सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

साधकांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी सगुण भक्ती करता करता त्यांच्या समवेत असलेल्या साधकांना परमेश्वराच्या भक्तीसंबंधी आपल्या अभंगांतून अमोलिक उपदेश केला आहे.

तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना या अभंगांचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

भक्तीचा सोपा उपाय ते साधकांना सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख//

म्हणवुनी शांती धरा / उतराल पैलतीरा//

खवळलीया काम क्रोधी/ अंगी भरती आधि व्याधी//

*तुका म्हणे त्रिविधताप/ मग जाती आपोआप//

शांतीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात, “

या जगात चित्ताची शांती ही श्रेष्ठ सिद्धी आहे. सर्व सुख तेथेच आहे, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून नेहमी मन शांत ठेवावे. त्यामुळे संसार सागरापासून पैलतीरी जाणे सोपे होते. काम, क्रोध खवळले तर अनेक व्याधींचा उगम होतो. एकदा आपल्या देहात, मनात शांती स्थिर झाली की आध्यात्मिक, आधिभौतीक आणि आधि दैविक हे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. “

भक्तीचा सोपा उपाय तुकाराम महाराज सामान्यांना सांगतात.

सोपे वर्म आम्हा/ सांगितले संती/

टाळ दिंडी हाती/ घेऊनी नाचा//

समाधी सुख सांडा/ ओवाळूनी//

अशा या कीर्तनी ब्रह्म रस/

तुका म्हणे मन पावोनी विश्रांती/

त्रिविध नासती ताप क्षणी//

हातात टाळ घेऊन आणि दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत तल्लीन होऊन नाचल्याने

तुमचे त्रिविध ताप क्षणार्धात नाहीसे होतील आणि समाधी लागल्याचे समाधान मिळेल.

पुढे जाऊन तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की देखाव्याच्या तीन जाती/(देवाला पाहण्याचे तीन प्रकार आहेत.

जैसा भाव तैसे फळ

स्वाती तोय एक जळ*

तुमचा देवाप्रती जसा भाव असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला दिसेल.

जसे, स्वाती नक्षत्रात पडणारे पाणी एकच असते, परंतु ते शिंपल्यात पडले तर त्याचा मोती होतो, कपाशीच्या पिकावर पडले, तर पिकाचा नाश होतो आणि जर ते सापाच्या मुखी पडले तर त्याचे विष होते. म्हणून जसा भाव तसेच फळ मिळते.

तुका म्हणे हिरा/ पारखिया मुढा गारा//

जो रत्नपारखी आहे, त्यालाच हिरा कळतो, जो मूर्ख, अज्ञानी आहे त्याच्या नजरेत हिरा आणि गारा सारख्याच असतात.

साधकांना तुकाराम महाराज भक्तीचा सोपा उपाय सांगतात.

सर्वसाधनांचे सार/ भव सिंधू उतरी पार/

योगायोग तपे/ केली तयाने अमूपे/

तुका म्हणे जपा/ मंत्र त्रि अक्षरी सोपा//

या अभंगात विठ्ठल नामाच्या चिंतनाचे महत्त्व तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत. चिंतनाने सर्व काही प्राप्त होते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे. भवसागर तरुन जाण्यास त्याची मदत होते. असंख्य व्रतवैकल्ये, तप, यज्ञ याग केल्याचे पुण्य या एका चिंतनाने मिळते. म्हणून साधकहो, विठ्ठल हा तीन अक्षरी नामजप तुम्ही श्रद्धेने आणि भक्ती भावाने करा. भक्ती मार्ग कसा अत्यंत सोपा आहे हे साधकांना महाराज सांगतात.

न लगे देश काळ/ मंत्र विधान सकळ/

करुनी करुणा भाकावी//

भक्तीतली आर्तता पाहूनच देव स्वतःहून भक्ताजवळ येतो.

*येतो बैसलिया ठाया/ आसने व्यापी देवराया/

निर्मल ते काया / अधिष्ठान तयाचे//

कल्पनेचा साक्षी/ तरी आदरेची लक्षी/

आवडीने भक्षी/ कोरडे धान्य मटामटा//

भक्ताच्या ठिकाणी भगवंताबद्दल जो आदर असतो, तो देवाला कळतो आणि भक्ताने प्रेमाने दिलेले अन्न तो मटामटा खातो.

घेणे तरी भाव/ लक्ष्मी दासाचा उपाव/

तुका म्हणे जीव/ जीवी मेळवील अनंत//

परमेश्वर दासाचा भक्तीभाव जाणून त्याचे रक्षण करतो आणि शेवटी भक्ताला आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतो.

वाटा घेई लवकरी/ मागे अंतरसी दूरी/

केली भरोवरी/ सार नेती आणिक//

ऐसी भांबावली किती/ काय जाणो नेणो/

किती समय नेणती/ माता भार वाहुनी//

नाही सरले तोवरी/ धाव घेई वेग करी/

घेतले पदरी/ पावले ते आपुले//

फटलंडी म्हणे तुका/ एक सहावे धक्का/

तरीच या सुखा / मग कैसा पावसी//

सामान्य प्रापंचिकाला महाराज या वरील अभंगातून काय सांगतात? ते म्हणतात की अरे परमार्थाचा वाटा लवकर घे, नाहीतर तुला तो मिळणार नाही. नंतर तू कितीही खटाटोप केलास, तरी दुसरेच लोक सार घेऊन जातील. संसाराच्या भ्रमात अडकलेली अशी किती माणसे आहेत, याची गणतीच नाही. निष्कारण प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन नरजन्माची सुसंधी वाया घालवतात, म्हणून आयुष्य असेपर्यंत हे साधका, तू संतांकडे धाव घे. संतांकडून मिळणारे ज्ञान साधनेने लवकर आत्मसात कर.

भगवंताला भक्त किती प्रिय आहे हे तुकाराम महाराज साधकांना पुराणातील कथांचा आधार घेऊन सांगतात.

मानी भक्तांचे उपकार/ ऋणिया म्हणवी निरंतर/

केला निर्गुणी आकार/ कीर्ती मुखे वर्णिता//

म्हणोनी जया जे वासना/ ते पुरवितो पंढरी राणा//

अंबऋषी कारणे/ जन्म घेतले नारायणे/

एवढे भक्तीचे लाहाणे/ दास्य करी दासाचे//

भावभक्तीचा अंकित/ नाम साजे दीनानाथ/

म्हणोनी राहिला निवांत/ तुका चरण धरुनी//

भक्तासाठी भगवंत सगुण रूप घेऊन त्याच्या मागे मागे सतत असतो. भक्ताला सर्वकाळ सर्व दिशा शुभच असतात. अखंड हरिनामाने तो शुचिर्भूत झालेला असतो. ज्या ठिकाणी नारायणाचे अखंड चिंतन चालू असते ते स्थळ

उत्तमच असते, मग तो एकांतवास असो, अथवा घर असो. नारायणाची कृपा हे महद्भाग्य आहे.

या ठिकाणी महाराज एक कथा सांगतात.

महाबळ नावाचा एक भट कृष्णाचे पारिपत्य करण्यासाठी गोकुळात आला होता. त्याला कंसाने पाठवले होते. आपण त्रिकालज्ञ ज्योतिषी आहोत असे भासवून त्याने नंद व यशोदेला मोहित केले होते. जेव्हा यशोदा व नंद यांनी त्याला कृष्णाचे भविष्य विचारले, तेव्हा त्याने मुद्दामच विपरीत भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी कृष्णाच्या मायेने त्या ब्राह्मणाला बसावयास दिलेला पाटच उडला आणि त्या ब्राह्मणाच्या पाठीत बसला. त्याचा खोटेपणा कृष्णाला सहन झाला नाही. असत्याचे, पापाचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे भक्तांना सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही कथा त्यांच्या अभंगात वर्णन केली आहे.

भक्तीचे महात्म्य सांगताना वेळोवेळी त्यांनी अशा प्रकारच्या रूपकात्मक कथांचा उपयोग केला आहे. कधी त्यांची भाषा परखड, तर कधी अति रसाळ आणि मधाळ वाणी त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते.

वेळोवेळी येणाऱ्या अभंगातून आपण याचा परामर्श घेणारच आहोत.

क्रमशः… ७ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted