मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ रसिका मी कैसे गाऊ गीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

३१ डिसेंबर…. प्रसिद्ध कवयित्री, गीतकार.. *वंदना विटणकर* यांचा स्मृती दिन!!

मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ‘वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू, बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली.

वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. महंमद रफी यांनी त्यांच्या भावगीतांचा केलेला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला. “हा रुसवा सोड सखे’, “हा छंद जिवाला लावी पिसे’, “हे मना आज’ यासह वंदनाताईंची अनेक गाणी रफी यांनी गायली.

कृष्णा कल्ले यांनी गायिलेले “परी कथेतील राजकुमारा’, “नाते जुळले मनाचे’ (जयवंत कुलकर्णी) ही सतत आठवणीत राहणारी गाणी त्यांचीच आहेत.

“अगं पोरी संबाळ दर्याला’, “ऐ आई मला पावसात जावू दे’, “कुहू कुहू येई साद’, “चित्र जयाचे मनी रेखिले’, “आम्ही दोघे राजा राणी’, “पीर पीर पावसाची’, “उजळू स्मृती कशाला’, “स्वप्नामध्ये सत्य गवसले’, “नको आरती नको पुष्पमाला’, “नाते जुळले मनाचे’, अशी सुरेल शब्दरचना करणाऱ्या वंदनाताईंच्या गीतांना सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल, अनिल मोहिले यांच्यासह आघाडीच्या संगीतकारांनी संगीतसाज दिला होता. हेमंत कुमार, आशा भोसले, सुधीर फडके, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, सुलोचना चव्हाण, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांसह ख्यातनाम गायकांनी त्यांची भावगीते, भक्तीगीते गायिली आणि ती रसिकांत लोकप्रिय ठरली.

*रसिका मी कैंसें गाऊ गीत* या गाण्याचा किस्सा* 

चालीवर गीताची बांधणी करणं हा शब्द स्वरांचा खेळ आहे, शब्दांवर प्रेम आणि स्वरांशी मैत्री असली की गीत रचना करणं आनंददायी असत असं त्यांना वाटायच. फक्त त्या वेळी मनस्थिती उत्तम असली पाहिजे. अरुण पौडवाल यांनी सुंदर चाल बांधली होती. पण वंदना विटणकर यांच्या पतीच्या डोळ्याचे मोठे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती स्थिर नव्हत्या. अशा वेळी गाणं सुचणं खूप अवघड झालं होत.

दवाखान्याच्या खोलीत त्या विचार करत बसल्या होत्या. श्रोते शब्दांच्या आणि स्वरांच्या सौन्दर्याने धुंद होतात पण गाणे जन्म घेत असताना कवीची मानसिकता त्यांना कशी कळेल असं वाटत असतानाच अचानक त्यांना गाण्याच्या ओली सुचल्या

*रसिका मी कैसे गाऊ गीत*

*दाटून आले घन आसवांचे, *

*मिटलेल्या पापणीत*

आणि मग त्या भरलेल्या तंद्रीतच पुढची कडवी देखील लिहून झाली आणि एका नितांत सुंदर गाण्याचा जन्म झाला

तुटल्या मनाच्या हळुवार तारा

गेला सुरांचा जळुनी फुलोरा

नाचे प्रलय लयीत!

 

मैफल सुखाची झाली विराणी

उरे वेदनांची जखमी कहाणी

रडते स्वप्न व्यथीत!

दोन कडव्याचं गाणं आहे आणि ध्वनीमुद्रण न झालेले तिसरं कडवं देखील आहे

कशाला स्वरांची आरास आता

विझली अभागी अंगारगाथा

झाला जन्म पतीत!

स्वर : अनुराधा पौडवाल

संगीत : अनिल अरुण 

‘शुरा मी वंदिले’, ‘पारध’, ‘देवता’, ‘मर्दानी’, ‘चोराच्या मनात चांदणं’, ‘अर्धांगी’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘आम्ही दोघं राजाराणी’, ‘आई पाहिजे’, ‘मामला पोरींचा’, ‘राजानं वाजवला बाजा’, ‘सवाई हवालदार’, ‘महानदीच्या तीरावर’ आदी चित्रपटांसाठी वंदनाताईंनी गीतलेखन केलं होतं.

आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदाश्रमात रहात होत्या. वर्षाअखेरीला सकाळी चहा घेताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाजवळच्या दवाखान्यात नेले, पण त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना डॉ. डी. वाय. हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे नेत असतानाच दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

त्यांनी नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली होती. त्या प्रमाणे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले; तर कळंबोलीतील एम. जी. एम रुग्णालयात देहदान करण्यात आले.

वंदना विटणकर यांना विनम्र अभिवादन!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’MY SOUL HAS A HAT…’ – मूळ रचना : मारिओ दि अन्द्रादे – अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

‘MY SOUL HAS A HAT…‘ – मूळ रचना : मारिओ दि अन्द्रादे – अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

 

– – – आणि अचानक लक्षात आलं..

 

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली 

आणि अचानक लक्षात आलं..

अरेच्चा! जेवढं जगून झालंय 

त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..

मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना..

खूप आवडीचा खाऊ खाताना..

तसं झालं काहीसं…

 

सुरुवातीला तो आवडीने खाऊ खातोच 

पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की 

आता थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र 

ते मूल खाऊ अधिकच चवीचवीने 

आणि अगदी मन लावून खायला लागतं.

 

कुठल्याच संकेत, नियम आणि कायदयांचं पालन होणार नाहीय 

हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

 

ज्यांची केवळ वयच वाढलीत.. बुद्धी नाही.. अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम 

आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

 

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..

आता मला फक्त अर्क हवा आहे..

आत्मा घाईत आहे माझा…

फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता.

 

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..

खऱ्याखुऱ्या माणसांच्या…

ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं.

ती माणसं..

जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत 

आणि ती माणसं…

जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात.

खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते 

आणि आपण कायम सत्य आणि प्रमाणिकतेच्या मार्गावर राहतो.

 

आपलं आयुष्य कामी येणं..

उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

 

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा 

हे चांगलंच ठाऊक आहे…

अशांच्या हृदयाला… ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत,

आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने 

ज्यांना तरीही मोठं केलंय.

 

हो आहे मी घाईत..

मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..

ती उत्कटता…

जी केवळ प्रगल्भतेतून येते.

आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची माझी इच्छा नाही.

 

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..

मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास.


माझं आता एकच ध्येय आहे…

माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेक बुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत 

अखेरचा क्षण गाठणं.. बस.

 

आपल्याकडे बरं का दोस्तांनो…

दोन आयुष्य असतात..

आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं 

की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे..

(मारिओ दि अन्द्रादे या ब्राझिलियन कवीच्या ‘MY SOUL HAS A HAT’  या कवितेचा स्वैर अनुवाद. -)

अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सादर प्रणाम!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सादर प्रणाम!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

तीर्थ अंदमान | जिथे झाली सजा |

तिथे आता पूजा | क्रांतीसूर्या ||१||

*

मातृभूमी तुज | तन मन धन |

अर्पिले जीवन | सर्वार्थाने ||२||

*

सेल्युलर जेल |काळे पाणी शिक्षा | 

राष्ट्रयज्ञ दिक्षा | क्लेशदायी ||३||

*

अंधार कोठडी | रोज काथ्याकूट |

शिक्षेचा मुकुट | शिरावरी ||४||

*

फिरवून कोलू | तीस पौंड तेल |

शृंखलांचा वेल | देहावरी ||५||

*

राष्ट्रासाठी त्याग | तरी उपेक्षित |

गंधर्व शापित | विनायक ||६||

*

तात्याराव तुम्हां | सादर प्रणाम |

उपेक्षा विराम | शुभ दिनी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

खेळ चाले माध्यमांचा

वास्तवाला झाकण्याचा

बोलतो रेटून खोटे

प्रश्न नाही लाजण्याचा

 *

गौरवाचे गीत गाता

तोल ढळतो लेखण्यांचा

 *

वारसा जपतोय आम्ही

जीवघेण्या श्वापदांचा

 *

ऐतखाऊ माणसाला

छंद नाही राबण्याचा

 *

आत्मप्रौढी ऐकताना

वीट आला भाषणांचा

 *

हे कसे स्वातंत्र्य आहे

जाच होतो बंधनांचा

 *

धर्म वेडे लोक झाले

विषय आहे चिंतनाचा

घ्या जरा अंदाज काही

यावयाच्या भाकितांचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घळ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ घळ… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

विरळ झाडीतून पुढे जाणारी ती घळ

फार सजीव भासत होती खरी,

झाडांची कमतरता सोडली तरी

वाटत होती ती खूप भारी.

पाण्याचा स्रोत काही अंशी हजर होता ;

म्हणून की काय पक्ष्यांचा तिथे वावर होता.

संध्याकाळमुळे काळोखात ती बुडत होती,

असले असे तरी इतरांना ती निरखीत होती.

 *

पडलेल्या संध्येच्या लालीमेत ती

आणखीन खुलून दिसत होती.

लुप्त होऊ पहात असलेली ती

पाहत राहावी अशी वाटत होती.  

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कळतच नाही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कळतच नाही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कळतच नाही मतदाराला

कोणता झेंडा घ्यावा हाती

नेम नाही उमेदवाराचा आता

कोणत्या पक्षात कोण जाती!

*

देशभक्ती अन देशप्रेम हे

उमेदवारा असते वा नसते

सत्ता मिळविणे अन भोगणे

प्राधान्य केवळ हेच असते!

*

मतदार आता शहाणा होवो

व्यक्ती नव्हे देशभक्ती पाहो

जाती, भाषा, धर्मापलीकडे

देशहिताचाच विचार होवो!

*

 जाती, भाषा, धर्मापलीकडे

 देशहिताचाच विचार होवो!!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

उत्पत्ती तेथे लय

लय तेथे उत्पत्ती

वर्ष बाविसचा लय

वर्ष तेविसची उत्पत्ती…

*

आत्मा तोच

वसन बदलले

तैसेचि हेही वर्ष

आकडे बदलले..

*

गताची नको खंत

स्वागतम् येणा-याचे

नवी उभारी, नवे संकल्प

कवच आहे सद्गुरुंचे…

*

किती गेले, येणार बरेच

भूतकाळात जमा हे वर्ष

असतील केल्या चुका अनेक

सुधारून त्या क्रमूया नववर्ष…

*

आणू तिव्रता साधनेत,

रिपूंना देवू मूठमाती,

नका दवडू वेळ,

सदगुरु आहेत सांगाती…

* नववर्षाच्या मन: पुर्वक शुभेच्छा *

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २७६ – द्राक्ष…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २७६ – विजय साहित्य ?

☆ द्राक्ष…!

(अष्टाक्षरी.)

द्राक्ष कोल्ह्यासी आंबट

आजी सांगायची मला

द्राक्ष आवडीचे फळ

पाहू बाग मळा चला.

*

बिया नसलेले द्राक्ष

वाटे रत्न अनमोल

किती खाऊ किती नको

द्राक्ष फळ लंबगोल.

*

बाग द्राक्षाची पाहून

पाणी‌ सुटते तोंडाला

काळी,लाल,हिरवीशी

घोस लोंबती वेलाला.

*

तासगांव नाशिकची

पहा द्राक्षे चवदार

रोग प्रतिकार शक्ती 

असे गुणकारी फार.

*

डोळे,हृदयाच्यासाठी

आहे द्राक्ष गुणकारी

द्राक्षासव,ताजारस 

असे मात्रा गुणकारी.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ शेकोटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

☆ शेकोटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

थंडी वाढली वाढली

चला शेकोटी पेटवू

हुडहुडी भरलीय

तिला पळवून लावू ll १ ll

*

गोळा करू काटेकुटे

पाला पाचोळा वाळला

कडाक्याची थंडी पळे

पेटविता शेकोटीला ll २ ll

*

शेकोटीच्या भोवताली

बसू मित्रांच्या सोबत

उबदार करू तन

मन मोकळे बोलत ll ३ ll

*

कधी शेतात रानात

येते मैफिल सजून

गप्पा गोष्टी गाणी आणि

होते पौष्टिक भोजन ll ४ ll

*

अशी शेकोटी स्नेहाची

सुख दुःख वाटणारी

सगे सोयरे मित्रांना

एकत्रित आणणारी ll ५ ll

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी

ही जुनी गोष्ट आहे.माझं लग्न 7 जून 1987ला झालं आणि मी सासरी म्हणजे बहुले, ता.पाटण,जि.सातारा इथं आले.सहा महिन्यांनी 31 डिसेंबर आला.त्यावेळी आम्ही घरातील सह्याद्री दूरदर्शनवरील कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असायचा तो पहात असू.दोनच राष्ट्रीय चॅनल त्यावेळी होते.

सासरी सतरा एकर शेती घरीच करत असल्यामुळे गडी माणसांचा राबता होता.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही होता.घरात कॅलेंडर कुठेतरी असायचे.पंचांगाचा वापरच सर्रास होत असल्याने सणवार,तिथी सर्व व्यवस्थित कळायचे.साजरे व्हायचे.गाव हे तसं स्वयंपूर्ण होतं.म्हणजे माळी,सुतार,लोहार,न्हावी ,शिंपी इ.यांनी काम केले की त्यांना धान्य, भुईमूग शेंगा असं दिलं जायचं.अशिक्षित लोकांना वेळेला सावकार लोक असायचे.त्यामुळे बॅंक व्यवहार त्यांना क्वचित माहित होते.

ही कविता या पार्श्वभूमीवर सुचली.31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहून झाला.एक तारीख गेली.दोन तारखेच्या सकाळी गावाला गेलेला एक गडी रघू परत आला.तो धारा काढायला मदत करायला येत असे.त्याला मी “Happy New year रघू “असं म्हणाले.तो क्षणभर बघतच राहिला.त्याला वाटलं वहिनींनी काही तरी काम सांगितले आहे पण कळलं नाही म्हणून म्हणाला”वहिनी,काय म्हनला तुम्ही कळलं न्हाय” मी पुन्हा Happy New year म्हणाले.तो म्हणाला” ते काय असतं ?”मला हसायला आले.सगळे हसायला लागले.मग मी म्हणाले.”अरे, नविन वर्ष सुरू झालं ना काल.ते सुखाचे जावो असं म्हणलं.”मग तो म्हणाला “काकांनी पंचांगात बगून(माझे सासरे)तसं कायबी सांगितलं नाय.”

मग मी त्याला सर्व माहिती सांगितली.त्यावर त्यानं दिलेलं उत्तर”आवं रोजची कामं काल बी हुती,आज बी हायत, उद्या बी असनार.कशाचं नवीन वरीस आन् काय.हां पुरनपोळी करायची हाय काय मंग हिला सांगतो करायला .”उत्तर साधं होतं. पण मी मात्र त्यांवर विचार करायला लागले .आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.शेतकर्यांना आजही हा जल्लोष वगैरे माहित नाही.त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते त्यामुळे विचार क्षेत्रही.त्याचा विस्तार व्हायला हवा.हे उत्तर मी कवितेत शब्दबद्ध केले आहे.

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात.श्यान भरलं,टाकलं

गुरास्नी चारा टाकला.न्याहरी केली.

शेतात गेलो बैलं घेऊन कोळपलं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात धारा काढल्या ‌

किटल्या भरल्या,वैरन टाकली.

कारभारणीला घेऊन शेत भांगललं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या दूध घालून परत आलो

कारभारणीनं केलेला च्या पिला

घेतला ईळा काढली वैरन

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

दिस मावळायला आला

गुरास्नी चारा पाणी झालं

ढगाआड सुर्व्या लपला

 काल बी असंच,उद्या बी असंच,

आज येगळं काय झालं?

*

तिकडं बी परदेशात अंधार झालाच की

समदी कामावरनं घरला आलीत की

 काल,आज, उद्या त्यास्नी राबायचं हायच की

घरात बाहेर कुटबी काम्पुटर हायच की

*

मंग नवीन वरस सुरू झालं म्हनं मंजी काय झालं?

आज, उद्या आन् परवा धारा हायत्याच की.ईळा बी हाय.भांगलायचं बी हाय.

आन् गुरास्नी वैरन ती कुटं जाती?कापायची हायच की.

भाकर तुकडा हायच की.झाडाखाली सुखानं पडायचं हायच की

*

मंग नवीन वरीस सुरू झालं मंजी काय झालं? काय आलं आनि काय गेलं?

मंजी काय झालं?

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares