मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ममत्व …’ – भाग- २ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘ममत्व …’ – भाग- २ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(भांडे धुण्यासाठी ठेवत असताना, डिंपलने तिथे उभ्या असलेल्या निष्पाप चेहऱ्यांकडे दुर्लक्ष केले. “जा, तुमच्या खेळण्यांशी खेळा. मला खूप काम आहे, ” असं म्हणत दोघांनाही तिथेच सोडून ती तिच्या खोलीकडे निघाली.) – इथून पुढे —

खोली व्यवस्थित आवरल्यानंतर, तिने पुस्तकांच्या आणि फाईल्सच्या ढिगाऱ्यातून काही फाईल्स काढल्या आणि त्यात ती कामात बुडून गेली. काही वेळाने तिला खोलीत कोणीतरी आल्यासारखे वाटले. मागे न वळताच ती म्हणाली, “हं, काय हवंय? “

पण काहीच उत्तर न मिळाल्याने तीने मागे वळून पाहिले तर प्रांजल आणि प्रार्धना तिथे उभे असलेले दिसले. प्रांजल हळूच म्हणाला, “प्रार्थनाला गाणं ऐकायचं आहे. ” 

डिंपलने एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या स्टीरिओकडे पाहिले, नंतर तिच्या फाईल्सकडे. तिला एका आठवड्यात नवीन प्रोजेक्टच्या फाईल्स तयार करायच्या होत्या. विचार करत असतानाच तिच्या तोंडातून “नाही” हा शब्द बाहेर पडला, मग तिने स्वतःला सावरले आणि त्यांना समजावून सांगताना म्हणाली, “आता मला खूप काम आहे, नंतर तुम्हाला गाणी ऐकवेन. “

दोन्ही मुले एकमेकांकडे पाहू लागली. त्यांना वाटले की त्यांच्या आईने त्यांना कधीही असा नकार दिला नव्हता. पण ते हे उघडपणे सांगू शकले नाहीत आणि शांतपणे त्यांच्या खोलीत गेले.

डिंपल पुन्हा फाईलींमध्ये बुडून गेली पण पुन्हा पुन्हा वाचूनही तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. डिंपलने पेन आपटला आणि ती उठून उभी राहिली. तिने मुलांच्या खोलीत डोकावले, तिथे पूर्ण शांतता होती. प्रार्थना उशी मांडीवर घेऊन, तोंडात अंगठा घेऊन बसली होती. प्रांजल सुटकेसमध्ये खेळणी भरण्यात मग्न होता.

“काय चाललंय? “

“आता आम्ही इथे नाही राहणार, ” प्रांजलने त्याचा निर्णय जाहीर केला.

त्या रात्री डिंपल तिच्या पतीला दुःखी आवाजात म्हणाली, “मी अजून काय करू शकते, आशिष? ते त्यांच्या नाराज नजरेने माझ्याकडे पाहत राहतात. मला ते पाहणे सहन होत नाही. मला त्यांना आनंदी बघायचं आहे, त्यांना समजावलं की आता हेच त्यांचं घर आहे, पण ते ऐकतच नाहीत. ” डिंपल चा सगळा राग तिच्या डोळ्यांतून बाहेर पडला.

प्रांजल आणि प्रार्थना यांच्या शांत रहाण्याने ती मनातून हादरली होती, तिला ते तिचे अपयश वाटत होते. तिला त्यांना स्वीकारायचे होते पण त्यांनी तिला नाकारले होते.

“मला माहित आहे, हे एक कठीण काम आहे, पण अशक्य नाही. आईने त्यांना हे देखील समजावून सांगितले की त्यांची आई खूप दूर गेली आहे आणि आता परत येणार नाही, आणि त्यांचे वडील देखील खूप आजारी आहेत. पण त्याचे कोमल मन हे स्वीकारण्यास तयार नाही. पण हळूहळू सर्व काही ठीक होईल. “

“कदाचित आपण त्यांना इथे आणायला नको होते. यातून जर चांगल्या ऐवजी काही वाईट घडले तर मला खूपच वाईट वाटेल. ” 

“नाही, डिंपी, आपण असा विचार करू नये. सध्या त्यांचे खूप लाड करणं, प्रेम देणं आणि त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण त्यांना जितके जास्त प्रेम देऊ तितके ते आपल्या जवळ येतील. ते आपल्यावर प्रेम करोत किंवा ना करोत, आपण त्यांना प्रेम देत राहिले पाहिजे. “

“असं वागणे मला कदाचित कठीण जाईल. मला त्यांना स्वीकारायचे आहे, पण तरीही मला एक विचित्र भावना, एक विचित्र अंतर आमच्यात जाणवते. ही मुलं जवळ असताना आणि नसतांनाही माझे ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही. माझं मन द्विधा अवस्थेत फसलं आहे. “

“मी इतका खोलवर विचार केला नव्हता. जर तुला इतका त्रास होत असेल तर मी त्यांना हॉस्टेल ला ठेवण्याचा विचार करेन. असंही मुलं अजून तुझ्यात भावनिक गुंतलेली नाहीत, ” आशिष डिंपलला धीर देत म्हणाला.

“नाही नाही, मला त्यांना परत पाठवायचे नाही, मला त्यांना खरोखर स्वीकारायचे आहे. मला ती आपली व्हावेत अशी मनापासून इच्छा आहे, आपल्याला त्यांची मनं जिंकावी लागतील, आशु, मी नक्कीच पुन्हा प्रयत्न करेन. ” 

डिंपलने दुसऱ्या दिवशी सकाळी गाणी लावली. स्वयंपाकघरात काम करत असताना तिने मुलांना हाक मारली, “मुलांनो, तुम्ही मला थोडी मदत कराल का?”

प्रांजल उत्साहाने भरला होता आणि तो मामीला वस्तू उचलून द्यायला लागला, पण प्रार्थना जमिनीवर बसून फक्त चमचा आपटत राहिली. तिच्या निष्पाप आणि उदास चेहऱ्यात काहीही बदल झाला नाही, तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती, जणू ती रात्रभर झोपलीच नव्हती.

त्या रात्री डिंपल त्यांच्या खोलीत बघायला गेली तेव्हा भाऊ आणि बहीण शांत चेहऱ्याने एकमेकांना मिठी मारून झोपले होते. एक मिनिट शांतपणे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, ती आवाज न करता हळूवारपणे तिच्या खोलीत परतली.

दुसरा दिवस खरोखरच चांगला गेला. डिंपलने दोन्ही मुलांना एकत्र आंघोळ घातली. ते बाथटब मधल्या पाण्यात खूप खेळले. मग सर्वांनी एकत्र नाश्ता केला. ती त्यांना खरेदीसाठी बाजारात घेऊन गेली आणि त्यांच्या आवडीचे नूडल्सचे पाकीट आणले. खरंतर डिंपलला नूडल्स अजिबात आवडत नव्हते तरी तिने त्या दुपारी नूडल्स बनवले. आशिष कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मुलांना झोपवण्यापूर्वी तिला त्यांना मिठी मारून प्रेम करायचे होते, पण ती विचार करू लागली, “माझ्यानं असं उत्स्फूर्तपणे का होत नाही? माझं मन का कच खातंय? मी त्यांच्यावर प्रेम करेन, मी त्यांच्यावर प्रेम करेन, ” आणि तिने लगेच त्यांच्या दोन्ही गालांचे मुके घेतले आणि त्यांना अंथरूणावर झोपवले.

तिच्या खोलीत येऊन अंथरूण पाहून डिंपलला शांत झोपून जावेसे वाटले, पण काही झालं तरी तिला तीची कामाची फाईल पूर्ण करायची होती. ती मन मारून उठली, पाय ओढत टेबलाजवळ पोहोचली आणि फाईलच्या पानांमध्ये अडकली.

बाहेर वातावरण अगदी शांत होते, फक्त पहारेकऱ्याचा शिट्टी आणि काठी आपटल्याचा आवाज येत होता. डिंपल ला वाटले की थोडी कॉफी प्यावी म्हणजे कामाला उत्साह येईल पण जशी ती वळाली, तीने बघितले की दारात एक छोटीशी आकृती उभी दिसली. “अरे, प्रार्थना? काय झालं बाळा? तू अजून झोपली नाहीस? ” डिंपलने पेन टेबलावर ठेवत विचारले.

पण प्रार्थना शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात असे काही भाव होते की डिंपल स्वतःला रोखू शकली नाही. ती गुडघ्यावर बसली आणि तीने प्रार्थनाला मिठी मारली. त्या छोट्या मुलीनेही स्वतःला तिच्या मांडीवर झोकून दिले आणि मोठ्याने रडू लागली. डिंपल तिथेच बसली आणि तिने प्रार्थनाला मिठी मारली आणि तिला गोंजारु लागली.

बराच वेळ डिंपल प्रार्थनाला छातीशी कवटाळून तिच्या डोक्यावरून हात फिरवत बसली. प्रार्थना तिच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, “आई आता खरंच येणार नाही का?”

आता डिंपलची पाळी होती. मोठ्या प्रयत्नांनी तिने आपले अश्रू आवरले आणि जड आवाजात म्हणाली, “नाही बेटा, ती आता कधीच येणार नाही. म्हणूनच आम्हाला तुम्हा दोघांची काळजी घ्यावी लागत आहे. चल, काहीतरी खाऊया. मला पण खूप भूक लागली आहे आणि तुलाही लागली असेल. चल नूडल्स बनवूया. हो, आणखी एक गोष्ट, आपण ही मज्जा केली ते कोणालाही सांगायचं नाही, अगदी मामांनाही नाही. ” प्रार्थना च्या डोक्यावरून हात फिरवत डिंपल म्हणाली.

‘‘मामी, प्रांजल ला ही नाही सांगायचं, ’’ प्रार्थना हसत म्हणाली.

‘‘ठीक आहे, प्रांजल ला ही नाही. तु आणि मी जागे आहोत, तर फक्त आपणच दोघं खाऊ मजेदार नूडल्स, ’’ डिंपल च्या उत्तराने प्रार्थना खूश झाली.

नूडल्स खाताना डिंपल प्रार्थनाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. आता तिला स्वीकारले गेले होते. तिने या छोट्या मनांवर विजय मिळवला होता. इतक्या दिवसांनी, प्रार्थनाने तिचे प्रेम स्वीकारले होते आणि तिच्या स्त्रीत्वाला शांती दिली होती. आता डिंपल चा थकवा गायब झाला होता आणि तिची झोप उडाली होती.

अचानक तिचे लक्ष तिच्या फाईलींकडे गेले की जर हे पूर्ण झाले नाही तर तिची स्वप्नेही अपूरी राहतील… पण डिंपलने हा विचार झटक्यासरशी तिच्या मनातून काढून टाकला. तिला मुलीची मिठी, तिचे रडणे आणि तिचा प्रेमळ स्पर्श आठवला. ती विचार करू लागली, ‘प्रत्येक गोष्टीची स्वतःची ओळख असते, स्वतःची गरज असते. यावेळी फायली इतक्या महत्त्वाच्या नाहीत, त्या त्यांची वेळ येण्याची वाट पाहू शकतात, पण मुले… ‘

जेव्हा डिंपलने प्रार्थनाला तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहताना बघितले तेव्हा ती म्हणाली, “ठीक आहे, मला सांग, उद्या रात्री आपण काय करायचे? ”

“मामी, आपण उद्या पुन्हा नूडल्स खाऊ, ” प्रार्थनाने झोप आल्याने जड झालेले डोळे मिचकावत म्हटले.

‘‘मामी नाहीं बेटा, आई म्हण, आई, ’’ म्हणत डिंपल ने तीला कडेवर उचलून घेतले.

– समाप्त –

मूळ हिंदी कथाकार – सुश्री मीता प्रेम शर्मा.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

नाशिक, मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ममत्व …’ – भाग- १ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘ममत्व …’ – भाग- १ – (अनुवादित) मूळ हिन्दी कथाकार : सुश्री मीता प्रेम शर्मा ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

आशीष जाताच डिंपल दरवाजा बंद करून स्वयंपाक घराकडे पळाली. घाईत डबा बॅगेत ठेवत ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून तयार होत स्वतःशीच बडबडत होती, ‘आज पुन्हा मला ऑफिसला जायला उशीर होईल. आधी घरकाम, मग नोकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तोच वादविवादाचा विषय… ‘५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात पहिल्यांदाच नवरा-बायकोमध्ये एवढा गंभीर वाद निर्माण झाला होता. प्रत्येक वेळी एक बाजू हार मानायची, पण यावेळी प्रकरण असे होते की ते असे सोडून देणे शक्य नव्हते.

‘अरे, आशिष, तू पुन्हा त्याच गोष्टीबद्दल बोलत आहेस. तुला माझा निर्णय आधीच माहित आहे, मी हे करू शकणार नाही, ‘ डिंपल म्हणाली, तिचा ताबा सुटला होता आणि टेबलावर तिचा हात आपटला. ‘ठीक आहे, ठीक आहे, मी ते असेच म्हणत होते, ‘

आशिषने अखेर शरणागती पत्करली. मग तो खांदे उंचावून म्हणाला, ‘प्रिया माझी बहीण होती आणि मुलेही तिचीच आहेत, म्हणून त्यांनीही… ‘

डिंपल त्याला मध्येच थांबवत म्हणाली, ‘मी हे समजू शकते, पण आपल्याला सध्या मुलं नको आहेत. मला या त्रासाला तोंड द्यायचे नाही. आपल्या दैनंदिन व्यस्त दिनचर्येत मुलांसाठी वेळ आहे कुठे? माझ्या करिअरसाठी तू नेहमीच मला साथ देशील हे वचन तू विसरलात का, सध्या मुले आवश्यक नाहीत?’ शेवटच्या शब्दांवर खरंतर तिचा आवाज नरमला होता. डिंपलला माहित होते की आशिषला मुलं खूप आवडतात. जेव्हा हे समजले की ती मुलांना जन्म देऊ शकत नाही तेव्हा दोघांनीही एखादं मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता, पण…

‘ठीक आहे डिंपी’ आशिषने तिच्या विचारांचा प्रवाह मध्येच खंडीत करत, वर्तमानपत्र आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवले आणि म्हणाला, ‘आई आणि मी मिळून काहीतरी करू. तू काळजी करू नकोस. सध्या मुलं शेजाऱ्यांकडे आहेत, काहीतरी व्यवस्था करावी लागेलच. ‘

‘आई मुलांना सोबत ठेवू शकत नाहीत का?’ डिंपलने चहाचे रिकामे कप उचलत विचारले.

‘तुला तर माहित आहे की ती किती अशक्त झाली आहे. खरं तर तिचीच काळजी घेण्याची गरज आहे. तिला इथे आपल्याकडे करमत नाही, तिला तिचे गावच जास्त आवडतं. मग त्या दोन लहान जीवांचे संगोपन… असो, मी जातो. मी तुला ऑफिसमधून फोन करून काय ठरलं ते सांगेन. ‘

तयार होताना, डिंपलचे डोळे भरुन आले, ‘अरेरे प्रिया आणि रवी, हे काय होऊन बसलं… बिचारी मुलं… पण मी तरी काय करू, ती सारखी डोळ्यापुढे फिरतात’, तिचे वाहणारे अश्रू पुसत, मेकअप करत ती साडी नेसू लागली.

दोन दिवसांपूर्वीच एका कार अपघातात प्रियाचा जागीच मृत्यू झाला होता व रवी गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल होता‌. त्यांची दोन्ही लहान मुलं आपल्या आई वडिलांची वाट पाहत असताना इकडे डिंपल विचारात पडली होती. तसं बऱ्याच काळापासून डिंपलने त्यांना बघितलंही नव्हतं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा ती त्यांना भेटली होती तेव्हा तर ते खूपच लहान होते.

चंद्रासारखा सुंदर मुलगा आणि फुलासारखी सुंदर मुलगी झाल्यानंतर रवीला जीवनात आणखी काहीही नको असं‌ झालं होतं. प्रिया तर नेहमीच त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळत त्या स्वर्गीय आनंदात न्हाऊन निघायची. पण घरातील बिघडलेल्या वातावरणाने दोघांनाही हादरवून टाकले होते. म्हणूनच मूल दत्तक घेण्याच्या केवळ विचाराने डिंपल घाबरली आणि तिने हा निर्णय घेतला होता.

‘तुझं बरोबर आहे डिंपी, ही घाई आणि गोंधळ माझ्यासाठीही असह्यच असेल आणि तुझं करियर…. ‘ आशिष ने तिचा हात हातात घेत म्हटले.

दोघेही त्यांच्या निर्णयावर खूश होते, परंतु तिला माहित होते की मुलांचे संगोपन केल्याने कुटुंबाचे विघटन होतेच असे नाही. ही एक वैयक्तिक प्रक्रिया आहे. पण ती तिचे भविष्य पणाला लावण्याच्या बाजूने अजिबात नव्हती. तिला हे चांगलेच माहीत होते की आशिषने हा निर्णय फक्त तिला आनंदी ठेवण्यासाठी घेतला होता. पण उलट, डिंपल मुलांचे नाव घेण्यासही धजावत नव्हती.

डिंपल घाईतच निघाली आणि तिने एक रिक्षा केली व ऑफिसला पोहोचली. अर्ध्या तासाने तिचा फोन वाजला, “मी आता मुरादाबादला जात आहे. वाटेत मी आईला माझ्यासोबत घेऊन जाईन, ” पलीकडून आशिषचा आवाज आला.

“मला तुमच्यासोबत येण्याची खरोखरच गरज आहे का?”

“नाही, तसं नाहीये, आई आली तरी चालेल. आणि काही दिवसांपूर्वीच मुले त्यांच्या आजीला भेटली होती. ते तिला ओळखतात. तुला तर ते ओळखतही नाहीत. असो, मीही त्यांना कधीचं भेटलेलो नाही. काळजी करू नकोस. ठीक आहे, मी फोन ठेवतो… “

दोन दिवसांनी, प्रवास व दगदगीने थकलेला आशिष तिथून परतला आणि म्हणाला, “रवी अजूनही बेशुद्ध आहे, दोन्ही मुले त्यांच्या शेजारच्या घरी आहेत. शेजारी खूपच चांगले लोक आहेत व ते दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतात. पण त्यांना तिथे जास्त वेळ ठेवणे योग्य दिसत नाही. मुले त्यांच्या आई वडिलांबद्दल विचारत राहतात, ” आशिष चेहरा ओंजळीत झाकून घेत म्हणाला. त्याचा स्वर भरून आला होता. “आई मुलांची काळजी घेण्यासाठी तेथे आली होती, पण दवाखान्यात रवीची अवस्था पाहून तीच अस्वस्थ झाली, ” आशिषने एक दीर्घ श्वास सोडला.

“मी आज किशोर साहेबांशी बोलले. ते एका आठवड्यात डबल बेड पाठवतील. “

“आणखी एक डबल बेड ? कशासाठी?” आशिषच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले.

“त्या दोघांसाठी एक डबल बेड तर लागेलच ना. आपण त्यांना असे वाऱ्यावर सोडू शकत नाही, त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. ती काही झाडावरून गळून पडालेली पाने नाहीत, जी काळाच्या भोवऱ्यात उडून जातील. ” डिंपलच्या डोळ्यांत पहिल्यांदाच ममत्वाचे भाव बघून आशिषचे मन रोमांचित झाले आणि तो उत्साहाने उडी मारुन तिच्याजवळ आला व म्हणाला, “खरंच डिम्पी, तू त्यांना सांभाळायला तयार आहेस? अगं, डिंपी, कसं सांगू, तू मला द्विधा मनःस्थितीतून बाहेर काढलंस, तुला कदाचित समजणार नाही. मी तुझा कायमचा ऋणी राहीन. ” त्याने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून कृतज्ञता व्यक्त केली.

डिंपल शांतपणे आशिषकडे पाहत होती. भावनिक अवस्थेत घेतलेला हा निर्णय किती काळ टिकेल हे तिला स्वतःलाच माहित नव्हते.

सर्व तयारी करून डिंपल मुलांच्या येण्याची वाट पाहत होती. रात्री १० वाजता बेल वाजली. आशिष दारात उभा होता आणि त्याने सामान जमिनीवर ठेवले होते. त्याचे एक बोट एका मुलाने धरले होती आणि दुसरे दुसऱ्या मुलाने. त्यांना समोर पाहून डिंपल स्तब्ध झाली. तिला मुलांविषयी काहीच ज्ञान किंवा अनुभव नव्हता. एकीकडे तिचे करिअर आणि दुसरीकडे मुले, ती थोडी गोंधळलेली होती. आशिष आणि मुले तिच्या बोलण्याची वाटच पाहत होते. वरवरचे हास्य आणि कोरड्या स्वराने, डिंपलने शांतता भंग केली आणि म्हणाली, “या या, कसा झाला प्रवास ?”

“खूप छान, मुलांनी प्रवासात काही त्रास दिला नाही. ही प्रार्थना आहे आणि हा प्रांजल. मुलांनो, ही तुमची मामी, ” आशिष हसत म्हणाला. पण चारही डोळे निर्विकारपणे या नवीन वातावरणाकडे पाहत राहिले, कोणीही काहीही बोललं नाही.

डिंपलने मुलांची खोली तिच्या आवडीनुसार सजवली होती. तिने कपाटात गोंडस कार्टून प्रिंट पेपर पसरवले होते आणि बिस्किटे व टॉफीचे बॉक्स रचून ठेवले होते. पलंगावर नवीन खेळण्या ठेवल्या होत्या.

प्रांजल खेळण्यांशी खेळण्यात मग्न झाला आणि त्याने या नवीन वातावरणाशी जुळवून घेतलं, पण प्रार्थना पलंगावर मांडीवर उशी घेऊन आणि अंगठा तोंडात घेऊन शांतपणे बसली होती. ती निष्पाप मुलगी तिच्या डोळ्यांत हरवलेले भाव तरळून या नवीन वातावरणाशी जुळवून घेऊ शकली नाही.

आशिषने ऑफिसमधून सुट्टी घेतल्यामुळे पहिले ४-५ दिवस इतके कठीण गेले नव्हते. दोन्ही मुलं एकत्र खेळायची आणि जेवल्यानंतर शांत झोपायची. तरीही डिंपलला भीती होती की ती नाराज तर होणार नाहीत. संध्याकाळी आशिष त्यांना बागेत फिरायला घेऊन जायचा. तिथे दोघेही झोक्यांवर झुलायचे, आईस्क्रीम खायचे आणि कधीकधी त्यांच्या मामांकडून गोष्टी ऐकत असत. आशिष मुलांमध्ये स्वाभाविकपणे मिसळला होता आणि मुलांनीही सर्व संकोच आणि लाजाळूपणा सोडून दिला होता. पण डिंपलशी ती मोकळ्यापणे मिसळू शकली नव्हती, कदाचित हे डिंपलला तसे भासत असेल.

एका आठवड्यानंतर, डिंपलने मुलांसोबत मिसळता यावे म्हणून ऑफिसमधून सुट्टी घेतली. ही एक अशी परीक्षा होती जी आशिषने उत्तीर्ण केली होती. आता डिंपलला तिची क्षमता दाखवायची होती. नेहमीप्रमाणे आशिष तयार झाला आणि ९ वाजता ऑफिसला निघून गेला. दोन्ही मुलांनी नाश्ता केला. डिंपलने त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला होता.

“ठीक आहे मुलांनो, आता तुम्ही जा आणि खेळा, मी थोडी साफसफाई करते, ” नाश्त्यानंतर मुलांना हे सांगत असताना, तिच्या आवाजात उपजत प्रेमभाव नव्हता, उलट मुलांना तिच्या आवाजात कडकपणा आणि आज्ञा जाणवली होती.

भांडे धुण्यासाठी ठेवत असताना, डिंपलने तिथे उभ्या असलेल्या निष्पाप चेहऱ्यांकडे दुर्लक्ष केले. “जा, तुमच्या खेळण्यांशी खेळा. मला खूप काम आहे, ” असं म्हणत दोघांनाही तिथेच सोडून ती तिच्या खोलीकडे निघाली.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथाकार – सुश्री मीता प्रेम शर्मा.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

नाशिक, मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग २ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग २ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

श्री भगवान वैद्य `प्रखर’

(मागील भागात आपण पाहिले- भद्रजींना आयुष्यात पहिल्यांदाच या शहरात राहिल्याचं दु:ख झालं. त्यांनी विचार केला, मी दिल्लीत, बनारस, अलाहाबाद किंवा लखनौमध्ये असतो तर…. आणि ’अमरकृती’ तिथून प्रकाशित झाली असती तर… आज कुठच्या कुठे गेली असती. माणसाने स्वत: बनवलेली आपली मनोहर प्रतिमा खंडीत होते, तेव्हा तो त्याचा दोष आपल्या आसपासच्या परिवेशावर थोपत असतो. भद्रजींनी हेच केले.) आता इथून पुढे — 

एक दिवस हताश होऊन त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उरलेल्या पुस्तकांचे गठ्ठे बांधले आणि आपला बेड किंवा दिवाण किंवा सोफा…. तुम्ही काहीही नाव द्या, त्याखाली सरकवून ठेवले आणि दुसर्‍या दिवसापासून हे विसरण्याचा प्रयत्न केला, की त्यांनीही एक पुस्तक प्रकाशित केलय, ज्याच्या चारशे प्रतींचा एक गठ्ठा, त्यांच्या बारा बाय दहा, बाय दहाच्या संसारात, चार बाय चार, बाय तीन फुटाची जागा घेरून आकसून बसलाय. पण भद्रजींची बायको अशी, की ती काही त्यांना पुस्तकांची आठवण करून देण्याची संधी सोडत नव्हती. तिचं दु:ख हे होतं की सकाळ संध्याकाळ झाडू मारताना तो गठ्ठा मधे मधे यायचा. ती काही क्षण त्यांच्याकडे टवकारून बघायची. मग या कोपर्‍यातून त्या कोपर्‍याकडे, त्या कोपर्‍यातून या कोपर्‍याकडे आपटायची. कधी त्यावर बसून बैठ्या स्टुलासारखा त्याचा उपयोग करायची. तर कधी भेटीसाठी घरी येणा-यांच्या लहान मुलांसाठी सिंहासन बनवायची.

भद्र–निवास स्थित या पूर्णत: उपेक्षित वस्तूला (अमरकृतीचा गठ्ठा) अगदी प्रथम बाहेरच्या ज्या व्यक्तीने जवाहर्‍याच्या नजरेने पाहिले, तो एक रद्दीवाला होता. त्याने भद्रजींची एकमात्र साहित्यकृती आपल्या नजरेने तोलली आणि भद्र–निवासवरून जाताना रद्दीच्या वाढलेल्या भावाची घोषणा केली. भद्रजी संध्याकाळी घरी परत आले, तेव्हा त्यांच्या बायकोने अर्थपूर्ण जिज्ञासा प्रगट केली,

‘असं ऐकलं, की रद्दीचे भाव आज-काल वाढलेत. ’

‘तुला कसं कळलं?’

‘आज रद्दी खरीदणारा आला होता. तो म्हणाला. ’

‘रद्दी खरीदणारा इथे कशाला आला होता? ‘अमरकृती’च्या प्रकाशनानंतर तंगीमुळे आपण वर्तमानपत्रसुद्धा विकत घ्यायचं थांबवलय. ’

‘ या मेल्या गठ्ठयाकडे बघून आला होता. सकाळी खोली साफ केली, तेव्हा हा दरवाजाशी उन्हात म्हणून ठेवला होता. वीस…. तीस किलो तरी असेलच. मांजराचा गू लिंपण्यासाठी उपयोगी नाही, ना सरवाण्यासाठी. ’

‘अमरकृती’च्या उरलेल्या प्रतींच्या बाबतीत श्रीमती भद्रचे स्पष्ट मत आणि त्यात लपलेला गठ्ठा-निवृत्ती प्रस्ताव ऐकून भद्रजींचं मन खिन्न झालं. त्यांनी भरल्या गळ्याने पत्नीला म्हंटलं, ‘भानुमती, काय वाटेल ते होऊ दे. मी माझी ‘अमरकृती’ रद्दीच्या भावात कधीच विकणार नाही. माझ्या ‘अमरकृती’च्या बाबतीत समाज जसा वागलाय, तसं प्रत्येक महान साहित्याकाराच्या महान कृतीबाबत होत आलय. त्यामुळे मला आशा आहे की तो दिवस कधी तरी उजाडेल, की ज्या दिवशी लोक मला शोधत या गल्लीत येतील आणि खाटेच्या खाली असलेले ‘अमरकृती’चेगठ्ठे कारमध्ये घालून घेऊन जातील. ’

भानुमतीच्या दृष्टीने भद्रजींच्या बाकीच्या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या होत्या, पण ‘काय वाटेल ते होऊ दे’, हा शब्दबंध तिने अगदी घट्ट पकडून ठेवला आणि दुसर्‍या दिवसापासून त्यावर अंमल करायला सुरुवात केली. तिने पुस्तकांच्या गठ्ठयाची घराच्या शेगडीशी ओळख करून दिली. हळू हळू हा परिचय घनिष्ठतेत बदलत गेला आणि लवकरच अमरकृती आणि शेगडी हे एकमेकांची गरज बनले. एक दिवस भद्रजींनी आपल्या डोळ्यांनी, अमरकृतीची पाने अग्नीबाणांप्रमाणे शेगडीत उपयोगात येताना बघितली, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांना या कल्पनेने अतिशय दु:ख झालं की त्यांचं अमर साहित्य त्यांच्याच घरात, त्यांच्याच जीवनासाठी, शेगडीत जळत जळत हुतात्मा होतय. याबरोबर अमरकृतीला ‘होम’ होण्यापासून कसं वाचवावं, याचा विचार ते करू लागले.

भद्रजींनी अनेक प्रकारे विचार करून बघितला, पण पुस्तके वाचवायचा कुठलाच मार्ग सापडला नाही. सगळ्यात मोठी अडचण ही होती, की शेगडीला पुस्तकांच्या पानांचं व्यसन लागलं होतं. जोपर्यंत शेगडीला पुस्तकाची चार-पाच पाने चाटवत नाही, तोपर्यंत ती धूर ओकणं चालू ठेवायची.

या दरम्यान भद्रजींच्या परिवारात एक घटना घडली. त्यांना पुत्ररत्न झाले. या पुत्राचं वैशिष्ट्य हे होतं, की त्याला शेगडीत पेटलेली आग खूप आवडायची, पण धूर मात्र आजिबात सहन व्हायचा नाही. त्यामुळे थोडासा जरी धूरउठला, तरी सिंहासन बत्तिशीच्या पुतळीप्रमाणे अमरकृतीची एक प्रत पटकन बाहेर येऊन शेगडीची भक्ष्य बनायची.

आठवडाभर विचार केल्यानंतर भद्रजींच्या मनात आलं, जोपर्यंत शेगडीरूपी शमा आणि पुस्तकरूपी परवाना एकाच जागी असतील, तोपर्यंत परवाने शहीद होत रहाणारच. गृहस्थाच्या घरात शेगडीचं स्थान म्हणजे सुवासिनीच्या कपाळावरील कुंकवासारखं अटळ आहे. भद्रजींनी मग एक अशी अनोखी युक्ती शोधून काढली, की दररोज शेगडीवर बळी चढणारी त्यांची अमरकृती चार भिंतींच्या बाहेर पडून एकाच वेळी अनेक हातात पोहोचेल आणि सामाजिक संपत्ती बनून चिरकाल जीवित राहील.

लगेचच भद्रजींच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम ठरवला गेला. शेजारी-पाजारी, गल्लीवाले अशा अनेक लोकांना बारशाचे आमंत्रण दिले गेले. त्यावेळी बत्ताशांबरोबर अमरकृतीची एकेक प्रत वितरित करायची योजना ठरवण्यात आली. अजूनही दोन-अडीचशे पुस्तके शिल्लक होती. त्यामुळे खूप लोकांना निमंत्रणे दिली गेली. तेवढेच बत्तासेही मागवण्यात आले.

शेवटी एकदाचा तो क्षण आला. अमरकृतीवर एकेक बत्तासा ठेवून ते वाटण्यात आले. बघता बघता दहा किलो बत्तासे आणि अमरकृतीचा पुरा गठ्ठा वाटला गेला. भानुमती खुश होती. तिच्या वन रूम फ्लॅटमध्ये दोन-चार फुटाची जागा रिकामी झाली. भद्रजी खुश होते, कारण त्यांचं पुस्तक सामान्य माणसांपर्यंत पोचलं, ज्यांच्या भावनांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शब्द दिले होते, किंवा असंही म्हणता येईल, की ज्यांचं प्रतिनिधीत्व ते पुस्तक करत होतं.

नामकरणाचा समारंभ संपला. आमंत्रित लोक आपापल्या घरी परतले. जमिनीवर हांतरलेली सतरंजी उचलण्यासाठी भद्रजी वाकले, आणि…. आणि त्यांना दिसलं, त्यांच्या अमरकृतीच्या सगळ्याच्या सगळ्या प्रती सतरंजीवर इथे-तिथे विखरून पडल्या आहेत. बत्ताशाचा मात्र एक तुकडाही नजरेला पडत नव्हता.

– समाप्त –

मूळ हिन्दी लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर’

30, गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती  444607

संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mailvaidyabhagwan23@gmail.com *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग १ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ अमरकृती आणि बत्तासा – भाग १ – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆  मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

भद्रजी, स्थानीय स्तरावरील श्रेष्ठ कवी होते. त्यांच्याकडे कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रकारची कविता तयार असायची आणि तयार नसेल, तर ऑर्डर ‘प्लेस’ करताच चोवीस तासाच्या आत वृत्तपत्राच्या कार्यालयात ती पोच केली जायची. त्यांची अशी ‘प्रॉम्प्ट सर्व्हिस आणि ‘होम डिलिव्हरी’ यामुळे शहरातील एखादंच अपावादात्मक वृत्तपत्र असेल, की ज्यात त्यांची कविता छापली गेली नसेल. असं असलं, तरी एक दु:ख भद्रजींना सलत असायचं. गल्ली-बोळातल्या नाव असलेल्या, नसलेल्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता छापल्या जात असल्या, तरी अजून कोणी माईचा लाल प्रकाशक त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करत नव्हता. पुस्तकरूपात काही प्रकाशित न झाल्यामुळे कुणी साहित्यिक संस्था भद्रजींना साहित्यिक मानायला तयार नव्हती. अखेर एक दिवस भद्रजींनी ‘काला अक्षर भैंस बराबर’; साहित्यिक समज असणार्‍या आपल्या बायकोशी याबाबत चर्चा केली आणि आपलं पुस्तक आपण स्वत:च काढायचं असा निर्णय घेतला.

श्री भगवान वैद्य `प्रखर’

दुसर्‍या दिवसासून भद्रजींचा ‘ पुस्तक प्रकाशन यज्ञ’ सुरू झाला. भविष्य निर्वाह निधी आणि सोसायटीतून घेतलेल्या कर्जाची त्यात आहुती पडू लागली. दुकान-न्- दुकान स्वत: बघत त्यांनी कागद खरेदी केले. डोळ्यात तेल घालून प्रूफ रीडिंग केलं. बाईंडिंग करताना हात काळे करून घेतले आणि आपल्या बारकाईने केलेल्या देखरेखीखाली, ‘अमरकृती’ नावाने आपला अनोखा काव्यसंग्रह तयार केला.

भद्रजींना खात्री होती, की त्यांचा कविता संग्रह छापला जाताच सगळ्या शहरात खळबळ उडेल. लोकांची गर्दीच गर्दी होईल. सगळ्या वर्तमानपत्राचे वार्ताहर बगलेत फोटोग्राफरना घेऊन, घराच्या दरवाजाशी धूळ खात उभे रहातील. पुस्तकाची पहिली प्रत तयार होताच, प्रेसवाला स्वत:च पळत पळत वर्तमानपत्राच्या कार्यालयात ही गुप्त बातमी पोचवून येईल, की शहरात एका महान कवीच्या महान कविता संग्रहाने, ‘न भूतो न भविष्यति’ असा जन्म आत्ता आत्ता एवढ्यातच घेतलाय. पण झालं काही वेगळंच. पुस्तकांचे गठ्ठे रिक्षावर लादताच, प्रेसवाल्याने भद्रजींच्या चालणार्‍या कमी पण हलणार्‍या जास्त मार्का सायकलीत आपली तंगडे अडकवले आणि म्हणाला, ‘महाशय आपली पुस्तके छापली गेली आणि आपण त्याच्या सगळ्या प्रती रिक्षावर चढवल्यातसुद्धा, पण माझे बील काही दिले नाहीत. आधी बील चुकते करा. मगच रिक्षा पुढे जाईल. भद्रजींनी आपली दुचाकी मागे घेत घेत म्हंटलं, ‘यार, जरा लाज बाळग. ही तुझ्या छापखान्यात छापलेली निवडणुकीची पोस्टर्स किंवा साड्यांच्या रीडक्शन सेलची पॅम्प्लेट्स नाही आहेत. ही साहित्यातील सर्वोत्तम विधा ‘कवितांची’ पुस्तके आहेत आणि तीही माझ्या कवितांची. थोडा धीर धर. ही पुस्तके तुला एवढी कीर्ती मिळवून देतील, जेवढी वीस वर्षात तुला हजारो टन कागद छापून मिळाली नसेल. केवळ तूच नाही, तर तुझ्या सात पिढ्यांना सांगताना अभिमान वाटेल, की ‘अमरकृती’ पुस्तक तुझ्या छापखान्यात छापले होते. राहता राहिली गोष्ट बिलाची. तर मी या महिनाअखेरीपर्यन्त तुझे बील चुकते करीन. पुस्तके दुकानात ठेवायचाच अवकाश. प्रती हातोहात खपतील. सहा महिन्यात जर दुसरी आवृत्ती नाही निघाली, तर माझं नाव भद्र नाही, अभद्र ठेव. ‘

प्रेसवाला म्हणाला, ‘तुझं साहित्य गेलं खड्ड्यात आणि हवं तर तू पण जा. जाण्यापूर्वी माझं बील मात्र चुकतं करून जा. अरे, तुम्ही कविता छापून घेणार्‍या लोकांपेक्षा छात्रसंघाच्या मतपत्रिका छापणं चांगलं. हजार-पाचशे छापल्या आणि गठ्ठा फेकला की पैसे हजर. छात्रसंघाच्या मतपत्रिकांच्या तूलनेत कविता छापणं किती महत्वाचं आहे, हे सांगण्यासाठी भद्रजींनी त्याच्यापुढे डोकं फोडलं, पण त्यांना वाटलं, सारी गीता म्हणजे म्हशीपुढे बीन वाजवण्यासारखं आहे. तेव्हा त्यांनी संतापून, आपल्या एकुलत्या एका बायकोची, तर्जनीत अडकवलेली अंगठी आणि आपल्या मनगटात बांधलेलं घड्याळ काढलं आणि प्रेसवाल्याकडे जवळ जवळ फेकत म्हणाले, ‘आज तुला या भद्रची कद्र नाही. पण बघ. पुस्तक मार्केटमध्ये जाण्याचाच उशीर. आठ दिवसात माझ्या प्रेमाची ही निशाणी तुझ्याकडून सोडवून घेऊन जाईन, तेव्हा तुला कळेल, भद्र नावाचीही कुणी चीज आहे. ‘

पुस्तके रिक्षावर लादून नेता नेता भद्रजींना शंका आली, की प्रेसवाल्याशी वाद घालता घालता लोकांना कुणकुण लागली की भद्रजी पुस्तक रुपात छापले गेले आहेत. लोकांनी हातांनी पैशाची बरसात करत, ते रिक्षावर तुटून पडले आहेत आणि घरी पोहोचे पोहोचेपर्यंत रिक्षा पुस्तकांच्या जागी नोटांनी भरलीय. पण असं काही अघटित घडलं नाही. नेहमीप्रमाणे रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती. लक्ष्मी वाटसरूंच्या खिशामध्ये आणि सरस्वतीची अस्मिता रिक्षामध्ये सुरक्षित राहिली. भद्रजी आपल्या रिक्षातील सहाशे प्रतींसकट सही सलामत घरी पोचले. दरवाजात बायकोने पुस्तकांचे गठ्ठे बघितले, तेव्हा चकित होऊन भद्रजींना म्हणाली, ‘हाय दय्या! आपण तर म्हणत होतात, एक पुस्तकच लिहलं आहेत आपण, पण इथे तर इतकी सारी पुस्तके दिसताहेत. ही सगळी आपणच लिहिलीत?’ ही पांडित्यपूर्ण प्रशंसा कॅश करत भद्रजींनी संधीचा फायदा उठवला आणि पुस्तक –प्रकाशनासाठी बायकोची परवानगी मिळवली.

तिसर्‍या दिवशीच एक साधासा पण महत्वाचा, श्रेष्ठ, दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला गेला. साधासा अशासाठी की तो आर्थिकदृष्ट्या ‘गरिबाची गोधडी’ वाटत होता आणि महत्वाचा, श्रेष्ठ, दर्जेदार अशासाठी, की ज्या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते, ते कवितांचे पुस्तक होते. आणि त्या काळात दर्जेदार हा शब्द कवींच्या कैदेत किंवा कवेत म्हणूयात हवं तर, होता. त्यामुळे तो शब्द ज्याला हवा तेव्हा आणि हवा तसा तो वापरू शकत होता. असो.

भद्रजींना खात्रीच होती की प्रकाशन होताच शे-दोनशे प्रती हातोहात खपतील जसं काही कवितेचं पुस्तक नाही, रिलायन्स कंपनीचा शेअर आहे. म्हणून त्यांनी चालू महिन्याचं सगळं बजेट प्रकाशन समारंभावर कुर्बान केलं होतं. प्रकाशन समारंभाच्या वेळी त्यांनी काही पुस्तके मंचावरील पाहुण्यांना वाटली, तेव्हा उपस्थितांना वाटलं की बत्तासे वाटणं चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाने हात पुढे केला. एकाच वेळी अनेक हात पुस्तकापुढे होताहेत, हे दिसताच भद्रजी भावविभोर झाले आणि मुक्त हस्ते पुस्तके वाटू लागले. पण थोड्या वेळाने भावनेची तीव्रता कमी झाली आणि ते धरातलावर उतरले, तेव्हा त्यांनी उपस्थितांचे लक्ष पुस्तकाच्या त्या हिश्श्यावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, जिथे पुस्तकाचे मूल्य छापले होते. पण लोक तर असे, पूर्ण पुस्तक समजून घेऊ इच्छित होते, पण त्या किंमत छापलेल्या भागाकडे डोळे उचलून बघायलादेखील तयार नव्हते.

समारंभ संपल्यावर भद्रजींनी हिशेब केला, दोन-अडीचशे प्रती वाटल्या गेल्या होत्या. त्यांनी ही आपली ‘इन्व्हेस्ट्मेंट’ मानली. आणि विचार करू लागले, दोन-अडीचशे लोक माझी ’अमरकृती’ एकदम वाचतील, तेव्हा शहरात अशी काही खळबळ माजेल, प्रत्येकाच्या जिभेवर पुस्तकाची चर्चा असेल. गल्ली-बोळातला प्रत्येक जण मला आदराने नमस्कार करेल आणि त्याचा परिणाम असा होईल, की पुस्तक विक्रेते स्वत:च माझं घर शोधत इथे येतील आणि ’अमरकृती’च्या उरलेल्या प्रती मी म्हणेन त्या रॉयल्टीवर विक्रेते घेऊन जातील. पण हाय रे नशिबा, न खळबळ माजली, न धूळ उडाली. ज्या शहराने मोठमोठ्या योद्ध्यांना त्यांच्या तीरंदाजीसकट पचवलं आणि ढेकरसुद्धा दिली नाही, त्या शहराने ’अमरकृती’च्या दोन-अडीचशे प्रती सहज पचवल्या.

ही घटना भद्रजींनी गंभीरपणे घेतली. त्यांनी प्रथमच आपल्या आतील तथाकथित महान साहित्यकाराच्या देहाची ऊंची खरवडून कमी केली. आणि स्वत: पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन त्यांचा अनुनय – विनय करत म्हणाले ‘ आपण माझं अभिनव पुस्तक ’अमरकृती’च्या काही प्रती आपल्या दुकानात ठेवा. विकली गेल्यावर किमतीच्या तीस टक्के आपले आणि सत्तर टक्के माझे. पण इथेदेखील भद्रजींच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. कुठलाही दुकानदार तीस / सत्तरच काय, सत्तर / तीसनेही त्यांची पुस्तके दुकानात ठेवायला तयार झाला नाही.

भद्रजींना आयुष्यात पहिल्यांदाच या शहरात राहिल्याचं दु:ख झालं. त्यांनी विचार केला, मी दिल्लीत, बनारस, अलाहाबाद किंवा लखनौमध्ये असतो तर…. आणि ’अमरकृती’ तिथून प्रकाशित झाली असती तर… आज कुठच्या कुठे गेली असती. माणसाने स्वत: बनवलेली आपली मनोहर प्रतिमा खंडीत होते, तेव्हा तो त्याचा दोष आपल्या आसपासच्या परिवेशावर थोपत असतो. भद्रजींनी हेच केले.

– क्रमश: भाग १ 

मूळ हिन्दी लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर’

30, गुरुछाया कालोनी, साईंनगर, अमरावती  444607

संपर्क : मो. 9422856767, 8971063051 * E-mailvaidyabhagwan23@gmail.com *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवन रंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

आठवडाभर पाठपुजा, रुद्राभिषेक आणि आज समाप्तीचे होमहवन, उत्तम प्रसाद, ब्राह्मणभोजन सर्व काही अगदी मनासारखे यथासांग पार पडले. सदाशिवने कशात काहीच उणीव भासू दिली नाही. यामुळे तृप्त झालेल्या यजमानांनी भरघोस दक्षिणा, त्याला धोतर उपरणे, त्याची बायको आणि आईला साडी चोळी असा घसघशीत आहेर केला. दक्षिणेचे पैसे तृप्त भावनेने, सदाशिवने देवळात महादेवापुढे ठेवले. डोके ठेवून मनोभावे दंडवत घातला…

“देवाधिदेवा महादेवा तुझीच कृपा. माझ्यासारख्या सामान्य भक्ताची तुलाच काळजी. मोठ्या विवंचनेतुन सोडवलेस देवा.. कोटी कोटी प्रणाम केले तरी पुरणार नाहीत एवढे उपकार केलेस.” डोळे मिटून शांतपणे प्रार्थना केली.

दुर्गम भागातील डोंगरावर असलेले ते देऊळ -महादेवाचे जागृत स्थान होते. फार जाहिरातबाजी नाही आणि येणे जाणे तसे कष्टाचे म्हणुन भक्तांची वर्दळ तशी मर्यादित. या वर्षी तर तीही रोडावली.

आता पावसाळा तोंडावर आल्याने भक्तांचे येणे केंव्हाही बंद होईल अशीच परिस्थिती होती. दर वर्षीच्या मानाने यावर्षी मिळकत तर खुपच कमी झाली. वर्षभर कसे निभावायचे ही विवंचना. शहरात शिक्षणासाठी रहाणार्‍या दोन मुलांची फी – रहाण्याचा खर्च, देवळाच्या सुधारणेसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते. आईच्या औषधपाण्याचा खर्च. घराची थोडी डागडुजी करावी लागणार तो खर्च. सदाशिवच्या तब्येतीची पण

अधूनमधून तक्रार असायची पण पैशासाठी तपासणी करुन घेणे तो टाळत होता. सगळे कसे काय भागवायचे हीच काळजी सदाशिवच्या मनात सतत होती. जमिन गहाण ठेवुन आणखी कर्ज काढले तरी भरमसाठ व्याजामुळे फुगणारे हप्ते कसे द्यायचे?आणि जमिनीचा तुकडा विकून पैसे उभे करायचे तर म्हातारपणी काय खाणार? २, ४ यजमान येऊन जरा काम मिळाले तर ठीक. नाहीतर काही खरे नाही.

पाठपुजा, अभिषेक, प्रसाद नैवेद्य —सगळे काही अगदी शास्त्रशुद्ध विधीवत सोवळ्यात करायचे ही पारंपारिक प्रथा काटेकोरपणे करणे, यजमानांचे समाधान करणे या बाबतीत सदाशिव कधीच हयगय करत नव्हता. पदराला खार पडली तरी चालेल पण शास्त्रोक्त विधीत तडजोड तो कधीच करत नसे.

त्यामुळे त्याच्याकडे येणारे यजमानही तसे धार्मिक, कर्मठ असायचे. हातातोंडाची गाठ पडण्यास एवढी मिळकत होत असे. पण या वर्षी जरा नव्हे तर चांगलीच ओढग्रस्त परिस्थिती त्याच्यापुढे उभी होती. महादेवच निभावून नेईल असे त्याला वाटत होते.

आणि महादेवाच्या कृपेने एक चांगले यजमान आले. ७ दिवस लघुरुद्र, रोज दुग्धाभिषेक, रोज ब्राह्मण भोजन, होमहवनाने समाप्ती. –सर्व काही शास्त्रशुद्ध पध्दतीने यथासांग पार पडल्यामुळे यजमान संतुष्ट झाले. मिळकतही चांगली झाली. सदाशिवची थोडी का होईना काळजी कमी झाली आणि नेहमीच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने याचे श्रेय महादेवाला दिले. त्याच्या डोळ्यातुन घळघळ वहाणार्‍या पाण्याने त्याने जणु महादेवाला अभिषेक घातला.

शांतपणे, डोळे मिटून, नतमस्तक होऊन नमस्कार करणारी त्याची आई आणि भांबावलेल्या नजरेने त्या दोघांकडे बघणारी, काहीशी कावरीबावरी झालेली त्याची बायको –उमा-मागे उभ्या होत्या. उभे राहुन, डोळे पुसत सदाशिवने वळुन पाहिले. आईच्या पायावर डोके टेकुन नमस्कार केला. उमाकडे बघत, “उमा, तुमची अडचण आली नाही म्हणुन हे सर्व सुखरुप पार पडले. नाहीतर शक्यच नव्हते. हातातोंडाशी आलेला घास गेला असता. महादेवाची कृपाच. “

हातातोंडाशी आलेला घास गेला असता हे ऐकल्यावर उमाने भरल्या डोळ्याने सासूकडे बघितले. तिला जे पाप वाटत होते ते करायला लावताना काल रात्री सासू हेच म्हणाली होती. “हातातोंडाशी आलेला घास जायला नको. ” सदाशिवने ७ दिवसांचा हा कार्यक्रम पत्करला तेंव्हाच उमाला धाकधुक वाटत होती. पाळी जाण्याचे वय झाल्यामुळे आताशा ती नियमित होत नव्हती. ऐनवेळी अडचण नको म्हणुन सदाशिवच्या कानावर घालुया असे उमा सासुला म्हणाली. पण सासूने, “अग, पैशाची आपल्याला किती गरज आहे माहित आहे ना. तु गप्प रहा. महादेव आहे पाठीराखा. अडचण आली तर पुढचे पुढे बघु, ” म्हणुन सासूने तिला काही बोलु दिले नाही.

सासु-सुन दोघीही “आजचा दिवस पार पडु दे रे देवा, ” म्हणुन रोज देवाला साकडे घालत, देवावर श्रध्दा ठेवुन सर्व करत होत्या. रोजची पुजापाठाची, अभिषेकाची तयारी, १०, १५ माणसांचे चहापाणी, नाष्टा, फराळाचे, जेवणाचे –त्यासाठी सामानाची, धान्याची, दुधातुपाची जुळवाजुळव –एकंदरीत बरेच काम-त्यात दिवस कसे गेले हे समजले नाही. होता होता ६वा दिवस उजाडला. उमाला जरा थकल्यासारखे वाटत होते. तरी दुपारपर्यंत सगळे काही रेटले. पण संध्याकाळी ज्याची भिती होती तेच झाले.

सासूबाईंना सांगितल्यावर त्या आधी थोड्या चिडल्या. पण सुनेवर चिडुन उपयोग नाही. हे त्यांनी जाणले. संध्याकाळचे फारसे सोवळे नव्हते म्हणुन जे काही करायचे ते करुन त्यांनी ढकलून नेले. “उमा कुठे आहेत? “म्हणुन सदाशिवने विचारल्यावर “उद्याची तयारी करते” म्हणुन वेळ मारुन नेली.

नंतर सायंप्रार्थनेसाठी देवळात गेल्या. सायंकाळी तशा त्या गाभाऱ्यात जात नसत. पण आज जाऊन महादेवाच्या पिंडीच्या बाजुला जरा लांब बसल्या. डोके शांत ठेवुन बराच वेळ विचार केला. त्यांचे सनातन मन हो-नाहीच्या चक्रात फिरत होते. पुढील वर्षभराचे दारुण चित्र डोळ्यापुढे उभे राहिले, मुख्य म्हणजे सदाशिवची वरचेवर बिघडणारी तब्येत. पैशासाठी तो चालढकल करतो. पण त्याची तपासणी होऊन वेळेवर औषधपाणी व्हायला पाहिजे. आता उद्याची समाप्ती व्यवस्थित झाली नाही तर तो यजमानांकडुन एक पैसाही घेणार नाही. उलट प्रायश्चित्त घेणार.. त्याचा त्रास करुन घेणार. मदतीसाठी कुणाला बोलावणे त्याच्या तत्वात बसणार नाही. हा सर्व विचार त्यांनी केला. डोके टेकुन नमस्कार करुन झटक्यात उठून घाईघाईने, पण निश्चयी मनाने, त्या घराकडे परतल्या.

“उमा, उमा, तिकडली कामे पुरेत. इकडे ये — विरजण घालायचे, डाळी भिजत टाकायच्या –मीठमसाला काढून ठेवायचा, विडे करायचे – किती कामे पडलीत, आत ये आणि भराभर आवर. पाच पंचवीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक म्हणजे सोपे काम नाही. लवकर उठुन कामाला लागायला पाहिजे. नैवेद्याचे ताट घेऊन तुलाच देवळात वेळेवर जायला पाहिजे. “

आत आलेल्या उमाच्या मनात सदाशिवचा विचार आला. भांबावलेल्या उमा काही बोलणार विचारणार, त्याआधीच सासू दबक्या आवाजात, “हे बघ महादेवाला मी सांगीतले, आता तुझे आढेवेढे नकोत, हातातोंडाशी आलेला घास थोडक्यासाठी घालवु नकोस. “

आता सदाशिव तेच म्हणाला –“हाता तोंडाशी आलेला घास”.

— तो आपण वाचवला खरा. पण हे बरे केले का? का पाप घडले आपल्याकडून?याची देव शिक्षा देतील. याचे प्रायश्चित्त कसे करुन घ्यावे. ? हा विचार करत ती खाली मान घालुन घराकडे निघुन गेली.

सासूने ते पाहिले, तिच्या डोळ्यात आता मात्र पाणी आले. भरले डोळे मिटून, महादेवाला नमस्कार करत ती, ” देवा महादेवा, तु सर्वज्ञ.. तुझ्यापासून काय लपून रहाणार? तिने या परिस्थितीत आज शेवटच्या दिवशी तुझ्या प्रसादाचे भोजन तयार केले. म्हणुन ती भांबावलीआहे. पण यात तिची काहीच चुक नाही. सदाशिवला चालणार नाही म्हणुन ती करायला तयारच नव्हती. पण मीच तिला हे करायला भाग पाडले. या पापाची जी काय शिक्षा असेल ती मला दे. आता निदान माझ्या मुलाला औषधोपचार करता येईल, माझ्या नातवंडांचे शिक्षण थांबणार नाही. मुलाची विवंचना थोडीफार तरी कमी होईल, यातच मला समाधान आहे”

मनातील विचार बाजुला सारून, सदाशिवच्या आईने डोळे पुसले. स्थिर मनाने देवळातून घराकडे गेली. ओटीवर रडत बसलेल्या सुनेकडे – उमाकडे कपड्याचे गाठोडे टाकत, ” हे घे,. जा आता परसदारी. घरातले बाकीचे मी आवरते. महादेवाची माफी मागुन आले. आता काळजी करु नकोस. डोळे पुस आता. ” म्हणून स्वतःचे डोळेही हळूच पुसले.

– – आपल्या सनातनी पण तितक्याच व्यवहारी, करारी सासूकडे पहात तिने भरल्या डोळ्यांना पदर लावला…. दोघीनी मंद हसत एकमेकींकडे बघितले.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आष्टा – इस्लामपूर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ आष्टा – इस्लामपूर… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले

“ए ,ते बघ आष्टा-इस्लामपूर ” .. बाळीनं मला कोपरानं ढोसलं.. आम्ही  दोघी त्यांना  पाहून हसू  लागलो..

बाळी माझी जवळची मैत्रीण.. अतिशय खोडकर, मिश्कील.. “सा-या दुनियेची मस्करी करण्यासाठी त्या आकाशातल्या देवानं आपल्याला भूतलावर पाठवलय”.. अशी पक्की खात्री असणारी. शाळा नि कॉलेजातले आदरणीय गुरूजनही तिच्या तावडीतून सुटले नव्हते.. मग हे “आष्टा-इस्लामपूर” कसं सुटावं?

झालं होतं असं की… मे महिना संपत आलेला होता.. आमची परीक्षा नुकतीच संपली होती. माझ्या ताईनं महाबळेश्वरची टूम काढली.. MTDC चं बुकिंगही केलं. त्यामुळे आम्ही महाबळेश्वरला आलेलो.. आम्ही बहिणी.. आमच्या आया-काकवा.. वगैरे..वगैरे. बाळीही आमच्या कुटुंबातलीच.

संध्याकाळी बॉम्बे पॉईंटला पोहोचलो.. सूर्यास्त पहायला.. सगळे सूर्यास्त पहात होते.. पण तारुण्याच्या बहरात असलेल्या माझं नि बाळीचं लक्ष मात्र तिसरीकडेच होतं… नुकतच् लग्न झालेली जोडपी हातात हात घालून, एकमेकांना खेटून फिरताना पहाताना मजा वाटत होती.. नि कुठेतरी पोटात गुदगुल्याही होत होत्या..

हातभर बांगड्या, मेंदीने रंगलेले तळवे, खरंतर वेणीची सवय असणारे पण हनीमूनला आल्याने मोकळे सोडलेले केस.. तेलाच्या सोबतीनं वेणीच्याच वळणाला जाणारे… मुद्दाम मधुचंद्रासाठी नवरोबानं खरीदलेली जीन्स नि त्यावरचा भडक रंगाचा टॉप.. तिला या असल्या कपड्याची सवय नसल्यानं खांद्यावरून ओघळणा-या टॉपला सतत जागेवर आणण्यात गुंतलेली ती, लग्नासाठी विकत घेतलेल्या उंच टाचेच्या वेलवेटच्या चपला नि तंग पॅंट यात अवघडून चालणारी .. हनिमूनला आलोय तर बायकोच्या अंगचटीला येणं हे कर्तव्य समजणारा तिचा गुलाबी शर्टातला नवरा.. नि या सगळ्यानं कसनुसा झालेला  फेअर अँड लवली लावून पांढरा केलेला तिचा चेहरा..!!

हे “आष्टा- इस्लामपूर “… खेडवळपणाचं नि इनोसन्सचं बाळीने ठेवलेलं नाव.. आमचं मिरजही काही मोठं गाव नव्हे… पुण्या-मुंबईसारखं.. तशा आम्हीही खेड्यातल्याच.. पण अंगचा आगाऊपणा स्वत:ला फार ग्रेट समजणारा.

त्या जोडप्यांची यथेच्छ  टर उडवून झाली..

“आपण  नाही हं असलं नव-याबरोबर हनीमूनला जायचं..” प्रतिज्ञाही करून झाली..!!

त्या बॉंबेपॉईंटवरच्या भेळ, आईस्क्रीमवर ताव मारून हॉटेलवर परतलो.. महाराष्ट्र वीज मंडळाच्या कृपेने कॅंडल लाईट डिनरचा आनंद उपभोगला..

दुसर्‍या दिवशी सकाळी विल्सन पॉईंटचा सूर्योदय.. इथे मात्र “आष्टा-इस्लामपूर”ची अनुपस्थिती.. सकाळच्या गुलाबी थंडीतला एकमेकांचा एकान्त सोडून ते त्या रोज उगवणा-या सूर्याला बघायला कशाला मरायला येतायत !!

पण आम्हा दोघींना मात्रं चुकल्या सारखं झालं..!!

त्या दिवशी इतरही अनेक पॉईंट्स पाहिले.. प्रत्येक ठिकाणी माकडांचे नि “लवबर्ड्सचे थवे”… फार मजा आली.. दुपारी दोनला पोटात ओरडणा-या कावळ्यांना गिरीविहार हॉटेलमधे शांत केलं..

हॉटेलमधे गेल्यावर समस्त मंडळी “आता आज कुठेही बाहेर पडायचं नाही” ..म्हणत मेल्यासारखी  झोपली..

मला नि बाळीला काही झोप येईना.. बाहेर पडलो.. नि वाट फुटेल तिकडे चालू लागलो.. “लॉडविक पॉईंट” बोर्ड दिसला.. पावलं तिकडे वळली.. नाहीतरी सकाळी हा पॉईंट पाहिला नव्हताच..

मातीची अरूंद पायवाट.. डोंगराच्या उंच सुळक्याकडे नेणारी.. दोन्ही बाजूला द-या.. सारं काही हिरवंगार.. मन नि डोळे तृप्त करणारं.. हिरवीगार जमीन, हिरवेगार डोंगर-द-या नि काळ्याभोर ढगांनी  भरलेलं निळं-काळं आभाळं… रंगाची नुसती उधळण..!

“निले, आष्टा-इस्लामपूर ” ..बाळी ओरडली..

खरच एक नाजुकसं, नवथर जोडपं जितकं बिलगता येईल तेवढं एकमेकांना बिलगून चालत असलेलं.. तिचा लालबुंद टॉप नि त्याचा पिवळा शर्ट.. हळदीकुंकवाला लाजवेल असा.. एवढे दिवस फक्त सिनेमात पाहिलेलं  प्रणयदृश्य असं लाईव्ह पहायला मिळाल्यावर आम्हाला वेड लागायची पाळी आली.

एवढ्यात टपटप आवाज येऊ लागला..नि त्यामागोमाग  खरपूस मृद्गंधानं लावलेली हजेरी.. थेंबांचं रूपांतर धारांत झालं तसं ती त्याच्या कुशीत शिरली.. नि .. बाळीनं  जोरदार आवाजात सुरू केलं..

“बरसातमें हमसे मिले तुमभी सनम तुमसे मिले हम.. बरसातमे..”

“ताक धिना धिन..”. .मी ही री ओढली..

त्या जोडप्यानं चमकून मागे वळून पाहिलं.. नि ते दोघेही लाजरं- बावरं हसले नि थोडे दूर झाले.. आमची हसून हसून पुरेवाट..

“रिमझिम गिरे सावन”, “गेला मोहन कुणीकडे” असली येत होती नव्हती तितकी आमची पावसाची युगुलगीते  म्हणून झाली .. नि त्यांचं पावसात नि लाजेत नखशिखांत भिजून झालं..

त्यांचं ठीक होतं.. पण आमचं आपलं  कोरडचं भिजणं.. त्यातून मला प्रचंड सर्दी-खोकला झालेला.. शिवाय अशा निर्मनुष्य ठिकाणी दोघींनी पावसात थांबणं सुरक्षित वाटेना..

“बाळे, चल परत जाऊया..”

“अगं पण अजून पॉईंटवर कुठे पोहोचलो ? तिथून प्रतापगड छान दिसतो म्हणे.. जाऊया गं पुढे !!” बाभळीच्या शब्दकोशात भीतीतला “भ” ही नसलेला.. नि भीतीशी माझी गट्टी !!

“मी चालले” .. आकाशात चमकणा-या विजांकडे पहात मी वळले..

“दुसरे दिवशी पुन्हा इथे यायचं” असा तहनामा करून आम्ही परत निघालो नि हॉटेलवर येऊन सा-यांच्या शिव्या पोटभर खाल्ल्या..

“चला, लॉडविक पॉईंटला जायचंय” रात्रीच्या वाक्यज्ञानाला न जुमानता बाळीनं फर्मान काढलं.. सगळे तयार होतेच.. लॉडविक पॉईंट गाठला.. फारच गर्दी होती आज.. भरभर सुळक्यावर पोहोचलो.. सुळका पोलिसांनी भरलेला..

पंचनामा सुरू होता.. 

आदले दिवशी  संध्याकाळी वीज पडून एक जोडपं जागीच गेलं होतं.. मरणानंतरही  एकमेकांच्या कुशीत विसावलेलं ते जोडपं  कालचं “अष्टा-इस्लामपूर”चं होतं..!! 

दरवर्षी मे महिना येतो.. आकाश भरून येतं.. पावसाबरोबरच विजांचं तांडव सुरू होतं..

                          नि..

“आष्टा-इस्लामपूर” डोळ्यांसमोरून  हालता हलत नाही…!! 

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “व्ही आय पी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “व्ही आय पी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

मी आणि व्ही. आय. पी…. कुछ भी… सालं आपल्याला फक्त, व्ही. आय. पी. अंडरवेअर आणि बनियान माहिती. व्ही. आय. पी. ट्रीटमेंट आपल्याला कोण देणार ?

औकात में रहो यार…

हं… फिर भी. एक जगह है ! जिथं आपल्याला व्ही. आय. पी. ट्रीटमेंट मिळते. तुम्ही कधी त्या बाजूला गेलात तर, तिथं जरूर जा. माझं नाव सांगा. फिर देखो, क्या फर्क पडता है !

काहीही फरक पडणार नाही. पहिल्यापासूनच तुम्हाला इतकी छान सर्विस मिळणार. आणखीन स्पेशल काय देणार ?

हं… माझं नाव सांगितलं तर गुलशनदा खुष होईल. हातभर लांब ग्लासातून, स्पेशल लस्सी पाजेल. त्याच्यातर्फे. वर ” कौस्तुभपाजी के दोस्त, वो मेरे दोस्त ” म्हणत तुम्हाला डोक्यावर घेईल. नको नको म्हणलं, तरी पोरांना खाऊ देईल. बिलात डिस्काऊंट देईल. धाब्यामागच्या घरी घेवून जाईल. भाभी, त्याची आई, त्याचा लेक यांच्याशी ओळख करून देईल. फिकर नाॅट. सरदारजी फॅमिली असली, तरी सगळे छान मराठी बोलतात. तुम्ही बिनधास्त मराठीत बोला.

गाडी चालवून दमला असाल, तर निवांत पडा. गुलशनदा सगळी सोय करेल. फ्रेश होवून, चहा पिवून मग पुढे जा. तिथून बाहेर पडताना, त्याच्या दिलखुलास अगत्यानं तुम्ही गुदमरून जाल. पर एक बात याद रखो.

गुलशनदाचं सगळं मनापासून असतं. वरवरचं नाही. जाताना तो तुम्हाला सांगणारच.

” ये पचास किलोमीटर की रेंज में, कोई भी प्राॅब्लेम आया तो मुझे काॅल करो पाजी, बंदा हाजीर हो जायेगा. ” असं म्हणत, तुमच्या हातात स्वतःचं कार्ड देईल. तुम्हाला खरंच आनंद होईल. कदाचित तुम्हीही त्याला तुमचं कार्ड द्याल… 

“पुण्यात आलात तर, आमच्याकडे नक्की या.. ” असं सांगालही. अन् तो खरंच आला तर ?….

काळजी नको. गुलशनदाने दुनिया देखी है.. तो नाही येणार तुमच्याकडे. पुणे सातारा रोड. सुरूरपाशी हायवे सोडला आणि, तुम्ही वाईच्या दिशेने वळलात की, लगेचच गुलशनदा धाबा लागेल. गल्ल्यावर गुलशनदाचा अगडबंब देह अर्धाच दिसेल.

मला तिथलं काय आवडतं सांगू ? तिथली स्वच्छता. पार्किंगला भरपूर जागा. मुलांना खेळण्यासाठी राईडस्.

छान चव. आणि भरघोस अगत्य… आपण कुठंतरी मुंजीला गेलोय. मुंज लागते. बुफे सुरू होतो. आपण खुर्च्या पकडून जेवायला लागतो. जेवण रूचकर असतंच. पण बटूच्या आईबाबांनी आग्रह करकरून,

पानात जिलब्यांची परात ऊभी केली की… जेवणाची गोडी आणखीनच वाढते… गुलशनदाचं तस्सच आहे.

तुम्ही जेवायला सुरवात केली की, तो स्वतः त्याच्या बिळातून बाहेर येणार. तुम्हाला काय हवं, काय नको ते बघणार.. आग्रह करकरून वाढणार. लहान पोरांशी त्याची पटकन गट्टी होते. त्यांना हळूच दटावणार… 

” पानात टाकलं की बाप्पा रागवतो.. ” अगदी अस्सल मराठीत. पोरगं प्रचंड गुलशनकाकाला बघून, आधीच घाबरलेलं असतं. काय बिशाद, पानात काही टाकेल ? तुमची जेवणं होईपर्यंत तो पोरांशी क्रिकेट खेळायला लागेल. बॅट बाॅल आणि प्लेयर्स.. तो सगळं पुरवतो. तुम्ही जेवा निवांत.

एकदा… एकदा चुकून पनीर टिक्का जरा खारट झालेला. मी गुलशनदाला फक्त सांगितलं तसं…

” हो जाता है कभी कभी.. दादा तुम्ही थांबा, पाच मिनटात मी तुम्हाला नवीन सब्जी आणून देतो…

स्वतः बनवलेली. ” तो झरकन भटारखान्यात शिरतो. पाच मिनिटात पनीर टिक्का घेवून हजर..

हा हा हा…. लाजवाब. काय चव होती.. अल्टीमेट.

माझी एक सवय आहे. आजीनं लावलेली. जेवण झाल्यावर, नेहमी करणाऱ्याचं कौतुक करावं. मी जाताना भटारखान्यात शिरायचो. तिथं कृपालसिंग असायचा. त्याला हाताचा मोर करून दाखवायचो.

” खाना बढिया ” तो खुश व्हायचा. गुलशनदालाही “मजा आ गया” असं सांगायचो.

आमच्या वेव्हलेंग्थस् सहज जुळल्या. दरवेळी महाबळेश्वरला जाताना आणि येताना… “गुलशनदा धाबा जिंदाबाद. ” तिथली सगळी माणसं ओळखीची. “कैसे हो ?” असं विचारलं की, भूक वाढायची. मजा यायची.

सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. घरातून आॅफिसला चाललेलो. अभिषेक हाॅटेलजवळचा सिग्नल. हिरव्याची वाट बघत थांबलेलो. पलीकडनं एक अॅम्ब्युलन्स घोंघावत चाललेली. बहुधा दीनानाथच्या दिशेने. गाडीत बसलेला गुलशनदा ओझरता दिसला. टेन्शनवाला गुलशनदा… मी पहिल्यांदाच पाहिला. मी विचार करूच शकलो नाही. गाडी आपोआप दीनानाथच्या दिशेने वळली. मी पोचेपर्यंत स्ट्रेचर आलेलं. त्याची आई. तो स्टेचरबरोबर पळत निघालेला. मागोमाग त्याची बायको. त्याचा छोटा मुलगा. ईमर्जन्सीचा दरवाजा, क्षणभर उघडला. त्याच्या आईला पोटात घेवून बंद.

मी हळूच गुलशनदाच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं मागं वळून बघितलं. कडकडून मिठी मारली. माझा खांदा ओलाचिंब. पाच मिनटं, मी आपला त्याला थोपटत होतो. पुढच्या गोष्टी पटापट झाल्या. मी फार्मा लाईनमधला. एका कंपनीचा जी. एम. मार्केंटींग. ओळखी होत्या. माहिती होती. अटॅक येवून गेलेला.

अॅन्जीओप्लास्टी करावी लागणार होती.

“मी पैसे घेवून येवू का घरनं ?”

गुलशनदानं एक बंडल पुढं केलं.

“कितीही लागू देत… मेरी माँको चंगा कर दो “

मी हिला बोलवून घेतली.

नको नको म्हणत होती ती मंडळी… ही वहिनींना आणि छोट्याला घेवून घरी. पुढचे आठ दिवस. आमच्या वाऱ्या चालू. गुलशनदा नाहीतर वहिनी. कुणीतरी एक आलटून पालटून, हाॅस्पीटलमध्ये थांबायचं. माझं घर दीनानाथपासून अगदी जवळ. गुलशनदाचा मुलगा घरी रमला. माझ्या लेकीशी छान जमायचं त्याचं. मस्त खेळायचे. नवव्या दिवशी डिस्चार्ज. सुदैवानं बायपास करावी लागली नाही.

भरल्या डोळ्यांनी गुलशनदा घरी गेला. आमचं मैत्रीचं नातं आणखीन घट्ट करून. मी मात्र श्रीमंत झालेलो.

मी… माझं घर… कुणाच्या तरी उपयोगी पडलं.. खरी श्रीमंती हीच. बाप्पांना थँक्स म्हणलं. नशीबवान आहे मी. माझ्यासारखीच वेडी बायको दिलीस मला. आल्यागेल्यांचं मनापासून करणारी.

.. सगळ्यात सुंदर बायको कोणती ? पाहुणे दारात बघून, जिच्या कपाळावर आठी उमटत नाही ती. खरंच मला, जगातली सगळ्यात सुंदर बायको मिळालेली.

मागच्याच आठवड्यात हिची किटी पार्टी होती. आऊटींग थीमवाली… महाबळेश्वरला. सोसायटीतल्या पंधरा वीस बायका. तीस पस्तीस पोरं. आख्खी व्हाॅल्वो केलेली.

जाता येता गुलशनदा धाबा. तिथली व्ही. आय. पी. ट्रीटमेंट. हिची गँग शाॅक्ड. सगळ्यांना, इसके पीछे का राज जानना था..

बायको गालातल्या गालात हसली. और बोली.. त्यासाठी “वेड्याची बायको” व्हावं लागतं.

बाजूला बसलेल्या माझ्या लेकीला, एकदम काहीतरी आठव्या.

तिनं भोंडल्यातलं गाणं सुरू केलं.

” वेड्याची बायको करीत होती लाडू.. “

गुलशनदा धाबा हसून हसून थरथरला म्हणे.

हीनं फोनवर सगळं सांगितलं.

मला एकदम व्ही. व्ही. आय. पी. झाल्यासारखं वाटलं.

 (कथा काल्पनिक आहे) 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय… भाग – १ – लेखक – श्री रमेश नागपुरे ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  ☆

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय… भाग – १ – लेखक – श्री रमेश नागपुरे ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

हल्ली एक व्हिडिओ viral होतोय. फळ्यावर आपल्या सगळ्या प्रिय व्यक्तींची नावे लिहिण्याचा आणि त्यातली कमी प्रिय असलेल्या व्यक्तीची एक एक नावे पुसण्याचा… त्यांना आपल्या आयुष्यातून घालवण्याचा… शेवटी एक नाव शिल्लक राहतं. अर्थात ते आपल्या जोडीदाराचं !

हा खेळ मी प्रत्यक्ष अनुभवलाय. अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावना हेलावून टाकणारा असा तो अनुभव होता.

सन 1993 साली मी दिल्लीला IIPA मध्ये पंधरा दिवसाच्या एका resident ट्रेनिंगला गेलो होतो तिथला हा अनुभव आहे. त्या ट्रेनिंगला सगळे चाळीशीच्या पुढचे साठीपर्यंतचे आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेले trainees होते.

एके दिवशी आधीची दोन दोन तासांची दोन सेसन्स झाली होती. नंतर लंच अवर होता. कॅन्टीनकडे वळताना थंडी जाणवत होती. डिसेंबरचा महिना होता. वातावरण खूप आल्हाददायी होतं.

कॅन्टीनमधलं जेवण खूपच रुचकर होतं. स्पेशल स्वीटच्या दोन पंजाबी डिसेस होत्या. एक खास राजस्थानी नमकीन मिठाई होती.

लंच घेतल्यावर आम्ही तीन वाजता पुन्हा क्लास रुममध्ये आलो.

साठीच्या घरातले प्रोफेसर अमीत सक्सेना आले. त्यांनी बघितलं, लंचला भरपेट झालेल्या जेवणाने बरेच लोक आळसावलेले होते.

ते म्हणाले, “Good afternoon…. So what is the topic today ?… Priorities – Elimination of Don’ts. “

थोडा गॅप घेऊन ते म्हणाले, “हरिकांत भैय्याजी तो हमे हर रोज अच्छाही खाना खिलाते है. लगता है आज वो हम पर ज्यादाही मेहेरबान थे. आज मै आपको लेक्चरसे बोअर नही करूंगा. “

थोडं थांबून ते म्हणाले, “चलो, आज हम एक गेम खेलते है. माॅनिटरींग करनेके लिए मुझे एक खूबसुरत चेहरा चाहिये, जो मन से भी खुबसुरत हो. “

मग ते हसत म्हणाले, “जेन्ट्सके चेहरे मुझे इतने खुबसुरत नही लगते. “

सगळे हसायला लागले.

ते पुढे म्हणाले, “हाँ, एक शर्त है. ज्यो भी खुबसुरत चेहरा प्लॅटफाॅर्मपर आये, वो पुरी प्रामाणिकता, सच्चाईसे और दिलसे परफाॅर्म करे. “

पाच मिनिटे गेली. कुणीच महिला उठत नव्हती. आमच्या क्लासमध्ये चौदा महिला होत्या. शेवटी प. बंगालची निधी सेन नावाची एक अभिजात बंगाली सौदर्याचं लेणं ल्यालेली, नजरेत भरणारी पन्नाशीच्या घरातली महिला उठून प्लॅटफाॅर्मपर आली.

सरांनी विचारलं, “तो निधीजी आप तैयार हो ?”

ती म्हणाली, “जी हाँ, सर. “

सरांनी विचारलं, “भावनेवर तुम्ही किती नियंत्रण ठेवू शकता ?”

ती म्हणाली, “फारसं नाही, मी खूप सेन्सेटिव्ह, इमोशनल आहे सर. “

सरांनी विचारलं, “गुड ! मला भावूक होणारी तरुणीच हवी होती. तुम्ही किती लोकांवर प्रेम करता ?”

विचार करून ती हसत म्हणाली, “मी खूप जणांवर प्रेम करते ! माझं हृदय सदैव प्रेमाने पूर्ण भरलेले असतं. “

सर म्हणाले, “good. त्या प्रेमाचा स्तर कमी जास्त असेल ना ?”

ती म्हणाली, “निश्चितच. व्यक्तीपरत्वे फरक पडणारच ना, सर ?”

सर म्हणाले, “good. आता तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता. एक काळजी घ्या. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा. मग क्रमाने दुसरी तिसरी चौथी अशी नावे लिहा. “

सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखल्या होत्या हे ती पाहत होती. तिच्यासाठी खूप अवघड टास्क होता असं तिच्या चेह-यावरून जाणवत होतं.

पहिल्याच नावाला ती अडखळली, चार वेळा तिने आपल्या हातातला पेन बोर्डजवळ नेला व परत खाली घेतला. तिच्या मनात उलाघाल चाललीय, ती तिची सर्वात जास्त प्रिय व्यक्ती ठरवू शकत नाही किंवा लिहू इच्छित नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. ते सरांच्याही लक्षात आलं, तसं ते म्हणाले, “प्रामाणिकता, सच्चाई और दिलसे लिखना है ये याद रखो. यहाँ शायद तुम्हे पहचाननेवाला कोई नही होगा. अपने दिलसे लिख सकती हो. “

तिने फळ्यावर नाव लिहिलं. “आशुतोष. “

सरांनी विचारलं, ”ये कौन हे नसीबवाला ?’

ती म्हणाली, “माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे. “

एक मित्र तिचा सर्वात जवळचा आहे हे ऐकून सगळे चकित झाले होते. मनातून तिच्या खरं बोलण्याला, धाडसाला दाद देत होते.

नंतर तिने आपल्या आईवडिलांची नावे लिहिली.

त्यानंतर एका भावाचे नाव लिहिले.

इथे सगळे पुन्हा चकित झाले. तिच्या भांगेत कुंकू होतं म्हणजे ती विवाहिता होती. मित्र, आई वडील, भाऊ यांच्यानंतर तिच्या नवरा की काय हा प्रश्न आम्हाला पडला होता. तिचा नवरा वारला असेल का अशीही शंका काही लोकांना आली असेल पण तिच्या भांगेतलं कुंकू तसं दर्शवत नव्हतं.

त्यानंतर तिने आपल्या पतीचे नाव लिहिलं.

इथपर्यंत नावं लिहिताना ती बराच विचार करायची हे आमच्या लक्षात आलं होतं.

पुढे ती एक एक नावे फारसा विचार न करता पटापट लिहित होती. जवळजवळ 38 नावे तिने फळ्यावर लिहिली. प्रत्येक नाव लिहिल्यावर ती त्यांची ओळख सांगायची.

सर म्हणाले, “आपने 38 नाव लिखे है और उनकी पहचानभी बतायी है. और भी कुछ नाम लिखना हो तो आप लिख सकती हो. “

तिने अजून चार नावांची भर घातली.

सरांनी विचारले, “अब आप कुछ कहना चाहोगे ?”

ती म्हणाली, “जी नावे लिहिली ती आणि त्यांचा क्रम मी मनापासून लिहिलाय. “

सर सगळ्यांना म्हणाले, “निधीजी बयालीस लोंगोंपर प्रेम करती है, एक क्लॅप तो निधीजी के लिए होनी ही चाहिये. “

सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या.

सर म्हणाले, “आता निधीजींची कसोटी लागणार आहे. खेळाला आता खरी सुरुवात होत आहे. “

खेळ खूप दिलचस्प होता. निधीजी फळ्यावर एक एक नावं लिहित होती. सगळे त्या खेळामध्ये मनाने सामिल झाले होते. तिच्याबरोबर सगळे खेळायला लागले होते. आपल्या मनःपटलावर आपण प्रेम करतो त्यांची एक एक नावे लिहित होते. काही लोकं वही पेनचा वापर करत होते.

सर म्हणाले, “निधीजी, तैयार हो, आगे खेलने के लिए ?”

निधी म्हणाली, “जी सर !”

सर म्हणाले, “आता चार जणांची नावे eliminate करा. तुमच्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढायचे आहे. कायमचं !”

निधीने एका क्षणाचाही विलंब न करता फळ्यावरील चार नावे पुसली.

सरांनी विचारले, “कोण आहेत ही चौघे ?”

निधी म्हणाली, “सर, ऑफिस निमित्ताने संपर्कात आलेली. “

सर म्हणाले, “ओके, अजून काही अशी नावे असतील आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांनाही तुमच्या आयुष्यातून कायमचं घालवू शकता. “

निधीने अजून काही नावे फळ्यावरून पुसून टाकली.

सर म्हणाले, “आता अजून सात आठ नावे पुसून टाका जी तुमच्या आयुष्यात नसतील तरी तुम्हाला चालतील. “

निधीने अजून काही नावे फळ्यावरून पुसून टाकली.

सरांनी विचारले, “कोण होती ही सगळी ?”

निधी म्हणाली, “आमच्या संपर्कात आलेली आणि आमचे शेजारी पाजारी. “

सर म्हणाले, “good. You are on the right track. आता अजून चार पाच नावे फळ्यावरून पुसून टाका ज्यांच्या नसण्याने तुम्हाला विशेष फरक पडणार नाही. “

खेळ रंगत चालला होता. खेळात बहुतेक सगळे सामिल झाले होते. तेसुद्धा खेळाशी एकरुप झाले होते. फरक एवढाच होता की निधी फळ्यावरची नावे पुसत होती आणि आम्ही आमच्या मनःपटलावरची नावे पुसत होतो.

निधीने काही नावे पुसल्यावर सरांनी विचारले, “ये सब कौन थी ?”

निधी म्हणाली, “मेरी सहेलिया. “

आत्ता फळ्यावर मोजकी नावे उरली होती.

तिचा जिवलग मित्र.

तिचे आईवडील.

तिचा एक भाऊ.

तिचा पती.

तिची दोन मुले.

तिच्या दोन बहिणी.

तिचा अजून एक भाऊ.

पतीचे आईवडील.

पतीची एक बहीण.

सरांनी त्या नावांकडे नजर टाकून पुन्हा एकदा त्यांची ओळख विचारली. निधीने ओळख दिल्यावर सरांनी निधीला तीन नावे पुसायला सांगितली.

निधीने थोडा विचार करून पतीचे आईवडील व पतीच्या बहिणीचे नाव पुसून टाकले.

आतापर्यंत या खेळाचा शेवट बहुतेकांच्या लक्षात आला होता. निधीची चांगलीच कसोटी लागणार असल्याची कल्पना आम्हाला आली होती कारण तिचा priority चा क्रम काहीसा अस्वाभाविक होता.

निधी काहीशी तणावाखाली आली होती. सासूसास-याचे नाव पुसताना तिचे हात कापत होते. ती काहीशी उदास दिसत होती.

सरांच्याही लक्षात तिची स्थिती लक्षात आली होती. ते म्हणाले, “आता अजून चार नावे पुसून टाका. “

निधी भावनावश झाली होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. अश्रुंचे काही थेंब तिच्या डोळ्यांतून गालावर ओघळले होते.

तिने दोन भाऊ आणि दोन बहिणीची नावे पुसली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

सर म्हणाले, “आपने अपनी दो बहने और दो भाईयों को भी अपनी जिंदगीसे निकाल दिया ? क्यो ?”

निधी रडत म्हणाली, “मै बहुत प्यार करती हूँ उनसे. लेकिन कभी कभार छः महिने, सालमे एक बार मिलते है. एक भाई तो यू के मे है. तीन साल हो गये, वो नही मिला. छोटा भाई भी दूर रहता है. छः आठ महिनें  मे मिलते है. पहले हम पुजा की छुट्टीयों मे हर साथ इकठ्ठा आते थे. अब सब अपने अपने काम मे व्यस्त हो गये है.”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री रमेश नागपुरे

मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रघुनायका, मागणे हेचि आता… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ रघुनायका, मागणे हेचि आता… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

मंदिराची पायरी उतरून ताई भयंकर चिडीने, त्राग्याने मुख्य दरवाजापाशी आल्या. स्वत:शीच पण मोठ्याने बडबडत होत्या. स्वत:शीच बडबडण्याच्या नादात शेजारी एक मोरपीस विकणारा दादा दिसला त्याच्याशी बोलू लागल्या :

“पुन्हा इथे दर्शनाला यायचं नाही. इतक्या लांबून माणसं येतात पण देवाला धड पाहूही देत नाहीत हे लोक. लांब रांगेतून देवासमोर पोचलो नाही तोच पुढे ढकलतात.”

तो दादा : “पहिल्यांदा येताय का ?”

ताई : “नाही हो. नेहमी हे असंच असतं.”

तो : “अहो ताई, इथे असंच होतं याची कल्पना होती तरी आलात ना ? मग आता जाऊ द्या की. नावं का ठेवत आहात ?

ताई : “अहो दादा, आशा वाटतेच ना की जरा नीट दर्शन होईल म्हणून ? देवापुढे मागणे मागता येईल, तोपर्यंत देवासमोर उभे राहता येईल. मागच्या दर्शनानंतर मुलाला चांगला जॉब लागला. आता जावयाच्या घराचा व्यवहार पक्का होऊ घातला आहे, त्यामुळे देवाचे दर्शन घेऊन येऊ म्हणून आले. पण इथे साधे दहा सेकंदही देवासमोर नीट उभे राहता येत नाही. आजही जेमतेम पाहिले देवाला.”

तो : “रांगेत किती वेळ गेला हो ?”

ताई : “तब्बल पाऊण तास होते रांगेत. तरी बरे पुढच्या एक ताई छान गप्पा मारत होत्या म्हणून बरे झाले.”

तो : “हाsss. हे बरे. एकट्या असता तर उगीच नामस्मरण वगैरे करत रांगेत उभे राहावे लागले असते.”

ताई (त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून) : “म्हणजे?”

तो (विषय टाळत) : “म्हणजे काही नाही हो. पाऊण तास नामस्मरण करायचे आणि प्रत्यक्ष देवासमोर दहा सेकंदही उभे राहता आले नाही तर सामान्य माणसाला राग येणारंच ना. साहजिकच आहे.”

ताई (एक भुवई वर करत) : “सामान्य माणूस म्हणजे?”

तो (विषय टाळत) : “काही नाही हो. जनरल बोललो.”

ताई : “नाही. सांग नीट.”

मनातली चीड जराशी व्यक्त झाली असल्याने एव्हाना ताई किंचित शांत होत होत्या.

तो : “ताई, समजा एक दिवस असे झाले की सबंध गाभारा. गाभाराच कशाला ? सबंध देऊळच लोकांसाठी बंद ठेवून फक्त तुम्हालाच आत प्रवेश दिला तर ? अख्खाच्या अख्खा दिवस देव फक्त तुमच्यासाठी. मोबाईल फक्त बाहेर ठेवायचा. तो सोबत न्यायचा नाही. बाकी सगळे देऊळ तुम्हाला. तर काय कराल ?”

ताई (तोंडाचा आ वासून, विचारांत गर्क) : ….

तो : “आहेत की अशीही पुरातन देवळे अजून, जिथे माणसे फार नसतातच. आणि ते राहू द्या बाजूला. पण समजा खरेच असे झाले तर ?”

ताई विचारातच पडल्या होत्या.

तो : “सांगा.”

ताई : “अहो, थांबा हो. विचार करतेय.”

तो : “जास्त ताण देऊ नका. मी सांगतो काय कराल ते. फक्त माझे म्हणणे बरोबर की चूक ते सांगा.”

“तुम्हाला देवाचे शांततेत दर्शन हवे आहे, देवाशी संवाद हवा आहे, त्याला मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, यासाठी सबंध देऊळ फक्त तुम्हाला देऊ केले. संपूर्ण देवळात फक्त देव आणि तुम्ही. तर तुम्ही आत जाल, नमस्कार कराल, देवाकडे मागण्या मागाल. हे असलं सगळं कराल आणि मग पाच मिनिटांत पहिला प्रश्न मनात येईल. ‘आता काय करायचे दिवसभर ? मोबाईल पण नाही सोबत. स्तोत्रे बित्रे किती म्हणणार.? जप तरी किती करणार.? इतर वेळेस सगळे सांभाळून आपण तोंडी लावल्यासारखे देवाचे करतो ते वेगळे. पण अख्खा दिवस देवळात करायचे तरी काय ? आणि देवाशी आपण बोलून बोलणार तरी किती? तो तर काहीच बोलत नाही. बापरे.’ होईल ना असे ?”

हे बोलणे ताईंसाठी अनपेक्षित होते असे त्यांचा चेहराच सांगू लागला.

“अहो ताई, आपल्याला देव भेटायला हवा असतो तो आपल्या टर्म्स वर! आपल्याला हवा तसा ! आपल्याला हवा तेव्हा ! हो की नाही ? आपल्याला नको असताना तर देवही नको असतो. हो ना ? 

‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ श्लोक शाळेत मराठी शिकवण्यासाठी शिकवलेला असतो आपल्याला, नाही ? आणि आपण स्वत: ठरवून देवाच्या दर्शनाला जायचे म्हणजे सगळे कसे सुखावह, आरामात व्हायला हवे म्हणजे ‘देवदर्शन छान झाले’ असे वाटते. आपल्या अपेक्षा अगदी इथपासूनच सुरु होतात, नाही ? ‘तुझे कारणीं देह माझा पडावा’ श्लोक तर केवळ चाल शिकवण्यासाठी शाळेत शिकवलेला असतो, नाही ?

ताईंना आता धक्क्यावर धक्के बसत होते.

“ताई, तुम्ही देवदर्शन करता ना ! ते तुमच्या मागण्या मी पुरवीन या आशेने. संतांनी देवदर्शनाला महत्व दिले ते आत्मज्ञानानंतर. ते आत्मज्ञान-बित्मज्ञान राहू द्या बाजूला. पण काही त्रास झाला नाही, काही भीती नसेल, कुठली धास्ती नसेल तर मी आठवतो का तरी तुम्हाला ? माझ्याकडे आल्यावर पहिले काय करायचे तर नमस्कार आणि लगेचच दुसरे काय करायचे तर आधीच मनात लिस्ट आऊट करून आणलेल्या मागण्या मागायच्या. एकापुढे एक. हो की नाही ? खरे सांगा ? तुम्ही देवळात मला भेटायला येता की तुमची स्वप्ने पूर्ण करणाऱ्याला लाच द्यायला येता ? पाव किलो पेढ्यांत मी ऐश्वर्य द्यायला तयार होतो ते केवळ ‘करुणा’ हा माझा स्थायीभाव आहे म्हणून. मी वेडा आहे म्हणून नव्हे. नाहीतर, कर्माचा सिद्धांत मला तुमच्यापेक्षा चांगला कळतो. माझे अनुसंधान नित्य टिकवा म्हणून नाम घ्या, असे संतांनी सांगितले. त्यांचे फोटो तुम्ही घरात टांगता. पण रांगेत पाऊण तास उभे राहावे लागले तर गप्पा मारायला तुम्हाला माणूस लागते, नाहीतर डोके खुपसायला मोबाईल लागतो. त्याऐवजी नाम घेणे होत नाही. खरे की नाही ? आणि काय हो, ‘जे होते ते त्याच्या इच्छेने’ यावर मुलांना – नातवंडांना मोठे लेक्चर देणारे तुम्ही – तुम्हाला इतकेही वाटत नाही का की माझ्या दर्शनाला येण्यासाठी समजा कधी कष्ट पडलेच तरी ते एक प्रकारचे तप आहे ? आपले तितके भोग सरले असा का नाही हो विचार करत तुम्ही ?.”

– – – आणि तो आणखी काही बोलून गेला आणि अचानक गर्दीत मिसळून दिसेनासा झाला.

ताई त्याच्या मधाळ पण डोळे उघडणाऱ्या शब्दांत इतक्या गुंगल्या होत्या की सुरुवातीला ‘देवाला’, ‘देवाचे’ असे देवाबद्दल बोलणारा तो मोरपिसवाला शेवटी शेवटी ‘मी’, ‘मला’, ‘माझ्या’ असे प्रथम वचनात बोलत होता हेच त्यांच्या वेळेवर लक्षात आले नाही आणि जेव्हा हे भान आले तेव्हा तो मोरपीसवाला समोर दिसत नव्हता. फक्त तो उभा होता त्या जागी एक मोरपीस मात्र पडलेले होते.

हे उमगले आणि ताईंच्या पायांतील त्राणच गेले. त्या तशाच खाली बसल्या. आजूबाजूची माणसे आणि आवाज त्यांच्या जाणिवेतच उरले नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो तोच सावळा मोरपीसवाला ! आणि कानात गुंजत होता तो त्याचा मधाळ आवाज !

मग डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी ते मोरपीस उचलले आणि कपाळाला लावले. तो उभा होता तिथली धूळ कपाळी लावली. मग मंदिरातील गाभाऱ्याकडे वळून पाहू लागल्या. जणू त्यांची नजर मंदिराची भिंत भेदून भिंतीपल्याडच्या देवाला पाहात होती. तिथे पाहात दाटल्या गळ्याने त्या इतकेच म्हणाल्या :

.. .. “पुन्हा अशी तक्रार करणार नाही रे ! पुन्हा तुला वेगळा मानणार नाही रे ! आता अनुसंधान सोडून राहणार नाही रे ! फक्त…

.. .. उपेक्षू नको गुणवंता अनंताsss, रघुनायका, मागणे हेचिं आता.”

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सुन्या आणि सुन्याची बायको…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “सुन्या आणि सुन्याची बायको…” ☆ श्री मंगेश मधुकर

साडेसहा-सातची वेळ, आल्हाददायक वातावरण, ऊन तापलं नसल्यानं अनेकजण फिरायला, व्यायामाला बाहेर पडलेले. रस्त्यावर गाड्यांची फार वर्दळ नव्हती. एवढ्या सकाळी एका ठिकाणी मात्र गर्दी जमलेली. दुकान उघडायची वाट पाहण्याऱ्या आसुसलेल्या नजरा. हे रोजचचं दृश्य. दिवस उगवला की अनेक पावलं आपसूक देशीच्या दुकानाकडं वळायची.. त्यांच्यापैकीच एक होता ‘सुन्या’.

चाळीशीच्या आसपास वय, बिगारी काम करायचा. वाटलं तर कामावर जायचं नाहीतर चौकातल्या रिकामटेकड्यांबरोबर टाईमपास हेच रुटीन. बायको चार घरची धुणी-भांडी करून घर चालवायची. सुन्या बेफाम प्यायचा. त्याच सवयीनं तब्येतीची वाट लागली तरी नाद सुटला नाही. दोन मुली बायकोच्या पदरात टाकून अकाली गेला.

देशीच्या दुकानासमोरच चार दिवसांपूर्वी सुन्यानं जीव सोडला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. रोजच्या बैठकीतल्या मित्राच्या जाण्यानं जो तो हादरला. दुकानात भरलेला ग्लास हातात घेऊन त्याचीच चर्चा.

– – “आमचे परमस्नेही, हितचिंतक, नित्यनियमाने भेटणारे, अल्पभाषी, कायम स्वतःच्या तंद्रीत असणारे, आमचे सन्मानीय ग्राहक “सुन्या”(पूर्ण नाव माहीती नाही) यांची उणीव कायम भासणार. आमच्या भरभराटीत, त्यांचाही खारीचा वाटा आहेच. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं वेळेचं कोणतचं बंधन न पाळता, त्यांनी आमच्या सेवेचा लाभ घेतला. कधीच भेट चुकवली नाही. साथ सोडली नाही. आता कायमचे दूर गेले. वाईट एवढंचं वाटते की, रोजचं गिर्हाइक कमी झालं… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

– दुकान मालकानं सुन्यासाठी लावलेला हा फ्लेक्स सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. सुन्याची बायको पोरींना घेऊन दुकानाजवळ आली. अक्षरं जुळवत जमेल तसं वाचताना भावनांचा उद्रेक होतं होता. त्याभरात कडेवर बसलेल्या रडणाऱ्या मुलीवर खेकसलीसुद्धा. फ्लेक्स वाचल्यावर नवऱ्याच्या आठवणीनं तिला खूप भरून आलं. डोळे घळाघळा वहायला लागले आणि खूप संताप झाला. रंग उडालेल्या साडीच्या पदरानं डोळे पुसत दुकानाकडं पाहत तिनं करकचून शिव्या हासडल्या आणि पचकन थुंकली. एकदा नाहीतर तीनदा. वाटोळं होवो, किडे पडो म्हणत मोठ्या पोरीच्या हाताला धरून तरातरा चालायला लागली. पोरगी मात्र मागे वळून वळून फ्लेक्सवरचा बापाचा हसरा फोटो कौतुकानं पाहत होती. त्याचवेळी दुकानात घरादाराला वाऱ्यावर सोडून, प्रॉब्लेम्सपासून पळणारे अनेक “सुन्या” जमा झाले होते.

– – पाच दिवसांपूर्वी मला ही बातमी समजली होती. तेव्हा खूप वाईट वाटलं. माझ्याकडं घरकाम करणाऱ्या संगीताचा नवरा सुन्या गेला. कित्येकदा पैसे मागायला यायचा. तोंडओळख होती. परिचयातला माणूस तडकाफडकी गेला की पुढचे काही दिवस अस्वस्थेत जातात. माझंही तसंच झालेलं. डोक्यातून ‘सुन्या’ जात नव्हता. बेल वाजल्यावर मी दार उघडलं. समोर संगीताला पाहून धक्काच बसला.

“संगीता तू…. ”

“हा कामाला आलीय”

“अगं पण.. ”

“नवरा जाऊन पाचच दिवस झालेत ह्येच ना”

“हो, पंधरा-वीस दिवस तरी घरी थांबायचं. ”

“तो जिवंत असताना तरी काय कामाचा होता. म्हणून आता त्याच्यासाठी घरी बसू. ”

नवऱ्याबद्दलचा संताप, राग संगीताच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून जाणवला. उगीच विषय वाढवायला नको म्हणून जास्त काही बोलले नाही. कामं झाल्यावर निघताना संगीता म्हणाली

“ताई, मगा बोल्ले त्याचा राग आला का? “

“नाही गं… पण जरा… “

“डोक्यावर परिणाम झालाय वाटलं असलं पण जे घडलं त्ये व्हणारच व्हतं. जरा लवकर झालं इतकंच. त्या बेवड्याइषयी काही वाटत नाही. फक्त पोरींचा ईचार करतेय. दोघींना लई शिकवायचयं. तुमची मदत पाहिजे. ”

“नक्की, काय मदत पाहीजे ते सांग. किती पैसे? ”

“पैसे नको. तुमच्या वळखीनं एखादी नोकरी मिळाली तर उपकार व्हतील. धुणी भांडीची कामं अन नोकरी दोनी करलं. ” परिस्थिती माणसाला घडवते अन बिघडवते सुद्धा. परिस्थितीला आपण सामोरं कसं जातो यावर सगळं अवलंबून असतं. संगीताच्या धैर्याचं, हिंमतीचं, दूरदृष्टीचं फार कौतुक वाटलं.

दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ. गर्दीनं हॉल भरलेला. त्यातच रंजना, रूपाली आई संगीतासोबत बसलेल्या. स्टेजवर एकेकाचं कौतुकसोहळा सुरू असताना निवेदक म्हणाला “आणि आता सर्वात महत्वाचा सत्कारासाठी कुमारी रंजनाला स्टेजवर आमंत्रित करतो. रंजना फक्त शाळेतच नाहीतर आपल्या जिल्ह्यात पहिली आलीये. जल्लोषात तिचं स्वागत करा. ”निवेदकाचं बोलणं संपायच्या आता टाळ्या सुरू झाल्या. सगळे रंजनाकडे पहायला लागले ती बावरली. वर्गशिक्षिका स्टेजवर घेऊन गेल्या तेव्हा रंजनाचे हातपाय लटपटत होते. सत्कार करताना गोल्ड मेडल दिल्यावर भावूक झालेली रंजना डोळ्यातलं पाणी रोखू शकली नाही. माईक हातात होता पण शब्द फुटत नव्हते. पाण्याचा घोट घेऊन रंजनानं सुरवात केली. “सर्वांना नमस्कार, खरं सांगायचं तर हे सगळं स्वप्न वाटतय. या यशाचं श्रेय हे माझी शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी या सर्वांचं आहे. मला खूप सांभाळून घेतलं आणि वेळोवेळी मदत केली हे उपकार जन्मभर विसरणार नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद! ! ”स्टेजवर डोकं टेकवत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून रंजनानं पुढे बोलायला सुरवात केली “या मेडलवर सगळ्यात मोठा हक्क माझ्या आईचा आहे. काही वर्षापूर्वी वडील गेले. घरची परिस्थिती हलाखीची. आजी, काका यांनी जबाबदारी टाळण्यासाठी आईला बोल लावत हात झटकले. घराबाहेर काढलं. पुढे सगळाच अंधार. अशा परिस्थितीत आईनं हिंमत सोडली नाही उलट ती डबल आत्मविश्वासानं कामाला लागली. नोकरी आणि धुण्याभांड्याची कामं करत आम्हांला शिकवलं. मुलींचं शिक्षण एवढं एकच ध्येय उराशी बाळगून ती जगतेय. तिला शिकायचं होतं पण परिस्थितीमुळे शिकता आलं नाही आणि लग्नानंतर सगळंच बदललं पण आवड कायम होती. म्हणूनच यंदा आईनं माझ्याबरोबर दहवीची परीक्षा दिली. दोघींनी सोबत अभ्यास केला आणि ४९% टक्के मिळवून आई पास झाली. आईच्या जिद्दीचा, कष्टाचा, लढाऊ वृत्तीचा खूप अभिमान आहे. घरदार, नोकरी सगळं सांभाळून आईनं मिळवलेलं यश माझ्यापेक्षा फार फार मोठयं. जास्त काही बोलत नाही, आईला स्टेजवर बोलवते. मम्मे स्टेजवर ये. ”आईकडे पाहत रंजनानं म्हणाली. सगळे पहायला लागल्यावर बावरलेल्या संगीतानं पदरामागे चेहरा लपवला.

धाकट्या रुपालीनं आईला स्टेजवर नेलं. पुढे येत रंजनानं मेडल आईच्या गळ्यात घातलं आणि वाकून नमस्कार केला तेव्हा संगीताचा बांध फुटला. लेकीला कुशीत घेऊन डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. वातावरण एकदम भावुक. सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवत संगीताला मानवंदना दिली.

“मम्मे, बोल. ”

“कोण मी? नाय वो”संगीतानं माइक मागे ढकलला.

“असं काय करते. बोल ना. ” रंजनानं आईचा हात घट्ट पकडला तेव्हा थरथरत्या हातानं संगीतानं माइक घेतला “नमस्ते. काय अन कसं बोलायचं ते माहीत नाय पण आज भारी वाटतयं. समदयांना ‘थेंकू’. माज्यासाठी लई आनंदाचा दिस हाये. पोरींचा बाप पक्का दारुडा त्यातच संपला. बायकोच्या जिवावर जगत होता. पैसे दिले नाहीतर मारायचा. बारा वर्षापूर्वी गेला आणि आम्ही सुटलो. जे झालं ते चांगलंच झालं”भरून आल्यानं संगीता बोलायची थांबली. तिचं बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसला. हॉलमध्ये शांतता.

“नवरा गेला अन चांगलं झालं ह्ये ऐकून जरा ईचीत्र वाटलं असेल पण माज्या बाजूनं ईचार करा. त्याच्या जाण्यानं नावापुरता असलेला आधार संपला आणि आमचं नवीन आयुक्ष सुरू झालं, लई संकट आली. येकापेक्षा येक अनुभव आले. एकटी बाई सोबत दोन पोरी बघून फायदा घेण्यासाठी टपलेली माणसातील जनावरं जवळून बघितली तरी सर्वांना पुरून उरले. काही चांगली माणसं सुद्धा भेटली त्यांनीच आधार दिला मदत केली मणून तर आत्ता इतं तुमच्यासमोर बोलतेय. नवरा असता तर अजूनही मार खात बसले असते अन माज्या पोरी.. ” माइक बाजूला ठेवून संगीता डोळे मिटून उभी राहिली. पुन्हा एकदा शांतता. सर्वांना नमस्कार करून संगीता, रंजना, रूपाली स्टेजवरून उतरल्या. कार्यक्रम संपल्यावर संगीता भोवती गर्दी झाली. सगळे अभिनंदन, कौतुक करत होते, सेल्फी काढत होते. संगीताचा पार गोंधळ उडाला. मला पाहून कावरीबावरी संगीता घोळक्यातून सुटका करत धावत आली.

“बरं झालं ताई, तुम्ही भेटलात. पार कसंतरीच वाटत होतं”

“अभिनंदन! ! संगीता. तू खरंच ग्रेट आहेस”

“रंजीनं नावं काढलं. शिकायची जुनी ईचा व्हती पोरींनी आग्रह केला अन तुम्ही शिकवणी घेतली म्हणून”

पाया पडण्यासाठी वाकलेल्या संगीताला कडकडून मिठी मारली. चेहरा ओंजळीत धरून एकटक पाहत राहिले.

“ताई, काय झालं. असं का पाहताय. ”

“तू भारियेस! ! खूप भोगलसं. सहन केलंस पण हार मानली नाहीस. शेवटी जिंकलीस. ”

“पोरीना लई शिकवणार, मोठं हापिसर करणार. ”

“नक्की करशील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो अजून एक.. आता बारावी…. ”

“हा नक्की……. ”नेहमीच्या उत्साहानं संगीता म्हणाली.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares