मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? ?

☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

खालील वाक्य वाचा :

“मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता.

बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेवुन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो.”

(वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.)

ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत.

नाही खरे वाटत?

बघा मग : दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग.

इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत.

आहे ना गंमत!!

पण मग हे सगळे झाले तरी कधी?

इसवी सन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली.

फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा.

हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला.

इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा कारभार खिलजी सल्तनत दिल्लीत बसून करत होती.

अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर पुढे १३४७ साली त्याचा सुभेदार हसन गंगू ह्याने दिल्लीशी संबंध तोडून दक्षिणेत बहमनी सल्तनतीची स्थापना केली.

इसवीसन १४९२ पर्यंत बिदर, १४८४ पर्यंत वऱ्हाड, १४८९ पर्यंत अहमदनगर, १४८९ पर्यंत विजापूर आणि १५१२ पर्यंत गोवळकोंडा भागात हि बहमनी सल्तनत अस्तित्वात होती.

ह्या वरील बहमनी सल्तनतीच्या वेळेसच मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा उद्योग सुरु केला. इसवीसन १४५० च्या सुमारास खानदेशातील स्वाऱ्यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे, कोळवनात कोळी, रामनगरास

राणे, सोनगड आणि रायरीच्या प्रांतात तेथील राजे, शिरकाणात शिरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगावास कर्णराज, मोरगिरीस मोरे, असे अनेक मराठे आपले राज्य स्वतंत्रपणे करीत असत. ह्या वरील प्रांतांमध्ये १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार होत असे. मात्र हे प्रांत सोडून बाकीच्या प्रदेशांत फारसी शब्दांचा सुळसुळाट झाला होता. १४५० नंतर हि लहान लहान राज्ये नष्ट होऊन बहमनी

सल्तनतीच्या अंकित बनली.

ह्या बहमनी सल्तनतीचे पुढे जाऊन बरिदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, आणि कुतुबशाही असे पाच तुकडे पडले.

बरिदशाही-१६५६, इमादशाही-१५७२, निजामशाही-१६३७, आदिलशाही-१६८६, आणि कुतुबशाही-१६८७ पर्यंत अस्तित्वात होत्या.

म्हणजे ह्या राजसत्ता जिवंत असूपर्यंत फारसी भाषेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.

हे सगळे मुस्लिम शासक मूळचे पर्शियन असल्यामुळे त्यांची दरबारी भाषा हि फारसी होती.

त्यामुळे फारसी आणि मराठीची टक्कर होऊ लागली. सुलतानांनी राज्य चालविताना आपली भाषा वापरण्यावर भर दिला. त्यामुळे जमीन महसूल असो कि अजून काही. सगळीकडे फारसी शब्द वापरू जावु लागले.

जेथे जेथे म्हणून मुस्लिम शासकांचे राज्य कायम झाले तेथे तेथे दरबारातील सर्व मराठी लिहिण्यात फारसी संबंधांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अश्या गावी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा जेथे संबंध नाही अश्या गावकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यात जे कागदपत्र बनत त्यात फारसी शब्दांची संख्या फारच कमी असे.

मात्र त्यात फारसी शब्द बिलकुल नसत असे नाही.

इसवीसन १२९६ ला अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यापासून १६८७ च्या कुतुबशाहीच्या अस्तापर्यंत ३९१ वर्ष फारसी भाषेला महाराष्ट्रात झाली होती. ह्या ३९१ वर्षात ह्या फारसी भाषेच्या राक्षसाने रूप धारण केले होते.

देशात फारसी भाषेचा इतका प्रचंड संचार झाला होता कि दरबारापासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तीच्याही बोलण्यात किंवा लिहिण्यात फारसी शब्द नकळत येत असे.

फारसीतून मराठीत जी विशेषनामे रूढ झाली ती धक्कादायक अशी आहेत. उदाहरणार्थ:

बाबा, मामा, मामी, नाना, नानी, काका, काकी, अबू, अम्मा, अम्मी वगैरे मराठीतील टोपण नावे हि फारसी आहेत.

ह्याशिवाय सुल्तानराव, जानराव, बाजीराव, रुस्तुमराव, शहाजीराव, शाहू, फिरंगोजीराव, सर्जेराव, हैबतराव, सर्फरोजीराव, वगैरे नावेही फारशीच आहेत. ह्या शिवाय अजून सौदागर, मुश्रीफ, सराफ, चिटणीस, फडणीस, पोतनीस, हेजिबराव, दिवाण, पेशवे, वाकनीस, दफ्तरदार अशी आडनांवेही फारसी आहेत.

अश्या स्वरूपाच्या शेकडो फारसी शब्दांनी मराठीत कायमचे ठाण मांडले.

जसे जसे यावनी भाषेचे मराठीवर आक्रमण होऊ लागले तसे तसे संतांनी तातडीने समाजप्रबोधनातून मराठी भाषा वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,

“माझा मराठाची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे। रसिके मेळवीन”

संत तुकाराम तर अजुन ओजस्वी म्हणतात कि

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ।।

शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन।

शब्दे वाटू धन जन लोका ।।

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव।

शब्दे चि गौरव पूजा करू ।।

संत जनाबाई, संत बहिणाबाईं, संत एकनाथांनी जशी मराठी भाषा समृद्ध केली तशीच संत नामदेवांनीही मराठी भाषेचा वारू यथार्थ दौडवला.

संग्राहक – सुश्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ 

“माझे साहित्य कोण वाचतात कितीजण वाचतात,हे कळत नसले तरी कुठेतरी माझे साहित्य जीवनाबद्दल कुतुहल जागृत करेल तेव्हढ्यासाठी तरी जगण्याची सूक्ष्मशी ईर्षा निर्माण करील अशी आडूनआडुन  मला आशा वाटत असते.पण तेव्हढ्यासाठीच मी लिहीतो का?

नाही.

लिहीणे ही माझीच मानसिक गरज आहे. विधात्याने मी जन्माला येताना मला सर्जनाची (कमी —अधिक)  शक्ती दिली आहे.ती शक्ती मला स्वस्थता देत नाही.मलाही ती स्वस्थता नको असते.ती स्वस्थता जेव्हां येईल तेव्हां माझ्या जगण्यातला अर्थ निघून गेलेला असेल.अशी मला भीती वाटत असते…..”

जयवंत दळवी (बाकी शिल्लक)

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

दारात उभे म्हातारपण

त्याला आत घेणार नाही

उत्साहाने बाहेर भटकेन

त्याकडे लक्ष देणार नाही!१!

 

उभा राहूदे दारात त्याला

ढुंकूनही  बघणार नाही

आजही मी तरुण आहे

त्यास घरात घेणार नाही!२!

 

जन्मा बरोबर असलेला

मृत्यू मला ठाउक आहे

उत्साहाने बाहेर भटकेन

जरी तो माझ्या मागे आहे!३!

 

विसरेन जन्म तारीख

म्हातारपणाला  थारा नको

किती मी चंद्र पाहिले

त्याचा हिशोब ठेवायला नको!४!

 

सुरकुतलेल्या चेहऱ्यावर

तारुण्याची चमक असेल

उत्साहाने काम करण्याची

हातापायात धमक असेल!५!

 

प्रेम देईन प्रेम घेईन

मित्रांच्या सहवासात राहीन

दररोज संध्या झाली की

एकच पेय प्रेमरस पीईन!६!

 

हाकला त्या म्हातारपणाला

जन्म तारीख विसरून जा

सकाळ झाली की खिडकीतून

कोवळे उन पहात जा!७!

 

दारात उभे म्हातारपण

त्याला आत घेणार नाही

उत्साहाने बाहेर भटकेन

त्याच्याकडे लक्ष देणार नाही!८!

 

प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना…… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(श्री. पु. ल. देशपांडे आणि श्री. आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा स्मृतिदिन नुकताच अगदी पाठोपाठ होऊन गेला. या दोघांच्या स्मृती एकत्रपणे जागवणारा हा सुरेख लेख)

काल पुलं स्मृतिदिन आणि आज आचार्य अत्रे स्मृतिदिन. ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं की, ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं…. “माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!”  या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी!!!!!

दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये…..!

असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा…..

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर!!!   मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था फारच दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं, तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं. अत्रेंचं तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या प्रा. मिलिंद जोशींनी हा प्रसंग फार छान वर्णन केला आहे….

अत्र्यांच्या खड्डे आणि धूळ यावरील भाषणाचा धागा पु.ल.नी अचूक पकडला आणि म्हणाले,

‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीति का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात, अत्रेसाहेब आपण आहात.’’

टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,

“मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.”

आचार्य अत्र्यांचा शब्द पु.ल.नी खोटा ठरू दिला नाही.  अत्र्यांच्यानंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पु.ल.नी चोख केले….!!!

गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा:…. याचंच मनोहारी दर्शन वरील प्रसंगातून सतेज दृग्गोचर झालं…!!!

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक-९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मीप्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- ९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

बोरा केव्हज् पाहून आम्ही बसने आरकू व्हॅली इथे मुक्कामासाठी निघालो. खरं म्हणजे विशाखापट्टणम ते छत्तीसगडमधील जगदलपूर हा आमचा प्रवास किरंडूल एक्स्प्रेसने  होणार होता. ही किरंडूल एक्सप्रेस पूर्व घाटाच्या श्रीमंत पर्वतराजीतून, घनदाट जंगलातून, ५४ बोगद्यांमधून  प्रवास करीत जाते म्हणून त्या प्रवासाचे अप्रूप वाटत होते. पण नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे एका बोगद्याच्या तोंडावर डोंगरातली मोठी शिळा गडगडत येऊन मार्ग अडवून बसली होती. म्हणून हा प्रवास आम्हाला या डोंगर-दर्‍या शेजारून काढलेल्या रस्त्याने करावा लागला. हा प्रवासही आनंददायी होता. रूळांवरील अडथळे दूर सारून नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीचे दर्शन अधूनमधून या बस प्रवासात होत होते. प्रवासी गाडी मात्र अजून सुरू झाली नव्हती. अनंतगिरी पर्वतरांगातील लावण्याच्या रेशमी छटा डोळ्यांना सुखवीत होत्या.भाताची पोपटी, सोनसळी शेते, तिळाच्या पिवळ्याधमक नाजूक फुलांची शेती आणि मोहरीच्या शेतातील हळदी रंगाचा झुलणारा गालिचा, कॉफीच्या काळपट हिरव्या पानांचे मळे आणि डोंगर कपारीतून उड्या घेत धावणारे शुभ्र तुषारांचे जलप्रपात रंगाची उधळण करीत होते.

गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप चरायला नेणारे आदिवासी पुरुष, लाकूड-फाटा आणि मध, डिंक, चिंचा, आवळे, सीताफळे असा रानमेवा गोळा करून पसरट चौकोनी टोपल्यातून डोक्यावरून घेऊन जाणाऱ्या आदिवासी स्त्रिया मधून मधून दिसत होत्या. या स्त्रिया कानावर एका बाजूला उंच अंबाडा बांधतात. त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या, मण्यांच्या माळा घालतात. घट्ट साडी नेसलेल्या, पायात वाळे आणि नाकात नथणी घातलेल्या तुकतुकीत काळ्या रंगाच्या या स्त्रिया भोवतालच्या निसर्गचित्राचा  भव्य कॅनव्हास जिवंत करीत होत्या. आरकू म्हणजे लाल माती.आरकू व्हॅली व परिसरातील आदिवासींना, वनसंपत्तीला संरक्षण देणारे विशेष कायदे आंध्र प्रदेश सरकारने केले आहेत. व्हॅलीतील सुखद,शीतल वास्तव्य अनुभवून आम्ही छत्तीसगडमधील जगदलपूर इथे जाण्यासाठी निघालो.

जगदलपूर हे बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बस्तरच्या खाणाखुणा पाषाण युगापर्यंत जातात. प्राचीन दंडकारण्याचा हा महत्वपूर्ण भूखंड आहे. हा सर्व भाग घनदाट जंगलसंपत्तीने, खनिजांनी समृद्ध आहे.साग आणि साल वृक्ष, बांबूची दाट बने, पळस यांचे वृक्ष तसेच चिरोंजी, तेंदूपत्ता,सियारी म्हणजे पळस, आंबा, तिखूर सालबीज, फुलझाडूचे गवत,  रातांबा आणि कित्येक औषधी वनस्पतींनी श्रीमंत असं हे जंगल आहे. या पूर्व घाटातील बैलाडीला या पर्वतरांगांमध्ये अतिशय उच्च प्रतीच्या लोहखनिजाचे प्रचंड साठे आहेत. ब्रिटिशांनी दुर्गम प्रदेशातील या खनिजसंपत्तीचा शोध लावला. बस्तर संस्थानच्या भंजदेव राजाला फितवून त्यांना हैदराबाद प्रमाणेच हे संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते. भारताची आणखी मनसोक्त लूट करायची होती. पण पोलादी पुरुष सरदार वल्लभाई यांनी १९४८साली बस्तर संस्थान खालसा केले. विशाखापट्टणम ते जगदलपुर ही पूर्व घाटातून ५४ बोगदे खणून बांधलेली रेल्वे जपानने बांधून दिली. १९६० साली जपानबरोबर ४० वर्षांहूनही अधिक वर्षांचा करार करण्यात आला. बैलाडीलातील समृद्ध लोहखनिज खाणीतून काढून कित्येक किलोमीटर लांबीच्या सरकत्या पट्ट्यांवरून मालगाड्यात भरले जाते. तिथून ते विशाखापट्टणमला येते आणि थेट जपानला रवाना होते. कारणे काहीही असोत पण जपानबरोबरचा हा करार अजूनही चालूच आहे. ब्रिटिशांच्या, जपान्यांच्या बुद्धिमत्तेचे, चिकाटीचे, संशोधक वृत्तीचे कौतुक करावे की वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या देशाची केलेली लूट पाहून विषाद मानावा अशी संभ्रमित मनस्थिती होते.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित ☆ 

माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळस धरायला सुरुवात केली आहे. 5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खर तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली.. एकटीच….

आता मी माझं रुटीन सेट करून घेतलंय.. सकाळी जरा लवकरच उठतो, त्याच काय आहे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरच होतो त्यांना म्हणुन सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं.. हो वाटायच.. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत.. नाही नाही गैरसमज करून घेऊ नका सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सुन नाहियेत… वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात.. माझी तक्रार काही नाही.. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं  सगळा ओटा खराब झाला..सुन नाराज झाली.. मला काही बोलली नाही पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत.. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले..”बाबा उद्यापासून आमच आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रूम मधे” असाच एकदा नातवाला एकदा म्हणालो चल तुला स्कूल बस पर्यंत येतो सोडायला.. तर म्हणतो कसा “आबा मी मोठा झालोय आता मी एकटा जाऊ शकतो तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल मी घाबरतो एकटा यायला..हसतील मला सगळे..”

म्हणुन सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो.. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मधे येतो.. मला कळून चुकलय की त्यांच्या आयुष्यातला फक्त एक भाग आहे कदाचीत थोडासा दुर्लक्षित…

आता मी संध्याकाळी फिरायला जातो.. तेवढाच माझाही वेळ जातो.. रोजचा मार्ग ठरलाय माझा agricultural college च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी.. त्या मार्गावर एक दोन शोरूम आहेत चार-चाकी गाड्यांच्या.. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते.. म्हणुन मग येता जाता त्या शोरूम मधल्या गाड्या बघत बघत जायचो अर्थात बाहेरूनच..

पण एक दिवस त्या शोरूम मधे एक वेगळीच गाडी दिसली काहीशी जुनी होती पण त्या गाडीला वेगळी जागा होती, तीला वेगळ्या पद्धतीने सजवल होत. कुतुहल वाटल म्हणून आत गेलो.. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला.”yes sir कुठली गाडी बघताय” नाही….म्हणजे हो बघतोय पण विकत नाही घ्यायची मला.. ही एव्हढी जुनी तुमच्या शोरूममधे कशी काय हा विचार करतोय. “सर ही vintage car आहे 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”

का हो सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे या गाडीवर मात्र तो नाही.”सर ही विंटेज कार आहे हिची किंमत ठरवता येत नाही..ज्याला या गाडीच मोल कळेल तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”

मी शोरूम मधून बाहेर पडलो..कसला तरी विचार येत होता मनामधे पण नक्की कळतं नव्हत काय ते..

असेच मध्ये काही दिवस गेले रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते.. ही गेल्या नंतरचा पाहिलाच गुढी पाडवा..जरा  उदासच होतो मी पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.. “आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते रोड वायडिंग मधे ते पाडणार होते.. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं.. आमच्या टीचरनी सांगितलं ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देत म्हणुन ते महत्वाचं आहे.”

त्या गाड्यांच्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर जस वाटलं होतं तसच काहीसं वाटून गेलं.

सुनबाई म्हणाली “बाबा तुम्ही पूजा कराल का गुढीची..इतकी वर्षे आई करायच्या म्हणुन वाटत आज तुम्ही करावी..” मी पण तयार झालो..

आम्ही सगळे जेवायला बसलो सूनबाईने छान तयारी केली होती.. जेवायला तांब्याची ताट काढली.. मुलगा म्हणाला ” अगं आज तो काचेचा सेट काढायचा ना”

“अरे असू दे आईने पाहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट… त्या सेट मधली आता फक्त ताटचं उरली आहेत म्हणुन मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी आईची आठवण म्हणून.”आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.

अचानक मला त्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता त्याचा अर्थ कळायला लागला..मौल्यवान या शब्दाचा.. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड काही तरी इशारा करत होते..

आता माझे मला समजले होते मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो..

आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने.. कारण मला माहितीये त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कार सारखं आहे… एकदम स्पेशल..

✍ सौरभ साठे 

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग दुसरा) ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग दुसरा ) ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

 (हृदयस्पर्शी अनुभव ) – जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!

मी असं ऐकलंय, की भातुकलीचा डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतो… आपला हा पण खेळ आता अर्ध्यावरच मोडेल ना बाबा….? 

बोला ना बाबा, गप्प का?

बाबा, तुम्ही आणि आई मला देवाघरी रहायला पाठवणार आहात ना?

का? मी मुलगी आहे म्हणुन…?

मुलगी असणं दोष आहे का बाबा?

तुमची आई, पण एक मुलगीच आहे ना…!

बाबा, देवाचं घर कसं असतं हो…?

तीथं आई-बाबा पण असतात की  आईबाबांना नको असणा-या   माझ्यासारख्या सर्व मुलीच असतात…..?

सांगा ना बाबा, तुम्ही गप्प का? 

बाबा, मला तुम्ही देवाच्या घरी रहायला का पाठवताय?  आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का?

मी ना बाबा, आपल्या मनीमाऊ सारखी काॕटखाली झोपून राहीन एकटीच, तुम्हाला आणि आईला मी कध्धी कध्धी त्रास देणार नाही बाबा…. मला नका ना पाठवू देवाघरी…. प्लीज बाबु…!

बाबा, आपली आई कशी दिसते हो? मी तर तिला पाहिलं पण नाही…. आणि आता देवाघरी गेले तर पाहू पण शकणार नाही….

खरं सांगू बाबा, मी खूप स्वप्नं पाहिली होती, पण यातलं एकही खरं होणार नाहीये. 

मला आभाळात उंच भरारी घ्यायची होती हो, पण मला काय माहित… जन्माला येण्याआधीच तुम्ही मला आभाळात पाठवणार आहात ते, कायमचं!

आज मी बोलतीये बाबा, पण उद्या मी नसणार आहे.

आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्याल मला बाबा….?

पाठीवर थोपटून एकदा तरी जवळ घ्याल मला  बाबा??

फक्त एकदाच लाडानं कपाळावरुन हात फिरवाल बाबा…???

बोला ना बाबा, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे…. रात्र संपत चालली आहे…. बोला ना बाबा… बोला ना…

बापरे…. बोलता बोलता सकाळ झाली….  तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये निघालात सुद्धा…???

आता कुंडीतून गुलाबाचं रोपटं उचकटून फेकून द्यावं तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देतील…

तुम्ही हे बघू शकाल का बाबा?

फुलासारख्या नाजूक तुमच्या ठमाकाकुला आईच्या पोटातून ओढून बाहेर फेकून देणार आहेत डाॕक्टर काका…  बाबा तुम्ही सहन करू शकाल हे…?

बाबा, हे डाॕक्टर काका, मला आणि आईला घेवुन कुठे चालले आहेत…?

कसले कसले आवाज येताहेत इथं बाबा… मला भिती वाटत्येय… आईला थांबवा ना… या डाॕक्टर काकांना थांबवा ना… बाबा थांबवा ना यांना प्लीज…

डाॕक्टरकाका, तुम्ही तरी ऐका…  मी माझी बाहुली देते तुम्हाला… हवं तर माझ्याकडची सर्व चाॕकलेट्स देते… पण आईबाबांपासुन दूर नका ना करु मला काका….

बाबा, तुम्ही माझा हात नका ना सोडु… प्लीज बाबु… सांगा ना या डाॕक्टरकाकांना… आई, तू तरी सांग ना… तू गप्प का…?

असह्य वेदना होत आहेत बाबा मला….

बाबा मला वाचवा…. बाबा मला वाचवा…. बाबा…. बाबा… बाबु…. बाबड्या…!

….. बाबा रडताहात तुम्ही?

आता नका रडु… गेले मी केव्हाच तुमच्यामधुन…

तुमचे डोळे पुसणारे इवलेसे हात आता अस्तित्वात नाहीत, तुमच्या डोक्याला आता मी बामही नाही लावू शकणार, लपाछपीच्या डावात आता मी तुम्हाला कध्धी कध्धीच  सापडणार नाही बाबा, दारामागुन आता तुम्हाला भ्भ्वाँव करायलासुद्धा मी येवु शकणार नाही… आणि हो, लंगडीच्या खेळात पण आता तुम्हाला मी कध्धीच  हरवायला येणार नाही बाबा… तुम्ही जिंकलात बाबा कायमचे!

तुमची चिमणी आता खूप दूर उडून गेली आहे, आभाळात…. तुम्हालाही तेच हवं होतं ना…?

जाऊदे बाबा, आता मला कसलाही त्रास होत नाहीय,  कसली ही वेदना नाही, संवेदना सुद्धा नाही…. मी या पलीकडे गेले आहे.

सारं कसं शांत शांत झालंय बाबा…

आता शेवटचा… अगदी शेवटचा एक हट्ट पुरवाल….?

आता फक्त एकदा एकदाच कुशीत घेउन मला ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवाल???

चिडवा ना बाबा…प्लीज…. शेवटचं… मी नाही रागावणार  तुमच्यावर…!

देवाघरी गेलेल्यांना रागावण्याचा हक्क असतोच कुठे म्हणा…!

तुमचीच जन्माला न आलेली,

अभागी ठमाकाकू

समाप्त

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बैठक ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

अल्प परिचय !

जन्म – 29 डिसेंबर 1953

नोकरी – व्यवसाय 2012 मधे VRS घेवून RBI मधून निवृत्त !

साहित्य निर्मिती –

  • RBI मधे असतांना बँकेच्या हाऊस मॅगझीन मधून (Without Reserve) इंग्रजी कविता प्रसिद्ध.
  • RBI मधील ‘मराठी वांग्मय मंडळाच्या’ बोर्डवर त्या त्या वेळच्या चालू घडामोडीवर विनोदी टीका टिप्पणी करणारे लेखन.  RBI स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित एकांकिका लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक.
  • RBI मधून निवृत्त झाल्यावर सुमारे दोनशेच्या वर कविता, चारोळ्या, ललीत लेख व विनोदी प्रहसन यांचे लेखन.
  • “सिंगापूर मराठी मंडळाच्या” अंकातून कविता प्रसिद्ध. तसेच त्यानी आयोजित केलेल्या कविता स्पर्धेत कवितेची निवड आणि त्याचा  मधुराणी प्रभुलकर आयोजित “कवितेचे पान – सिंगापूर !” या web series मधे छोटया मुलाखतीसह समावेश !

? विविधा ?

??? बैठक !???? ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

मी तरुण असतांना (अर्थात वयाने !) जे काही शब्द प्रचलित होते, त्यातील “बैठक” हा शब्द, सांप्रतकाळी नामशेष झाल्यात जमा आहे !

“अहो जोशी काकू, तुम्ही तो नवीन आणलेला फ्लॉवर पॉट द्याल का आज संध्याकाळी, थोडा वेळासाठी ?” “हो न्या की, त्यात काय विचारायचं मेलं ? आज काही खास आहे वाटत घरी ?” “अहो, आमच्या सुमीच्या लग्नाची ‘बैठक’ आहे संध्याकाळी !”

असे संवाद त्या काळी, लग्न सराईत म्हणजे लग्नाच्या सीझन मध्ये चाळी चाळीतून ऐकायला मिळत असतं ! या संवादात फक्त फ्लॉवर पॉटची जागा दुसऱ्याकडच्या, दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूने घेतलेली असायची, एवढाच काय तो फरक ! आणि हो त्या काळी लग्नाचा सीझन असायचा बरं का ! आत्ता सारखे दोन्ही पक्षांना सोयीचा मुहूर्त काढून, लग्न उरकण्याचा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता !

लग्न जमल्यावर, म्हणजे रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम होऊन, एकमेकांची पसंती झाल्यावर, लग्नाची ही “बैठक” साधारणपणे मुलीच्या घरी एखाद्या रविवारच्या सकाळी होत असे ! ही बैठक एकदाची यशस्वी झाली, की त्याच संध्याकाळी भावी जोडपे फिरायला जायला मोकळे ! या अशा लग्नापूर्वीच्या महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोचलेल्या “बैठकी” पर्यंत, एकदा जमणाऱ्या लग्नाची गाडी आली, की भावी वधूपित्याला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत असे ! कारण नंतर कुठल्याच कारणाने असे “बैठकी” पर्यंत जमत आलेलं लग्न, देण्या घेण्यावरून मोडल्याची उदाहरण हातावर मोजण्या एवढी सुद्धा नसायची !

“ताई, उद्या माझी रजा हाय !” आमच्या कामवाल्या बाईने, सौ.ला एका सुप्रभाती आल्या आल्या, काम सुरु करायच्या आधीच, हसऱ्या चेहऱ्याने ही ललकारी दिली ! ते ऐकून सौ ने पण तिच्या इतक्याच, पण त्रासिक चेहऱ्याने तिला विचारलं, “अग मालू उद्या मधेच गं कसली तुझी रजा ?” यावर तिने लगेच हातातले भांडे हातातच ठेवून, नमस्कार केला आणि उत्तरली “उद्या आमच्या ‘तिरकाल न्यानी बाबांची बैठक’ हाय !” “बैठक म्हणजे ? तुझ्या त्या बाबांचं लग्न बिग्न ठरलं की काय ?” सौ ने हसत हसत पण खोडकरपणे विचारलं ! “काही तरीच काय ताई, आमचे बाबा अखंड ब्रमचारी हायत म्हटलं !” “अग मग बैठक कसली ते सांगशील का नाही ?” “अवो बाबांची ‘बैठक’ म्हणजे ते परवचन देनार आनी आमी समदी बगत मंडली, ते खाली बैठकीवर बसून ऐकनार !”

तर मंडळी, मालूच्या त्या उच्चारलेल्या वाक्यातील “बैठक” या शब्दाच्या, मला समजलेल्या नव्या अर्थाने, माझ्या शब्दांच्या ज्ञानाची बैठक थोडी विस्तारली !

“आजच्या ‘बैठकीत’ बुवांचा आवाज जरा कणसूरच लागला, नाही ?” शास्त्रीय संगीताची खाजगी बैठक संपल्यावर बाहेर पडतांना, असे संवाद कधी कधी कानावर येतात ! यात कणसूर म्हणजे नक्की काय, हे माझ्या सारख्या कान सम्राटाला, तीच बुवांची बैठक खूपच आवडल्यामुळे कळतंच नाही ! कदाचित माझी शास्त्रीय संगीताच्या जाणकारीची बैठक, फक्त कानापूर्ती मर्यादित असल्यामुळे असं झालं असावं ! असो !

हल्ली अनेक संघटनांच्या, राजकीय पक्षांच्या चिंतन “बैठका” होण्याचं प्रमाण वाढलं आहे ! अशा चिंतन बैठका मध्ये कसलं चिंतन होतं, ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना त्या बैठकामधे प्रवेश नसाल्यामुळे कधीच कळू शकत नाही ! हे बरंच आहे ! त्यांच चिंतन त्यांना लखलाभ !

फडावरची लावणी आणि “बैठकीची” लावणी असे दोन प्रकार असतात, असं ऐकून होतो ! हे दोन्ही प्रकार जरी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही, तरी अनेक मराठी तमाशा चित्रपटांनी माझी ही इच्छा पूर्ण केली, हा भाग निराळा ! फडावरच्या लावणीत नृत्यांगना बोर्डावर नाचत नाचत लावणी म्हणते आणि बैठकीच्या लावणीत, ती एकाच जागी बसून हाताची अदा, डोळ्याचे विभ्रम इत्यादी करून लावणी सादर करते !

या दोन्ही प्रकारात मला एक फरक जाणवला तो असा, की ही बैठकीची लावणी सादर करणारी नटी, फडावरील लावणी सादर करणाऱ्या नटी पेक्षा अंगाने थोडी जाडजुडच असते ! किंबहुना माझं आता असं स्पष्ट मत बनलं आहे की, उतारवयात शरीर थोडं स्थूल झालेल्या आणि स्वानुभवातून आलेल्या बौद्धिक बैठकीतून एखाद्या अशा नटीनेच, हा बैठकीच्या लावणीचा प्रकार शोधून काढला असावा ! असली तमाशा बहाद्दरच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील असं मला वाटत !

पूर्वीचे खवय्ये (का खादाड ?) लग्नात जेवण झाल्यावर, त्याच बैठकीत ताटभर जिलब्या किंवा परातभर लाडू संपवत असत, असं मी फक्त ऐकलंय ! असा प्रयोग  स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचे भाग्य या पुढे कोणाला बघायला मिळणे दुरापास्त आहे, यात दुमत नसावे !

तसेच एखाद्या पैलवानाने एकाच सत्रात पाच हजार जोर, दंड बैठका काढल्या, ही पण माझी ऐकीव बातमी बरं का ! उगाच खोटं बोलून मी आपल्यातील संवादाची बैठक कशाला मोडू ?

“मग काय राजाभाऊ, येत्या शनिवारी रात्री कुणाच्या घरी ‘बैठक’ ठरली आहे ?” या  गजाभाऊंनी विचारलेल्या प्रश्नातील “बैठक” या शब्दात नानाविध अर्थ अभिप्रेत आहेत, हे आपल्या सारख्यांना वेगळे सांगायलाच नको ! ज्याने त्याने, आपापल्या बुद्धिमतेच्या बैठकीप्रमाणे त्याचे अर्थ लावावेत आणि आपली बुद्धिमत्तेची बैठक त्या शब्दाच्या मिळणाऱ्या नवनवीन अर्थाने विस्तारावी, ही विनंती !

एखाद्या पुस्तकाची समीक्षा करतांना, साक्षेपी समीक्षक (म्हणजे नक्की कोण ?) त्यात “पुस्तक चांगले उतरले आहे, भाषा चांगली आहे, पण लेखकाच्या विचारांची ‘बैठक’ नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करत्ये, (आता बैठक म्हटल्यावर ती वाटचाल कशी करेल, हे मला न उलगडलेलं कोडं बरं का !) हे शेवट पर्यंत वाचकाला कळतच नाही ! लेखकाच्या स्वतःच्या बौद्धिक विचारांचा, त्याच्या स्वतःच्याच डोक्यात गोंधळ उडालेला दिसतो, हे पुस्तक वाचतांना कळते आणि त्याचे प्रत्यन्तर पुस्तकात पाना पानांत प्रत्ययास येते !” अशी सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बैठकीचा कस पाहणारी बोजड वाक्य हमखास लिहून, हे साक्षेपी समीक्षक वाचकांच्या डोक्यातील गोंधळ आणखी वाढवतात, एवढं मात्र खरं !

“बैठक” या शब्दाचे आणखी बरेच अर्थ जे तुम्हांला ठाऊक असावेत पण मला ठाऊक नाहीत, ही शक्यता आहेच ! तरी आपण ते अर्थ मला योग्य वेळ येताच कळवाल, अशी आशा मनी बाळगतो !

शेवटी, आपली सर्वांची बौद्धिक बैठक, या ना त्या कारणाने नेहमीच उत्तरोत्तर विस्तारत राहो, हीच त्या जगदीशाच्या चरणी माझी प्रार्थना !

© श्री प्रमोद वामन वर्तक

मो – 9892561086

(सिंगापूर) +6594708959

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग पहिला) ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग पहिला) ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

 (हृदयस्पर्शी अनुभव ) – जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!

प्रिय बाबा,

साष्टांग नमस्कार !

बाबा…. अहो बाबा… झोपलात की जागेच आहात ? 

अहो,  मी इकडुन बोलतीये आईच्या पोटातून….

मला माहितीये, रात्र खुप झालीये आणि आई आणि तुम्ही जागेच राहून विचार करताय, मला जन्माला घालायचं की… मला जन्माला न घालताच देवाघरी पाठवायचं… ?

बाबु…. बाबा मी तुम्हाला प्रेमानं बाबु म्हणु…. ?

म्हणुद्या की हो… बाबु… !

बाबु, खरं सांगू मला यायचंय हो तुम्हाला भेटायला….  इतके दिवस आईच्या पोटात झोपले आता बाबु, तुमच्या कुशीत झोपायचंय मला… मला ना, श्‍वास घ्यायचाय हो बाबा.. फक्त एक श्वास…. !

बाबा परवाचं आईबरोबरच तुमचं बोलणं मी ऐकलंय…. मुलगा जन्माला आला तर त्याच्यासाठी मऊ मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात तुम्ही…. आणि मुलगी जन्माला आली तर ?

बाबु…  नकोय मला गादी… मी तुमच्या मांडीवरच  झोपेन ना…. नवा फ्रॉक पण नको मला, खेळणी पण नकोत मला… मी खेळेन बाई तुमच्याशीच बाबा…

बाबड्या, मी कधीच तुमच्याशी गट्टी फू करणार नाही बरं… बाबु… तुम्ही गालावर पापी घेताना दाढी टोचेल बरं मला… पण दाढी टोचली तरी मी अज्जिबात रागावणार नाही…

बाबुड्या, संध्याकाळी तुम्ही कामावरुन घरी आलात ना, की दारामागुन मी भ्भ्वाँव करीन हां तुला… पण तुम्ही घाबरायचं हां बाई…

नायतर आमी नाय खेळणार ज्जा…

आई चहा करुन आणेस्तोवर मी तुमच्या कपाळाला बाम लावून देईन हां…

बाई गं… कपाळावरचे केस कुठं गेले बाबुड्या…. ?

टकलु हैवान झाले आहात नुसते… !

आँ… आईग्ग्ं…. गालगुच्चा नाही घ्यायचा हां आमचा… गाल दुखतात आमचे…. नाहीतर मी पण कान ओढेन तुझे ससोबासारखे…. बघा मग ह्हां… सांगुन ठेवते… !

आणि हो, बाबा…  परवा माझ्या  मैत्रिणींसमोर सारख्खं  ठमाकाकु…  ठमाकाकु म्हणुन चिडवत होतात ना मला…. ?

थांबाच आता, तुमच्या  आॕफिसातले लोक घरी आले ना की, त्यांच्यासमोर मी पण तुम्हाला ढेरीपाॕम….  ढेरीपाॕम… म्हणुन चिडवेन….

ढोलुराम पळायला जात जा की जरा… !

काय म्हणालात… ?

हो, मी मुलगी म्हणुन जन्मले तरी तुमची आई म्हणुनच जगेन…. !

पण मला जन्माला तरी येवु द्या बाबा….

बाबा तुम्हाला वेणी घालता येते का हो ? नाही….?

कसा रे तू बाबड्या….!

बरं भांडीकुंडी तरी खेळता येतात का… ? नाही….???

बाई गं….  काहीच कसं करता येत नाही तुम्हाला… ???

मग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता तरी काय…?

आता लंगडी घालता येते का म्हणून अज्जिबात विचारणार नाही मी या ढेरीपाॕमपाॕमला… ढोलुराम कुठले… !

भातुकली तरी  खेळता येते का बाबा तुम्हाला…. ???

क्रमशः…. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

लहान मुलांना आपण शेकडो गोष्टी सांगतो. साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून सात-आठ वर्षांची होईपर्यंत सगळी मुलं गोष्टींमध्ये मनांपासून रमतात. या गोष्टींमधून मुलांचं स्वतःचं एक भावनिक, आभासी विश्व तयार होत असतं. त्यात राजा असतो, राणी असते, राजकन्या असते, म्हातारी असते, लबाड कोल्हा असतो आणि एक भला मोठा भोपळा सुद्धा असतो. ही सर्व मंडळी मुलांच्या लेखी खरोखरच अस्तित्वात असतात!आजी-आजोबा हा गोष्टी मिळवण्याचा मुख्य स्रोत! त्यानंतर रात्री गोष्टी ऐकत ऐकत झोपण्यासाठी आई लागते. बाबा लागतात.

या गोष्टीतल्या पात्रांमधल्या “म्हातारी” या पात्राबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे! वेगवेगळ्या गोष्टींतून ही म्हातारी येते. गोष्टी निरनिराळ्या असल्या, तरी मला म्हातारी नेहमी एकाच रूपातली दिसते. पांढरे शुभ्र केस, तोंडाचं बोळकं, बारिकशी कुडी, कमरेत वाकलेली, हातातली काठी टेकत टेकत तुरुतुरु चालणारी! डोक्यानं तल्लख! “एक होती म्हातारी” हे वाक्य ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर म्हातारीचं हेच चित्र उभं रहातं. म्हातारी आणि भोपळा यांचं नातं अतूट आहे. कुठल्याही मराठी माणसानं म्हातारीची ही विलक्षण कथा ऐकलेली नसेल, हे तर संभवतच नाही! पूर्वी कितीही वेळा ऐकलेली असली, तरी मुलं ही माहीत असलेली गोष्टच पुन्हा पुन्हा सांगायला लावतात! ती म्हातारी, तिची लेक, वाघोबा-कोल्होबा, शिरा-पुरी, तूप-साखर, लठ्ठलठ्ठ होण्याचं खोटं आश्वासन, भला मोठा भोपळा, आणि “म्हातारी बितारी मला नाही ठाऊक –  चल रे भोपळ्या टुण्णुक टुण्णुक” असं म्हणत वाघोबा-कोल्होबाचा पार मामा करून टाकणं — हे सगळं ऐकतांना गुदगुल्या झाल्यासारखी खिदळणारी पोरं पाहायला मला आवडतात!! या गोष्टीचा शेवट दोन प्रकारांनी सांगितला जातो. पहिल्या प्रकारात वाघोबा-कोल्होबाच्या हातावर तुरी देऊन भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणून पोचवतो, असा शेवट केला आहे. दुसऱ्या प्रकारात, म्हातारी राखेच्या ढिगाऱ्यावर झोपते, मग वाघ तिला खायला येतो, आणि मग म्हातारी जोरात *???? फुस्स्स्स्!! राख उडते आणि वाघाच्या डोळ्यांत जाते. डोळ्यात राख गेल्यामुळे वाघ डोळे चोळत बसतो आणि भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणतो, असा शेवट केला आहे. मला दुसरा प्रकार ऐकायला खूप आवडायचा! आणि इतर बच्चे कंपनीला सुद्धा! पण एकूणच या म्हातारीने बालवाङ्मयात अढळपद मिळवलं!!!

म्हातारीची इतर रूप पाहतांना देखिल मला मजा वाटते. सांवरीच्या झाडाची, चवरीच्या आकाराची, पांढऱ्या तंतुंची, बुडाला हलकसं बियाणं चिकटलेली, हवेवर तरंगत तरंगत जाणारी म्हातारी पाहायला मला आवडते! सावरीची म्हणजेच शेवरीची शेंग तडकली, की अशा शेकडो म्हाताऱ्या एकदम हवेवर तरंगायला लागतात. त्यांच्या हातात हात घालून मला पण तरंगल्याचा भास होतो! (शेवरीची म्हातारी म्हटल्यावर आचार्य अत्रे यांची आठवण येणे अपरिहार्य आहे!)

सुकं खोबरं किसतांना शेवटी किसला न जाणारा असा चिवट पापुद्रा शिल्लक राहतो. त्याला म्हातारी हे नांव कां पडलं असावं, हे मला एक कोडं आहे. बहुधा मरू घातलेल्या, पण चिवटपणे जिवंत राहून आप्तेष्टांच्या पदरी गाढ निराशा टाकणाऱ्या म्हातारीचा ‘चिवटपणा’ हा गुण या पापुद्र्याला चिकटला असावा आणि हे नामाभिधान त्याला प्राप्त झालं असावं!

साखरेच्या गुलाबी रंगाच्या तंतुंच्या काडीभोवती गुंडाळलेल्या कापसाच्या गठ्ठ्याला म्हातारीचे केस असं कां म्हणतात, हे सुद्धा मला एक कोडंच आहे. आजकाल बऱ्याच खऱ्याखुऱ्या म्हाताऱ्या, मेंदी लावून आपले केस लाल-भगवे करून घेतात. खरं म्हणजे त्यांना म्हातारपणांत सुद्धा गुलाबी रंगाचं वावडं नसावं! म्हातारीचे गुलाबी साखरेचे केस विकणारे, हातात एक हळुवारपणे किणकिणणारी घंटा घेऊन केस विकायला येतात. त्यांच्याकडे गुलाबी रंग मिळू शकेल हे या खऱ्या म्हातार्‍यांना कुणीतरी सांगायला हवं! कदाचित तो म्हातारीचे केस विकणारा, खऱ्या म्हाताऱ्यांच्या खऱ्या केसांना सुद्धा गुलाबी रंग लावून देईल!

पावसाळ्यात गडगडाट झाला, की आकाशातली पीठ दळणारी म्हातारी केवढी असेल, तिचं ते धान्य दळायचं जातं केवढं मोठं असेल, असं कुतुहल लहानपणी वाटायचं! आकाशातून सरसरत खाली पडणाऱ्या पिठाचा पाऊस कसा होतो, हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीतच आहे. पण त्या लहान वयात सगळं खरं खरं वाटायचं!!

म्हातारीच्या टोपलीतली बोरं चोरणाऱ्या कोल्होबाची गोष्ट तर आबालवृद्धांना अतिशय प्रिय! या कोल्होबाला अद्दल घडवायला म्हातारी होते  सज्ज! हुशारच ती!! सणसणीत तापवून, लालबुंद केलेला तवा ती टोपली जवळ ठेवते. आपल्याला बसायला म्हातारीने रंगीत पाट ठेवलाय्, म्हणून कोल्होबा खुश्. ते त्या रसरशीत तव्यावर जरा बुड टेकून बसतात मात्र … आणि??? आणि हाहा:कार!!! कोल्होबा जीव घेऊन पळ काढतात. म्हातारीची हसून हसून पुरेवाट होते. जळके कुल्ले सांभाळत पळणाऱ्या कोल्होबाला म्हातारी खिजवून प्रश्न विचारते …

शहरी भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, खोड मोडली!!

ग्रामीण भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, * भाजली !!

तर अशी ही म्हातारी! लहान मुलांच्या गोष्टींतून, लोकवाङ्मयातून दिसणारी. ती डोक्याने तल्लख आहे, चटपटीत आहे, युक्तीबाज आहे, विनोदी आहे! ती लहान मुलांच्यात रमते आणि मुलं तिच्यात रमतात. मुलांच्या भावविश्वात तिचं स्थान अढळ आहे आणि म्हणूनच …

ही म्हातारी अमर आहे!

?  ?

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares