श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ६२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- उन्हाच्या कडाक्याने बळी घेतलेले ते दोन जीव आणि त्यांच्या अखेरच्या श्वासांचा मूक साक्षीदार असणारा मी…! तो पूर्ण दिवस मृत्यूच्या त्या काळ्या सावल्या मला अस्वस्थ करत राहिल्या. जगणं किती क्षणभंगूर असतं याचा तो ‘जीवघेेणा’ अनुभव यापुढे उगवणारा इथला प्रत्येक दिवस तिथं तग धरून रहाण्यासाठी मला कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या संघर्षाचं सूतोवाचच करतोय असं तिथल्या संघर्षकाळात मला सतत जाणवत रहायचं! )
त्याचा प्रत्यय मला पुढे पावलोपावली येऊ लागला. इथे अकोल्याला येताना मी फक्त एका सुटकेसमधे माझे कपडे आणि रोज लागणाऱ्या वस्तूच घेऊन आलो होतो. पहिले दहा दिवस माझी व्यवस्था बँकेतर्फे लॉजवर झालेली होतीच. तेवढ्या अवधीत ब्रॅंचमधल्या रूटीनची आणि थकीत कर्ज खात्यांसंदर्भात मी तातडीने सुरू करणे आवश्यक असणाऱ्या कारवाईची जुजबी सुरुवात तरी झाली होती. सुदैवाने पहिल्याच दिवशी ब्रॅंचमधे भेटायला येऊन देशपांडेनी माझ्या रहाण्याचा प्रश्न सोडवला होता. त्यामुळे मी लॉज सोडून रेंटल फ्लॅटवर रहायला यायच्या दिवशीच मी आधीच देऊन ठेवलेल्या सूचनेनुसार अहमदनगरच्या सर्व स्टाफने माझं बाकी सगळं घरसामान व्यवस्थित पॅकिंग करून ट्रकमधून पाठवून दिलेलं होतं. त्याची उस्तवार लगेचच करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी ती पॅकींग्ज् एका रूममधे तशीच रचून रूम बंद करून ठेवली. फ्लॅटमधली सगळी स्वच्छता फ्लॅट माझ्या ताब्यात देण्यापूर्वीच देशपांडेनी करून ठेवलेली होती. सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत नगरहून सामान आणणं असो किंवा भाड्याने सोयीची जागा मिळणं असो, ही दोन्ही कामे जी माझ्यासाठी एरवी जिकिरीची ठरली असती ती इतक्या सुरळीतपणे पार पडणे ही ‘त्या’चीच कृपा आहे हा विचार मनात आला आणि मी स्वस्थ झालो. ती स्वस्थताच पुढे येऊ लागलेल्या साध्या साध्या बाबींमधेही येत रहाणाऱ्या असंख्य अडचणींतून मार्ग काढायला मला सहाय्यभूत ठरली होती!
या साध्या साध्या बाबी अगदी दैनंदिन जीवनातल्या आवश्यक अशाच. खिशात पैसे आहेत म्हणजे त्या मिळणारच असं आपण गृहीतच धरत असतो अशाच. आपल्या आवश्यक आणि अपरिहार्य गरजेच्याच. त्या मिळाल्या नाहीत तर आपण तगही धरू शकणार नाही इतक्या अत्यावश्यक! त्यातही अतिशय महत्त्वाच्या म्हणजे भुकेच्या वेळेला पोटभर चांगलं जेवण आणि थकून भागून अंथरूणाला पाठ टेकली की आवश्यक असणारी शांत झोप! मी फ्लॅटमधे रहायला आलो आणि तेव्हापासून नेमक्या याच दोन गोष्टींना महाग झालो!!
तोपर्यंतचं माझं बँकिंग क्षेत्रातलं अठ्ठावीस वर्षांचं करियर किती सुरळीत आणि सरळरेषेत गेलेलं होतं हे इथल्या परिस्थितीला सामोरं जाताना मला नव्याने जाणवू लागलं. रात्रीची शांत झोप, पहाटेचं नियमित फिरणं आणि व्यायाम, रोजची पूजा हे सगळं तेव्हा विनासायास सुरू असायचं. माझं आवरण्यापूर्वीच जेवणाचं ताट घेऊन ठेवलेलं असे आणि मी पानावर बसताच पानात वाढला जाणारा वाफाळलेला भात! खरंतर या सगळ्या किती साध्या गोष्टी, पण त्याच इथे आयुष्यांत प्रथमच हातून निसटून गेल्या आणि त्या साध्या साध्या गोष्टीत लपलेला आनंद आणि समाधान किती मोलाचं होतं हे मला खऱ्या अर्थाने समजलं. त्या तुलनेतलं इथलं माझं आत्ताचं रुटीन तेव्हाचं ते स्वास्थ्य, समाधान, निश्चिंतता देणारं नव्हतंच. खिशात पैसे असूनही दोन वेळेला साधं पोटभर जेवण मिळणंही किती दूरापास्त असू शकतं याचा तो विलक्षण त्रासदायक अनुभव मी प्रथमच घेत होतो! निमित्त झालं ते फ्लॅटमधे रहायला आलो त्या पहिल्या दिवशी एका चांगल्या घरगुती खानावळीमधे मी जेवायला गेलो त्याचं. तिथं सुग्रास जेवणाची अपेक्षा नव्हतीच. तरीही दोन घास कसेबसे खाऊन मला नाईलाजाने उपाशीपोटीच पानावरून उठावं लागलं होतं. कारण भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर सगळंच इतकं तिखट आणि जळजळीत होतं कीं त्या पहिल्या दोन घासातच तोंड अक्षरशः पोळून निघालं. लॉजवर होतो तिथल्या रेस्टॉरंटमधेही हीच परिस्थिती असली तरी तिथे इतर पर्याय उपलब्ध होते. इथं आता रोजचं हे निभवायचं कसं हाच प्रश्न. त्यादिवशी मी बँकेत गेलो ते घरून निघताना दोन भांडी पाणी पिऊन आणि जाताना थोडी फळे विकत घेऊन. त्यानंतरचे दोन-तीन दिवस दोन्ही वेळेला नुसता ताक-भात आणि भूक लागेल तेव्हा मिळतील ती फळं खाऊन मी कसेतरी ओढून काढले. त्याकाळी मोबाईल नव्हते. एक-दोन दिवसाआड रात्री टेलिफोन बूथवर जाऊन घरी मी आठवड्यातून किमान दोन दिवसतरी लँडलाईनवर फोन करायचा असं ठरलं होतं आणि फोन करायचे वार आणि वेळही ठरवून ठेवलेली होती. नेमक्या त्यावेळी सगळं आवरून आरती, सलिल माझ्या फोनची वाट पहात असायचे. इथला कडक उन्हाळा, जेवणाखाण्याची सोय या सगळ्याबद्दल आरती सुरूवातीला खूप काळजीने विचारायची, पण ‘सगळं व्यवस्थित आहे, फारसं त्रासदायक कांही नाही’ असं मोकळेपणाने हसत सांगून मी वेळ मारून न्यायचो. इथल्या न बदलू शकणाऱ्या गोष्टींचे दडपण आणि काळजी तिला सांगून माझा त्रास कमी होणार नव्हताच, उलट त्या दोघांचा जीव तिकडं टांगणीला लागला असता असा विचार मी केलाच शिवाय आता आपणही इथं हतबल न होता सगळं मनापासून स्विकारायचं आणि हसून साजरं करायचं असं मी स्वत:पुरतं ठरवूनच टाकलं. ते निभावणं ही माझी मला स्वतःलाच घ्यावी लागणारी परीक्षाच होती जशीकांही. मुख्य प्रश्न होता रोजच्या दोन वेळच्या जेवणाखाण्याचा. मला अहमदनगरहून आलेल्या माझ्या घरसामानाच्या एका खोलीत मी रचून ठेवलेल्या पॅकिंग्जची आठवण झाली आणि माझ्या अंधारून आलेल्या मनात एक आशेचा किरण चमकून गेला. मी तत्परतेने त्या खोलीकडे धाव घेतली. अहमदनगरला असताना मे आणि दिवाळीच्या सुट्टीत आरती आणि सलिल तिथे रहायला यायचे. कधी वाटलं तर घरी ऐनवेळी कांहीतरी करता यावं म्हणून आम्ही मुद्दाम एक गॅसची सिंगल शेगडी आणि अगदी आवश्यक तेवढी मोजकी भांडीकु़ंडी खरेदी केली होती. इथं तेच सगळं माझ्यासाठी एक वरदानच ठरलं होतं! एकदाही आजारी पडायचं नसेल, ‘बँकेतल्या कामाकडं कणभरही दुर्लक्ष होऊन द्यायचं नसेल तर येईल तसं स्वतः रांधायचं आणि होईल ते होईल तसं खायचं. ‘ असं मी स्वत:लाच बजावलं आणि समोरची पॅकींग्ज खोलून सगळं सामान जागच्याजागी लावायला सुरूवात केली.
हे असं ठरवलं खरं पण ते निभावणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. सामान लावून होईपर्यंतच रात्रीचे नऊ वाजून गेले. त्या रात्री तरी फलाहाराशिवाय दुसरा पर्याय नव्हताच.
हे सगळं असं सविस्तर लिहितानाही आपण हे खरंच तेव्हा कसं निभावू शकलो याचं मलाच आश्चर्य वाटत रहातं.
हे सगळं मला सुसह्य व्हावं यासाठीच घडलेली असावी तशी ध्यानीमनी नसताना त्या रात्री मला दिलासा देणारी एक घटना घडली. तशी साधीच पण माझ्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची!
देशपांडेंच्या त्या फ्लॅटमधे एक बैठं लाकडी देवघरही होतं जे त्या रात्री किचनमधे सामान लावताना मला अचानक प्रथमच लक्षात आलं. देशपांडेचं वास्तव्य सध्या पुण्यात असल्याने देवघरातले देव अर्थातच त्यांच्या पुण्यातल्या बि-हाडी गेलेले. मला ते रिकामं देवघर पाहून कसंतरीच वाटलं. उद्या दत्ताचा एखादा फोटो आणून इथं देवघरात ठेवायचा असंही मी मनोमन ठरवलं आणि त्यालाच पूरक ठरणारी अशी अनपेक्षितपणे घडली ती ही घटना! रात्री झोपण्यापूर्वी जास्तीच्या कपड्यांचं एक पॅकिंग आपण अजून उघडलेलं नाहीय हे माझ्या लक्षांत येताच मी ते उघडून त्यातले कपडे न् इतरही सामान आवरून ठेवायचं ठरवलं. त्यातले कपडे बाहेर काढताना नॅपकिनची एक घडी थोडी जड वाटली म्हणून मी ती घडी उघडून पाहिलं तर आत दत्ताची मूर्ती! ती व्यवस्थित रहावी म्हणून पॅकींग करताना ती अशी घट्ट गु़डाळून ठेवली होती. मी भान हरपून त्या मूर्तीकडे पहातच राहिलो. तळहाताएवढ्या उंचीची. अतिशय शांत, हसतमुख आणि प्रसन्न अशी ती दत्तमूर्ती! माझी इचलकरंजी ब्रॅंचहून ऑडिट डिपार्टमेंटला बदली झाल्यानंतर अचानक प्रवासाची तयारी करायला लागलो असताना एखादा चमत्कार घडावा तशी मला घरपोच मिळालेली तीच ही दत्ताची मूर्ती! ती मूर्ती मिळणं हा तेव्हा आणि आत्ता या रात्रीही एक शुभशकूनच वाटला मला! त्या मूर्तीशी लगडलेल्या कितीतरी जुन्या आठवणी त्या क्षणी माझ्या मनात उभारून वर आल्या आणि त्या आठवणींच्या स्पर्शानेच मनातला सगळा अंधार क्षणात विरून गेला!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈







खूप छान! उत्कंठावर्धक