मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका जिद्दी माणसाची गोष्ट… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका जिद्दी माणसाची गोष्ट… माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

— — स्टीव्ह जॉब्ज

अ‍ॅपल : १९७६ साली एका साध्या गॅरेजमधून सुरू झालेली ही कंपनी आज इतकी अफाट श्रीमंत आहे की, तिचा पैसा मोजायचा झाला तर जगातील १८० पेक्षा जास्त देशांची एकूण अर्थव्यवस्था फिकी पडेल. ज्या माणसाने हे साम्राज्य उभं केलं, त्या स्टीव्ह जॉब्जचा २४ फेब्रुवारी, हा जन्मदिवस – आज स्टीव्ह आपल्यात नसूनही त्याच्या विचारांची जादू आजही आपल्या खिशातल्या आयफोनमध्ये किंवा समोरच्या मॅकबुकमध्ये जिवंत आहे. तो फक्त एक बिझनेसमन नव्हता, तर तो एक असा किमयागार होता ज्याने तंत्रज्ञानाला सौंदर्याची जोड दिली.

गोष्ट अशी आहे की, जॉब्ज म्हणायचा की ‘नवनिर्मितीच ठरवते की तुम्ही लीडर आहात की फक्त कुणाचे तरी फॉलोअर’. हे वाक्य आजही तितकंच लागू होतं, कारण त्याने कधीच कोणाची कॉपी केली नाही, तर स्वतःचे नियम स्वतः बनवले.

आता इथे ट्विस्ट आहे, अनेकांना वाटतं की डिझाईन म्हणजे फक्त एखादी वस्तू दिसायला कशी आहे, पण स्टीव्हचं मत वेगळं होतं. तो ठामपणे सांगायचा की ‘डिझाईन म्हणजे ती वस्तू कशी दिसते एवढंच नाही, तर ती काम कशी करते हे सर्वात महत्त्वाचं असतं’.

कल्पना करा, ज्या माणसाला त्याच्याच कंपनीतून बाहेर काढलं गेलं, तोच माणूस पुन्हा परततो आणि जगाला सांगतो की ‘तुमचं काम हे तुमच्या आयुष्याचा मोठा भाग व्यापणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला महान काम करायचं असेल, तर तुम्ही जे करताय त्यावर तुमचं प्रेम असायला हवं’.

ही गोष्ट इथे संपत नाही, कारण साधेपणा ही स्टीव्हची सर्वात मोठी ताकद होती. मनाला शांत ठेवून एखादी गोष्ट सोपी करणं ही एक तपश्चर्याच आहे, असं तो नेहमी म्हणायचा,

 २०११ मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला पण जाताना ‘स्टे हंग्री, स्टे फूलिश’ हा मंत्र देऊन गेला. नवनवीन गोष्टी शिकण्याची भूक आणि काहीतरी वेगळं धाडस करण्याचं वेड असेल, तरच तुम्ही जग बदलू शकता हे त्याने सिद्ध केलं.

आज जेव्हा आपण एआय (AI) आणि नवनवीन गॅजेट्सच्या गराड्यात आहोत, तेव्हा या माणसाची आठवण येणं स्वाभाविक आहे. त्याने आपल्याला फक्त मशीन नाही, तर एक अनुभव दिला.

तुमच्या आयुष्यात असं कोणतं ‘वेड’ आहे जे तुम्हाला स्टीव्ह जॉब्जसारखं काहीतरी वेगळं करायला भाग पाडतंय?


माहिती संग्राहक : अज्ञात .

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २७ आणि २८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २७ आणि २८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २७ – – – 

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।

धरी रे मना धीर धाकासि सांडी ।

रघुनायका सारिखा स्वामि शीरी ।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।।

अर्थ : हे मना, एखाद्या भित्र्या माणसासारखा तू प्रपंचाला का घाबरतोस? भीती सोडून धैर्य धारण कर. कारण तुझ्या पाठीशी रघुनायकासारखा स्वामी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अगदी यमाचा कोप झाला तरी तो तुला कधीही सोडणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही.

(भव – प्रपंच, लंडी – भित्रा/कमजोर मनाचा, दंडधारी – यम)

विवेचन : मानवी जीवन हे अनेक अनिश्चिततांनी भरलेले आहे. उद्या काय होईल याची चिंता, नोकरीची काळजी, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा असंख्य विचारांनी मन व्यापलेले असते. त्यामुळे माणूस आतून अस्वस्थ आणि भयग्रस्त होतो.

प्रपंचाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या भीतीने खचून जाणे योग्य नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला धीर देतात…

“धरी रे मना धीर, धाकासि सांडी”

… हे मना, तू भीती झटकून टाक आणि धैर्याने उभा रहा.

आपले जीवन हे जर एक रणांगण मानले, तर या रणांगणावर शूरवीराप्रमाणे लढणे आवश्यक आहे. हातात तलवार किंवा बंदूक आहे पण हात पाय कापताहेत, तर लढाई कशी लढणार ? शत्रूसाठी मग तुम्ही सोपे लक्ष्य असाल. मनात भीती असेल तर विजय शक्य नाही.

संकटेही अशीच असतात. आपण त्यांना जेवढे घाबरतो, तेवढी ती अधिक मोठी वाटतात. धैर्याने सामना केला, तर ती हळूहळू नाहीशी होतात.

या संदर्भात स्वामी विवेकानंद यांच्या बालपणातील प्रसंग अत्यंत बोलका आहे. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र. ते अत्यंत अवखळ आणि खोडकर होते. ते झाडावर चढत. आईला असे वाटले की झाडावर चढून हा खाली पडला तर त्याला इजा होईल. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना झाडावर चढू नकोस. तिथे ब्रह्मराक्षस राहतो असे सांगितले. पण नरेंद्राने आईला विचारले, “ब्रह्मराक्षस ? कुठे आहे तो मला त्याला पाहायचेच आहे. ?” ब्रह्मराक्षस प्रत्यक्षात नव्हताच. आपली मनच अशा गोष्टींची निर्मिती करते. म्हणूनच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे आपण म्हणतो.

समर्थ पुढे आपल्याला एक मोठा आधार देतात…

… रघुनायकासारखा स्वामी आपल्या पाठीशी आहे.

राम म्हणजे केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाही, तर तो धैर्य, धर्मनिष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. वाल्यासारख्या बलाढ्याला संपवणारा, रावणासारख्या अहंकारी व्यक्तीचा नाश करणारा हा राम सज्जनांचा त्राता आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात 

प्रत्यक्ष यम जरी कोपला, तरी राम तुला कधीही सोडणार नाही. तुझी उपेक्षा करणार नाही. याचा अर्थ असा नाही की की श्रीरामांना शरण जाण्यामुळे आपला मृत्यू टळणार आहे. मृत्यू तर अटळ आहे परंतु श्रीराम आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास जेव्हा आपल्या मनात निर्माण होतो तेव्हा मृत्यूची भीती कमी होते. संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते.

शेवटी, भय, आनंदी आणि धैर्याचे जीवन जगण्यासाठी समर्थांचा स्पष्ट संदेश आहे की श्रीरामावर (भगवंतावर) श्रद्धा ठेवा, धैर्य धरा आणि निर्भयपणे जगायला शिका. श्रीराम तुमच्या पाठीशी आहेतच.

स्वसंवाद :: 

  • मी माझ्या आयुष्यातील समस्यांना धैर्याने सामोरे जातो का, की त्यांना घाबरून जातो?
  • माझी भीती वास्तव आहे की ती माझ्या मनाने निर्माण केली आहे ?
  • संकटांच्या वेळी मला ईश्वरावर खरोखर विश्वास वाटतो का?
  • माझ्या मनातील श्रद्धा आणि धैर्य वाढवण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?

– – – – 

श्लोक क्र. २८ – – – 

दिनानाथ हा राम कोदंडधारी |

पुढे देखता काळ पोटी थरारी |

जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |२८|

अर्थ: श्रीराम हा दीनांचा कैवारी/रक्षणकर्ता आहे. धनुर्धारी रामाला समोर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काळ म्हणजे यमराजाला देखील धडकी भरते. हे वाक्य सत्य समजा की भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आणि त्याचे रक्षण करणारा आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही.

(कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला, वाक्य – वचन, नेमस्त – निश्चितपणे)

विवेचन : मागील श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी म्हणजे प्रपंचाच्या भीतीने हे मानवा तू का घाबरतोस ? या श्लोकात ते भगवंत आपला रक्षणकर्ता कसा आहे आणि तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करीत नाही हे समर्थ निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवतात. त्यासाठीच भगवंत आपल्या दासाची/भक्ताची उपेक्षा करीत नाही हे सांगणारे (नुपेक्षी कदा राम दासाभिमानी)हे पालुपद असलेले बरेच श्लोक आहेत.

मनुष्य अनेक अर्थाने दुबळा किंवा परावलंबी असतो. संकटप्रसंगी त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. कधी कधी हा आधार तो आपल्या नातलगांमध्ये किंवा मित्रांमध्ये शोधत असतो. परंतु या सगळ्याच गोष्टी बेभरवशाच्या असतात. परिस्थिती फिरली की ही मंडळी सुद्धा पाठ फिरवतात. पैसा सुद्धा सर्वप्रसंगी उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून संत आपल्याला कळकळीने सांगतात की आधार हा एकमेव परमेश्वराचाच असला पाहिजे कारण सर्व परिस्थितीत तोच आपल्याला साथ देईल. तो दीनानाथ आहे.

आपल्याला नुसता कोणाचातरी आधार आहे ही जाणीव सुद्धा खूप मानसिक बळ देणारी असते. स्वामी समर्थांच्या फोटोखाली, ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे वचन लिहिलेले असते. हे वचन लाखो भक्तांना जगण्याची शक्ती देते. स्वामी प्रत्यक्ष आपल्या पाठीशी आहेत या भावनेतून भक्त कठीण प्रसंगातूनही तरुन जातो. गीतेतील नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात – – 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

– – जो भक्त निष्ठेने आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी उपासना करील त्याचे मी रक्षण करतो.

आजकाल बरीच शिकलेली मंडळी माझा देवावर विश्वास नाही असे म्हणत असतात आणि त्याचे निरनिराळ्या प्रकारे समर्थन करीत असतात. आपण आस्तिक म्हणून जगायचे की नास्तिक म्हणून जगायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अशा मंडळींनी आस्तिक लोकांचा बुद्धिभेद करून त्यांच्या जगण्याचा आधार काढून घेऊ नये. ईश्वराला विज्ञानाच्या कसोटीवर अनुभवता येत नाही. त्याची अनुभूती श्रद्धेच्या कसोटीवर घेता येते ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी त्याच्यावर दृढ श्रद्धा असावी लागते, निष्ठा असावी लागते. त्या भावनेने जोपर्यंत आपण त्याची भक्ती करीत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही.

समर्थांना प्रिय असलेला आणि त्यांचे आराध्य दैवत असलेला राम हा कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला आहे. त्याच्या नुसत्या धनुष्याच्या टणत्काराने काळ देखील थरारतो. तो दीनांचा, दुःखितांचा रक्षण करणारा आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. फक्त आपली त्याच्यावर दृढ श्रद्धा हवी.

संकटातून परमेश्वर आपले रक्षण करतो असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ संकटांशी सामना करण्याची शक्ती तो आपल्याला देतो आणि त्याच्या कृपेनेच हा भवसागर आपण तरुन जातो असा आहे. तेव्हा हे मना, तू अन्य सगळे आधार सोडून केवळ एका रामावर श्रद्धा ठेव. तोच तुझे कल्याण करील. जेव्हा आपल्याला आतून जाणवते की एक दिव्यशक्ती आपल्या सोबत आहे, तेव्हा चिंता, राग, भविष्याची भीती यासारख्या गोष्टी आपोआपच कमी होतात. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, आपल्याजवळ आहे ही अनुभूती आली की माणूस कोणत्याही संकटांना सहजपणे तोंड देऊ शकतो.

स्वसंवाद :: 

१) मी खरोखरच परमेश्वराला अंतिम आधार मानतो का ? की पैसा, मित्र नातेवाईक हेच अंतिम प्रसंगी उपयोगी पडतील असे मला वाटते ?

२) संकटसमयी देवावरील माझा विश्वास डळमळतो का की अधिक दृढ होतो? 

३) “राम दासाभिमानी आहे” या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे का ? 

४) मी परमेश्वराला केवळ सुखात आठवतो की दुःखातही त्याच्यावर भार टाकतो ? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक २७ आणि २८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Contact आणि Connection – – –  – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

Contact आणि Connection – – – – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.

त्यातील एकाने साधूला विचारलं,

“साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.

पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?”

 

साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.

साधू : “तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?”

पत्रकार : “येस !! का हो ?”

साधू : “घरी कोण कोण असत?”

आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं… कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

 – – तरी मूळ प्रश्नाचे “उत्तर” मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.

तो म्हणाला : “माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण ! सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत. “

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?”

(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)

साधू : “तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?”

पत्रकाराने राग आवरत सांगितलं : “बहुतेक एक महिना झाला असावा.

साधू : “तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ? एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?”

(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)

तरी त्याने उत्तर दिले : “गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो”

साधू : “त्यावेळी किती दिवस एकत्र होता?”

पत्रकार (हळवा होत) : “तीन दिवस होतो”

साधू : “तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?”

(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ? वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?”

– – (असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).

साधू : “बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते… 

… तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीये….. You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी “लगाव” असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते.

एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं… हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही…

– – तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही. ”

आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं.

एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला.

आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं… 

… आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, सहकारी, समाज… सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो…

सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही…

कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत, सगळे स्वमग्न झालेत… !

– – – आपण वरचेवर बदलत चाललोय… हेच खरं आहे.. !

इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय…

कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं, हे चांगलच समजायला लागलयं…

प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे…

गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे…

वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं ऊत्तर तयार ठेवायचं… !

– – दाहक असलं… तरी सत्य हेच आहे… 

संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच connection.. 

वरील घटनेतील “साधू” म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आपले होते… * स्वामी विवेकानंद. * 

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६६, ६७, ६८. ६९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

भक्ति सूत्रे ६६ – – 

त्रिरूपभङ्गपूर्वमकम् नित्यदास्यनित्यकान्ताभजनात्मकं प्रेम कार्य प्रेमैव कार्यम् ||६६||”

अर्थ : त्रिपुटीचा भंग म्हणजे नाश अथवा लय करून सर्वकाळ भगवतांचा दास आहे अथवा त्याची कांता आहे असा भाव धारण करून त्याच्यावर प्रेम करावे, प्रेमच करावे.

विवेचन : साधन, साधक आणि साध्य अथवा भक्त, भक्ति आणि भगवंत अशी त्रिपुटी अथवा त्रिकुट मानले जातात. अध्यात्मात या तिन्हीची गरज असते. जेव्हा भगवतांची प्राप्ती होते तेव्हा ही त्रिपुटी संपुष्टात येत असते.

आपण नदीचे उदाहरण पाहू.

नदीचा उगम सागराला जाऊन मिळण्यासाठी होतो. यात नदी, नदीचे वाहणे आणि सागर मिळून त्रिकुट अथवा त्रिपुटी होते. यातील एक जरी नसेल तरी चालणार नाही. नदी सागराला जाऊन मिळाली की तिचे अस्तित्वच संपुष्टात येते, तिचे नदीपण शिल्कच उरत नाही…

भक्त भक्ति करतो, यथावकाश त्याला भगवंताची प्राप्ती होते, मग तो भक्त म्हणून सांगायला शिल्लकच उरत नाही. इथे आपल्याला प्रश्न पडेल की मग संत कसे काय आपल्याला उपदेश करतात. त्याला एकमेव उत्तर आहे. संत कमीपणा घेऊन आपल्यासाठी *”अवतरण”* करीत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती याची अनुभूती आपण प्रत्येक संताच्या बाबतीत घेऊ शकतो.

हे सर्व लिहिणे सोपे आहे, प्रत्यक्षात आणणे महाकठीण.

त्यासाठी संपूर्ण शरणागत भाव अथवा हनुमंतासारखी दास्य भक्ति अंगिकारता आली पाहिजे.

साधकाने भगवंताला म्हटले पाहिजे की तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन… ! तुझे चरण मी काही झाले तरी सोडणार नाही. तुझ्या चरणावर डोके ठेवले आहे. आता तू तार अथवा मार. तू तारलेस किंवा मारलेस, तरी दोन्ही मध्ये माझेच कल्याण आहे. अशी दृढ श्रध्दा हवी. असे जमले की विषाचा प्याला पिताना भीती वाटतं नाही, छाटी उडाल्यावर मागचा पुढचा विचार न करता कल्याण गडाच्या तटावरून उडी मारू शकतो, कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले तरी भक्त प्रल्हादाला निश्चिंत रहात नाम घेता येते…

अशी अनेक उदा. आपल्याला सांगता येतील.

… बाळाची आई बाळावर अकारण प्रेम करते. ते बाळ दुध पिताना आईला लाथा मारते, तिच्या अंगावर शी करते, शू करते, रात्री अपरात्री जागरण करवते, तरी आई त्या बाळावर अपरंपार प्रेम करते…

… भक्त आपल्या भगवंतावर असाच प्रेम करतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते.

संत तुकाराम महाराज या स्थितीचे खालील अभंगात वर्णन करतात.

“हाचि नेमआतां न फिरें माघारीं । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ 

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥ 

बळियाचा अंगसंग झाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥”

– – – – –

भक्ति सूत्रे ६७ – –

भक्ता एकान्तिनो मुख्याः ||६७||”

अर्थ : भगवंतांची एकनिष्ठपणे भक्ति करणारे भक्त हे मुख्य भक्त होत.

विवेचन: प्रपंचात अनेक गोष्टी मनुष्याला सांभाळाव्या लागतात, याउलट परमार्थ मार्गात मात्र एका भगवंताला आपलेसे करून घ्यायचे असते. गणिती भाषेत बोलायचे झाल्यास अनेक गणिते सोडवण्यापेक्षा एक गणित सोडवणे त्यामानाने सोपे, नाही का?

अनेक वर्षे प्रपंच करून मनुष्याला किती समाधान मिळतं हा प्रश्नच सध्याच्या काळात गैरलागू झाल्यासारखा आहे, असे म्हटले तर नवल वाटू नये… !

समर्थ म्हणतात, ” प्रपंच अवघाचि नासका”

यासाठी प्रापंचिक मनुष्याने, साधकाने दिवसातील काही वेळ एकांतात व्यतित करायला हवा. अनेक लोकांना एकांतापेक्षा एकटेपणाची जास्त भीती वाटतं असते. एकांत म्हणजे एकाचाही अंत. अंतर्यांमी वसलेल्या आत्मारामामध्ये स्वतःचा अंत करणे म्हणजे एकांत सेवन करणे. दुसऱ्या बाजूने विचार करता, आपली आणि भगवंताची इच्छा एक करणे, अर्थात त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळणे. तो जसा ठेवील तसे आनंदाने राहणे म्हणजे एकांत म्हणता येईल.

ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळून जाते तसे साधकाने भक्तीत विरघळून जावे. एक अर्थात जो आपला अभिमान आहे, अहंकार आहे, मीपणा आहे तो सर्व त्याच्याचरणी वाहून टाकावा, संपूर्ण शरणागत होऊन भगवंताशी समरस होऊन जावे… ! सर्व संतांनी हे करून दाखवले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“लवण मेळविता जळे| काय उरले निराळे ||१|| समरस झालो `तूज माजी हरपलो ||२|| अग्निकर्पूराच्या मेळी| काय उरली काजळी ||३|| तुका म्हणे होती| तुझी माझी एक ज्योती||४||”

(संदर्भ : अभंग क्रमांक २३७९, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

या गुणातीत भक्तीमध्ये व्यवहाराचा, स्वार्थाचा लवलेश नसतो. अशा भक्ताला फक्त भगवंताचे प्रेम हवे असते, आणि त्यासाठीच तो भगवंतावर जिवापाड प्रेम करीत असतो… ! मग, एखादी मीरा म्हणून जाते आणि ते अजरामर होते,

“मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा ना कोय||”

असा भक्त सर्वांना आवडतो, अर्थात देवालाही प्रिय होतो.

– – – –

भक्ति सूत्रे ६८, ६९ – – – 

कण्ठावरोधरोमञ्चाश्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथिवीं च ||६८||”

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि, सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि॥ ६९ |

अर्थ : प्रेमातिरेकामुळे कंठ दाटून येऊन शरीरावर रोमांच उभे राहिलेले असतांना आणि डोळ्यांतून अश्रू वहात असताना सिद्ध भक्त बाष्प गद्गद स्वरांनी एकमेकांशी संभाषण करताना उभय कुळे आणि पृथ्वी पावन करतात. इतकेच नव्हे तर असे भक्त (संत) तीर्थांना पावन करतात तसेच, ते जे बोलतात, त्याला वेदांत वाक्य म्हणून मान्यता मिळते.

विवेचन : भक्ति वाढत चालली की साधकाचे अष्ट सात्विक भाव जागृत होत असतात. आता अष्ट सात्विक भाव आपण पाहू.

अष्ट सात्विक भाव म्हणजे भक्तीमध्ये किंवा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होणारी आठ प्रकारची शरीरिक-मानसिक लक्षणं. हे भाव परम भक्तीच्या अवस्थेत देवाप्रती प्रेम व एकात्मतेमुळे आपोआप उमटतात. हे “सात्विक” (शुद्ध, निर्मळ) स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना सात्विक भाव असे म्हणतात.

अष्ट सात्विक भाव :

  1. स्तंभ (स्तब्धता)

शरीर स्थिर होणे, न बोलणे, हालचाल थांबणे.

  1. स्वेद (घाम येणे)

अनोख्या आनंदाने किंवा भावानं अंगाला घाम फुटणे.

  1. रोमांच (रोमहर्ष)

अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर सुटणे.

  1. स्वरभंग (गेल्यावर आवाज अडखळणे)

बोलताना गहिवर येणे, आवाज तुटक होणे.

  1. कंपन (थरथर)

शरीर थरथरणे, हातपाय हलणे.

  1. वैवर्ण (रंग बदलणे)

चेहऱ्यावर लाली, पल्लव, पांडूपणा इ. रंग बदल.

  1. अश्रू (डोळ्यांतून पाणी येणे)

आनंद, प्रेम, भक्तिभावाने डोळ्यांतून अश्रू येणे.

  1. प्रलय (संमोहनासारखी अवस्था / शून्यभाव)

शरीर व मन पूर्णपणे विश्रांतीत जाणे, समाधिस्थ अवस्था.

साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर साधकाला या आठही भावांची अनुभूती येत असते. परंतु यामध्ये न गुंतता साधकाने आपली साधना, उपासना सुरू ठेवायला हवी.

जेव्हा अधिकार प्राप्त झालेले दोन भक्त भेटतात किंवा दोन संत भेटतात, तेव्हा त्यांच्यात एकतर मौनात चर्चा होते किंवा ते फक्त आपल्या गुरुबद्दल किंवा आपल्या भक्तीबद्दल चर्चा करीत असतात. तेव्हा त्यांचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊ शकतात, किंवा काही वेळा झालेले अनेक साधकांनी पाहिले असेल. जिवंत साधकांच्या डोळ्यात पाणी आले यात नवल कदाचित नसेल, पण श्रीमहाराज (गोंदवलेकर महाराज) जेव्हा नैमिष्यरण्यात जायला निघाले तेव्हा थोरल्या रामाच्या डोळ्यांत पाणी आले. श्रीमहाराज त्याच्याजवळ गेले की त्याला विचारले की अरे, मी नैमिष्यरण्यात जातोय, ते तुला आवडले नाही का ? तसे असेल तर मी जाणार नाही… !

या सर्व गोष्टी परम प्रेमातूनच घडून येऊ शकतात. सर्व संतांनी भगवंतावर निरातिशय प्रेम करून त्याच्या सगुण विग्रहातून चैतन्य प्रकट करविले. चैतन्य सर्वत्र भरून राहिले असेल तर ते कोठूनही प्रगट होऊ शकते, फक्त ते प्रगट करण्याइतकी साधना, तप:श्चर्या आणि संपूर्ण शरणागती अत्यंत आवश्यक ठरते.

गंगेचे अवतरण झाले तेव्हा गंगा म्हणाली की पृथ्वीवर पापी लोकं राहतात, ते माझ्या पाण्यात स्नान करतील तेव्हा त्यांची पापे नष्ट होतील, यात बिल्कुल संदेह नाही, पण मी मैली होईन तेव्हा मला कोण शुद्ध करेल. तेव्हा भगवंताने तिला वचन दिले की संतमंडळी जेव्हा तुझ्या स्नान करतील तेव्हा त्याच्या अंतरंगी असलेल्या माझ्या अंशाने तू पुन्हा पुण्यसलीला होशील. आजपर्यंत हे वचन भगवंताने पाळले आहे.

अशा एकनिष्ठ भक्तांमुळे, संतांमुळे कुळ, मूळ आणि धरित्री पावन होत असते, नद्यांना तीर्थत्व प्राप्त होत असते… ! आणि संत जे बोलतात ते शास्त्र म्हणून मान्यता पावते. आदरणीय ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की मी पुस्तकातून जो वेदांत शिकलो तोच वेदांत श्रीमहाराज साध्या साध्या उदाहरणातून आणि स्व-आचरणातून जगाला सांगत आहेत. वेगळा वेदांत अभ्यासण्याची गरजच नाही. श्रींचे प्रत्येक वाक्य हे वेद वाक्य आहे, वेद वचन आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ६६, ६७, ६८, ६९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके

पहाटेचा दीड वाजला आहे. Central Reserve Police Force च्या एका तुकडीवर अंतर्गत भागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या भागातील एका शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरते out post उभारण्यात आले आहे.

कारगिल युद्ध समाप्त झाल्याची घोषणा झालेली आहे. बाहेरून आत येऊन सीमेमध्ये खोलवर लपून बसलेला शत्रू आपण फार मोठी किंमत मोजून पिटाळून लावला आहे… पण आधीच देशाच्या अंतर्भागात बस्तान बसवलेले शत्रू आता आतून दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सैन्याने ज्यांचा येथील कार्यकाळ संपलेला आहे, अशाही सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना इथं मुदतवाढ देऊन जबाबदारी दिली गेली आहे. त्यात अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे लागले होते! 

ही outpost तशी काश्मिरातल्या जंगलाच्या भागात, आणि तेथून पाकिस्तान सीमा फारशी दूर नाही.. आसपास बऱ्यापैकी लोकवस्ती. तेथील लोकांशी या outpost मधील सैनिकांशी बराच परिचय झालेला होता. तेथील तरुण या सैनिकांशी क्रिकेट खेळत, दूध वगैरे वस्तू आणून देत असत. एकूण मैत्रीपूर्ण आणि शांत वातावरणात सैनिक कर्तव्यावर तैनात होते!

चक नटनस नावाचे ठिकाण. दिनांक ६ ऑगस्ट, १९९९… कारगिल युद्ध समाप्तीची घोषणा होऊन केवळ दहाच दिवस झालेले होते… पाकिस्तानी अतिरेक्यांच्या आणि स्थानिक अतिरेक्यांच्या एका खूप मोठ्या गटाने या outpost वर मोठ्या आधुनिक शस्त्रांनी हल्ला चढवला! अतिरेकी या OUTPOST पासून अगदी जवळ, म्हणजे सुमारे पंचवीस तीस मीटर्सपर्यंत जवळ पोहोचले होते… व त्यांनी अक्षरश: POINT BLANK RANGE हल्ला चढवला.. त्यांच्याकडे आर. पी. जी. अर्थात ROCKET PROPELLED GRENADES होते… जे खांद्यावरील बंदुकीतून डागता येतात… पिका मशीन गन्सही होत्या… या एक हजार मीटर्सपर्यंत अचूक मारा करीत मिनिटाला सहाशे ते आठशे राउंडस डागू शकतात… अंधार एवढा की केवळ रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांमुळे उडणाऱ्या ठिणग्या दिसाव्यात.

Outpost मध्ये सैनिकांची संख्या मर्यादित. शिवाय पहाऱ्यावरील दोन, तीन रक्षक (सेंट्री) वगळता इतरांना रात्री त्यांच्याकडील शस्त्रे शास्त्रागारात जमा करण्याचे आदेश होते! 

अचानक झालेल्या तुफानी गोळीबारात दोन पहारेकरी आणि तीन सैनिक आणि एक अधिकारी मिळून सहा शूरवीर धारातीर्थी पडले!

मदतीला येण्याचा संदेश दिला गेलाय… पण बचाव दल पोहोचायला किमान दोन तास लागतील. हल्ला अगदी पूर्वतयारी करून झाला आहे. क्रिकेट खेळायला येणाऱ्यांनी बहुदा गावाशेजारच्या जंगलात आधीपासूनच लपून बसलेल्या अतिरेक्यांना सर्व माहिती पुरवली आहे! त्यामुळे कोणत्या बाजूला किती जवान असतात, शस्त्रे कोणती आणि किती असतात याची माहिती शत्रूला होती, असे स्पष्ट होते!

४, राष्ट्रीय रायफल्स (बिहार रेजिमेंट) कुपवारा येथे कर्तव्यावर असलेले मेजर मनजीत सिंग यांची खरे तर काश्ममीरातील नेमणूक संपली होती आणि ते लवकरच त्यांच्या गावी, जालंधरला सुट्टीवर जाणार होते… पण प्राप्त परिस्थिती पाहून लष्कराने त्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना तिथेच कार्यरत राहण्याचे आदेश दिले होते.

८, माउंटन डिविजन काश्मीर खोर्‍यातून काढून तिला द्रास भागात झालेल्या घुसखोरीचा बिमोड करण्याच्या कामी धाडण्यात आले होते. त्यामुळे उत्तर काश्मीर भागात अतिरेकी विरोधी कारवाईत कार्यरत असलेल्या सैनिक, अधिकारी यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला होता. नेमका याचाच फायदा शत्रूच्या फिदायीन अर्थात आत्मघातकी अतिरेक्यांनी उचलला होता. काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती ज्यांना माहीत आहे, अशांना यात काहीही आश्चर्य वाटणार नाही. तेथील परिस्थितीचे यथार्थ ज्ञान भारतातील इतरांना फारसे नाही.

गोळीबाराचा आवाज ऐकून मेजर मनजीत सिंग आपल्या झोपण्याच्या जागेवरून ताडकन उठले आणि बाहेर धावले. मागच्याच वर्षी त्यांनी जगरपोरा येथे झालेल्या चकमकीत एका अफगाणी अतिरेक्यास यमसदनी धाडले होते. तो अतिरेकी बी. एस. एफ. च्या बंकर वाहनावर चढून वाहनात ग्रेनेडस टाकण्याच्या अगदी बेतात असतानाच मनदीप यांनी त्याला ठोकले होते. त्यावेळच्या चकमकीत कॅप्टन तरुण कुमार (मरणोत्तर कीर्ती चक्र) आणि त्यांचे सिग्नलमन श्री. सावंत यांना वीरगती प्राप्त झाली होती. तो आणि असे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी होते. पुढे राहून नेतृत्व करणारा हा शूर अधिकारी होता. मर्यादित शस्त्रे आणि प्रचंड संख्येने चालून आलेला शत्रू… परिस्थिती भयावह होती.

जखमी झालेल्या कनिष्ठ सैनिक अधिकाऱ्याची जागा घेण्यासाठी ते धावत असताना त्यांच्या पोटात, छातीत ग्रेनेडचे तुकडे घुसले… पण तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी इतर सैनिकांना भराभर सूचना देत स्वत: गोळीबार आरंभला.

यात एक गोष्ट आपल्या बाजूची ठरली.. ती म्हणजे पहाऱ्यावर असलेल्या एका सैनिकाजवळ रणगाडा भेदी rocket launcher होता! त्या जांबाज बहादाराने त्या तेवढ्या धुमश्चक्रीत ते शस्त्र चालवले… अतिरेक्यांना त्या शस्त्राची बहुदा कल्पना नसावी. त्या तोफगोळ्याच्या आवाजानेच अतिरेकी हादरून गेले आणि त्याच्या स्फोटात पुढे आलेल्या काही अतिरेक्यांचे तुकडे झाले.

अतिरेकी पांगले. पण तीन अतिरेकी मात्र OUTPOSTच्या आतील भागापर्यंत पोहोचले. त्यातील एकाकडे दोन ग्रेनेड्स होते. पण त्यादिवशी outpost मध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून एके ४७ रायफल जमा करण्याचे चुकून राहून गेलेले होते! 

सैन्यातील प्रत्येकाला शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. त्याचा फायदा झाला. या सफाई कर्मचाऱ्याने एके. -४७ अचूक चालवली. त्या अतिरेक्याच्या हातातील दोन्ही ग्रेनेड्स त्याच्या हातातच फुटले आणि ते तिघेही ठार झाले! 

पूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना कंपनी कमांडर कॅप्टन मनदीप यांनी रायफल चालवली. सैनिकांना मार्गदर्शन करीत राहिले. त्यांनी आणि साथीदार सैनिकांनी खूप अंधार असतानाही केवळ उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर अचूक गोळीबार केला. तब्बल २६ अतिरेकी ठार मारले! 

एका छोट्या OUTPOST वर केला गेलेला हा मोठा हल्ला होता. त्यामुळे आपल्या सैनिकांनी बलिदान आणि उत्तरही मोठेच दिले! नायब रिसालदार नरेंदर सिंग, नाईक मिथिलेश पाठक, सोवार सोहन सिंग सोलंकी यांनीही शौर्य गाजवीत वीरगती पत्करली. अतिरेक्यांच्या हल्याची ही योजना पाकिस्तानी स्पेशल सर्विस ग्रुप (एस. एस. जी. )च्या, भारतात घुसखोरी केलेल्या एका अधिकाऱ्याने आखून दिली होती असं म्हटलं जातं!

१९ मे, १९६९ रोजी जन्मलेले मनजीत सिंग ६ ऑगस्ट, १९९९ रोजी, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी हुतात्मा ठरले! महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम शरीरसौष्ठवपटू, मिस्टर पंजाब, मिस्टर जालंधर या स्पर्धांत सहभागी होते. कारगिल युद्धाच्या धामधुमीत कॅप्टन मनजीत सिंग यांचे हे बलिदान काहीसे दुर्लक्षित राहिले असल्याची शक्यता आहे. त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले! 

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काय एक एक माणसे असतात! – लेखक : नितीन मांडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

काय एक एक माणसे असतात! – लेखक : नितीन मांडे ☆ प्रस्तुती :  गौरी गाडेकर

काय एक एक माणसे असतात!

 – – वाचाच!

मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो!

अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले! संस्कृत दासबोध! अरे बापरे!

प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद! कसं शक्य आहे?

हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला!

आता आली का पंचाईत! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा?

समर्थांची प्रार्थना केली मनोमन… अणि दिवस पुढे सरले.

नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे”… रामशास्त्री… असो. समर्थेच्छा!

 

वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी,

बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल!

त्यात संघाची चड्डी घातलेली त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…

म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पाहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला!

एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला! “कोण रे तु? इथं कुठं वाट चुकलास? “

मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला… जा पळ घरी… इथं काय मिळणार तुला?

जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊदेत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे, इथं काय ठेवलय दगडं आणि माती!

मी म्हणालो, इथंच तर खर सुख आहे बाबा! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?

बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, अस्सं! ! ! बर मग जा आत!

मी दर्शन घेऊन परत आलो! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती!

मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय? “

“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात! ” “वेळापुरे? श्याम? ” “अरे श्याम नाही राम! “

आणि अचानक माझ्या डोक्यात ट्युब पेटली! अरे बापरे! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, ते संस्कृत दासबोध कर्ते?

“तिथं तिथं… ” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, “तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते! मी साधा मास्तरडा रे! मला काय दगड कळतय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक… त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही! “

मती सुन्न झाली! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?

नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहुन अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे!

बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा! तरच कार्य सिद्धीस जाईल! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत! काय चमत्कार आहे हा! वाचून पहा ग्रंथ! खरोखरीच अप्रतीम झाला आहे!

मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध. कॉम वर आला!

ते म्हणाले, “अरे माझी मुर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे! त्यांना विचार आणि दे टाकून! माझे काय आहे त्यात! “

डोळ्यात पाणी आले… पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले! “अरे अरे अरे! सांभाळ! डोक्याला शेण लागेल तुझ्या! “

मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, “मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या! ” आणि खो खो खो हसू लगले!

त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले!

अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे!

हा संस्कृत दासबोध www. dasbodh. com वर नक्की वाचा! आवडॆल तुम्हाला!

 

लेखक : नितीन मांडे 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदिर…’  लेखक : ” रामभक्त ” प्रशांत कुलकर्णी ☆प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदिर…’  लेखक : ” रामभक्त ” प्रशांत कुलकर्णी ☆प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

लोणार सरोवराच्या पाण्यापाशी जाताना उंचावरून एका पायवाटेने खाली उतरत यावं लागतं… हा रस्ता नागमोडी वळणाचा आणि जंगलातून जाणारा आहे. याचं पायवाटेवर जरासं आडवाटने बाजूला काही अंतर चालतं गेलं की डाव्या बाजूला थोडंसं उंचावर हे एक अदभूत आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असे श्रीरामाचे मंदिर आहे. मोडतोड आणि अत्यंत दुर्लक्षित झालेलं हे मंदिर अजूनही त्याच्या पुराणकालीन वैभवशाली श्रीमंतीची साक्ष देत उभे आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामाची मूर्ती आहे, सहसा श्रीराम यांची एकटी मूर्ती कधीही नसते. श्रीरामाच्या एका बाजूला बंधू लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला पत्नी सीता उभे असतात. अजून खास म्हणजे श्रीराम यांची ही मूर्ती निशस्त्र अवस्थेत आहे आणि हे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीरामाच्या हातात कायम धनुष्यबाण दाखवले जाते जे या मूर्तीत नाही.

यामागे एक खास कारण आहे. श्रीराम वनवासात असताना येथे या सरोवराच्या बाजूला वास्तव्यास असताना त्यांचे वडील दशरथ यांचे निधन झाले. श्रीरामांनी आपल्या वडिलांचा दशक्रियाविधी येथून वीस किमी अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या काठी मेहकर येथे केला. तेथेच श्री बालाजी यांची खास मूर्ती आहे त्यावर मागच्या भागात लिहिले आहेच…

श्रीराम यांना आपल्या वडीलांचे पिंडदान करायचे होते आणि ते वनवासात असल्याने त्यासाठी अट अशी होती त्या विधीसाठी श्रीराम निशस्त्र असायला हवेत आणि त्यांच्याबरोबर कोणी स्वकीय असायला नको. हेच पिंडदान श्रीरामांनी या सरोवराच्या बाजूला केले आणि त्याचं ठिकाणी सध्याचे हे निशस्त्र श्रीरामाचे मंदिर आहे.

या मंदिरात एक अचंबित करणारी गोष्ट अशी या ठिकाणी तुम्ही गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर उभे राहून हात जोडून नमस्कार करायला उभे राहिलात की तुम्हाला श्रीरामांच्या मूर्तीच्या एका बाजुला लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला सीता मातेचे दर्शन होते. हे खूपच आश्चर्यकारक आहे. त्यामागे एक खास कारण आहे. या मंदिरात सभामंडपात दगडी सुबक नक्षीकाम केलेले बारा खांब आहेत, जे एका विशिष्ट रचनेत मंदिरात बसवले गेले आहेत. चार मोठे खांब सभामंडपात मध्यभागी आणि चार छोटे खांब उजव्या बाजूला आणि चार डाव्या बाजूला. हे खांब अशा रितीने बसवले गेले आहेत की ज्यावेळी आपण मूर्ती समोर हात जोडून उभे असतो त्यावेळी प्रकाशाची किरणे विशिष्ट कोनातून परावर्तित होईन आपली स्वतःची सावली श्रीरामाच्या मूर्तीच्या बाजूला अशा प्रकारे पडते की आपल्याला त्या मूर्तीच्या एका बाजूला सीतामाता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत हा भास निर्माण होतो. मी हे प्रत्यक्ष बघितल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले. जरा विचार करा त्यावेळी आजच्या सारखे कॅलक्युलेटर, संगणक, दुर्बीण, होकायंत्र असे कोणतेही अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध नसताना हे त्यांनी कसे निर्माण केले असेल? अहो एक दोन सेंटीमीटर जरी खांबांची लांबी, रुंदी, ठेवण बदलली तरी ही विस्मयकारी गोष्ट साकारणे केवळ अशक्य आहे. यावरून त्याकाळी विज्ञान किती प्रचंड ताकदीचे होते याची प्रचिती येते…

एवढंच नाही तर या मूर्तीच्या समोर उभे राहून तुम्ही आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ उभे नेऊन डावीकडे उजवीकडे बाय बाय केल्यासारखे हलवले तर श्रीरामांच्या मस्तकाच्या वर मागच्या भिंतीवर या आपल्या हातांच्या सात सात सावल्या पंखा घालत असल्यासारख्या हलताना दिसतात. हे दोन्ही प्रकार मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. असे अजूनही खास वैशिष्ट्य या मंदिरात आढळले…

यावरून जरा विचार करा की आपले पूर्वज किती विद्वान आणि प्रचंड कलात्मक होते. त्यावेळेसची पाषाण शिल्पकला किती अफाट होती. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं हे भव्यदिव्य आहे, पण काळाच्या ओघात अक्षरशः नेस्तनाबूत होत आहे…

अरे हो अजून एक खास बाब अशी या मंदिरात होकायंत्र काम करत नाही. तिथे मंदिरात विश्रांतीसाठी खाली जमिनीवर बसलो असताना होकायंत्र काढून वेगवेगळ्या दगडावर ठेऊन पाहिलं तर त्या होकायंत्राची सुई दक्षिण उत्तर दाखवत नाही. वेगवेगळ्या दगडावर होकायंत्र ठेवलं की ती सुई भरकटत जाते पण स्थिर दक्षिण उत्तर होत नाही. आहे की गमतीशीर? … अर्थात यामागे शास्त्रीय कारण आहे…

या मंदिराची सध्याची अवस्था पाहून मन विषण्ण झालं… इतकं मोठं वैभव आपल्याकडे आहे याचा खरोखरचं अभिमान वाटतो…

लेखक : ” रामभक्त ” प्रशांत कुलकर्णी

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

मागील भागात आपण मधुरा भक्ती विषयी थोडी माहिती घेतली. या भागात भक्तीच्या याच प्रकाराविषयी आणखी काही माहिती घेऊ.

स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यांनंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात. स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती.

पुरूषभक्ताने स्त्रीवेष धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्‍नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनले परंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा समाजमनावर असल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले असावेत. आपल्याकडचे पोतराज वगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे.

जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो अशी समजूत आहे. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूने विवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.

चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते.

रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते. वल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला होता.

मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसा सारखी करण्यात आली आहेत.

गुलाबराव महाराजांचा (इ स १८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला फारसे स्थान मिळालेले नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्‍नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादि सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.

भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (१५ वे शतक) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. युरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णने ही आढळतात. मुस्लिम स्त्री संत रबिया (इ स ७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.

जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत मीराबाई या त्यापैकी प्रमुख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी आंडाळ ही रंगनाथाला म्हणजेच कृष्णाला आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.

याच प्रकारच्या भक्तिरसाचा अविष्कार आपल्याला ‘गीतांजली’ तील गीत क्र ५२, ५३, ५४, ५६, ५७, ५९, ७२, ७३, ७४, ८९, ९१, ९४, ९९, १०१, १०२ मध्ये कमी अधिक प्रमाणात पहायला मिळतो.

—–

☆ गीत : ५५ ☆

LANGUOR is upon your heart and the slumber is still on your eyes.

Has not the word come to you that the flower is reigning in splendour among thorns? Wake, oh awaken! Let not the time pass in vain!

At the end of the stony path, in the country of virgin solitude my friend is sitting all alone. Deceive him not. Wake, oh awaken!

What if the sky pants and trembles with the heat of the midday sun ⎯ what if the burning 

sand spreads its mantle of thirst ⎯

Is there no joy in the deep of your heart? At every footfall of yours, will not the harp of 

the road break out in sweet music of pain?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:५५ ☆

जागा असशी परी ये भानावर

दूर जायचे तुज असे खरोखर

डोळ्यात झोप, मनात मरगळ

झटकून दे, व्यर्थ जातोय काळ॥ 

*
काट्यांसंगे गुलाब बहरतसे

वैभवात अन् राज्य करितसे

संकटे झेलण्या तुझेच रे बळ

ध्यानी धरी, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

थांबू नको वाट बिकट जराशी

सखा एकटा त्या निर्जन प्रदेशी

वाट पाहे, करी प्रवास सुफळ

भेट न चुको, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

झेलुनि रवितापा नभ उरी कंपते

तप्त वाळु भिउनि जळात भिजते

तसा सोसुनि भवताप सकळ

मार्ग आक्रमी, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

हर्ष अंतरीचा तुज जाणवेल

चाहूल हरीची जेंव्हा कळेल

सुसह्य होईल वेदनेची कळ

ऊठ ऊठ, व्यर्थ जातोय काळ॥ 

*

टाक पाऊले त्या वाटेवरती

पदरवातुनि तारा झंकारती

मुक्त हो, त्यागुनि देहाची खोळ

त्वरा करी, व्यर्थ जातोय काळ॥

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत : ५६ ☆

THUS it is that thy joy in me is so full. Thus it is that thou hast come down to me. O thou lord of all heavens, where would be thy love if I were not?

Thou hast taken me as thy partner of all this wealth. In my heart is the endless play of 

thy delight. In my life thy will is ever taking shape.

And for this, thou who art the King of kings hast decked thyself in beauty to captivate my heart. And for this thy love loses itself in the love of thy lover, and there art thou seen in 

the perfect union of two.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५६ ☆

मला पाहता, तुझ्या अंतरी, प्रीत जागते

उतरलास पायरी, ठाऊक तरी तुला सांगते

*
मी नसते तर सांग कुणावर होशी आरक्त

तुला मिळविण्यासाठी मी ही झाले विरक्त

*
जे जे मजला आनंद देई, ते ते निर्मित जाशी

कान्हा, जिंकाया मन माझे रूपे अनेक घेशी

*

सर्वस्व अर्पुनि मजला, आलास हृदयी रिक्त

आनंद मनी दाटला, काय सांगू त्या नसे अंत

*

कळले नाही, तू माझ्यात मी तुझ्यात विरले

दोन मने जुळता, जीव शिव ना अलग उरले

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ५७ ☆

LIGHT, my light, the world-filling light, the eye-kissing light, heart-sweetening light!

Ah, the light dances, my darling, at the centre of my life; the light strikes, my darling, the chords of my love; the sky opens, the wind runs wild, laughter passes over the earth.

The butterflies spread their sails on the sea of light. Lilies and jasmines surge up on the crest of the waves of light.

The light is shattered into gold on every cloud, my darling, and it scatters gems in 

profusion.

Mirth spreads from leaf to leaf, my darling, and gladness without measure. The heaven’s river has drowned its banks and the flood of joy is abroad.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:५७ ☆

कसे सांगू माझे प्रकाशाशी नाते

तो माझा, फक्त माझाच वाटते

*
डोळ्यांना चुंबतो, हृदयी माधुर्य भरतो

अंतरी नाचतो, हृदयाची तार छेडतो

*

प्रिये, बघ आकाश त्याने उघडले

हास्य किरण धरणीवर उधळले

*

प्रकाश सागरात फुलपाखरांच्या बोटी

तर लाटेवर स्वार पुष्पगंधाची लोटी

*

प्रिये, बघ सोनेरी शिंपल्यात मेघ

भरून, भारून टाकला विश्व परीघ

*

मुक्त हस्ते करतो, रत्नांची उधळण

पानापानांतून आनंदाची पखरण

*

बांध तोडले गंगेने, भरून आला ऊर

अथांग पसरेल आता आनंदाचा पूर

– क्रमशः भाग १९..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवाच्या दिवशी व्हाट्सअपवर नवीन चित्रपटासंदर्भात एक पोस्ट फिरत होती. सालार, डंकी आणि आणखी असेच काही बॉलिवूडचे मसाला चित्रपट येत असताना प्रेक्षकांनी अस्सल हिरोकडे पाठ फिरवली. हा अस्सल हिरो म्हणजे सॅम बहादूर. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल. भारतीय लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावून आपल्या देशातील जवानांना आणि तरुणांना सेवेचा आदर्श त्यांनी उभा केला. तरुणाईने पाहिलाच पाहिजे असा हा चित्रपट पण हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हा थिएटरमध्ये तुरळक गर्दी होती. पाहणारे बहुसंख्य प्रेक्षक साठी ओलांडलेले होते. असाच एक रिअल हिरो म्हणजे प्रकाश बाबा आमटे. आपल्या वडिलांचा म्हणजेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या विकास आणि प्रकाश या दोन सुपुत्रातील द्वितीय. हा द्वितीय पुत्र तसा एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु करतात. एक दिवस आपल्या मुलांसह भामरागडच्या जंगलात सहलीसाठी म्हणून जातात. भामरागडचे जंगल हे जाण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे. रस्ते नीट नाहीत, दळणवळण सुविधा नाहीत. आरोग्याच्या सोयी तर नाहीतच पण जंगलातील माडिया, गोंड यासारखे आदिवासी तर आरोग्य आणि शिक्षण यांच्याबद्दल काडीचीही आस्था नसलेले. अशा वेळी बाबांना प्रश्न पडतो. मी तर आनंदवनात कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु केलंय पण अशा बिकट ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवाना कोण सेवा देणार? त्यांच्या मनातील खंत जाणून घेऊन नुकताच डॉक्टर झालेला प्रकाश म्हणतो, ‘ मी करीन इथे काम. ‘ बाबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो.

एम बी बी एस झालेला, डोळ्यात भविष्याची स्वप्ने तरळत असलेला हा तरुण निश्चय करतो आदिवासींच्या सेवेचा. त्याच्यासाठी हे काम अजिबात सोपं नसतं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि त्या तालुक्यातील हेमलकसा हे ठिकाण. इथे सुरु होतो लोकबिरादरी प्रकल्प. या क्षेत्रात माडिया, गोंड आदी आदिवासी जमातींचा निवास. त्यांची भाषा वेगळी. राहणी तर कमालीची साधी. अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. शिकार करून मिळेल ते खायचे. नाही मिळाले तर उपाशी राहायचे. कुपोषित बालके जन्माला येणं ही तर जणू काही इथली परंपराच! त्यातील काही योगायोगाने जगायचे आणि पुढे अनेक आजारांचे शिकार व्हायचे. बाळंतपणत होणारे मृत्यूही भरपूर. त्यांना कोणी काही सांगू गेले किंवा शिकवू गेले तर, त्या माणसाला ते आपला शत्रू समजायचे अशी सगळी परिस्थिती.

अशा भयाण परिस्थितीत प्रकाशाची एक छोटीशी पणती तेवत होती ती प्रकाश आमटेंच्या रूपाने. जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी उभारली गेली. या झोपडीला दारही नव्हते. प्रकाश यांची सहधर्मचारिणी मंदाताई या झोपडीतच त्यांच्यासवे आल्या. त्याही डॉक्टर होत्या. पण त्यांनीही आपल्या पतीसमवेत सेवाकार्यात स्वतःला झोकून दिले. आदिवासींमध्ये काम करणे सोपे नव्हते. अशा बाहेरच्या व्यक्तींना स्वीकारायला आदिवासी अजिबात तयार नव्हते. त्यासाठी या दाम्पत्याला त्यांची भाषा शिकावी लागली. त्यांच्याप्रमाणेच साधी राहणी ठेवावी लागली. हळूहळू त्या लोकांचा विश्वास या दाम्पत्यावर बसू लागला. ही माणसे आपल्याला मदत करण्यासाठीच आली आहेत अशी त्यांची खात्री झाली. लोकबिरादरी प्रकल्प मार्गी लागला. आदिवांसीसाठी दवाखाना, शाळा सुरु झाली.

४ नोव्हेंबर २०१९ हा तो दिवस. याच दिवशी या सेवाव्रतींचे दर्शन आम्हाला घडले. त्या दिवशी आम्ही हेमलकशाला गेलो होतो. भेटीसाठी प्रकाश आमटेंची वेळ मिळाली होती. प्रकाश आमटे आणि मंदाताई भेटणार म्हणून कोण आनंद झाला होता. माझ्यासारखेच इतरही काही पर्यटक प्रकाश आमटेंचं सेवाकार्य आणि लोकबिरादरी प्रकल्प पाहण्यासाठी आले होते. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. एवढ्यात डॉ प्रकाश आणि मंदाताई आल्या. त्यांच्या राहण्यातला साधेपणा, वागण्याबोलण्यातली अकृत्रिमता लक्ष वेधून घेत होती. आमच्याशी त्यांनी काही वेळ संवाद साधला. त्यावेळी माझं ‘ कवडसे सोनेरी… अंतरीचे ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालं होतं. ते पुस्तक त्यांना भेट देण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ प्रकाश यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती आम्हाला दिली. आणि मग स्वतः आमच्यासोबत येऊन त्यांचे प्राणी अनाथालय त्यांनी आम्हाला दाखवले. प्राण्यांबरोरबर ते संवाद साधत होते. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना भरवत होते. ते मुके जीव सुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या देवमाणसाला अत्यंत प्रेमाने प्रतिसाद देत होते.

डॉ प्रकाश यांचं प्राणीप्रेम, त्यांना घराच्या एखाद्या सदस्यासारखं सांभाळणं या सगळ्या गोष्टी आम्ही त्या थोड्या वेळात अनुभवल्या. त्यांचं हे प्राणी अनाथालय कसं सुरु झालं याची हकीकत रोमहर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. जंगलात राहणारे आदिवासी जो प्राणी दिसेल, त्याची शिकार करून खात.

शक्यतो वानरांची शिकार कोणी करत नाही पण एकदा काही आदिवासी माणसे एका वानरीणीची शिकार करून तिला घेऊन जात होते. वानरी मृत झाली होती पण तिचे पिलू जिवंत होते. ते तशाही अवस्थेत तिचे दूध पिण्याचा प्रयत्न करीत होते. कोणत्याही सहृदय व्यक्तीचे मन हेलावून टाकणारे ते दृश्य होते. प्रकाश यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनी त्या आदिवासींना त्या पिलाला सोडून द्या म्हणून विनंती केली. पण ते म्हणाले की आमच्या लेकरांना खायला काय द्यायचे? तेव्हा डॉ प्रकाश यांनी त्यांना डाळ तांदूळ दिले. तेव्हा आदिवासींनी ते पिलू त्यांच्या हवाली केले. ही त्यांच्या प्राणी अनाथालयाची पहिली सुरुवात होती. पुढे मग जंगलात सापडलेली अनाथ पिले आदिवासी डॉ प्रकाश यांना आणून देऊ लागले. आपल्या आईलाही ज्यांनी पाहिले नाही अशा या अनाथ पिलांना आईची माया डॉ प्रकाश यांनी दिली.

हेमलकसा इथे साधारणपणे १९७४ च्या सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर २६ डिसेंबर हा डॉ प्रकाश यांचा जन्मदिवस. आता त्यांचं वय सुमारे ७६/७७ वर्षे असावं. या दरम्यान जीवनातील खूप चढउतार या दाम्पत्याने अनुभवले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे आमटे कुटुंब. तोच वारसा डॉ प्रकाश आणि मंदाताई यांनी पुढे चालवला. अनेक आदिवासींना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांची पुढची पिढीही हा वारसा जपते आहे, पुढे नेते आहे. आपल्या परिसरातील रुग्णांची सेवा करता करता डॉ प्रकाश याना गेल्या वर्षी एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागला पण सेवाकार्याची पुण्याई पाठीशी असल्याने त्यातूनही ते सुखरूप बाहेर पडले. आदिवासींची सेवा करताना त्यांनी भेदभाव केला नाही. अनेक नक्षलवाद्यांवरही त्यांनी उपचार केले, त्यांचे समुपदेशन केले. भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यांची दूर रवानगी केली.

हेमलकसा येथील शाळा सुद्धा पाहण्यासारखी आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी या शाळेत जीवनाचे धडे गिरवत आहेत. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण त्यांना इथे दिले जात नाही. शेती करणे, निरनिराळे उद्योगव्यवसाय करणे, निरनिराळी कौशल्ये हस्तगत करणे या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. जीवनमूल्ये शिकवली जातात. या विद्यार्थ्यातून अनेक विद्यार्थी शिकून मोठे होऊन आज मोठमोठ्या पदांवर पोहोचले आहेत, तर काही आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करत आहेत. डॉ प्रकाश आमटे म्हणतात, ‘ मी तर केवळ निमित्तमात्र आहे. हे सगळे टीमवर्क आहे. मला सेवाभावी कार्यकर्ते मिळाले म्हणून एवढे मोठे कार्य करणे शक्य झाले. ‘ त्यांचे हे उद्गार त्यांची नम्रता दर्शवतात. डॉ प्रकाश आणि डॉ मंदाताई यांना मॅगसेसे पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या कार्यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यांच्यामुळे या पुरस्काराना मोठेपण लाभले आहे. त्यांनी लिहिलेली ‘ प्रकाशवाटा ‘ आणि रानमित्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा ‘ डॉ प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो ‘ हा सुंदर चित्रपट आहे. यात नाना पाटेकर यांनी डॉ प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटातील गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गीत अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर आहे.

तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे,

जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

अशाच ‘सत्यसुंदराचा ध्यास घेतलेल्या’ डॉ प्रकाश आमटे यांना आणि त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समईच्या शुभ्र कळ्या…  – लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ समईच्या शुभ्र कळ्या…  – लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर  ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(भाऊ-बहीण यांचं नातं मायेच्या ओलाव्याचं, नितळ आणि प्रेमानं ओथंबलेलं. थोरली बहीण आशा भोसले यांच्याविषयी लिहिताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रतिभा विलक्षण उंची गाठते. पंडित हृदयनाथ यांचा हा विशेष लेख) 

‘संध्येची वेळ, पत्थरानी चढणित घर राहिले रे दूर…’ कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेसारखी स्थिती…दहा वर्षांची आशाताई मला कडेवर घेऊन धुळीनं, म्हणजे फुपाट्यानं, भरलेल्या रस्त्यानं चालत होती. दुपारच्या उन्हानं तापलेला रस्ता अजूनही आपले उष्ण श्वास सोडत होता.

कडेवर पाच वर्षांचा भाऊ आणि एका हातात नदीवर धुतलेल्या कपड्यांचे पिळे घेऊन ही फक्त दहा वर्षांची आशाताई…उपाशीपोटी, अजाण आशाताई त्या खडकाळ तापलेल्या रस्त्यानं आनंदात चालत होती.

आलेल्या परिस्थितीला हसत तोंड देणं हा दैवी गुण तिला लहानपणापासूनच मिळाला होता. एका बाजूला एक पडका किल्ला, एका बाजूला तापी नदीचा भीतिदायक खोल डोह आणि पुरात नदीनं कापलेले बिहड आणि फुफाट्याचा एकाकी रस्ता…ही निर्भय पोरगी अगदी आरामात चाललेली होती. नेटका सुंदर चेहरा, सरळ नाक,

जाड; पण सुबक ओठ, अगदी निष्पाप डोळे, भोळा भाव असलेले; पण मोठे, गालाला गोड खळ्या, सावळा रंग, अतिशय प्रमाणबद्ध दणकट शरीर, बाबांचं (मा. दीनानाथ) सारं सौंदर्य, स्वभाव आणि मुख्यतः गाणं घेऊन आशाताई जन्माला आली होती. बाबा गायला बसायचे. समोर दीदी (लता मंगेशकर), तिच्या बाजूला मीनाताई आणि बाबांचे निवडक शिष्य रियाज करायचे आणि आशाताई? ती एकतर खेळत असायची किंवा आईला मदत करत असायची.

एकदा आईनं चिंतेनं विचारलं : ‘‘मालक, ही आशा नुसती खेळत असते. ही केव्हा गाणार?’’

बाबा शांतपणे म्हणाले : ‘‘काळजी करू नकोस. ती खेळता खेळता गाणं शिकत असते आणि गाणं शिकवून येतच नाही; त्याला दैवी देणगी असावीच लागते. हिला ती दैवी देणगी आहे आणि स्वभावानं ती ‘हब’ आहे. (‘हब’ म्हणजे म्हैस).

ती प्रेमळ आहे, भोळी आहे; पण कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेण्याची शक्ती तिच्यात आहे. वेळ आली की धडक देऊन ती अचानक गायला सुरुवात करेल आणि ‘मी मी’ म्हणणारे तिच्यापुढं लोटांगण घालतील असं ती गाईल; पण श्रीमती, हिचा भोळा स्वभाव? मला चिंता वाटते. बघू पुढं काय होते ते.’’

माझं आणि धुतलेल्या कपड्यांचं ओझं घेऊन आशाताई घरी पोहोचली. मला ओट्यावर बसवून ती कपडे वाळत घालू लागली… .. 

‘‘ए आजी, भूक लागली आहे. काही खायला आहे?’’

म्हातारी आजी ताईबाई म्हणाली : ‘‘आशा, जेवून गेली होतीस ना? मग या वेळी तुला भूक का लागली?’’

‘‘ताई, सारे कपडे धुतले…वाळत घातले…सारी भांडी धुतली…सारं घर सारवलं…बाळला कडेवर घेऊन आताच तापीवरून आले आणि मग भूक नाही का लागणार?’’

‘‘बरं, मीच चुकले. आत भाकरी आणि तिखट-तेल आहे, लोणचंही आहे. खाऊन घे…पण आशा, लवकर जेवून घे. आज जडीबाई (शेजारीण) येणार आहे. थोडं गाऊ या.’’

मग जडीबाई आणि गावातल्या बायका यायच्या. संध्याकाळचं गार वारं सुखावू लागायचं. पाखरं घरी जाण्याच्या तयारीत किलबिल करायची. मग ताईबाई, आशाताई, उषाताई गायला सुरुवात करायच्या.

‘यशोदे घराकडे चाल .. मला जेवू घाल

आई दही वाढ दही .. वर कांद्याची कोशिंबिरी

पाई पडलिया फुटा .. झिजली नखं

मला जेवू घाल.’

त्या अत्यंत मागासलेल्या खेड्यातल्या त्या जीर्ण घरात हे सगळं अतिकरुण वाटायचं. आशाताईच्या गळ्यातला हा करुण रस या खेड्यातल्या उपासमारीच्या आणि कामाच्या ताणामुळं समृद्ध झाला. त्यात युद्धाच्या काळात आलेलं दारिद्र्य सारं गाव भोगत होतं. त्यात खरूज या आजाराची साथ. खरजेनं आशाताईचं सारं अंग भरलेलं. माझंही. नुसत्या वेदना. या वेदनेनं शरीर नाही; पण भावजीवन समृद्ध झालं. पुढील संगीताच्या वाटचालीत या भोगलेल्या यातनांचा फार उपयोग झाला.

‘‘आशा, ते छल्ल्याचं गाणं गा. जडी, ही कशी ठसक्यात गाते, ते ऐक.’’

.. .. मग आशाताई गायला सुरुवात करायची… .. 

‘मेरा छल्ला जो गम गया

ढूँढो जमादार

नको, नको जमादार

मेरे छल्ले के खातीर

मै तो तोडे बनाऊँगा

नको नको जमादार

मेरी छल्ला जो गम गया

ढूँढो जमादार.’

मग अशी अनेक लोकगीतं आशाताईला त्या थाळनेर गावी पाठ झाली.

‘‘आशाताई, तुझ्यासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. अर्थात्, ‘एचएमव्ही’साठी. पैसे मिळणार नाहीत; पण रॉयल्टी मात्र मिळेल.’’

‘‘बाळ, मी फार कामात आहे. पैशाचा प्रश्नच नाही; पण मला वेळच नाही.’’

‘‘ठीक आहे, गाणं ऐकून घे. आवडलं तर वेळ मिळाल्यानंतर गा.’’

‘‘बरं गा, मी ऐकते.’’

मी गायला सुरुवात केली…

‘‘जिवलगा ऽऽऽ राहिले रे दूर घर माझे

पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

जिवलगाऽऽऽ’’

‘‘बस्स कर, थांब! थाळनेरमधले सारे भोग या गाण्यात उतरले आहेत. तुला कडेवर घेऊन उपाशीपोटी मी अशीच चालायची! बाळ, मी फिल्मची दोन गाणी रोज गाते आणि गातच राहणार; पण माझ्या जीवनाचं दर्शन घडवणारं हे गाणं मी इतर गाणी सोडून गाणारच. चल! आपण रिहर्सल करू या.’’

‘‘पण आशाताई, या गाण्यामध्ये अंतऱ्यासाठी संगीताचे तुकडे नाहीत. हे अनुभवनिष्ठ, दृष्टान्त देणारं गाणं आहे. गायिका फक्त आपल्या ‘जिवलगा’साठी गात आहे. गायिका, जिवलग, निसर्ग आणि जीवघेणी संध्याकाळ…या गाण्यात कुणालाही प्रवेश नाही.

“ ‘‘जिवलगाऽऽऽ’ म्हणजे प्रियकर असं मुळीच नाही. जिवलगा ही एक आर्त हाक आहे, एक जीवघेणी पुकार आहे. ही आर्त हाक कुणासाठी आहे हे ज्यानं त्यानं आपल्या जीवनानुभूतीनं ठरवावं. संगीतकार, कवी, गायिका हे या जिवलगाच्या आर्त हाकेचे केवळ माध्यम आहेत.’’

एक दिवस आशाताईचा आईला फोन आला : ‘‘माई, मी फार त्रासात आहे. तू लवकर मला इथून बाहेर काढ.’’

माई घाबरली. म्हणाली : ‘‘चल बाळ, आशाला घरी आणू या. ती फार त्रासात आहे.’’

मग मी, आई, अर्जुन (माझा खास मित्र) असे तिघं आशाताईच्या घरी पोहोचलो. आशाताई आणि भोसले भांडत होते. आई त्यांना समजावत होती; पण कुणीच ऐकत नव्हतं. अचानक आशाताई घर सोडून निघून गेली. आठ महिन्यांची गरोदर बाई घर सोडून निघून गेली. मी बंगल्याखाली मोटारीत बसलो होतो.

माझ्यासमोरच आशाताई टॅक्सीत बसून निघून गेली. आई भोसलेंना समजावत बसली. तेवढ्यात मला आशाताईची मुलगी वर्षा दिसली. आशाताईचीच कॉपी…तसंच नाक, तोच रंग, त्याच खळ्या, तेच निष्पाप भोळे डोळे.

.. .. लहान आशाताई माझ्याकडं पाहत होती! मी काहीही विचार न करता गच्चीवर गेलो. वर्षाला उचललं आणि मोटारीत घालून वाळकेश्वर इथं घरी आलो. वर्षा इतकी लहान होती की ती मला आपला बापच समजली. लग्नाआधीच मी तीन वर्षांच्या मुलीचा बाप झालो.

थोड्या वेळानं आशाताई घरी आली. दोघी बहिणी खूप रडल्या.

‘‘आशा, आता तू इथंच माझ्या खोलीत राहा. बघू, तुझ्या केसाला कोण धक्का लावतंय.’’

‘‘पण दीदी, माझा हेमंत, वर्षा हे सारे इथंच राहतील?’’

‘‘अगं, हे तुझं घर आहे, जिथं आम्ही तिथं तू, जिथं तू तिथं तुझी मुलं. मी लता मंगेशकर, तू आशा भोसले…काय कमी आहे आपल्याला?’’ दीदी आशाताईला मिठीत घेत म्हणाली.

मग आशाताई निश्चिंतपणे ‘वाळकेश्वर हाऊस’ इथं आमच्याबरोबर राहू लागली. वर्षा मला सोडून राहायचीच नाही. मी तिचे सारे लाड पुरवत होतो. एक दिवस आई, दीदी, उषाताई कोल्हापूरला गेल्या. गरोदर आशाताईची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.

मी थोडा अस्वस्थ झालो. कारण, आशाताई गरोदर होती आणि माझी अनामिक भीती खरी झाली. आशाताईला टायफॉईड झाला. डॉक्टरांनी सांगितलं : ‘चौदा दिवस बेडरेस्ट. पलंगावरून हलायचं नाही. कारण, पोटात गर्भ आहे.’ मी डॉक्टर कपूर यांना म्हणालो : ‘‘डॉक्टर, मी कसं सांभाळणार आशाताईला? ती गरोदर आहे आणि तिला विषमज्वर झाला आहे. तिची औषधं, पथ्यपाणी वगैरे मी कसं सांभाळणार?’’

डॉक्टर म्हणाले : ‘‘काळजी करू नका. आशाताई दणकट आहे. ती या आजारातून सहज बाहेर येईल. मी एक नर्स पाठवून देतो. ती सर्व औषधपाणी सांभाळेल.’’

मी सुटकेचा निःश्वास सोडला. मग नर्स आली. तिनं सारी जबाबदारी घेतली; पण संध्याकाळी, रात्री द्यायच्या औषधांची यादी आणि वेळा सांगून गेली. मीही फार विचार न करता तिला ‘हो’ म्हणालो. वेळेप्रमाणे औषध देऊ लागलो. शेवटचं औषध पहाटे पाचला होते. मी सूर्यवंशी… पहाटे कसा उठणार? मी जागतच बसलो.

असे चार दिवस गेले. आशाताई बरी होत होती; पण मी मात्र किंचित वेड्यासारखं बोलत होतो. माझा मित्र अर्जुन यानं मला सांगितलं, ‘तू असंबद्ध बोलत आहेस…’ मग माझ्या लक्षात आलं की, मी रोज रात्री जागरण करतोय, दिवसाही झोपत नाही…मग मी आशाताईला म्हणालो : ‘‘आज सकाळची औषधाची गोळी तू घे. आज मी जरा झोपतो.’’

आशाताई म्हणाली : ‘‘मी तुला सांगत होतेच की, इतका जागू नकोस; पण तू ऐकतोस कुठं? जा, झोप जा. मी वेळेवर औषध घेईन.’’

मग मी झोपायला गेलो; पण झोप येईच ना. बऱ्याच वेळानंतर डोळ्यांवर झापड येऊ लागली आणि माझा गतकाळात प्रवेश झाला :

ते पुणं…ते घर…ती रेवडीकरांची गल्ली… तो राजा गडी…

‘‘आशा, बाळला घे…मघापासून रडतोय बघ! काही तरी खेळव त्याला.’’ आईचा हळवा आवाज आला.

‘‘बघते आई, तू काळजी करू नकोस,’’ आशाताई मला कडेवर घेत म्हणाली. बाबांचा मृत्यू होऊन एक महिना झाला असावा. दीदी कामाला लागली होती. मीनाताई पोटाच्या विकारानं त्रस्त होती. उषाताई लहान. मग मला कडेवर कोण घेणार? आशाताई. कारण, शरीरानं ती दणकट होती; पण मला कडेवर का घ्यावं लागायचं?

कारण, मला चालता, अगदी रांगताही, येत नव्हतं. बोन टीबी म्हणजे हाडेव्रण झाला होता. पायात दूषित रक्त भरलं गेलं होतं. दिवस-रात्र फक्त वेदना आणि आक्रोश. आशाताईला हे कळत होतं. म्हणून ही माझी दुसरी आई मला सतत कडेवर घेऊन काम करायची.

खरंही वाटणार नाही; पण आशाताई मला कडेवर घेऊन झाडून घेणं, भांडी घासणं, कपडे धुणं ही सारी कामं करायची. पुढं मी सिंदबादची गोष्ट वाचली. तो म्हातारा, सिंदबादच्या खांद्यावरून उतरतच नाही. त्या म्हाताऱ्यासारखा मी आशाताईच्या कडेवरून उतरतच नसे. किती सेवा केली तिनं माझी! कसं उतरणार हे ऋण?

एखाद्या माणसाच्या नशिबात नियती असं गमतीदार; पण करुण भविष्य लिहून जाते की आश्चर्यच वाटतं. आशाताईचं प्रारब्ध असं काही विचित्र आहे…दणकट शरीर मिळालं; पण लहानपणापासून शारीरिक कष्ट सतत भोगावे लागले. गुणी मुलगी आणि प्रतिभावान मुलगा देवानं तिच्या ओटीत टाकला.

ती दोन्ही मुलं अल्पायुषी ठरली…आशाताईनं प्रेमविवाह केला. तो प्रियकर विक्षिप्त निघाला. लाथा, शिव्या, मार खातही अमर गाणी तिनं गायिली. अलीकडं मी टीव्ही पाहतो. तेव्हा, भारत सरकार ‘भारतरत्न’ ही पदवी खिरापतीसारखी वाटते आहे, हे मला काही दिवसांपूर्वी बातम्यांमधून कळलं…पण जगताला ७० वर्षं संगीतकलेचा प्रत्यय देणाऱ्या, नव्वदी उलटलेल्या एकमेव आशा भोसले यांना सरकार का विसरतं? नियती! आणि, दुसरं काय?

बाबा गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो. नुसते हाल. चुरमुऱ्यात पाणी घातलं की आमचं जेवण झालं. नुसतं दैन्य, वेदना, अवहेलना. बाबांचं श्राद्ध आलं की, बाबांचं एक चांदीचं ताट आई विकायची. ते ताट आणि मी कडेवर…अशा थाटात एप्रिल महिन्याच्या उन्हात आशाताई गुजरी गल्लीत जायची.

ते ताट विकून जे पैसे यायचे त्यांतून श्राद्ध करण्यास लागणारं सारं सामान घेऊन ती घरी यायची. मग आई, मीनाताई, आशाताई स्वयंपाकाला बसायच्या. गावातली एक समजूत की, श्राद्ध या कर्माला २१ भाज्या लागतात. मग या बायका २१ भाज्या करण्याचा खटाटोप करायच्या. मग दुसऱ्या दिवशी भटजींना दक्षिणा देऊन आम्ही पाची भावंडं गच्चीच्या तापलेल्या पत्र्यावर उभे राहून उपाशीपोटी, कावळा घासाला केव्हा शिवतो, याची वाट बघत राहायचो.

का कुणास ठाऊक, मी या कर्मकांडाच्या विरुद्ध झालो. थोडीफार आशाताईही या कर्मकांडाच्या विरुद्ध आहे. या कोल्हापुरात प्लेगची साथ आली आणि आम्ही थाळनेरला गेलो. ही खानदेशची राजधानी…पण नगण्य खेडं.

तिथं आशाताईच्या आणि माझ्या अंगावर खरूज या आजारानं हल्ला केला. सर्व अंग रक्ताळायचं. त्या वेदनामय आजारात आशाताई दीड-दोन मैल (किलोमीटरची भाषा त्या वेळी नव्हती) चालत तापी नदीवर आंघोळ करून, सगळ्यांचे कपडे धुऊन घरी यायची. मला सदैव कडेवर घेऊन.

मग आम्ही मुंबईला आलो. आता थोडे बरे दिवस आले होते. मी चालूही लागलो होतो. एक दिवस उग्र मुद्रेनं आशाताई भिंतीला टेकून उभी होती. आई तिच्यावर ओरडत होती. आशाताई निगरगट्टपणे उभी होती.

मग कळलं की, आशाताई घर सोडून गेली प्रियकराबरोबर. सगळ्यात जास्त धक्का मला बसला. आता आशाताई कधीही दिसणार नाही…मी उन्हात दुपारी रस्त्यावर उभा राहायचो आणि प्रत्येक मोटारीत बघायचो. कारण, माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की, आशा या रस्त्यानं जाते. बरेच दिवस मी उन्हात उभा राहिलो; पण आशाताई दिसली नाही.

‘तुझ्याच साठी कितीदा… ऊन्ह सोशिले माथी रे, तुझ्याच साठी रे…’

कविवर्य ना. घ. देशपांडे यांची ही कविता मला वाचवेना. आताही मला झोप येईना. कारण, हा सारा भूतकाळ माझी झोप घेऊन गेला होता.

आशाताई बरी झाली आणि मुलाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात गेली. दोन दिवसांनी तिनं एका सुंदर मुलाला जन्म दिला. सगळे आनंदानं वेडे झाले; पण आशाताईच्या नवऱ्यानं रुग्णालयाला धमकी दिली. बायकांचं रुग्णालय ते.

साऱ्या बायका घाबरल्या. आशाताई एक दिवसाची बाळंतीण; पण तिनं धैर्यानं त्या रुग्णालयाच्या संचालिकेला सांगितलं की, ‘तुम्ही काळजी करू नका. मी आत्ता घरी जाते.’ आणि, एका दिवसाच्या मुलाला घेऊन आशाताई घरी आली; पण जिना कसा चढणार?

मग मी, अर्जुन, हिरालाल यांनी आशाताईला खुर्चीवर बसवलं आणि आम्ही तिघांनी आशाताईला तिसऱ्या मजल्यावर नेलं. मी आशाताईला गमतीनं म्हटलं : ‘‘आशाताई, इतके दिवस तू मला खांद्यावर मिरवलंस…आज मी तुला खुर्चीवर बसवून मिरवलं.’’

दीदीनं मुलाचं नाव ठेवलं : ‘आनंद.’

‘‘आशाताई, आपला प्रयोग असलेलं ‘जिवलगा…’ हे गाणं मैफलीत शास्त्रीय संगीतकारही गायला लागलेत…मोठे समीक्षकही ‘जिवलगा’वर समीक्षा लिहीत आहेत. सर्वसाधारण श्रोत्यांना हे गाणं फार आवडलं आहे. आता एक नवा प्रयोग करतोय, गूढकाव्य स्वरबद्ध करतोय. तूच या गाण्याला न्याय देऊ शकशील याची मला खात्री आहे. गाणार का?’’

आशाताई हसली. म्हणाली : ‘‘प्रयोग असला की तुला माझी आठवण येते, नाही?’’

मी पहिल्यांदाच गंभीरपणे म्हणालो : ‘‘आशाताई, तुझी यासाठी आठवण येते; कारण, नियती आपल्या सहनशीलतेवर एक प्रयोगच करत होती. त्या प्रयोगाचे फक्त दोन साक्षीदार आहेत…तू आणि मी.’’

‘‘बरं, गाणं ऐकव,’’ आशाताई गहिवरून म्हणाली.

मी गाणं ऐकवलं.

‘‘फार छान चाल आहे. गाणाऱ्याला एक आव्हान आहे या चालीत; पण बाळ, काव्य ओ की ठो कळलं नाही आणि कळणारही नाही; पण मी हे गाणं गाणार.’’

‘‘नाही आशाताई, अंधारात बाण मारू नकोस. मी उद्या कवी आरती प्रभूंकडून याचा अर्थ नीट समजावून घेतो आणि तुला लिहून देतो. त्या अर्थामध्ये एकाकार होऊन मगच हे गाणं गा.’’

दुसऱ्या दिवशी मी तो कागद आशाताईला दिला. आशाताई ते गाणं गायिली.

नव्वद वर्षांची आशाताई नुकतीच मला भेटली. जुन्या आठवणी निघाल्या. एकदम हरवून म्हणाली : ‘‘बाळ, तुझी इतकी गाणी मी गायिले…अवघड, अनवट अशी गाणी. ‘जिवलगा…’, ‘केव्हातरी पहाटे…’, ‘तरुण आहे रात्र अजुनी…’, ‘मी मज हरपुन बसले गं…’, ‘मागे उभा मंगेश’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली…’, ‘नभ उतरू आलं…’ ही सगळी गाणी फार लोकप्रिय झाली; पण तुझं ते गाणं – जे कुणालाच पसंत नव्हतं ते गाणं – मी तुझ्या सर्व गाण्यांत उत्कृष्ट नव्हे, उत्कट गायिले, असं मला ठामपणे वाटतं.’’

ते गाणं अर्थासहित :

समईच्या शुभ्र कळ्या उमलवुन लवते

केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे

मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळू नये डोळा पाणी लावू नये

पदराच्या किनारीला शिवू शिवू उन गं ये

हासशिल हास मला मला हासूही सोसेना

अश्रू झाला आहे खोल चंद्र होणार का दुणा…

रामप्रहर होतो, कळ्यांना बहर येतो. त्या कळ्यांचा आकार कसा असतो? झाडाच्या डहाळीवर झोके घेत असलेली कळ्यांची लडी… समईच्या कोन्यावर झुलत असलेली शलाका…अनेक रंगांच्या जटा धारण केलेली धवलशुभ्र ज्योत ही समईवर उगवलेली मोगऱ्याच्या एक कळी भासते…

समईच्या वाती प्रज्वलित केल्या, त्या वेळी त्या नव्हाळीनं उभ्या होत्या; पण आता फार वेळ गेल्यामुळं त्या कोमेजल्या आहेत. त्या वाती मान लववून आहेत. रात्री केसात माळलेल्या कळ्या, उमलून केसातच फुलून आता कोमेजून पायाशी पडल्या आहेत. म्हणजे, रामप्रहर झाला आहे…दिठी म्हणजे दृष्टी.

विश्वाचं दर्शन घडवणारा तेजोपट…तेज म्हणजे प्रकाश…माझी अस्वस्थता माझ्या भिवयांच्या फडफडीतून व्यक्त होत आहे. त्या फडफडीचा वेग इतका विलक्षण आहे की, त्या वेगानं माझ्या दिठीच्या वेगाला अडथळा येतोय.

म्हणजे, माझ्या भिवयांची तडफड प्रकाशाच्या वेगालाही मागं टाकतेय आणि हा सारा जीवघेणा खेळ, माझं मागं मागं राहिलेलं माहेर बापुडपणे बघत आहे. मी सासुरवाशीण आहे म्हणून हे निमूटपणे भोगत आहे. काय भोग आहेत हे की जे अव्यक्त असावेत? इतकी रात्र झाली आहे. चांदणं चहूकडं पसरलं आहे. कालही झोप लागली नाही. आजही तीच अवस्था.

‘दिन तैशी रजनी झाली गे माये’

झोप नाही; पण पेंग येते…पण डोळ्यांत अश्रू साचल्यानं डोळे अर्धवट उघडे राहतात. त्या अश्रूंत चांदण्यांचं प्रतिबिंब पडतं…डोळ्यांना चांदणीची पेंग? नुसते डोळे मिटले की त्यांत अवकाश सामावलं हेही साधं उमजत नाही. डोळे बंद करण्याचं स्मरणच होत नाही. मुलखाची विसराळू झालेय, झालं!

माळायची आहेत तर थोडी फुलं माळू नयेत. साऱ्या रात्रभर पुरतील इतकी फुलं घ्यावीत. अहो! रात्र सरली पाहिजे ना…

झोप येते म्हणून डोळां पाणी लावू नये. झोप न येऊ देण्याचं काम अश्रू करताहेत ना!

रात्री फुलं माळायचं काम उजाडल्यावर संपलं. पदराच्या किनारीला सकाळचं ऊन्ह शिवायला लागलं. माझी ही दयनीय अवस्था पाहून तुला हसू येतंय ना? खरंय…तुला हसू येणारच. तुझं अस्तित्व मी उदरात जोपासते आहे ना! पण खरं सांगू?…मला तुझं हसू सोसत नाही. तुझ्या-माझ्यासारखा एका जिवाला मी जन्म देणार आहे.

मी बाळाला अंगावर पाजणार…एक शरीर माझ्या शरीरात जगतंय…मी जन्मदात्री माता, आई होणार…ही जाणीव इतकी विलक्षण आहे की, मी हादरून गेले आहे. माझी अवस्था तुम्हा पुरुषांना कळणारच नाही. अरे, माझा अश्रू खोल झाला आहे. त्याला करुणेचे, दुःखाचे, मायेचे कंगोरे आहेत. ‘जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है?’ आता मी रूपांतरित होणार आहे आणि चंद्रही दोन होणार आहेत.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares