श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “तुमने बुलाया और हम चले आये…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“अरे मला वर तर आधी घ्याल की नाही! … असा किती वेळ दोन्ही हातांनी या दाराच्या चौकटीवर लोंबकळत राहू म्हणता? … अवघडून अवघडून हाताला रग लागून दुखायला लागलेत! … आणि तुम्हांला सोडून खाली उडी मारून दुसरी कडे जाण्याची दारं सुद्धा बंद झाली आहेत… काय म्हणता मला तुमच्यात पुन्हा सामावून घ्यायला जागाच शिल्लक उरली नाही! … अरे असं कसं बोलता तुम्ही? .. मी तर पहिल्या पासुन तुमच्याच गटाचा ओरीजनल सक्रीय कार्यकर्ता आहे! .. ते मधेच आपल्या गटनेत्या बरोबर तात्विक मतभेदांमुळे आणि माझ्या एकनिष्ठेवर त्यांनी अविश्वास दाखवल्या मुळे मी नाराज होऊन आपला गट सोडून गेलो होतो… आपण गटात नसताना आपली खरी किंमत काय आहे ती गटनेत्याला लवकरच कळून यावी म्हणून तो मी एक डाव खेळलो होतो… पण माझ्या लक्षात आलयं, मी नसल्याने गटाची ध्येय धोरणांची दिशाच भरकटून गेली आहे.. काही आपमतलबी कार्यकर्ते च्या गराड्यात गटनेते अडकले गेले असल्याने त्यांची विवेकबुध्दी चालेनाशी झालेली दिसतेय. गटात अनागोंदी आणि अराजकता माजलीयं… स्वार्थाच्या बजबजपूरीने गट खिळखिळा झालाय त्यामुळे आपल्या संघात आपल्याच गटाचा प्रभाव संपत चाललाय… तुम्ही तर माझ्या मागाहून गटात आलेली कालची मंडळी आहात तुम्हाला कदाचित मी काय बोलतोय हे नीट कळणार नाही… आपले ते जेष्ठ गट प्रतोदांना जरा  विचारून पहा म्हणजे कळेल तुम्हाला… इतकंच कशाला मागच्या सहा महिन्यापासून माझं त्यांचं अनौपचारिक बोलणी होत होती त्यांनीच मला तुमच्या सारख्या जुन्या जाणत्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गटाला गरज आहे तेव्हा स्वगृही परत या म्हणून… कोणत्या वेळी यायचं आहे हे नक्की झालं कि तुम्हाला संकेत करतो तेव्हा असेल तसे आणि जिथे असाल तिथून सगळे पाश तोडून तात्काळ आपल्या गटाकडे या… गट तुमच्या स्वागताला सदैव तयार आहे… सगळी आपलीच घरची मंडळी आहेत.. तेव्हा कुठल्याही मानपानाचा किंतू मनात न आणता आपल्या गटात पुर्नमिलन करून गटाची ताकद वाढवूया… तसा संकेत मला  आजच मिळाला म्हणून तर मी स्वगृही परत आलोय.. इतकं तुम्हाला जीव तोडून सांगतोय तरी मला तुम्ही आत घेण्याच्या ऐवजी दारावरच लोंबकळत ठेवलात.! .. अरे हे काय मी कुणाशी बोलतोय? माझं तुमच्यापैकी कोणी ऐकतयं काय?  आणि तुम्ही सगळे मी इथं दारावर लोंबकळत तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून त्या तिकडे नजर लावून काय बघताय.? .. अहो तो त्यांच्या गटात फार मोठा राडा माजलाय.. मी तिकडूनच बाहेर पडून पुन्हा आपल्या गटाकडे आलोय की… काही नाही हो त्यांच्या गटात फारच सुंदोपसुंदी आहे.. जो तो स्वताला मीच गट नेता म्हणवून घेत बसलाय.. आपापल्या संख्या पाठबळाची ताकद दाखवणं सुरू आहे… सगळा तिथे मनी मसल नि पाॅवरचा गेम चाललाय… गटाची तत्वं, धोरणं, ध्येय वगैरै त्यांनी चुलीत घातलयं… राखरांगोळी करायला निघालेत ते… गटशुध्दीसुचेताच्या नावाखाली जे आंगातूक होते त्यांच्यावरच आगपाखड करून त्यांना गटाच्या बाहेरचा रस्ता दाखवला हो त्यांनी… मलाही… त्यांनाच जर आपली कदर करायची नाही अश्या ठिकाणी न राहिलेलं बरं… शेवटी स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही खऱ्या कार्यकर्त्या च्या अंगी… मग मी ठरवलो गड्या आपला पूर्वीचा गट बरा… पक्षप्रतदोंशी सोसायटी चेअरमन च्या मुलीच्या लग्नाच्या वेळी भेट घेतली आणि  एकूणच आढावा दिला.. त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता तुम्हाला आमचे दरवाजे सदैव उघडे आहेत… या घरं आपलचं आहे… त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तर इथं आलो आणि पाहतो तर दारातच तुम्ही मंडळी माझी वाट अडवून बसतात… हे काही नैतिकतेला धरून बरोबर नाही.. असा अवमान करायला तुमचं धारिष्ट्य होतचं कसं.? . तुम्ही आधी त्या गट प्रतोदांना आधी इथं बोलवा नाही तर मला त्यांच्या कडे घेऊन चला मग काय ते होईल दूध का दूध नि पानी का पानी! … समजलं! … “

” अवं अन्ना का उगा आपलं रगात आटवून घ्यायला लागलासा! … आता इथं जागाच शिल्लाक नाही आणि तुमास्नी कुठं उरावरं घेऊन बसायचं हो… त्याचं कायं अन्ना मी काय सांगतू त्याचा जरा गांभिर्यानं इचार करा तुमच्या फायद्याचचं असणार आहे.. अवो तुमचा तो आमचं प्रेरणास्थान, शक्तीस्थान, स्फुर्ती स्थान, आशास्थान, देवस्थान…. आणि आणि हि सगळी तुमच्या वेळीची स्थानं आताच्या जमान्यात भंगारात निघाली, मातीत गाडली गेलीत बघा… आता तुम्हाला आम्ही फोटूच्या चौकटीत बसवून तुमचा पोवडा गाऊन आमचं राज्य करनार.. आणि ते बघा नव्या पिढीचे नवे शिलेदार म्हंजी, आमचे दादा, आप्पा, भाऊसाहेब, भैय्यासाहेब, तात्यासाहेब, काका, मामासाहेब, युवानेते,… हि मंडळीची फौजच तयार झाली बघा… ते साम दाम दंड नि भेद हि जुनी चौकडी संस्कृती कंडम ठरली इथं आता एके, रिवव्हावलर, कट्टा, खोका या भाषेतच सगळं चालतया… तुमच्या विवेकाची पुंगळीने आता साधा फटाका बी इथं उडत नाही तर धमाकेदार धमाका करायला बाॅम्बच बाळगतात… आणि अन्नसाहेब तुम्ही इथलच ओरीजनल सोताला म्हणवून घेता मगं का हो तुम्ही मधीच बंडखोरी करून ऐनवेळी बाहीर पडलात… अन तिथं बी हाताला काय गावंना, त्यांनी तुम्हालाच लाथा घातल्यावर तवा तुम्हासनी जुनं ते सोनं आठवलं होय… गटप्रतोदाचे पाय धरून (धुवून) पुन्हा गटात यायचा घाट घातलाय काय? .. पण तुम्हासनी सांगतो शेवटी तुम्ही पण गद्दारच निघाला हायसा… आणि इथं गद्दारांना गटात घेतलं जात नाही… त्या गटात राहून तुम्ही काय दिवे लावलेत हे आम्हांला दिसतचं आहे… तवा तुम्ही माझं ऐका आता गप गुमान सोताच्या घरला जावा नि बायका मुलात हरि हरि करत बसा… आता कुठं गटाची सेवा करण्यासाठी जीवाला उगी तोसीश लावून घेताय… इथं तुम्हाला कोणं काळं कुत्रं देखील विचारणार नाही… तुमची धमक संपली आहे आणि जो कमजोर तोच कामचोर या न्यायाने तो पुन्हा शिरजोर होण्यापूर्वीच त्याची अशी उचलबांगडी करायची हिच नवी खेळी गट प्रतोदांनी खेळली आहे…

आणि तसंही म्हणाल तर त्या दुसऱ्या गटाला खिंडार पाडून किती कार्यकर्ते तुमच्या बरोबर आपल्या गटाकडे घेऊन आलात ते तरी सांगा… मगतरी तुम्हाला सन्मानानं गटात सामील करून घेऊ… नाही ना जमलं एव्हढीही तुम्हाला तिथं राहून… मग आमच्या बरोबर गद्दारी करून तुम्हाला नेमकं काय मिळालं ते तरी सांगा.. दिलं का त्यांनी अध्यक्षाचं पद निदान गटप्रतोद पद, गेलाबाजार गटाधिकारी तरी… नाही ना… अहो उपऱ्यांना काही मिळत नसतं फक्त आधार दिला जातो हेच उपकार केले जातात.. ना त्याचं कोणी ऐकत ना त्यांना चारचौघात बोलायला दिलं जातं… आधी गट समजून घ्या समजून घ्या या नावाखाली बरीच वर्षे हिणवत राबवून मात्र घेतलं जातं… होय कि नाही… तुमचा काही याहून वेगळा अनुभव आहे काय… मगं घुसमटलेला जीव बाहेर पडणारच की जुन्या गटाकडे यायला मागणारचं कि… पण मला एक सांगा तुमच्या बरोबर इथं असणारी जी तुम्ही बंडखोरी करून निघून जाऊन परत तुम्ही इथं आल्यावर ती मंडळी तशीच राहतील… का नाही त्यांनी त्याची प्रगती करून घ्यावी.. त्या़ची विचारसरणी का नाही अमंलात आणावी.. त्यांना कधी एक्सपोजर मिळावं… तुमच्या सारखे गुळाला मुंगळे कायमच चिकटून बसलेले असताना त्यांना संधीची वाट मिळताच का नाही त्यांनी आपलं सोनं करून घेऊ नये… अवो अन्ना हि एक झलक तुम्हाला दाखवली आहे.. अजुन हिमनग पाण्यात खोलवर रुतून बसलाय… तुम्हारे बस की बात अब नही रही… तेव्हा तुम्ही आता इथून बऱ्या बोलानं जायचं बघा… नाहीतर कायमचे घालावयचे मार्ग आम्हाला मोकळे आहेत… तो तुम्ही आम्हाला धरायला लावू नका… आणि उद्या तुम्हीच मिडियाला सांगाल गटप्रतोद परदेश दौऱ्यावर गेल्याने अन्नाचां स्व गृह प्रवेश लांबला… आणि हे जर तुम्हाला जमणार नसेल तर तर तुम्हाला उभ्याचे आडवे करण्याशिवाय पर्याय उरणार नाही… कसं? …

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted