(पूर्वसूत्र- प्रकाशन समारंभाची सांगता झाली पण त्या आठवणी मात्र इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर मनात आजही तितक्याच ताज्या आहेत! कारण त्या कार्यक्रमाचं चोख नियोजन जसं, तसंच या समारंभाच्या निमित्ताने माझ्या उर्वरित आयुष्याला मिळालेलं एक अनोखं वळणसुद्धा! ते वळण म्हणजे त्या दिवशीच्या पहाटे मला पडलेल्या स्वप्नाचं ‘त्या’च्या कृपेने अकल्पितपणे सत्यात होणारं परिवर्तनच होतं!!)
आणि याला सुरूवात होणार होती मी सोमवारी बॅंकेत पोचल्यानंतर लगेचच!
सोमवारी मी बँकेत गेलो तेव्हा याच सर्क्युलरच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यसाठी वखरेसाहेबांनी मला आणि माझ्या असिस्टंटना तातडीने केबिनमधे बोलावून घेतलं. मी डायरीत सर्व महत्त्वाचे मुद्दे त्या रात्री व्यवस्थित लिहून ठेवले होतेच. त्यामुळे सुरूवातीलाच मी या योजनेचे सर्व नियम व अटीं यांची थोडक्यात माहिती सांगितली. या स्वेच्छानिवृत्ती योजनेला प्रतिसाद म्हणून स्वेच्छानिवृत्ती साठी आता स्टाफमेंबर्सकडून येणाऱ्या अर्जांची अक्षरश: रीघ लागणार होती. त्यामुळे मुदत संपेपर्यंतचा पुढचा संपूर्ण महिना आम्ही याच कामाच्या चक्रात फिरत रहाणार होतो!
या स्वेच्छानिवृत्ती योजनेतून मिळणारे आर्थिक लाभ आणि त्यामुळे उर्वरीत आयुष्यात मिळणारी निश्चिंतता यांचा विचार केला तर कुणालाही मोह पडावा अशीच ही योजना होती. कमीतकमी वीस वर्षे सर्व्हिस झालेलं कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार होतं. आर्थिक लाभ म्हणजे उर्वरीत सर्व्हिस मुदतीच्या ५०% मुदतीचा पगार अतिरिक्त लाभ म्हणून मिळणार होता!
असं असूनही ज्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत ते मात्र इच्छा असूनही या योजनेचा लाभ घेण्याचं धाडस करणं शक्य नव्हतं. तसंच ज्यांच्या विरूध्द कामामधील अनियमिततांमुळे अंतर्गत चौकशी सुरू आहे तेही या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार होते. अशा केवळ नाईलाजाने मागे रहाणाऱ्यांना अचानक निर्माण होणारं स्टाफ शाॅर्टेज, बॅंकांमधे लगेचंच सुरू होणाऱ्या काॅम्प्युटरायझेशनमुळे नवीन भरतीची फारशी शक्यता नसणे या सगळ्यामुळे बॅंकेतलं रूटीन मॅनेज करण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागणार होती! आणि अर्थातच माझी तेव्हा अजून नऊ वर्षे सर्व्हिस शिल्लक असल्याने मीही मागे रहाण्यातलाच एक असल्याने मलाही त्या तारेवरच्या कसरतीची मानसिक तयारी आत्तापासूनच करायला हवी होती,.. पण त्याचं आत्तापासून दडपण घेण्यात अर्थ नव्हता.
या सर्क्युलरबद्दलची आमची चर्चा पुढे तासभर सुरू होती आणि मग चहा येईपर्यंत आपल्या प्रत्यक्ष झोनल आॅफिसमधून कोण कोण स्वेच्छानिवृत्ती स्विकारू शकेल याविषयीचे अंदाज बांधणं सुरू झालं. कारण त्याचा थेट नकारात्मक परिणाम आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या मोजक्या स्टाफलाच सहन करावा लागणार होता! याचं दडपण आमच्यापैकी इतर कुणाला त्याक्षणी फारसं जाणवलं नसलं तरी संपूर्ण झोनल आॅफिसचे सर्वेसर्वा म्हणून वखरे साहेबांना जाणवलं असणारच. कारण याच अनुषंगाने त्यांची आलेली प्रतिक्रिया प्रथमदर्शनी तरी मला बुचकळ्यात टाकणारीच होती.
“खरं सांगू कां? .. मला शक्य असतं ना, तर या योजनेनुसार पहिला अर्ज मी स्वत:च केला असता… ” ते वरवर हसत गंमतीने बोलावं तसं म्हणाले होते!
मीटिंग संपवून मी केबिनमधे आलो ते मनात तरंगत राहिलेले हे सगळे विचार सोबत घेऊनच. अर्थात मी त्यात फार वेळ गुंतून पडणं योग्य नव्हतं. समोरच्या कामांचा निपटारा अधिक महत्त्वाचा होता!
त्यादिवशी सगळी कामं आवरून मी ड्राॅवर लॉक केला आणि ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा मात्र दुर्लक्ष करून मी दूर सारलेले तेच सगळे विचार मनात पुन्हा डोकावू लागले. त्या विचारांचं दडपण नव्हतं, फारशी उत्सुकता नव्हती, चलबिचल नव्हती, तरीही ते विचार झटकून टाकावेत असंही वाटेना. ‘मला शक्य असतं तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यासाठी मीच पहिला अर्ज केला असता.. ‘ असं वखरे साहेब म्हणाले होते. पण आपल्याला ते त्यांच्याइतकं अशक्य कुठं आहे? आजवर मी आणि आरती दोघांनीही आमच्या संसाराची गरज म्हणून तिची नोकरी कधीच गृहीत धरलेली नव्हती. जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा आरती नोकरी सोडून त्या क्षणीच्या कर्तव्यभावनेने घरी राहिली होतीच. आता यावेळी तिची नोकरी आहे म्हणून स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेणं मलाच योग्य वाटत नव्हतं. अर्थात या योजनेमुळे निर्माण झालेल्या असंख्य व्हेकन्सीज् पैकी थोड्या फार जागा तरी तातडीने भरण्याची निकड निर्माण होणार असल्यामुळे पुढचं प्रमोशन प्रोसेस तात्काळ सुरू व्हायची शक्यता होतीच. आणि अर्थातच प्रत्येक स्टेटमधे उच्चाधिकार पदांच्या जागा मोजक्याच असल्याने आऊट ऑफ स्टेट पोस्टिंग देखील अपरिहार्यच होतं! थोडक्यात आमच्यापैकी मागे रहाणाऱ्या जवळजवळ सर्वच अधिकाऱ्यांच्या आयुष्यांत या आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे प्रचंड उलथापालथ होणार होती!!
मनातले हे सगळे उलट सुलट विचार दूर सारून मी दारावरची बेल वाजवली. घरी आई होतीच आणि आरती आणि सलिलही प्रकाशन समारंभाला येताना दोन-तीन दिवसांची सवड घेऊनच आले होते. दार सलिलनेच उघडले. जेवायला बसण्यापूर्वीपर्यंत गप्पांचे सगळे विषय कालच्या प्रकाशन समारंभाबद्दलचेच होते आणि ते अपेक्षितही होतं. या तिघांसाठीही तो एक वेगळा आणि आनंददायी अनुभव होताच!
रात्रीची जेवणं आवरली. गप्पागोष्टी झाल्यावर आई झोपायला गेली. आरती/सलिलला आता लवकरच घडू शकणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींची अंधूक कां होईना कल्पना देणं मला आवश्यक वाटलं.
“तुम्हा दोघांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय.. ” मी म्हणालो. दोघांनीही प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं.
“कां? काळजी करण्यासारखं आहे कां कांही? ” आरतीनं विचारलं.
“आज नाही पण पुढं लवकरच थोडं फार काळजी करण्यासारखं घडू शकेल.. “
“तुम्ही क.. कशाबद्दल बोलताय? “
“बँकेत बरेच फेरबदल होऊ पहातायत. कोणत्याही क्षणी कांहीही घडू शकेल. माझ्यापुरतं बोलायचं तर आमचं प्रमोशन प्रोसेसही लवकरच सुरू होईल आणि त्यानंतरचं पोस्टिंग मात्र आऊट ऑफ स्टेटच असणार हे ठरलेलंच आहे. मला कुठेही जावं लागेल आणि त्यासाठी आपल्या तिघांचीही तयारी हवी. म्हणूनच आज बँकेत याविषयी बोलणं सुरू झाल्यापासून एकच विचार माझ्या मनात येतोय. त्याबद्दलच बोलायचंय. तशीच वेळ आली तर आरती, तू जॉब रिझाईन करून माझ्याबरोबर येशील? ” मी विचारलं. याआधी प्रत्येक वेळी मी कांहीं दिवस एकटा राहून निभावत आलो होतो पण यापुढे वय आणि जबाबदाऱ्या वाढत जातील तेव्हा मला ती ओढाताण नको होती. तिला सौम्य शब्दांत मी कल्पना दिली ती यासाठीच.
आरतीने चमकून माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खरकन् उतरलेला होता न् नजरेत हातून कांहीतरी निसटून जात असल्याची भावना!
” तुम्हाला लगेच कुठं जावं लागणार नाहीये ना? तशीच वेळ आली, तर तेव्हा ठरवूया ना आपण. आत्ताच त्याची चर्चा कशाला? ” बोलतानाही तिचा आवाज भरून आला होता.
” कां? तुला कंटाळा नाही आला नोकरीचा? ” मी विचारलं.
“नाही. मला आवडतो हा जाॅब. पण तरीही वेळ येईल तेव्हा सोडेन ना मी. ” ती त्याच भिजल्या आवाजात म्हणाली.
“पण मला कंटाळा आलाय आता नोकरीचा. मी सोडू? ” मी दोघांचा अंदाज घेत गंमतीने विचारलं.
” होs.. कंटाळा आला असेल तर खरंच सोडा. ” आरतीचा चेहरा खुलला. ती अगदी मनापासून म्हणाली.
आता मात्र त्यांना अधांतरी ठेवणं मला योग्य वाटेना. मी त्यांना नवीन स्वेच्छा निवृत्ती योजनेची सविस्तर माहिती दिली. ते ऐकून तोवर कांही न बोलता लक्षपूर्वक सगळं ऐकत राहिलेला सलिल म्हणाला, “बाबा, तुम्ही ही चांगली संधी खरंच सोडू नका. तुमचं सगळं व्यवस्थित आर्थिक नियोजन आहे, त्यामुळे निवृत्त व्हायचं ठरवलंत तर पुढं तुमचे आत्तापर्यंत शक्य न झालेले सगळे छंद जोपासत रहायचं आणि अर्निंग साठी कांहीही करायचं नाही. तसं असेल तरच.. ” तो म्हणाला. ते ऐकलं आणि मी पूर्ण निश्चिंत झालो. आता जे कांही करायचं ते आरतीची नोकरी आणि पगार गृहीत न धरता जे शक्य असेल तेच करायचं. आणि तेही पूर्ण विचारांती..!
हे मी मनाशी ठरवलं आणि पुढं अल्पावधीतच जे कांही घडलं ते आपसूकच घडत जावं तसंच सगळं.. आणि मी कधी कल्पनाही केली नव्हती अशा अनपेक्षित वळणापर्यंत मी येऊन थबकलो! इथे वळायचं कीं आहे त्याच रस्त्याने पुढं चालत रहायचं? .. माझी क्षणकाळाची ही द्विधा मनोवस्था ओळखल्या सारखा ‘तो’ स्वत:शीच हसत उभाच असणार तिथंच कुठंतरी.. माझ्याजवळ. कारण पुढं जे जे घडत गेलं ते सगळं त्यानेच घडवल्यासारखं! प्रत्येकवेळी मला दिलासा देणारं आणि बरंच कांही एरवी मी कधी कल्पनाही केली नसती असं सगळं..!!
” आता तुमीच सांगा ताई हिला, कार्टी साळंला जायाचं नाई म्हणतीया. हीचा बाप जाताना मला बजावून गेलाय, पोरीला खूप शिकव आनी शानी कर म्हणून. पण ही बया रोज काईनाकाई कारण सांगून, दांडी मारतीया. साळा जवळ तर हाय ” सावित्रीची तक्रार चालूच होती.
सुंद्रीचे गाल फुगले, नाक उडवून ती म्हणाली, “मला चालायचा लई म्हणजे लई कंटाळा येतो बाई.”
सावित्रीचा स्फोट आणि सुंद्रीची पळवाट ऐकून, मी तेव्हां काहीच बोलले नाही. पण दुपारी शेजारच्या उनाडक्या करणाऱ्या पोरांना मी म्हणाले, “चला रे पोरांनो मी तुम्हांला एक गोष्ट सांगते.”
टाईमपास करणाऱ्या सुंद्रीने कान टवकारले आणि ती पळतच मुलांच्या घोळक्यात येऊन बसली. काऊचिऊ, भोपळा म्हातारी गोष्टी ऐकण्याचं वय सरलं होतं मुलांच.
काल वाचनात आलेली ‘चुस्कित’ माझ्या मनांत रेंगाळत होतीच.
“ऐकताय ना मुलांनो? मी तुम्हांला चुस्कीत नावाच्या, तुमच्या एवढ्या मुलीची गोष्ट सांगणार आहे. नऊ वर्षाची चिमूरडी गोड पोरगी आहे ही.. पण-पण-आपल्या सारखे पायच नाहीत हो तिला ”
“ अरेरे! असं कसं झालं? मग ती चालणार कशी? शाळेत जाणार कशी? “ नीरज कळवळला.
माझं गुऱ्हाळ मी पुढे चालूच ठेवलं. “ असं बघा, तुम्ही आम्ही सुंद्री सगळे धडधाकट आहोत. हातपाय दिलेत देवानी आपल्याला. दुर्दैवाने चुस्कितला जन्मतःच पाय नव्हते. ‘अ मची’कडे म्हणजे तिबेटी वैद्याकडे लेह मधल्या डॉ. कडे पण तिचे आई-बाबा तिला घेऊन गेले होते.
“मग झाले कां बरे तिचे पाय? “ मकुची उत्कंठा वाढली होती.
“नाही रे बाळा! उपचाराच्या पलीकडची केस होती ती” माझ्या उत्तरातही दुःख होतं.
दिवसामागून दिवस चालले होते. चुस्कीत बाळ मोठी होत होती. तिच्या दुःखी मनाला तिचे ‘अ बाले’ म्हणजे तिचे बाबा दिलासा देऊन म्हणायचे, ” बेटा चित्र किती सुंदर काढतेस तू, तुझ्या ‘अ मालेने, ‘ आईने शिकवलेली शिवणकला आहे नां तुझ्या अंगात.. ती तू वाढव. ”
बाबांच्या प्रोत्साहनाने तिची उमेद वाढली. तिच्या मनाने पुढचं पाऊल उचललं. खिडकीतून दिसणारं आभाळ, आकाशपक्षी तिला खुणाऊ लागले आणि ओहोळाचं नितळ पाणी तिच्या निळ्या डोळ्यात सळसळू लागलं. उत्साहाचं वारं अंगात शिरलं आणि चुस्कीतने पेन्सिल उचलली. मग काय! कागदावर चित्ररेषा उमटू लागल्या. आणि बोलबोलता निसर्ग चित्र तयार झाली. टाईमपास करीत, इकडे तिकडे वेळ न घालवता त्या पोरीने उत्साहाने आपल्या बोटातली कला कागदावर साकारली.
– – हे सांगताना माझी नजर सुंद्रीकडे गेली. तिची मान खाली गेली होती. “समझनेवाले समझ गये थे l”
मी तिच्याकडे बघत गालांतल्या गालांत हसून म्हणाले, ” मला कुठे देवानी पाय दिलेत असं म्हणून रडत न बसता या पोरीने वेळ वाया न घालवता, शिक्षणही घेतलं आणि आपल्या अंगातले, कलागुण वाढवून उमद्या मनाने ती पुढेपुढे चालतच राहिली. बाबांनी आणलेल्या व्हीलचेअरवर बसून ती आसमंतातला आनंद घेत असताना मे-लेले म्हणजे तिच्या आजोबांकडे येणारा अब्दुल तिचा जिगरी दोस्त झाला होता. कारण त्याने शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून चुस्कीतची शाळेत जाऊन शिकण्याची, परीक्षा देण्याची स्वप्नकहाणी सरांना सांगितली. शालेय जीवनाची चुस्कीतची ओढ अब्दुलने जाणली. त्या हुशार मित्रानी तिच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचे उपायही शोधले.
.. अब्दुलची आणि तिची निर्मळ मैत्री म्हणजे नितळ निसर्गझराच होता. शालेय जीवनाची चुस्कीतची ओढ अब्दुल जाणून होता त्या हुशार मित्रानी तिच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचे नुसते उपायच शोधले नाहीत तर काय सांगू तुम्हाला! तिच्या वर्ग मित्रांनी सळसळत्या उत्साहाने हा उपक्रम, यशस्वी रीतीने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, पारही पाडला होता बरं का मित्रांनो!
ओवीने विचारले, ” म्हणजे काय केलं हो बाई त्यांनी? “
“ सांगते ना! हंसतखेळत ही बालमंडळी म्हणजे तिचे वर्गमित्र एकत्र आले. चुस्कीतच्या घरासमोरच्या ओहोळाच्या बाजूचे दगड धोंडे साफ करून त्यांनी सपाट रस्ता तयार केला. हो! त्यांची गोड मैत्रीण त्या सपाट रस्त्यावरून सहजपणे व्हीलचेअर वरून शाळेत जाणार होती ना! आणि शाळेचं, शिक्षणाचे तिचं स्वप्न पूर्ण करणार होती. सपाट रस्त्यावरून सहजपणे तिला जाता यावं म्हणून, “साथी हाथ बढाना” हे गाणं म्हणत मित्रांनी तिला ही सप्रेम भेटच दिली होती.
कोपऱ्यातली एक चिमणी चिवचिवलीच.. ” पण बाई तो ओहोळ! व्हीलचेअर घेऊन पाण्यावरून कशी काय जाणार चुस्कीत? ”
तिचा प्रश्न ऐकून माझ्या मनाने कौल दिला, ‘ रंगतीय! रंगतीय चुस्कीतची गोष्ट चांगलीच रंगतीय ‘. कारण मुलं कान देऊन ऐकत होती. माझ्या लक्षात आलं बालश्रोतृवर्ग पोहोचलाय चुस्कीतच्या जगात.
सुजाता पद्मनाभन आणि अनुवादक उत्कर्षा महाजन यांना मनोमन हात जोडले. कारण त्यांनीच तर ही सुंदर बालकथा आपल्या कसदार लेखणीतून उतरवलीय.
ती मी वाचली म्हणून तर मला मुलांपुढे मांडता आली होती. सुजाताताईंची कथा सांगताना मला आणखीनच हुरूप आला.
चिवचिवणाऱ्या चिमणीला जवळ घेऊन मी म्हणाले,
“बरं का चिमणे, तुझं म्हणणं बरोबर आहे रस्ता तर छान तयार झाला. एक काम पूर्ण झाले पण ओहोळावरून जायला लाकडी पूल सुद्धा तयार केला तिच्या दोस्तांनी. ”
हे ऐकून सगळ्या चिमुकल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
“ आणि बरं का मित्रांनो! मे-लेलेच्या मदतीने अशा प्रकारे चुस्कितचा शालेय प्रवास महाराणीसारखा व्हीलचेयरवर बसून सुरू झाला. पण दोस्तांनो! आधी मला सांगा मे-लेले म्हणजे कोण हो? “
मुद्दामच मी प्रश्न विचारला होता. मुलांची स्मरणशक्ती जागृत करून ही मंडळी किती गोष्टीशी समरस झाली आहेत हे मला बघायचं होतं. तर काय दणदणीत कोरस आवाज आला… “मेमे -ले म्हणजे आमच्या आजोबांसारखे चुस्कितचे आज्जोबा, हो नां बाई?
– – – मी धन्य झाले, ‘ सुजाता पद्मनाभन’ ह्यांच्या कसदार लेखणीतून, ‘उत्कर्षा महाजन’ ह्यांच्या अनुवादातून सादर झालेली ही भावस्पर्शी बालकथा बालकांच्या नसानसांत भिनली होती. माझ्या सांगण्याचे सार्थक झालं कारण माझ्याजवळ येऊन सुंद्री माझ्या कानांत कुजबजली, “बाई मी पण उद्यापासून शाळेत जाईन.
तिला जवळ घेत मी म्हणाले, ” सुंद्राताई पटलं ना तुम्हाला शाळेचं महत्त्व? अगं शाळा नुसती साक्षर नाही तर परिपूर्ण खऱ्या अर्थाने शहाणं करते. नुसती माहिती नाही तर आपल्या रोजच्या आणि पुढच्या आयुष्याचं महत्त्व पटवून देते. मनातली भीती जाऊन आपल्यात आत्मबळ आणि आत्मविश्वास निर्माण करते. ”
सुंद्रीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मी पुढे म्हणाले “बेटा खूप शिक. ज्ञानाने मनाने मोठी हो. वडिलांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण कर आणि आईचे पांग फेड “
कोपऱ्यात उभी राह्यलेली सावित्री पुढे येऊन माझ्या कानाची लागून म्हणाली, “बाई तुमची मात्रा बरोबर लागू पडली बघा! बाकी सोनारानं कान टोचलेले बरे पडतात म्हणायचे. चला आता आणखी नवीन काम शोधते. तेवढेच चार पैसे मिळतील, पोरीला शिकवाया पदर बांधायाच हवा मला. ”
तिची लगबग, उमेदबघून माझ्याही नजरेत कौतुक उमटलं. मी चुस्कीतचे मनोमन आभार मानले.
‘प्रेमा तुझा रंग कसा’ या वसंत कानेटकारांच्या नाटकामध्ये बबडी जेव्हा स्वतःच्या वडिलांना असे म्हणते तेव्हा ते उत्तरतात..
“रोमियो ज्युलीयटने सुद्धा लग्न करून संसार थाटला असता तर त्यांनाही असंच वाटलं असतं की आपला चॉईसच चुकला”
जगातील अनेक मोठमोठ्या प्रसिद्ध प्रेमकथा सांगितल्या जातात त्या बहुतेक प्रेमकथांमध्ये त्या दोन्ही प्रेमिकांचे लग्न आणि संसार झाल्याचा त्यात उल्लेख नाही.
… आम्ही ४८ वर्षे आमच्या आयुष्याचा सहप्रवास एकत्रितपणे केला. हुssश्शsss…
जवळपास पहिली चाळीस वर्षे आमची (अर्थात दोघांचीही) सुद्धा बबडीच्या मानसिकतेमध्येच गेली.
चाळीसाव्या वर्षानंतर हळूहळू बदल घडत गेला. आता आम्हाला सहवासाची, एकमेकांच्या बरोबरच रहावे अशी जाणीव प्रकर्षाने होऊ लागली… प्रेमाचा साक्षात्कारच झाला म्हणा ना!
बहुधा अजून दोन वर्षे अशीच प्रेमाच्या साक्षात्कारात जातील.
.. त्यापेक्षा जास्त प्रेम उचंबळून येऊ नये म्हणूनच बहुतेक ५० व्या वर्षानंतर, त्याच दोन्ही नवरा बायकोने पुन्हा लग्न करण्याची पद्धत असते असे म्हणे!
ठीक आहे.
… वाट पाहू अजून चार वर्ष.
… मग पुन्हा चॉईस चुकल्याची भावना आणि भांडणे यांना तोंड द्यायचं आहे? नवीन लग्न झाल्यासारखं?
ठीक आहे. त्याआधी लग्नापूर्वीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून घेऊ!
☆ “नाहीतर मला तुझ्याकडे बोलावून घे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एकाच वेलीवर फुललेली दोन फुलं एकमेकांशी आयुष्यभर नातं सांगत राहतात पण दुसरं फूल कोमेजून जाईतोवरच… पण कोमेजून गेलेल्या, मातीच्या कुशीत विरून गेलेल्या फुलाची सय सल म्हणून मनात जागवत दुसरं फूल जेंव्हा सुगंधाविना जगत राहतं… तेंव्हा त्या लतेने तिच्या सर्वच फुलांत तिचे स्वप्राण गुंफलेले आहेत.. असं समजावं!
आजच्या दिवशी मोग-याचा एक फुलोरा निमाला! सुगंधाला फुलांपेक्षा जास्तीचे श्वास देऊन निसर्गाने आपल्यावर मोठेच उपकार केलेले आहेत. सुकलेली सुमनेही कितीतरी वेळ मने उल्हसित करीत राहू शकतात… फक्त ती जपून मात्र ठेवता आली पाहिजेत.
पण काही वेदना, काही दु:खं कधीच जुनी होत नाहीत. सावली निघून गेल्यानंतर भाजणारं ऊन सदोदित प्रखर होत जातं… बाळासाहेबांचं असंच झालेलं आहे!
दीनानाथ, माई, लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ… या एकमेकांशी एका अखंड सूत्रात बांधल्या गेलेल्या फुलांची संख्या स्वरांच्या संख्येएवढी असावी हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही!
लतेच्या देहातून कळ्या प्रकट होतात… आणि फुलत जातात… पण लताच कोसळून पडली की कळ्यांनाही माती जवळ करावीच लागते. या कळ्यांतील हृदयनाथ नावाची कळी पुढे स्वत:च्या सामर्थ्यावर फूल झाली… पण या फुलाने लतेचा हात काही सोडलेला नाही… अगदी आजच्या क्षणापर्यंत.
दीदी आपल्याला सोडून गेल्या त्यापेक्षा त्या हृदयनाथ यांना जास्त सोडून गेलेल्या आहेत… हे बाळासाहेबांचे शब्द सांगून जातात. गेल्या काही महिन्यांपासून दैनिक सकाळच्या रविवार पुरवणीत बाळासाहेब आणि दीदी यांच्यातील संवाद वाचायला… नव्हे ऐकायला मिळतो आहे. एक भाऊ आपल्या बहिणीशी एवढा तादात्म्य पावू शकतो हे अनुभवणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. आई आणि मूल हा स्नेहसंबंध आपल्याला ज्ञात असतो… पण भावा-बहिणीमधली ही भावसरगम दुर्मिळ म्हणावी अशी. मुख्य म्हणजे ही सरगम गद्यात व्यक्त केली जाते आहे.
आपण या संवादात जणू आगंतुक आहोत… वाटतं… हृदयनाथ जगाला काही सांगायला जात नाहीत… ते स्वत:लाच सर्वकाही सांगत आहेत. ते केवळ त्यांच्या दीदीशीच बोलत आहेत… तिच्या आठवणींच्या खोल डोहात अगदी तळापर्यंत जाऊन भावसमाधी लावून बसलेत… बाळासाहेबांचं विदीर्ण झालेलं हृद्य प्रत्येक शब्दात ठळक दिसत राहतं… हे असं प्रेम लाभलेली माणसं असतात… हे जाणवत राहतं.
मायाजाल हे असंच तर असतं… पण त्याची स्वत:चीही एक गोडी आहे. लता दीदी आणि बाळ हृदयनाथ या भावा-बहिणीच्या नात्याची उकल हृदयनाथ मंगेशकर यांच्या लिखाणातून थोडी थोडी होत जाते आहे… पण अजूनही खुद्द हृद्यनाथ यांना सर्वकाही सर्वांशाने व्यक्त करता आलेलं आहे… असं दिसत नाही. फुले वेचू जाता तिकडे दुस-या कळ्यांना बहर आलेला आहे असं होत जातं. मोगरा फुलला या माऊली ज्ञानोबारायांच्या अजरामर शब्दकळ्या सुरात गुंफताना लता-हृद्य यांच्यात झालेला संवाद जणू ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथांचा संवाद वाटतो… इथं दीदी जणू निवृत्ती!
दीदी गेल्या… आणि त्यांचे हृदय मागे राहिले आहे… या हृदयाला आता पुन्हा लतेच्या अंतरंगात शिरून तिच्याशी एकरूप होऊन जाण्याची आस लागलेली आहे…
“तू परत ये… परत येऊ शकणार नसशील… तर मला तुझ्याकडे बोलावून घे… ” हे हृदयनाथांचे शब्द मन हेलावून जातात!
लता मंगेशकरांनी जेवढे आपल्याला दिले तितकेच हृदयनाथ यांनीही दिलेले आहे. अभंगवाणी, मीरेची भजने यांच्या सुरावटी त्यांनीच तर रेखल्या आहेत… त्यांच्या सुरांवरच लता दीदीच्या स्वरांतून मोगरा फुलला आहे! बाळासाहेबांनी दीदीच्या आठवणी सांगत राहाव्यात… शब्दबद्ध करीत राहाव्यात… कारण फूलच लतेचे अंतरंग जाणत असते!
जुलै, ऑगस्ट महिने म्हणजे बारा महिन्यांपैकीच. पण खास, वेगळे महिने. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी. पूर्ण वातावरण छान, सुंदर हिरवेगार, आल्हाददायक प्रत्त्येकच दिवशी काही तरी विशेष आहे, असं वाटत. आणि खरच काही न काही असतही. नागपंचमी, जिवतीची पूजा, श्रावणसोमवार, जन्माष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी, महालक्ष्मी पूजन, आणि बाप्पा चे आगमन ही असतेच. •••••
असे अनेक सणवार. प्रत्त्येकाचे विशेष महत्व. कधी आपल्या मुलांच्यासाठी, तर कधी मुली माहेरी येतात म्हणून. तर कधी घरच्या कान्हा करिता. तर कधी नववधू ची मंगळागौर. शुक्रवारी हळदीकुंकू, तर श्रावणातला सत्यनारायण. बरोबर खाण्यापिण्याची रेलचेल. पूरणपोळी, भजी शुक्रवारी गुळ चणे, सत्यनारायणाचा प्रसाद, राखीचा नारळीभात, कृष्ण जन्माष्टमी नंतरचा गोपाळकाला. मज्जाच मज्जा असते. ••••
महालक्ष्मीची पूजा हा एक मोठा सण. •••••
देशस्थांचे महालक्ष्मी पूजन म्हणजे अगदी प्रशस्त कार्यक्रम /सोहळा. त्या दिवशी सोळा भाज्या, चार पाच कोशिंबीरी, पाच प्रकारची भजी, पडवळ टाकून कढी, ज्वारीची आंबिल, सांजोरया, पूरणपोळी, करंजी, लाडू पात्या यांचा फुलोरा असतोच. हा सगळा कार्यक्रम जेष्ठा आणि कनिष्ठा माहेरी आलेल्या असताना, त्यांच्या स्वागतासाठी. माहेरी आलेल्या मुलींचे कौतुक. स्वागत. दोघी बहिणींचे आगमन त्यांचा पाहुणचार, दागिने साड्या, सर्व तयारी अगदी दहा बारा दिवसांआधी च सुरू होते. त्यांची मुले ही असतातच बरोबर. एक दिवस राहुन आपल्या घरी परत जातात. ••••
प्रत्येक दिवशी एक नवीन कार्यक्रम उत्साह आनंद सगळीकडे. •••••
याच बरोबर १५ ऑगस्ट म्हणजे देशाचा, सर्व नागरिकांचा मोठा सण. राष्ट्रीय सण. सर्व सणांपेक्षा मोठा, एकत्र येऊन साजरा होणारा सण.
तस बघीतल तर राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम दखवायच, म्हणजे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला देश भक्ती गाणी ऐकायची, झेंडावंदन, भाषण ऐकायच एवढच नव्हे.
आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला मिळालेल व्यक्ती स्वातंत्र्य, आपली सुरक्षा, प्रगती हे सर्व आपण दररोज अनुभवतो. मग काय? फक्त या दोनच दिवस देशाचा विचार करायचा का?
आपल्याच घरच उदाहरण घ्या… घरचा प्रमूख कितीही चांगला जबाबदार असला, तरी घरच्या मेंबर्स ची पण काही जबाबदारी असतेच ना.
घरातील चार लोकांची मत एकसारखी नसतात. त्यावर आपापसात चर्चा होते.
कधी कधी तर अगदी गरमागरम चर्चा होते. विषय किती वाढवायचा? कुठे थांबायच? हे कळल तर पुन्हा सर्व एकत्र गुणागोविंदाने नांदतात. एकमेकांना मदत करतात. घरातील शांती, प्रगती याकडे लक्ष देतात. शेजारी जाऊन आपल्या घरच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना आपल्या घरच्या आंतरिक गोष्टींबद्दल चर्चा करायला, आपल्या घरात ढवळाढवळ करायला चांस देत नाही. आपल्या भावाबहिणींबद्दल एकही अशी तशी गोष्ट ऐकायला आपण तयार नसतो. हे नियम घराचे स्वास्थ्य टिकवायला आपण पाळतो. आपला स्वाभिमान जपतो. दररोज लक्ष देतो. बरोबर शेजारचा अडचणीत असला तर लगेच मदतीचा हात पूढे करतो. हे सर्व आपला विवेक, संतुलन आणि शिस्त, परस्पर आदर यामुळे शक्य होत.
जेंव्हा एकाच घरातील चार जण एकाच मताचे नसतात, तेंव्हा देशातील १४० करोड लोकांमध्ये मतभेद असतीलच. फक्त त्यात स्वार्थ् नसावा. देश सर्वोपरी असावा…
मग हाच विचार, हीच भावना, असच वागण, , ही समज आपल्या देशासाठी पण असायला हवी ना. फक्त दोन दिवस नाही, तर दररोजचचच..
* अंतराळातून भारत महत्वाकांक्षी दिसतो. निडर दिसतो, confident दिसतो, येथून भारत गौरवशाली दिसतो म्हणूनच आपला भारत सारे जहां से अच्छा आहे.
त्या दिवशी देशभरातील सर्व नागरिक शुधांशुच्या सुखरूप परत येण्याची वाट बघत होते. प्रार्थना करत होते. त्यांना बघून सर्वांचा ऊर दाटून आला. सर्वत्र टाळयांचा कडकडाट ऐकू आला.
अंतराळातून भारताबद्दल उद्गारलेली ही वाक्य, त्या भावना, त्या आशा, अपेक्षा, इच्छा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत.
मग माझ्या सारख्या सामान्य नागरिकाची जबाबदारी काय? मान्य आहे,… मी किंवा माझ्यासारखे बहुतेक सगळेच अंतराळात जाऊ शकत नाही, सीमेवर देशाचे रक्षण करायलाही जाणे जमणार नाही. प्रत्येकाकडून ही अपेक्षाही नाही आणि गरजही नाही. पण मी काहीच करणार नाही का? फक्त टाळया वाजवेन, हेही अजिबातच बरोबर नाही.
सिंदूर operation च्या वेळेस देशावर आलेल संकट आपण बघीतल. कोविडचा महामारीचा पिरेडही आपण बघीतला.
परिस्थिती चे गांभिर्य कळल्यावर लगेचच आपण नवीन झालेले बदल मान्य केले. कुठलाही हट्ट न करता, तक्रार न करता, जसं जे नियमात बसेल तसं सहर्ष करत गेलो. ही किती मोठी, किती कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या देशाची गरज आहे, फक्त एवढी समज सर्वांना समजली. व त्याप्रमाणे सर्व वागू लागले. सध्या सर्व देव पांढरा कोट घालून दवाखान्यात आहेत हे म्हणणे तेंव्हा आपल्याला पटले. •••••
हा सर्व सणाहुन मोठा असा समजदारीचा, जबाबदारीचा, देशभक्तीचा, परिचय आपण दिला. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यापेक्षा अजून जास्त एक भारतीय आपला परिचय काय देऊ शकतो??. म्हणजे देशाची गरज, आपली जबाबदारी, आपल्या सर्वांना चांगली समजते. सर्वांच्या सहकार्याने देशावर आलेल्या संकटाला आपण नेहमीच सामोरे जातो.
ही समजदारी, देशभक्ति, जबाबदारीने वागण हे नेहमीच असाव ना. त्यासाठी कठीण परिस्थितीतच यायला हवी का?
कोणत्याही सणापेक्षा ‘ राष्ट्रीय सण/प्रश्न ‘ मग तो स्वतंत्रता दिवस असो, किंवा देशावर आलेले संकट असो. सर्वांचे एकत्र येणे, मजबूती ने सामोरे जाणे, ही महत्वाची गोष्ट आहे. देशाला सांभाळणारे बरेच आहेत. फक्त मी काय करावे? व काय करू नये? एवढच समजणे सामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त कठीण परिस्थितीतच नाही, तर नेहमीच आहे. ••••••
देशाचे नागरिक, त्यांचे विचार, शिस्त देशाची संपत्ती असते. देशाचे वैभव, शान असते. असे जबाबदार नागरिक देशाची ढाल असतात.
मी माझ्या घराची शांतता, स्वच्छता सांभाळतो, शेजारयांशी चांगले संबंध ठेवतो. प्रत्त्येकाचा आदर करतो. हीच एक बेसिक गोष्ट सर्वांनी पाळली तर या आंतरिक शक्तिमुळे देशातच काय? देशाच्या बाहेर सुद्धा सुरक्षिततेचे कवच आपोआपच तयार होईल. मग फक्त आपणच नाही तर दूसरे बाहेरचे पण म्हणतील..
ये भारत है। ये भारत के लोग है । सारे जहां से अच्छे है।
म्हणतात ना…
Your greatest weapon is your mind. Train it To make right decisions. To make right selectios. To make right choices.
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ८ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)☆
वेळ…
वेळ (Time) या विषयी अनेकांचे अनेक समज आणि गैरसमज आहेत. हल्ली तर लोकं वेळ मिळत नाही असे न म्हणता वेळ भेटतं नाही असे म्हणताना पाहतो…! काही ठिकाणी ती बोलीभाषा असू शकेल, पण ते खरे बोलतात असे मला आता वाटायला लागले आहे… , कारण लोकांना अनेक गोष्टी करायला वेळ मिळत नाही, पण गर्दी मात्र सर्वत्र आहे…
वाहतुकीच्या माध्यमांमध्ये प्रचंड वैविध्य आणि प्रगती झालेली असताना, दोन शहरांमधील अंतर कमी झालेले नसले तरी या माध्यमांमुळे प्रवासाचा वेळ नक्कीच कमी झाला आहे…
तरीही लोकांना एकमेकांकडे जायला, भेटायला, बोलायला, आपुलकीने चौकशी करायला, शिळोप्याच्या गप्पा मारायला वेळ नाही…
आज इतकी भयानक परिस्थिती आहे की कित्येक दिवसांत लोकांनी आपल्या शेजाऱ्याचे तोंड पाहिलेले नाही… , कित्येक दिवसांत मनुष्य आपल्या प्रियजनांना भेटलेला नाही, कित्येक दिवसांत त्याने मित्रांसोबत टपरीवर किंवा एकमेकांच्या घरी जाऊन चहा प्यायलेला नाही, अशा अनेक न केलेल्या गोष्टी आपल्याला आता आठवतील… , हो न? हातात फोन आहे, म्हणून मनुष्याने दूरच्या माणसांची सोडून देऊ, शेजारच्या माणसाची चौकशी केली आहे असे म्हणणे आता धाडसाचे ठरू शकेल…
पटतंय ना?
पूर्वी आळीमध्ये, चाळींमध्ये गप्पांचे फड पडायचे, मग एकेकाच्या घरातील लाडू, चिवडाचे, पोह्याचे डबे रिकामे व्हायचे, इकडे डबे रिक्कामे होत असताना, तिकडे माणसांची मने मात्र भरून पावायची… , माणसांना माणसांचा उबदार सहवास लाभायचा… , यातून मनुष्याच्या मनात असलेल्या अनेक गोष्टींचा, तणांचा आणि तणावांचा कळतनकळत निचरा व्हायचा…!
– – कारण… तेव्हा वेळ मिळत होता असे नाही, तर लोकं एकमेकांसाठी वेळ काढत होती… , त्यांना माणुसकीतील आनंद अत्यावश्यक वाटतं होता…
… आज लोकं वस्तू, त्यांचा संग्रह आणि त्याची जाहिरात करण्यात आनंद मानत आहेत… , असो…!!
आज आपल्या लक्षात येत आहे की मनुष्य, त्याने स्वतःच निर्माण केलेल्या जीवघेण्या स्पर्धेच्या चक्रव्यूहात आणि वेळेच्या कचाट्यात अडकत चालला आहे… , तो इतका अडकला आहे की तो आता फक्त घडाळ्याच्या काट्याप्रमाणे नुसता पळत चालला आहे… , त्याने जगायचे कधीच सोडून दिले आहे…
अनेकांची वेळ साधता साधता मनुष्य त्याच्यासाठी, खऱ्या स्वार्थासाठी, वेळ काढणे विसरून गेला आहे…
.. बरेच दिवसांत त्याने सूर्योदय पाहिलेला नाही…
.. द्वितीयेच्या चंद्राची कोर पाहिलेली नाही…
.. लेकराला कुशीत घेऊन चांदोमामा दाखवलेला नाही…
.. पतीचा किंवा पत्नीचा हात हातात घेऊन मूक संवाद साधलेला नाही…
.. आईच्या कृश झालेल्या मांडीवर डोके ठेवलेलं नाही…
.. बाबा, तुम्ही खूप कष्ट केलेत आता तुम्हाला हवे ते करा असे म्हटलेले नाही…
कारण…
कारण.. वेळ नाही..
या वेताळाला वेळीच आवर घालून आपण आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढू…
☆ माझी जडणघडण… भाग – – ७७ / २ – ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
ग्रँड कॅन्यन.
(साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.
आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला)
इथून पुढे —
ही सफर अवघड, साहसी असणार याची कल्पना होतीच. संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर गाईड होता. आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स, काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या. मोबाईलला परवानगी होती.
आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.
अमेरिकन, जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.
सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं, या जमीनीच्या पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..
अक्षरश: आम्ही धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय
सरळ अशा शिड्या होत्या. सांभाळून उतरावे लागत होते.
असे सहा टप्पे आम्ही उतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.
आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच. अरुंद, चढउताराची, वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.
कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन
पसरलेलं होतं. धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं
उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं. बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.
चालायचे. वळसे घेत. बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क, ईमो, सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं. तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस. हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते. ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळू वाहून जाते. तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते. इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.
जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो. डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.
जे पाहिलं, अनुभवलंं ते वर्णनातीत होतं.
निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले.
मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.
आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता.
आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले.
फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एकतासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास.
अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट.
रुक्ष, रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य, निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.
ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला, वळणा वळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन)चे उंच वृक्ष. आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय, भूगर्भीय आश्चर्यच.. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्या मातीमुळे तयार झालेली ही नैसर्गिक विवीध आकारांची लाल पांढरी कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली. आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले. आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू…
सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली. जवळ जवळ १४एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे.
इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा (meditation) आणि प्रार्थने साठी येतात. नतमस्तक होतात.
अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे. ही मूर्ती इंडोनेशीयाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे. आणि जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.
त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्या चिंता, विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. इश्वर एक आहे, चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला. त्याच्या चरणी मी लीन झाले. एक अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली…
सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत.
हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर, उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे. हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळजवळ ३००, ३०० यु एस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले.
उंच गाभार्यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.
भिंतींवर, येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात, ” हे! प्रभु! यांना क्षमा कर. कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..! “
मन अंतर्मुख होते.
समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते…
सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं, ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं गाव. सुंदर पायवाटा, कारंजी, विवीध रंगांची फुलझाडे, कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विवीध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना.
अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले…
किती पाहशील तू.. किती घेशील तू अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता.. अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..
आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची (observatory) भेट.
फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्ये ही लाॅवेल वेधशाळा स्थापीत झाली.
१९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास, संशोधकांनी या वेधशाळेत केला.
१९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.
सूर्यमाला, ग्रह तारे, आकाशगंगा, आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे सातत्याने होत असते.
तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.
जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात. आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांडपाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू?
रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले….
बघावं तितकं थोडं.. लिहावं तितकं थोडं..
तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.
*अद्भुत* या शब्दांचा खरा अर्थच या सफरीत मी अनुभवला असे म्हणायला हरकत नाही.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ११ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
विस्तीर्ण, ओसाड माळावरचे सप्तपर्णीचे दोन प्रचंड वृक्ष पाहून रविंद्रनाथांच्या वडिलांनी तो माळ विकत घेतला व तिथे ‘शांतिनिकेतन’ नावाची छोटीशी बंगली बांधली. तिथे ते दोघे, रविंद्रनाथ व त्यांचे वडिल राहू लागले. वडिलांबरोबर रविंद्रनाथांनी हिमालयात भ्रमंती केली. या तीन महिन्यांच्या प्रवासात ते त्यांच्याकडून खूप कांही शिकले. शाळेच्या भिंतींतून मुक्तता झाल्यानंतरच शिक्षणातील आनंद त्यांना गवसला. आणि शांतिनिकेतन च्या निर्मितीचं बीज त्यांच्या मनात रुजले.
शाळा सुरू करण्यासाठी ते १९०१ साली पत्नी व दोन मुलांसह शांतिनिकेतनात आले. तिथला शाळेचा व कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी त्यानी; जग्गनाथपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या हौसेने बांधलेला बंगला विकून टाकला. त्यांच्या पत्नीने आपले सर्व दागिने विकले.
निसर्गाला गुरू मानून, मुलांच्या मनातलं कुतूहल जिवंत ठेऊन, मुलांना समजणाऱ्या भाषेतून, त्यांच्या ओळखीच्या, आवडणाऱ्या प्रसंगवर्णनातून दिलेलं शिक्षण जास्त उपयुक्त ठरेल याबद्दल गुरूदेवांना खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वतः पाठ्यपुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेले ‘सहज पाठ’ आजही प. बंगालमधील शाळांत शिकविले जातात.
‘साधन’ असणाऱ्या पुस्तकांना ‘साध्य’ मानणाऱ्या परिक्षा पद्धतीचा त्यांना तिटकारा होता. त्यांच्या मते बुद्धीचा विकास म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशील मुक्त विचार व जिज्ञासा यांचा विकास!
विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे यावर ते ठाम होते. एखादी व्यक्ती व्यावसायिक शिक्षण किंवा बौद्धिक शिक्षण किंवा मानवता केंद्रित शिक्षण निवडेल किंवा कुणी एखादा ब्रह्मचर्य पाळून आत्मसाक्षात्कार, व्यक्तित्वाचा व चारित्र्याचा विकास हे उद्देश ठेऊ शकतो. यासाठी त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम सुरू केले होते. निरोगी शरीराचे महत्त्व ओळखून योग, खेळ यांचे शिक्षण अनिवार्य हवे अशी त्यांची धारणा होती.
अध्यापन वास्तविक व व्यावहारिक असले पाहिजे; कृत्रिम आणि सैद्धांतिक नको, यावर त्यांचा भर होता. टागोरांच्या मते, व्यक्ती स्वतःला मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकते व योग्यरित्या संवाद साधू शकते. म्हणून त्यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेवर जास्त भर दिला आहे.
ग्रामीण लोकांच्या गरिबीची चिंता त्यांना होती. शिक्षणाद्वारे गरिबी दूर झाली पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी संबंधित क्षेत्रातील विषयात त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर ते कुशल कारागीर बनू शकतात. याचसाठी त्यांनी श्रीनिकेतन ही संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू केली.
—–
☆ गीत : ३१ ☆
“PRISONER, tell me, who was it that bound you? ”
“It was my master, ” said the prisoner. I thought I could outdo everybody in the world in wealth and power, and I amassed in
my own treasure-house the money due to my king. When sleep overcame me I lay upon the bed that was for my lord, and on waking up I found I was a prisoner in my own treasure-house. “
“Prisoner, tell me who was it that wrought this unbreakable chain? ”
“It was I, ” said the prisoner, “who forged this chain very carefully. I thought my invincible power would hold the world captive leaving me in a freedom undisturbed. Thus night and day I worked at the chain with huge fires and cruel hard strokes. When at last the work was done and the links were complete and gunbreakable, I found that it held me in its grip. “
WHEN it was day, they came into my house and said, “We shall only take the smallest room here. ”
They said, “We shall help you in the worship of your God and humbly accept only our own share of his grace”; and then they took their seat in a corner and they sat quiet and meek.
But in the darkness of night I find they break into my sacred shrine, strong and turbulent, and snatch with unholy greed the offerings from God’s altar.