☆ “ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे☆
३१ मे– पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. मला एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श वाटते’?
मार्मिक प्रश्न होता, अगदी ब्रह्मवादिनी गार्गी आणि मैत्रेयीपासून ते झाशीच्या राणीपर्यंत भारतीय इतिहासात आदर्शवत वाटू शकणाऱ्या खूप स्त्रिया आहेत पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आली ती एक शुभ्रवस्त्रावृता, विलक्षण बोलक्या डोळ्यांची एक कृश स्त्री जी आयुष्यभर केवळ इतरांसाठीच जगली. नगर जिल्ह्यातल्या जामखेड च्या चौंडी गावच्या एका साध्या धनगराची ही मुलगी, मल्हारराव होळकरांच्या दृष्टीला काय पडते, तिची कुवत त्यांच्या पारखी नजरेला काय समजते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी म्हणून ती आजच्या मध्य प्रदेशाच्या इंदौर संस्थानात काय येते आणि पूर्ण देशाच्या इतिहासात स्वतःचं नाव काय कोरते, सारंच अद्भुत.
अहिल्याबाईना त्यांच्या खासगी आयुष्यात फार कमी सुखाचे दिवस लाभले. त्यांचे पती फार लवकर गेले. त्या काळच्या रीतीप्रमाणे सती जायला निघालेल्या अहिल्याबाईंना मल्हारबांनी मागे खेचलं, तिच्या राज्याप्रती असलेल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन. मल्हारबांच्या शब्दाखातर अहिल्याबाईनी सतीचे वाण खाली ठेवले आणि त्याबदलात अनेक लोकापवाद झेलले पण त्यानंतर जे आयुष्य त्या जगल्या ते निव्वळ व्रतस्थ होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले. थोरले बाजीराव पेशवे ते नारायणराव ही पेशवाईतली स्थित्यंतरे त्यांनी जवळून बघितली, पानिपतचा दारुण पराभव बघितला, राघोबादादाची कारस्थाने बघितली, ब्रिटिशांची भारत देशावरची हळूहळू घट्ट होणारी पकड बघितली आणि त्यांच्या डोळ्यांसमोर इतकी राजकीय स्थित्यंतरं घडत असताना त्यानी होळकरांच्या त्या चिमुकल्या संस्थानात न्याय आणि सुबत्ता तर राखलीच, पण देशभर धर्माचे काम म्हणून मुसलमानांनी उध्वस्त केलेली मंदिरे परत बांधली, गोर गरीबांसाठी जागोजाग धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले, आणि हे सर्व केले ते स्वतःच्या खासगी मिळकतीतून.
त्यांच्या दुर्दैवाने ज्या ज्या व्यक्तिवर त्यांनी जीव लावला त्या त्या व्यक्तीकडून त्यांच्या पदरी निराशाच आली. मुलगा व्यसनी, बदफैली निघाला. त्यांच्या डोळ्यासमोर मुलाचा करुण मृत्यू अहिल्याबाईंना बघावा लागला. अत्यंत लाडकी अशी त्यांची मुलगी मुक्ता, नवऱ्यामागे सती गेली. स्वतः सती जाण्यापासून मागे हटलेल्या अहिल्याबाई काही तिला थांबवू शकल्या नाहीत. तिचा मुलगा, त्यांचा नातू, तोही त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यू पावला. हे सर्व आघात त्यांनी झेलले आणि जगल्या त्या निव्वळ रयतेसाठी. निष्कलंक चारित्र्याच्या, व्रतस्थ प्रशासक असलेल्या ह्या कणखर स्त्रीचे चारित्र्य खरोखरच प्रेरक असेच आहे.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान.. – लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥
घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥
भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ||
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||
एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य!
माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही.
या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले….दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही.
काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.
भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.
थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते.
सुजनहो!
मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही.
पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय.
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ||
‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात…
भारुड शब्दाची व्युत्पत्ती:
भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं.
भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.
भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:
गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो….
मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार….अशा असंख्य…! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली…यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.
भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड…
‘अग ग ग ग ग विंचू चावला…
विंचू चावला हो…
काम क्रोध विंचू चावला..
तेणे माझा प्राण चालला..’
माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ.
पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच, पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो.
एकनाथ महाराज पुढे म्हणतात, ‘…या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’
विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!
भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला.
‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’
सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय…अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!
‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’
समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला….
हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा… तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं…अधिक रमलं…
किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी!
पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!
लेखिका : डॉ अपर्णा बेडेकर
संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हो ‘पोनोपोनो’… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
आज आपण एका अतिशय सुंदर ध्यान-साधने संबंधी जाणून घेऊ या।
याची माहिती मागच्या वर्षी एका अंकात आलेली आहे पण अंक कायम रहात नाहीत, ब्लॉगवर आणि पोस्ट द्वारे ही कोणीही केव्हाही वाचू शकेल।
तर काय झालं, काही वर्षांपूर्वी हवाई बेटावर एक हॉस्पिटल होतं जे केवळ खुनशी वेड्यांसाठी होतं। ज्यांना समाजाने ‘क्रिमिनली इनसेन’ ठरवून हाता – पायात साखळदंड बांधून डांबून टाकलं होतं.
त्यांना भेटायला फारसं कुणी येत नसे। ती इतकी भीषण जागा होती की नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी व डॉक्टर ही काही आठवडे, एखाद – दोन महिन्यांच्यावर तिथे टिकू शकत नसत.
अनेक रिसर्च सेन्टर्स, हॉस्पिटल, मनोवैज्ञानिक लोक मात्र येऊन येऊन वेगवेगळी संशोधनं करत।
रुग्णांवर त्याचा काहीही परिणाम होत नसे। ही थोर माणसं येऊन निष्कर्ष करून डिग्र्या घेत, ते कैदी मात्र आपल्या काळ्या विश्वात तळमळत, संतापत असत।
मग एक नवा माणूस आला. ‘ मी एक काही प्रयोग करू का?’ म्हणाला.
तिथले मोठे डॉक्टर्स म्हणाले, ‘ कर बाबा, तू ही ‘ कर।
त्याने सगळ्या रुग्णांच्या फाईल्स मागवल्या. एक छोटी खोली पुरेल म्हणाला. तो रोज सकाळी ९ला यायचा। खोलीचं दार बंद करून आतच असायचा. संध्याकाळी ५ वाजता निघून जायचा। परत दुसऱ्या दिवशी ९ला हजर.
तिथल्या लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही. मग काही आठवड्यात फरक जाणवू लागला।
‘अरेच्चा ! हे खुनशी लोक जरा बरं वागतायत की.’
हळूहळू त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. संताप, उद्विग्नता, क्रौर्य कमी दिसू लागलं.
ती परोलवर जाण्या योग्य झाली… बाहेरच्या कसलाही कंट्रोल नसलेल्या जगात, त्यांच्या राग – संतापाच्या नात्यात जाऊनही, ते मुदत संपल्यावर नीट परत येऊ लागले।
नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी, माळी, सुरक्षा कर्मचारी, सगळेच टिकू लागले. बदल होत होत ते रुग्ण बरेही होऊन बाहेर जाऊ लागले।
आणि चारच वर्षांनंतर एक दिवस असा उजाडला, की आता रुग्णच नाहीत म्हणून ते हॉस्पिटल चक्क बंद करावं लागलं ! असे दोनच राहिले होते ज्यांना सरकारने अमेरिकेतल्या हॉस्पिटलात हलवलं आणि ते खुनशी वेड्यांचं हॉस्पिटल बंद केलं !
सर्वच मानसोपचार तज्ञ, संशोधक, प्रसार माध्यमांना चक्रावून टाकणारी गोष्ट होती ही…..
त्यांनी विचारलं की ‘ हा चमत्कार झाला कसा?’
तिथल्या नर्सेस, डॉक्टर, सगळ्यांनी सांगितलं की ‘आधी’ व ‘नंतर’ यात ‘तो’ माणूस हा एकच फरक होता।
खरं तर तो एकाही रुग्णाला प्रत्यक्ष भेटलाही नाही. ‘ तुझं दु:ख सांग ‘ नाही, ‘ रडून मोकळा हो ‘ नाही, – काहीच नाही. त्याने नक्की काय केलं, ते आता त्यालाच विचारा, पण हे रुग्ण मुळापासून बरे झाले आहेत हे मात्र खरं।
ते गेले त्याच्याकडे। म्हणाले, ‘ नक्की काय केलात तुम्ही? इतके रुग्ण, तेही सगळी दुष्ट कर्म केलेले, वेडे, मनावर ताबा नसलेले, तुम्ही बरे कसे केलेत? काय जादू केलीत? ‘
त्या हवाईयन माणसाचं नाव होतं डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
त्याने हसून शांतपणे उत्तर दिलं…..
“आमच्या हवाईयन प्रथेत असं मानतात की बाहेरच्या जगात, समाजात जे काही चाललं आहे, ते फक्त आपल्या आत मनात जे आहे, केवळ त्याचंच प्रतिबिंब आहे. तुम्हाला बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या मनाची स्थिती बदला. “
त्यांनी स्वत:वर उपचार केले होते ! —-
— कसे?
त्यांनी हवाईयन संस्कृतीतलं ‘हो’पोनोपोनो’ केलं होतं. या शब्दाचा अर्थ आहे ‘ चूक दुरुस्त करणं ‘.
डॉक्टर लेननी प्रत्येक गुन्हेगाराची केस-फाईल आधी नीट वाचली. त्याने केलेले खून, दरोडे, सगळं जाणून घेतलं. मग फाईल बंद करून शांतपणे बसून त्या व्यक्तीला उद्देशून मनाशी चार वाक्यं म्हटली —
१. माझं चुकलं. (I am sorry).
२. मला माफ कर. (Please forgive me).
३. मी तुझे आभार मानतो. (Thank you).
४. माझं तुझ्यावर प्रेम आहे. (I love you).
समाजात सगळ्या प्रकारच्या वृत्ती – प्रवृत्ती असतात. संताप, निराशा, हिंसा, क्रूरपणा – मनाने दुर्बल असलेले — या वृत्ती एखाद्या स्पंजसारख्या शोषून घेतात. मग त्याच गुणाकाराने सगळीकडे वाढतात.
डॉक्टर लेननी असं मानलं की “ माझ्या मनातल्या अशा सुप्त वृत्तींचंच बाह्य प्रक्षेपण या रुग्णांतून होत आहे. यांना सुधारायचं असेल तर मला माझ्या मनातली हिंसा कमी केली पाहिजे.”
प्रत्येक रुग्णाची फाईल वाचून त्याला ‘ माझं चुकलं’, ‘मला माफ कर’, ‘मी तुझा आभारी आहे’ व ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं सांगून त्यांनी त्या रुग्णाला तर सबळ, सकारात्मक बनवलाच, पण स्वत:च्या मनातली सुप्त हिंसाही शांत केली.
आपल्याला जगात काय चाललंय ते कळतच नाही, ‘ लोक असे कसे वागतात न? ‘ असं म्हणायची खोड आहे, पण स्वत:च्या मनाचा अजिबात थांग नसतो. आजूबाजूच्या जगातल्या घडामोडीमधून तुम्हाला जर सतत हिंसाच दिसत असेल तर तुमच्या मनात ती भरपूर आहे. तिची खाज कमी करायच्या प्रयत्नात तुम्ही त्या बातम्या चवीने वाचता, चर्वितचर्वण करता, घरच्यांवर भडकता, सरकारला शिव्या देता व सगळ्यांना फाशी दिल्याशिवाय देशाचं काही भलं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगता…..
विचार करा !—
ही चार वाक्यं एक अतिशय शक्तिशाली अशी साधना आहे. तुम्ही प्रत्येकाने ही नक्की करून बघा.
कशी करावी?—-
एक जागा निवडून तिथे डोळे मिटून २ मिनिटं {तरी!} शांत बसा.
ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध चांगले नाहीत, त्रास होतो, तिला नजरेसमोर आणा.
मग तिला उद्देशून ही ४ वाक्यं मनापासून म्हणा.
मनातच म्हणायची आहेत, म्हणून माफी मागायला हरकत नसावी !
आपल्या कुटुंबियांपासून सुरुवात करा.
तुम्हीच त्यांना जन्म घेण्याआधी निवडलं आहे, म्हणून संबंध सुधारून पुढच्या प्रगतीसाठी मोकळे व्हा।
Ps: The Hawaiian word ho’oponopono comes from ho’o (“to make”) and pono (“right”). The repetition of the word pono means “doubly right” or being right with both self and others. In a nutshell, ho’oponopono is a process by which we can forgive others to whom we are connected.
ओम शांती
माहिती संग्रहिका :सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा ८ ते १४ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा ८ ते १४
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या आठ ते चौदा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
वेद॒ वात॑स्य वर्त॒निमु॒रोरृ॒ष्वस्य॑ बृह॒तः । वेदा॒ ये अ॒ध्यास॑ते ॥ ९ ॥
सर्वगामी उत्तुंग जयाचा असतो संचार
गतीशील पवनाचे आहे सामर्थ्य अति थोर
ऊर्ध्व राहती या वायूच्या विभिन्न ज्या देवता
या सर्वांना वरुणदेवते तुम्ही ओळखुनि असता ||९||
☆
नि ष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्या३ स्वा । साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑ ॥ १० ॥
आज्ञा अपुल्या गाजवूनिया समग्र विश्वावर
वरुणदेवता समर्थ करिते सुराज्य जगतावर
साम्राज्या प्रस्थापित करण्या विराज सप्तलोकी
अतिव आदरे सारे त्यांना घेती हो मस्तकी ||१०||
☆
अतो॒ विश्वा॒न्यद्भु॑ता चिकि॒त्वाँ अ॒भि प॑श्यति । कृ॒तानि॒ या च॒ कर्त्वा॑ ॥ ११ ॥
निर्मिली देवे किती अद्भुते विश्वाला सजविती
ज्ञानी समर्थ देव तया कौतुके अवलोकिती
मानस त्याचा अजुनी आहे नवाश्चर्य निर्मिण्या
समर्थ तरीही त्यांना अपुल्या चक्षूने पाहण्या ||११||
☆
स नो॑ वि॒श्वाहा॑ सु॒क्रतु॑रादि॒त्यः सु॒पथा॑ करत् । प्र ण॒ आयूं॑षि तारिषत् ॥ १२ ॥
समर्थ आहे हा आदित्य राजा विश्वाचा
मार्ग आम्हाला दावित जावो सदैव सन्मार्गाचा
जीवन अमुचे करुन निरामय सुखी अम्हाला करा
आरोग्यमयी आयुष्याला वृद्धिंगत हो करा ||१२||
☆
बिभ्र॑द्द्रा॒पिं हि॑र॒ण्ययं॒ वरु॑णो वस्त नि॒र्णिज॑म् । परि॒ स्पशो॒ नि षे॑दिरे ॥ १३ ॥
वस्त्र आपुले दिव्य नेसुनी मिरवितसे शोभेने
कवच सुवर्णाचे तयावरी झळाळते तेजाने
सेवक त्याचे त्याच्या भवती नम्र उभे ठाकले
भव्य तयाच्या रूपाने साऱ्या विश्वा दिपविले ||१३||
☆
न यं दिप्स॑न्ति दि॒प्सवो॒ न द्रुह्वा॑णो॒ जना॑नाम् । न दे॒वम॒भिमा॑तयः ॥ १४ ॥
कपटीकृत्यांचा दुष्टांच्या यांना धाक नसे
मनुष्यजातीच्या द्वेष्ट्यांची भीतीही ना वसे
पातक करिती दुर्जन खल यांना भिववीती कसे
सर्वसमर्थ शक्तीशाली धाक कुणाचा नसे ||१४||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ “रामशास्त्री वेळापुरे” — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो ! अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले !
“ संस्कृत दासबोध ! “ अरे बापरे ! प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद ! कसं शक्य आहे?
हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा ! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला ! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला !
आता आली का पंचाईत ! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा? समर्थांची प्रार्थना केली मनोमन…अणि दिवस पुढे सरले… पण नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे “ .. …रामशास्त्री…असो. समर्थेच्छा !
वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल ! त्यात संघाची चड्डी घातलेली, त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…
म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला !
एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला ! “कोण रे तू? इथं कुठं वाट चुकलास?”
मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला…” जा पळ घरी…इथं काय मिळणार तुला?
जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊ देत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे. इथं काय ठेवलंय.. दगडं आणि माती ! “
मी म्हणालो, “ इथंच तर खर सुख आहे बाबा ! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?”
बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला ! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, “ अस्सं !!! बर मग जा आत ! “
मी दर्शन घेऊन परत आलो ! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती !
मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय?”
“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात !”
“वेळापुरे? श्याम?” .. “अरे श्याम नाही राम !”
आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! अरे बापरे ! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, “ ते संस्कृत दासबोध कर्ते? “
“तिथं तिथं…” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, ” तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते ! मी साधा मास्तरडा रे ! मला काय दगड कळतंय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक…त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही !”
मती सुन्न झाली ! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?
नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे ! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय ! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहून अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे !
बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले– “ घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा ! तरच कार्य सिद्धीस जाईल ! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला ! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून ! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत ! काय चमत्कार आहे हा ! वाचून पहा ग्रंथ ! खरोखरीच अप्रतिम झाला आहे !
मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध.कॉम वर आला !
ते म्हणाले, “अरे माझी मूर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे ! त्यांना विचार आणि दे टाकून ! माझे काय आहे त्यात !”….
डोळ्यात पाणी आले…पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले– “अरे अरे अरे ! सांभाळ ! डोक्याला शेण लागेल तुझ्या !”
मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, ” मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या आणि खो खो खो हसू लागले !
— त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले !
अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे !
हा संस्कृत दासबोध dasbodh.com वर नक्की वाचा ! आवडॆल तुम्हाला !
☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
नमस्कार ! दिनांक ८/ ०५/२०२३ ला राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर येथे गेलो होतो.
एखाद्या पंचतारांकित हॉटेलात जातोय की काय असाच भास आला !
दवाखान्याची इतकी भव्यता, अत्याधुनिक यंत्रणा आणि सुंदरता बघून खूप अभिमानस्पद वाटलं , की माझ्या देशात सुद्धा अश्याप्रकारचे दवाखाने तयार होत आहेत.
आम्हा सगळ्यांना खूप सुरक्षित आणि आरामदायक वाटले ! रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आहे! संपूर्ण कर्मचारी अतिशय ज्ञानी आणि मैत्रीपूर्ण आहेत ! खोली अतिशय स्वच्छ आणि आरामदायक आहे! दिलेले अन्न अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होते ! एकूणच, मला खूप सकारात्मक अनुभव आला !
कर्करोग या संकटाशी लढण्यासाठी इथे ‘कर्कयोद्धा’ ची फौज तयार करत आहेत. दवाखान्याच्या मिशनमधील प्रत्येक भागधारक, मग तो रुग्ण, काळजीवाहू, नातेवाईक किंवा इथले सेवा सहयोगी– हा सुद्धा कर्कयोद्धा आहे.
कार्यक्षमता, टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षा आणि सौंदर्यशास्त्र या मूल्यांवर राष्ट्रीय कर्करोग संस्थेची योजना आखली आहे.—- कर्क योद्धा, परिवार शक्ती, कर्क सेवक, आंतरिक संगत, सबकी लडाई ह्या तत्वांवर चालणारी ही संस्था आहे.
आज तुम्हा सगळ्यांना ऊर्जा कार्यक्षमता या तत्त्वावर कश्या प्रकारे ही संस्था आधारित आहे? हे सांगण्याचा प्रयत्न करतो – हा प्रकल्प पूर्णपणे सौर उर्जेवर आहे. सौर ऊर्जेच्या प्लेट्स च्या खालच्या सावलीचा उपयोग काय करायचं?, तर तिथे गाड्या पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्या भागात फुलबाग सुद्धा फुलविली आहे. अश्या प्रकारे आम्ही ऊर्जा सुद्धा तयार करू – जागेचा पुनर्वापर करू – फुलबाग सुद्धा फुलवू, हेच तत्व अश्या प्रकारच्या कृतीतून दाखवून आपल्या सगळ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे.
लेखक : श्री सूरज पाल
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“सेंगोल” – या राजदंडाची उंची ५ फूट आहे. तो चांदीचा असून त्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे. त्याच्या माथ्यावर शिवाचे प्रिय वाहन “नंदीबैल” विराजमान आहे, ज्याला निष्पक्षता आणि न्यायाचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे. हा राजदंड राजाने हाती धारण करणे म्हणजे धर्माशी अतूट, अविचल आणि तत्त्वनिष्ठ राहून शासन करण्याची जबाबदारी पार पाडणे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी, शेवटचा ब्रिटिश व्हॉईसरॉय – लॉर्ड माऊंटबॅटन यांना सत्तांतराचे प्रतीक म्हणून काही दृष्यस्वरूपातील चिन्ह हवे होते. तसे त्यांनी पं.नेहरूंना सुचवले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते – माननीय सी. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी. ते थोरापल्ली, जिल्हा कृष्णगिरी, तामिळनाडू (तेव्हाचे मद्रास राज्य) येथील रहिवासी होते. त्यांच्या मनावर चोल राजवंशाचा मोठा प्रभाव होता. राजसत्तेच्या सत्तांतराच्या समारंभात हा ‘सेंगोल’ (राजदंड) विधिपूर्वक नव्या शासकाच्या हाती सुपूर्द करण्यात येई. राजाजींनी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील “थिरूवदुथुराई अधिनाम (मठ), (Thiruvaduthurai Adheenam (Mutt) या धर्मपीठाशी संधान साधून चेन्नईतील “व्युमिडी बंगारू चेट्टी” या सराफी-पेढीकडून हा “सेंगोल” तयार करून घेतला. त्यावेळी त्याची किंमत रू.१५,०००/- होती.
अशा रीतीने १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा “सेंगोल” (राजदंड) पं. नेहरूंच्या घरी त्यांचे हाती या मठाच्या साधूंकडून विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
तो ‘सेंगोल’ (राजदंड) अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील संग्रहालयात वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रदर्शित करण्यात आला होता.
मात्र आता, कालच उद्घाटन झालेल्या नव्या संसद-भवनामध्ये, लोकसभा अध्यक्षांच्या सन्मान्य आसनाशेजारी त्याची सन्मानपूर्वक स्थापना होत असून, ती तामिळनाडूतील त्याच मठाच्या साधूंकडून विधिपूर्वक केली जाईल.
माहिती संग्रहिका :: सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.) इथून पुढे —
“डॉक्टर साहेब, या प्लेटलेट्स गोळा कशा केल्या जातात ? प्लेटलेट्स देण्यासाठी दात्याचे काही निकष असतात का आणि प्लेटलेट्सचेही रक्तगट असतात का हो ?” – रजत.
— जरा शास्त्रीय आणि तर्कशुद्ध महत्त्वाचे प्रश्न ऐकून डॉक्टरसाहेबांची कळी खुलली आणि ते समजावून सांगू लागले.—-
“रक्तदानापेक्षा प्लेटलेट डोनेशनचे निकष कांकणभर जास्तच काटेकोर असतात. दाता वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा लागतोच, शिवाय डोनेशनच्या किमान ४८ तास आधीपासून दारू पिणे, तंबाखू सेवन हे सगळंच कटाक्षाने बंद ठेवावे लागते. हिमोग्लोबीन १२.५ पेक्षा अधिक असावं लागतं आणि प्लेटलेट संख्या प्रति मिलीलिटर २,६५,००० पेक्षा जास्त असावी लागते.– दात्याच्या शरीरातून रक्त काढणे सुरू करतात, यंत्राद्वारे त्या रक्तातून प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि उरलेले रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडलं जातं. (डायलिसिस करताना कसं शरीरातील रक्त काढलं जातं, शुद्ध केलं जातं आणि ते शुद्ध रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं, तसंच.) साधारण एक दीड तास ही प्रक्रिया चालू राहते. तसेच ही प्रक्रिया करणाऱ्या यंत्राचा संच हा फक्त एकदाच वापरला जातो. व त्या वापरानंतर तो मोडीत काढला जातो (only one time use, disposed after single use). त्यामुळे दात्याला संसर्ग होण्याची तिळमात्रही शक्यता नसते. रक्तदानात तुमच्या शरीरातून रक्त काढून घेतले जाते, म्हणून तुम्हाला recovery साठी तीन महिन्यांपर्यंत परत रक्तदान करता येत नाही. प्लेटलेट डोनेशन मात्र दर पंधरा दिवसांनी करता येते. आणि तसं ते करावंही, आज प्रचंड गरज आहे. आणि हो, प्लेटलेट्सना रक्तगटाचं बंधन नसतं, बरं का ! कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स कोणत्याही रक्तगटाच्या पेशंटना चालतात. करोना काळात पेशंटची मोठी गैरसोय होत होती, अशा वेळी व जेव्हा कधी तातडीची गरज असेल, तर दाता सुदृढ असेल तर डबल डोनेशनही घेतले जाते. आणि हो, आपण दिलेल्या प्लेटलेट्स कोणाला दिल्या गेल्या हे दात्याला कधीच सांगितले जात नाही. आजवर फक्त एकदाच हा रिवाज मोडला गेला. ज्यांच्या सांगण्यावरून मी त्या दिवशी डोनेशनला गेलो होतो त्या बालविभागाच्या प्रमुखांनी दुसऱ्या दिवशी ज्या लहानग्याला माझ्या प्लेटलेट्स दिल्या होत्या, त्याच्या पालकांचा आलेला आभाराचा मेसेज मला forward केला होता. दानाच्या प्रक्रियेसाठी इतका वेळ देणं, त्या मोठ्या सुईच्या वेदना सहन करणे, आणि पुन्हा पंधरा दिवसांनी हीच प्रोसेस रिपीट करणं – तुम्हाला अनाकलनीय वाटेल कदाचित, पण आपली ही कसरत कोणाचा तरी जीव वाचवत आहे, ही भावना, ही जाणीव आपल्याला प्रेरणा देत रहाते. दान केलेले रक्त तीन आठवड्यांपर्यंत साठवता येते, पण प्लेटलेट्स फक्त पाचच दिवस टिकू शकतात, त्यामुळे आणखीन दाते पुढे येण्याची नितांत गरज आहे.”
— डॉक्टर सुयोग भरभरुन सांगत होते.
घरी परतताना, चक्क बंड्याही शांत होता, रजत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता, आणि एकदम तो उद्गारला, “बंडूशेठ, तू म्हणतोस तेच खरं. तो ब्राझीलचा चिकिन्हो स्कार्पा आणि हे डॉक्टर सुयोग दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. — त्या चिकिन्होने गाडी जमिनीत गाडायचा गाजावाजा केला, एवढंच तुला आठवलं. पण त्याने पुढे काय म्हटलं, ठाऊक आहे का तुला ?”
बंड्यांनं नकारार्थी मान हलवली.
” तो म्हणाला, ही गाडी माझ्या मृत्यूनंतर मला उपयोगी पडेल म्हणून मी गाडायचे ठरवले, तर तुम्ही माझी हुर्यो उडवलीत, मला नावं ठेवलीत, माझी अक्कल काढलीत. मग तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अनमोल अवयव तुम्ही जेव्हा जमिनीत गाडता, तेव्हा तुमची ही बुद्धी कुठे जाते ? त्यापेक्षा अवयव दान करा, अन्य गरजूंना मदत करा.”
“ अरे Organ donation ला प्रसिद्धी देत होता तो. तसंच या डॉक्टरांना स्वतःच्या कौतुकाची, मानमरातबाची हौस नाहीये. पण असं हे आचरट title पाहिलं, असं heading पाहिलं, असा मथळा पाहिला, की कोण आहे हा टिकोजीराव ? या उत्सुकतेने तरी लोकं ही बातमी वाचतील आणि प्लेटलेट डोनेशनला प्रेरित होतील – उद्युक्त होतील, म्हणून त्यांचा हा खटाटोप. – तुला माहित आहे का, डॉक्टरांनी आत्तापर्यंत तब्बल ७५ वेळा प्लेटलेट डोनेशन केले आहे ?”
— रजत विचारत होता, आणि बंड्या प्लेटलेट डोनेशन करण्यासाठी कोणाला संपर्क करायचा हे विचारणारा मेसेज सुयोग सरांना पाठवत होता.
— समाप्त —
(डॉ. सुयोग कुळकर्णी MD आयुर्वेद आणि त्यांनी ७५ वेळा केलेले प्लेटलेट डोनेशन ही १००% सत्य घटना आहे. प्लेटलेट डोनेशन या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉ. सुयोग यांना ९८२०२५९५६९ या क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.)