मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगांतून कळलेले संत तुकाराम(२)

आजच्या लेखातही अभंगातून कळलेल्या संत तुकाराम महाराजांविषयी

आपण बोलणार आहोत.

 बोलावा विठ्ठल/ पहावा विठ्ठल/

 करावा विठ्ठल/ जीवे भावे//

 येणे सोसे मन/ झाले हाव भरी/

 परती माघारी/ येत नाही//

 बंधनापासूनी/ उकलल्या गाठी/

 देता आली मिठी/ सावकाश//

 तुका म्हणे देह/ भरीला विठ्ठले/

 काम क्रोधे केले/ घर रिते//

 विदुषी किशोरीताई अमोणकर यांनी हा अभंग त्यांच्या गोड गळ्यातून गाऊन अतिशय प्रसिद्ध करून ठेवला आहे.

 या अभंगातून आपल्याला स्पष्ट दिसून येते की तुकाराम महाराजांची भक्ती आता सगुणाकडून निर्गुणाकडे जात चालली आहे. विठ्ठलाची भक्ती करत असताना या ठिकाणी त्यांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. म्हणून ते म्हणतात, ” मी ब्रह्म आहे या भावनेच्या अवस्थेत माझा जन्म झाला. माझे सगळे नवस पूर्ण झाले व सर्व आशा नाहीशी झाली. मी आत्मा आहे या अनुभवाने बलवान झालो. “

 मी ची मज व्यालो/ पोटा आपुलिया आलो/

 आता पुरले नवस/ निरसोनी गेली आस/

 दोन्हीकडे पाहे/ तुका आहे तैसा आहे//

 काही जाणो नये /पांडुरंगाविण/

पावीजेल सीण/ संदेहाने//

 भलतिया नावे/ आळविला पिता/

 तरी तो गात्रा धणी/ हरी कथा//

 तुका म्हणे उपजे / विल्हाळआवडी/

 करावा तो घडी/ घडी लाहो//

एका पांडुरंगा व्यतिरिक्त कसलाच विचार करू नये. कोणत्याही कारणाने कळवळ्याने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. हरी कथेने सर्वांगांचे समाधान होते. एक हरीकथाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते.

अशाप्रकारे तुकारामांची अवस्था हरीमय झाली आहे.

म्हणून पुढे ते म्हणतात,

 दास झालो हरिदासाचा/*बुद्धी काया मने वाचा/

 तेथे प्रेमाचा सुकाळ/टाळ मृदुंग कल्लोळ//*

नासे दुष्ट बुद्धी सकळ/समाधी हरिकीर्तनी//

ऐकता हरी कथा/भक्ती लागे त्या अभक्ता//

 देखोनी कीर्तनाचा रंग/ कैसा उभा पांडुरंग//

 हे सुख ब्रह्मादीका/ नाही नाही म्हणे तुका//

हरी प्रेमाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी रूपकात्मक अभंग रचना केली आहे.

 या ठिकाणी ते म्हणतात…

 रवीचा प्रकाश/ तोचि निशी घडे नाश/

 झाल्या बहुवस तरी/ त्या काय दीपिका//

बंधमोक्षाचे वर्णन करताना महाराज रात्र आणि दिवस याची उपमा देतात. सूर्यप्रकाश आला की रात्र नाहीशी होते. अनेक दीप लावून रात्र संपत नाही. त्याप्रमाणेच सर्वोत्तम असा श्रीहरी तो माझ्या जीवात राहिला तरच त्याची सर्व रहस्य मला कळतील. ते दुसरा दृष्टांत देतात.

सवे असता धनी/ आड ये न सके कोणी/

नलगे विनवणी/ पृथकाची करावी//

प्रत्यक्ष मालकच आपल्याबरोबर असला तर वाटेत कोणाची विनवणी करावी लागत नाही, तसेच आपल्याजवळ श्रीहरीचे प्रेम असले तर आपल्या मार्गात काहीच अडथळे येत नाहीत.

म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून आपण सहज मुक्त होतो.

या ठिकाणी तुकारामांना भक्ती सुखाबरोबर ब्रह्मसुख भेटले आहे.

 नाम घेता मन निवे/ जीवे अमृतची स्त्रवे/

 होताती बरवे /ऐसे शकुन लाभाचे//

 मन रंगले रंगले/ तुझ्या चरणी स्थिरावले/

 केलीया विठ्ठले/ ऐसी कृपा जाणावी//

 *सुख भेटता आले सुखा/ निध सापडला मुखा/

 तुका म्हणे लेखा/ आता नाही आनंदा//

 सर्वत्र अवर्णनीय असा आनंद आहे.

 जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत/

 त्यांचे पायी चित्तठेवीन मी//

 जयासी विठ्ठल आवडे लोचनी/

 त्याचे पायवणी स्वीकारीन//

 विठ्ठलाची जीही दिला सर्व भावा/

 त्यांच्या पायी जीव ठेवीन मी//

 तुका म्हणे रज होईन चरणींचा/

 म्हणावी ती त्यांच्या हरीचे दास//

तुकाराम भक्तिमार्गाला लागले आहेत, आता ते मायामोहातून बाहेर पडले आहेत, परंतु आपण संसार बंधनात अडकलो याचे त्यांना दुःख आहे. ते दुःख आपल्या अभंगातून व्यक्त करतात

 पंचभूतांचे सापडलो संदी/

 घातलीसे बंदी अहंकारे//

 आपल्या आपण बांधविला गळा/

 नेणेची निराळा असताही//

 कासया हा सत्य मानीला संसार/

 काहे केले चार माझे माझे//

 का नाही शरण गेलो नारायणा/

 का नाही वासना आवरिली//

 किंचित सुखाचा धरीला अभिळास/

 तेणे बहु नास केला पुढे//

 तुका म्हणे आता देह देऊ बळी/

 करुनी सांडू होळी संचिताची//

तुकारामांनी आपले सर्वस्व पांडुरंग चरणी वाहिले आहे आणि ते देवाच्या विविध कथांचा संदर्भ घेऊन विठ्ठलाला आळवीत आहेत.

 फिरविले देऊळ जगामाजी ख्याती/

 नामदेवा हाती दूध प्याला//

(नामदेवाने आपल्या भक्ती द्वारा विठ्ठलाचे देऊळ फिरवून प्रवेशद्वार आपल्यासमोर आणले अशी कथा आहे.)

 भरियेली हुंडी नरसी मेहत्याची/

 *धनाजी चाट्याची सेते पेरी//

 मिराबाई साठी प्याला विषाचा/

 लाख्याकोला त्याचा ढोल पिटी//

 

 कबीराचे मागी विणू लागे शेले/

 मूल उठविले कुंभाराचे//*

 या सर्व संतांची कामे पांडुरंग स्वतः करत होता

 त्याचप्रमाणे तुकारामांकडेही देवाने लक्ष द्यावे

 म्हणून ते विनवणी करतात…

 आता तुम्ही दया करा पंढरीराया/

 तुका विनवी पाया वेळोवेळा//

विठ्ठल भेटीची तुकाराम महाराजांना किती तळमळ लागून राहिली होती हे आतापर्यंत अनेक अभंगातून आपण पाहिले. आता पुढील काही अभंगातून त्यांची व विठ्ठलाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्था पाहण्यासारखी आहे.

 बहुता दिसांची आजी झाली भेटी/

 झाली होती तुटी काळ गती//

 येथे सावकाश घेईन ते धणी/

 गेली अडचणी उगवोनी//

 बहु दुःख दिले होते घरी कामे/

 वाढला हा श्रमे श्रम होता//

 बहु दिसत होता सांडीला मारग/

 क्लेशाचा त्या त्याग आजी जाला//

 बहु होती केली सोंग संपादणी/

 लौकीकापासूनी निर्गमले//

 तुका म्हणे येथे झाले अवसान/

 परमानंदी मन विसावले//

 पुष्कळ काळपर्यंत देवाच्या पायांचा वियोग झाला होता, आज सुदैवाने त्याची भेट झाली. आता सर्व अडचणी दूर होऊन, विठ्ठलाच्या पायाचे ध्यानसुख तृप्त होईपर्यंत घेईन. अनेक वैश्विक इच्छांनी मी दुःखी झालो होतो, त्यामुळे श्रम फार वाढले होते, ते आज संपले. प्रपंचात राहून अनेक सोंगे करावी लागली, आता सर्व लौकिक गोष्टींशी असलेला माझा संबंध संपला. मन मोकळे झाले. शेवटी सर्व व्यवहाराचे पर्यवसान एका परम आनंदात होऊन त्या ठिॅ

थौतकाणी माझे मन विश्राम पावले आहे. एक समाधानाची रेषा त्यांच्या मुद्रेवर या ठिकाणी दिसून येते.

 क्रमशः… ९  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘Mandatory की Optional??…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘Mandatory की Optional??…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

Growing old is mandatory but getting old is optional. 

काल ताईकडे सहजच गेले. दिवसभर खूप गप्पा टप्पा झाल्या. कूठून कुठपर्यंत गप्पा जातात. हे कळतच नाही. किती तरी विषयांवर चर्चा होते. आठवून बघावे तर आठवतही नाही. तरी अनेक विषय बोलायचे / सांगायचे राहूनच जातात. काही विषय तर नेहमीचेच असतात. तेच तेच बोलण होत. तरी बोलतो. सर्वात महत्वाचं म्हणजे गप्पा झाल्या की मजा येते. पोट भरल्यासारखे वाटते. समाधान होत. अनेक प्रश्न सुटतात. अनेक शंका दूर होतात. •••

संध्याकाळी घरी जायला निघणार, तर आज सर्वांचाच खूप आग्रह झाला की आज मी येथेच रहावे. अजय अनिता, भाऊजी सर्वांनीच थांबवून घेतले. •••

कारण काय तर म्हणे, •••तर जवळच एक उडपी हॉटेल उघडले आहे. तेथे उद्या संध्याकाळी जेवायला जाऊ. नंतर अजय मला घरी पोहचवेल. •••

त्यामुळे रहाणे झाले. आणि ताईकडील सकाळ ची घाई गडबड बघायला मिळाली.

तशी प्रत्येकाच्याच घरी एका विशिष्ट पद्धतीने सकाळची गडबड असते. रोज तीच काम, त्याच क्रमाने करायची असतात. अगदी त्या त्या कामाची वेळ पण ठरलेली असते तरी लग्न घाईच असते. तेच, तसेच डायलॉग असतात. त्यात जर लहान शाळेत जाणारी मुल असतील तर मजाच असते. •••

संध्याकाळी अजयने अनयला शाळेची तयारी करायला सांगितले. •••

अनयने होमवर्क केल्यावर आपला बस्ता लावला. कंपॉस बॉक्स चेक केला. बूट पॉलिश केले. त्याबरोबरच बाबांचे, आजोबांचे पण बूट पॉलिश केले. •••

अजय अनिताने पण दुसऱ्या दिवशीची तयारी केली. ताई ने मावशींकडून सकाळच्या नाश्त्याची, डब्याची तयारी करून घेतली. •••

सकाळचा अलार्म वाजला आणि सगळेच वेळेवर उठले. •••

अजय, अनय ने सुर्य नमस्कार घातले. अनिताने पण व्यायाम केला. सर्वांच्या आंघोळी झाल्या. देवाला नमस्कार करून झाला. तोपर्यंत नाश्ता तयार झाला. आधी सर्वांचे चे डबे भरणे, नाश्ता झाला.

शांतपणे सर्व आपापल्या कामाला निघाले.

अनय आजोबांना म्हणाला, •••

आजोबा!! आल्यावर रामायणातील गोष्ट सांगायची आहे. •••

आजोबा म्हणाले, ••• Yes!! छान लक्ष देऊन अभ्यास कर. नंतर गोष्ट नक्की. •••

अजय म्हणाला, ••• बाबा!! आज बॅंकेत गेला तर माझ काम करून या. •••

आता घरी आम्ही तिघेच होतो. •••

यानंतर आमची सकाळची काम सूरू झाली. ताई भाऊजींचा व्यायाम, चहा नाश्ता पूजा.

नंतर भाऊजींचे पेपर वाचन, शेयर मार्केट चे उतार चढाव बघण. बॅंकेत जाऊन आले. येताना ताईने दिलेल्या लिस्ट प्रमाणे सामान आणले. ••••

आमच्या पुन्हा गप्पांचा 2 nd round झाला. जेवण झाली. झोप झाली. •••

दिवसाचा दुसरा पार्ट सुरू झाला. चहा पाणी झाले. भाऊजींनी लॅपटॉपवर काम केले. तेवढ्यात अनय आला. लगेच बस्ता जागेवर ठेवला. डबा धुवायला म्हणून बेसीन मध्ये ठेवला. मोजे धूवून टाकले. युनिफॉर्म बदलला. आजीने दूध बिस्किटे दिली, दूध पिणे झाल्यावर आजोबांना शाळेत काय काय झाले ते सांगितले. होम वर्क काय आहे?? ते सांगितले. •••

आजोबांच्या जवळ गोष्ट ऐकायला बसला. आजोबांनी छान गोष्ट सांगीतली. त्याच्या अनेक प्रश्नांची शांतपणे उत्तर दिली.

राम कडून, हनुमानाकडून आपण काय शिकू शकतो. त्या गोष्टीचा वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींच्या संदर्भात आपण काय कराव? कस वागाव? हेंही सांगीतले. ••••

थोडक्यात आयुष्याचे धडे अनयला दिले. •••

आजोबा नातवाचा तो बॉन्ड बघून खूप छान वाटल. ••••

खरंतर ही बऱ्याच घरातील सर्व सामान्य गोष्ट आहे. पण घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या गोष्टी एवढयाच सहजतेने घडतात का?? ••••

मी ताईला विचारल, ••• अग!! हा तुमच्या घरचा रोजचा कार्यक्रम आहे का?? •••

ताई म्हणाली, ••••

हो, जवळपास रोजच. •••

अजय अनिता चे आॅफिस, अनय ची शाळा त्यामुळे routine हेच असते. अनयला पण शिस्त लावली आहे. त्याच्या सवयींकडे लक्ष असत आमच्या सर्वांचे. •••

आजोबांनी रोज गोष्ट सांगावी. अस अजय अनिता चे म्हणणे असते. त्यामुळे एखादी motivational गोष्ट किंवा महाभारत, रामायणातील गोष्ट किंवा कधी त्यांच्या बालमनातील समस्येवर लागू पडणारी गोष्ट आजोबा सांगतात. त्याच्या बरोबर आम्ही सर्वच खूप गप्पा मारतो. त्यामुळे तो काय विचार करतो. त्याच्यावर होणारा संगतीचा असर सर्वच लक्षात येत. ••••

रामरक्षा, इतर स्तोत्र म्हणून घेणे ही माझी जबाबदारी आहे. •••

मावशींकडून काम करून घेणे ही पण माझी जबाबदारी असते. •••

जी काम आम्हाला सहज जमतात, ती आम्ही आनंदाने करतो. •••

अग!! म्हणतात ना, •••

Growing old is mandatory but getting old is optional. •••

I will run,

if not I will walk,

if not I will crawl.

But I will move forward. •••

– – हाच नियम आम्ही पाळतो. •••

Team work किती महत्वाचे असते. हे या घरच्या activities बघून कळते. ••

म्हणतात ना. •••

**Alone you can win the match but, if you have a good team, you can win Tournament. **

रोजच्या किती तरी गोष्टी Team work ने सहज पूर्ण करता येतात. •••

शेवटी तडजोड आणि समजूतदारपणा याच दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. •••

पंच्याहत्तर वर्षाचे भाऊजी आणि सत्तर वर्षाची ताई कडे काही समस्या / Problems नसतील का?? •••

पण म्हणतात ना, •••

Happiness is not the absence of Problems, It is the ability and the team work to deal with them.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हलक्या डोक्याचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “हलक्या डोक्याचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

प्रसंग एक :

सकाळची वेळ, किचनमध्ये स्वयंपाकाची गडबड. आईनं पोहे प्लेटमध्ये ठेवून दहा मिनिटं झाली. तीन-चार वेळा हाका मारल्या पण अंकितानं एकदाही उत्तर दिल नाही. तेव्हा संतापलेल्या आईनं हातातला मोबाइल हिसकला. अंकिताला भयंकर राग आला. आईवर मोठ्या आवाजात खेकासली “काय कटकट ये. फोन दे”

“देणार नाही. उठून तास झाला. फोनमध्येच तोंड घालून बसलीयेस. बाकी काही काम नाही. खाऊन घे. ”

“मला भूक नाही. फोन दे महत्वाचं काम आहे. ”

“रील्स पाहून पोट भरणार नाही. तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. ”

“माझं मी बघेन. उगीच डोकं फिरवू नकोस. फोन दे नाहीतर.. ”

“काय करशील”आईनं म्हटल्यावर राग अनावर झालेल्या अंकिता जोरात किंचाळत हाताला येईल त्या वस्तू फेकल्या. वाट्टेल ते बडबडत थेट आईच्या अंगावर धावून गेली. लेकीचं अनपेक्षित वागणं पाहून प्रचंड धक्का बसलेल्या आईनं फोन पुढे केला. अंकितानं झडप घालून फोन घेतला “परत माझ्या फोनला हात लावलास ना तर बघ. ”आईच्या डोळ्यात पाणी आलं त्याचवेळी अंकिता रील्स पाहत हसत होती.

प्रसंग दोन :

दुपारची वेळ असल्यानं गाड्यांची वर्दळ कमी होती. उड्डाणपूलावरून स्कूटरस्वार हेल्मेटधारी सुधीर चाललेला. अचानक विरुद्ध दिशेनं तूफान वेगानं येणाऱ्या बाईकला पाहून सुधीर गडबडला. कशीबशी टक्कर टाळली पण दोघंही तोल जाऊन पडले.

“का फुकट मरतोस. जरा नीट चालव की, ”चिडलेला सुधीर ओरडला. बाइकवाला भडकला.

“ए, xxxxx काय बोल्ला”

“तुला मरायचं तर एकटा मर. दुसऱ्याला का घेऊन जातोय. गाडी अशी चालवतात का? ”

“गाडी कशी चालवायची हे सांगणारा तू कोण?? माजं मी बगेन. रस्ता काय तुझ्या बापाचाय का? ”

“मग तुझ्या बापाचा आहे का? . एकतर रॉन्ग साइडनं आलास. वर माज दाखवतो”सुधीरच्या बोलण्यानं भडकलेला बाईकवाला अंगावर धावून आला. तेव्हा इतर गाडीवाल्यांनी मध्ये पडत दोघांना शांत केलं.

“गप जा. डोकं फिरवू नकोस. ”संतापानं फणफणणारा बाईकवाला म्हणाला. त्याचा एकूणच अवतार आणि आविर्भाव बघून नादी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आल्यानं सुधीर तिथून निघाला. तेव्हा बाइकवाल्याची हातवारे करत बडबड सुरू होती.

प्रसंग तीन :

फोनची वाजणारी रिंग किचनमध्ये कामात असलेल्या सुमाला ऐकू आली नाही. तीन-चार वेळा फोन करूनसुद्धा फोन घेतला नाही म्हणून दीपक जाम वैतागला. घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्यानं आरडाओरड सुरू केली. “हजारवेळा सांगितलं की फोन घेत जा. ”

“फोन वाजेलला लक्षातच आलं नाही”

“अंताक्षरी खेळण्यासाठी फोन केला नव्हता”

“मी सुद्धा मुद्दाम केलं नाही. कामात होते. ”

“लक्ष कुठं असतं. कसल्या तंद्रीत असतेस”

“गाढ झोपले होते म्हणून मुद्दाम फोन घेतला नाही. आता बोला. इतकं काय अति महत्वाचं काम होतं. ” सुमाच्या तिरकस बोलण्यानं म्हणाली तेव्हा दिपकचा पारा अजून चढला. तोंडाला येईल ते बोलायला लागला. शब्दाला शब्द लागून दोघांत कडाक्याचं भांडण झालं.

—-

– – वरील घटना काल्पनिक असल्या तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. कोणाही सोबत असं होऊ शकतं. तीनही प्रसंगात कोण बरोबर कोण चूक याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे “राग” आणि वागण्यातली आक्रमकता हाच खरा चिंतेचा विषय आहे.

रागावर कंट्रोल नाही हाच अनेकांचा मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय.

‘राग येणं’ हे जरी नैसर्गिक असलं तरीही आजकाल आपण लगेच चिडतो, संतापतो.

आणि त्यासाठी कोणतंही निमित्त पुरतं. फार लवकर रिअॅक्ट होतो.

अनेकदा डोकं तापलं की संयम सुटतो. तारतम्य राहत नाही. शांतपणे विचार करण्याची इच्छाशक्ती आणि कुवत जवळपास संपलीये.

क्षुल्लक गोष्टींसाठी टोकाची भूमिका घेऊन परिणामांचा विचार न करता भावनेच्या भरात कृती केली जाते.

पूर्वी सुद्धा लोक चिडायचे, रागवायचे पण प्रतिक्रिया आजच्या इतक्या तीव्र नव्हत्या.

शिवीगाळ, धमकी, अंगावर धावून जाणं, मारहाण, अगदी जीव घेणं. असे प्रकार घर, ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी सर्रास होतायेत.

पेपरमध्ये त्याविषयीच बातम्या आणि सोशल मिडियावर सुद्धा तेच.

आदर, संयम, समजूतदारपणा आता सुविचारापुरते मर्यादित झालेत. याचा वास्तवात फारसा कोणी वापर करत नाही.

धावपळ, तणाव, एकटेपणा आणि आभासी जगाचा कैफ यात गुरफटलेलं आयुष्य जगताना सतत अस्थिर असलेलं मन.

माणसा – माणसातील प्रत्यक्ष संवाद आणि त्यातली सहजता संपलीयं.

जिथं तिथं फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करण्याच्या नादात सगळंच बिघडलंय.

अनाकलनीय होतं चाललयं.

एकुणात सारांश असा की आपण खूप “चिडके” झालोय.

ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारे जसे हलक्या कानाचे तसेच कशावरूनही चिडणारे *“हलक्या डोक्याचे”* – – आजच्याच भाषेत बोलायचं तर ‘अँग्री बर्डस’ 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

 नारद भक्ती सूत्र क्र. ४७ 

यो विविक्तस्थानं सेवते, यो लोकबन्धमुन्मूलयति, निस्त्रैगुण्यो भवति, योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥

अर्थ : जो एकांतवासाचे सेवन करतो, लौकिक संबंधांमुळे निर्माण झालेली बन्धने तोडून टाकतो, जो तीन गुणांनी रहित होतो आणि जो योग व क्षेमाचाही त्याग करतो, तो माया तरून जातो.

विवेचन :  साधनाचा विचार करीत असता त्याचे अंतरग व बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलेच आहे. अंतरंगसाधनांना बहिरंग-साधनाची आवश्यकता असते. संगत्याग हे साधन मागील सूत्रात सांगितले आहे ते सिद्ध होण्याकरिता या सूत्रात ‘विविक्त स्थानं सेवते’ म्हणजे निर्जन एकांतवासाचा आश्रय करतो असे सांगितले आहे. याचा उल्लेख गीतेमध्ये आढळतो.

भगवंत म्हणतात,

“माझ्या ठायी अनन्यत्वें भक्ति निष्काम निश्चळ | एकांताविषयीं प्रीति जन संगात नावड||”

(गीताई १३. १०)

एकांत… समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

“कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ । जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥”

(दास. १९. ०८. २९)

अनेक लोकांना एकांत शब्द सोडून देऊ, एकटं राहण्याचीही भीती वाटते. या भीतीमागील एक कारण हे असू शकते की त्यांना आपण एकटेच आहोत या *भीती*ची भीती वाटतं असते. एकांत हा शब्दाबद्दल एक गैरसमज आहे. एकटे रहाणे म्हणजे एकांत. मनुष्य एकटा राहतो. दिसायला तो एकांतात दिसतो, पण स्वतःच्या मनात तो मनोराज्य रचत असतो. याला खरा एकांत म्हणता येत नाही आणि अशा एकांताचा त्या मनुष्याला काहीही लाभ होत नाही. उलट असे करून स्वतः च स्वतःची फसवणूक करून घेत असतो.

एकांताची समर्पक व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. “एकाचाही अंत म्हणजे एकांत. “

संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात याचे वर्णन आहे. ते भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन एकांताचा अनुभव घेत असतं. ते स्वतःला इतके विसरून जात की जंगलातील पक्षी एखादे झाड समजून त्यांच्या अंगावर खांद्यावर खेळत असतं, बागडत असतं. तेथील लता, वेली त्यांची सोयरी झाली होती.

“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।। तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।”

साधकाने कोणतेही साधन करावा, चिंतन करावे, ध्यान, भजन असो, मन एकाग्र झाल्या शिवाय त्यात गती प्राप्त होत नाही. अनादिकालीन संस्कारामुळे साधकाचे मन चंचल असते हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरिता काही साधने करावी लागतात.

साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणेही दूर होणे आवश्यक आहे. ती विघ्ने म्हणजे स्वजन-परजनांकडून होणारा संसर्ग. तो अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटात राहून दूर करता येत नाही, सर्वावर नियंत्रण कसे ठेवता येईल? याकरिता तो संसर्ग टाळणेच अवश्य आहे. या दृष्टीने विविक्त स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला घ्यावा लागतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥२॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥३॥शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥४॥ तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥५॥”

(अभंग क्रमांक ३१९५, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

सूत्राच्या पुढील भागात या लोकबन्धमुन्मूलयति असे नारद म्हणतात.

श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की परमार्थाला आपल्या घरापासून सुरुवात करावी. मंदिरातील मूर्तीत राम आहे आणि माझ्या घरातील माणसांमध्ये तो नाही असे कसे होऊ शकेल? पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा यापेक्षाही साधक-भक्ताला लोकेषणा बाधक असते. लोकानी स्तुती करावयास आरंभ केला की तीच प्रिय वाटावयास लागते. पण स्तुतीबरोबर हळूहळू निंदाही होण्याला सुरुवात होते, ज्याला स्तुतीने सुख वाटते त्याला निंदा ऐकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. हाच लोकबन्ध होय. श्री जगन्नाथ कुंटे यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे. निंदा गोड वाटू लागली म्हणजे साधक पक्का झाला. जोपर्यंत साधकाला स्तुती गोड वाटते, तोपर्यंत तो भगवंतापासून खूप दूर आहे असे समजायला हरकत नाही.

पतितपावना देवराया ॥१॥

संसार करितां म्हणती हा दोषी ।

टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु. ॥

आचार करितां म्हणती हा पसारा ।

न करितां नरा निंदिताती ॥२॥

*

संतसंग करितां म्हणती हा उपदेशी ।

येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥

*

धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा ।

समर्थासि ताठा करिताती ॥४॥

*

बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ ।

न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥

*

भेटिसि नवजातां म्हणती हा निष्ठुर ।

येतां जातां घर बुडविलें ॥६॥

*

लग्न करूं जातां म्हणती हा मातला ।

न करितां जाला नपुंसक ॥७॥

*

निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।

पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥

*

लोक जैसा लोक धरितां धरवे ना ।

अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥

*

तुका म्हणे आतां ऐकावें वचन ।

त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥

संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सर्वाना सांगतात की, जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय, परकीय, शिष्य, भक्त म्हणविणारे असोत का विरोधी असोत टाळून भक्ती करा.

निस्त्रैगुण्यो भवति’

“प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व_रजस_तम|

ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती||”

(गीताई १४. ०५)

सत्त्वगुण सुखसंग व ज्ञानसंगाच्याद्वारा बांधतो, रजोगुण हा आसक्ती काम याच्या द्वारे बांधतो. तमोगुण पूर्ण अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवास बांधतो. जसा मासा हा आमिषाच्या आशेने स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणाच्या जाळ्यात अडकतो. गुण म्हणजेच सर्व संसार आहे. कारण सचेतन-अचेतन सर्व सृष्टीही गुणात्मकचआहे, असेच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. भक्ताला गुणातीत बनावयाचे असते. त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्तियोगाचा आश्रय करावयाचा असतो. तसेच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात. तोही भक्तिमार्गाला प्रतिबंधक आहे म्हणून नारद ‘निस्त्रैगुण्यो भवति’ असे म्हणतात.

योग क्षेम त्यजति

संसारामध्ये बहुतेक जीवाना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का व प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी व प्राप्त आणि अनुकूल वस्तूचा नाश न व्हावा, त्या आपल्या म्हणून आपणाजवळ अखंड राहाव्या या भावनेला योगक्षेम म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व प्राप्ताचे रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योग-क्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसे गढून गेलेली आहेत. तसेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत, व ते प्राप्त होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहावे लागते. नाना प्रकारची शुभाशुभ कर्मे करीत रहावे लागते आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरिताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधकदेखील या योग-क्षेमाच्या चिंतेने ग्रस्त होणे शक्य आहे. पण ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्या साधकाने आपल्या देहभरण – पोषणाची म्हणजेच लौकिक योग-क्षेमाची चिंता ठेवू नये. कारण देहाचे भरण – पोषण झाले तरी तेवढ्याने सर्व पुरुषार्थप्राप्ती झाली असे नाही. त्या भरण-पोषणातूनही पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते जीवन अशांत बनवीत असतात.

भगवतांचे वचन आहे.

“अनन्य भावें चिंतूनि भजती भक्त जे मज| सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी||”

(गीताई ०९. २२)

मनुष्याला मिळणाऱ्या भौतिक गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाची भूक आपसूक कमी होते. ज्याने जीभ जिंकली, त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे म्हणतात.

– – संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पुरेसा बोलका आहे.

साळंकृत कन्यादान ।

पृथ्वी दानाच्या समान ॥१॥

परि तें न कळे या मूढा ।

येईल कळों भोग पुढां ॥ध्रु. ॥

आचरतां कर्म ।

भरे पोट राहे धर्म ॥२॥

सत्या देव साहे ।

ऐसें करूनियां पाहें ॥३॥

अन्न मान धन ।

हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥

तुका म्हणे सोसे ।

दुःख आतां पुढें नासे ॥५॥

पुढील सूत्रात आपण आणखी दोन गोष्टींचा कसा त्याग करायचा हे पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४७.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “Not today! Not today!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “Not today! Not today!” ☆ श्री संभाजी बबन गायके

Not today! Not today! Not today!.. आज मी मरणार नाही.. कुटुंबाला मरू देणार नाही!

… अगदी मागच्याच आठवड्यात त्याला केवळ साडेतीनशे मीटर्स अंतर पोहताना खूप दम लागला होता… त्यासाठी त्याने त्याच्या जलतरण प्रशिक्षकाची बोलणीही खाल्ली होती. आणि आज तर त्याच्यापासून किनारा सुमारे चार किलोमीटर्स दूर होता… आणि त्या समुद्रातल्या लाटा त्याला पुढे जाऊ देत नव्हत्या! पण त्याला तर किना-यावर पोहोचायचंच होतं… आज तो मृत्यूला शरण जाणार नव्हता… आणि त्याची आई आणि त्याचे दोन भावंडं अशा तिघांनाही मरणाच्या दारात सोडून येणार नव्हता!

ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहराच्या दक्षिणेला २०० किलोमीटर्सवर असलेल्या क्विन्डालप या समुद्रकिना-यावर जिओग्राफी बे याठिकाणी केवळ तेरा वर्षे वयाच्या ऑस्टिनचे कुटुंब सुट्टीसाठी आलेले होते… आई जोन, त्याची आठ वर्षांची धाकटी बहिण आणि अकरा वर्षांचा धाकटा भाऊ असे तिघे होते. सुट्टीच शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. परत जाण्याची तयारी झालीच होती… पण हाताशी आणखी थोडावेळ असल्याने त्यांनी समुद्रात फेरफटका मारण्यासाठी एक Paddle Board भाड्याने घेतला… हे रबरी बोर्ड्स हवा भरून फुगवले जातात… आणि हा बोर्ड वल्हे मारून चालवावा लागतो. या board वर ऑस्टिनची आई आणि त्याची दोन्ही भावंडं स्वार झाली… तर ऑस्टिनने स्वत:साठी कयाक बोट घेतली होती… निमुळती असलेली ही छोटीशी बोट वल्ह्याने वल्व्हावी लागते. या समुद्रसफरीला एक तासभर लागणार होता. ऑस्ट्रेलियन माणसं तशी दर्यावर्दी. खोल समुद्रात ते अत्यंत सहजतेने विहार करतात. पोहण्याचे शिक्षण हा त्यांच्याकडे शालेय शिक्षणाचा भाग आहे. समुद्रात बुडणा-या लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या समुद्र किना-यांवर विशेष जीवरक्षक तैनात असतात… हे आपण टी. व्ही. वरील बॉन्डाय रेस्क्यू कार्यक्रमात पाहिले असेलच.

 ऑस्टिन छान कयाकिंग करीत होता… पण उत्साहाच्या भरात तो समुद्रात काहीसा जास्त पुढे जाऊ लागला… तसे त्याच्या आईने त्याला मागे बोलवण्यासाठी Paddle Board त्याच्या जवळ नेला. या प्रयत्नात तिचा Paddle Board पाण्यात पलटला आणि तिच्या हातातला एक वल्हे पाण्यात पडले आणि दूर वाहून गेले. आता सर्वजण पाण्यात होते… जोन ने कसाबसा तो paddle board सरळ केला आणि त्यावर तिघेही चढले… जोन Paddle Board एका वल्ह्याने वल्हवू लागली… पण तितक्यात समुद्रात जोराचा वारा सुटला, लाटा उफाणल्या आणि paddle board आणि कयाक यांना आत आत खेचू लागल्या…! आणि paddle board पुन्हा पलटी झाला… जोनच्या हातातलं दुसरं वल्हे सुद्धा पाण्यात पडले! ऑस्टिन त्याची कयाक घेऊन यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला… त्या तिघांना त्याने कयाकमध्ये ओढून घेतले… पण आता कयाक जड झाली… तिच्यात पाणी भरू लागले… मग या सर्वांनी पाण्यात उद्या घेतल्या… कयाक मधले पाणी समुदात खाली केले… आणि कयाक सरळ करीत पुन्हा तिच्यात चढले… पण आता लाटा आणखी जोरदार येऊ लागल्या… कयाक टिकेल असे वाटत नव्हते. पण तरीही कुणी फार घाबरले नव्हते! किनारा काही फार दूर नव्हता. शिवाय paddle board आणि कयाक ज्या हॉटेलने भाड्याने दिले होते… ते लोक… यांना उशीर झाला म्हणून यांना शोधायला येतीलच… असं जोन ला वाटलं! पण तसं काही घडलं नाही. चार तास उलटून गेले होते या संघर्षाला…

 किना-यावर जवळपास कुणी नव्हतेच… आणि पुढे येणारी प्रत्येक लाट त्यांच्यातले आणि किना-यातले अंतर वाढवत वाढवत चालल्या होत्या. लाटा त्यांना तब्बल चौदा किलोमीटर्स अंतरापर्यंत घेऊन गेल्या होत्या… ओरडून काहीही फायदा नव्हताच… सर्वांच्या अंगावर Life Jackets होती… यामुळेच ते समुद्रात पडले तरी बुडणार नव्हते सहजी. परंतु वारा, थंड आणि खारे पाणी… आणि शार्क मासे! तरीही जोराचे प्रयत्न करीत हे कुटुंब किना-याकडे येण्याचा प्रयत्न करीत राहिले… दहा किलोमीटर्सचे अंतर त्यांनी पारही केले होते… सर्वांना आपण निश्चित किना-यावर पोहोचू, आपल्याला वाचवायला कुणीतरी येईल, असे वाटत होते. पण काहीच झाले नाही… अंधार पडण्याची चिन्हे होती… आपण किना-यापर्यंत पोहत जावे आणि मदत मिळवावी, असे जोनला वाटले… पण दोन लहान मुलांना असं समुद्रात सोडून येणं तिला पटेना… मग तिने एक निर्णय घेतला… ऑस्टिनने कयाक घेऊन किना-याकडे निघावे… आम्ही paddle बोर्ड धरून तरंगत राहू… त्याला पाठवावे! ऑस्टिनने कयाक पुढे काढली.. त्याच्याही अंगावर life jacket होतेच… तो नजरेआड झाला! लाटा कमी होण्याचे मात्र नाव घेईनात!

अंधार पडू लागला… आपण पोराला पुढे पाठवून चूक तर नाही ना केली? आईचं हृदय विचार करून रडू लागलं! बराच वेळ झाला… कुणीही मदतीला आलं नव्हतं!

 इकडे ऑस्टिन कयाकने पुढे पुढे सरकत असताना त्याच्या लक्षात आलं की आपण काही फार पुढे जाऊ शकत नाही आहोत… त्याने पाण्यात उडी घेतली… पण life jacket सुद्धा जड झाले आहे… त्यामुळे पोहण्याचा वेग कमी होतो आहे.. त्याने ते काढून फेकले… आणि त्याला जितक्या पद्धतीने पोहता येत होते त्या त्या पद्धती त्याने अवलंबल्या… ब्रेस्ट स्ट्रोक, back stroke, survival swimming इत्यादी. त्याच्या मनात काय सुरु होतं यावेळी? मला आज किना-यावर पोहोचायचेच आहे… मी आज मरणार नाही… माझ्या कुटुंबाला मरु देणार नाही! ऑस्ट्रेलियन लोक today या शब्दाचा उच्चार साधारणत: to die असा करतात… पण ऑस्टिन मात्र not today… आज नाही… असं मनाशी म्हणत राहिला… त्याला त्याचे मित्र आठवत होते… त्याचं आयुष्य आठवत होतं.. शरीर बधीर होत चाललं होतं… आपण किती थकलो आहोत… हेही त्याला जाणवत नव्हतं… त्याला फक्त किनारा गाठायचा होता! इकडं समुद्रात असलेया जोन आणि तिच्या भावंडांनी आता आशा सोडायला सुरुवात केली… अंधार झाला होता!

ऑस्टिन किना-यावर पोहोचला… आणि कोसळला… पण दुस-याच क्षणी उठला… थकलेले पाय… वाळूतून धावू लागले… तिथून माणसं आणखी दीड दोन किलोमीटर्स दूर होती! जीवाच्या आकांताने ऑस्टिन धावला… पण त्याच्या दुर्दैवाने इंग्लीश भाषा समजू शकतील अशी माणसं त्या गर्दीत नव्हती… होती ती सारी परकीय पर्यटक माणसं होती… ऑस्टिनने आणखी पुढे धाव घेतली… फोन बूथ गाठला… ००० हा तातडीचा फोन डायल केला… आणि अगदी शांतपणे, आत्मविश्वासाने त्याची परिस्थिती कथन केली… मला हेलीकॉप्टर, विमान, बोट हवी आहे… माझी आई, माझे बहिण, भाऊ समुद्रात अडकलेत. त्याने बचाव पथकाला त्यांचा ठावठिकाणा नेमका कुठे असेल ते अचूक सांगितले… पण अंधार पडलेला होता… हेलीकॉप्टरने तो भाग पिंजून काढीत या लोकांना शोधलं… एक आधुनिक बोट त्यादिशेने भरधाव गेली… त्यांनी paddle board ळा धरून पाण्यात कसेबसे तग धरून राहिलेल्या त्या तिघांना वर उचलून घेतले… जोनने विचारले… ऑस्टिन? बचावकर्त्यांनी ऑस्टिन सुखरूप असल्याचे सांगितल्यावरच जोनचा जीव स्थिर झाला! किना-यावर पोहोचताच ऑस्टिनने जोनला आलिंगन दिले… भाऊ, बहिणीला जवळ घेतले… वैद्यकीय उपचारांनंतर या सर्वांना घरी सोडण्यात आले… Austin Applbee हा तेरा वर्षांचा पोरगा… not today… not today… not today म्हणत मृत्यूला हरवणारा पोरगा… हिरो ठरला आहे! जीवन अनमोल आहे… ते वाचवण्यासाठी ऐनवेळी शरीरही त्याच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकते… फक्त जिद्द हवी… हेच यातून सिद्ध झाले.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पुढं जे काही घडलं ते सगळं आपसूकच घडत जावं तसंच आणि कधी कल्पनाही केली नव्हती असं एक अनपेक्षित वळण येताच मी थबकलो. इथं वळायचं की आहे त्याच मार्गाने पुढं जायचं या माझ्या क्षणकाळाच्या द्विधा मन:स्थितीत ‘तो’ स्वतःशीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी… माझ्याजवळ! कारण पुढे जे घडत गेलं ते प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं असंच सगळं..!! )

स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा माझा अट्टाहास नव्हता, पण आयुष्यात क्वचितच येणारी एकमेव संधी या दृष्टीने मी त्याकडे पहात होतो. या योजनेच्या अतिरिक्त आर्थिक मोहात न पडता, मिळू शकणारे ते लाभ माझ्या सर्व जबाबदाऱ्या विनासायास पार पडण्यासाठी पुरेसे आहेत कां याचाच विचार करणे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे होते. सलिल आणि आरतीने जेव्हा नि:शंकपणे संमती दर्शवली त्यानंतर माझ्या विचारांना या दिशेने चालना मिळाली आणि मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक असल्याने मी हे कितपत फायदेशीर ठरेल हे पहायला सुरूवात केली.

या योजनेतील वरवर जाणवणारे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येकाच्या शिल्लक राहिलेल्या नोकरीच्या मुदतीच्या अर्ध्या कालावधीचा पूर्ण पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता. या हिशोबाने माझ्या उर्वरित नऊ वर्षांच्या कार्यकाळाच्या निम्म्या म्हणजे साडेचार वर्षांच्या पगाराची रक्कम अतिरिक्त लाभ म्हणून मला मिळणार होती. त्या रकमेचे मासिक व्याज माझ्या त्यावेळेच्या पगारापेक्षा थोडे जास्तच येत होते. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार केला तर मला ते सोयीचे आणि पुरून उरणारेच होते. शिवाय माझे घरापासून लांब, एकटा राहिल्याने होणारे अतिरिक्त सर्व खर्च जे दरमहा माझ्या पगाराच्या निम्म्या रकमेइतके होते ते वाचणार होते. शिवाय नोकरीतल्या जबाबदाऱ्यांची कायम मनात असणारी व्यवधानं आणि दडपणं नाहिशी होणार होती आणि त्यासाठी द्यावा लागणारा रोजचा दहा- बारा तासांचा वेळ हा माझ्यासाठी पूर्ण मला हवा तसा व्यतित करण्यासाठी मोकळा मिळणार होता जे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं होतं!

असे सगळेच घटक निदान माझ्यापुरते तरी सर्वार्थाने सोयीचे होते तसेच फायद्याचेही! नकारात्मक म्हणता येईल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे बॅंकांमधे पूर्वी पेन्शन योजना आस्तित्त्वात नव्हती. तरीही सुरुवातीपासूनच आपला जॉब पेन्शनेबल नाही हे गृहित धरूनच मी माझे आर्थिक नियोजन केलेले होते. त्यानंतर १९९६ मधे सर्वप्रथम पेन्शन योजना बँकांसाठी लागू करण्यात आली होती. ती ऐच्छिक होती. त्यामुळे ती स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय अर्थातच खुला होता. आणि त्या वेळच्या हिशोबानुसार पेन्शन पर्याय न स्विकारता बऱ्याच जणांनी आणि मीही पीएफ् चा पर्यायच स्वीकारला होता. अर्थात पेन्शन नसणे हा योग्य अशा आर्थिक नियोजनामुळे माझ्यासाठी तरी तसा गौण मुद्दा होता. अर्थात स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर उच्चाधिकार पदांवरील बऱ्याच जागा रिक्त होणार असल्याने मागे राहिलेल्यांसाठी पुढच्या प्रमोशनच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होणार होत्या हे खरे, पण त्यामुळे वाढणाऱ्या अधिकारांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि मला हव्यास नसणाऱ्या अॅमिनीटीज् भरपूर पण टॅक्सेशनचा विचार करता मिळणारे आर्थिक लाभ मात्र तुलनेने अतिशय नगण्य ही वस्तुस्थिती होती.

अर्थात इतर बऱ्याच जणांना या ना त्या कारणाने या योजनेचा फायदा घेता येणार नव्हता त्यामुळे त्याचे शल्य मनात घेऊनच उर्वरित काळ इच्छा नसूनही त्यांना शेवटपर्यंत नोकरी करणं क्रमप्राप्त होतं!

अशा रीतीने या सर्व बाबींचा विचार करून नोकरी चालू ठेवणे अधिक तोट्याचे आणि गैरसोयीचे होते याची खात्री झाल्यानंतर मी

स्वेच्छानिवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करायचे निश्चित केले. घरी आई, आरती आणि सलिल यांना यासंदर्भातल्या सर्व हिशोबांची आणि माझ्या नियोजनाची सविस्तर कल्पना देऊन त्यांचे समाधान झाल्यानंतर माझा अर्ज तयार केला. तरीही तो सबमिट करण्यापूर्वी वखरे साहेबांना माझ्या निर्णयाची पूर्वकल्पना देणे मला आवश्यक वाटले. मी माझा अर्ज सोबत घेऊन साहेबांच्या केबिनमधे गेलो पण त्यामुळे माझ्या या संकल्पात अडसर निर्माण होऊ पहातोय याची मला कल्पना कुठं होती?

मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी मला बसायची खूण केली. मी त्यांचं बोलणं संपायची वाट पहात बसलो खरा पण फोन महत्त्वाचा होता हे वखरे साहेबांच्या अदबीने बोलण्यावरून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरून माझ्या लक्षात आले. आपण नंतर यावे असा विचार करून मी खुर्ची मागे सरकवून उठलो तेवढ्यांत त्यांनी बसायची खूण केली. पुढे कांही मिनिटातच फोनवरचं बोलणं संपलं तसं रिसिव्हर ठेवून ते क्षणभर शांत बसून राहिले आणि मग माझ्याकडे पहात सहज विचारल्यासारखं म्हणाले,

“फोन कुणाचा होता सांगा बरं…? “

“सेंट्रल ऑफिस? “

“एम्. डी. हिमसेल्फ वाॅज आॅन द लाईन… ” पाण्याचा ग्लास हातात घेत त्यांनी सांगितलं.

“कां? .. कांही प्राॅब्लेम..? “

“आपल्या ऑफिसपुरता तरी काही प्रश्न नसणाराय हे नशीब माझं. ” ते कांहीसे रिलॅक्स होत म्हणाले.

“म्हणजे? ” मला कांही अंदाजच येईना.

” आपल्याला डिपॉझिट, ॲडव्हान्सेस, रिकव्हरी.. अशी डोईजड टार्गेट्स दिली जातात ना नेहमी? आताही त्यांनी एक वेगळंच टार्गेट दिलंय. आश्चर्य म्हणजे ते ‘निगेटीव्ह टार्गेट’ आहे. पण ठीक आहे. फार टेन्शन घ्यावं असं कांही नाहीय. “

“निगेटिव्ह टार्गेट? म्हणजे? “

ते हसले.

“नुकत्याच आलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेच्या सर्क्युलरच्या संबंधातलं टार्गेट.. “

“म्हणजे? “

अतिरिक्त स्टाफची संख्या कमी करण्यासाठी ही योजना तयार केलेली असली तरी त्यामागे अनप्राॅडक्टीव्ह स्टाफसंख्या कमी करण्याचा प्रमुख उद्देश आहे. तरीही कायदेशीर आक्षेप घेतले जाऊ नयेत म्हणूनच केवळ ती सरसकट सर्वांसाठी खुली ठेवली गेलीय हे मला माहित होतं पण..

” पण यासंदर्भातलं ‘निगेटिव्ह टार्गेट’ म्हणजे काय ते नाही समजलं.. ” मी साहेबांना माझी शंका विचारली.

” त्या संदर्भातच सगळं फोनवर ऐकवून झालंय” ते हसत म्हणाले, ” त्याचं काय आहे, नुकत्याच झालेल्या एक्झिक्युटिव्ह प्रमोशन प्रोसेसमधले रिसेण्ट प्रमोटीज् आहेत ना तुमच्यासारखे ते बॅंकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अॅसेटस् आहेत. त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यापासून परावृत्त करण्याची सूचना एम्. डी. नी आम्हा सर्व झोनल हेडस् ना दिलीय. त्यापैकी कुणीही ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. या अर्थाने आपल्या झोनसाठी मला दिलं गेलेलं हे ‘निगेटिव्ह टार्गेट’च ना? “

वखरे साहेबांचं बोलणं त्यांच्या नकळत माझ्या निर्णयात मोठ्ठा अडसर निर्माण करणारं होतं. माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायलाच मी आलेलो असताना नेमका त्यातच हा अडसर निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर तो अर्ज आत्ताच देणं मला योग्य वाटेना. न द्यावा तर मी इथे कां आलो होतो हा प्रश्न निर्माण होणार होताच. मनातली ही अनिश्चितता मनात तशीच घेऊन मी जायला उठलो..

“अरे, बसा ना, बोला, तुम्ही कां आला होतात? ” वखरे साहेबांनी विचारलंच.

आता मात्र खरं कारण सांगणं मला अवघड वाटेना….

” मी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलंय. ते सांगायलाच मी आलो होतो. ” मी मोकळेपणानं सांगून टाकलं.

ते अविश्वासाने पहातंच राहिले.

” तुम्ही आणि स्वेच्छानिवृत्ती? चेष्टा करताय कां माझी? ” त्यांचा आवाज थोडा चढल्या सारखा वाटला.

“नाही सर. खरंच सांगतोय. ” मी म्हंटलं, आणि सोबत आणलेला माझा अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवला.

त्यांनी तो हातात घेऊन त्यावरून झरझर नजर फिरवताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला अस्वस्थ करीत राहिले. तो अर्ज घडी घालून मला परत देत ते म्हणाले,

” हा सध्या तुमच्या जवळच राहू दे. यू प्लीज गिव्ह सेकंड थाॅट टू युवर डिसिजन. आपण यावर सविस्तर बोलू नंतर. मग ठरवू काय करायचं ते. ” ते शांत पण ठाम स्वरात म्हणाले.

त्यांचं म्हणणं मला स्विकारता येईना न् डावलताही.

” ठीक आहे. आपण बोलू नंतर ” असं म्हणत त्यांनी पुढे केलेला तो अर्ज मुकाट्याने परत घेऊन मी केबिनमधून बाहेर आलो.

जे सुरळीत पार पडणार हे मी गृहितच धरलं होतं ते गृहितच असं चुकीचं ठरलं होतं. त्यामुळं जे सहजसाध्य वाटत होतं तेच अप्राप्य ठरत असल्याचं लक्षात येताच माझी चलबिचल सुरू झाली. जे घडेल ते आपल्या हिताचंच असेल हा विश्वास मनात असूनही आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जातं असल्याची रूखरूख माझं मन अस्वस्थ करीत राहिली.

आता यातून अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे अखेर ‘तो’च तर ठरवणार होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फडक्यांची गोष्ट…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “फडक्यांची गोष्ट…” ☆ सुश्री शीला पतकी 

लीला आत्या जरा रागातच घरात आली म्हणाली, “संपलं बाई संपलं फडक्यांचे युग संपले”… मी तिला शांत करीत म्हणाले, ” अगं आता जुनी युग संपणारच ना. सि. फडकेंना एका काळात वाचणारी वाचक मंडळी खूप होती… तरुण मुलं फडक्यांच्या कादंबऱ्याचे फॅन होते. ना सी फडक्यांच्या लिखाणात तरुणांना आकर्षित करण्याची ताकत होती. तो कालखंड फडक्यांचा होता….

त्यावर लिला आत्या म्हणाली, ” ते नाही ग दुसऱ्या फडक्यांबद्दल बोलते”…. ” अच्छा अच्छा म्हणजे आपल्या सुधीर फडक्यांबद्दल.. बाबूजी असं म्हण की सरळ… बाबूजी बद्दल काय ग रामायणा ने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं. मराठी गाणी त्यांनीच संगीतबद्ध करावी आणि आशा ताईंनी ती म्हणावीत. फडक्यांच्या चाली सुंदर शब्दाला त्या माणसाने खऱ्या अर्थाने अर्थ दिला नाही ग” लीला आत्यांनी हात झटकला, “मी साहित्यातल्या फडक्यांबद्दल बोलत नाही” 

“ मग कशाबद्दल बोलतीयेस? “ माझा वैतागून तिला प्रश्न.

त्यावर ती म्हणाली… “ अगं माझ्या सुनेचा महिन्याचा खर्च सर्वाधिक कशावर होतो तर तो त्या हगीजवर… पंधरा हजार रुपयाचा खर्च त्या कापडावर आणि हात पुसायच्या त्या कागदांवर! त्यानंतर तोंड पुसायचे हात पुसायचा असे कागद आणखीन वेगळे सारखी कागद ओढत असते डब्यातून, नाहीतर त्या रीळातून फाडत असते. ताट पुसायला फाडला कागद… टेबल पुसायला फाडला कागद… तोंड पुसायला वेगळा कागद… काय कचरा का कचरा आणि खर्च केवढा…? मिळवता मिळवता म्हणजे काय उधळपट्टी करायची…?” 

माझ्या एकूण विषय लक्षात आला. आमची लीला आत्या म्हणजे…. आता सांगतेच तुम्हाला.. अहो कोणाचे लग्न ठरलं ना तर या बाईची जमवाजमवा कशाची असावी? … तर फडक्यांची.. जुने लुगडे, साड्या धोतरं, जुन्या पॅंटी, जुने गंजे फ्रॉक, हे फाडून फाडून ती शिवून ठेवायची. मी म्हणलं “ हे उद्योग का करतेस? ”

तर म्हणाली “ लग्नाकार्यामध्ये आचाऱ्याच्या हाताला फडके द्यावे लागतात. आणि ते आपल्या घरचे स्वच्छ असलेले बरे… ताट पुसायला फडके पाहिजेत.. भांडी पुसायला फडके पाहिजेत.. लादी पुसायला फडके पाहिजे… लादी पुसायचे फडके पूर्णपणे पाणी शोषून घेणारे आहेत. ते मी यांच्या बनियन चे करते. “ 

लिला आत्याच्या घरात गेलो तर अनेक ठिकाणी टांगलेले फडके दिसतील… आणि उगीचच इतस्ततः कसेही टाकलेले नाहीत बरं…! त्या त्या ठिकाणी त्यालाही हुक असेल. ताट पुसायचे फडके वेगळे…. वाट्या भांड्याचे वेगळे… टेबल पुसायचे वेगळे… देवाचे वस्त्र वेगळे… लादी पुसायचे वेगळे.. स्वयंपाकात हात पुसायचे वेगळे… आणि हे फडके जुन्या कपड्यांचे…. चारी बाजूच्या कडा शिवलेले त्याला अडकवायला कपड्याचा नाडा किंवा हुक बांधलेले आणि दररोज ते स्वच्छ धुतलेले! आणि शिवाय तिचं एक कपाट आहे त्यात सुद्धा मोड आणण्याच्या उसळी बांधायचे फडके वेगळे…. श्रीखंड करण्यासाठी चक्का बांधण्याचे फडके वेगळे.. ते खास पांढरे स्वच्छ धोतराचे असायचे… जानेवारी महिन्यात हलवा करताना घ्यावयाचे पांढरे स्वच्छ फडके वेगळे… रोज सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी स्वयंपाक घरातले डबे पुसण्याचे फडके ते वेगळे..!

मी तिला म्हणायची “ अग रोज कसले डबे पुसते.. “ 

ती म्हणायची “ स्वयंपाकाच्या घाईत कसले हात या डब्याला लागतात. मग डबे चिकट होतात तेव्हा घरच्या बाईनं दुपारच्या निवांतपणात असे डबे पुसून ठेवावेत. ” तो तिचा कार्यक्रम रोज दुपारी अर्धा तास चालत असे.

एकदा काय झालं…

एक छोटी बादली होती. तुळस वाळत चालली होती म्हणून मी त्या बादलीत पाणी घेऊन तुळशीला घालायला निघाले. तिने मला घाई घाईने थांबवलं.. “ ती कशाला बादली घेतलीस? “ 

“ मग काय झालं स्वच्छ तर आहे ना?

“अग ती फडक्यांची बादली आहे …”

मी म्हणलं “असू दे ना देऊन टाकते पाहिजे तर त्यांना…” कारण शेजारी फडके राहत होते ना…

ती म्हणाली “ नाही नाही तसं नाही. मी रोज दुपारी सगळे फडके म्हणजे कपडे पुसायचे त्या बादलीत भिजत घालते आणि स्वच्छ धुऊन टाकते… फरशी पुसायचे फडके ओट्याचे फडके… हे एकदा धुते आणि हातपुसणीचे वाट्या भांड्याच एकदा…. “

लीला आत्याच्या स्वयंपाक घरात जाल तर कपाटात पांढरे स्वच्छ फडके बांधलेल्या मोरावळ्याच्या बरण्या, उपवासाच्या लोणच्याच्या बरण्या, मुरंबाच्या बरण्या अगदी नटून डोक्यावर पदर घेतलेल्या बाईसारख्या बसलेल्या असायच्या. खालच्या फडताळ्यातल्या… मिठाच्या, लोणच्याच्या बरण्याही अशा नटून-तटून बसलेल्या असायच्या, अर्थात आता ते दृश्य नाही. मी मनात नेहमी म्हणायची ‘हिच्या सुनेच फार अवघड आहे…. ’ पण हिची सून वरचढ निघाली 

… तिने प्रश्नच मिटवला. ॲमेझॉन वरून मागवलेल्या हगीजमुळे लेकराचा लंगोटाचा प्रश्न मिटला, दुपट्यांचा प्रश्न मिटला, टिशू पेपरमुळे हात पुसायचा प्रश्न मिटला. आता लिलाआत्याला फारसा स्कोप उरला नाही.

 लिहीत असताना मला जाणवलं की पूर्वीच्या बायका किती निगुतिने घर स्वच्छ ठेवत असत. जुन्याचा पुनर्वापर.. त्याच शिवण टिपण… त्याची स्वच्छता.. हे सगळं कुठल्याही शाळेत न जाता त्या शिकल्या होत्या… त्यामुळे आजार घरात फिरकत नव्हते. माझी आई नेहमी म्हणायची, “अग ओट्यावरच हात पुसायचं फडकं आणि दारातला पाय पुसणं त्या घरातली स्वच्छता सांगत असत…! ” पायपुसण सुद्धा आई आमची दोन दिवसाला एकदा स्वच्छ धुऊन टाकायची कारण ते जाड कापडाचाच बनवलेल असायचं.

आता फडक्यांची दुनिया घरातून गायब झाली आणि त्यांची जागा ॲमेझॉनच्या कागदाने घेतली. उसळीला मोड आणायचे डबे बाजारात विकत मिळू लागले. चक्का बांधणे संपले. वस्तूंचा पुनर्वापर संपला. कचऱ्याचा ढिगारा वाढू लागला… स्वच्छतेच्या नावाखाली अस्वच्छतेचा पसारा आपण घालू लागलो. बंगल्याच्या समोर असणाऱ्या कचऱ्याच्या डब्यात कागदांचे ढीग वाढू लागले….! ॲमेझॉन चे असे कागद घरात वापरणे आता (कागद हा शब्द जरा लिहिता येतो.. तुम्हाला गावंढळपणाचा वाटेल.. बर ठीक आहे आपण पेपर म्हणूयात) तर असे पेपर घरात ठाई ठाई ठेवलेले आहेत…..

… तरीही लीला आत्याच्या घराचा लक्खपणा नाही. स्वच्छता ही बाईच्या अंगी असावी लागते आणि त्याच्यासाठी लिलाआत्यासारखं नियोजनही असावं लागतं. पैसे आहेत म्हणून ते कागदावर उधळणे कदाचित या पिढीला योग्य वाटत असावं. पैसा पैसा जमा करून भविष्याची तरतूद करणाऱ्या आमच्या पिढीला मात्र हे मानवणार नाही… अर्थात त्यांना जे करायचे ते करू द्यावं संघर्ष नको…!

… तुम्हाला काय वाटतं मंडळी? …. आमच्या लीलाआत्यासारखं फडक्यांवर प्रेम करावं? का त्यांच्या सुनेसारखा ॲमेझॉन चा मार्ग धरावा?

– – बाकी लीलाआत्याचं फडक्यांवर एवढं प्रेम की तिने जावई सुद्धा फडके शोधला आहे.

आहे की नाही गंमत…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बल्ब…” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बल्ब …” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

खूप जुनी गोष्ट आहे. नुकतेच आम्ही नवीन घरात राहायला आलो होतो. त्यावेळी ट्युबलाईटचा विशेष प्रसार झाला नव्हता. घरोघरी पिवळे बल्बच असायचे.

दहा दिवसांच्या अवधीत तिसऱ्यांदा बल्ब गेला. पुन्हा बल्ब गेला, म्हटल्यावर आई आणि त्यामुळे मी व संध्याही कावऱ्याबावऱ्या झालो.

बंद दरवाजाचा जमाना तोपर्यंत आला नसल्याने शेजारीपाजारीही जमा झाले.

मग नवीन बल्ब आणून लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतरही गप्पा चालूच होत्या.

“संध्याच्या आई, वरचेवर बल्ब जातो, म्हणजे वायरिंगचा प्रॉब्लेम असणार. “

“हो. हो. इलेक्ट्रिशियनला बोलावून चेक करून घ्या. “

“मला वाटतं…… “

तेवढ्यात आईला आठवलं, “वर राहतात ना, ते ठोकत असतात अधूनमधून. “

“बरोबर. मग त्यामुळेच हादरे बसून बल्ब जात असणार. “

“तुम्ही जाऊन सांगा त्यांना. म्हणावं, नवीन बल्बचे पैसे द्या. “

“हो, हो. जाच तुम्ही, संध्याच्या आई. “

“आता ‘यां’ची यायची वेळ झालीय. स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. उद्या सकाळी बघूया. “

मग शेजारणींनाही आपापल्या घरच्या स्वयंपाकाची आठवण झाली.

आजचं मरण उद्यावर गेलं, म्हणून हुश्श करत आई रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

बाबा आल्यावर त्यांनीही शेजारणींना दुजोरा दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा-अकराच्या सुमाराला पुन्हा वरून ठोकाठोकी सुरू झाली.

“संध्याच्या आई, आत्ता जा आणि रेडहॅन्डेड पकडा त्यांना. “

“पण त्या भांडायला लागल्या तर? “

“घाबरू नका तुम्ही. त्या भांडायला लागल्या, तर खाली आवाज येईलच. मग मी येईन वर. “

“मीही येईन, ” म्हणत सगळ्याच तयार झाल्या.

जीव मुठीत धरून आई वर गेली.

दहा-पंधरा मिनिटं झाली, तरी सारं कसं शांत शांत म्हटल्यावर कुमक गोंधळून गेली. मग एका दूताला वर पाठवण्यात आलं.

“संध्याच्या आई त्यांच्या घरात बसून चहा पित होत्या. “

पाच-दहा मिनिटांत आई आलीच. एकदम शांत दिसत होती.

“काय झालं? ” “काय झालं? ” सगळ्यांनी कल्ला केला.

मग आईने सुरुवात केली, “अहो, मी जरा भीतभीतच गेले वर. म्हटलं, त्या बाईंनी तोंड सोडलं, तर मी काय करणार? पण त्या चक्क म्हणाल्या, ‘गे, भायेरसून कित्याक, घरात येवन बसा आणि बोला. ‘ त्याबरोबर माझ्या जिवात जीव आला. त्या खलात काहीतरी घेऊन बत्त्याने कुटत होत्या. मग मी सांगितलं बल्बचं. तर म्हणाल्या, ‘अरे द्येवा! धा दिसांत तीन बल्ब गेल्यानी? माका ठावक न्हाय, गे, असा काय होईत म्हणान. आता काळजी घेयीन मिया. ‘मग त्या थोड्या सरकून बसल्या. सुनेकडून एक गोधडी मागून घेतली. तिची जाडशी घडी केली. तिच्यावर खल ठेवून त्यांनी आपलं कुटण्याचं काम चालू केलं.

‘माजो हातपण वाईच जोरात चलता. दोघांची शक्ती एकाच हातात इली हा मा? आता हळूहळू मारतंय. ‘

तेव्हा कुठे माझं लक्ष गेलं. त्या डाव्या हाताने बत्ता मारत होत्या. उजवा हात फक्त अर्ध्या दंडापर्यंतच होता.

‘म्हणजे? तुमचा हात? ‘

‘अगे, धाकटो चार वर्साचो होतो, त्या येळा त्येचो बापूस ग्येलो. माज्या पदरात चार पोरा. मगे घोवाच्या मिलमद्ये माका नोकरी दिल्यानी. द्येव त्येंचा भला करो. एक दिस मशनीत हात गावलो आन कापान टाकाचो लागलो. माका दिसला – संपला सगळा. पण पोरांकडे बघून पुन्ना उभ्या रवलंय. मिया डाव्या हाताक सांगलंय – इतकी वर्सां उजव्याच्या जिवाsर तू आराम क्येलंय. आता तुज्याsर दोगांच्या वाट्याचा काम करुची पाळी इली हा. मग तो लागलो कामाक. तेणा माका बगलंला मा, पोरांची आऊस आणि बापूस जालंला… अरे, मिया बोलत काय बसलंय? पयल्यांदाच इल्यात घरी. इल्लो च्या घेवा. ‘

मग त्यांच्या सुनेने चहा करून दिला.

‘अगो, थोडी कोकमां दी गो त्येंका. कालच पावण्यान हाडली गावसून, ‘ म्हणून आमसुलांची पुडीही हातात ठेवली.

‘थोरलो आयलो, का त्येका सांगतंय हां, तुमका बलब हाडून देवक. ‘

‘अहो, नको. राहू दे. आता लावला आम्ही. यापुढे जरा काळजी घ्या, एवढंच सांगायला आले होते. ‘ “

– – – बल्बची भरपाई मागायला गेलेली आई आयुष्यभर पुरेल एवढा सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन आली होती.

 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

देवबाभळी असे निरस नाव असलेलं एखादं नाटक असेल असं कधी वाटलं नव्हतं, त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते संगीत नाटक असेल आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो एक थरारून टाकणारा नाट्यानुभव असेल असंही कधी वाटले नव्हते. पण म्हणतात ना Truth is stranger than fiction. तसंच काहीसं माझं या नाटकाच्या बाबतीत झालं आहे. पुण्यातील वास्तव्यात हे नाटक पाहण्याचा योग आला आणि जे पाहिले त्यामुळे भरून पावलो. हे नाटक पाहिलं नसतं तर एका चांगल्या आनंदाला निश्चितच मुकलो असतो.

खरं तर हे नाटक आहे संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी देवी रुख्मिणी यांच्यावर. या नाटकात केवळ या दोघींच्याच भूमिका आहेत. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा उल्लेख वारंवार झाला तरी या नाटकात पात्र म्हणून प्रत्यक्षात रंगमंचावर ते कधीच येत नाहीत पण ते अवघे नाटक व्यापून उरले आहेत. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते. मग प्रश्न असा आहे की देवबाभळी हे नाव आले तरी कसे?

यासाठी नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्राजक्त देशमुख यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. तुकारामांची पत्नी आवली हिच्या पायात बाभळीचा काटा मोडतो. तो काटा काढण्यासाठी कोण मदत करतं तर प्रत्यक्ष विठुराया. विठुरायाने पायातला काटा काढला तरी पायातल्या वेदनेची आणि जखमेची ठसठस घेऊन आवली नाटकभर वावरते. विठुराया केवळ तेवढं करून थांबत नाही, तर तिच्या मदतीला आपली पत्नी रुख्मिणी हिला पाठवतो. त्यावेळी आवली पोटुशी असते. देवबाभळीचा काटा मोडणं हे खरं तर निमित्त! पण या निमित्ताने विठुरायाचे आपल्या भक्तांवरील प्रेम दिसते. या निमित्तानेच रुख्मिणी आवलीच्या घरी येते. या दोघींचंही दुःख कुठेतरी एकसमान आहेत. पण त्या दोघींच्या मनातील वेदना, स्त्री सुलभ भावना आणि आपल्या पतीबद्दल असलेलं प्रेमही यानिमित्ताने दिसून येतं. या सगळ्या गोष्टींना कारण ठरते ती देवबाभळी!

नाटकाचा पडदा उघडतो आणि शेणानं आपलं अंगण सारवणारी आवली दृष्टीस पडते. सारवताना ती गात असते. सकाळचे प्रसन्न वातावरण दृष्टीला पडते. स्वयंपाकघरातून डोकावणारी सूर्यकिरणे दिसतात. चुलीतला धूर दृष्टीस पडतो. आवली भाकऱ्या करते आणि भंडाऱ्याच्या डोंगरावर असणाऱ्या आपल्या पतीला म्हणजेच तुकाराम बुवांना त्या नेऊन देत असते. तुकारामबुवांना हाक मारताना ‘ आवो आवो… ‘ अशा तिच्या आर्त हाका हृदयाला स्पर्शून जातात. डोंगर उतरताना आवलीच्या पायात बाभळीचा काटा घुसतो आणि ती खाली कोसळते. पुढचं तिला आठवत नाही.

आवलीला शुद्ध येते तेव्हा ती आपल्या स्वयंपाकघरात पडलेली असते. चुलीजवळ कोणीतरी स्त्री भाकऱ्या करताना तिला दिसते. आपल्या घरात ही कोण नवीन बाई? तुकारामबुवांनी काही नवीन तर..? अशी शंका तिच्या मनात येते. ती त्या स्त्रीला विचारते, ‘ कोण ग तू? आणि माझ्या घरात कशी आलीस? ‘ तेव्हा ती सांगते, ‘ माझं नाव लखुबाई. मला तुमची काळजी घ्यायलाच पाठवलं आहे. ‘ ही लखुबाई म्हणजेच रुख्मिणी. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सांगण्यावरून ती इथं आली आहे. तशी आवली कजाग बाई. विठ्ठलाला चक्क शिव्या घालत असते. पण त्याचं कारणही तसंच असतं. तिचा पती म्हणजेच तुकाराम महाराज विठ्ठलाच्या नादी लागलेले असतात. आपल्या पत्नीकडे, घराकडे, संसाराकडे त्यांचे काडीमात्रही लक्ष नाही. त्यामुळे ती विठ्ठलाला शिव्या देते. आपल्या पतीला हे ‘ पंढरीचे भूत ‘ लागले आहे आणि त्याने आपल्या सगळ्या संसाराचे वाटोळे केले आहे अशी तिची भावना असते.

आवली विठ्ठलाला ‘ चिघळलेली जखम ‘ म्हणते. देवाच्या नादी लागण्याचा, नामस्मरणाचा काय उपयोग आहे असे म्हणते. पण आता घरात आलेल्या रुख्मिणीला मात्र तिचे हे विठ्ठलाला म्हणजे आपल्या पतीला शिव्या देणे आवडत नाही. अशी ही कजाग आवली असली तरी वरून काटेरी फणसासारखी दिसणारी आहे. अंतर्यामी मात्र फणसाचे गोड गरे आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की आवली विठ्ठलाला शिव्या देत असली तरी त्यानिमित्ताने का होईना पण ती घेते त्याचेच नाव! या अर्थाने आवलीही विठ्ठलभक्त आहेच!

रुख्मिणी तिचा पाय हातात घेते. त्याला मलमपट्टी करते. तिच्याच घरात तिच्यासाठी भाकऱ्या बडवून तिला मदत करते. तेव्हा रुख्मिणी विचारते, ‘ यातला मला एखादा तुकडा दिला तरी चालेल. ‘ तेव्हा आवली म्हणते, ‘ तुकडा कशापायी? पूर्ण भाकरीच देईन की तुला. ‘ यातून आवलीचा प्रेमळ स्वभावही दिसून येतो. रुख्मिणी चुलीजवळ बसून जेव्हा भाकरी करते, तेव्हा चुलीतल्या निखाऱ्याचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. त्याने तिचा मुळातच तेजपुंज असलेला चेहरा उजळून निघतो. तिचं भाकरी करणं, भाकरी शेकणं हे कुठेही नाटकातलं वाटत नाही, इतकं ते जिवंत साकारण्यात ती आणि दिग्दर्शक दोघेही यशस्वी झाले आहेत. आवली जेव्हा घर सारवते, तेव्हाही ते नाटकातलं दृश्य वाटतच नाही.

घर सारवणं नाहीतरी आजकाल कोणाला माहिती आहे? पण आजच्या पिढीला ते यात माहिती होऊ शकेल.

आवलीचा तुकारामबुवांवर राग आहे तसाच रुख्मिणीचा सुद्धा विठ्ठलावर आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रुख्मिणीची देऊळं वेगवेगळी आहेत. विठ्ठल हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे. श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेला आला, तेव्हाही त्याने राधेशी असणारी प्रीती, स्नेहभाव कायमच ठेवला होता. त्यामुळे रुख्मिणी रागावून दिंडीर वनात निघून गेली होती. तोच संदर्भ इथे आहे. या कारणानेच रुख्मिणी विठ्ठलावर नाराज आहे. विठ्ठलाला आपल्यापेक्षा आपले भक्त अधिक प्रिय आहेत अशी तिची तक्रार आहे. विठ्ठलाने जेव्हा आवलीच्या पायातला काटा काढला, तेव्हा स्त्री सुलभ भावनेतून रुख्मिणी बघायला आली की कोण ही की जिच्या पायातला काटा आपला पती काढतो आहे. आवली त्याच्या भक्ताची पत्नी आहे. त्याची काळजी घेणारी ती आहे. ती गर्भार अवस्थेतही आपल्या पतीला जेवण घेऊन येते. म्हणून विठुराया रुख्मिणीला आवलीच्या घरी जाऊन तिची सेवा करायला सांगतो.

अशा या परिस्थितीत आवली आणि रुख्मिणी जवळ येतात. एकमेकींची दुःख समजून घेतात. त्यांच्यातील संवाद हृदयस्पर्शी तर आहेतच पण खूप काही सांगून जाणारे आहेत. तुकाराम बुवा घरात अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्वयंपाकघरातील डबे, भांडी रिकामी आहेत. खरं तर आवलीच माहेर श्रीमंत होतं. ती आपल्या माहेरी परत जाऊ शकली असती. रुख्मिणी तिला विचारते, ‘ मग काय आहे तुमच्याकडे? कसा चालतो तुमचा संसार? ‘ त्यावेळी आवली उपरोधिकपणे तुकारामबुवांचा अभंग वापरून उत्तर देते, ‘ आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने… ‘ त्यावेळी प्रेक्षक अंतर्मुख होतात.

रुख्मिणी विचारते, ‘ मग तू निघून का जात नाहीस? ‘ त्यावर आवलीने दिलेले उत्तर सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ‘ निघून जाऊन काय करू? मी आहे म्हणून त्यांना जेवण तरी मिळते. माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला रुसून निघून जाण्याचा अधिकार कुठे आहे? मी काही रुख्मिणी थोडीच आहे रुसून निघून जायला? आणि निघून गेल्यावर घरी परत यावंसं वाटलं तर आल्यावर घर तरी जागेवर असेल का? मग कुठे जायचं? ‘ यातून तिने रुख्मिणीला बोध तर केला आहेच पण आजकाल क्षुल्लक कारणावरून नवऱ्यावर चिडून घरातून निघून जाणाऱ्या मुली, काही झाले की लगेच घटस्फोट घेणाऱ्या मुली यांच्यासाठीही दोन मोलाचे शब्द यातून तिने सुनावले आहेत असे वाटते. एकदा का घर सोडून निघून गेल्या आणि नंतर परत यावेसे वाटले तरी घर (पती) जागेवर असेलच याची शाश्वती कोणी द्यावी?

रखुमाई म्हणते, ‘ मी आणि तू दोघं गाभाऱ्याच्या बाहेर आहोत, पण तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस. ‘ आवली जशी रुख्मिणीला तिची चूक दाखवून देते, तशीच रुख्मिणी सुद्धा आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग आवलीला सांगते. ती पावसात आवलीला घेऊन जाते. हात पसरून सांगते, ‘ बघ पावसात असं मनसोक्त भिजायचं असतं सगळं विसरून. मुक्त, आनंदी व्हायचं असतं. ‘ या नाटकातील संवाद असेच हृदयाला हात घालणारे आहेत. नाटकाचा काळ प्राचीन असला तरी आजही हे संवाद स्त्री मनाची अवस्था स्पष्ट करतात. ‘ करपायच्या आत खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फोडणी तांबूस झाल्या झाल्या ओतायची भाजीत, उतू जायच्या आत उतरवायचं भांडं… का? कडेलोटाच्या क्षणापर्यंत पोहोचून पुन्हा माघारी का गं फिरायचं आपण बायकांनीच? ‘ आणखी एका संवादात म्हटलं आहे, रखुमाई आवलीला म्हणते, ‘ स्वतःसाठी जग. जगताना स्वतःसाठी काहीतरी जपून ठेव. ‘ ‘ प्रत्येकानं आपापल्या वाट्याचं शेत नांगरून ठेवायचं असतं. पाऊस पडेल किंवा नाही याची चिंता करायची नसते. ‘ ही वाक्यं कुठेतरी गीतेतल्या उपदेशाशी नातं सांगणारी आहेत असं मला वाटतं. आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करावं. बाकी गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढचं ईश्वरावर सोपवावं असंच गीतेत सांगितलं आहे ना!

एकंदरीत हे नाटक आपल्याला थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगीतिक अनुभव देतं. या नाटकात एकाच रंगमंचावर जणू देहू नगरी अवतरली आहे. तुकारामबुवांचा वाडा, आवलीच स्वयंपाकघर, भंडाऱ्याचा डोंगर, इंद्रायणीचा घाट हे सगळे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. यात प्रकाश योजना, नेपथ्य या साऱ्यांचा भाग आहेच. आवली किंवा रुख्मिणी कपडे धुताना, इंद्रायणीच्या पाण्यात हात घातल्यानंतर होणारा आवाज इतका हुबेहूब आहे की खरोखरच इंद्रायणी नदी तिथे असल्याचा भास होतो. यात पारंपरिक संगीत वाद्यांचा वापर केला आहे. तबला, पखवाज, संवादिनी, सतार आदी वाद्यांचे स्वर मन प्रसन्न करणारे आहेत. प्राजक्त देशमुख यांचे संवाद आणि अभंगरचना यांना शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रुख्मिणी /लखुबाई) यांनी न्याय दिला आहे असे म्हणण्यापेक्षा त्याचे सोने केले आहे असे म्हणणे योग्य ठरेल. आनंद भाटे यांचे तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पार्श्वगायन भक्तिरसाचा अनुभव देणारे आहे.

शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांचा जिवंत अभिनय हे नाटकाचं वैशिष्ट्य. आवली जेव्हा तुकारामांना साद घालते तेव्हा तिचे, ‘ आवो आवो ‘ हे शब्द अक्षरशः काळजाचं पाणी पाणी करतात एवढी ताकद, एवढी आर्तता त्या स्वरात आहे. मानसी जोशी विठ्ठलाच्या मूर्तीशी संवाद करीत असताना ती केवळ मूर्तीशी बोलते आहे असे वाटतच नाही. प्रत्यक्ष विठ्ठलच समोर आहे असे वाटते. तुकाराम बुवांची गाथा वाचताना आवली आणि रुख्मिणी दाखवल्या आहेत. आवलीचे गूढ रम्य स्वप्न, वाऱ्याने उडणारी तुकोबांच्या गाथेची पाने, इंद्रायणीत पडून वाहून जाणारी गाथेची पाने हे सगळे प्रसंग कमालीचे जिवंत वाटतात. चित्रपटाच्या तुलनेत दृश्ये दाखवताना नाटकांना अनेक मर्यादा पडतात पण इथे त्या सगळ्या मर्यादा असूनही सगळं काही रंगमंचावर जिवंत करण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि प्रकाश योजनाकार यशस्वी झाले आहेत. प्रेक्षकांना एक भव्यदिव्य अनुभव त्यांनी दिला आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनने अनेक दर्जेदार नाटके दिली, त्याच परंपरेतील हे नाटक आहे. मच्छिंद्र कांबळी यांची दर्जेदार नाटकांची परंपरा प्रसाद कांबळी यांनी नुसतीच चालू ठेवली नसून आणखी पुढे नेली आहे. देवबाभळी हे संगीत नाटक असूनही इतर संगीत नाटकांपेक्षा आगळेवेगळे. प्रसाद कांबळी या नाटकाचे निर्माते आहेत. आनंद ओक यांचे संगीत आहे. विशेष म्हणजे या नाटकातील गीते शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी दर वेळी प्रत्यक्ष गातात. इतर नाटकांप्रमाणे त्या गीतांची रेकॉर्ड लावली जात नाही.

प्राजक्त देशमुख यांचे संवाद हृदयाला भिडणारे आहेत. लोकसंगीत, अभंग, ओवी इ. चा सुरेख वापर या नाटकात केला गेला आहे. संतपरंपरा, लोकपरंपरा आणि अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन हे या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या नाटकाला एकूण ४४ पारितोषिके मिळाली आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी इ. विविध पुरस्कार मिळाले आहेत. अनेक विक्रम या नाटकाने रचले आहेत. फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने या नाटकाची सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून नोंद घेतली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी हे नाटक गौरविले आहे.

केवळ दोनच स्त्री पात्रे एवढा सशक्त अभिनय करून दोघींच्या बळावर एखादे नाटक एवढे यशस्वी करू शकतात हे विस्मयचकित करणारे आहे. त्यासाठी शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघीना सलाम. या नाटकाची वाटचाल लवकरच पाचशेव्या प्रयोगापर्यंत होईल. ज्यांनी अजूनपर्यंत एकदाही हे नाटक पाहिले नसेल त्यांनी एकदा तरी ते जरूर पाहावे असे आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ केळीचे डोहाळेजेवण – लेखिका: सौ. मंजिरी अभिजित वझे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ केळीचे डोहाळेजेवण लेखिका: सौ. मंजिरी अभिजित वझे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

चार दिवस घरात नुसती गडबड चालू होती. कारण काय, तर केळीचे डोहाळजेवण करायचे ठरले होते. गडबड म्हणजे काय, तर हिरवी साडी आणायची. तिला बांगड्या ब्लाऊज पीस, ओटीचे सामान, विड्याची पाने, हे आणायचे होते. घुगऱ्यांसाठी हरबरे, शेंगदाणे भिजत घालायचे होते. मनात खूप उत्सुकता होती, कारण मला पण हे नवीन होते.

दुसरा दिवस उजाडला. सगळी पूजेची तयारी केली. मग सगळ्याजणी म्हणजे कामाच्या 12 बायका आणि मी आम्ही निघालो. जवळ जवळ अडीच हजार झाडे लावलेली त्यातला जो पहिला घड पडला होता, तेच झाड आम्ही निवडले. तिथली जागा स्वच्छ केली. विड्याची पानं मांडली.

त्यावर सुपारी, हळकुंड मांडले. मग त्यावरच सगळा नैवेद्य घातला. म्हणजे दहीभात, वरणभात, मसालेभात, शेवयाची खीर, गव्हाची खीर (इथे त्याला हुग्गी म्हणतात), भाजी, मुख्य पदार्थ म्हणजे आंबील. ती नाचणीची असते. थंडावा देण्यासाठी असते म्हणे. नैवेद्य झाल्यावर ओटी भरली. ओटीत साडी, ब्लाउजपीस, पाच प्रकारची फळे, बांगड्या असे सगळे साहित्य ठेवले होते. मग ती साडी जशी आपण नेसतो तशी झाडाला निऱ्या वगैरे करून नेसवली. त्यानंतर आरती केली. फोटो सेशन तर सतत चालले होतेच. मग सगळ्या बायकांनी गारवा आणला होता. त्यात भाकऱ्या, मुगाची उसळ, दाण्याची चटणी, दहीभात, झुणका, गोड म्हणून मोतीचूराचे लाडू असे आणले होते. त्याचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्या सगळ्यांनी माझी ओटी भरली. अभिजितला टॉवेल टोपी दिली.

जो घरी केलेला राहिलेला नैवेद्य होता तो सगळा एकत्र केला आणि पूर्ण दोन एकराच्या रानात चारी बाजूंनी शिंपडला. मग दुसऱ्या झाडाचा तयार झालेला घड काढला.

हे सगळे का करतात, हा प्रश्न तर मनात होताच. तर केळीचे झाड असे आहे की जे फक्त आपल्या मुलासाठी जगते. जेव्हा झाड मोठे होते, तेव्हा त्याला कोका पडतो, तेव्हा त्याला पण त्रास होतो. झाडातून विव्हळण्याचा आवाज येतो, असे जुन्या बायका सांगतात. जसा घड मोठा होतो तसे त्याचे वजन सांभाळत स्वतःला झिजवत जायचे, आणि पूर्ण पोषण केळ्यांना द्यायचे. आणि जेव्हा घड काढला जातो, तेव्हा स्वतःला समर्पित करायचे. घड काढून झाला, की झाड आपोआप वाळत जाते. म्हणून ही पूजा त्या साठी असते की झाडाची माफी मागून घड कापायचा असतो. अशा प्रकारे आज नवीन माहिती कळली.

लेखिका:सौ. मंजिरी अभिजित वझे

 

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares