मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे- – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे– – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

– – – सागर आणि नेत्रा पाटील

संध्याकाळ होत जाते, घरोघरी दिवे लागतात आणि अंधार मागे सरतो. पण ‘अंधार’ म्हणजे नेमकं काय? काहींसाठी तो प्रकाशाचा अभाव असतो; तर काहींसाठी संधींचा.

सागर पाटील यांना हा फरक आयुष्याच्या अगदी लहान वयातच समजला. डोळ्यांवर अनेक शस्त्रक्रिया होऊनही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. त्यानंतर समाज दिव्यांग व्यक्तीकडे कसा पाहतो, हे त्यांनी जवळून अनुभवले. दुर्लक्ष, उपेक्षा, दया किंवा ‘बिच्चारा’ असा शिक्का—यापलीकडे अनेकांना काही दिसतच नव्हते.

या सर्व प्रवासात अत्यंत खंबीरपणे, खमकेपणाने सागर यांच्यासोबत त्यांचे आई वडील उभे राहिले. मुलाला अंधत्व आले असतानाही त्यांनी कधीच “हे करू नकोस” किंवा “तुला जमणार नाही” असा नकारात्मक सूर लावला नाही. उलट, सागर काही नवी गोष्ट अजमावत असतील, तर आई वडील म्हणायचे, “आमच्या समोरच कर, काही मदत लागली तर आम्ही आहोतच”. हा सकारात्मक दृष्टीकोन, सागर यांच्या आत्मविश्वासाचा पाया ठरला.

यामुळे सागर यांच्या मनात एक विचार दृढ झाला होता—एखाद्या व्यक्तीची “मर्यादा (limitation) / कमजोरी” ही तिच्या मूल्याची मोजपट्टी असू नये. पुढे हाच विचार एका चळवळीचा पाया ठरला.

त्यांच्या सोबतीला होत्या नेत्रा पाटील—शांत, संवेदनशील आणि कृतीतून परिवर्तन घडवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या.

सागर यांनी मराठी साहित्य विषयात एम. ए. केले; पण त्यांचा जीव रमला तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. वडिलांना सरकारी नोकरी सोडावी लागलेली पाहून त्यांनी लहानपणीच ठरवले होते—नोकरी करणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक व्हायचे.

शालेय वयापासूनच त्यांचे इस्त्री, रेडिओ, ट्यूबलाईट दुरुस्त करणेही सुरू झाले. वापरात नसतानाही बॅटऱ्या का उतरतात (drain होतात) ? हा प्रश्न त्यांना सतावत राहिला. त्यातून पुढे त्यांनी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचे तंत्र विकसित केले.

२०१३ मध्ये त्यांनी IIG (Ideal Innovative Group) कंपनीची स्थापना केली. संगणक आणि एलईडी उत्पादनांची जुळणी सुरू झाली. नामांकित कंपन्यांसाठी बल्ब व ट्यूबलाईट तयार करण्याबरोबरच स्वतःच्या ब्रँडनेही उत्पादने बाजारात आली.

कामाची व्याप्ती वाढू लागल्यावर, सागर यांनी सॉल्डरिंगची कामं घरी आणायला सुरुवात केल्यावर, वयाची साठी उलटून गेलेल्या त्यांच्या आईंनी हे कौशल्य स्वतः आत्मसात केले. आजही त्या नातवाला सांभाळत, घर सांभाळत दिवसाला सॉल्डरिंगचे १०००-१५०० टाके सहज लावतात.

पुढे एलईडी उत्पादने स्वस्त झाल्यावर सागर आणि नेत्रा यांनी पुनर्भरणीय उत्पादनांवर (rechargable products) लक्ष केंद्रित केले. टाटा पॉवर हे त्यांच्या सुरुवातीच्या नामवंत ग्राहकांपैकी एक. उत्पादनाचा दर्जा हा यशाचा पाया असतो, या त्यांच्या विश्वासाला टाटा पॉवरने दीर्घकालीन कराराद्वारे (lifetime contract) दुजोरा दिला.

पुढे त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या विशेष पुनर्भरणीय (rechargable) बॅटऱ्यांनी रेल्वे क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. रेल्वे गार्ड आणि मोटरमन सिग्नल देण्यासाठी वापरत असलेल्या विशेष बॅटऱ्यांच्या उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सुमारे चारशेहून अधिक उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘VC – व्हिज्युअली चॅलेंज्ड’ या त्यांच्या ब्रँडच्या उत्पादनांनी सर्व तांत्रिक कसोट्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि महत्त्वाच्या ऑर्डर्स प्राप्त केल्या. गुणवत्ता, नित्यनूतनता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

परंतु या दांपत्याचा प्रवास केवळ स्वतःपुरता उद्योग उभारण्यापुरता आणि पैश्यांची धन करण्यापुरता मर्यादित राहिला नाही.

रुईया महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांना संतोष फडके, अनघा पेंडसे यांच्यासारख्या समविचारी मित्रमैत्रिणी भेटल्या, महाविद्यालयानंतरही हे मैत्र अबाधित राहिलं. आणि या सर्वांच्या परस्पर सहकार्य, संवाद आणि सामूहिक विचारातून, दृष्टिबाधित व्यक्तींना आणि एकंदरीतच समाजातील गरजूंना प्रशिक्षण देण्यासाठी IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली.

या सगळ्यांना एक साधी पण महत्त्वाची गोष्ट उमगली होती—लोकांना सहानुभूतीपेक्षा संधीची अधिक गरज असते.

अनेक दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये त्यांनी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिस्त आणि अपार क्षमता पाहिली. समाज जिथे “हे लोक काय करू शकत नाहीत?” असा प्रश्न विचारत होता, तिथे त्यांनी “त्यांना संधी मिळाली तर ते काय करू शकतील?” हा प्रश्न विचारला.

…… आणि त्या एका प्रश्नाने अनेक आयुष्यांची दिशा बदलली.

ट्रस्टने दानधर्माऐवजी सक्षमीकरणाचा मार्ग निवडला. कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे त्यांच्या कार्याचे केंद्र बनले. इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण, संगणक साक्षरता, उद्योजकता मार्गदर्शन, व्यावसायिक मराठी, क्रीडा आणि जनजागृती उपक्रमांद्वारे अनेकांना नवी दिशा मिळाली.

प्रशिक्षित हातांनी तयार होणारा प्रत्येक एलईडी दिवा जणू एक संदेश देत होता—

“मी सक्षम आहे. ”

कार्यशाळा वाढल्या. प्रशिक्षणार्थी उत्पादने तयार करू लागले, उपकरणे दुरुस्त करू लागले, स्वतः कमाई करू लागले. अनेकांना वर्षानुवर्षांनी आत्मविश्वास मिळाला. चिंतेत जगणाऱ्या कुटुंबांना आशेचा किरण दिसू लागला.

या प्रवासात नेत्रा यांनी भावनिक आधाराची महत्त्वाची भूमिका निभावली. व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपुलकीची ऊब दिली. लोकांना ‘प्रकरण (case study)’ म्हणून नव्हे, तर स्वप्ने आणि क्षमता असलेल्या व्यक्ती म्हणून वागवले.

मोठ्या ऑर्डर्स आल्या असताना त्यांची पूर्तता करण्यात आणि प्रशिक्षण कार्यशाळांच्या पूर्वतयारीत सागर यांच्या आईंचा सहभाग आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.

सागर यांची दृष्टी केवळ उद्योग किंवा प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर नेण्याची त्यांची वृत्ती तितकीच प्रेरणादायी आहे.

अलिबाग येथील कुटुंबाच्या सामायिक मालकीची जमीन अनेक वर्षे वाद आणि मतभेदांचे कारण बनली होती. सागर यांच्या मेहुण्याने (मावशींच्या जावईबापूंनी) या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्याची कल्पना मांडली. सागर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात पुढाकार घेतला. आज तीच जागा एका सुंदर रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्याचा लाभ सर्व भागीदारांना मिळत आहे.

समाजहित आणि लोकांना जोडण्याच्या या कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. अलीकडेच अमरावती येथे सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या मातृसंस्था असलेल्या रुईया महाविद्यालयाचा ‘रायझिंग स्टार’ हा सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

आज ट्रस्टने ५० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि १००० हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी ३५०हून अधिक जण दृष्टीबाधित आहेत, अनेकजणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, तर काही स्वमग्न (ऑटिस्टिक) आहेत. विविध कारणांनी गरजू असलेल्या या सर्वांना एकच व्यासपीठावर समान संधी देण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा विशेष पैलू आहे.

सागर आणि नेत्रा यांनी या सगळ्यांना केवळ मदत केली नाही; त्यांनी हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीतील १८ कामगारांपैकी १४ जण दृष्टिबाधित आहेत.

एकेकाळी ज्या शैक्षणिक संस्थांनी सागर यांना इलेक्ट्रॉनिक्स शिकवण्यास नकार दिला होता, त्याच संस्था आज त्यांना प्रशिक्षक म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रित करताना दिसतात.

काही प्रशिक्षणार्थी आज स्वतः मार्गदर्शक झाले आहेत. काहींनी स्वतःचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. जे पालक कधीकाळी भविष्याबद्दल साशंक होते, ते आज अभिमानाने बोलतात.

या यशोगाथा कदाचित वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत फारशा झळकत नसतील; पण त्यांनी अनेक आयुष्ये उजळवली आहेत.

कारण सागर आणि नेत्रा पाटील यांनी केवळ दिवे तयार केले नाहीत—

…… त्यांनी माणसांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला आहे.

अधिक माहितीकरता : 

IIG Education and Development Trust,

संपर्क :  शॉप क्रमांक २बी, जिजामाता चाळ, कोकणीपाडा, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई, ४०००६८. मो ९३२२०१७१४०.

डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दिव्यसहस्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला ‘Tape Recorder’ : स्फटिक

कुरुक्षेत्रावर कोणी notes घेतले नाहीत, मग विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले?

आपल्याला माहीत असलेली गोष्ट :

भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर. युधिष्ठिर समोर. श्रीकृष्ण साक्षीला. वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूची एक हजार नावे सांगितली.

आपण सगळे हे जाणतो.

पण एक प्रश्न कधी मनात आला का?

त्या भयाण रणांगणावर, बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी notes घेतल्या होत्या का? कागद होता? लेखणी होती? कोणी लिहित होते का?

नाही.

 आणि इथेच सुरू होते, ती गोष्ट ~ जी तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल.

भीष्मांनी सांगितले ~ पण कोणी लिहिले नाही!

भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्त्र नावे सांगत होते, तेव्हा तिथे असलेले सगळे म्हणजे युधिष्ठिर, पाचही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांचे सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले.

पहिला आवाज आला युधिष्ठिराचा–

“थांबा… पितामहांनी एक हजार नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो. पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला! सहस्त्रनाम हरवले!”

सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले..

“तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल!”

श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले “मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो. माझ्याकडेही उत्तर नाही. ”

सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार? 

 मग श्रीकृष्णाने सांगितला एक अद्भूत उपाय!

श्रीकृष्ण म्हणाले : एकच मार्ग आहे. सहदेव.

सगळे चकित झाले. सहदेव? पाचव्या पांडवाला हे कसे शक्य होईल?

श्रीकृष्ण म्हणाले “सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे, जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे, की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली, तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले, तर तो स्फटिकातून ते ध्वनी परत मिळवू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. “

जगातील पहिला ‘Tape Recorder’

स्फटिक!

सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले, जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते.

सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एकेक नाव लिहून घेऊ लागले.

असे वेदव्यासांनी विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले.

हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, “जगातील सर्वात पहिला Tape Recorder म्हणजे हा ‘स्फटिक’ ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. “

हे ऐकून सगळे स्तब्ध झाले.

आणखी एक गोष्ट, जी कमी माहीत आहे.

महाभारतात दोन महान उपदेश आहेत : एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे, विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते!

विचार करा… ज्याची नावे सांगितली जात होती, तो स्वतः ऐकत होता!

 हे किती जुने आहे?

महाभारत युद्ध साधारण इसवीसनपूर्व ३०६७ मध्ये झाले, असे मानले जाते ~ म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास ५१०० वर्षे झाली आहेत.

५१०० वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठलेले; वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो. हा धागा तुटला नाही, कारण श्रद्धा तुटली नाही.

आजचा विचार :

पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जेव्हा म्हणाल, तेव्हा एक क्षण थांबा!

कुरुक्षेत्राच्या त्या भयाण रणांगणावर, बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिल; ते ५१०० वर्षांनंतर तुमच्या ओठांवर आहे.

हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत!

॥ॐ नमो भगवते वासुदेवाय॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औदुंबर… बालकवी ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ औदुंबर… बालकवी ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

☆ औदुंबर ☆

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

 *

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

 *

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

 *

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

– बालकवी 

बालकवींच्या “औदुंबर” कवितेचे रसग्रहण.

मराठी साहित्यात निसर्गाचे अत्यंत कोमल, चित्रमय आणि भावस्पर्शी वर्णन करणाऱ्या कवितांमध्ये “औदुंबर” या कवितेचे स्थान विशेष आहे. बालकवींनी अवघ्या काही ओळींत एक जिवंत निसर्गचित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. ही कविता वाचताना आपण एखाद्या शांत नदीकाठी उभे आहोत आणि त्या दृश्याकडे तल्लीन होऊन पाहत आहोत, असा अनुभव येतो.

कवितेच्या सुरुवातीलाच कवी म्हणतात की झऱ्याच्या दोन्ही तीरांवर हिरवीगार वनराई पसरलेली आहे. निळसर पाणी बेटाबेटांतून संथपणे वाहत आहे. या वर्णनामुळे मनात शांत, प्रसन्न आणि रमणीय वातावरण निर्माण होते. पुढे पाण्यातील काळसर डोह, त्यातील पांढऱ्या पायवाटा, हिरव्या कुरणांवर चरणारी जनावरे अशा तपशीलांमुळे दृश्य अधिक सजीव बनते.

बालकवींची एक मोठी ताकद म्हणजे शब्दांतून चित्र निर्माण करण्याची क्षमता. हिरवे, निळे, काळे, पांढरे अशा रंगछटांचा अत्यंत प्रभावी वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे कविता केवळ वाचली जात नाही, तर ती डोळ्यांसमोर उभी राहते.

मात्र या कवितेचे खरे सौंदर्य शेवटच्या ओळीत दडलेले आहे—

“पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.”

येथे औदुंबर वृक्षाचे मानवीकरण केले आहे. तो एखाद्या समाधानी, चिंतनशील ऋषीसारखा पाण्यात पाय सोडून शांत बसला आहे, असे वाटते.ही फक्त झाडाची प्रतिमा नाही. आयुष्याच्या धावपळीतून निवृत्त झालेला, जगाकडे शांत नजरेने पाहणारा एखादा ज्ञानी मनुष्यही त्या औदुंबरात दिसतो. सभोवताली हिरवळ, पाणी, पशुपक्षी, जीवनाची हालचाल सुरू आहे; पण औदुंबर मात्र निर्विकार, समाधानी  स्थिर आहे.ही प्रतिमा केवळ निसर्गचित्र राहत नाही, तर ती जीवनदृष्टी बनते. जगातील गोंधळ, धावपळ आणि अस्थिरतेच्या मध्यभागी स्थिर, शांत आणि समाधानी राहण्याचा संदेश या प्रतिमेतून सूचित होतो.

या कवितेचा स्थायीभाव शांत रस आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारी प्रसन्नता, निवांतपणा आणि अंतर्मुखता यांचा अनुभव कविता देते. अलंकारांच्या दृष्टीने मानवीकरण, अनुप्रास आणि चित्रमयता यांचा सुंदर उपयोग आढळतो.

“औदुंबर” ही केवळ एका वृक्षाची किंवा नदीकाठची कविता नाही. ती निसर्गाशी एकरूप होण्याची, क्षणभर थांबून जीवनाकडे शांत नजरेने पाहण्याची प्रेरणा देते. म्हणूनच ही कविता आजही वाचकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत राहिली आहे.

थोडक्यात, “औदुंबर” ही निसर्गसौंदर्य, शांतता, स्थैर्य आणि समाधानी जीवनदृष्टी यांचे अत्यंत प्रभावी कलात्मक दर्शन घडवणारी बालकवींची अजरामर कविता आहे.

© राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – नकार पचविता आला पाहिजे… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – नकार पचविता आला पाहिजे… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

रोज न्यूज पेपर उघडला की अगदी सहज दोन चार तरी बातम्या सहज वाचायला मिळतात.. प्रेमात नकार.. आयुष्य संपवले.. , परिक्षेमध्ये मिळालेल्या अपयशा मुळे विद्यार्थांनी उचलले टोकाचे पाऊल.. , मुलाना हवे ते खेळणे न मिळाल्यामुळे अल्पवयीन मुलाने जीवन संपवले.. , आयुष्यात मिळालेला नकार आणि प्रेमिकाचे टोकाचे पाऊल.. आपल्या मित्राची मैत्रिणीची हत्या.. अशा अनेक बातम्या वाचल्या की मन सुन्न होत.. नकार, अपयश न स्वीकारता आल्यामुळे टोकाची भूमिका घेतली जाते.. यातून येणारे नैराश्य स्वतःचे किंवा समोरच्याच्या मृत्यूचे कारण बनते, अपयश, नैराश्य ह्याने अहंकार दुखावतो आणि त्याचे परिणाम समाजाला, कुटुंबाला भोगावे लागतात.. छोट्या छोट्या नकारांमुळे मनावर परिणाम होतो आणि टोकाची पाऊले उचलली जातात.. आजकाल सगळ्यानाच इन्स्टंट सुख यश हव असत वाट बघण कोणालाच मंजूर नाही आणि याच मानसिकतेमुके अनेक अपराध घडतात अशा बातम्या विचार करायला भाग पाडतात.. काय चूक काय बरोबर ह्यातला फरक न कळल्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि आयुष्याची गाडी वळणावरून कधी घसरते आणि चुकीच्या मार्गावर कधी जाते हे कळत सुद्धा नाही.. हे सगळं टाळण्यासाठी आपल्या मनावर असणारा संयम आणि स्वतःवरील विश्वास फार महत्वाचा असतो.. नकार, अपयश ह्याकडे एक संधी म्हणून पाहिले तर आयुष्याच्या गाडीला योग्य दिशा मिळते आणि ही गाडी आपोआप ध्येयापर्यंत पोहचतेच गरज असते ती संयम आणि विश्वासाची..

नकार पचविता आला पाहिजे…

जीवनात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडतंच असं नाही. कधी नोकरीत, कधी व्यवसायात, कधी नात्यांमध्ये तर कधी आपल्या स्वप्नांच्या वाटेवर आपल्याला नकाराचा सामना करावा लागतो. नकार मिळाला की मन दुखावतं, आत्मविश्वास डळमळतो आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण खरं तर नकार हा अपयश नसतो; तो पुढे जाण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा एक टप्पा असतो.

नकार स्वीकारण्याची क्षमता माणसाला अधिक परिपक्व बनवते. प्रत्येक नकार आपल्याला काहीतरी शिकवून जातो—आपल्या चुका दाखवतो, सुधारण्याची संधी देतो आणि नवीन मार्ग शोधायला प्रेरित करतो. ज्याला नकार पचविता येतो, तोच संकटांवर मात करून यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

जीवनातील अनेक यशस्वी व्यक्तींना सुरुवातीला अनेकदा नकार मिळाले होते. पण त्यांनी त्या नकारांना शेवट न समजता नव्या सुरुवातीची संधी मानली. म्हणूनच नकार मिळाला तर खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे..

नकार हा आपल्या किमतीचा मापदंड नसतो. तो फक्त त्या क्षणी मिळालेला एक प्रतिसाद असतो. त्यामुळे नकार स्स्वीकारून त्यातून धडा घेतला पाहिजे आणि नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत कारण कधी कधी एक नकारच आपल्याला अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जात असतो.

नकार हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा अपरिहार्य अनुभव आहे. परंतु नकार मिळणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा तो कसा स्वीकारला जातो हे अधिक महत्त्वाचे असते. अनेकदा आपण नकाराला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, कर्तृत्वाचा किंवा अस्तित्वाचा नकार समजतो. त्यामुळे मन दुखावते, अहंकार जखमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण वास्तवात नकार हा व्यक्तीचा नसतो; तो एखाद्या परिस्थितीचा, निर्णयाचा किंवा त्या क्षणाच्या गरजेचा असतो.

नकार स्वीकारणे म्हणजे पराभव मान्य करणे नव्हे. उलट, वास्तव स्वीकारण्याचे धैर्य दाखवणे असते.. जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडेल, अशी अपेक्षा ठेवणे हेच दुःखाचे मूळ आहे. जेव्हा आपण आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा नकाराचे दुःखही कमी होते. कारण आपल्याला समजते की प्रत्येक गोष्ट मिळवणे हेच यश नाही; काही गोष्टी न मिळणेही आपल्या भल्यासाठी असू शक तात..

नकार माणसाला अंतर्मुख करतो. यशाच्या क्षणी आपण स्वतःकडे फारसे पाहत नाही; पण नकार मिळाल्यावर आपण स्वतःला प्रश्न विचारतो. माझ्यात काय कमी पडले? मी आणखी काय सुधारू शकतो? हा आत्मपरीक्षणाचा प्रवास माणसाला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच नकार हा अनेकदा व्यक्तिमत्त्व घडवणारा सर्वोत्तम शिक्षक असतो.

अहंकाराला नकार सहन होत नाही. कारण अहंकाराला नेहमी स्वीकार, कौतुक आणि मान्यता हवी असते. परंतु जीवन प्रत्येक वेळी आपल्याला मान्यता देईलच असे नाही. ज्याने स्वतःची किंमत इतरांच्या स्वीकारावर अवलंबून ठेवली आहे, तो प्रत्येक नकाराने तुटत जातो. पण ज्याला स्वतःची ओळख आणि स्वतःवरील विश्वास आहे, तो नकाराने ढासळत नाही. कारण त्याला माहीत असते की इतरांचा निर्णय माझ्या यशाची व्याख्या असू शकत नाही.

नकार पचविणे म्हणजे मनातील कटुता सोडणे असते अस मला वाटतं. अनेक जण नकार मिळाल्यानंतर राग, द्वेष किंवा सूडभावना बाळगतात. पण अशा भावना सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच करतात. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारणे आणि पुढे जाणे हीच खरी मानसिक ताकद आहे. नदीला दगड आडवा आला म्हणून ती थांबत नाही; ती नवीन मार्ग शोधते. तसेच जीवनातही अडथळे आणि नकार यांच्यावर अडकून न पडता पुढे वाहत राहणे गरजेचे असते.

खरे तर प्रत्येक नकारामध्ये एक संदेश दडलेला असतो. काही नकार आपल्याला अधिक मेहनत करण्याची आठवण करून देतात. काही नकार चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवतात. तर काही नकार आपल्या संयमाची परीक्षा घेतात. त्या संदेशाला समजून घेतले तर नकार ओझे राहत नाही; तो मार्गदर्शक बनतो.

ज्याला नकार स्वीकारता येतो, त्यालाच खऱ्या अर्थाने स्वीकार मिळतो. कारण नकारातूनच सहनशीलता, नम्रता, संयम आणि आत्मविश्वास यांचा जन्म होतो. यश माणसाला प्रसिद्धी देऊ शकते, पण नकार माणसाला गहन विचार करायला मदत करतो. यश तुमची ओळख निर्माण करते; नकार तुमचे व्यक्तिमत्त्व घडवतो.

म्हणून आयुष्यात जेव्हा नकार भेटेल तेव्हा त्याला शत्रू समजू नका. त्याच्याकडे शिक्षक म्हणून पाहा. कारण प्रत्येक नकार हा तुमच्या प्रवासाचा शेवट नसतो; तो तुम्हाला अधिक सक्षम, अधिक शहाणा आणि अधिक मजबूत बनवणारा एक महत्त्वाचा टप्पा असतो.

“ज्याला नकार पचविता येतो, त्याला जीवनातील कोणतीही परिस्थिती पचविता येते. कारण नकार स्वीकारणे म्हणजे वास्तवाशी मैत्री करणे होय. ”

“नकार हा शेवट नसतो; तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो.”

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग☆ शीला पतकी 

इयत्ता आठवी ड चा वर्ग… सहामाहीचे पेपर वाटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणितात नापास… कारण या विद्यार्थिनी बाहेरच्या शाळेतून आलेल्या… जिथे इंग्रजी फारसे करून घेतले जात नाही… आणि गणिताची तितकी तयारी नसते. या वर्गाला शिकवणारे आम्ही दोन शिक्षक मी आणि डॉक्टर पार्वतीबाई मोहोळकर !.. दोघी आम्ही मेहनती, मुलींबद्दल कळवळा, प्रेम, आपल्या विषयात तयार असल्या पाहिजे याची जाणीव. हे सगळं आमच्या दोघींकडे होतं. मग आम्ही ठरवलं की यांचं कोचिंग घ्यायचं. कोचिंगला सकाळी या मुली लवकर येत नाहीत कारण या मुलींना घरामध्ये कामाला खूप गुंतवले जाते. अतिशय खालच्या वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांनी असतात एकल पालक विद्यार्थिनी. पैशाची चणचण आणि मुलीला कुठेतरी कामाला लावलेले असते. त्यामुळे तिला सकाळी वेळ नाही. मग आम्ही ठरवलं शाळा सुटल्याबरोबर वर्गात घुसायचे एकाही मुलीला घरी जाऊ द्यायचं नाही पालकांना तशी कल्पना दिली होती आणि गुरुदक्षिणा म्हणून वर्गाला एक रुपया फी ठेवली होती. तीन दिवस मोहोळकर बाई इंग्रजी शिकवायचे आणि तीन दिवस मी गणित करून घ्यायची. मुलींना हा तास बुडवता येत नव्हता. अगदी बेसिक पासून आम्ही शिकवायला सुरुवात केली त्यामुळे मुलींना समजायला लागलं त्या शंका विचारायला लागल्या आणि त्यानंतरच्या नऊमाही परीक्षेमध्ये थोडी प्रगती झालेली दिसली. त्यांचाही उत्साह वाढला आमचाही उत्साह वाढला. आणि वार्षिक परीक्षेला मात्र त्या मुलीने कमालच केली सर्व मुलीने उत्तम गुण मिळवले होते आता एक चार दोन असतात ते सुधारत नाहीत ते सोडले तर बाकी सगळ्या मुलींनी चांगले मार्क मिळवले चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने जिथे आज सात आठ दहा पंधरा मार्क पडायचे तिथे ते 40 45 50 पर्यंत गेल्या मुख्य म्हणजे त्यांना विषयाची गोडी लागली, आणि आम्हाला खात्री पटली की आता या दहावीपर्यंत नापास होणार नाहीत. या वर्गाला असणारी एक रुपया फि. वर्गांची संख्या 50 ते 55. शेवटचा वर्ग असायचा. साधारणपणे महिन्याला चाळीस एक रुपये जमायचे. बाकी काही गरीब विद्यार्थीना रुपयाही माफ होता. त्यातले 20 डॉक्टर पार्वती बाई मोहोळकर आणि वीस शीला पत्की अशी वाटणी व्हायची. वीस रुपये फी मिळत असताना आम्ही तीन दिवस एक तास जीव तोडून शिकवत होतो त्या तर बाई पीएचडी करत होत्या.

दुसरी घटना मी मुख्याध्यापक झाल्यावर रिझल्ट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दहावी वर प्रयत्न सुरू झाले दहावीत जातानाच सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एका वर्गात घातल्या जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून ठोस काही करून घेता येईल. त्या सर्व मुलींच्या पालकांची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितले की आम्ही या वर्गाला कोणतेही शुल्क घेणार नाही. फक्त मुलींना सकाळी बरोबर आकरा वाजता पाठवा. पालकांची मीटिंग झाली ह्या मुलींवर आता काम केले तर त्या सहज दहावी पास होऊ शकतील असा विश्वास आम्ही पालकांना दिला. कारण त्यावेळेला वीस मार्काच्या कुबड्या नव्हत्या. पालकांनाही कल्पना पटली एक महिना हा वर्ग चालू ठेवला तेव्हा बऱ्याच विद्यार्थिनी उशिरा येत होत्या किंवा आल्या तर बाहेर बसायच्या असे चालू झाले. पुन्हा एकदा विद्यार्थिनी आणि पालक यांची एकत्रितरित्या मीटिंग घेतली. त्यामध्ये एक अडाणी असलेल्या पालक बाई म्हणाल्या,

“मी या सगळ्याची जबाबदारी घेते रोज अकरा वाजता मी येऊन शाळेपाशी बसते एकही मुलगी इकडे तिकडे फिरणार नाही सगळ्या आत जातील ही जबाबदारी मी घेते आणि त्या बाईने मुलींना एक लेक्चर दिले अगदी… का ग टिंब टिंब नो एवढी शाळा तुमच्यासाठी काय काय करायली,… ही बाई एवढं तळमळून सांगायली… अन तुम्हाला नग वाटते होय ग… आमच्या काळात शिक्षण नव्हतं म्हणून आमची अशी तरा झाली… तुम्हाला एवढ आम्ही शाळेत घातले चांगले शिका की 

… मग बसाल आमच्यासारख्या भाकऱ्या थापत अन शेण लावत. अगं पोरींनो तुम्ही पास झाला तर तुमच्या आई बाचं नाव होईल ह्या बाईचं नाव होणार आहे का ?ऐका जरातेवढी तळमळून सांगायला लागली “

झालं या भाषणा नंतर सभेचा नूरच बदलला प्रत्येक पालकाने आपल्या मुलीची जवाबदारी घेतली वर्ग व्यवस्थित सुरू झाले आणि त्यावर्षीचा रिझल्ट सेवासदन च्या आत्तापर्यंतच्या रिझल्ट मध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के लागला तेव्हा एवढे रिझल्ट लागत नव्हते आणि कॉपी वगैरे प्रकरणं फार प्रचलित नव्हती आणि आमच्या शाळेत तर नाहीच नाही.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज एक बातमी वाचली 45 हजार रुपये देणाऱ्यांनाच मोटेगावकर प्रश्न देत असत.

फुकट शिकवल्यावर किंमत नसते म्हणून 1रू घेऊन महिनाभर शिकवणारे आम्ही शिक्षक आणि त्याला गुरुदक्षिणा हे भक्कम नाव देणारे… आणि शाळेचा निकाल उत्तम पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी मुलींच्या वर्गाचे नियोजन करूनमोफत शिकवणारे आमचे शिक्षक त्याला सहकार्य करणारे पालक या सगळ्या घटना 20-22 वर्षांपूर्वीच्या आहेत 22 वर्षांमध्ये एवढ अधःपतन व्हावे याचे वाईट वाटले…!

आता तुम्ही म्हणाल तुमचं काय नीट च नव्हतं पण आमचं त्या गरीब मुलींचं नीट व्हावं म्हणून तरी नक्कीच होतं

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे वळण येते जिथे शब्दांच्या तलवारीने काळजावर वार केले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला सतत अपमान करते तेव्हा सुरुवातीला मनात संताप येतो मग वेदना होते आणि हळूहळू आपण स्वतःच्याच नजरेत स्वतःला कमी लेखू लागतो. पण खरं सांगू का?अपमान हा देणाऱ्याचा स्वभाव असतो पण तो स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार कटू शब्द बोलते तेव्हा ती प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या मनातील गोंधळ मत्सर किंवा न्यूनगंडाला वाट करून देत असते. आपण मात्र ते शब्द एखाद्या ओझ्यासारखे आपल्या खांद्यावर वाहत राहतो.

खरंतर समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावरील खडकावर आदळून परत फिरतात तसाच आपला स्वभाव असायला हवा. खडक शांत असतो स्थिर असतो आणि लाटांच्या आदळण्याने त्याचे अस्तित्व संपत नाही. आपली शांतता हेच अशा अपमानाला दिलेलं सर्वात सडेतोड उत्तर असतं. कारण आपण जेव्हा प्रत्युत्तर देतो तेव्हा आपण नकळत समोरच्याच्या पातळीवर उतरलेलो असतो. कधीकधी हा अपमान आपल्याला खूप काही शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला कमी लेखलं ज्यांनी आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं तेच लोक कळत-नकळत आपल्याला प्रगतीची जिद्द देऊन जातात. अपमान पचवणं सोपं नसतं पण जो तो पचवून त्याचं रूपांतर ऊर्जेत करतो तोच इतिहासाच्या पानात स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितो.

जगातील मोठ्या क्रांती या बहुतेक वेळा कोणाचे तरी हसे उडवल्यामुळे किंवा कोणाचा तरी घोर अपमान झाल्यामुळेच घडल्या आहेत. अशा वेळी स्वतःला दोष देणं थांबवा. तुमच्या सौंदर्याची तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्या कर्तृत्वाची किंमत एखाद्या व्यक्तीच्या शब्दांवरून ठरत नाही. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यापासून हळूच दोन पावलं मागे होण्यातच शहाणपण असतं. स्वतःचा आदर करायला शिका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा जगातील कोणताही शब्द तुम्हाला जखम करू शकत नाही. तुमचं मौन इतकं प्रगल्भ असू द्या की समोरच्याला स्वतःच्या शब्दांच्या पोकळपणाची जाणीव व्हावी. शेवटी सूर्याला कोणी कितीही दूषणं दिली तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही तसंच तुम्ही तुमच्या तेजाने तळपत राहा अपमान करणाऱ्यांचे शब्द आपोआप हवेत विरून जातील. तुमच्या शांततेत इतकी ताकद असू द्या की, समोरच्याच्या शब्दांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.

“मित्रांनो;काळजी घ्या… “

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी

महात्मा गांधी हे टागोरांपेक्षा बरेच लहान. पण दोघे अगदी सख्खे मित्र होते. गंमत म्हणजे ही मैत्री ते समविचारी आहेत म्हणून होती कां, तसेही नाही. आपण म्हणतो नं, ‘तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय गमेना’ तसा प्रकार आहे हा! कित्येक बाबतीत त्यांच्यात मतभेद होते, कधी कधी टोकाचे, पण त्यामुळे मैत्रीत बाधा आली नाही.

त्यांच्यातल्या मतभेदाला सुरवात, गांधींजींनी शांतिनिकेतनला दिलेल्या पहिल्या भेटीपासूनच झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि लगेंच ६ मार्च १९१५ ला त्यांनी शांतीनिकेतन ला पहिली भेट दिली. तोपर्यंत टागोर जगप्रसिद्ध झाले होते, कारण १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.

शिक्षणाबद्दलच्या विचारात दोघांमध्ये मूलभूत मतभेद होते. गांधीजींच्या मते शिक्षण हे व्यावहारिक व सर्वांगीण विकासावर केंद्रित हवे. जागतिक प्रवाहाशी जुळवून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना गरजेचा वाटत नव्हता. याउलट टागोरांचा शिक्षण विषयीचा दृष्टिकोन वैश्विक होता. तरीही भारतीय परंपरांचा पण शिक्षणात अंतर्भाव व्हायला हवा म्हणून त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय परंपरा व आंतरराष्ट्रीय मूल्ये यांचा मेळ घालणारे शिक्षण देणारी व्यवस्था होती. यामुळे गांधीजी शांतिनिकेतनच्या शिक्षण पद्धतीवर संतुष्ट नव्हते.

गांधींच्या मते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी. नोकर, स्वयंपाकी, झाडूवाले, पाणीवाले यांची गरज नसावी. त्यांनी हे मत टागोरांकडे व्यक्त केलं व टागोरांनीही कोणताही किंतु न बाळगता ही पद्धत अंमलात आणली. तो दिवस (१० मार्च) ‘गांधी दिवस’ म्हणून रविंद्रनाथांनी घोषित केला. आजही तेथे या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते व विद्यार्थी सर्व कामे करतात.

स्वातंत्र्य, समता व मनुष्य धर्म यांची दोघांनाही ओढ आहे पण गांधीनी लोकलढ्याचा मार्ग अवलंबिला. मात्र टागोरांना अहिंसात्मक लढा प्रसंगी हिंसक होतो याचे भय वाटे. हा लढा सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे करतो यावर दोघांचा विश्वास होता. पण विराट समुदायाच्या भावनांना गांधी ऐनवेळी कसा आवर घालणार ही चिंता टागोरांना होती. उपोषणात टागोरांना अतिरेक दिसे तर गांधीजींना त्यात आत्मशुद्धी दिसे. उपोषण हा एक अहिंसक जुलूम आहे ही टागोरांची भूमिका तर तो नैतिक बळाचा वापर आहे ही गांधीजींची भूमिका होती.

दोघेही वसाहतवाद व भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण गांधीजींनी राजकारणाचा मार्ग स्विकारला आणि टागोरांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्राचा! असहकार चळवळ, शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, परदेशी कपडे जाळणे याला टागोरांचा प्रचंड आक्षेप होता.

रोज अर्धा तास प्रत्येकाने चरखा चालवावा असे आवाहन गांधीजींनी केले, तेव्हा टागोर उपहासाने म्हणाले, “जर यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार असेल तर मग अर्धा तास का, साडे आठ तास का नाही?” एकूणच गांधींच्या चरखा प्रकरणावर ते टीका करत, व यामुळे भारत पुन्हा मध्ययुगात जाईल, अशी शंका व्यक्त करत.

स्वातंत्र्य चळवळीत उपेक्षित घटकांसह समाजातील सर्व घटकांच्या समावेशाचा आग्रह गांधीजींनी धरला. हिंदू मुस्लिम ऐक्य, दलितांची उन्नती यावर त्यांनी भर दिला. ते अनेकदा पाश्चात्त्य संस्कृतीवर टीका करत. याउलट टागोरांचा राष्ट्रवाद विश्व व्यापी व मानवतावादी होता.

बिहारच्या भूकंपानंतर गांधीजी म्हणाले होते, “हरिजनांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकल्याबद्दलची ही शिक्षा देवानेच दिली आहे. “

यावर टागोरांनी कडाडून टीका केली. कारण ते अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. वैज्ञानिक प्रगतीनेच राष्ट्र समृद्ध होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

दोघेही अहिंसा, सहिष्णुतेवर आधारित मानवतावाद व निसर्ग प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही आत्मनिर्भरतेच्या बाजूने होते. दोघेही गरिबी व दयनीय अवस्थेत जगणाऱ्यांच्या बद्दल प्रेम व सहानुभूती बाळगून होते. दोघेही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व आध्यात्मिक इतिहासाचा अभिमान बाळगणारे होते.

गांधीजींच्या मते, माणसे सगुण ईश्वराची पूजा करत असतील तर ती मानसिक गरज म्हणून पहावी. जनसामान्यांना दिलासा देणारा परमेश्वर त्यांना मान्य होता. टागोरांचं उपनिषदीय अध्यात्म सामान्यांच्या पचनी पडणारं नाही म्हणून त्यांना पसंत नव्हतं.

गांधीजींना ईश्वर सत्यामधे दिसत होता तर टागोरांना ईश्वर प्रेमात दिसत होता व दोघांचे मार्गही वेगळे होते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तर टागोरांनी सहकार्य, परस्पर आदर व सहिष्णुतेच्या मार्गाने प्रेम म्हणजेच ईश्वर मिळविण्याचा प्रयत्न केला.

दोघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता. दोघे एकमेकाचे प्रचंड चाहते होते. मूल्ये सारखीच पण तपशिलात मतभेद होते. त्यांच्यात सतत पत्र व्यवहार होत होता. त्यात मतभेदांची मोकळी चर्चा व्हायची कारण दोघांनाही परस्परांची थोरवी मान्य होती. आणि त्यामुळेच गांधीजींनी टागोरांचा उल्लेख ‘गुरुदेव’ असा केला तर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली 

दोघांनीही मैत्रीचे नाते कसे निभावले याचीही उदाहरणे आहेत.

अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या ब्रिटिश प्रस्तावाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटल्याने टागोर स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यावेळी सुदैवाने इंग्रज सरकारने त्यांची मागणी मान्य केली होती आणि या नेत्याने उपोषण सोडले. त्यावेळी महात्माजींनी टागोरांना स्वतः रचलेले गाणे गाण्याची विनंती केली आणि खरोखरच टागोरांनी ‘जीवन जाखन शुकै ए जय करुणाधारे’ हे गाणे म्हटलं.

विश्वभारतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने नृत्य नाट्य पथक घेऊन टागोर दिल्ली दौरा करत होते. ही बातमी गांधीजींपर्यंत पोहोचली. इतक्या उतार वयात निधी गोळा करण्यासाठी त्यांना फिरताना पाहून गांधीजींना अतीव दुःख झाले. गांधीजी त्यांना भेटले व त्यांच्या पैशाची व्यवस्था ही केली.

टागोरांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४० मध्ये गांधीजी कस्तुरबांसह या आजारी कवीला भेटायला गेले होते. टागोरांनी त्यांना विनंती केली की आपल्या नंतर गांधींनी विश्वभारतीचा कार्यभार स्वीकारावा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१ मध्ये विश्वभारती ला भारत सरकारने केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.

एकाच वेळी एकमेकांचे विरोधक व प्रशंसक असणाऱ्या या दोन महान विभूतीं सारखी शुद्ध, स्पष्ट व आदरयुक्त मैत्री पुन्हा होणे नाही.

—–

☆ गीत : ८२ ☆

TIME is endless in thy hands, my lord. There is none to count thy minutes.

Days and nights pass and ages bloom and fade like flowers. Thou knowest how to wait.

Thy centuries follow each other perfecting a small wild flower.

We have no time to lose, and having no time we must scramble for our chances. We 

are too poor to be late.

 

And thus it is that time goes by while I give it to every querulous1

 man who claims it, and thine altar is empty of all offerings to the last.

 

At the end of the day I hasten in fear lest thy gate be shut; but I find that yet there is time.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८२ ☆

मोजतसे क्षण।

कोण तुझे पण।

काळाचे बंधन।

तुला नाही॥

 

दिस राती जाती।

ऋतु सरताती।

युगे युगे भक्ती।

वाट पाही॥

 

काळ तुझ्या हाता।

फुले उमलता।

आणिक सुकता।

काय राही॥

 

सृष्टी आवडीने।

निर्मि सवडीने।

काळ कावडीने।

पाणी भरी॥

 

आम्ही तो पामर।

काळाचे चाकर।

मिळता भाकर।

सारे साहू॥

 

असे ज्याचा त्याचा ।

आपल्या वाट्याचा।

त्याच्या प्रसादाचा।

कालखंड॥

 

माझ्या वेळे साठी।

सगेच भांडती।

कसा तुझ्या साठी।

वेळ काढू॥

 

साधे ना सकळ।

न काढी जो वेळ।

तो तुझ्या जवळ।

जाता न ये॥

 

दिसाच्या शेवटी।

येतो तुझ्या कुटी।

दार जगजेठी।

लावू नको॥

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८३ ☆

MOTHER, I shall weave a chain of pearls for thy neck with my tears of sorrow.

The stars have wrought their anklets of light to deck thy feet, but mine will hang upon thy 

breast.

Wealth and fame come from thee and it is for thee to give or to withhold them. But this my sorrow is absolutely mine own, and when I bring it to thee as my offering thou rewardest me with thy grace.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८३ ☆

जरी चंद्रतारका घेऊन येती

पैंजण रुणझुण तुझ्या पदाला॥

*

ओवीन म्हणतो तुझियासाठी

माझ्या दुःखाश्रुंची माला

जी रुळेल तव वक्षावरती

हृदयाशी करी हितगूजाला॥

*

मानमरातब आणिक मत्ता

तूच देतसी, तूच घेतसी

दुःखावर परी माझी सत्ता

अर्पित तुजला, घे हृदयासी॥

*

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८४ ☆

IT is the pang of separation that spreads throughout the world and gives birth to shapes innumerable in the infinite sky.

It is this sorrow of separation that gazes in silence all night from star to star and becomes lyric among rustling leaves in rainy darkness of July.

It is this overspreading pain that deepens into loves and desires, into sufferings and joys 

in human homes; and this it is that ever melts and flows in songs through my poet’s 

heart.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८४ ☆ 

☆ 

विरह वेदना भुवना व्यापिते

अंबरी अगणित रचना निर्मिते॥

*

नीरवतेतुन ती अंधारी फिरते

सहसंवेदना ताऱ्यांत शोधिते॥

*

तीच आणखी बनुनी गीते 

पाऊसओल्या पानी सळसळते॥

*

ही अनुभूती वैश्विक असते

प्रेम, अपेक्षा यातही रुजते॥

*

आनंद, यातना घरोघरी पाहते

तीव्रता तयांची हृदयी सांडते॥

*

माझे कवीमन त्यात अडकते

काव्य त्यातुनी जन्मा येते॥

☆ 

– क्रमशः भाग २८

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी ☆

सुनिता जोशी

 

? इंद्रधनुष्य ?

☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी

जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो; पण बऱ्याच वेळा, गजर न वाजता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो. यालाच बायो-क्लॉक म्हणतात. बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की, माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते. तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरु होतात, असेही त्यांना ठामपणे वाटते. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वत:च आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात. म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात. खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पध्दतीने प्रोग्राम करतो. चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत! चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात. या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट आहे. आणि म्हणूनच! तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या! हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा!

१. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा. नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो.

२. ४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा. वृध्दत्व हे १२० वर्षांनंतरच सुरु होते, असे स्वत:ला पटवा.

३. केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा. नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा. कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा. हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला वृध्द समजू नका.

४. खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करु नका. उदा. हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे असे विचार टाळा. त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की, ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुध्द होत आहे आणि माझ्यासाठी अमृतासमान आहे. हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल. अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानिकारक ठरतात.

५. सदैव सक्रिय राहा. चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा.

६. वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते, यावर विश्वास ठेवा. (हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)

७. आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत. जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही. म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा! रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मन मोकळं हसा!

८. मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही! तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते. बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा! दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल! जगण्याचा आनंद घ्या….

लेखक – रणजीत भोसले

प्रस्तुती : सुनीता जोशी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ हसणं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हसणं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

हसणं : ओठांवरचं नव्हे, तर काळजातून येणारं लेणं!

​’हसणं’ ही ईश्वराने फक्त माणसाला दिलेली एक अद्भुत देणगी आहे. पण आजच्या धावपळीच्या जगात आपण हे साधं, सोपं सुख कुठेतरी हरवून बसलोय की काय, असं वाटतं. ज्या दिवशी आपण मनमोकळं हसलो नाही, तो दिवस खरोखरच ‘वेस्ट’ आहे.. !

आयुष्यात संकटं कोणाला नाहीत? प्रत्येकाच्या पाठीवर दुःखाची एक छोटी-मोठी गोणी असतेच. पण जो माणूस या संकटांकडे बघून एक ‘तिरकस’ का होईना, पण हसू देऊ शकतो, त्याच्यातला अर्धा ताण तिथेच विरघळतो.

लहानपणीच्या त्या “हसी तो फसी” या डायलॉगमध्ये आपण अडकून पडलो होतो, पण मोठेपणी कळतं की हसू हे कोणाला ‘फसवण्यासाठी’ नाही, तर स्वतःला ‘सावरण्यासाठी’ असतं. लाफ्टर थेरपीमध्ये कृत्रिमरीत्या हसणारे लोक जेव्हा आपण पाहतो, तेव्हा जाणीव होते की, ‘आतलं हसू’ आज किती महाग झालंय. समोरच्याचा अपमान करण्यासाठी आलेलं हसू हे विष असतं, तर कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी दिलेलं हसू हे अमृत असतं. स्वतःवर हसायला ज्याला जमतं, त्याला जग जिंकणं सोपं जातं. जगातील सर्वात पुण्यवान माणूस तोच, जो स्वतःच्या डोळ्यात पाणी असताना समोरच्याला हसवण्याची ताकद ठेवतो.

तुमचा हसरा चेहरा हा केवळ तुमचा दागिना नाही, तर तो तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक आशेचा किरण असतो. म्हणूनच, अट्टाहासाने का होईना, पण हसायला शिका. आरशात बघून स्वतःला एक स्माईल द्या, जुन्या आठवणी काढून मित्रांसोबत खिदळा आणि हो… एखादा विनोद समजला नाही, तरी दुसऱ्याचं हसू बघून हसा! त्यातही एक वेगळीच मजा आहे.

हसण्याचं हे ‘बजेट’ कधीच कमी होऊ देऊ नका!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “बुद्धि दे रघुनायका ..” – कवी : श्री समर्थ रामदास ☆ रसग्रहण –  श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? काव्यानंद ?

☆ “बुद्धि दे रघुनायका ..” – कवी : श्री समर्थ रामदास ☆ रसग्रहण –  श्री दिवाकर बुरसे ☆

काव्यानंद

समर्थांची मूळ कविता…

☆ बुद्धि दे रघुनायका ☆

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

 *

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥

कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

 *

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥

बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

 *

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥

सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

 *

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥

अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

 *

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥

मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

 *

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

 *

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥

आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

 *

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥

हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

 *

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥

आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥

सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी

 बुद्धी दे रघुनायका

साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर

🪷

प्रस्तावना

दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची स्विकृती आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.

समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. “युक्ति नाही बुद्धि नाही” अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ स्विकृती देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे!

ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.

आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश

“युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥”

या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.

साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही स्विकृती म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.

मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ

“मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…”

मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.

ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.

परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका. ”

हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.

सामाजिक अपुरेपणाची वेदना

“बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…”

येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.

“संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥”

या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?

ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.

असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश

“चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…”

मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.

“कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…”

येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.

निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी

“आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…”

ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.

समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.

 समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया

ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.

स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे “बुद्धी दे रघुनायका. ”

ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.

समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—

“मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.”

रसग्रहण – श्री दिवाकर बुरसे,

पुणे

संपर्कः ९५ ५ २६ २९ २ ४ ५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares