श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
तस्याः साधनानि गायन्त्याचार्याः ॥ ३४॥
अर्थ : ही परा भक्ति साध्य होण्यासाठी आचार्य त्या भक्तीची अनेक साधने सांगतात.
विवेचन :
भक्ति करून मुक्ति मिळवावी असे मुमुक्षूच्या लक्षात आले की भक्तीचे नवनवीन मार्ग त्याला दिसू लागतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने जितक्या व्यक्ती, तितके भक्तीचे मार्ग असू शकतात.
अनेक आचार्यांनी सांगितलेले अनेक मार्ग आपल्याला माहित आहेत. त्यातला अमुक एक मार्ग तितका चांगला आणि बाकीचे गौण असे म्हणता येत नाही.
मागील सूत्रात भक्ती हेच साधन व भक्ती हेच फल असे सांगितल्यानंतर पुन्हा तिची साधने भक्त्याचार्य सांगतात – नव्हे गातात – असे म्हणण्याचे कारण काय अशी शंका येईल. भक्ती हेच साधन, भक्ती हेच फल जरी म्हटले आहे तरी साधनरूपा भक्ती अंतःकरणात प्रगट होण्याकरिता त्याच्या आड जे प्रतिबंध येतात ते दूर केलेच पाहिजेत. रोगनिवृत्तीकरिता योग्य औषध दिले तरी योग्य अनुपान व पथ्यकारक पदार्थांचे सेवन अवश्यच असते. वेदात, शास्त्रात मोक्षाचे साधन ज्ञान हे सांगितल्यावर त्या ज्ञानाकरिता श्रवण, श्रवणाधिकार प्राप्त होण्याकरिता विवेक-वैराग्यादी व इतर काही अंतरंग व बहिरंग साधने सांगितली आहेतच. फलस्वरूपा भक्तीचे पराभक्तीचे अपराभक्ती हे साधन मानले तरी ती भक्ती प्रत्येक मानवाच्या अंतःकरणात उत्पन्न होतेच असे नाही. ‘नराणां क्षीणपापाना कृष्णे भक्तिर्हि जायते ।’ ‘ज्याची पापवासना नष्ट झाली आहे त्यांच्याच ठिकाणी कृष्णभक्ती उत्पन्न होते. ‘ अशी अनेक वचने आहेत. तसे नसते तर मागील सूत्रात ‘मुमुक्षुभिः’ असे पद घालण्याचे कारण नव्हते. पामर विषयी पुरुष भक्तीकडे वळतच नाहीत. साधने दोन प्रकारची असतात. साध्यप्राप्तीत काही अडथळे आले तर ते दूर करणारी, आणि साध्याला पुष्टी देणारी. प्रतिबंध दूर करणारी दोन साधने पुढील पस्तिसाव्या सूत्रात सांगितली असून पुष्टी देणारी साधने छत्तीस व सदतिसाव्या सूत्रात दाखविली आहेत. तसेच आणखीही एका महत्त्वाच्या साधनाचा अडतीस ते चाळिसाव्या सूत्रात विचार केला आहे तो पुढे येईलच.
सूत्रात “गायन्ति” असे पद आहे ते महत्त्वाचे आहे. साधने सांगतात असे न म्हणता गातात असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामुळे त्या साधनाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. साधनाची स्तुती केल्यासारखे होते. साधनात गोडी आहे हे सिद्ध होते. कारण जेथे गोडी, रुची निर्माण होते तेथेच गायन होते. तसेच साधनात उपदेश किंवा आज्ञा नसून सूचकता असावी असे वाटते. गायन हे श्रोत्यांच्या संतोषाप्रमाणे आत्मतुष्टीचेही साधन आहे असेही सूचित होते. म्हणून ‘गायन्ति’ या पदातून अनेक अभिप्राय प्रगट होतात. हृदयातील ज्या संवेदना असतात त्या जेव्हा प्रेमाचे स्वरूप धारण करून बाहेर पडतात तेव्हा त्यास गायन म्हटले जाते. प्रेमाची बोली संगीत म्हटली जाते व प्रेमाची चाल (गती) तिला नृत्य म्हणतात. हे भक्त्याचार्य भक्तीचे परमप्रेमी आहेत म्हणून भक्तिविषयक साधनाचे गायन करीत असतात.
ज्ञान, कर्म आणि योग याद्वारे भगवंताला कदाचित प्राप्त करता येईल की पण त्यामुळे
भक्तीचे प्रेम लाभलेच असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
भक्तीचा प्रत्येकाच्या अंतरात असते असे म्हणता येईल का? यात थोडा गोंधळ होऊ शकतो, पण प्रत्येकाच्या अंतरी प्रेम आहे का? तर याचे उत्तर हो असेच असेल. प्रत्येकाच्या अंतरी प्रेम भावना आहे. प्रत्येकाला प्रेमाची भूक आहे. आपल्यावर कोणी प्रेम करावे अशी प्रत्येकाच्या सुप्त इच्छा असल्याचे आपल्याला जाणवेल.
कोणाचे आपल्या पतीवर जिवापाड प्रेम असेल तर कोणाचे पत्नीवर, कोणाचे आईवर, कोणाचे बाबावर, कोणाचे बहिणीवर, कोणाचे पाळलेल्या कुत्र्यावर, कोणाचे एखाद्या वस्तूवर, एखाद्या खाद्य पदार्थावर…..,
ही यादी कितीही लांब होऊ शकते….
भक्ति करायची म्हणजे बाकींच्यावर असलेले प्रेम भगवतांकडे वळवायचे…! वाचायला एकदम सोपे पण आचरणात आणायला थोडे जड असे हे सूत्र आहे.
प्रेमाने जग जिंकता येतं असे सर्व संत सांगतात.
आदरणीय श्री. यशवंतराव केळकर यांच्यावर लिहिलेले एक पुस्तक आहे. *”माणूस नावाचे काम”* त्यात एक वचन आहे.
“मनुष्य असो अथवा धातू, दोघेही वितळू शकतात, पण आवश्यक तितकी स्नेहाची ऊर्जा आपल्याला देता आली पाहिजे…! “
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ३४
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






