मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खरंच कां? …. सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? काव्यानंद ?

☆ खरंच कां? …. सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

 

कविता – खरंच कां? – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 

खरंच कां?

बघतां बघतां हे काय झालं?

गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं–

कळलं नाही माझं मला,

असं कसं झालं?

खरंच कां वय माझं उताराला लागलं?

 

आपणही काही चवीढवीचं ,

करावंसं वाटलं

 कसं कोण जाणे ,

भांडं हातातुन निसटलं

आवाज कानी आदळला—

कोण आत कडमडलं?

तेल तर सांडलंच—अन्–

पाठी धुपाटणं आलं—    

खरंच का वय माझं उताराला लागलं?

 

फुलांच्या ठेल्याजवळ

घुटमळले मी जरा,

हळुच,स्वारींना म्हटलं–

“घ्याना गडे –गजरा—“

डोळे मोठे करीतच हे वदले,

“जरा वयाचा विचार करा”

माझी मीच गोरीमोरी,

भोवताली पाहिलं–

खरंच का वय माझंउताराला लागलं?

 

हौसेनं नातवंडांच करायला गेले,

तर सुनबाईनं मान हलवत

नाक की हो मुरडलं—

नात म्हणाली,

 “आजी नको मधे मधे येऊ,

तुझं तू बघ आपलं—“

तुम्हीच सांगा आता—

माझं काय चुकलं–?

खरंच का वय माझं उताराला लागलं?

 

हसतच हे म्हणाले,

“बाईसाहेब,संपली तुमची सद्दी,

स्वखुशीने सोडलीत ना ,

तुम्ही तुमची गादी?

बाहेर पडा यातुन जरा,

पुसा डोळे ,चेहरा करा हसरा

साहित्य-साधनेसारखा

मित्र नसे दुसरा”

मलाही सारं पटलं—

ष्रसन्नपणे हसतच,

कुठे कुठे विसावायचं,

माझं मी ठरवलं–

माझं मी ठरवलं.

 

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

कोथरूड- पुणे. मोबा. 9595557908/02

 

आवडलेल्या कवितेचे रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर

स्थूलमानाने, कवितेचे  २ महत्वाचे पैलु म्हणजे आशय आणि  अभिव्यक्ती. सोप्या भाषेत—

“काय सांगितले?” आणि “कसे सांगितले?”

कोणतीही कविता वाचतांना हे दोन्ही पैलु डोळसपणे ,वेगवेगळ्या अंगाने पारखणे ,आणि त्याच कसोटीवर कवितेचा जनमानसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे म्हणजे रसग्रहण.त्यामुळे कवितेचा आस्वादही मनापासुन घेता येतो. दुःख, आनंद,आश्चर्य, भिती, प्रेम, वात्सल्य राग, चीड ,संताप अशा कोणत्या ना कोणत्यातरी भावना मनात निर्माण होतात.कविता मनाची पकड घेते. कविता भावते.

अशीच एक भावलेली कविता.,ज्यावर आज मी माझे विचार मांडणार आहे.

ही कविता आहे शुभदा कुलकर्णी ,पुणे यांच्या भावफुले या काव्यसंग्रहातील. डॉ अमृता ह. मराठे यांनी अभ्यासपूर्ण,सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. अमृताताईंनी म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक, वैचारिक, निसर्गविषयक, सणांसंबंधी अशा विविध विषयांवरील कवितांनी समृध्द असा हा काव्यसंग्रह आहे.सर्वच कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.

पण मी ही कविता निवडली कारण ती वाचतांना मला वाटले की मी जणु माझेच प्रतिबिंब आरशात पहात आहे.

विषय तसा साधाच, — सामान्य संसारी स्त्रीचा. ती स्वीकारत असलेल्या  वेगवेगळ्या भुमिका,.

त्या वठवतांना ,कालानुरूप बदलतांना,मनाला जाणवणारी थोडीफार खंत उदास करते.

खरंच ,हे कारण असेल का?

हा संभ्रमही मनात निर्माण होतो. शुभदाताईंनीकवितेला दिलेले नावही साधे पण सार्थ आहे.

खरंच कां?

कवितेच्या आधी व्यक्त केलेल्या मनोगतात त्या म्हणतात, “वय उतारा लागलं ,cहे स्विकारलं की ,सगळं सोपं होत.—थोडा मनःस्ताप—पण आनंदाचे नविन मार्ग शोधावे—“

पहिल्या ४ कडव्यात नेहमीच्या चाकोरीबद्ध पध्दतीने स्वीकारलेल्या भुमिका,अन् त्यामुळे येणारा काहीसा खेदजनक अनुभव मांडला आहे.

स्त्री –घराचा केंद्रबिंदू –सर्वेसर्वा-.-गृहस्वामिनी,–ही तिला आवडणारी भुमिका .पण कळतनकळत ती या भूमिकेतून बाहेर पडते .अन् तिला काय वाटते ते शुभदाताईंनी १ ल्या कडव्यात सांगितले आहे.

“बघता बघता हे काय झालं?

गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं– कळलं नाही माझं मला,असं कसं झालं?

खरंच का माझं वय उताराला लागलं?””

पुर्ण घराची राणी राहिली नाही तरी ,स्वयंपाक —तिचा हुकमाचा एक्का तरी हातात आहे असे वाटते. त्याच्या वापर करुन खेळात बाजी मारता येईल असे तिला वाटते.. पण तिथला अनुभव–? छान शब्दांत मांडला आहे या दुसऱ्या कडव्यात–

 “”आपणही काही चवीढवीचं,

करावंसं वाटलं,

कसं कोण जाणे ,भांडं हातातुन निसटलं,

आवाज कानी आदळला—

कोण आत कडमडलं?

तेल तर सांडलच–अन्

पाठी धुपाटणं आलं–

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

ठीक आहे.,काम होत नसेल आता.शरीर,भले थकले तरी मन जवानीत रमु पहाते.  . आयुष्यभराचा जोडीदार तरी आपल्या भावना समजुन घेणार ही अपेक्षा असते.आणि तेही रास्तच आहे. पण?

त्याबाबत काय होते ते सांगणारे पुढचे कडवे —

“”फुलांच्या ठेल्याजवळ घुटमळले

मी जरा,

हळुच स्वारींना म्हटलं–‘घ्या ना गडे गजरा’

डोळे मोठे करीतच हे वदले,’जरा वयाचा विचार करा’

माझी मीच गोरीमोरी,भोवताली पाहिलं—

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

नातवंडे —- दुधावरची साय.अन् आजी म्हणुन मनात मायाममतेचा पुर भरुन येतो.त्याची ऊधळण नातवंडावर करावी असे वाटणे स्वाभाविक आहे.पण त्याही बाबतीत

काय होऊ शकते हे ४  थ्या कडव्यात सांगितले आहे.

“”हौसेनं नातवंडांचं करायला गेले ,

तर सुनबाईंनं मान हलवत नाक की

हो मुरडलं—

नात म्हणाली, ‘आजी नको मधे मधे येऊ,

तुझं तु बघ आपलं-‘-

तुम्हीच सांगा आता,माझं काय चुकलं?

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

कोणीही समजुन घेत नाहीत ,मनासारखे होतच नाही मग निराशा येणारच. पण,शुभदाताईंनी शेवटच्या ५ व्या कडव्यात एकदम यु टर्न घेतला.

“”हसतच हे म्हणाले,

‘बाईसाहेब, संपली तुमची सद्दी,

स्वखुषीने सोडलीत ना,

तुम्ही तुमची गादी?

बाहेर पडा यातुन जरा,पुसा डोळे,

चेहरा करा हसरा,

साहित्य-साधनेसारखा मित्र नसे दुसरा

            मलाही सारं पटलं–

 प्रसन्नपणे हसतच,कुठे कसं विसावायचं

माझं मी ठरवलं, —माझं मी ठरवलं

बदलत्या काळाप्रमाणे, वाढत्या वयामुळे जुन्या मार्गावरून चालणे शक्य होणार नाही. तिथे नाकारले गेलो तरी त्याची खंत न करता, नविन मार्गावरून नेणारा कोणीतरी जोडीदार भेटतो. आणि वाढत्या वयातही नव्या मार्गक्रमणाचा आनंद मिळवता येतो.

खरंच, किती सकारात्मक विचार शुभदाताईंनी आपल्या कवितेतुन मांडला आहे.

मला वाटते,काही तरुण मैत्रिणी अपवाद आहेत.पण बर्‍याच ज्येष्ठ मैत्रिणींच्या दृष्टीने  आपला साहित्यसमुह म्हणजे  असाच भेटलेला जोडीदार .आणि आपणही त्याच्या हातात हात घालुन साहित्यसेवेच्या या मार्गावरून आनंदाने विहार करीत आहोत,.

कारण आपले ब्रीदवाक्य

” लिहा आणि लिहित्या व्हा”

हेच आहे.

माझ्या एका मैत्रिणीनेच लिहीलेली ही कविता  मला आवडली, म्हणुनच तुमच्यासाठी  निवडली.

धन्यवाद.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

 

?विविधा ?

☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर ☆

प्रसिद्ध कथ्थक कलाकार पंडीत बिरजु महाराज यांचे वयाच्या ८३व्या  वर्षी नुकतेच निधन झाले…

जणू भारतीय संगीताची लयच थांबली.

सूर मुके झाले.

भाव शून्य झाले..एक विलोभनीय मुद्रा लोप पावली..

कथक नृत्य हा शब्द उच्चारताच,बिरजु महाराजांचेच नाव ओठावर येते.कथ्थक आणि बिरजु महाराज यांचे असे घट्ट नाते होते.

नृत्याला अभिजात कला न मानता,केवळ अंगविक्षेप म्हणून हेटाळणी केली जायची. त्या काळात,बिरजु महाराजांनी नृत्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.नृत्यकलेतील अस्सलअभिजातता त्यांनी जपली.

शिवाय नृत्य हे स्त्रियांनी करण्याचा प्रकार आहे.

पुरुषांच्या जातीला हे बरोबर नव्हे,अशा मध्ययुगीन मानसिकतेला बिरजु महाराजांचे नृत्यमय  आयुष्य हे एक पद्धतशीर प्रभावी ऊत्तर आहे.

गायन ,वादन, व नृत्य याचा एकत्रित अविष्कार म्हणजे संगीत.पण गायन आणि वादनाकडे प्रतिष्ठेने पाहिले जाते.त्यामानाने नृत्याला ही प्रतिष्ठा फार उशीरा प्राप्त झाली.

बिरजु महाराज हे लखनौ घराण्यातील प्रमुख प्रतिनिधी होते.कालिकाबिंदादीन या घराण्याची गौरवशाली परंपरा त्यांनी जपली आणि जगभर त्याचा प्रसार केला.

बिरजुमहाराजांचे मूळ नाव, ब्रिजमोहन मिश्रा.

४फेब्रुवारी १९३८रोजी त्यांचा कथ्थक कुटुंबात जन्म झाला.त्यांचे वडील अच्छान महाराज आणि काका शंभुराज हे ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध कलाकार होते.वडीलांचे अकाली निधन झाल्यामुळे बिरजु महाराजांवर लहान वयात कुटुंबाची जबाबदारी येउन पडली.त्यांनी कथ्थक नृत्याचे धडे आपल्या काकांकडून घ्यायला सुरवात केली.

त्यांचे आयुष्य म्हणजे एक ध्यास होता. शास्रीय नृत्याचा..कथ्थक नृत्याविषयी त्यांनी समाजभान जागृत केले. कोठीतले नृत्य म्हणून ओळख असणार्‍या कलेला त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले.

त्यांनी अनेक शिष्य घडवले.

या वयातही त्यांचा नृत्याविष्कार तरुणांना लाजवेल इतका लोभस होता..

सरकारने त्यांना पद्मविभूषणाने गौरवले.

पुण्याच्या कला आणि आध्यात्म जगताने त्यांना लक्ष्मी—वासुदेव—कलाभूषण पुरस्कार दिला.

बिरजु महाराज यांनी अनेक बाॅलीवुड चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. उमराव जान,बाजीराव मस्तानी, देढ ईश्कीया या चित्रपटांतील त्यांनी दिलेले नृत्याविष्कार हे अत्यंत प्रेक्षणीय आणि विलोभनीय आहेत…

दिल्लीत कलाश्रम नावाचे नाट्य विद्यालय त्यांनी सुरू केले..या माध्यमातून अनेक शिष्य घडले,घडत आहेत आणि कथ्थक या भारतीय नृत्यकलेची परंपरा जपली जात आहे..

बिरजुमहाराज हे कथ्थक गुरु तर होतेच.

पण ते उत्कृष्ट गायक होते.तबला,सरोद,व्हायोलिन या वाद्यांचे निष्णात वादकही होते.उत्तम दर्जाचे चित्रकार होते.तसेच कोशाकार,लोकसाहित्याचे अभ्यासक,संग्राहक आणि संपादकही होते..

गुरुंकडून मिळालेली विद्या,असामान्य प्रतिभा,आणि अं त:प्रेरणा या त्रयींवर त्यांनी कथ्थक नृत्याचे नवनवे प्रयोग केले.

दरबारातली ही कला त्यांनी रंगमंचावर आणली.

बिरजु महाराज यांचे नृत्य पहाणे म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा.त्यांच्या मुद्रेवरच्या सहज सुंदर रेषा,अप्रतीम पवित्रे,म्हणजे एक चित्रशिल्पच.

मोराच्या गतीत जेव्हां ते चालत,तेव्हां खरोखरच लखलखीत पिसार्‍याचा डौलदार मोरच आपल्यासमोर नाचतोय असे वाटायचे…इतके सुंदर त्यांचे भावांग…

“मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो.कारण बंगालमधे मी माझ्या कलेचा आरंभ केला.पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिला..”

हे त्यांचे नम्र उद्गार आहेत…

आज हा महान कलाकार ,नृत्य सम्राट,कथ्थक नृत्य कलेचा सरताज अनंतात विलीन झाला..

जातो तो कलाकाराचा नश्वर देह..

पण त्यातला कलात्मा अमर असतो..!!

त्या देवत्वाचा अंश अंतहीन असतो..

या कलेच्या देवतेला आदरयुक्त श्रद्धांजली…???

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ स्मिता अशोक झगडे – श्री सुहास मुकुंद मोरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑफिसची गाडी बंद पडली. त्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कालिना ते सायन स्टेशनपर्यंत ऑटोने यावे लागले.

पावसाची रिपरिप थोडीशी चालूच होती. तोंडावर मास्क, त्यामुळे डोळ्यावर असलेल्या चष्म्यावर धुकं जमलेलंं… घाईघाईत ऑटोतून उतरतानाच टॅक्सी स्टँडवर असलेल्या एका टॅक्सीकडे हात दाखवत सवयीप्रमाने मोठ्याने विचारले, “बरकत अली नाका चलोगे क्या?”

त्याच वेळी ड्रायव्हर सीटच्या बाजूचा दरवाजा उघडत एक हसऱ्या डोळ्यांचा चेहरा बाहेर डोकावत बोलला, “कुठे…?”

तोवर माझ्या चष्म्याची काच क्लीअर झाली होती. आता मला स्पष्ट दिसले… ती एक महिला होती !

मी थोडा गोंधळलो…मागे फिरणारच होतो, इतक्यात पुन्हा प्रश्न आला, “कुठे जायचेय?”

मी गोंधळलेल्या चेहऱ्याने कसेतरी हसत (मास्कमुळे न दिसलेले) मराठीत बोललो, “बरकत अली नाका, वडाळा.”

त्या म्हणाल्या, “बसा सर.”

मी आणि आझे एक सहकारी दोघे आत बसलो. नवीकोरी टॅक्सी, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पुढच्या आणि मागच्या सीटमध्ये प्लास्टीकचा पारदर्शक पडदा.

टॅक्सी स्टार्ट करून त्यांनी विनंती केली, ” सर, मला रस्ता गाईड करा प्लीज.” मी हो म्हणालो.

असे विचारणारा ड्रायव्हर नवा असतो हे सांगायला नको.

सरदार नगर, सायन कोळीवाडा येथे माझे सहकारी उतरले.

महिला टॅक्सी ड्रायव्हर, विशेष म्हणजे आपली मराठी महिला, असलेल्या टॅक्सीत मी प्रथमच प्रवास करत होतो…

त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांचा प्रतिसाद कसा असेल याचा विचार करत होतो.

बरकत अली नाक्यापर्यंत प्रवासात त्यांच्याशी बोलावे म्हणून विचारले,

” किती वर्षं झाली टॅक्सी चालवता? “

” एक महिना झाला..”

त्यांचे उत्तर आणि माझे प्रश्न असा प्रवास चालू होता..

काळाचौकी येथे राहणाऱ्या या धाडसी महिलेचे नाव स्मिता अशोक झगडे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली…..चिंचपोकळी येथील प्रसिद्ध शोरूम लॉकडाऊनकाळात बंद असल्याने तिथली नोकरी नसल्यातच जमा……  कुटुंबाची जबाबदारी, वाढत्या महागाई मध्ये पती पत्नी दोघेही कमावते असले तरच निभाव लागेल अशी परिस्थिती….  हाताला काम नाही….

ड्रायव्हींग लायसन्स २०१२ ला बनवून घेतले होते.

मग डोक्यात विचार आला, खचून न जाता नव्या क्षेत्रात धाडस करायचे.

एका महिलेने टॅक्सी चालवणे हा विचार तसा सहजासहजी कोणालाही न पटणाराच.

पाय ओढणाऱ्या आपल्याच लोकांचा नेहमीचा बुरसटलेला प्रश्न तयार होताच,

” लोकं काय म्हणतील??”

पण हे अपेक्षित होतेच.

काठावर बसून बुडणाऱ्याची मजा पाहणाऱ्या लोकांची पर्वा न करता स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडता येणे हीच मोठी गोष्ट.

स्मिता झगडे यांनी घरातल्यांच्या पाठबळावर टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला…!

स्मिता झगडे यांना रोज वेगवेगळे अनुभव येतात. पण इतरांना वाटते तशी आमची_मुंबई वाईट नाही याचा त्यांना विश्वास वाटतो.

ड्रायव्हिंग करत असताना मुंबईच्या रस्त्यांची पुरेशी माहिती नसते, तेव्हा प्रवाश्यांनाच  विनंती करण्याची त्यांची तयारी असते. प्रवाश्यांशी वागताना सौजन्य हा महत्त्वाचा गुणधर्म त्यांच्या अंगी जाणवला. विशेष म्हणजे त्यांनी भाडे नाकारले नाही. (भाडे नाकारणे हा इथल्या टॅक्सीचालकांचा जन्मसिध्द अधिकार आहे की काय असे वाटते.)

प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असताना ड्रायव्हर सीटवर महिला पाहून कधी कधी लोकं न विचारताच पुढे जातात. बरेचदा लोकांना कुतुहल वाटते. महिलांना असे काही वेगळे करताना पाहण्याची सवय नसल्याचा हा परिणाम असेल.

स्मिता झगडे यांच्याशी बोलताना एक गोष्ट सतत मनात येत होती…यांच्या धाडसाची दखल माध्यमांनी घेतली पाहीजे. महिला सबलीकरणाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही. अशा वेगळ्या वाटा निवडणाऱ्या हिरकणींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे. स्मिता झगडेसारखी परिस्थितीवर मात करू पाहणारी स्त्री इतर स्त्रियांसाठी उदाहरण असते.

कोणतेच काम लहान मोठे नसते.  तुमची मानसिकता आणि स्वत:ला स्वयंप्रकाशित करण्याची जिद्द  तुमच्या कामाचा दर्जा ठरवते. परिस्थितीपुढे हतबल होणारे, खचून जाणारे समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत. समाजाचे खरे आदर्श असतात ते स्मिता झगडे यांच्यासारखी सामान्यांतली असामान्य माणसं !

अशा धाडसाला हवी असते ती प्रोत्साहनाची शाबासकी, आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द. त्यांची लढाई ते लढत असतात. आपण फक्त लढ म्हटले तरी त्यांना हत्तीचे बळ मिळते.

मी असेच त्यांच्या धाडसाला प्रोत्साहन दिले. बरकत अली नाका आल्यावर एक फोटो काढू का विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. मास्क घातलेला एक फोटो क्लिक केल्यावर त्यांनीच मास्क बाजूला करून दुसरा फोटो काढायची परवानगी दिली. नंतर माझा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यांचे नाव पत्ता दिला.

मुंबई सारख्या ठिकाणी २५-३० मिनिटांच्या प्रवासातल्या ओळखीत आपल्यावर कोणी असा विश्वास दाखवते, ते ही एक महिला, तेव्हा एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली असते.

स्मिता अशोक झगडे यांची मुंबईतल्या प्रवासात कधी कुठे भेट झाली तर त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका…!

Don’t Underestimate The Power Of Women !

 

– सुहास मुकुंद मोरे

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्ही वाचनवेड्या ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अशी झाले मी उद्योजिका ☆ सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆ 

साधारण एक वर्षापूर्वी माझी भाची सौ मेधा सहस्रबुद्धे, जी स्वतः उत्तम शिक्षिका आहे, तिने कल्पना मांडली की आपल्याकडे इतकी छान छान पुस्तके आहेत, तर आपण ती एकत्रितपणे वाचूया का? 

माझी नणंद विमल माटेने ती कल्पना उचलून धरली.

माझ्या पतिराजांना पुस्तक म्हणजे जीव की प्राण  .त्यामुळे घरात कपड्याच्या कपाटापेक्षा पुस्तकाची कपाटे मोठी. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने ही त्यांना खरी आदरांजली, असेही वाटून गेले आणि मग एके दिवशी आम्ही एक ग्रुप फॉर्म केला त्याला नाव दिले” संवादिनी “.

माझी मोठी नणंद म्हणजे मेधाची आई सुध्धा लगेच आमच्या ग्रुपला जॉईन झाल्या.

मग आम्ही पहिले पुस्तक गुगलमीट वरून  सुधा मूर्तींचे ‘ wise  and otherwise ‘ वाचायला सुरू केले. वाचनाबरोबर रोज त्यावर चर्चा करता करता आमच्यासारखे पुस्तक वेडे एक एक करून ग्रुप ला जॉईन झाले. पहिल्या दिवशी आम्ही चौघी आणि मृदुला अभंग आणि मंजिरी अदवंत  आल्या.

‘समानशीले व्यसनेषु सख्यं ’ ह्या उक्तीप्रमाणे हळूहळू आमचा ग्रुप खूप मोठा झाला. आमच्या ग्रुप मध्ये ८६ वर्षापासून  पन्नाशीच्या अलीकडे पलीकडे असणाऱ्या  सर्वजणी तितकाच इंटरेस्ट घेऊन ऐकतात आणि वाचतात. एका सदस्याचे ९२ वर्षाचे वडीलसुद्धा  खूप आवडीने सहभागी झाले होते  तिच्याकडे होते त्यावेळेस.

गुगलमीटमुळे एकाच वेळी पुणे, सांगली, मुंबई, कोल्हापूर, बडोदा इथल्या सगळ्या एकत्र वाचन करतो. एक मैत्रीण परदेशी आहे, पण तीही जमेल तसे जॉईन होते.

हा उपक्रम जवळ जवळ एक वर्ष चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही २५ पुस्तके वाचली आहेत .ह्याच वाचन कट्टयावर सावरकरांचे जीवन ह्याचे सार्थ चित्रण डोळ्यासमोर उभे करणाऱ्या मुग्धा पंडितना ऐकायला मिळाले. बनारसला जाऊन शिवतांडव म्हणून आलेल्या वैजयंती आसलेकर- कडून अस्खलितपणे तितक्याच ताकदीने म्हटलेले शिवतांडव ऐकायला मिळाले. करोनामुळे प्रत्यक्ष एकत्र येणे मागील काळात शक्य नव्हते. पण आम्ही इ-कोजागिरी साजरी केली. प्रत्येक सदस्याला त्यात भाग घेता आला आणि काहीतरी सादर करायला मिळाले. सूत्र संचालन सुद्धा ऑफ लाईन प्रोग्रामसारखे झाले. असा एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म खूप काही देऊन गेला. कोरोनाने आलेले नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले.

आजकाल आपण म्हणतो की मुलांना वाचनाची गोडी नाही. मराठी भाषा ही त्यांना अगम्य.  पण तितकी चांगली पुस्तके एकत्र येऊन वाचली तर मुलंही लक्ष देवून ऐकतात हे आमच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यांच्यासाठीही  एक दिवस मराठी भाषेतील हा खजिना त्यांच्या पुढे उघडावा असे आम्ही ठरवले आहे.

आत्तापर्यंत वाचलेली पुस्तकं फक्त मराठी अशी नव्हती. सर्व भाषांमधील भाषांतरित केलेली पुस्तकेही वाचली . तसेच ‘ महामुनी व्यास ‘ हे हिंदीमधले पुस्तकही तितक्याच कौतुकाने वाचले. आमच्या मामी सौ.उज्वला केळकरही आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत. त्या स्वतः ही उत्तम लेखिका आहेत, आणि त्यांची ६५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण त्याही वाचनात समरस होतात.

अतिशय समृद्ध अशी आपली भाषा आता  टीव्ही मोबाईल संस्कृतीमुळे पुस्तकांपुरतीच सीमित राहिली आहे. अर्थात डीजीटलाइझेशनमुळेच एकत्र वाचनाचा आनंद घेता येतो. पण ती लपलेली संपदा अश्या व्यासपीठांवर ठळक पणे उपलब्ध झाली. आम्ही सगळ्या मैत्रिणी चातकासारखी वाचनाची वाट पाहतो आणि आमची पुस्तकाची तहान भागवतो. आमच्या एक सदस्या सौ मृदुला अभंग हिने सर्व वाचलेल्या पुस्तकांची यादी लेखकांच्या नावासहीत ग्रुपवरती पाठवली आहे.

असा आहे आमचा वाचन ग्रुप “ संवादिनी “, जो सतत नवनवीन  प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून एकमेकींशी संवाद साधतो.

© सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग १ – ध्येय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग १ – ध्येय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.]

विचार–पुष्प – भाग १ – ध्येय

जीवनात, आपली प्रत्येकाचीच काहींना काही ध्येये असतात.म्हणजे स्वप्नच म्हणाना. आपल्याला सन्मान मिळावा, आपल्याला उत्तुंग यश मिळावं. आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी व्हावा.आणखी बरच काही. मग त्याप्रमाणे आपण प्रयत्नांची शिकस्त ही करत असतो. कोणाचं मार्गदर्शन घेत असतो. सल्ला घेत असतो. एखादी व्यक्ती पण आपल्याला प्रेरणा देणारी असते.त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते.आणि आपण पुढे जात असतो. आपल्या जीवनात एखादा आदर्श आपल्यासमोर असेल तर आपले ठरवलेले ध्येय  लवकर साध्य करता येते.

स्वामी विवेकानंदांच्या मते, एखाद्याच्या समोर आदर्श असेल तर तो मनुष्य एखादीच चुक करेल, पण जर समोर आदर्शच नसेल तर तो मनुष्य मात्र, अगणित चुका करेल.म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे महत्वाचे आहे असे विवेकानंदांना वाटते. ते म्हणतात, “युवकांनी उदात्त ध्येये ठेवली पाहिजेत, ती साध्य  होईपर्यन्त त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रगतिच्या वाटेवर त्यांचे पाऊल सतत पुढेच पडले पाहिजे.यश प्रयत्नपूर्वक खेचून आणले पाहिजे”. त्यासाठी त्यांच्यात हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. ती असेल तर तुम्हाला अपेक्षित असलेले यश, मान सन्मान, कीर्ती नक्कीच प्राप्त होईल. अपयशाला सामोरं जाऊन ते यशामध्ये बदलविण्याचे धाडस आपल्यात हवं. मग आपले भाग्य आपल्याच हातात हे अनुभवायचे असेल तर आत्मनिर्भर व्हायला  हवे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भांड्यांवरची कोरलेली नावं ☆ सुश्री शुभा गोखले

?  मनमंजुषेतून ?

☆ भांड्यांवरची कोरलेली नावं ☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

लहानपणी पुण्यातल्या  घरांमधल्या  भांड्यांवर खिळ्याने ठोकून नावं घातलेली असत. प्रत्येक तांब्या-पितळेच्या आणि नंतर स्टीलच्या सुद्धा भांड्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तीचं  नाव (मालक म्हणून असावं बहुदा !) तारीख आणि गावाच्या नावासह वळणदार अक्षरात कोरलेलं असायचं. जर एखाद्या समारंभात ते भांडं दिलं असेल तर ” चि. सौ. का. xxx च्या विवाहाप्रित्यर्थ किंवा चि. XYZ च्या मौजीबंधन समारंभ प्रित्यर्थ– ABC कुटुंबाकडून सप्रेम भेट ” असं तारखेनिशी लिहिलेलं असायचं ! 

असं नाव कोरून देणारा  माणूस माझ्या दृष्टीनी भांड्यांच्या दुकानातला सगळ्यात इंटरेस्टिंग माणूस असायचा ! तुळशीबागेच्या समोर जराशा उजव्या हाताला असणाऱ्या  “पंड्याच्या” भांड्यांच्या दुकानात आईची खरेदी सुरु झाली, की माझा मोर्चा तिथे शेजारीच असलेल्या देवळाच्या पायरीवर बसून, भांड्यांवर कोरून  नावं घालणाऱ्या काकांकडे  वळलेला असायचा—-आणि त्यांचं एकाग्रपणे चाललेलं ते काम मीही मन लावून बघत बसायची. 

एका संथ तालात, किंवा लयीत म्हणूया,  साध्या खिळ्याच्या साह्याने ठोकत ठोकत, गिऱ्हाईकाने कागदावर लिहून दिलेली  मराठी किंवा इंग्रजी अक्षरं अगदी वळणदार पद्धतीने उतरवणारे ते हात एखाद्या शिल्पकारासारखे वाटायचे मला— आता कुठे गेले ते हात ? काही दिवसांनी नावं घालायच्या मशीनचा उदय झाला, आणि ही परंपरागत कला लोपच पावायला लागली— बघता बघता लोप पावली सुद्धा  !!

पण एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे, की मशीननी घातलेली नावं पुसूनही जातात , पण ठोकून कोरलेली नावं  ५०-६० वर्षांनंतरसुद्धा अजूनही भांड्यांवर टिकून आहेत !!!

– सुश्री शुभा गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

कै रामदास कामत

(18 फेब्रुअरी 1931 – 8 जानेवारी 2022)

नुकतेच ८जानेवारी २०२२ रोजी आघाडीचे गायक,संगीत शिक्षक आणि नाट्य अभिनेते माननीय रामदास कामत यांच्या निधनाची दुःखद वार्ता आपल्याला मिळाली.एक बुलंद दमदार आवाज अस्तंगत पावला. रामदास कामत म्हटले की आठवते ते त्यांचे देवाघरचे ज्ञात कुणाला हे मत्स्यगंधा नाटकातले पद! अभिषेकी बुवांचे संगीत आणि रामदास कामतांचा स्वर.अगदी मणी कांचन योग…! मत्स्यगंधातील नको विसरू संकेत मीलनाचा हे पदही त्यांनी अजरामर करून ठेवले आहे. ह्याच बरोबर चिरंजीव राहो जगी नाम, नाटक ~ धन्य ते गायनी कळा, तम निशेचा सरला आणि प्रेम वरदानही ययाती आणि देवयानी या नाटकांतील ही गाणी खास त्यांचीच आहेत.

नाट्यसंगीताखेरीज त्यांनी अनेक भक्तीगीते,भावगीते,स्तोत्रे गायिली आहेत.

१८ फेब्रुअरी १९३१ रोजी गोव्यातील साखळी या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड.त्यांचे वडील बंधूही गायक होते.तेच त्यांचे सुरवातीचे संगीत गुरू.पुढे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही.

मुंबईत अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी आकाशवाणीवर गाणे,जमेल तसे नाटकात काम करणे चालू ठेवले होते.

वयाच्या सातव्या वर्षी,१९३८ साली त्यांनी बेबंदशाही नाटकात बाल संभाजीचे काम केले होते,वास्तविक हे गद्य नाटक,परंतु त्यातही त्यांनी दोन पदे सादर केली होती.पुढे तर जवळ जवळ सगळ्याच संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.

एकच प्याला~रामलाल

मानापमान~धैर्यधर

मृच्छकटिक~चारूदत्त

सौभद्र~अर्जून,कृष्ण,नारद.

मात्र मत्स्यगंधापराशर,धन्य तू गायनी कळातानसेन,मदनाची मंजिरीसारंगधर, व ययाती आणि देवयानीकच या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

२००९ मध्ये बीड येथे झालेल्या ८९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.तसेच २००८च्या विष्णुदास भावे पुरस्काराचे ते मानकरी ठरले.

एका थोर कलावंताला आज आपण पारखे झालो आहोत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझी त्यांना भावंजली!

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी कसा आहे..? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆ मी कसा आहे..? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक   उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ”  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?”  हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”

उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–

—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .

खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा  व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ”  हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ”  हे महत्वाचे आहे—-

विचार जरूर करा—

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

ओम स्थापकायच धर्मस्य हिंदूधर्म स्वरूपिणे/

अवतार वरिष्ठाय  सावरकराय ते नमः //

विनायक दामो दर सावरकर या विनायक  नावाप्रमाणेच ते बुद्धी मान, मेधावान, प्रद्न्यावान असेच होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती  नसानसात भिजलेली होती. त्यांच्या आयुष्यात त्यांना काही सहकारीही एकाच मताचे, एकाच विचाराचे असे भेटले होते. अनेक सहकार्यांपैकी, नेताजी सुभाषचंद्र बोस उर्फ सुभाषबाबू यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दोघेही अभिजात देशभक्त आणि निष्ठावान होते.

सावरकरांचा जन्म सन अठराशे 83 मध्ये आणि सुभाषबाबूंचा जन्म अठराशे 97 मध्ये. इंग्लंडमध्ये जाऊन, सावरकर बॅरिस्टर झाले आणि सुभाषबाबू आय.सी.एस .झाले. पण देशस्वातंत्र्याच व्रत मात्र दोघांचं एकच. 1921 च्या मार्चमध्ये सावरकर अंदमानातून हिंदुस्थानात आले. आणि त्याच जुलैमध्ये सनदी नोकरीवर लाथ मारून सुभाषबाबू मायदेशी परतले. आणि ते सशस्त्र लढ्यावर भर असणाऱ्या, चित्तरंजन दास यांच्या मार्गाने गेले. 1924 ते 1937 सावरकर रत्‍नागिरीत स्थानबद्ध  होते. 1925 – 1926 ला सुभाषबाबू मंडालेच्या कारागृहात होते. तेथून सुटल्यानंतर त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या (युरोपातील).  आणि तेथील राजकीय नेत्यांशी विचारविनिमय केला. 1937 मध्ये सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले .आणि 1938 मध्ये सुभाष बाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. दोघेही क्रांतिकारकच! त्यामुळे सशस्त्र क्रांतीवर दोघांचाही विश्वास होता. इतकेच नाही तर, स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकारभाराचे चित्रही त्यांनी पाहिले होते .दोघांनाही हिंदू संस्कृतीविषयी अत्यंत अभिमान होता .श्रद्धा होती. प्रेम होते. लंडन मधल्या हिंदी सांस्कृतिक कार्यक्रमाला  भारतीय शिरोभूषणच  वापरावं असं सावरकर सांगत. आणि स्वतःही ते तसे वागत. सुभाषबाबू यूरोप मध्ये जिथे जिथे  कार्यक्रमाला जात ,तिथे भारतीय पोषाखातच  जात. तेथील लोकांना हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा मोठ्या अभिमानाने सांगत. सुभाष बाबू बर्लिनमध्ये मराठीही बोलत .आणि छत्रपती शिवाजी आणि सावरकरांचे चरित्र सांगत असत. 1934 मध्ये युरोप मध्ये असतानाच सुभाषबाबूंनी (द इंडियन स्ट्रगल) हिंदुस्तानचा लढा हे पुस्तक लिहिलं. आणि अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक सावरकरांनी लिहिल.

 दोघांनाही एकमेकांची पुस्तक खूपच आवडली.

१९३७पासून दरवर्षी हिंदुमहासभेचे अध्यक्ष सावरकरच निवडले जात होते  १९३९ मध्ये सुभाष बाबू पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले. पण महिन्याभरातच त्यांनी त्याचं त्यागपत्र दिलं. आणि (फॉरवर्ड ब्लॉक) पुरोगामी  गट  नावाचा नवा पक्ष काढून त्याचे ते अध्यक्ष झाले. १९३९मधे महायुद्ध काळातच उठाव व्हायला हवा, असं सावरकर आणि सुभाष बाबू दोघांनाही प्रकर्षानं वाटत होत. पण महात्मा गांधींचे मत मात्र याविरुद्ध होते. दोघांच्याही मते एका गोष्टीत मात्र मतभिन्नता होती. सावरकरांना वाटत होतं, नव्हे त्यांची खात्री होती की, हिंदू-मुसलमानांच्या  एकी शिवाय आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही ,निजामशाही ,बिदर शाही वगैरे पाच शाह्या असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतंच ना! खरंतर दोघांच्याही समोर शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा आदर्श होता. दोघांनाही त्यांचा अभिमान होता. पण अजून सुभाष बाबूना सावरकरांचे मत पटत नव्हते. सावरकर युद्धाची संधी साधण्यासाठी सैनिकीकरणाचा प्रचार करत होते .पण सुभाषबाबूंना त्याचा अर्थ नीट न कळल्यामुळे ते त्यांना ‘रिक्रुट वीर’ असं म्हणून हिणवत होते. सावरकरांना मुसलमानांच्या बाबतीतलं काँग्रेसचे धोरण राष्ट्र घातक वाटत होतं. म्हणून “राजकारणाचं हिंदूकरण करा” असं ते सांगत होते. पण तेही सुभाषबाबूंना पटत नव्हतं. सुभाषबाबू बँरिस्टर जीनांना भेटले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.जर्मन हिटलरलाही  भेटले.पण ते सध्या युध्दात भाग घेणार  नसल्याचे हिटलरने सांगितले .

“जपान त्या मानाने जवळ आहे आणि युद्धात भाग घेईल”. असं जपानमध्ये असलेल्या क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच गुप्त पत्र सावरकरांनी सुभाषबाबूंना दाखवलं. रास बिहारींनी, जपान मध्ये जे क्रांतिकारक होते, त्यांची हिंदू सभा स्थापन केली होती. १९१२ च्या डिसेंबरमध्ये लॉर्ड हार्डिंग्ज वर, मिरवणुकीत बॉम्ब टाकून ,स्त्री वेषात निसटून ते पुढे जपान ला गेले.” तसे सुभाष बाबू तुम्हीही करू शकाल”, असे सावरकर सांगत होते .युद्ध सुरू होताच बंगालच्या उपसागरातून ब्रह्मदेशातून  कोठूनही चढाई करता येईल असं ते सांगत होते.सावरकरांचा आशीर्वाद घेऊन सुभाषबाबू कलकत्त्याला गेले. घराभोवती कडक पहारा होता. शिवरायांचे स्मरण करून, आणि अनुकरण करून, त्या पहाऱ्यातून ते निसटले. ज्याप्रमाणे शिवाजीने संभाजी मेल्याची बातमी पसरवली, त्याचप्रमाणे सुभाषबाबूंनी आपणच मेल्याची बातमी पसरवली. ती तारीख  होती १७ जानेवारी १९४१. त्यांनी पुढे जे स्वातंत्र्ययुद्ध केलं, त्यात ते विमान अपघातात मरण पावले ,अशी बातमी पसरवून ते दुसऱ्या देशात गेले असावेत याबद्दल सावरकरांना खात्री होती.” ही नामी संधी आली आहे, हिंदुस्थाना  बाहेर जाऊन स्वातंत्र्य युद्ध करायला तुम्हीच समर्थ आहात” अस  सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले होते. म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाच श्रेय, सावरकर सुभाषबाबूंना देतात.’अभिनव भारतच्या ‘ सांगता समारंभाच्या अध्यक्षपदी, त्यांनी सुभाषबाबूंची निवड केली होती. पण ते स्वतः येणं शक्य नव्हतं.

म्हणून त्यांचं भव्य चित्रच उच्चस्थानी ठेवलं होतं.

रास बिहारींची गुप्त पत्र, सावरकरांची प्रेरक भेट, आणि सुभाषबाबूंचा साहसी कर्तृत्व या त्रिवेणी संगमाने, भारतात स्वातंत्र्याचा उदय झाला. राष्ट्रभक्ती , राष्ट्रप्रेम, सावरकरांच तेजस्वी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व नव्या पिढीच्या समोर यायला हवं, असं मला प्रकर्षानं वाटतं .भारतात सावरकरांना “भारतरत्न” ही सर्वोच्च पदवी दिली तरी ,त्यांच्या योग्यतेला ती अपुरीच पडेल असं वाटतं. त्यांनी जगावं कसं आणि त्याच बरोबर मरावं कसं असेही शिकवलं. “धन्योहं, धन्योहं कर्तव्यं मे न विद्यते किंचित ,”अशा समाधानात प्रायोपवेशण करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे दिव्यत्व  पाहून  “तेथे कर माझे जुळती,”अस म्हणून आपोआप दोन्ही हात जोडले जातात.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 2 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !) इथून पुढे ——

त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी पडतात याचं कारण समजावलं. त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं. पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली,  ” पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून? “. यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते. ” घरी गाय पाळा “. हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला. ” एक पेला दुधाचे पैसे जवळ नाहीत, तर गाय कुठून आणणार? ” डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, ” मी कर्ज देतो. त्यातून गाय घ्या “.  पुढचा प्रश्न होता कर्ज परत करायचे कसे? यावर डॉक्टरांनी त्यांना एक योजना समजावून सांगितली.  ” बघा तुमच्या जमा पैशांतूनच मी कर्ज देतो. तुम्ही घरापुरते दूध ठेवून बाकीचे मला विका. त्यातून जे पैसे येतील त्यातून कर्ज फेडता येईल “.

लक्षात घ्या हा १९२०-३० चा काळ होता. बायकाच काय, पण पुरुषही निरक्षर -अडाणी होते. ही योजना त्यांचा गळी उतरायला वेळ लागला. पण एका बाईंनी हे कर्ज घेतले, दूध विकायला सुरुवात केली.  त्यानंतर ‘मी पण – मी पण ‘ असं म्हणत सगळ्या बायकांनी गायी घेऊन दूध विकायला सुरुवात केली. हळूहळू कर्ज फिटायला लागले, घरातल्या पोराबाळांना दूध मिळायला लागले, बचत वाढायला लागली. काही वर्षांतच ही योजना इतकी यशस्वी झाली की या योजनेतून सहकारी दूध संस्था उभी राहिली.

दुसरीकडे डॉक्टरांच्या बचत योजनेत इतके पैसे जमा व्हायला लागले की त्यांनी चक्क एक बँक सुरु केली. तिचं नाव होतं- “ कॅनरा इंडस्ट्रीअल अँड बॅकींग सिंडीकेट लिमिटेड.”  १९२५ साली या बँकेची पहिली शाखा कर्नाटकात उडूपी इथे सुरु झाली. १९३७ साली मुंबईच्या चेक क्लीअरींगमध्ये या बँकेची नोंदणी झाली. याच दरम्यान मणिपाल येथे डॉक्टरांनी महाविद्यालयांची सुरुवात केली. काही वर्षांतच मेडिकल -इंजीनिअरींगची कॉलेजेस पण सुरु झाली. आज जगातल्या काही उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या यादीत असलेल्या मणिपाल विद्यापीठाची स्थापना अशी झाली.  डॉक्टरांनी सुरु केलेल्या बँकेला आज आपण सिंडीकॅट बँक म्हणून ओळखतो.

एका छोट्या प्रयत्नातून अस्तित्वात आलेल्या सिंडीकेट बँकेची ही कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांची ही प्रेरणादायक कथा आहे. डॉक्टर टी. एम. ए. पै यांच्या आयुष्यातली आणखी एक घटना सांगितल्याशिवाय हा लेख अपूर्णच राहील.

डॉक्टर टी. एम. ए. पै हे नेहेमी व्यवसाय वाढवायच्या प्रयत्नात असायचे. अशाच एका कामासाठी जात असताना त्यांचीओळख एका गुजराती व्यापार्‍याशी झाली. त्या व्यापार्‍याला यार्नचे लायसन्स हवे होते. पण त्याची ओळख कमी पडत होती. डॉक्टर टी. एम. ए. पै यांनी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते लायसन्स मिळवून दिले. त्या घटनेनंतर भारतीय उद्योगात एका नव्या कंपनीचा जन्म झाला. तिचं नाव आहे- रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तो व्यापारी म्हणजे धीरुभाई अंबानी. धीरुभाई अंबानी डॉ. पैंनी केलेली मदत कधीच विसरले नाहीत. डॉ. पै असेपर्यंत रिलायन्सच्या बोर्डावर त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य कायम असायचा. आजही रिलायन्सचा मुख्य बँकर सिंडीकेट बँकच आहे. 

महिन्याभरापूर्वी सिंडीकेट बँकेचे कॅनरा बॅकेत विलीनीकरण झाले.  पण दुधाच्या एका ग्लासमधून निर्माण झालेली ही बँक कधीच विस्मरणात जाणार नाही.

 समाप्त

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares