मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मळभ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मळभ… ? श्री आशिष  बिवलकर ☆

अर्ध्यावर साथ सोडून गेलीस,

या खुर्चीला तुझी आस आहे |

पदोपदी, श्वासाश्वासात मज,

भोवताली तुझाच भास आहे |

*

सावली होऊन वावरलीस,

अर्पण करून तुझं सारं काही |

आयुष्यभर भरपूर देत राहिलीस,

उरल्या वाटेवर तुझी सोबत नाही |

*

नियती तिचा घाला घालून गेली,

आयुष्यभराचा घायाळ करुनी |

भळभळत्या जखमेवरती फुंकर,

तुझ्या सोबतचे रम्य क्षण स्मरुनी |

*

घराला उरल्यात फक्त भिंती,

ते घरपण आता जाणवत नाही |

किती वेळ एकांतात बाहेरच असतो,

आतुरतेचा उंबरठा खुणावत नाही |

*

स्वागतास नाही रंगीत रांगोळी,

नाही उंबऱ्याच्या बाजूस दिवा |

तिन्ही सांजांना सांग ना गं सखे,

उरलाय फक्त तुझ्या आठवांचा ठेवा |

*

पुढे पडणारं एक एक पाऊल,

न कळत जड वाटू लागलंय |

स्तब्ध एकाच जागी राहून,

ह्रदयात मळभ दाटू लागलंय |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वराज्य…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

दशके लोटली सात परि तसा ‘स्वातंत्र्य’लढा अजुनी गाजे

मला पहा अन् फुले वहा ‘ या मनोवृत्तीचे तण अती माजे ।।

*

स्वतंत्र देशी स्वतंत्र आम्ही, रुचे मना ते करूही धजतो

लोकशाहीचे नायक आम्ही, कोण आम्हाला अडवू शकतो?

*

जो तो आहे स्वतंत्र तर मग का आम्हा चिंता इतरांची

आपले आपण फक्त पहावे, जळोना तिथे भ्रांत दुजांची ।।

*

कामापुरते गोड आम्ही अन् काम संपता पाठ करू

गरज आमची पडेल तेव्हा नन्नाचा पाढाच सुरू ।।

*

सहाय्य करण्या दुजा कुणाला सवडच नाही आम्हा मुळी

अन् सहाय्य ते तरी कसे करावे.. भिन्न की आमची जातकुळी ।।

*

निधर्मी आमचे राष्ट्र म्हणविते.. आम्हास देणे-घेणे नाही

निधर्म म्हणजे धर्म सोडणे.. याविण अर्थच ठाऊक नाही ।।

*

राजधर्म हा असेच शिकवी.. कलियुगातली हीच रिती

नेते म्हणजे राजे येथे.. लोकशाही ती दीन अती ।।

*

राजा आणिक रंकामधली निशिदिनी वाढतीच दरी ती

एकाची नित चाले प्रगती.. दुज्या नशीबी अधोगती ।।

*

मर्कटहाती कोलीत तैसा.. स्वैराचारा जणू परवाना

दुर्दशेस या आम्हीच कारण.. उठवू न शकतो निद्रिस्त मना ।।

उठा उठा हो सामान्यांनो.. उशीर किती हा आधीच झाला

जागे व्हा.. तुम्ही सज्जच व्हा अन् परजा आपल्या मनशक्तीला ।।

*

शक्ती एकजुटीची जाणून.. मिळवा मतभेद नि मातीला

स्वैराचारा शह द्या.. मिरवा जित्याजागत्या लोकशाहीला ।।

मिरवा सशक्त लोकशाहीला

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सु सं वा द!” ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏 “सु सं वा द! ” 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नसावे गोष्टी वेल्हाळ

लावू नये पाल्हाळ,

सत्य वाचे सदा वदावे,

मोजके तेव्हढे बोलावे!

घालून डोळ्यात डोळे

‘संवाद’ तुम्ही साधावा,

खोटे न बोलती डोळे

भाव मनीचा कळावा!

 *

‘संवाद’ साधतांना तुम्ही

नका करू हातवारे,

शब्द मुखातुनी “मधाळावे”

न करीता अरे ला कारे!

 *

स्वरपट्टी सांभाळून

साधा संवाद शांतस्वरे,

पकडून धागा संवादाचा

पोचवा मनीचे भाव सारे!

 *

साधे नियम हे संवादाचे

पाळा साधतांना ‘संवाद’

साध्य होईल ध्येय मनीचे

मिटतील फुकाचे वाद!

मिटतील फुकाचे वाद!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कशास काढावे गळे!! ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कशास काढावे गळे!! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

नाल्यावरती घरे दुकाने

सांडपाण्या अडथळे

नदी शिरली गावात की मग

कशास काढावे गळे!!

*

डोंगर फोडा झाडे कापा

करा रस्त्यांचे जाळे

पडतो पाऊस केंव्हाही मग

कशास काढावे गळे!!

*

थकल्यावरती मनोरंजन

मनरंजनीच रमती खुळे

मोबाईलने पिढी बिघडली

कशास काढावे गळे!!

*

मोह पाडते आभासी जग

वास्तवाचे भान खळे

परस्परांचे कुशल न घेती

कशास काढावे गळे!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवण… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आज घेताना मागोवा

जुनी वाट उजाळावी.

दूर धुक्यातून कोणी

जुनी कथा रेखाटावी.

 *

आज व्हावे डोळाबंद

रंग -रूप पळसाचे.

जागावावे भाव मनी

भोळ्या – खुळ्या शेवंतीचे

 *

अर्धखुल्या पापणीत

आठवणींचा थवा मिटावा.

तिथे त्यांना जोजवीता

मनगाभारा गंधित व्हावा.

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘राग वसंत… राग बहार…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘राग वसंत… राग बहार…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आज वसंत पंचमी आहे. त्या निमित्त दोन कविता

१. राग वसंत व २. राग बहार

🌼राग वसंत 🌼

ऋतूंचा राजा’वसंत’ तर रसांचा राजा शृंगार! वसंतात आधिष्ठान असतं रसराज शृंगाराचं! स्वतः भगवंतानेही विभूतियोगात स्वतःचा उल्लेख ” ऋतुनां कुसुमाकरः” असा केलाय.

असा हा वसंत येतो बहुरंगी, शतगंधी फुलांच्या पायघड्यांवरून. मग काय विचारता, अनंगरंगात विश्व रंगून जात!

राग वसंत 

तोड़ा

 *

मुरलीचे स्वर ऐकुन राधा झाली की बावरी

यमुनातटि हा रंग खेळतो राधा कुंजविहारी

धुंद बसंतातून बहरती रंग रंग फुलपंखी

भिजली राधा, भिजला माधव, भिजली सुरासुरांनी।।

या कुंजावर, त्या कुंजावर।।धृ।।

भ्रमरांचे गुंजारव सुंदर

वसंत फुलला अंगांगावर

जैशी सुमने वृक्षलतांवर

या कुंजावर, त्या कुंजावर।। १।।

 *

कोकिळ बोले आम्रतरूवर

मधुबन नाचे त्या तालावर

रस शृंगारा, येई बहरा

तू तर राणा नऊ रसांवर!

या कुंजावर, त्या कुंजावर।।२।

 *

दिवाकर बुरसे, पुणे

९५५२ ६ २९ २ ४ ५

 🌼🌼🌼🌼

🌼 राग बहार 🌼

वसंत ऋतुत गाईला, वाजवला जाणारा महत्वाचा दुसरा राग म्हणजे “बहार” हा ही शृंगार रसप्रधान राग, फार लोकप्रिय आहे.

🌼 राग बहार 🌼

तव सहवासा आसुसले रे, कर माझा स्वीकार

श्यामला, जुईस आला बहार! ।।धृ।।

 *

फुलल्या वेली, फुले नाचरी

विमल चंद्रिका नभी हासरी

एकांती मज मिठीत घेउनि

घाल गळा कर हार

श्यामला, जुईस आला बहार।।१।।

 *

अधरावरती अधर टेकुनी

करपाशी घे तनू बांधुनी

गात्रागात्रातून घुमू दे

अमृतमय झंकार!

राजसा, जुईस आला बहार।।२।।

 *

रतिमंची ही तनू शिणू दे

उठता किंचित तोल ढळू दे

विशाल वक्षावरी झेलुनी

 दे मजला आधार!

राजसा, जुईस आला बहार।।३।।

 *

अर्धोन्मीलित नेत्र होउ दे

भाळावरले दव ओघळु दे

अन् ओठातुन पुन्हा फुटू दे

 अस्फुटसा सीत्कार!

राजसा, जुईस आला बहार।।४।।

 *

श्वासामध्ये श्वास विरू दे

धुंदीमध्ये रात्र जागु दे

रेंगाळू दे मुक्त कुंतली

 उगाच मृदु गंधार!

राजसा, जुईस आला बहार।।५।।

🙏🏽🙏🏽🙏🏽

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

भक्तीतून तुकारामांना प्राप्त झालेली अधिकार वाणी-

गाथेतील एकेक अभंग वाचत गेले की संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भेटीची अत्यंत तळमळ लागून राहिली आहे, हे आपण पहिल्या तीन भागात पाहिले. अशी अनन्य भक्ती करत असताना पांडुरंगाशी ते कित्येक वेळा मोठ्या अधिकार वाणीने बोलत आहेत याची जाणीव होते.  

पांडुरंगाने त्यांना भेट द्यावी म्हणून या अभंगातील महाराजांचा युक्तिवाद पहा.

ठाईची ओळख ही येईल टाकू टाका सुखी

तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन

ठेवीला तो ठेवा अभिलाषा बुडवावा

मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा 

स्वतःचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराज विनवणी करत आहेत. ते म्हणतात, ” देवा, तुझी आणि माझी फार जुनी ओळख आहे, ती तू विसरू शकत नाहीस. जर विसरलास तर तूच बदनाम होशील. तुझे इमान जाईल आणि माझे पतन होईल. ” यासाठी ते दृष्टांत देतात. म्हणतात, ” एखाद्या जवळ कोणी काही ठेवा ठेवण्यासाठी म्हणून दिला आणि त्याच्याकडून तो काही कारणास्तव बुडाला, तर तो लोभाने बुडाला असेच म्हटले जाईल. म्हणून हे दातारा

 या गोष्टीचा तू विचार कर (आणि मला दूर लोटू नकोस.)

कारे माझा तुज ये कळवळा

असोनी जवळा हृदयस्था

अगा नारायणा निष्ठा निर्गुणा

केला शोक नेणा कंठस्फोट

काय चित्त नाही पावत विश्रांती

इंद्रियाची गती खुंटेचीना

तुका म्हणे का हो धरीयेला कोप

सरले नेणो पाप पांडुरंगा

पांडुरंगा तू माझ्या हृदयात आहेस. इतका जवळ आहेस तरी तुला माझी करुणा का येत नाही?

हे नारायणा, तू देव असून गुणातीत आहेस, मग इतका निष्ठूर का आहेस? घसा फुटेपर्यंत मी रडलो तरी तू माझ्याकडे जराही लक्ष देत नाहीस. माझी विषयासक्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, ती का थांबत नाही? माझे चित्त अजून शांत का होत नाही? देवा तू माझ्यावर रागावला आहेस का?

मधूनच ते विठ्ठलाशी अशा प्रकारे सलगीने बोलतात.

दीनानाथ तुझी ब्रिदे चराचर

घेशील कैवार शरणागता

तू दीनांचा स्वामी आहेस आणि तुला शरण आलेल्या तुझ्या भक्तांचा तू कैवारी आहेस.

पुराणी जे तुझे गरजेची पवाडे

ते आम्हा रोकडे कळो आले

आपल्या दासाचे न साहसी उणे

उभा त्या कारणे राहिलासी

तुका म्हणे तुज भक्तीचे कारण

करावया पूर्ण अवतार*

वेद पुराणात तुझी कीर्ती वर्णिली आहे. तुझ्या दासांवरची संकटे तुला सहन होत नाहीत. तू ती तात्काळ दूर करतोस. त्याच्यासाठी तू सदैव उभा आहेस. भक्ताचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझे अवतार आहेत.

शिवाजी महाराजांवर परचक्रं आली, तेव्हा महाराज विठ्ठलाला अधिकाराने सांगतात.

न देखवे डोळा ऐसा हा आकांत

परपीडे चित्त दुःखी होते

काय तुम्ही येथे नसालसे झाले

आम्ही न देखीले पाहिजे हे

परचक्र कोठे हरिदासांच्या वासे

न देखजे ते देशे राहातिया

तुका म्हणे माझी लाजवीली सेवा

हीन पणे देवा जिणे झाले

देवाला निर्वाणीच्या शब्दात गाऱ्हणे घालतात. विठ्ठला, हा दुःखद प्रसंग मला पाहवत नाही. हे असे का व्हावे? त्यावेळी तू तेथे नव्हतास का?

अशा प्रकारचे दुःख आम्हाला दिसता कामा नये. हरिदासाच्या घरी परचक्र येतेच कसे? मी तुमची इतकी सेवा केली, तिला तुम्ही लाज आणली आणि मलाही न पणे जगणे प्राप्त झाले. — किती ही अधिकार वाणी!

 पुढच्या अभंगात महाराज विठ्ठलाला सांगतात, हरी किर्तन आणि सर्व भक्त तरले जावेत, हे त्याचे खरे फळ आहे. हे जे परचक्र आले आहे, त्यावरून आपणच सगळा उच्छाद मांडला असावा असे वाटते. पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही हे या प्रसंगाने उघड आहे, पण जेथे तुमचे दास राहतात तेथे तुम्ही पण राहता हे मी खरे कसे मानावे? असा परखड प्रश्न महाराज देवाला विचारतात.

पुढील भागात अधिकारवाणीच्या आणखी काही अभंगांचा विचार मांडण्याचा प्रयत्न असेल.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संध्याचित्र… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ संध्याचित्र… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

क्षितिजावर ओठ टेकून

सूर्य बुडाला देत अलिंगन.

कळप गाईंचे परत फिरती

व्याकूळ कंठी नाद किणकिण.

तुळशी पुढती दीप जळावा

शुभंकरोती अर्थ कळावा.

सूरमयी कुणी राग म्हणावा.

यमन शोकी समजून यावा.

ना दिवस ना रात्रही

वेळ कातर भीतर झाली.

दिन अस्तास आज गेला

होय, संध्याकाळ झाली.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कनकभरली फुले… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कनकभरली फुले… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वर्णसंख्या 16 यती 8 व्या अक्षरावर)

उंच उंच डोंगरात झाडेवेली घनदाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||ध्रु||

*

रिमझिम रिमझिम पावसाच्या येती सरी

घाटाघाटातली झाडी वेली त्यात रंग भरी

कनकभरली फुले सोनमोहोराचा थाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||1||

*

हिरव्यात डोकावती पहा देखणी पिवळी 

पर्ण पाचूवर आली कळी कोवळी कोवळी

मधू प्राशनास धावे फुलपाखरु सुसाट

किती सारी साजरी धुकं भरली पहाट ||2||

*

वाटा वळणे वळणे झरे पाण्याचे खेळणे

ताम्रफुले पहुडली त्यांचे मातीशी लोळणे

पायघड्या देखण्याश्या वारा घालतो मोकाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||3||

*

माकडांचे लोट आले इकडे तिकडे पळे

ताम्रशेंगा पितवृष्टी खळखळून ओघळे

माझ्या कवन शेल्याला पितंबरी ताम्र काठ

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||4||

*

कुठे बेफाटला वारा कुठे पाऊस सरारा

ताम्रवृक्ष उंच उंच फुले घागरा गरारा

ओंजळीत सोनफुले शब्दांची वाहती लाट

किती साजरी साजरी धुकं भरली पहाट ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बकुळ… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बकुळ… ?

बकुळीच्या झाडाखाली 

 वेचत असता फुले 

मनाच्या ओंजळीतून 

 खूप काही सांडले 

*

वेचता वेचता फुले 

 लहानपण आठवले

उशीर झाला म्हणून 

 पाठीतले धपाटे आठवले

*

एक फूल माझ्याशी 

 व्यथा मांडून गेले 

तेव्हापासून मनात

 त्याचे दुःख कोरले गेले

*

हल्ली मला उचलून घ्यायचे 

 कष्ट कुणी घेत नाहीत

तसंही मला माळण्यासाठी

 लांब केसही उरले नाहीत

*

दोन वेण्यातली परकरी नात 

 बघता बघता गायब झाली

सर ओवत बसलेली 

 आजीही नजरेआड गेली

*

बरं झालं तू आलीस 

 ओंजळ तुझी भरली 

कुणीतरी आमची 

 दखल आज घेतली

*

माहिती आहे मला 

 माझे जीवन एका दिसाचे 

पण व्रत मात्र आमचे 

 अव्याहत सुगंध लुटायचे

*

रोज झाडावरून ओघळून 

 जमिनीकडे झेपावतो

तेव्हाच आमच्या मनात 

 विचार एक येतो

*

असो जीवन एक दिवसाचे,

 आपण सुगंध लुटावा

प्रत्येकाच्या आयुष्याचा 

 माझ्यापरी बकुळ व्हावा 

*

सुकून गेलो तरीही 

 गंध मागे ठेऊन जातो

प्रत्येकाच्या हृदयात 

 अविरत मी दरवळतो

☆ ☆ ☆ ☆

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares