☆ ‘नाही’ चा आदर करा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
एकदा एक पक्षीण पावसाळ्यात अंडी घालण्यासाठी घर आणि निवारा शोधत होती. तिला दोन झाडं दिसली आणि ती संरक्षण मागायला गेली.
तिने पहिल्या झाडाला विचारले असता त्याने तिला आसरा देण्यास नकार दिला. निराश होऊन ती दुस-या झाडाकडे गेली. आणि दुसऱ्या झाडाने होकार दिला.
तिने घर केले आणि अंडी घातली आणि मग पावसाळा आला.
पाऊस इतका मुसळधार होता की पहिले झाड पडले आणि पुरात वाहून गेले.
पक्ष्याने हे पाहिले आणि टोमणे मारत म्हणाली:
“हे बघ, हे तुझे कर्म आहे, तू मला आश्रय दिला नाहीस, आणि आता देवाने तुला शिक्षा दिली आहे.”
झाड शेवटच्या वेळी हसले आणि म्हणाले: “मला माहीत होते, की मी या पावसाळ्यात जगणार नाही, म्हणूनच मी तुला नकार दिला, कारण मला तुझा आणि तुझ्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. ”
पक्ष्याला अश्रू आले कारण..
ती आणि मुलं जिवंत का आहेत हे तिला आता कळलं!
शिकवण:
आपण नेहमी कोणाच्या “नाही” ला त्यांचा अहंकार समजू नये..
तुम्हाला संपूर्ण चित्र माहीत नसते..
इतरांचा निर्णय तुमच्या बाजूने असो किंवा नसो, त्याचा आदर करा.
आपण आपल्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपण समोरच्या व्यक्तीचा मुद्दा बघायला विसरतो.
त्यांचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न न करता, आपण आपले निर्णय घेत असतो.
आम्ही इतरांना त्यांच्या ‘नाही’वर कधीही न्याय देऊ नये कारण आम्हाला त्यांची कथा माहीत नसते.
त्यांच्या ‘नाही’मागे तुमच्यासाठी काय चांगले दडलेले आहे हे तुम्हाला माहीत नसते.
त्यामुळे नेहमी ‘नाही’चा आदर करा, विराम द्या आणि तुमच्या मनात त्याबद्दल वा त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा खोलवर विचार करा!
☆
कवी:अज्ञात
प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ फुगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एकेक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर दोन दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं, असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावे याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं. त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रोकरी, गाडी मिळवूनही आपण आनंदी कसे नाही, हा विचार तिला सतावत होता.
काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण ती यु ट्युब वर बघत होती. ते म्हणाले, ” देवानं आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन हाताच्या ओंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्याअगोदर लोकांना देऊन टाका. कारण ते नाहीतरी जाणारच आहे. ”
तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात, कारण त्यांच्याकडे प्रसिध्दी आहे, पैसा आहे. आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? पण जो संचय केला आहेस त्यातले काहीही तुला बरोबर नेता येणार नाही, असे अंतर्मनाने परत परत ऐकवले आणि ती वैतागून उठली.
मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि चालायला बाहेर गेली. रस्त्यात एक १५ वर्षाचा मुलगा हेलिअम भरून फुगे विकत होता. “ताई घ्या की फुगा. आज काही विक्री झाली नाही. लई वर जातोय बघा हा फुगा. बघा तरी! ” तो काकुळतीला येऊन म्हणाला.
तिने त्याच्याकडून सहा हेलिअमचे फुगे घेतले. तो खूष झाला. “ताई, कधीही फुगे हवे असतील. वाढदिवसाला आणि कशाला तर सांगा, ” म्हणाला.
ती घरी आली. काय करू या फुग्याचं, म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदाने उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्याने आईला मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. “कशाबद्दल? ” म्हणाली. ती म्हणाली, “असंच. ” चौथा फुगा तिनं ॲाफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक “आज वाढदिवस आहे का कुणाचा? “ म्हणत एकमेकाशी नेहमीपेक्षा जास्त बोलू लागले. पाचवा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून चार जास्त लोकं तिच्याकडे भाजी घ्यायला आली. शेवटचा फुगा तिनं एका मर्सिडीजमधून उतरलेल्या सुट-बुटातील व्यक्तीला दिला. तो हसून “थॅंक्यू” म्हणाला.
ती घरी आली. साधे सहा फुगे पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात. म्हणून दुसरे दिवशी तिने त्याच्याकडून बारा फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटसना पाठवले. तिथून फोन आला, ” अजून थोडे फुगे पाठवा. “
तिने रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरूरीच्या व रोज लागणाऱ्या चार गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकले. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॅास्पिटल्समध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरूवात केली.
माहीत नसलेल्या बायका मुला-माणसांकडून तिला सुंदर पत्रे, मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा, म्हणून देणगी देण्यास सुरूवात केली.
फुगेवाली मॅडम आता सर्वांना माहीत झाली होती. आता तिने एक एक बोध कथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली.
ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलावले.
त्यांनी विचारले, “मॅडम ही फुग्याची कल्पना कशी आली? ”
ती म्हणाली, “ मी पहिला फुगा विकत घेतला, तेव्हा त्या मुलाने साधं चपटं पडलेलं रबरी लेटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो. त्यात त्याने हेलिअम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला. तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्यामागे काहीतरी कारण आहे. नाहीतर हा एका बॉक्समध्ये नुसता पडून तर होता.
जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आतदेखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे.
आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं, तेव्हा एकेक आयडिया आपोआप येत गेली! मी फक्त त्या आतल्या आवाजाने जे सांगितले ते केले. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसवून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत!
जे जमवले होते ते आताच देऊन टाकले, कारण कधीतरी द्यावे लागणारच आहे..
मग आताच का नाही, असा विचार केला.
आणि आता जे जमवले आहे ते संपत नाही. जुने होत नाही.
हा हेलिअम फुग्यालाच नाही, तर मलाही वर वर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात. प्रेमाने मिठी मारतात.
पत्र, मेसेजेस पाठवतात.
आशीर्वाद देतात.
म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका.
तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल.
आशीर्वाद, दुवा, शुभेच्छा ही आहे माझी आताची कमाई, हा माझा नवा संचय! आणि हो. हे सगळं मी माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस!
जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणतं? अहो, आपल कार्यच आपल्याला लोकांच्या, आप्तस्वकियांच्या मनात जिवंत ठेवतं. मी प्रयत्न करतोय तुम्हीसुद्धा करा. पहा. किती आत्मीय सुख मिळत ते!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी पाहिलेला सर्वात सुखी माणूस…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
१) दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती, व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकांसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्यावेळी त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअर फूट इतके लहान आहे. परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे. तरीसुध्दा त्याचे घर हे लहान आहे. म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात. तो साधी कार व आयफोनचे साधे मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र.. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला.
२) महाग फोन : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व देखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखपर्यंत मिळते. परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्सव्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशल मीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडीओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्ये सुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व ऍप निरुपयोगी, काही कामाची नसतात.
३) महागडे घर : आजकाल मोठे मोठे बंगले आहेत बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हफ्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.
४) महागडी कार : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रॅंडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईत तर, लोक कार तर घेतात. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नंतर लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबीयांसोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.
५) महागडे कपडे : उच्च, आधुनिक जीवन शैलीचा भाग म्हणून लोक ब्रॅंडेड रेडीमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतु हे कपडे खूप कमी वापरले जातात. बाकी ते कपाटातच पडून राहतात. आपण घेतलेले महागडे कपडे हे ७०% निरुपयोगी असतात. ते फक्त ठराविक वेळीच वापरतो. नंतर ते कपाटात ठेवून देतो. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत.
६) मित्र/नातेवाईक : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात. जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु यातले ७०% नातेवाईक हे निरुपयोगी असतात, कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईकांपैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत नाही करत. गर्दीपेक्षा दर्दी लोकांत रहा.
७) कमाविलेला पैसा : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते, ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ ३०% संपत्तीचाच तो उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल, तर त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमावतो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच खाणार. काही मूर्ख रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षांनी मरून जातात. शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधता का?
८) भांडी व साड्या : आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात. परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिक लाईफ स्टाईल म्हणून काही बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठरावीक कार्यक्रम- समारंभात साड्या वापरल्या जातात. त्यामुळे त्यांचा वापर ७०% ही होत नाही.
आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तू वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तू खरेदी करण्याचे वेड असते. परंतु पाश्चात्य देशातील लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुध्दिमत्ता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते.
Do not collect assets… Collect happiness, achievement, experience & enjoyment in life… Earn honour… Earn respect… Earn Name.
CTO च्या वेतनाच्या तुलनेत त्याचा खर्च फक्त २०% होता. त्यामुळे तो ९९% तणावरहित काम करू शकत होता व खूप आनंदी होता.
त्याने एकच अत्यंत महत्वाचा संदेश दिला, “Do not buy, hold, own anything which you can’t use, consume, monitor. Do not carry any unnecessary weight or burdens on your head, mind and brain. “
जो चूक करतो तो माणूस… तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस… जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस… ज्याला आपण विजडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विजडम प्राप्त होण्यास मदत होईल.
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
☆ कृष्णाचे कर्णाला उत्तर… – मूळ बंगाली लेखक: अज्ञात – मराठी अनुवाद: श्रीमती स्वाती दाढे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
हे आजच पोस्ट करतीये, कारण अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून आजपासूनच दक्ष राहूयात.
आज १६ ऑगस्ट. सकाळच्या वेळी रस्त्यातला कागद-कचरा गोळा करणाऱ्या त्या तरुणाची चौकशी करण्याच्या हेतूने कुतूहलाने मी त्याला विचारले, “नाव काय तुझं?”
तो क्षणभर उभा राहिला, हसला, म्हणाला, “खुदिराम..” आणि पुढे जाऊन कागद वेचत वेचत निघून गेला.
त्याच भर दुपारी पाहिलं, पोस्ट ऑफिसच्या समोरच्या कचराकुंडीत हात घालून तोच तरुण काहीतरी शोधत होता. थांबून विचारले, “काय शोधतोस खुदिराम?”
उत्तर मिळालं, “खुदिराम नाही… मी प्रफुल्ल …” माझ्याकडे बघून निरागसपणे हसला आणि कचरा चिवडण्याचे काम काळजीपूर्वक करू लागला. मी अवाक.
दुपारनंतर पुन्हा तो दिसला, तशाच एकाग्रपणे कचरा निवडत असलेला. मी विचारले, “प्रफुल्ल, चहा घेणार?”
तेव्हा माझ्याकडे आश्चर्याने बघत तो म्हणाला, “माझं नाव कानाईलाल…” आणि हसला निरागसपणे.
आता मात्र माझा विस्मय आणि कुतूहल वाढले. मी त्याच्याबद्दल चौकशी करू लागलो. तर कळले —
प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ ऑगस्टला हा वेडा अचानक अवतीर्ण होतो. कुठून येतो, नाव काय, कुणालाच माहीत नाही. या गल्लीतून त्या गल्लीत, या रस्त्यावर, त्या रस्त्यावर, या वळणावर, त्या चौकात… कचराकुंडीत, गटाराच्या कडेला… सकाळपासून रात्रीपर्यंत कचऱ्यात काहीतरी शोधत फिरत असतो. पार शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, खांद्यावर पोतं घेऊन, उपाशी पोटी वणवणत असतो हा वेडा..!
संध्याकाळी घरी परतताना मोठ्या रस्त्याच्या वळणावर गोंधळ ऐकून थांबून बघू लागलो. लोकांची हीss गर्दी. एकाला विचारले, “काय झालं?” एकजण म्हणाला, “एका चोराला धरलंय लोकांनी …”
शंका येऊन गर्दी हटवत पुढे जाऊन बघितलं, दिव्याच्या खांबाला बांधलेला तोच – सकाळचा खुदिराम, भर दुपारचा प्रफुल्ल आणि नंतरचा कानाईलाल…! शेजारी मालानं खच्चून भरलेलं पोतं, जे सकाळी रिकामं होतं.
एकजण म्हणाला, “या पोत्यात चोरलेल्या वस्तू आहेत … बघा, बघा…”
कसंतरीच वाटलं मला. त्याला दुखऱ्या स्वरांत विचारलं, “का चोरी करतोस?”
तो निरागस आणि निर्विकार हसला, आधीसारखाच. बाकी काहीच उत्तर दिलं नाही त्यानं.
लोकांना कसबसं थांबवून मी पोत्याचं तोंड खोललं. मातीत उलटं केलं. त्यातून बाहेर पडले… फाटलेले, तुटलेले, दुमडलेले, मोडलेले प्लास्टिकचे आणि कागदाचे तिरंगे झेंडे..! होय, फक्त आपले तिरंगे! आपला राष्ट्रीय अभिमान असलेले, स्वतंत्र भारताचे तिरंगी झेंडे!! रस्ता, कचराकुंडी, गटारं… जिथं दिसतील तिथून उचलून पोत्यात भरलेले..!
हे सर्व बघताच लाजिरवाणी होत गर्दी पांगली. डोळ्यांत दाटून आलेले पाणी आवरून भराभर त्याला बांधलेली दोरी सोडली. माझ्या तोंडाकडे पहात त्याच निष्पाप भावनेने म्हणाला, “कोणाच्या तरी पायांखाली येऊन तुडवले जाऊ नये म्हणून…!” हसला आणि खाली वाकून परत एकेक तिरंगा हळुवारपणे पोत्यात भरत राहिला … तो वेडा.
तो… खरंच वेडा?
मी स्तंभित होऊन उभा…पायांना खिळा ठोकल्यासारखा… अपार वेदना, दु:ख, लाज यांजबरोबर प्रेम, आदर आणि विस्मय डोळ्यांत, मनात दाटलेल्या अवस्थेत मी उभाच …!
☆
मूळ बंगाली लेखक: अज्ञात
अनुवाद : श्रीमती स्वाती दाढे
प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “श्रीराम आणि श्रीकृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
हे दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत.
एकाने ‘अयोध्या ते रामेश्वर’पर्यंतचा
तर दुसऱ्याने ‘द्वारका ते आसाम’पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत, गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.
तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे, नाही का?
एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो ही मध्यरात्री!
एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात!
साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिणीच…..
एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!
शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.
ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले, त्या दोघी म्हणजे कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या…
ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले.
एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला!
एकाने लोकापवादाखातीर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.
एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबीयांवर शस्त्र उगारण्यासदेखील गैर मानले नाही.
एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.
एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.
एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.
एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.
पहिला Theory…. आहे. तर… दुसरा Practical आहे.
दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे ‘दीपस्तंभ’ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.
जय श्रीराम… जय श्रीकृष्ण!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
मित्रांनो, आपण रोज जीवन जगतो… पण बऱ्याचदा आपल्या जगण्यातली गोडी हरवलेली असते. कारण? कारण आपण पावलोपावली नाराज होतो, आणि तेही अशा बारीक सारीक गोष्टींवरून, ज्या क्षणभरात विसरून टाकायला हव्या होत्या. पण त्या मनात कुठेतरी खोलवर कायमस्वरुपी घर करून राहतात… आणि मग सारा दिवस, कधी कधी संपूर्ण आयुष्य नाराजीतच जातं!
कधी एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखी घडली नाही म्हणून, कधी कोणी हसून बोललं नाही म्हणून, कधी एखाद्यानं साधं ‘थॅंक यू’ बोललं नाही म्हणून, कधी एखाद्यानं आपलं मत नाकारलं म्हणून, कधी चुकून कुणीतरी विसरलं म्हणून…. या अशा कितीतरी गोष्टींवरुन आपण सतत नाराज होत असतो.
खरंच विचार करा मित्रांनो, यातून काय मिळतं हो?
मानसशास्त्र सांगतं, माणसाचं मन म्हणजे एक ‘कंटेनर’ आहे. ते सतत आठवणी, प्रसंग, भावना साठवत जातं. पण त्यात नेमकं काय साठवायचं, हे आपल्यावर असतं. जर प्रत्येक छोटीशी नकारात्मक गोष्ट आपण गोळा करत राहिलो, तर मन हे डस्टबिन होऊन जातं. पण जर त्याऐवजी आपण एखाद्याचं हसू, एक छोटासा गोड क्षण, एखाद्यानं दिलेलं प्रेम लक्षात ठेवलं, तर हेच मन ‘गार्डन’ होऊन जातं.
नाराज राहणे ही एक सवय असते. हो, सवयच. आणि तीही फार हळूच लागते. ती सवय वाढत जाते आणि मग आनंदाची दारं हळूहळू बंद व्हायला लागतात. कारण नाराज मन आनंदाला श्वास घ्यायलाच देत नाही.
कधी बसमध्ये कुणीतरी आपल्याला धडकून गेलं, कधी एखाद्यानं फोन नाही उचलला, कधी मित्रांनी आपल्याशिवाय प्लॅन केला, कधी घरात कुणी आपल्या कामाची दखल घेतली नाही, अशा रोजच्या कितीतरी बारीक सारीक गोष्टी असतात ज्यामुळे आपण आपल्या मनातल्या ‘मी’ला दुखावतो.
पण आपण एक गोष्ट मात्र विसरतो- ती म्हणजे सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष देणं, आपल्याशीच प्रेमानं वागणं, आपल्याला केंद्रस्थानी ठेवणं असा काही सृष्टीचा नियम नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य, आपली जबाबदारी, आपले स्वभाव आणि मर्यादा असतात.
मानसशास्त्र सांगतं – “Perception is projection. ” आपण जसं पाहतो, तसं आपल्याला दिसतं. जर आपण सतत दोष बघत राहिलो, तर जगात सगळं चुकीचं वाटेल. पण जर आपण क्षमाशीलतेनं पाहिलं, तर समजूत आणि प्रेम हे खूप सोपं होऊन जातं.
मन म्हणजे एखाद्या बाळासारखं असतं. त्याला शिकवायला लागतं. रोज थोडं थोडं. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ठरवलं पाहिजे- “आज मी कुणावर नाराज होणार नाही. “
आणि तसं रोज करत गेलं, की मनातला नाराजीचा अंधार तुटतो आणि आनंदाचा अन् समाधानाचा लख्ख प्रकाश उमलतो.
मित्रांनो, आनंद ही अवस्था नसते, तर ती वृत्ती असते. ती आपण ‘घडवायची’ असते. कोणी चुकलं, दुर्लक्ष केलं, अपमान वाटावा, असं वागलं तर स्वतःला एकच प्रश्न विचारावा-
“यामुळे मी नाराज राहिलो, तर काय साधणार आहे? ”
अशावेळी एक छोटा श्वास घ्या, डोळे मिटा, आणि स्वतःलाच सांगा- “मी क्षमा करतो. मी मुक्त होतो. ”
माफीत खुप शक्ती असते. माफ करणं म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणं नव्हे तर ते स्वतःला शांतता देणं आहे. कारण प्रत्येक नाराजी, राग, खंत ही आपल्या मनावर एक ओझं टाकत असते. जोपर्यंत नाराजी, राग आपल्या मनात आपण साठवून ठेवतो, तोपर्यंत आपण त्या ओझ्याखाली दबलेले असतो… आपल्याला अजिबात मोकळं वाटत नाही… मात्र जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण त्या गोष्टीच्या गुंत्यातून स्वतःला अलग करतो आणि तेव्हाच खरं सुख, खरी मोकळीक अनुभवायला लागतो.
आपण खूश राहणं ही काही इतर कोणाच्या वागण्यावर अवलंबून असणारी गोष्ट नाही… खूश राहण्याचा कंट्रोल आपल्याकडेच असावा असे वाटत असेल, तर त्याबाबत मनाला शिस्त लावणे गरजेचे असते.
✩ आणि स्वतःला सतत सांगणं, “माझा आनंद माझ्या हातात आहे! तो इतरांवर अवलंबून नाही. “
जगात प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवतो. जर आपण एखाद्यामुळे दुखावलो गेलो, तर त्याने आपली सहनशक्ती वाढते. जर कुणी दुर्लक्ष केलं, तर त्यातून आपण ‘स्वतःकडे’ वळतो. आणि ही ‘स्वतःकडे’ वळण्याची वाट, हीच खरी आत्मशांतीची वाट असते.
कधी कधी मनातला एक छोटासा विचारसुद्धा जीवन बदलवण्यास कारण ठरतो.
जसं “काहीही झालं तरी, मी आजही सुखात आहे, समाधानी आहे. “
हा विचार संपूर्ण दिवस सकारात्मक प्रकाशाने भरून टाकतो.
थोडक्यात,
आनंद मिळवायचा नसतो, तो घडवायचा असतो.
राग विसरायचा नसतो, तो सोडायचा असतो.
नात्यांत परिपूर्णता शोधायची नसते, तर स्वीकाराची जागा तयार करायची असते.
आणि या सगळ्याचं मूळ आहे आपल्या मानसिकतेत. ती आपण घडवू शकतो. हळूहळू, रोज थोडी थोडी. कारण मन घडतं… आपल्याच हातांनी. ते फुलवायचं की बिघडवायचं, हे आपणच ठरवायचं.
चला तर मग आजपासून नाराजीला सुट्टी देऊया… कारण, आता आपण ‘खूश’ राहायला शिकतोय!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आपलं ‘लिमिटेड’ पण सुखाचं जग... लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
☆
सध्या वय 50, 55 +, 60 वर्षे असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.
आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..
▪️आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.
▪️शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..
▪️आपण आपल्या खर्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो – नेट फ्रेंड्स सोबत नाही..
▪️तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते – आपल्याला कधी बिसलेरी घ्यावी लागली नाही..
▪️आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो – पण आजारी नाही पडलो..
▪️आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाड, स्थूल नाही झालो..
▪️आपण कितीदा अनवाणी फिरलो – तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..
▪️आपल्याला निरोगी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..
▪️आपली खेळणी आपणच बनवली – दोन रिकाम्या काडेपेट्यासुध्दा आपल्यासाठी गाडी, फोन किंवा पिस्तूल बनायच्या..
▪️आपला भरपूर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..
▪️आपल्या जवळ मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते – कारण आपल्या जवळ खरेखुरे मित्र-मैत्रिणी होते..
▪️आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही – आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..
▪️आपण एक अद्भुत रसायन आहोत. कारण आपणच आहोत एक अशी पिढी, ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली…
▪️आपण भले स्पेशल नसू; पण ‘लिमिटेड एडिशन’ तर नक्कीच आहोत..
▪️आपली एकच पिढी अशी आहे, ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला, खरे तारूण्य अनुभवले – आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत…
▪️आपणच फक्त “कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत” अनुभवली..
आणि शेवटी…..
आठवतंय का…. आपण ‘मदर्स, फादर्स डे’ कधी साजरा केल्याचं??
नाही ना?
कारण आई वडीलच आपलं जग होतं….
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈