मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सलाम या महान सैनिकाला!!!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “सलाम या महान सैनिकाला!!!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

१९७१ चे युद्ध संपल्यानंतरची ही गोष्ट आहे. युद्ध संपताच जन. माणेकशॉ यांची निवृत्ती जवळ येऊ लागली होती. एक दिवस त्यांच्या असे लक्षात आले की त्यांचा ड्रायव्हर श्याम सिंग अचानकपणे कुठल्यातरी तणावाखाली आलेला दिसत होता आणि खूप चिंताग्रस्तही वाटत होता. तो काही नेहमीसारखा दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरच्या काळजीकडे दुर्लक्ष करताच येणार नाही इतकी ती अगदी स्पष्ट जाणवत होती. आणि अर्थातच ही गोष्ट जन. माणेकशॉ यांच्या लक्षात आलीच.

 ” नेमकं काय झालंय श्यामसिंग? आजकाल तू इतका चिंताग्रस्त वाटतोयस की जणू काही तुझ्या घरच्या म्हशीने दूध देणे बंद केले आहे. काय झालंय “

” नाही सर, तसं काहीच झालेलं नाही ” एवढंच बोलून श्यामसिंग गप्प बसला.

 पुढचे काही दिवस असेच गेले. पण जन. माणेकशांची निवृत्तीची तारीख जशी जवळ आली तशी श्यामसिंगने शेवटी त्यांना मनातली गोष्ट बोलून दाखवली …….

” सर, माझी एक इच्छा आहे जी फक्त आपणच पूर्ण करू शकता… “

” अरे मग सांग ना मला.. नि:संकोचपणे बोल”.

” सर, मलाही नोकरीतून लवकर निवृत्त व्हायचंय. कृपया यासाठी आपण शिफारस करावी अशी मी आपल्याला विनंती करतो… “

“अरे पण कशासाठी इतक्या लवकर निवृत्त व्हायचंय तुला? काही जमिनीचा वाद, भांडणतंटा आहे, का काही कौटुंबिक वाद? तू तुझी नोकरी व्यवस्थित पूर्ण कर. मी तुला नायब सुभेदार होण्यासाठी मदत करीन. पण तू ही लष्करातली नोकरी सोडू नकोस! ” जन. माणेकशॉ यांनी त्याला सल्ला दिला.

….. ” नाही सर, काही वेगळंच कारण आहे याचं. पण नोकरी सोडेपर्यंत मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. “

त्याचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान पाहून अखेर जनरलने त्याच्या निवृत्तीची आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केली आणि काही दिवसातच त्याच्या निवृत्तीची ऑर्डर आली.

जनरलने आता पुन्हा एकदा त्याला विचारले ” आता तुला बरं वाटलं ना? आता तरी सांगशील का मला की तुला लवकर का निवृत्त व्हायचे होते? ” 

ड्रायव्हर आदबीने उभा राहिला आणि म्हणाला, ” सर, आपला ड्राइवर म्हणून इतकी वर्षं काम केल्यानंतर आता मी दुसऱ्या कुणाचा तरी ड्राइवर म्हणून काम करूच शकणार नाही. आपल्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करणं हा माझ्यासाठी माझ्या जीवनातला सर्वात मोठा सन्मान होता आणि आता इथून पुढे तोच सन्मान आणि ती आठवण आयुष्यभरासाठी सोबत घेऊन मला जगायचं आहे. “.

हे उत्तर ऐकून फील्ड मार्शल माणेकशॉ यांना हसू आलं आणि ते म्हणाले, ” तू खरंच महामूर्ख आहेस! तुम्ही हरियाणवी लोक ना अगदी हट्टी आणि करारी असता. पण आता निवृत्तीबाबतची कार्यवाही सुरु झाल्याने त्यात कुठलाच बदल करणं मला शक्य नाही. ” 

मग एक दिवस जनरलने त्याला विचारलेच, ” निवृत्तीनंतर तू काय करायचे ठरविले आहेस? “

” काही तरी करीन सर, एखादी नोकरी शोधेन. “

“तुझ्याकडे शेती किती आहे? “

” शेती नाहीच आहे सर. मी एका गरीब कुटुंबातला आहे.. ” 

.. यावर जनरल माणेकशॉ यांचं मन हेलावलं.. ‘एका अशा अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून नोकरी केल्यावर दुसऱ्या कुणाकडेच आपण ड्रायव्हर म्हणून काम करू शकणार नाही’, या विचाराने आपल्या उपजीविकेचे साधनच वाऱ्यावर सोडून देणारा असा हा गरजू माणूस बघून कमांडर साहेबांना खूप वाईट वाटले.

श्यामसिंगच्या निरोप समारंभाच्या दिवशी कमांडर माणिकशॉनी त्याच्या हातात एक पाकिट दिले आणि सांगितले.. ” श्यामसिंग, हे पाकिट घरी गेल्यावरच उघडायचं बरं का “.

” होय, सर ” असं म्हणत श्यामसिंगने त्यांना एक सॅल्युट केला आणि निघून गेला.

घरी आल्यावर लगेच तो नोकरी शोधण्यात गर्क झाला आणि ते पाकिट पूर्णपणे विसरून गेला. एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली, ” मी तुमचा आर्मीचा गणवेश ट्रंकमधे ठेवत असतांना त्याच्या खिशात मला हे पाकिट सापडले आहे ” 

” अरे बापरे, मी पूर्णपणे विसरूनच गेलो बघ. मला वाचता येत नसल्याने मी ते उघडलेच नाही. नक्कीच त्यात सरांनी मला दिलेले प्रशस्तीपत्रक असेल. कारण वरिष्ठ अधिकारी अशी प्रशस्तीपत्रके देतच असतात. ” “ पण तरी आपण हे मास्तरांकडे घेऊन जाऊ आणि त्यांनाच ते वाचायला सांगू. मला खूप उत्सुकता लागून राहिली आहे त्यात काय लिहिले आहे ते जाणून घेण्याची ” बायको म्हणाली.

म्हणून मग ते दोघे शाळेच्या मुख्याध्यापकाकडे गेले आणि त्यांना ते पत्र मोठ्याने वाचण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांनी चष्मा घातला, पाकिट उघडले.. वाचले, आणि ते अचानक एकदम स्तब्धच झाले.

“काय झाले गुरुजी? तुम्ही हे पत्र असं निरखून का बघताय? ” काही न कळून श्यामसिंगने विचारलं.

” अरे तुला काही कल्पना तरी आहे का यात काय लिहिलंय याची? “

” नाही गुरूजी! “

“अरे, यात एक हस्तांतर दस्त आहे. “

“ म्हणजे नक्की काय आहे? “ गोंधळून गेलेल्या श्यामसिंगने विचारलं.

” अरे १९७१च्या युद्धातील विजयानंतर हरियाणा सरकारने जनरल सॅम माणेकशॉ यांना त्यांचा बहुमान म्हणून 25 एकर जमीन बक्षीस दिली होती. आणि आता ती पूर्ण जमीन त्यांनी तुझ्या नावावर ट्रान्सफर केलीय. आता तू चक्क 25 एकर जमिनीचा मालक झाला आहेस श्यामलाल “.

– – खऱ्या अर्थाने महान असलेल्या जन. माणेकशॉ यांनी एका ड्रायव्हरला दिलेल्या ‘ऐतिहासिक’ बक्षीसाची ही कहाणी आहे. युद्धातील विजयामुळे स्वतःला बक्षीस म्हणून मिळालेली सोनीपत येथील जमीन तर त्यांनी अगदी सहजपणे आपल्या ड्रायव्हरला दान केलीच, शिवाय या दानशूर नेत्याने फिल्ड मार्शल म्हणून स्वतःला मिळणारे पेन्शनही सैन्यातील जवानांच्या विधवांच्या कल्याण निधीला देणगी म्हणून देऊन टाकले..

अतिशय दिलदार स्वभावाच्या या महान सैनिकाला आणि माणूस म्हणून त्यांच्यात असलेल्या विलक्षण आणि असामान्य माणुसकीला अगदी मनापासून सलाम!!!

जय हिंद!!!!!.

 

इंग्रजी माहिती संकलक आणि लेखक : अज्ञात.

मराठी अनुवाद आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५९ – – – 

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |

मनी कामना राम नाही जयाला |

अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९||

अर्थ : हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील?

(कल्पिता – कल्पना करणे, कल्पकोटी – अनंत/ नाना प्रकारच्या)

विवेचन : आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.

समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. ज्याला प्रपंच नीट करता आला नाही त्याला परमार्थ कसा जमणार? म्हणून आपल्याला यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे. अस्थिर मनाने प्रपंच आणि परमार्थ ही साधणार नाही.

कल्पना करीत राहणे हा मानवी स्वभाव आहे. या कल्पनाच आपल्याला विषयांच्या राज्यात घेऊन जातात आणि त्यांच्या तीव्र ओढीने विषयांचे सेवन आपल्याकडून घडते. साहजिकच भगवंतापासून आपण दूर जात असतो. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये विषय चिंतन आणि भगवंत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. मन एकाच गोष्टीला पूर्णपणे वाहिले पाहिजे.

परमार्थाकडे वाटचाल करताना मनामध्ये वासना असता कामा नये. वासना असतील तर आपल्याला भगवंत हवा, अगदी मनापासून हवा असे वाटणारच नाही. जोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच आहे असे मनापासून वाटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही.

भगवंत हवा आहे असे मनापासून वाटत असेल तर विषयाकडे धावणारी वृत्ती सवयीने हळूहळू कमी करायला हवी. त्यासाठीच नामस्मरण, पूजा, सत्संग, साधना इ. गोष्टी सांगितल्या आहेत.

पण विषयाकडे धावणारे मन नाना प्रकारच्या कल्पना करीत राहते. मनाची शक्ती अपार आहे. परंतु आपण या शक्तीचा योग्य वापर करण्यापेक्षा गैरवापरच जास्त करीत असतो. दिशाहीन आणि निरुपयोगी कल्पना मनाला थकवा आणतात. म्हणूनच मनाला प्रयत्नपूर्वक योग्य मार्गावर आणायला हवे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. मला भगवंत हवा आहे अशी निव्वळ इच्छा करून तो प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवेक आणि वैराग्य धारण करावे लागेल. भगवंत हवा असेल तर अन्य सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा नित्य सहवास लाभला की त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. त्याप्रमाणेच सतत भगवंताचे नाम घेत गेल्याने त्याच्याबद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण होईल.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दिवसभर कोणत्या प्रकारच्या कल्पना सर्वाधिक येतात – विधायक की विषयप्रधान?

२) मी वास्तवात जगतो का, की कल्पनांच्या जगात जास्त वेळ घालवतो?

३) मला खरोखर भगवंताची ओढ आहे का, की ती केवळ एक वरवरची इच्छा आहे?

४) मी माझ्या मनाला जाणीवपूर्वक योग्य दिशेला वळवण्यासाठी काही प्रयत्न करतो का (नामस्मरण, वाचन, सत्संग)?

– – – – – 

श्लोक क्र. ६० – – – 

मना राम कल्पतरू कामधेनू |

निधी सार चिंतामणी काय वानू|

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता|

तया साम्यता कायसी कोण आता |६०|

अर्थ : हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी… सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल?

(चिंतामणी – इच्छिलेली वस्तू देणारा, वानू – वर्णन करू)

विवेचन : या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया.

कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते. कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार किंवा खजिना, चिंतामणी म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा काल्पनिक मणी.

प्रभू रामचंद्र भक्तांचे सर्व मनोरथ पुरवणारे आहेत. ते कल्पतरू, कामधेनू आहेत. आपल्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी ते घेतात. इच्छिलेले सर्व काही देणारे ते आहेत. ते निधी म्हणजे कुबेराचे भांडार आहेत. कुबेराचे भांडार म्हणजे समृद्ध खजिना! कशाचीही कमी नाही. म्हणजेच श्रीरामाच्या भक्तांना कसलीही कमी पडणार नाही. त्यानंतर समर्थ म्हणतात की ते सार आहेत. सार म्हणजे महत्त्वाचे तत्व! या विश्वामध्ये सार म्हणजे फक्त एक श्रीराम. बाकी सर्व काही असार. एका वाक्यात सांगायचे झाले तर रामनाम ही सर्व कुलुपांची अशी एक किल्ली आहे की ज्यामुळे सर्व कुलुपे विनासायास उघडतात.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात परमेश्वराला प्रार्थना करताना म्हटले आहे, “जो जे वांछील, तो ते लाहो. ” म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा होईल ती ती गोष्ट प्राप्त होवो. अर्थात या ठिकाणी इच्छा म्हणजे सदिच्छा किंवा चांगली इच्छा हे गृहीत आहे. भक्ताच्या चांगल्या इच्छाच भगवंत पुरवेल. आणि श्रीरामांच्या भक्तांना वाईट इच्छा कशी होईल? म्हणून आपल्या भक्तांच्या मोक्षाच्या, दर्शनाच्या सर्व कामना तो दयानिधी पुरविल.

वर निधी म्हणजे कुबेराचा खजिना असे आपण म्हटले आहे. परंतु निधी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आणखी वेगळा आणि थोड्या व्यापक अर्थाने घेता येईल. निधी म्हणजे साठा. निधी म्हणजे समुद्र. श्रीराम म्हणजे गुणांचा साठा, दयेचा आणि करुणेचा समुद्र. आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा असा तो आहे. त्याच्या गुणांचे काय वर्णन करावे? त्यासाठी शब्द कमी आहेत. तो कोणासारखा बरं आहे? तर त्याच्यासारखा तोच!

अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने? असा तो आहे. तो द्यायला बसला की आपली झोळी अपुरी पडेल. म्हणून काही मागायचे तर त्याच्या जवळच मागावे. जो सगळे काही आहे जो, सारसर्वस्व आहे, त्याच्याजवळ मागण्याचे सोडून इतरांजवळ मागण्यात काय हशील?

व्यवहारामध्ये आपली इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती करणारी सारी साधने गौण आहेत. त्या इच्छा, त्या वासना कधी संपतच नाहीत. भगवंत जेव्हा आपली इच्छापूर्ती करतो, तेव्हा काही मागायचे राहतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ” काय उणे आम्हा विठोबाचे पायी? ” अशी भक्ताची अवस्था होते. मन शांत, तृप्त होते आणि अत्यंत सामर्थ्यशाली बनते. कोणतीही आणि कशीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, असा भक्त डगमगत नाही. असे समाधान देणारा भगवंत हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची बरोबरी कशानेही होणार नाही.

स्वसंवाद :: 

१) मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाह्य साधनांवर जास्त अवलंबून आहे का, की परमेश्वरावर विश्वास ठेवतो?

२) “मला अजून काही हवे आहे” ही भावना माझ्यात कितपत आहे? की “काय उणे आहे? ” अशी तृप्ती आहे?

३) मी जे मागतो, ते खरोखर माझ्या कल्याणासाठी आहे का, की केवळ वासनापूर्ती आहे?

४) माझ्या जीवनात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मला भगवंत “सर्वस्व” वाटतो का, की अजूनही इतर गोष्टींमध्येच माझा जास्त विश्वास आहे? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक श्लोक ५९ आणि ६०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

(आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती..! ) 

इथून पुढे – – 

पंचवीस वर्षांचा काल उलटला आणि इंडियन मिलिटरी अकादमीच्या क्र. ८८-नियमित अभ्यासक्रम-७१व्या तुकडीचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याची कल्पना काही माजी अधिका-यांच्या मनात आली. कर्नल सजन मोईद्दीन आणि दिवंगत जोसेफ साहेबांच्या सोबत एन. डी. ए. मध्ये आणि पुढे इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकी-अधिका-यांनी त्यांच्या तुकडीचा रौप्य महोत्सव २४ जून, २०१६ रोजी साजरा करण्याचा कार्यक्रम आखला.

निवृत्त अधिकारी, जवान यांच्या घरी संपर्क साधण्यात आला. एक देखणा कार्यक्रम आयोजित केला… अगदी परदेशातूनही सैनिक-कुटुंबे आली होती. या तुकडीतील १९ अधिकारी देशसेवेत हौतात्म्य प्राप्त करते झाले होते… या १९ अधिका-यांची त्या यादी विक्रम गिल साहेबांनी तयार केली… त्यात जोसेफ साहेबांचे नाव अग्रस्थानी होते. सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले… उपस्थित सर्वांना स्मृतीचिन्हे देण्यात आली… पण या नातेवाईक लोकांत E. जोसेफ साहेबांचे कुणी नव्हते…! कारण त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यांच्या पत्त्यावर पाठवलेली सर्व पत्रं माघारी आली होती. आणि संपर्क जरी झाला असता तरी केरळमधून नागालँड मध्ये पोहोचायचे तर खर्च, प्रवास व्यवस्था… कितीतरी समस्या आल्याच असत्या आणि एकतर एवढे दूरचे अंतर! पण कार्यक्रमात काही अधिका-यांच्या मनात एक शल्य निश्चित होतं… जोसेफ साहेब असते तर? किमान त्यांचे आई-वडील तरी आज इथं पाहिजे होते!

समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या कुटुंबियांना स्मृतीचिन्हे त्यांच्या घरी नेऊन देण्याची व्यवस्था करण्यात आली. दक्षिणेत कर्तव्यावर असलेल्या एका केरळी अधिका-यावर जोसेफ कुटुंबियांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी खूप नेटाने शोध घेत दोन महिन्यांनी केरळ मधल्या ग्रामीण भागात जाऊन जीवन कंठणा-या निवृत्त सुभेदार मेजर जोसेफ साहेब यांच्या घराचा शोध लावला… आपल्या लेकाच्या नावाचे स्मृतिचिन्ह पाहून जोसेफ साहेब आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले… आणि बोलण्याच्या ओघात सौ. जोसेफ म्हणाल्या… ”माझ्या लाडक्या लेकाचा चेहराही मला शेवटचा पाहता आला नाही! त्याच्या कबरीवर फुलं वाहून मला त्याला श्रद्धांजली वाहायची होती… आणि त्याचे आभार मानायचे होते! देवाने मला इतका शूर मुलगा दिला… त्याचा अभिमान आहे मला! … पण तो इतक्या दूर आहे त्याच्या कबरीत विसावलेला… माझ्या जीवनाची संध्याकाळ नजीक आली आहे… बहुदा त्याची आणि माझी भेट देवाच्या घरीच होणार आता… ” आणि पुढे अश्रूंचा महासागर लोटला… सायंरेषा अधिकाधिक गडद होत गेल्या!

स्मृतिचिन्ह घेऊन गेलेला अधिकारी एका निश्चयाने परतला. सर्व माजी अधिकारी एकत्र बसले… आणि त्यांनी निश्चय केला… आपल्या मित्राला त्याच्या आईकडे पाठवायचेच! आणि सुरु झाला एका शूर मुलाच्या देहाच्या अवशेषांचा त्याच्या आईपर्यंतचा प्रवास!

जोसेफ साहेबांच्या कबरीचा शोध घेणे हे मोठे जिकीरीचे काम होते. लष्करी परिसरात अंत्यविधी झाला होता… तरीही ही जागा तशी विस्मरणात गेली होती. पण कागदपत्रे आणि इतर बाबी तपासल्या असता कोहिमा मध्ये चाकाबामा येथे एकूण सहा कबरी सापडल्या… चार मुस्लीम अधिका-यांच्या तर दोन ख्रिस्ती अधिका-यांच्या. त्यातील जोसेफ साहेबांची कबर शोधण्यात आली… मित्रांना त्यांचा मित्र पुन्हा गवसला होता.!

हुतात्मा जोसेफ साहेब एन. डी. ए. खडकवासला च्या ७८व्या तुकडीचे विद्यार्थी. त्यांचे सहपाठी पुढे नौदल, वायुदल आणि पायदळात अधिकारी झाले होते… त्यातले बहुतांश आता सेवानिवृत्त झालेले होते. या सर्वांशी संपर्क साधला गेला. आणि काही वेळात मोठी रक्कम जमा झाली.

कर्नल अतुल सालुखे साहेबांनी वायूसेनेतून निवृत्त झालेल्या आणि त्यावेळी इंडिगो विमान कंपनीत वैमानिक असलेल्या कॅप्टन मनोज कुमार यांच्या कानांवर एक गोष्ट घातली… त्यांच्या पुढाकाराने इंडिगो विमान कंपनीने जोसेफ साहेबांच्या कुटुंबियांची आणि जोसेफ साहेबांच्या अवशेषांसाठी विनामूल्य प्रवास व्यवस्था करून दिली. वाटेतील प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था संबंधीत ठिकाणच्या लष्करी केंद्रामधील सैनिक, अधिका-यांनी मोठ्या विनयाने आणि बंधू भावनेने करून दिली.

या दरम्यान सर्व सैनिकी अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली होती… आणि न भूतो असा निर्णय घेण्यात आला… भारतीय सैन्यातील अत्यंत वरिष्ठ अधिका-यांनी एका अत्यंत भावनिक निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला… जोसेफ साहेबांना त्यांच्या घरी पाठवण्याचा… लष्करी इतमामात! सर्व कागदपत्रे, परवानग्या मिळवण्यात आल्या. ११ ऑक्टोबर, २०१६… जोसेफ कुटुंबीय कोहिमा येथे पोहोचले… जड पावलांनी त्या सर्वांनी दफनभूमीत प्रवेश केला… आईच्या अश्रूंनी कबरीवरची माती ओलीचिंब झाली… तिथल्या गवतावर उगवलेली नाजूक फुलं कावरीबावरी झाली!

कबर विधीवत उकरण्यात आली… प्रार्थना सुरु होत्या… साहेबांचे अवशेष मोठ्या सन्मानाने गोळा करण्यात आले… एका स्वतंत्र शवपेटीत बंदिस्त करण्यात आले… त्यावर राष्ट्रध्वज पांघरला गेला… सलामी झाली… बिगुल वाजला… एक सैनिक अधिकारी आपल्या आईच्या घरी निघाला… १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी कोची विमानतळावर जोसेफ साहेबांचे पार्थिव पोहोचले… स्थानिक पोलिस, लष्करी अधिका-यांनी पुष्पचक्रे वाहिली… मिरवणूक निघाली… कंजारीमोत्तम इथल्या ख्रिस्ती दफनभूमीत खास व्यवस्था केली गेली होती… कबर तयार होती… १४ ऑक्टोबर रोजी विशेष प्रार्थना सभा आयोजित करून होली क्रॉस चर्च येथे भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा सेकंड लेफ्टनंट ई. टी. जोसेफ साहेब यांना कायमचा निरोप देण्यात आला! आठ हजार आठशे नव्वद दिवसांनी पोरगं आईकडे परतले होते… आता आई थ्रीसिएम्मा रोज तिच्या लाडक्या लेकाच्या कबरीवर फुलं वाहायला जाऊ शकणार होती… जोसेफ साहेबांच्या मित्रांनी अत्यंत निकराने प्रयत्न करून हेही ऑपरेशन यशस्वी करून दाखवले होते! प्रशिक्षण आणि सैन्यसेवेमध्ये जीवाला जीव देणा-या अधिका-यांनी आपल्या साथीदाराची साथ अखेरपर्यंत सोडली नाही… जय हिंद… जय हिंद की सेना!

(सैनिकांचा इतिहास जिवंत रहावा यासाठी कार्यरत असणा-या उमाताई कुळकर्णी यांच्या पोस्टवरून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – २ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – २ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ११ ते २०

महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यन्

न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि ।

अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया

ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः ॥ ११॥

*

नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं

शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु ।

अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो

विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम् ॥ १२॥

*

विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितै-

रवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः ।

हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां

कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे ॥ १३॥

*

स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये

जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा ।

अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां

गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः ॥ १४॥

*

जडानन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्

ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् ।

निलिम्पैर्निर्मुक्तानपि च निरयान्तर्निपततो

नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि ॥ १५॥

*

स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपा-

मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति ।

मुदायं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः

समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः ॥ १६॥

*

कृतक्षुद्रैनस्कानथ झटिति सन्तप्तमनसः

समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः ।

अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरिता-

न्नरानूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे ॥ १७॥

*

निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां

प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः ।

समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां

श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः ॥ १८॥

*

पुरो धावं धावं द्रविणमदिराघूर्णितदृशां

महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम् ।

ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो

वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि ॥ १९॥

*

मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-

स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौङ्कुमरुचि ।

सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं

जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु ॥ २०॥

– – – – 

मराठी भावानुवाद 

लाभ जयाचा नाही ध्याने अमाप दानाने

घोर तपस्ये प्राप्त न होई विविध यागाने

या सकलांहुनी प्रभावशाली गङ्गे तव दर्शन

सामान्यांसी प्राप्ती सहजी माधवपद पावन ॥११॥

*

एक कटाक्षे तुझिया होते भवभयहारण

तव मूर्ती करि जगताचे या सदैव कल्याण

क्षुब्ध जाहल्या शैलजेस त्या महेश सोडून

सदोदीत तुजला मस्तकावरी करितो धारण ॥१२॥

*

जगात भरली असंख्य पापे उन्मत्त बोल

निंदक भेदी धर्म सांडिती आक्रमिती टवाळ

समस्त पातकी पापे क्षालित तुझिया पाण्यातुन

निर्मल विजयी प्रवाह हा तव एकचि विश्वातुन ॥१३॥

*

पतीत दीन उद्धारास्तव अवतर अवनीवरी

बांधुनिया निजपाशी कुंतले ठेवी मन्मथअरी

निर्मोही तरी दोष मोह ठेवी तुजला बांधुन

दोष तुझा की सांग माते सारे सद्गुण ॥१४॥

*

पङ्गू अंध बधीर मूक मूढ पापी पीडित

पापांपासुन मुक्तिसाठी पांथस्थ रखडत

त्यागिती सर्व देव तयांसी नरकात जायचे

तूची श्रेष्ठ भेषज अससी उद्धार दीनांचे ॥१५॥

*

स्वाभाविक शीतल नि विमल नीर तुझे महान

महिमा त्याचा काय वदावा सर्वा करि पावन

तुझिया स्पर्शे मोक्ष मिळोनी गेले स्वर्गात

सगरपुत्र द्यूलोकी अजुनी स्तवन तुझे गात ॥१६॥

*

लघूपातकांचा होता पस्तावा मग जीवनी

पातकहरणा असंख्य असती तीर्थक्षेत्र त्रिभुवनी

पापांना ज्या नाही उतारा पश्चात्तापाचा

अनुपम पावन करुनी मार्ग दावि मुक्तीचा ॥१७॥

*

खजिना धर्माचा तो मुख्य तीर्थांचे स्थान

कितीक आमोदासी देशी प्रज्ञे समाधान

आच्छादुनी चिंतेसी ठेवी विमल वस्त्र परिधान

लक्ष्मीवास हरण करी दुःखा तव रूप छान ॥१८॥

*

आशा जोपासुनी धनाची मंदबुद्धी झालो

धनपिसाट राजांसामोरी नतमस्तक झालो

स्वार्थापोटी सोडुन निजहित मति का मूढावी

करुणामयी होई हे माते वियोग तव हटवी ॥१९॥

*

लहरींनी पवनाच्या जलतरंग जे उठले

पद्मपराग केशरवर्णी चहूकडे विखुरले

सुरस्त्रियांच्या वक्षांवरचे कर्दमगरूसम आले

ऐसे जल तव नष्ट करो मम जननमरण जाळे ॥२०॥

– क्रमशः भाग दुसरा – 

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

दोघांच्या मध्ये सुमारे चार हजार किलोमीटर्सचं भलं थोरलं अंतर होतं… ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. नवरा फौजेत होताच… सुभेदार मेजर पोस्टवर होता Shillong मध्ये. पोराला दुसरं-तिसरं काहीही व्हायचंच नव्हतं… बापाच्या पाठोपाठ पोरगंही फौजेत गेलं तसं तिच्या काळजाचे दोन भाग झाले. एक भाग कुंकवाची चिंता करी तर दुसरा भाग म्हातारपणाच्या आधाराची. एकुलता एक तर लेक होता तो. त्याच्या आधी दोन मुली पदरात होत्या… पण पोरी लोकाच्या घरी जायच्या… उतारवयात आधार पाहिजेच की! पोराचे दोनाचे चार हात झाले आणि अंगणात नातवंडं खेळायला लागली की जन्माचं सार्थक झाल्याची स्वप्नं ती माऊली रंगवत दोघांचीही वाट पहात बसायची!

मुलाचं पत्र आलंय चारच दिवसांपूर्वी… ”अम्मा, येतोय सोळा-सतरा जूनला. माझ्या आवडीची ओल्या नारळाची बर्फी, चटणी आणि गरमागरम दोसे तयार ठेव. आणि हो, यावेळी माझ्या मागं लग्नाचं टुमणं नकोस लाऊस गं… एकच वर्ष तर झालंय मला फौजेत जाऊन. आणखी जरा स्थिर स्थावर होऊ दे. पुढची पोस्टिंग शांतता क्षेत्रात मिळेल बहुदा. अगं, इकडं खूप दमछाक होते… रोज अतिरेक्यांना शोधायला जातो आम्ही… कधी त्यांचे लोक मारले जातात.. कधी आमचे. पण तू काळजी करू नको. मला छान पैकी मी इथून निघण्याच्या आधी आमच्या मेस मध्ये सर्व अधिकारी, जवान सुग्रास जेवण देतील आणि निरोप देतील! पुन्हा कधी त्यांची भेट होईल न होईल… देव जाणे! पप्पा तिकडे शिलॉंगमध्ये पोस्टेड आहेत. त्यांना सुट्टी मिळाली असती तर आम्ही दोघेही एकाचवेळी घरी आलो असतो… शेतातली कामं मार्गी लावली असती. या दोघी अभ्यास करताहेत ना? त्यांच्यासाठीही काही आणीन छान यावेळी Nagaland मधून. येतो… काळजी घे… तुझाच… E. Thomos Joseph. Corps of Military Intelligence attached with 1/5 Gorkha Rifles. तारीख ११ जून १९९२.

उद्या निघायचं म्हणून ई. जोसेफ साहेब आज रात्रीच तयार झाले होते सामानसुमान बांधून. कालच मेसमध्ये पार्टी झाली निरोपाची. उद्या निघायचं कोट्टयमला.. सुंदर केरळमध्ये… पोहोचायला तीन-चार दिवस तर सहजी लागतील. बिछाण्यावर अंग टाकले आणि युनिटमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या… अतिरेक्यांच्या मागावर एक QRT Quick Action Team निघाली होती… तिथून जवळच अतिरेक्यांचा एक मोठा गट असल्याची पक्की खबर होती! जोसेफ साहेब गणवेश परिधान करून तातडीने बाहेर पडले… सहकारी अधिकारी म्हणाले, “आप तो कल छुट्टीपर निकलने वाले हो… आज ऑपरेशनसे लौटने में देर होगी.. आप मत साथ आईये!” त्यावर सेकंड लेफ्टनंट जोसेफ साहेब म्हणाले, “छुट्टी तो कल से है… मैं तो आज duty पर हूं… मैं भी साथ चलूंगा!”

ते अतिरेकी विरोधी अभियान रात्रभर चालले… अतिरेक्यांना या अभियानाची खबर आधीच लागली होती… गावाजवळच्या जंगलात त्यांनी सापळा रचून ठेवला होता… त्यांच्या तावडीत गोरखा सैनिकांची ही तुकडी दुर्दैवाने सापडली… आपल्या सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले… काही अतिरेकी जोसेफ साहेबांनी अचूक उडवले होते… पण अतिरेक्यांना यमसदनी धाडताना आपले तीन अधिकारी आणि दहा सैनिक धारातीर्थी पडले… त्यात ई. टी. जोसेफ साहेबही होते! त्या सर्वांचे कुटुंबीय आता कायम प्रतीक्षेत राहणार होते… जोसेफ साहेबांच्या मातोश्री थ्रीसिएम्मा जोसेफ सुद्धा!

Nagaland त्यावेळी धुमसत होतं… रस्ते बंद… रस्त्यांत हिंसक निदर्शने, लष्करी वाहनांवर दगडफेक, गोळीबार… एक ना अनेक गोष्टी सुरु होत्या. लष्कर याही परिस्थितीमध्ये संयम ठेवून काम करीत होतं… नेहमीप्रमाणे. जोसेफ साहेबांचे वडील सुभेदार मेजर थॉमस जोसेफ यांच्यापर्यंत लेकाच्या हौताम्याची बातमी पोहोचली… किती मोठा धक्का असेल त्या पितृहृदयासाठी… बाप के कंधे पे बेटे का जनाजा… किती मोठं ओझं हे! हे शल्य वागवीत ते शिलाँगवरून नागालँडकडे जायला निघाले… तेरा तासांचा प्रवास… पोहोचायला चार दिवस लागले… मालगाडीमधून प्रवास करावा लागला… काही ठिकाणी पायी जावे लागले! हुतात्म्यांचे देह आता कणा-कणाने निसर्गाच्या स्वाधीन होऊ लागले होते. त्याची दुर्गंधी सुटू लागली… भारतीय लष्कराच्या त्यावेळच्या व्यवस्थेनुसार गोरखा सैनिकांचे दाह-संस्कार युनिटमध्येच केले गेले. जोसेफ साहेब धर्माने ख्रिस्ती. त्यांना कोहिमामध्येच विधिवत दफन केले गेले… कारण तो देह इतक्या दूरवर पाठवणे दुरापास्त होते… अंत्यसंस्कार प्रसंगी केवळ त्यांचे वडीलच उपस्थित राहू शकले… आई, बहिणी आणि नातेवाईकांना अंत्यदर्शन होऊ शकले नाही!

सुभेदार मेजर जोसेफ साहेबांनी त्याच वर्षी सेनेतील नोकरी सोडली आणि ते आपली पत्नी, आणि दोन मुली यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी निघून गेले… काळजात लेकाचा विरह घेऊन! यात सर्वांत दु:खी होत्या त्या मातोश्री थ्रीसिएम्मा!

त्या गावातल्या चर्चच्या मागील बाजूस असलेल्या दफनभूमीकडे बघायच्या तेंव्हा त्यांना भास होई… लेक तिथल्या एका कबरीमध्ये विसावला आहे… आणि आपण त्याच्या कबरीवर साधं फूल वाहू शकत नाही… इकडे हजारो किलोमीटर्स दूर अंतरावर एका तशा अज्ञात स्थळी, एकाकी अवस्थेत जोसेफ साहेबांचा आत्मा त्या कबरीत तळमळत असेल… आई नजरेस नाही पडली शेवटच्या क्षणी!

एक एक क्षण युगासारखा असतो दुखावलेल्या मनांसाठी. संसार सुरु राहतो… पण पायात रुतलेल्या काट्यासारखे दु;ख पावलोपावली साथ देत राहतं… वाटचाल वेदनेकडून आणखी वेदनेकडे. आई-बापाचे दु:ख दुस-या कुणाला कसे समजावे?

काळ पुढे सरकत गेला. जोसेफ कुटुंबीयांनी मग मुलींकडे लक्ष केंद्रित केले, त्यांना योग्य ते शिक्षण दिले… त्या दोघीही शिक्षिका झाल्या! आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती… !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे- – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे– – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

– – – सागर आणि नेत्रा पाटील

संध्याकाळ होत जाते, घरोघरी दिवे लागतात आणि अंधार मागे सरतो. पण ‘अंधार’ म्हणजे नेमकं काय? काहींसाठी तो प्रकाशाचा अभाव असतो; तर काहींसाठी संधींचा.

सागर पाटील यांना हा फरक आयुष्याच्या अगदी लहान वयातच समजला. डोळ्यांवर अनेक शस्त्रक्रिया होऊनही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. त्यानंतर समाज दिव्यांग व्यक्तीकडे कसा पाहतो, हे त्यांनी जवळून अनुभवले. दुर्लक्ष, उपेक्षा, दया किंवा ‘बिच्चारा’ असा शिक्का—यापलीकडे अनेकांना काही दिसतच नव्हते.

या सर्व प्रवासात अत्यंत खंबीरपणे, खमकेपणाने सागर यांच्यासोबत त्यांचे आई वडील उभे राहिले. मुलाला अंधत्व आले असतानाही त्यांनी कधीच “हे करू नकोस” किंवा “तुला जमणार नाही” असा नकारात्मक सूर लावला नाही. उलट, सागर काही नवी गोष्ट अजमावत असतील, तर आई वडील म्हणायचे, “आमच्या समोरच कर, काही मदत लागली तर आम्ही आहोतच”. हा सकारात्मक दृष्टीकोन, सागर यांच्या आत्मविश्वासाचा पाया ठरला.

यामुळे सागर यांच्या मनात एक विचार दृढ झाला होता—एखाद्या व्यक्तीची “मर्यादा (limitation) / कमजोरी” ही तिच्या मूल्याची मोजपट्टी असू नये. पुढे हाच विचार एका चळवळीचा पाया ठरला.

त्यांच्या सोबतीला होत्या नेत्रा पाटील—शांत, संवेदनशील आणि कृतीतून परिवर्तन घडवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या.

सागर यांनी मराठी साहित्य विषयात एम. ए. केले; पण त्यांचा जीव रमला तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. वडिलांना सरकारी नोकरी सोडावी लागलेली पाहून त्यांनी लहानपणीच ठरवले होते—नोकरी करणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक व्हायचे.

शालेय वयापासूनच त्यांचे इस्त्री, रेडिओ, ट्यूबलाईट दुरुस्त करणेही सुरू झाले. वापरात नसतानाही बॅटऱ्या का उतरतात (drain होतात) ? हा प्रश्न त्यांना सतावत राहिला. त्यातून पुढे त्यांनी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचे तंत्र विकसित केले.

२०१३ मध्ये त्यांनी IIG (Ideal Innovative Group) कंपनीची स्थापना केली. संगणक आणि एलईडी उत्पादनांची जुळणी सुरू झाली. नामांकित कंपन्यांसाठी बल्ब व ट्यूबलाईट तयार करण्याबरोबरच स्वतःच्या ब्रँडनेही उत्पादने बाजारात आली.

कामाची व्याप्ती वाढू लागल्यावर, सागर यांनी सॉल्डरिंगची कामं घरी आणायला सुरुवात केल्यावर, वयाची साठी उलटून गेलेल्या त्यांच्या आईंनी हे कौशल्य स्वतः आत्मसात केले. आजही त्या नातवाला सांभाळत, घर सांभाळत दिवसाला सॉल्डरिंगचे १०००-१५०० टाके सहज लावतात.

पुढे एलईडी उत्पादने स्वस्त झाल्यावर सागर आणि नेत्रा यांनी पुनर्भरणीय उत्पादनांवर (rechargable products) लक्ष केंद्रित केले. टाटा पॉवर हे त्यांच्या सुरुवातीच्या नामवंत ग्राहकांपैकी एक. उत्पादनाचा दर्जा हा यशाचा पाया असतो, या त्यांच्या विश्वासाला टाटा पॉवरने दीर्घकालीन कराराद्वारे (lifetime contract) दुजोरा दिला.

पुढे त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या विशेष पुनर्भरणीय (rechargable) बॅटऱ्यांनी रेल्वे क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. रेल्वे गार्ड आणि मोटरमन सिग्नल देण्यासाठी वापरत असलेल्या विशेष बॅटऱ्यांच्या उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सुमारे चारशेहून अधिक उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘VC – व्हिज्युअली चॅलेंज्ड’ या त्यांच्या ब्रँडच्या उत्पादनांनी सर्व तांत्रिक कसोट्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि महत्त्वाच्या ऑर्डर्स प्राप्त केल्या. गुणवत्ता, नित्यनूतनता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

परंतु या दांपत्याचा प्रवास केवळ स्वतःपुरता उद्योग उभारण्यापुरता आणि पैश्यांची धन करण्यापुरता मर्यादित राहिला नाही.

रुईया महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांना संतोष फडके, अनघा पेंडसे यांच्यासारख्या समविचारी मित्रमैत्रिणी भेटल्या, महाविद्यालयानंतरही हे मैत्र अबाधित राहिलं. आणि या सर्वांच्या परस्पर सहकार्य, संवाद आणि सामूहिक विचारातून, दृष्टिबाधित व्यक्तींना आणि एकंदरीतच समाजातील गरजूंना प्रशिक्षण देण्यासाठी IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली.

या सगळ्यांना एक साधी पण महत्त्वाची गोष्ट उमगली होती—लोकांना सहानुभूतीपेक्षा संधीची अधिक गरज असते.

अनेक दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये त्यांनी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिस्त आणि अपार क्षमता पाहिली. समाज जिथे “हे लोक काय करू शकत नाहीत?” असा प्रश्न विचारत होता, तिथे त्यांनी “त्यांना संधी मिळाली तर ते काय करू शकतील?” हा प्रश्न विचारला.

…… आणि त्या एका प्रश्नाने अनेक आयुष्यांची दिशा बदलली.

ट्रस्टने दानधर्माऐवजी सक्षमीकरणाचा मार्ग निवडला. कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे त्यांच्या कार्याचे केंद्र बनले. इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण, संगणक साक्षरता, उद्योजकता मार्गदर्शन, व्यावसायिक मराठी, क्रीडा आणि जनजागृती उपक्रमांद्वारे अनेकांना नवी दिशा मिळाली.

प्रशिक्षित हातांनी तयार होणारा प्रत्येक एलईडी दिवा जणू एक संदेश देत होता—

“मी सक्षम आहे. ”

कार्यशाळा वाढल्या. प्रशिक्षणार्थी उत्पादने तयार करू लागले, उपकरणे दुरुस्त करू लागले, स्वतः कमाई करू लागले. अनेकांना वर्षानुवर्षांनी आत्मविश्वास मिळाला. चिंतेत जगणाऱ्या कुटुंबांना आशेचा किरण दिसू लागला.

या प्रवासात नेत्रा यांनी भावनिक आधाराची महत्त्वाची भूमिका निभावली. व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपुलकीची ऊब दिली. लोकांना ‘प्रकरण (case study)’ म्हणून नव्हे, तर स्वप्ने आणि क्षमता असलेल्या व्यक्ती म्हणून वागवले.

मोठ्या ऑर्डर्स आल्या असताना त्यांची पूर्तता करण्यात आणि प्रशिक्षण कार्यशाळांच्या पूर्वतयारीत सागर यांच्या आईंचा सहभाग आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.

सागर यांची दृष्टी केवळ उद्योग किंवा प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर नेण्याची त्यांची वृत्ती तितकीच प्रेरणादायी आहे.

अलिबाग येथील कुटुंबाच्या सामायिक मालकीची जमीन अनेक वर्षे वाद आणि मतभेदांचे कारण बनली होती. सागर यांच्या मेहुण्याने (मावशींच्या जावईबापूंनी) या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्याची कल्पना मांडली. सागर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात पुढाकार घेतला. आज तीच जागा एका सुंदर रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्याचा लाभ सर्व भागीदारांना मिळत आहे.

समाजहित आणि लोकांना जोडण्याच्या या कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. अलीकडेच अमरावती येथे सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या मातृसंस्था असलेल्या रुईया महाविद्यालयाचा ‘रायझिंग स्टार’ हा सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

आज ट्रस्टने ५० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि १००० हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी ३५०हून अधिक जण दृष्टीबाधित आहेत, अनेकजणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, तर काही स्वमग्न (ऑटिस्टिक) आहेत. विविध कारणांनी गरजू असलेल्या या सर्वांना एकच व्यासपीठावर समान संधी देण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा विशेष पैलू आहे.

सागर आणि नेत्रा यांनी या सगळ्यांना केवळ मदत केली नाही; त्यांनी हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीतील १८ कामगारांपैकी १४ जण दृष्टिबाधित आहेत.

एकेकाळी ज्या शैक्षणिक संस्थांनी सागर यांना इलेक्ट्रॉनिक्स शिकवण्यास नकार दिला होता, त्याच संस्था आज त्यांना प्रशिक्षक म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रित करताना दिसतात.

काही प्रशिक्षणार्थी आज स्वतः मार्गदर्शक झाले आहेत. काहींनी स्वतःचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. जे पालक कधीकाळी भविष्याबद्दल साशंक होते, ते आज अभिमानाने बोलतात.

या यशोगाथा कदाचित वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत फारशा झळकत नसतील; पण त्यांनी अनेक आयुष्ये उजळवली आहेत.

कारण सागर आणि नेत्रा पाटील यांनी केवळ दिवे तयार केले नाहीत—

…… त्यांनी माणसांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला आहे.

अधिक माहितीकरता : 

IIG Education and Development Trust,

संपर्क :  शॉप क्रमांक २बी, जिजामाता चाळ, कोकणीपाडा, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई, ४०००६८. मो ९३२२०१७१४०.

डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी

महात्मा गांधी हे टागोरांपेक्षा बरेच लहान. पण दोघे अगदी सख्खे मित्र होते. गंमत म्हणजे ही मैत्री ते समविचारी आहेत म्हणून होती कां, तसेही नाही. आपण म्हणतो नं, ‘तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय गमेना’ तसा प्रकार आहे हा! कित्येक बाबतीत त्यांच्यात मतभेद होते, कधी कधी टोकाचे, पण त्यामुळे मैत्रीत बाधा आली नाही.

त्यांच्यातल्या मतभेदाला सुरवात, गांधींजींनी शांतिनिकेतनला दिलेल्या पहिल्या भेटीपासूनच झाली. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आले आणि लगेंच ६ मार्च १९१५ ला त्यांनी शांतीनिकेतन ला पहिली भेट दिली. तोपर्यंत टागोर जगप्रसिद्ध झाले होते, कारण १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.

शिक्षणाबद्दलच्या विचारात दोघांमध्ये मूलभूत मतभेद होते. गांधीजींच्या मते शिक्षण हे व्यावहारिक व सर्वांगीण विकासावर केंद्रित हवे. जागतिक प्रवाहाशी जुळवून घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार त्यांना गरजेचा वाटत नव्हता. याउलट टागोरांचा शिक्षण विषयीचा दृष्टिकोन वैश्विक होता. तरीही भारतीय परंपरांचा पण शिक्षणात अंतर्भाव व्हायला हवा म्हणून त्यांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली, जिथे भारतीय परंपरा व आंतरराष्ट्रीय मूल्ये यांचा मेळ घालणारे शिक्षण देणारी व्यवस्था होती. यामुळे गांधीजी शांतिनिकेतनच्या शिक्षण पद्धतीवर संतुष्ट नव्हते.

गांधींच्या मते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी. नोकर, स्वयंपाकी, झाडूवाले, पाणीवाले यांची गरज नसावी. त्यांनी हे मत टागोरांकडे व्यक्त केलं व टागोरांनीही कोणताही किंतु न बाळगता ही पद्धत अंमलात आणली. तो दिवस (१० मार्च) ‘गांधी दिवस’ म्हणून रविंद्रनाथांनी घोषित केला. आजही तेथे या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते व विद्यार्थी सर्व कामे करतात.

स्वातंत्र्य, समता व मनुष्य धर्म यांची दोघांनाही ओढ आहे पण गांधीनी लोकलढ्याचा मार्ग अवलंबिला. मात्र टागोरांना अहिंसात्मक लढा प्रसंगी हिंसक होतो याचे भय वाटे. हा लढा सामान्य माणसातील सुप्त सामर्थ्य जागे करतो यावर दोघांचा विश्वास होता. पण विराट समुदायाच्या भावनांना गांधी ऐनवेळी कसा आवर घालणार ही चिंता टागोरांना होती. उपोषणात टागोरांना अतिरेक दिसे तर गांधीजींना त्यात आत्मशुद्धी दिसे. उपोषण हा एक अहिंसक जुलूम आहे ही टागोरांची भूमिका तर तो नैतिक बळाचा वापर आहे ही गांधीजींची भूमिका होती.

दोघेही वसाहतवाद व भांडवलशाहीच्या विरोधात होते. पण गांधीजींनी राजकारणाचा मार्ग स्विकारला आणि टागोरांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्राचा! असहकार चळवळ, शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, परदेशी कपडे जाळणे याला टागोरांचा प्रचंड आक्षेप होता.

रोज अर्धा तास प्रत्येकाने चरखा चालवावा असे आवाहन गांधीजींनी केले, तेव्हा टागोर उपहासाने म्हणाले, “जर यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत होणार असेल तर मग अर्धा तास का, साडे आठ तास का नाही?” एकूणच गांधींच्या चरखा प्रकरणावर ते टीका करत, व यामुळे भारत पुन्हा मध्ययुगात जाईल, अशी शंका व्यक्त करत.

स्वातंत्र्य चळवळीत उपेक्षित घटकांसह समाजातील सर्व घटकांच्या समावेशाचा आग्रह गांधीजींनी धरला. हिंदू मुस्लिम ऐक्य, दलितांची उन्नती यावर त्यांनी भर दिला. ते अनेकदा पाश्चात्त्य संस्कृतीवर टीका करत. याउलट टागोरांचा राष्ट्रवाद विश्व व्यापी व मानवतावादी होता.

बिहारच्या भूकंपानंतर गांधीजी म्हणाले होते, “हरिजनांना अस्पृश्य म्हणून वाळीत टाकल्याबद्दलची ही शिक्षा देवानेच दिली आहे. “

यावर टागोरांनी कडाडून टीका केली. कारण ते अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या मते लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. वैज्ञानिक प्रगतीनेच राष्ट्र समृद्ध होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता.

दोघेही अहिंसा, सहिष्णुतेवर आधारित मानवतावाद व निसर्ग प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही आत्मनिर्भरतेच्या बाजूने होते. दोघेही गरिबी व दयनीय अवस्थेत जगणाऱ्यांच्या बद्दल प्रेम व सहानुभूती बाळगून होते. दोघेही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा व आध्यात्मिक इतिहासाचा अभिमान बाळगणारे होते.

गांधीजींच्या मते, माणसे सगुण ईश्वराची पूजा करत असतील तर ती मानसिक गरज म्हणून पहावी. जनसामान्यांना दिलासा देणारा परमेश्वर त्यांना मान्य होता. टागोरांचं उपनिषदीय अध्यात्म सामान्यांच्या पचनी पडणारं नाही म्हणून त्यांना पसंत नव्हतं.

गांधीजींना ईश्वर सत्यामधे दिसत होता तर टागोरांना ईश्वर प्रेमात दिसत होता व दोघांचे मार्गही वेगळे होते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्य मिळविण्याचा प्रयत्न केला. तर टागोरांनी सहकार्य, परस्पर आदर व सहिष्णुतेच्या मार्गाने प्रेम म्हणजेच ईश्वर मिळविण्याचा प्रयत्न केला.

दोघांना एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता. दोघे एकमेकाचे प्रचंड चाहते होते. मूल्ये सारखीच पण तपशिलात मतभेद होते. त्यांच्यात सतत पत्र व्यवहार होत होता. त्यात मतभेदांची मोकळी चर्चा व्हायची कारण दोघांनाही परस्परांची थोरवी मान्य होती. आणि त्यामुळेच गांधीजींनी टागोरांचा उल्लेख ‘गुरुदेव’ असा केला तर टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली 

दोघांनीही मैत्रीचे नाते कसे निभावले याचीही उदाहरणे आहेत.

अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या ब्रिटिश प्रस्तावाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटल्याने टागोर स्वतः त्यांना भेटायला गेले. त्यावेळी सुदैवाने इंग्रज सरकारने त्यांची मागणी मान्य केली होती आणि या नेत्याने उपोषण सोडले. त्यावेळी महात्माजींनी टागोरांना स्वतः रचलेले गाणे गाण्याची विनंती केली आणि खरोखरच टागोरांनी ‘जीवन जाखन शुकै ए जय करुणाधारे’ हे गाणे म्हटलं.

विश्वभारतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधी गोळा करणे या उद्देशाने नृत्य नाट्य पथक घेऊन टागोर दिल्ली दौरा करत होते. ही बातमी गांधीजींपर्यंत पोहोचली. इतक्या उतार वयात निधी गोळा करण्यासाठी त्यांना फिरताना पाहून गांधीजींना अतीव दुःख झाले. गांधीजी त्यांना भेटले व त्यांच्या पैशाची व्यवस्था ही केली.

टागोरांच्या मृत्यूच्या आधी एक वर्ष म्हणजे १९४० मध्ये गांधीजी कस्तुरबांसह या आजारी कवीला भेटायला गेले होते. टागोरांनी त्यांना विनंती केली की आपल्या नंतर गांधींनी विश्वभारतीचा कार्यभार स्वीकारावा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१ मध्ये विश्वभारती ला भारत सरकारने केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली.

एकाच वेळी एकमेकांचे विरोधक व प्रशंसक असणाऱ्या या दोन महान विभूतीं सारखी शुद्ध, स्पष्ट व आदरयुक्त मैत्री पुन्हा होणे नाही.

—–

☆ गीत : ८२ ☆

TIME is endless in thy hands, my lord. There is none to count thy minutes.

Days and nights pass and ages bloom and fade like flowers. Thou knowest how to wait.

Thy centuries follow each other perfecting a small wild flower.

We have no time to lose, and having no time we must scramble for our chances. We 

are too poor to be late.

 

And thus it is that time goes by while I give it to every querulous1

 man who claims it, and thine altar is empty of all offerings to the last.

 

At the end of the day I hasten in fear lest thy gate be shut; but I find that yet there is time.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८२ ☆

मोजतसे क्षण।

कोण तुझे पण।

काळाचे बंधन।

तुला नाही॥

 

दिस राती जाती।

ऋतु सरताती।

युगे युगे भक्ती।

वाट पाही॥

 

काळ तुझ्या हाता।

फुले उमलता।

आणिक सुकता।

काय राही॥

 

सृष्टी आवडीने।

निर्मि सवडीने।

काळ कावडीने।

पाणी भरी॥

 

आम्ही तो पामर।

काळाचे चाकर।

मिळता भाकर।

सारे साहू॥

 

असे ज्याचा त्याचा ।

आपल्या वाट्याचा।

त्याच्या प्रसादाचा।

कालखंड॥

 

माझ्या वेळे साठी।

सगेच भांडती।

कसा तुझ्या साठी।

वेळ काढू॥

 

साधे ना सकळ।

न काढी जो वेळ।

तो तुझ्या जवळ।

जाता न ये॥

 

दिसाच्या शेवटी।

येतो तुझ्या कुटी।

दार जगजेठी।

लावू नको॥

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८३ ☆

MOTHER, I shall weave a chain of pearls for thy neck with my tears of sorrow.

The stars have wrought their anklets of light to deck thy feet, but mine will hang upon thy 

breast.

Wealth and fame come from thee and it is for thee to give or to withhold them. But this my sorrow is absolutely mine own, and when I bring it to thee as my offering thou rewardest me with thy grace.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८३ ☆

जरी चंद्रतारका घेऊन येती

पैंजण रुणझुण तुझ्या पदाला॥

*

ओवीन म्हणतो तुझियासाठी

माझ्या दुःखाश्रुंची माला

जी रुळेल तव वक्षावरती

हृदयाशी करी हितगूजाला॥

*

मानमरातब आणिक मत्ता

तूच देतसी, तूच घेतसी

दुःखावर परी माझी सत्ता

अर्पित तुजला, घे हृदयासी॥

*

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत : ८४ ☆

IT is the pang of separation that spreads throughout the world and gives birth to shapes innumerable in the infinite sky.

It is this sorrow of separation that gazes in silence all night from star to star and becomes lyric among rustling leaves in rainy darkness of July.

It is this overspreading pain that deepens into loves and desires, into sufferings and joys 

in human homes; and this it is that ever melts and flows in songs through my poet’s 

heart.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८४ ☆ 

☆ 

विरह वेदना भुवना व्यापिते

अंबरी अगणित रचना निर्मिते॥

*

नीरवतेतुन ती अंधारी फिरते

सहसंवेदना ताऱ्यांत शोधिते॥

*

तीच आणखी बनुनी गीते 

पाऊसओल्या पानी सळसळते॥

*

ही अनुभूती वैश्विक असते

प्रेम, अपेक्षा यातही रुजते॥

*

आनंद, यातना घरोघरी पाहते

तीव्रता तयांची हृदयी सांडते॥

*

माझे कवीमन त्यात अडकते

काव्य त्यातुनी जन्मा येते॥

☆ 

– क्रमशः भाग २८

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी ☆

सुनिता जोशी

 

? इंद्रधनुष्य ?

☆ बायो क्लॉक… – लेखक – रणजीत भोसले ☆ प्रस्तुती – सुनिता जोशी

जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो; पण बऱ्याच वेळा, गजर न वाजता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो. यालाच बायो-क्लॉक म्हणतात. बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की, माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते. तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरु होतात, असेही त्यांना ठामपणे वाटते. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वत:च आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात. म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात. खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पध्दतीने प्रोग्राम करतो. चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत! चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात. या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट आहे. आणि म्हणूनच! तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या! हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा!

१. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा. नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो.

२. ४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा. वृध्दत्व हे १२० वर्षांनंतरच सुरु होते, असे स्वत:ला पटवा.

३. केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा. नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा. कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा. हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला वृध्द समजू नका.

४. खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करु नका. उदा. हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे असे विचार टाळा. त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की, ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुध्द होत आहे आणि माझ्यासाठी अमृतासमान आहे. हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल. अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानिकारक ठरतात.

५. सदैव सक्रिय राहा. चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा.

६. वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते, यावर विश्वास ठेवा. (हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)

७. आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत. जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही. म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा! रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मन मोकळं हसा!

८. मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही! तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते. बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा! दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल! जगण्याचा आनंद घ्या….

लेखक – रणजीत भोसले

प्रस्तुती : सुनीता जोशी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामियाचा केक… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

? इंद्रधनुष्य ?

☆ लामियाचा केक☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

काही वर्षांपूर्वी एका जंगल सफारी दरम्यान वाघाचे दर्शन घेण्यासाठी आमची धडपड चालू होती. हरणं, गवे, हत्ती दिसले पण वाघ काही दिसेना. परतीच्या वाटेवर दूर एका झाडामागे मला काहीतरी भास झाला. “वाघच असावा बहुतेक, ” मी म्हणाले, तर आमचा गाईड हसून म्हणाला, ” तो वाघापेक्षाही भयानक दोन पायांचा प्राणी आहे. ” या विधानाच्या सत्यतेचा अनुभव अनेक वेळा नराधमांच्या कृत्याच्या बातम्या वाचून आपल्याला येतो. क्रौर्य आणि हिंसेने बरबटलेल्या अनेक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या रूपाने कधी बाहेर येतात तर कधी सामूहिक अत्याचार आणि दंगलींच्या रूपात दिसतात.

जगाच्या इतिहासात प्रचंड हिंसाचार आणि क्रौर्य घडतं ते युद्धाच्या वेळी. सीमेवरील सैनिकच याचे बळी ठरतात असे नाही तर लहान मुलं, स्त्रिया हजारो निरपराध जीवांचं आयुष्य आणि अनेक पिढ्या युद्धामुळे उध्वस्त होतात. कधीही भरून न येणाऱ्या भळभळणाऱ्या जखमा युद्धामुळे तयार होतात.

लामियाची ही कथा अशीच एक. 1990 साल, इराक मधील एका छोट्या खेड्यात आपल्या आजी – बीबी सोबत राहणारी नऊ वर्षाची एक गोड मुलगी लामिया आणि तिचा हिंदी नावाचा एक कोंबडा. लामिया आपल्या काबाडकष्ट करणाऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होती. आजीला ती प्रत्येक कामात मदत करत असे. कंदीलाच्या प्रकाशात घरचा अभ्यास करणारी, आपल्या मित्रासोबत आपले स्वप्न बोलून दाखवणारी निरागस लामिया. सद्दाम हुसेन इराकवर राज्य करत होता. या तानाशहाचे गोडवे गाऊन शाळेतला दिवस सुरू होतो. ‘आमचं रक्त, आमचा आत्मा, आमचं सर्वस्व आम्ही त्याग करू आमच्या सद्दाम साठी. शत्रू ने आमचं अन्नपाणी, औषधे बंद केले, एवढेच काय आम्ही श्वास घेतो ती हवा थांबवली तरी आम्ही झुकणार नाही. ‘ अशी सद्दामच्या जयजयकाराची प्रार्थना होऊन शाळा सुरू होते. सायरन चे आवाज आणि आकाशात घिरट्या घालणारी विमानं छातीत धडकी भरत असतात. सद्दाम हुसेन चा वाढदिवस शाळेत साजरा करायचा असतो. त्यासाठी मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या शिक्षक काढतात. एक विद्यार्थी शाळा स्वच्छ करेल, एक ताजे फळं आणेल. केक कोण आणणार?

केक आणण्यासाठी चिठ्ठी निघते ती लामियाच्या नावाची. शाळेत रोज डबाही आणू न शकणारी लामिया सगळ्यांसाठी केक कसा आणणार? घरी पोहोचल्यावर आपल्या लाडक्या बीबीला ती ही बातमी सांगते. शेजारणी कडून ते आजीला आधीच समजलं असतं. शेजारणीचा मुलगा सईद लामियाचा मित्र. रात्री बीबी आणि लामिया केकला काय काय साहित्य लागणार, याची यादी करतात मैदा, साखर, बेकिंग पावडर इत्यादी. लामियाच्या वडिलांची आठवण म्हणून ठेवलेलं एक घड्याळ आणि अशाच काही जुन्या वस्तू झोळीत घेऊन लामिया, बीबी आणि हिंदी, लामियाचा कोंबडा दुसऱ्या दिवशी शहरात जायला निघतात. शहरात गेल्यावर बीबी काही जुन्या वस्तू विकून एक छान ड्रेस लामियाला घेऊन देते. मग ती तिला एका जुन्या ओळखीच्या संपन्न घरात घेऊन येते. ती म्हणते, ” मी आता म्हातारी झाली आहे. तुझं शिक्षण, खाणं- पिणं मला आता झेपणार नाही. तू आता यांच्यासोबत रहा. लामियाचा चेहरा कावरा -बावरा होतो.

“बीबी, तू माझ्यावर रागावली का? मी सगळं करेन. कपडे धुवेन. भांडी घासेन. तू म्हणशील ते ऐकेन. मला तू इथे नको राहायला सांगू. मी तुझ्याबरोबर येईन. तू केक साठी माझ्यावर रागावली आहेस का? ” बीबी काही उत्तर देईना. संधी साधून लामिया पळाली. तिला बिचारीला वाटलं की केक साठी बीबी आपल्यावर रागावलेली आहे. मी केकचं साहित्य जमवलं तर बीबी आपल्याला परत घरी घेऊन जाईल. बीबी लामियाला शोधत याला त्याला विचारता विचारता पोलीस स्टेशनमध्ये येते. पोलीस तिला काही दाद देईना. तिकडे लामिया गावात भटकत राहते. योगायोगाने तिचा मित्र सईद तिला भेटतो. केकचं साहित्य जमवण्यासाठी दोन लहान मुलांची केविलवाणी धडपड. कधी चोरी करतात, कधी लोक त्यांना फसवतात, कधी कोंबडा हरवतो, कधी भांडतात, रुसतात तर कधी एकमेकांसाठी जीव ओवाळतात. हॉस्पिटलमध्ये हातपाय तुटलेले लोक जेव्हा सईदला भेटतात तेव्हा सईद त्यांना विचारतो, ” अमेरिकन बॉम्ब मुळे तुटला का तुझा हात? “

इकडे बिबीला एक भला माणूस भेटतो. अंध:कारातही कुठेतरी पणतीची मंद वाद तेवत असते, तशीच या क्रौर्याने भरलेल्या या जगात भली माणसं अधून मधून भेटत राहतात. बीबी त्या माणसाच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये लामिया हरवल्याची तक्रार करते. तेवढ्यात सायरनचा आवाज येतो आणि बीबी खाली कोसळते. हा भला माणूस बीबीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो. लामियाची शहरातली पायपीट सुरूच असते. एका दुष्ट माणसाच्या तावडीतून पळून येताना एका मिरवणुकीत ती घुसते आणि पोलीस तिला पकडतात. त्या भल्या माणसाला अखेरीस लामिया सापडते …

तो त्वरेने तिला हॉस्पिटलमध्ये आजीला भेटायला घेऊन जातो पण आजी बेडवर नसते. लामियाला भेटण्याअगोदरच बीबीचा मृत्यू झालेला असतो. बीबीचं प्रेत घेऊन दोघे परत खेड्यात येतात. बीबीला दफन केल्या जातं. आता सईदची आई लामियाला केक करायला शिकवते. या केक साठी लामियाने आजीच्या मरणाचं दुःख झेललं असतं. अनेक हालअपेष्टा सोसून जमा केलेलं ते केकचे साहित्य. अखेर तो वाढदिवसाचा दिवस येतो. सद्दामचा जयजयकार होतो. शिक्षक लामियाचा केक, इतर मुलांनी आणलेली फळं टेबलवर मांडून ठेवतात. केकचा एक घास खाऊन बघतात आणि लामियाचं कौतुक करतात. डोळ्यात अश्रू आणि दुःखी चेहऱ्याने लामिया ते सगळं बघत असते. इतक्यात सायरनचा आवाज येतो, पाठोपाठ बॉम्ब पडल्याचा आवाज. सगळी मुले बेंच खाली लपतात. लामिया आणि तिचा मित्र एकमेकांकडे बघत बेंच खाली लपलेले असतात. तेवढ्यात आणखी मोठा आवाज येतो. बॉम्ब तिच्या वर्गावरही पडतो. अर्धा वर्ग उद्ध्वस्त होतो. एका क्षणात नाहीसे होतात- शिक्षक, वर्गातली मुलं आणि लामियाने आणलेला केकही. लामिया आणि तिचा मित्र अश्रूपूर्ण नजरेने एकमेकांकडे बघत असतात आणि याच वेळी कुठेतरी आनंदी म्युझिक सुरू असतं. सद्दाम हुसेनच्या राजवाड्यात वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला असतो. छतापर्यंत मोठा केक. दिव्यांचा झगमगाट. पदार्थांची रेलचेल…. सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा, क्रौर्य आणि हिंसेतून मिळालेला बीभत्स आनंदोत्सव.

ही कथा आहे, “The president’s cake, ” या सिनेमाची.

आजही जगात हजारो निरागस मुलं अनाथ होतात, हजारो बेघर होतात, हजारो भूकबळी पडतात. युद्ध काही संपत नाही. सत्तेची न संपणारी राक्षसी आकांक्षा, मत्सर, क्रौर्य, विवेक बुद्धीचा अभाव यातील प्रत्येक गोष्ट विनाशकारी ठरते आणि या सगळ्या एकत्रित आल्या तर काय होणार?

ऐश्वर्यमीर्ष्या नैर्घृण्यं क्षीबत्वं निर्विवेकता|

एकैकं किं न यत् कुर्यात् पञ्चाङ्गित्वे तु का कथा ॥

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

 (एक डॅाक्टरची आई)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दक्षिण भारतात ६०, ७०, ८०, ९० आणि १०० व्या वर्षाचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा आहे, याचे कारण:

आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० ही वर्षे इतक्या थाटामाटात का साजरी करतो? या आकड्यांमागे काही *आध्यात्मिक* अर्थ आहे की या केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत?

याचे उत्तर महाभारतातील एका प्रभावी कथेत दडलेले आहे—राजा ययातीची कथा.

राजा ययातीचे आयुष्य ऐश्वर्य, सुख आणि यशाने परिपूर्ण होते. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो आतून हादरला. सखोल चिंतनानंतर त्याला एक गहन सत्य उमजले:

सुखाला मर्यादा आहेत, पण इच्छेला कधीच अंत नसतो. “

या एका जाणीवेने त्याचे आयुष्य बदलले. त्याने वृद्धत्वाचा स्वीकार केला आणि स्पष्ट केले की मानवी आयुष्यात पाच आंतरिक वळणे असतात—जी वयावर नाही, तर समजूतदारपणावर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० वर्षांच्या टप्प्यांशी तंतोतंत जुळतात. चला तर मग, हे टप्पे सोप्या भाषेत समजून घेऊया.

६० वर्षे – षष्टी:

मन साठवण्याकडून समजून घेण्याकडे वळते.

वयाच्या ६० व्या वर्षी शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात बदल होतो. “मला अजून किती मिळू शकेल? ” हा प्रश्न हळूहळू मावळतो आणि “आता खरंच महत्त्वाचं काय आहे? ” हा प्रश्न त्याची जागा घेतो.

येथे आत्मचिंतन सुरू होते. आता गोंगाट, टाळ्या किंवा इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची गरज उरत नाही. आता ओढ असते ती केवळ स्पष्टतेची. हा ऱ्हास नाही—तर महत्त्वाकांक्षेला मिळालेली परिपक्वतेची जोड आहे.

७० वर्षे – भीमरथ शांती:

स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते.

चाळीशी आणि पन्नाशीमध्ये आपण जगाला आपले म्हणणे पटवून देण्यात वेळ घालवतो. ७० व्या वर्षी एक शांत बदल घडतो. तुम्ही आता लगेच प्रतिक्रिया देत नाही. वादांचे आकर्षण संपते. *वाद जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे वाटते. *

एक जाणीव प्रबळ होते: “बरोबर असण्यापेक्षा शांत असणे जास्त मौल्यवान आहे. ” म्हणूनच ७० वे वर्ष साजरे केले जाते.

८० वर्षे – सहस्रचंद्रदर्शन / शताभिषेकम:

तुमचे अस्तित्वच एक उपचार बनते.

८० व्या वर्षी लोक तुमच्याकडे केवळ सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी सखोल शोधत येतात—एक असा विश्वास की, “आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते. “

या वयात तुमचे अस्तित्वच एक आशीर्वाद बनते.  शब्दांची गरज उरत नाही. तुमचे असणेच सांगून जाते: “सगळं काही ठीक होतं. आयुष्य आपला मार्ग शोधून घेतं. ” म्हणूनच ८० वे वर्ष पवित्र मानले जाते.

९० वर्षे – नवती:

अहंकार हळूच निवृत्त होतो.

९० व्या वर्षी काहीतरी दुर्मिळ घडते. *तुम्हाला आता लोकांना सुधारण्याची इच्छा होत नाही. * तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिक रित्या घेतल्या जात नाहीत. तुमचे मन सहजासहजी दुखावले जात नाही.

हे अशक्तपणामुळे घडत नाही—तर आयुष्याने तुम्हाला आतापर्यंत पुरेसे दाखवलेले असते. *क्षुल्लक गोष्टी आता तुमची ऊर्जा खर्च करण्यास पात्र नसतात. * एक सात्त्विक शांतता मनात स्थिरावते. ही नम्रताच खरी आध्यात्मिकता आहे.

१०० वर्षे – शतमानम्:

आयुष्य वैयक्तिक कहाण्यांच्या पलीकडे जाते.

१०० व्या वर्षी पोहोचणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या गाठणे नव्हे. ही अशी अवस्था आहे जिथे आयुष्याचे व्यापक चित्र स्पष्ट दिसू लागते.

तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहिलेल्या अनेक चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम हेच खरोखर महत्त्वाचे होते. आणि हे आयुष्य नेहमीच एका अनामिक, दयाळू शक्तीने सावरून धरलेले होते. १०० व्या वर्षी व्यक्ती एक ‘व्यक्ती’ उरत नाही, तर ती एक दैवी ‘अस्तित्व’ बनते.

सार:

आपल्या ऋषीमुनींनी केवळ वयाचा उत्सव साजरा केला नाही. त्यांनी वयासोबत येणाऱ्या आंतरिक परिवर्तनाचा उत्सव साजरा केला.

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात.
  • ७० – शांतता हीच ताकद बनते.
  • ८० – अस्तित्व हेच औषध/उपचार बनते.
  • ९० – अहंकार शांतपणे विरघळतो.
  • १०० – आयुष्य पूर्णत्वास जाते.

वृद्धत्व म्हणजे झिजणे नव्हे.  वृद्धत्व ही एक गाळण्याची प्रक्रिया आहे—ज्यातून केवळ शहाणपण, सौम्यता आणि कृपा शिल्लक राहते.

अर्थात – – 

वयाने मोठे होणे म्हणजे आयुष्य अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होणे होय. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares