मराठी साहित्य – कविता ☆ संसार दोघांचा + संपादकीय निवेदन – डॉ. सोनिया कस्तुरे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

🎇अ भि नं द न 🎇

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि शब्दांगण साहित्यिक सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलन मिरज येथे संपन्न झाले. या संमेलनात आपल्या समुहातील कवयित्री डॉ. सोनिया कस्तुरे यांना,  नाही उमगत ‘ ती ‘ अजूनही या त्यांच्या काव्यसंग्रहाला ‘ऋतुजा माने साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे डॉ सोनिया कस्तुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐🌹💐

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त काव्य संग्रहातील कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “संसार दोघांचा” ☆ डॉ सोनिया कस्तुरे

तू म्हणतोस संसार दोघांचा,

मग दोघ मिळून करु या ना…

*

तू चूल पेटवं, मी भाकरी करते,

तू भाजी चीर मी फोडणी देते,

मी कपडे धुते, तू वाळत टाक;

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघं मिळून करु या ना..!

*

भातुकलीत मी स्वयंपाक केला,

आता ही मीच सगळं करते ;

झोपडीत तर मी खूप राबते,

महालात ही मीच…

मी कोणत्याही पदावर असूदे

घर कामातून माझी सुटका नाही

तू म्हणतोस घर दोघांचं,

घर काम ही मिळून करु या ना,

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघ मिळून करु या ना..!

*

मी आई हे “सत्य”,

तू बाप हा “विश्वास”

मी जन्म देणं निसर्ग नियम,

तू संगोपनाला हातभार लाव ना,

 सत्य आणि विश्वास पेरत

मिळून मुलांना घडवूया ना…

तू म्हणतोस कुटुंब सर्वस्व तर

टी. व्ही, मोबाईल बाजूला ठेवून

पालक सभेला मिळून जाऊया ना…

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघ मिळून करु या ना..!

*

तुझ्या सुखदुःखाची मी सोबती

घराच घरपण मी, म्हणतोस,

मी थोडी “बाप” होते

तू थोडा “आई” हो ना…

मी तुझी आर्धांगिनी

तू माझं अर्धांग हो ना…

तू म्हणतोस संसार दोघांचा

मग दोघं मिळून करु या ना..!

*

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ई डी चा बाप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? क्षण सृजनाचा ?

🤣 ई डी चा बाप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(प्राजक्ता, माझी मुलगी सिंगापूरला नुकतीच Standard Chartered बँकेत Executive Director झाली, त्यावर केलेली रचना! 🙏)

🕺🤣 EDचा बाप! 😅🕺

EDचा बाप होण्याचं भाग्य

मिळालं प्राजक्तामुळे काल परवा

आता माझ्याशी कसं वागायचं

तुम्ही आपल्या मनाशी ठरवा

*

तसं घाबरायचं कारण नाही

सांगून ठेवतो आत्ताच तुम्हांला

कारण तुम्हावर ‘रेड टाकायचा’

अधिकार नाही बरं कां आम्हांला

*

आम्ही टाकलीच जर कधी ‘रेड’

तुमच्यावरील प्रेमाने घरावर

खात्री असू द्यावी मनातून

तुम्हांला धरणार नाही धारेवर

*

बोळवण करावी अशावेळी

आमची तुम्ही गोडधोड देऊन

अन्यथा सुखदुःखाच्या गोष्टी करू

संध्याकाळी निवांतपणे ‘बसून’

संध्याकाळी निवांतपणे ‘बसून’

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ११ वा – – 

जनी सर्वसुखी असा कोण आहे?

विचारे मना तूचि शोधूनि पाहे|

मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|

तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|

अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का?

म्हणून समर्थ मनाला (म्हणजे आपल्याला)उपदेश करताना म्हणतात, ” जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही. ” लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच!

परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो, ‘ खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ‘ साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल.

हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.

म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

  • जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
  • पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
  • वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
  • माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो? (क्रमशः)

– – – – 

श्लोक १२ वा – – 

मना मानसी दुःख आणू नको रे|

मना सर्वथा शोक चिंता नको रे|

विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|

विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|

अर्थ : हे मना (मानवा) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा (आनंदाचा) भोग घे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु ‘गतं न शोच्यम्’ म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे.

देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.

जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे… ‘ असे म्हणू शकले.

समर्थ या श्लोकात आपल्याला ‘ विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.

स्वसंवाद :: 

  • मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?
  • भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?
  • देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?
  • विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का?

 – क्रमशः श्लोक ११ आणि १२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हे तर प्रकाशाचे दान ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हे तर प्रकाशाचे दान ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

मावळतीला 

निघे नारायण

सुवर्णाची आभा

देई पसरून!!

*

जलालाही देई

प्रकाशाचे दान

घेई सामाऊन

अंतरात!!

*

दिनकर जाई

क्षितिजा पल्याड

सागराची गाज

निरंतर!!

*

प्राचीवर पुन्हा

येई प्रभाकर

पाखरांना जाग

आपसूक!!

*

पूर्व पश्चिमेला

सुवर्ण सोहळा

नेत्रसुखाचा हा

आनंद सोहळा!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ करा विचार… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ करा विचार...श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मुंग्या लागल्या भेसळीच्या

त्या बालाजीच्या प्रसादाला,

पैशाच्या मोहापायी बडव्यांनी 

सोडले नाही व्यंकटेशाला!

*

घातला दंडवत गोविंदाला 

पण पुजले मनांत लक्ष्मीला,

खेळून भक्तांच्या भावनांशी 

खिसा केला आपला ओला!

*

कुणावर ठेवायचा विश्वास 

प्रश्न पडतो अशावेळी खास,

भक्तांच्या भोळेपणामुळे 

होतोय नितिमूल्यांचा ऱ्हास!

*

खरंच कां हो असतो देव 

अशा श्रीमंत मंदिरांत,

कां त्याचा खरा वास असतो 

प्रत्येक माणसाच्या देहात?

*

विचार करून स्वमनाशी 

तुमचे उत्तर तुम्हीच शोधावे,

मदत करून नडलेल्यांना 

मनोमन “त्याला” भजावे!

मनोमन “त्याला” भजावे!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८५ – जास्वंद…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८५ – विजय साहित्य ?

☆ जास्वंद…!

(अक्षरछंद… पंधराक्षरी)

(शीर्षक – औषध खासे.)

ज्या सुमनाचे,‌ चित्र काढता

दिसतो देव

त्या मोरयाची,‌जास्वंद फुले,

पुजेत ठेव. १

*

पाच पाकळ्या, गर्भ रेशमी,

घेर अनोखा

तुरा शोभतो, फुलातुनी‌ ज्या,

झुलतो झोका. २

*

लाल,भगवा, छटा आगळ्या,

कातर पाने

रंगपंचमी, नाजूक कांती,

रंग दिवाणे.३

*

नको सुईने, हारात गुंफू,

वाहू‌ चरणी

जास्वंदीची, फुले अनोखी,

नाचे धरणी. ४

*

तेल औषधी,त्वचा निरोगी,

किती फायदे

केस त्वचेला, देई तजेला,

गोड वायदे.५

*

अर्क काढूनी, तेल करावे,

औषध भारी

चूर्ण करोनी, चहा करावा,

तो गुणकारी. ६

*

गजाननाच्या,शिरी शोभते,फुल जास्वंदी

निसर्गातले, औषध खासे,

करे आनंदी…७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ द्वैत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ द्वैत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

आल भरुन आकाश

फक्त तुझ्यासाठी .

मी होईन पाऊस

फक्त तुझ्यासाठी .

मयूर मी नृत्यातुर

फक्त तुझ्यासाठी .

वारा होईन बेभान

फक्त तुझ्यासाठी .

वृक्ष होउन भिजेन

फक्त तुझ्यासाठी .

पक्षी होउन गायीन

फक्त तुझ्यासाठी .

मी झुूरेन मरेन

फक्त तुझ्यासाठी .

जन्मोजन्मी जन्म माझा

फक्त तुझ्यासाठी .

तुझ्या विना जगणे

सांग कशासाठी ?

द्वैत एवढेच आता

फक्त माझ्यासाठी .

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगांतून गीतेचे तत्वज्ञान

देह बुद्धी नष्ट होऊन भक्तिमार्गाने परब्रम्ह प्राप्त झाले, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून माणसाची सुटका होते, हे तत्त्वज्ञान आहे. परंतु तुकाराम महाराजांना पांडुरंगाची अखंड भक्ती करून त्याची सेवाच करायची आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही, म्हणून त्यांच्या एका अभंगात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,

आमुचे उचित/ हेचि उपकार/

आशपुलाची भार/ घालू तुज//

 आमच्या योगक्षेमाचा भार देवा तुझ्यावर घालून स्वस्थ बसणे हेच उचित आहे.

 मी भक्त व तू माझा हरी, अशी द्वैतभावना तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिसत असली

 तरी अद्वैत झाल्याशिवाय, खरा भक्त असूच शकत नाही हे त्यांच्या अभंगातून दिसणारे गीतेचेच तत्त्व आहे. ते अभंगातून स्पष्ट सांगतात,

दुजेखंडे तरी/ उरला तो अवघा हरी/

आपण बाहेरी/ नलगे ठाव धुंडावा//

इतुले जाणावया जाणा/ कोड तरी मने मना/

पारधीच्या खुणा/ तेणेची जाणाव्या//

तुकाराम बुवा या अभंगात काय सांगतात? मनानेच मनाला जाणले पाहिजे. जो पारधी असतो तो शिकारीचा शोध कसा घेतो, हे दुसरा पारधीच जाणतो. आपला हरी हा आपल्या जवळच आहे, तो दुसऱ्या ठिकाणी शोधायची गरज नाही.

 देह आधी काय खरा/ देहसंबंध पसारा/

 बुजगावणे चोरा/ रक्षणसे भासते//

 तुका करी जागा/ नको वासपू वाऊगा/

 आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//

तुकाराम महाराज निजरूप विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात, आणि सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैत रूप हरी तुला सापडेल, कारण तू स्वतःच परमात्मरूप आहेस. तुझी आत्मदृष्टी उघडी ठेवशील तर तुला हा बोध होईल.

थोडक्यात महाराजांना इथे असे सांगायचे आहे, की संपूर्ण विश्वात, चराचरात जो परमात्मा भरलेला आहे, तो तुला तू जर डोळे उघडे ठेवलेस तरच दिसू शकेल. आपल्याला एखादा माणूस सहज कुठेतरी भेटतो, आणि आपली मदत करून जातो. परमेश्वराच्या रूपानेच आपल्याला मदत करण्यासाठी तो आलेला होता याची मात्र आपल्या देहधारी माणसाना जाणीव नसते.

भगवंताने अर्जुनाला काय सांगितले?

“तुझे सर्व कर्म मला अर्पण कर.” तुकाराम महाराजही मुमुक्षुंना हेच सांगत आहेत.

आहे ते सकळ/ कृष्णासी अर्पण/

नकळता मन/ दुजे भावी//

म्हणून पाठे/ लागतील भुते/

येती गिवसित /पाच जणे/

(पंचमहाभूते, ज्यापासून माणसाचे शरीर बनले आहे)

 ज्याचे त्या वंचले/ आठव न होता/

दंड हा निमित्त कारणे/ तुका म्हणे//

अर्थात सर्व कर्मे हरीची असून त्याची त्याला अर्पण करायची आठवण न ठेवल्यामुळे, माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो, त्याला दंड मिळतो.

तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा गीतेत आलेल्या धर्म रक्षणाचे महत्त्व जीवनात का आहे ते त्यांच्या अभंगातून सांगतात, त्याचप्रमाणे शांत मनोवृत्तीचे महत्व ते समजावून सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख/

म्हणवुनी  शांती धरा/ उतराल पैलतीरा//

अंगी भरती आधी व्याधी/ तुका म्हणे त्रिविध ताप/ मग जाती आपोआप//

 मन जेव्हा शांत असेल, त्याचवेळी सर्व दुःखांचा नाश होऊन पैलतीरास जाणे सोपे होईल.

साळंकृत कन्यादान/ पृथ्वीदानाच्या समान/

परिते न कळे या मुढा/ येईल कळो भोग पुढा//

आचरता कर्म/ भरे पोट राहे धर्म/

सत्या देव साहे/ ऐसे करूनिया पाहे//

अन्न मान धन/ हे तो प्रारब्ध आधीन/

तुका म्हणे सोसे दुःख/ आता पुढे नासे//

गीतेतील कर्मयोग महाराजांनी या अभंगात भक्तांना सांगितला आहे. या ठिकाणी त्यांनी तत्कालीन वर्णाश्रमधर्माचे महत्त्व लक्षात घेतले आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माला अनुसरूनच कर्म केल्याने दुःख राहत नाही असा या अभंगातून त्यांनी उपदेश केला आहे.ज्याप्रमाणे

कृष्णाने पार्थास त्याच्या क्षात्र धर्माचे पालन करण्यास सांगितले.

क्रमशः… 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ५०

स तरति स तरति स लोकान्स्तारयति ॥ ५० ॥

अर्थ : जो या भवसागरातून(आपण माया नदी असेही म्हणू शकतो) तरून जातो, तो आपल्या सोबत इतरांना ही तारतो.

विवेचन : सेहेचाळिसाव्या सूत्रात आरंभी ‘कस्तरति माया’ मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न उपस्थित करून एकोणपन्नासाव्या सूत्रापर्यंत माया तरून जाणार्‍या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. “जो संगत्याग करतो, महानुभवांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचे उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसेच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो या दैवी दुरत्यया गुणमयी मायेतून तरून जातो हे निश्चयपूर्वक द्विरुक्तीने या सूत्रात सांगतात. मायातारण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे मागील सूत्रात सांगितलेच आहे.

आसक्तीचा त्याग, सत्पुरुषांची सेवा, ममत्त्वाचा त्याग, एकांत सेवन, लौकिक गोष्टीचा त्याग, त्रिगुणातीत होणे, योगक्षेमाचा त्याग, कर्मफळाचा त्याग, कर्म संन्यास, द्वंद्वाच्या पलिकडे जाणे, तसेच वेदांचा साक्षेपाने अभ्यास 

करून ज्याला भगवंता विषयी निरतिशय प्रेम प्राप्त होते, तो साधक स्वतः या मायनदीतून तरून जातोच, तसेच स्वतः सोबत अनेकांचे कल्याण करतो, त्यांनाही तारुन नेतो असे नारद महर्षी आपल्याला सांगतात.

भक्त स्वतः भक्ती करतात व लोकाना भगवद्‌भक्तीचे, भगवन्नामाचे महात्म्य अट्टाहासाने पटवून अनेकांना या भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारदाचे सर्व जीवन अनंत जीवांना मायानदीतून तारून नेण्यातच गेले नाही काय? ‘यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कवणाची ॥’ हे तुकाराममहाराजांचे उद्‌गारही लोकतरणच दर्शवितात. ते लोकांना का तारून नेतात? याचे उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. *”बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि॥’* हे उद्‍गार याचीच साक्ष देतात. त्याच्या अवतारकार्याचे प्रयोजनच हे सांगितले जाते. ‘अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥’ चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या सर्व वृक्षांचेही महत्त्व वाढते, त्याचा उद्धार होतो त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्याने ओहोळास पावन करते, परिस आपल्या सामर्थ्याने लोहास सुवर्ण बनवितो, कस्तुरी आपल्या गुणाने मातीस मुल्यवान बनविते त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष आपल्या सामर्थ्याने अनेकाना या मायानदीतून तारून नेतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥ आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५१

अनिर्वचनीयम् प्रेमस्वरूपम्

अर्थ: प्रेमाच्या स्वरूपाचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.

विवेचन: भक्तीची व्याख्या करताना ती परम प्रेम रुपा आहे असे आधी सांगितले आहे. त्यानंतर ती अमृत स्वरूपा आहे असे सांगितले आहे. रूप आणि स्वरूप यात फरक आहे. रूपात वस्तूचा आकार, रंग, बाजनझ आवरण आदी बाह्य गुणधर्माचा समावेश होतो. स्वरूप वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे लक्षण सांगते. नट वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळा दिसतो पण प्रत्यक्षात मात्र त्याचा विशिष्ट असलेला स्थायीभाव जे त्याचे स्वरूप असते ते मात्र वेगळे असते.

प्रेम हा शब्द प्री या धातूपासून तयार होतो. संतोष पावणे, तृप्त होणे. प्रेम हा मनाचा असा अनुभव अथवा अवस्था आहे की ज्यामुळे मनुष्य समाधानी होत असतो.

प्रेम फक्त अनुभवता येते. जशी हवा दाखवता येत नाही, आकाशाची उंची मोजता येत नाही तसे प्रेम मोजून दाखवता येत नाही. प्रेम असते तरी नसते. असे कोणी म्हणू शकत नाही की मी अमक्या वर पाच रुपयांचे प्रेम करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकदा मनुष्य नवनवीन क्लुप्त्या शोधून काढेल. चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे चंद्र सूर्य आणून देतो अशा थापा मारू शकेल. अर्थात हे सारे वर्णन असेल किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेली कृति असू शकेल…! याला फारतर प्रेमाचा आविष्कार म्हणता येईल…

पण प्रेम म्हणता येईल का? तर नाही…

प्रेम हे अदृष्ट, अदृष्य असल्याने ते पाहता येत नाही. ज्याला अशा प्रेमाचा लाभ होतो, अनुभूति मिळते, तो एका विलक्षण आनंदात असतो. त्या आनंदाचा तो आस्वाद घेऊ शकतो, पण सर्वार्थाने त्याचे वर्णन करू शकत नाही..

संत तुकाराम महाराज प्रेमाबद्दल म्हणतात,

“प्रेम नये सांगता बोलता दाविता। अनुभव चित्ता चित्त जाणे ।।”

(अभंग क्रमांक २७२९, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

महाराज म्हणतात, प्रेम ही काही प्रदर्शन करायची भावना नाही. प्रेम ही मनापासून ते मनापर्यंत पोहचणे आवश्यक असते. हल्लीच्या काळात खरे प्रेम मिळणे तसे खुप अवघड आहे. कारण प्रेम हा काय प्रकार आहे. ही भावना काय आहे. हे किती जनांना माहीत आहे. हाच खुप मोठा प्रश्न आहे असे मला वाटते. कारण सद्यपरिस्थितीत आकर्षणाला व वासनेलाच प्रेम म्हटले जाते.

आपण इथे भगवंतावर अकारण केल्या जाणाऱ्या प्रेमाबद्दल चर्चा करीत आहोत. पण समाजाची, समाजातील सद्यस्थिती लक्षात यावी म्हणून त्याचा वरती उल्लेख आला आहे.

प्रेम म्हणजे देव

प्रेम म्हणजे भक्ती,

प्रेम म्हणजे साधना

प्रेम म्हणजे शक्ति।।

प्रेम, त्यातून मिळणारा आनंद याचे अचूक वर्णन करणे अशक्य आहे, पण सर्व संतांना सामान्य मनुष्याबद्दल कळवळा असल्याने ते या प्रेमाचे वर्णन करतात, अर्थात ते सुद्धा चपखल वर्णन करू शकत नाहीत असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५२

मूकास्वादनवत्

अर्थ : प्रेमाचा अनुभव हा मुक्या माणसाने घेतलेल्या रसास्वादाप्रमाणे असतों. (… त्यामुळे त्याला तो शब्दाने सांगता येत नाही.)

विवेचन : मुका मनुष्य बोलू शकत नाही. त्याला झालेल्या, होत असलेल्या वेदना तो सांगू शकत नाही. इथे नारद मुनी आपल्याला मूक्याचे उदाहरण देऊन साधक अनुभूतीच्या विशिष्ट टप्प्यावर मौन होऊन जातो. बाह्यांगावरून तो मूक झाला, अबोल झाला असे आपण म्हणू शकतो. परंतु त्या पातळीवर पोचलेल्या साधकाला जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे भगवतांची लिला आहे, याची अनुभूती आलेली असते. त्याच्या आयुष्यात तसेच त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याला भगवंताचे अस्तित्व जाणवत असते. सर्व जाणल्यावर बोलायचे काही शिल्लक रहात नाही.

एक छान वाक्य आहे.

“वेदना जास्त बोलते आणि सुख कमी बोलते. “

भक्तिमार्गात या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर साधक मौन न झाला तर नवल…! साखर दुधात पूर्णपणे मिसळून गेली की त्यातून स्वतः साखरेला तिचे वेगळेपण दाखवता येत नाही आणि आपण ते वेगळे करून पाहू शकत नाही.

समर्थ दासबोधात याचे वर्णन करतात…

“मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥”

 (दास. ०६. १०. ०२)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५३

प्रकाशते क्वापि पात्रे”

अर्थ: त्या परम प्रेमाचा प्रकाश क्वचितच, कधीतरी एखाद्या अधिकारी व्यक्तीत पाहायला मिळतो.

विवेचन : भगवंतावरील प्रेम हेच खरे प्रेम आहे, असे सर्व संत सांगतात. पण हे प्रेम वेगळे काढून दाखवता येत नाही, त्याची फक्त अनुभूती घेता येते. ज्याप्रमाणे नदी सागराला जाऊन मिळण्यासाठी धडपड करीत असते. ती सागराला जाऊन मिळाली की नदीचे अस्तित्व संपुष्टात येते. नदी पुन्हा बाहेर सांगू शकत नाही की मी नदी आहे. तसे खरा ज्ञानी मनुष्य कधीही सांगत फिरत नाही की मी ज्ञानी आहे. तर, त्याच्या चित्तात प्रकट झालेला ज्ञानाचा प्रकाश आपसूक सर्वदूर पसरतो. साखर सांडली की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही, त्या आपसूक येत असतात.

संतांचे अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्याच्याकडे अकारण शांतता लाभते, ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाही, तरी त्याच्याकडे पुन्हा जावेसे वाटते, अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ज्याच्याकडे गेल्यावर परत येऊ नये असे वाटते, (अर्थात माहेरी गेल्यासारखे वाटते) त्याला संत अर्थात ज्ञानी म्हणता येईल.

एक व्यवहारातील उदाहरण पाहू. अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देत असतात, पण त्यातील फार कमी लोक त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात.

खरंतर जीव हा मुळात ज्ञानी आहे, पण त्याच्यावर असलेला मायेचा पडदा ज्याला काढता येतो, तो ज्ञानी होतो. वाचायला /लिहायला एकदम सोपे आहे, पण ही माया जाणणे फार अवघड.

“लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी|

झटणाऱ्यात एखादा तत्त्वतां जाणतो मज||”

(गीताई ०७. ०३)

एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, अर्थात प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्या व्यक्तीला जे आवडते ते करतो. त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने बनवलेल्या, आणलेल्या, भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा आदर करतो, त्यांना अत्यंतिक प्रेमाने सांभाळतो. याच अनुषंगाने जेव्हा साधक भगवंतावर प्रेम करू लागतो, त्याचवेळी त्याने भगवंताने निर्माण केलेल्या चराचर सृष्टीवर प्रेम करणे अपेक्षित आहे, नव्हे अनिवार्य आहे. असे प्रेम करणारा मनुष्य विरळाच असतो. पण त्याच्या या निःस्वार्थ प्रेमाचा प्रकाश पडल्या शिवाय रहात नाही.

साधकाने साधना करीत रहावी, दयासिंधु आसलेल्या सद्गुरूंना त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पुढील सूत्रात आपण परमप्रेम कसे असते, ते शब्दाने सांगण्याचा प्रयत्न नारद महर्षींनी केला आहे त्याचा अभ्यास आपण करू.

जय जय रघुवीर समर्थ!! 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कशास खाता भाव तुम्ही” – कवी : विनायक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कशास खाता भाव तुम्ही” – कवी : विनायक जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

स्वप्नात आले महाराज रात्री

काढली त्यांनी खरडपट्टी

देशासाठी आम्ही कमविले

 तुम्ही तर करताय उधळपट्टी//1//

*

घेऊन जीएसटी रयतेकडून

फुकटात वाटता साड्याचोळ्या

जनता होईल आळशी स्वार्थी

बंद करा आधी या पागोळ्या//2//

*

गल्लोगल्ली उभारून पुतळे

कशास करता महसूल नास

लाचखोर बसवून मंत्रालयात

कशाला करता फुकट फार्स//3//

*

सोडून संकल्प पुतळ्यांसाठी

फास घेऊन मरतोय शेतकरी 

वाचवा प्राण बळीराजाचे

त्याचे जीवावर खाता भाकरी//4//

*

खंडणीखोरांना लावून चाप

जरब बसवावी शासनाची

टांगून चार दोन फासावरती

आका बकांना जरब तुमची//5//

*

काढून माझ्या जन्म यात्रा

कर्तृत्व तुमचे त्यात कुठे

आवाज करत ढोलताशांचा

ध्वनिलहरीतून कान फुटे//6//

*

धर्मा आडून लपून छपून

साप फिरतात स्वराज्यात

ठेचून काढा वेळीच त्यांना

बदल करतील ते संविधानात //7//

*

कसले करता वाढदिवस

पुरुषार्थ नाही त्यात काही

मारून दाखवा हिरवे पिवळे

होऊंदे अंगाची त्यांचे लाही//8//

*

बांधून पुतळे जागोजागी

कबुतरांची करता आणखी सोय

सरहद्दीतून घुसतात परदेशी

करू नका तुम्ही त्यांची गय//9//

कवी : विनायक जोशी

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares