‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.
म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—
जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र.
शास्त्राची तात्त्विक व्याख्या
भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.
प्राचीन व्याख्या सांगते—
“शासनात् शंसनात् शास्त्रम्”
म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—
“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”
म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.
शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप
कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.
या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—
न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)
यांखेरीज—
वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे.
शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार
भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.
शास्त्रांचा पाया उभा आहे—
श्रुति (अध्यात्मिक परंपरा)
युक्ति (तर्कबुद्धी)
अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)
शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.
म्हणूनच शास्त्र हे—
वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे.
शास्त्र आणि विवेकबुद्धी
शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.
ते शिकवते—
सत्य आणि असत्य यातील भेद.
नित्य आणि अनित्य यातील भेद
आत्मा आणि अनात्म याची ओळख
परंतु—
शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.
म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—
विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता
शास्त्र आणि साधकाची भूमिका
नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर
शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.
बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.
कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन
काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.
म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे
नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.
शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे
थोडक्यात—
जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.
शास्त्र हे—
जीवनाला दिशा देते
मनाला स्थैर्य देते
बुद्धीला स्पष्टता देते
समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत
शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.
सुनामी येण्यापूर्वी समुद्रात काय काय बदल दिसतात हे उलगडून सांगितलं…
समुद्र अनैसर्गिकरीत्या कसा मागे मागे जातो, त्याचं पाणी कसं फेसाळतं, आणि समुद्राचं वर्तन कसं विचित्र होत जातं हे सगळं सर उत्तम प्रकारे शिकवत होते..
आणि टिली जीवाचे कान करून ऐकत होती..
दोन आठवड्यांनी ख्रिसमसची सुट्टी सुरू झाली. टिली अतिशय आनंदात होती कारण तिचे आई बाबा तिला सुट्टीसाठी थायलंडला घेऊन गेले होते. हा तिचा पहिलाच परदेश प्रवास होता.
ते फुकेट मध्ये पोचले. फुकेट हे थायलंड देशाच्या दक्षिण भागातील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय बेट आहे. तेथील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य अशा माई खाओ नावाच्या बीचवर ते पोचले..
साधारण शंभर लोकांना सामावून घेईल असा तो बीच होता व पूर्णपणे भरला होता..
हवा अतिशय छान होती..
पण टिलीला काहीतरी बरोबर नाही असं वाटू लागलं..
तिच्या लक्षात आलं..
समुद्राचं पाणी अजिबात शांत नव्हतं..
ते आत-बाहेर न करता फक्त आत आतच जात होतं..
समुद्र फेसाळला होता..
“बिअरवर जसा फेस येतो तसा समुद्र फेसाळला आहे.. ” ती आई बाबांना म्हणाली.. समुद्र अनैसर्गिकरीत्या मागे जाणं, फेसाळ पाणी, समुद्राचं विचित्र वर्तन सारं काही ती दोन आठवड्यांपूर्वीच भूगोलाच्या वर्गात नुकतीच शिकली होती..
“सुनामी येणार आहे…सुनामी येणार आहे” ती जोरजोरात ओरडू लागली..
पण तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना समुद्रात एकही लाट दिसत नव्हती. आकाश स्वच्छ होतं. बीच शांत होता.
“मी जाणार आहे इथून.. सुनामी येतय.. ” टिली घाबरून गेली होती.
तिच्या कापऱ्या आवाजातील भीती तिच्या बाबांना जाणवली व त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरवले. शिवाय तिथे बीचवर एक जपानी माणूस उभा होता त्याने टिलीचे बोलणे ऐकलं. तो बाबांना म्हणाला, “तुमची मुलगी बरोबर सांगते आहे! सुमात्रामधे भूकंप झालाय ही बातमी मला नुकतीच मिळाली आहे! ”
टिलीच्या बाबांनी ते ज्या हॅाटेलमधे रहात होते त्या स्टाफला सुनामीबद्दल सांगितलं. त्यांनी लगेच बीच रिकामा करायला सुरुवात केली.
सारे बीचवरून बाहेर पडण्यासाठी धावू लागले..
आई, बाबा, टिली पण धावत होते..
टिलीची आई मागे पडली होती. पाणी तिच्या मागून प्रचंड वेगाने येऊ लागलं तेव्हा तिला पळू लागली.. आपण आता मरणार असं वाटत होते पण ती पळत राहिली..
नशीबानं ते त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले.
आणि मग ती प्रचंड लाट आली…३० फूट उंच.
बीचवरील सारं काही.. खुर्च्या, नारळाची झाडं, कचरा.. सारं काही वाहून गेलं.
२६ डिसेंबर २००४ च्या सुनामी मध्ये १४ देशांतील २३०, ००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.
फुकेतच्या प्रत्येक बीचवर हजारो लोक मरण पावले.
पण
माई खाओ बीचवर एकही जीव गेला नाही…
कारण
एका दहा वर्षांच्या मुलीने भूगोलाचा धडा वर्गात लक्ष देऊन ऐकला होता.
टिलीला “एंजेल ऑफ द बीच” म्हणून गौरवण्यात आलं. तिला मरीन सोसायटीचा थॉमस ग्रे स्पेशल अवॉर्ड, “चाइल्ड ऑफ द इयर” घोषित केलं. युनायटेड नेशन्स मध्ये तिचं भाषण ठेवलं गेलं.. आज टिली ३० वर्षांची आहे. ती लंडनमध्ये राहते आणि याट चार्टरिंगमध्ये काम करते.
ती आजही तिच्या भूगोलाच्या सरांचे आभार मानते. “मिस्टर कार्नी नसते तर मी आणि आई बाबा आज जिवंत नसतो. ”
दोन आठवडे..
एक धडा..
शंभर जीव..
हे वर्गात लक्ष देऊन ऐकण्यातलं सामर्थ्य आहे.. शिक्षणातील सामर्थ्य आहे..
शाळेतला एक साधा धडा..
जीवन आणि मृत्यू साठी कारणीभूत ठरला..
“वर्गात लक्ष दे” माझी आई मला रोज शाळेला जाताना सांगायची. वर्गात शिकवलेलं किती लक्षात आहे ते पण नेहमी विचारायची..
आपणही मुलाबाळांना “वर्गात लक्ष दे” सांगण्यास विसरू नका!
(सत्य घटना)
लेखिका : ज्योती रानडे
सौजन्य : कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व (2026 Jyoti Ranade. All rights reserved.)
प्रस्तुती – मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
“माणूस असावा तर असा आणि एखाद्या संस्थेचा प्रमुख असावा तर असा” —
असं वाटायला लावणारी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशाच थोडक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. वसंतराव डोक्रस. व्यक्तीचित्र म्हटलं की सहजपणे पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेली अंतू बरवा, हरी तात्या, सखाराम गटणे यांसारखी अजरामर पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात. पुलंनी माणसांच्या स्वभावरेषा ज्या सूक्ष्मतेने आणि जिवंतपणे रेखाटल्या, ती उंची गाठणं अवघडच. तरीही इतर लेखकांच्या लिखाणातही अशी काही व्यक्तीचित्रं आढळतात, जी वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात.
अशाच लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचित्रांपैकी एक म्हणजे डॉ. विजय देशपांडे यांनी आपल्या ‘माणूस नावाची शाळा’ या पुस्तकात रेखाटलेले डॉ. वसंतराव डोक्रस यांचे व्यक्तिचित्र. ते वाचताना क्षणोक्षणी असं वाटत जातं की नेतृत्व, विद्वत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. डोक्रस.
डॉ. वसंतराव डोक्रस हे नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (व्हीआरसीई) चे माजी प्राचार्य. आज हेच महाविद्यालय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याबद्दल लिहिणारे डॉ. विजय देशपांडे हेही याच संस्थेतील प्राध्यापक होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्र अनुभवांच्या प्रामाणिक मातीवर उभं राहिलेलं आहे.
डॉ. डोक्रस यांच्या कर्तृत्वाचा पाया त्यांच्या विद्यार्थीदशेतच रचला गेला होता. अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यानंतर त्यांना प्रतिष्ठित आय. आय. एस. (IISc – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मध्ये एम. एस्सी. साठी शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी एम. एस्सी. ‘डिस्टिंक्शन’सह उत्तीर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळेच १९४० च्या दशकात त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून एम. एस. (MS) आणि पी. एचडी. (Ph. D) साठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचा त्या काळातील शोधनिबंध आजही गुगलवर उपलब्ध आहे, जो त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीची साक्ष देतो.
डॉ. डोक्रस मोजकंच, पण नेमकं आणि मार्मिक बोलत. एकदा ते आणि डॉ. विजय देशपांडे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील एका उपसंचालकांना भेटायला गेले. पद मोठं होतं, खुर्चीही मोठी होती; पण त्या पदावर बसलेली व्यक्ती मात्र सातत्याने आपल्या अडचणींचा पाढा वाचत होती. आपल्याला अपेक्षित असलेलं काही साध्य होणार नाही, हे लक्षात येताच दोघे बाहेर पडले. तेव्हा डॉ. डोक्रस सहज म्हणाले—
“खुर्च्या मोठ्या केल्या तरी त्यात बसणारी माणसं मात्र खुजीच राहतात. ”
त्यांचे हे उद्गार म्हणजे नेतृत्वाच्या संकल्पनेवरची कठोर पण खरी आणि मार्मिक अशी टिप्पणी होती.
डॉ. डोक्रस हे शिस्तप्रिय होते, पण ती शिस्त जाचक नव्हती. एकदा व्हीआरसीईच्या विद्यार्थ्यांनी एका काश्मिरी पंडित विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली हॉस्टेलच्या जेवणावरून संप पुकारला. डॉ. डोक्रस यांनी त्यांना समजावून पाहिले, पण विद्यार्थी ठाम होते. तेव्हा त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, “जर मेस बंद झाली, तर तुम्ही जेवणार कुठे? ” विद्यार्थ्यांकडे उत्तर नव्हते. अशा वेळी डॉ. डोक्रस यांनी आपल्या पत्नीला घरी स्वयंपाक करायला सांगून तो डबा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा रोष निवळला आणि तो विद्यार्थी नेता चक्क डॉ. डोक्रस यांच्या पत्नीचे आभार मानायला त्यांच्या घरी पोहोचला. विद्यार्थी हा त्यांचा खरा ‘वीक पॉईंट’ होता. चिडलेल्या विद्यार्थ्यांशी ते असं काही भावनिक संवाद साधत, की क्षणात वातावरण बदलून जाई.
त्यांची तत्वनिष्ठा केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही दिसून आली. १९६७ मध्ये इराणचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या राज्याभिषेकासाठी त्यांना खास निमंत्रण होते. त्यांचे पुत्र डॉ. उदय डोक्रस सांगतात की, हे निमंत्रण शहांच्या थेट ओळखीमुळे नव्हे, तर इराणी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांशी असलेल्या मैत्रीमुळे होते. याच काळात इराणच्या एका मंत्र्याच्या मुलाला (जो अभ्यासात कच्चा होता) पास करण्यासाठी डॉ. डोक्रस यांच्यावर दबाव आला, पण त्यांनी त्याला कसलीही मदत केली नाही. परिणामी त्या मुलाला रिकाम्या हाती इराणला परतावे लागले. डॉ. डोक्रस हे पूर्णपणे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त होते.
डॉ. डोक्रस हे विद्वान तर होतेच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते एक उमदं, सकारात्मक व्यक्तिमत्त्व होते. मध्य प्रदेशात त्यांनी केलेल्या यशस्वी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची व्हीआरसीईच्या प्राचार्यपदी नेमणूक केली. त्यांनी जो मार्ग प्रशस्त केला, त्यावरून पुढे चालणं नंतरच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांसाठी सुकर झालं.
कामाचा उरक प्रचंड होता. टेबलावर आलेली प्रत्येक फाईल निकाली काढूनच ते घरी जात. डॉ. विजय देशपांडे यांनी एकदा त्यांच्या कामाच्या पद्धतीचं रहस्य विचारलं, तेव्हा ते सहज म्हणाले—
“अरे, कसलं आलंय रहस्य! सारं काही सवयीन जमतं. सवय लावून घ्यायला थोडी बुद्धी, काम करताना लागणारं कसब आणि मुख्य म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्याची मानसिक तयारी—या तीन गोष्टी जवळ असल्या की बाकी सगळं आपोआप जमतं. ”
डॉ. उदय डोक्रस सांगतात की, वडील कायम कामात आणि प्रवासात असायचे. पण त्यांच्या लोकप्रियतेची खरी जाणीव त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाली. नागपूरच्या धंतोली भागातील रस्ते शोकसागरात बुडालेल्या जनसमुदायाने गच्च भरले होते.
प्रत्येक माणसाला जन्म असतो, तसा शेवटही असतो. माणसाचं मोठेपण त्याच्या पदात नसतं; पदाला मोठं करणारी त्याची उंची असते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचं संस्थापक सदस्यत्व ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व—अशा अनेक सन्मानांनी त्यांचं कर्तृत्व अधोरेखित झालं. त्यांच्यातील ‘वसंत’ सदैव बहरलेलाच राहिला. ज्या ज्या निर्जीव खुर्च्यांवर ते बसले, त्या त्या खुर्च्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे उंची मिळत गेली.
असा हा हिमालयाएवढ्या उंचीचा माणूस!
… व्यक्तीचं जीवन कसं असावं, याचा हा एक जिवंत आदर्श.
आषाढ शुद्ध प्रतिपदा. महाकवी कालिदास दिन, या निमित्त या विश्वविख्यात महाकवीस माझे विनम्र अभिवादन आणि त्यांच्या चरणी ही अल्पशी भावांजली.
प्रास्ताविक
महाकवीकुलगुरु कालिदास हे भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध महाकवी व नाटककार म्हणून ज्ञात आहेत. काव्याच्या ह्या तिन्ही क्षेत्रात (नाटक, खंडकाव्य व महाकाव्य) त्यांच्या योग्यतेचा दुसरा कवी झाला नाही हे सर्वमान्य आहे.
अशा या विश्वकवीच्या जीवनाविषयी मात्र फार थोडी माहिती उपलब्ध आहे. आज त्यांचे चरित्र केवळ जनश्रुतीवरच आधारित आहे.
कालिदास अशिक्षित, अडाणी आणि मूर्ख होते. शारदानंद नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलीचे नाव होते विद्योत्तमा. ती लावण्यवती होतीच पण विद्वान व सर्वशास्त्रकलानिपुणही होती. तिला तिच्या विद्वत्तेचा अभिमान व गर्व होता. ‘जो मला शास्त्रार्थात पराभूत करेल त्याचाच मी पती म्हणून स्वीकार करेन’ असा पण तिने केला होता. विवाहेच्छुक अनेक विद्वानांना तिने वादविवादात पराभूत केले होते, अपमानित केले होते. तेव्हा विद्वानांनी सूडबुद्धीने एक षड्यंत्र रचले. मूर्ख कालिदासाशी तिचा विवाह घडवून आणला. हा आपला पती मूर्ख आहे हे कळताच तिने कालिदासांचा धिक्कार करून त्यांना अपमानित करून घरातून हाकलवून दिले.
अपमानदग्ध कालिदास भगवती कालीला शरण गेले. तिची उग्र उपासना त्यांनी आरंभिली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन कालीने त्यांना अपूर्व अशी विद्वत्ता व प्रतिभा प्रसादरूपाने प्रदान केली.
प्रतिभासंपन्न कालिदास विद्योत्तमेच्या घरी परतले. घराची कवाडे बंद होती. त्यांनी दार खटखटवले आणि म्हटले, ‘ अनावृत्तकपाटं द्वारं देहि’ (दार उघड). आतून आवाज आला, ‘ अस्ति कश्चित् वागविशेषः? ‘ (काही वाग् वैभव आहे? ‘) पत्नीच्या प्रश्नार्थक वाक्यातील तीन वाक्ये आरंभी घेऊनच पुढे कालिदासाने तीन महाकाव्ये लिहिली.
१) ‘ अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ कुमारसंभव ‘
२) कश्चितकांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ मेघदूत ‘ व
३) ‘ वागर्थाविव सम्पृक्तौ ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ रघुवंश ‘
कालिदासांचा जन्म कोठे झाला?
कालिदास कोठे जन्मले, त्यांची जन्मभूमी कोणती याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. काही विद्वान त्याची जन्मभूमी काश्मीर मानतात तर काही हिमवत् प्रदेश. काहींच्या मते मालव तर काहींच्या मते बंगाल किंवा उडिसा. काहींच्या मते उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशी जवळील कविल्ठा गावात कालिदास जन्मले. प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. काहीही असो पण त्यांचे बालपण निश्चितच मालवराजधानी उज्जैनीत गेले असावे. विक्रमादित्यही तेथलाच. त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी कालिदास एक रत्न होते. खेरीज कालिदासाचे उज्जैनीप्रेम त्यांच्या वाङ् मयात ठाई ठाई दिसते.
कालिदास शैव म्हणजे शिवभक्त असावेत. तरीही इतर देव-देवतांविषयी आदर बाळगणारे होते हे त्यांनी केलेल्या विष्णू, ब्रह्मा यांच्या स्तुतींवरून म्हणता येईल.
वेश्यागमन हा कालिदासाच्या चरित्रावरील एक गडद कलंक आहे. श्रीलंकेत एका वेश्येनेच आपल्या घरी कालिदासाची हत्या केली. एका थोर, प्रतिभासंपन्न, शब्दप्रभूची व्यसनाधीनतेतून हत्या व्हावी हे फार क्लेशकारक आहे.
समस्यापूर्ति आणि घात
समस्यापूर्ति ह्या काव्यक्रीडा प्रकारात कालिदास निपुण होते. अनेक समस्यापूर्ति त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. विस्तारभयास्तव त्या येथे सांगणे टाळतो. तरीही एका कथेचा व समस्यापूर्तीचा उल्लेख अनिवार्य आहे.
एकदा आपला मित्र कुमारदास याला भेटण्यासाठी कालिदास सिंहलद्वीपला गेले होते. तिथेच ते एका गणिकेकडे गेले असता तिच्याकडून त्यांना एक समस्या ऐकायला मिळाली. समस्यापूर्तीसाठी राजाने घवघवीत पारितोषिक घोषित केले होते. दिलेली समस्यापंक्ति अशी होती…
‘कमले कमलोत्पत्ति श्रूयते न तु दृष्यते’
(अर्थः- कमळातून कमळाची उत्पत्ती होते हे ऐकिवात आहे पण पाहिले मात्र नाही आम्ही)
कालिदासाशी मनोविनोद करताना त्या वेश्येने ही ओळ त्यांना सांगितली. ओळ ऐकताच कालिदासांच्या मुखातून पुढील ओळ निघाली..
‘बाले तवमुखाम्भोजात्कथमिन्दीवरव्दयम्’
(अर्थः- हे कन्ये, तुझ्या मुखकमलावर नयनरूपी निलकमले कशी बरे दिसत आहेत मग!)
समस्या क्षणात पूर्ण करणारेआपले हे ग्राहक साक्षात् कालिदास आहेत हे त्या गणिकेला ठाऊक नव्हते. उद्या याने राजाला भेटून ही केलेली समस्यापूर्ति ऐकवली तर आपले पारितोषिक हाच घेऊन जाईल या भीतीने त्या व्येश्येने त्याच रात्री कालिदासाचा कपटाने वध केला.
कठोर चौकशीअंती जेव्हा राजाला हे समजले तेव्हा तो फार चटपटला, विव्हळ झाला. तो त्या वेश्येला म्हणाला, हे लोभी गणिके, क्षुद्र मोहापायी तू ज्याला मारलेस तो कवी कालिदास होता. अगं हत्या करण्यापूर्वी मला सांगितलं असतंस तर मी पारितोषिकाच्या दसपट धन तुला दिलं त्या बदल्यात. काय केलंस हे. जग एका महाकवीला मुकलं ना!
कालिदासाचा काल
कालिदास ब्राह्मणकुलोत्पन्न होते. गुरुकुलातून ते विद्यासंपन्न झाले असावेत. त्यांच्या कालाविषयी मतमतांतरे आहेत. डॉ मिराशींनी इ. स. २५० ते ४५० हा कालिदासाचा काळ असावा असे सिद्ध केले आहे.
ते उज्जैनीचे रहिवासी होते. शककर्त्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या पदरी होते. गुप्त व वाकाटक या राजघराण्यांची सोयरीक होती. चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती ही वाकाटकांच्या रुद्रसेनाची भार्या होती. रुद्रसेनाचे अकाली निधन झाल्यावर प्रभावतीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने राज्यशकट चालवायला आरंभ केला. तिच्या सहाय्यार्थ चंद्रगुप्ताने आपले काही अनुभवी अधिकारी वाकाटकांच्या राजधानीला विदर्भातील नंदिवर्धनला, म्हणजेच रामटेक जवळील नंदिग्रामला पाठविले. कालिदासही त्या अधिकाऱ्यांपैकी एक होते.
मेघदूत या खंडकाव्याची रचना तिथेच झाली. मेघदूतातील नायक यक्ष, नागपूरजवळील रामटेक म्हणजेच रामगिरी पर्वतावर कुबेराचा शाप भोगित होता.
कालिदासाने रामायणातील मूळ कल्पनेवर मेघदूताची उभारणी झाली आहे. रामाने मारुतीला दूत नियुक्त करून आपला संदेश सीतेला पाठविला ही गोष्ट मनात ठेवूनच कालिदासाने मेघदूताची रचना केली हे मल्लिनाथाचे म्हणणे सत्य वाटते.
कालिदासाच्या कलाकृती, ग्रंथसंपदा
एकूण अदमासे चाळीस रचना कालिदासाच्या नावावर सांगितल्या जातात.
नाटके
१)मालविकाग्निमित्रम् (राजा अग्निमित्र व मालविका यांची प्रणयकथा)
२) विक्रमोर्वशीयम् (राजा पुरुरवा व अप्सरा उर्वशी यांची प्रणयकथा)
३) अभिज्ञानशाकुंतलम् (राजा दुष्यंत व शकुंतला यांची प्रणयकथा)
२) कुमार संभवः (शिव-पार्वतीपुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा)
खंडकाव्ये
१) ऋतुसंहारः (सहा ऋतुंचे विभ्रमवर्णन)
२) मेघदूतम् (मघाला दूत करून त्याकरवी संदेश पाठविणे)
वरील सात रचना निश्चित कालिदासाच्या मानल्या जातात. याविषयी विद्वानांत एकवाक्यता आहे. याखेरीज अधिक काही रचना अशा आहेत ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. त्यातील काही रचनांची नावे –
१) उत्तम कलामृतम् (ज्योतिषविषयक ग्रंथ) २) श्रुतिबोधम् ३) शृंगारतिलकम् ४) सेतुकाव्यम् ५) पुष्पबाणविलासम् ६) श्यामा दंडकम् ७) ज्योतिर्विद्याभरणम् इ.
१)कुमार संभवम् २) रघुवंशः ३) मेघदूतम् ह्यांना ‘लघुत्रयी’ म्हणतात. मेघदूत हे खंडकाव्य मात्र विश्वविख्यात झाले आहे. दंडिचे अनुयायी याला महाकाव्य म्हणतात, तर पाश्चात्य विद्वान याला गीतीकाव्य (Lyric) म्हणतात.
मेघदूताचे थोडक्यात कथानक असे
एक यक्ष आपला स्वामी कुबेर याच्या सेवेत चूक करतो. कुबेर त्याला शाप देवून एक वर्षाकरिता अलका नगरीतून सीमापार करतो. आपल्या प्रेयसीपासून वियुक्त झालेला, विरहाने कृश झालेला तो यक्ष रामगिरी पर्वतावर वास्तव्य करतो. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी तो आकाशात एक नवीन मेघ पाहतो. त्याचे मन अधिकच कष्टी होते. प्रेयसीची आठवण अधिक तीव्र होते. मग तो या मेघालाच आपला दूत बनवितो व अलकानगरीतील आपल्या प्रेयसीकडे निरोप घेऊन जाण्याची विनंती करतो. निरोप काय, तर हे प्रियतमे, थोडा धीर धरून आपले प्राण धारण करून रहा. चारच महिन्यात मी माझी शिक्षा भोगून त्वरित येईन व मग आपण पुन्हा परस्परांच्या सहवासात आनंदाने राहू.
हे छोटेसे कथानक ब्रह्मवैवर्त पुराणातले. पण त्यावर कालिदासाने आपल्या उत्तुंग प्रतिभेने जो भव्य काव्यप्रासाद उभारलाय तो पाहून वाचकाची मति गुंग होते.
मेघदूताचे दोन भाग आहेत.
१) पूर्वमेघ (श्लोक संख्या ६३)
२) उत्तरमेघ (श्लोक संख्या ५२)
एकूण श्लोक संख्या ११३.
या खंडकाव्यासाठी महाकवींनी अत्यंत भारदस्त आणि श्रुतिमधुर अशा ‘मंदाक्रांता’ या वृत्ताची निवड केली आहे.
(गण- म भ न त त ग ग)
पूर्व मेघात मेघाने रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत कोणत्या मार्गाने जावे, वाटेत काय काय पहावे याचे विस्ताराने मार्गदर्शन केले आहे. उत्तरमेघात अलकापुरीचे, त्याच्या घराचे व प्रियतमेचे वर्णन आहे. बस!
काव्य शास्त्रदृष्टया मेघदूत
कथेतील नायक धीरललित आहे तर नायिका स्वकीया प्रेषितभर्तृका आहे. काव्यरस विप्रलंभ शृंगार. यक्ष नायक, यक्षपत्नी नायिका हे दोन आलंबन विभाव, मेघागमन हे उद्दीपन, विचारशून्यता, मेघयाचना हे अनुभाव ग्लानि, निराशा इ. सहचारी भाव व रति हा स्थायीभाव आहे. माधुर्य व प्रसाद ह्या दोन गुणांनी हे काव्य अलंकृत झाले आहे.
जगातील अनेक भाषांतून मेघदूताचे अनुवाद झाले आहेत. सर्वात प्राचीन अनुवाद तिबेटी भाषेतील आहे.
दीपशिखा कालिदास
कालिदासाने ‘रघुवंश’ काव्यातील नायिका इंदुमतीला दिलेली ही विश्वविख्यात उपमा, ज्यामुळे त्याला ‘ दीपशिखा कालिदास ‘ही पदवी रसिकांनी दिली.
संचारिणी दीपशिखेव रात्रौ
यं यं व्यतीयाय पतिंवरासा।
नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे
विवर्ण भावं स स भूमिपालः।।
अर्थः- रात्री फिरणा-या दीपज्योतीप्रमाणे ती पतीची निवड करण्यास निघालेली इंदुमती ज्या ज्या राजाला टाकून पुढे गेली, तो तो राजा राजमार्गावरील महालाप्रमाणे काळा ठिक्कर पडला.
कालिदासाचा गौरव करणारे सुभाषित
पुराकवीनांगणनाप्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः।
अद्यापितत्तुल्यकवेरभावात्
अनामिकासार्थवतीबभूव।।
अर्थः- पूर्वी कवींच्या गणनाप्रसंगी कनिष्ठिकेवर कालिदासाला आधिष्ठित केले. (पण) अद्यापी त्याच्या तोडीचा कवी निर्माण न झाल्यामुळे पुढची अंगुली जी अनामिका ती ख-या अर्थाने अनामिकाच ठरली!
कालिदास स्मृतिदिन
कालिदासाविषयी फार थोडी माहिती इतिहासाला ठाऊक आहे हे वर सांगितलेच आहे. त्याचा जन्मदिन, मृत्युदिन याची कुठेच नोंद नाही. म्हणून कालिदासाचा स्मृतिदिन आषाढ प्रतिपदा हा सर्वानुमते ठरवला गेला. मेघदूताच्या आरंभीच्या दुसऱ्या श्लोकाच्या तिसऱ्या पंक्तीवरून हे ठरविले. तो श्लोक असा..
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वामासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः।
आषाढस्य प्रथमदिवसेमेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
तेव्हा अशा या थोर कविकुलगुरू कालिदासांच्या रम्य स्मृतीस सादर वंदन!!
म.बी.बी.स (पूर्वाश्रमीची..डाॅ.कुसुम जुगादे), सध्या दिल्लीत प्रायव्हेट प्रॅक्टीस करत आहे.
लेखिकेचे प्रकाशित साहित्य – लुप्ता, कथुल्या, सखा, सासुबाई साल मुबारक, कथागुच्छ, जिचे हाती कढई, वगैरे,एकूण तेरा पुस्तकं प्रकाशीत.
इंद्रधनुष्य
☆ “व्हेल माशाच्या तोंडात” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆
व्हेल माशाच्या तोंडात – –
एड्रियन व त्याचे वडील डॅम सिसिमॅकस हे दोघेही व्हेनेझुएलाचे रहिवासी आहेत. मॅगेलनच्या सामुद्रधुनीत ते आपआपल्या लहान बोटी घेऊन जलविहारासाठी गेले होते. एकमेकांपासून काही मीटर्स अंतरावर ते होते.
अचानक एड्रियनला जाणवलं की त्याच्यावर काही तरी आदळलं. त्याने डोळे बंद केले. डोळे उघडले, तेव्हा त्याला जाणवलं की तो त्याच्या लहानशा बोटीसह व्हेल माशाच्या तोंडात होता. त्याच्या चेहर्यावर पातळसा ब्रश फिरत असल्याचं त्याला जाणवलं. तिथे त्याला फक्त गर्द निळा व पांढरा रंग दिसला. काय करावं, ते एड्रियलला कळेना. त्यानं श्वास रोखून धरला होता. पण किती काळ त्याला श्वास रोखून धरता आला असता? त्याला काहीच करता येण्यासारखं नव्हतं. पण त्याचं नशीब थोर होतं॰ त्याला जाणवलं की तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतोय. म्हणजे व्हेलने त्याला त्याच्या कयाकसह तोंडातून बाहेर फेकलं होतं.
हे सगळं दृश्य, त्याचे वडील हातबुद्ध होऊन पहात होते. नाहीसा झालेला एड्रियल पुन्हा कयाकसह पृष्ठभागावर आला, तेव्हा त्यांनी नि:श्वास सोडला. नंतर त्यांना व्हेल माशाचं धूड दूर निघून जाताना दिसलं.
उसळत्या लाटांचं चित्रीकरण करता यावं, म्हणून वडील डॅम यांनी. त्यांच्या बोटीच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवला होता. त्या कॅमेर्याने या विलक्षण थरारक प्रसंगाचे क्षण टिपले होते.
व्हिडिओमध्ये ते पुन्हा पाहताना, तो व्हेल मासा किती मोठा होता, ते पाहून त्यांना धक्काच बसला.
एड्रियननं नंतर बी. बी. सी. च्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, ‘तो केवळ जीवंत रहाण्याचा अनुभव नव्हता. मला जगण्याची दुसरी संधी मिळाली होती. ‘
व्हेल मासा जरी आकाराने फार मोठा असला, तरी त्याच्या गळ्याचा भाग फार लहान असतो. ते फक्त लहान मासे गिळू शकतात. माशाच्या तोंडात गेलेले लोक मरतात, कारण ते श्वास रोखून धरू शकत नाहीत. मासा त्यांना बाहेर फेकतो, कारण तो त्यांना गिळू शकत नाही.
एड्रियननं श्वास रोखून धरला व तो जीवंत राहिला. ‘ असं मत प्राणीशास्त्रज्ञांनी वर्तवलं.
एड्रियन माशाच्या तोंडातून, म्हणजेच मरणाच्या दारातून परत आला होता.
“कुठे अंतच नाही या सरकारच्या अत्याचाराच्या सामर्थ्याचा… लोकांना तुडवून काढतयं अक्षरशः! लोक ही बिचारे कुठपर्यंत आणि किती सहन करतील?? “
“तू म्हणशील तर मी व्हाईसरॉय ला माफी पत्र लिहू का? “
“सुकुमार पोरी -बाळी तुरूंगात डांबल्या आहेत; त्या माफी मागत नाहीत ; आणि तुम्ही मागणार? …
हा संवाद आहे स्वराज्यासाठी अतीव कष्ट, असीम त्याग करणा-या दोन महनीय अशा…
महात्मा गांधी आणि त्यांची सहचारिणी कस्तुरबा या दोघांतील… आणि तोही… पुण्यातील आगाखान पॅलेस मधील कारावासातील अक्षम्य हेळसांड, अन्याय, आजारातील वेदना सहन करत असतांना!! एक लखलखणारं तेज… एक ज्योती निमाण्यापूर्वी, संपूर्ण शक्तीनिशी तेजाळून उठलीयं! रोमा-रोमांतलं प्रवाही देशप्रेम,
वैखरीतून हे असं व्यक्त झालयं!
कस्तुरबा… खरंतर भारताच्या आणि स्त्री स्वातंत्र्य लढ्याच्या पुस्तकातलं एक चमकणारं पान! पण त्यावर धूळ साचून ते नजरेआड झालयं. कस्तुरी सुगंध दरवळ जणू विरून गेलायं!
कस्तुरबा… कस्तुर ही पोरबंदर येथील गोकुळदास माखजी या एका श्रीमंत व्यापा-याची कन्या. मोहनदास गांधी… बापू… यांचा परिवार ही शेजारीच रहात होता. दोन परिवारातील स्नेह ; बंधनात बद्ध झाला तो या दोघांतील गठबंधनाने!
आणि सुरू झाला कस्तुर चा जीवन प्रवास… सामान्य गृहिणी ते असामान्य ‘ बा ‘ पर्यंतचा!!
कस्तुर… कधीही शाळेत न गेलेली एक समर्पित गृहिणी. बायको बनून आली पण नंतर आपल्याच मुलांची नाही ; तर बापूंच्या ‘साबरमती ‘ आणि ‘सेवाग्राम ‘ आश्रमातील सगळ्यांचीच बा झाली. निष्कपट श्रद्धा, निस्वार्थ भक्ती, आणि सेवा यांचा आदर्श ठरल्या कस्तुरबा.
गांधीजी जेव्हा शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेव्हा दोन लहान मुलं पदरी घेऊन बां नी, कुठलंही आदान-प्रदान नसलेलं आयुष्य कंठीलं! दक्षिण आफ्रिकेला गेले तेव्हाही बां नी त्यांना समर्थन आणि प्रोत्साहनच दिले.
दक्षिण आफ्रिकेत असतांना तर त्यांनी असाधारण असं साहस दाखवलं. गो-यांची फौज धमकावायला आल्यावर गांधीजींना इंग्रजांच्या हाती लागू न देण्याची पराकाष्ठा केली आणि वाचविले. आणि स्वतः ही मुलासह दुस-या घरी जाऊन शरण घेतली.
बघता-बघता या कस्तुरीचा सुगंध दरवळत जाणवायला लागला. त्या बापूंच्या जीवन संग्रामात अचल निष्ठेने उभ्या राहिल्या. स्वतः ला काया, वाचा, मनाने अर्पण केले त्यांच्या जीवनकार्यात एक समिधा बनून!!
आश्रमातील लोकांना आईच्या मायेनं आणि वत्सलतेनं शिस्त आणि व्यवस्थापनाचे धडे दिले.
महिलांना स्वच्छता, आरोग्य आणि साक्षरतेचे धडे दिले.
कस्तुरबा लिहायला शिकल्या ख-या पण त्यांची पद्धत लहान बालकासारखी प्रत्येक शब्द, अक्षर वेगवेगळं, दूर दूर. बापूंनी खूप शिकवलं, सराव करायला सांगितलं. सगळ्यांनी वही मागितली, बां नी ही मागितली. पण बापूंनी त्यांना वही… नोटबुक न देता, त्यांच्या हातात कागदाचं बंडल ठेवत सांगितलं… “तुझं लेखन सुधारेल तेव्हाच तुला नोटबुक मिळेल.” बां ना खूप वाईट वाटलं. दुखावल्या गेल्या त्या.
नंतर बापूंना ही जाणवले ते. सरोजिनी नायडूंना सांगून, सुशिला नायरच्या हाती एक नोटबुक पाठवली. पण बां चं मोठं स्वाभिमानी उत्तर बघा… ” मला नोटबुक ची काय गरज?”…
याच कस्तुरबांचं एक पत्नी म्हणून बलिदान प्रशंसनीय आहे. राष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी आपलं घर खुलं केलं. पतीच्या प्रयत्नांना पूर्ण साथ दिली. पती जेलमध्ये असतांना उपवास केले, दागिने आणि इतर वस्तूंचा ही त्याग केला. बा एक समर्पित पत्नी होत्या, पण म्हणून ‘दबलेल्या ‘ कधीच नव्हत्या.
“चले जाव” चळवळीच्या वेळी बापूंना अटक झाली त्यावेळी त्यांनी बां ना सांगितले, ” तू माझ्या सोबत येण्याऐवजी मी अंगिकारलेले व्रत पूर्ण कर. ” परंतु भाषणासाठी शिवाजी पार्क वर पोहोचण्यापूर्वीच बां ना अटक झाली.
त्यावेळी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाने करेंगे या मरेंगे… लिहिलेला बिल्ला शिवून घ्यावा असे ठरले… पण… “मला याची काय गरज आहे? तो तर माझ्या काळजावरच कोरलेला आहे. ”
अशा या बां नी, म. गांधींजींना नेहमीच असाधारण साहस, आस्था, समर्पण युक्त अशी साथ दिली. बलिदानाच्या मार्गावर न घाबरता, न डगमगता चालत राहिल्या. म. गांधीजींची विशाल छबी, प्रतिबिंब बनून राहिल्या त्या. नश्वरता पार करून अमरता प्राप्त केलीयं खर तर त्यांनी.
त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर बापूंनी त्यांच्या विषयी काढलेले गौरवोद्गार स्मरणीय आणि उल्लेखनीय असेच आहेत… ” कस्तुरबा माझ्या सगळ्या राजनैतिक संघर्षात माझ्या सोबतीने ठामपणे उभी राहिली. संकटं आल्यावर जराही घाबरली किंवा डगमगली नाही. आजच्या काळानुसार ती भले ही अशिक्षित वाटेल, पण माझ्या नजरेतून मात्र ती ख-या शिक्षणाचा एक आदर्श होती.”
स्वराज्यासाठी अतीव कष्ट, असीम त्याग केलेल्या कस्तुरबांचा आगाखान पॅलेस मधला तुरूंगवास मात्र खूपच कठीण, वेदनामय होता. त्यांच्या उपचाराबाबत अक्षम्य हेळसांड झाली. बापूंची त्या तुरूंगवासातली सोबत… अगदी शेवटच्या श्वासापर्यंत… हाच काय तो फार मोठा दिलासा होता त्यांच्या साठी!
या कारावासातच त्यांचा मृत्यू झाला.
तेथेच या समर्पितेची समाधी आहे. असं म्हणतात की, त्या समाधीवर स्वतः गांधीजींनी लहान-लहान शंखांनी हे राम! हे शब्द कोरलेले आहेत.
“करेंगे या मरेंगे”… हे भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य कस्तुरबांनी खरे करून दाखवले.
अशी ही कस्तुर… सगळ्यांचीच, अगदी कारागृहातील महिलांची ही आई बा होऊन जगली. आपल्या पतीचा पंथ धरला. त्यांच्या कठोर दुराग्रहाचे, प्रकोपाचे विष ही पचवले. पतीच्या साधनेत आपले मूक पण संपूर्ण योगदान अर्पिले. गांधीजींच्या शक्तीची आदि स्त्रोत होती बा!!
फोर बर्नर थिअरी बद्दल ऐकलंय का तुम्ही कधी? सुंदर रूपक आहे. तुमचं आयुष्य म्हणजे जणू चार बर्नर असलेला गॅसस्टोव्ह आहे असं समजा. कुटुंब, मैत्री, आरोग्य आणि व्यवसाय ह्या त्या चार चुली. ऍटोमिक हॅबिट्स ह्या पुस्तकाचे लेखक जेम्स क्लिअर यांनी लोकप्रिय केलेली ही कल्पना. कुठल्याही व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा ही मर्यादित असते. ती ऊर्जा म्हणजे आपापला गॅस सिलिंडर समजा. फोर बर्नर थियरी हे रूपक आपल्याला सांगतं की हे चारही बर्नर एकाच वेळी मोठ्या आचेवर ठेवले तर आपली ऊर्जा लवकर संपून जाईल आणि आपण पूर्णपणे बर्नआऊट होऊ. जे लोक आपापल्या क्षेत्रात अतिशय यशस्वी होतात त्यांना ह्या चार पैकी एक तरी बर्नर कधीतरी बंद करावाच लागतो. बहुतेक लोकांसाठी ‘मैत्री’ हा बंद होणारा पहिला बर्नर असतो, मग कुटुंब, मग आरोग्य आणि सर्वात शेवटी काम!
पण एखादा बर्नर पूर्णपणे बंद न करता, आपण जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर आहोत, आपलं प्राधान्य कशाला आहे हे समजून ते दोन बर्नर त्या वेळेला मोठ्या आचेवर ठेवून इतर दोन बर्नर सिमवर ठेवता आले तर? आपापल्या स्वयंपाकघरात आपण ते करतोच की, भाताला आधण आलं की उष्णता कमी करून भाजीच्या कढईची उष्णता वाढवतो. तसं केलं नाही तर गॅस पण संपेल आणि जे आपण बनवतोय तेही करपून जाईल हे आपल्याला समजतं. तोच धडा आपण आपल्या जीवनात गिरवायला सुरु केला तर?
फोर बर्नर थियरी हा कुठला मानसशास्त्रीय सिद्धांत नाहीये. ही एक रूपकात्मक मांडणी आहे. पण मला ही संकल्पना खूपच आवडली. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. काही काळ असा असतो जेव्हा आपापल्या कामाला प्राधान्य द्यावंच लागतं. शिक्षणाचा काळ,
स्पर्धा परीक्षा, व्यवसाय उभारणी, एखादा महत्त्वाचा व्यावसायिक प्रकल्प. अश्या वेळी कामाचा बर्नर जोमाने पेटतो. कुटुंब, मैत्री, आरोग्य सर्वांकडे दुर्लक्ष होतं. पण अश्या वेळी इतर बर्नर्स कडे पूर्णपणे दुर्लक्ष न करता ते मंद आचेवर ठेवता आले तर?
पुढे आयुष्यात एक टप्पा असाही येतो जेव्हा कुटुंब केंद्रस्थानी येतं. नवीन संसार उभारताना, मुलं लहान असताना, आई-वडील म्हातारे होत जाताना, घरातलं कुणी आजारी असताना.. अशा वेळी कुटुंबाचा बर्नर मोठ्या आचेवर असावाच लागतो. पण आरोग्य, काम आणि मैत्री असे उरलेले तीन बर्नर पूर्णपणे बंद करून चालत नाही. आरोग्याबाबत बोलायचं तर शरीर हाच फार कठोर गुरु आहे. आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, तर ते आपल्याला धडा शिकवतंच. म्हणून आरोग्य बिघडतं तेव्हा इतर बर्नर आपोआपच मंदावतात, कधीकधी पूर्णपणे बंदही पडतात, त्यामुळे आरोग्य हा बर्नर सदैव चालू असलाच पाहिजे.
आयुष्याचं संतुलन म्हणजे हे चारही बर्नर सदैव सारख्या आचेवर ठेवणं नव्हे. ते अशक्य आहे. संतुलन म्हणजे एक-दोन बर्नर पूर्णपणे बंद करून उरलेले मोठ्या आचेवर धगधगत ठेवणे हे ही नाही. संतुलन म्हणजे योग्य वेळी योग्य बर्नरची उष्णता वाढवणं, आणि इतर बर्नर्स बंद न करता त्यांना मंद आचेवर जिवंत ठेवणं. कामाचा काळ कठीण असला तरी कुटुंबासोबत संवाद आणि जेवण, दररोज थोडासा तरी व्यायाम, जुन्या मित्र-मैत्रिणींना अधूनमधून तरी भेटत राहणं. हे सगळं म्हणजे मंद आचेवर चालू ठेवलेले इतर बर्नर्स.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला प्राधान्यक्रम वेगळा असतो, किंबहुना असायला पाहिजे. २५ वर्षांच्या व्यक्तीच्या प्रायॉरिटीज वेगळ्या, ४५ वर्षांच्या व्यक्तीच्या वेगळ्या, ६० वर्षांच्या व्यक्तीच्या वेगळ्या. खरा प्रश्न हा नाहीच आहे की, ‘मी सगळं एकाच वेळी करू शकते का? ’ खरं शहाणपण हे समजण्यात आहे की आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर कुठली चूल धडधडून पेटायला हवी आणि कुठली मंद आचेवर असायला हवी. ज्या व्यक्तीला हे कळलं त्याचं आयुष्य शांत, समतोल आणि सुखी होणारच!
लेखिका : शेफाली वैद्य
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७७ — –
करी काम नि:काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।।
अर्थ : या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.
विवेचन :परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश्वर हवा आहे अशा अनन्य भावनेतून जर आपण त्याचे गुणगान केले तर त्याचा एक परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या इतर वासना नाहीशा व्हायला लागतील. देहबुद्धी कमी होईल.
त्या गोष्टीचे मात्र आपल्याला सतत ध्यान लागले पाहिजे. त्याचा छंद किंवा वेड लागले पाहिजे. असे झाले म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारा ईश्वर हळूहळू या विश्वात सर्वत्र विद्यमान आहे याची जाणीव होईल. तो जसा माझ्यात आहे तसाच सर्व प्राणीमात्रात देखील आहे याची जाणीव दृढ होत जाईल. तो केवळ सजीवात नसून निर्जीवात किंवा सृष्टीच्या कणाकणात त्याचे अस्तित्व आहे हे जाणवेल. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू देवांना आपला शत्रू समजत होता. पण अशा या असुराचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, ” कुठे आहे तुझा ईश्वर? ” तेव्हा त्याने सांगितले की तो या सर्व चराचरात भरून राहिला आहे. मग हिरण्यकश्यपूने विचारले की या निर्जीव अशा खांबात देखील तो आहे का? तेव्हा प्रल्हादाने होय उत्तर दिले. नंतर त्याच स्तंभातून परमेश्वराने नरसिंह रूप धारण करून दुराचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला.
पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. संत एकनाथांनी तृषार्त अशा गाढवाला गंगेचे पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला आणि सर्वांचा आत्मा एकच आहे याचा प्रत्यय लोकांना आणून दिला. भगवंताच्या भक्तीने या सगळ्या संतांच्या मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते.
त्याप्रमाणे हरिनामाचे गुणगान केले की आपल्याही जाणिवा हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. मनातील द्वंद्व नाहीसे होते. या जगामध्ये विविध रंग आणि रूपात तोच नटलेला आहे याचा साक्षात्कार होतो. जसे वेगवेगळ्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी त्या भांड्याच्या आकारात राहते. पण पाणी एकच असते. सोन्याचे दागिने विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात. पण त्यातील सोने एकच असते. त्याप्रमाणेच या विश्वात परमेश्वरच सगळीकडे भरून राहिला आहे ही जाणीव दृढ होत जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ” हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचि जाहला. ” अशी साधकाची अवस्था होते. म्हणून आपण निर्वासन होऊन फक्त एका परमेश्वराचीच वासना धरावी असे समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद ::
१. माझी आजची भक्ती किंवा प्रार्थना ही देवाला काहीतरी ‘मागण्यासाठी’ (सकाम) आहे, की मी केवळ त्याच्या ‘स्वरूपासाठी’ (निष्काम) त्याची आराधना करतोय?
२. संतांनी गाढवात किंवा खांबातही देव पाहिला; मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये तोच ईश्वरी अंश पाहू शकतो का?
३. माझ्या मनातील ‘आपले-परके’, ‘चांगले-वाईट’ हे द्वंद्व किंवा भेद नष्ट व्हावेत म्हणून माझ्या ठायी रामनामाचा ‘वृत्तीविश्वास’ दृढ झाला आहे का?
४. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे “हे विश्वचि माझे घर” ही भावना माझ्या मनात रुजण्यासाठी मी माझ्या संकुचित विचारांचा ‘छेद’ (त्याग) करायला तयार आहे का?
– – – –
श्लोक क्र. ७८ – –
अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ।
महाराज तो स्वामी कैवल्यदाता ।
वृथा वाहने देहेसंसारचिंता ।।७८।।
अर्थ :ज्या मनुष्याचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्या माणसाला (पामराला) सर्व प्रकारची संकटे त्रास देतात. भगवंत महाराज म्हणजे राजांचा राजा आहे, या विश्वाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो कैवल्यदाता म्हणजे मोक्ष देणारा आहे. असा हा सर्वशक्तिमान परमेश्वर आपली काळजी वाहण्यास समर्थ असताना आपण उगाच देहाची आणि संसाराची चिंता करीत बसतो.
विवेचन :आधीच्या श्लोकात समर्थांनी श्रीरामावर निष्काम श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केल्यास मनातील द्वंद्व नाहीसे होते. सर्व जीवांच्या मध्ये तो एकच परमात्मा व्यापून राहिला आहे असा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे. या श्लोकात ज्याचा रामावर विश्वास नाही अशा माणसाचा खरपूस समाचार समर्थ घेतात. अशा माणसाला ते पामर म्हणतात. पामर म्हणजे क्षुद्र, हीन. गरीब आणि पामर यात फरक करता येतो. गरीब माणूस आपल्या कर्तृत्वाने स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. पामर हा त्या दृष्टीने महामूर्ख म्हणावा लागेल. कारण आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा नाही, अशा माणसांना समर्थ पामर म्हणतात. मग तो ऐहिक दृष्ट्या भलेही श्रीमंत असेल, पण पारमार्थिक दृष्ट्या अभागी आणि हीन दीन.
असा माणूस आर्थिक दृष्ट्या भलेही सधन असेल पण प्रपंचात येणाऱ्या संकटांनी तो खचून जातो. प्रपंचातील संकटांचे तडाखे भल्याभल्यांना सोसवत नाहीत. छोट्यामोठ्या गोष्टींनीही अशी माणसे विचलित होतात. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर अशा माणसांना संसार आणि त्यातील अडचणी बाधक ठरतात. पण ज्यांची रामावर श्रद्धा आहे, अशा माणसांना प्रपंचातील संकटे विचलित करीत नाहीत. त्यांना संकटे येत नाहीत असे नाही. पण भगवंतावर सर्व भार टाकल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही.
या श्लोकात भगवंताच्या गुणांचे वर्णन करताना समर्थ तीन विशेषणे वापरतात. तो ‘महा ‘राज आहे, स्वामी आहे आणि कैवल्यदाता आहे. महाराज म्हणजे महान राजा. राजांचा राजा. रामराज्य होऊन आज हजारो वर्षे लोटली तरी रामराज्याची कल्पना आजही लोकांना भावते. रामराज्य म्हणजे आदर्श राज्य होते. राम हा आदर्श राजा. दुसरी गोष्ट म्हणजे तो या चराचराचा स्वामी आहे. इंग्रजी शब्द वापरायचा तर तो ‘ सुप्रीम पॉवर ‘ आहे. या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता तोच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो कैवल्यदाता आहे. कैवल्यदाता म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणारा. ज्याने ज्याने रामनाम घेतला, तो तरून गेला. मग तो वाल्या कोळी असेल, भक्त प्रल्हाद असेल, रामनाम घेणारी शबरी असेल किंवा अहिल्या असेल. हनुमंत आणि बिभीषण हे रामाचे भक्त तर चिरंजीव झाले.
थोडक्यात सांगायचे झाले तर श्रीराम म्हणजे कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष हा इच्छिलेले देणारा असतो. त्याच्या सावलीत बसून आपण काय मागायचे हे आपल्यावर आहे. तो आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देणारा आहे. कैवल्य प्रदान करणारा आहे. असा हा भगवंत आपल्या पाठीशी असताना आपण देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता वाहत असतो. माझे कसे होईल, माझ्या मुलाबाळांचे, नातवंडांचे कसे होईल अशी चिंता आपण करीत बसतो. तर कोणाला या जगाचे कसे होईल अशा प्रकारची चिंता. अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी सामान्य माणूस गोंधळून जातो.
समर्थ म्हणतात, ‘ मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. ‘ प्रारब्धानुसार जे घडायचे असते, ते घडणारच असते. आपण मात्र व्यर्थ चिंता करीत बसतो. त्यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व भार त्याच्यावर सोपवावा. याचा अर्थ मात्र असा नाही की आपल्या वाट्याला आलेले कर्म न करता स्वस्थ बसायचे. अर्जुनाला कर्तव्यप्रवण करण्यासाठीच तर भगवंताने गीता सांगितली ना! तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या वाट्याला आलेले निहित कर्म उत्तम प्रकारे करावे. तोच पुरुषार्थ आहे. इतर गोष्टी परमेश्वरावर सोपवाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, “घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. “मग देहाच्या आणि प्रपंच्याच्या चिंता आपल्याला सतावणार नाहीत.
स्वसंवाद ::
१. “माझे कसे होईल? माझ्या कुटुंबियांचे कसे होईल? ” या विचारसरणीत अडकून मी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे प्रपंचाची ‘वृथा’ (व्यर्थ) चिंता करत बसलो आहे का?
२. संकटाच्या काळात मी एका ‘पामरा’सारखा विचलित होऊन खचून जातो, की भगवंतावर संपूर्ण भार टाकून खंबीरपणे परिस्थितीचा सामना करतो?
३. कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आल्यावर मी त्याच्याकडे केवळ तात्पुरती ऐहिक सुखे मागत आहे, की चिरंतन शांती आणि मोक्षाची आस धरतो आहे?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “देव सुखाचा सागर” आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे का? मी माझे निहित कर्म करून उरलेला भार त्याच्यावर सोपवायला शिकलो आहे का?
जुलै महिना हा अवयवदान प्रबोधन महिना म्हणून नोटो म्हणजेच भारत सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने एक लेख – – जास्तीत जास्त लोकांमध्ये तो पसरवून लोकांना अवयवदानाबाबत जागृत करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करीत आहे.
आपलं शरीर हे एक अजब असं स्वयंचलित यंत्र आहे. सदर यंत्रामध्ये दोन केंद्रे आहेत. त्यातलं एक ऊर्जा केंद्र आणि दुसरं आज्ञा केंद्र. या ऊर्जा केंद्राला आपण हृदय असे म्हणतो आणि आज्ञा केंद्राला आपण मेंदू असे म्हणतो. या दोन्ही केंद्राद्वारे आपल्या शरीरातील सर्व व्यवहाराचे नियंत्रण होत असते. आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग असतात. जसे की हात, पाय, डोकं, नाक, कान, डोळे वगैरे. या सर्व शरीराच्या भागांना अवयव असे म्हणतात. आत्ता मी सांगितले ते सर्व शरीराचे बाह्य अवयव आहेत. त्याचप्रमाणे शरीराच्या आत मध्ये विविध भाग असतात उदा. यकृत, जठर, फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड, स्वादुपिंड, वगैरे. या सर्व शरीराच्या आत मध्ये असलेल्या भागांना अंतर्गत अवयव असे म्हणतात. आपलं संपूर्ण शरीर हे बाह्य अवयव आणि अंतर्गत अवयव यांचे द्वारे बनलेले असे अजब यंत्र आहे.
यंत्राचा जेव्हा एखादा भाग बिघडतो तेव्हा यंत्रातला तो भाग काढून दुसरा भाग बसवून ते यंत्र पुन्हा चालू केले जाते. यंत्राचे सुट्टे भाग कंपन्यांकडून विकत मिळतात. त्यामुळे यंत्राचा बिघडलेला भाग दुसऱ्या भागाने बदलून ते यंत्र पुन्हा कार्यरत करता येते. परंतु शरीर हे एक असे अजब यंत्र आहे की त्या यंत्राचा कोणताही भाग कोणत्याही कारखान्यात किंवा शरीराबाहेर कोठेही तयार होत नाही किंवा तयार करून मिळत नाही. शरीराचा भाग हा मानवाच्या शरीरातच तयार होतो आणि तो शरीरातच उपलब्ध असतो.
वर्षानुवर्षे मानवाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात बऱ्याच वर्षांपूर्वीपर्यंत मानवाच्या शरीरातला एखादा भाग बिघडला की मानवाचे आयुष्य संपून तरी जाते किंवा त्या मानवाला अपंगत्व किंवा काहीतरी शारीरिक कमतरता निर्माण होते.
बिघडलेल्या अवयवामुळे निर्माण होणारी कमतरता अथवा मृत्यू ही गोष्ट असाहाय्यपणे सहन करण्याशिवाय त्या माणसाकडे व त्याच्या कुटुंबीयांकडे पर्याय राहिलेला नसतो.
परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने यातील अनेक व्याधींवर संशोधन करून त्यामध्ये नवीन उपचार पद्धती निर्माण केली आहे त्या उपचार पद्धतीला अवयव प्रत्यारोपण असे म्हणतात.
प्रत्यारोपण म्हणजे खराब झालेल्या अवयवाच्या ठिकाणी तो अवयव काढून दुसरा चांगला अवयव बसवणे. परंतु त्यासाठी दुसरा चांगला अवयव उपलब्ध असणे आवश्यक असते आणि आपण पाहिलेच आहे की कोणताही मानवी अवयव कोणत्याही दवाखान्यात किंवा कारखान्यात बनविता येत नाही. तो दुसऱ्या माणसाच्या शरीरातूनच उपलब्ध झाल्यास, तेही चांगल्या गुणवत्तेचा अवयव उपलब्ध झाल्यास खराब झालेल्या अवयवाच्या जागी बदलून बसवता येतो. पण हे कसं घडणार? त्यासाठीच आवश्यक आहे ते म्हणजे ‘अवयवदान’
अवयवदान म्हणजे आपल्या शरीरातील चांगल्या अवयवाचे दुसऱ्याच्या शरीरातील खराब अवयवाच्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्या चांगल्या तऱ्हेने कार्यरत असलेल्या अवयवाचे दिलेले दान. हे अवयवदान दोन प्रकाराने करता येते
एक जिवंतपणी आणि दुसरे मृत्यूनंतर.
आता आपण त्याचा उहापोह करूया.
कोणताही अवयव मला माझ्या जगण्यासाठी माझ्या शरीरामध्ये उपलब्ध असावा लागतो. तो नसल्यास माझ्या जीवनाचे काय होईल? आणि त्यामुळे मी एखादा अवयव जिवंतपणे कसा बरे देऊ शकेन? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते ते अवयव म्हणजे
१) दोन पैकी एक किडनी म्हणजेच मूत्रपिंड.
२) लिव्हरचा म्हणजेच यकृताचा काही भाग.
३) फुफ्फुसाचा काही भाग,
४) स्वादुपिंडाचा काही भाग,
५) आतड्याचा काही भाग.
६) गर्भाशय
कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनी वर म्हणजेच मूत्रपिंडावर व्यवस्थित व्यतीत होऊ शकते. त्यामुळे एक किडनी दान केल्याने त्याला कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. त्याच प्रमाणे इतर ज्या अवयवांचे काही भाग आपण दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करतो ते अवयव दोन्ही शरीरात काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्ण पणे कार्यरत होतात. तशी शक्यता असेल तरच डॉक्टर अशा अवयवांचा काही भाग काढून घेण्यास मान्यता देतात. त्यामुळे एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही.
एखाद्या स्त्रीचे गर्भाशय चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या स्त्रीला पुढे मूल नको असल्यास त्या स्त्रीच्या शरीरातून गर्भाशय काढून ज्या स्त्रीच्या शरीरात गर्भाशय नाही किंवा असलेले गर्भाशय नीट कार्यरत होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या शरीरात ते प्रत्यारोपित करता येते व त्यामुळे त्या स्त्रीला मूल होऊ शकते.
जिवंतपणी वरील प्रमाणे सर्व अवयव दान करून गरजू रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि दात्याला कोणताही शारीरिक धोका नसतो हे जाणून घेतले पाहिजे.
यातील दुसरा भाग म्हणजे मृत्यूनंतरचे अवयवदान.
अनेक वर्षापासून मृत्यूची व्याख्या ही हृदयक्रिया बंद पडल्यानंतर मृत्यू होतो अशीच आहे. त्यामुळे सहसा हृदयक्रिया बंद पडली की मृत्यू आला अशी व्याख्या केली जायची. सर्व धर्मांनी ही हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू होतो अशीच मृत्यूची व्याख्या केली होती. परंतु आपण या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. आपल्या शरीराची दोन नियंत्रण केंद्रे असतात त्यातील पहिले हृदय असते. परंतु दुसरे एक नियंत्रण केंद्र म्हणजे मेंदू. ज्याप्रमाणे हृदय बंद पडल्यानंतर मनुष्याचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे मेंदू बंद पडल्यानंतरही माणसाचा मृत्यू निश्चित असतो. म्हणूनच मृत्यू दोन प्रकारचे असतात हे आता आधुनिक विज्ञानाने सप्रयोग सिद्ध केलेले आहे. हृदयाचा मृत्यू आणि मेंदूचा मृत्यू – – –
– – हृदयाचा मृत्यू झाल्यानंतर फक्त तीन मिनिटांमध्ये शरीरातील सर्व अंतर्गत अवयव बंद पडतात आणि पूर्णपणे निरुपयोगी ठरतात. परंतु बाह्य अवयवांपैकी नेत्र आणि त्वचा या दोन अवयवांच्या बाबतीत अपवाद ठरू शकतो. मृत्यूच्या घटकेनंतर साधारणपणे सहा तासापर्यंत हे अवयव खराब होत नाहीत. अर्थात सर्वसामान्यांच्या भाषेत रूढ झाले म्हणून जरी आपण त्यांना अवयव म्हणत असलो तरी तांत्रिक शास्त्रीय भाषेत त्यांना उती म्हणजेच टिशू असे संबोधले जाते. या टिशूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रक्ताशी संबंध नसतो त्यामुळे कोणत्याही माणसाच्या टिशू कोणाही माणसाच्या शरीरास प्रत्यारोपण करता येतात त्यासाठी रक्तगट जुळण्याची आवश्यकता नसते….. त्यामुळे मृत शरीरामधील कॉर्निया व त्वचा म्हणजेच स्किन हे दोन टिशूवर्गीय अवयव मृत्यूनंतर सहा तासाच्या आत काढून घेऊन दुसऱ्याच्या शरीरावर प्रत्यारोपण करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अवयवदान करायचे असल्यास त्याच्या मृत्यूनंतर किमान नेत्र व त्वचा दान करता येतेच…… शरीराचे अंतर्गत अवयव मात्र एका विशिष्ट परिस्थितीमध्येच प्रत्यारोपणासाठी उपयोगी ठरू शकतात आणि त्या परिस्थितीतच ते दान करता येतात. त्याबद्दल आपण विस्तृत चर्चा करू.
कल्पना करा की माझा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये माझ्या मानेला जोराचा मार बसलेला आहे आणि मी बेशुद्ध असून मला दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे. या परिस्थितीत ऍडमिट केल्या केल्या कोणत्याही दवाखान्यामध्ये डॉक्टर प्रथम पेशंटला अति दक्षता विभागात ठेवून त्याला व्हेंटिलेटर लावतात. कारण त्याच्यावर उपचार करत असताना मधूनच त्याचा श्वास बंद पडू नये याची काळजी घेण्यासाठी हा व्हेंटिलेटर लावला जातो. व्हेंटिलेटर हे एक कृत्रिम श्वसन यंत्र असते आणि या यंत्रांमुळे माणूस स्वतः श्वसन करण्यास सक्षम नसेल तर या यंत्राद्वारे कृत्रिमरीत्या त्याचा श्वासोच्छ्वास चालू ठेवता येतो. जर श्वासोच्छ्वास चालू असेल तरच हृदयाचे कार्य चालू ठेवता येते. अशा परिस्थितीत डॉक्टर जेव्हा रुग्णावर उपचार करत असतात त्यावेळी जर पेशंटची मानेच्या मागील बाजूस असलेली ब्रेन स्टेम म्हणजेच मेंदूस्तंभ नावाची ही कांडी तुटलेली असेल तर पेशंटचा मेंदूशी संपर्क पूर्णपणे नष्ट होतो. तसेच जर डोक्याच्या कवटीला मार लागला असेल आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला असेल तरीही मेंदूचे कार्य बंद पडू शकते.
अपघात न झालेल्या रुग्णाला सुद्धा जर ब्रेन हॅमरेज मुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला असेल तर.
म्हणजेच कोणत्याही कारणामुळे एकूणच शरीराचा मेंदूशी संपर्क तुटणे किंवा मेंदूचे कार्य रक्तस्त्राव होऊन बंद पडणे या दोन्ही स्थितीला ब्रेन डेड म्हणजेच मेंदू मृत्यू किंवा मस्तिष्क स्तंभ मृत्यू असे संबोधले जाते. सर्वसामान्यांच्या भाषेत मेंदू मृत्यू असे आपण म्हणू शकतो.
ही स्थिती अत्यंत महत्त्वाची असते यावेळी मेंदूचे कार्य बंद असले तरीही व्हेंटिलेटर चालू असल्याने रुग्णाचा श्वासोच्छ्वास कृत्रिमपणे का होईना चालू असतो, त्यामुळे हृदयक्रिया चालू असते. त्यामुळे माने खालील सर्व शरीर हे रक्ताभिसरणामुळे जिवंत आहे असे वाटण्याची शक्यता असते. छातीमध्ये हृदयाची धडधड स्पष्टपणे दिसू शकते पण तरीही मेंदू मृत झालेला असेल तर व्हेंटिलेटर काढल्या काढल्या त्या रुग्णाचा मृत्यू 100% निश्चित असतो. म्हणजेच ब्रेन डेड याचा अर्थ जिवंत सदृश्य मृत्यू असेही आपण म्हणू शकतो.
हा खरा मृत्यू आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अपनी या नावाची एक टेस्ट असते ही टेस्ट चार डॉक्टरांची सरकार नियुक्त समिती सहा तासाच्या अंतराने दोन वेळेला करते. दोन्ही वेळेला ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर या समितीतर्फे त्या रुग्णास ब्रेन डेड असे घोषित केले जाते. ब्रेन डेड म्हणजे शंभर टक्के मृत्यूच.
अशा जिवंत सदृश्य मृत्यू परिस्थितीमध्ये माने खालील शरीरामधील सर्व अंतर्गत अवयव कार्यरत असतात. सामान्य यांत्रिक भाषेत म्हणायचे तर ते वर्किंग कंडिशन मध्ये असतात. असे कार्यरत अवयवच फक्त एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात.
याचा अर्थ असा रुग्ण मृत्यूशयेवर हॉस्पिटल मधील आयसीयू मध्ये असल्यास व डॉक्टरांच्या समितीने त्याला ब्रेन डेड घोषित केले असल्यास मगच त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्याही परिस्थितीत ब्रेनडेड रुग्णाच्या वारसांनी अवयव प्रत्यारोपणासाठी मान्यता दिलेली असणे कायद्याने आवश्यक असते.
– – – आता आपण असे समजू की वरील सर्व परिस्थिती सकारात्मक आहे. जेव्हा असे असेल तेव्हा शरीरातील अनेक अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असतात. डॉक्टर त्यातील कोणकोणते अवयव योग्य स्थितीत आहेत ते पाहून मगच कोणते अवयव प्रत्यारोपित करावयाचे हे ठरवतात. परंतु सर्वसाधारणपणे जर सर्व अवयव सुस्थितीत असतील तर प्रामुख्याने पुढील अवयव हे मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतात म्हणून त्यांना लाइफ सेविंग किंवा प्राण रक्षक अवयव असे म्हणतात ते मुख्यतः पुढील प्रमाणे हृदय, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, दोन्ही किडनी म्हणजेच मूत्रपिंडे.
परंतू त्याशिवायही आतडी, गर्भाशय, रक्तवाहिन्या, कानाचे ड्रम, हृदयाची झडपे, हाडे, कूर्चा, बोन मॅरो वगैरे तसेच बाह्य अवयवांपैकी दोन्ही डोळे, त्वचा, दोन्ही हात वगैरे असे एकूण 50 पेक्षा जास्त अवयव आणि मुख्यतः उती म्हणजेच टिशू प्रत्यारोपणासाठी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषत: वारस नातेवाईकांनी जर अवयवदानास संमती दिली, तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. यातले कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी केलेल्या संकल्पपूर्ती ने आपण वाचवू शकतो.
आज आपण अवयवदान / देहदानाचा संकल्प करूया आणि या संकल्पाची माहिती आपल्या कुटुंबियांना आणि मित्र व नातेवाईक यांना देऊन त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेऊया. या माणुसकीच्या कार्यासाठी आपल्याला सजग राहता येईल आणि अनेकांचे प्राण वाचवले याचे पुण्य पदरी पाडून घेता येईल.
लेखक : सुनील देशपांडे
उपाध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन.
संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन.
मो ९६५७७०९६४०
ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७५ आणि ७६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७५ – –
समस्तामध्ये सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहे ।
जिवा संशयो वाउगा तो तजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७५।।
अर्थ :परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नाम हेच सार (उत्कृष्ट साधन) आहे. जर हे समजत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, उपनिषदे आणि संतांची वचने यांचा अभ्यास करून पहा. भगवंताच्या नामाबद्दल विनाकारण येणाऱ्या संशयाचा त्याग कर. पहाट समयी भगवंताचे चिंतन कर.
विवेचन ::समर्थ पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाची महती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी इतर साधनांपेक्षा रामनाम हे घेण्यासाठी किती सोपे आहे हे समजावून सांगितले. या श्लोकात ते म्हणतात की रामनाम हेच सार आहे. बाकी सर्व असार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ” सार सार सार विठोबा, नाम तुझे सार, म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार. ” बा विठ्ठला, तुझे नाम हेच एक सार आहे. म्हणून तर प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्याचा वारंवार जप करीत असतात.
फळे जमिनीतील पाणी, जीवनसत्वे शोषून घेतात. फळातून ते सार आपल्यापर्यंत पोचवतात. नदी पर्वतातील गाळ, कचरा इ. वाहून आणते पण गोड पाणी आपल्यापर्यंत पोचवते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याची वाफ होते. मेघ आपल्याला जीवनदायी जलधारांचा वर्षाव करतात. आपले शरीर देखील आपण खाल्लेल्या अन्नातील सार शोषून घेते. असार आहे ते बाहेर टाकते. निसर्गातील सर्वच घटक अशा प्रकारे सार ग्रहणाचे कार्य करीत असताना आपल्याला दिसतील. त्याप्रमाणेच ज्याने हे विश्व निर्माण केले, त्याचे नामच सर्व सार आहे. नामातच त्याचा वास आहे. तेच नाम आपणही घ्यावे. पण आपण मात्र असार असलेला हा संसार खरा मानून सारभूत असलेले भगवंताचे नाम घेत नाही.
पण नामाचा महिमा वारंवार सांगूनही काही लोकांना पटत नाही. अशा लोकांना समजावणे अवघड असते. स्वतः शोध घेतल्याशिवाय त्यांची खात्री पटत नाही. त्यांच्या मनात अपार शंका असतात. यांना सांगायला काय जाते? नुसत्या नामामध्ये एवढे सामर्थ्य असणे कसे काय शक्य आहे? नुसते नाम घेऊन काय होणार आहे? कशाला त्यात वेळ घालवायचा? अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की माझे बोलणे तुम्हाला खरे वाटत नसेल तर स्वतः खात्री करून घ्या. विविध ग्रंथ, पुराणे, वेद, उपनिषदे अभ्यास. संतांच्या वचनांचे वाचन करा. हे सगळे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे ग्रंथ, पोथ्या पुराणे एकमुखाने भगवंताच्या नामाचा उद्घोष करीत आहेत. सर्व संतांनी देखील नामाचा महिमा एकमुखाने गायिला आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा आपल्या मनातील व्यर्थ शंकांचा त्याग करा. सर्व संशय टाकून द्या. ‘ संशयात्मा विनश्यति ‘ असे म्हणतात. तेव्हा परमेश्वराचे नाम हेच सर्व सार असल्याची जेव्हा खात्री होईल तेव्हा सगळ्या शंका टाकून देऊन निःशंक मनाने भगवंताचे नाम घ्या. कवी अशोक परांजपे आपल्या एका सुंदर गीतात म्हणतात – –
नाम आहे आदि अंती, नाम सर्व सार ।
आहे बुडत्याला नौका ठेवली जीवनी आधार ।।
या गीताच्या शेवटच्या कडव्यात ते म्हणतात – –
नाम जपो वाचा नित्य श्वासांतही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म
असे आपलेही कर्म नाममय व्हावे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – –
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जासील झणीं ॥
– – म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की प्रभात समयी भगवंताचे चिंतन करावे. म्हणजे दिवसभर त्याचे स्मरण राहते.
स्वसंवाद ::
१. निसर्गातील प्रत्येक घटक जर केवळ ‘सार’ ग्रहण करत असेल, तर मी मात्र संसारातील ‘असार’ (क्षणभंगुर) गोष्टींनाच आयुष्यभराचे सत्य मानून त्यात गुंतलो आहे का?
२. भगवंताच्या नामाबद्दल किंवा भक्तीबद्दल माझ्या मनात नकळत काही ‘वाउगा’ (व्यर्थ) संशय किंवा तर्क-वितर्क येत राहतात का?
३. सर्व संतांनी आणि श्रेष्ठ ग्रंथांनी ज्या नामाला ‘जीवनाचा आधार’ म्हटले आहे, त्या नामाचा अनुभव मी स्वतः कधी निःशंक मनाने घेऊन पाहिला आहे का?
४. माझे नित्य कर्म ‘नाममय’ व्हावे यासाठी मी रोजच्या धावपळीत किती जागृत राहतो?
– – – –
श्लोक क्र. ७६ – –
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७६।।
अर्थ :आपल्या हातून कर्म, धर्म किंवा योग यातील एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही. माणूस पूर्णपणे भोगातही रमत नाही किंवा पूर्णपणे त्यागही त्याच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीत समर्थ म्हणतात नामावर विश्वास ठेवा. पहाटेच्या वेळी श्रीरामाचे चिंतन करा.
(त्याग – विरक्ती, सांग – यथासांग/व्यवस्थितपणे)
विवेचन :प्रभाते मनी राम चिंतीत जावा या श्लोकमालिकेतील हा शेवटचा श्लोक. या दहा श्लोकांच्या गटात समर्थांनी भगवंताच्या नामाचा महिमा निरनिराळ्या प्रकारे वर्णन केला आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ या ओळीने झाला आहे. या श्लोकांनी नामस्मरणाचे आणि प्रभात समयी श्रीरामाच्या चिंतनाचे महत्व आपल्या मनावर ठसवले आहे.
आपण प्रापंचिक माणसे. जसे जमेल तसे आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मतमतांच्या गलबल्यात आपण एवढे हरवून किंवा गोंधळून जातो की हाती आलेल्या कर्माला व्यवस्थितपणे न्याय देणे आपल्याला जमत नाही. धर्मपालनाच्या बाबतीतही असेच होते. धर्मपालनासाठीच्या विविध गोष्टी, विविध मार्ग ऐकून सामान्य माणूस गोधळतो. मग हे करू की ते करू अशी त्याची अवस्था होते. योगाचा किंवा ध्यानधारणेचा अभ्यास करणे त्याला शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सामान्य माणसाची स्थिती एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे होते. लोकांची ही मानसिकता ओळखून त्यांची दिशाभूल करणारे बुवा बाबा त्यांचे उखळ मात्र पांढरे करून घेतात. समर्थांसारखे सद्गुरू लोकांना अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे अचूक कार्य करतात. लोकांना सन्मार्गाची दिशा दाखवतात.
समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस अशा गोंधळलेल्या स्थितीतच होता. तो कर्मकांडात अडकला होता. त्यामुळे ईश्वरप्राप्तीच्या खऱ्या मार्गापासून दूरच चालला होता. अशा वेळी समर्थ, संत तुकाराम आदी संतांनी लोकांना खरा धर्म काय आहे हे समजावून सांगितले. लोकांची परंपरा, अंधश्रद्धा आदींवर प्रहार करून त्यांना खरा ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. समर्थांनी नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे. त्यासाठी काही पैसा, वेगळा वेळ, शारीरिक श्रम या गोष्टी लागत नाहीत हे सांगितले.
कालमान बदलले आहे. पूर्वीप्रमाणे लोकांना योग, याग, तप करणे जमणार नाही हे ओळखून त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी लोकांच्या हाती नामस्मरणाची गुरुकिल्ली दिली. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे जेवढया चांगल्या प्रकारे शक्य होईल तसे पालन करा, आपण जे काही धार्मिक विधी करतो, त्यात काही तरी अपूर्णता राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेवटी म्हणतो, ” आवाहनं न जानामी, न जानामी तव अर्चनं… ” असे म्हणून परमेश्वराची क्षमा मागतो आणि काही अपूर्ण राहिले असेल ते पूर्ण करून घे अशी प्रार्थना करतो. म्हणूनच धर्म, योग, याग या गोष्टी पूर्णपणे जशाच्या तशा पालन करणे जमणार नाही हे समर्थ जाणतात. पण या सगळ्यात एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांचे सांगणे आहे. ती गोष्ट कोणती? तर ते म्हणतात, “म्हणे दास विश्वास नामी धरावा. ” इतर गोष्टी जशा जमतील तशा करा. पण नामावर विश्वास ठेवून नामस्मरणाचा सोपा मार्ग अवलंबा असेच त्यांचे सांगणे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, ” एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ” तेव्हा सर्व संतांचे सांगणे एकच आहे. परमेश्वराचे नाम भक्तिभावाने घ्या. जणू तो समोर उभा आहे अशी कल्पना नाम घेताना करा. तुकाराम महाराज म्हणतात, “नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी । ऐसे धरोनिया ध्यान, मनी करावे चिंतन. ” तेव्हा अशा प्रकारे प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करा.
स्वसंवाद ::
१. विविध ग्रंथांचे मतमतांतर आणि संभ्रम यात अडकून न पडता, मी समर्थांनी सांगितलेल्या ‘नामावरील विश्वासाची’ गुरुकिल्ली स्वीकारायला तयार आहे का?
२. “आवाहनं न जानामी” म्हणताना माझ्या मनात माझ्या अपूर्णतेची जाणीव आणि भगवंताप्रती संपूर्ण शरणागती असते का?
३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मुखात नाम घेताना प्रत्यक्ष ‘जगजेठी’ (परमेश्वर) माझ्या समोर उभा आहे, अशी अनुभूती घेण्याचा मी कधी प्रयत्न करतो का?
४. या १० श्लोकांच्या मालिकेतून मी नेमके काय शिकलो? उद्यापासून माझ्या मनात ‘राम चिंतनाची’ नवी पहाट होईल का?