मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोपी – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆  गोपी – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

छोट्या निरागस गोपी बरोबर माझा मुंबई-पुणे टॅक्सीतून प्रवास सुरू होता. वयानं लहान असला तरी अनुभवानं तो खूप मोठ्या झाल्याचा मला जाणवत होतं. आपली छोटीशी बॅग अगदी पोटाशी कवटाळून मला चिकटून बसला होता.. “आत्या, तू तरी मला आता सोडून जाऊ नको हं.” अशी विनवणी मला त्याच्या स्पर्शामध्ये जाणवत होती.

त्याच्या आई-बाबांच्या भांडणाची,वादावादी ची झळ गोपीला बसली होती. त्याला आपल्यापाशी आणण्याची त्याच्या पप्पांची धडप ड त्यांनी जवळून पाहिली होती. त्यालाही पप्पांचा आधार हवा होता.त्यांच्या मायेची उब त्याला लपेटुन घ्यायची होती. पप्पां कडेच तो राहणार होता. त्याला खात्री होती, तो पप्पांकडे आला की आजी आजोबा तिकडेच येणार. त्यांच्या बरोबर राहायला मिळणार म्हणून तो मनोमन खुश होता, आनंदात होता.

कोर्टा मधल्या त्या विचित्र, नकोशा वाटणाऱ्या वातावरणात, काळ्या कोट वा ल्या वकिलांना, मोठ्या खुर्चीत बसलेल्या जज्ज अंकल ना त्यांनी निक्षून सांगितले होते, “मी माझ्या पप्पांकडे जाणार”. कोवळ्या वयातल्या त्या चिमुरड्या बोलांनी कोर्टातल्या सगळ्यांचे डोळे पाणावले, मन हेलावलं आणि गोपी चा ताबा रीतसर त्याच्या पप्पांकडे आला.

कोर्टाचा निकाल इतका पटकन लागेल अशी गोपीच्या पप्पांना खात्री नव्हती. त्यांना आनंद झाला, पण वेगळाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. गोपी कडे आता घरी कोण लक्ष देणार? आजी-आजोबांना यायला तर हवं! म्हणून त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं.

क्रमशः —-

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

दुस-या दिवशी सकाळी माधुरीच्या प्रतिकचा फोन, “मावशी तुझी  कल्पना काय भारी आहे ग मला आणि हिला खूपच आवडली. एक्झॅक्टली वृध्दाश्रम नाही. पण तुमच्या मित्रमैत्रिणीचा वयस्कर  आनंदाश्रम म्हणू हवं तर आईबाबा पण खूष. आम्हाला पण त्यांची काळजी रहाणार नाही. बाबा नियमितपणे घरी व्यायाम करत नाहीत. पथ्य पाळत नाहीत. आम्ही सांगायला गेलो तर वाद होतात. दिवसभर घरात दोघंच असतात भांडत बसतात. तुमच्याकडे सगळ्या बरोबर नियमित व्यायाम, पथ्य पण होईल. आम्हाला पण काळजी नाही. आनंदात रहातील दोघं. बरं तसं अंधेरी सांताक्रुझ म्हणजे अंतर पण फार नाही. वाटलं तर कधीही भेटू शकतात.

लगेच प्रकाशच्या जान्हवीचा फोन आला “आत्या, दी ग्रेट! तुझी आयडिया भन्नाट आहे. मला आणि ह्यांना एकदम पसंद” “अग, पण प्रकाश म्हणत होता तुझ्या शुभ्राला आजी आजोबांचा लळा आहे. तू नाही म्हणशील.” “अग आत्या ते बरोबर आहे, पण शुभ्रासाठी का त्यांना अडवून ठेवायचे. त्यांना करू दे ना आता उतारवयात तरी आपल्या मनासारखं. आयुष्यभर कुटुंबासाठीं, नंतर आम्हा मुलांसाठीं नोकरी सांभाळून घर. खूप कष्ट केले. आता बस झालं let them enjoy with you people.”

सुनिताच्या मुलीचा तर us वरुन फोन “मावशी तुझी आयडिया 101% आवडली. असं तर आई बाबा इकडे माझ्याकडे कायमचे यायला तयार नाही की दादाकडे बॅगलोरला पण जात नाहीत. तुमच्या सगळ्या बरोबर मज्जेत रहातील इकडे मला पण काळजी नाही.

विद्याचा मुलगा नितीश तर संध्याकाळी माझ्या घरी हजर,”मावशी तू माझं सगळं tension च दूर केलेस. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही”. “अरे आभार मानण्यासारखं मी काय केले? ते तरी सांग”. “अग मावशी, माझ्या बायकोचं आणि आईचं पटत नाही. आईला समजवावं तर ‘बायकोचा नंदीबैल, आणि बायकोला सांगायला जावं तर मम्माज् बाॅय’ही विशेषणं बर॔ दोघीही वाईट नाहीत दोघींची मते त्यांच्या परीने बरोबरच आहेत. पण कुठे माशी शिंकते कळत नाही. आणि घरांतले मनःशांती बिघडते. एवढे मात्र खरं. तू मात्र ह्या संकटातून माझी सुटका केलीस. परत जवळच्या जवळ कधीही जा ये करु शकतो.”

विजू बायको गेल्यापासून एकटाच रहात होता म्हणून ऑस्ट्रेलियात असणा-या मुलांने मला  फोनवर सांगितले, ‘आत्या, तुम्ही बाबांना तुमच्या कडे घेऊन जा. मला चालेल काय विचारतात ते. त्याना म्हणावं धावेल त्यांनाच काय तुमच्या आनंदाश्रमाला लागेल ती मदत मी करेन. एक जोडपं care taker बरोबर अजून एखाद दोन मुली वरच्या छोट्या, मोठ्या कामाला पार्ट टाईम ठेवा. आता फक्त तुम्ही सर्वानी मज्जा, आराम करायचा. आणि आपापल्या  तब्येती सांभाळच्या. माझी खात्री आहे माझे बाबा तुमच्या सगळ्यांबरोबर जेवढे आनंदात रहातील तेवढे कुठेच राहू शकणार नाही. त्यानी आमच्यासाठीं खूप खस्ता काढल्या. आईच्या आजारपणात पण त्यांची खूप ओढाताण झाली. माझी पण नोकरी इकडे नवीन असल्यामुळे माझी पण मदत नव्हती. तुमच्या सगळ्यांची मदत होती म्हणून आईचे आजारपण ते निभावू शकले. आता तिचे आयुष्य तेवढेच होतं. शेवटी ईश्वरी इच्छा.आता बाबांचे तरी आयुष्य तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आनंदात जाऊ दे.

मला कल्पनाच नव्हती. सहज मनांत विचार येतो काय मी सगळ्यांना बोलावून, सांगते काय ते आपल्या मुलांच्या कानांवर घालतात काय आणि त्यांचा इतका छान आणि त्वरीत प्रतिसाद मिळतो काय?

आमचे पतिराज मला दोन दिवसापूर्वीच म्हणाले होते तुझी कल्पना चांगली आहे. पण त्याला प्रतिसाद फारसा मिळेल असं वाटतं नाही. तुला वाईट वाटेल. पण झालं उलटचं. पण छान. चला कामाला लागू या. मज्जा पुन्हा एकदा 40 वर्षा पूर्वीचे आयुष्य जगू या. कोणाचे बंधन नाही.

कोणाला नातंवंडाना शाळेच्या स्कूल बसचं tension नाही कि सुनेचे, मुलाचे डब्बे भरायला नको. कुणाच्या मुलांना आईबाबा इकडे उतारवयात कसे रहात असतील? ह्याचे साता समुद्रापार टेन्शन नको.

ते पण मजेत, आम्ही पण मजेत, आनंदात आणि याच आनंदात कधी तरी exit घेऊ या.

≡ समाप्त ≡

© सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १७ . विचारपूर्वक निर्णय

नासिकापुरात चार कापूस विक्रेते होते. त्यांनी एक घर भाड्याने घेऊन तिथे खरेदी केलेला कापूस ठेऊन कापसाचा व्यापार सुरु केला. परंतु त्या घरात उंदरांनी धुमाकूळ घातला व ते कापूस कुरतडू लागले. उंदरांचा त्रास कमी व्हावा म्हणून सर्वांनी मिळून एक मांजर खरेदी केली व त्या घरात ठेवली. हळूहळू त्या मांजरीचा त्यांना लळा लागला. मांजरीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या प्रत्येकाने मांजरीच्या पायांमध्ये आभूषणे चढवली.

काही काळानंतर त्या अलंकारांच्या घर्षणाने मांजरीच्या एका पायाला जखम झाली. म्हणून त्या पायात अलंकार घालणाऱ्या व्यापाऱ्याने  अलंकार काढून प्रेमाने जखमेवर कापडी पट्टी बांधली. एकदा रात्री मांजरीने दिव्याच्या मागे लपून समोर उड्या मारणाऱ्या एका उंदरावर एकदम झेप घेऊन त्याला खाल्ले. या झटापटीत मांजरीच्या पायाला बांधलेली कापडाची चिंधी दिव्याला लागून तिने पेट घेतला. मांजर ती चिंधी फाडू शकत नव्हती. जसजसा अग्निदाह वाढू लागला, मांजर सर्वत्र उड्या मारू लागली. उड्या मारता मारता ओरडत ओरडत ती कापूस ठेवलेल्या ठिकाणी आली. कापसाच्या ढिगाऱ्यावर येताच त्या ज्वालेमुळे कापसाने पेट घेऊन सगळा कापूस भस्मीभूत झाला.

दुसऱ्या दिवशी ते दृश्य बघून बाकीचे तिघेही व्यापारी त्या चिंधी बांधणाऱ्या व्यापाऱ्याला “आमचे नष्ट झालेले धन परत कर” असे म्हणू लागले. त्या व्यापाऱ्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला. तो स्तब्धच झाला. नंतर त्या तिघा व्यापाऱ्यांनी राजाकडे जाऊन तक्रार केली की, “या व्यापाऱ्याने नष्ट झालेले धन परत दिले पाहिजे. हेच व्यवहारायोग्य ठरेल.”

राजाने सर्व वृत्तांत सविस्तर ऐकला व विचार करून तिघांना म्हणाला, “या व्यापाऱ्याने पट्टी बांधलेला पाय जखमी होता. त्या जखमी पायाने मांजर कशी बरे उड्या मारू शकेल? म्हणून कापसाच्या ढिगावर उड्या मारण्याने निर्माण झालेला आगीचा डोंब मांजरीच्या इतर तीन पायांमुळे निर्माण झाला यात काही संशय नाही. त्यामुळे तुम्ही तिघांनीच ते घर पूर्वीप्रमाणे बांधून मालकाला द्यावे व तुम्हीच तिघांनी मिळून चौथ्या व्यापाऱ्याला त्याचे नष्ट झालेले धन परत करावे.”

तात्पर्य – विचारपूर्वक निर्णयामुळे निर्दोष व्यक्तीचे रक्षण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का!’  पुष्पा घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन.’

आण्णांनी `ठीक आहे.’ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय,  तो बाप-लेकीतला,किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो,  गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने,  इतकेच नव्हे,  तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या  उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले.  स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही,  अशा असहाय्य,  परित्यक्ता,  विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली,  तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम,  पाठ्यपुस्तके,  प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या  आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार,  उमेद,  उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

—- क्रमश:

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

तुम्ही सगळ्यानी आमच्याकडे आणि निलीमाकडे येऊन रहायचे. आपण एक ठराविक रक्कम एकत्र काढायची. एक तरुण सुशिक्षित जोडपं आपलं care taker म्हणून ठेवायचं म्हणजे ती बाई आपलं चहापाणी, नाश्ता, जेवण,  खाण्या पिण्याचे बघेल. नशिबाने आमच्यात पिणारे कोणी नव्हते म्हणा. आणि त्या जोडप्यांतला पुरुष सगळी बाहेरची कामं करेल. आपण फक्त खाना पिना, मज्जा करना. आणि आपले छंद जोपासणे. बरं त्यातून कधी कोणाला मुलांकडे जावेसे वाटले तर जाऊन यायचं. स्वतःच्या घरी दोन दिवस वाटलं तर जायचं. इतकंच काय पण स्वतःचं घर भाड्याने द्यायचे असेल तरी नंतर देऊ शकता. पण एक महिना बघू या. आपण सगळे कसे adjust होतो का? बरं वैद्यकीय मदत हवी तर एक बिल्डींग सोडून आमचे जुने जाणते डाॅक्टर आणि त्यांचा त्याच्याच सारखा हुशार डाॅक्टर मुलगा आणि क्लिनीक पण आहे. आपापल्या मुलांना विचारा. विचारपूर्वक निर्णय घ्या. आणि आठ दिवसाने सांगा.

रश्मीने शुभारंभाचा नारळ फोडला. ती म्हणाली “आपल्याला ही कल्पना एकदम 100% पटली.” दोन दिवस ती पेन्शनच्या कामासाठीं नाशिकहून दिरांकडून मुंबईला आली होती. माझ्याकडेच मी ठेवून घेतली होती. 2 दिवसासाठीं या स्वतःच्या घराची झाडझूड करा. रहा. चहापाणी सगळंच. त्यापेक्षा म्हटलं माझ्याकडेच रहा. आणि तुझी बाकीची बॅकेची सोसायटीची कामं कर. तिला मुलं बाळं नसल्यामुळे पती निधनानंतर “एकटी कशी रहाणार? आम्ही सगळे नाशिकला. वेळी अवेळी काही दुखलंखुपलं तर आमच्या चार नातेवाईकांत असलेली बरी” म्हणून नणंदेनी आणि जावेनी तिला तिच्या मनाविरुद्ध नाशिकला नेली. भक्कम पेन्शन, बॅंक जमा मजबूत, मुंबईत स्वतःचा फ्लॅट. ह्या वयात कामाला पण वाघ स्वभावाने पण शांत, निरुपद्रवी. अशा माणसाला ठेवायला कोण तयार होणार नाही? पण तिच्या मनाचा विचार कोण करणार? त्यामुळे माझी ही कल्पना तिला पटली. आणि मागचा पुढचा विचार न करता तिने होकार दिला.

माधुरी म्हणते कशी “माझा प्रतिक हो म्हणेल की नाही शंकाच आहे. सूनबाई तर तयार होणारच नाही.” प्रकाश म्हणाला, “आमची जान्हवी नाहीच म्हणणार तिच्या शुभ्राला आजी आजोबाच पाहिजे”. बाकीचे मुलांना विचारुन सांगतो असे गुळमुळीत उत्तर देऊन गेले.

क्रमशः …

© सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा – बाळा जो जो रे ☆ श्री बिपीन कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆ अति लघु कथा – बाळा जो जो रे ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆

कानावर अंगाईचे सूर पडताच मी जागा झालो आणि उठून बाहेर आलो. हातात पाळण्याची दोरी आणि चेहऱ्यावर पसरलेलं विलक्षण लोभस मातृत्व लेऊन वहिनी अंगाई गाण्यात गुंग झाली होती. डोळे विस्फारून मी आणि दादा पहात राहिलो…

समोर कुरळ्या सोनेरी केसांच्या आणि निळ्याशार डोळ्यांच्या आमच्या चिऊचा फोटो होता. आणि वहिनी… रिकामा पाळणा झुलवत होती…

 

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

☆ जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सकाळी लवकर उठून आपले आवरले. स्वत:पुरता नाष्टा करून खाल्ला. आज ऑफिसचा पहिला दिवस होता. पिकअप् करण्यासाठी तिने हा पत्ता ऑफिसला दिला होता.गाडी आली ती गेली. नेहमीच्या सवयी प्रमाणे सम्यक दुपारी उठला अंघोळ आवरुन,  हाॅटेलात जेवून आला. आज घर कसे झकपक होते. प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथे. एका बाईच्या हाताची जादू. घराला घरपण लगेच येते. बाई जेवढ्या प्रेमाने घर आवरते तेवढ्या प्रेमाने पुरूषाला जमत नाही.हे मानलं मी. तो स्वत:वर हसला आणि पुन्हा झोपला. विभा संध्याकाळी घरी आली तेव्हा तो नव्हता. हा लपंडाव आहे. हे घर फक्त झोपायला हवं आहे का? तिने निवांत आपले आवरले, पिठलं भात तयार करून खाल्ला. ती झोपली. आज चांगली झोप लागली. याच रूटीन मध्ये आठवडा कसा गेला समजले नाही आज रविवार मी घरात. तो ही घरात. आपण आपले आवरावे आणि

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जावे. या विचारात ती आवरत होती. तो अंघोळीला गेला होता. तेव्हा बेल वाजली. मी का दार उघडू? माझ्या ओळखीचे कोणी नाही. तिने दुर्लक्ष केले. पुन्हा बेल वाजली तो आतून ओरडला दार उघडा. मी दार उघडले तर दोन मुले होती दारात त्यांचे मित्र असावेत मला पाहून ती गडबडली. मला बघून वेगळाच अर्थ काढला

“साॅरी, न.. सांगताच आलो. येतो आम्ही. सम्याला सांग.अज्या, जॅकी आले होते.”

मी काही बोलायच्या आत सम्यक टाॅवेल गुंडाळून बाहेर आला तो दिसताच “लेका…भावा…पार्टी पाहिजे. आम्हाला न सांगता वहिनी आणलीस.”

“ती वहिनी नाही. पेईंग गेस्ट आहे.”

“सम्या आम्ही सकाळी घेत नाही. काही पण पुड्या सोडतोस. अशी कोणी मुलगी पेईंग गेस्ट म्हणून राहिलं होय.”

ही चर्चा अजून वेगळ्या वळणावर जायच्या आत विभा म्हणाली “होय हे खरे आहे. मी पेईंग गेस्ट म्हणून राहते इथं.”

मित्र घरात आले मी बाहेर पडले. हे गृहित होते. लोक बोलणार. दुसरीकडे घर शोधत राहू चांगले मिळाले की हे घर सोडू. मंदिरात बसून तिने घरी फोन केला. “आई कशी आहेस?”

“मला काय होतंय? तू कशी हायस पोरी. जेवलीस का? तुला हवा मानवली का? जागा मिळाली का? काम कसे आहे? “आई काळजीने चौकशी करत होती. कुशल मंगल विचारत होती. दोघीच्या मायेला पुर आला होता. आईचे आतडे ते लांब गेलेल्या मुलींची काळजी वाटणार.” नवीन शहरात हायस जीवाला जप. तूझ्यावर घर हाय बघ. काही झालं तरी नोकरी महत्त्वाची. तवा जपून रहा. नीट काम कर. सांभाळून रहा.”

“माझी काळजी करू नकोस प्रकाश शाळेत जातो का बघ. त्यांचा अभ्यास घे. बाबांची काळजी घे. फोन ठेवते.” आईशी बोलल्यावर वेगळी ऊर्जा मिळाली. आजवर आईने आपल्यासाठी किती कष्ट उपसले ते आठवले. दिवसरात्र राबून तिने आपल्या शिकवले घर सांभाळले. बाबांचा काही उपयोग नाही. आयुष्यभर कडक इस्त्रीचे कपडे घालून ते पुढारीपणा करत हिंडले. आई होती म्हणून माझे शिक्षण झाले. आता प्रकाशला शिक्षण देण्याची, घर चालवण्याची जबाबदारी माझी आहे. आई नेहमी म्हणायची ‘पोरी तूला चांगली नोकरी लागली की माझी दगदग संपेल बघ. मग प्रकाशची काळजी नाही. तूला कमावलं पाहिजे. तू घराची काळजी घेतली पाहिजे. तुझ्या जीवावर आहे आता सगळं घर.’

विभा ऑफिस मधून घरी आली तर सम्यक घरीच झोपून होता. तिने हाक मारली तरी तो उठला नाही. जवळ जावून पाहिले तर तो कन्हत होता. त्याच्या अंगात ताप असणार. आपण चौकशी केली तर आपण करार मोडला जाणार, आपल्या घर खाली करावे लागणार. काय करू? तिने पुन्हा हाक मारून उठवले तसा तो उठला. तिने चहा बिस्किटे दिली त्याला थोडी हुशारी आली. समोर उभे राहून दवाखान्यात पाठवले औषध खायला घातले. रात्री त्याच्यासाठी मऊ खिचडी केली दोन तीन दिवस चांगली देखभाल केली त्यांच्यात सुधारणा झाली.

“मी हे घर कधी सोडू?”

या प्रश्नाने तो गोंधळला “का?”

“मी आपण आजारी असताना तुमच्या जीवनात ढवळाढवळ केली. करार मोडला, नियमानुसार मला गेले पाहिजे.”

“ही…. ढवळाढवळ चांगली होती. यासाठी घर सोडायची गरज नाही. ती माणुसकी होती. तुमचा मला काही त्रास नाही. तुम्ही राहू शकता.”

“मग मी काही विचारलं तर चालेल. करार मोडणार नाही ना.”

“मी काल इथं एक कागद पाहिला तुम्ही तर डिग्री होल्डर दिसता. मग हे काम?”

“ती मोठी कहाणी आहे. संकट येतात तेव्हा एकटी येत नाहीत. काही वेळा जगण्याची उमेद संपवतात. दोन तीन वर्षांपूर्वी एका अपघातात माझे आई-वडील दोघे गेले. क्षणात मी पोरका झालो. आमचे कुटुंब मध्यप्रदेश मधील वडील एकूलतेएक तिकडे ही कोणी नातेवाईक नव्हते मला काही सुचत नव्हते, मी नुकताच एका कंपनीत जाॅईन झालो होतो.ती नोकरी सोडून जाणार कुठे मी? नाही म्हणायला हे हक्काचे छप्पर होते. पण घरात जीव रमत नव्हता. जरा कुठे सावरत होतो तेवढ्यात मी ज्या  कंपनीत नोकरीला होतो ती कंपनी बंद पडली. नोकरी गेली. घरी बसून बसून वेड लागायची वेळ आली.मी गावभर फिरत राहिलो. रात्री ही घरी यावे असे वाटत नव्हते. मग नाईट क्लबला जावू लागलो. मग तिथेच नोकरी मिळाली. आता रात्रीचा दिवस करतो अन् दिवसांची रात्र हे बरं अंगवळणी पडलय.”

“तुम्ही पुन्हा दुसऱ्या कंपनीत प्रयत्न का केला नाही.”

“आता पुन्हा कुठे श्री गणेश  करायचा? मला भीती वाटते चांगुलपणाची. आहे ते बरं आहे. जास्त अपेक्षा नाहीत जीवनाकडून.”

इंजिनीअर असून हा एका नाईट क्लबवर काम करतो हे काही तिच्या पचनी पडले नाही.

त्या दिवशी सम्यकच्या नांवे एक अपाॅईमेंटलेटर आले त्याला बेंगळुरूला जाॅयनिंग करायचे  होते. तो आश्चर्यचकित झाला. मी कुठेही ऍप्लिकेशन केले नव्हते, तर मला हे पत्र कसे आले. त्याने तिला विचारले तूला काही माहिती आहे. ती गालात हसली तसा तो समजला बोला हे पत्र कसे आले?

“तुम्हाला आनंद झाला नाही?”

“पण हे कसे शक्य आहे?”

“त्यात अवघड काम आहे? तुमची डिग्री चांगली, तुमचा कामाचा अनुभव चांगला, ती प्रमाणपत्रे इथंच मिळाली, मी फक्त दोन तीन कंपन्यात माहिती पाठवली. तुमचे काम झाले. जीवनात उमेद हारून चालत नाही. स्वत:ला ओळखलं पाहिजे. ‘चलती नाम गाडी है’?”

“खरच माझा माझ्यावरचा विश्वास संपला होता. माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खुप आनंदी आहे. आता माझ्या गुणांचे चीज होईल. मला उद्या निघायला पाहिजे.”

“आणि मला ही हे घर सोडावे लागले. मी तयारी करते.”

“ते का?”

“तुम्ही बेंगळुरूला जाणार. तर मला ही घर सोडावे लागेल ना.”

“नाही मी एकटाच जाणार. ह्या घरात तुम्ही रहायचं. हे घर तुम्ही सांभाळणार आहात. हा माझा निर्णय आहे. यावर चर्चा नको.”

समाप्त.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

अंधेरीत आमचा टु बीएचके पुढे मोठी बाल्कनी म्हणजे जवळ जवळ एक रुमच ती. आम्ही आता दोघं senior citizen. घर खायला उठायचे. मुलं आपापल्या संसारात US ला सेटल. आम्ही दोघंच 24 तास घरी. मनांत एक विचार आला. माझा 40 वर्षापूर्वीपासूनचा एक काॅलेजचा ग्रुप 5,6 जणांचाहोता. आता सगळ्यांचे life partner add होऊन double झाला. सगळे एकमेकांत छान मिसळू लागले. पुढे सगळ्यांची मुलं पण साधारण एकाच  वयोगटातील असल्यामुळे त्या सगळ्यांचे पण छान जमत होते. आमचे असे एक कुटुंब झालं होतं. मधून मधून पिकनिकला. गेट-टु-गेदर करा. हे चालूच असायचे. कोणाच्या अडी-अडचणीला, सुखदुःखात आम्ही धावून जात होतो.  मज्जेला तर सगळे होतोच. सगळ्यांची मुले मोठी झाली. नोकरी धंद्यासाठी इकडे तिकडे  पांगली.  त्यांची लग्ने झाली. मुली सासरी दुस-या ठिकाणी गेल्या.

आता काॅलेजचा मुळचा ग्रुप पण जवळपास सगळ्या जबाबदारीतून आपल्या पार्टनर सकट मोकळा झाला. निदान म्हणायला तरी. कोणाचा लाईफ पार्टनर अर्ध्या वाटेवर जग सोडून गेला होता. तसे आम्ही सगळे मुंबईतच आणि विशेष म्हणजे योगायोगाने का होईना पार्ले, अंधेरी, सांताक्रुझला रहात होतो. ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचा निलिमाचा ब्लाॅक तर आमच्या बिल्डींग मध्ये आमच्याच मजल्यावर होता. तो विचार मनांत आला.  पतीराजांशी चर्चा केली. ते म्हणाले माझी हरकत नाही. आपल्या  मुलांशी फोनवर बोलून त्यांचे पण मत घे. आणि मग तुझ्या मित्रमैत्रिणीं बरोबर बोल. पण मला नाही वाटत ते आणि त्यांची मुलं तयार होतील. पण मी म्हटलं विचारुन तर बघू या. माझ्या मुलांना माझी कल्पना आवडली. दोघांनीही ग्रीन सिग्नल दिला. लवकर तयारीला लागा.  म्हणून सल्ला पण दिला.

सगळ्यांना मी एका शनिवारी रात्री घरी रहायलाच बोलावले. पत्ते खेळलो, गाण्याच्या भेंड्या खेळलो. मग विषय काढला. माझ्या मनांत एक विचार आहे तुम्हाला पटतो का बघा? आता आपल्या पैकी बहुतेकांच्या घरात आपण sr. Citizen चअसतो. अगदी एकटं एकटं वाटते. तशी माझी आणि निलीमाची जागा 12,13 जणांसाठीं पुरेशी आहे. मी निलीमाशी पण बोलून घेतले आहे.  तिला आणि तिच्या अहोना पण माझी कल्पना पटली आणि आवडली आहे. तर आपण एक महिना हा प्रयोग करुन बघू या का?

क्रमशः …

सौ. शशी नाडकर्णी -नाईक

फोन नं.8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

परिचय 

शिक्षा – B.Com., A.T.D.A.M.

कला शिक्षक – राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली.
पुरस्कार –  
  1. राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार (2008 व 2019)
  2. राज्य पर्यावरण विभाग चा सृष्टी मित्र पुरस्कार  (2019)
  3. शिक्षण मंडळ कराड यांचा साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार (2019)
  4. कर्मव्रती पुरस्कार (2018) वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी.सांगली .

साहित्य पुरस्कार –

  1. आम्ही तुमचे सोबती या पुस्तकास तीन पुरस्कार
  2. उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती पुरस्कार (2012) मराठी बालकुमार साहित्य सभा,कोल्हापूर.
  3. बालनाट्य लेखन पुरस्कार, सांगली शिक्षण संस्था (शताब्दी महोत्सव)
लेखन –
  1. आम्ही तुमचे सोबती…एकांकिका
  2. शाळेला चाललो आम्ही…पथनाट्य
  3. स्वरा बोलू लागली…कथासंग्रह
  4. वाघोबाचे दुकान….कविता  संग्रह
  5. कोंडमारा….कविता संग्रह
  6. अनेक दैनिके,मासिके यातून नियमित लेखन व पुरस्कार प्राप्ती
  7. प्रकल्पात व सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग,सल्लागार,संचालक

 ☆ जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

विभा ठाणे रेल्वेस्टेशनवर उतरली सकाळचे आठ सव्वा आठ वाजले होते. आजवर सिनेमांतून, सिरियल मधून, कथा कादंबरीतून, वाचलेले मुंबई शहर आज प्रत्यक्ष बघत होती. गर्दीचा सागर उसळला होता.या अफाट गर्दीत तिला ओळखणारे कोणी नव्हते. शेजारच्या गीता काकूंची बहिण निर्मला तिला घ्यायला स्टेशनवर येणार होती.त्यांचा फोटो मोबाईल मध्ये बघितला होता. त्यांना फोन केला नाॅटरिचेबल आला. गीता काकूंचा फोन ऐंगेज येत होता.आता काय करावे सुचत नव्हते.आपण नवखे आहोत हे दाखवायचे नाही. असे ठरवून ती वावरत होती. पण चिंता चेहऱ्यावर दिसत होती. दोन-तीन वेळा ट्राय केल्यावर गीता काकूंचा फोन लागला एकदाचा. इथली अडचण तिने सांगितली आणि एका बाकावर बॅग जवळ घेवून बसली. मनात विचार आला…. समजा निर्मला अंटीची भेट झाली नाही तर ?आपले काय होणार? या अनोळखी शहरात कुठे जाणर? परत घरी जाणे शक्य नाही. आजवर या शहरा बद्दल किती तरी वाचले होते. इथं लोक कसे फसवतात, लुबाडतात. काही सूचत नव्हते. तेव्हा दुसरे मन म्हणत होते, काही तरी मार्ग निघेल. थोडा धीर धर.तेवढ्यात फोनची रिंग वाजली. निर्मला अंटीचा फोन होता. त्याची भेट झाली. त्याच्या बरोबर घरी गेली. इथं राहून कोणत्याही परिस्थितीत तिला दोन चार दिवसांत स्वत:च्या राहण्यांची सोय करायची होती. तिच्या घरात आधीच सहा माणसे होती. छोट्या जागेत त्यांनी विभाला आसरा दिला. हिच मोठी गोष्ट होती. शाळकरी मुले,ही दोघे जाॅबला, तिचे सासू सासरे घरी कागदी पिशव्या तयार करत होते.भली माणसे होती. विभाला त्यांनी घरच्या सारखे वागवले. त्यांने ती सुखावली आणि भारावली. विभा घराच्या शोधासाठी निर्मला अंटी बरोबर बाहेर पडे. घर भाड्यांने देणे आहे. या जाहिरातीतील बहुतेक घरे पालथी घातली.

अशीच एक जाहिरात वाचून तिने घर गाठले. बेल वाजली. एका तरुणाने दार उघडले केस विस्कटलेले, डोळे तारवटलेले, डोळ्यात झोप, अंगात बनियान, टाॅवेल गुंडाळलेला बहुदा तो नुकताच झोपेतून उठलेला असावा किंवा झोप मोड झाली असेल……..

आपल्या काय करायचं ते “चौधरी इंथच राहतात ना.”

तो म्हणाला “कोण हव आहे?”

“जागा भाड्याने द्यायची आहे ना?”

“पेंईग गेस्ट हवा आहे.”

“मी बघू शकते जागा.”

“कोणासाठी?”

“अर्थात माझ्यासाठी”

“नाही मिळणार.”

“का?”

“मी पुरुष भाडेकरू ठेवू इच्छितो.”

“तसा जाहिरातीत उल्लेख नव्हता.”

“राहिला असेल, पण मी तुम्हाला पेंईग गेस्ट म्हणून नाही ठेवू शकत.तुम्ही एक स्त्री आहात.”

“स्त्री आहे हा गुन्हा आहे का?”

“नाही. पण मी अविवाहित आणि ही रिस्क मी घेवू इच्छित नाही. तेव्हा मला फोर्स करू नका.”

चार पाच दिवस झाले. तंगडतोड करते आहे. एक घर धड  मिळाले नाही.हक्काचा निवारा मिळण्यांची आशा अंधुक होताना दिसत आहे. आता जर माघार घेतली तर मला पुन्हा गाशा गुंडाळून गावाकडे जावे लागेल आणि ते अजिबात परवडणारे नाही. चार दिवसात किती नमुने  बघितले. काहीनी तोंडावर दार लावून घेतलं, काहीजण कुलूप लावून पसार झालेले, तर काही ठिकाणी मी जायच्या आत जागा गेलेली. एखाद्या लाॅजवर रहावं म्हणून चौकशी केली तर कळले तिथे साधे फ्रेश होण्यासाठी तासाला सहाशे, सातशे रूपये मोजावे लागतात. आपल्य सारख्याच ते काम नव्हे. एका दिवसात सगळा पगार जायचा.एवढ्या प्रयत्ना नंतर नशिबाने या घराचा पत्ता मिळाला आहे. आता पर्यंत अनुभव लक्षात घेता, ‘आर या पार’ ही जागा हातची घालवायची नाही.

“मी जाते. पण एक मिनिट माझे ऐकाल आणि योग्य वाटले तर निर्णय तुमचा.”

ही पोरगी भलतीच स्मार्ट दिसते. वेगळा स्पार्क आहे हिच्यात  ऐकून तर घेवू. तिचे मत मानण्याची थोडीच जबरदस्ती आहे.

“हं बोला. दोनच मिनिटात.माझ्याकडे जास्त वेळ नाही.”

“थॅक्स हं. मला सांगा. दोन पुरूष एकत्र राहू शकतात, दोन स्त्रिया एकत्र राहू शकतात तर एक पुरुष आणि एक स्त्री का एकत्र राहू शकणार नाहीत. त्यांची मने स्वच्छ असतील, काही गोष्टी सुरूवातीस स्पष्ट केल्या तर मित्रा प्रमाणे का नाही राहता येणार. “दिल दोस्ती दुनियादारी” टी.व्ही. वर बघितलं ना तुम्ही.”

“हे बोलायला सोपे वाटते. जीवन म्हणजे टी.व्ही वरील मालिका नव्हे. प्राॅक्टिकली हे शक्य नाही. दोन अनोळखी स्त्री पुरुष दहा मिनिटे जरी जवळून चालत गेले तरी लोकांच्या भुवया टउंचावतात. वेगळा अर्थ काढतात. तुम्ही तर एकत्र राहण्यांच्या गोष्टी करता आहात. हे शक्य नाही.”

“आपली गरज महत्त्वाची. आपल्या गरजेला लोक मदत करतात का? तमाशा बघत वेळ घालवतात पण दोन मिनिटे मदत करणार नाहीत. उलट जाताना फुकटचा सल्ला देतील. ती गोष्ट वेगळीच. आपल्या कृतीने दोघांच्या गरजा भागत असतील तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष का द्यायचे. या मताची मी आहे.”

“पण उद्या आपल्या वर शितोंडे उडतील, आपल्या बद्दल लोक वाईट बोलतील त्याच काय?”

“आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो म्हणजे झाले. मी दुनियेची चिंता करत नाही. तुम्हाला आर्थिक गरज आहे म्हणून ही जाहिरात दिली ना? पेंईग गेस्ट स्त्री की पुरुष हा प्रश्न माझ्या दृष्टीने गौण आहे.तुमचा आर्थिक भार हलका होणे महत्त्वाचे.माझी तयारी आहे.तुम्ही ही हो म्हणावे.मी मित्रा सारखी राहीन  हे प्राॅमिस आहे माझे.”

या मुलीच्या बोलण्याची तडफ, तिचे विचार वेगळेच आहेत. खर बोलते ती. तसे ही तिच्या अब्रुसाठी मी नाही म्हणत होतो. तिच जर शंभरावर एक टक्का तयार असेल तर, काय हरकत आहे? जमल तर बघू, नाही तर जागा खाली करायला सांगू पण त्यासाठी आपण ही तिला लेखी करारात बांधून घेतले पाहिजे. नंतर कोणते झंगट नको. आपली अजिबात ओळख नाही, कुणाच्या माहितीतील नाही. केवळ विश्वासाच्या भरोश्यावर निर्णय घेतला पाहिजे.

“ठिक आहे. मी विचार करीन,पण एक लेखी करार करु. तो जर मोडला गेला तर मात्र घर सोडावे लागेल.”

“मला मान्य आहे. पण हे पक्के ना?”

तिथून बाहेर पडताना विभा पिसा पेक्षा ही हलकी झाली. मनावरच ओझं कमी झालं. आता ती तिच्या उद्दिष्टा जवळ आली होती. इथं परक्या ठिकणी उपर राहणं किती अवघड असते हे ती अनुभवत होती. निर्मलाचे उपकार न फेडण्या सारखे होते, कोण कुठली  ती. ना नात्याची ना गोत्याची. तरी पाच सहा दिवस आसरा दिला. मायेन ठेवून घेतले. इथली माहिती दिली. चार ठिकाणी वेळ काढून माझ्यासाठी आली. चार ठिकाण हौसेने दाखवली. जेव्हा नाव प्रवाहात जाणार तेव्हाच धक्का देणे महत्त्वाचे असते. तो आधार मला दिला.

त्या तरुणाचा काय निर्णय येईल, सांगता येत नाही. मला पेंईग गेस्ट म्हणून ठेवून घेईल का नाही माहित नाही. पण तिथं राहणे म्हणजे…. पदरात निखारे बांधून घेण्या सारखे होते. प्रथमदर्शनी ती व्यक्ती सभ्य वाटली. ती तशीच असावी यासाठी प्रर्थना करू शकते चार दिवसांत मी कंपनी जाॅईन करीन. त्यापूर्वी मला निवारा मिळणे आवश्यक आहे. तसे ही मी बारा तास बाहेर असणार. झोपण्यासाठी घर हवं.तिच वेळ घातक असते. सगळे पुरुष वाईट नसतात. संशय घेऊन लागलो तर जगणे मुश्किल होवून जाईल. माझ्या या धाडसाला कोणी वेडेपणा म्हणू  शकेल किंवा आणखी काही पण. माझा माझ्यावर विश्वास आहे. एस.टी., रेल्वे, सिनेमागृह, गर्दीत, तिथे अवतीभवती अनेक पुरूष असतात. आपल्याला सगळ्या पुरुषां बद्दल असे काही वाटते का? आपण तिथे समजूतीने वागतो ना. दुसरीकडे जागा मिळेल ही, पण तेवढा वेळ नाही. किती दिवस निर्मला अंटीकडे रहायचं.’ ऊस गोड लागला म्हणून मूळा पर्यंत खाऊ नये’ त्यानां त्रास देणे मला आवडणार नाही. जसे असेल तसे सामोरे जावे लागणार.

ठरल्या प्रमाणे करारावर सह्या करुन ती रहायला आली. त्यांने तिला खोलीची आणि घराची दोन किल्या दिल्या. ही तुमची खोली. मी रोज संध्याकाळी कामावर जातो. पहाटे घरी येतो. माझ्या किल्लीचा वापर मी करेन. तुम्ही तुमच्या सोईने बाहेर ये जा करु शकता. मला कोणता ही त्रास होता कामा नये. मी पहाटे घरी आलो की दिवसभर झोपतो. मला दंगा आवडत नाही. या गोष्टी मी करारात लिहिलेल्या आहेत, वाचलेल्या असतील. मी बॅंकेचा नंबर देतो तिथे भाडे भरा. त्यासाठी ही माझी वाट बघायची गरज नाही. तुम्ही जेवण तयार करण्यासाठी किचनचा वापर करू शकता. मी घरात जेवण करत नाही. मला हे इथं क ते तिथे का? असे विचारायचं नाही. तुमच्या काही सूचना असतील तर सांगा. तिने बोलणे टाळले, तो रात्रभर घरात नाही हीच मोठी गोष्ट होती. तिने आपले साहित्य लावले. देवाचा फोटो ठेवला.” इथं किराणा मालाचे दुकान कुठे आहे ते सांगा. मी साहित्य घेऊन येते”. त्याने माहिती दिली. तिने घर लावले. तो संध्याकाळी कामावर गेला. रात्री तिला या नवख्या जागेत झोप येत नव्हती. घरची आठवण येत होती.आपल्या घराची ऊब या घरात शोधत होती.

पहाटे पहाटे डोळा लागला.तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. आपला दरवाजा तो ठोठवणार नाही ना? कुलूपाची दुसरी किल्ली त्याकडेआहे. जर तो आत आला तर मी काय करणार?  तिने उश्या जवळ चिलीस्प्रे ठेवला होता तो हातात घेतला, तो जवळ आला तर चिलीस्प्रे डोळ्यात उडवायचा आणि बाहेर पडायचे. एक मोठी काठी ही हाताशी ठेवली होती. आपण आपल्या तयारीत असावे. काय भरोसा. कोण? कधी? कसे? वागेल? तिची छाती थडथडायला लागली. डोळे मिटून घेतले. जीवाचा कान करून ती बाहेरील हलचाली टिपू लागली. तो आला पाणी प्याला आणि झोपी गेला. तेव्हा तिला हायसं वाटलं.

क्रमशः

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सॉरी (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ सॉरी (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मला त्यांना सॉरी म्हणावं लागलं, पण मनात विचार आला, माणसं आताशी कसला विचार करू लागलीत. असं झालं होतं रस्त्यावर खूप गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. मी विचार करत होतो, इतकी गर्दी का झालीय? हळू हळू कडेकडेने मी माझी बाईक घेऊन पुढे जात राहिलो. माझ्या असं लक्षात आला, की बरेचसे लोक आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवण्यात मश्गुल झाले आहेत. मी आणखी थोडा पुढे गेलो. माझ्या लक्षात आलं, की पुढे एक ट्रॅक्टर ट्रॉली चाललीय. तिच्यावर बरंच सामान आहे. ते दोरीने बांधलेलं आहे. पण एका बाजूला ते जरा जास्तच झुकलय. इतकं झुकलय… इतकं झुकलय की वाटतय, ट्रॉली आत्ता उलटतीय की मग उलटतीय. ट्रॅक्टरच्या तरुण ड्रायव्हरला याची कल्पना नाहीये.

मी पटकन माझी बाईक पुढे घेतली आणि ट्रॅक्टरच्या तरुण ड्रायव्हरला म्हंटलं, ‘आपल्या ट्रॉलीवर लादलेलं सामान इतकं एका बाजूला झुकलय की ट्रॉली कधीही उलटू शकेल.’

त्याने माझे आभार मानले आणि ‘आता नीट करतो’,  असं म्हणत ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला थांबवला.

मी त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरशी बोलत असेलेलं अनेकांनी पाहीलं होतं. त्यापैकी काही जण माझ्याजवळ  येऊन म्हणाले, ‘आम्ही ती ट्रॉली उलटण्याचा व्हिडिओ बनवणार होतो. आपण सगळी माजाच घालवून टाकलीत.’ आणखीही काय काय बोलले ते लोक.

मी त्यांना सॉरी म्हंटलं आणि पुढे निघालो.

 

मूळ कथा – ‘सॉरी’ –   मूळ  लेखक – श्री विजय कुमार,

सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares