मराठी साहित्य – विविधा ☆ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे

सहज सुचलं म्हणून… ✍️क्षण झाला अमर

१: “भूत-भविष्य चिंतनात नाही तर वर्तमान कळतं…”

भूत म्हणजे स्मृतींची सावली.

भविष्य म्हणजे कल्पनांची छाया.

दोन्हींचा आधार मन आहे — आणि मनच काळ निर्माण करते.

पण वर्तमान?

तो ना स्मृती आहे, ना कल्पना. तो शुद्ध अनुभूती आहे.

 

उपनिषद म्हणतात —

“यत् साक्षादपरोक्षाद् ब्रह्म” —

जे प्रत्यक्ष आहे, तेच ब्रह्म आहे.

वर्तमान क्षण हाच साक्षात् ब्रह्मानुभवाचा दरवाजा आहे.

जो क्षण पूर्णतेने जगतो, तो काळाच्या पलीकडे जातो.

 

२: “दिवसांचे महत्त्व कमी झाले की ‘क्षणांचे’ मूल्य कळते…”

दिवस हे मोजमाप आहे.

क्षण हा अनुभूती आहे.

दिवस बाह्य घड्याळ सांगते. मात्र क्षण अंतःकरण उलगडते.

जेव्हा आपण दिवसांच्या धावपळीतून थांबतो, तेव्हा जाणवते —

जीवन दिवसांनी नव्हे, तर जागृत क्षणांनी घडते.

 

अद्वैत दृष्टीने —

प्रत्येक क्षणात पूर्णत्व आहे.

कारण क्षणातच चैतन्य प्रकट आहे.

 

३: “भगवंत हृदयस्थ आहे…”

भगवंत शोधायचा बाहेर का?

तो तर साक्षीभावात, शुद्ध जागरूकतेतच आहे.

ईशावास्यमिदं सर्वम्” —

सर्व काही त्याने व्यापले आहे;

मग हृदय त्याच्या बाहेर कसे असेल?

जेव्हा मन भूत-भविष्य सोडते,

तेव्हा हृदयात शांत, निर्विकल्प प्रकाश उगवतो.

तोच भगवंत.

🕉️ थोडक्यात

न भूतं न भविष्यं, केवलं वर्तमानम्।

न कालः तत्र भाति, केवलं चैतन्यम्।

यस्मिन् क्षणे विश्रान्तिः, स एव ब्रह्मक्षणः॥

(भूत नाही, भविष्य नाही — जे उरते ते वर्तमान चैतन्य; ज्या क्षणी विश्रांती मिळते, तोच ब्रह्मक्षण.)

 *

ध्यान म्हणजे अपूर्णतेच गोडी वाटणे, अनुभवणे

भूत-भविष्य निवळले की क्षण पवित्र होतो;

क्षण पवित्र झाला की हृदय मंदिर बनते. 🙏

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हौसेचं फसलेलं गणित… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हौसेचं फसलेलं गणित... ? श्री आशिष  बिवलकर ☆

लग्नात कपड्याच्या हौसेला,

पैशाचं मोल कधीच ते नसतं |

कोपलेल्या सूर्यनारायणापुढे,

मात्र हौसेचं गणित मात्र फसतं |

*

रेमंडचा थ्री पीस सूट शिवून,

लग्नात ऐटीत होता मिरवणार |

मुलीकडच्यांची पोशाखात,

नवरदेव म्हणाला जिरवणार |

*

इतकी वर्षे रखडलेला उपवर,

यंदा मात्र नशिबाने लग्न जुळलं |

समोरची पार्टी पैशाने मजबूत,

तिथंच गड्याचं नशीब फळलं |

*

बँडबाजा वरात सनई चौघडा,

हट्टाने मान्य करुन घेतलं मागून |

वैशाखातच चांगला मुहूर्त आहे,

थाटात लग्न बैठकीत गेला सांगून |

*

वैशाख वणव्यात थ्री पीस सोडा,

चड्डी बनियान घालून तो पाटावर |

पाहून लग्न सोहळा वऱ्हाड्यांनी,

यथेच्छ ताव तो मारला ताटावर |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रेमसखा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रेमसखा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रंगारी साऱ्या दुनियेचा 

धरून बैसला कुंचला,

चितारी तन्मयतेने मग 

हृदयी वसल्या राधेला!

*
कर्णफुले कानी दोन 

प्रेम रंगात रंगवली,

नील कांती मुखावरची 

खुलवी ओठांची लाली!

*

मुग्ध भाषा दो नयनांची 

सौन्दर्य मुखाचे वाढवी,

बिंदीसवे कनक मुकुट 

केशसंभार तो खुलवी!

*

प्रेम नजरेने बघता तिला 

वाटे आत्ता जिवंत होईल,

दिसता प्रेमसखा सामोरी 

मिठीत त्याच्या विरघळेल!

मिठीत त्याच्या विरघळेल!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जगणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

असले कसले छळते जगणे

फसवा फसवी करते जगणे

*

नखरे करते तितके चुकते

चुकल्या वरती रडते जगणे

*

करुया म्हणते समता ममता

करते समयी फसते जगणे

*

धमकी मिळता बनते हळवे

हरलो म्हणते पळते जगणे

*

ठरल्या वरती बनते पणती

दूस-या करता जळते जगणे

*

जगता जगता हसते म्हणते

सजण्या करता नसते जगणे

*

घटको घटकी झिजते विरते

दमते शिणते मरते जगणे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई अजूनही वाट पहाते… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आई अजूनही वाट पहाते… – कवी : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

आई अजूनही वाट पाहते…

पण आम्ही मोठे झालो.

 

घर बदललेलं नाही.

त्या भिंती अजूनही तशाच आहेत.

दार अजूनही तसंच किरकिरत उघडतं.

 

फक्त एक गोष्ट बदलली आहे…

घरातले आवाज कमी झालेत.

 

आई अजूनही तिथेच आहे.

पण आम्ही… मोठे झालो.

 

लहानपण :

लहानपणी घर म्हणजे गोंधळ असायचा.

सकाळी आईचा आवाज –

उठा आता! शाळेला उशीर होईल.

आम्ही चादरीत लपून बसायचो.

आई येऊन पांघरूण ओढायची –

चल… अजून झोपायचं नाही.

किचनमध्ये पोह्यांचा वास.

डब्यांसाठी घाई.

बाबा पेपर वाचत.

 

त्या सगळ्या गोंधळात

आई कायम धावत असायची.

 

पण तेव्हा आम्हाला वाटायचं…

आईला थकवा येतच नाही.

 

वेळ:

हळूहळू वर्षं गेली.

शाळा संपली.

कॉलेज सुरू झालं.

घरातले विषय बदलले.

 

Exam कधी आहे? ”

Job मिळाला का? ”

 

आई अजूनही तसंच विचारायची –

जेवलास का? ”

तो प्रश्न कधी बदललाच नाही.

 

घर सोडण्याचा दिवस :

एक दिवस बॅग भरली.

नोकरीसाठी शहर बदलायचं होतं.

आई शांतपणे कपडे घडी करत होती.

 

ती म्हणाली –

सगळं घेतलंस ना? ”

मी म्हणालो –

हो.

पण खरं सांगायचं तर

मी घरच तिथे ठेवून जात होतो.

 

दारातून बाहेर पडताना

आई म्हणाली –

कधी कधी फोन कर.

 

त्या चार शब्दांत

खूप काही होतं.

 

नवीन आयुष्य:

नवीन शहर.

नवीन नोकरी.

नवीन लोक.

आयुष्य वेगाने चालायला लागलं.

Meeting.

Deadline.

Traffic.

फोन करायचं ठरवायचो…

पण वेळ नसायचा.

 

कधी कधी रात्री आईचा missed call दिसायचा.

 

मी message करायचो –

Busy होतो.

 

आई reply द्यायची –

ठीक आहे, बाळा.

 

आईचं घर:

आई अजूनही त्या घरात आहे.

सकाळी उठते.

चहा करते.

कधी कधी चार कप ठेवते.

मग हसते –

अरे… आता दोनच लोक.

 

किचन शांत.

भांड्यांचा आवाज कमी.

पण आठवणींचा आवाज जास्त.

 

गॅलरी:

 संध्याकाळी आई गॅलरीत उभी राहते.

 रस्त्यावरची मुलं खेळत असतात.

 कुणीतरी “आई! ” म्हणत धावत येतं.

 

आई थोडं हसते…

आणि आत जाते.

 

कारण तिला आठवतं —

एकेकाळी त्या आवाजात आमचं नाव असायचं.

 

जुने फोटो:

एक दिवस आईने जुना अल्बम काढला.

फोटो –

शाळेचा.

पिकनिकचा.

दिवाळीचा.

 

एका फोटोमध्ये

आम्ही सगळे हसत होतो.

 

आई फोटोला हात लावते.

आणि हळूच म्हणते –

किती पटकन मोठे झाले.

 

सण:

दिवाळी आली.

पूर्वी घरात धिंगाणा असायचा.

 फटाके.

फराळ.

गोंधळ.

 

आता आई दोनच दिवे लावते.

एक देवासाठी.

एक दारासाठी.

 

ती म्हणते –

कदाचित यंदा येतील.

 

 फोन:

 रात्री फोन वाजतो.

 आई पटकन उचलते.

 

हॅलो? ”

मी म्हणतो –

आई, कशी आहेस? ”

 ती लगेच म्हणते –

छान… तू जेवलास का? ”

 

मी म्हणतो –

हो.

ती अजून काही बोलायचा प्रयत्न करते.

 

पण मग म्हणते –

ठीक आहे… काम कर.

 फोन ठेवला की

घर पुन्हा शांत होतं.

 

सत्य:

मोठं होणं वाईट नाही.

स्वप्नं पूर्ण करणंही चुकीचं नाही.

पण एक गोष्ट आपण विसरतो…

 

आपण मोठे होत असताना

आई अजूनही तिथेच थांबलेली असते.

 ती अजूनही वाट पाहते.

 

एका फोनची.

एका भेटीची.

एका “आई” म्हणण्याची.

 

एक दिवस:

 एक दिवस अचानक मी घरी गेलो.

 दरवाजा उघडला.

 आई मला पाहून थबकली.

 अरे अचानक? ”

 मी म्हणालो –

तुला भेटायला आलो.

त्या दिवशी किचन पुन्हा जिवंत झालं.

आईने चार पदार्थ केले.

 घरात पुन्हा आवाज आला.

 

 शेवट:

 त्या रात्री आई म्हणाली –

तू आलास की घर पुन्हा घर वाटतं.

ते वाक्य ऐकून

माझं मन भरून आलं.

 

कारण मला कळलं…

 

घर कधी रिकामं नसतं.

घरातली वाट पाहणारी आई

त्याला जिवंत ठेवत असते.

 

 जर तुम्ही ही कविता वाचत असाल…

 तर एक काम करा.

 आज आईला फोन करा.

 फक्त एवढं म्हणा —

आई, कशी आहेस? ”

 कारण…

 आपण मोठे झालो असलो

तरी आई अजूनही वाट पाहते.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नराधम… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नराधम... ? श्री आशिष  बिवलकर ☆

वासनाधुंद्याने | कळी चिरडली |

ती तडफडली | प्राणांतिक ||१||

*

नराधम वृद्ध | परोल सुटका |

वासना घटका | अत्याचार ||२||

*

विकृत वावरे | ऐसे समाजात |

करतात घात | कोवळ्यांचा ||३||

*

आंधळा कायदा | कुर्मगती न्याय |

पीडितांचा पाय | खोलातच ||४||

*

ज्ञात अज्ञात त्या | असंख्य निर्भया |

प्रतीक्षेत न्याया | दुर्लक्षित ||५||

*

नेहमीच कैसी | तिचीच शिकार |

करावा धिक्कार | विकृतांचा ||६||

*

भर चौकातच | घाला त्यास गोळी |

व्हाव्या पोरीबाळी | सुरक्षित ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंद… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंद… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

सदगुरु सेवेसाठी

काया ही झिजवावी,

सदगुरुंची महती आळवावी,

बोल टोचणीचे सोसून…

 

तपोवनी येती

रंक आणि राव

नाही भेदभाव

होती सारे एकरूप…

 

जशी टाळ चिपळी

हाती हात घेऊन

धरी ताल, समरस होऊन

साकारे अंतरी नादब्रह्म…

 

लागे ब्रह्मानंदी टाळी

तुटे जगाचा संग

आत्मरंगी दंग

साधकगण…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खरं तर आपण खुनी आहोत…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “खरं तर आपण खुनी आहोत…☆ श्री जगदीश काबरे ☆

नदीला आपण “देवी” म्हणतो आणि मग —

तिच्याच कुशीत टाकतो आपल्या श्रद्धेचा कचरा.

निर्माल्य…फुलं, हार, अगरबत्त्यांची राख—

ज्यांना आपण पवित्र म्हणतो

तेच तिच्या श्वासात हळूहळू विष मिसळत जातात.

दुधाचे टँकर येतात भावनेच्या उन्मादात

पांढऱ्या प्रवाहात ओतलेलं दूध

क्षणात बदलतं कुजलेल्या दुर्गंधीत.

देवाला अर्पण करताना

आपण विसरतो नदी पोट भरून खात नाही,

ती वाहते… आणि आपणच तिच्या प्रवाहात

रासायनिक दुधाचे विषारी नाग सोडतो.

पणत्या, दिवे— प्रकाशाचा उत्सव म्हणे…

पण त्या तेलकट ज्योती पाण्याच्या पृष्ठभागावर

मरणासन्न तवंग निर्मितात 

मग त्या तवंगाखाली मासे गुदमरून मरतात.

राख, अस्थी, विधी… मोक्षाच्या आशेने

आपण मृत्यूही नदीवर सोपवतो.

पण त्या राखेत फक्त शरीर नाही,

तर प्रदूषणाचे कणही असतात—

जे तिच्या अंगावर जखमा कोरतात.

त्याहीपेक्षा जास्त निर्दयी असतो

आपला “विकास”!

सांडपाणी कारखान्यांचं, शहरांचं,

घराघरातलं घाणेरडं पाणी

सरळ तिच्या कुशीत सोडलं जातं.

जणू ती नदी नाही,

तर एक न संपणारं गटार आहे.

नदीकाठची झाडं तोडून

आपण तिची सावलीच काढून घेतो,

तिचं श्वसन रोखतो,

तिच्या काठांना सिमेंटने कैद करतो

एका नाल्यात रूपांतरित होऊन वाहणारी नदी

आता श्वास गुदमरलेली रेषा बनते.

आणि आपण म्हणतो— “ही देवी आहे! ”

देवी?

देवीला आपण असं मारतो का?

देवीला आपण घाण, रसायनं, मृत्यू अर्पण करतो का?

धर्माच्या नावाखाली विनाश लपवण्याची युक्ती

म्हणून आपण पूजा करतो, पण जपणूक नाही.

आणि शेवटी—

हेच पाणी आपल्या नळातून येतं,

आपल्या शरीरात जातं,

आपल्या रक्तात मिसळतं…

आणि आपणही हळूहळू

स्वतःलाच संपवत राहतो.

नदी मरत नाही. पण ती मरते तेव्हा

आपणच मरतो.

पण आपल्याला अजूनही वाटतं,

आपण भक्त आहोत.

खरं तर आपण खुनी आहोत.

आणि नदी आपल्या श्रद्धेची

सर्वात मोठी बळी.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाळ धरतीशी !! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? नाळ धरतीशी !! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

किती कापा कसेही तोडा

आपसूक झाडा येई फुटवा

जोवर गच्च नाळ धरतीशी

तोवर वृक्ष नित राही हिरवा!!

*
तीच भरविते घास मुखी अन्

मुळातुनी वाढ म्हणुनी ऊर्जा

मातीमायच खतपाणी देऊनी

म्हणते निसर्ग समतोल राख जा!!

*

सकला देतो सावली नीत्य मी 

फळे, फुले, चाराही पुरवितो 

तरीही का ही कुऱ्हाड देहावर

प्रश्न मला नित छळत राहतो!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रश्न छळवादी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रश्न छळवादी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

आणि तसाही अर्थ नव्हता

विचारण्याला प्रश्न माझ्या.

गांभीर्यही नव्हते अपेक्षित

असंबद्ध उत्तराचे तुझ्या.

*

विसरुन जा म्हणण्याआधी

विसरलीस ना तू मला.

विसरणे विसरुन गेलो

विसरले मी जसा मला.

*

अनुत्तरित प्रश्न माझे

प्रश्न अजूनही पडती मला.

घेउनी गेलीस प्रश्न माझे

ठेऊन उत्तराचे ओझे मला.

*

पाठ करुन निघून गेली

अतर्क्य उत्तरे सारी मला.

पुनःपुन्हा परत सामोरी

छळवादी प्रश्न येती मला.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares