मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्राजक्ता आहेच थोडा असा… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्राजक्ता आहेच थोडा असा… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

प्राजक्ता आहेच थोडा असा 

 कोवळ्या पाकळ्यांनी फुलणारा 

 वाऱ्याची हळूच झुळूक येता 

 हिंदोळ्यावर झुलणारा 

 रात्रीच्या अंधारात 

 शुभ्र फुलात डवरलेला 

 फांदी फांदीवर चांदणं जणू 

 अंगोपांगी मोहरलेला 

 *

 प्रभातीच धावतो खाली 

 अंगणाच्या ओढीने 

 सुगंधी शुभ्र गालिचा 

 भूमातेला घालतो लाडीगोडीने 

 *

 केशर कांती देठाने 

 रंगांची करतो उधळण 

 सडा पाहून प्राजक्ताचा 

 बेधुंद होते माझे मन 

 *

 हळूच सांगतो कानात 

 अलगद उचल हं मला 

 पाकळी जर तुटली माझी 

 काळजात दुखेल हो तुला 

 *

 सुगंधी जखमांना 

 घेऊन वावरशील कशी 

 तुटलेल्या पाकळीला सांग ना 

 मग सावरशील कशी 

 *

 श्रीहरीच्या चरण कमलावर 

 विनम्र भावे नतमस्तक होताना 

 त्याच्या इतकच व्हावं कोमल 

 प्राजक्ताला ओंजळीत घेताना 

 *

 क्षणात विरक्त होतो तो 

 सर्वस्वाचे दान देऊन 

 निर्माल्य होताना हा प्राजक्त 

 जातो गोड आठवणी ठेवून

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देश आमुचा… ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

सौ. ज्योती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देश आमुचा… ? ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

(वृत्त : पादाकुलक) 

जय जवान हो जय किसान हो 

शास्त्रीजींचा होता नारा

हिंद देश हा आहे न्यारा

असे तिरंगा अम्हास प्यारा

*

पोशिंदा हा धान्य पिकवितो

हलधर येथे कष्ट करीतो

रक्षण अपुले करण्यासाठी 

जवान हाती शस्त्र धरीतो

*

चला शिकू या आपण काही

घेऊ थोडी जबाबदारी

मदत करू या पकडायाला 

दिसले जर का भ्रष्टाचारी

*

घेत काळजी प्रदूषणाची 

निसर्गापुढे सदाच वाकू

शत्रू सगळे मिळुनी शोधू

परकी शक्ती उखडू फेकू

*

विकास व्हावा सर्वांगाने

देशात हवी अम्हास शांती 

मतभेदाच्या तोडत भिंती

घडवू आपण नवीन क्रांती

कवयित्री : सुश्री ज्योती कुळकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द मनीचे… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ शब्द मनीचे ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मन दुखावले,

शब्द मूक झाले!

ओलावले डोळे,

संवाद न बोले!

*

अंतरात भाव,

निखळ प्रेमाचा!

शब्द शब्द माझा,

असे हृदयीचा!

*

नसे वाट सोपी,

खाच खळग्यांची!

कशी पार करू,

वेस विचारांची!

*

भाव भावनेचा,

खेळ निरंतर!

चालला मनात,

जीवनी दुस्तर!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१६ ☆ पेढे वाटू गावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१६ ?

☆ पेढे वाटू गावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अधरावरती ओठ टेकता मधुर च्युइंगम व्हावा

या ओठांनी त्याच ठिकाणी कायम आश्रय घ्यावा

त्या मुरलीची घून ऐकुनी वेडी झाली राधा

मला वाटते तिच्याचसाठी शिकून घ्यावा पावा

 *

ओठ तसा तर मिटून आहे काही बोलत नाही

तरी अंतरी श्वास कसा हा तिचाच करतो धावा

 *

प्रीत सागरी संगम व्हावा याच्यासाठी आम्ही

नदी किनारी दिल्या सोडुनी दोन कागदी नावा

 *

पलंगासही आज लगडुनी मस्त चांदणे आले

मधुचंद्राच्या रात्री आम्ही कलश दुधाचा प्यावा

 *

वर्षभरातच हलो पाळणा चैतन्याचा येथे

उदरामधुनी तुझ्याच सखये छावा जन्मा यावा

 *

तुझ्या नि माझ्या अस्तित्वाची खूण वाढते आहे

आगमनाच्या नंतर आपण वाटुन खाऊ मावा

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काव्यदर्पण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ काव्यदर्पण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

भाव अंतरीचे उमटता मनी

साद हृदयात समेटतो ध्वनी.

दिशा नजरेत स्पंदनांचे शब्द

काव्य गुंफताना भावनांचे ऋणी.

 *

बंध रेशमांचे सोयरिक नवे

भेट आयुष्याची आठवण जुनी.

 *

ऋतू बहरात पाखरांची झेप

रंग  संसारात पंखवेल वेणी.

 *

ध्येय आभाळाचे गाठताना ओळ

धुंद  लेखणीची  भिजरी पापणी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दु:ख बोलवेना… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दु:ख बोलवेना … ? श्री आशिष  बिवलकर ☆

खंदा सहकारी | गेलाय सोडून |

आक्रित घडून | गेलं आज ||१||

*

रिकाम्या खुर्चीस | होतेय वेदना |

दुःख बोलवेना | मुकी स्तब्ध ||२||

*

नि:शब्द चेहरे  | अश्रू ओघळती |

मिश्किल सोबती | दुरावला ||३||

*

क्रूर नियतीने | केला असा घात |

मालवली वात | नेतृत्वाची ||४||

*

चटका मनास | बसलाय आज |

व्यथित समाज | घटनेने ||५||

*

महाराष्ट्र बुडे | शोक सागरात |

हुंदका कंठात | वियोगाचा ||६||

*

दादा माणसाचा | ऐसा कैसा अंत |

हळहळ खंत | ह्रदयात ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नाही कधीच केल्या मजबूत योजना मी

करतो खुशाल आहे खोट्याच वल्गना मी

स्वातंत्र्य आज आहे झालाय कैदखाना

सोसून खूप थिजलो तेथील यातना मी

 *

जमलेत गुंड सारे कोंडून मारणारे

थकलो करून आहे त्यांचाच सामना मी

 *

वैरी बनून मजला जखडून टाखणा-या

दडपून टाकल्या त्या सा-याच वासना मी

 *

झाले गुलाम सगळे विसरून हक्क त्यांचे

त्यांच्या कडून कसली घेतोय चालना मी

 *

शोधून ही ठिकाणा ज्याचा मला मिळेना

ठेवू उगा कशाला त्याचीच कामना मी

 *

ज्याच्यात प्रेम नाही आहेच दगड धोंडा

त्याच्या पुढे कशाची करतोय अर्चना मी

 *

मी क्रोध जाळताना झालो मलूल तेव्हा

विसरून सर्व गेलो माझ्याच भावना‌ मी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महत्व पदराचे… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ महत्व पदराचे… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार : अष्टाक्षरी)

तुझी सावली पदरा जपे अवस्थी अर्भक

थरी मायेचा पदर सदा बनतो रक्षक ||||

कधी पदर रुमाल ठरे हात पुसण्याला

माझा ठरतो आधार नित्य मम मदतीला ||||

 *

पदराची बाब खास थोपवितो तो उन्हाला

माझ्या डोक्यावर येतो सावली ती धरण्याला ||||

 *

पदराच्या सावलीत सांगे हितगुज मन

असे अमाप विश्वास मुक्त होई मन तन ||||

 *

असो कसाही पदर सुती असो वा रेशमी

एक भाव जपे सदा साथ देतो तो नेहमी ||||

 *

पदराच्या सावलीत नसे कशाचीच भ्रांत

माया पाझरे अंतरी मन करतसे शांत ||||

 *

ममतेचा हा पदर छत्र होई सदा शिरी

होई सदा आश्वासक छाया धरी सर्वांवरी ||||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अणुरेणुया थोकडा…”☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

? विविधा ?

☆ “अणुरेणुया थोकडा…” ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

अणुरेणिया थोकडा…

सामंजस्य, समजूतदारपणा व साहचर्य हे जीवनाचे सूत्र आहे…

सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा ।

बिकट रूप धरी लंक जलावा ।

असाच हा निसर्ग… बजरंगबली

कणकण में है भगवान!

हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. जगात प्रत्येक जागी परमेश्वर भरलेला आहे हे नक्कीच पण त्याचा अनुभव तरी कसा घ्यायचा? म्हणजे त्यासाठी साधना करायला हवी, शिवाय अध्यात्मा विषयी आवड निर्माण व्हायला हवी आणि हे सगळे करायचे तर अध्यात्ममार्ग आहेच पण निसर्गाच्या अभ्यासाने व डोळसपणे अनुभवण्यानेही ते शक्य आहे.

आपल्या नजरेआड काय काय चालले आहे हे जर आपल्याला कळले तर आश्चर्य करून करूनच आपल्या ‘मी’ पणाचा अंत होऊ शकतो. आपल्या जगण्यासाठी निसर्ग किती बारकाईने कार्य करतो आहे हे लक्षात आले तर आपली बोलती बंद व्हायची वेळ येते.

सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो, खिशात मोबाईल वर रेडिओ चालू होता. सकाळी साडेसहा नंतर भक्ती संगीत थांबले आणि पुढे विज्ञान विषयक कार्यक्रम सुरू झाला. सूक्ष्मजीवांचे जग या विषयावर कार्यक्रम लागला नंतर पुढे सलग चार-पाच दिवस पाच-पाच मिनिटांचे त्या कार्यक्रमांचे भाग प्रसारित झाले.

दुरदर्शन वर देखील एका रविवारी सुक्ष्मजीव या विषयावर एक चित्रफीत प्रसारित झालेली पाहिली होती.

‘सामंजस्य – सहजीवन – साहचर्य’

हा विषय मनात आला आणि मला त्या कार्यक्रमांची आठवण झाली. मग काही थोडका अभ्यास केला, ऐकले आणि हा लेख लिहिण्याचे धाडस करत आहे.

न कळत, न बोलता हे सूक्ष्मजीव आपल्या जीवनात अनायास मिसळले गेले आहेत.

सुक्ष्म म्हणजे किती सुक्ष्म? तर त्यासाठी सेंटीमीटर चे ही एक हजार भाग (मायक्रोमिटर) करावे लागतील… व मोजायला लागेल. काही मायक्रोमिटर आकाराचे हे जीव.

खरं तर आपण सर्वजण सूक्ष्मजीवांच्या समुद्रातच राहत आहोत. ईश्वराची करणी अगाध आहे आणि त्या मध्ये एक करणी म्हणजे

सूक्ष्मजीव…

अगदी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहेत म्हणांना! …

अदिकालात म्हणजे पृथ्वीवर जीवन निर्मिती झाली त्या काळात ते होते, आजही ते भरून राहिले आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत ते राहतील यात शंका नाही.

सुक्ष्मजीव नाहीत तर जीवनही चालणार नाही. अक्षरशः हे पंचमहाभूतात सामावले आहेत. ईश्वर कणाकणातून त्यांच्या रूपाने जीवन साकारत आहे. अग्नी, जल, वायू, तेज आणि आकाश हे सर्व सर्व या धुळी कणांच्या पेक्षाही लहान जीवांनी व्यापलेले आहे. सुक्ष्मजीव नाहीत अशी एकही जागा नाही. मग ते आपल्या भोवती आहेत तसेच ते आपल्या आत देखील आहेत. प्रत्येक एका मानवी पेशी मागे दहा ते अकरा सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आहेत आहात कुठे?

जगातील सर्व लोकसंख्येच्या एवढे सुक्ष्मजीव फक्त आपल्या तोंडात असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. असे हे सूक्ष्मजीवांचे आगळे वेगळे जग आपल्या नजरेआड कार्यरत आहे. खरं तर आपण त्यांना साध्या डोळ्यांनी पाहूच शकत नाही. ढोबळमानाने या सुक्ष्मजीवांच्या जगाचे पाच गट करता येतात. एक म्हणजे बॅक्टेरिया किंवा जिवाणू जे मातीची सुपकता आणि अन्न निर्मिती करतात. दुसरे म्हणजे कवके किंवा बुरशी जी अन्य जीवांवर अवलंबून आहे. शेवाळ ही तिसरी अवस्था जी स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करते. चौथे आहे प्रोटोझोवा म्हणजे अमिबा सारखे जीव जे जीव एकपेशीय असतात. आणि शेवटी पाचवा म्हणजे विषाणू आजच्या भाषेत ज्याला व्हायरस असे संबोधले जाते जे योग्य वातावरण मिळताच सक्रिय होतात, वाढतात व रोग निर्माण करतात. हे जनुकीय संशोधनातही वापरले जातात…

अमुक एक साबण वापरला आणि सूक्ष्मजीवांचा 99% पर्यंत नाश झाला व अमुक एका तासांसाठी आपण सुरक्षित झालो, अमुक एक फिनेल वापरले आणि आपले घर सूक्ष्मजंतू विरहित झाले अशा जाहिराती आपण बघितल्या असतील हे बघायला खूप छान आहे. पण खरेच सगळे सूक्ष्मजीव शत्रू आहेत का? धोकादायक आहेत का? हेच शोधायला पाहिजे सूक्ष्मजीव जसे त्रासदायक आहेत तसेच किंवा त्यापेक्षाही कधीतरी प्रमाणात आपल्यासाठी उपकारक आहेत हेच खरे. उलट शत्रू सुक्ष्मजीवांना मारता मारता प्रत्येक मानवाच्या जगण्यासाठी स्वतःचे सर्वस्व, प्रसंगी प्राणही हे मित्र सूक्ष्मजीव अर्पण करतात असे आढळले आहे. यांना जर आपण कायमस्वरूपी नष्ट केले किंवा करू शकलो तर पृथ्वीवर जीवनही चालणार नाही.

आपल्या शरीरात त्वचेच्या आवरणात अनेक थर आहेत. त्या त्वचेच्या थरातील सर्वात वरचा थर फक्त सूक्ष्मजीवांनी निर्माण झाला आहे…

आपल्या त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण योग्य राखण्याची जबाबदारी हे जीव घेतात. त्वचेवर तेलासारखा एक स्त्राव सोडून आपली त्वचा तुकतुकीत बनवतात. आपल्या देहाला तेज देतात… त्वचा दिसताच आपल्याला सहाय्य करणारे हे जीव त्वचेवर मुक्कामाला येतात व आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या शत्रू सूक्ष्म जीवांना विषाणूंना ते रोखतात. या त्यांच्या वृत्तीने अनायास आपल्या शरीराचेही संरक्षण होते हीच कथा बाकी सर्व अवयवांच्या आतील सूक्ष्मजीवांची आहे.

सूक्ष्म जीवांच्या या अभ्यासाने औषधे ही कल्पनाही बदलली गेली. मित्र सूक्ष्मजीवांचे पोषण व शत्रू सूक्ष्मजीवांचा नाश अथवा प्रतिबंध हेच सूत्र वापरून औषधोपचारांचे नियोजन केले जाते. क्वचित प्रसंगी जिवंत सूक्ष्मजीव औषधाच्या रूपात आपल्या शरीरात पोचवले जातात. सूक्ष्म शत्रू जीव नष्ट करतानाच मित्र सूक्ष्मजीवांचा ही नकळत नाश होत असतो… त्यांची भरपाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात.

पु ल देशपांडे यांच्या ‘म्हैस’ या कथेत येते त्याप्रमाणे

“एका कोंबडींस तीन तांस तर म्हशीस कितीं? झंम्प्या! मोज बोटे…! “

या चालीवर

“आपल्या तोंडात जगाच्या लोकसंख्ये एवढे सुक्ष्मजीव तर पूर्ण शरीरात किती? झंप्या! मोज बोटे! “

असे म्हणावेसे वाटते.

मिलियन, बिलियन, ट्रिलियन या संख्या तर कुठेच नाहीत गणिताच्या कुठेतरी पलीकडे जावे लागेल तेव्हा या सूक्ष्मजीवांची संख्या लिहिता येईल आणि हा लेख म्हणजे एखाद्या अंकावर असंख्य शून्यच लिहायला लागतील. हा लेख मनोरंजक न राहता कंटाळवाणा व आकडेमोडीची कसरतच ठरेल, तेव्हा त्यात न पडणे कधीही श्रेयस्कर…

मानवी देहाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे वजन सूक्ष्मजीवांचे असते. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर 70 किलो वजनाच्या एखादा माणसामध्ये सात किलो वजन सूक्ष्मजीवांचे असायची शक्यता आहे…

अन्नपचन करताना पोटात अनेक सूक्ष्मजीव अन्नपचनासाठी लागणारी रसायने- स्त्राव निर्माण करतात जी मानवी शरीराला अत्यंत उपयुक्त असतात अशी रसायने स्त्राव निर्माण करणे हे मानवी पेशींना शक्यच नाही. केवळ सूक्ष्मजीवच आहेत त्यामुळे आपल्याला अन्न पचू शकते. अन्नाची गरज निर्माण झाली की सूक्ष्मजीव काही विशिष्ट रसायने निर्माण करतात व आपल्या पोटात भुकेची जाणीव निर्माण होते व मेंदूपर्यंत संदेश पोहोचवला जातो आणि मग मेंदू अन्नाची मागणी करतो… वेगळ्या अर्थाने भूक ही भावना निर्माण करण्यात सूक्ष्मजीवांचाच वाटा आहे…

शेतीमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव महत्त्वाची भूमिका पार पाडतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणात मोठ्या प्रमाणात असलेला नायट्रोजन वायू जमिनीत स्थिर करण्याचे मोठे काम केवळ सूक्ष्मजीवांमुळेच शक्य झाले आहे. सर्वच वनस्पती जग हे सूक्ष्मजीवांवरती अवलंबून आहे. सर्वच जीवांमध्ये सूक्ष्मजीव त्यांचे जगणे सुलभ करत आहेत…

शेतीमध्ये लागणारी अनेक प्रकारची खते ही देखील सूक्ष्मजीवांचीच देणगी आहे.

कचरा समस्या ही जागतिक डोकेदुखी ठरली आहे पृथ्वीवर अनेक नष्ट होणाऱ्या पदार्थांचे विघटन करून तो पदार्थ मूळ अवस्थेत माती व वायूत परिवर्तीत करण्यासाठी सूक्ष्मजीवच कार्यरत असतात.

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरा या चालीवर जनन, पोषण आणि मरण किंवा नाश या गोष्टी सूक्ष्म जीवांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने शक्य झाल्या आहेत.

स्वयंपाक घरात सुद्धा दुधाचे दही, ताक, तूप यामध्ये रूपांतर होणे, डोसे, इडल्या, केक करणे, कणिक फुगवणे इत्यादी गोष्टी असोत हे देखील सूक्ष्मजीवांचेच कर्तृत्व आहे.

पृथ्वीवर मद्य निर्माण करण्याचे कार्य देखील सूक्ष्मजीवांचेच हं ते नाहीत तर वाईन, बिअर देखील नाही.

लोणची पापड व टिकणारे अनेक पदार्थ निर्माण करताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते.

अनेक उद्योगात तर सूक्ष्मजीवच काम करतात. अशा उद्योगात सूक्ष्म जीवांचा अभ्यास व वापर करून गोपनीय फॉर्म्युले तयार केले जातात व अशा फॉर्म्युल्यांमूळेच अनेक उद्योग भरभराटीला आले आहेत.

पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यात देखील सूक्ष्मजीवांचे मोठे योगदान आहे

आपल्या ऋषीमुनींनी सूक्ष्म जगताचा खूप अभ्यास केलेला दिसतो व त्यांना जाणलेले दिसते. भगवान महावीरांनी देखील सूक्ष्मजीवांवर मोठे चिंतन केले आहे. जैन तत्वज्ञानात सूक्ष्मजीवांचा खूप बारकाईने विचार केलेला आढळतो

आतापर्यंत फक्त 20% एवढे संशोधन सूक्ष्मजीवांवर झाले आहे. अजून 80 % संशोधन होणे बाकी आहे. तेव्हा नवयुवकहो आपल्याला विद्या क्षेत्र देखील सूक्ष्मजीवांनी उपलब्ध करून दिले आहे.

त्यांच्यातील रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आकाश हीच मर्यादा ठरेल!

कणाकणात वसलेला हा परमात्मा आपल्या सामान्य दृष्टीला दिसत नाही. त्यासाठी तेवढीच सूक्ष्म दृष्टी आणि प्रज्ञेची दिव्यदृष्टी असण्याची गरज आहे.

आपल्याला वाटते ‘आपण जगतो आहोत’ पण बघा ना आपल्याला हे सूक्ष्मजीव जगवत आहेत.

आपल्याला वाटते ‘आपले अन्न आपण निर्माण करतो’ पण ते अन्न निर्माण करण्यात सूक्ष्मजीवच मोठा वाटा उचलत आहेत.

आपला श्वास देखील सूक्ष्मजीवांमुळेच शक्य आहे…

बघा करोनाकडे… ज्याने आपले जीवन धोक्यात आणले होते म्हणजे आपल्या जीवाला धोका निर्माण करणारे हेच ते जग…

सूक्ष्मजीव त्रासदायक असतीलही पण त्यापेक्षा ते कितीतरी मोठ्या प्रमाणात मानवी जीवनास सहाय्यक आहेत हेच खरे…!

उलट शत्रू सूक्ष्मजीवांना मारता मारता एकेका मानवाच्या जीवनासाठी, जगण्यासाठी प्रसंगी स्वतःचे सर्वस्व आणि कधीकधी आपले प्राण देखील अर्पण करतात. आपल्याला आयुष्य मिळावे म्हणून कोट्यवधी सुक्ष्मजीव त्यांचे जीवन वेचतात…

तेव्हा

हे मानवा आता तरी जागा हो! आपला अहंकार सोड! निसर्गाला शरण जा! सकारात्मक जग… आणि सर्वांना सकारात्मक जगू देत.

संत ज्ञानेश्वर लिहीतात

तूज स्थूल म्हणू की सुक्ष्म रे?

स्थूल सुक्ष्म एकू गोविंदू रे!

येथेच संत तुकारामांच्या सारखेच

“उरलो उपकारा पुरता!”

म्हणत मौन होऊया! …

🙏🏻

©  श्री श्रीनिवास गोडसे

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाते हे अतूट…!! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नाते हे अतूट…!! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

विठू माऊलीची

अशी गळाभेट

मिळते का सांगा

करिता पायपीट!

*

जयाच्या मनी

सदा भक्तिभाव

त्यालाच भेटतो

असा तिथे देव!

*

आपसूक होते

अशी गळाभेट

भक्ताशी देवाचे

नाते हे अतूट!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares