मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अतिशय उद्विग्न मनानेच मी खोलीतून बाहेर पडले. नेहेमीच लक्ष वेधून घेणा-या बाहेरील बागेकडे आज मात्र माझे अजिबात लक्ष गेले नाही. माझे मनच मुळी था-यावर नव्हते. जन्म-मृत्यूच्या सीमारेषेवर, तळ्यात की मळ्यात हे न कळण्याच्या टप्प्यावर येऊन थबकलेली माझी आई आत खोलीत निपचित पडली होती. एरवी खुट्ट झाले तरी जागी होणारी आई, आज व्हेंटिलेटरच्या धकधक आवाजातही अगदी शांत झोपली होती. आणि हे पाहून माझ्या मनाला एक अनामिक हुरहूर लागली होती. चालू असलेला कृत्रिम श्वासोच्छवास सोडला तर तिची इतर गात्रे अगदी म्लान, जीवच उरला नसल्यासारखी होऊन गेली होती. आणि ते पाहून आम्ही सर्वजण हरवल्यासारखे, हतबल होऊन, एकमेकांकडे पहात बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो. अगदी काही क्षणांसाठी व्हेंटिलेटर काढला तरी श्वासासाठी होणारी आईची असह्य तडफड आम्हाला अत्यंत बेचैन करत होती. आणि कालपासून दोन-तीन वेळा हा प्रयोग झाल्यावर मग डॉक्टरांनीच आमच्यासमोर तो मन हेलावून टाकणारा विचार मांडला होता. व्हेंटिलेटर काढून टाकून,आईचा शेवटचा नैसर्गिक श्वास कोणता असेल ते पहात बसण्याचा….  तिच्या मरणाची वाट पहात बसण्यासारखेच होते हे.

याच विचाराने उद्विग्न होऊन मी खोलीबाहेर आले होते. जरा वेळाने नकळतच या उद्विग्नतेची जागा विचारांनी घेतली. आईची दिवसेंदिवस खालावणारी प्रकृती, त्यावर अगदी प्रामाणिकपणे केले जाणारे पण अजिबात उपयोगी पडत नसलेले अद्ययावत, दीर्घ उपचार, एकामागोमाग एक शिथिल होत गेलेले जवळजवळ सगळेच अवयव, आणि आता हा शेवटचा उपचार – कृत्रिम श्वासोच्छवास. हा सगळा प्रवास अशा शेवटच्या पायरीवर येऊन एखाद्या कोड्यासारखा थांबला होता. ते कोडे सोडविणा-या एका चुटकीचीच जणू वाट पहात, आणि ही चुटकी वाजवण्याचे अत्यंत क्लेशदायी, मनात अपराधीपणाची भावना कायमसाठी रुजवू शकणारे काम डॉक्टरांनी अगदी निर्विकारपणे आमच्यावर सोपवले होते. काय निर्णय घेणार होतो आम्ही? आपल्या जन्मदात्या आईचे आयुष्य जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा असा क्रूर निर्णय घेऊ शकणार होतो का आम्ही? काहीच सुचत नव्हते.

विचार करता करता नाण्याची दुसरी बाजू लख्ख दिसायला लागली. इतर सर्व अवयव निकामी झाले तरी श्वास चालू असेपर्यंत आईचे अंतर्मन नक्कीच जागे असणार. मग अतिशय कष्टाने, स्वावलंबनाने आणि उमेदीने घडवलेले, सजवलेले आपले मनस्वी आयुष्य, असे विकलांगी, परावलंबी, जाणीव-नेणिवेवर हिंदकाळतांना पाहून तिच्या स्वाभिमानी मनाला किती अतोनात यातना होत असतील, या विचाराने मी एकदम अस्वस्थ झाले आणि जराशी सावरून बसले. तिच्या शारिरीक यातना अगदी तज्ञ डॉक्टरही दूर करू शकत नाहीत हे जरी खरे असले, तरी तिच्या मनाला होणा-या असह्य यातना तर आम्हीच थांबवू शकलो असतो ना… व्हेंटिलेटर काढून टाकून? हा विचार मनात आला आणि मी केवढ्यांदा तरी दचकले. 

…. पण मग वीस दिवसांपूर्वी, जेव्हा ती थोडे बोलू शकत होती, तेव्हाचे तिचे काकुळतीचे बोलणे आठवले. अगदी सहन करण्यापलिकडच्या त्या वेदनांमधून आम्ही तिला सोडवावे, असे ती अगदी आपणहून, मनापासून सारखं सांगत होती. ‘ आजपर्यंत तिने कधीच कोणाकडे काही मागितलेले नाही. तर आता तिचे हे पहिले आणि शेवटचेच मागणे आम्ही मान्य करावे. गांगरून न जाता नीट चौफेर विचार करावा व नाही म्हणू नये. दुखण्याच्या मरणयातनांपेक्षा प्रत्यक्ष मरणंच सुसह्य आहे तेव्हा आता आम्ही तिला जाणिवपूर्वक मरू द्यावं.’… असे आमच्यापैकी प्रत्येकाला ती सांगत होती. तेव्हा ऐकायलाही नकोशा वाटणा-या या बोलण्यावर, आता मात्र विचार करावा असे वाटू लागले. आज तिच्या स्पर्शातूनही तिची ही मरणेच्छा माझ्या मनाला स्पर्शून जात होती. माझ्याही नकळत मी मनाशी काही निश्चय केला आणि मन घट्ट करून सर्वांसमोर अशा इच्छामरणाचा विषय काढण्याचे ठरविले.

‘आईला या यातनांमधून सोडव देवा ’ या प्रार्थनेचा ‘ तिला आता मरण दे ’ असा थेट अर्थ लावायला साहजिकच सगळे घाबरत होते, पण हळूहळू सगळेच बोलते झाले. इच्छामरण काही अटींवर मान्य करावे, इथपासून ते इच्छामरणास अजिबात मान्यता नको, या टोकापर्यंत मतं मांडता मांडता, आपण आपल्या आईबद्दल बोलतो आहोत हा विचारही जरा वेळ नकळतच बाजूला झाला.

एका भावाचे असे म्हणणे होते की …  ‘‘इच्छामरण’ ही संकल्पना मरणासन्न, जराजर्जर माणसाच्या संदर्भात खरोखरच विचार करण्यासारखी आहे. ज्यांची अवस्था ‘ मरण येईना म्हणून जिते हे, जगण्याला ना अर्थ दुजा ’ अशी आहे, त्यांना त्यांच्या मरणप्राय यातनांसह जबरदस्तीने जगवत ठेवणे हे खरे तर विचार करण्याजोगे पाप आहे. वाट्टेल तितके प्रयत्न करूनही हा माणूस त्याच्या दुखण्यातून पूर्ववत् बरा होऊ शकत नाही, इतकेच नव्हे तर कमीतकमी स्वावलंबनही यापुढे शक्य नाही, याची डॉक्टर वारंवार खात्रीपूर्वक सूचना देत असतील आणि ती व्यक्तीही स्वत:ला या यातनांतून सोडवावे अशी अगदी मनापासून, कळकळीची विनंती करत असेल, तर अशावेळी आणखी काही तज्ञ डॉक्टरांचे त्याच्या तब्येतीविषयी, बरे होण्याच्या शक्यतेविषयी मत घेऊन, त्यानुसार त्या आजारी व्यक्तीच्या विनंतीला त्याच्या नातलगांनी, स्वत:च्या मनाविरुध्द पण त्रयस्थ प्रामाणिकपणे विचार करायला खरोखरच काही हरकत नाही. काही धर्मांमध्ये वयोवृद्ध पण अगदी धडधाकट माणसेसुध्दा, संथारा व्रतासारख्या व्रताद्वारा अगदी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, संयमाने व शांतपणे, अधिकृतपणे आपले आयुष्य धर्मसंमत मार्गाने संपवू शकतात.’ 

‘ स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या अतिशय निधड्या छातीच्या ध्येयवेड्या माणसानेही … ‘ प्रायोपवेशन ‘ करून स्वतःहून आपले आयुष्य संपवले होते– नाही  का ? आत्ता खरं तर मला संत ज्ञानेश्वर आणि इतर काही संतही आठवताहेत, ज्यांनी आपले जीवनकार्य संपले हे जाणून जिवंत समाधी घेण्याचा मार्ग स्वीकारला होता, आणि अतिशय शांत आणि स्थिर मनाने ते हा इहलोक सोडून गेले होते. अर्थात हे सगळे संत आपल्यापेक्षा, आपल्याला विचारही करता येणार नाही आणि अजिबात गाठताच येणार नाही अशा फारच उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेले होते हे मान्यच करायला हवे. ‘देहाबद्दल वाटणाऱ्या अहंकाराशी लढून, त्याचा पूर्ण नि:पात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप झाला आहे, त्याला मिळणारी एक फार महान पदवी म्हणजे संतत्व‘ असे म्हटले जाते.  असामान्य आणि ईश्वरासदृश असणाऱ्या अशा दुर्मिळ आणि अपवादात्मक देवमाणसांशी आपल्यासारख्या सामान्य माणसांनी मनातल्या मनातही तुलना करणे हे खरं तर पापच आहे. तेव्हा या इच्छामरणाच्या संदर्भात त्यांचा विचारही आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात येणे अतिशय चुकीचे आहे. आत्ता इथे, आपल्या या अशा समस्येसंदर्भात त्यांची आठवण यावी हेही खरोखरच पाप आहे. फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई …. ‘ 

क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निसर्गरुपे : दुपार… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ निसर्गरुपे : दुपार…  ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

निसर्गाची विविध रूपे मला भावतात. सगळीच रूपे तशी मनोहर असतात. अर्थात तशी दृष्टी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला दुपार सुद्धा आवडेल. पौर्णिमेची रात्र तर सर्वांना आवडतेच पण निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना अमावास्येची रात्र सुद्धा तेवढीच आवडते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाश प्रकाशमान करतो. समुद्राला भरती येते. रुपेरी चंद्रप्रकाश अवघे विश्व व्यापून टाकतो. कवी, लेखकांच्या प्रतिभेला बहर येतो. पण अमावास्येची रात्रही तेवढीच सुंदर असते. त्यावेळी आकाश म्हणजे जणू चंद्रकळा ल्यालेली एखादी घरंदाज गृहिणी वाटते. चांदण्याची नक्षी तिच्या साडीला जडवलेली असते. हा जरीपट खूप शोभून दिसतो. 

खरा निसर्गप्रेमी कोकिळेवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम कावळ्यावर आणि घुबडावर सुद्धा करतो. अशीच निसर्गाच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुपार हे निसर्गाचेच रूप आहे हे समजून त्याचा आनंद घेते. गुलाब, जाईजुई, मोगरा ही फुले मला आवडतातच पण सदाफुली आणि गवतफुलासारखी फुलंसुद्धा मन मोहून घेतात. तेही निसर्गाचेच सुंदर अविष्कार आहेत. 

बहुतेक सगळ्या कवी, लेखकांनी पहाटेच्या वेळेचं रम्य वर्णन केलं आहे. संध्याकाळ आणि रात्रीचंही केलं आहे. पण दुपारचं वर्णन फारसं कोणी केल्याचं वाचनात आलं नाही. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या प्रसंगांचं वर्णन करणारी शेकडो गाणी आहेत पण दुपारच्या वेळेवर लिहिलेली गाणी मला कुठे आढळली नाहीत. या अर्थानं दुपार  म्हणजे ‘ अनसंग हिरोईन ऑफ द डे ‘ असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही मला एखाद्या वेळी विचारलं की पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या दिवसांच्या वेळांना तुम्ही स्त्रियांचीच उपमा का देता आहात ?तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण आपल्या मराठीत आपण हे शब्द स्त्रीलिंगीच वापरतो ना ! ती रम्य पहाट, ती प्रसन्न हसरी सकाळ, ती दुपार, संध्याकाळ, रात्र वगैरे. ‘ ती ‘ ऐवजी एखादा पुल्लिंगी शब्द वापरून पहा बरं. तो पहाट, तो सकाळ,तो रात्र वगैरे…  सगळी मजा गेली ना ! 

कधी कधी फोनवर बोलणारी ती बाई अशा शब्दांची फार गल्लत करते, त्या वेळी असं वाटतं की ही समोर असती तर काही तरी सांगता आलं असतं. आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि त्या व्यक्तीनं फोन उचलला नाही तर बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं. ‘ ज्या व्यक्तीला आपण फोन केला आहे, तो व्यक्ती आपला फोन उचलत नाही किंवा उत्तर देत नाही. आता ‘ व्यक्ती ‘ हा शब्द सुद्धा स्त्री लिंगीच वापरला जातो. मग ‘ तो ‘ व्यक्ती कशाला ? पण जाऊ द्या विषय दुसरीकडेच चालला. आपल्या मूळ विषयाकडे येऊ या. 

तर पहाटेचा आणि सकाळचा उल्लेख आधीच्या लेखात आपण पहाट म्हणजे अल्लड तरुणी आणि त्यानंतरची सकाळची वेळ म्हणजे वेणीफणी, गंधपावडर करून आलेली सुस्नात तरुणी असा केला. त्यानंतर जेव्हा सकाळचे अकरा वाजण्याचा सुमार होतो, तेव्हा दुपारचे वेध लागू लागतात. आता सकाळच्या या तरुणीचे रूपांतर तीस चाळीस वर्षांच्या गृहिणीत झालेलं असतं. तिला घरच्यांची काळजी असते. सकाळपासून आपापल्या कामात मग्न असलेल्या आपल्या पतीला, मुलाबाळांना भूक लागली असेल, याची जाणीव होऊन ती स्वयंपाकाला लागलेली असते. दुपारी साडेबारा एकच्या सुमारास ती त्या सगळ्यांना मोठया प्रेमाने बोलावते आणि जेवू घालते. 

इथे दुपार येते ती आईचे रूप घेऊन. आई जशी आपल्या मुलांची काळजी करते,त्यांना वेळच्या वेळी खाऊपिऊ घालते, तशीच दुपार दमलेल्या, थकलेल्याना चार घास भरवते. आणि चार घास खाल्ल्यावर म्हणते, ‘ अरे लगेच नको लागूस कामाला. जरा अंमळ विश्रांती घे ना. ‘ त्या दुपारच्या कुशीत काही क्षण माणसे विश्रांती घेतात, ताजीतवानी होतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. गाई, गुरं सुद्धा एखाद्या झाडाखाली विश्रांती घेताना दिसतात. 

सकाळ आणि संध्याकाळ यांच्या मधली वेळ म्हणजे दुपार. शेतकरी, कष्टकरी, मजूर हे सगळे सकाळपासूनच कामाला जुंपलेले असतात. दुपारी ते एखाद्या झाडाच्या सावलीत बसतात. आपल्या सोबत जी काही चटणी भाकरी आणली असेल ती खातात, दोन घोट पाणी पितात. आपल्या बरोबरच्या व्यक्तींशी गप्पा, हास्यविनोद करतात आणि ती ऊर्जा सोबत घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. या अर्थानं दुपारी ही एक प्रकारची ‘ होरेगल्लू ‘ आहे. ती मनावरचा ताण कमी करते.

जसा ऋतू असेल किंवा जसं हवामान असेल, तशी दुपारची रूपं वेगवेगळी असतात. ग्रीष्मातली दुपार अंगाची लाही लाही करते. कधी कधी तर वाराही बंद असतो. डोंगरावरील, जंगलातील झाडं एखाद्या चित्रासारखी स्तब्ध असतात. अशा वेळी दुपार तुम्हाला सांगते, ‘ बाबारे, बस थोडा. अंमळ विश्रांती घे. उन्हात विनाकारण फिरू नकोस. ‘ ती जणू सांगत असते, ‘ जरा विसावू या वळणावर…’  दुपार आहे म्हणून तर थोड्या वेळाने तुला हवीहवीशी वाटणारी सांज येईल, रात्र येईल आणि पहाटही उगवेल. थोडा धीर धर. 

वसंतातली दुपार त्या मानाने जरा प्रसन्न असते. वसंत हा तर कवी, लेखकांचा आवडता ऋतू. मुबलक फळे, फुले उपलब्ध असतात. झाडांना नवी पालवी फुटलेली असते. दसरा दिवाळीला आपण जसे नवीन कपडे परिधान करतो, तशी वसंत ऋतूत निसर्गाचीही दिवाळी असते. जुनी पालवी टाकून देऊन झाडं नवीन पालवी धारण करतात. गुलाबी, पोपटी, हिरवी अशी विविध रंगछटा असलेली पानं दृष्टीस पडतात. या ऋतूत झाडांना मोहर आलेला असतो. त्याचा मंद दरवळ सगळीकडे पसरलेला असतो. या ऋतूत निसर्ग भरभरून रूप, रस आणि गंध प्रदान करतो. अशा ऋतूतली दुपारही छान वाटते. ऊन असतेच पण शीतल वाऱ्याच्या लहरी अंगावर जणू मोरपीस फिरवतात. उन्हाची तलखी कमी करतात.

वर्षा ऋतूतली दुपार बऱ्याच वेळा ढगांच्या छायेनं आच्छादलेली असते. अशा वेळी उन्हाचा तडाखा जाणवत नाही. वर्षा ऋतूत सकाळी आणि संध्याकाळी बऱ्याच वेळा हमखास पाऊस असतोच. पण दुपारही कधी कधी पाऊस घेऊन येते. पावसात भिजलेलं तिचं हे रूप आल्हादकारक वाटतं. दुपारी कधी कधी सोसाट्याचा वारा सुटतो. ‘ नभ मेघांनी आक्रमिले ‘ असेल तर अशा वेळी ऊन सावलीचा आणि ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असतो. निसर्गाच्या कॅनव्हासवरचं चित्र सारखं बदलत असतं. अशा वेळी तुमच्यात दडलेला रसिक, कलाकार या निसर्गचित्राला दाद देतो. 

अशी ही दुपारची विविध रूपं. तऱ्हेतऱ्हेची आणि मजेमजेची. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीसारखीच मनमोहक रूपे. तिलाही भेटू या. तिचंही स्वागत करत राहू या. तिला म्हणू या… 

‘ हे दुपार सुंदरी, तू अवश्य ये 

येताना तू नेहमीच चारदोन निवांत क्षण घेऊन येतेस. 

दिवसाच्या धामधुमीत तू आम्हाला चार घास प्रेमाने भरवतेस. 

विश्रांती देऊन ताजेतवाने करतेस. 

तू ये. तू अवश्य ये. तुझं स्वागत आहे. ‘

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निसर्गरुपे : पहाट… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ निसर्गरुपे : पहाट…  ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

निसर्गाची सगळीच रूपे मला भावतात. पहाट, सकाळ, दुपार आणि दुपारच्या आधीची आणि नंतरची वेळा, संध्याकाळची विविध रूपे आणि नंतर येणारी रात्र. ऋतू कोणताही असो, त्यातील विविध प्रहरांची ही विविध रूपे मला सारखीच आकर्षित करतात. प्रत्येकच प्रहर काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणीतरी एखादं छानसं गिफ्ट आकर्षक रूपात गुंडाळलेलं घेऊन यावं, ते उघडून पाहिल्याशिवाय त्यात काय आहे ही उत्सुकता जशी शमत नाही, तशाच या वेळा अनुभवल्याशिवाय त्या आपल्यासाठी काय घेऊन येतात हे नाही कळायचं. अशाच या निसर्गवेळा मला जशा भावल्या, तशा तुमच्यासमोर ठेवणार आहे. शब्दांचाच रूपाने त्यातील रूप, रस आणि गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 

‘प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती… ‘ ही सुंदर भूपाळी आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची असेल. रमेश अणावकर यांचे सुंदर शब्द आशा भोसलेंनी अमर केले आहेत. या गीतात ‘ पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत ‘ असे शब्द आहेत. मला वाटतं ही प्रभात वेळा जशी पानोपानी अमृत शिंपीत येते, तसेच अमृत आशाताईंच्या स्वरातून जणू आपल्यावर शिंपडले जाते. मरगळलेल्या मनाला हे अमृतस्वर संजीवनी देऊन ताजेतवाने करतात. या भूपाळीमध्ये अप्रतिम असे निसर्गाचे वर्णन आले आहे. 

सकाळी आपण जशी परमेश्वराची पूजा करतो, तशीच पूजा निसर्गही पहाटेच्या रूपाने त्या परमात्म्याची बांधत असतो. त्याच्या पूजेसाठी विविध रंगांची, गंधांची फुले निसर्ग तयार ठेवतो. नदीचं, झऱ्याचं खळाळणारं संगीत असतं, वाऱ्याची बासरी आसमंतात लहरत असते, पक्ष्यांचं कूजन म्हणजे जणू मंत्रघोष ! अशी सगळी स्वागताला तयार असतात. त्यातच पूर्वेचं आकाश स्वागतासाठी गुलाबी वस्त्र परिधान करून तयार असतं. अशाच वेळी सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन या निर्गुण निराकाराच्या आरतीला जणू प्रकाशाची निरांजन घेऊन हजर होतात. पाहता पाहता या निरांजनाच्या ज्योती अधिकाधिक प्रकाशमान होऊन अवघे विश्व उजळून टाकतात. पूर्वेचा गुलाबी रंग आता सोनेरी रंगात बदलतो. रात्रभर प्रकाशाच्या प्रतीक्षेत असलेली झाडं, वृक्षवेली आपले हात पसरून या प्रकाशाचं स्वागत करतात. अशा वेळी भा रा तांब्यांच्या कवितेतील ओळी सहजच ओठांवर येतात. ‘ पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर…’ या कवितेतलं वर्णन कवीनं जरी सायंकाळचं केलेलं असलं तरी सकाळच्या वेळेलाही ते चपखल लागू पडतच. ‘ फिटे अंधाराचे जाळे…’ या गीतात म्हटल्याप्रमाणे अंधाराचे जाळे नाहीसे होऊन स्वच्छ दिवस उजाडलेला असतो. अशा वेळी परमेश्वर म्हणा की निसर्ग म्हणा मानवाला, पशुपक्ष्याना आणि अवघ्या सृष्टीला जणू म्हणतो, ‘ बघ, तुझ्यासाठी एक अख्खा सुंदर दिवस घेऊन आलो आहे. आता त्याचा कसा वापर करायचा ते तू ठरव. ‘

पहाटेच्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भासतात. पण मला सगळ्यात जास्त आवडते ती जंगलातील पहाट. या पहाटेसारखी सुंदर वेळच नाही. रात्र संपून दिवस उगवण्याच्या सीमारेषेवर ही पहाट उभी असते. अशा वेळी निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं. रात्र संपून पहाट होतानाची वेळ इतकी सुंदर असते की अशा वेळी शहरातले भगभगीत दिवे नकोसे वाटतात. पहाटेला तिच्या नैसर्गिक रूपातच पाहावं, फुलू द्यावं, खुलू द्यावं. आकाशातल्या रात्रीच्या मुक्कामाला असणाऱ्या तारे आणि तारका आपल्या घरी हळूहळू परत जायला निघालेल्या असतात. हळूहळू त्या दृष्टीआड होतात. त्यांना अदृश्य होताना आणि पहाटवेळा उमलताना पाहण्यात एक वेगळाच अनोखा आनंद आहे. तो अनुभवावा. 

पहाट मला एखाद्या अल्लड तरुणीसारखी भासते. कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ती आपल्या नैसर्गिक रूपातच येते. तिचं हे नैसर्गिक रूपच मनाला जास्त भावतं. जातीच्या सुंदराला जसं सगळंच शोभून दिसतं, तशीच ही पहाट असते. रम्य, देखणी. अशा वेळी जंगलातून एखादा फेरफटका मारावा. निसर्गाची भूपाळी अनुभवावी. रंग, रूप, रस, गंध सगळं सगळं असतं त्यात. फक्त ती अनुभवता आली पाहिजे. निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपल्याशी बोलत असतो पण ते ऐकता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही साधना आवश्यक असते. सगळ्या कवींना, महाकवींना, लेखकांना या पहाटेनं स्फूर्ती दिली आहे. अनेक सुंदर काव्य पहाटेच्या मंगल वेळेनं प्रसवली आहेत. अनेक ऋषी मुनी, लेखक, कवी यांना प्रतिभेचं देणं या पहाटेनच दिलं आहे. 

आपल्या घराजवळ एखादा डोंगर किंवा एखादी टेकडी असेल तर पहाटे जरूर जावं. नसेल तर कधीतरी मुद्दाम वेळ काढून अशा ठिकाणी जावं. ही पहाट अनुभवावी. ही पहाट अनुभवण्यासाठी सध्या तरी कोणतंच शुल्क आकारलं जात नाही. काही चांगल्या गोष्टी अजूनही मोफत मिळतात. त्यातील पहाट, पहाटेचा गार वारा, नयनरम्य निसर्ग आपल्याकडून काही घेत नाही. देतो मात्र भरभरून ! ‘ आपल्याला ते घेता आलं पाहिजे. नाहीतर ‘ देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था व्हायची ! ‘ 

या पहाटेच्या प्रसंगी रानवाटा जाग्या होऊ लागतात. झाडे, वेली जाग्या होतात. आपण जंगलातून तर फेरफटका मारणार असू तर झाडांचा एक अनोखा गंध आपलं स्वागत करतो. अशा वेळी खोल श्वास घेऊन हा गंध, ही शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यावी. पक्ष्यांचे निरनिराळे आवाज कानावर पडत असतात. त्यांच्यातली विविधता, माधुर्य अनुभवावे. पूर्वेकडून होणाऱ्या सुवर्णप्रकाशाची उधळण अनुभवावी. तो प्रकाश अंगावर माखून घ्यावा. तळ्यात फुलणारी कमळे,उमलणारी फुले आकर्षक स्वरूपात आपल्यासमोर जणू हजर होतात. त्यांचं निरीक्षण करावं. त्यांचं रूप नेत्रांनी प्राशन करावं, श्वासावाटे गंध मनात साठवावा. पाण्यावर सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरलेला असतो. तो दिवसभरात नंतर पुन्हा दिसत नाही. नदीचा, झऱ्याचा खळखळाट ऐकू येतो. आपण समुद्रकिनारी असू तर, समुद्राची गाज ऐकू येते. त्याच्या लाटांचे तुषार आपल्या अंगावर येऊन जणू आपल्याला पवित्र करत असतात. तुम्ही पहाटेला कुठेही असा. नदीकिनारी,समुद्रावर,डोंगरावर किंवा जंगलात. पहाट आणि तिचं मोहक रूप तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणारच नाही. ही पहाटवेळा तुम्हाला दिवसभराची ऊर्जा प्रदान करेल. 

पहाटेनंतरची वेळ म्हणजे सकाळ. आता दशदिशा उजळलेल्या असतात. साऱ्या सृष्टीत चैतन्य भरून राहिलेलं असतं. माणसाचा, पशु पक्ष्यांचा दिवस सुरु होतो. जो तो आपापल्या कामाला लागलेला असतो. अवघ्या सृष्टीत लगबग सुरु असते. मंदिरातली आरती, धूप दीप आदी सारे सोपस्कार होऊन मंदिरातील मूर्ती प्रसन्न वाटतात. बच्चे कंपनी तयार होऊन शाळेला निघण्याची गडबड असते. गृहिणीची घरातली आणि कामावर जाणाऱ्यांची  वेगळी धांदल सुरु असते. सकाळचे हे रूप वेगळेच असते. पहाट कोणताही मेकअप न करता नैसर्गिक रूपात आपल्यासमोर येते तर नंतर येणारी सकाळ मात्र छानपैकी सुस्नात आणि वेणीफणी करून आलेल्या तरुणीसारखी प्रसन्न भासते. ती जणू आपल्याला सांगते, ‘ चला, आता आपल्या कामांना सुरुवात करू या. दिवस सुरु झालाय. ‘ मग प्रभात समयीचे हे सूर हे हळूहळू मंद होत जातात. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आई आणि तिचा श्याम …” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “आई आणि तिचा श्याम …” ☆ श्री संभाजी बबन गायके 

पक्ष्यांची, प्राण्यांची पिलं मोठी झाली की घरटं सोडतात आणि त्यांच्या जन्मदात्यांनाही ! पण मानवप्राण्याची पिलं जन्मत:च परावलंबी. त्यांना जन्मानंतर कित्येक वर्षे सांभाळावं लागतं,भरवावं लागतं तेंव्हा कुठं ती चालू लागतात. सुरूवातीची कित्येक वर्षे आयता चारा खात राहतात आणि कित्येक वर्षांनी स्वत:चा चारा स्वत: कमावू लागतात. पक्षी-प्राण्यांची आयुर्मर्यादा मानवापेक्षा बरीच कमी असते, पण मानव अनेक वर्षे जगतो आणि मुख्य म्हणजे जरजर्जर होतो. त्याला आयुष्याच्या सायंकाळी पुन्हा बालपण प्राप्त होतं. आणि या बालकांना पुन्हा आई-बाप हवे असतात! यासाठी मनुष्य मुलांनाच आपले उतारवयातील आईबाप म्हणून घडवत राहतो…..हरप्रकारची दिव्यं पार पाडून. म्हातारपणी चालताना जाणारा तोल सांभाळता यावा म्हणून माणूस आपल्या मुलांच्या रूपात काठीची योजना करून ठेवतो. त्यापेक्षा अंतसमयी मुखात गंगाजलाचे दोन थेंब तरी पडावेत यासाठी देवाकडे अपत्यांची याचना करीत असतात. ज्यांच्या पदरात ही फळं पडत नाहीत त्यांचे पदर सदोदित पेटते राहतात. निदान आपल्याकडे तरी असंच आहे आणि बहुदा भविष्यातही असेल !

मुलांना जन्माला घालून त्यांचे संगोपन, ती आपलेही आपल्या वृद्धापकाळी असेच संगोपन करतील या भावनेने करणे हा विचार वरवर जरी एक व्यवहार वाटत असला तरी या व्यवहाराला किमान आपल्याकडे तरी काळीजकिनार असते. काळीज आणि काळजी हे दोन शब्द उगाच सारखे वाटत नाहीत ! पोटाला चिमटा काढणे, खस्ता खाणे, काळीज तिळतीळ तुटणे, हे वाक्प्रचार मराठीत निव्वळ योगायोगाने नाहीत आलेले. अनेक काळजं अशी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निखा-यांवर चालत आलेली आहेत. पण सर्वच काळजांना त्यांच्या उतारवयात पायांखाली वात्सल्याची, कृतज्ञतेची फुलवाट गवसत नाही, हे ही खरेच ! 

पुरूष असूनही आपल्या आईचं काळीज आपल्या उरात बाळगून असलेले साने गुरूजी म्हणजे मातृ-पुत्र प्रेमाचा जिवंत निर्झर ! शाम आणि आई ही दोन नाती किमान मराठी मानसात साने गुरूजींमुळेच चिरस्थापित झालीत. शाम या नावापासून ‘शामळू’ असं शेलकं विशेषण जन्माला आलं असलं तरी या शाममुळे कित्येक मातांच्या पुत्रांना जन्मदातापूजनाचं पुण्य प्राप्त करण्याची सदबुद्धी झाली, हे कसं नाकारता येईल? 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो एकदा परदेश भेटीत असताना एका कुटुंबात मुक्कामी राहिले होते. मध्यरात्री त्यांना बालकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. त्या बालकाचे पालक आता त्या आवाजाने जागे होतील आणि त्याला शांत करतील ही त्यांची कल्पना होती. पण पंधरा मिनिटे उलटून गेली तरी काहीच हालचाल नाही असं पाहून त्यांनी त्या बाळाच्या खोलीत जाऊन त्या एकट्या झोपलेल्या बालकाला उचलून घेतलं, छातीशी धरलं….आणि मग ते बाल्य निद्रेच्या कुशीत शिरून शांत झालं ! सकाळी त्या बालकाच्या आईबापाशी संवादात असं समजलं की, त्यांच्याकडे पोरांनी स्वत:च रडायचं आणि स्वत:च आपली समजूत काढून झोपी जायचं ! या वृत्तीचे परिणाम विलायतेतील समाज भोगतो आहेच. आपल्याकडेही असे विलायती कमी नाहीत. आपल्या मुलांना “ श्यामची आई “ ही  साने गुरुजींची कथा सांगणे आजही अगत्याचे वाटते ते यासाठीच…कारण आजही हा विषय कालसुसंगत आहेच. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “योगा म्हणजे काय ?…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “योगा म्हणजे काय …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

नुकताच योगा डे होऊन गेला म्हणे ?

पण खरंच योगा म्हणजे काय ?

थांब जरा मनाच्या गहनतळात शोधून बघतो.

योग: कर्मसु कौशलम्. 

योग म्हणजे कृतीमधलं कौशल्य. कोणत्याही कृतीमध्ये कौशल्य प्राप्त करून घेणं  म्हणजे योग. असं म्हणतात. 

म्हणजे पहिल्यांदा आपल्याला उच्चार कौशल्य जाणून घ्यायचं असेल तर योग्य उच्चार करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच – योगा नव्हे योग.– परदेशी लोकांना शुद्ध उच्चार करता येत नाहीत म्हणून ते योग ला योगा म्हणतात तसे ते लोक सुद्धा त्यांच्या भाषेतील आपल्या उच्चारांना हसत असतीलच ना !   पण आपण तरी योगा न म्हणतात योग म्हणूया. 

तर मी म्हणत होतो – “ योग: कर्मसु कौशलम्. “

– म्हणजे कामामध्ये कौशल्य प्राप्त करून घेणे. तसे योगाचे अनेक प्रकार आहेत म्हणे.  पण विवेकानंदानी सांगितलेले राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग. हे चार प्रकार. आपण त्यातल्या कर्मयोगाचे पालन मुख्यतः करत असतो म्हणून पहिल्यांदा कर्मयोगाबद्दल मनात काही सापडते का बघूया. 

कर्मयोग म्हणजे ज्या गोष्टी व्यवहारासाठी आवश्यक, जगण्यासाठी आवश्यक आणि ज्या कराव्याच लागतात त्यांना आपण कर्मयोग म्हणूया. आपल्या प्रत्येक कृतीत कौशल्यपूर्ण पूर्णता आणणे यासाठी सतत प्रयत्नशील राहणे म्हणजे योगाभ्यास योग म्हणजे कौशल्यपूर्णता. आधुनिक भाषेत ‘टी क्यू एम’= टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. कॉर्पोरेट जगतात लाखो रुपये घेऊन शिकवतात ते बहुधा हेच असावे. ते शिकवताना कायझन,टी पी एम, हाउसकीपिंग वगैरे बरंच काही शिकवलं जातं.  हाउसकीपिंगचा जरी विचार केला तरी घरात वस्तू जिथल्या तिथं असणं, स्वच्छता आणि व्यवस्थितपणा हेच तर शिकवतात. त्याला 5S असंही म्हणतात.

एका ठिकाणी एक छान बोर्ड पाहिला— 

‘ कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणं म्हणजेच शिस्त ‘ ..   हे वाक्य तयार करणाऱ्याचं फार कौतुक करावं वाटतं.  यात हाउसकीपिंग, टीपीएम, कायझन, क्वालिटी मॅनेजमेंट सगळ्याचं सार या एका वाक्यात त्याने गुंफलं होतं.  वाक्य कुणाचं माहीत नाही, पण एका कंपनीत तो बोर्ड पाहिला.  हेच ते ‘कर्मसु कौशलम्’. मग ते कंपनीत असो, ऑफिसमध्ये असो, दुकानात किंवा घरात असो, शाळा-कॉलेजमध्ये असो— सगळीकडे हेच तत्व लागू पडतं.

चला तर मग आजपासून निदान एवढं तरी व्यवहारात, अमलात आणायचा प्रयत्न करूया. आपल्या घरात ऑफिसमध्ये, कंपनीत, सगळीकडे बोर्ड लावूया. पण प्रथम आपल्या मनात बोर्ड लावूया —- 

” कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणे म्हणजे शिस्त ! “

आज मनाच्या गहन तळात एवढंच सापडलं. बघू पुन्हा काय सापडतंय….  पुन्हा एखादी खोल बुडी मारू तेंव्हा उद्या परवा…..

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टेक ऑफ…” – लेखक : श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “टेक ऑफ…” – लेखक : श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

हा टेक ऑफचा क्षण लांबून बघताना मला तरी आतून कुठून तरी भारावून जायला होतं… माझ्या नकळत ‘माझा भारत देश’ हा अभिमान उचंबळून येतो… आतून भरुन येतं… डोळे ओले होतात…

माझं जर हे असं होत असेल तर या प्रोजेक्ट मधे गेली तीन चार वर्षे अव्याहतपणे झोकून देऊन काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना, अभियंत्यांना काय होत असेल… 

एका बाजूला १४५ कोटी लोकांकडून अपेक्षांचं ओझं… दुसरीकडे अतिशय क्लिष्ट आणि वेगवेगळ्या विषयांवरचे इंजिनियरिंग … इंजिनियरिंग स्ट्रीम्सचं इंटरलिंकींग… विविध तऱ्हेच्या मानसिकतेंचं सिन्क्रोनायझेशन… एकमेकांशी इंटरफेसिंग… स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या, घरगुती जबाबदाऱ्या… वेळोवेळी येणारे अप-डाऊन्स, प्रॉब्लेम्स, प्रेशर्स…  वगैरे वगैरे… सांभाळणं आणि जमवून घेणं ! 

आणि हे सगळं सांभाळून अखेरीस हा निरोपाचा… टेक ऑफचा क्षण येतो…

लॉन्चिंग पॅड तयारच असतं… सगळं सेटिंग झालेलं असतं… काऊंट डाऊन सुरु होतं… फ्यूएलिंग होतं… कंट्रोल रुममध्ये एक अनामिक शांतता असते… फक्त रिपोर्टिंगचे आवाज ऐकू येत असतात… ‘सिस्टीम इनिशिएटेड’…. ‘सिस्टीम ॲक्टिव्हेटेड’… ‘ऑल चेक्स नॉर्मल’… तरीही सर्वांचे चेहरे दडपणाखाली असतात… आपापल्या पद्धतीने प्रार्थना सुरु असतात… काऊंट डाऊन संपत आलेला असतो… आणि झिरो होतो… 

इग्निशन ॲक्टिव्हेट होतं… अग्निचे लोळ उसळतात… आणि सगळे बंध तडातड तोडून ते निमिषार्धात आकाशात झेपावतं…. सरसर वेगानं पुढं पुढं झेपावत… पहिली स्टेज ओलांडत दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्यात जातं… क्रायोजेनिक इंजिन सुरु होतं आणि मग ते ठरवून दिलेल्या ट्रॅजेक्टरीत स्थापित होत होत ठिपका ठिपका होत दिसेनासं होतं आणि मग इकडं कंट्रोल रुममध्ये उरतं फक्त समोरच्या स्क्रीनवर एक ट्रॅजेक्टरी आणि त्यातून पुढे पुढे सरकणारा एक इवलासा ठिपका… हे एवढंच काय ते त्याचं अस्तित्व… 

सगळ्यांचे चेहरे हलके होतात… थोडं थोडं हसू तिथं उमलायला लागतं… एकमेकांचं अभिनंदन केलं जातं…

एवढं आपण केलेलं आज लाखो किलोमीटर लांब निघालेय… लांबचा पल्ला आहे… ते तिथं लांब आणि आपण इथं बसून त्यावर नियंत्रण ठेवायचं… कसं जमत असेल ना हे सगळं ? 

या सगळ्या मंडळींना ग्रेट म्हणायलाच हवं… 

आणि मग याच क्षणी त्यांना  ‘पूर्णत्वा’चा अनुभव मिळत असेल ना !  

पूर्णात पूर्ण ते हेच असणारेय !

एकदा त्या शास्त्रज्ञांना भेटून हे विचारायलाच हवे… 

खात्री आहे, ते हेच सांगतील…

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…

लेखक : श्री उमेश कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आई☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आई !  तुझ्यावर काहीतरी लिहावं असे भाचीने सांगितल्यावर तुझ्याविषयी काय काय लिहू असा प्रश्न मनाला पडला ! कळायला लागल्यापासून तू डोळ्यासमोर येतेस ती अशीच कर्तृत्ववान, सतत कामात असणारी आणि स्वाभिमानाने जगणारी, कष्ट करणारी आई ! संसारासाठी सतत दादांच्या पगारात आपला तिखट मिठाचा आणि भाजीपाल्याचा खर्च निघावा म्हणून धडपड करणारी आई ! 

तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगण्यापूर्वी तिचे लग्न कसे ठरले हे सांगणे मला महत्त्वाचे वाटते. कारण पेंडसे कुटुंब कराचीला राहत होते तर आईचं माहेर बेळगावला घाणेकरांच्याकडचे ! इतक्या लांबच्या ठिकाणी राहणारी ही दोन्ही कुटुंबे एकत्र कशी आली हा प्रश्न मला पडत असे. नंतर कळले की आमचे आजोबा शिकायला असताना घाणेकरांच्या घरी राहत होते. नंतर नोकरी निमित्ताने ते कराचीला गेले. व त्यांचा संसार तिथे सुरू झाला.. वडिलांच्या वयाच्या 22व्या वर्षी आजोबा काही कारणानिमित्ताने बेळगावला आले होते, त्यावेळी माझ्या आईचे पण लग्नाचे बघतच होते. त्यामुळे मोठ्यांच्यात बोलणी झाली आणि त्यांचे लग्न ठरवले गेले. आईने दादांना तर पाहिलेच नव्हते. पण त्याकाळी मोठ्यांनी लग्न ठरवले की मुलगा -मुलगी यांच्या पसंतीचा प्रश्न गौण ठरवला जाई. १९४५ साली लग्न झाल्यानंतर माझी आई बेळगावहून कराचीला आली.  त्याकाळी बेळगाव ते कराची या प्रवासाला एकूण पाच दिवस लागत ! माहेर सोडून आई एवढ्या लांब प्रथमच जात होती आणि तेही इतक्या दूरदेशी परक्या राज्यात ! त्या काळात आईने कसे निभावले असेल असे आता वाटते ! अचानकपणे लग्न ठरवण्याचा परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. केवळ एका विषयात मार्क कमी मिळाल्यामुळे आई मॅट्रिकला फेल झाली. आजोबांना शिक्षणाचा प्रचंड ध्यास.. त्यांनी आईला पुन्हा बेळगावला पाठवले आणि मॅट्रिकचे वर्ष चांगल्या तऱ्हेने पूर्ण करून आई कराचीला परत आली ! पुढे फाळणीनंतर भारतात येऊन त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला.

तिला शिवणकामाची आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला शिवणकामाचा कोर्स  करायला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिने शिवण शिवायला सुरुवात केली.  शिवणकामाचा वर्ग सुरू केला. विशेष करून ती फ्रॉक, स्कर्ट- ब्लाऊज, परकर यासारख्या लेडीज शिवणकामात पारंगत झाली. रत्नागिरीत ती रमली होती. पण मग ती. दादांची बदली प्रमोशन वर मराठवाड्यातील नांदेडजवळील खेड्यात झाली. ती. दादांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे राहणे अवघड होते. त्यांना खोकला, दम्याचा त्रास होता, तरीही ते सतत काम करत असत. त्या दरम्यान आम्ही तिन्ही मुले कॉलेज शिक्षण करत होतो. तेव्हा आईने मन घट्ट करून आम्हाला सांगलीला शिकायला ठेवले. पैशाच्या दृष्टीनेही सर्व अवघडच होते, पण मुलांचे शिक्षण करणे हे आई दादांचे ध्येय होते. 

नांदेडजवळ बेटमोगरा या लहान ठिकाणी वडिलांची सरकारी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती. तेथील वातावरण वेगळेच होते. पण तिथे गेल्यावर आईने तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले .पाणी लांबून आणावे लागत असे.त्यामुळे पाणी आणण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवावा लागत असे. मोजक्या पाण्यामध्ये सर्व कामे करावी लागत असत. आईने तिथे राहून तेथील बायकांशी ओळखी करून त्यांच्याकडून काही शिकून घेतले, तसेच त्यांनाही नवीन गोष्टी शिकवल्या. तेव्हा रेडिओ हाच विरंगुळा होता. रेडिओवरील कार्यक्रम ऐकणे, त्यावर प्रतिक्रिया पाठवणे,  वाचन करणे, शिवणकाम करणे आणि दादांच्या वेळा सांभाळणे यात तिचा दिवस जाई.

मी आणि माझा भाऊ तेव्हा सांगलीला होतो. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही मराठवाड्यात गेलो की आमचे सगळे विश्वच बदलत असे. आई मला सुट्टीच्या पूर्वीच पत्र लिहून सांगत असे की, ‘काहीतरी भरत काम, विणकाम करायला घेऊन ये’. शाळेची लायब्ररी होती त्यामुळे वाचायला पुस्तकं मात्र भरपूर मिळत असत. सुट्टीत गेले की अधूनमधून आवड म्हणून स्वयंपाक करणे यात माझा वेळ जाई.आई-दादानाही खूप छान वाटत असे. सुट्टीचे दिवस संपत आले की आईची माझ्याबरोबर द्यायच्या पदार्थांची तयारी सुरू होई. नकळत ती थोडी अबोल होत असे आम्ही जाणार या कल्पनेने !

कालक्रमानुसार आम्हा तिघांची शिक्षणं झाली. आणि नंतर भावांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. आईने स्वतःच्या हिमतीवर आमच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नुसती लग्न केली म्हणजे संपत नाही, त्यानंतर सणवार, बाळंतपण, नातवंडांबरोबर संवाद ठेवणे या सर्व गोष्टी ती जाणीवपूर्वक उत्साहाने आणि जबाबदारीने करीत होती. तीर्थरूप दादांचे तिला प्रोत्साहन असे. पण तब्येतीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते. आकुर्डी येथे भावाने घर बांधले आणि आईची ‘घरघर’ थांबवली. तिला आपल्याला घर नाही ही गोष्ट फार जाणवत असे. भावाच्या घराने -विश्वास च्या ‘पारंबी’ ने सर्वांनाच आधार दिला. तिथे तिचे स्वास्थ्यपूर्ण जीवन चालू झाले. गरजेनुसार ती आमच्याकडे येई. पण आकुर्डीला सरोज वहिनीची नोकरी व नातवंडे यामध्ये तिने राहण्याचे ठरवले. आकुर्डीत भजनी मंडळात तिचा सक्रिय सहभाग होता. भजन- भोजन यात तिचा वेळ छान जात असे.आकुर्डीच्या नातवंडांसाठी तिने इतके केले की मी तिला म्हणायची, “तुझी आणखी दोन मुले वाढवायची हौस राहिली बहुतेक !”

 ती. दादांच्या निधनानंतर ती आकुर्डीतच रमून राहिली. पुढे नातवंडांचे लग्न, बाळंतपण यात तिने जमेल तेवढी मदत केली. आज तीन मुले, सात नातवंडे आणि अकरा पंतवंडे असा तिचा वंश विस्तार आहे !

आताआतापर्यंत ती स्वयंपाकघरात भरपूर लुडबुड करत असे. आपलं वय झालंय हेच तिला पटत नाही. मला आता काही काम होत नाही असं म्हणत तिचं काम चालू असे. वयाच्या साठीच्या दरम्यान तिने उत्तर भारत, दक्षिण भारत या यात्रा केल्या. त्यानंतर नेपाळ ट्रिप करून आपण परदेश प्रवासही करू शकतो असा तिला कॉन्फिडन्स आला. वयाच्या ७३ व्या वर्षी तिने दुबई ,अमेरिका या ट्रिप केल्या. नायगारा फॉल्स, न्यूयॉर्क सगळे बघून ती खुश झाली. तिचा स्वभाव अतिशय उत्साही,! नवीन गोष्टी शिकण्याची, पाहण्याची आवड असल्यामुळे ती सतत कार्यरत असे. विणकाम हे तर तिचे फार आवडते ! सगळ्या नातवंडांना,पंतवंडांना  स्वतःच्या हाताने विणून स्वेटर, टोपी ती बनवत असे. रोजचे वर्तमानपत्र पूर्ण वाचायची. चांगल्या पुस्तकाचे वाचनही तिचे बरेच होते. टीव्ही जागरुकतेने बघत असे. तिला काळाबरोबर सर्व गोष्टी माहीत असत. तिचे डोळे अजून चांगले होते. जगण्याची उमेद होती. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ती चांगले आयुष्य जगली. आम्ही तर तिची शंभरी साजरी करू अशी  आशा करत होतो. परंतु ईश्वरी इच्छेपुढे  इलाज नसतो. तिला फारसा कोणताही  मोठा आजार नव्हता. तिचे खाणे पिणे अतिशय मोजके होते. त्यामुळे तिची तब्येतही ती राखून असे. आईच्या सहवासात चार दिवस राहावे या हेतूने मी आकुर्डीला गेले होते. भाऊ-वहिनींचाही मला राहण्यासाठी आग्रह होता. फारसे काहीही निमित्त न होता एके दिवशी

सकाळी माझ्याकडून तिने नाश्ता घेतला आणि गरम चहा पिण्यासाठी मागितला. तेच तिचे शेवटचे खाणे माझ्या हातून दिले गेले. दोन-तीन तासानंतर सहज म्हणून तिच्याजवळ गेले तेव्हा ती शांत झोपल्याप्रमाणे

दिसली, पण नुकताच तिचा देहांत झाला होता ! इतकं शांत मरण तिला आले ! आजही तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि आईची तीव्रतेने आठवण येते. ती उणीव भरून येत नाही 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाॅपकाॅर्न…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पाॅपकाॅर्न…” ☆ सौ राधिका भांडारकर 

पॉपकॉर्न या शब्दाशी तशी आयुष्यात जरा उशीरच ओळख झाली.  पण पाहता क्षणीच मी त्या शब्दाच्या आणि चवीच्याही प्रेमात पडले.  “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला”  अशीच काहीतरी अवस्था मनाची झाली.  “अगदी सुंदरा मनामध्ये भरली”.

इतक्या दिवसांच्या जीवन प्रवासात वेगवेगळ्या चवींचे अनुभव काय थोडे असतात का? आता बघा पॉपकॉर्न मधला पॉप थोडावेळ बाजूला ठेवूया आणि  उरलेल्या त्या काॅर्नशी आपला  संबंध होताच की? काॅर्न  हा शब्द असेल परदेशी थाटाचा, काहीसा नखरेल, आधुनिक संस्कृतीशी चटकन शेक हँड  करणारा पण आपल्यासाठी त्याचा एकच अर्थ मका.  आणि मका म्हटलं की एकावर एक मस्त मखमली धाग्यांचं, मऊ वस्त्र लपेटलेलं एक सुंदर दाणेदार कणीस!  दाणे कधी पांढरे कधी पिवळसर पण रूप अतिशय देखणं,  आणि या मक्याचे आणि पावसाचे एक घट्ट नाते आहे.  छान पावसाच्या सरी कोसळत असाव्यात, वातावरणात ओला गारवा, असावा कुठेतरी झाडाच्या खाली अथवा रस्त्याच्या  कडेला पावसापासून सुरक्षित निवारा शोधून मक्याच्या कणसांची रास गाडीवर ठेवून, कोळशाची शेगडी पेटवून , त्या तप्त निखाऱ्यांवर कणसे भाजणारा “तो” किंवा “ती” दिसावी आणि तिथे टुणकन् उडी मारून आपण जावं. त्या उडणार्‍या ठिणग्या आणि तडतडणारे दाणे आणि नंतर त्या शेगडीवर भाजलेल्या, वरून तिखट, मीठ, लिंबू पिळलेल्या खमंग, गरम कणसांचा आस्वाद घ्यावा.  ते खरपूस, रसदार दाणे चावून खाताना रसनेची होणारी तृप्ती…क्या बात है!.. अलौकिकच! ज्या कोणी याचा आनंद घेतला नसेल तर तो जीवनातल्या महान आनंदला कायमचा मुकला आहे असेच मी म्हणेन.

तर अशा या मक्याशी— काॅर्नशी  असलेलं, आपलं नातं तसं जुनच.  पिढ्यानु पिढ्या चालत आलेलं.  पण या मक्याचे “पॉपकॉर्न” असं नामकरण झालं आणि आपण एका वेगळ्याच संस्कृतीत पाऊल टाकलं.जसं निवडुंगाचं कॅक्टस झालं,तसंच काहीसं.पण  ही संस्कृती आहे. हलकीफुलकी, नाचणारी, बागडणारी, उडणारी पॉप संस्कृती. रेडीमेड पण चविष्ट, खमंग आणि सहज नेत्रांना सुखावणारी,  रसनेलाही भावणारी.   म्हणजे पॉपकॉर्न या उच्चाराबरोबर काॅर्न  किंवा मका खाण्याचे वैज्ञानिक, आरोग्य विषयक नियमांचे विचार वगैरे येत नाहीत  बरं का? म्हणजे त्याचे अँटिऑक्सिडंट घटक, हृदयाला ऊर्जा देणारी गुणवत्ता वगैरे असं काहीही गंभीर, अभ्यासात्मक मनाला त्यावेळी स्पर्शूनही जात नाही. ते सारं ज्ञान एकीकडे आणि कागदाच्या उभट  द्रोणातून भरभरून वाहणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे (चवीचे न म्हणता) पॉपकॉर्न खाण्याची  मजा काही औरच. 

पण क्षणभर थांबा.  आता या खाद्याच्या मजेच्या, आनंदाच्याही पातळ्या वेगवेगळ्या आहेत.  म्हणजे हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.  त्यातही पुन्हा ऑप्शन्स आहेत. “ए वन  पॉपकॉर्न” या ब्रँडचे छोटे, कागदी पुडीतले, इन्स्टंट म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये दोन मिनिटात तडतड उडणारे पॉपकॉर्न खाऊ शकता किंवा चक्क सुकलेले मक्याचे दाणे किंचित तेलावर, शिट्टी न लावलेल्या कुकरमध्ये गरम केले की  तुम्हाला या मक्याच्या सुंदर, नक्षीदार, हलक्या लाह्या घरबसल्या  मिळतील.    मग त्यावर तुमच्या आवडीचं, कुठलंही मसालेदार, चटकदार मिश्रण भुरभुरा. पॉपकॉर्न तयार.  आता मात्र त्यास मक्याच्या लाह्या हे पारंपारिक विशेषनाम न देता काय म्हणाल? 

 “पॉपकॉर्न”

“. बरोब्बर”

मस्त . टीव्हीवरच्या अथवा ओटीटी वरच्या एखादा अत्यंत कंटाळवाण्या सिनेमाचीही  रंगत हे पॉपकॉर्न वाढवतात. जोडीला बाहेर पाऊस पडत असेल तर मग अगदीच दुग्ध शर्करा  योग. यातही भरपूर मजा आहे.

पण मंडळींनो! पॉपकॉर्न आणि मजा याची ही अगदीच मर्यादित, सामान्य पातळी  आहे. अगदी उपहासाने, काहीसं तिरसटपणे, तुच्छतेने उच्चभ्रुंच्या ठेवणीतलं म्हटलेलं  वाक्य म्हणजे “मिडल क्लास मेंटॅलिटी”  “मध्यमवर्गीय मानसिकता” घरीच बनवा,घरीच खा हा ट्रेंड. कारण पॉपकॉर्नचं खरं नातं आहे ते आजच्या नवयुगातल्या मॉल संस्कृतीशी.  पीव्हीआर, आयनॉक्स,  सिने संस्कृतीशी.  थिएटर मधल्या गोल्ड, प्लॅटिनम, रेक्लायनर या बैठक संस्कृतीशी.  त्या मस्त थंड काळोखात घमघममणारा तो पॉपकॉर्नचा विशीष्ट, नमकीन सुगंध तुम्हाला कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. 

बाहेरच्या काउंटरवर काचेच्या मागे त्या आनंदाने टप टप उडणाऱ्या, गरमागरम लाह्या , (लाह्या नाही हो…पाॅपकाॅर्न) न खाता किंवा खिशात हात न घालता तुम्ही पुढे गेलात तर हाय कंबख्त!  एक तर तुम्ही अत्यंत कंजूष  किंवा “इतके पैसे कशाला मोजायचे?””दोन रुपयाच्या ठिकाणी दोनशे का द्यायचे?” या काटकसरी, कर्तव्यनिष्ठ, समंजस,धोरणी,संयमी  वयस्कर समूहातले असाल. फार तर लार्ज कप नका घेऊ. थोडेसे तरी पैसे वाचवून स्मॉल कप घ्या, पण घ्या.  त्याशिवाय पीव्हीआर मध्ये जाऊन सिनेमा पाहण्याच्या  निखळ आनंदाची पूर्तता होणारच नाही.सिनेमा भिक्कार कां असेना पण पॉप काॅर्न हवेतच.  वाटल्यास चित्रपटगृहात बालदीभरून पॉपकॉर्न खाणाऱ्यांबद्दल, “काय ही आजची युवापीढी, बापाच्या जीवावर मजा करते किंवा आयटीत जॉब असेल. लहान वयात भरपूर पैसा मग काय मजा..  किंवा आजकाल काय खिशात क्रेडिट कार्ड असतेच ना..” असे शेरे तुम्ही या खर्च करणाऱ्या, उधळपट्टी करणाऱ्या पिढीवर मनातल्या मनात मारू शकता.  पण घरी आल्यावर हिशोबाच्या डायरीत सिनेमाची— मी आणि सौ— दोन तिकिटे..रु. साडेसातशे प्लस पॉपकॉर्न रु.साडेतीनशे अशी नोंद करताना मुळीच हळहळू नका.

या वयातही “थोडीसी रुमानी हो जाये”  हाच अटीट्यूड ठेवा की !  नाही तर भूतकाळात रमाल.  आम्ही दोन रुपये देऊन पिटात पिक्चर पाह्यचो. फार तर मध्यंतरी पुडीतले  चणे किंवा थोडे पैसे असतील तर मटका कुल्फी.  काय कमी मजा होती  का यात?  अगदी गेला बाजार नाट्यप्रेमींचा आनंद काय होता?  खरं म्हणजे आजही आहेच  तो. मध्यंतरात मस्त जायफळ, वेलची घातलेली मधुर कॉफी आणि गरम बटाटेवडे.  पण हे दृष्य गडकरी रंगायतन  किंवा बालगंधर्व मध्ये.  पीव्हीआर मध्ये नक्कीच नाही. तिथे मात्र हेच अहंकारी, शिष्ट, तडतड उडणारे तरीही तुम्हाला खुलवणारे, बोलवणारे, तुमच्या “पैसे बचाव” घट्ट संस्कृतीच्या रेषा ओलांडायला लावणारे, हलकेफुलके पॉपकॉर्नच. 

तर मंडळी पॉपकॉर्न ही एक संस्कृती आहे.  त्या पलीकडे जाऊन मी म्हणेन ती एक मानसिकता आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषा विषयक अभिमानाला आणि मराठी माणसाने मराठीतच बोलावे या संदेशाला सादर प्रणाम करून आणि नंतर त्यांची मनस्वी क्षमा मागून विनम्रपणे मी म्हणेन की “पॉपकॉर्न” या धबधब्यासारख्या, एका विशिष्ट लय असलेल्या, उच्चारवातच आनंदाची कारंजी उडवणाऱ्या, हलक्या फुलक्या शब्दाशीही नाते आणि खाद्य संस्कृती जुळवण्याचा एक प्रयत्न तरी करून बघूया.   बदलत्या काळाबरोबर जरा जगायला शिकूया की.

आनंददायी खवय्येगिरी .

जाता जाता आणखी एक…..   पॉप काॅर्न या शब्दातही एक संदेश दडलेला आहे. नाचा, उडा, मुक्त व्हा आणि मूळचा कडक,कठीण, सुका भाव उधळून पिसासारखे हलके व्हा.”

“मन उडू उडू झाले” याचा हा  वेगळाच अर्थही जाणून घेऊया.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “पितृदिनानिमित्त एक खास आठवण” – मूळ इंग्लिश: विवेकरंजन अग्निहोत्री ☆ मराठी रूपांतर व प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा पाली हिल इथे एका अत्याधुनिक इमारतीत “सशुल्क पाहुणा” (पेईंग गेस्ट) म्हणून राहू लागलो. खरं तर माझी ऐपत नव्हती. पण मी नशिबवानच म्हणायचो, म्हणून काही हळव्या भावनेतून ही जागा मला मिळून गेली. घरमालक पती-पत्नी दोघेही वयस्कर होते आणि त्यांच्या मानाने ती जागा फारच ऐसपैस होती. त्यांना एकाकी वाटण्याचं कारण म्हणजे त्यांची मुले परदेशात होती. म्हणून त्यांना अशी मोठी भीति वाटत होती की, दोघांपैकी कुणाला काही झालं, तर त्यांना इस्पितळात कोण घेऊन जाईल?  

त्यांनी त्या सदनिकेतील एक लहानशी खोली मला भाड्याने दिली. त्या माझ्या तरूणपणाच्या काळात मी जगण्याच्या, स्थिरावण्याच्या धडपडीत होतो. जेवणाखाण्यासाठी खर्चायला फार पैसे नसायचे. मग मी लिंकिंग रोडवरील टप-या किंवा हातगाडीवर मिळणारे भेळपुरी, वडापाव असे स्वस्तातले पदार्थ आणत असे, कधी मालकांच्या मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेत असे आणि माझ्या खोलीत बसून खात असे. 

एके दिवशी मावशींनी त्यांच्या स्वयंपाकघरात मला जेवायला बोलावलं. मग दुस-या दिवशी मी थोडी जास्तच भेळपुरी घेऊन गेलो आणि त्यांनाही खाण्याचा आग्रह केला. थोडंसं कां कूं करत त्यांनी ती खाल्ली. काका तर म्हणाले की, त्यांना वीसेक वर्षं तरी झाली असतील असं चटकमटक टपरीवरचं खाणं खाऊन ! त्यांच्या मुलांनी असं उघड्यावरचं खायला बंदी केली होती ना .

हलके हलके हा मुळी पायंडाच पडून गेला. ते दोघेही माझी घरी परतण्याची वाट पाहू लागले. मी आणत असलेल्या चटकदार खाण्यामुळे त्यांच्या आयुष्यातला आनंद वाढला होता. आता, मलाही कौटुंबिक वातावरणात असल्यासारखे वाटू लागले. मग त्यांनी माझ्याकडून वचनच घेतले की, ही गोष्ट म्हणजे आमच्यातलं गुपित राहील आणि यदाकदाचित त्यांच्या मुलांची आणि माझी गाठ पडलीच, तर हे मी त्यांना अजिबात कळू देता कामा नये. दर आठवडाअखेर नियमितपणे त्यांच्या मुलांचा चौकशीचा फोन येई, पण आमचे हे गुपित त्यांनी कधीच उघड केलं नाही.  

मग मात्र मी मुंबईतील खाऊगल्ल्यांचा धांडोळा घेऊ लागलो. लांब अंतरावरची ठिकाणे लोकलमधून, तर मैलोन् मैल चालत जाऊन मुंबईचे कानेकोपरे पालथे घालून गाजलेली खास खाऊठिकाणे शोधून काढली – क्रॉफर्ड मार्केटजवळच्या ‘गुलशन- ए-इराण’ चा खिमापाव, विलेपार्लेमधील ‘आनंद’चा डोसा, किंवा ग्रँट रोडवरच्या ‘मेरवान’चा बनमस्का आणि मावा सामोसा, किंवा शीवच्या ‘गुरूकृपा’तील छोले सामोसा, कधी स्वाती स्नॅक्समधून खिचडी, तर कधी चेंबूरच्या ‘सदगुरू पावभाजी’तील पावभाजी.

या प्रकाराने मला जगण्याचा हेतु सापडला, तर वृद्ध दांपत्याला मिळाली जगण्याची आशा.  जेवणाच्या टेबलावरच्या त्या क्षणांनी आमच्या तिघांचे एक छोटेसे घट्ट कुटुंब बनून गेले. नव्वदीच्या आसपासचे हे वृद्ध काका मला रोज काही ना काही किस्से त्या वेळी ऐकवत असत. पुढे कधी तरी एकदा मावशींशी बोलता बोलता मला कळलं की, दिवसभर ते अगदी गप्प गप्प असत, चुकूनही बोलत नसत. जेवणाच्या टेबलावरच्या या क्षणी मात्र त्यांच्यात एकदम चैतन्य संचारे.

वयोपरत्वे त्यांची तब्येत ढासळू लागली. त्यांचा विसराळूपणा वाढू लागला आणि एक दिवस विसरण्याचा कडेलोट झाला. मी त्यांचा मुलगा नाही, हे ते विसरूनच गेले. त्यांच्या वाढदिवशी, व्ही.टी. स्टेशनजवळच्या ‘पंचम पुरीवाल्या’कडून मी पु-या आणि बटाट्याची भाजी घेऊन गेलो. खूप वेळ त्यांनी स्वादाचा सुगंध घेतला आणि अचानक त्यांच्या मुलाच्या नावाने मला हाक मारली. मावशी म्हणाल्या की, त्यांचं ऑफिस ‘पंचम’जवळ असल्याने ते बरेचदा तिथे बटाटा भाजी, पुरीचं जेवण घेत असत. पण ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या मुलाने ‘तिथं खायचं नाही’ असं निक्षून बजावलं होतं. तासभर होऊन गेला. काकांनी मजेमजेत पुरी भाजीचा आस्वाद घेतला. मग उठले, वॉकर घेऊन सावकाश चालत त्यांच्या खोलीत गेले आणि एक खोकं घेऊन परत आले. पुन्हा एकदा त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या नावाने हाक मारली आणि ते खोकं माझ्याकडे सुपूर्द केलं. म्हणाले, ” तू तुझं मुलाचं कर्तव्य बजावण्याइतका मोठा होशील, तेव्हा तुला देण्यासाठी हे राखून ठेवलं होतं. आज तू तसं वागलास. आता हे  तुझं ! “

… मी खोकं उघडलं. त्यात एक “हिरो” – शाईचे पेन होते. मग मावशींनी खुलासा केला की, त्या पेनाने त्यांनी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेली ती ‘भेट’ होती.

त्या रात्री मला ‘हिरो पेन’ नव्हतं मिळालं, तर मला एक वडील मिळून गेले.  ते पेन मी जपून ठेवलं आहे. ते मलाही माझ्या मुलाकडे एक दिवस असंच सोपवायचं आहे,  जेव्हा मी म्हातारा आणि दुबळा झालेला असेन आणि माझा मुलगा मला माझं आवडतं खाणं आणून देईल ..

आपला जन्मदाता पिता एकच असतो. तरीही, आपण अनेक पित्यांचा पुत्र होऊ शकतो.

 हा पितृदिन आनंदात जावो !      

मूळ इंग्रजी लेखक – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री

मराठी रूपांतर व प्रस्तुती  : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टाईम पास… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ टाईम पास… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.

“जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?”

जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. 

“तुला कालचीच गोष्ट सांगतो,” काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. “मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा – हातात पावतीपुस्तक. आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो – “बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे.” 

तशी तो म्हणू लागला, “सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही.”

“तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा.”

“लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता,  कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी.”

” ‘त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?’ माझा निरागस प्रश्न” – जोशी काका सांगत होते. तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार. 

“ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल हो. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही.”

“असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ?  सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून.”

माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला. 

“अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता.” हवालदाराने रौद्र रूप धारण केले.

… आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे – तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.

हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं – “ तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.”

ती त्याला म्हणाली, “अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये.”

पण आता तो हवालदार काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. 

“नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी.”

मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता.” जोशी काका सांगत होते.

“अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?” – मित्राची पृच्छा.

“मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो.” 

“आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?” मित्राला काहीच उमगेना.

“काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो.…. तू मला विचारलंस – मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो. आणि आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते – आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी !”

— जोशी काका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares