मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

 

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 4 ☆ 

(©️doctor for beggars )

( मी काय बोलणार यावर—-) इथून पुढे 

मी स्तब्ध झालो…!

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना, कटु अनुभव गाठीशी असतांना, पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते…! 

हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा… ?

‘चला निघु मी डाॕक्टर ? 

केळी घ्यायचीत मला…’ आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो.’आता केळी कशाला…? नाही म्हणजे कुणाला… ?’ ——मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो.  

‘अहो, तो काल मला म्हणाला, केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय. मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला… पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात. आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु, केळी मिळाली नाहीत म्हणुन…! 

मग आठवलं… मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी… जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात… ! 

म्हटलं बघू, पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ…! शिकरण करुन देईन हो, पोराचं मन तरी मोडणार नाही…!’ 

भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना, देव दिसेना… दिसत होती फक्त एक आई… ! 

रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई…!

निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई…!

हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई…!

याच बाईत मला दिसली आई !!!

भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो, तीने पाया पडु दिलं नाही… ! 

‘आज्जी, मी तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु…? दाटल्या गळ्यानं मी विचारलं. 

यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,’पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची… ?’ 

‘नाही आज्जी, वृद्धाश्रमात तुमची सोय होईल, मुलाचं मग बघु काहीतरी… !’ 

माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली… ,’काय डाॕक्टर, मग काय फायदा…? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी… अजुन केळ्याची सोय करायचीय मला…’ 

असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला…! —–

मी इकडं तिकडं आसपास पाहिलं… सर्व बंद. 

आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती…

मला दोघांचं भविष्य दिसत होतं… आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार…या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, ‘आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु…?’

यावर ती हसत म्हणाली होती, ‘अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी … आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता… ? 

या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी…. आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहू  दे…त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत …!

ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली…!

नव्यानंच पुन्हा आई झालेल्या, म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन … ? 

आईला वय कुठं असतं…?

ती कधीच म्हातारी होत नाही, हेच  खरं ! 

गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा, तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा, पैसे असण्याचा, पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी… ! 

ती फक्त आई असते !

पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागू  शकते… ! 

पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात ! 

दोन्हीचं वजन सारखंच…!!! 

यानंतर मी त्या जागेवर, केळी घेऊन ब-याचदा गेलो… पण ती दिसत नाही !

हातात केळी घेऊन माझी नजर तिला शोधत असते…

का कोण जाणे…तिला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो…! 

का कोण जाणे…तिला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…तिला शोधतांना तिने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…तिला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…!!!

समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर  

माननीय प्रिय द.मा.मिरासदार यांस,

स.न.वि.वि…

आदरणीय लेखकमहाशय,या क्षणी तुम्हाला संबोधताना,कै. द.मा. मिरासदार असे लिहीताना हात थरथरला म्हणून कै.  हे संबोधनात्मक अक्षर मी टाळले.

कालच तुमच्या निधनाची बातमी ऐकली आणि एक दु:खाची लहर सळसळून गेली.मृत्यु अटळ.मृत्यु सत्य.

तुम्ही चौर्‍याण्णव वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून, लोकांना हसवत, हसत जगाचा निरोप घेतलात. मात्र आमच्यासाठी ,प्रचंड हास्य तुमच्या लेखन प्रपंचातून  ठेवून गेलात….. तुमच्या निखळ हास्यकथा वाचतच खरं म्हणजे आम्ही वाढलो. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. तुम्ही १९६२ सालापासून, महाराष्ट्रात आणि परदेशातही ठिकठिकाणी, कथाकथनाचे कार्यक्रम केलेत आणि आम्हा श्रोत्यांची अपार करमणूक केलीत. ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून, हातवारे करुन तुम्ही बोलू लागलात की एक अद्भुत नाट्यच अनुभवायला मिळायचे.

मराठीतील, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं वि जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांची विनोदी लेखन परंपरा आपण चालू ठेवलीत. व्यंकुची शिकवणी,  माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, माझी पहिली चोरी,भूताचा जन्म अशा अनेक हास्यकथांचे उत्कृष्ट लेखन आणि तितकंच प्रभावी सादरीकरण हे श्रोत्यांना ,चिंता समस्यांपासून दूर नेउन मनमोकळं हंसणं

देत…या सर्वच कथा मनावर कोरलेल्या आहेत.

विसंगतीतून निर्माण होणारा विनोद नेहमीच ऐकणार्‍याला ,जीवनाचा एक सकारात्मक दृष्टीकोन देतो.

एखाद्या घटनेकडे कधी तटस्थपणे,कधी हसत खेळत. विनोदी अंगाने बघायला शिकवतो.यश ,अपयश पचवायची ताकद देतो. द.मा.,तुमच्या लेखनाने हे केले.

आम्हाला समृद्ध केलंत तुम्ही…खूप ऋणी आहोत आम्ही तुमचे…

गप्पागोष्टी, मिरासदारी,गुदगुल्या ,गप्पांगण ,ताजवा असे २४कथासंग्रह तुम्ही आम्हाला दिलेत.एक डाव भूताचा

ह्या  गाजलेल्या चित्रपटाची कथा तुमचीच.त्यातली तुमची हेडमास्तरांची भूमिकाही मनावर ठसली.

तुमच्या बहुतेक कथा ,ग्रामीण जीवनावरच बेतलेल्या आहेत.गणा मास्तर,नाना चेंगट,राम खरात,बाबु पेहलवान,

चहाटळ अनशी,ज्ञानु वाघमोडे अशा एकाहून एक ,गावरान,इब्लीस,बेरकी,वाह्यात ,टारगट क्वचित भोळसटही  पात्रांनी आम्हाला पोट धरुन हसायला लावले आहे.या सर्व पात्रांना आमच्यासाठी एक निश्चित चेहरा दिला.हे सारे चेहरे आमच्या आयुष्याच्या वाटचालीत

हसत हसत सामील झाले.आमचे सोबती बनले.मनुष्य स्वभावाचे,इच्छा आकांक्षाचे, छोट्या छोट्या स्वप्नांचे ,

मनोर्‍यांचे, इमल्यांचे आरसे बनले.भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे ,कावेबाजपणाचे, लबाडीचे

धूर्त राजकारणाचे ,धडे दिले.सर्वार्थाने अचंबीत झालेल्या सर्वसाधारण सामान्य माणसाकडे पहायलाही शिकवलं.

काही गंभीर कथाही तुम्ही लिहील्यात.जसं की ,विरंगुळा

कोणे एके काळी , स्पर्श वगैरे.त्यांतून जीवनातले कारुण्यही तुम्ही  अचूक टिपलेत.पण तरीही तुमचा स्वाभाविक कल हा मिस्कील ,विनोदी लेखनाकडेच राहिला.तिथेच बहरला.

पुण्याच्या साहित्य संमेलनात तुम्ही तुमची ‘भुताची गोष्ट’

ऐकवली होती.सतत दीड तास श्रोतृवर्ग हास्यकल्लोळात डुबला होता.एकेक पात्र रंगतदारपणे डोळ्यासमोर ऊभे केले.तुमच्या आवाजातले चढउतार,कथा फुलवण्याची जबरदस्त क्षमता,नाट्यमयता, अभिनय सारेच सर्वांग सुंदर होते..त्यावेळीही तुमचे वय ऐंशी अधिकच होते…

सलाम तुमच्या कलेला. सलाम तुमच्या लेखनाला…

वि. रा. भाटकर हे विनोदी गद्यप्रकार लिहीणारे… तुमचेच टोपण नाव  होते.

द.मा. भरभरुन दिलंत तुम्ही आम्हा साहित्यप्रेमींना…

खूप  हसवलंत. बोधप्रद करमणुक केलीत .ज्ञानातून मनोरंजन केले.एक मोठ्ठा साहित्य ऐवज आमच्यासाठी ठेवून गेलात….आम्ही खूप कृतज्ञ आहोत!!खूप ऋणात आहोत.

आज तुमच्या अचेतन देहावर भावपूर्ण श्रद्धांजलीचे फुल वाहते!!!

 

तुमची एक

लेखनवेडी,..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 3 ☆ 

(©️doctor for beggars )

(“म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ ) इथून पुढे —-

 “ माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती, आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं… आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं…तिथंच आईपण संपतं… ! “

“ हो ना पण, मुलाला त्याचं कर्तव्य कळू नये ? “ 

“ डाॕक्टर, रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही, आपण आपल्या पायात चप्पल घालावी– त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल… आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं  काम करत रहायचं, फळाची अपेक्षा न धरता… !” 

गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता, गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 

“ चला डाॕक्टर, निघते मी… माझं पोरगं घरी एकटंच असेल… मला जायला हवं आता…! “ 

“ क्काय…??? “  मी जवळपास किंचाळलो असेन… कारण या वाक्यावर ती दचकली होती. 

“ अहो आज्जी, आत्ताच तर म्हणालात ना… एक मूल लहानपणीच  वारलं– बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडून गेला… आता हे काय… ? ”

ती मंद हसली. म्हणाली, “ सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर… आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी…” 

“ नाही आज्जी, आत्ताच सांगा… प्लीज… माझ्या मनातनं हे जाणार नाही… “ 

ती शांतपणे म्हणाली,  “ अहो डाॕक्टर, कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते, तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच.  नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं. “  

“ मग…? “  आवंढा गिळत मी म्हटलं. 

“ मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं…साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता—- कमरेखाली अधु ! 

मी त्याच्याकडे पाहिलं… !  डोळे मिचकावत मला म्हणाला… ” काय होनार नाय मावशी तुला, काळजी करु नको… अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला..!” 

“ हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो… ? 

मावशी म्हणतो… ?—- हा निराधार अपंग… रस्त्यांवर राहतो… माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला…!— मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं… आज माझं मूल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं.– ज्या काळात तो गेला… त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती… तो ही आज रस्त्यावरच असता…!–डाॕक्टर , त्या अपंग मुलात, मला माझं मुल दिसलं. आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले—त्या दिवशी मी परत आई झाले हो… मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी… येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले. “ 

—मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 

“ आज्जी, आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही… त्यात अजून एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला…?”   मी आश्चर्याने विचारलं. 

“ डाॕक्टर, आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत. आईला व्यवहार कधीच कळत नाही… !  शिवाय पैसा जगायला लागतो…जगवायला नाही…! “ 

“ म्हणजे … ? “  मी आ वासून विचारलं. 

“ म्हणजे, जो स्वतःचा विचार करत  स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात… पण आपण जेव्हा “स्व” सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो… त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो…आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा ! “

मी हे तत्वज्ञान ऐकत मूकपणे उभा होतो. 

“ मोठी झालेली मुलं, आपल्या आईला त्यांच्या घरात  राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् … पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?–आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर  ! “

मी शहारलो हे ऐकून… ! 

‘आज्जी, आधीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?’ मी चाचरत बोललो. 

‘डाॕक्टर, हा सोडुन गेला तरी, तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?

एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो… त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं… एक आई पण जन्म घेते त्याचवेळी… !

दोन जीव जन्मतात त्यावेळी… एक मुल आणि एक आई ! 

जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं… हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?

मी काय बोलणार यावर—–

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “द. मा.” ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ “द. मा.” ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“द. मा.”

?

असे कसे हो आम्हाला सोडून गेलात?

आपल्या निर्मळ विनोदाने, कथाकथनातून सात दशके महाराष्ट्र हास्यरसाचा आस्वाद घेत होता, आता करोनाच्या महामारीमधे विनोद हाच सांगाती आवश्यक असताना आपण निघून गेलात..

आता बापाची पेंड कोण देणार, व्यंकूची शिकवणी कोण घेणार, शिवाजीचे हस्ताक्षर कोण पहाणार?

अवघी भोकरवाडी हळहळली..

गणा मास्तर

नाना चेंगट

बाबू पहिलवान

शिवा जमदाडे

सुताराची आनशी

सर्व आपले मानसपुत्र,

? भावपूर्ण श्रद्धांजली 

 

संग्रहिका  : डॉ. ज्योती गोडबोले 

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

पूर्वसूत्र- “या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं. त्यानंतरच्या दिवाळीपासून जावई म्हणालेत तसं करू.” त्यांनी आजोबांना सुचवलं. ते विचारात पडले. त्यांना काय बोलावं ते सुचेचना.

“पण थोडक्यासाठी त्यांना दुखावले असं नको व्हायला. ठरलंय तसंच होऊदे” ते म्हणाले. आजी हिरमुसल्या.

“ठरलंय तसं करू पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.समजावेन त्यांना. सांगून बघू तरी काय म्हणतात ते.” आजी म्हणाल्या.

जे जे होईल ते ते पहावे असा विचार करून आजोबा नाईलाजाने गप्प बसले.)

जावई आढ्यतेखोर नव्हतेच.त्यामुळे त्यांनी आजींच्या विनंतीला मान दिला. मग पूर्वीप्रमाणे त्या वर्षीही  सर्वजण दिवाळीसाठी सोलापूरच्या बंगल्यातच एकत्र आले. दिवाळीच्या फराळाचे सर्व जिन्नस सुनेच्या मदतीने पुढाकार घेऊन आजीनीच बनवले होते. त्यांनी मुलं, सुना, मुलगी, जावई, नातवंडं सर्वांसाठी आपले आशीर्वाद म्हणून त्यांच्या त्यांच्या आवडीच्या भेटवस्तूही आवर्जून खरेदी केलेल्या होत्या. या वर्षीच्या दिवाळीची रंगत काही औरच होती. पाडव्याच्या आदल्या रात्री स्थानिक साधकांना नामसाधनेसाठी आमंत्रित केलेले होते. रात्री उशीरपर्यंत नामसाधना, मग अल्पोपहार, भक्तिगीतांचा कार्यक्रम,असा भरगच्च कार्यक्रम होऊन त्या आनंदसोहळ्याची सांगता झाली. त्या रात्री आजी- आजोबांनी  अतिशय प्रसन्नचित्ताने अंथरुणाला पाठ टेकली. रात्री झोपायला खूप उशीर होऊनसुद्धा ठरल्याप्रमाणे पहाटे चार वाजता रोजच्यासारखी दोघांनाही जाग आली.

रोज असे पहाटे उठून मुख-संमार्जन करून दोघेही गुरुदेवांसमोर निरांजन लावून त्यांना मनोभावे नमस्कार करून नामसाधनेला बसत.नेमक्या ठराविक वेळी अंत:प्रेरणेनेच आजोबा प्रसन्नचित्ताने नेमातून बाहेर येत. मग उठून फुलांची परडी आणि दुधाचे पातेले घेऊन बागेत जात. दूधवाला येईपर्यंत त्यांची फुलांची परडी बागेतल्या फुलांनी अर्धी भरलेली असे. तो येताच पातेल्यात दूध घेऊन ते खिडकीत ठेवीत. बाकी फुले काढून आत येईपर्यंत दूध गॅसवर चढवून आजीनी चहाची तयारी सुरू केलेली असे. हा त्यांचा गेल्या कित्येक वर्षांचा न चुकणारा दिनक्रम. आजही असेच झाले. नेहमीप्रमाणे फुले काढत असताना दूधवाला येताच आजोबांनी दूध घेऊन पातेले खिडकीत ठेवले.फुले काढून झाल्यावर ते आत आले तरीही आजी अजून साधनेतच. खिडकीत दुधाचे पातेले तसेच होते. आजी नामसाधनेत तल्लीन. त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आजोबांनी खिडकीतले

पातेले हळूच घेऊन ते आत नेऊन गॅसवर चढवले. चहाची सगळी तयारी करून ठेवली. आणि देवघराच्या दाराशी येऊन त्यांनी हलक्या आवाजात आजीना हाक मारली. प्रतिसाद आला नाही तसे पुढे होऊन त्यांनी आजींच्या खांद्यावर हलक्या हाताने थोपटले तशी त्या स्पर्शाने आजींची मान कांहीशी कलली. आजोबांना वेगळीच शंका आली. क्षणार्धात ती खरीही ठरली. नामसाधनेतल्या तल्लीनावस्थेतच आजी  परतत्त्वात  विलीन झाल्या होत्या!

दुसऱ्या दिवशीच्या पेपरमधे आजी गेल्याची बातमी वाचून मला धक्काच बसला. पण त्यांच्या या अलौकिक जिवा-शिवा च्या भेटीचा वृत्तान्त मी कुंटे आजोबांच्या सांत्वनासाठी गेलो तेव्हा मला समजला. सांगताना आजोबा स्थिरचित्तच होते.

“मृत्यूसुद्धा कृपावंत ठरला तिच्यासाठी.” ते म्हणाले होते.

“आला तेही तिला कणभरही वेदना न देता. नामस्मरणात दंग असताना मोठ्या सन्मानपूर्वक पालखीतून मिरवत न्यावं तसं घेऊन गेला तिला. माझ्यासकट सगळ्या सग्यासोयऱ्यांना या उत्सवासाठी जणू काही तिने आवर्जून बोलावून घेतले होते. स्वतःसह सगळीच छान आनंदात असताना अशी अलगद निघून गेली….!! “

आजोबा म्हणाले होते. त्यांच्या आवाजात थरथर जाणवत होती.पण चेहऱ्यावर मात्र त्यांच्या आनंदाश्रूनी ओलावलेल्या नजरेतून अलगद विलसलेलं अस्फुटसं स्मित..!

ऐकतानासुध्दा अंगावर शहारा आला होता माझ्या..!

कांही कांहीं अनुभव अविस्मरणीय असतात ते असे.

खूप विचार करुनही या अशा प्रस्थानाचं गूढ मला आज तागायत उलगडलेलं नाहीय. कुणालाही निरोप न देता न् कुणाचाही निरोप न घेता आलेला असा कृतार्थ मृत्यू विरळाच.त्या अर्थाने कुंटे आजी भाग्यवान हेही खरेच.पण तरीही एक निरुत्तर प्रश्न आजही माझ्या मनात डोकावून जातोच.’ठरल्याप्रमाणे दिवाळीला लेक जावयाकडे जाण्याचा बेत बदलायची व सर्वांना दिवाळीला इकडेच बोलावून घेण्याची आजीना झालेली प्रेरणा ही एक निव्वळ योगायोग की त्यांना आधीच लागलेली स्वतःच्या प्रस्थानाची चाहूल?

या प्रश्नाचं उत्तरही आजींसोबतच निघून गेलंय.म्हणूनच तो प्रश्न माझ्यासाठी तरी आजींच्या मृत्यू सारखाच एक गूढ बनून राहिलेला आहे..!

समाप्त 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आज्जी भूषणला म्हणाली,  “बाळा, दिवेलागणीची वेळ झाली, शुभंकरोती म्हणायला चल. हातपाय धुवून ये हं.”  भूषण आला नि आज्जीजवळ बसला. आज्जी  शिकवायला लागली.” शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम धनसंपदा———-बाहेरची लक्ष्मी घरात येवो,  घरातली इडापिडा बाहेर जावो,”  हे सगळं आज्जीने शिकवलं. 

भूषण म्हणाला, “आजी, लक्छुमी म्हंजे काय?”

आज्जीने सांगितलं, “लक्ष्मी म्हणजे पैसे, दागिने, धान्य, वगैरे.” 

“आनी इलापिला म्हंजे काय?”

त्याला समजेल अशा भाषेत आज्जीने  सांगितलं—- 

” इडापिडा म्हणजे गरिबी, खायला मिळत नाही, फाटके कपडे, आजारी पडणं असं सगळं  “

“इलापिला बाहेल जाऊदे म्हंजे कुथे?”

“जाऊदे तिकडे रस्त्यावर”  आज्जीने उत्तर दिलं . 

“मी शुभंकलोती म्हननाल नाही.”  

“कारे”?आज्जीने विचारलं.

“लश्त्यावल पबीचं घल आहेना!  (पबी म्हणजे त्याची छोटी मैत्रिण प्रभी,ती झोपडीत रहाते.)

इलापिला तिच्याकले गेली तल ती आजाली पलेल”. 

लहानशा भूषणचा समाजवाद ——

—–आज्जीला खूप काही शिकवून गेला.  

 

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

कांही कांही अनुभव अविस्मरणीय असतात.  कुंटे कुटुंबियांच्या बाबतीतला हा अनुभवही असाच. त आमच्या बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रँचमधे मी मॅनेजर होतो त्यानिमित्ताने माझ्या संपर्कात आलेले कुंटे आजोबा. आमच्या बँकेचे ग्राहक.  एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व.

मी नवीनच रुजू झालो होतो त्या ब्रॅंचला, त्यानंतरच्या पहिल्याच एक तारखेची गोष्ट.  नेहमीप्रमाणे पेन्शनर्सची खूप गर्दी.  केबिनमधून बाहेर लक्ष गेलं तेव्हा जाणवलं की त्या गर्दीत बसायला जागा नसल्यामुळे एक वृद्ध गृहस्थ माझ्या केबिनलगत अवघडून पाठमोरे उभे आहेत. मी शिपायाला सांगून त्यांना आत बोलावलं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. ती खरं तर माझ्या दृष्टीने मीच करायला हवी होती अशी एक साधी गोष्ट होती. पण हीच माणूसकी मला पुढे अनेक पटीने बरंच कांही देऊन गेली. कारण त्यानंतर ते केबीनमधून बाहेर गेले ते माझ्याबद्दलचा एक सद् भाव मनात घेऊनच.  

कुंटे आजी-आजोबा, त्यांची दोन्ही मुलं-सुना, मुलगी-जावई सर्वचजण निंबाळ संप्रदायातले.  गुरुदेव रानडे यांचे उपासक.  त्यांनीच मला आवर्जून आग्रहाने एकदा निंबाळला नेले  होते.  कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडांचं अवडंबर नसलेलं, तिथलं वातावरण मला खूप भावलं होतं.  भक्तीमार्गाचे अनुसरण करून मानवजन्माचे सार्थक करण्याची शिकवण हे निंबाळ-संप्रदायाचे वैशिष्ट्य. त्यामुळे नित्यनेमाने नामसाधना हे कुंटे आजी-आजोबांचे अढळ श्रध्देने स्विकारलेले व्रतच होते. त्यांचे सोलापूर येथील कॉलेजमधे प्राध्यापक असणारे चिरंजीव    श्री. नरेंद्र कुंटे हे या संप्रदायातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते.  भक्तीमार्गावरील अनेक थोर विभूतींच्या ग्रंथरचनांचे विश्लेषण करणारे त्यांचे अतिशय सुबोध लेखन आणि त्यावरील त्यांची निरूपणं सर्वसामान्यांच्या अनेक शंकांचे निरसन करीत त्यांना मार्ग दाखवीत असत.  या कुंटे कुटुंबीयांबद्दल तिथे आलेल्या सर्वच उपासकांना वाटत असलेलं प्रेम आणि निष्ठा पाहून माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला होता.

कुंटे आजीही अतिशय शांत,हसतमुख,अगत्यशील. त्यांचा एक मुलगा (श्री. नरेंद्र कुंटे), सून, नातू सोलापूरला त्यांच्याचजवळ.  दुसऱ्या मुलाचं बि-हाड नोकरी निमित्ताने मुंबईला. मुलगी-जावई पुण्यात.

त्या घरची दिवाळी त्या सर्वांसाठीच एक हवाहवासा आनंदसोहळा असे. कारण  आजी-आजोबाची इच्छा म्हणून सर्व कुटुंबियांची दिवाळी दरवर्षी सोलापूरच्या बंगल्यातच उत्साहात साजरी व्हायची.  त्यामुळेच दिवाळी म्हणजे कुंटे कुटुंबियांसाठी एक सत्संग आणि आनंदोत्सवच असायचा. परगावचे मुलगा,सून लेक-जावई, नातवंडे सर्वचजण दिवाळीचे चार दिवस आवर्जून सोलापूरला येत.

एका दिवाळीला असेच सर्वजण जमलेले असताना जावई आग्रहाने म्हणाले, “आता यापुढे दरवर्षी दिवाळीला आपण आलटून पालटून प्रत्येकाच्या घरी एकत्र जमू या कां? त्याशिवाय आमच्या बि-हाडी सगळ्यांचं येणं कसं होणार?”

मुंबईच्या मुलासूनेनं ही कल्पना उचलून धरली. एरवीही त्यात नाकारण्यासारखं कांही नव्हतंच. आजोबांनी आजींकडे पाहिलं. आजीनी हसून संमतीदर्शक मान हलवली. मग सर्वानुमते पुढच्या वर्षाची दिवाळी लेकीच्या घरी पुण्यात करायची असं ठरलं.

पावसाळा संपत आला तशी आजींच्या मनात चलबिचल सुरू झाली.

“आपल्या नामसाधनेला पुढच्या वर्षी एकवीस वर्षं पूर्ण होतायत.  त्यानिमित्ताने आपण निंबाळला सत्संग आयोजित करणार आहोत.  त्यानंतर पुढे लगेचच दिवाळी येईल.  या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं.  मग त्यानंतरच्या दिवाळीपासून हवंतर जावई म्हणताहेत तसं करू. ” त्यांनी आजोबांना सुचवलं.

ते विचारात पडले. त्याना  काय बोलावं ते सुचेचना. “पण थोडक्यासाठी त्यांना दुखवल्यासारखं होईल. नकोच ते. ठरलंय तसं होऊ दे. “ते म्हणाले.

आजी हिरमुसल्या.

“ठरलंय तसं करु,पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.  समजावेन त्यांना.  सांगून बघू तरी काय म्हणतात ते” आजी म्हणाल्या. जे जे होईल ते ते पहावे असा विचार करुन आजोबा नाईलाजाने गप्प बसले.

क्रमशः —- 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सौदामिनी तंत्र ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सौदामिनी तंत्र ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

सौदामिनी तंत्र

भारद्वाज ऋषींनी आपल्या “सौदामिनी तंत्र” या ग्रंथात विजांचे (Electricity) ५  प्रकार सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

१) रेशीम, कोल्हा, ससा किंवा मांजर या प्राण्यांचे कातडे हवेत झटकले तर उत्पन्न होते ती ‘तडित्‌’ वीज. (पाश्च्यात शास्त्रज्ञ अद्याप हिचा काहीच उपयोग करीत नाहीत.)

२) स्फटिक, रेशीम, लाख वगैरे जिनसा एकमेकांवर घासल्यावर उत्पन्न होते ती ‘सौदामिनी’ वीज.

३) आकाशात ढगात उत्पन्न होते ती ‘चपला’, हिलाच विद्युत, चंचला असेही संबोधतात.

४) विद्युतकुंभ ( Battery ) मध्ये उत्पन्न होणारी वीज ती ’शतकोटी’. * अगस्त्य ऋषी हिला ‘मित्रावरुणौ’ म्हणतात. मित्र म्हणजे धन व वरुण म्हणजे ऋण वीज होय. कार्य करण्यासाठी शंभर कुंभ वापरावे लागतात म्हणून हिला ‘शतकुंभी’ अथवा ‘शतकोटी’ असेही म्हणतात.

५) लोहचुंबकाचे फिरण्याने उत्पन्न होऊन एका भांड्यात साठवली जाणारी ती ‘हादिनी’ वीज. वीज साठवण्याच्या भांड्याला हूद (Storage Battery ) म्हणतात.

वशिष्ठ, अगस्त्य व भारद्वाज यांनी विजेच्या शास्त्रांवर ग्रंथ लिहिले आहेत. विमानशास्त्रांवर नारायण, वाचस्पति, शौनक, गर्ग व भारद्वाज यांचे ग्रंथ आहेत.

वरील माहिती श्री कृष्णाजी विनायक वझे (१८६९ – १९२९) यांच्या लेखातून घेतली आहे. श्री कृष्णाजी विनायक वझे हे इंजीनिअर होते. त्यांनी सिंधमधील सिंधू नदीवर सक्करचे प्रसिध्द धरण बांधले,  त्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ’रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. पुढे लो. टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्रज सरकारची पदवी परत केली व स्वत:ला भारतीय शिल्पशास्त्राच्या संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक भारतीय प्राचीन वास्तु शिल्प शास्त्रांच्या ग्रन्थांचा अभ्यास केला. पण दुर्दैवाने त्यांचे बरेचसे लिखाण आज काळाच्या उदरात गडप झाले आहे. सध्या त्यांचे केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या या संशोधन कार्यात ज्या प्राचीन ग्रन्थांचा अभ्यास केला ती यादी केवळ पाहिली तरी  थक्क व्हायला होते. त्यातीलही बरेचसे ग्रन्थ आज नष्ट झाले आहेत.  पण जे आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन त्यावेळी आपला समाज किती प्रगत होता याविषयी सांगताना श्री वझे म्हणतात की, “ गेल्या ३० वर्षात संस्कृत ग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावर भौतिक शास्त्रमय शिल्पात हिंदुस्तानात किती ज्ञान होते याबद्दलचा  एक निबंध मी इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला. मी आपल्या माहितीसाठी येथे इतकेच सांगतो की, वाफेच्या यंत्राखेरीज बहुतेक आधुनिक शिल्प (मशीन्स) आपल्याकडे एकेकाळी होती असे मला आढळून आले आहे.” 

आजच्या शिक्षण पद्धतीविषयी श्री वझे म्हणतात की, ” इंग्रजी राज्य हिंदुस्थानात आल्यावर इंग्रजानी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे इंग्रजी ज्ञान व त्याचा फैलाव हिंदुस्थानात झाला. तशातच सरकारी नोकऱ्यात ज्ञानापेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य प्राप्त झाल्याने प्राचीन हिंदू ज्ञानाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की, भारतात विचार करण्यासारखे ग्रंथच नाहीत व सर्व उत्तम ज्ञान काय ते पाश्चिमात्यांकडेच आहे, अशी मोठ्या समजल्या जाणाऱ्यांची समजूत झाली. ज्याप्रमाणे वेदांतात हेगेल, कांट, शोपेनहार, प्लेटो, सॉक्रेटिस, मिल, ह्यूम यांच्या वेदांताचे जितके व जसे शिक्षण दिले गेले, तसे पतंजली, कणाद, जैमिनी, बादरायण यांच्या वेदांताचे दिले गेले नाही. हीच अवस्था इतर विषयांच्या बाबतीतही झाली.”  ज्यांनी मोठमोठी राज्ये चालविली, किल्ले, कालवे, इमारती, पूल वगैरे बांधले, सूक्ष्म विचार करण्यात ज्यांची बुद्धी फार कुशाग्र अशी ज्यांची ख्याती, असे लोक भौतीक शास्त्रांशिवाय राहिले कसे ? अशी सहज येणारी शंकासुद्धा या पंडितांना आली नाही..

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 1 ☆ 

(©️doctor for beggars )

एप्रिल चा पहिला आठवडा ! 

रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता. नाही म्हणायला पोलीस जागोजागी… ! 

मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर … माझं काम रस्त्यावरच !

लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, मग भले ती झोपडपट्टीत का असेनात, त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं…!  ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं. आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं. तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. 

फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो. मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद… ना भिक्षेकरी… ना भक्त !

—मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली. ही माझ्या ओळखीची नव्हती. कपडे ब-यापैकी नीटनेटके… ! 

भिक्षेकरी वाटत नव्हती…!  मग ही इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली. मी जवळ गेलो… 

हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 

मला आश्चर्य वाटलं… भिक्षेकरी तर वाटत नाही…मग हात का पुढे करावा हिने ? 

वय असेल साधारण 70-75 वर्षे. डोईवरचे सर्व केस पांढरे, डोळे खोल गेलेले, चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं… हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं… !  या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे, चेह-यावर अजीजी, करुण भाव … !

‘आजी इथं का बसलाय ?’ मी विचारलं. 

‘काही नाही, बसल्येय हो देवळाच्या दारात, आपण पोलीस आहात का?  बोलणं मृदु आणि स्वच्छ !

माझी खात्री झाली, आजी भिक्षेकरी नाही. 

तरीही तिला म्हटलं, “ देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता. बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात, बघितलं ना मी…”

तिनं चमकुन माझ्याकडं पाहिलं, डोळ्यात पाणी तरारलं… पण बोलली काहीच नाही. 

“ उठा आजी असं उघड्यावर बसू नका, सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी…कुणी येणार नाही काही द्यायला “. मी पुन्हा बोललो. 

ती ओशाळली, म्हणाली, “ तसं नव्हे हो ! जाते मी इथुन …. कुणी येणार नाही काही द्यायला…काय करणार नशीबच फुटकं…! “—-मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 

ती उठली… जायला निघाली.— मनात नसतांनाही ती जायला उठली, पण तिला थांबायचं होतं अजून— माझ्याकडं तिनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. 

मलाच वाईट वाटलं. म्हटलं, “आजी, मी डाॕक्टर आहे, काही औषधं लागत असतील तर सांगा, दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा…!  पण कुणाला भीक मागायला लागू  नये यासाठी मी काम करतोय, शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात…आणि …”

ती चालता चालता थबकली, वळून हसत म्हणाली…” चांगलं घर , वाईट घर असं पण असतं का ?”

“ नाही तसं नव्हतं म्हणायचं मला…” मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

ती हसली; काहीतरी विचार करुन म्हणाली, “ केळी आहेत का तुमच्याकडे ? “

मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही, तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती, हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते…! 

मानसिक रुग्ण असावी का ?—– उलगडा होईना. उत्सुकता अजुन चाळवली. 

मी तिच्या मागं गेलो, म्हणालो “ आजी… काय झालं… इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का… ? “ 

“ मला केळी द्याल…? ” पुन्हा तिनं भाबडेपणानं विचारलं.

मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, “ आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ” 

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ महात्मा गाँधी जन्मदिवस विशेष – महात्मा गाँधी और विश्व शांति के लिए अहिंसा ☆ श्री अरुण कुमार डनायक

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है. पर्यटन आपकी एक अभिरुचि है।आज प्रस्तुत है श्री अरुण डनायक जी  का महात्मा गाँधी जन्मदिवस पर विशेष आलेख  “महात्मा गांधी और विश्व शांति के लिए अहिंसा ”)

☆ महात्मा गाँधी जन्मदिवस विशेष – महात्मा गांधी और विश्व शांति के लिए अहिंसा  

महात्मा गांधी की 152वीं जन्म जयंती के अवसर पर विश्व शांति की मंगलकामनाएं ।

महात्मा जी के मन में अहिंसा का जनआन्दोलन में उपयोग करने का विचार कब और कैसे  आया होगा? यह शोध का विषय है । लेकिन उनके अहिंसा संबंधी विचारों को विश्व ने माना, अनेक देशों के राजनेताओं ने अपने-अपने देश को गुलामी की जंजीरों से मुक्त करने अहिंसा के सिद्धांत को अपनाया, विभिन्न राजनीतिक विचारधारा के लोगों ने राज सत्ता के समक्ष अपनी मांगे रखने के लिए अहिंसक मार्ग को चुना, कर्मचारी संघठनों ने, प्रबंधन से चर्चा करने के लिए इसी मार्ग का सहारा लिया और सफलता पाई। यह ऐसे चंद उदाहरण हैं, जो गांधीजी की अहिंसा के सिद्धांत की, सर्वकालिक प्रासंगिकता को स्वमेव सिद्ध करते हैं । यहां तक कि  उनके विचारों के धुर विरोधी, दक्षिणपंथी और हिंसा में विश्वास रखने वाले भी लोग भी अहिंसा संबंधी गांधीजी के  विचारों का खंडन तर्क से नहीं कर पाते हैं और इसलिए वे उसका मजाक उड़ाने लगते हैं । ‘अहिंसा ने हमें कायर बना दिया’, ‘गांधी मार्गियों से थप्पड़ खाने के लिए अपना  गाल आगे करने’ की बातें, ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’, ‘चरखे ने आजादी दिला दी’  आदि ऐसे कुतर्क हम अक्सर सुनते रहते हैं।

अहिंसा को लेकर गांधीजी ने अपने विचार विभिन्न लेखों और अपने कार्य के माध्यम से  समय समय पर आम जनमानस के सामने रखे। लेकिन उनका समेकित स्वरूप हमें पढ़ने मिलता है, गांधीजी के बीज ग्रंथ ‘मंगल-प्रभात’ में । छोटी सी यह पुस्तिका हमें इस महामानव के एकादश व्रतों के बारे में विस्तार से बताती है और उसमें सत्य के बाद अहिंसा का स्थान है । शेष 9 व्रत नहीं दोनों सिद्धांतों पर आधारित हैं ।  

गांधीजी ने अहिंसा को कभी भी कायरों को अस्त्र नहीं माना ।  वे तो इसे आत्मबलिदान की भावना से प्रेरित, मानवता की रक्षा करने और अत्याचार का मुकाबला करने का एक ऐसा अचूक तरीका मानते थे, जो स्वयं को सर्वशक्तिमान समझने वाली तानाशाह, क्रूर, हिंसक राजसत्ता का मुकाबला करने के लिए डटी रहती है । गांधीजी राज्य की हिंसा को मानवता के लिए सबसे ज्यादा हानिकारक मानते थे ।  आम जनता, राज्य की हिंसा का मुकाबला, अपने सीमित संसाधनों से नहीं कर सकती है। यह विभिन्न देशों में  घट रही घटनाओं से , जिसमें विरोध का दमन करने पुलिस और सेना के निर्दयी बल प्रयोग और राजनीतिक विरोधियों को समाप्त करने  के लिए पुलिस द्वारा फर्जी मुठभेड़ का सहारा लेकर हत्या कर देना, प्रत्यक्ष रूप से सिद्ध हो जाता है। भूगोलीकरण के इस दौर ने अर्थतन्त्र को मजबूती प्रदान की है और अनेक लोगों को असीमित संपत्ति अर्जित करने का अवसर दिया है ।  ऐसे लोग आजकल राजसत्ता के नए हिंसक तरीके का शिकार हो रहे हैं । अपने विरोधी का दमन करने, संपत्ति धारकों से अधिक से अधिक धन वसूली की लिप्सा ने, सरकार ने उसके पास उपलब्ध सरकारी एजेंसियों के माध्यम से,  जांच व छापे मारने के दुरुपयोग को जन्म दिया है । यह  आश्चर्य का विषय हो सकता है कि छापे केवल राजनीतिक विरोधियों के ठिकानों पर क्यों पड़ते हैं ? और राज्य की ऐसी हिंसा, जिसके चंद उदाहरण ऊपर पढ़ने में आए हैं, के विरोध का एक मात्र तरीका अहिंसक मार्ग पर चलते हुए, उस दमनात्मक कारवाई के विरोध में, राजसत्ता के सामने डट कर खड़े  रहकर ही किया जा सकता है । गांधीजी की अहिंसा, हमें आत्मबलिदान की भावना के साथ, अन्याय का  मुकाबला करने की प्रेरणा देती है। वह हमें दमन स्थल से भागने के लिए नहीं कहती । डटकर मुकाबले में खड़े रहने की भावना वीरता और साहस का प्रतीक है । इसलिए अहिंसा कायरों का नहीं वरन आत्मबलिदानियों का मार्ग है । 

गांधीजी कहते थे कि अगर कोई एक गाल पर थप्पड़ मारे तो हमें दूसरा गाल आगे कर देना चाहिए, हिंसा का सहारा लिए बिना अपने सत्य पर अडिग रहना चाहिए । अहिंसक मार्ग पर चलने को उत्सुक ऐसे आत्मबलिदानियों के सामने, अंततः  हिंसक मनुष्य भी झुक जाएगा और वह हिंसा का परित्याग करने विवश हो जाएगा । गांधीजी मानते थे कि अपने सक्रिय रूप में अहिंसा का अर्थ है ज्ञानपूर्वक कष्ट सहना ! गांधीजी की अहिंसा, अन्यायी के आगे दबकर घुटने टेक देने की नीति नहीं है, वरन वह अत्याचारी की क्रूरतम मनोदशा  के आगे आत्मा की सारी शक्ति लगाकर विरोध करते रहने की भावना से ओतप्रोत है ।  और भारत के इस प्राचीन आदर्श का पालन करते हुए एक अकेला आदमी भी, अपने सम्मान,धर्म और आत्मा की रक्षा के लिए, किसी भी अन्यायी, यहां तक कि शक्तिशाली व बलशाली राजसत्ता, को भी चुनौती दे सकता है ।  ऐसे अहिंसक विरोध प्रदर्शन कर वह सुधार की नींव रख सकता है ।  गांधीजी जब अपने अनुयायियों को एक गाल पर थप्पड़ खाने पर दूसरा गाल आगे कर देने की शिक्षा देते हैं तब उनका मकसद होता है कि अहिंसक रहते हुए अन्याय का प्रतिकार करो, जुल्मी के आगे डटे रहो । यह तरीका हमने आजादी के आंदोलन में बार-बार कारगर होते देखा और सुना । विश्व भर की तानाशाह सरकारें भी  ऐसे विरोध प्रदर्शन के आगे अंतत: झुकने को विवश हो गई । यह तरीका त्वरित परिणाम नहीं देता पर जो परिणाम इस मार्ग पर चलकर प्राप्त होते हैं वे स्थाई होते हैं ।

‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ वे लोग मानते हैं जिन्होंने हमारे स्वतंत्रता संग्राम का इतिहास पढ़ा ही नहीं है । गांधीजी जब दक्षिण अफ्रीका से,  जनरल स्मिटज  की भेदभावपूर्ण नीतियों का अहिंसक तरीके से मुकाबला कर और अनेक ईसाइयों व मुस्लिम युवाओं, जिन्होंने उन  पर प्राणघातक हमले किए थे, का हृदय परिवर्तन कर, भारत वापस आए तो लोगों ने उनसे भारत की स्वतंत्रता में योगदान देने हेतु न केवल आग्रह किया वरन उनके तरीके को भी स्पष्ट करने को कहा ।  गांधीजी ने तब यह कहा था कि  अभी आगामी दो वर्षों तक वे भारत का भ्रमण करेंगे, जनता के विचार जानेंगे तब अपनी योजना सबके सामने रखेंगे । अपने देशव्यापी दौरे के बाद जब वे कांग्रेस के सामने प्रस्तुत हुए तो उन्होंने यही शर्त रखी की आजादी की लड़ाई अहिंसक तरीके से लड़ी जाएगी तभी वे इस आंदोलन का नेतृत्व करेंगे ।  भारत के लोगों से उन्होंने अहिंसा अपनाने इसलिए नहीं कहा की भारतीय कमजोर हैं, उनमें वीरता का अभाव है ।  गांधीजी को भारत के निवासियों के बल और उसकी वीरता का भान था और इसीलिए उन्होंने उन्हें अहिंसा के मार्ग पर चलने की सलाह दी । उनके आह्वान को देश भर से समर्थन मिला और तमाम विरोधों के बावजूद वे अगले तीस वर्षों तक भारतीय स्वतंत्रता संग्राम का नेतृत्व करते रहे ।  अपने नवोन्मेष तरीकों, राजनीतिक चातुर्य से अंग्रेजों और देश की विघटनकारी शक्तियों के नापाक इरादों को ध्वस्त करते हुए देश को आजादी दिलाने के अपने प्रयासों में  कामयाब हुए। उनके आंदोलनों ने उस वक्त  ब्रिटिश साम्राज्य को घुटने टेकने मजबूर कर दिया। और इसीलिए गांधीजी मजबूरी नहीं मजबूती का नाम है ।

चरखे को गांधीजी के स्वतंत्रता आंदोलन का ऐसा अहिंसक हथियार बना दिया जिसने न केवल ब्रिटिश अर्थव्यवस्था को चोट पहुंचाई वरन  भारत के करोड़ों गरीबों को दो जून की रोटी कमाने और खाने का आसान तरीका उपलब्ध कराया ।  चरखा और उससे सूत कातने को गांधीजी ने स्वराज प्राप्ति का साधन माना ।  उनके अनुसार जब अंग्रेज भारत छोड़कर चले जाएंगे तब देश को राजनीतिक आजादी मिलेगी लेकिन सच्चा स्वराज तो तभी आएगा जब हर हाथ को काम और दो वक्त  की रोटी शांति से खाने को मिलेगी । खादी और चरखा जिसका उनके रचनात्मक कार्यक्रमों में अभिन्न व महत्वपूर्ण स्थान था, वह केवल प्रतीक नहीं था I I एक आंकड़े के अनुसार 1940 में तीन लाख ग्रामीणों ने कताई, पिंजाई, बुनाई, आदि से लगभग पैतीस लाख रुपये की मजदूरी कमाई थी I चरखा और खादी उत्पादन  को वे ग्रामीण अर्थव्यवस्था की रीढ़ मानते थे । चरखे ने तो देश और विदेश में स्वदेशी की धूम मचा दी थी I तभी तो राजा से लेकर रंक तक ( महाराजा नाभा ने अपनी महारानी के साथ चरखा चलाना शुरू किया था तो नेहरूजी का परिवार भी सूत कातने लगा था ) सभी ने गांधीजी के आह्वान पर चरखा चलाना, स्वयं के काते सूत के कपडे पहनना शुरू कर  दिया था और जब गांधीजी द्वितीय गोलमेज कांफ्रेंस में भाग लेने लन्दन गए तो 26सितम्बर 1931 को लंकाशायर की कपडा मिलों के बंद हो जाने से बेरोजगार मजदूरों से भी उनकी मुलाक़ात हुई I मजदूरों को उनके चरखा आन्दोलन से शिकायत थी I लेकिन जब गांधीजी ने भारत के बुनकरों के बेरोजगार होने और उनकी गरीबी का कारण लंकाशायर की मिलों के कपडे को बताया तो बेरोजगार मजदूर भी उनके समर्थन में दिखे, तमाम अखबारों ने भारत की विदेशी परतंत्रता के युग मे चरखा व खादी को गांधीजी की मौलिक खोज बताने में परहेज नहीं किया। 

विश्व के अनेक देशों ने महात्मा गांधी की प्रतिमाएं अपने यहां  स्थापित की, मार्गों और सड़कों के नाम गांधीजी पर रखे गए, विश्व के समकालीन लेखक, साहित्यकार, कवि, राजनेता, फिल्मी कलाकार, पत्रकार, राजनेता उनसे मिलने सदैव उत्सुक रहते थे ।  नोबल समिति ने उन्हे शांति के लिए नोबल पुरस्कार न दे पाने पर अनेक बार खेद जताया और ऐसे अनेक लोगों को यह पुरस्कार दिया जिन्होंने गाँधीमार्ग से प्रेरणा लेते हुए मानवता के कल्याण के लिए सतत प्रयास किए ।

संयुक्त राष्ट्र संघ ने उनके सत्य, अहिंसा और सत्याग्रह के सिद्धांतों को मान्यता देते हुए उनके जन्म दिन को अंतर्राष्ट्रीय अहिंसा दिवस मनाने का संकल्प लिया ।  यह सब हम भारतीयों के लिए गर्व और गौरव का विषय है।       

©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares