☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०३ आणि १०४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १०३ – – –
हरिकीर्तने प्रीती रामीं धरावी ।
देहेबुद्धि नीरूपणी विसरावी ।
परद्रव्य आणिक कांता परावी ।
येदर्थी मना सांडि जीवीं करावी ।।१०३।।
अर्थ :श्रीरामाबद्दल प्रेमभाव ठेवून हरिकीर्तन आणि निरूपणात देहबुद्धीचा त्याग करून स्वतःला विसरून जावे. परद्रव्य आणि परस्त्री यांचा अगदी मनापासून त्याग करावा.
(हरिकीर्तन – भगवंताचे गुणगान, निरूपण – तात्विक चर्चा, येदर्थी – या कारणाने, सांडि जीवीं करावी –मनापासून त्याग करावा)
विवेचन :या श्लोकात साधकाने कसे वागावे त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण एक लक्षात घेतली पाहिजे की साधक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपण आहोत. आपण त्या मार्गावर वाटचाल करायचे ठरवली म्हणजे आपण साधकच झालो. आपण प्रापंचिक माणसे. आपली देहबुद्धी प्रबळ असते. ही देहबुद्धी कमी होऊन भगवंताकडे आपले चित्त लागावे यासाठी हरिकीर्तन आणि निरूपण यासारखा सहज उपाय दुसरा नाही. हरिकीर्तन करणे म्हणजे भगवंताच्या गुणांचे गुणगान करणे. त्याच्या गुणांचे जेव्हा आपण वर्णन करू तेव्हा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल.
दुसरी गोष्ट म्हणजे निरूपण. म्हणजे तर्काच्या, बुद्धीच्या साहाय्याने भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. त्याच्या अवतारकार्याबद्दल, त्याने जो उपदेश केला आहे त्याबद्दल जाणून घेणे. भक्ती आणि ज्ञान इथे हातात हात घालून चालतात. हृदय आणि मेंदू एकत्र येतात. कोरडे ज्ञान उपयोगाचे नाही. भक्ती जेव्हा ज्ञानासहित केली जाते तेव्हा ती डोळस भक्ती असते. म्हणून समर्थ आपल्याला हरिकीर्तन आणि हरिकथा निरूपण असे दोन्ही करायला सांगतात.
भगवंत निर्गुण आणि सगुण असा दोन्ही आहे. भक्तीच्या शक्तीने तो निर्गुणातून सगुणात येतो. म्हणून साधकाला आधी त्याचे सगुण रूपात प्रेम निर्माण होणे आवश्यक असते. त्यातूनच मग पुढे निर्गुणाकडे जाता येते. सगुणाचे प्रेम निर्माण होण्यासाठी त्याच्या रूप गुणांचे गुणगान करता आले पाहिजे. भगवंताबद्दल तात्विक चर्चा करून त्याच्याबद्दल अधिक जाणून घेता आले पाहिजे. आणि यामध्ये दांभिकता नको. कोणतीही गोष्ट मनापासून असावी.
साधकासाठी आणखी दोन महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या श्लोकात आपल्याला सांगितल्या आहेत. परद्रव्य आणि परस्त्री यांची अभिलाषा धरू नये. तसा विचार मनात देखील आणू नये. या दोन गोष्टी वरवर करायला सोप्या वाटल्या तरी आपल्या देहबुद्धीमुळे त्यावर नियंत्रण मिळवणे फार कठीण जाते. कनक आणि कांता या दोन गोष्टी माणसाला मोहात पडतात. त्यामुळे तो जर परमार्थ मार्गावर वाटचाल करीत असेल तर त्याचा परमार्थ निष्फळ ठरतो. कारण काम, वासना, द्रव्यलोभ या गोष्टी भगवंत प्राप्तीच्या आड येतात. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत हवा असेल तर या गोष्टींचा त्याग करायला हवा. आपल्या संसारापुरते आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा परंतु दुसऱ्याच्या पैशावर डोळा नको. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे… ‘ त्याचप्रमाणे परस्त्री मातेसमान मानावी असं आपली संस्कृती सांगते. परमार्थात तर ही गोष्ट फार महत्वाची आहे.
तेव्हा देहबुद्धी कमी करण्यासाठी परमेश्वराच्या गुणगायनात आणि निरूपणात आपला वेळ व्यतीत करावा. ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो.. जगी तोचि तो मानवी धन्य होतो ‘ हे समर्थांचे वचन लक्षात ठेवावे.
स्वसंवाद
१. मी माझी भक्ती केवळ ‘कोरडी’ किंवा भावनिक करतोय, की संतांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञान आणि निरूपणाच्या साहाय्याने ती ‘डोळस’ करण्याचा प्रयत्न करतोय?
२. “एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत” हे लक्षात ठेवून, मी भगवंताची आस धरताना मनातल्या कनक आणि कांतेच्या (लोभ आणि वासनांच्या) तलवारी बाजूला ठेवायला तयार आहे का?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, माझा प्रपंच चालवण्यासाठी पैसा मिळवताना माझा व्यवहार ‘उत्तम आणि प्रामाणिक’ आहे का? मी नकळत परद्रव्याची अभिलाषा तर धरत नाहीये ना?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनातील ‘देहबुद्धी’ (अहंकार) कमी करण्यासाठी मी दिवसातील काही वेळ तरी हरिकीर्तनात किंवा चांगल्या तात्विक विचारांच्या निरूपणात घालवतो का?
– – – – – – –
श्लोक क्र. १०४ – – –
क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चीत दुश्चीत ते लाजवीते ।
मना कल्पना धीट सैराट धावे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ।।१०४।।
अर्थ : मनुष्य निरनिराळ्या प्रकारे बोलतो. परंतु बोलण्याप्रमाणे त्याचे स्वतःचेच वागणे नसल्याने त्याचे मनच त्याला आतून लाजवते. प्रत्यक्ष आचरण न करता ज्याचे मन नुसत्या स्वैर कल्पना करण्यात दंग असते अशा मनुष्याला परमेश्वर कसा प्रसन्न होईल?
(नानापरी – विविध प्रकारे, चीत – चित्त, दुश्चित – वाईट विचारांनी दूषित झालेले मन, सैराट – स्वैरपणे/बेलगाम, धीट – अनियंत्रित)
विवेचन : व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांचे बोलणे मोठे आकर्षक असते. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्याचा प्रयत्न ते करीत असतात. परंतु ज्यावेळी त्यांच्या परीक्षेचा प्रसंग येतो, तेव्हा अशी माणसे उघडी पडतात. अशी माणसे लोकांना आपल्या बोलण्याने काही काळ प्रभावित करण्यात यशस्वी देखील होतात पण त्यांचे अंतर्मनच त्यांना सांगत असते की तू खोटे बोलतो आहेस, लोकांना फसवतो आहेस. अशा वेळी त्यांचीच त्यांना लाज वाटते. पण हा आतला आवाज ऐकून जे सावध होतात त्यांना प्रगतीची काहीतरी संधी नक्कीच असते. पण त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून जे आपले वागणे सुरूच ठेवतात, अशा व्यक्ती परमेश्वरापासून लांबच जातात. जे स्वतःशीच प्रामाणिक नाहीत, ते परमेश्वराला कसे प्रसन्न करून घेणार?
महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराचे उदाहरण या बाबतीत सांगता येईल. त्यांच्या कीर्तनाला अक्षरश: हजारोंचा जनसमुदाय जमत होता. आपल्या कीर्तनात हे बुवा आपल्या मुलामुलींचे लग्न अत्यंत साधेपणाने करा. अवास्तव खर्च, थाटमाट या सगळ्या गोष्टींना फाटा द्या असे आवाहन करीत. आजची परिस्थिती पाहता सामाजिक बदलाच्या दृष्टीने त्यांची ही सूचना योग्यच होती. कारण सामान्य परिस्थितले अनेक लोक किंवा गरीब शेतकरी मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून अडचणीत येतात. पण ज्यावेळी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी साखरपुड्यालाच एवढा प्रचंड खर्च आणि थाटमाट केला की त्यापुढे श्रीमंतांकडील लग्नही फिके पडावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ‘ म्हणून प्रत्यक्ष आचरणाला अतिशय महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ यांच्यासारखे आमचे अनेक संत जसे बोलले तसेच वागले. म्हणूनच ते अवघ्या जगासाठी वंदनीय ठरले.
त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, ‘ नसत्या कल्पना करू नये. ‘ बऱ्याच वेळा माणूस भूतभविष्याचा विचार करून नको त्या कल्पना करत बसतो. बऱ्याच वेळा या कल्पना मोहाच्या वा विषयांच्या संदर्भात असतात. कल्पनेचा अश्व चौखूर दौडत असतो. कल्पनांना देखील काही एक महत्व निश्चितच आहे. पण त्या वास्तवतेवर आधारित असाव्यात. त्यांच्या साहाय्याने सत्याचा शोध घेण्यात मदत व्हावी. अशा त्या असल्या तर जीवनात अत्यंत उपयोगी ठरतात. पण कोणताही वास्तविक आधार नसताना सैराट म्हणजे सैरावैरा धावणारे मन नको त्या कल्पना करते. त्यातून माणूस नको त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतो. अशा गोष्टींचा सुद्धा संसारात ताप होतो. परमार्थात तर अशा कल्पनांना थारा नाही. समर्थ आधीच्या एका श्लोकात म्हणतात, “जनीं बोलण्यासारिखे चाल बापा। मना कल्पना सोडी संसारतापा॥
म्हणूनच माणसाने बोलण्यासारखे वागावे. आपल्याच वागण्याने आपल्याला लाज उत्पन्न होईल असे कर्म करू नये. चित्त दूषित करणाऱ्या अशा गोष्टींपेक्षा आपले चित्त ईश्वराकडे लावावे.
स्वसंवाद :
१. मी समाजमाध्यमांवर किंवा चार लोकांमध्ये जे मोठे आणि आदर्श विचार मांडतो, माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंग आल्यावर मी स्वतः खरोखरच त्याप्रमाणे आचरण करतो का?
२. “बोले तैसा चाले” या तुकाराम महाराजांच्या सूत्राचा आदर राखताना, माझे अंतर्मन कधी माझ्याच एखाद्या ढोंगी वागण्यामुळे मला आतून ‘लाजवते’ का?
३. भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील चिंता यांमुळे माझे मन ‘सैराट’ (बेलगाम) धावत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालून वास्तवतेच्या भूमीवर आणतो का?
४. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी बाह्य देखावा किंवा कोरडी बडबड करण्यापेक्षा, मी माझे चित्त ‘दुश्चींत’ (दूषित) होण्यापासून वाचवून देवाकडे लावायला तयार आहे का?
छानछान खायला मिळतं. कोडकौतुक अमाप होतं, म्हणूनच लहानपण सगळ्यांनाच कायमच हवंहवंसं वाटत. पण त्याची मजा लुटता येण्यासाठी तुमच्या जवळ निसर्गाची आवड, मित्रपरिवार, घरच्यांचं पाठबळ, आणि तुमच्या तना मनातलं अमाप चैतन्य असावं लागतं. हे फार उशिरा म्हणजे बालपण निघून गेल्यावर कळतं. तेव्हा मन खट्टू होत. अपराधीपणाची भावना निर्माण होते मनात. एक छानशी संधी हकनाक हुकल्याची. तेव्हा कुठलाच पर्याय हातात नसतो… जुन्या आठवणीं आठवण्या शिवाय.
पण ज्यांनी आपलं बालपण घरच्यांचे पाठ शेकणारे धपाटे खाऊन ही मनसोक्त उपभोगलय, अनुभवलय ते भाग्यशाली ठरलेत.
कारण त्यांच्या जवळ आहे आठवणींचा जादुई पेटारा. तो उघडून ते कुठेही केव्हाही आपला स्वतःचा आनंदी कोश निर्माण करून तल्लीनतेने तेथे समधीस्त होऊन, गेल्या दिवसांच्या चित्रफितींचे अवलोकन करत असतात. अशा अनेकानेक चित्र फिती ज्यांच्या पोतडीत ठासून भरून ठेवल्या आहेत त्यांना एकांतवासाने कधीच छळले नाही. तर आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्याची संधी वारंवार उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच आठवणीच्या इलाख्यातले हे मुसाफिर कायम हसतमुख राहून इतरांना ही हसमुख बनवण्यात तरबेज असतात.
प्रत्येकाला आपलं लहानपण आठवत असेल. त्यातला आपला मोलाचा वाटा त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या काळजावर कोरून ठेवला असेल. त्यांच्यावर साठलेली वयाची धूळ जराशी झटकली की कुबेराला ही देता येणार नाही असा अविनाशी खजीना त्याच्या पुढ्यात अवतरतो.
मग त्यातला प्रत्येक दस्तऐवज त्याच्या गतकाळातील वैभवाला त्याच्या समोर प्रस्तुत करतो आणि आनंदी बनवून स्वप्नसश्रृष्टीची सफर घडवून आणतो. हे गतवैभव प्रत्यक्षात उपभोगता येणं दुरापास्त असलं तरी त्याला आठवून पंख लावून भुतकाळाची अविस्मरणीय सफर नक्कीच करता येते. म्हणूनच बालपणाला, लहानपणाला आपापल्या पासून कधीच दूर लोटून देवू नका. त्याच सतत चिंतन मनन तुम्हाला एक नवी ऊर्जा बहाल करून नवचैतन्य बहाल करील यात काही शंका नाही.