱ्यांना काय म्हणावं?
– – – असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर ‘हडळ’ म्हणून शिक्का मारतात. एखाद्याला बहिष्कृत करतात.
या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो.
वय झालं होतं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता… जवळ कुणी जायचंच नाही.
– – मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली.
तिनं ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी… गूढ.. गालातल्या गालात!
‘काय आणून देऊ म्हातारे तुला? ‘ मी हातात हात घेऊन प्रेमानं विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडे तिनं क्षीणपणानं बोट दाखवलं.
‘लुगडं? ‘ मी बरोबर ओळखलं.
मी झट्दिशी उठलो. घरी जाऊन माझ्या आजीची दोन-चार लुगडी घेऊन येण्यासाठी..
तिने हातानंच खूण करत कुठे चाललास असं विचारलं. मी ही खुणेनंच सागितलं, ‘लुगडं घेऊन येतो…! ‘
तिनं मला परत खुणेनच जवळ बोतावलं. मी खाली वाकलो. ती. कानाजवळ येऊन एकेक शब्द तोडत बोलली, ‘जुनं तुज्या आजीचं लुगडं मला नगो, नव्वंकोरं आन तुज्या पैशाचं.. घडी मीच मोडनार… मरनाऱ्या मान्साला जुनं दिऊ न्हाई काई… माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं, ह्येजातच माझा आनंद… ‘ हे बोलून ती पुन्हा गूढ हसली.
– – तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अतिप्तता..!
बरं तिनं कसं ओळखलं ती मरणार आहे ते…?
मी विद्यार्थीदशेत… नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी? पण पुढच्यावेळी आलो की घेऊन येईन असे सांगून मी उठलो होतो.
पुढे काही वर्षांनी डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं.
म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते, ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती, एका कोपऱ्यात लोळागोळा होऊन… गाव खरंच सुधारलं होतं.
– – शेजारी उभ्या असणाऱ्या एकाला खुणेनं विचारलं, ‘म्हातारी कुठंय? ‘ तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला होता, ‘कोन? ती हाडळ व्हय? आरं ती मेली की कवाच… कोन नव्हतं तिला… ‘
पुढचं मला ऐकूच आलं नाही.
कोण नव्हतं तिला? कसं सांगू…?
ती मेली नाही… माझ्या मनात ती कायम जिवंत आहे…!
कोण कसं नव्हतं? मी होतो की तीचा, मनातून तिनं मुलगा मानलं होत मला?
… आई होऊन ती गेली. मलाच मुलगा होता आलं नाही..!!!
प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं, म्हणून ती तशी गूढ हसली असेल का?
यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो. पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो.
मला भीती वाटते आणि लाजही!
… पटकन् समोर येऊन ती दे माजं नवकोरं लुगडं अशी पटकन पुढ्यात येऊन मागेल ही भीती… आणि मी तिला ते कधी देऊ शकलो नाही याची लाज.
डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे. पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की!
माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही…! या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होतात, तेव्हा त्या पैशाची ‘लक्ष्मी’ होते. नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत.. बाकीचे नुसतेच धनिक!
नोटा आणि नाण्यांचे धनी!!
तिच्या पडक्या घराला तोक *हाडळीचं घर* म्हणतात, मी त्याला आईचं स्मारक समजतो.
– – ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझं ठेवून गेली.
– – तिच्या घराजवळनं जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा…
पण का कोण जाणे…? त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच… आणि उगीचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट… माझ्याकडे बघत मंद मंद हसते आहे. गालातल्या गालात.. तसंच गूढ..!!!
… आणि मी पाय ओढत एकटाच मी तिथून चालायला लागतो, कुढत… आई नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा…!!!
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
मी नववीत असेन बहुधा.
साताऱ्यातून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीला.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही. खूप रडावसं वाटतं, मन भरून येतं, पण रडू येत नाही तसंच काहीसं.
त्या दिवशी आजीबरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती. रागानं दिवसभर जेवलो नव्हतो, तिनेही बोलावलं नाही.
रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. संध्याकाळचे ७ वाजते असावेत.
अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत ‘पहले आप पहले आप’ म्हणून निरोप देत असावेत.
निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरू झाला, काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो-धो पाऊस सुरू झाला. मी चिंब…!
पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो. घर कसलं? पत्रे, गोणपाट लावून केलेला तो एक निवारा होता.
आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे!
आम्ही जिथे रहायचो. तिथे एक पन्नाशीची बाई रहायची. शेजारच्या आयाबाया तिला ‘हडळ’ म्हणायच्या.
ती दिसायलाही होती तशीच. डावा डोळा एकदम बारीक, या डोळ्यात काळे बुब्बुळ नव्हतंच, अख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं, या वयातही चेहरा सुरकुतलेला, पांढरे केस पिंजारलेले, तोंडात मोजके दात, त्यातून समोरचा एक पडलेला. दुसरा ओठातूनही बाहेर आलेला, अंगावर लुगडं घातलंय की चुकून अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा, की काळ्या रंगानं लाजावं…!
… एकूण अवतार भेसूर!
त्यात बोलण असं की भांडल्यासारखं, प्रत्येक वाक्यात शिवी.
कुणीही हिच्या नादी लागत नसे, समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना, अपशकून व्हायचा त्यांना. कोणत्याही सण समारंभात हिला जाणीवपूर्वक बाजुला ठेवायचे. लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल, अशी भिती घालायचे. तिला जादुटोणा येतो, तिच्या घरात कवट्या आहेत वगैरे असंही बोललं जायचं. हे घर तिचंच..!
मी नेमका याच घरात शिरलो होतो. पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती. शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात रॉकेल भरून, जुनी नाडी टाकून, उजेडासाठी वात पेटवलेली असे. गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता.
ती चुलीशेजारीच बसली होती. त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात.. केस तसेच पिंजारलेले. चूल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता. मूळचाच भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता. विरुद्ध बाजूला तिचीच सावली जमिनीवर पडली होती. एकूण वातावरण भितीदायक!
मी घाबरलो. पण बाहेर पडायची सोय नव्हती.
‘काय रं? ‘ घोगऱ्या आवाजात ती गरजली.
‘काय नाय, ते आपलं भायेर पाऊस म्हणून.. ‘ मी पायाने जमीन टोकरत चाचरत बोललो.
ती बसली होती. समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. पूर्वी डालड्याचा पिवळा डबा मिळत असे. त्यावर कसल्याशा झाडाचं चित्र असे. डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक उपयोग असत. कुणी डाळी तांदुळ त्यात साठवत असत, कुणी बाहेर शौच्यासाठी जाताना टमरेल म्हणूनही वापरे. तिनं याच डब्यात पाणी भरून ठेवलं होतं.
डबा काटवटी शेजारी. डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ तिंबत होती.
मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती. इकडून तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती, मध्येच पिठाचा गालगुच्चा घेत होती. मी हा खेळ पाहण्यात रंगून गेलो. शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिनं तोडला. दोन हाताच्या तळव्यात धरून या लचक्याला तिनं गोल आकार दिला आणि हातातून पडू न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारू लागली. दोन्ही बाजूंनी ढोलकी बडवतात तसं…
एका क्षणी तर जादू झाली. या गोल गोळ्यापासून एक सुंदर गोलाकार अशी ताटाएवढ्या आकाराची पोळी तयार झाली. माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते, हिनं हवेतच ती केली. हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी आता माझी खात्री पटली.
यानंतर तिने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली. डब्यात पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरन फिरवला. शेणाने सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं, तिनं आधी ते पदराला पुसलं. उलथन्यानं तव्याला थोडं ढोसून चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढून चुलीच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली.
आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला. ती टम्म फुगली. दिवसभर मी फुगलो होतो, तस्साच!
तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतंच. बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. पत्र्याबाहेर अंधार, नुकताच पडून गेलेला पाऊस, हवेत झोंबरा गारवा, पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग!
मी आशाळभूतपणे भाकरीकडे पहात होतो.
तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. म्हणाली, ‘खातु का भाकर? ‘ छ्या… छ्या… नको मला. ‘ एकदम हो कसं म्हणणार?
एखादी गोष्ट मनापासून हवी असताना… ती मिळत असताना, नको म्हणणं काय असतं, हे त्या नको म्हणणारालाच कळेल.
तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच, मनात असलं नसलं तरी! डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे.
तिला या अंधारातही ते दिसलं असावं. म्हणाली, ‘हिकड ये… ‘
‘जावू का नको? ‘ मी घुटमळलो.
‘ये रं ल्येकरा, माज्याजवळ बस… ये हिकडं… जमिनीवर हात आपटत ती बोलली… तीच्या बोलावण्यात आर्तता होती.
मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो. मायेनं भिजलेला तो आवाज होता.
तरीही जवळ बोलावून भाकरीबरोबर ही मलाच खावून टाकणार नाही ना? या विचारानं मी घाबरलो.
तिनं पुन्हा हाक मारली.
मी पाय ओढत तिच्या दिशेनं घाबरत निघालो. मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालातल्या मंद हसली. मी असं हसताना याआधी कधीच पाहिलं नव्हतं. का हसली असेल ती अशी मला बघून? मी आणखी घाबरलो.
आता पळायची सोय नव्हती. तिनं माझे हात धरले होते. माझे थरथरते हात तिने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं.
… चुलीजवळ असूनही मला कापरं भरलं. ती पुन्हा हसली. ओठाबाहेर आलेला दात मला अजून भ्या दावत होता. ‘कवापस्नं जेवला न्हाईस? ‘ डोक्यावर हात फिरवत मायेनं तिनं विचारलं. ‘सकाळपस्नं… ‘ मी चाचरत बोललो.
शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती. तिन ती पदरानं पुसली. त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. मी अजूनही साशंक होतो. ती पुढे काय करणार मला माहीत नव्हतं.
तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते सारं आठवलं. अंगावर शहारे आले. ‘तू भाकर खायाला सुरवात कर, मी तवर भाजी करते. ‘ या वाक्यान माझी तंद्री भंगली.
तेवढ्यात तिनं, बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली, दुसऱ्या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. किटलीतलं तेल कढईत टाकलं. किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तिनं बोटानं पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली, ‘रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर, डोस्क्याला त्याल लावावं.. कसं भुतावानी झाल्यात क्यास…! ‘ असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं.
मी तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं, वाटलं, मला सांगते तर मग ही का लावत नसेल डोक्याला तेल?
.. “भुतावानी” हा तिच्या तोंडून आलेला शब्द ऐकून मी अजून घाबरलो.
तिला याचं काही सोयरसुतक नव्हतं. शांतपणे जरा लांब हात करून तिने मग लसणाची गड्डी काढली. जमिनीत उकरून केलेल्या उखळात टाकली, वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली. उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसून घेतलं. त्यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली.
बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं…!
☆ ‘पडद्यामागची माणसं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
माझ्या मुलाने चि. प्रसादने माझ्यासाठी मोठ्ठा खजिना म्हणजे, मोबाईल मला दिला आणि व्हाट्सअप तर्फे खूप ओळखी होऊन तो मोबाईल आता जग्नमित्र झाला आहे’ अनेक मान्यवरांच्या ओळखी झाल्या – – ज्योतसे ज्योत जगाके चलो l प्रेम की गंगा बहाते चलो l – – तशा ओळखी वाढून अनेक पडद्यामागच्या कलाकारांची ओळख झाली आणि धुळ्याचे अशोक भाऊ सोनार यांची ओळख वाढली.
धुळ्याच्या पेट्रोल पंपावर ते काम करतात. नोकरीची उंची महत्वाची नसते तर विचारांची उंचीचं श्रेष्ठ ठरते. आमच्या प्रत्यक्ष ओळखी झाल्या नव्हत्या. पण तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे व्हाट्सअप तर्फे ओळख झाली ती अशी की आमच्या कथा सामायिक झाल्या की पहिला फोन अशोक भाऊंचाच येतो. ते सांगतात पेट्रोल पंपावर काम करतांना मधल्या वेळेत मोबाईल उघडून मी अगदी अधाशासारखा तुम्हां लेखकांच्या कथा वाचतो आणि ताबडतोब लेखकांना कथा आवडल्याचा फोन करतो. लेखी उत्तर देण्याइतका मी सज्ञान नसलो तरी तोंडी कौतुक अभिप्राय द्यायला मी पुढे सरसावतो. ”
मेघ:श्याम सोनवणे सरांचा कथा सामायिक करण्याचा उत्साह, उपक्रम प्रशंसनीय आहे अनेक कथांना न्याय देताना त्यांना लेखकांना वेळ द्यावा लागतो. माझ्या कथेलाही त्यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना वेळ द्यावा लागला. अशोक भाऊनी त्यांना लगेच फोन केला, “अहो सर पंडित मॅडमच्या कथा पाठवा की लवकर, म्हणजे मला त्यांना फोन करता येईल. “
… फारसे शिक्षण नसतांनाही त्यांची साहित्याची ‘जाण’, वाचनाची उडी उंच आहे. एखादा वक्ता काय बोलेलं इतकी त्यांची लेखकांना प्रतिक्रिया देण्याची पद्धत अवाक करणारी असते. पहिलं गिऱ्हाईक वाटेला लावून दुसरं गिऱ्हाईक येईपर्यंत ते मधल्या वेळात मिळेल ती कथा अगदी भुकेल्या माणसासारखी वाचतात. ते म्हणाले, “माझी साहित्याची भुक बकासुरासारखी आहे ”
मी हसून प्रश्न विचारला, ” अशोक भाऊ इतकी तल्लख बुद्धी, इतकं संभाषणचातुर्य तुम्ही शिकलात कुठे? ” त्यावर त्यांचं परखड उत्तर आलं, ” अहो मॅडम कुठलं शिक्षण आणि कुठलं काय! शिक्षण घ्यायला शाळेत जावं लागतं ना? मी शाळेतच गेलो नाही तर कोणते गुरुजी मला वरच्या वर्गात चढवणार? गरीबीनी आणि रिकाम्या पोटाने मला वर्गात बसू दिले नाही. कारण दिवसभर नुसत्या चहाच्या पाण्यावर राहणं सोपं आहे का? तुम्हीच सांगा मला, “
मी नवलाईने विचारलं “हो पण मग, तुमचं इतके वाचन, साहित्यिक भाषा, जनरल नॉलेज शाळेत न जाता तुम्ही कसं काय मिळवलत? ”
“काय सांगू मॅडम भुकेने पोटात लचके तोडल्यासारखं वाटायचं. मग मास्तरांचं शिकवण म्हणजे माझ्या बुद्धी पलीकडचं काम व्हायचं. कशातच लक्ष लागायचं नाही मग एक दिवस गुरुजींच्या पायाला हात लावून शाळेकडे पाठ फिरवून मी घरचा रस्ता धरला घरी आल्यावर आईने मला चांगलंच धोपटलं. आणि माझी ‘शाळा’ घेतली. असाच उनाडक्या मारत फिरत असताना त्या मायने मला मारतच घरी आणलं. आणि म्हणाली, ” मी भाकर करतीया तर बैस इथे, हे घे बालभारतीचे पुस्तक आणि वाचं. ” – –
– “अग पण माय! मला कुठे वाचता येतया? “शाळला जात नाहीस गावभर भटकतोस कसं येईल तुला वाचता? ते काय नाय आज पासून तू घरीच शिकायचंस कसं वाचता येत नाही ते बघतेचं मी” मायने मला फटकारले… “ अग पण! अग पण! “ मी अडखळलो. मला म्हणायचं होतं “तुला तरी कुठे येते य वाचता? आणखी मला तिला म्हणायचं होतं, माय भाकरीचा खरपूस वास नाकात शिरतोय, आणि पोटात भुकेचा डोंब उसळलाय ग बाई! आधी भाकर तरी दे” – – हे मनांत म्हणताना, माझी नजर पुन्हा पुन्हा तव्यावरच्या भाकरीकडे वळत होती. मायच्या ते लक्षात आलं. क्षणभर ती कळवळली. पण लगेच कठोर होऊन ती कडाडली, ”हा धडा वाच. धड्याचे नाव आहे खरा दागिना ‘ “
“अगं पण! “पुन्हा मी तुणतुणं वाजवलं, तर चित्र माझ्यापुढे नाचवत ती म्हणाली “हे चित्र बघ आणि त्याच्यावरून काय दिसतं ते पाहून वाक्य तयार कर. हळूहळू असं वाचायला पण शिकशील. ”
– – आणि काय सांगू मॅडम! माझ्या आईचे शब्द खरे ठरले. चित्र बघून वाक्य जोडत मी वाचायला शिकलो. आमचं खोपट म्हणजे माझी शाळा झाली, आणि त्या शाळेतली माझी गुरु झाली होती माझी माय. ”
– – तो धडा अशोकभाऊंच्या मनात कायम कोरला गेला. एक श्रीमंत उंची कपडे घातलेला दागिन्यांनी मढलेला किडकिडीत मुलगा, तर दुसरा हुशार धष्टपुष्ट, आरोग्यपूर्ण मुलगा दोघांच्या तुलनेत मास्तरांच्या परीक्षेत खरा दागिना म्हणजे शिक्षणात आणि आरोग्यात दुसरा मुलगा उत्तीर्ण झाला. अशोक भाऊंच्या मनात बिंबलेला तो धडा अगदी खोलवर रुजला आहे.
परिस्थितीमुळे खूप नाही शिकता आलं तरी साहित्याच्या मेळाव्यात ते अग्रगण्य आहेत त्यांच्या ओळखी त्यांचा लोकसंग्रह, वाचनाची धडपड आणि प्रतिक्रिया देण्याचा उत्साह अमाप आहे. वेळात वेळ काढून छोटी मोठी कथा वाचली की ते लेखकांचा नंबर अभिप्राय देण्यासाठी तत्परतेने फिरवतात. कधी कधी माझी कथा सामायिक झाल्याचं माझ्या आधी त्यांनाच कळतं. आणि त्यांचा लगेच फोन येतो, “राधिका पंडीत मॅडम आज तुमची कथा आली आहे बरं का! मी वाचलीय आवडली मला. म्हणून तर तुम्हाला लगेच फोन लावलाय”.
बालभारती दिन नुकताच साजरा झाला. आणि मला आठवले ते अशोक भाऊ, आणि त्यांची माऊली. तेव्हां मुखपृष्ठावरचं चित्र बघून ती म्हणाली असेल, “बघ हे चित्र! आणि म्हण मी ह्या मुलांसारखा वाचायला शिकणार आहे. ”.. आणि खरोखरच माऊलीच्या इच्छेप्रमाणे अशोकभाऊनी आपला वाचनाचा व्यासंग वाढवला.
… आता साठीतल्या अशोक भाऊंचा वाचन हा छन्दचं झाला आहे. धुळ्याच्या पेट्रोल पंपावर तुम्ही गेलात ना, की तुम्हाला पुस्तकात डोकं खुपसलेले वाचनात गढलेले अशोकभाऊ नक्कीच भेटतील. त्यांना एखादं छोटसं पुस्तक तुम्ही भेट द्या ते जाम खुश होतील. आयुष्याच्या प्रवासात अशी कितीतरी माणसं येतात आणि एक आपला आगळा वेगळा असा ठसा उमटवतात. त्यापैकीच एक आहेत अशोकभाऊ सोनार..
२५ मार्च – वपु काळे यांची जयंती.. त्यानिमित्ताने सहज भूतकाळात गेलो. त्यांच्याशी माझी मैत्री अखेरपर्यंत होती. ९० च्या दशकात पत्रसंवाद हेच साधन होते आणि मी माझ्या आवडत्या लोकांना पत्राद्वारे संपर्क करून स्नेहबंध जुळून येत गेले. नारायण सुर्वे, शिरीष काणेकर, पुल तसेच वपु ही!
मात्र वपुशी असलेली मैत्री हा माझा खऱ्या अर्थाने समृद्ध खजिना!
माझ्याकडे नवीन काही घडलं की मी आवर्जून त्यांना कळवायचो. तेही त्या प्रत्येक पत्राला नक्की उत्तर द्यायचे! तसेच त्यांच्याकडे नवीन काही घडलं की ते आवर्जून मला कळवायचे. असा पत्र संवाद सुमारे २५ वर्ष सुरु होता. त्यांची एक एक पत्र म्हणजे जणू साहित्यिक मेजवानीच…
नंतर प्रत्यक्ष भेटीचे योग येत गेले. पुण्यात कुठं त्यांचा कार्यक्रम असला की हमखास आधी मला कळवून “भेटूया” असं म्हणायचे. टिळक स्मारकाच्या ग्रीन रुममध्ये अशा कैक गप्पांच्या मैफिली रंगलेल्या!!
त्यांची केवळ पत्रच वाचनीय असायची असं नाही तर त्या पत्राचे एन्व्हलप पण तितकेच प्रत्येकवेळी वाचनीय आणि देखणे असायचे.
वाचकांची आलेली पत्रे आणि त्याला त्यांनी दिलेली उत्तरे याचेच त्यांनी दोन भागात पुस्तक काढले! प्लेजर बॉक्स या नावाने!
आणि दोन्ही भागात माझं एक एक पत्र आणि त्यांनी दिलेलं उत्तर छापलं आहे! हे किती आनंदाचे!
त्यांच्या पत्रसंवादाचा एक अफलातून नमुना सोबत पहा.
माझं लग्न झालं त्यावेळी मी त्यांना ते कळवून सोबत आमच्या जोडीचा फोटो पाठवला. मी माझ्या लेटरहेडवर ते पत्र पाठवलेलं. ते पाहून त्यांनी त्यांच्यासाठी पण छान एखाद डिझाईन करून द्याल का मला? असं विचारलं!! हे किती भाग्य. अर्थात नंतर मी त्यांना ते डिझाईन करून दिले जे नंतर शेवट्पर्यंत वापरत होते.
तर माझ्या लग्नाबद्दल त्यांनी पाठवलेलं पत्र आणि त्याचे इन्व्हलप… दोन्ही पहा… यावरून त्यांच्या अफाट सृजनशीलतेचा कल्पना येते!
“काही लोक ‘ Missing Tile Syndrome’ या आजाराने ग्रस्त असतात. “
काल आम्ही सर्व मैत्रिणी नेहाकडे गेलो होतो. तिने नवीन घर बांधलेम्हणजे अगदी छान टुमदार बंगलाच बांधला. काल बाप्पाचे दर्शन, हळदीकुंकू व तिचे नवीन घर बघणे असा कार्यक्रम झाला.
सर्व मैत्रिणींनी छान गुलाबी रंगाच्या साड्या नेसायचे ठरविले होते व नेहा करिता छान gift पण घेतले होते.
नेहा कडे तिचे मिस्टर, जे इतक्यातच रिटायर्ड झाले आहेत. व तिचा मुलगा निशांत.
जो सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. म्हणजे एकुण मध्यम वर्गीय एक चांगला परिवार म्हणता येईल.
आम्ही वेळेवर पोचलो. नेहाने उत्साहाने आपला थ्री बेडरुम बंगला दाखवायला सुरुवात केली. किचन, ड्राय बाल्कनीहॉल मागची पूढची जागाछोटासा बगीचा वगैरे वगैरे. सर्वजण उत्साहाने बघत होतो. जो तो आपापल्या परीने कौतुक ही करत होते. घरातील wood workकिचन मधील डिझाईन colour combinations, भिंती चे रंग. प्रत्त्येक सहा महिन्यांत फॅशन बदलते. त्यामुळे हे नवीन घर बघायला सर्वांना मजा येत होती. नवीन घरात एक वेगळाच सुगंध दरवळत असतो.
सर्वच सारखे असतातअसं नाही ना. आमची पण एक मैत्रिण थोडी वेगळीच आहे. मी विचारच करत होतेअजून मॅडमने काही शेरा कसा मारला नाही?? expert comments कसे दिले नाहीत.???
तेवढ्यात सुरू झालेच. “अग! शहरापासून किती दूर आहे. बंगला म्हंटला तर security चा प्रश्न येतोच. या वयात फ्लॅटच बरा. एवढ मोठं घर बांधले तर आहे. पण तुझी सतत तक्रार असतेच. कंबर दुखते ना. मग maintain कसं काय करणार?? “
” आमच बघ कस सुटसुटीत. एक समोर चा दरवाजा बंद केला, की काळजी नाही. अगदी शहरात. खाली उतरलं की सर्व मिळत. रंग थोडे डार्क च वापरले आहेस तू. अंधार पडत असणार. दिवसा पण लाईट लावावे लागत असतील. “
विषय बदलावा म्हणून मी म्हंटल अग निशांत काय म्हणतो? शिक्षण पूर्ण होण्यातच असेल नाही का?? नेहा उत्तर देणार, तेंव्हाच “अग, आजकाल H1 B visa चा खूप. Problem चालू आहे. नोकऱ्यांचा तर प्रश्न आहेच आहे. आमच्या अजय ची काळजी नाही आम्हाला. ‘citizenship’ मिळाली आहे ना त्याला. “बोलल्याच मॅडम. “
नेहा चे मिस्टर तर आधीच सटकले होते. नेहा हुं हां करत ऐकत होती. बाकी सर्व बैचेन झाल्या होत्या.
अग!! नेहा चल हळदीकुंकू दे. निघायला हवं आम्हाला. मी म्हंटल.
नेहाने हळदीकुंकू दिले. वाण दिले. व मस्त गरम गरम बटाटे वडे व गाजर हलवा ही होता. खरं तर सर्व व्यवस्थित झाले होते. एवढा पाहुणचार भरपूर होता. पण काय करणार?? बटाटे वड्यात आलं लसूण थोडे कमीच झाले होते ना. ‘वडे’ अजून थोडे तळायला हवे होते. असा मॅडमचा ‘expert comment’ आलाच. बटाटे वडा करताना बेसन मधे थोडी तांदूळाची पीठी घातली की वरचा पापुद्रा कसा छान क्रिस्पी होतो. एक सूचना पण मिळाली.
आम्ही परत यायला निघालोनेहाने मला जवळ येऊन विचारले काय ग! घर कसे वाटले? बरे आहे ना.
मी म्हंटलेअग!! अगदी मस्त. फारच सुंदर. बटाटे वडे पण छान. , मस्तच.
नेहाचा चेहरा खुलला.
घरी येताना मी हाच विचार करत होतेकी मॅडमने जेवढ्या comments केल्या. त्यातील एका तरी comment ची गरज होती का? ती वेळ बरोबर होती का? तुम्ही किती पण expert असाल. पण प्रत्त्येकाची आवड असतेइच्छा असतेपैशाचा ही विचार करायचा असतो. मुख्य म्हणजे तो त्यांचा विचार आहे. आपल्याला तेथे रहायचे ही नाही. व तुम्हाला कोणी विचारले ही नाही. आता नेहाने आपल्या तीस वर्षांच्या संसारात आधीही बटाटे वडे केलेच असतील ना. पाहुण्यांनी पाहुण्यांसारखे रहावे. हा साधा सरळ सोपा नियम आहे.
आणि जर चूका काढायचे ठरविले तर स्वतः पासून सुरुवात करावी.
खूप लोकांना दुसर्यांच्या आनंद साजरा करता येत नाही. कौतुक करणे तर सोडाच.
” जिभेचं वजन खूप कमी असते, म्हणून तिचा तोल सांभाळणं कठीण काम असते. ” प्रत्येकाला जमतेच असं नाही. .
असे लोक वेळ बघत नाही, मौका बघत नाही, बोलतात. आपली तुतारी सतत प्रत्येक क्षेत्रात वाजवत राहतात. IMeMyself याच्या बाहेर ते निघतच नाही. विषयवेळ, काळ कोणताही असो ‘I am the best ‘ I know everything. हेच दाखवायचा प्रयत्न असतो. व लक्ष नेहमी दुसऱ्यांच्या रिकाम्या अर्ध्या ग्लास वरच असतं. कमजोर मनाचा व्यक्ती जर यांच्या बरोबर सतत राहिला तर तो तर डिप्रेशन मध्ये जाईल.
अरे!! देवा तू मला काहीच गुण दिले नाहीअशी तक्रार तो देवाजवळ करेल.
स्वतःचा ‘ EGO ‘ सांभाळतानाते किती लोकांना दुखवतातहे त्यांना कळत नाही. समोरचा माणूस उत्तर देत नाही. याचा अर्थ तो बोलू शकत नाही. असा होत नाही. प्रत्येकाला डोळेकानतोंड असतंच की. बुद्धी पण देवाने दिलीच आहे. तो वादविवाद टाळतो. वातावरण खराब होऊ नये. याचा प्रयत्न करतो म्हणून बोलत नाही. परंतु कधी कधी ठोकावच. त्याशिवाय ते सुधारणार नाही. हे पण नक्की. अस माझं मत आहे.
उद्या मॅडम कडे मुलांचे लग्न होणारसून येणार तेंव्हा काय होईल? आज हळद जास्त झाली. उद्या मीठच कमी झाल. गॅस किती मोठा ठेवलाय? वगैरे वगैरे. हे असच मॅडम करणार का??
काही जण “missing tile syndrome” या आजाराने ग्रस्त असतात. चूका (त्यांच्या दृष्टीने) शोधणे व दाखविणे आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. स्वतः बद्दलही विचार करावा थोडासा. नेहा पण सहज उत्तर देऊ शकली असती.
मी म्हणेन तेच बरोबर. तेच झालं पाहिजे. ते दुसऱ्यांना गृहित धरतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट आपण कुठे बुधवारी जाऊ म्हंटल तर त्या म्हणतील नाहीआपण शुक्रवारी जाऊ या.
गृप मधे सर्व सारखेच ना. असं ‘self style commander ‘ बनायची गरज नसते. मैत्रित ‘सर्वानुमते’ हा शब्द खूप महत्त्वाचा असतो.
एकदा असा स्वभाव कळला तर हळूहळू लोक दूर जातात. किंवा नाइलाजाने ऐकतात.
असा स्वभाव घरचे सहन करतील. बाहेरच नाही. घरचे ही हळूहळू विरोध करतातच.
आता मात्र मी ठरवलंय मॅडम बरोबर बाहेर जायचे नाही. समोरचा बदलत नाही, तर आपणच बदलावे.
काही गोष्टी वयामानाप्रमाणे शिकायच्या असतात. काही सवयी ठरवून बदलायच्या असतात. काही नाही आवडलं तरी सहन करायचं असत. आपल्या बॉडी लॅंगवेजवर expressions वर लक्ष द्यायचं असत. माझ्या दोन गोष्टी तुम्हाला आवडतं नाही, ठीक आहे. अगदी मान्य आहे. माझ्यात दोन नाही, दहा गोष्टी तुम्हाला न आवडणाऱ्या असतील. तसंच तुमच्या ही चार गोष्टी मला आवडत नाहीत. हे पण तेवढंच खरं आहे. हेही लक्षात असू दयाव. तुमचाही अर्धा ग्लास रिकामा आहेच.
अशा प्रसंगांना कसे handle करायचे हे प्रत्येकाला ठरवायचे असते. दुर्लक्ष करायचे, मनाला लावून घ्यायचेकी सडेतोड उत्तर द्यायचे. न बोलता आपली नाराजी दर्शविली तरी चालेल.
खरंतर इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत? याने काही ही फरक पडता कामा नये.
*I must learn to value myself. *
लोकांच्या बोलण्यामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा आपली मानसिक शांती जास्त महत्वाची हेही खरंय.
“मी अशीच आहे “. म्हणून चालत नाही. वय कोणतेही असो गृपचे manners व attiquets वेगळेच असतात. टीम चा मेंबर रहायचे असैल तर ते पाळणे गरजेचे असते.
अस नाही की हे असे लोक पॉझिटिव्ह कमेंट / कौतुक करतच नाहीत. करतात पणफक्त काही लोकांचेजेथे फायदा असेल तेथे कौतुक करतात आणि तेथे चमचेगिरी करायला पण लाजत नाहीत..
म्हणतात ना,
“Be generous while giving compliments.
Your words can change their world. “
“Comments do wonders. “
*कौतुक शब्द जरी छोटा असला तरी ते करायला मन मात्र मोठं लागत. *
सगळेच जण आपापल्या आवडींप्रमाणे व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा करत असतात. माझा या वर्षी हा दिवस असा होता…
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात जवळची मैत्रिण, म्हणजे बायको, तिला ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ केले. मी रोजच सकाळी कारण शोधून बायकोला शुभेच्छा देत असतो. अगदीच काही कारण नसेल, तर, हॅपी सोमवार वगैरे, असे पण विश करतो. बायको खुश असेल तर दिवस छान जातो, हा माझा आजवरचा अनुभव!
सकाळचे खाणे आटोपले आणि घराच्या बाहेरच्या बागेत झाडांना पाणी घालायला बायको बाहेर गेली. मी काहीतरी किरकोळ काम करत होतो. तेवढ्यात बायकोचा बाहेरुन आवाज़ आला –
अहो, ग्लासभर गरम पाणी प्यायला देता का?
चला, बायकोला खुश करायला अजुन एक चान्स मिळाला, असा विचार करून मी लगेच गॅसवर दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले. तेवढ्यात हॉलमधून मोबाईलची रिंग वाजली. धावत हॉल मधे गेलो. कॉलेज मैत्रीण छायाचा फोन होता.
मी : छायाजी नमस्ते, आज एकदम सकाळी सकाळी फोन!
छाया : अरे आज १४ फेब्रुवारी. हॅपी वैलेंटाईन डे.
मी : ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’. शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. भरपूर जुन्या-नव्या गप्पा झाल्या. आता पुढचा फोन मी करायचा असे ठरले. बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे करून फोन संपला. किती वेळ गेला हे समजलेच नाही. फोन टेबलवर ठेवला आणि गॅसवर पाणी आहे, ही डोक्यात टयुब पेटली. धावत आत गेलो. गॅसवरचे दोन ग्लास पाणी आटून पाव कप पाणी झाले होते. तेवढ्यात बायकोचा बाहेरून आवाज आला,
‘अहो, आज गरम पाणी मिळणार आहे कां?
मी : सॉरी, पाणी गॅसवर लगेच ठेवलं होतं, पण माझ्या गोंधळात, गॅस ऑन करायलाच विसरलो होतो. आता लगेच देतो. असे म्हणून, मायक्रोवेव्ह मधे 30 सेकंदात पाणी गरम केले आणि खिडकीतून बाहेर बायकोला ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ म्हणत पाणी दिले. बायको पुन: खुष.
११ च्या सुमाराला माझी फर्माईष म्हणून बायकोकडून मला गरमा-गरम चहा मिळाला. बायकोला म्हटलं, चला, आज वॉशिंग मशीन मी लावतो. आमच्या घरात वाशिंग मशीन वरच्या मजल्यावर आहे. कपड्यांची बादली घेऊन वर गेलो. तेवढयात मित्राचा फोन आला. फोनवर बोलत-बोलत वर गच्चीत गेलो. ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ ची देवाण -घेवाण झाली. ३-४ मिनिटात फोन संपला. मशीनकडे गेलो. साबण पावडर टाकली. अॅक्टीव्ह सोक – वॉश – रिंझ – स्पिन अशी सायकल सिलेक्ट केली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रिंग वाजली की आपण हातातले काम सोडून का पळतो, हे अजुनहि मला समजत नाही. मशीनचे झाकण घाई-घाईत लावले आणि गच्ची मध्ये रेंज छान असते म्हणून फोन घ्यायला गच्चीत गेलो. व्हेरी व्हेरी ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ अशी तिकडून सुरूवात झाली. अननोन नंबर – लेडीज आवाज – कोण आहे, हे ओळखण्याकरता तिकडून अनेक क्लू -जसे नावातली / आडनावातली अक्षरे वगैरे, असे सुरू झाले. माझी टयुब पेटत नव्हती. मी म्हटलं, तुमचं लग्नाच्या आधीचं नाव आणि आडनाव यातली काही अक्षरं सांगा, लगेच ओळखतो. तिकडून २ – ३ अक्षरं आली आणि मी एकदम ओरडलो, अरे, ‘X X X’ तू —-!
काय पत्ता आहे? कुठे होतीस???? अशा अनेक प्रश्नांची मी सरबत्तीच सुरू केली. अहो -जाहो वरून अरे – तुरे वर केव्हा आलो आणि दोघेहि भूतकाळात कधी गेलो हे समजलेच नाही. आता कुठे भेटायचे / कसे भेटायचे हे ठरले, आता पुढचा फोन मी करायचा असे पण ठरले. बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे करून फोन संपला. गच्चीचं दार लावलं आणि आत आलो. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला –
‘अहो, मशीन झालेलं दिसतयं, ‘बीप – बीप’ आवाज येतोय’.
मशीनची सायकल नुकतीच संपली होती आणि ‘बीप – बीप’ आवाज येत होता. मेनस्वीच बंद केला, झाकण उघडलं आणि गोंधळ लक्षात आला. सगळे कपडे बाहेर बादलीतच होते. मशीन मोकळीच होती. म्हणजे मशीनमधे पाणी घेणे, साबणाचा फेस होणे, पाणी फेकणे, पुन: पाणी घेणे, असे सगळे सोपस्कार बिन कपडयांचेच झाले होते. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला —
बायको : कपडयांची बादली जिन्यात आणून ठेवा, मी वाळत घालीन.
मी : अग, जरा गोंधळ झाला. मशीन झाली आहे, पण मी मशीनमधे साबण टाकायला विसरलो होतो. आता साबण टाकून पुन: मशीन लावली आहे.
बायकोचा विश्वास बसला की नाही, हे कळायला मार्ग नव्हता.
खाली आलो आणि बागेत गेलो. एक खडा घेऊन कानाला खडा लावला – की, पुढच्या व्हॅलेंटाईन-डे ला –
बायकोनी गरम पाणी प्यायला मागितले तर पाणी गॅस वर गरम न करता, मायक्रो वेव्ह मधे गरम करायचे.
वॉशिंग मशीन लावायचे असेल तर, मशीनमधे आधी कपडे टाकायचे, मग पुढचे सोपस्कार करायचे… ,
कारण व्हॅलेंटाईन डे म्हणजे मैत्रिणींचे फोन हे येणारच…
तो सुप्रसिद्ध गायक स्व. मुकेश यांचा जन्मदिवस होता. आणि मला जुनी गाणी ऐकण्याची आवड असल्याने त्यांचे ‘ मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है.. ’ हे सदाबहार गीत योगायोगाने ऐकत होतो. हे गीत पडद्यावर राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झाले असून सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांचे हे अजरामर आणि अवीट गोडीचे द्वंद्वगीत आहे. आपला असा समज होण्याची शक्यता आहे की मी आज स्व. मुकेश यांच्याविषयी किंवा या गीताविषयी बोलणार आहे पण खरे तर मला सांगायचे आहे ते वेगळेच. जेव्हा राजेंद्रकुमार वैजयंती मालाला म्हणतो की ‘ मेरा प्यार भी तू है…’ तेव्हा त्याला तिच्या ठायी निसर्गातील सगळ्या गोष्टी असलेल्या प्रतिबिंबित होतात. निसर्गातील फुलात, सगळ्या निसर्ग सौंदर्यात जणू तिचाच भास त्याला व्हायला लागतो. किंवा दुसऱ्या एखाद्या गीतात एखादा प्रियकर आपल्या सुंदर प्रेयसीकडे पाहून म्हणतो, ‘ तेरे चेहरेसे नजर नही हटती, नजारे हम क्या देखे…’ असे चित्रपटातील नायक आणि नायिकेचे प्रेम आपण नेहमी पडद्यावर पाहतो. किती छान वाटते हे सगळे बघायला आणि ऐकायला सुद्धा.. ! सगळे कसे romantic…! ‘ क्या यही प्यार है…? ‘
आपल्याला चित्रपटातील, टी व्ही वरील मालिकातून नायक नायिकेचे प्रेम बघायची इतकी सवय झालेली आहे की हे सगळे आपण पाहतो ते म्हणजेच प्रेम असा आपला समज होत असतो. इतकं ते आपल्या रक्तात भिनलेले असते जणू. मंगेश पाडगावकर यांची ‘ प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं.. ’ या ओळी आम्हाला पाठ असतात किंवा ऐकून माहिती असतात. पण खरं प्रेम कसं असतं ? ‘ प्रेमा तुझा रंग कसा ?’ प्रेम हे सर्वव्यापी आहे. प्रेमाला स्वतःचा मुळचा रंग नाही. प्रेम हे पाण्यासारखे असते. ‘ पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो लगे उस जैसा… ’ एक सुंदर मराठी गीत आहे, ‘ प्रेमाला उपमा नाही, हे ते देवाघरचे देणे.. ’ खरंच किती सुंदर शब्द आहेत ! प्रेम हे देवाघरचे देणे आहे.
प्रेम हे जीवनाच्या वेलीवर उमललेले सर्वात सुंदर फुल आहे ! फुलासारखेच नाजूक आणि सुंदर. जणू काही ‘ जपून हाताळा ‘ दुष्ट आणि क्रूर मानवी भावनांनी ते करपून जाते. त्याला सतत मायेचे पाणी घालावे लागते नाही तर ते कोमेजण्याचा धोका असतो. प्रेमाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रेम दिल्याने वाढते. जेवढे देऊ त्याच्या अनेक पटींनी परत मिळते. जसे शेतात काही मुठ दाणे पेरावे आणि अनेक पटींनी पीक घ्यावे. What we give, we get back in abundance. प्रेम दिले तर प्रेम मिळेल आणि द्वेष पेरला तर द्वेशाचेच पिक येईल. म्हणूनच तर आपण ‘ पेरावे तसे उगवते ‘ असे म्हणतो. एकदा गौतम बुद्धांकडे एक गरीब माणूस आला. तो म्हणाला, ‘ महाराज मी गरीब का आहे ते सांगावे. ’ बुद्ध त्याला म्हणाले, ‘ तू तुझ्याजवळ असलेले लोकांना देत नाहीस म्हणून तू गरीब आहेस. ’ त्याने विचारले की माझ्याजवळ काय आहे देण्यासारखे ? बुद्ध म्हणाले, ‘ अरे लोकांना प्रेम तर देऊ शकतोस की नाही, लोकांशी प्रेमाने तर बोलता येईल की नाही ?’ मग बघ तू गरीब राहणार नाहीस. किती सुंदर उपदेश बुद्धांचा… !
खरे प्रेम कसली अपेक्षा करीत नाही. आई आपल्या मुलांवर निरपेक्ष प्रेम करते. तिला कोणती अपेक्षा असते ? आपल्या वृद्धापकाळी आपल्याला हे मूल सांभाळील या भावनेनेच ती त्याचे सगळे करते का ? पित्याचेही मुलांवर असेच निरपेक्ष प्रेम असते. त्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धापकाळी सांभाळायचे की नाही हा प्रश्न या प्रेमापुढे गौण ठरतो. असेच प्रेम भावंडांचे एकमेकांवर असते. पण जिथे नात्यात स्वार्थ आला तिथे प्रेम संपते. स्वार्थ, कपटीपणा या सारख्या भावनांनी प्रेमाचे फुल करपते. पती पत्नींचे एकमेकांवरील प्रेम असेच निरपेक्ष असते, असले पाहिजे. लग्नानंतरचे मंतरलेले जादुई दिवस काही वर्षातच भुरकन उडून जातात. मग वास्तवाला सामोरे जावे लागते. एकमेकांच्या स्वभावातील दोष, उणीवा जाणवू लागतात. पण खरे प्रेम या सर्व गुणदोषांसह समोरच्याचा स्वीकार करते. तसे नसेल तर ते खरे प्रेम नाहीच असे समजायला हरकत नाही.
मी वाचलेली एक गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा मोह आवरत नाही. एका डॉक्टरांचे हे निवेदन आहे. ते त्यांच्याच शब्दात. “ सकाळची ८. ३० ची वेळ. माझ्या दवाखान्यात कोणीही रुग्ण नव्हता. एवढ्यात एक ८० वर्षांचे वृद्ध गृहस्थ दवाखान्यात आले. त्यांच्या अंगठ्याला जखम झालेली होती. तिला टाके घातलेले होते. हे टाके काढण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले डॉक्टर, लवकर माझी जखम बघा आणि टाके काढा. मला दुसरीकडे जायचे आहे. माझी नऊ वाजताची दुसरीकडे appointment आहे. दवाखान्यात गर्दी नसल्याने मी त्यांचा रक्तदाब इ. तपासला. आणि त्यांच्या जखमेचे परीक्षण करू लागलो. जखम बऱ्यापैकी भरली होती. मी सहाय्यक डॉक्टरांना टाके काढण्याचे साहित्य घ्यायला सांगितले.
जखमेचे टाके काढले आणि जखमेची मलमपट्टी करताना त्यांच्याशी बोलू लागलो. मी विचारले, तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचे आहे का ? त्यावर ते म्हणाले, मला माझ्या पत्नीला भेटायला जायचे आहे. ती शुश्रुषा गृहात आहे. मी दररोज सकाळी तिच्यासोबत नाश्ता करतो. मग मी विचारले की कशी आहे त्यांची तब्येत ? त्यावर ते म्हणाले ती वृद्धापकाळी होणाऱ्या विस्मृतीच्या आजाराने (Alzheimer Disease) ग्रस्त असून गेली पाच वर्षे अंथरुणावर आहे. मी विचारले की तुम्हाला उशीर झाला तर त्या काळजी करतील का ? यावर ते म्हणाले की गेली पाच वर्षे ती मला ओळखत नाही. त्यामुळे माझी काळजी करण्याचा प्रश्नच येत नाही.
मी आश्चर्यचकित होऊन विचारले की त्या तुम्हाला ओळखतही नाहीत आणि तरीही तुम्ही गेली पाच वर्षे त्यांना नियमाने भेटायला जात आहात ? यावर त्यांनी दिलेले उत्तर मला थक्क करणारे होते. ते म्हणाले, मग काय झाले ? ती जरी मला ओळखत नसली तरी मी तिला ओळखतो ना.. ! अशा वेळी साथ सोडायची का ? आणि त्यांनी माझा हात हलकेच थोपटला. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातील नकळत येणारे अश्रू मी रोखले. “
असे असते खरे प्रेम. खरे प्रेम केवळ शारीरिक नसते किंवा romantic ही नसते. खरे प्रेम म्हणजे जे काही आहे, असणार आहे या सगळ्यांचा स्वीकार करणे. जगातील सर्वात सुखी दिसणाऱ्या माणसांना सर्वच गोष्टी उत्तम मिळालेल्या असतात असे नाही पण जे काही मिळाले आहे त्यातून सर्वोच्च आनंद मिळवण्याची त्यांची क्षमता आणि मानसिक तयारी असते. म्हणूनच ते सुखी आणि समाधानी असतात.
बहिणाबाईंनी मानवीमन अचूक ओळखलं आहे. मन असंख्य कल्पना सतत करत असतं. मनात विचार येणं नैसर्गिक आहे. त्या विचारांच्या दिशेने कृती केली जाते ऐच्छिक कर्माचे एक वैशिष्ट्य आहे, कर्म करावे वाटते, त्यानुसार कर्म करावेही वाटते पण सहेतुक ! काहीतरी मनात विशिष्ट विचार ठेवूनच कृती केली जाते त्यामुळे त्या कृतीचा परिणाम ही आवश्यक असतो व तो मिळतो ही! प्रश्न असा आहे की आलेला परिणाम मनाला कधी आवडतो कधी आवडत नाही. आवडणारा परिणाम त्या व्यक्तीचा अहंभाव पुष्ट करतो व नावडता परिणाम त्याला दुखावतो. विचार व कर्माची ही शृंखला अव्याहतपणे सुरू असते सोबतच सुख व दुःखही मिळत रहातात. थोडासा जरी विचार केला तर हे सुख असो की दुःख काहीच टिकाऊ नाही. सुखामागे दुःख व दु:खामागे सुख सुरुच असते त्यामुळे समाधान मात्र दूर रहाते. विचार व कृती ही धावपळ घडवतात त्यामुळे समाधान मिळत नाही. मनाचा गुणच संकल्प विकल्पाचा आहे. म्हणूनच बहिणाबाईंनी मनाला ओढाळ म्हंटले आहे. कुठेही न थांबता केलेले विचार व त्यानुसार कृती दमछाक करवतात व व्यक्ती थकून जातो.
सत्याचा शोध घेतल्याशिवाय ही दमछाक थांबणार नाही असे सांगत समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेत. ज्यात मनाला आधीच सज्जन संबोधून त्याच्यावर समाधान मिळवण्याची जबाबदारी टाकली. द्वाड म्हणून हेटाळणी न करता सज्जन म्हणून सन्माआन केला व त्या सन्मानाला पात्र होण्यासाठी काय करावे हा समुपदेश केला. ओढाळ मनाला शांत प्रशांत प्रसन्न करण्यासाठी ज्ञान दिले स्वतः चेच!मी कोण आहे हे कळणे प्राथमिकता ठरवली. देव कोण आहे हे सांगत आपलाच विस्तार सांगितला. आपण त्याचे अंश आहोत हे जर जाणवले तर त्याचे गुण अंगिकारणे परम कर्तव्य आहे फक्त त्यामुळेच सुख दुःखाचे हे दुष्टचक्र थांबू शकते अन्यथा पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं ही मालिका सुरूच राहील व आपला मूळ स्वभाव आनंदी आहे हे कळणारच नाही.
मनाचा उपयोग समाधान मिळवण्यासाठी करायचा असेल तर हदयाची विशालता त्याला समजावी लागेल तरच स्वतः ची मर्यादा मन ओळखू शकेल व शाश्वत समाधानासाठी स्वतः चे विचार व त्यानुसार कृती थांबवेल. मनाचा गोंधळ थांबल्याशिवाय हृदयातील शांती मिळणार नाही हे पटले की काम झाले!
मनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे त्याला जर एखादी गोष्ट पटली की मग त्याला काहीही करताना त्रास वाटत नाही. वाटणेच तर घात करते किंवा समाधान देते त्यामुळे ओढाळ मनाला तू मर्यादित नसून अमर्याद आहे असे पटले की अमर्यादाची म्हणजेच देवाची तळमळ लागते. अमर्याद कृती त्याच्याकडून विनासायास घडतात त्याही अपेक्षा विरहित व “इदं न मम”म्हणत!
आधीच सज्जन म्हणून सज्जनासारखी कृती करवून घेणारे स्वामी म्हणूनच समर्थ आहेत.
समर्थ भेटण्यासाठी आपली तशी ओढ आवश्यक आहे. जशी तळमळ असेल तसेच सद्गुरू करवून घेतात यावर ठाम निष्ठा असणे मात्र आपले काम आहे जे मनाद्वारे केले जाते. म्हणून मनावर लक्ष ठेवणे हा समाधानाचा पाया आहे.