मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ – डब्यातील डबे- – -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ डब्यातील डबे — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

आज सकाळी मसाल्याचा डबा घासायला काढला आणि त्याकडे बघतच राहिले.कारण आपली महिलांची सवय! डब्यावरचे नाव वाचले, विशेष म्हणजे बाहेरच्या डब्यावर व आतील छोट्या डबीवर नाव वेगळे.मग डब्याकडेच बघत बसले आणि हळूच आठवणीची एक पुडी सुटली.बाहेरचा डबा मैत्रिणीने दिलेला तर आतील छोटे डबे माझ्या जुन्या डब्यातील होते, जो डबा पूर्वी चिरल्यामुळे मोडीत काढला होता.मग लक्षात आले महिलांचा जीव कुठे कुठे अडकलेला असतो.

अगदी आजचे उदाहरण बघायचे झाले तर डबे घरात बघितले तर किती विविध प्रकारचे डबे सांभाळून ठेवलेले असतात.आई कडे असतो तो पर्यंत याचे महत्व लक्षात येत नाही. पण एकदा स्वतः च्या संसाराला सुरुवात झाली की या डब्यात जीव अडकणे सुरु होते.लग्नात आहेरात आलेले डबे अगदी कायमची सोबत करतात.विविध आकाराचे डबे अगदी व्यवस्थित लावून ठेवणे, दर महिन्याला घासून चकचकित ठेवणे.घासून मगच त्यात सामान भरणे.व्यवस्थित साहित्य सापडावे म्हणून त्यावर छान स्टिकर्स लावणे.अशी उत्तम गृहिणीची कामे सुरु होतात.आणि त्या कामाचे सर्वांकडून कौतुक पण होते.अर्थात लेबल असलेल्या डब्यात तोच पदार्थ असेल याची मात्र खात्री नसते.आणि कोणी शेंगदाणे कुठे आहेत? याच्या उत्तरा दाखल “आहेत ना तिथेच, रवा लिहिलेल्या डब्यात.” हे वाक्य ऐकू येते.काय करणार, तात्पुरती सोय केलेली असते.पण कोणाला समजणार?

काही मैत्रिणी तर डब्यांच्या समोर मुद्दाम सेल्फी काढून आपले वैभव दाखवत असतात.पूर्वी तर किचन मधील एक भिंत म्हणजे डब्यांची मांडणी असायची.आणि त्यात चढत्या किंवा उतरत्या डब्यांच्या उंचीच्या क्रमाने डबे लावलेले असायचे.जणू किचनचे वैभवच!

हळूहळू हळदीकुंकू, मिळालेले आहेर, भेटवस्तू अशा प्रसंगातून छोट्या, मोठ्या, विविध आकाराच्या, रंगाच्या डब्यांची बहीण, भावंडे घरात येतात आणि ऐटीत जुन्या डब्यांच्या समोर किंवा डोक्यावर जाऊन बसतात.त्यात अगदी सध्याच्या पार्सल मध्ये येणारे डबे पण अपवाद नसतात.अगदी टाकून द्यावेसे वाटले तरी “असू दे, वेळेला उपयोगी पडतील.” असे म्हणून ठेवले जातात.इतके डबे असून एखादा डबा आला नाही तर जीव हळहळतो.आणि दुकाना समोरून जाताना एखादा नवीन फॅशनचा डबा भुरळ घालतोच!

आणि हो आपला जीव अडकलेले डबे घरातल्यांच्या मात्र डोळ्यात खुपत असतात.मग मी एक युक्तीच केली आहे.एक बॉक्स घेऊन त्यात हे डबे छान ठेवले आहेत.काही दिवसांनी मात्र हे डबे त्यात मावत नाहीत.मग मी डबे एकात एक असे घालून जपून ठेवते.आणि छोट्या छोट्या डब्या मोठ्या डब्यांच्या पोटात लपून बसतात. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला या तत्वाने! अजून एक गंमत सांगू का? हे झाले निवडक डब्यांचे अजून आठवणींचे डबे उघडलेच नाहीत.म्हणजे लहानपणीचे, आज्जीचे, कड्या कुलुपे असणारे, विविध घाटांचे ( आकार ).

आणि हो या डब्यांच्या मध्ये यांच्या बहिणी बरण्या राहूनच गेल्या आहेत.बरण्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संकल्प… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ संकल्प☆ सौ शालिनी जोशी

‘संकल्प’ हा संस्कृत शब्द सम् अधिक कल्प. सम् म्हणजे चांगला आणि कल्प म्हणजे इच्छा, प्रतिज्ञा किंवा निश्चय म्हणून कोणताही चांगला म्हणजे हितकारक निश्चय हा संकल्प असतो.

परमात्मा एकटाच सर्व विश्वाला व्यापून होता. तेव्हा ‘एकोsहं बहुस्याम’ ‘एकटाच आहे बहु व्हावे ‘असे स्फुरण त्याला झाले. हाच पहिला संकल्प. याला ‘हरी संकल्प’ म्हणतात. यातूनच पुढे सृष्टीची रचना झाली. म्हणजे संकल्पाचे मूळ परमात्म्याकडे जाते. सहजच ते आपल्यापर्यंत आले. म्हणूनच कोणत्याही धार्मिक विधी पूर्वी संकल्प करून त्या देवतेला कार्यपुर्तीसाठी प्रार्थना केली जाते म्हणजे तो सिद्धीला जातो इच्छापूर्ती होते.

परमात्म्याचा संकल्प तत्काळ सिद्धीला गेला. आपल्यासाठी मात्र संकल्प आणि सिद्धी यामध्ये जमीन आसमानाचे अंतर. म्हणजे बराच काळ, कष्ट, प्रतीक्षा, संयम आणि सातत्याची गरज. समर्थ मनोबोधात सांगतात ‘सत्य संकल्प जीवी धरावा’ ‘ पाप संकल्प सोडून द्यावा’ म्हणजे संकल्पचे दोन प्रकार. परिणाम चांगला घडवणारा सत्य संकल्प. जसा ध्रुवाने अढळपद प्राप्तीचा केला. बालपणी तपश्चर्या आणि बराच काळ चांगले राज्य केल्यावर त्याला अढळपद प्राप्त झाले. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या प्रतिमेला पुढे ठेवून श्रेष्ठ धनुर्धर बनण्याचा संकल्प केला. मोठ्या कष्टाने त्याने आपले ध्येय साधले. संकल्प सिद्धीला पोहोचला. हे सत्य संकल्प. पण दुर्योधनाने ‘सुईच्या टोकावर राहील एवढीही जमीन पांडवाना देणार नाही’ असा संकल्प केला आणि तो युद्धाला कारण झाला. कौरवांचा नाश झाला हा पाप संकल्प. चाणक्य, शिवाजी महाराज यांचे संकल्प देशोध्दाराला कारण झाले. आर्य चाणक्याने नंदाच्या सभेत ‘तुझे भ्रष्टाचाराने बरबटलेले राज्य नाश करून समर्थ असा राजा सिंहासनावर बसवेपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली ‘ती पूर्ण करून दाखवली. अडीच तपाचा कालावधीमध्ये गेला. पण संकल्प पूर्ण झाला. तसेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पूर्ण केली. हे सत्य संकल्प. अशा प्रकारे संकल्प करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

गीतेत संकल्प हा शब्द बरेच वेळा आला आहे

१) न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन।(गी६/२)

२) सर्व संकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते। (गी६/४)

येथे संकल्प म्हणजे कामनायुक्त इच्छा असा अर्थ आहे त्यांचा त्याग येथे सांगितला आहे.

पूर्वी स्त्रिया चातुर्मासाच्या निमित्ताने काही व्रते करीत ते संकल्पच. संकल्पच यशाला कारण होतो. आताही कोणी एव्हरेस्ट चढण्याचा, कोणी खाडी पार करण्याचा, कोणी समाज सुधारण्याचा, कोणी अनाथांना सांभाळण्याचा, तर कोणी प्राण्यांची काळजी घेण्याचा संकल्प करतात. अशा प्रकारे संकल्पाना मर्यादा नाही. ज्याला जो आवडेल, झेपेल, पचेल, रुचेल पण दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही. तो त्याने अवश्य करावा. रोज काही वाचण्याचा, लिहिण्याचा, पाठांतराचा, व्यायाम करण्याचा, काही नियम करून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प नेहमी चांगलाच असतो. त्यामुळे शिस्त लागते. शरीराला म्हणाला वळण लागते. मनाची चंचलता कमी होते. अशा प्रकारे संकल्प करावा. सिद्धीचा आनंद भोगाव व सुखी व्हावे.

सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत हा मोठा संकल्प आपल्या देशापुढे आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आपण असे का वागतो?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आपण असे का वागतो?☆ श्री जगदीश काबरे ☆

माणसाचे सामाजिक वर्तन हे त्याच्या संस्कारांचे, परंपरांचे, भीतीच्या आणि स्वीकाराच्या अपेक्षांचे मिश्रण असते. अनेकदा आपण अनुभवतो की आपल्या आसपास असे मित्र, सहकारी किंवा नातेवाईक असतात की जे स्पष्ट बोलायला घाबरतात. त्यांना एखादे काम सांगितले असता ते आवर्जून “हो बघतो”, “हो करतो”, “नक्की करतो”, असे शब्द उच्चारतात; पण प्रत्यक्षात ते काम करतच नाहीत. ही घटना अनेकांच्या जीवनात इतकी वारंवार घडते की ती एक सामान्य ’सामाजिक पॅटर्न’ बनली आहे. या पॅटर्नचा अभ्यास केला तर त्यामागे केवळ व्यक्तीगत स्वभाव नसून खोल सांस्कृतिक आणि मानसिक संरचना दिसते. “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या संस्कारांनी हीच मानसिकता बळकट केली आहे. सत्य बोला, पण तेही प्रिय असले पाहिजे, ही अपेक्षा चांगली असली तरी तिचा अनपेक्षित परिणाम असा होतो की माणूस अप्रिय सत्य टाळायला लागतो आणि अखेरीस बोटचेपणा किंवा लोकांना न दुखावण्याच्या वर्तनाची एक प्रमुख खूण बनते.

भारतीय संस्कृतीत सहिष्णुता, नम्रता, इतरांना न दुखावणे, सुसंवाद राखणे यांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. हे मूल्य समाज टिकवण्यासाठी नक्कीच आवश्यक असले तरी त्यांचा अतिरेक झाल्यास माणूस स्वतःची भूमिका, मत किंवा नकार व्यक्त करताना त्याला असुरक्षित वाटायला लागते. “नाही” म्हणणे म्हणजे उद्धटपणा, रूक्षपणा, अनादर किंवा असामाजिकता, अशी एक समजूत पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात बसवली गेली आहे. त्यामुळे लोक “नाही” म्हणण्यापेक्षा “हो” म्हणतात आणि नंतर दुर्लक्ष करतात. हा प्रकार केवळ व्यक्तीगत संबंधांमध्येच नाही, तर कार्यालयीन कामकाजात, सार्वजनिक ठिकाणी, प्रशासनात आणि राजकीय जीवनातही दिसतो. वरवर पाहता सौम्य वाटणारी ही मानसिकता प्रत्यक्षात मोठ्या सामाजिक समस्यांना जन्म देते. जे करायचे नाही, तेही “हो” म्हणणे म्हणजे गैरसमज, चुकीची अपेक्षा वाढवणे आणि परस्पर अविश्वास निर्माण करणे. हीच परिस्थिती पुढे नात्यातील ताण, मित्रांमधील नाराजी किंवा कार्यक्षेत्रातील काम प्रभावीपणे न करण्यात परिवर्तित होते.

बोटचेपणा म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे मत, निर्णय किंवा स्वभाव लपवत, फक्त समोरच्याला भावेल असेच बोलणे. यातून खरी संवाद प्रक्रिया अगदी बिघडण्याचा सांभाव असतो. समाजशास्त्र सांगते की संवाद जितका अस्पष्ट तितका गैरसमज निर्माण होण्याची शक्यता अधिक. आपण एखाद्याला काम सांगतो तेव्हा आपल्याला हवे असते उत्तर –ते काम शक्य आहे की नाही. परंतु समोरचा माणूस स्पष्टपणे नकार देत नाही, कारण त्याच्या मते नकार देणे म्हणजे संबंध बिघडवणे. म्हणून तो “करतो”, “बघतो”, “थोडा वेळ दे” असे शब्द वापरून दुसऱ्याच्या अपेक्षा जिवंत ठेवतो. हे उत्तर ऐकणाऱ्याला सुखकारक वाटले तरी नंतर काम न केल्यामुळे गैरसमज वाढण्याची शक्यता असते. परिणामी, काम न झाल्यावर निराशा आणि नाराजी वाढते आणि त्या व्यक्तीला पुन्हा काम न सांगण्याचा सांगण्याचा निर्णय घेतला जातो. विश्वास तुटणे हे बोटचेपणाच्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे.

या मानसिकतेच्या सामाजिक मूळांचा अभ्यास केला तर सर्वप्रथम लक्ष जाते ते संस्कारांकडे. भारतात घरात, शाळेत आणि समाजात ज्या प्रकारे मुलांचे संस्कार होतात त्यात “नकार देणे चुकीचे आहे” असा भाव अगदी खोल रुजवला जातो. मुलांनी मोठ्यांना “हो” म्हटले पाहिजे, शिक्षकांनी सांगितले तसे वागले पाहिजे, घरी पालकांच्या निर्णयांवर प्रश्न विचारू नये, नम्रता दाखवावी, रागावू नये, गैरसोय होईल असे काही बोलू नये, अशा अनेक सूक्ष्म अपेक्षा त्यामागे असतात. या प्रक्रियेतून वाढणारे मूल आत्मविश्वासाने “हे मला जमत नाही”, “हे मी करू शकत नाही”, किंवा “हे मला मान्य नाही” असे बोलण्याची हिम्मत दाखवूच शकत नाही. भीडस्त स्वभाव वाढल्यामुळे मोठेपणी एखाद्या कामाला नकार द्यायचा असेल तरी त्याला ते कठीण जाते. तो विषम परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा बोटचेपणा स्वीकारतो, कारण त्याच्या मते ते अधिक सुरक्षित असते.

समाजशास्त्रात ’संघर्ष टाळण्याची संस्कृती’ अशी एक संकल्पना आहे. भारतीय सामूहिक जीवन हा या संस्कृतीचा एक प्रमुख नमुना म्हणायला हवा. कारण आपल्यात उघड संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती इतकी प्रबळ आहे की लोक सत्य बोलण्यापेक्षा शांत राहणे किंवा आनंददायी प्रतिसाद देणे पसंत करतात. एखाद्याने सांगितलेले काम नक्कीच नकोसे असू शकते, वेळ नसेल, कौशल्य कमी असेल, किंवा मनात इच्छा नसेल पण या सगळ्यांपेक्षा संघर्ष नको हा भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. मैत्री, नातेसंबंध किंवा सहकार्यातील सौहार्द टिकवण्याची भीती वाटणाऱ्या व्यक्तीचा खोटे आश्वासन देण्याकडे कल वाढतो. परंतु या संस्कृतीचे दुष्परिणाम बहुआयामी आहेत. सर्वप्रथम, व्यक्ती स्वतःच्या मर्यादा मान्य करण्याची सवय गमावते. ती स्वतःच्या क्षमता, वेळ, प्राधान्ये किंवा आवडीनिवडींचा विचार न करता प्रत्येक गोष्टीला “हो” म्हणते. त्यामुळे तिच्यावर अनावश्यक भार वाढतो. ती दिलेल्या शब्दांवर ती ठाम राहू शकत नाही, कारण सुरुवातीपासूनच ते शब्द वास्तविकतेवर आधारलेले नसतात. दुसरे म्हणजे, इतरांच्या दृष्टीने तिची प्रतिमा हळूहळू अविश्वसनीय, ढिसाळ, किंवा दुटप्पी बनते. जेव्हा एखादा माणूस वारंवार “हो” सांगून काम करत नाही तेव्हा लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत. त्याचे वचन, आश्वासन किंवा बोलणे यांचे मूल्य कमी होते. कार्यक्षेत्रात ही मानसिकता अधिक गंभीर बनते. भारतीय कार्यालयीन संस्कृतीत सांगितलेली कामे स्वीकारण्याचा दबाव असतो. येथेही सरळ “हे माझ्याकडून होणार नाही” असे सांगितले जात नाही. कारण करिअर वर डाग लागण्याची भीती असते. म्हणून कोणीही नकार देत नाही, पण कार्याची गती मंदावते, जबाबदाऱ्या ढकलल्या जातात, शेवटच्या क्षणी सबबी दिल्या जातात. यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. व्यवस्थित संवादाअभावी प्रकल्प अर्धवट राहतात आणि संस्थेत इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. सामूहिक कामकाजासाठी स्पष्ट संवाद ही पहिली अट असते; बोटचेपणा हा संवादाचा सर्वात मोठा शत्रू असतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर “नाही” म्हणू न शकणाऱ्या लोकांमध्ये अपराधगंड प्रबळ असतो. नकार दिल्यास समोरचा दुखावेल, रागावेल किंवा आपल्याबद्दल नकारात्मक विचार करेल अशी भीती वाटते. ही भीती त्यांना स्वतःच्या प्रतिमेबद्दल अतिसंवेदनशील बनवते. ते “चांगले व्यक्ती” दिसण्याची इच्छा ठेवतात. त्यांच्या मते जे लोक स्पष्टपणे नकार देतात ते उद्धट, हट्टी किंवा कठोर असतात. त्यामुळे ते कोणत्याही नात्यात स्वतःची जागा स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. परंतु दीर्घकाळात हीच प्रवृत्ती मानसिक ताण वाढवते. सतत लोकांशी गोड बोलत राहणे म्हणजे स्वतःची इच्छा, वेळ आणि ऊर्जेचा अपव्य करणे होय. त्यामुळे अशा लोकांत चिंता, निराशा निर्माण होताना दिसते.

सामाजिक पातळीवर बघितले तर “अप्रिय सत्य” बोलण्याची भीती आपल्याला आपली संस्कृती व्यक्तीगत स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते की दडपते, या प्रश्नाचे द्वंद्व आपल्या मनात उभे करते. स्पष्टपणा, प्रामाणिक संवाद, आणि नकार देण्याची क्षमता या गोष्टी कोणत्याही निरोगी समाजासाठी अत्यावश्यक असतात. परंतु जिथे कधीही नकार देऊ नये, तडजोड करावीच, सौहार्द राखणेच महत्वाचे अशी मानसिकता असते तिथे समाज बाहेरून शांत वाटला तरी आतून अस्वस्थ असतो. असा समाज दुटप्पी, दाम्भीक बनतो. संबंधांमध्ये आंतरिक प्रामाणिकता नसते. लोक एकमेकांना खरेपणे ओळखू शकत नाहीत, कारण ते मुखवटे धारण करून खऱ्या भावना लपवून ठेवत असतात. परिणामी, संबंध वरवरचेच राहतात. जर आपल्याला सामाजिकदृष्ट्या प्रामाणिकपणा वाढवायचा असेल तर प्रथम “नाही” म्हणण्याच्या संस्कृतीला स्वीकारले पाहिजे. “नकार देणे म्हणजे नातं तोडणे नाही”, हे लोकांच्या मनात ठसवले पाहिजे. नकार देणारी व्यक्ती प्रामाणिक असते, कारण ती आपली क्षमता आणि मर्यादा स्पष्टपणे सांगते. यामुळे त्याचे शब्द विश्वासार्ह असतात. उलट, सतत “हो” म्हणणारी व्यक्तीच अविश्वसनीय ठरते. म्हणूनच, सामाजिक विश्वास टिकवण्यासाठी “नाही” हा शब्द आपल्याला अपमानित करणारा वाटता कामा नये. कारण “हो” आणि “नाही” या दोन शब्दांमध्येच संवादाची मूलभूत रचना असते. दोन्ही शब्द आवश्यक.

म्हणून “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या वाक्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सत्य प्रिय असावे—होय. पण “प्रिय नसल्यास सत्य बोलू नये” हा अर्थ काढणे चुकीचे आहे. सत्याने प्रिय होणे म्हणजे सत्य सांगण्याची पद्धत विनम्र असावी. म्हणजेच सत्य लपवू नका, पण ते अप्रिय असले तरीही सत्य सांगायला कचरू नका. समाजात सत्य बोलण्याला प्रोत्साहन देताना त्याची पद्धत सौम्य ठेवणे हा मूळ उद्देश आहेच, परंतु याचा अर्थ असा नाही की अप्रिय सत्य सांगूच नये. पण संस्कृतीने प्रिय सत्यच सांगा असाच संस्कार रुजवला आणि व्यक्तीला सामाजिक दबाव सहन करावा लागला. म्हणून भारतीय समाजात “नकार” हा शब्द सामाजिक भीतीचा केंद्रबिंदू झाला आहे. कुणाला दुखावण्याची, कुणाकडून अवहेलना होण्याची, कुणीकडून नाते तुटण्याची किंवा स्वतःला वाईट ठरवले जाण्याची भीती लोकांना “हो” म्हटण्यास भाग पाडते. ही मानसिकता बदलायची असेल तर शैक्षणिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर आणि सामाजात संवाद कौशल्याची नव्याने मांडणी करणे गरजेचे आहे. मुलांना “हो” आणि “नाही” दोन्ही शब्द योग्य ठिकाणी कसे वापरायचे हे शिकवणे आवश्यक आहे. “नाही” म्हणणाऱ्या व्यक्तीला समाजाने दोष देणे बंद केले पाहिजे. उलट, त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान करायला हवा. याशिवाय, काम स्वीकारताना लोकांनी स्वतःच्या क्षमतांचा आणि वेळेचा तर्कसंगत विचार करणे आवश्यक आहे. नकार देणे कठीण वाटले तरी त्याचे दीर्घकालीन फायदे अधिक असतात. सामाजिक प्रामाणिकता वाढते, काम व्यवस्थित विभागले जाते, आणि अपेक्षा स्पष्ट राहतात. अशा संवादामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यांमध्ये पारदर्शकता वाढते.

शेवटी, “नाही” म्हणण्याची क्षमता असणे ही सामाज प्रगल्भ झाल्याची खूण आहे. जिथे लोक एकमेकांशी स्पष्टपणे व्यक्त होतात आणि तसे वागतात तिथे संबंध टिकाऊ बनतात, कामकाज अधिक परिणामकारक होते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. बोटचेपणा माणसाला वरवर चांगला वाटतो, पण वास्तवात तो स्वतःलाही आणि इतरांनाही हानीकारक असतो. एखाद्या कामाला नकार देणे हे चुकीचे नाही तर ते प्रामाणिकपणाचे धैर्य आहे. सत्य सांगणे आणि नको असलेले टाळणे यात संतुलन साधल्याशिवाय समाज निरोगी बनू शकत नाही. “प्रिय सत्य” ही संकल्पना योग्य आहे, पण “अप्रिय सत्य” टाळणे ही सामाजिक चूक आहे. म्हणूनच, स्पष्टपणे “नाही” म्हणणे ही परस्परातील संबंध पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक असणारी कृती आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंग वाणीतून कळलेले संत तुकाराम

अत्यंत तळमळीने पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या मुखातून जी अभंगवाणी निघाली आहे त्यातून आपल्यासारख्या साधक भक्तांना तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडत गेले आहे.

आता तरी पुढे/ हाचि उपदेश/

नका करू नाश/ आयुष्याचा//

सकाळच्या पाया/ माझे दंडवत/

अपुलाले चित्त/ शुद्ध करा//

हित ते करावे/ देवाचे चिंतन/

करूनिया मन/ एक विध//

तुका म्हणे लाभ/ होय तो व्यापार/

करा काय फार/ शिकवावे//

तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी(व्यापारी) होते. त्यामुळे भक्तांना उपदेश करताना, ज्यामध्ये तुमचे हित आहे, असाच व्यापार तुम्ही करावा असे ते बोलतात. या ठिकाणी व्यापार या शब्दाचा अर्थ कर्म असाच घेणे योग्य ठरेल.

अर्थात स्वहिताचे कर्म करावे.

*शरणागत झालो/ तेणे मी पणा मुकलो//

आता दिल्याचीच वाट/ पाहू नाही खटपट//

नलगे उचित/ काही पहावे संचित//

तुका म्हणे सेवा/ माने तैसी करू देवा//

या ठिकाणी संसारातून मुक्त झाल्याची त्यांची अवस्था दिसते. त्यांच्यातील मी नष्ट होऊन परमेश्वरा जवळ त्यांनी पूर्णतया शरणागती पत्करली आहे. परमेश्वर जे देईल त्याचीच वाट पाहणे आहे असे ते म्हणतात. संचिता पासून सुखाची अथवा दुःखाची प्राप्ती होवो, त्यांना काही फरक पडत नाही. परमेश्वराची सेवा हा एकच त्यांचा ध्यास आहे.

खऱ्या अर्थी तुकाराम जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे हे खालील १३ अभंग वाचले पाहिजेत. ते काय म्हणतात बघा…

कपट काही एक/ नेणे भुलवायाचे लोक//

तुमचे करितो कीर्तन/ गातो उत्तम ते गुण//

दावू नेणे जडी बुटी/ चमत्कार उठा उठी//

नव्हे मठपती/ नाही चाहूरांची वृत्ती//

नाही देवार्चन / असे मांडीले दुकान//

नाही वेताळ प्रसन्न/ काही सांगो खाणखूण //

नव्हे पुराणिक/ करणे सांगणे आणिक//

नाही जाळीत भणदी / उद्धव म्हणोनी आनंदी//

नेणे वादा घटा पटा/ करिता पंडित करंटा//

नाही हलवीत माळ/ भोवते मिळवूनी गबाळ//

आगमीचे नेणे कुडे / स्तंभन मोहन उच्चाटणे //

नोहे त्यांच्या ऐसा/ निरथवासी पिसा/

१) लोकांना कसे फसवावे, हे कपट मी जाणत नाही.

२) मी फक्त कीर्तन करतो आणि कीर्तनातून देवा, फक्त तुमचे गुणगान करतो.

३) लोकांना नादी लावणे हा माझा उद्देश नाही, म्हणून एखादी मुळी काढण्यासारखा कोणताही चमत्कार मी कधीच करत नाही.

४) माझे कोणीही शिष्य नाहीत, की जात वारा, मी माझे मोठेपण समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन.

५) मी मठाधिपती नाही किंवा मला कोणतीही जमीन इनाम मिळालेली नाही.

६) धूप, दीप, गंधादी पुजा अर्चनेच्या कोणत्याही गोष्टींचे दुकान मांडून मी पसारा घातलेला नाही.

७) काही लोकांच्या खाणाखुणा सांगणारा कोणताही वेताळ माझ्यावर प्रसन्न नाही.

८) पुराणाचा आधार घेऊन लोकांना एक सांगावे आणि व्यवहारात वेगळेच वागावे असा ढोंगी पुराणिक मी नाही.

९) अंबाबाईच्या नावाने उदो करत डोक्यावर अग्नीचे खापर जाळणे मला माहित नाही.

१०) घटाकाश, मटाकाश, तंतू आणि पट असे जे वेदांतातील दृष्टांत आहेत त्यांचा अनुवाद करणारा करंटा पंडित मी नाही.

११) लोकांना भवती जमवून आणि त्यांच्यात बसून जपमाळ ओढण्याचे ढोंग करणाऱ्यातला मी नाही.

१२) वेदातील जारण, मारण, उच्चाटन इत्यादी प्रयोग मला माहित नाहीत.

१३) हरीच्या भक्ती वाचून इतर प्रकार करणारा नरकवासी वेडा मी नाही.

तुकाराम महाराज हे फक्त तनाने आणि मनाने हरीचे दास आहेत, भक्त आहेत.

संत तुकाराम एक प्रापंचिक माणूस, साधना करताना त्यांचे मन मध्येच साशंक होते. आपली भक्ती खरी आहे की मी भक्तीचे ढोंग!! करतो आहे अशी शंका त्यांच्या मनात उत्पन्न होते आणि ते अस्वस्थ होतात. पांडुरंगाला सांगतात…

गातो भाव नाही अंगी/ भूषण करावया जगी//

परी तू पतित पावन/ करी साच हे वचन//

मुखे म्हणावितो दास/ चित्ती माया लोभ आस//

तुका म्हणे दावी वेष/ पैसा अंतरी नाही लेश //

ते या अभंगात स्वतःचे दोष वर्णन करतात.

हे हरी, मी तुझे नाव घेतो, परंतु त्यासाठी योग्य असा भक्ती भाव माझ्यापाशी आहे का? जगात माझा लौकिक वाढावा म्हणून तर मी हे नामस्मरणाचे ढोंग करत नाही ना? अशी स्वतःविषयी ते शंका घेतात. तू पतीत पावन आहेस, तेव्हा तूच मला माझ्या चुकीतून सावर. मी जेव्हा माझ्या भक्त असण्याचे दाखवतो, स्वतःला तुझा दास म्हणवितो, तेव्हा मला असे वाटते की भक्तीचा लेशही माझ्यात नसून माझ्या चित्तात अजूनही माया मोह लोभ आहे.

देवाला तुकारामांची ही प्रामाणिक कबुली आहे.

भक्तीचा महिमा इतका अपार आहे, की त्यामुळे तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यातील द्वैतभाव हळूहळू कमी होत चालला आहे. महाराज म्हणतात,

बाहिर पडलो/ आपुल्या कर्तव्ये /

संसाराची जीवे/ वेटाळीलो//

एका मध्ये एक/ नाही मिळो येत/

ताक नवनीत/ निवडिले//

झाली दोन्ही नामे / एकची मथनी/

*दुसरीया गुणी/ वेगळाली//

तुका म्हणे दाखविली/ मुक्ताफळी/

शिम्पलेची स्वस्थळी/ खुंटलीया//

महाराज स्वतःची स्थिती या अभंगात वर्णन करतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, केवळ या जीवदशेमुळे जन्म, मृत्यू, आणि संसार यात ते गुंतून पडले आहेत. पण आता प्रयत्नपूर्वक या सर्वातून बाहेर पडत आहेत. ताकापासून निघालेले लोणी ज्याप्रमाणे ताकात पुन्हा मिसळणे अशक्य, त्याचप्रमाणे आता एकदा संसारातून बाहेर पडल्यावर त्यात पुन्हा अडकणे नाही. एकाच्याच मंथना पासून वेगळ्या गुणांमुळे सार व असार हे दोन भाग झाले आणि त्यास दोन नावे पडली. एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढल्यावर त्याला पूर्ववत शिंपल्याशी जोडता येत नाही.

तुकाराम महाराजांची स्थिती या शिंपल्यातून बाहेर काढलेल्या मोत्यासारखी झाली आहे.

मोक्ष तुमचा देवा/ तुम्ही दुर्लभ तो ठेवा/

माझी भक्तीची आवडी/ नाही अंतरी ते गोडी//

आपल्या प्रकारा/ करा जतन दातारा/

तुका म्हणे भेटी/ पुरे एकची शेवटी//

तुकारामांना मोक्षाची हाव नाही. तो दुर्लभ आहे. ते देवाला सांगतात की देवा, मोक्ष काय आहे तो तुझ्यापाशीच ठेव. मला फक्त तुझ्या भक्तीची आवड आहे. तुझ्या भेटीसाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे.

तुकाराम महाराजांच्या मनस्थितीची कल्पना या अभंगातून वाचकांना येते.

५००० अभंगाच्या या गाथेत वेळोवेळी तुकाराम महाराज आपल्या नजरेसमोर सतत उभे राहतात. त्यांच्याविषयी पुढील लेखात अजून जाणून घेऊ.

 क्रमशः…  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- प्रकाशन समारंभाची सांगता झाली पण त्या आठवणी मात्र इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर मनात आजही तितक्याच ताज्या आहेत! कारण त्या कार्यक्रमाचं चोख नियोजन जसं, तसंच या समारंभाच्या निमित्ताने माझ्या उर्वरित आयुष्याला मिळालेलं एक अनोखं वळणसुद्धा! ते वळण म्हणजे त्या दिवशीच्या पहाटे मला पडलेल्या स्वप्नाचं ‘त्या’च्या कृपेने अकल्पितपणे सत्यात होणारं परिवर्तनच होतं!!)

आणि याला सुरूवात होणार होती मी सोमवारी बॅंकेत पोचल्यानंतर लगेचच!

सोमवारी मी बँकेत गेलो तेव्हा याच सर्क्युलरच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यसाठी वखरेसाहेबांनी मला आणि माझ्या असिस्टंटना तातडीने केबिनमधे बोलावून घेतलं. मी डायरीत सर्व महत्त्वाचे मुद्दे त्या रात्री व्यवस्थित लिहून ठेवले होतेच. त्यामुळे सुरूवातीलाच मी या योजनेचे सर्व नियम व अटीं यांची थोडक्यात माहिती सांगितली. या स्वेच्छानिवृत्ती योजनेला प्रतिसाद म्हणून स्वेच्छानिवृत्ती साठी आता स्टाफमेंबर्सकडून येणाऱ्या अर्जांची अक्षरश: रीघ लागणार होती. त्यामुळे मुदत संपेपर्यंतचा पुढचा संपूर्ण महिना आम्ही याच कामाच्या चक्रात फिरत रहाणार होतो!

या स्वेच्छानिवृत्ती योजनेतून मिळणारे आर्थिक लाभ आणि त्यामुळे उर्वरीत आयुष्यात मिळणारी निश्चिंतता यांचा विचार केला तर कुणालाही मोह पडावा अशीच ही योजना होती. कमीतकमी वीस वर्षे सर्व्हिस झालेलं कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार होतं. आर्थिक लाभ म्हणजे उर्वरीत सर्व्हिस मुदतीच्या ५०% मुदतीचा पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता!

असं असूनही ज्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ते मात्र इच्छा असूनही या योजनेचा लाभ घेण्याचं धाडस करणं शक्य नव्हतं. तसंच ज्यांच्या विरूध्द कामामधील अनियमिततांमुळे अंतर्गत चौकशी सुरू आहे तेही या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार होते. अशा केवळ नाईलाजाने मागे रहाणाऱ्यांना अचानक निर्माण होणारं स्टाफ शाॅर्टेज, बॅंकांमधे लगेचंच सुरू होणाऱ्या काॅम्प्युटरायझेशनमुळे नवीन भरतीची फारशी शक्यता नसणे या सगळ्यामुळे बॅंकेतलं रूटीन मॅनेज करण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागणार होती! आणि अर्थातच माझी तेव्हा अजून नऊ वर्षे सर्व्हिस शिल्लक असल्याने मीही मागे रहाण्यातलाच एक असल्याने मलाही त्या तारेवरच्या कसरतीची मानसिक तयारी आत्तापासूनच करायला हवी होती,.. पण त्याचं आत्तापासून दडपण घेण्यात अर्थ नव्हता.

या सर्क्युलरबद्दलची आमची चर्चा पुढे तासभर सुरू होती आणि मग चहा येईपर्यंत आपल्या प्रत्यक्ष झोनल आॅफिसमधून कोण कोण स्वेच्छानिवृत्ती स्विकारू शकेल याविषयीचे अंदाज बांधणं सुरू झालं. कारण त्याचा थेट नकारात्मक परिणाम आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या मोजक्या स्टाफलाच सहन करावा लागणार होता! याचं दडपण आमच्यापैकी इतर कुणाला त्याक्षणी फारसं जाणवलं नसलं तरी संपूर्ण झोनल आॅफिसचे सर्वेसर्वा म्हणून वखरे साहेबांना जाणवलं असणारच. कारण याच अनुषंगाने त्यांची आलेली प्रतिक्रिया प्रथमदर्शनी तरी मला बुचकळ्यात टाकणारीच होती.

“खरं सांगू कां? .. मला शक्य असतं ना, तर या योजनेनुसार पहिला अर्ज मी स्वत:च केला असता… ” ते वरवर हसत गंमतीने बोलावं तसं म्हणाले होते!

मीटिंग संपवून मी केबिनमधे आलो ते मनात तरंगत राहिलेले हे सगळे विचार सोबत घेऊनच. अर्थात मी त्यात फार वेळ गुंतून पडणं योग्य नव्हतं. समोरच्या कामांचा निपटारा अधिक महत्त्वाचा होता!

त्यादिवशी सगळी कामं आवरून मी ड्राॅवर लॉक केला आणि ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा मात्र दुर्लक्ष करून मी दूर सारलेले तेच सगळे विचार मनात पुन्हा डोकावू लागले. त्या विचारांचं दडपण नव्हतं, फारशी उत्सुकता नव्हती, चलबिचल नव्हती, तरीही ते विचार झटकून टाकावेत असंही वाटेना. ‘मला शक्य असतं तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यासाठी मीच पहिला अर्ज केला असता.. ‘ असं वखरे साहेब म्हणाले होते. पण आपल्याला ते त्यांच्याइतकं अशक्य कुठं आहे? आजवर मी आणि आरती दोघांनीही आमच्या संसाराची गरज म्हणून तिची नोकरी कधीच गृहीत धरलेली नव्हती. जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा आरती नोकरी सोडून त्या क्षणीच्या कर्तव्यभावनेने घरी राहिली होतीच. आता यावेळी तिची नोकरी आहे म्हणून स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेणं मलाच योग्य वाटत नव्हतं. अर्थात या योजनेमुळे निर्माण झालेल्या असंख्य व्हेकन्सीज् पैकी थोड्या फार जागा तरी तातडीने भरण्याची निकड निर्माण होणार असल्यामुळे पुढचं प्रमोशन प्रोसेस तात्काळ सुरू व्हायची शक्यता होतीच. आणि अर्थातच प्रत्येक स्टेटमधे उच्चाधिकार पदांच्या जागा मोजक्याच असल्याने आऊट ऑफ स्टेट पोस्टिंग देखील अपरिहार्यच होतं! थोडक्यात आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या जवळजवळ सर्वच अधिकाऱ्यांच्या आयुष्यांत या आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे प्रचंड उलथापालथ होणार होती!!

मनातले हे सगळे उलट सुलट विचार दूर सारून मी दारावरची बेल वाजवली. घरी आई होतीच आणि आरती आणि सलिलही प्रकाशन समारंभाला येताना दोन-तीन दिवसांची सवड घेऊनच आले होते. दार सलिलनेच उघडले. जेवायला बसण्यापूर्वीपर्यंत गप्पांचे सगळे विषय कालच्या प्रकाशन समारंभाबद्दलचेच होते आणि ते अपेक्षितही होतं. या तिघांसाठीही तो एक वेगळा आणि आनंददायी अनुभव होताच!

रात्रीची जेवणं आवरली. गप्पागोष्टी झाल्यावर आई झोपायला गेली. आरती/सलिलला आता लवकरच घडू शकणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींची अंधूक कां होईना कल्पना देणं मला आवश्यक वाटलं.

“तुम्हा दोघांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय.. ” मी म्हणालो. दोघांनीही प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं.

“कां? काळजी करण्यासारखं आहे कां कांही? ” आरतीनं विचारलं.

“आज नाही पण पुढं लवकरच थोडं फार काळजी करण्यासारखं घडू शकेल.. “

“तुम्ही क.. कशाबद्दल बोलताय? “

“बँकेत बरेच फेरबदल होऊ पहातायत. कोणत्याही क्षणी कांहीही घडू शकेल. माझ्यापुरतं बोलायचं तर आमचं प्रमोशन प्रोसेसही लवकरच सुरू होईल आणि त्यानंतरचं पोस्टिंग मात्र आऊट ऑफ स्टेटच असणार हे ठरलेलंच आहे. मला कुठेही जावं लागेल आणि त्यासाठी आपल्या तिघांचीही तयारी हवी. म्हणूनच आज बँकेत याविषयी बोलणं सुरू झाल्यापासून एकच विचार माझ्या मनात येतोय. त्याबद्दलच बोलायचंय. तशीच वेळ आली तर आरती, तू जॉब रिझाईन करून माझ्याबरोबर येशील? ” मी विचारलं. याआधी प्रत्येक वेळी मी कांहीं दिवस एकटा राहून निभावत आलो होतो पण यापुढे वय आणि जबाबदाऱ्या वाढत जातील तेव्हा मला ती ओढाताण नको होती. तिला सौम्य शब्दांत मी कल्पना दिली ती यासाठीच.

आरतीने चमकून माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खरकन् उतरलेला होता न् नजरेत हातून कांहीतरी निसटून जात असल्याची भावना!

” तुम्हाला लगेच कुठं जावं लागणार नाहीये ना? तशीच वेळ आली, तर तेव्हा ठरवूया ना आपण. आत्ताच त्याची चर्चा कशाला? ” बोलतानाही तिचा आवाज भरून आला होता.

” कां? तुला कंटाळा नाही आला नोकरीचा? ” मी विचारलं.

“नाही. मला आवडतो हा जाॅब. पण तरीही वेळ येईल तेव्हा सोडेन ना मी. ” ती त्याच भिजल्या आवाजात म्हणाली.

“पण मला कंटाळा आलाय आता नोकरीचा. मी सोडू? ” मी दोघांचा अंदाज घेत गंमतीने विचारलं.

” होs.. कंटाळा आला असेल तर खरंच सोडा. ” आरतीचा चेहरा खुलला. ती अगदी मनापासून म्हणाली.

आता मात्र त्यांना अधांतरी ठेवणं मला योग्य वाटेना. मी त्यांना नवीन स्वेच्छा निवृत्ती योजनेची सविस्तर माहिती दिली. ते ऐकून तोवर कांही न बोलता लक्षपूर्वक सगळं ऐकत राहिलेला सलिल म्हणाला, “बाबा, तुम्ही ही चांगली संधी खरंच सोडू नका. तुमचं सगळं व्यवस्थित आर्थिक नियोजन आहे, त्यामुळे निवृत्त व्हायचं ठरवलंत तर पुढं तुमचे आत्तापर्यंत शक्य न झालेले सगळे छंद जोपासत रहायचं आणि अर्निंग साठी कांहीही करायचं नाही. तसं असेल तरच.. ” तो म्हणाला. ते ऐकलं आणि मी पूर्ण निश्चिंत झालो. आता जे कांही करायचं ते आरतीची नोकरी आणि पगार गृहीत न धरता जे शक्य असेल तेच करायचं. आणि तेही पूर्ण विचारांती..!

हे मी मनाशी ठरवलं आणि पुढं अल्पावधीतच जे कांही घडलं ते आपसूकच घडत जावं तसंच सगळं.. आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती अशा अनपेक्षित वळणापर्यंत मी येऊन थबकलो! इथे वळायचं कीं आहे त्याच रस्त्याने पुढं चालत रहायचं? .. माझी क्षणकाळाची ही द्विधा मनोवस्था ओळखल्या सारखा ‘तो’ स्वत:शीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी.. माझ्याजवळ. कारण पुढं जे जे घडत गेलं ते सगळं त्यानेच घडवल्यासारखं! प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं आणि बरंच कांही एरवी मी कधी कल्पनाही केली नसती असं सगळं..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “राष्ट्रीय सणांचे महत्त्व…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “राष्ट्रीय सणांचे महत्त्व…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

जुलै, ऑगस्ट महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••

असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••

महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••

देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, सांजोरया, पूरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••

प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••

याच बरोबर १५ ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.

तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.

आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?

आपल्याच घरच उदाहरण घ्या… घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच ना.

घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.

कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच? हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायला, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. आपल्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलन आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.

जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील १४० करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा…

मग हाच विचार, हीच भावना, असच वागण, , ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही, तर दररोजचचच..

इतक्यातच घडलेली घटना…

४१ वर्षानंतर अंतराळातून

भारत कसा दिसतो?

याबद्दल बोलताना Wing Commander Sudhanshu Shukla म्हणाले…

* अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत सारे जहां से अच्छा आहे.

त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.

अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.

मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,… मी किंवा माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच बरोबर नाही.

सिंदूर operation च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.

परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••

हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो??. म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.

ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?

कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••

देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असतात.

मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल. मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..

ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।

म्हणतात ना…

Your greatest weapon is your mind. Train it To make right decisions. To make right selectios. To make right choices.

जय हिंद.

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योतीने तेजाची आरती… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ ज्योतीने तेजाची आरती… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

काजवा” किती वेगळा अद्भुत कीटक आहे ज्याने तेज प्रकाशित केले… स्वतः! स्वयंनिर्मितीचा पुरावा हा! पण चंद्रासारखाच परप्रकाशित!

चंद्राचा शीतल प्रकाश मिळवतोय सूर्याकडून तर काजव्याचा प्रकाश मिळवतोय, नव्हे नव्हे मिळतोय आंतरिक सूर्यापासूच (त्याचा आत्मा)!

 

मोराचं सौंदर्य, सिंहांच शौर्य, हरणाची चपळता, विंचवाचं डंख मारणं, पाण्याचं उतारा कडे वाहण, अग्नीचं जाळणं, कमल पत्राची निर्लेपता, ढगांची सौहार्द्रता, सागराची असीमता, नदीची पवित्रता, पर्वतांची स्थिरता, फुलांची मोहकता… किती सांगू…

“हरि अनंत हरिकथा अनंता”… याप्रमाणे ही प्रकृती चिंतनाचा नसून आनंदाचा विषय व्हावा हे वाटणेही कुणाचे? तोच आत्मा जो (काजव्याला व चंद्राला) सर्वत्र आहे, तोच हृदयस्थ आहे त्याचे!

 

आता एक गोष्ट लक्षात येते की सगळीकडे तोच कार्यरत आहे, पण त्याची ओळख पटत नाही! आपल्या शरीरात एक गोष्ट नक्की की पहाणारा “मी” आहे तसेच प्रकृतीला व मला सांभाळणारा ही एकच व तोच सगळीकडे व माझ्यात अविरतपणे आहे! मग…

 

“अनेक रुपे नटलेली” ही सत्ता आता आपली वाटू लागते कारण आधी इतर गोष्टी पाहिल्या की एकतर न्यूनगंड किंवा मिळवण्याची धडपड असायची स्वमर्यादेच्या जाणीवेचा हा अभाव!

हा अभाव संपणे म्हणजे जीवनाची खरी सुरुवात आहे. या मूलभूत जाणीवेनंतर जगात काहीही करणे ही त्या जाणीवेची प्रतिक्रिया असणार आहे (अभावातून प्रभावाकडे! )

 

“माझ्यातलाच” तो आहे तर मग यत्र तत्र सर्वत्र “माझ्यातलाच” आहे, हा प्रभावाचा “स्वानंद” आहे!

 

हिमालयाला गवसणी घालणारा कुणीतरी गिर्यारोहक माझीच इच्छा पूर्ण करतोय (माझाच हा विस्तार आहे), माझी शास्त्रीय संगीताची इच्छा एखादा कलाकार पूर्ण करतो, तोही माझाच विस्तार ठरतो. मी किंवा माझ्याच मुलीनी किंवा माझ्याच शिष्यांनी ते गायले तर फक्त “आनंद” असेल तर तो स्वानंदाचा एक भाग आहे! “स्वानंद हा त्याचा अमर्याद विस्तार आहे”! हा विस्तारही माझ्या स्वानंदाचा विषय नाही कारण जीवनाची काळी बाजूही माझ्यातल्या च मी चा विस्तार आहे! हा चौफेर विस्तार शून्य (अंधार)व अमर्याद (प्रकाश) माझाच आहे!

जितकं सकारात्मक उत्तम ऊर्जादायी तेजस्वी जगात आहे तितकंच या विरुध्दही आहे हे न नाकारता प्रकृतीचाच तो विस्तार आहे हे जाणवणं खरं “माझं” आहे! शब्दांचा विस्तार व शब्दांचे शून्यत्व एकाच पारड्यात पहाणारा “मी” आहे!

विरोधाभासात जो स्थिर आहे तो मी आहे म्हणून माझं काहीच नाही व सगळंच माझं आहे हे ही मी नाही!

(फक्त) मी आहे!

एक निमिषभर मिळालेला हा दुर्मिळ, अमर”क्षणच” मी आहे त्यासाठी “मी” आहे!

अपूर्ण गोडी पूर्ण करोनी “क्षण झाला अमर”… (अमृतकण)

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातम्या… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

🔅 विविधा 🔅

☆ बातम्या ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

खरं तर दूरदर्शन वरील बातम्या पाहून त्याच त्या बातम्या

कितीवेळ पहाव्या अन का पहाव्या असा प्रश्न पडतो. एकच बातमी सह्याद्री वाहीनी सोडली तर प्रत्येक वाहीनी वर दर दहा मिनीटाला चालू असते. प्रत्येक घरात हल्ली दूरदर्शन आहे. घरात राहणा-या माणसानीं ती कितीवेळा पहावी याला काही गणितच राहिलेले नाही.

एक एक बातमी तर सलग तीन तीन दिवस चालू असते. एखदा बातमी सरळ सांगायची. परत तीच बातमी मीठमसाला लावून सांगायची. परत तीच फोडणी देवून सांगायची. परत दोन तासानी त्या बातमीच्या घटनेबद्दल लोकांचं काय मत आहे, हे विचारायचं. प्रत्यक्ष त्या घटनेचं त्या जागेवरील चित्रीकरण दाखवायचं. बातमी तीच एखदा पुरुषाकडून कांहीवेळाने स्त्री कडून सांगायला लावायची.

ते ही जोरदार आवाजात. घरातल्या ऐकणा-या माणसाला वाटावं ही बातमी नसून कोठेतरी दंगलच चालू आहे. हे सर्व का? तर चॉनेलवाल्यांचा टीआरपी

वाढावा म्हणून. मला यातून एक म्हणायचं आहे तुमच्या टीआरपी साठी किती लोकांना तुंम्ही कितीदा मुर्ख बनवणार आहात.

सर्वसाधारण १९९० च्या पुर्वी बातम्या सांगणा-या स्त्री कलाकार सुंदर वेशभूषा करून बातम्या सांगायच्या. फार सुंदर बातम्या वाटायच्या. मनांला वाटायचं या बातम्या तास न तास पहात रहाव्या. एकतर बातम्या देणा-यांचा आवाज इतका गोड असायचा. बाहेर बसणारे लोक, हा आवाज ओळखायचे. त्या बातम्यात कर्णमधुर आवाज होता, शालीनता होती. सहजसुंदर आवाजाने ते रसिकांना आकर्षित करायचे. अशा बातम्यांची सुरुवात सहजसुंदर हास्याने व्हायची तर शेवटही सुंदरशा हास्यानेच व्हायचा.

टिव्ही वरील हिंदी बातम्यांची सुरूवात सन १९६५ पासून झाली. पहिली बातमी देण्याचा मान हा प्रतिमा पुरी यानां मिळाला. त्यानंतर ज्यानीं जादूई आवाजाने सर्वसामान्य रसिकांवर भूरळ पाडली त्यामध्ये सलमा सुलतान, शमी नारंग, सरला नायर, मंजिरी जोशी अगदी अलीकडे म्हणजे २००५ पर्यंत शोभना जगदीश यांच नांव घ्यावं लागेल. अर्थात आपल्याकडे टिव्ही १९८५-९० च्या काळात आला. पण एक सत्य आपण कबूल केले पाहिजे. जोपर्यंत दूरदर्शन होतं तोवर सारं काही ठिक होतं.

चांगल्या बातम्या व दर्जेदार मालिका आपणाला त्यावेळीच पहायला मिळाल्या. रंगीत टिव्ही नसतानां आपण हे रसिकतेने पहायचो. ऐकायचो.

आज आपण पहातोय त्या बातम्या भले ख-या असतील ही पण रसिकांना त्या फेक न्यूज वाटू

लागल्यात. म्हणजेच त्यामधील सत्यता पडताळणीची

वेळ तुंम्हा-आंम्हावर आलेली आहे. या बाबींचा निश्चितच आपणाला गांभीर्याने विचार करावा लागेल.

राजकीय बातम्या बद्दल तर न बोललेलं बर!

इतक्या बेभरवशाच्या बातम्या चॅनेल वाले द्यायला लागलेत. उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली काही नेत्यांना मंत्री पद मिळाली नाहीत. त्यामूळे ते नाराज आहेत. इथपर्यंत ठिक आहे. पण ते अमुक पक्षाकडे निघालेत. त्यानीं या नेत्यांची भेट घेतली, त्या नेत्यांची भेट घेतली. प्रत्यक्ष आजही पाहिलं तर आपणास यामध्ये काही ही सत्य नसल्याचे आढळून येईल. पण अशा बातम्या कोण पहिल्यांदा देतो यासाठी ही लागलेली चुरस आहे, हे सहज आपल्या लक्षात येईल.

काही बातम्या टीआरपी वाढविण्यासाठी अति रक्तरंजित दाखविल्या जातात. जर अशा बातम्यांची खरी बाजू लोकांपासून दडवून ठेवली जाते. त्यामुळे आज आपली जबाबदारी फारच वाढली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही.

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अलकनंदा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ अलकनंदा☆ सौ शालिनी जोशी

भारतीयांची पवित्र नदी गंगा. अलकनंदा आणि मंदाकिनी गंगेच्या उपनद्या आहेत. दोन्हींच्या संगमानंतर गंगा म्हणून पुढे वाहते. अलकनंदा आणि मंदाकिनी या बहिणी बहिणी. पृथ्वीवरच्या उत्तरांचलच्या देवभूमीतून वाहणाऱ्या. आता यांच्या नावाना आपल्या आकाशगंगेत स्थान मिळाले आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या आपण जी आकाशगंगा पाहतो तिला ‘मंदाकिनी’ म्हणतात. आता शास्त्रज्ञांनी नवीन आकाशगंगेचा शोध लावला. तिला ‘अलकनंदा’ नाव दिले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला. आकाशगंगेच्या रचनेवर संशोधन करणारी पीएचडीची विद्यार्थ्यांनी राशी जैन हिने तिचे वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. दोन डिसेंबर २५ ला हे प्रसारित झाले.

२७००आकाशगंगा म्हणजेच दीर्घिकांचा अभ्यास करून ही पूर्ण विकसित दीर्घिका शोधली. वैशिष्ट्य म्हणजे विश्वाचे वय फक्त दीड अब्ज कोटी वर्षे असताना ही पूर्ण विकसित झाली होती. ती आपल्यापासून १२. २ अब्ज प्रकाश वर्षे अंतरावर आहे. सर्पिलाकार भुजा आहेत. खरंतर दीर्घिका पूर्ण विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असताना विश्वाचे वय दहा टक्के असतानाच ही विकसित झाली. ही इतक्या कमी कालावधीत तयार कशी झाली, हेच आश्चर्य. त्यात तारे निर्माण झाले आहेत. ही एक प्रभावी वैश्विक केंद्र आहे. तर यांचे वस्तुमान आपल्या सूर्यमालेच्या दहा अब्ज पट आहे. मध्यभाग फुगीर असून व्यास ३०००प्रकाश वर्षे आहे.

आता याचा अभ्यास हे शास्त्रज्ञाना आव्हान आहे. याची रचना मंदाकिनी सारखीच असल्यामुळे शास्त्रज्ञांनी अलकनंदा नाव दिले. विश्वाच्या बाल्यावस्थेतील हा एक अज्ञात पैलू जगासमोर आला. वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सर्वात दूरवरची आकाशगंगा, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, टाटा मूलभूत केंद्र, पुणे येथे हे संशोधन चालू आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी खगोल शास्त्रातील या महत्त्वाच्या शोधातून भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे दर्शन जगाला घडवले. प्राचीन काळातील खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट, वराहमिहीर यांची परंपरा पुढे चालू ठेवली.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

साधकांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी सगुण भक्ती करता करता त्यांच्या समवेत असलेल्या साधकांना परमेश्वराच्या भक्तीसंबंधी आपल्या अभंगांतून अमोलिक उपदेश केला आहे.

तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना या अभंगांचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

भक्तीचा सोपा उपाय ते साधकांना सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख//

म्हणवुनी शांती धरा / उतराल पैलतीरा//

खवळलीया काम क्रोधी/ अंगी भरती आधि व्याधी//

*तुका म्हणे त्रिविधताप/ मग जाती आपोआप//

शांतीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात, “

या जगात चित्ताची शांती ही श्रेष्ठ सिद्धी आहे. सर्व सुख तेथेच आहे, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून नेहमी मन शांत ठेवावे. त्यामुळे संसार सागरापासून पैलतीरी जाणे सोपे होते. काम, क्रोध खवळले तर अनेक व्याधींचा उगम होतो. एकदा आपल्या देहात, मनात शांती स्थिर झाली की आध्यात्मिक, आधिभौतीक आणि आधि दैविक हे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. “

भक्तीचा सोपा उपाय तुकाराम महाराज सामान्यांना सांगतात.

सोपे वर्म आम्हा/ सांगितले संती/

टाळ दिंडी हाती/ घेऊनी नाचा//

समाधी सुख सांडा/ ओवाळूनी//

अशा या कीर्तनी ब्रह्म रस/

तुका म्हणे मन पावोनी विश्रांती/

त्रिविध नासती ताप क्षणी//

हातात टाळ घेऊन आणि दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत तल्लीन होऊन नाचल्याने

तुमचे त्रिविध ताप क्षणार्धात नाहीसे होतील आणि समाधी लागल्याचे समाधान मिळेल.

पुढे जाऊन तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की देखाव्याच्या तीन जाती/(देवाला पाहण्याचे तीन प्रकार आहेत.

जैसा भाव तैसे फळ

स्वाती तोय एक जळ*

तुमचा देवाप्रती जसा भाव असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला दिसेल.

जसे, स्वाती नक्षत्रात पडणारे पाणी एकच असते, परंतु ते शिंपल्यात पडले तर त्याचा मोती होतो, कपाशीच्या पिकावर पडले, तर पिकाचा नाश होतो आणि जर ते सापाच्या मुखी पडले तर त्याचे विष होते. म्हणून जसा भाव तसेच फळ मिळते.

तुका म्हणे हिरा/ पारखिया मुढा गारा//

जो रत्नपारखी आहे, त्यालाच हिरा कळतो, जो मूर्ख, अज्ञानी आहे त्याच्या नजरेत हिरा आणि गारा सारख्याच असतात.

साधकांना तुकाराम महाराज भक्तीचा सोपा उपाय सांगतात.

सर्वसाधनांचे सार/ भव सिंधू उतरी पार/

योगायोग तपे/ केली तयाने अमूपे/

तुका म्हणे जपा/ मंत्र त्रि अक्षरी सोपा//

या अभंगात विठ्ठल नामाच्या चिंतनाचे महत्त्व तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत. चिंतनाने सर्व काही प्राप्त होते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे. भवसागर तरुन जाण्यास त्याची मदत होते. असंख्य व्रतवैकल्ये, तप, यज्ञ याग केल्याचे पुण्य या एका चिंतनाने मिळते. म्हणून साधकहो, विठ्ठल हा तीन अक्षरी नामजप तुम्ही श्रद्धेने आणि भक्ती भावाने करा. भक्ती मार्ग कसा अत्यंत सोपा आहे हे साधकांना महाराज सांगतात.

न लगे देश काळ/ मंत्र विधान सकळ/

करुनी करुणा भाकावी//

भक्तीतली आर्तता पाहूनच देव स्वतःहून भक्ताजवळ येतो.

*येतो बैसलिया ठाया/ आसने व्यापी देवराया/

निर्मल ते काया / अधिष्ठान तयाचे//

कल्पनेचा साक्षी/ तरी आदरेची लक्षी/

आवडीने भक्षी/ कोरडे धान्य मटामटा//

भक्ताच्या ठिकाणी भगवंताबद्दल जो आदर असतो, तो देवाला कळतो आणि भक्ताने प्रेमाने दिलेले अन्न तो मटामटा खातो.

घेणे तरी भाव/ लक्ष्मी दासाचा उपाव/

तुका म्हणे जीव/ जीवी मेळवील अनंत//

परमेश्वर दासाचा भक्तीभाव जाणून त्याचे रक्षण करतो आणि शेवटी भक्ताला आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतो.

वाटा घेई लवकरी/ मागे अंतरसी दूरी/

केली भरोवरी/ सार नेती आणिक//

ऐसी भांबावली किती/ काय जाणो नेणो/

किती समय नेणती/ माता भार वाहुनी//

नाही सरले तोवरी/ धाव घेई वेग करी/

घेतले पदरी/ पावले ते आपुले//

फटलंडी म्हणे तुका/ एक सहावे धक्का/

तरीच या सुखा / मग कैसा पावसी//

सामान्य प्रापंचिकाला महाराज या वरील अभंगातून काय सांगतात? ते म्हणतात की अरे परमार्थाचा वाटा लवकर घे, नाहीतर तुला तो मिळणार नाही. नंतर तू कितीही खटाटोप केलास, तरी दुसरेच लोक सार घेऊन जातील. संसाराच्या भ्रमात अडकलेली अशी किती माणसे आहेत, याची गणतीच नाही. निष्कारण प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन नरजन्माची सुसंधी वाया घालवतात, म्हणून आयुष्य असेपर्यंत हे साधका, तू संतांकडे धाव घे. संतांकडून मिळणारे ज्ञान साधनेने लवकर आत्मसात कर.

भगवंताला भक्त किती प्रिय आहे हे तुकाराम महाराज साधकांना पुराणातील कथांचा आधार घेऊन सांगतात.

मानी भक्तांचे उपकार/ ऋणिया म्हणवी निरंतर/

केला निर्गुणी आकार/ कीर्ती मुखे वर्णिता//

म्हणोनी जया जे वासना/ ते पुरवितो पंढरी राणा//

अंबऋषी कारणे/ जन्म घेतले नारायणे/

एवढे भक्तीचे लाहाणे/ दास्य करी दासाचे//

भावभक्तीचा अंकित/ नाम साजे दीनानाथ/

म्हणोनी राहिला निवांत/ तुका चरण धरुनी//

भक्तासाठी भगवंत सगुण रूप घेऊन त्याच्या मागे मागे सतत असतो. भक्ताला सर्वकाळ सर्व दिशा शुभच असतात. अखंड हरिनामाने तो शुचिर्भूत झालेला असतो. ज्या ठिकाणी नारायणाचे अखंड चिंतन चालू असते ते स्थळ

उत्तमच असते, मग तो एकांतवास असो, अथवा घर असो. नारायणाची कृपा हे महद्भाग्य आहे.

या ठिकाणी महाराज एक कथा सांगतात.

महाबळ नावाचा एक भट कृष्णाचे पारिपत्य करण्यासाठी गोकुळात आला होता. त्याला कंसाने पाठवले होते. आपण त्रिकालज्ञ ज्योतिषी आहोत असे भासवून त्याने नंद व यशोदेला मोहित केले होते. जेव्हा यशोदा व नंद यांनी त्याला कृष्णाचे भविष्य विचारले, तेव्हा त्याने मुद्दामच विपरीत भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी कृष्णाच्या मायेने त्या ब्राह्मणाला बसावयास दिलेला पाटच उडला आणि त्या ब्राह्मणाच्या पाठीत बसला. त्याचा खोटेपणा कृष्णाला सहन झाला नाही. असत्याचे, पापाचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे भक्तांना सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही कथा त्यांच्या अभंगात वर्णन केली आहे.

भक्तीचे महात्म्य सांगताना वेळोवेळी त्यांनी अशा प्रकारच्या रूपकात्मक कथांचा उपयोग केला आहे. कधी त्यांची भाषा परखड, तर कधी अति रसाळ आणि मधाळ वाणी त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते.

वेळोवेळी येणाऱ्या अभंगातून आपण याचा परामर्श घेणारच आहोत.

क्रमशः… ७ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares