मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || संत उपदेश | बीज अध्यात्माचे || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || संत उपदेश | बीज अध्यात्माचे || ? श्री आशिष  बिवलकर ☆

संत उपदेश | बीज अध्यात्माचे | 

कल्याण जगाचे | निरंतर ||१||

*

एक एक शब्द | अर्थ त्याचा जाण |

सुवर्णाची खाण | हाती लागे ||२||

सोसूनिया कळा | जन्म देते माय |

दुधावरी साय | जैसी यावी ||३||

*

संताचे जीवन | जैसे मातेपरी |

निरपेक्ष सारी | अंगी सेवा ||४||

*

आंधळ्याच्या हाती | मार्ग दावी काठी |

तैसी जगजेठी | संतजन ||५||

*

संतांचीया देखी | रंक आणि राव | 

नसे भेदभाव | अंतरीसी ||६||

*

आशिष वंदितो | संताचे वचन |

ज्ञानाचे लोचन | उद्धारासी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वादळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ वादळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

असणे नसणे यांच्या मधले अंतर कळते आहे

मानवतेचे या निकशावर नाते झुलते आहे

*

कोण कोठला कुठून आला याची पर्वा नाही

खला सोबती खल होताना सगळे जमते आहे

*

तो पैशाला देव मानतो चुकते कोठे त्याचे

गोळाकरण्या धनदौलत मग नाते तुटते आहे

*

अधिकारानी गळा घोटला स्वातंत्र्याचा येथे

न्यायदेवता डोळे झाकत मौनी बनते आहे

*

भ्रष्टाचारी जमले येथे करती सारे घपले

त्याच मुळे तर सामान्यांचे जगणे मरते आहे

*

भले पुढारी झाले त्यांना का हे दिसले नाही

दुर्बलतेचे रोज कलेवर येथे जळते आहे

*

खाणारानी खात जायजे दिसेल जे जे ते ते

सत्तेच्या मग बुरख्यात खाली सारे खपते आहे

*

समोर दिसतो विनाशकारी काळ मातला वेडा

रुपात त्याच्या विध्वंसाचे वादळ फिरते आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झटकून टाक जीवा… – कवी: ग. दि. माडगूळकर ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ झटकून टाक जीवा… – कवी: ग. दि. माडगूळकर  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

झटकून टाक जीवा…

गदिमा

‘जीवन हे अनमोल ‘

आयुष्याच्या वाटचालीत चढउतार येतातच. सुख-दुःख, यश अपयशाचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरूच असतो. अशावेळी धीराने, संयमाने संकटांचा सामना करावा लागतो. त्यातूनच पुढचा मार्ग सापडून यशाला गवसणी घालता येते. पण काहीजण अशावेळी धीर खचून गलितगात्र होतात. काही जण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा अवस्थेत त्यांना मायेची साथ, प्रोत्साहनाचे शब्द, आधारचा हात पाठबळ देणारा असतो. संकटांनी, दु:खाने खचलेल्या मनाला उभारी देणारे अलौकिक शब्दप्रभू कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे एक गीत मला फार आवडते. त्याच गीताचा रसास्वाद आपण घेऊया.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||

*

होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा

अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा

आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ||

*

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे

आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे

हसुनी करी परी ते वर्षाव सौरभाचा ||

*

का कालचा उद्याला देसी उगा हवाला

द्यावाच वाटतो ना मग जीव रे जीवाला

अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ||

*

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||

*

‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटातील हे गीत आहे. अगदी विमनस्क स्थितीतला नायक आत्महत्या करायला निघालेला असतो. त्याला वाटेत एकजण भेटतो. तो त्याची विचारपूस करून अगदी योग्य रीतीने समजूत घालतो.

तो सांगतो, ” अरे हे जग एवढे वाईट नाही. प्रलय करणारं पाणी सुद्धा शेत पिकवतं, वीज खेळवतं. लक्षात ठेव, दिलेली एकच गोष्ट परत घेता येत नाही कधी, ती म्हणजे आपला ‘जीव’….” त्याच्या समजावण्याने भारावलेला नायक मागे फिरतो. या पार्श्वभूमीवर हे गीत ऐकू येते.

दुःखाने, संकटांनी उदास, निराश झालेल्या मनाला उभारी देणारे हे गीत आहे. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आशावादी, उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन कवीने पहिल्याच ओळीत केले आहे ते श्रोत्यांच्या मनाला अगदी थेट भिडते.

दिवसभरामधे मध्यान्हीचे ऊन हे तसे त्रासदायकच असते. पण तो ताप सोसल्यावर पुन्हा सावलीचा लाभ होतोच. तसंच आयुष्यात दुःखाची धग सोसल्यावर पुन्हा सुखाची सावली मिळतेच. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन चुकीचा काही निर्णय न घेता शांत रहायला हवे.असे केल्याने येणाऱ्या नव्या क्षणांचा शांतपणे सुखाने आनंद, आस्वाद घेता येतो.

छोटंसं नाजूक कोमल फुल ऊनपावसाची तमा न बाळगता दिमाखात डोलत असते. खरंतर आपलं आयुष्य एक दिवसाचं आहे हे त्याला माहीत असतं तरीही ते हसत रहातं, फुलत रहातं आणि सगळीकडे सुगंधाचा वर्षाव करीत दरवळत रहातं. आपलं आयुष्य तर कितीतरी मोठे असते. त्यामधे किती तरी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःला आनंद मिळवत इतरांना आनंद देऊ शकतो. कसे जगायला हवे हे कवीने सहजसोप्या आणि प्रभावी शब्दात सांगितले आहे.

कवीने पुढे विचारले आहे की, ” कालचा दिवस वाईट होता म्हणजे उद्याचा दिवसही वाईट असेल असे का समजायचे?  उद्या कदाचित वेगळे पण चांगले काही घडू शकेल. तुला जर जीव द्यायचा असेल तर तो इतरांना दे. इतरांशी संवाद साधत मनाने जोडला जा. यातून जीवाला जीव देणारे सुहृद भेटतील. त्याऐवजी चुकीचा काही तरी विचार करुन घातक निर्णय घेऊ नकोस. माणसाचा जन्म मोठ्या भाग्याने मिळतो. तर अविचाराने या देहाचा अव्हेर करू नकोस. आत्महत्या हा संकटातून सुटण्याचा मार्गच नाही तर परिस्थितीवर मात करायला हवी. आपोआप सुखाचा मार्ग गवसेल हे कवीने खूप प्रभावीपणे समजून सांगितले आहे.

मन निराश असताना खूप अडचणींनी उदासी जाणवते, जगणे व्यर्थ वाटू लागते अशावेळी कुणीतरी आपुलकीने आपली चौकशी केली, आपले बोलणे निदान ऐकून घेतले तरी बरे वाटते. त्यामुळे आता आपली परिस्थिती बदलेल, आपलेही प्रश्न सुटू शकतील अशी आशा वाटू लागते. गेलेला उत्साह परत येतो. एक जिव्हाळ्याची व्यक्ती हे काम अतिशय उत्तम रीतीने करते. अगदी तसेच काम कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे शब्द करतात. जिवलग मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास पुन्हा परत यावा तसे हे गाणे ऐकल्यावर वाटते.

जगण्यातला आनंद मावळत चाललाय, जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे अशा लोकांना आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे. गदिमांनी अतिशय सुंदर समर्पक शब्दांत मनाला उभारी देणारी रचना केली आहे. त्यासाठी मध्यान्हीचे ऊन आणि नाजूक फुल यांच्या रूपकातून जीवनाचे सार अगदी चपखल शब्दात सांगितले आहे.

आजचं जीवन धकाधकीचं, धावपळीचं आणि ताणतणावाचं झालेलं आहे. अनेकदा संकटांनी, दु:खाने माणसे अगदी त्रासून जातात. मानसिक स्वास्थ्य हरवते. मन निराश होऊन चुकीचा निर्णय घेऊ लागते. काहीजण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. असे मनाने पूर्ण निराश झालेल्या लोकांना जगण्याची नवी प्रेरणा, आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे.

जीवनामधे आशावाद भरभरून वाहतोय. तेव्हा सर्व संकटांना, आव्हानांना सामोरे जात जीवन समरसून जगायला हवे असा संदेश या गीतातून दिलेला आहे. जगण्याची सकारात्मक प्रेरणा देणारे हे गीत तसे खूप जुने आहे. पण आजही ते तितकेच परिणामकारक सिद्ध होते आहे ही कविवर्य गदिमांच्या शब्दांची थोरवी आहे.

परिस्थितीने गांजलेल्या एखाद्या जीवाला त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळो हीच सदिच्छा आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जरी वाजले सूप…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏 जरी वाजले सूप…! 👍 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आली आली म्हणता

येवून सरली दिवाळी,

ठेवा डब्यात माळ्यावर

आता शिल्लक रांगोळी!

*

चिवडा चकली शेवेचा

उरला असेल जर चुरा,

करून सुट्टीत मिसळ

घरातच तो वापरा!

*

लक्ष्मी पूजनाचे ताट

ठेवा नीट सांभाळून,

पुढच्या वर्षी दुप्पट

भर घालायचे ठरवून!

*

फटाक्याच्या धुरात

पुन्हा पैसे नका टाकू,

अनाथालया दान देण्याचे

मनांत ठरवून टाकू!

*

जरी संपला दीपोत्सव

ठेवा तेवत स्वप्नांचे दीप,

निर्धार करुन स्वप्नपूर्तीचा

जगी मिळवा मान खूप!

जगी मिळवा मान खूप!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चटका लाऊन निघून जा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ चटका लाऊन निघून जा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

गिरिशिखरीचा नसुदे चंदन

झुडुप तरी हो दरीतले

झुडुप असे हो ज्याला पूर्वी-

कुणी कधी ना बघीतले।।१।।

*

झुडुपही नाही होता आले

इवले हिरवे गवत तरी

गवत असे देखणे, जणू की-

शालू हिरवा जरतारी।।२।।

*

अथांग सागर दूर राहु दे

गर्द निळे कासारची हो

वटवृक्षाची नसे अपेक्षा 

हरि अधरीचा वेळू हो! ।।३।।

*

सारे सेनापती कशाला

कुणी शिपाई हवेत ना

शिवबालाही सवे लागती

गड जिंकाया कुणी ताना।।४।।

*

काष्ठशिल्प उतुंग उभविण्या 

लघु लघु खणखर खिळे हवे

संगमरवरी ताजबांधण्या

क्षुद्र चुन्याचे कणहि हवे।।५।।

*

जसा लागतो शिल्पि तैसा

भार वाहण्या गर्दभही

राजसूय संपन्न व्हावया

शुष्क लागती समिधाही।।६।।

*

राजमार्ग होणे ना जमले

हो एखादी पाउलवाट

चंद्र-सूर्य, जा ठेव बाजुला

हो तारा घनदाट नभात।।७।।

*

आकारावर कधी न ठरते 

महत्व कुठल्या गोष्टीचे

तृणभारे अन् केशरकाड्या

एक दराने तुलायचे? ।।८।।

*

जे वाट्याला आले काही

अनन्यभावे करीत जा

ईश्वरसेवा मानुनि सारी

श्रमभक्तीतचि रंगुन जा।।९।।

*

रंगरंगता रंग धुंद ते

सवंगड्यांवर शिंपित जा

आणि अचानक संघामधुनी

चटका लाउन निघून जा! ।।१०।।

*

(‘Be the best of whatever you are’ या ‘Douglas Malloch’ यांच्या मूळ इंग्रजी कवितेने प्रेरित होऊन केलेली ही रचना आहे.) 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दर्पण… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दर्पण… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

सृष्टीस मोह झाला

प्रतिबिंब पाहण्याचा

कंठात हार घाली

पितस्वर्ण फुलांचा

*

पाण्यात पाहताना

प्रतिबिंब ती स्वतःचे

पाणीही जाहले स्तब्ध

दर्पण होई जलाचे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्ग ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ निसर्ग ☆ सौ. मंजिरी येडूरकर

मज दावितो निसर्ग, रोज वेगळेच भास

शाळाच भरवितो जणू, ऋतूंचीच खास

*

येता वसंत कोकिळ, खुलवितसे शिवार

येईल पानोपानी, फुलवेलींना बहार

*

बेचैन होतसे मी, ग्रीष्मातल्या झळांनी

बसलाय शुष्क चातक, चोचीस फुलवोनी

*

चैतन्य देई वर्षा, नटली वसुंधरा ती

उघडे निळा पिसारा, मन मोर नाचताती

*

आकाश स्वच्छ होता गीत रंगले खगांचे

शरदात पांघरते, नभ वस्त्र चांदण्यांचे

*

बोचऱ्या हिवाचा, नको पहाटेस स्पर्श

हेमंत येई घेऊनि, शेकोटीचा ग हर्ष

*

अति रुक्ष पानगळ, शिशिरात होतसे ती

अंकुर नाही डोई, तरी वृक्षास नाही भिती

*

वाट पाहतो हा, उरी घेऊनि मनिषा

येईल पुन्हा वसंत, बहरेल माझी आशा

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “हा छंद जिवाला लावी पिसे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “हा छंद जिवाला लावी पिसे...” ☆ सौ राधिका भांडारकर 

धुंदमनी एकाकी मी गातो

देहभान विसरुनी जातो

नाद पैंजणी तुझाच भासे

हा छंद जिवाला लावी पिसे।ध्रु।

*

मंद वारा कसा बिलगतो

गंध स्पर्श तुझा जाणवतो

मिठीत यावे वाटतसे

हा छंद जिवाला लावी पिसे..

*

तव दिठीतली तेजकळी

कपोली लाजरी एक खळी

आठवून मी बेभान असे

हा छंद जिवाला लावी पिसे..

*

डाव तो खट्याळ पावसाचा

आरस्पानी देह लावण्याचा

प्रणयात जीव गुंततसे

हा छंद जिवाला लावी पिसे..

*

हरित पानी पीत बहावा

बेचैन करी तुझा दुरावा

टिपुर चांदणे नभी हसे

हा छंद जिवाला लावी पिसे..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कल्पवृक्ष आहे मोह ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कल्पवृक्ष आहे मोह ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

 (अष्टाक्षरी)

तुला पाहून मनाला

माझ्या पडतो ना मोह

असा सुगंध देणारा

कल्पवृक्ष आहे मोह

*

मोठ्या मोठ्या पानांमध्ये

पांढुरकी छान फुले

येता वाऱ्याची झुळूक

झुबक्यात पहा खुले

*

रात्री उमलती सारे

किती झाडाखाली सडे

आदिवासींचा हा देव

सदा उपयोगी पडे

*

तेल बनतेच याचे

औषधेही बनतात

फळफुल पान सारे

उपयोगी गणतात

*

फुले लागतात गोड

प्राणी पक्षी खाती सारे

माणसाला झिंग चढे

मोहाचे या रंग न्यारे

*

खीर रोट बनवती

आदिवासी खाण्यासाठी

पर्यावरण राखतो

हवा शुद्ध देण्यासाठी

*

नावातच मोह आहे

मद्य बनते फुलांचे

आज मोहाचे केले मी

काव्यातून गाजेवाजे

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आता थांबायचं नाही… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आता थांबायचं नाही… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कोणी टाकले दगड वाटेत

अडथळे उभे अडवायला ||

पाहिले उंच त्या आकाशाकडे

निर्मीत वाट लागे चालायला ||

*

धारेची मग मी झाले ओहोळ

अडथळ्यांना वळसे घालून ||

कपारीवरून झोकून दिले

मिरवले मग झरा होऊन ||

*

कितीतरी ते खड्डे बुजवले

कितीतरी गं काठ सजवले||

माझ्यासंगे ‘जीवन’ फुलवीत

सरीता झाले वाहत राहिले||

*

पुढे जायचा घेतला वसा मी

कुठेच आता थांबायचं नाय||

सागर होऊन दाखविणार

ध्येय मार्ग जरी दुर्गम हाय||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares