शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पितृदिन… – लेखक : कचरू चांभारे ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

झिजुनी झुंजुनी राखीतो कुटुंब

पिता, तात, बाप ज्याचे नाव

 जून महिन्याचा तिसरा रविवार ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगळता जगाच्या इतर भागात जागतिक पितृ दिन म्हणून साजरा करतात. भारतीय संस्कृतीत माता व पिता हे दोन्ही तत्त्व संसारात जोडीनेच उल्लेखिले जातात. माता पित्याचे कष्ट व संस्कारच कुटुंबाला यश, कीर्तीच्या वाटा दाखवत असते. आपल्या देशात पुरुषसत्ताक, पितृसत्ताक पद्धती असली तरी मातृत्व भावनेचे जेवढे कौतुक झाले आहे तसे कौतुक बाप भावनेच्या वाट्याला आलेले नाही. कुटुंबाचा कणा म्हणून बापच केंद्रस्थानी असतो. कुटुंबाच्या उभारणीसाठी झिजणा-या, झुंजणा-या पित्याचा सन्मान म्हणून आजचा दिवस पितृ दिन म्हणून साजरा करतात.

 पितृत्वाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची किनार जरी आजच्या दिवसाला असली तरी हा दिवस साजरा करण्याच्या इतिहासाला भयानक दुःखद घटनेची किनार आहे.  ती दुर्घटना आहे पश्चिम वर्जीनिया देशातील फेअरमोंट शहरातील. 6 डिसेंबर 1907 रोजी मोनोंगाह येथील खाणीत काम करताना तब्बल 210 कामगारांचा मृत्यू झाला होता. मृत्यूदेवतेने एकाचवेळी शेकड्याने मानवी देह कवेत घेतले होते. मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते.  नियतीच्या एकाच विपरित फटक्याने कित्येक संसार उघडे पडले होते, मुलंबाळं अनाथ केली होती. या दुर्घटनेतील पित्यांची आठवण म्हणून श्रीमती ग्रेस गोल्डन क्लेटन या माऊलीने 5 जुलै 1908 रोजी पिता दिनाचे आयोजन केले होते. पुढील वर्षीपासून दरवर्षी पितृ दिन साजरा होऊ लागला, तो आजतागायत कायम आहे.

 घराचे मांगल्य आई असते तर बाप हा घराचे अस्तित्व असतो. पुराण कथेतील पिता ते आजही मुलांबाळांसाठी झगडणारा पिता पाहिला की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पित्याची वेशभूषा, पेहराव बदलला असेल पण पितृत्व भावनेची जबाबदारी, काळजी आजही तशीच आहे. गतिमान आधुनिक जीवन काळात आणखी एक ठळक बदल आपल्याला पाहायला मिळतो.  तो म्हणजे पूर्वीचा कडक, कठीण बाप आता पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या ढेकळावानी मऊ झाला आहे.  पूर्वीच्या काळी मुलं आडदांडपणा करू लागली की त्यांना वडिलांना नाव सांगण्याची धमकी मिळायची. मुलगा त्या धमकीने गप्पगार पडायचा. आताचा मुलगा उलट पिता येण्याची वाट पाहत असतो. धोतर, पांढरा लांब बाह्यांचा

 गुडघ्यापर्यंतचा सदरा (नेहरु शर्ट), डोक्याला फेटा किंवा टोपी हा आपल्याकडील पारंपारिक पोषाख; पण आता धोतराची जागा पँटने घेतली, शर्ट शॉर्ट झाले व डोक्यावरील कापडी झाकण जवळपास कालबाह्य झाले आहे. बाप नावाचा पोषाख बदलला पण बाप नावाचे काळीज नाही बदलले.

 प्रसिध्द कवी इंद्रजीत भालेरावांची ‘माझा बाप’ नावाची कविता प्रत्येकाला आपल्याच बापाची जीवनकहाणी वाटते तर दोन तीन वर्षाखाली प्रदर्शित झालेल्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ चित्रपट तर स्वतःसोबतच घडल्यासारखा वाटतो.

 संसारवेल विस्कटून जाऊ नये म्हणून पित्याला अनेक भूमिका साकाराव्या लागतात. लेकरांसाठी बाप असलेला व्यक्ती पत्नीचा पती असतो, आईवडीलांचा मुलगा असतो, रक्तसंबंधाने व मानसिक भावभावनांच्या वेगवेगळ्या नात्याने तो इतरांशीही बांधलेला असतोच. व्यवसाय व नोकरीच्या निमित्तानं तो कर्मयोगी असतो. पैसा हे विनिमयाचे साधन झाल्यापासून व पैसा हाच समाज व्यवस्थेत केंद्रस्थानी आल्यापासून बाप नावाचं नातं निभावणा-या व्यक्तीची फरफट झाली आहे. आर्थिक समस्यांना सामोरे जाताना घराच्या बाहेर अनेक कडू-गोड, अवमानाच्या प्रसंगांना बापास तोंड द्यावे लागते. चिमणा- चिमणीचा सुरेख संसार चालवताना चिमणा नावाचा घरधनी सतत घरट्याच्या सुरक्षेच्या विचारात असतो.

 लेकरांचं संगोपन ही आता सहज प्रक्रिया राहिली नाही.  ती आता शास्त्रीय कला बनली आहे. पाळण्यात बाळ असतानाच त्याच्या पाळण्याबाहेरच्या जगाचे नियोजन पाळण्याभोवतीच करण्याचा आज जमाना आला आहे. बाळाच्या लहानपणी त्याला पित्याच्या पाठीवरून घरातल्या घरात मानवी घोडेस्वारी करायला खूप आवडतं. घोडा घोडा खेळातून मूल पाठीवरून उतरले तरी बापाचं घोडेपण थांबत नाही.  ते सतत धावतं असतं. बाप नावाच्या व्यक्तीस त्याच्या लहानपणी न मिळालेल्या बाबी तो स्वत:च्या लेकराच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करत असतो.  स्वजीवनात आलेले भयंकर कष्ट लेकराच्या भोवताली फिरू नयेत म्हणून तो राखण करत असतो. उत्तम वस्त्र, चांगले शिक्षण, सुदृढ आरोग्य याविषयी आजचा बाप तडजोड करत नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे पण कुवतीतील सर्वोच्च देण्याचा प्रयत्न प्रत्येक पिता करत असतो.

 मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न याबाबतीत तर आजचा पिता कमालीचा सजग आहे. घरात जन्माला आलेल्या चिमणीचे लाडाकौतुकात संगोपन करायचे व हीच चिमणी, दुस-याच्या अंगणाची तुळस म्हणून पाठवायचे कर्म पित्यालाच करायचे असते. हुंदका दाबून, अश्रूंचा बांध रोखून व दुःखाचे आवंढे गिळून पिता आपले कर्तव्य पार पाडत असतो. घराबाहेचा संघर्ष बाप एकट्याच्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत असतो.

 महाभारतातल्या अर्जूनासमोर आप्त स्वकीयच शत्रू म्हणून उभे होते. रणांगणी गोंधळलेल्या अर्जुनाला कृष्णाने उपदेश केला व अर्जुन त्यातून तरला. आजचा प्रत्येक पिता अर्जुन आहे. शत्रू इथे दिसत नाही; पण लढणं मात्र टळत नाही. रोजच तो कुरूक्षेत्रावर उभा आहे. बापाच्या पायी मोडलेला काटा व भळभळ वाहत जाणारं रक्त धरतीत मुरतं, तेव्हाही ते लेकरासाठीच हिरवीगर्द स्वप्न पाहत असतं. वारंवार छाटलेल्या झाडांना योग्यवेळी पुन्हा पालवी फुटते; तसं बाप तत्त्व कितीही वेळा छाटलं गेलं, तरी ते अंकुरणं सोडत नाही. बिजातून अंकुर व अंकुरातून रोपटे व रोपट्यातून झाड तयार होत असताना मूळ बीज नष्ट होत असते. बीजाच्या त्यागावरच वृक्षाचं रुजणं अवलंबून आहे. बिजाप्रमाणेच स्वइच्छा त्यागण्यातच बाप मूल्याचे फलित आहे.

 बदलत्या काळासोबत आजचा पिता खरोखरच खूप प्रेमळ बनला आहे.  काळजीवाहू झाला आहे. काडी काडी जमा करुन पक्षी जसं घरटं निर्माण करतात, तसं पित्यालाही घरटं असतं. स्वतः झिजत झिजत खंगत खंगत, झुंजार आयुष्य जगणाऱ्या, लेकरांच्या चिमुकल्या गोड मिठीत विसावून सुख शोधणा-या सर्व विशाल हृदयी बाप पित्यांना पितृदिनी वंदन करतो.

लेखक : कचरु चांभारे

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted