मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिले सुर मेरा तुम्हारा ssss … लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ मिले सुर मेरा तुम्हारा ssss … लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्मिता सुहास पंडित ☆

“मिले सुर मेरा तुम्हारा ssssss” 

 – – या अजरामर गाण्याचं बाळंतपण

 “मिले सूर मेरा तुम्हारा ssssss” हे गाणे माहीत नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” ही संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र आली. या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.

विश्वविक्रमी गाणे – १५ ऑगस्ट १९८८ रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार अशोक पत्की. भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियूष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.

लता दीदीची एन्ट्री – खरं तर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी… मला ही संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते. ” 

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे… कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला. याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले आणि मग लतादीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असू द्यात! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

प्रसिद्ध धबधबा – या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे! हाच तो धबधबा आहे जिथं लिरील साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले!

ताजमहाल शूटिंग किस्सा – या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिझर्व्ह पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.

दोन महत्वाच्या रेल्वे – या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी ही रेल्वे येते! महाराष्ट्रातील हे शूटिंग कामशेत जवळील आहे. आहे नं अभिमानाची गोष्ट!

कोरस मंडळींचा मोठेपणा – या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजन्सी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कूल मध्ये झाले आहे.

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार – गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले आणि अवघ्या दहा मिनिटात तो सीन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शूटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री – दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण… त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”. यावर कैलाशजी म्हणाले की, “संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही” आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी – एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखाद गाणं इतकं अजरामर का होतं… त्या मागे किती काय काय घडत असत अन कितीजणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं. ते माहीत असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच!

थोडक्यात सांगायचे तर… असं गाणं पुन्हा होणे नाही!!

 

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा!

 – – रावणाच्या लंकेत पराक्रम गाजवणारे ‘राम’स्वामी परमेश्वरन!

२५ नोव्हेंबर, १९८७. साडे पाच वाजले होते… पहाटेचा अंधार संपत आला होता. रात्री दीड वाजल्यापासून या ठिकाणी अंधारात सापळा रचून, डोळ्यांत तेल घालून बसलो होतो… सर्वांची बोटं ट्रिगरवरच होती. काल संध्याकाळी पक्की खबर आली होती… याच गावात असलेल्या एका घरात अतिरेक्यांनी हत्यारांची मोठी खेप उतरवून घेतलेली आहे. त्यानुसार मी कॅप्टन डी. आर. शर्मांना PATROLING PARTY घेऊन जाऊन खात्री करून घ्यायला पाठवले होते. कॅप्टन शर्मा आणि त्यांचे वीस जवान त्या घराच्या जवळ पोहोचताच, त्यांच्यावर त्या घराजवळ असलेल्या एका मंदिराच्या गच्चीवरून तुफान आणि अचूक गोळीबार झाला! त्यात काही जवान जखमी झाले. कॅप्टन शर्मा तिथून काहीसे मागे आले आणि त्यांनी बटालियन हेडक्वार्टरला संदेश दिला की, ते गाव LTTE अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमच्या ताब्यात असून त्यांचे संख्याबळ अधिक असून त्यांची हत्यारे आधुनिक आणि प्रभावी आहेत!

मी कॅप्टन शर्मांना तिथेच सुरक्षित जागी थांबून राहण्याचे आदेश दिले आणि निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी घेऊन घटनास्थळाकडे त्वरीत कूच केले. तिथे पोहोचायला मला रात्रीचा दीड वाजला. कारण अंतर बरेच होते, रस्त्यात जंगल होते, त्यामुळे सावधानतेने जाणे गरजेचे होते.

आम्ही तिथे पोहोचलो तर त्या भागात एकदम स्मशान शांतता होती. त्या घराच्या जवळ एक ट्रक उभा होता. आम्ही त्या घराला वेढा घातला आणि सकाळी उजाडताच कारवाई करण्याची योजना आखली. पण सकाळी साडेपाच पर्यंत काहीही झाले नाही. त्या घरातून काहीही हालचाल झाली नाही. त्या घरात कुणीही नव्हते, हत्यारेही नव्हती. त्यामुळे आम्ही तिथून परतण्याचा निर्णय घेतला… काही अंतर चालतो न चालतो तोच… आमच्यावर तिथून अगदी जवळच असलेल्या जंगलातून जोरदार गोळीबार सुरु झाला. HMG अर्थात हेवी मशीन गन, एके-४७, हातगोळे इत्यादी शस्त्रांनी आमच्या तुकडीवर प्राणघातक हल्ला झाला! पहिल्याच फेरीत आमचे सुमारे दहा बारा जवान धारातीर्थी पडले!

मी कॅप्टन शर्मांना तिथूनच गोळीबाराला उत्तर देण्याचे आदेश देत ज्या जंगलातून हल्ला सुरु होत्या त्याच्या मागच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला… कारण अजून तसे उजाडले नव्हते… आहे त्या अंधाराचा फायदा घेत, थोड्या लांबच्या रस्त्याने जाऊन शत्रूवर मागून प्रहार करण्याची माझी योजना होती. त्यानुसार मी माझ्या वीस सैनिकांना घेऊन निघालो. गोळीबाराचा आवाज येत होता, त्या दिशेने गेलो… एवढ्यात अंधारातून माझ्या छातीवर रायफल टेकवली गेली… मोठा आवाज झाला आणि त्या रायफलमधून सुटलेली एक गोळी माझ्या बरगड्या फोडत छातीत घुसली… तो धातूचा लालबुंद तापलेला गोलाकार गोळा… खोलवर घुसला… मांस जाळत, चिरत! रक्ताची चिळकांडी उसळली… डोळ्यांपुढे अंधारी आली… आई, बाबा, पत्नी डोळ्यांसमोर दिसू लागली… आता त्यांची कधीही भेट होणार नाही! लष्करात आलो तेंव्हाच समजलं होतं… कुठल्या तरी गोळीवर आपले नाव निश्चित लिहून ठेवले गेले असेल तर त्या गोळीला रोखू शकणार नाही कुणीच. आणि तशी गोळी बनली नसेलच तर मात्र मला काहीही होणार नव्हतं. मरण तर काय कुठेही, कसेही येतेच. देशसेवेत आले मरण तर सोन्याहून पिवळे! माझ्या हातातली रायफल गळून पडली त्या प्रहाराने… पण त्याच उजव्या हाताने मी ती माझ्यावर डागली गेलेली रायफल, तिची नळी पकडली आणि जोर लावून माझ्याकडे खेचली… ती रायफल धरणारा दचकून मागे सरला… त्याला कल्पनाच नव्हती की ज्याला आपण छातीत गोळी घातली आहे… तो असं काही करेल! मी वायूवेगाने रायफल पेलली… ट्रिगर दाबला आणि समोरच्याच्या छाताडात एक नव्हे, दोन नव्हे… सलग पाच-सहा गोळ्या मारल्या… त्याच्या तोंडून मोठी किंकाळी आणि शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या… धूर निघाला! आणि तो धाडकन कोसळून पडला!

आता अतिरेक्यांनी हल्ल्याचा वेग वाढवला तसा मी ही आहे त्या जागेवरून माझ्या तुकडीला जोरजोरात सूचना देत राहिलो.. माझ्या महार रेजिमेंटची युद्ध घोषणा दिली… बोल… हिंदुस्तान की जय! श्रीलंकेत माझ्या भारताचे, हिंदुस्तानचे नाव त्या जंगलात गुंजत राहिले… माझे जवान लढत राहिले… काही वेळाने आपल्या मदतीसाठी आणखी सैनिक तिथे पोहोचले… मी रक्तबंबाळ… घायाळ… घरच्या, घरातल्यांच्या… माझ्या मायभूमीच्या आठवणीत डोळे मिटले… ते कायमचेच! १३ सप्टेंबर २०२६ रोजी ८० वर्षांचा झालो असतो!

आमचे मूळ गाव केरळमधल्या कोट्टयमजवळचे रामपूरम. आमचे कुळ किलीमंगलम नावाचे. वडील शंकरनारायनन आणि आई जानकी पोटासाठी मुंबईत येऊन राहिले आणि इथेच १३ सप्टेंबर, १९४६ रोजी माझा जन्म झाला. माझे शालेय शिक्षण आणि विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण सायन येथील SIES अर्थात साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात झाले. घरची लष्करी पार्श्वभूमी नसतानाही मी देशाच्या सेवेसाठी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. आणि The Officers’ Training School, Chennai (जी आता Officers’ Training Academy म्हणून ओळखली जाते) मधून १९७२ या वर्षी लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित झालो. मला १५, महार रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले. पुढील आठ वर्षे मी या रेजिमेंटमध्ये राहिलो. आम्हांला भारताच्या ईशान्येकडील राज्यांत देशविरोधी शक्तींचा मुकाबला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ती मी यथाशक्ती पार पाडली. ‘बोलो, हिंदुस्तान की जय! ’ ही आमची युद्ध घोषणा आणि ‘यश सिद्धी’ हे आदर्श वाक्य आहे. मला माझी मातृभाषा मल्याळम तर येत होतीच, पण माझी जन्मभूमी असलेल्या मुंबईची मराठीही अवगत होती आणि… तमिळ सुद्धा! माझे सैनिक मला ‘पारी साहेब’ म्हणत… परमेश्वरन आडनावामुळे असेल बहुदा! लष्करी अधिका-यांनी नेहमी पुढे राहून नेतृत्व करावे, अशा विचारांचा मी होतो… त्यामुळे ईशान्येत अनेक अतिरेकीविरोधी मोहिमांत मी नेहमी आघाडीवरच राहिलो! ‘१५, महार’ मधून मला पुढे ‘५, महार’ मध्ये पाठवले गेले.

श्रीलंका आपला शेजारी देश… केवळ १८. ६ समुद्री मैल किंवा किलोमीटर्सच्या भाषेत ३४. ५ किलोमीटर्स एवढेच अंतर. या देशाशी आपला संबंध अगदी पुराण काळापासूनचा आहे. पुढे तमिळनाडूमधून मोठ्या संख्येने शेतमजूर श्रीलंकेत स्थायिक व्हायला गेले. श्रीलंकेतील बहुसंख्य ‘सिंहली’ समुदाय आणि मूळच्या भारतीय पण आता श्रीलंकेत कित्येक पिढ्यांपासून स्थायिक झालेल्या समुदायामध्ये संघर्ष पेटला. तमिळ लोकांपैकी काहींनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम अर्थात L. T. T. E. ही सशस्त्र संघटना स्थापन केली आणि श्रीलंका सेनेशी गृहयुद्ध सुरु केले. काही राजकीय उद्दिष्ट लक्षात घेऊन भारताने श्रीलंका आणि तमिळ बंडखोर यांच्यात परस्पर शांतता राखण्यासाठी श्रीलंकेत ‘शांतिसेना’ अर्थात IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्स’ पाठवायचे ठरवले. ५४ व्या पायदळ डिविजनमध्ये ८, महार रेजिमेंटही या शांतिसेनेचा एक भाग बनली… आणि मला या रेजिमेंटमध्ये जबाबदारी देण्यात आली… मला तमिळ भाषा येत होती ही बाबही लक्षात घेतली गेली असावी… श्रीलंकेत तमिळ भाषिक आहेत.. त्यांच्याशी संवाद साधायला माझ्या भाषा ज्ञानाचा उपयोग झाला!

भारतीय लष्कर जो आदेश देईल तो प्राणपणाने पाळण्याची आपल्या सैनिकांची परंपरा आहे… मी ही याला अपवाद नव्हतो! जो देशाविरोधात, देशाच्या लष्कराच्या विरोधात शस्त्र हाती घेईल… तो आमचा शत्रू हे सैनिकांचे धोरण आणि प्रशिक्षण असते… बाकी राजकीय, धार्मिक, सामाजिक बाबी आम्ही शिपाईगडी ध्यानात घेत नसतो!

आरंभी श्रीलंकेतील तमिळ जनतेने शांतिसेनेचे स्वागत केले. परंतु पुढे दुर्दैवाने त्यांनीच भारतीय लष्करावर हल्ले करायला सुरुवात केली. शेजारी राष्ट्रांपैकी काही राष्ट्रं श्रीलंका लष्कराला तर काही राष्ट्रं तमिळ बंडखोरांना शस्त्रपुरवठा करू लागली. शांतिसेनेचे काम असल्याने सुरुवातीला भारतीय लष्कर युद्धाच्या तयारीनिशी श्रीलंकेत गेलेच नव्हते. त्यामुळे आधुनिक, मोठी शस्त्रे सोबत नेण्याचा प्रश्नच नव्हता… आणि इथेच खरी समस्या उभी राहिली!

परंतु उत्तम प्रशिक्षण, शौर्याच्या जोरावर भारतीय सैनिकांनी तमिळ बंडखोरांवर बाजी उलटवली… परंतु त्यासाठी ११७१ सैनिकांना प्राणार्पण करावे लागले आणि ३५०० पेक्षा अधिक सैनिक जायबंदी झाले!

मला माझ्या शौर्याबद्दल भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार ‘परमवीर चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला. परकीय भूमीवर भारतीय सैन्यातून कामगिरी करीत असताना एखाद्या सैनिकास दिले गेलेले हे तसे पहिलेच ‘परमवीर चक्र’! १९६१ मध्ये कांगो देशातील कटंगा येथे संयुक्त राष्ट संघाच्या आंतरराष्ट्रीय सैनिकांचा समावेश असलेल्या शांतिसेनेत अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल कॅप्टन गुरुबचनसिंग सलारिया साहेबांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते. आपला देश युद्धात सहभागी नसताना परदेशातल्या युद्धभूमीवर पराक्रम गाजवल्याबद्द्ल ‘परमवीर चक्र’ मिळवणारा केवळ दुसराच सैनिक ठरलो होतो. तसेच ‘परमवीर चक्र’ मिळवलेला OTAचा माजी विद्यार्थी म्हणून मी आजवर एकमेव आहे!

परंतु… पण… त्याचं काय झालं… माझ्या शौर्याची देशात फार काय सुरुवातीला तर अजिबातच चर्चा झाली नाही. कुसुमाग्रजांनी नेमकं म्हणून ठेवलं आहे… स्तंभ तिथे ना कुणी बांधला… पेटली न वात!

त्यावेळचं भारतातील राजकीय, सामाजिक वातावरण, आंतरराष्ट्रीय संबंध या व अशा अनेक कारणांमुळे अगदी २०२५ पर्यंत माझ्या किंवा श्रीलंकेत भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पवन’ (१९८७-१९९०) मध्ये दिलेल्या ११७१ बलिदानांचा अधिकृत स्मृतिदिन कुठे पाळला जात नव्हता! श्रीलंकेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, काही अधिका-यांचे मृतदेह भारतात आणले जाऊ शकले नाहीत!

‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझ्या कुटुंबास विशेष आर्थिक लाभही दिला गेला नाही… किंबहुना ‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझे नावही काही फारसे प्रसिद्ध नव्हते! श्रीलंका सरकारने मात्र २००८ मध्ये कोलंबो येथे IPKF Memorial निर्माण केले!

२०१८ मध्ये OTA मधले ३७ सेवानिवृत्त लष्करी अधिकारी-मित्र एकत्र आले. त्यांनी सात लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि महार रेजिमेंटच्या सैनिक-अधिका-यांनी त्यात एक लाखाची भर घातली आणि माझा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारला… रायफल हाती आहे माझ्या! OTA मधल्या Drill Square ला माझे नाव देण्यात आले आहे. मी याच ठिकाणी इतरांची सरावाची वेळ संपली तरी March-Pastचा सराव करीत असे. त्यावेळी नेमके भारत-पाक युद्ध सुरु झाले होते, काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून निघूनही गेले… पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो! देशासाठी मरण पत्करणे ही एक भावना आहे. मात्र सैनिक युद्धात शत्रूला मारायलाच जात असतात… मरायला नव्हे! परंतु या प्रयत्नांत मरण आलेच तर ते हसत हसत स्वीकारण्याचीही तयारी असते सैनिकांची! अशा सैनिकांच्या बळावरच तर देश टिकून राहतात… देशाच्या सीमा सुरक्षित राहतात! सैनिक होण्यासाठी काही किंमत चुकवावीच लागते… आणि त्याबद्दल सैनिकांची काहीही तक्रार नसते!

२३ जानेवारी, २०२३ रोजी अंदमान-निकोबार मधील एका बेटाचे माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रामस्वामी बेट’ असे नामकरण करण्यात आले! मागील वर्षी २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी साहेबांनी भारतीय लष्कराच्या वतीने माझ्या आणि ऑपरेशन पवन मध्ये धारातीर्थी पडलेल्या सर्व सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पचक्र वाहिले! माझी पत्नी लेखिका, कवयित्री श्रीमती उमा परमेश्वरन उपस्थित होती. ही परंपरा आता सुरु राहील! सैनिकांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो, ते केवळ पगार मिळतो म्हणून नोकरी करीत नाहीत.. किंबहुना सैन्यातील सेवा ही नोकरी नव्हेच… तो एक करार असतो आत्म्याने देशाशी केलेला… आणि हा करार प्राण देऊनही पाळला जातोच!

(ऑपरेशन पवन मध्ये महाराष्ट्राचे, मराठा लाईट इन्फंट्री, महार रेजिमेंट यांच्या विविध तुकड्यांमधील तसेच अन्य काही विभागातील सुमारे ८५ पेक्षा अधिक सैनिक हुतात्मा झाले. यांपैकी शिपाई प्रभाकर बयाजी पत्रे आणि हवालदार पांडुरंग काकफळे, सुबेदार सीताराम पाटील (गढवाल रायफल्स) यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने तर लान्स नायक मिलिंद कांबळे, यांना मरणोत्तर सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. या यादीत नाईक श्रीधर विठ्ठल कुरणकर(गढवाल रायफल्स) हेही मराठी नाव आढळते ज्यांना मरणोत्तर वीर चक्र आणि सेना मेडल मिळाल्याचा उल्लेख आहे. इंटरनेटवर शहीद उपवन मध्ये ही सर्व नांवे आहेत. असो.

जय हिंद… जय हिंद की सेना.

(हा लेख संपूर्णपणे अराजकीय आहे)

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जल ऊर्जा (Water Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

मिळवण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जलतत्त्व संतुलित करण्यासाठी व मनाला शांत करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. जल ऊर्जा हे निसर्गाशी जोडलेली शांतता आणि भावनांवर नियंत्रण मिळवून देणारी असते.

जल ऊर्जेचे फायदे:

मानसिक शांती:

पाण्या सारखा प्रवाहीपणा आपल्या विचारात येतो. त्या मुळे मनातील गोंधळ कमी होतो. व एकाग्रता वाढण्यास मदत होते.

पाण्यासारखी स्थिरता आणि शांतता मिळण्यास मदत होते.

तणावमुक्ती: मज्जासंस्था शांत होते. आणि मानसिक ताण कमी होतो. ही ऊर्जा स्नायुंमधील ताण कमी करुन शरीराला शिथिल (Relax) करते. त्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

सर्जनशीलता:

मन स्पष्ट आणि शांत झाल्यामुळे कल्पकतेत वाढ होते. मनाला नवीन दृष्टी मिळते.

भावनिक समतोल: भावनांचे नियमन करण्यास आणि नकारात्मकता कमी करण्यास मदत होते. जलतत्व हे भावनांशी संबंधित असते. या मुळे राग, भीती, तणाव या सारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. आणि मन स्थिर होते.

लवचिकता

पाणी जसे पात्रा प्रमाणे आकार धारण करते त्या प्रमाणे ही ऊर्जा जीवनातील बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवते.

अंतर्मनाची शुद्धी

पाणी जसे अशुद्धी धुवून टाकते, त्या प्रमाणे ही जलऊर्जा मनातील जुन्या नकोशा आठवणी, दुःख, नकारात्मक विचारांचे ओझे स्वच्छ करुन मन हलके करते.

अंतर्ज्ञान

ही ऊर्जा अंतर्ज्ञानाशी (Intuition) जोडलेली असते.

सकारात्मक ऊर्जा वाढणे

या ऊर्जे मुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित होतात.

टीप: हे ध्यान रात्रीच्या वेळी किंवा शांत वातावरणात करणे अधिक फलदायी मानले जाते, जेणेकरून मन अधिक एकाग्र होऊ शकते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

अग्नी किंवा तेज तत्त्व हे पंचमहाभूतांपैकी एक अत्यंत प्रभावशाली तत्त्व आहे. मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचे अनेक फायदे होतात.

शारीरिक फायदे

पचनशक्ती (जठराग्नी) आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी अन्नाचे पचन करतो. हा अग्नी संतुलित असल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

रोगप्रतिकारशक्ती सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून मिळणारे ‘तेज’ शरीरातील जंतूंचा नाश करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

चयापचय 

शरीरातील उष्णता रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखते.

मानसिक आणि बौद्धिक फायदे

स्पष्टता आणि निर्णयक्षमता प्राप्त होते.

‘तेज’ म्हणजे प्रकाश. ज्याप्रमाणे अंधारात प्रकाश दिशा दाखवतो, त्याचप्रमाणे तेज तत्त्वाच्या प्रभावामुळे बुद्धी तल्लख होते आणि संभ्रम दूर होऊन विचारांमध्ये स्पष्टता येते.

आत्मविश्वास आणि उत्साह मिळतो

तेज ऊर्जेमुळे माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. नैराश्य किंवा आळस दूर करून कार्य करण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा आवश्यक असते.

अध्यात्मिक फायदे

नकारात्मकतेचा नाश ज्याप्रमाणे अग्नी अशुद्ध गोष्टी जाळून शुद्ध करतो, त्याचप्रमाणे तेज ऊर्जा मनातील नकारात्मक विचार आणि विकार भस्म करण्यास मदत करते.

तेजस्वी व्यक्तिमत्व उपासनेतून किंवा ध्यानधारणेतून तेज तत्त्व आत्मसात केल्यास व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि स्वभावात एक प्रकारचे ‘ओज’ किंवा तेज जाणवते, ज्यामुळे समाजात त्याचा प्रभाव पडतो.

तेज ऊर्जा मिळवण्याचे काही मार्ग

१ सूर्योपासना: सकाळी लवकर कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यनमस्कार घालणे.

२ दीप दर्शन: शुद्ध तुपाचा दिवा लावून त्याकडे त्राटक (एकाग्रतेने पाहणे) करणे. या मुळे एकाग्रता वाढते. मनातील नकारात्मकता भस्म होऊन मानसिक शक्ती मिळते.

३ सात्त्विक आहार: शरीरातील जठराग्नी प्रदीप्त ठेवणारा ताजा आणि संतुलित आहार योग्य वेळी घेतल्यास शरीरातील अग्नी, अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करतो. जास्त मसालेदार व जास्त तिखट अन्न, जास्त उष्ण पदार्थ यामुळे पित्त वाढते. ते तेज किंवा अग्नीचे असंतुलित स्वरूप आहे. ते टाळण्यासाठी शीत व पाचक पदार्थांचा समावेश करावा.

जर हा अग्नी मंद झाला तर शरीरात आळस व रोग निर्माण होतात.

४ प्राणायाम व योग : भस्त्रिका व कपालभाती या सारख्या प्राणायामा मुळे शरीरातील उष्णता वाढते. व रक्ताभिसरण सुधारून मानसिक जडत्व दूर होते.

५ उष्ण पाण्याचे सेवन : कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. आणि चयापचय क्रिया सुधारते.

थोडक्यात सांगायचे तर, अग्नी किंवा तेज ऊर्जा ही माणसाला केवळ जिवंत ठेवत नाही, तर त्याला प्रगतीसाठी आवश्यक असलेले चैतन्य आणि दीप्ती प्रदान करते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे… – लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ जडेल नाते प्रभुशी तयाचे– लेखक : डॉ. सतीश पवार ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

डॉ. विवेक आणि डॉ. सीमा रेडकर 

आजोळ, दिलासा, विसावा…

डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर या दाम्पत्यास आज लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा व त्यांच्या मोठ्या समाजकार्याचा छोटासा आढावा.

आज सानेगुरुजी असते तर त्यांनी लिहिले असते,

करी जतन जो वृद्धांचे

जडेल नाते प्रभुशी तयाचे.

कारण वृद्ध ही आज एक टाकाऊ चीझ झाली आहे. सिंधुदुर्गचे एक डॉक्टर दाम्पत्य आपला वेळ धन देऊन त्यांच्यासाठी सेवा उभ्या करतात हे समाजाला व डॉक्टर लोकांना दिशादर्शक आहे.

लहान मुलांना कोणीही उचलून घ्यायला तयार असतो. पण वृद्ध मात्र कोणाला नको असतात. सिंधुदुर्ग मधील वृद्ध लोकांची संख्या वाढते आहेत. काही जणांना मुले नाहीत तर ज्यांना मुले आहेत ती बाहेर आहेत. अशा वृद्धांची काळजी घ्यायचे मालवणच्या डॉ विवेक व डॉ सीमा रेडकर यांच्या मनात आले. वृद्धाश्रम नाही तर माणूस रिटायर झाल्यावर कसे जगावे अशी संस्था काढायचे त्यांनी ठरवले. ही संकल्पना कै दिलीप लाड यांची व आजोळ हे नाव ठेवले डॉ सीमा रेडकर यांनी.

आजोळ म्हणजे आजी आजोबांचे घर. या प्रकल्पात जे जे नेरुरकर व इतर लोकांचाही मोठा हातभार लागला.

आजोळ नेरूर, ता. कुडाळ इथे 25 मे 2011 ला चालू झाले आणि तेथील उत्तम काळजीमुळे वृद्धांचे आयुष्य वाढू लागले. आयुष्य वाढल्याने त्यांना वृद्धपणातील अनेक आजार होऊ लागले. मग या शारीरिक व मानसिक आजाराची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन या संकल्पनेचा जन्म झाला व रेडकर रिसर्च संस्थेने दिलासाची स्थापना रेडी इथे केली.

येथील काम पाहून आरवली येथील शेट्ये ट्रस्टने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया कक्ष व कॉन्फरन्स हॉल दिला.

येथील वृद्धांची सेवा सुरेशजी झांट्ये व त्यांच्या ट्रस्टने पाहिली. अशा लोकांसाठी प्रशस्त व सर्व सोयीने युक्त हॉस्पिटल असावे ते त्यांचे मत होते. त्यांनी रमाबाई नारायण प्रभू झांट्ये ट्रस्ट मार्फत विसावा नावाची छान वस्तू रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला चालवण्यासाठी सुपूर्द केली.

इथे तीन भाग आहेत. पहिला भाग अल्पकाळाने आजारी असणाऱ्या वृद्ध रुग्णांसाठी. इथे पेशन्ट 8 ते 10 दिवस ठेवून बरे करून घरी पाठवले जातात. मोतीबिंदू, संधिवात, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा आजारांची तपासणी होते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होते. पर्यटनाचा आनंद लुटला लुटता ब्लडप्रेशर, हृदयविकार, मधुमेह या प्राणघातक आजारांचा चेकअप एकाच वेळी करता येतो, अशी अत्याधुनिक यंत्रणा रेडी या खेड्यात उपलब्ध आहे. त्याला होलटर मॉनिटरिंग, ambulatory ब्लडप्रेशर मॉनिटरिंग व continuous ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतात.

इथे तुम्ही भेट दिल्यावर तुम्हाला दिसेल की विसावा व दिलासा या रेडकर हॉस्पिटल ट्रस्टच्या शाखा वार्धक्याने थकलेल्या वृद्धांची उत्तम काळजी घेत आहेत. त्यांच्या सेवेसाठी सक्षम स्टाफ आहे, उत्तम स्वच्छता आहे, मनोरंजन, योगसाधना यांची सोय आहे. शारीरिक परिस्थितीमुळे विकल झालेले वृद्ध खाटेवरून खाली पडू नयेत म्हणून लहान मुलांच्या पाळण्याला लावतो तशा पट्ट्या त्यांच्या खाटेला लावल्या आहेत, अशा अनेक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला दिसतील.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व ना नफा ना तोटा तत्वावर चालू आहे. या ट्रस्टच्या संचालकांना कोणतेही मानधन याबाबत मिळत नाही.

ज्या मुलांना आपल्या आईवडिलांना सरकारी दवाखान्यात पाठवायचे नाही पण फाईव्ह स्टार वृद्धाश्रम हॉस्पिटलही परवडणारे नाही, अशा दारिद्रय रेषेजवळ घुटमळणाऱ्या खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीयांसाठी या विसावा व दिलासा यांची गरज आहे.

रेडकर ट्रस्ट तर्फे इथे सरकारमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स घेण्यात येतो. आतापर्यंत रेडी पंचक्रोशीतील 180 हुन अनेक मुली 10 वि, 12 वि होऊन नन्तर इथे सिस्टर झाल्या आहेत व त्यांना जॉब मिळाला आहे.

**

डॉ विवेक रेडकर हे सिंधुदुर्ग मधील पहिले MD मेडिसिन डॉक्टर. त्यांची जडणघडण सामाजिक बांधिलकी असणारे त्यांचे आईवडील यांच्यामुळे झाली. त्यांचे वडिल एकनाथ रेडकर यांनी मिठबाव डी एड कॉलेज, कसाल व वेतोरे हायस्कूल इथे झोकून देऊन योगदान दिले. आई सुशीला रेडकर हिंदी शिक्षिका कन्या शाळा मालवण येथे होत्या.

निवृत्ती नंतर दोघांनी रेडी इथे खाण मालकांविरोधात न्यायाचा लढाही दिला.

रेडकर हॉस्पिटल रिसर्च संस्था 14/12/2005 ला स्थापन झाली असून मालवण, रेडी व धारगळ गोवा इथे सेवा देत असून हल्लीच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून असे ते कोकणातील एकमेव केंद्र आहे.

वैद्यकीय संशोधन हे डॉ विवेक रेडकर सरांची पॅशन असून त्यांनी 21 पेक्षा जास्त शोधनिबंध अमेरिका, युरोप अशा चौदा देशात सादर केले आहेत. हत्तीपाय या रोगावर त्यांनी मालवण शहरात राबवलेली मोहीम सर्वश्रुत आहे तसेच हल्लीच केलेले कोविड काळातील मिथिलीन ब्लुवरील संशोधन सुद्धा प्रसिध्द व सर्वमान्य झाले आहे.

हीच संशोधनाची आवड त्यांचा मुलगा डॉ सागर व सून डॉ सुप्रिया यांच्यात उतरली असून कोविडच्या covaxin या लसीवरील संशोधनासाठी देशातील फक्त दहा हॉस्पिटलची निवड केली होती त्यात एक होते धारगळ, गोवा येथील रेडकर हॉस्पिटल. ती अत्यंत अभिमानाची बाब आहे. या संशोधनात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला त्यामुळेच त्यांना अधिकृत वैद्यकीय संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळायला सोपे झाले.

रेडकर रिसर्च सेंटर लहान मुलांचा मधुमेह तसेच लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया यावरही मोलाचे काम करत आहे. शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीतुन त्यांनी 170 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील डॉक्टर लोकांच्या सहकार्याने मोफत केल्या आहेत.

सरांच्या दोन्ही बहिणी अलका नारकर व संगीता तोरकर शिक्षिका म्हणून रिटायर होऊन आता सामाजीक कार्याला वाहून घेतले आहे व आपल्या बंधूंना मदत करत आहेत.

**

कुठे गाजावाजा प्रसिद्धी न करता सिंधुदुर्ग मधील एक डॉक्टर दाम्पत्य आयुष्याच्या संध्याकाळी थकलेल्या वृद्ध लोकांची सेवा करत आहे. बरेच जण आपल्या घरातील वृद्धांना धड बघत नाहीत, तर इथे दुसऱ्यांच्या घरातील वृद्धांची सेवा केली जात आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

आम्ही सिंधुदुर्गचे डॉक्टर या सामाजिक भान बाळगणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला मानवंदना देतो. खूप शुभेच्छा.


लेखक : डॉ सतीश सदाशिव पवार,

कणकवली

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वायू ऊर्जा (Air Element Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ वायू ऊर्जा (Air Element Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

वायू तत्व (Air Element) हे पंचमहाभूतांपैकी (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) अत्यंत महत्त्वाचे आणि गतिमान तत्व आहे. आपल्या शरीरात आणि विश्वात हालचाल, प्राणशक्ती आणि संवाद साधण्याचे काम वायू तत्व करते.

या वायू तत्वाचे आपल्या जीवनातील उपयोग आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१. वायू तत्वाचे शरीरातील आणि दैनंदिन जीवनातील उपयोग

प्राणवायूचा पुरवठा (Respiration): वायू तत्वाचा सर्वात मुख्य उपयोग म्हणजे श्वसन. शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे हे वायू तत्वामुळेच शक्य होते.

शारीरिक हालचाली शरीरातील रक्ताभिसरण अन्ननलिकांमधून अन्नाची हालचाल, हातापायांची हालचाल आणि मज्जासंस्थेद्वारे होणारे संदेशवहन हे सर्व वायू तत्वाच्या नियंत्रणाखाली असते.

उत्सर्जन क्रिया शरीरातील टाकाऊ पदार्थ (मल-मूत्र, घाम) बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत वायू तत्व (विशेषतः अपान वायू) महत्त्वाची भूमिका बजावते.

संवाद आणि आवाज आपण जे बोलतो, तो आवाज हवेच्या माध्यमाशिवाय दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे संवाद साधण्यासाठी वायू तत्व आवश्यक आहे.

२. वायू तत्वाचे आरोग्यदायी फायदे

जेव्हा शरीरात वायू तत्व संतुलित असते, तेव्हा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात:

मानसिक आणि बौद्धिक फायदे

विचारांची स्पष्टता आणि एकाग्रता – संतुलित वायू तत्व बुद्धीला तीक्ष्ण करते. यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, कल्पकता (Creativity) आणि विचारांमध्ये स्पष्टता येते.

उत्साह आणि चैतन्य शरीरात वायूचा प्रवाह योग्य असेल तर आळस दूर होऊन दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

शारीरिक फायदे

उत्तम पचनक्रिया – आयुर्वेदामधील ‘समान वायू’ जठराग्नीला प्रदीप्त करतो, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते.

त्वचेचे आरोग्य:-

 वायू तत्व शरीरातील स्पर्शज्ञानाशी संबंधित आहे. वायू संतुलित असेल तर त्वचेवरील चमक कायम राहते आणि त्वचा निरोगी राहते.

लवचिकता:- स्नायू आणि सांध्यांमध्ये योग्य प्रमाणात वायू असल्यामुळे शरीरात लवचिकता (Flexibility) टिकून राहते.

वायू तत्व संतुलित करण्याचे उपाय

शरीरात वायू तत्व बिघडल्यास (उदा. वात दोष वाढल्यास) सांधेदुखी, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे किंवा अस्वस्थता (Anxiety) यांसारखे त्रास होऊ शकतात. ते संतुलित ठेवण्यासाठी खालील उपाय फायदेशीर ठरतात:

प्राणायाम अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी प्राणायामामुळे शरीरातील वायू तत्वाचे शुद्धीकरण आणि संतुलन होते.

वायू मुद्रा: अंगठ्याचे टोक तर्जनीच्या (पहिले बोट) मुळाशी लावून उर्वरित तीन बोटे सरळ ठेवल्यास ‘वायू मुद्रा’ बनते. ही मुद्रा रोज १५ ते २० मिनिटे केल्याने सांधेदुखी आणि पोटातील गॅस कमी होतो.

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे: पहाटेच्या शुद्ध हवेत फिरणे किंवा बागेत बसून दीर्घ श्वास घेतल्याने शरीराला शुद्ध वायू तत्वाचा लाभ होतो.

आहार: वात वाढवणारे पदार्थ (जसे की अतिशय कोरडे, शिळे किंवा थंड अन्न) टाळावेत. आहारात तूप, कोमट पाणी आणि ताज्या अन्नाचा समावेश करावा.

वायू तत्व हे आपल्या शरीरातील ‘प्राणशक्ती’ (Life Force) आहे. मनाची शांती, शरीराची गती आणि उत्तम आरोग्यासाठी वायू तत्वाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे.

वायू तत्त्वाची (Air Element) ऊर्जा आपल्या शरीरात प्राणायाम, सजगता आणि ध्यानधारणा याद्वारे मिळवता येते. निसर्गात वायू हा गतिमानता, मोकळेपणा, विचार आणि संवादाचे प्रतीक आहे. शरीरात याचे स्थान प्रामुख्याने अनाहत चक्र (हृदय चक्र) आणि श्वसनसंस्थेशी जोडलेले असते.

वायू तत्त्वाची ऊर्जा सक्रिय करण्यासाठी आणि ती आत्मसात करण्यासाठी खालीलप्रमाणे ध्यान (Meditation) आणि काही पद्धतींचा अवलंब करता येईल.

१ स्पर्श अनुभवणे: तुमच्या त्वचेला स्पर्श करून जाणाऱ्या हवेच्या मंद लहरींचा (हळुवार वाऱ्याचा) जाणीवपूर्वक अनुभव घ्या.

२. प्राणायाम (श्वसनाचे नियंत्रण)

वायू तत्त्वाचा थेट संबंध आपल्या श्वासाशी आहे. त्यामुळे प्राणायामाद्वारे ही ऊर्जा सर्वात जलद मिळते:

३. ज्ञान मुद्रा (Gyan Mudra)

वायू तत्त्व संतुलित करण्यासाठी ‘ज्ञान मुद्रा’ किंवा ‘वायू मुद्रा’ अत्यंत प्रभावी आहे.

ध्यानाला बसताना अंगठ्याचे टोक आणि तर्जनीचे (पहिले बोट) टोक एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत हात गुडघ्यावर ठेवा.

यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि विचारांमधील अस्थिरता कमी होऊन वायू तत्त्वाची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होते.

४. अनाहत चक्रावर ध्यान (Heart Chakra)

वायू तत्त्वाचे मुख्य केंद्र हृदय मानले जाते.

ध्यानादरम्यान आपले संपूर्ण लक्ष छातीच्या मध्यभागावर (अनाहत चक्र) केंद्रित करा.

या चक्राचा रंग हिरवा आहे. तिथे हिरव्या रंगाच्या प्रकाशाची कल्पना केल्यास किंवा ‘यं’ (YAM) या बीजाक्षराचा मानसिक जप केल्यास वायू तत्त्वाची ऊर्जा जागृत होते.

५. निसर्गाशी जवळीक

प्रातःकालीन भ्रमण: पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत, बागेत किंवा टेकडीवर फिरायला जाणे.

विस्तीर्ण आकाशाकडे पाहणे: मोकळ्या आकाशाकडे काही वेळ शांतपणे पाहिल्याने मनातील संकुचितपणा दूर होतो आणि वायू तत्त्वासारखा मोकळेपणा अनुभवास येतो.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला फक्त मज्जा करायचीये – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ मला फक्त मज्जा करायचीये – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

“मला फक्त मज्जा करायचीये”… विषय संपला.

“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या उरावर पांघरू लागलीयेत.

इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –

“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी… “

“पार्टी नाही? शी… “

“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक… “

तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला! ? फारच बोरिंग….

“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं… “

“वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर… “

“डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad… “

“वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी… “

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.

TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.

न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.

सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या.

“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं? ” असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.

एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.

तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.

कमवा; आणि उडवा.

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho!!

भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.

या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा!!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या!!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.

चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.

मग मेलात तरी चालेल.

आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?

चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, *हे दुसऱ्याला दाखवणं*, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.

ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.

मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.

तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.

मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.

गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.

त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.

हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.

जागे होऊया रे.

स्वत्व नको विकूया आपण.

दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत!!

उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.

आपण सूर्य निवडू या.


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वतःला पृथ्वीशी जोडणे… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ स्वतःला पृथ्वीशी जोडणे… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

स्वतःला पृथ्वीशी जोडणे, ज्याला आधुनिक भाषेत ‘अर्थिंग’ (Earthing) किंवा ‘ग्राउंडिंग’ (Grounding) असेही म्हणतात, हे केवळ आध्यात्मिक नसून वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपल्या शरीरात सतत जैविक-विद्युत क्रिया (Bio-electrical activities) सुरू असतात. जेव्हा आपण पृथ्वीच्या थेट संपर्कात येतो, तेव्हा त्याचे आपल्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:– – – 

१. शरीरातील सूज (Inflammation) कमी करणे

आपल्या शरीरात चयापचय क्रियेमुळे ‘फ्री रॅडिकल्स’ तयार होतात, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पृथ्वीवर मुक्त इलेक्ट्रॉन्सचा (Negative charge) अफाट साठा असतो. जेव्हा आपण अनवाणी पायाने जमिनीवर चालतो, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि फ्री रॅडिकल्सना संतुलित करतात. यामुळे जुनाट आजार आणि सूज कमी होण्यास मदत होते.

२. तणाव आणि स्ट्रेस कमी करणे

पृथ्वीशी जोडले गेल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल (Cortisol) या स्ट्रेस हार्मोनची पातळी नियंत्रित राहते. यामुळे मानसिक शांतता मिळते, चिंता कमी होते आणि आपली मज्जासंस्था (Nervous System) शांत होते.

३. झोपेची गुणवत्ता सुधारणे

ग्राउंडिंगमुळे शरीराचे ‘सर्काडियन रिदम’ (Circadian Rhythm – जैविक घड्याळ) सुधारते. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांना जमिनीच्या संपर्कात राहिल्यामुळे गाढ आणि चांगली झोप लागते.

४. रक्ताभिसरण सुधारणे

काही संशोधनानुसार, अर्थिंगमुळे रक्ताची चिकटपणा (Viscosity) कमी होतो. यामुळे रक्त पातळ राहण्यास आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

पृथ्वीशी कसे जोडून घ्यावे?

स्वतःला ग्राउंड करण्यासाठी तुम्ही खालील साध्या गोष्टी करू शकता:

 अनवाणी चालणे : गवत, माती किंवा वाळूवर किमान १५-२० मिनिटे अनवाणी चालावे.

 बागेत काम करणे : झाडांना पाणी देणे किंवा मातीशी संपर्क येईल अशी कामे करणे.

 नैसर्गिक पाण्यात पोहणे : समुद्र किंवा नदीच्या पाण्यात पोहणे हे ग्राउंडिंगचा एक उत्तम मार्ग आहे.

 पृथ्वी कडुन ऊर्जा मिळवणे हे मेडिटेशन करणे

आपल्याला पंचमहाभूतां कडून ऊर्जा मिळत असते. कारण आपणही निसर्गाचाच एक घटक आहोत.

आपण मदर अर्थ अर्थात पृथ्वी माता कडून ऊर्जा कशी मिळवायची हे बघणार आहोत.

– – सिमेंटचे रस्ते किंवा लाकडी फरशीवरून चालल्याने अर्थिंग होत नाही, कारण ते विद्युतरोधक असतात. नैसर्गिक माती किंवा गवत हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

थोडक्यात सांगायचे तर, आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. आधुनिक जीवनशैलीत आपण रबरी चपला आणि सिमेंटच्या घरांमध्ये अडकल्यामुळे हा संपर्क तुटला आहे. तो पुन्हा जोडणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ‘नॅचरल हीलिंग’ (Natural Healing) सारखे काम करते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कोंडीबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “कोंडीबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉन्व्हेंट स्कूलच्या (Convent School) प्रिन्सिपलच्या केबिनबाहेर पालकांची रांग लागली होती. सगळे श्रीमंत, सुटाबुटातले पालक आपल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी आले होते. एसी असूनही तिथे पालकांचा रुबाब आणि परफ्युमचा वास दरवळत होता…!

तेवढ्यात तिथे एक माणूस आला. ,

नाव त्याचं कोंडिबा‘…

कोंडिबाची अवस्था बघून ;सगळ्यांनी नाकाला रुमाल लावला…!

त्याचे कपडे… गटारातल्या काळ्या पाण्याने माखले होते. , अंगाला एक तीव्र आणि मळमळणारा 

घाणेरडा वास येत होता…! पायातले बूट फाटलेले होते आणि हातात… एक प्लास्टिकची पिशवी होती…!

तो पालिकेत गटार साफ करणारा‘… (Manual Scavenger) कामगार होता…!

तो केबिनच्या दारात उभा राहिला. तिथे उभ्या असलेल्या एका श्रीमंत पालकाने मिस्टर देशमुखांनी, शिपायाला ओरडून सांगितलं,

अहो, हे काय चाललंय…? या भिकाऱ्याला आत कसं येऊ देता…? किती घाण वास येतोय त्याचा… त्याला बाहेर हाकला, आमची मुलं इन्फेक्शनने आजारी पडतील. “

कोंडिबाने मान खाली घातली… , तो दरवाजाच्या बाहेरच कोपऱ्यात उभा राहिला…!

शिपाई त्याला म्हणाला,

ए कोंडिबा, तुला सांगितलंय ना, शाळा सुटल्यावर येत जा. आता साहेब मिटिंगमध्ये आहेत.

चल निघ. “

कोंडिबा काकुळतीने म्हणाला,

दादा, फक्त दोन मिनिटं… मला परत कामावर जायचंय… , आज शेवटची तारीख आहे फी भरण्याची. ,

जर आज पैसे भरले नाहीत, तर त्या पोरीचं वर्ष वाया जाईल…! “

हे ऐकून देशमुखांना हसू आलं.

काय रे…? तू गटार उपसणारा… तुझी पोरगी या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणार..? आरशात तोंड बघितलंस का…? सरकारी शाळेत टाक की… “

.. तिथे उभ्या असलेल्या इतर पालकांनीही कुत्सितपणे हसून त्याला अपमानित केलं…!

तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम बाहेर आल्या… ,

त्यांनी कोंडिबाला पाहिलं आणि त्या रागात असतील असं सगळ्यांना वाटलं…

पण प्रिन्सिपल मॅडम धावत कोंडिबाच्या जवळ गेल्या. त्या घाणेरड्या कपड्यातल्या कोंडिबाला त्यांनी वाकून नमस्कार केला…!

सगळे पालक शॉक झाले.

मॅडम म्हणाल्या, “या कोंडिबा भाऊ… आत या. “

कोंडिबा लाजत म्हणाला,

नको मॅडम, आतली कार्पेट खराब होईल. मी इथेच बाहेरून पैसे देतो… “

त्याने आपल्या मळक्या पिशवीतून चुरगळलेल्या,

दमट झालेल्या १००-५० च्या नोटा आणि काही चिल्लर टेबलवर ओतली…!

मॅडम, हे घ्या १५ हजार रुपये, मोजून घ्या, त्या गौरीची फी आहे… “

मिस्टर देशमुखांना राहवलं नाही. ,

त्यांनी विचारलं, “मॅडम, हा गटार साफ करणारा… आणि याची मुलगी गौरी तुमच्या शाळेत शिकते..?

आणि तुम्ही याला इतका मान का देताय…? “

प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं. ,

त्या म्हणाल्या :

“मिस्टर देशमुख, तुम्हाला माहित आहे का की, हा माणूस कोण आहे…? ज्या गौरीची फी भरण्यासाठी हे आलेत, ती यांची सख्खी मुलगी नाहीये.. , ती एक अनाथ मुलगी आहे…! १० वर्षांपूर्वी कोंडिबाची स्वतःची मुलगी, ‘सखू’, डेंग्यूने वारली, कारण त्यांच्या वस्तीत गटार तुंबलं होतं आणि उपचाराला पैसे नव्हते…!

त्या दिवशी कोंडिबाने शपथ घेतली की, ‘आज पैशावाचून माझी पोरगी गेली, पण यापुढे माझ्या वस्तीतल्या कोणत्याही अनाथ मुलीचं शिक्षण पैशावाचून थांबणार नाही…! ” 

– – गेली १० वर्षे हा माणूस… रोज सकाळी ६ वाजता गटारात उतरतो…! तुमच्या-आमच्या घरातली घाण साफ करतो. , त्याबदल्यात त्याला जे तुटपुंजे पैसे मिळतात, त्यातले स्वतःला वडापाव खाण्यापुरते पैसे ठेवतो ;आणि बाकीचे सगळे पैसे साठवून… आपल्या शाळेतल्या ५० अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलतो…!

.. तुमच्या अंगाला महागडा परफ्युम आहे, पण तुमचे विचार संकुचित आहेत…! आणि याच्या अंगाला गटाराचा वास आहे, पण याचं मन चंदनापेक्षा सुगंधी आहे…! तुम्ही स्वतःच्या मुलासाठी फी भरता,

आणि हा माणूस दुसऱ्यांच्या मुलांसाठी आयुष्य गटारात घालवतोय. “

हे ऐकून तिथे स्मशानशांतता पसरली…

देशमुखांची मान शरमेने इतकी खाली गेली की, त्यांना कोंडिबाकडे बघायची हिंमत होत नव्हती..!

कोंडिबा फक्त हसला, हात जोडले आणि म्हणाला :

साहेब, वास पोटाला नसतो, वास कामाला नसतो.. वास फक्त माणसाच्या विचारांना असतो…!

माझी पोरं शिकली, तर ती गटारात नाही, मोठ्या खुर्चीवर बसतील, यातच मला स्वर्ग मिळतो..! “

त्या दिवशी त्या एसी ऑफिसमध्ये कोंडिबाचा तो घाणेरडा वाससगळ्यांना पवित्र वाटू लागला…! माणूस काय काम करतो…??? यावरून त्याची उंची मोजू नका, तो ते काम कोणत्या उद्देशाने करतो, हे महत्त्वाचं आहे…! समाजसेवा करण्यासाठी खिसा नाही, तर काळीज मोठं असावं लागतं…! कोणाच्या मळक्या कपड्यांना नावं ठेवण्याआधी, त्याच्या स्वच्छ मनाला ओळखायला शिका…!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही फक्त हकीकत नसून वास्तव.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ ही फक्त हकीकत नसून वास्तव.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

ही फक्त हकीकत नसून वास्तव – – 

अतिशय गंभीरपणे प्रत्येकाने वाचावे, विचार करावा ही हकिकत नसून वास्तव आहे

एक प्रश्नही निर्माण होतो : जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग???

येणारा काळ हा अविवाहितां,चा काळ असेल…

एका नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, पुढील सहा वर्षांत जगातील सुमारे ४५% महिला अविवाहित राहतील.

हा अहवाल १ मे २०२६ रोजी ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.

हा ‘मॉर्गन स्टॅनली’ने (Morgan Stanley) केलेल्या एका विस्तृत अभ्यासावर आधारित आहे.

अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष :

१. आजच्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि आपल्या करिअरला प्राधान्य देतात.

२. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाहीत.

३. त्यांना स्वातंत्र्य आवडते आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ इच्छितात.

४. त्यांनी लग्न, मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.

५. हा कल असाच सुरू राहिला, तर पारंपारिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते.

६. लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांच्या संख्येत वाढ होणे आणि वृद्धत्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

७. इथे एक प्रश्नही निर्माण होतो : जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग?

अनेक आई-वडील आपल्या मुलींसाठी स्थळे शोधत आहेत, पण मुलींना स्वतःलाच लग्नात रस नाही.

परिणामी, आलेले प्रत्येक स्थळ नाकारले जाते.

समाजातील एका मोठ्या वर्गाला अजूनही या बदलाचे गांभीर्य समजलेले नाही, त्यामुळे आपण योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे.

मुलीच्या लग्नाचे योग्य वय २३ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे किंवा शक्य असल्यास त्याहूनही आधी असावे. यासाठी सामूहिक पातळीवर जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे.

हा मुद्दा कोणाच्या विरोधात उपस्थित केलेला नाही, तर भविष्यातील स्थिरता आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडला आहे.

समाज, कुटुंब, कुटूंब व्यवस्था आणि वैयक्तिक जीवन यात संतुलन राखणे हीच खरी प्रगती आहे.

आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे.

भविष्यातील एक ज्वलंत समस्या

  • जेव्हा मुलांची लग्ने २० व्या वर्षी होत होती, तेव्हा एका शतकात ५ पिढ्या होत होत्या.
  • जेव्हा मुलांची लग्ने २५ व्या वर्षी झाली, तेव्हा एका शतकात ४ पिढ्या झाल्या.
  • आता, जेव्हा मुलांची लग्ने ३० व्या वर्षी होत आहेत, तेव्हा एका शतकात केवळ ३ पिढ्या होत आहेत.

विचार करण्यासारखी गोष्ट : आपला समाज पुढच्या शतकापर्यंत टिकेल का?

रस्ते आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत, आसपासची घरे रिकामी आहेत.

आज घरांमध्ये मुलांचा आवाज कमी आणि पती-पत्नीचे आवाज जास्त ऐकू येतात.

महिला वयाच्या ३०-३५ वर्षांपर्यंत अविवाहित राहतात.

पुरुष वयाच्या ३५ वर्षानंतरही अविवाहित राहतात.

उशिरा लग्ने – आणि मग विभक्त होणे (घटस्फोट).

तुटलेली कुटुंबे,

दुःखी आई-वडील,

एकटे पडलेले आई-वडील…

संपूर्ण पिढी एक रिकामेपण (पोकळी) अनुभवत आहे.

आपण याला “शिक्षित समाज” म्हणू शकतो की “आत्मघातकी समाज”?

ही लोकसंख्या कमी करण्याची एक छुपी कटकारस्थाने वाटते.

जर ५० जोडप्यांपैकी प्रत्येकाला एकच मूल असेल, तर पुढच्या पिढीतील मुलांची संख्या नाममात्र असेल.

हे असेच सुरू राहिल्यास तिसरी पिढी तर जवळपास नाहीशी होईल.

पाडे आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत आणि प्रत्येकजण रस्त्यावर आहे.

अर्धे आयुष्य रस्त्यावरच जाते.

संपूर्ण गावेच्या गावे नाहीशी होत आहेत.

शहरांमध्ये उत्तुंग इमारती आहेत, पण संयुक्त कुटुंब पद्धती संपुष्टात आली आहे.

नवीन सुना म्हणतात की त्यांना “फक्त एकच मूल” हवे आहे.

हा समाज आहे का?

सत्य हे आहे की :

मुले आता प्रेमाचे प्रतीक राहिलेली नाहीत, उलट, मूल होणे ही एक सक्ती वाटू लागली आहे.

यात सर्वात मोठा दोषी मुलीचा बाप आहे; तोच बाप ज्याने स्वतः २०-२२ व्या वर्षी लग्न करून संसार थाटला, तोच आता वयाच्या ३० वर्षांपर्यंत मुलीचे लग्न न करून हिरोगिरी दाखवतो.

परिणाम…?

स्त्री-पुरुष मानसिक तणावाखाली जातात.

आज मुलांना ना वेळेवर नोकऱ्या मिळत आहेत, ना त्यांची लग्ने वेळेवर होत आहेत.

समाज हळूहळू कोलमडत चालला आहे.

म्हणूनच मुले समाजासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात.

म्हणजेच, विभक्त कुटुंबे.

ते अगदी असेही म्हणतात की त्यांना मुले नको आहेत.

लग्नाला उशीर करणे / मूल होण्यास उशीर करणे, आणि नंतर एका मुलानंतर वैद्यकीय आणि संगोपनाच्या समस्यांची कारणे देणे… हे आता सामान्य झाले आहे.

वयामुळे हजारो तरुण-तरुणी अविवाहित फिरत आहेत आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी गप्प आहेत.

लग्न, कुटुंब, मुले,

सर्व काही एक ओझे मानले जात आहे.

लग्न हे केवळ सांसारिक बंधन नाही, तर ते घर, कुटुंब आणि समाजाचा मुख्य आधारस्तंभ आहे.

हा वंश, सभ्यता आणि संस्कृती पुढे नेण्याचा मार्ग आहे.

आता आपल्या सर्वांना समजून घेण्याची वेळ आली आहे.

मुलांना “अति” स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज काढून घेतली आहे.

लग्ने पुढे ढकलली जात राहिली आणि जेव्हा ती होतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

पुन्हा तोच एकाकीपणा.

लग्नाचे योग्य वय :

  • पुरुषांसाठी : वयाच्या ३० वर्षांपूर्वी
  • महिलांसाठी : वयाच्या २५ वर्षांपूर्वी

अन्यथा इतिहास लिहील, “त्या समाजाने स्वतःला शांतपणे नष्ट केले.” विचार करा आणि समजूतदारपणे वागा.

आपल्या मुलांची लग्ने योग्य वेळी करा.

कारण, जर कुटुंबाचे रक्षण झाले नाही, तर समाज कोसळायलाही वेळ लागणार नाही.

म्हणूनच डेव्हिड सेल्बॉर्न आणि बिल वॉर्नर सारख्या लेखकांना असे म्हणणे भाग पडले आहे की, मजबूत कौटुंबिक रचनेच्या अभावामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये आणि अगदी भारतातही कौटुंबिक परंपरेचा ऱ्हास सुरू झाला आहे.

पाच रक्ताची नाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत :

मोठे काका (वडिलांचे मोठे भाऊ),

लहान काका / चुलते (वडिलांचे लहान भाऊ),

आत्या (वडिलांची बहीण),

मामा (आईचे भाऊ),

मावशी (आईची बहीण).

भविष्यात अशी नाती कदाचित पाहायला किंवा ऐकायलाही मिळणार नाहीत.

हे आपण असे समजून घेऊ शकतो :

मुलगा मुलगी

२ १ (मावशी नाही)

१ २ (मोठे काका, लहान काका नाहीत)

१ १ (मोठे काका, लहान काका, मावशी नाही)

१ ० X

० १ X

परिणाम

० ०

एका अपत्याच्या (single-child) कुटुंबांमुळे तिसऱ्या पिढीवर गंभीर परिणाम होईल, ती पिढी जिथे तुम्ही आजी-आजोबा असाल.

ज्या आजोबांना मुदलापेक्षा व्याजाची (नातवंडांची) जास्त ओढ असते, ते मुद्दलही गमावून बसतील. त्याला ते स्वतःच जबाबदार असतील.

त्यामुळे, जोडप्यांनी एकाच अपत्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.

लोकसंख्येची ही घटती आकडेवारी बरेच काही सांगून जाते.

तुमचा नातू किंवा पणतू या जगात अगदी एकटा पडेल.

जर त्याला रक्ताच्या नात्यांची गरज भासली, तर या संपूर्ण विश्वात त्याचे म्हणायला कोणीही नसेल.

ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

हे केवळ आपल्या मुलांना एकाकी जीवन जगण्यास भाग पाडत नाही, तर आपली संस्कृती देखील नष्ट करेल.

आपण एकतेच्या गोष्टी करतो, पण संस्कृतीच नष्ट होईल.

या सर्व गोष्टीला सध्याची पिढी जबाबदार आहे.

जर तुम्हाला हा विषय गंभीर वाटत असेल, तर यावर घरी, पती-पत्नीमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये आणि विविध सभा-बैठकांमध्ये चर्चा करा.

आपली संस्कृती, मूल्ये आणि येणाऱ्या पिढ्यांना वाचवा.

 

हा लेख खरचं आजच्या दुष्टीने प्रेरणादायी आहे – – यातुन तरी वधु वर पालकांनी सर्तक राहा.

आपल्या पाल्यांसाठी नक्कीच विचार करावा ही खरंच विनंती आहे

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares