मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “माझे वाचन” – लेखिका: शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझे वाचन खूप वेगवेगळ्या विषयांवर, पण फार विस्कळीत असते. माझ्या बेडसाईड टेबलवर एकाच वेळी चार ते पाच तरी वेगवगळ्या विषयांवरची आणि वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तके असतात, आणि थोडे हे पुस्तक, थोडे ते पुस्तक असे चाखत माखत वाचन सुरु असते. फक्त मंदिर स्थापत्य, भारतीय वस्त्रकला आणि एकूणच कला हे तीन आवडीचे आणि अभ्यासाचे विषय सोडले तर माझे वाचन बरेचशे बेशिस्त, अघळपघळ आणि विस्कळीत आहे, बट समहाऊ, इट वर्क्स फॉर मी!

आता हेच बघा ना, शंकर रामाणींची कोकणी कविता मला थेट माझ्या बालपणीच्या गोव्यात घेऊन जाते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला गोव्याच्या खाऱ्या वाऱ्याचा गंध आहे, तिथल्या तांबड्या मातीचा रंग आहे, तिथल्या जाई-सुरंगीचा परमळ आहे आणि तिथल्या आठवणींची आंबटगोड अमूरपिकी चव आहे. आता हीच, छोटीशीच कविता पहा ना,

खंयचो हो गांव?

पांचवेंचार सेम

अपरूपाचे ब्रह्म

चंवरता.

 

पालवली वात ;

फांतोडेची भूल

उजवाडाचो धुल्ल

म्हज्या दारां.

पहिल्या वाचनात ही कविता अगदीच साधी वाटते; पण थोडं थांबून विचार केला तर कळतं की रामाणी कुठली अध्यात्मिक जाणीव कवितेत जिवंत करू पाहतात.

‘खंयचो हो गांव? ’ हा प्रश्न साधा नाही, आपण कोण? कुठले? कुठे उभे आहोत? हे विचारणारा हा साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आयुष्याच्या ज्या वळणावर कवी उभा आहे, तिथे तो स्वतःलाच हा प्रश्न विचारतोय. पांचवेंचार सैम/अप्रूपाचे ब्रह्म ह्या ओळीत कवी आधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो. सैम म्हणजे निसर्ग, जो स्वतःच जणू अप्रुपाचं ब्रह्म आहे. सगळं निसर्गचक्र एकमेकांत गुंफलेलं आहे. माती, पाणी, उजेड, वारा, आणि मानवी जीवन सारं एकाच धाग्यात ओवलेलं. समुद्राच्या पाण्यात अदृश्य रूपात मीठ असावं तसं हे ब्रह्मरूप आहे. म्हटलं तर हा साक्षात्कार सोपा आहे, पण जीवन इतकं सोपं, सरळ नसतं.

‘फांतोडेची भूल’ हा किती अचूक शब्द वापरलाय रामाणींनी. आयुष्यात किती तरी वेळा आपल्याला चकवा लागतो, पहाटेच्या धुक्यात पुढ्यात पुढ्यात रस्ता असूनही आपण कधी कधी चुकीच्या वाटा धरतो. ‘उजवाडाचो धुल्ल म्हज्या दारां’, म्हणजे प्रकाश आहे, पण तो स्वच्छ नाही. प्रकाशाचा धुरळा आहे. सत्य आपल्या पुढे आहे, पण ते स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी नजर आधी स्वच्छ करावी लागते. मला रामाणींची कविता भाषेचं साधं सौंदर्य आणि तरीही त्या कवितेला व्यापून उरलेली एक प्रकारची अध्यात्मिक गूढता ह्यासाठी आवडते.

‘देखणा देहान्त जो’ हे वनिता पटवर्धन ह्यांचे पुस्तक सर्वांगाने मृत्यूविषयी भाष्य करते. जरा वेगळा विषय आहे, पण अध्यात्मिक, साहित्यिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेतलेला मृत्यूचा धांडोळा वाचनीय आहे. तसेही कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला मृत्यू ह्या संकल्पनेबद्दल एक सुप्त आकर्षण असतेच.

नितीन वैद्य Neeteen Vaidya हे फेसबुकवरचे माझे एक आवडते लेखक. ते मुखत्वे पुस्तकांविषयी लिहितात. त्यांच्या वाचनात कमालीचे सातत्य आणि शिस्त आहे, जी बघूनच माझी छाती दडपून जाते. इतक्या शिस्तीने मी काहीच करू शकत नाही, पण ‘वाचून उरणारी पुस्तके’ हे त्यांचे त्यांच्या वाचनप्रवासाबद्दलचे पुस्तक खरोखरी छान आहे. ते म्हणतात तसे ‘पुस्तके तुम्हाला वेगवेगळ्या शक्यतांच्या तिठ्यावर आणून सोडतात’.

भैरप्पांचे सार्थ हे माझ्या अतीव आवडीचे पुस्तक. आठव्या शतकातल्या भारताचा प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक पट वाचकांपुढे उलगडणारे हे पुस्तक मी कितीही वेळा वाचू शकते. आता एक दीर्घ लेख लिहिण्याच्या निमित्ताने कितव्यांदा तरी परत वाचून काढले. भैरप्पांच्याच जास्त लोकप्रिय असलेल्या आवरणचं प्रिक्वेल म्हणून प्रत्येकाने सार्थ वाचावं असं मला वाटतं. भारताच्या ऱ्हासकाळाची सुरवात सार्थ मध्ये नोंदली गेली आहे तर मध्य आवरण मध्ये.

ह्यातलं ‘आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी’ हे पुस्तक इतर पुस्तकांहून वेगळं आहे. बचत, गुंतवणूक आणि खर्च ह्या तिन्ही संकल्पनांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारं हे पुस्तक पैश्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. जवळचा पैसा खर्च करणं म्हणजे फक्त नोटा मोजून एखादी वस्तू विकत घेणे नव्हे, तर आपण पैसे केव्हा, कसा आणि कशावर खर्च करतो ह्यातून आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या प्राथमिकता परिभाषित होतात हेच हे पुस्तक विविध उदाहरणे देऊन सांगतं. पैशाला नाकारायचं नाही, तुच्छ लेखायचं नाही पण त्याला आपल्या आयुष्याचा राजाही बनवायचं नाही हेच हे पुस्तक सांगतं. अनुभवांवर, शिक्षणावर, आरोग्यावर, नात्यांवर केलेला खर्च ही उधळपट्टी नसते, ती आपल्या आयुष्यात केलेली गुंतवणूक असते हा महत्त्वाचा धडा हे पुस्तक देतं.

ही सगळी पुस्तकं एकाच वेळी वाचताना मला असं जाणवत होतं ही पुस्तकं वेगवेगळी असली, तीन वेगवेगळ्या भाषांमधली असली तरी कुठेतरी ह्या सगळ्या पुस्तकांना जोडणारा एक अदृश्य धागा आहे, तो म्हणजे वाचक म्हणून माझा दृष्टिकोन. रामाणींच्या कवितेतला “खंयचो हो गांव? ” हा प्रश्न, भैरप्पांच्या लेखनातून उमटणारी इतिहासाची जाणीव, वनिता पटवर्धनांची मृत्यूकडे पाहण्याची शांत, थेट नजर, नितीन वैद्यांचे ठासून सांगणे की पुस्तके मित्र असतात, जगण्याला आधार देतात पण जगावं मात्र आपल्यालाच लागतं आणि मॉर्गन हौसेलची पैशाकडे बघण्याची प्रगल्भ समज हे सगळंच शेवटी वाचक म्हणून आपल्यालाच आपली ओळख नव्याने करून देतं.

वाचन शिस्तीत करता आलं तर आनंदच आहे, पण तसं ते नसलं तरी जिवंत असावं लागतं. थोडं असं, थोडं तसं, कधी विस्कळीत, कधी नेमकं, पण सतत आपल्याला घडवत राहणारं. जसं समुद्राच्या वाऱ्यात मीठ असतं, तसं या सगळ्या वाचनात वाचक म्हणून आपल्या अनुभवांचं, आठवणींचं आणि जाणिवांचं एक सूक्ष्म पण कायम राहणारं अस्तित्व असतं. आणि मग लक्षात येतं, शंकर रामाणी शोधत असलेलं ‘गांव’ हे बाहेर नसून, या सगळ्या शब्दांमध्ये, त्यातून मिळणाऱ्या अनुभूतींमध्ये, स्वतःच्या आतच कुठेतरी शांतपणे वसलेलं आहे.

लेखिका:शेफाली वैद्य

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुंड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गुंड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

 चांगले लोकही आंधळे जाहले

फालतू वागले कावळे जाहलें

संगती भोवल्या नासल्या भावना

भोग भोगायचे सोहळे जाहले

 *

गुंतले ते असे लाभल्या यातना

जाणते शाहणे वेंधळे जाहले

 *

सापळे मांडले कोंडली माणसे

भक्त सारे कसे बावळे जाहले

 *

धर्म आहे कुठे राहिला चांगला

कर्म आहे इथे पांगळे जाहले

 *

साधना संपली वासना जागली

पाप ही हासले सोवळे जाहले

 *

बंधने संपली कायदे मोडले

गुंड आता पुन्हा मोकळे जाहले

 *

रंगल्या बातम्या संपली तीवृता

ढोंग आता किती कोवळे जाहले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

दुर्गाबाई दामोदर चाफेकर 

२२ जून… हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील धगधगते पान! त्या पानावरील होमकुंड म्हणजे आपल्या सशस्त्र क्रांतीने पेटविणा-या चाफेकर बंधूंच्या अभिमानास्पद योगदानाचं तेजाळलेलं दर्शन!!

१८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्लेग कमिशनर कॅप्टन रॅंड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर गोळ्या झाडून केलेला वध! ही घटना इतिहासातील पानावर कोरली गेली. नंतर १८ एप्रिल १८९८ रोजी मोठे बंधू दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. स्वातंत्र्य यज्ञात बलिदान दिलेला हा हुतात्मा!!

पण… त्याच होमकुंडात, समिधा म्हणून सतत स्वतः ला समर्पित करत राहिलेल्या… पण साधा नामोल्लेख च काय पण… साधं नाव देखील माहीत नसलेल्या अशा… उपेक्षित आणि अलक्षित स्त्रियांपैकी एक… स्वातंत्र्यवीराची पत्नी… दामोदर चाफेकरांची अर्धांगिनी *दुर्गाबाई*!!

दुर्गाबाई पिंपरी जवळील *मेंढ-याचे तळे* येथील होळकर घराण्यातील! एक हसरी, मिश्किल स्वभावाची मुलगी! गाणेही उत्तम गात असे. सणासमारंभात जमलेल्या नातेवाईकांना एकत्र करून नाच-गाणी करत असे. थोडक्यात काय तर एक हसता-खळाळता, उत्फुल्ल, निर्मळ निर्झर! अतिशय नाजूक अशी बाला! गंमत म्हणजे तिला शीळ देखील वाजवता येत असे.

ही अशी भरभरून जगणारी दुर्गा, १७ व्या वर्षी दामोदर चाफेकर यांच्याशी विवाह संपन्न होऊन चाफेकरांच्या घरात मोठी सून बनून प्रवेशली आणि दुर्गा… दुर्गा *बाई* बनली… आणि बघता-बघता तिच्यातली अल्लड, खेळकर, खुशमिजाज दुर्गा तिच्या बाईपणाच्या कोशात गुरफटून जणू अस्तित्व हीन झाली. दामोदर रावांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या प्रवाहाविरुद्ध न वाहता, त्याच प्रवाहात स्वतः ला पूर्णपणे सामावून घेत, जीवन प्रवाह वाहता ठेवला तिनं!

दामोदर चाफेकरांना फाशी झाली. दुर्गाबाई आणि धोंडीराम नामे त्यांचा पुत्र मागे राहिले. दामोदर चाफेकरांचे, चाफेकर बंधूंचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर झाले. पण इतिहासात अशा प्राणांची आहुती देऊन अमर झालेल्यांच्या कुटुंबियांचे… पत्नी, मुलांचे काय झाले असेल, हा विचार ही आम्हां आयते स्वातंत्र्य उपभोगणा-यांच्या मनात ही येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

रॅंड आणि आयर्स्ट चा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत… दोघांच्याही श्रीमतींना आणि मुलांना स्पेशल, वार्षिक पेन्शन सुरू झाले. ऑन ड्युटी मारले गेले म्हणून खास वाढीव दराने पेन्शन सुरू झाले. पण…

दामोदर चाफेकर… जे… खरं म्हणजे देशासाठी ड्युटी करून फासावर चढले, त्यांच्या पाठीशी घरी राहून ऑन ड्युटी राहूनही, दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलाला कोणतेही पेन्शन मिळाले नाही. १८९७ मध्ये त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या १९५६ पर्यंत… म्हणजे ६० वर्षे जगल्या. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही त्या ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले, ना, पती स्वातंत्र्य सैनिक असल्याचे ताम्रपट मिळाले!

हीच ती खरी खंत! विचार करावा अशी बाब!! शेवटी होमकुंडात किती आणि कोणत्या समिधा जळल्या… कुणी पाहिल्या ना????

*ज्या प्रबला निज भाव बलाने*

*करिती सदने हरिहर भुवने*

*देव -पतिना वाहिनी सुमने*

*पाजुनी केशव वाढविती*

*परी जयांच्या दहनभूमीवर,

नाही चिरा नाही पणती…

* तेथे कर माझे जुळती!!

– लेख क्र. २.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनातले आभाळ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🙏 मनातले आभाळ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मनी दाटल्या आभाळाला

कधीतरी मोकळे करा,

डोह दुःखी आठवांचे

नित्य नेमाने रिते करा!

मनी दाटल्या आभाळाला

फिरू दे मुक्त आभाळी,

लादू नका तुमची घुसमट

तुम्ही त्याच्या कपाळी!

 *

मनी दाटल्या आभाळाला

नका घालू तुम्ही वेसण,

करून त्या मोकळे ढाकळे

करा साजरा रोज सण!

 *

मनी दाटल्या आभाळाला

भरू दे स्वतः आपले रंग,

कुवत त्याची जोखा तुम्ही

ते समर्थ रचण्या अभंग!

ते समर्थ रचण्या अभंग!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २५ आणि २६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २५ आणि २६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २५ – – 

मना वीट मानू नको बोलण्याचा ।

पुढे मागुता राम जोडेल कैचा?

सुखाची घडी लोटता दुःख आहे ।

पुढे सर्व जाईल काही न राहे ।।२५।।

अर्थहे मना, माझ्या या बोलण्याचा—एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा—तू कंटाळा मानू नकोस. कारण तसे झाले तर ज्या भगवंतप्राप्तीसाठी तू प्रयत्न करीत आहेस, तो राम तुला कसा प्राप्त होईल? या संसारात सुख-दुःखाचे चक्र अखंड सुरू असते. सुखाचा क्षण संपला की दुःख येतेच. आणि शेवटी ज्याला तू सुख मानतोस तेही नाश पावणारेच आहे—काहीही शाश्वत राहात नाही.

विवेचनया श्लोकात समर्थांची लोककल्याणाची विलक्षण तळमळ पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते. आपण वारंवार सांगत असलेला उपदेश ऐकून लोकांना कंटाळा येऊ शकतो, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच ते प्रेमाने सांगतात—

माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस.

आपल्या व्यवहारातही असेच घडते. कोणी आपल्या हितासाठी एखादी गोष्ट सांगितली, उपदेश केला तर तो आपल्याला लगेच पटत नाही. उलट, आपले भले व्हावे या उद्देशाने स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीबद्दल अनेकदा नकारात्मक मत तयार केले जाते—

“तो खूप स्पष्टवक्ता आहे”, “तो नेहमी नकारात्मकच बोलतो”, “त्याचे ऐकले तर व्यवहार कसा करायचा? ”

परंतु सत्य हे असे आहे की अप्रिय पण हितकारक बोलणारा माणूस दुर्मिळ असतो, आणि त्याचे ऐकणारा त्याहूनही दुर्मिळ!

संसारात सुख आणि दुःख यांचे चक्र अखंड चालू असते. सुखाचा काळ संपला की दुःख येणारच—ही अटळ गोष्ट आहे. एखादा माणूस मोठ्या पदावर पोहोचतो—आमदार, खासदार किंवा मंत्री होतो. पण त्या सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याऐवजी तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. सत्तेची नशा चढते. परंतु एक दिवस सत्ता जाते, आणि त्याला वास्तवाला सामोरे जावे लागते.

एखाद्या उद्योगपतीचा भरभराटीला आलेला व्यवसाय अचानक तोट्यात जातो. जोपर्यंत सुख आपल्या वाट्याला असते, तोपर्यंत आपण त्यातच रमून जातो. त्या सुखात इतके गुंततो की परमेश्वराची आठवणही होत नाही. आपल्याला वाटते—हे सुख कायम राहील.

परंतु हे सर्व प्रारब्धावर अवलंबून असते. जसे सुख आपल्या कर्मानुसार मिळते, तसेच दुःखही भोगावे लागते. सुख-दुःखाचे हे चक्र, जन्म-मरणाचा हा फेरा—कोणालाही टाळता येत नाही.

म्हणूनच, जर आपल्याला या चक्रातून मुक्त व्हायचे असेल, तर परमेश्वराशी नाते जोडणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जो कोणी आपल्याला सत्य, श्रेयस्कर आणि हितकारक मार्ग दाखवेल, त्याचे बोलणे कंटाळा न करता ऐकणे गरजेचे आहे.

अर्थात, अशी शिकवण संतच देऊ शकतात. समर्थांसारख्या संतांच्या वचनांमध्ये गूढार्थ, अनुभव आणि करुणा दडलेली असते. त्यांचे प्रत्येक शब्द आपल्याला योग्य दिशेने नेणारे असतात.

खरा साधक कधीच त्यांच्या बोलण्याचा कंटाळा करत नाही; उलट तो त्या मार्गावर निष्ठेने चालत राहतो.

स्वसंवाद :: 

  • माझ्या हितासाठी कोणी सत्य सांगितले तर मी ते खुलेपणाने स्वीकारतो का?
  • सुखाच्या काळात मी परमेश्वराला विसरतो का, की त्याचे स्मरण ठेवतो?
  • सुख-दुःख हे क्षणभंगुर आहे याची जाणीव ठेवून मी जीवनाकडे पाहतो का?
  • संतांचे किंवा हितचिंतकांचे मार्गदर्शन मी मनापासून ऐकतो आणि आचरणात आणतो का?

 – – – – 

श्लोक क्र. २६ – – 

देहे रक्षणाकारणे येत्न केला ।

परी सेवटी काळ घेऊनि गेला ।

करी रे मना भक्ती या राघवाची ।

पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ।।२६।।

अर्थ : मनुष्य आपल्या देहाचे रक्षण व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतो, त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी काळ (मृत्यू) त्याला घेऊन जातोच. म्हणून हे मना, तू राघवाची भक्ती कर आणि मनातील संसाराची (भवाची)चिंता सोडून दे.

विवेचनमागील श्लोकात समर्थांनी सुख-दुःखाच्या चक्राचे वास्तव आपल्यासमोर ठेवले. या श्लोकात त्याच विचाराला पुढे नेत ते देहाभिमानाचे वास्तव आपल्यासमोर मांडतात.

आपण आयुष्यभर देहाच्या रक्षणासाठी झटत असतो. देहबुद्धी इतकी प्रबळ असते की देहसुखालाच आपण खरे सुख मानतो. शरीराला आनंद मिळावा म्हणून माणूस विविध भोग-विलासात रमतो. काही जण तर केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा हाच जीवनाचा उद्देश समजतात.

पूर्वी चार्वाकांनीही “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” असा भोगवाद मांडला होता. आज अनेकजण नकळत त्याच विचारसरणीचा स्वीकार करताना दिसतात.

पण येथे समर्थांचा हेतू देहरक्षणाला नाकारण्याचा नाही. देहाची काळजी घेऊ नये असे ते म्हणत नाहीत. उलट, देह ही एक मौल्यवान देणगी आहे.

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्”. शरीर हेच धर्मसाधनेचे पहिले साधन आहे.

म्हणून देहाची योग्य काळजी घेणे आवश्यकच आहे. निरोगी आयुष्य जगणे, जीवनाचा आनंद घेणे हेही चुकीचे नाही. परंतु याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की हा देह नश्वर आहे आणि एक दिवस तो सोडून जावेच लागणार आहे.

वेदकाळातील ऋषींनीही आपल्या निरोगी दीर्घायुष्याची कामना केली, पण मिळालेल्या त्या आयुष्याचा उपयोग त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी आम्ही करणार आहोत असे स्पष्ट सांगितले.

आपल्या जीवनात आपले काहीतरी ध्येय असते. आस्तिक व्यक्ती परमेश्वर प्राप्तीसाठी झटते तर नास्तिक किंवा बुद्धिवादी मंडळी मानवसेवा, समाजसेवा, वैज्ञानिक प्रगती यासारख्या गोष्टींना आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात. परंतु बरेचदा आपण मात्र ध्येय बाजूला ठेवून देहासाठीच अधिक वेळ खर्च करतो.

माणूस स्वतःच्या देहाबरोबरच संसाराची, घरदाराची, मुलाबाळांची चिंता करीत राहतो. पण प्रारब्धानुसार जे घडायचे ते घडणारच असते. म्हणून समर्थ सांगतात

– – – “करी रे मना भक्ती या राघवाची”

श्रीरामाबद्दल बोलताना समर्थ नेहमी “या राघवाची” भक्ती करावी असे म्हणतात. त्यांचे आराध्य दैवत असलेला श्रीराम जणू त्यांच्यासमोर उभा आहे. त्या राघवाची असे ते कधीही म्हणत नाहीत. समर्थांसाठी श्रीराम हे केवळ तत्त्व नाही, तर सजीव अनुभव आहे. जणू समोर उभा असलेला ईश्वर!

म्हणूनच ते आपल्याला सांगतात की बाबारे, संसाराची चिंता करण्याऐवजी मनाला राघवाच्या स्मरणात गुंतव. एकदा का मन त्याच्याकडे लागले, की मग संसाराची चिंता आपोआप कमी होत जाते. आणि हळूहळू अशी भावना दृढ होते की राम कर्ता आहे, सर्व काही त्याच्याच कृपेने घडते आहे.

अशी श्रद्धा निर्माण झाली की मन हलके होते, चिंता निवळते आणि जीवन अधिक शांत, समाधानी बनते.

स्वसंवाद :: 

  • मी माझ्या देहाची काळजी घेताना त्यालाच अंतिम सत्य मानून चालतो का?
  • जीवनाचे खरे ध्येय लक्षात ठेवून मी देहाचा उपयोग करतो आहे का?
  • संसाराच्या चिंतेत मी इतका गुंततो का की परमेश्वराचे स्मरण विसरतो?
  • माझ्या मनाला राघवाच्या नामस्मरणाची सवय लागली आहे का?

– क्रमशः श्लोक २५ आणि २६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ यांची वेगळीच भाषा.. ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? यांची वेगळीच भाषा.. ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

या पिवळ्या रंगाची

बाई वेगळीच भाषा

सोनियाच्या रंगीरंगे

रोज उगवती दिशा!!

*

चाफा पिवळ्या रंगात

मंद गंधाळ बोलतो

रंग घेऊनी पिवळा

शेवंतीत विसावतो!!

*

पित गुलाबाची तऱ्हा 

आता कशी वर्णू बाई

करी मोकळी पाकळी

गंघ वारीयाला देई!!

*

मंद गंध या फुलांचा

चित्तवृत्तीला तजेला

या पिवळ्याचे कौतुक

पुरे करते आजला!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अवकाशाचे अंतटोक… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अवकाशाचे अंतटोक ☆ श्रीशैल चौगुले ☆

कवेत पर्वत घेण्या

मी पर्वत होऊन जावे

त्या स्वर्गधुक्यात न्हाता

आयुष्य हे निसर्ग व्हावे.

या शिव निलनभास

स्पर्शून निळकंठ व्हावे

विसरुन या विश्वाला

पंख घेऊन विहारावे.

हे हात रिकामे साथी

भासे कुठेतरी हा त्याग

हा जन्मसुखी सोहळा

या धरतीवर पुण्य राग.

हिमशिखराशी भाव

मन भक्तीमोही अतुल्य

एक शिवाची निर्मीती

मानवा पवित्र नि अमुल्य.

अमोद किरणे कोटी

देहास छेडती ही प्रभात

उभा असा साधू जैसा

ओंकार नादाचा प्रपात.

संपून हे माया कोष

अवकाशाचे अंत टोक

श्वासात अखंड वेद

सहा ऋतूंचे देव लोक.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खळाळ रक्ताचा… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

खळाळ रक्ताचा ☆ प्रा. भरत खैरकर 

स्वप्नांची ओढूनी शाल

पाषाणाशी घेतली उरभेट

माथ्यावरचे आभाळ धरण्या

चढलो घाटांवर घाट!

 *

अखंड वेदना पेलतांना

झुंजायाचे बळ आले

तुटल्या पंखानी भरारतांना

पंखाखाली आभाळ निळे!

 *

शमता खळाळ रक्ताचा

पेलताना चढावाचे आव्हान

अधांतरी अंतरीचा झुला

तुटे कंठातील मधुतान!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २३ – – – 

न बोले मना राघवेवीण काही ।

जनी वाऊगे बोलता सुख नाही ।

घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।

देहांती तुला कोण सोडू पाहतो ।।२३।।

अर्थ : हे मना, एका राघवाशिवाय म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. तू इतर व्यर्थ बडबड केलीस तर तुला जे पारमार्थिक सुख अपेक्षित आहे ते मिळणार नाही. काळ क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करीत असतो. जर या काळात परमेश्वराचे नामस्मरण करणे राहून गेले, तर अंतकाळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही.

विवेचनमागील श्लोकात समर्थांनी आपल्या हितासाठी श्रीरामाचे नाव चित्तामध्ये दृढ धारण करावे असा उपदेश केला. या श्लोकात त्याच विचाराचा विस्तार करत ते आपल्या मनाला बजावतात की हे मना, एका रामाशिवाय तू दुसरे काही बोलू नकोस. कारण इतर गोष्टी बोलण्यात खरे सुख नाही. काळ कोणासाठीही थांबत नाही. तो कोणाचाही अपवाद करत नाही. क्षणाक्षणाला तो आपले आयुष्य कमी करीत असतो आणि एक दिवस असा येतो की अंतिम क्षणी तो आपल्यालाही सोडत नाही.

समर्थांना आपल्या कल्याणाची किती तळमळ आहे हे या श्लोकातून जाणवते. आपले जीवन म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य भेट आहे. पण या जीवनामध्ये ज्याने आपल्याला ही सुंदर देणगी दिली त्या परमेश्वरालाच आपण विसरतो आणि निरर्थक बोलण्यात आपले आयुष्य वाया घालवतो.

बोलण्यात आपली मोठी शक्ती खर्च होत असते. अनेकदा बोलण्यामुळे जेवढा शीण येतो, तेवढा एखादे श्रमाचे काम केल्यामुळेही येत नाही. एखादा वक्ता जर दोन-तीन तास सतत बोलत राहिला तर त्याला किती थकवा येतो हे त्यालाच ठाऊक असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही हा अनुभव वारंवार येत असतो.

परंतु समाजात आपण पाहतो की बरीच मंडळी व्यर्थ बोलण्यात वेळ घालवतात. चौकात उभे राहून गप्पा मारणारी तरुणांची टोळकी, कट्ट्यावर बसणारे लोक, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र जमलेली मंडळी या सगळ्यांच्या चर्चांना कोणताही विषय चालतो. एकदा बोलायला सुरुवात झाली की कोणत्याही विषयावर अखंड बोलत राहणे ही सवय बनते. यात वेळेचा आणि शक्तीचाही अपव्यय होतो.

अति बोलण्याची सवय वृद्धापकाळात त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी घरातील लोकांनाही ती माणसे नकोशी वाटू लागतात. बोलायला कोणी नसते आणि त्यामुळे मनात निरर्थक दुःख साचत जाते. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या काळात टीव्हीवरील चर्चा, भडक बातम्या किंवा निरर्थक वादविवाद यांकडे लक्ष देण्यातही आपला बराच वेळ खर्च होतो. परंतु साधकाच्या दृष्टीने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही.

आपले खरे हीत साधायचे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्या नामाला विसरून आपण कितीही इतर गोष्टी बोलत राहिलो, तरी ती व्यर्थ बडबडच ठरते. त्यामुळे खरे सुख मिळत नाही. येथे सुख म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल असे म्हणता येईल.

नाम घेण्याची सवय जर आयुष्यभर अंगवळणी पडली नाही, तर अंतकाळी ते सहजपणे आपल्या मुखात येणार नाही. संतांना माणसाचे कल्याण व्हावे याची प्रचंड तळमळ असते. म्हणूनच संत गोंदवलेकर महाराज देखील आपल्या प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात की तुम्ही रामनाम घ्या.

समर्थ रामदासांचाही कळकळीचा हाच संदेश आहे. जीवनाचा एकही क्षण व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण करा.

स्वसंवाद :: 

  • वेळ, शक्ती आणि आयुष्य वाया घालवणाऱ्या व्यर्थ चर्चांपासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो का?
  • माझ्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण कितपत आहे?
  • आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मी तो अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो का?

– – – – 

श्लोक क्र. २४ – – 

रघूनायकावीण वाया शिणावे ।

जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।

अहंता मनी पापिणी ते नसो दे |२४|

अर्थ: हे मना, एका रामाला सोडून केलेली सगळी कामे व्यर्थ आहेत. भगवंताला विन्मुख झालेल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यर्थ बडबड (वोसणावे) करू नये. त्या बाष्कळ बडबडी ऐवजी भगवंताचे नाव मुखात असू दे. अहंकार हा अध्यात्मामध्ये फार मोठा शत्रू आहे. त्याला मनात थारा देऊ नकोस.

विवेचन: समर्थांना मानव जातीच्या कल्याणासाठी वाटणारी तळमळ ही एखाद्या मातेसारखी आहे. आपल्या मुलाचे कल्याण व्हावे म्हणून ती त्याला जरी आवडत नसले तरी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचप्रमाणे समर्थ मागील श्लोकातीलच गोष्ट या ठिकाणी पुढे विस्तारून सांगतात. आधीच्या श्लोकात मनाला राघवाशिवाय काही बोलू नकोस कारण व्यर्थ बोलण्यामध्ये सुख नाही असे त्यांनी सांगितले आहे. या श्लोकात हीच गोष्ट ते वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात.

भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य आहे. शिणलेल्या मनाला शक्ती देण्याचे, उभारी देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आपण जर खऱ्या सुखाचा शोध घेत असू तर भगवंताच्या नामाइतके सुख कशातच नाही. अन्य सुखे तात्पुरती आहेत आणि अंतिमतः दुःख देणारीच आहेत हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी भगवंताचे नाम असावे असे त्यांचे सांगणे आहे.

शब्द किंवा भाषा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये केवढी शक्ती असते हे जेव्हा आपण अधिकारी व्यक्तींच्या साहित्याचे वाचन करतो किंवा त्यांचे बोल ऐकतो तेव्हा लक्षात येते. बोलण्याला वाचाशक्ती असेही आपण म्हणतो. हे सरस्वतीचे वरदान आहे. पण सर्वसामान्य लोक बऱ्याच वेळा वायफळ बोलण्यात ही शक्ती व्यर्थ घालवत असतात.

पण ज्यांना साधना मार्गावर वाटचाल करायची आहे, भगवंत जोडायचा आहे, त्यांना अशी बाष्कळ बडबड करून चालणार नाही. आपल्या वाचेने त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला हवे तशी सवय करायला हवी. उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता… भगवंताचे नाम मुखात यायला हवे. मी जर साधक आहे आणि भगवंत प्राप्ती हे माझे ध्येय आहे असे जर आपण मनाशी ठरविले असेल तर जनांमध्ये मिसळताना सामान्य माणसांसारखी बडबड करून मला भागणार नाही. तसे केले तर मी माझ्या वाचेची शक्ती व्यर्थ घालवली असा त्याचा अर्थ होईल.

सुरुवातीला लोक मला नावे ठेवतील. माझी चेष्टा किंवा टिंगलटवाळी करतील पण मला भगवंत प्राप्तीसाठी ती सुद्धा सोसता आली पाहिजे. काही दिवसांनी लोकांना हे लक्षात येईल की ही व्यक्ती आपल्यासारखी नाही. ती साधक आहे. मग ते तुमच्याशी आदराने व्यवहार करतील. समर्थ या सगळ्या परिस्थितीतून गेले आहेत. ही परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे आणि त्यातूनच त्यांचे हे अनुभवाचे बोल आले आहेत.

समाजात मिसळताना आपल्याला लोकांनी नावे ठेवू नये किंवा आपण कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा आपण जसे नसतो तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी विद्वान आहे, ज्ञानी आहे मला फार कळते अशा प्रकारचे मुखवटे धारण करतो. हा मुखवटा लोकांना दाखवण्यासाठी जरी असला तरी त्यातूनच अहंकार जन्म पावतो. अहंकार हे पापाचे मूळ आहे. रावणाला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही हा त्याचा अहंकार त्याचे विनाशाला कारणीभूत ठरला. अहंकारातून अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ अहंतेला पापिणी असे म्हणतात.

म्हणून, हे मना, वाणीमध्ये भगवंताचे नाम ठेव आणि मनातून अहंकार दूर ठेव. यातच तुझे खरे कल्याण आहे.

स्वसंवाद :: 

  • माझ्या बोलण्यात भगवंताचे नाम कितपत आहे आणि व्यर्थ बडबड किती आहे?
  • भगवंताचे नाम घेण्याची सवय मी स्वतःला लावतो आहे का?
  • माझ्या मनात अहंकाराची छटा आहे का? ती ओळखून मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे का?

क्रमशः श्लोक २३ आणि २४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८९ – सुखी संसाराची छाया…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८९ – विजय साहित्य ?

☆ सुखी संसाराची छाया…!

(काव्यप्रकार : अष्टाक्षरी)

परंपरा संस्कृतीत,

नारीशक्ती आहे वसा.

कर्तृत्वाची पराकाष्ठा,

संयमाचा दैवी ठसा…! १

*

गाते भुपाळी अंगाई,

नारी दळते दळण.

घर स्वच्छता पहाटे,

जमा करी सरपण…!२

*

लागे जीवनाचा कस,

होई सासुरासी जाच.

कसे जगावे जीवन,

सांगे आठवांना वाच…!३

*

पिढ्या पिढ्या राबतसे,

घर संसारात नारी.

पती मानुनी ईश्वर,

घेई कर्तृत्व भरारी…!४

*

कष्ट,त्याग, समर्पण

नाते संबंधांचा सेतू.

नारीशक्ती कर्मफल,

घरे जोडण्याचा हेतू…!५

*

माती आणि आभाळाशी,

नारी राखते इमान.

संगोपन छत्रछाया,

नारीशक्ती अभिमान…!६

*

नारी कालची आजची,

जपे स्वाभिमानी कणा.

कष्ट साध्य जीवनाची,

नारी चैतन्य चेतना…! ७

*

बदलले जरी रूप,

नाही  बदलली नारी.

अधिकार कर्तव्याची,

करे विश्वासाने वारी…!८

*

नारी आजची साक्षर,

करी कुटुंब‌ विचार.

सुख ,शांती, समाधान,

करी ऐश्वर्य साकार…!९

*

नर आणि नारी यांचा,

नारीशक्ती आहे बंध.

जाणिवांचा नेणिवांशी,

दरवळे भावगंध…!१०

*

देई कुटुंबास स्थैर्य,

नारीशक्ती प्रतिबिंब.

रवि तेज जागृतीचे,

जणू एक रविबिंब..! ११

*

नारी संसार सारथी,

नारी निजधामी पाया.

तिची कार्यशक्ती आहे,

सुखी संसाराची छाया…!१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares