सौ. स्मिता सुहास पंडित
इंद्रधनुष्य
☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
३१ डिसेंबर…. प्रसिद्ध कवयित्री, गीतकार.. *वंदना विटणकर* यांचा स्मृती दिन!!
मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ‘वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू, बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली.
वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. महंमद रफी यांनी त्यांच्या भावगीतांचा केलेला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. “हा रुसवा सोड सखे’, “हा छंद जिवाला लावी पिसे’, “हे मना आज’ यासह वंदनाताईंची अनेक गाणी रफी यांनी गायली.
कृष्णा कल्ले यांनी गायिलेले “परी कथेतील राजकुमारा’, “नाते जुळले मनाचे’ (जयवंत कुलकर्णी) ही सतत आठवणीत राहणारी गाणी त्यांचीच आहेत.
“अगं पोरी संबाळ दर्याला’, “ऐ आई मला पावसात जावू दे’, “कुहू कुहू येई साद’, “चित्र जयाचे मनी रेखिले’, “आम्ही दोघे राजा राणी’, “पीर पीर पावसाची’, “उजळू स्मृती कशाला’, “स्वप्नामध्ये सत्य गवसले’, “नको आरती नको पुष्पमाला’, “नाते जुळले मनाचे’, अशी सुरेल शब्दरचना करणाऱ्या वंदनाताईंच्या गीतांना सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासह आघाडीच्या संगीतकारांनी संगीतसाज दिला होता. हेमंत कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांसह ख्यातनाम गायकांनी त्यांची भावगीते, भक्तीगीते गायिली आणि ती रसिकांत लोकप्रिय ठरली.
*रसिका मी कैंसें गाऊ गीत* या गाण्याचा किस्सा*
चालीवर गीताची बांधणी करणं हा शब्द स्वरांचा खेळ आहे, शब्दांवर प्रेम आणि स्वरांशी मैत्री असली की गीत रचना करणं आनंददायी असत असं त्यांना वाटायच. फक्त त्या वेळी मनस्थिती उत्तम असली पाहिजे. अरुण पौडवाल यांनी सुंदर चाल बांधली होती. पण वंदना विटणकर यांच्या पतीच्या डोळ्याचे मोठे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती स्थिर नव्हत्या. अशा वेळी गाणं सुचणं खूप अवघड झालं होत.
दवाखान्याच्या खोलीत त्या विचार करत बसल्या होत्या. श्रोते शब्दांच्या आणि स्वरांच्या सौन्दर्याने धुंद होतात पण गाणे जन्म घेत असताना कवीची मानसिकता त्यांना कशी कळेल असं वाटत असतानाच अचानक त्यांना गाण्याच्या ओली सुचल्या
*रसिका मी कैसे गाऊ गीत*
*दाटून आले घन आसवांचे, *
*मिटलेल्या पापणीत*
आणि मग त्या भरलेल्या तंद्रीतच पुढची कडवी देखील लिहून झाली आणि एका नितांत सुंदर गाण्याचा जन्म झाला
तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा
नाचे प्रलय लयीत!
मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी
रडते स्वप्न व्यथीत!
दोन कडव्याचं गाणं आहे आणि ध्वनीमुद्रण न झालेले तिसरं कडवं देखील आहे
कशाला स्वरांची आरास आता
विझली अभागी अंगारगाथा
झाला जन्म पतीत!
स्वर : अनुराधा पौडवाल
संगीत : अनिल अरुण
‘शुरा मी वंदिले’, ‘पारध’, ‘देवता’, ‘मर्दानी’, ‘चोराच्या मनात चांदणं’, ‘अर्धांगी’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘आम्ही दोघं राजाराणी’, ‘आई पाहिजे’, ‘मामला पोरींचा’, ‘राजानं वाजवला बाजा’, ‘सवाई हवालदार’, ‘महानदीच्या तीरावर’ आदी चित्रपटांसाठी वंदनाताईंनी गीतलेखन केलं होतं.
आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदाश्रमात रहात होत्या. वर्षाअखेरीला सकाळी चहा घेताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाजवळच्या दवाखान्यात नेले, पण त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना डॉ. डी. वाय. हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे नेत असतानाच दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
त्यांनी नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्या प्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले; तर कळंबोलीतील एम. जी. एम रुग्णालयात देहदान करण्यात आले.
वंदना विटणकर यांना विनम्र अभिवादन!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

















