मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 12☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

रोज वेगळा वेगळा प्रसंग समोर आ वासून उभा रहात असे. लातूर ते ढोकी पुढे कळंब रोड येडशी पर्यंत गाडीतही कत्तली होत होत्या. सर्वत्र अशांत व  अस्थैर्य असे  वातावरण होते. एकदा गोरा कुंभाराच्या समाधीचे दर्शन घ्यावे म्हणून निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बऱ्याच ठिकाणी हाडं आणि कवट्या पडलेल्या दिसल्या. मन बेचैन झालं.छोट्या उषा आणि प्रकाश यांना कशाचंच गांभीर्य नव्हतं. अज्ञानातच सुखी होते बिचारे! पाच वर्षाचा प्रकाश आईला कधीतरी विचारायचा “आई कापून काढतो, फुंकून टाकतो, म्हणजे काय ग” आई उत्तर न देता गप्प बसायची.  या तणावातच  घरातली म्हैस व्याली. दुभते सुरू झाले.  दोघांनाही म्हशीची काळजी वाटायची. पेटलेले रझाकार जनावरेही पळवत होते.मारत ही होते.कधी कधी  जोरजोराच्या  आरडाओरड्यांनी,  बंदुकीच्या आवाजांनी जनावरेही  घाबरायची. आणि ‘”शब्देविण संवादू ‘”,असं डोळ्यांनी बोलायची. आई तात्या दोघेही त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगावरून हात फिरवायचे.आई  इब्राहिमला म्हणायची , “का हो मारतात या जनावरांना? त्यांना का जात धर्म असतो? कसल्या चुकीबद्दल आणि कुठल्या न्यायालयातली ही शिक्षा? माणसांनीच स्वतःला धर्माच्या कोशात लपेटून घेतलंय”. आई रोज सकाळी मागचं दार उघडताना हात जोडायची, आणि आपली मुलं — जनावर सुरक्षित असल्याचे पाहून, परमेश्वराचे आभार मानायची.

काही प्रसंग असे आले की आईची अत्यंत अवघड परीक्षेची वेळ आली.एकदा मागच्या अंगणात  अत्यंत घाबरलेल्या, दहा-बारा मुसलमान बायका लहान मुलांना घेऊन आल्या. लहान मुलांच्यासाठी त्यांना दूध हवे होते.आणि काही वेळ आसरा हवा होता.मोठा बाका प्रसंग होता. आईला काहीच सुचेना.आसरा द्यावा तर फंदफितुरी होईल. पुन्हा विचार केला. या छोट्या निरपराध, यांचा काय दोष? यांना ना जात ,ना धर्म, ना अधर्म ! त्यांनी काय केलंय? घरात दूध असताना, उपाशीपोटी परत पाठवायची  शिक्षा, त्यांना का द्यायची? परस्पर विरुद्ध विचारांनी मनात हलकल्लोळ उठला. अखेर माणुसकी जिंकली.बापुड्या  जीवांना दूध  देऊन  मागच्या अंगणातून त्यांना लवकर परत पाठविले. असे  अनेक  वेगवेगळे प्रसंग !  तोंड देणे चालू होते.

कधीतरी एखादा गावकरी तात्यांकडे यायचा. ” तात्या काय करू, जित्राब उपाशी  हैत. लांडग्यांनी शेत कापून न्हेल की हो.” तात्या असेल त्यातला कडबा,  जात पातीचा विचार न करता  द्यायचे. कठीण प्रसंगात  दोघांनीही माणुसकी श्रेष्ठ ठरविली.

एके दिवशी रझाकारांनी तेरणा नदीवरील पूल उडवून दिला.एकवीस दिवस दोन्हीकडील संपर्क तुटला.दोन्ही कडून येणाऱ्या गाड्या पुढे न जाता , पुलापासूनच परत जायच्या. रेल्वेने येणाऱ्या पाण्याच्या टाक्या बंद झाल्या. कोणीही  ना आले ,ना गेले , चिठ्ठ्या, निरोप ,पत्र  काहीच नाही.आसपासच्या पाच सहा स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबांना  गावी पाठवलं होतं. अपवाद एकटी माझी आई, आणि उषा ,प्रकाश! वातावरण आणखीच तंग आणि गंभीर झालं  होतं.  तरीही आई हट्टानं तिथेच राहिली होती. इब्राहिम, रसूल, मोहम्मद पुन्हा पुन्हा सांगायचे. “हम नमक हराम  है ही नही। हम आपके खाये हुए नमक का हक अदा करेंगे।” असं ऐकलं की आईला थोडा धीर यायचा.

दोन्हीकडील सैन्याची कुमक वाढली. एक दिवस इब्राहिम तात्यांना सांगायला आला “.तुमची सरशी होणार आहे.निजामाचा प्रधान कासिम रझवी, पाकिस्तानात जायच्या तयारीला लागलाय.” ‘”दिव्याची ज्योत विझण्यापूर्वी मोठी होऊन मग शांत व्हावी”, तसे झाले.

दंगली करून कत्तली करून अनेकांनी हात धुऊन घेतले. अखेर निजाम शरण आला.हैदराबाद संस्थान खालसा झाले.शांतता पसरायला लागली. अत्यानंदाची लाट  वहायला लागली. इब्राहिम रसूल व मोहम्मद यांनी दिलेला शब्द मोठ्या मनाने पाळला. “आता राज्य तुमचंच आहे ,आम्ही आता जातो “असं म्हणून त्यांनी  ,आई तात्यांच्या  पायावर डोके ठेवून नमस्कार केला. उषा आणि प्रकाश यांना जवळ घेऊन त्यांना प्रेमाने  खाऊ दिला. दहा महिने त्यांच्याशी सहवास झाला होता. जाताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.त्यांनी तात्यांना काळी फरची टोपी व टॉवेल दिला. आईनेही त्यांना साग्रसंगीत जेवायला वाढले. त्या काळातही, आई जाती-धर्म भेद न मानता माणुसकीची पूजा करीत होती. इब्राहिमने दिलेल्या काळ्या फरच्या टोपीचा पेहराव, तात्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळला.

इतक्या संकटातून स्टेशन सांभाळले, म्हणून ढोकी गावच्या लोकांनी तात्यांचा सत्कार केला. आदरसत्काराचे शब्द बोलताना, अनेकांना आनंदाश्रू येत होते. नवऱ्याच्या एकनिष्ठतेला बायकोने खंबीरपणाने व कणखरपणे दिलेली साथ ,प्राणिमात्रांची मुलांप्रमाणे घेतलेली काळजी, कठीण व तंग परिस्थितीत ,धर्म व जातीचा विचार न करता, सांभाळलेल्या माणुसकीच्या व्रताचे ‘ मूर्तिमंत उदाहरण’ म्हणून आईचा उल्लेख केला.शब्द ऐकताना  तिचा  ऊर भरून आला. कृतकृत्य वाटायला लागलं.

दोघेही आज हयात नाहीत पण त्यांनी माणुसकी व प्राणिमात्रांच्या सेवाव्रताचा दीप माझ्याकडे सुपूर्द केला आहे. .आता माझी इच्छा इतकीच आहे—-” दीप हा सांभाळुनी मी ठेविला. तेवती तत्जोती राहो उज्ज्वला.

——— समाप्त.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

व्रत म्हटले की साधारण स्रियांची व्रते डोळ्यासमोर येतात. पण पुढे जाऊन पुरूषांचीही,अगदी लहान मुलांची आभ्यासाची व्रतेही यामधे अंतर्भूत होऊ शकतात .अगदी आता सध्याच्या काळात कोणी अध्यात्माच्या माध्यमातून, मनोकायिक स्वास्थ्य ,आनंद,शांती ,समाधान प्राप्त करण्याच्या कलेच्या प्रसाराचे व्रत घेतले आहे. किती व्रते सांगावी तितकी कमीच .पण मला आज व्रतस्थ  अशा  माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या माणुसकीच्या व्रताचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो .काल व परिस्थिती अनुरुप त्यांचे व्रतही कमी लेखता येणार नाही.

माझे वडील, तात्या पूर्वीच्या बार्शी लाईट रेल्वे मार्गावरील  ‘ढोकी ‘या  स्टेशन वर ,स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते .भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा  होत होती. हैदराबाद संस्थानचा निजाम भारतीय संघराज्यात यायला तयार नव्हता. ‘ढोकी’ हे दोन्हीकडील सरहद्दीवरील स्टेशन! गावात आजूबाजूला, खेडोपाडी रझाकारांच्या धुमाकूळ चालू होता. गावागावातील पुढाऱ्यांना धमक्या येत होत्या. खूनही पडत होते. हिंदूंची ही आंदोलन चालू होती .तेही आक्रमक व्हायला लागले होते .सर्वत्र मारामाऱ्या, दंगे, जाळ पोळी  सत्र चालूच होते. गावचा पाटील, ‘ किशनदास गराडे ‘,धमकीने घाबरून साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. तेथूनही  तो सुटू शकला नाही. रझाकारांनी त्याच वेषात ओढत बाहेर आणून ठोकून काढले. खूप आरडाओरडा झाला .अखेर   खच्च. संपवला त्याला—. जाळपोळीही चालू होत्या. ‘जवळा’ नावाचे गावच्या गाव जाळून टाकले. अगदी खोपटी ही त्यातून सुटली नाहीत. मुक्या जनावरांसाठी ठेवलेल्या गंजीची जळून राख व्हायची. शेतात उगवलेली उभी  पिकच्या पिकं कापली जायला लागली. अनेकांनी आपले वैयक्तिक हेवेदावे ही यातच वापरून घेतले. हे सगळं सांगण्याच प्रयोजन काय तर अशा खडतर पण नाजूक वातावरणात , तात्या स्टेशनचे काम करीत होते एकनिष्ठेने, आणी  तणावपूर्ण परिस्थितीत,! स्टेशन सांभाळण्याच्या कर्तव्याचे व्रत घेऊन!

हे स्टेशन दोन्हीकडील लोकांना हवे असल्याने, ते सांभाळण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती .स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम हा फौजदार, रसूल आणि मोहम्मद हे हवालदार रुजू होते. तात्यांना इकडून, तिकडून सर्व नातेवाईकांकडून तारा येत होत्या. निरोप ,पत्र, चिट्ठया,—–नोकरी सोडून या. जीवावर उदार होऊन राहण्याची गरज नाही. इकडे दुसरे काहीही पाहू. सर्वांना काळजी वाटते .पण मोडल तर ते  व्रत कसलं? तात्या नोकरीशी एकनिष्ठता सोडायला तयार नव्हते. ते सतत आईला सांगायचे ‘मुलांना घेऊन तू माहेरी गणेशवाडीला ,नाहीतर सासरी जमखंडीला जा, या दंगलीत भडकलेली डोकी काय करतील सांगता येत नाही”. ती म्हणायची “आम्ही परगावी जाऊन काळजीत अर्धमेले होण्यापेक्षा सर्वांचंच  इथंच काय व्हायचे ते होऊ दे. आणि आपली गोठ्यातली  जनावरं ,कुत्री ,मांजर, हरीणी, शेळी  ही आपली मुलंच ना! त्यांचं काय करायचं? या सगळ्यांबरोबर मीही इथच राहणार.” असं म्हणून तात्यांना गप्प करायची. या मुक्या जनावरांवर दोघांचाही  खूपच प्रेम होत. त्यांच्या सेवेच जणू  व्रतच दोघांनीही घेतल होत. उतू नको, मातू नको घेतला वसा टाकू नको ही संस्कृती तिच्यावर बिंबलेली होती.

दररोज नवीन नवीन घटनांना सामोरं जावं लागत होतं. स्टेशन मध्ये   तात्या  काम करत असताना,  आप्पा पोर्टर कोणाशी तरी भांडत भांडत आत आला. तावातावाने बोलायला लागला. चिडलेल्या  रझाकारांनी  स्टेशन मध्येच त्याला कापून काढला. “मारू नका, मारू नका” तात्या सांगत होते. पण ” जास्त बोलाल तर  फुंकून  टाकू.” अस उत्तर आल. खुर्ची, टेबल ,वह्या सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडले. भयानक दृश्याला सामोरे जावे लागले. अधून मधून तात्यांना तारखांना निजामाबादला जावे लागायचे .तात्या स्टेशन मध्ये ,आई मुलांना,( छोटे उषा व प्रकाश) घेऊन घरात आणि जनावरं गोठ्यात सगळेच तणावाखाली राहात होते .इब्राहिम रसूल आणि मोहम्मद तिघेही सतत सांगत असत —

” चिंता मत करो ।जब तक हम है तब तक कोई आपका बाल भी बाका नही कर सकता”.। असं ऐकलं की थोडा धीर  यायचा.  पण तरीही पुन्हा कधीतरी मनात पाल चुकचु कायची. आपण जे अन्न खातो, तेच त्यांनाही द्यायची .अधून मधून काही ना काही देत रहायची. माणुसकी जपायची. तिघांनाही विशेषतः  इब्राहिमला  तात्यां बद्दल फार आदर होता. आपुलकी होती. कौतुकही होते. तात्यानाही, त्यांच्याबद्दल ओढ वाटायची .बाहेर घडणाऱ्या ( दोन्हीकडील) बारीक-सारीक गोष्टी तो  तात्यांना  येऊन सांगायचा.

क्रमशः ….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ५ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ५ ☆ 

जवळचे लोक मला नेहमी विचारतात, “  आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस—-?”  

मी खूप काही कमावलंय—–

—-आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं, हे पुत्रत्व मी कमावलं !

—-आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला, तो मायेचा हात मी कमावला …!

—-आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले, हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली…! 

—-शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले–”  I am proud of you my child “ हे शब्द — या शब्दांतुन child असणं मी कमावलं ! 

—-सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री विजय भटकर म्हणाले होते, “ मी कॉम्प्युटर बनवला, पण तू माणूस घडवतो आहेस— “ –मी हा “विजय” कमावला…!

—-विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते, ”  भारीच करतोय तु राव कायतरी, आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर… हा घे माझा पर्सनल नंबर–”  हा “विश्वास” मी कमावला… !

—-तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले… ! 

—-जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो… परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो… माणुस म्हणुन चेहरा मी कमावला… ! 

—” ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तू गमावलंस किती… ? “ 

— अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे —- 

—ह्या कामानं मी…’ मी ‘पणा गमावला ! 

—आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला !

—केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामामध्ये गमावला ! 

—स्वतःच्या चेहर्‍यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला !

—सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली—! 

पोरा – लेकरा-  बाळा या उबदार शब्दात मी  विसावलोय आता—-

मला खुर्चीपेक्षा — उकीरडा आवडायला लागलाय आता !

मला उष्टं… खरकटं… शिळं … आणि नासकं जेवण आवडतं हल्ली, आणि आवडत राहील

—-तोपर्यंत —– 

—-जोपर्यंत माझ्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत ! 

—-जोपर्यत माझा भिक्षेकरी कष्टकरी होत नाही तोपर्यंत !

—-जोपर्यंत तो गांवकरी होणार नाही तोपर्यंत ! 

—–माझ्या आईबापाला जेव्हा मी “ भिक्षेकरी “ या संबोधनापासून  स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल … !

मी तर सारा लेखाजोखा मांडलाय …

आता अजुन कमवायचं राहिलं काय… ? 

आणि गमवायचं राहिलं काय… ?

माय बापहो…तुम्हीच निवाडा करा… !

जयहिंद !!! 

15 आॕगस्ट 2021

——समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स

सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357 

ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com 

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? स र प्रा ई ज ! ?

सकाळचा नेत्र सुखद मॉर्निंग वॉक…… याच्या पुढचं, हे चौथे चं म त ग असल्यामुळे तुम्हांला एव्हाना पाठ झालेलं असणारच, अशा माझ्या खात्रीलायक (?) समजूतीतूनच आजच हे चं म त ग सादर करतोय !

तर नेहमीप्रमाणे सोफ्यावर पेपर वाचत, बोक्या सारखा (कोब्रा असल्यामुळे डोळ्याचा रंग त्याच्या डोळ्याशी मिळता जुळता असणारच!) तो जशी दुधाची वाट बघत बसतो तसा, एक डोळा किचनकडे ठेवून, बायकोच्या हातच्या पहिल्या गरमा गरम चहाची वाट बघत बसलो होतो ! पण दहा मिनिट झाली तरी जमीन हादरली नाही !  मग मीच पेपर पुन्हा पुन्हा उघडझाप करून त्याचा आवाज किचन मधे ऐकू जाईल इतपत करून बघितला !  तरी पण टाचणी पडून त्याचा सुद्धा आवाज ऐकू येईल इतकी किचन मधे शांतता ! आता हा pin drop silence आपल्या भाषेत कोणी आणला, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल, कारण माझ्या मते अशी एखादी टाचणी खरंच जमिनीवर टाकून, त्याचा कोणी आवाज ऐकला असेल, यावर शेंबड पोर पण विश्वास ठेवणार नाही ! असो ! साहेब जाताना ज्या अनेक गोष्टी सोडून गेला त्यातलीच त्याची ही एखादी पिन मागे राहिली असावी, असा आपला माझा अंदाज ! यावर पिना मारण्यात पटाईत लोकंच जास्त पिना, सॉरी (हा आणखी एक साहेबाने आपल्याला बहाल केलेला तोंडाचा दागिना !) प्रकाश टाकू शकतील, या विषयी माझ्या मनांत कसलीही शंका नाही ! तुम्हांलाच काही शंका असेल तर स्वतःच एखादी पिन टोचून, सॉरी, जमिनीवर पाडून तिचा आवाज येतोय का ते बघा आणि मला कळवा म्हणजे झालं !

आता चहासाठी बायकोला स्वतःहून बोलावण्याशिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नव्हता, कारण सकाळचा पहिला चहा पोटात गेल्याशिवाय पुढची ‘सगळीच आन्हीक शब्दशः अडकणार होती’ ! शेवटी, मी जशी रडणाऱ्या लहान मुलाची ज्या आवाजात समजूत काढतात, तो आवाज माझ्या गळ्यातून काढायचा प्रयत्न केला आणि “अगं ऐकलस का, मला जरा च…….” माझा हा उच्चारायच्या आत बायको कधी नाही तो ट्रे मधे चहा बरोबर, माझ्या आवडत्या गूड डेच्या बाजूला उपम्याची डिश अशा सरंजाम्यात माझ्या समोर हसत हसत हजर झाली ! काय सांगू तुम्हांला मंडळी, माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना ! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, with Rayban गॉगल अशी माझी अवस्था झाली ! “अहो, सॉरी हं !” बघा मगाशीच मी म्हटलं नां, साहेबाने दिलेला तोंडाचा दागिना, लगेच हिच्या मुखातून माझ्यासाठी कधी नव्हे तो पहिल्यांदा बाहेर पडला ! मी पण वरकरणी “अगं सॉरी कशाला म्हणायला हवं, रोज तू मला न मागता लगेच चहा आणून देतेस आणि आज एक दिवस उशीर…..” “देते हो, पण म्हटलं आज तुम्हाला थोडं ट्रे मधून surprise पण द्यावं, म्हणून उशीर झाला !”

आता मला सांगा, मी आज मला मिळालेल्या पहिल्या टीच्या, ट्रे ट्रीटमेंटच्या सरप्राईज मधून अजून सावरलो नव्हतो, तर बायको म्हणत होती तुम्हाला आज सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे म्हणून ! अरे बापरे, आता हे तिचं आणखी नवीन सरप्राईज माझ्या खिशातल्या पाकिटाला किती जड जाणार आहे, असा मनांत विचार करत “कसलं गं सरप्राईज ?” असं म्हणत चहाचा कप हातात घेऊन एक घोट घेतला आणि तोंडातून नकळत खरोखरचा “व्वा !” आला. त्याला कारण आजच्या चहाची चव खरंच अमृततुल्य होती ! माझा “व्वा” ऐकून बायकोने माझ्या मागे येवून माझ्या गळ्यात लाडाने हात टाकले ! “अगं मुलं मोठी झाली आपली आता आणि तू असं…” “आई येणार आहे पंधरा दिवस रहायला !” तिचे ते शब्द मी पीत असलेल्या गरम चहा सारखे माझ्या कानात गरमा गरम शिरले आणि मी “काय s s s s ?” असं तितक्याच गरम आवाजात उच्चारता झालो ! “म्हणजे ?” “अगं तसं नाही, मला ‘कधी’ म्हणायचं होतं, पण चुकून ‘काय’ असं आलं तोंडातून !” “मग ठीक आहे !” असं म्हणत ती माझ्या समोर येवून बसली. माझा शब्दखेळ बहुतेक तिच्या पचनी पडला असावा असं समजून मी परत एकदा “कधी येणार आहे आई ?” असं जमेल तितक्या मऊ मुलायम स्वरात तिला विचारलं. “या पंधरा तारखेला आणि तीस तारखे पर्यंत परत जाणार आहे !” बायको मला आनंदाने सांगती झाली. “अगं पण तेंव्हा तर आपण दोघ महाबळेश्वरला जाणार आहोत !” मी पुडी सोडून दिली. “काय s s s ? हे कधी ठरलं, तुम्ही मला काहीच सांगितलं नाहीत महाबळेश्वरच्या या आपल्या प्लॅन विषयी !” “तूच नेहमी सरप्राईज द्यायच असं थोडंच आहे, कधीतरी या पामराला तो चान्स मिळू दे की !” मी हसत हसत गुगली टाकली.

त्यावर लटक्या रागाने खूष होऊन बायको मला विचारते कशी “हे मधेच काय तुम्ही महाबळेश्वरचे काढलंत आणि ते सुद्धा मला मेलीला जराही थांगपत्ता न लागू देता ! अगदी कमालच झाली बाई तुमच्या या अनोख्या सरप्राईजची !” “अगं कमाल वगैरे काही नाही ! बँकेने नवीन हॉलिडे होम बांधलं आहे महाबळेश्वरला आणि पेन्शनर लोकांना पण त्याचा स्वस्तात लाभ घेता येतो असं परवाच मला लेल्या म्हणाला.” “असं होय, नाहीतर सिझनमधे तिथल्या हॉटेलात रहाणं म्हणजे कठीणच होतं आपल्याला.” “अगं म्हणून तर चांगल पंधरा दिवसाचं बुकिंग केलय आपल्या दोघांच !” “नाही, पण बुकिंग confirm आहे नां आपल्या दोघांच ?” “म्हणजे काय, तू काळजीच करू नकोस, बिनधास्त लगेच तयारीला लाग !” असं म्हणून उरलेला चहा मी संपवला आणि ओला नारळ आणि कोथिंबीरीने सजलेली उपम्याची डिश हातात घेतली ! ते बघून, “मी आलेच हं आईला फोन करून !” असं अत्यानंदाने घोषित करून बायको बेड रूम मधे पळाली पण ! ते बघून मी सुटकेचा निश्वास टाकला. आता तुम्ही मला विचाराल सुटकेचा निश्वास का टाकला तुम्ही ? तर काय सांगू तुम्हांला मंडळी, आमच्या सासूबाई म्हणजे मोठं खटलं आहे ते ! अतिशय कर्मठ, या कलियुगात पण सोवळ ओवळ पाळणाऱ्या, इतकं की सकाळी अंघोळ झाल्याशिवाय कुणीही चहाच काय, पाणी पण प्यायचं नाही असा त्यांचा दंडक ! या वरून तुम्हांला कल्पना येईल की मी सुटकेचा निश्वास का टाकला ते !

मी बायको आत गेल्याचे बघून उपम्याचा पहिला घास घेणार इतक्यात, बायको हातात मोबाईल घेऊन बाहेर आली आणि मला म्हणाली “अहो आईचा नंबर बदलला आहे का ? लागत नाहीये !” “अगं मला कसं माहित असणार तुझ्या आईचा नंबर बदलला असेल तर ? ती तुलाच आधी सांगेल नां ?” त्यावर थोडं वैतागून मला म्हणते कशी “अहो माझ्या आईचा नंबर मला तोंड पाठ आहे, तो अजिबात बदललेला नाही, कळलं ? मी तुमच्या आईचा मोबाईल नंबर बदलला आहे का असं विचारत्ये ?” मी पण तेवढ्याचं शांतपणे तिला म्हटलं “नाही गं, माझ्या आईचा पण जुनाच नंबर आहे, कळलं ! अगं पण माझ्या आईचा मोबाईल नंबर कशाला हवाय तुला ?” यावर ती तितक्याच थंडपणे मला म्हणाली “अहो असं काय करता, तुमची आई येणार होती नां आपल्याकडे पंधरा दिवस रहायला ? पण आता आपण तेंव्हा तर महाबळेश्वरला असणार, मग तिला तसं सांगायला नको का, आत्ता येऊ नका, नंतर कधीतरी या म्हणून ?” तीच ते बोलणं ऐकून, माझ्या पहिल्या वहिल्या उपम्याच्या घासाचा चमचा, माझ्या ओठाजवळ येता येता, हवेतल्या हवेत राहिला आणि बायकोच्या या कुटील सरप्राईज मुळे त्याच अवस्थेत मी फक्त बेशुद्ध व्हायचा बाकी राहिलो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिचारी आजी – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

 ☆ विविधा ☆ बिचारी आजी – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

नातवंडांच्या शाळेत ग्रँड पेरेंट्स डे होता. त्यामुळे आजी- आजोबा मोठ्या उत्साहानं मुलाकडं जायला निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ ,नातवंडांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके, इतर सटरफटर वस्तू… आजोबांच्या सूचना डावलून आजीबाई सामान वाढवतच चालल्या होत्या. गाडी सुरु झाली तशी आजोबांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मुलाच्या घरी पोहोचता क्षणीच ,”आजी- आजोबा” म्हणत चार बाल हातांनी त्यांच्या कमरेला विळखा घातला.’सुख- सुख म्हणजे वेगळं काय असतं!’ विचारानं दोघेही गहिवरली. नवे- नवे कपडे, खेळणी यात गुरफटलेल्या नातवंडांना इकडे तिकडे बघायला फुरसतच नव्हती .

दुसऱ्या दिवशी नातवंडांच्या कार्यक्रम बघून त्यांना खूप धन्यता वाटली. डान्स ,गाणी, फनी गेम्स स्पर्धा त्यांनी सगळं खूप एन्जॉय केलं.

” छान ,अगदी दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम होता नाही? किती स्मार्ट असतात हल्लीची मुलं, नाही तर आपल्या वयाच्या लोकांचं बालपण….” आजी म्हणाल्या. आजीच्या म्हणण्याला आजोबांनी ही दुजोरा दिला.

पुढच्या दिवशी मुलांचे आई बाबा गेले ऑफिसला. मुलांना गॅदरिंग संपल्याची सुट्टी होती आणि आजी आजोबा घरी असल्याने लालन-पालनमधे… (पाळणा घराचे नाव)… जायचा पण प्रश्न नव्हता. आजोबा पेपरात डोकं घालून बसले आणि आजींचा आवडता टाइमपास सुरू झाला…. टीव्ही सिरीयल बघण्याचा…, ‘नवऱ्याची बायको’ चालू होतं! शनायाशी गुरुचं लग्न लागत होतंआणि राधिकाचं रडणं सुरू होतं. थोरला नातू जवळ येऊन बसला होता. “आजी ती गर्ल का रडतेय ?ती त्या अंकलची वाईफ आहे का? मग तो दुसऱ्या गर्लशी लग्न का करतोय ?..म्हणजे तो गुरु अंकल बॅड बॉय आहे का?”प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

” हो रे बाबा, “आजी टीव्ही वर टिकवलेली नजर न काढता उत्तरली… ‘ठाय्-ठाय’ टी.व्हीवर खोट्या खोट्या गोळ्या झाडत तो पळून गेला.

मुलगा सुनेला कामापुढे टीव्ही बघायला वेळच नसायचा. आणि नातवंडांना लालन पालन मधे फक्त बेबी टीव्ही, किंवा छोटा भीम या सारख्या मालिकाच दाखवायचे ,ते पण थोडाच वेळ !  

रात्री आजीने कोणती तरी राजा राणी ची मालिका लावली होती. थोरला- धाकटा दोघंही बघायला बसले…  आणि त्यांचे प्रश्न सुरु झाले ,”आजी हाअंकल कोण आहे ?”  ..”राजा चंद्रसेन.”..” ती क्वीन आहे का..?”..”हो .”आणि ती दुसरी गर्ल?..ओह! ती पण क्वीन ?..”एक किंगच्या दोन-दोन क्विन ?”नातवंडांचे प्रश्न !

“अरे पौराणिक ,ऐतिहासिक अशा पूर्वीच्या काळात एका राजाच्या दहा दहा पण क्विन्स असायच्या. “आजोबांनी नको तेव्हा नाही ती माहिती पुरवली. “ओ माय गॉड!” दोघं एक सुरात ओरडली, “आजी म्हणजे तो चंद्रसेन किंग,तो पण बॅड बॉय आहे का त्या गुरुसारखा?”

बिचाऱ्या आजीला उत्तर सुचले नाही. तेवढ्यात थोरला म्हणाला , “आजी हे नको बघायला. त्यापेक्षा क्रिकेट लावूया.” चॅनल बदलून क्रिकेट, न्यूज वगैरे बघण्यात नातवंडं आणि त्यांचे आई-बाबा गुंग झाले.

क्रमशः….

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समृद्ध मराठीतील समृद्ध पडणे ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? वाचताना वेचलेले ?

☆ समृद्ध मराठीतील समृद्ध पडणे ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

झाडावरून पडलो 

मागे पडलो

प्रेमात पडलो

परीक्षेत कमी पडलो

इलेक्शन मध्ये पडलो

रणांगणात पडलो

धंद्यात पडलो

धंद्यात पडलो – ( नुकसान झाले )

दारू पिऊन पडलो

मी जरा पडलोय

दुसऱ्याच्या कमी पडलो

यात मी का पडलो बाबा ?

संभ्रमात पडलो

याला टक्कल पडलं बघ

कारभारात पडलो

काळाठिक्कर पडलो

कुठून चौकशीत पडलो कळत नाही

डोक्यावर पडला आहेस का ?

चेहरा पडला

टिपूर चांदणं पडलंय

अध्यात्मात पडलो

पदरात दान पडलं

चंद्राला खळे पडलंय

देवाच्या पायी पडलो

मला विसर पडला

माझे शेअर्स पडले

बायकोची गाठ पडली 

 

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ३ ☆ 

मित्र म्हणायचे, “ काय बे आब्या , उतरली का रे मस्ती तुजी ? साल्या, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, तू  मोटा तीसमारखान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ?  एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता, नोकरी सोडून जो शहाणपणा केला आहेस—भोग त्याची फळं… त्याच लायकीचा आहेस xxxx तू … ! ”

——ही  xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी … !——-ही शिवी मी मनात जपुन ठेवलीय—–फ्रेम करुन– आणि या फ्रेमवर मी खूप प्रेम करतो ! 

——मी पूर्ण डिप्रेस झालो होतो, डिप्रेस करणारे माझेच होते…!

——बुडण्याचं दुःखं नसतं—-मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही– याचंही दुःखं मुळीच नसतं—पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !

मी या दुःखात बुडुन गेलो !  

तरीही निर्लज्जासारखं मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये  मी रोज रोज जायचो. 

नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो, त्यांच्या पोटभर शिव्या खायचो, रात्री झोप लागायची नाही, कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं…. ! 

——हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 31 महिने चाललं—–! 

एकेदिवशी, अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर 24 वर्षे पडलेले एक आजोबा दिसले.  त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे. त्यांचं सर्व ड्रेसिंग करून, त्यांना स्वच्छ करून 

“आपलं घर” च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं. 

–या बाबांना  पूर्ण माणसात आणलं….!  ते गेले,  तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले——!

भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं… ! 

यानंतरही या भिक्षेकर्ऱ्यांनी  मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या—- !

—आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं…!—- 

“ यार … हे सालं आपल्यातलंच हाय… ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय … ! “

—–इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला 31 महिने गेले होते—आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो—-! 

—-हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासून परवानगी दिली. 

आॕगस्ट 2015 ते मार्च 2018 अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो—! 

हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता… खडतर होता… ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच वर्षे झुंज द्यावी लागली. 

या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे,  जेवत असे, खात असे—! 

भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच  वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली—- !

—–भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात—-MPSC आणि UPSC पेक्षा अवघड !  यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!! 

—–आणि मग साधारण एप्रिल 2018 पासून माझं “ डॉक्टर फाॕर बेगर्स “ म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. 

डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार – पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो, आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते. 

मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो !— होय—-मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो… ! 

——–ही पदवी एकदा हातात पडल्यानंतर मात्र, मी मागं वळून पाहिलंच नाही.

आम्ही आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे—-

बिन बाळंतपणाची मनिषा… आई झाली त्यांची ! 

लगीन झालेली बाई सर्व गोष्टीं आपल्या नव-याला, नाहीतर आपल्या बापाला सांगते..

——–सांगायला अभिमान वाटतो की, आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे. 

मला विचारल्याशिवाय आज  कोणतीही गोष्ट यांच्यात होत नाही—- यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो. यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात—! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात—पण आज भिक्षेकरी पोरी मला नि मनिषाला त्यांच्या आई अगोदर आम्हाला सारं सांगतात —–

पोरी मलाच बाप समजाया लागल्या—-आईशप्पथ –मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा पण बाप झालो—-! बापापेक्षा पोरगी वयानं मोठी… पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं… आणि नात्याला वय नसतं !

भिक्षेक-यांच्या  शंभराहून अधिक  पोरांची नावं आज “अभिजीत” आहेत—पन्नासहून अधिक पोरींची नाव आज “मनिषा” आहेत… !

——कोणताही  पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं !

क्रमशः…..

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विदारक तरीही ?? ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ विदारक तरीही ?? ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

परंपरा या नावाखाली आपण बऱ्याचदा सारासार विवेकबुद्धी हरवतो आणि भले -बुरे याचा विचार न करताच परंपरेशी बुद्धी गहाण ठेऊन एकनिष्ठ रहातो, मनाला न पटले तरी मनाचा दगड करतो, ज्या समाजात फुले, आगरकर, कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक आयुष्याची होळी करून गेले असले तरी !

परवा एका नातेवाईकांच्या घरी माती सावरणेच्या प्रसंगाला गेल्यावर मन पेटून उठवणारा पण हतबलता लक्षात येऊन मन विषण्ण झाले तो प्रसंग असा..नवरा कावीळ ने गेला लग्न होऊन अवघे दोन वर्षे झालेले, लग्न जोडीदार याचा अर्थ कळायच्या आतच मुलीवर हा प्रसंग, त्यातच मुलगी शामळू, भित्री, नुकतेच कॉलेजचे शिक्षण संपवून हात पिवळे झाले, हळदीचा रंग अजून फिकट व्हायचा होता तोपर्यन्त तिच्यावर आलेला हा प्रसंग ती कोलमडली या अनपेक्षित धक्क्याने, मानसिक अवस्था बिकट झाली, ती नुसतं रडतच होती … विधिलिखित  कुणी बदलू शकत नाही, हेच खरे !तिसरा दिवस …नातेवाईक गोळा झाले, नैवेद्य भरला अन …अन तो प्रसंग आला कुणाही स्त्रीच्या आयुष्यात येऊ नये असा …तिचं अहेव लेण उतरून नैवेद्यावर ठेवण्याची घाई ..कुणी जायचे मंगळ सूत्र तोडायला ? कुजबुज वाढली ..”आवरा …”पुरुषमंडळी बाहेरून ओरडत होती …इतक्यात एक विधवा वृद्धा धीर धरून पुढे आली …खरेच किती विदारक हे …पहिले मंगळसूत्र ….ती मुलगी तोंड लपवून हुंदके दाबत होती तिचा श्वास घुसमटला …ते चित्र मला पाहवेना ..मी उठले न जमलेल्या सर्व जमावाला उद्देशून म्हणले, ” खरेच याची गरज आहे का ?? आपण सगळे सुशिक्षित आहात मग का अश्या पद्धतीने मंगळसूत्र तोडत आहात ? मुलीची मानसिक अवस्था तर पहा ! “

क्षणभर एकदम स्तब्धता पसरली माझं बोलणं अनपेक्षित होतं …कुजबुज सुरु झाली …”ही कोण ?काय करते ?” बऱ्याच स्त्रियांना विचित्र वाटले त्या विचित्र नजरेने पाहू लागल्या, पण मला फिकीर नव्हती .”ठीक तुमची मर्जी … ” एक पुरुष बोलला पण मंगळसूत्र तोडलेच, जोडवी उतरली, बांगडी फोडली अन नैवेद्य असा सजून गेला .गर्दीतली एक बाई उठली अन माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाली, “बाई माझे …मनातलं गं बोललीस …लाखातलं एक …”अन ती धाड धाड रडू लागली जणू त्यांच्या ठसठसत्या वेदना मी आज मुक्त वाहू दिल्या होत्या !

पण माझं विचारी मन अस्वस्थ झालेय, राहून राहून प्रश्न पडतो, की आपण आज शिकलो, प्रगत झालो, पण अश्या परंपरेच्या मानसिक गुलामीतून का मुक्त होऊ शकत नाही ? का अजूनही स्त्रीला जबरदस्तीने अहेव लेण उतरून ठेवायला लावले जाते ? का नवऱ्याच्या आत्म्यालाही या सगळ्यांची आवश्यकता असते ?? बऱ्याचदा ग्रामीण  भागात असे चित्र दिसते, शेतकरी कामकरी महिलांची पायांची बोटे कष्टाच्या कामाने रापतात जोडवी करकचून फिट्ट झालेली असते, आणि ती सहजा सहजी निघत नाहीत, अशात ज्या महिलेवर असा प्रसंग ओढवलेला असतो तिला हा प्रसंग नको, ते लेण उतरवायला नको असे वाटत असते, ती अंग चोरते, तोंड लपवते आणि जोडवी हिसकावून काढताना जखमा होतात किती विचित्र ! कोणतीही स्त्री परंपरेच्या विरुद्ध सहजासहजी जात नाही मग तिला जेव्हा ते उतरावे वाटेल तेव्हा ते उतरून द्यायची मुभा का नसावी ? समाजातील हे चित्र आता तरुणानीच बदलायला हवे , (कारण स्त्रिया दुःखामुळे पतीवरील प्रेमामुळे असा निर्णय नाही घेऊ शकत )

चंद्रकोर कपाळी मिरवून शिवबाचे पाईक आहोत हे दाखवण्यापेक्षा विचारांचे जरूर पाईक व्हावे, आठवा, शिवरायांनी आपल्या मातेला सती जाऊ दिले नव्हते ! प्रत्येकाने आपल्या नातेवाईक महिलांवर असे प्रसंग आले तर अश्या निरर्थक प्रथेला विरोध करायला हवा, पहिला दगड कुणीतरी उचलल्याशिवाय समाजाला आत्मबल आणि आत्मभान येणार नाही होय ना ??

आठवावे, मंगळसूत्र घालतानाचा विधी किती पवित्र, शुभ मुहूर्त पाहून केला जातो ! मग ते काढताना इतका विदारकपणा अन अमानुष पणा अन भयानकता का ?? कोल्हापूर जिल्ह्यातील एका थोर विचारवंताने आपल्या पत्नीला सांगून ठेवले होते की ‘त्यांच्या माघारी पत्नीच्या आचरणात कोणताच बदल न व्हावा अन अहेव लेणी, कुंकू  तसेच ठेवावे ‘

माणूस किती शिकला याला महत्त्व नाही तर त्याचे आचरणात किती शिक्षितपणा आहे हेच महत्वाचे नाही का ??

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

तुलना(Comparison) 

श्वेताने एका तासात १० किमी अंतर कापले. आकाशने तेच अंतर दीड तासात पूर्ण केले. 

दोघांपैकी तंदुरुस्त कोण? किंवा कोणाचा फिटनेस चांगला? 

अर्थात सर्वांचे उत्तर श्वेता असेल. 

श्वेताने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले तर आकाशाने दगड-मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर ???

मग सर्वांचे उत्तर आकाश असेल. 

पण जेव्हा आम्हाला कळले की श्वेता ५० वर्षांची आहे तर आकाश २५ वर्षांचा आहे ?? 

मग सर्वांचे उत्तर पुन्हा श्वेता असेल. 

पण आम्हाला हे देखील कळले की आकाशचे वजन तब्बल १४० किलो आहे तर श्वेताचे वजन ६५ किलो आहे. 

पुन्हा सर्वांचे उत्तर आकाश असेल 

जसे आपण आकाश आणि श्वेताबद्दल अधिकाधीक माहिती मिळवतो, तसे तसे कोण चांगले आहे याबद्दल आपली मते भिन्न होतात आणि निर्णय बदलतात.

जीवनाचे वास्तवही असेच आहे. आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि घाईने आपले मतं तयार करतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही. 

प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळतात. 

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. 

प्रत्येकाची साधन-संपत्ती भिन्न आहे. 

प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. 

प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे आहेत. 

प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे.

म्हणूनच आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी तुलना करण्यात नाही तर स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात,  एकमेकाशी वादविवाद व तुलना करणं टाळा तुम्ही जसे आहात तसेच रहा आणि तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत रहा. निरोगी रहा, समाधानी रहा, हसत रहा, भगवंताच्या भक्तीत राहा, प्रामाणिक प्रयत्न करत रहा.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स : 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆  15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग २ ☆ 

दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.

15 ऑगस्ट 2015 ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता, अंगावरची झूल काढली होती. मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी ! 

आज बरोबर या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली, म्हणून साधारण सहा वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे——

वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली व्हायची,  म्हणून भीक मागणा-या  समूहासाठी मी काम करायचं ठरवलं. 

ते तर गेले… पण त्यांच्यासारखे अजून खूप आहेत—त्यांतल्या एखाद्याला हात देवू, या विचारांतुन—-! 

या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून मग मी रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.  

सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती. मी भीक मागणाऱ्यांमध्ये  मिसळायचा प्रयत्न करु लागलो. 

सुरूवातीला लाज वाटायची…!  डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.  

मुखवटा लावला होता… ! 

पण मला भीक मागणा-या  लोकांनी त्यांच्यात सुरुवातीला येवू दिलं नाही.  त्यांना वाटायचं, हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन … ! (कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं )

किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा …!– डाॕक्टर आहे हा xxx—गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल, रक्त विकेल, अजून काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल— यांत आपण मरुन जाऊ—-या डॉक्टरचा भरवसा काय ? 

किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल,  फसवुन “धंद्याला” लावेल.  (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो— शरीर विक्रय करणा-या  या ताईंमध्ये माझी उठबस होती. काही लोकांना वाटायचं, हा माझा “धंदा” आहे, आणि मी मधला दलाल ! भीक मागणाऱ्या समुहामध्ये हाच गैरसमज पसरला होता)—-

या सर्व गैरसमजापोटी, या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातली, धमक्या दिल्या, शिव्याही दिल्या. खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले, काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे…! मी त्यांच्यात येवुच नये, यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे ! 

मी पूर्णपणे निराश झालो होतो. या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं…

मी पूर्णपणे निराश झालो ! 

धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली. कुत्रं तरी बरं, त्याला कुणीतरी हाड् म्हणत  का होईना, तुकडा तरी टाकतं… मला ते ही मिळेना ! 

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणून नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते– नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो… ! 

या काळात भिक्षेक-यांपेक्षा  वाईट अवस्था झाली माझी ! मी खरोखरचा बेरोजगार, बेनाम  झालो होतो… 

14 आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेऊन आदरानं भेटायला यायचे —– 

15 आॕगस्ट नंतर भिक्षेकरी पण मला हाकलून द्यायचे… माझ्यावर थुंकायचे ! 

किती विरोधाभास !

लाखोंचा पगार थांबल्यामुळे, माझं घर डबघाईला आलं—- कालचा साहेब, आज भिकारी झाला !

एका रात्रीत रावाचा रंक होतो… आणि रंकाचा रावही होवू शकतो… ही म्हण मला माहीत होती… ! 

मी रावाचा रंक झालो होतो.  त्या काळात, एका भिका-याचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं … !

—अशा परिस्थितीत, डॉक्टर मनीषा धावून आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तिनं निभावलं !

 तिने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला… 

—आई-वडील डॉक्टर पी. डी. सोनवणे आणि सौ भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला. 

—माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला…!

—-पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो… ! आर्थिक आणि मानसिक !  

त्यातही मी रस्त्यांवर फिरायचो — भिक्षेक-यांत…. 

आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे—- 

“ काय हो, महाराष्ट्र प्रमुख, आज रस्त्यावर कसे काय तुम्ही…?”  खी.खी.. खी… हसत  लोक टोमणा मारायचे… !

“ एसी हाफीसात बसणारे तुमी… आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा … आरारारा…. वाईट वाटतं बुवा तुमचं… खी..खी… खी…! “ 

“काय वो सर… आज भिका-यांत बसले तुम्ही…? काय पाळी आली राव तुमच्यावर…  खी..खी… खी…!”  

“ कशाचा सर रे तो …? खी..खी… खी…”

——ही   खी… खी… खी… मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!

मात्र या खी… खी… खी…ने माझे इरादे अजू न मजबूत केले ! 

क्रमशः….. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares