मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ आणि मी… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ आणि मी ☆ संगीता कुलकर्णी ☆

(१३ फेब्रुवारी “जागतिक रेडिओ दिन” निमित्त.) 

मी सकाळी वर्तमानपत्र वाचत मोबाईल वर लावलेली गाणी ऐकत असताना ” ‘लग जा गले के फिर ये हंसी रात…’’ या सुमधुर गाण्याने माझे लक्ष वेधून घेतलं.. आज पुन्हा आठवलं नव्यानं…!

या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील माझ्य अनेक आठवणी मात्र जाग्या झाल्या… काही गोष्टी, आठवणी वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात..!

रेडिओचे दिवस किती रम्य दिवस होते ते आणि त्या अविस्मरणीय आठवणी… आठवण एवढ्याचसाठी म्हटलं कारण माझ्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं…! ती जुनी गाणी ऐकताच माझे मन नकळतच जुन्या आठवणीत रमून गेले.. आठवू लागले लहानपणीचे रम्यदिवस.. रेडिओच्या आठवणीचे..!

टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने माझ्यावर अधिराज्य केले किंबहुना तो माझा जीवन साथीच होता म्हणा ना..!

लहानपणापासून माझे व रेडिओ चे अतूट असं एक नात…!

सकाळी विविध भारतीच्या सिग्नेचर ट्यूनच्या आवाजाने जाग यायची.

सकाळची कामे उरकता उरकता ‘संगीत-सरिता’ कानावर पडायचं. हा शास्त्रीय-संगीतावर आधारित छान कार्यक्रम असायचा. एखादा राग निवडून त्याची वैशिष्ट्ये, त्याचे आरोह-अवरोह दिग्गजांच्या तोंडून ऐकायला मिळत. त्या दिवशीचे सन्माननीय अतिथी असलेले शास्त्रीय गायक, वादक त्या रागावर आधारित आपली पेशकश करत असत. त्या काळात या कार्यक्रमातून अनेक दिग्गज प्रभृती पेश झालेत हे विशेष. त्यानंतर त्या रागावर आधारित अशी एखादी धून किंवा चित्रपट गीत ऐकवलं जाई… रेडिओ सिलोन’ वरचा ‘पुराने फिल्मों के गीत’ हा कार्यक्रम…! “फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने..! या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा सिलसिला…!

ऐकलेल्या गाण्यांचा कैफ मनावर ताजा असतानाच प्रादेशिक संगीत, हवामहल, चित्रलोक, भुले बिसरे गीत, भावसरगम, फिल्मसंगीत इ. अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांची रेलचेल.. अभ्यासातल्या कविता चटकन पाठ होत नसत पण रेडिओवरच्या जाहिराती, जिंगल्स आजही लक्षात आहेत. ‘ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं…’, ‘रंग जमाता है कोकाकोला…’, ‘पापा पापा आए, हमारे लिए क्या लाए…’ ‘तंदुरुस्ती की रक्षा करता है …’ वगैरे वगैरे… रेडिओवरचा खास जिव्हाळ्याचा प्रोग्रॅम म्हणजे अमीन सायानीजी यांचा ‘बिनाका गीतमाला’… ‘ जीऽऽ हां… भाईयों और बहनो ” असं आपलेपणाने अँकरिंग करणारे अमीन सयानजी केक पायदान पेश करत.. बिनाका गीतमालाचा कार्यक्रम म्हणजे गाण्यांची मेजवानीच…! गाण्यांशी माझं भावविभोर विश्व निगडीत होतंच की..! मी कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायची. वर्षभरातच्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायची.. रेडिओमुळे अनेक गीतांचे गीतकार, संगीतकार, गायक नीट लक्षात रहायचे.

विविधभारती वर गाणे लावण्यापूर्वी अगदी स्पष्ट आणि खणखणणीत आवाजात निवेदक वा निवेदिका सांगायचे.. “आईये, अब सुनते है, आशा भोसले और किशोर कुमार की आवाज में, शैलेंद्र का लिखा गीत, संगीत से सवांरा है एस डी बर्मनने और फिल्म का नाम है… ” किती छान वाटायचं हे ऐकताना..! इतकच काय तर क्रिकेट समालोचनात सर्वात आवडते म्हणजे सुरेश, सरय्या

किती मधाळ बोलणे अन ओघवती भाषा.!

अक्षरक्षः एका मागे एक अमॄतधारांचा वर्षावव..!!

रेडिओवर गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झालेली.. इतकच काय रेडिओमुळे बर्‍याच जुन्या गाण्यांशी माझा दोस्ताना ही झाला होता… ती ‘भुली-बिसरदी यादें’, ‘बेला का फूल’! … विविध भारतीवरील अनेक कार्यक्रम (तेव्हाचे आणि आताचे). कॉलेजात असताना मी ‘साज और आवाज’ खूप आवडीने ऐकायचे. काही जाहिराती तर पाठ झाल्या होत्या. जशा की…

फिनोलिक्स नं आणलं पाणी…

प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल 

असे अजून बरेच काही आहे…

खरंच..! आठवणींचे मोहोळ उठलं..

या रेडिओच कलेच्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. कित्येक कलाकार या रेडिओने घडवलेत. रेडिओवर नेहमी काही ना काही कार्यक्रम होत असत. त्यात नव्या कलाकारांना संधी मिळताच त्या संधीचं सोनं करीत असत. या कार्यक्रमाच्या अमृतमंथनातून अनेक रत्ने गवसलीत… ज्यांचे नाव उच्चारताच आजही माझे हात आदरानं कानाच्या पाळीकडे आपसूकच जातात..!

खरचं… रेडीओला पर्यायच नाही. मग युट्युब असो वा काहीही..! कारण किती तरी सुंदर निवेदने, अनेक सुंदर कार्यक्रम ऐकता येतात रेडिओ वरती… रेडिओ तो रेडिओच…! रेडिओला पर्यायच नाही…!

माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेला पण मध्ये विस्मरणात गेलेला हा रेडिओ,, आता, हवा का रुख देखकर, त्यानं आता नवं रुप धारण केलंय बरं…! . एफ. एम. रेडिओ..!! एफ. एम. आले तेच वाजतगाजत. या एफ. एम. मुळे गाणी ऐकण्याच्या आवडीला पुन्हा खतपाणी मिळालंय. पुन्हा रेडिओ माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग झाल्याचं पाहून मी मनोमन सुखावली..!

माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेला हा रेडिओ माझी व रेडीओची पुनर्भेट म्हटलं तर वावग ठरणार नाही..!

आज आपण टेक्नॉलॉजिमध्ये कितीही पुढे गेलो असलो आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये वैविध्यता आणली तरी ‘रेडिओ’ या श्राव्य माध्यमाची जी जादू आणि विश्वासाहर्ता आहे ती आजही टिकून आहे. रेडिओ हे संवादाचे जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून आजही पाहीले जाते.

ज्या रेडिओने मला गाण्यांचे वेड लावले, जगातील घडामोडींचे अपडेट्स दिले.. या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत..

रेडिओची त्या सुवर्ण कामाची आठवण काढीत मी गुणगुणत राहिले

“दिल ढुंढता है, फिर वही, फुरसत के रात दिन, “..!!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या लहानपणी साधं सरळ आयुष्य होतं. ब्रेकफास्ट म्हणजे फोभा, फोपो किंवा पोहे… अगदी क्वचित कधीतरी रविवारी वडील पाव आणायचे. मग त्या दिवशी आम्हा तिन्ही भावंडांना चहा मिळायचा.

 इतर वेळेस आई सांगायची, ” लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो. “

 यावर का? कशाला? वगैरे प्रश्न आम्ही विचारत नव्हतो. कारण वडीलधारे सांगतात ते बरोबरच असणार ही खात्री होती.

जेवणात पोळी, भाजी, भात, वरण थोडीशी कोशिंबीर. सकाळचं राहिलेलंच रात्री खायचं. त्याच्या जोडीला मुगाची खिचडी नाहीतर डाळ फळ… पानात टाकायचं नाही आणि वाया घालवायचं नाही हा नियमच होता.

त्या काळी सगळेच जण असं साधं सात्विक अन्न खात असल्याने आजारपण कोणाला फारसे नसायचेच.. आणि झाले तर अगदी साधे आजार होत असत. लगेच त्यावर आजीचे घरगुती उपचार सुरू व्हायचे…

पोट दुखण… हा आजार मधून मधून व्हायचा. त्यावर कधी, काय, किती खाल्लंय याचा विचार करून आई आणि आजी कुठलं औषध द्यायचं ते अचूक ठरवायच्या.

कधी ग्लासभर लिंबाच सरबत आजी द्यायची. वर बजावून सांगायची, ” घटाघटा पिऊ नको. थोडं थोडं थांबून घे. “

आता लक्षात येतं.. साखर, मीठ, पाणी म्हणजे ते ओरल सलाईनच असायचं. रात्री थोडंसं दूध घातलेली साबुदाण्याची खीर द्यायची. त्याने दुसरे दिवशी पोट एकदम बरे व्हायचे.

दुसरा इलाज म्हणजे तिखट बाळांतशेपा चावून खायला सांगायची. ते नको म्हटलं की उकळून त्या पाण्यात साखर घालून द्यायची.

ओवा भाजून तो हातावर चोळून लहान मुलांच्या पोटाला चोळायची. त्यानी कुरकुरणारं बाळ शांत झोपायचे.

गरम दुधात तूप घालून द्यायची. त्यांनी पोट मऊ पडतं(म्हणजे काय होत कोण जाणे) असं ती सांगायची. त्या दोघी हे कुठून शिकल्या याच आम्हाला आश्चर्य वाटायचं.

खोबरेल तेल तर बहुऊपयोगी होते. कान दुखला की चार थेंब कानात, लहान मुलांचे पोट दुखलं की कोमट करून ते बेंबीत थोडं थोडं घालायचं. केस चांगले वाढण्यासाठी रविवारी अंघोळीच्या आधी केसांना भरपूर खोबरेल तेल लावायचं. नंतर एक तासाने शिकेकाईनी केस धुवायचे.

थंडीत तेल पायाला लावायचं… तेच आमचं स्क्रीन लोशन असायचं. आणि गंमत म्हणजे त्याचे कुठले साईड इफेक्ट कधी व्हायचे नाहीत.

घसा दुखत असला की लवंग भाजून पूड करायची ती मधात खलून त्याच चाटण करून द्यायची.

सुंठ पूड विकत मिळायची. पण ती महाग असायची. आजी घरीच खलबत्त्यात सुंठ कुटायची. गरम पाण्यात साखर, सुंठपुड घालून ती प्यायला द्यायची. गवती चहा पाण्यात घालून त्याच्यात अजून काही काही घालून त्याचे काढे आम्हाला प्यायला द्यायची.

एवढ्या तेवढ्याला डॉक्टरांकडे जायचं नाही हे ठरलेलं असायचं. ताप आला तर मात्र डॉक्टरांना दाखवायच.

जवळच सिंधूताई आपटे यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे गेलं की त्या आ करायला सांगून जीभ बघायच्या. श्वास आत बाहेर करायला सांगून छाती तपासायच्या. बसं ईतकच… लगेच त्यांच्याकडच्या तयार असलेल्या पांढऱ्या गोळ्यांच्या पुड्या द्यायच्या. सोबत औषधाची बाटली… त्यावर शंकरपाळ्याच्या आकाराचा पांढरा कागद डोस किती घ्यायचा याच्या खुणेसाठी चिटकवलेला असायचा. त्यातल लालसर गोड औषध आम्हाला फार आवडायचं. दोन दिवसात ताप गायबच व्हायचा.

खेळताना भावाचा पाय मुरगळला आणि सुजला होता. आईनी लगेच रक्तचंदनाची बाहुली सहाणे वर उगाळायला घेतली. त्याचा घट्ट लेप भावाच्या पायाला लावला. ” जसजसं वाळेल तसं आकसून सूज आपोआप कमी होईल. “ती म्हणाली आणि खरंच तीन-चार दिवस लेप लावल्यानंतर सूज उतरूनच गेली.

कधी पाय दुखायला लागला की आजी तिळाच तेल लावून चोळायला सांगायची. घसा दुखत असला की गरम हळद दूध ती देत असे.

“गरम तव्यावर फडक गरम करून त्याने छाती शेकली की कफ सुटतो आणि खोकला लगेच बरा होतो. “आजी हे इतकं ठामपणे सांगायची की आम्हाला ते ऐकूनच बरं वाटायला लागायचं.

पाळी आली की पोटात दुखतय म्हंटलं तर आई सांगायची,

“प्रत्येक बाईला त्या दिवसात दुखत असतं. बाईंनी तेवढं सहन करायला शिकायलाच पाहिजे. त्यासाठी औषध घ्यायचं नाही. पुढं बाळंतपणाच्या कळा सोसायला बाईच शरीर तयार होत असतं. ” आईच्या या वाक्याचा अर्थ पुढे फार उशिरा कळला.

सायकल शिकताना गुडघे फुटणार.. हे इतकं गृहीत धरलं होतं की त्याचं काहीच वाटायचं नाही. नुसतं पाण्याने धुऊनही गुडघे बरे व्हायचे.

वर आजी म्हणायची, ” पडो झडो माल वाढो”.

वडिलांची पाठ दुखायला लागली की ते भिंतीजवळ पालथे झोपत. मग मी भिंतीचा आधार घेऊन त्यांच्या पाठीवर ऊभ राहून इकडे तिकडे अस करत चेपुन देत असे. आता हा ऊपचार आठवला तरी गंमत वाटते.

सकाळी झालेला आजार आजीच औषध घेऊन संध्याकाळी एकदम बरा होऊन जायचा. शाळा बुडवली असेल तर आज बाईंनी काय शिकवलं ते विचारायला संध्याकाळी मैत्रिणीकडे पळायच. इतक सोप जगणं होत.

आत्ताही बरं वाटलं नाही की आई आजींची औषधचं आधी मी घेऊन बघते…

त्या औषधात माया, आपुलकी, प्रेम होतं. त्या औषधाने मला बरं वाटणार… ही श्रद्धा पण होती. शरीराला मनाची साथ असल्याने आजार बरे व्हायचे. आईच्या उबदार कुशीत झोपताना आईचा हात कपाळावरून फिरला की निम्म दुखणे तिथेच पळून जायचं…

किती गोड दिवस होते ते…

 म्हणूनच त्या आठवणी आज तुम्हाला वाचण्यासाठी पेटीतून बाहेर काढल्या…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कालगणना आणि दिनदर्शिका… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ कालगणना आणि दिनदर्शिका… ☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतातील कालगणनेचा इतिहास हा केवळ दिवस, महिने आणि वर्षे मोजण्याचा तांत्रिक प्रश्न नसून तो मानवी संस्कृती, धर्म, शेती, राज्यव्यवस्था आणि वैज्ञानिक समज यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. मानवाने ज्या क्षणी ऋतूंचे पुनरावर्तन, चंद्राची कला आणि सूर्याच्या गतीचा अभ्यास सुरू केला, त्या क्षणी कालगणनेची गरज निर्माण झाली. भारतीय उपखंडात ही प्रक्रिया अतिशय प्राचीन काळात सुरू झालेली दिसते. वैदिक काळातच दिवस, रात्र, मास, ऋतू आणि वर्ष यांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेद, यजुर्वेद आणि ब्राह्मणग्रंथांमध्ये चंद्राच्या कलांवर आधारित मासांची आणि सूर्याच्या गतीवर आधारित ऋतूंची सूक्ष्म निरीक्षणे नोंदलेली आहेत. त्यामुळे भारतातील कालगणनेचा पाया हा खगोलशास्त्रीय निरीक्षणांवर आधारित होता, केवळ धार्मिक कर्मकांडापुरता मर्यादित नव्हता.

प्राचीन भारतात पंचांग ही संकल्पना विकसित झाली. पंचांग म्हणजे पाच अंगांवर आधारित कालगणना—तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. यातील तिथी ही चंद्राच्या स्थितीवर आधारित असल्याने भारतीय पंचांग मुख्यतः चांद्र कालगणनेवर आधारित होते. अमावास्या ते पौर्णिमा आणि पुन्हा अमावास्या असा चंद्राचा एक फेरा म्हणजे एक मास अशी संकल्पना रूढ झाली. परंतु केवळ चांद्र मास स्वीकारल्यास ऋतूंचा मेळ बसत नाही, हे भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या लक्षात आले. चंद्रवर्ष हे सुमारे ३५४ दिवसांचे असते, तर सौरवर्ष सुमारे ३६५ दिवसांचे. त्यामुळे दरवर्षी सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी अधिक मासाची संकल्पना विकसित करण्यात आली. यामुळे भारतीय चांद्र-सौर पद्धतीचा जन्म झाला. धार्मिक सण, व्रते आणि विधी चांद्र मासांवर आधारित राहिले, तर ऋतूंची संगती राखण्यासाठी सौर गतीचा विचार करण्यात आला.

ही पंचांग व्यवस्था भारतीय समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली. शेती, लग्ने, उत्सव, यात्रा, राजकीय निर्णय आणि युद्धसुद्धा शुभ तिथी-नक्षत्र पाहूनच ठरवले जात. त्यामुळे पंचांग हे फक्त दिनदर्शिका नसून समाजनियंत्रणाचे आणि सांस्कृतिक सलगतेचे साधन होते. प्रत्येक प्रांतात स्थानिक खगोलशास्त्रज्ञांनी आणि पंडितांनी आपापल्या पंचांगांची निर्मिती केली. त्यामुळे कालगणनेत एकसंघता न राहता विविधता निर्माण झाली. एकाच दिवशी वेगवेगळ्या पंचांगांमध्ये तिथीभेद आढळू लागला. ही विविधता धार्मिक दृष्ट्या स्वीकारली गेली, पण प्रशासकीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या ती अडचणीची ठरू लागली.

जगाच्या इतर भागांतही कालगणनेचा विकास वेगवेगळ्या मार्गांनी झाला. प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरावर आधारित सौर कालगणना विकसित झाली. बाबिलोनियन संस्कृतीत चांद्र-सौर पद्धत होती. ग्रीक आणि रोमन साम्राज्यांत सुरुवातीला चांद्र पद्धतीचा वापर झाला, पण पुढे सौर कालगणनेचे महत्त्व वाढले. रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ. स. पू. ४६ मध्ये ज्युलियन कॅलेंडर लागू केले, जे पूर्णतः सौरवर्षावर आधारित होते. मात्र या कॅलेंडरमध्ये वर्षाची लांबी थोडी जास्त धरली गेल्याने शतकानुशतके जाताना ऋतू आणि दिनांक यांत फरक पडू लागला.

हा फरक दुरुस्त करण्यासाठी १५८२ साली पोप ग्रेगरी तेराव्याने ग्रेगोरियन कॅलेंडर लागू केले. यात लीप इयरची सुधारित पद्धत स्वीकारली गेली. या कॅलेंडरमुळे सौरवर्ष आणि दिनदर्शिका यांचा मेळ अधिक अचूक बसला. सुरुवातीला हे कॅलेंडर केवळ ख्रिस्ती राष्ट्रांतच स्वीकारले गेले, पण व्यापार, वसाहतवाद आणि वैज्ञानिक संवाद यांमुळे हळूहळू ते जागतिक स्तरावर प्रचलित झाले. आधुनिक विज्ञान, उद्योग आणि जागतिक व्यवहारांसाठी एकसमान कालगणना आवश्यक असल्याने ग्रेगोरियन कॅलेंडर आंतरराष्ट्रीय मानक बनले.

भारतावर ब्रिटिश राजवटीत ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर प्रशासकीय पातळीवर सुरू झाला. न्यायालये, महसूल व्यवस्था, शिक्षण आणि लष्करी कारभार यासाठी इंग्रजी दिनदर्शिका वापरली जाऊ लागली. तरीही सामान्य जनतेच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात पंचांगाचे स्थान कायम राहिले. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर प्रश्न उभा राहिला की, राष्ट्रीय ओळख जपणारी पण वैज्ञानिकदृष्ट्या सुसंगत अशी कालगणना कोणती असावी. पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आधुनिक भारत उभारायचा होता. त्याच वेळी भारतीय परंपरेची नाळ तोडायची नव्हती. याच पार्श्वभूमीवर ‘भारतीय राष्ट्रीय कालगणना’ किंवा ‘शक संवतावर आधारित राष्ट्रीय दिनदर्शिका’ तयार करण्याची कल्पना पुढे आली.

या उद्देशासाठी मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. मेघनाथ साहा हे केवळ खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञान आणि समाज यांचा मेळ घालणारे विचारवंतही होते. समितीने विविध भारतीय कालगणनांचा अभ्यास केला. अखेरीस शक संवतावर आधारित सौर कालगणना स्वीकारण्यात आली. या दिनदर्शिकेत चैत्र हा पहिला महिना मानण्यात आला आणि वर्षाची सुरुवात वसंत ऋतूशी जोडली गेली. हे महिने मराठी आणि इतर भारतीय सौर महिन्यांशी साधर्म्य राखणारे होते—चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ही कालगणना पूर्णतः सौर असल्याने ऋतू आणि महिने यांचा मेळ अचूक बसत होता. १९५७ साली भारतीय राष्ट्रीय कालगणना अधिकृतपणे लागू करण्यात आली. सरकारी गॅझेट, आकाशवाणी आणि काही अधिकृत दस्तऐवजांमध्ये तिचा वापर सुरू झाला. मात्र ती सर्वसामान्य जीवनात फारशी प्रचलित झाली नाही. यामागे अनेक कारणे होती.

पहिले कारण म्हणजे जनमानसाची सवय. शतकानुशतके चालत आलेली पंचांग परंपरा आणि ब्रिटिश काळात रुजलेली ग्रेगोरियन दिनदर्शिका या दोन्हींच्या मध्ये राष्ट्रीय कालगणनेला स्वतंत्र सामाजिक अवकाश मिळाला नाही. सामान्यजनांसाठी धार्मिक सणांसाठी पंचांग आवश्यक होते आणि आधुनिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन कॅलेंडर अपरिहार्य होते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रशासकीय अर्धवटपणा. भारतीय राष्ट्रीय कालगणना सक्तीने लागू करण्यात आली नाही. सरकारी कार्यालयांतही तिचा वापर दुय्यम स्वरूपात राहिला. बहुतांश कागदपत्रांत ग्रेगोरियन दिनांकासोबत कंसात शक दिनांक दिला जाई. त्यामुळे लोकांना स्वतंत्रपणे ही कालगणना वापरण्याची गरजच वाटली नाही. शिक्षण व्यवस्थेतही तिचे सखोल शिक्षण देण्यात आले नाही. परिणामी नवीन पिढीला या दिनदर्शिकेशी भावनिक किंवा व्यावहारिक जडणघडण झाली नाही.

तिसरे कारण म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवहार. भारतीय समाजात सण, व्रते आणि उत्सव अजूनही चांद्र तिथींवर आधारित आहेत. दिवाळी, होळी, गणेशोत्सव, एकादशी, शिवरात्र यांसारखे सण चंद्राच्या स्थितीवर अवलंबून आहेत. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका सौर असल्याने ती या सणांची तिथी थेट सांगू शकत नाही. त्यामुळे सामान्य माणसासाठी पंचांग अपरिहार्यच राहिले. राष्ट्रीय कालगणना धार्मिक जीवनाशी जोडली गेली नाही.

चौथे कारण म्हणजे जागतिकीकरण. स्वतंत्र भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार, कूटनीती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला. या सर्व क्षेत्रांत ग्रेगोरियन कॅलेंडर हेच आंतरराष्ट्रीय माध्यम होते. विमानसेवा, बँकिंग, शेअर बाजार, संगणक प्रणाली आणि इंटरनेट या सर्वांनी ग्रेगोरियन दिनदर्शिकाच स्वीकारली. अशा परिस्थितीत एक स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना वापरणे व्यवहार्य वाटले नाही.

या सगळ्या प्रक्रियेमुळे आज आपण एका द्विधा स्थितीत सापडलो आहोत. धार्मिक-सांस्कृतिक जीवनासाठी चांद्र किंवा चांद्र-सौर पंचांग वापरले जाते, तर प्रशासकीय, वैज्ञानिक आणि जागतिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन सौर दिनदर्शिका वापरली जाते. भारतीय राष्ट्रीय कालगणना ही या दोहोंच्या मध्ये अडकून पडलेली आहे. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि भारतीय परंपरेशी सुसंगत असली, तरी तिचा वापर मर्यादित राहिला आहे. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो की, कालगणना ही केवळ तांत्रिक व्यवस्था नसून सामाजिक स्वीकारावर अवलंबून असते. कोणतीही दिनदर्शिका लोकांच्या दैनंदिन गरजांशी, श्रद्धांशी आणि व्यवहारांशी जोडली गेली नाही, तर ती कागदावरच मर्यादित राहते. भारतीय राष्ट्रीय कालगणनेच्या बाबतीत हेच घडले. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असली, तरी सामाजिकदृष्ट्या अपरिहार्य बनू शकली नाही.

आज आपण जी कालगणना स्वीकारली आहे ती मुख्यतः सौर मासावर आधारित आहे, कारण आधुनिक जीवनाला ऋतूंची अचूकता, वेळेची एकसंधता आणि जागतिक सुसंगती आवश्यक आहे. चांद्र कालगणना भावनिक आणि धार्मिक पातळीवर महत्त्वाची राहिली आहे, पण ती आधुनिक प्रशासनासाठी पुरेशी नाही. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका हा एक समन्वयाचा प्रयत्न होता—भारतीय महिने आणि सौर शास्त्र यांचा मेळ घालणारा. मात्र तो प्रयत्न अपूर्ण राहिला असे म्हणावे लागेल. चंद्राच्या कलांपासून सूर्याच्या अचूक गतीपर्यंतचा मानवाचा हा प्रवास म्हणजे अंधश्रद्धेपासून निरीक्षण, गणित आणि विज्ञानाकडे झालेली वाटचाल आहे. प्रत्येक धर्माची कालगणना त्याच्या काळातील गरजांची पूर्तता करत होती. मात्र आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, सौर कालगणना हीच सर्वाधिक अचूक, स्थिर आणि सार्वत्रिक ठरते, तर चांद्र कालगणना ही सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून आजही आपले स्थान टिकवून आहे. भविष्यात या कालगणनेचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते. डिजिटल युगात अनेक कालगणना एकत्र वापरणे शक्य आहे. परंतु त्यासाठी केवळ सरकारी आदेश नव्हे, तर सामाजिक संवाद, शिक्षण आणि सांस्कृतिक पुनर्संवाद आवश्यक आहे. कालगणनेचा इतिहास आपल्याला हेच शिकवतो की वेळ मोजण्याची पद्धत ही मानवी गरजांनुसार बदलत जाते. चंद्रापासून सूर्यापर्यंत आणि स्थानिकतेपासून जागतिकतेपर्यंतचा हा प्रवास म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा आरसाच आहे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ९ वा – – – 

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे |

अति स्वार्थबुद्धी न रे पाप साचे|

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे |

न होता मनासारिखे दुःख मोठे |९|

अर्थ : 

समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात की पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा त्याज्य समजावा. पैशाची हाव सुटली की माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आणि त्यातून पापाचाच संचय होतो. आणि ज्यामुळे पापकर्माची फळे भोगावे लागतात असे कर्म खोटे म्हणजे त्याज्य आहे. स्वार्थाची इच्छा धरणारा माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही की दुःखी होतो.

मागील श्लोकात समर्थांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून सज्जनांना संतुष्ट करावे असे सांगितले आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला दुसऱ्याच्या पैशाचा किंवा संपत्तीचा लोभ ठेवू नये असे सांगत आहेत. पुढीलांचे या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पुढीलांचे म्हणजे पूर्वजांचे असाही अर्थ घेता येतो आणि दुसऱ्यांचे हाही अर्थ या ठिकाणी लागू होतो. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या पिढीसाठीचे. आपल्या पूर्वजांनी कमावलेले धन आयतेच आपल्याला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु अशा प्रकारची अभिलाषा धरली तर आपल्या कर्तृत्वाला फारसा वाव मिळत नाही. माणूस आळशी बनतो आणि अनेक दुर्गुण त्याच्या अंगात प्रवेश करतात. पूर्वजांच्या संपत्तीसाठी (वारसा हक्कासाठी)होणारी भांडणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भानगडी, कोर्टकचेऱ्या आपणा सर्वांना परिचित आहेत.

स्वार्थ कोणाला चुकला आहे? लहान मुलाला सुद्धा आपला स्वार्थ कळतो. त्यामुळे आपली गरज भागेल एवढे जरूर मिळवावे. परंतु गोंधळ होतो तो अती स्वार्थ बुद्धीमुळे. आपल्या चरितार्थासाठी आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा. पण पुढील पिढ्यांसाठी त्याचा संचय करू नये असेही समर्थ आपल्याला सुचवत आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणत, “घरात तीन दिवसांचे अन्न असले म्हणजे चौथ्या दिवसाची चिंता करू नये. ” परंतु प्रत्यक्षामध्ये आपण असे पाहतो की साधारणतः तीन पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असतानाही लोकांना अधिकाधिक संपत्तीची हाव असते.

पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा नको. ते कोणत्याही प्रकारे घेणे म्हणजे एक प्रकारची चोरीच आहे. मग पैसा मिळवायचाच नाही का? प्रापंचिक माणसाला तर पैसा आवश्यकच असतो. अगदी साधू संन्यासी यांना देखील अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता असतेच. मग पैसा कसा मिळवावा? याचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे आहे. अशा पद्धतीने पैसा मिळवला तर तो धर्माला मान्य आहे. सरळमार्गी राहून पैसा मिळवता येत नाही अशा प्रकारची साधारण समजूत आहे. परंतु कष्टाने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवून श्रीमंत झालेल्यांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. पण अशी उदाहरणे आदर्श म्हणून समाजासमोर ठेवली गेली पाहिजेत.

असे म्हणतात की माणसाच्या गरजा पूर्ण करता येतात परंतु हाव पूर्ण करता येत नाही. म्हणून गरजेपुरते असले की माणसाने समाधानी असावे. परंतु तसे होत नाही. म्हणून आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीकडे पहावे असे म्हटले जाते. कारमध्ये फिरणाऱ्या माणसाने मोटरसायकलवर फिरणाऱ्या माणसाकडे पाहून आपण त्यापेक्षा भाग्यवान आहोत असे समजून समाधान मानावे. मोटरसायकलवाल्याने सायकल चालवणाऱ्याकडे, सायकलवर असणाऱ्याने पायी चालणाऱ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे लक्षात येईल. परंतु असे होत नाही. आपण नेहमी उलटच करत असतो. श्रीमंत अतिश्रीमंताकडे पाहत असतो आणि स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अतिस्वार्थ बुद्धीमुळे आपल्याला अधिक हवे असे वाटत असते आणि मग ते कोणत्याही मार्गाने मिळवण्यात काही गैर वाटत नाही. परंतु असे करत असताना आपण पापकर्मांचाच संचय करत जातो. गैरमार्गाने पैसा कमावणारे लोक समाजात सुखाने जगताना दिसतात. ते पाहून आपणही तसे करावे असे वाटणे साहजिक असते. परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार अशा लोकांना देखील आपल्या पापाचा हिशेब द्यावाच लागतो. ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भ्रष्ट नेते एखाद्यावेळी न्यायालयातून निर्दोष सुटतीलाही परंतु नियती हे असे न्यायालय आहे की जिथे आपल्या कर्मांचा योग्य तो हिशेब होतोच. तिथे कोणाचीही सुटका नाही. अधिकाधिक पैसा कमावण्याचा हव्यास लागतो तेव्हा अनेक प्रकारच्या चिंता, दडपण, स्पर्धा यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातूनच मग दडपण, निद्रानाश, अपचन, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या अनेक विकारांना निमंत्रण मिळते. त्यामानाने सरळ मार्गाने वागणारा माणूस खाऊन पिऊन सुखी आणि समाधानी असतो. पैशाची, संपत्तीची आणि सत्तेची हाव सुटलेल्या माणसाला जेव्हा त्याच्या मनासारखे होत नाही तेव्हा मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागते. धनवृद्धीसोबत जर चिंतावृद्धी होत असेल तर काय उपयोग? समर्थांचा इशारा स्पष्ट आहे —

– – द्रव्य मिळव, पण द्रव्याचा दास होऊ नकोस.

– – संपत्ती कमव, पण स्वार्थाचा संचय करू नकोस.

स्वसंवाद : 

  • माझ्या मनात दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल आकर्षण किंवा हेवा आहे का?
  • मी गरज आणि हाव यातील फरक ओळखतो का?
  • पैसा कमावताना माझा मार्ग प्रामाणिक आणि नीतिमान आहे का?
  • अधिकाधिक मिळवण्याच्या धडपडीत माझे समाधान हरवत तर नाही ना?
  • धनवृद्धीबरोबर माझी चिंताही वाढते आहे का?

– – – 

श्लोक १० वा – – – 

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी|

दुःखाची स्वये सांडी जीवी करावी|

देहेदुःख ते सुख मानीत जावे| 

विवेके सदा सस्वरूपी भरावे |१०|

अर्थ:

या श्लोकात समर्थ आपल्याला भगवंतावर प्रेम करायला सांगतात. प्रारब्धामुळे जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्या जाणिवेचा त्याग करायला शिकावे. देहाच्या दुःखाला सुख मानण्याचा अभ्यास करावा. योग्य आणि अयोग्याचा विवेक करून आपले मन सस्वरुपी स्थिर करावे.

प्रेम करणे हा मनुष्यस्वभाव आहे. प्रत्येकाचे कोणावर तरी किंवा कोणत्यातरी वस्तूवर प्रेम असते. कंजूष माणसाचे धनावर प्रेम, विषयलंपट माणसाचे विषयावर प्रेम, कोणाला सत्ता प्रिय असते. असे प्रेमाचे विविध विषय असतात. प्रेमातून आनंद मिळतो परंतु हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो. प्रेमाचा विषय चुकला तर दुःख पदरी पडणारच! मदिरेच्या प्रेमात धुंद होऊन (चित्रपटात दाखवल्याप्रमाणे)देवदास बनण्यापेक्षा भगवंताचे प्रेम लागून त्याचे म्हणजे देवाचे दास होणे कधीही चांगले. या प्रेमातून जो आनंद मिळेल तो चिरंतन असेल. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. ‘

आपण मनुष्य जन्मात आलो आहोत तेव्हा सुखदुःख हे असणारच. परमेश्वराने जेव्हा मानवी अवतार धारण केला तेव्हा त्याला किंवा संतांना देखील सुखदुःखे चुकली नाहीत. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा! आपण सुखाने आनंदतो आणि दुःखाने दुःखी होतो. परंतु या ठिकाणी दुःखाचा त्याग करायला शिका असे समर्थ आपल्याला सांगतात. थोडक्यात असे म्हणता येईल की दुःखाची जाणीवेला आपल्या मनात स्थान देण्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनाकडे जर लक्ष दिले तर दुःख हलके होईल.

हा दुःखाचा त्याग करणे म्हणजे मनाला एक प्रकारचे वळण लावणे आहे. ही गोष्ट सहजासहजी होणारी नाही. त्यासाठी समर्थ सांगतात की देहाला जे दुःख होते त्यालाच सुख मानून पुढे चालावे. याचा अर्थ प्रारब्धाने जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्याचा स्वीकार करावा आणि आपले कर्म करावे. बऱ्याच लोकांना आपल्या आजाराचा आणि दुःखाचा बाऊ करण्याची सवय असते. दुसऱ्यासमोर आपल्या दुःखाचे वारंवार प्रदर्शन करून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे फारसे काही साध्य होत नाही. सतत अशी तक्रार करणारी माणसे इतरांना नकोशी होतात. प्रारब्धाने जे दुःख आपल्या वाट्याला आले आहे ते स्वीकारण्याची आणि त्यालाच सुख मानण्याची वृत्ती जेव्हा आपली होईल तेव्हा सुखाचा वेगळा शोध घेण्याची आवश्यकता राहणार नाही. असेल त्या परिस्थितीतही आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू.

आपल्या अवतीभवती जर नजर टाकली तर आपल्याला ज्यांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास किंवा व्याधी आहेत असे लोक आपल्या दृष्टीस पडतात. परंतु त्यातील बरेच लोक त्यांचा स्वीकार करून आपले जीवन ध्येय जे आहे त्या मार्गावर वाटचाल करताना दिसतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना मज्जासंस्थेचा गंभीर आजार झाला तरी देखील त्यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले. प्रसिद्ध नृत्यांगना असलेल्या सुधा चंद्रन यांना आपला एक पाय अपघातात गमवावा लागला. परंतु त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. थोडक्यात सांगायचे तर: या व्यक्तींनी आपल्या शारीरिक मर्यादांना आपली कमकुवत बाजू न बनवता, त्यांना आपली ताकद बनवले. “शरीराला अपंगत्व असू शकते, पण मनाला नाही, ” हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने विवेकाची कास धरून स्वस्वरूपाचे चिंतन करावे. मी म्हणजे देह नाही. त्यामुळे देहाला होणाऱ्या दुःखाशी माझा खऱ्या अर्थाने संबंध नसून मी म्हणजे एक आनंदस्वरूप आत्मा आहे अशी भावना मनाशी दृढ करावी. त्यासाठी भोवतालच्या परिस्थितीकडे साक्षी भावाने पाहता यायला हवे. साधकाने आत्मस्वरूपाच्या चिंतनातच (म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणात)इतके रंगून जावे की त्याला त्यामुळे दुःखाची जाणीव सुद्धा होणार नाही.

स्वसंवाद : 

  • माझे प्रेम नेमके कशावर आहे — नश्वर गोष्टींवर की चिरंतन तत्त्वावर?
  • एखादे दुःख आले की मी त्याचा बाऊ करतो, की शांतपणे स्वीकारून पुढे चालतो?
  • माझ्या देहाच्या त्रासाशी मी पूर्णपणे एकरूप होतो का, की मी त्याचा साक्षी राहू शकतो?
  • विवेकबुद्धी वापरून मी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांमध्ये फरक करू शकतो का?
  • माझे मन नामस्मरणात किंवा आत्मचिंतनात किती वेळ रमते? (क्रमशः)

 – क्रमशः श्लोक ९ आणि १०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गुप्तदान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “गुप्तदान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या ‘ जिल्हा परिषद शाळेत’ आज मोठा कार्यक्रम होता. शाळेला १० संगणक (Computers) भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन ‘मिस्टर सुहास ओक’ आले होते.

सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता – “दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे.”

शाळेच्या पटांगणात कार्यक्रम सुरू झाला. सुहासराव मंचावर (Stage) मधल्या खुर्चीत बसले होते.

त्यांची नजर अचानक मंचाच्या खाली, एका कोपऱ्यात गेली.

तिथे एक ७५-८० वर्षांचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर सतरंजीवर मुलांमध्ये बसले होते. त्यांचे कपडे अत्यंत साधे होते – एक विटकं धोतर, जुना सदरा आणि डोक्यावर एक मळके उपरणं. ते सारखे खोकत होते आणि त्यांच्या पायात एक जुनी चप्पल होती.

सुहासरावांना ते दृश्य खटकलं. त्यांना वाटलं, “हा भिकारी इथे काय करतोय? माझ्यासारखा एवढा मोठा माणूस आलाय आणि इथे मंचासमोर हे असं दृश्य?”

त्यांनी मुख्याध्यापकांना (Principal) खुणेने जवळ बोलावलं.

सुहासराव रागाने कुजबुजले, “सर, तो म्हातारा कोण आहे? त्याला तिथून उठवा. माझ्या फोटोच्या फ्रेममध्ये येतोय तो. ‘स्टँडर्ड’ खराब दिसतंय शाळेचं. भिकारी वाटतोय तो, त्याला गेटच्या बाहेर काढा आणि जेवण देऊन वाटेला लावा.”

मुख्याध्यापक थोडे ओशाळले. ते म्हणाले, “साहेब, ते… ते…”

सुहासरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. “अहो, कसले ‘ते’? सांगा शिपायाला. उचलून बाहेर काढा त्यांना.”

शिपाई गेला आणि त्याने त्या म्हाताऱ्याला (ज्यांचं नाव ‘तात्या’ होतं) हाताला धरून उठवलं.

“तात्या, चला उठा. साहेबांना त्रास होतोय. तुम्ही मागे जाऊन बसा किंवा बाहेर थांबा.”

तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. त्यांनी आपली काठी टेकवली आणि ते थरथरत्या पायांनी मंचाच्या मागच्या बाजूला, जिथे मुलांचे बूट ठेवले होते, तिथे जाऊन एका दगडावर बसले.

कार्यक्रम पार पडला. सुहासरावांनी १० कॉम्प्युटर दिले. खूप टाळ्या वाजल्या. हार-तुरे झाले.

शेवटी भाषणाची वेळ आली.

मुख्याध्यापक माईकवर आले. त्यांचा आवाज भरून आला होता.

ते म्हणाले:”आज सुहासरावांनी आपल्याला १० कॉम्प्युटर दिले, त्याबद्दल त्यांचे आभार.

पण आज मला एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, ज्याने या शाळेसाठी आपलं ‘सर्वस्व’ दिलं, पण कधी स्टेजवर येऊन हार स्वीकारला नाही.

सुहासराव, मगाशी ज्यांना तुम्ही ‘भिकारी’ समजून मंचासमोरून उठवलंत आणि बूट स्टँडजवळ बसवलंत ना…

ते ‘तात्या पाटील’ आहेत.

या शाळेची जी २ एकर जमीन आहे, ज्याची आजची किंमत ५ कोटी रुपये आहे… ती जमीन या तात्यांनी शाळेला ‘दान’ दिली आहे.

तात्यांकडे राहायला स्वतःचं पकं घर नाहीये, ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलं त्यांना सोडून गेली.

म्हातारपणी औषधाला पैसे नसतात, पण दरवर्षी आपल्या पेन्शनचे पैसे साठवून ते शाळेतल्या गरिबांच्या पोरांना गणवेश (Uniform) देतात.

साहेब, तुम्ही १० कॉम्प्युटर दिलेत, पण त्यासाठी १० फोटोग्राफर आणलेत.

या माणसाने ५ कोटींची जमीन दिली, पण आज स्वतःच्याच जागेवर बसण्यासाठी त्यांना तुमच्या परवानगीची गरज लागली.

खरा ‘श्रीमंत’ कोण, हे आज तुम्हीच ठरवा.”

सगळ्या सभामंडपात स्मशानशांतता पसरली.

सुहासरावांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

ज्या माणसाला ते कपड्यावरून ‘भिकारी’ समजत होते, त्या माणसाची दानत सुहासरावांच्या संपत्तीपेक्षा हजार पटीने मोठी होती.

सुहासराव मंचावरून खाली उतरले. त्यांचे बाउन्सर, त्यांचे फोटोग्राफर सगळे बघत होते.

सुहासराव धावत त्या मंचाच्या मागे गेले.

तिथे तात्या एका दगडावर बसून, मुलांनी दिलेलं बिस्किट खात होते.

सुहासरावांनी आपले महागडे बूट तिथेच काढले आणि त्या मळक्या धोतर नेसलेल्या तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं.

“मला माफ करा तात्या! मी पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने खूप गरीब राहिलो. तुम्ही खरे ‘राजा’ आहात. मी तुमची लायकी काढली, पण खरी लायकी आज मला माझी समजली.”

तात्यांनी हसून सुहासरावांच्या पाठीवर हात फिरवला.

“अरे बाबा, त्यात काय झालं? देव देतो आणि देवच नेतो. आपण फक्त माध्यम असतो. तू दिलं, मी दिलं… हे महत्त्वाचं नाही. पोरांनी शिकणं महत्त्वाचं. उठ, कपडे खराब होतील तुझे.”

सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं.

आज त्यांना समजलं होतं की, श्रीमंती बँकेच्या बॅलन्समध्ये नसते, तर ती ‘देण्याच्या’ वृत्तीमध्ये असते.

त्या दिवशी सुहासरावांनी एकही फोटो काढला नाही. त्यांनी तात्यांचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने मंचावर नेऊन आपल्या खुर्चीवर बसवलं.

कोणाच्या कपड्यावरून त्यांची लायकी ठरवू नका. साध्या राहणीमागे खूप मोठं आणि श्रीमंत मन असू शकतं. दान दिल्यावर त्याचा गाजावाजा करणं म्हणजे त्या दानाची किंमत कमी करण्यासारखं आहे. ‘गुप्तदान’ हेच श्रेष्ठ दान असते जेथे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला देखील कळलेलं नसतं.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अर्कपत्र पहुडावी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अर्कपत्र पहुडावी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी)

सूर्याचे तेज नभी

सूर्यकिरण चमचमती

अर्कपत्र पहुडावी

बहु सुंदर होय क्षिती

*

तेज मला मोहविते

जाईन मी त्या तिकडे

मातीवर फुललेले

कनकाचे जणू रुपडे

*

सूर्यवर्त, दिवाकर

अर्कादल म्हणती फुला

सूर्यकमल, सूर्यकांती

काय म्हणू सांग तुला

*

दिशा देई रवीकर तुज

वळशी तू त्या संगे

सूर्योदय सूर्यास्ता

प्रवास हा किती रंगे

*

पाहताच तुझ्याकडे

चैतन्ये सळसळती

चित्रपतंगास मोह

भिरभिरती बागडती

*

पिवळी पिवळी कुरणे

शब्द होती दिवाणे

सूर्यफुला ऐक जरा

कवनाचे नजराणे

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोरा कॅनव्हास… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोरा कॅनव्हास… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कोरा कॅनव्हास घेऊन हाती 

विठ्ठल रुक्मिणी विवाह रेखीला 

भाव सुंदर असा सोहळा 

पण कसा कुणी तो न देखीला 

*

कुठे आहे असे चित्र यावर 

विचारता त्या चित्रकाराला 

म्हणाला पंढरपूरला सारे सोहळ्यास जाता

कसे दिसतील ते इथे तुम्हाला?

*

वसंतपंचमी आहे म्हणूनी

रेखीली सरस्वती हंसवाहिनी

ती पण कुठे दिसत का नाही

सांग झणी मला समजावूनी

*

कसे सांगू तुम्हा का न दिसे ती

चित्रकार तो बोले हसूनी

पहा माझी कला वाढवण्या

बसली माझ्या करात येऊनी||

*

गवत खाणाऱ्या गायीचे चित्र

कुठे आहे विचारता खोदूनी

 म्हणे गवत खाऊन संपले म्हणूनी

गायही तेथून गेली निघूनी||

*

अशा अगणीत चित्रांचे कोलाज

आहे या कोऱ्या कॅनव्हास वरती

मनःचक्षुने पाहता त्याकडे

चित्रे त्यातील स्पष्ट दिसती||

*

दिसते तसे कधीच नसते

म्हणून तर जग फसत असते

करता विचार तर्क शुद्धीने

चित्र त्यावर सहज प्रकटते||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # ३१६ – कविता – ☆ बिना हँसे रोये क्या पाया… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता टेम पब्लिसिटी का भैये” ।)

☆ तन्मय साहित्य  # ३१६ 

☆ बिना हँसे रोये क्या पाया… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

जिनमें संवेदना नहीं,

वे कैसे रोयेगे

ओढ लबादे, ‘व्यर्थ सोच’ के

कैसे सोएंगे।

 

चेहरों पर जिनके

मुस्कान नहीं

सहज सरलता से

पहचान नहीं

जो गंभीर मुखौटे

ओछे बैठे हैं

प्रमुदित रहने का

है ज्ञान नहीं

शंकित मन जीवन में

कैसे खुशियाँ बोयेंगे…

 

जो न प्रकृति से

हँसना सीखे हैं

जो, जो भर

रोने से रोते हैं

हंसी-रुदन तो

जीवन के वरदान है

सुख-दुख बिन

जग के रस फीके हैं

बिना हँसे-रोए

क्या पाया है

जो खोएंगे…

 

है बसंत तो,

पतझड़ भी आएगा

दिवस बाद

अँधियारा भी छाएगा

मोर और संध्या में

जैसी समरसता है

हर्ष-शोक भी जीवन में

क्षमता लाएगा

सहज बनेंगे तब आंसू

तन मन को धोएंगे।….

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १३७ ☆ मज़दूर ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “क्यों?” ।)       

✍ जय प्रकाश के नवगीत # १३७ ☆ मज़दूर ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

शहर के हर चौराहे पर

आज भी इकट्ठे होते हैं लोग

काम की तलाश में

कहीं भटकते नहीं है

बस खड़े रहते है

इस आस में कि कोई ज़रूरतमंद

आकर उन्हें ले जाएगा

अपने साथ लेकर चलते हैं

दिन भर का भोजन पानी

जैसे-जैसे दिन ऊपर चढ़ता है

उनकी आस उसी तरह

कम होती जाती है

सर्वहारा वर्ग आज भी

आशाओं और व्यवस्था के बीच

झूलता लटकता अपना और

अपने परिवार का बोझ ढोता

ज़िंदा है इस कायनात में

इन असंगठित लोगों के लिए

सरकारों की प्रतिबद्धता

सिमट कर रह जाती है सिर्फ़ काग़ज़ों में

जो शायद ही कोई

साकार रूप ले पाती है

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – डस्टबिन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – डस्टबिन ? ?

क्रोध, आक्रोश

प्रेम, आवेश

भय, चिंता

पौरुष के सारे प्रवाहों का

‘डस्टबिन’ होती है औरत,

स्त्री विमर्शकों का

मंथन जारी था..,

असहाय होता है डस्टबिन

एकत्रित करता है कूड़ा

और दुर्गंध से सना रह जाता है,

सुनो-

विमर्शक नहीं हूँ मैं

किंतु

चिंतन में उठती हैं लहरें

माटी सोखती है

सारा चुका हुआ

सारा हारा हुआ,

माटी देती है

हर बीज को

अपनी उष्मा

अपना पोषण,

बीज उल्टा पड़ा हो या सीधा

टेढ़ा या मेढ़ा

आम का हो

या बबूल का,

सारे विमर्शों से परे

माटी अँकुआती है जीवन

धरती को करती है हरा

धरती को रखती है हरा

हरापन-

प्राणवान होने का प्रमाण है,

माटी फूँकती है प्राण

मित्रो!

स्त्री माटी होती है

और दुनिया के

किसी भी शब्दकोश में

माटी का अर्थ

‘डस्टबिन’ नहीं होता।

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आशुतोष साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र ही दी जावेगी। 🕉️ 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares