मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडमध्ये मुलीकडे दोन महिने होतो.यावर्षी सहा महिने होतो.पण यावर्षी घरातली अनेक कामं, मुलीची धावपळ यामुळे घर सोडून फारसं फिरायला गेलो नव्हतो.तसे आम्ही इंग्लंडला पर्यटन म्हणून न जाता मुलीला तिच्या कामात मदत करायलाच जातो. त्यामुळे त्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही. तरीपण एक दिवस रात्रीची जेवणं आटोपून आम्ही निवांत बसलो होतो तर मुलगी तिथं आली, ” आईपप्पा, उद्या पाऊस नसला तर, आपण ऑक्सफर्डला फिरायला जाऊ”.

सकाळीच आटोपून दहाच्या सुमारास ट्रेनने फॅरिंग्टन, पॅडिंग्टनमार्गे आम्ही ऑक्सफर्डला पोहोचलो. स्टेशनवरून हाॅप ऑन हाॅप ऑफ .. या बसने शहराचा आधी फेरफटका घेतला.गेल्या वर्षी अशाच केंब्रिज या शहराला भेट दिल्याची आठवण जागी झाली. सुमारे तासभराच्या बस प्रवासात शहरातील जगप्रसिद्ध बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये आणि विख्यात महाविद्यालयांना धावती भेट दिली.

जगभरातील १४ वेगवेगळया भाषांतून माहीती दिली जात होती. इथे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी मला जाणवल्या ;

– इथली अनेक महाविद्यालये कित्येक शतकांपासूनची आहेत. जगातील अनेक विख्यात व्यक्तींनी इथून शिक्षण घेतल्याचा इतिहास आहे.

– आजही ह्या महाविद्यालयांच्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.

– आपल्याकडे शिक्षण १९ व्या शतकापासून सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो, मात्र स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा विकास अधिक गतीने झाला.

– मात्र आपल्याकडच्या इमारतींची आजची अवस्था, स्वच्छता आणि तिथले वातावरण यात खूप फरक जाणवला. आपल्याकडे विद्यार्थी निवडणूका, विविध युवक महोत्सव अशा बाबतीत झालेल्या अप्रिय घटनांमुळे शिक्षणाबरोबरच गलिच्छ राजकारण, पैसा आणि इतर साधनांचा गैरप्रकार यामुळे आपल्याकडच्या शिक्षणाला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे.

– इंग्लंडमधील विशेषत: ऑक्सफर्डमधील अनेक जुन्या, नव्या महाविद्यालयांतून दिले जाणारे शिक्षण आणि एकूणच वातावरण पहाता आपली स्थिती नक्कीच शोचनीय वाटते.

– महाविद्यालये, बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये पहाताना, स्वच्छ रस्ते, लोकांनी पाळलेली स्वयंशिस्त, वातावरणातील शांतता पाहून अशा बाबी आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहेत ह्याची जाणीव झाली.

दिवसभरात जगातील एक सुंदर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध शहराचा प्रवास संपल्यावर सायंकाळी हलकासा पाऊस पडून गेला होता, हवेत खूप गारठा जाणवत होता. म्हणून तिथल्या, डोसा पार्क नावाच्या दक्षिण भारतीय हाॅटेलात गेलो.तिथले सगळे वातावरण दक्षिण भारतीय होते. मोठ्या कागदी कपातून चहा पीत असताना भिंतीवर कृष्णाचे एक लहानसेच पण अतिशय सुंदर चित्र पहायला मिळाले.

लहानपणापासून मी कृष्णाची अनेक चित्रं पाहिली.पण ते चित्र मला खूपच भावले. आजवर कृष्ण म्हटला की, सोबतीला राधा असलेला बासरी वाजवणारा कृष्ण किंवा फार फार झालं तर, महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथावर आरूढ किंवा अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण मी पाहिला होता. अनेक ठिकाणी कृष्णाची देव स्वरूपातली चित्रं पाहिली. मागे आपल्याकडचे एक अतिशय अभ्यासू, पुरोगामी विचारवंतांचे भाषण मी युट्यूबवर ऐकले होते.त्यांच्यामते कृष्ण हा भारतीय संस्कृतीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्याला बदनाम करण्यासाठी ‘पाण्यात कपडे काढून अंघोळ करणाऱ्या गोपींची वस्त्रं पळवून गंमत करणारा खोडकर ‘ अशी त्याची प्रतिमा निर्माण केली. खरंतर अगदी आपल्या देशात असं कोणतं गाव असेल जिथं सार्वजनिक जलाशयावर गावातील स्त्रिया कपडे काढून अंघोळ करतात? आणि क्षणभर ते गृहीत धरलं तरी त्यांची वस्त्रं पळवून नेणा-याला लोकांनी काय केलं असतं ? अशा माणसाला लोकप्रियता मिळाली असती का ? त्या विद्वानांच्या मते राधा हे पात्रही कवींची कल्पना आहे. इंद्राला नैवेद्य देण्याऐवजी तो नैवेद्य आपल्या सर्वसामान्य गुराखी मित्रांना देणारा कृष्ण ही घटना कृष्णाची सर्वसमावेशकता दाखवून देते.या दृष्टिकोनातून डोक्याला साधा फेटा बांधलेला कृष्ण मी या चित्रात पहात होतो. कृष्णाची एका बाजूला देव अशी प्रतिमा निर्माण करायची आणि दुसरीकडे काही कथा त्याच्या नावावर खपवायच्या (ज्यातून त्याचे नकारात्मक चित्र डोळ्यासमोर उभे रहाते) या दोन्हीपेक्षा सर्वसामान्यांचा लाडका आणि बलिष्ठांच्या मुजोरीला भीक न घालणारा कृष्ण मला जवळचा वाटतो.

येताना पॅडिंग्टन रेल्वेस्टेशनवर उतरलो तर काही सुंदर संगीताचे स्वर कानावर पडले.

एका प्लॅटफॉर्मवर काही वादकांच्या वाद्यांतून संगीत सुरेल संगीत ऐकू येत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे येणा-या जाणा-या रेल्वेगाडयांचा धडधडाट, मधूनच येणारे अनेक कर्णकर्कश आवाज, त्यात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, रेल्वेतून सांडणारी माणसं, लोकांची धावपळ अशा बाबींपेक्षा हे वेगळंच होतं. आमची परतीची ट्रेन येईपर्यंत मी हे पहात होतो.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – मी गतीचे गीत गाई— ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

 

☆ – मी गतीचे गीत गाई— – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधना ताईंचे हात बळकट तर होतेच.त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे!

विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं ,म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय! या गौरव ग्रंथात प्रत्येकाने त्याबद्दल लिहिले आहेच! त्यामुळे मी आज विकासदादांबद्दल  एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकास दादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला  गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय!

विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून  त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन , पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना.मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली!

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, “पद्मजा, काही काळजी करू नकोस,” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद…

परत धक्का देणे…असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो.

सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं  औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं ! त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या…

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही….

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे 

झेन आणि आनंदी राहण्याची कला 

काही दिवसांपूर्वी झेन तत्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती . त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दात जीवन आनंदाने जगण्याची तत्वे सांगितली होती .

* झेन हा शोधाचा आणि आनंदाने जगण्याचा मार्ग आहे. आयुष्याला आत्ता आणि इथेच अनुभवण्याचा स्पष्टपणे पाहण्याचा आणि सरळपणे अनुभवण्याचा मार्ग आहे.

* कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने,मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं,ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो  ही गोष्ट म्हणजे झेन होय.

*आपले आयुष्य जगत असताना आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या सोबत घडु शकणारी सर्वोत्तम गोष्ट आहे असे समजावे म्हणजे आपण आनंदात जगु शकतो.

* तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमचे जितके नुकसान करु शकणार नाही तितकेच बेसावध विचार तुमचे नुकसान करु शकतात पण एकदा का आपण त्यांच्यावर प्रभुत्त्व मिळवले की आपण आनंदाने राहु शकतो.

* माणसाच्या मनातल्या नकारात्मक भावना या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात तर सकारात्मक भावना या रोगमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

* एखादी गोष्ट तेव्हाच अनुकूल ठरते जेव्हा माणूस तिच्याशी जुळवून घेतो.

* आयुष्याच्या मार्गांवर जशी तुमची वर्तणूक असेल त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य उलगडत जाते.

* तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना कशी प्रतिक्रिया देता,हे तुमच्या वैयक्तिक तत्त्वज्ञानानुळे निश्चित होतं.तुमच्या आनंदासाठी आणि हितासाठी ते पुर्णपणे जबाबदार असते .

* सत्य नेहमीच हाताच्या अंतरावर,तुमच्या आवाक्यातच असते.

* जेव्हा धामधुमीतसुद्धा तुम्ही शांत राहु शकता तीच निसर्गाची खरी अवस्था असते.

* जेव्हा तुम्ही दुःखाच्या काळातही आनंदी राहु शकता तेव्हा तुम्ही मनाचे खरं सामर्थ्य पाहु शकता.

* माझ्यासोबत जे काही घडतं ते केवळ मला त्यापासुन सर्वाधिक फायदा व्हावा या एकाच हेतुनं घडते.

* आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं,निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात आनंद कसा जोपासावा? वर्तमानात जगत असतानाही भविष्य कसं बदलावे ? याविषयी झेन तत्वज्ञान सकारात्मक शिकवते .  

आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या विशिष्ट क्षेत्रात अनेक छोटे छोटे विषय असतात आणि या विषयात सुद्धा अनेक छोटे छोटे संप्रदाय तयार झालेले असतात . या संप्रदायानांसुद्धा अनेक वेगवेगळे फाटे फुटलेले असतात आणि या फाट्यांमध्ये सुद्धा अनेक नवनवीन प्रयोग होत असतात . 

काही जण हे प्रयोग , नव्या दिशा , नव्या वाटा , नवे विचार यांचे सहजपणे आत्मचिंतन करून आपल्या जीवनात खरोखर परिवर्तन करून घेतात . या नव्या चिंतनामुळे जो आतमधून बदल होतो , तो बदल होत असताना व झाल्यानंतर आतमध्ये अनेक रोमांचित घटना तयार होत असतात . 

आपल्या वाढण्याऱ्या शरीरात वयामुळे , अनुभवांमुळे , मनामध्ये खूप नाजुक , हळुवारपणे नकळतपणे खूप आश्चर्यचकीत करणारे बदल होत असतात पण त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो . त्यामूळे खरं तर आपले नुकसानच होते .

झेन तत्वज्ञान स्वतःला ओळखवायला , आतमध्ये डोकावयाला प्रेरीत करत असते .

एकदा एक उत्कृष्ट नाव कमावलेला , निष्णात जसे दिसते तसे रेखाटणारा , रंगवणारा निसर्गचित्रकार होता . तो वेळ मिळाला की सर्व साहीत्य घेऊन निसर्गात जायचा . डोंगर , दऱ्या , इमारती , रस्ते , नद्या , समुद्र , बोटी , किल्ले यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्र काढायचा . अगदी बारीकसारीक सर्व डिटेल्स रंगवायचा , रंगवताना तल्लीन होऊन जायचा . त्याला स्वतःचे रंगवलेले निसर्गचित्र पाहुन खूप आनंद व्हायचा व आपण खूप भारी चित्रकार आहोत असा थोडा अहंकारही त्याच्या मनात निर्माण झाला होता . त्या चित्रकाराने आपल्या निसर्गचित्रांची प्रदर्शने करून थोडेफार व्यावसायिक यशही मिळवले होते .

एक दिवस त्याने आपल्या चित्रांचा एक मोठा गट्टा सोबत घेतला आणि तो त्याच्या एका गुरूनां दाखवायला व मार्गदर्शन घेण्यासाठी घेऊन गेला . हे गुरुजी झेन तत्वज्ञानाचे अभ्यासक होते . मोठी साधना केली होती त्यांनी . गुरुजींनी त्याचे प्रत्येक चित्र नीट ,शांतपणे , व्यवस्थितपणे पाहीले आणि चित्राची फाईल पुन्हा होती तशी ठेवली .

निसर्गचित्रकाराने मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली पण गुरुजी काही पुढे बोलण्यासच तयार दिसेनात. त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला व तो परत जायला निघाला . निघताना त्याने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले .

दरवाजातून बाहेर जाताना त्याने पाहीले की गुरुजी काही तरी सांगत आहेत . तो परत आत आला व जमीनीवर मांडी घालून शांतपणे डोळे मिटून बसला .

गुरुजी म्हणाले प्रत्येक ठिकाणी जाऊन जसे दिसते तसे रेखाटण्याचे कौशल्य तू फार कष्टाने मिळवले आहेस . त्याबद्दल तुझे स्वागत व अभिनंदन करतो . पण आता तुझे डोळे मिटलेले आहेत . आता तुझ्या आतमध्ये डोकावून पहा . तिथला निसर्ग तुला दिसतो आहे का ?

आपण सगळेच जण बर्हीमुखी झालेलो आहोत . आपण बाहेरचा निसर्ग , बाहेरचे रुप , बाहेरचे जग पाहुन एकमेकांची कॉपी व तुलना करून , स्पर्धा करून , जसे दिसते तसे पाहतोय . तेच चित्रण कागदावर , कॅनव्हासवर रंगवतो . आतला निसर्ग , आतला आवाज , आतले जग, आतली अद्भूत दृश्ये , आतला आनंद , आतल्या वेदना कागदावर कधी रंगवणार ?  ज्या दिवशी तु आनंद , दुःख , सर्व संवेदना रंगवायला सुरुवात करशील त्यावेळी तुझी चित्रे नक्की वेगळी असतील . निसर्गात फिरशील त्यावेळी चिंतन कर , खूप वेळा नजर खिळवून एकाच ठिकाणी बस . ते दृश्य मनात साठव . शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या , धमन्यांमध्ये ते दृश्य खेळते राहील व नंतर हृदयावर त्याचे एक प्रतिबिंब उठेल असे ठरव व नंतर त्या प्रतिबिंबालाच कागदावर उतरव . तन मन धन चित्रांवर केद्रींत कर ,एक वेगळे अनवट चित्र निर्माण होईल . जे आतून येईल ते तुझे खरे चित्र असेल.

मग मी देखील या झेन गुरुजींना मनःपूर्वक नमस्कार केला व आतून चित्र काढता येतात का त्याचा प्रयत्न करू लागलो . मनाच्या आतमध्ये खुप खोलवर गेल्यावर उंचचउंच पाचगणीच्या टेबललॅन्डचे पठार दिसू लागले . त्या पठाराच्या अतिउंच कड्यावर मी स्वतः उभा राहून खाली वाकून पाहतोय असे काहीसे दिसू लागले . सभोवतालच्या डोंगररांगा कडेकपाऱ्या , आसमंतात भरलेली शुद्ध हवा , धुक्याची किमया , सुर्यकिरणांमुळे चमकणाऱ्या निसर्गाचे अद्भूत दर्शन दिसू लागले . मग पेन्सीलने रेखाटणे करण्याचीही गरज वाटत नव्हती . सगळे रंग आपोआप एकमेकांचा हात धरून हे अनोखे आकार , वेगळे भावविश्व वेगळे रूप धारण करून चित्रे कागदावर उतरू लागली . जसजसे आत जावू लागलो तसतसे बाहेरच्या जगाचा विसर पडू लागला . स्पर्धा संपल्या, टिकास्त्रे संपली , द्वेष संपला , विरोध संपला , मोठा चित्रकार होण्याची हाव संपली . आतमध्ये एक अद्भूत उजेड आहे . एक मोठी पोकळी आहे . त्या स्वच्छ निर्वात पोकळीतून प्रवास करताना आता फक्त आनंदच आनंद दिसत आहे .

तुम्ही देखील या झेन गुरुजींचे कधी तरी ऐका 🙏

कदाचित तुम्हालाही झेन गुरुजींचे ऐकल्यामूळे धर्मभेद ,जातीभेद , व्यक्तिभेद , स्वार्थ , आंदोलने , टिकास्त्र , हिंसा , द्वेष , सामाजिक , राजकीय , आर्थिक , मानसिक भेदाभेदीचा विसर पडेल व आपल्या आतल्या अनोख्या विश्वात संचार करून नव्या प्रकाशाचा उजेड सापडेल . 

प्रत्येकाला असा आतला नवा आनंद, नवा उजेड सापडावा यासाठी शुभेच्छा ! 💐

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

बघता बघता दोन हजार तेविसाव्व सरून दोन हजार चौविसाव्व्याला सुरवात होईल. तेविसाव्व्याच्या सुरवातीलाच घरातून घोषणा झाली की, मी आता थकले. या वर्षी मी काहीही पदार्थ करणार नाही. म्हणजे जेवणाच्या पानांतली वामांगी व्यंजने आणि इतर काही !

या घोषणेला सुरुवातीलाच हरताळ फासला गेला तो मे महिन्यांत. सोमेश्वरहून कोणीतरी दोन मोठमोठे भोपळी आंबे आणून दिले तेव्हा. इतके ताजे आंबे डोळ्यांसमोर फुकट कसे घालवायचे, या विचाराने हात कामाला लागले. मग काय? एका आंब्याचं गोडं लोणचं आणि दुसऱ्याचा मेथांबा! दोन्ही पदार्थ विलक्षण रुचकर! हे एवढंच कसं पुरणार, म्हणून आणखी भोपळी आंब्यासाठी शोभाची बाजारांत ट्रीप झाली. आंबे नाही मिळाले. पण …..

काळे गोल, गोड तीळ मिळाले. (कारळे नव्हेत) हा पदार्थ आजकाल रत्नागिरी बाजारातून दुर्लभ झाला आहे असं कळतं. एकेकाळी भारीवाल्या माम्यांकडे हे तीळ भरपूर असायचे. मग गोड्या तिळकुटाच्या संगतीत पुढचे काही दिवस छान गेले! याच माम्यांकडे कोकणचा मेवा म्हणजे करवंद, अटकं, अळू, तोरणं, हा रानमेवा मिळतो. त्याच्यावर स्वयंपाकघरात काही प्रक्रिया करायची नसते, त्यामुळे हा मेवा अनेक वेळा आणला जातो.

नाचण्याच्या सत्वाची किंवा पिठाची, गोडी किंवा ताकाची आंबटसर आंबिल अधूनमधून होतच असते. पण खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यातून उरलेल्याची साबुदाण्याची गोड आणि आंबट लापशी सुद्धा अनपेक्षितपणे होऊन गेली! खूपच स्वादिष्ट लागते.

घावन-घाटलं हा कोंकणातला लोकप्रिय पदार्थ. घावन नाही, पण नाही नाही म्हणतांना घाटलं झालंच. सिंधुदुर्गात तर घावन घाटल्याशिवाय कोणताही सण होऊच शकत नाही. अगदी तेराव्याला सुद्धा घावन घाटलं केलच जातं. तसंच काकडीच्या पातोळ्यांचा बेत आमच्या घरी केलेलाच नव्हता. पण लीलाकडून तेही आले. त्यामुळे तीही रिकामी जागा भरली गेली. नक्की आठवत नाही पण बहुतेक लीलाकडूनच एक बरका फणस आला होता. त्यामुळे सांदणं झाली. मेच्या अखेरीला शोभा बाजारात गेली होती. तेव्हा तिला रायवळचे गोड चवीचे, मोठ्या आकाराचे आंबे मिळाले. कोयाड्यासाठी (आंब्याची पातळ रसाची भाजी – अनेकांना हा प्रकार माहीत नाहीये) अतिशय छान. मग घोषणा राहिली बाजूला आणि सुंदर, रुचकर कोयाड्याची भरती जेवणांत झाली!

खरं सांगू? कितीही ठरवलं आणि कितीही घोषणा केल्या गेल्या,  तरी काही काही पदार्थ हे घरामध्ये केलेच जातात. आणलेला किंवा आलेला पदार्थ नासून फुकट जाऊ नये म्हणून तरी, किंवा काही विशिष्ट समयी, विशिष्ट संकेताने जेव्हा जिव्हालौल्य उफाळतं तेव्हा तरी !

असो. तुका म्हणे सुखी रहावे,

        जे जे होईल ते ते खावे.

लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तोच चंद्रमा नभात” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

“तोच चंद्रमा नभात☆ श्री मनोज मेहता 

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कवी थॉमस मेकॉले यांनी १८४२ मध्ये लिहून ठेवलंय…. ‘मरण तर प्रत्येकाला येणारच आहे… कुणाला आधी तर कुणाला नंतर. परंतू भयावह विपरीत परिस्थितीशी दोन हात करतांना, आपल्या पित्याच्या राखेसाठी आणि मंदिरातल्या देवांसाठी झुंजत असताना येणारं मरण सर्वांगसुंदर!

आपली तरणीताठी पोरं अशीच मरणाला सामोरी जाताहेत. आजवरच्या सर्व मोठ्या युद्धांपेक्षा जास्त भयावह युद्ध आपले सैन्य आपल्याच सीमेमध्ये लढते आहे. आपलेच जंगल आहे मात्र त्यात परकी क्रूर श्वापदं शत्रूच्या मदतीने घुसून दबा धरून बसलेली आहेत. त्यांनी आपल्यावर झेपा टाकण्याआधी त्यांच्या अंगावर धावून जाणं हा एक धाडसी पण अपरिहार्य मार्ग उरला आहे आपल्या हाती. कारण ही जनावरं जर मुलुखात शिरली तर किती निरपराध माणसं मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पावलांचा माग काढीत काढीत त्यांच्या गुहांमध्ये शिरावंच लागतं. यात आपल्या जीवाला सर्वाधिक धोका आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे… आणि तरीही आपली मुलं त्या अरण्यात शिरतात. कधी शिकार गवसते तरी कधी शिकार बनावं लागतं.

या जीवघेण्या खेळात जाणाऱ्या जीवांचा हिशेब ठेवण्यास कुणाला सवड असो नसो…. आईबापाला एकुलती एक असलेली, थोड्याच दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहण्याच्या तयारीत असलेली, सणासुदीला नाही निदान नंतर काही दिवस घरच्यांना, म्हाताऱ्या आईबापांना, कोवळ्या लेकरांना भेटायला जावं म्हणून तळमळणारी तरूण, धडधाकट, वाघाच्या काळजाची पोरं आपल्या जीवाचा हिशेब मांडत बसत नाहीत. ती लढताहेत ते आपल्या बापजाद्यांनी प्राणांची बाजी लावून जपलेल्या देशाच्या अखंडत्वासाठी, हृदयमंदिरातल्या देश नावाच्या देवासाठी. ही पोरं जर तिथं उभी राहिली नाहीत तर देश आणि देव यांना वाली कोण असेल?

पण भारतमातेचं सुदैव असं की, एक पडला तर दुसरा त्याच जागी पाय रोवून उभा राहतो… त्याच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी. जबर जखमी झालेलाही बरा झाल्यावर पुन्हा सीमेवर जाण्याची शपथ घेतो…..

देशवासियांनो…. सुखनैव रहा….. पोरं तिथं जागता पहारा देताहेत….. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे आणि मरण्याची रीत. हे जग सोडून निघून जाणाऱ्या हुतात्म्यांनो.. शुभास्ते पंथान: संतु! इकडे तुमचे देह मांडीवर घेऊन बसणाऱ्या चिता तुमच्या बलिदानाने सुगंधित झाल्या आहेत… सदगतीस प्राप्त व्हालच!

जय हिंद… `जय भारत !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस” ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

परिचय 

पं. पिंपळखरे, पं.जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुर्टू हे गायनातील गुरू.पंडिता रोहिणी भाटे यांना कथक नृत्याला २५ वर्षे गायन संगत.
ना. दा. ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका. ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठ येथे संगीत गुरू.

पुरस्कार

  • आदर्श शिक्षक,आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार.
  • गुणवंत युवा कलाकार,
  • गुणीदास पुरस्कार
  • पंडिता रोहिणी भाटे स्मरणार्थ आदर्श संगतकार पुरस्कार
  • ह्रदयनाथ मंगेशकर करंडक

लेखन

  • बिंदादीन महाराजांच्या कारकिर्दीवर पुस्तक ” बिंदा कहे”
  • अस्तित्व,रानपाखरं एकांकिका पुरस्कार प्राप्त.
  • फलकलेखनावर पुस्तक बोलका फळा.

? मनमंजुषेतून ?

“तुळस” डॉ. माधुरी जोशी 

मी अनेकदा  अगदी मागून आणून,विकत आणून तुळस लावली.पण ती कधी रूजलीच नाही.तसं फेसबुकवर खूप लोक या संदर्भात सल्लाही मागत असतात… कारण अनेकांना  ही समस्या असते. म्हणजे ही ओढ अनेकांना आहे तर. मला तुळस आवडते फार…लावायची असते पण जगत नाही. आजवर उपाय शोधत राहिले… वाट पहात राहिले सुंदर, डौलदार  तुळशीची…

काही कामासाठी एकदा कोकणात गेले होते..बसची वाट पहात होते. बसथांब्यावर बसायची काहीच सोय नव्हती…पण बसथांब्याशेजारीच ग्रामपंचायतीची इमारत होती. मग तिथल्याच एका पायरीवर रुमाल पसरला आणि वाट पहात थांबले.जरा इकडेतिकडे पहात होते अन् ती दिसली. जराशी कोपऱ्यात.बऱ्यापैकी मोठी… हिरवट काळसर पानांनी रसरशीत फुललेली…असंख्य जांभळट छटेच्या मंजिऱ्यांनी डवरलेली….

ना कुणी तिची निगा घेत होतं…ना कसली कुंडी, ना बांधलेला पार…  ना तुळशी वृंदावन….पण ती खूष होती…अगदी तृप्त… समाधानानं डवरलेली… आनंदानं फुललेली… मी आश्चर्यचकित!! ही अशी माझ्याकडे  का नाही भेटतं… मी तर पाणी, उन्हं,औषधं, माया सगळं देते हिला….उत्तर मिळालं नाहीच… आणि बसही आली. मी परतीला निघाले…

काही दिवसांनी अशीच बहिणीच्या फार्म हाऊसवर गेले….दोन चार पायऱ्या चढून वर दार होतं घराचं….पायरीवर पाऊल ठेवलं आणि परत ती दिसली.त्या पायरीला जरा लहानसा तडा गेला होता.जरा मातीची फट झाली होती म्हणा ना…त्या चिरेत तुळशीचं चिमुकलं रोप डोलंत होतं…सतेज पानांचं …अगदी सात आठ इंचच  उंचीचं….जरा वाऱ्याची झुळूक आली की आनंदानं हासणारं ते रोप पाहून मला परत आश्चर्य वाटलं.कोण सांभाळतं याला?कोण पाणी देतं?काळजी घेतं….कोsssणी नाही….तरी ते घट्टमुट्टं उभं आहे…आपल्यातच रमलंय जसं काही…..मी तर थक्कंच…कारण मी किती धडपडत होते आणि माझी  तुळस काही जगंत नव्हती….आम्ही तिला पाहून काळजीनं पायरी चढलो होतो..पण मला वाटलं दुसऱ्या कुणाचा पाय पडू शकतो…आपण तिला तिथून हालवलं पाहिजे…त्या एवढ्याशा पायरीच्या फटीत ती अशी काही खोल घट्ट मुळं धरून रूजली होती ती सहज निघेना.मग उलथनं,खुरपं अलगद वापरून ती काढली आणि शेजारी रिकाम्या जमिनीत लावली…वाटलं ती आनंदेल, खूप खूष होईल,,,पण कसलं काय? तिनं संध्याकाळी मानंच टाकली…जणू पायरीच्या हक्काच्या, प्रेमाच्या तिच्या घरातून तिला बेघर केलं मी….

खूप अपराधी वाटलं.वाटलं बिच्चारी छान डोलत होती…वारा पीत होती…निरागस बाळासारखं हासत होती…. कशाला केलं मी हे?आम्ही परतलो . मनात सल राहिला.परत काही महिन्यांनी एका रविवारी गेलो.पायरीशी गेलो…त्या तुळशीची आठवण झाली…संकोचायला झालं… आणि क्षणात पुन्हा नवा आश्चर्याचा धक्का बसला….तिथे तसंच चिमुकलं,हासरं,सतेज तुळशीचं रोप डोलत होतं.मेव्हणे म्हणाले ते लावलेलं नाही ..ते आपोआप येतंच….मला निसर्गाचं आणि त्या रोपाचंही नवल वाटलं..ही काय जादू…परत तिथंच ही निर्मिती कशी? किती महान आहे निसर्ग यांची साक्षंच पटली…. आणि माझी खंत परत उफाळून आली.मला सुंदर तुळस हवी होती.सुदैवानं अंगण होतं.अगदी कावेच्या रंगाचं वृंदावन ..पणतीचा कोनाडा सगळे लाड केले असते तिचे.छोटा सुबक कट्टा केला असता.परवचा ,गप्पा गोष्टी रंगलं असतं.तिळाचं तेल कापसाची वात वृंदावनाच्या कोनाड्यात उजळलं असतं मंद,शांत,मंगल,पवित्र….शहरी झगमगाटापासून दूर…बालपणापासून ठसलेलं….पण ती माझ्या अंगणात रमतंच नव्हती….त्या ग्रामपंचायतीच्या अंगणातली नाही तर पायरीच्या फटीतली तुळस मला चिडवत होती जणू..

एवढं का हवं होतं मला तिचं अस्तित्व?….कारण तिच्या सान्निध्यातला श्वास प्राणवाचक…प्रसन्न…हवाहवासा….खरंतर ना तिला फूल ना रंगांची पखरण…

पण तिचा हिरवट काळसर पानांचा विस्तार आगळा सुगंधी…औषधी….थेट गाभाऱ्यात भेटणारी तुळस….तिचं रोप कुठेही भेटो नमस्काराला हात जुळणार अशी तिच्यावर श्रद्धा…. श्वासात शुद्ध गंध भरणारच तिचा..मनात आठव कृष्णसख्याचा, विठू माऊलीचा नाही तर सत्यनारायणाच्या पूजेच्या विष्णूसहस्रनामात वाहिल्या जाणाऱ्या तबकातल्या सहस्र तुळशीपत्रांचा….मनात विसावलंय सुवर्णतुलेतलं  ते तुळशीपत्र नाही तर दानावर त्यागाची मोहर उमटवणारं एक पान…निर्मळ,निर्मोही मनाचं रुपडं जणू… नाही तर द्रौपदीच्या अक्षयपात्राचा अन्नपूर्णेच्या थाळीचा दाखला… नाही तर अंतिम प्रवासात मुखावर ठेवलं जाणारं ते पान…

उदात्त विचार,अध्यात्म असो नाहीतर आजीबाईच्या बटव्यातलं बाळाचं औषध,काढा…सगळीकडे तुळशीचं अस्तित्व…सहज,सोप्पं पण अनमोल…म्हणून तर तिला अंगणात,पूजेत मान…केवढीही बाग फुलुदे,अनेक रंग,गंध,आकारांची उधळण होऊदे.‌..तुळशीचं महात्म्य,सौंदर्य,पूजन अ बा धि त!!!!

आणि ती रूजणार तिच्या मर्जीने,,,, तिच्या आनंदानं…. कारण तिला खात्री आहे किती ही माजलेलं तण,गवत उपटा… त्यात वाढलेलं तुळशीचं रोप उपटून फेकणार नाहीत… त्यांची काळजी घेणारंच…फारतर नव्या मातीत नव्या कुंडीत रुजवणार कारण तुळस आहेच मंगल,पवित्र, सात्विक म्हणून तर देवांची ही लाडकी….साधी पण जीव लावणारी , जीव जपणारी…रांगोळीनं साधी तिरकी रेषा काढा आणि तुळशीपत्र ठेवा शेजारी…मनात कृष्णसख्याची बासरी गुंजले आणि रांगोळीच्या रेषात कटीवर कर आणि गळ्यात तुळशीहार मांडा…टाळ मृदंगाच्या घोषात विठुमाऊलीची गळाभेट होईल जणू.. म्हणून तर शेतीची कामं संपवून…कपडे दोनचारंच पण टाळ,मृदंग, वीणा डोईवर तुळशीवृंदावन घेऊन या संतांना आणि विठुरायाला भेटवणारे वारकरी..त्यांची श्रद्धा,माया,प्रेम जाणून  या प्रवासात संगत करते आणि पंढरपुरात अधिक सुखानं, समाधानानं डवरते.,, विठुरायाला आलिंगन देणे…गाभारा तिच्या गंधाने कोंदतो …अशी साजिरी……तुळस !!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली !” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली ! ☆ श्री मनोज मेहता 

डोंबिवली जुन्या जमान्यातली,

डोंबिवली गर्द हिरव्या झाडीत लपलेली !

इवलुशा लाल लाल मातीच्या रस्त्यांची ! टुमदार बंगल्यांची, सुंदर,

चिकनी -चिकनी, डोंबिवली !! 

माझी फोटोग्राफी १५ मे १९७२ पासून, माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुरु झाली. भावाने सांगितले की इथे जाऊन अमुक अमुक यांना भेट, लग्नाचे इतकेच फोटो काढायचेत. हो, त्या जमान्यात ३६ ते ४८ म्हणजे ३ / ४ रोलची छायाचित्रं, म्हणजे भरपूर मोठा अल्बम. बारा फोटो एका रोल मध्ये. मग माझी स्वारी कॅमेऱ्याची बॅग घेऊन इच्छित स्थळी, म्हणजे त्यांच्या घरी पोचायची. ‘अरे वा वा, ‘ये मनोज ! अगं, मनोज आलाय, आटपा गं लवकर, अशा आरोळीनं माझं स्वागत व्हायचं. कारण त्याकाळी घरी देवाला नमस्कार करताना, हातावर दही देताना, मनांत असेल तर एक समूह फोटो असा शुभकार्याच्या फोटोंचा क्रम असायचा.

नंतर छान कौलारू घराच्या बाहेरील मंडपात किंवा आफळे राम मंदिरात अथवा मोजक्या मंगल कार्यालयात ही कार्य होत असत. सुरूवातीला  गुरुजींच्या पाया पडून, माझा छायाचित्रणाचा प्रवास सुरु व्हायचा.

मी लग्नाचे सर्व ब्राम्हण -विधी अन् जेवणावळींचे फोटो काढून, माझ्या घरी दुपारी १२ पर्यंत परतायचो.

त्यात सीकेपींचं लग्न असेल तर  अर्धा तास अगोदरच घरी ! मग सायंकाळी ६ ते ८ स्वागत समारंभ असायचा. तेव्हा आलेल्या प्रत्येकाला प्रचंड प्रसिद्ध असा गोल्डस्पॉट, व्हॅनिला / तिरंगी / टूटी-फ्रूटी आईस्क्रीम किंवा जॉय आईस्क्रीमचे कप, अशाप्रकारे हे डोंबिवलीतील स्वागत समारंभाला असायचं हं ! नो जेवण भानगड ! आणि या स्वागत समारंभाचे फोटू काढून मी अन नवरा नवरी साडेआठला आपापल्या घरी असायचो बरं !

तर मंडळी सत्तर ते ऐंशीच्या दशकात फोटोग्राफर, गुरुजी, वाजंत्रीवाले व मंगल कार्यालयं यांची संख्या अगदीच तुटपुंजी असायची. आणि मुख्य म्हणजे ज्यांना बोलावलं जायचं ते वेळेच्या आधी हजर असायचे. माझ्या छायाचित्रणाच्या सुरवातीच्या, म्हणजे १९७२ पासूनच्या कार्रकिर्दीत, साखरपुडा, लग्न- समारंभ इ. साठी, श्री. धामणकर, दीक्षित वा भातखंडे गुरुजी असायचे. त्यात प्रामुख्याने मला गुरु म्हणून लाभले ते ‘धामणकर गुरुजी’. मी इतक्या लहान वयात फोटो काढतो, म्हणून कौतुक आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेमही होतं. शिस्तबद्ध पण शांत स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य ! प्रत्येक विधीचा अर्थ वधू -वरास समजावून, मगच त्यांच्याकडून कृती करून घ्यायचे. त्यात अजून एकाची भर पडली तो म्हणजे मी ! ‘मनोज, आता या विधीचा फोटो काढ. नीट काढ हो, पुन्हा मी फोटो काढायला देणार नाही. ‘ ते अर्थ सांगत असताना, माझंही लक्ष असायचं. धामणकर गुरुजींच्या ‘गुरुकृपेने’ मी  हळूहळू का होईना पण सर्व आवश्यक विधींचे फोटू काढण्यात तरबेज होऊ लागलो होतो.

सुमारे ४८ वर्षांपूर्वीची घडलेली गोष्ट आहे ही ! मला नक्की आठवत नाही १९७५ की ७६, पण डोंबिवली पश्चिमेला नाख्ये यांच्या एव्हरेस्ट मंगल कार्यालयात लग्न होते. त्या मंडळीचं नावही आता लक्षात नाही. कार्यालयाच्या चौफेर फेरी मारून, कुठं क्लोजअप फोटो घेता येतील, याचा मी आधी अंदाज घ्यायचो. मग पुढचा प्रवास सुरु व्हायचा.

तर मंडळी, त्यादिवशी या लग्नकार्यात गुरुजींचा पत्ताच नाही, कुजबुज सुरु झाली. काही मंडळी गुरुजींच्या घरी जाऊन आली, अजून कोण गुरुजी उपलब्ध आहेत का ते ही पाहून झालं. दोन्हीकडची मंडळी चिंतेत ! बरं गंमत म्हणजे, मला याचा काहीच थांगपत्ता नाही. काही वेळाने मी विचारायला गेलो की एवढा का उशीर होतोय, तेव्हा मला हे कारण समजलं. मी भाबडेपणाने विचारलं, ‘ मी करु का विधी ? मला मंत्र येत नाहीत, पण सगळे विधी व्यवस्थित करून घेईन आणि हो, मंगलाष्टका मात्र म्हणा कोणीतरी, हे सांगताच ते उडालेच की ! एकतर मी अर्ध्या चड्डीत फोटो काढायला आलेलो आणि हा एवढासा मुलगा हे काय सांगतोय ?

नंतर कोणीतरी आजोबा आले व त्यांनी माझी नीट चौकशी करून, खात्री करून, होकार दिला.

मग मी सीमांतपूजन करून, मुलीला गौरीहाराजवळ बसून पूजन करायला सांगितलं. नंतर कार्यालयाच्या मुख्य दारात वराकडच्या मंडळींना उभं करून, वधूच्या आईने वराचे पाय धुवून, तिलक लावून ओवाळायला सांगितलं. वधूच्या बाबांनी वराच्या हातात नारळ देऊन त्याला मंडपापाशी आणलं. माझ्या नशिबाने दोघा तिघांनी मंगलाष्टका म्हटल्या. बरोबर मुहूर्तावर, ‘आता वधू-वरांनी एकमेकांना हार घाला, ‘ अशी मी जोरात आरोळी ठोकली, मी दोघांचे फोटो काढले अन् वाजंत्रीही वाजली. ‘वधूवरांना करवल्यांनी ओवाळा हो !’ ते झाल्यानंतर नवरा-नवरीला मी पाटावर बसण्यास सांगितलं. नंतर कन्यादान, सप्तपदी इ. झालं. इतकं सारं, मी फोटो काढत -काढत (आजच्या जमान्यातील 20-20 की. ) पार पाडलं. लक्ष्मीपूजनाला नवऱ्यामुलाला मी विचारलं, ‘तुझ्या बायकोचं नाव काय ?  तेच लिहायचं हं, ताटातल्या तांदुळात !  हे सारे विधी मी प्रत्येक विधीचा फोटो काढून व पुढच्या विधीला काय करायचं ते सांगत, असं एक तासात आटोपलं. आता हे सर्व पाहायला, दर्दी ज्येष्ठांची गर्दी होतीच. सर्व विधी झाल्यावर, त्या ज्येष्ठांपैकी कोणी आजी होत्या, त्यांनी वधुवराला माझ्या पाया पडायला लावलं. ‘अहो, ते नवरा नवरी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मीच त्यांच्या पाया पडतो ! असं मी म्हटल्यावर तुफानी हास्यकल्लोळ झाला !  पण मला काही कळेना, हे माझ्या का पाया पडतायत ? आणि वरती हातात पाकिट देऊन, मला आजींनी जवळ घेऊन माझी पापी घेतली, मला त्यांच्या जवळ बसवून प्रेमानं जेवायला घातलं.

ते पाकिट न उघडता, मी घरी आल्यावर वहिनीच्या हातात दिलं. तिने विचारलं, ‘ काय आहे यात ?’ मी म्हटलं, ‘मला काय माहित ? लग्नात दिलं मला. ‘ तिनं उघडल्यावर कळलं, त्यात २१ रू. होते.

नंतर फोटोचा अल्बम घ्यायला, ती मंडळी घरी आल्यावर, मी केलेले प्रताप भावाला व माझ्या वडिलांना कळले. ‘मनोजनेच आमच्याकडच्या लग्नात सर्व विधी पार पाडले !’ ‌’काहीतरी काय सांगताय ? आम्हाला काही बोलला नाही, ‘ असं म्हणत, भावानी मला हाक मारली. त्यांच्या समोर आल्यावर मी सांगितलं, यांच्याच आजीनं नवरा -नवरीला माझ्या पाया पडायला लावलं !’ हे ऐकताच सगळे खो खो हसायला लागले.

पण त्यादिवशी गुरुजी न आल्यामुळे हे सुंदर लग्न- रामायण घडलं. या प्रसंगातील प्रेमळ आज्जी, नवरा -नवरी, माझी चौकशी करून मला विधी करायला परवानगी देणारे आजोबा अन् सारी मंडळी… आजही हे आठवलं की मला गुदगुल्या झाल्याशिवाय रहात नाहीत.

यानंतर असा प्रसंग कधीही परत माझ्या वाट्याला आला नाही.

हां, कधी बारशाला तर कधी साखरपुड्याला मला समोरून कधीतरी कोणी विचारतं, ‘तुम्हीच सांगा हो मेहताजी, आता पुढे काय ते !’ मग मी त्या त्या प्रसंगी, कोणी काय करायचं ते व्यवस्थित सांगतो.

पण पण मी लग्नात कुण्या मुलीचा भाऊ तर कधी मामाचं पात्र, आयत्यावेळी अजूनही वठवतोय अन् कार्य सुरळीत पार पडतं. ते ही फोटोग्राफी करता करता हं.

हे घडून आलं ते फक्त अन फक्त माझ्या कारकिर्दीला वळण देणाऱ्या, गोविंद धामणकर गुरुजींच्या गुरुकृपेमुळेच, अन तेही बाल वयात !

त्यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले) इथून पुढे

एक दिवस ठरवून माझे चित्रकलेचे स्टॅन्ड ( ईझल ), बसण्याची फोल्डींगची छोटी खुर्ची, कोणी ओळखू नये म्हणून डोक्यावर मोठी क्रिकेटची टोपी, व रंगकामाचे इतर सर्व साहित्य सॅकमध्ये घेऊन मी रात्रीच्या ११ वाजता मेनरोडवर रस्त्याच्या बाजूला निवांत बसलो व रेखाटनास सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त हा रात्रीचा लाईट चित्रात कसा आणता येईल ? हाच विचार चालला होता व वेगळ्या विचारात मी चित्रकामात पूर्ण गुंग झालो होतो.

पाचगणी हे मुख्य शहर आहे व त्याच्या आजूबाजूला दांडेघर, आंब्रळ, खिंगर,  भिलार, राजपूरी, तायघाट अशी छोटी मोठी खेडेगाव आहेत. त्याठिकाणावरून दिवसभर दुकानात, हॉटेलात कामे करून परत त्यांच्या गावाला परतणारा मोठा कामगार व व्यापारीवर्ग आहे. आजही काही कामगार दांडेघर गावाकडे उशीरा निघाले होते. त्यातले काही कामगार थोडी फार नशापाणी करून जाणारेही असतात.

इकडे माझे  ११ वाजता सुरु झालेले चित्रकाम १२ वाजेपर्यंत रंगात आले होते. मी पूर्ण स्वतःचे  देहभान विसरून चित्रात मग्न झालो होतो.आणि अचानक समोरून येणाऱ्या दांडेघरच्या दोन माणसांचा मोठा आरडाओरडा ऐकू आला. 

“ भूत, भूत,चित्रकाराचे भूत……… चित्रकाराचे भूत…….पळा पळा “

असे घाबरून ओरडत ते माघारी पळू लागले हातातल्या पिशव्या सांभाळण्याचेही त्यानां भान राहिले नाही आणि ते वेगाने परत आल्या दिशेने पळू लागले, म्हणून त्यांच्या पाठीमागे येणारे आणखी दोनचार जण घाबरून तेही पळू लागले.

त्यांना असे पळताना पाहून मीही घाबरलो. कारण मला ओळखले तर शाळेत बोंबाबोंब होईल व मला जाब विचारला, तर रात्रीची चित्रे काढतो म्हणून कदाचित नोकरी देखील जाईल या विचाराने  पटापट सामान आवरून मी रस्त्याच्याजवळ एका मोठ्या वडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसलो.

दांडेघरची ही माणसे आता  राम राम राम राम राम राम राम असे मोठ्यानेच म्हणत  म्हणत दबकत दबकत हळूहळू, दमादमाने सावधपणे येत होती. आणि बघतात तर तेथे कोणीच दिसेना. त्यातला एक प्यायलेलाच होता. तो छाती ठोकून आत्मविश्वासाने सर्वांना सांगत होता….. 

“ म्या इथंच बघितला ते भूत, मोठ्ठी टोपी घातली होती.”

दुसरा त्यात भर घालून म्हणाला.. 

“ अरं इंग्रजाचे होतं ते भूत “

“नाय,अरं बाबा ही पारशांची शाळा होती, म्हंजी भूत पारशीच असणार नव्ह.”

“अरं पारशी चित्रकाराचे भूत म्हंजी जालीम लेका, लई डेंजर असणार ‘

“लई कटकटी असत्यात पारशी लोकं, म्हंजी भूत भी कटकटी आन जालीम असलं तर सोडणार नाय, आपल्या मागंसुद्धा लई कटकट  लागलं. “ एकाने असा अनुभव सांगितला. 

“अरं तुला सांगतो एकदा का धरलं ना, तर आजिबात सोडत नाहीती ही भूत. मानगुटीवर बसत्यात, नाचत्यात, लई हाल हाल करत्यात.” 

मग एका सुरात सर्वजण राम राम राम राम राम राम राम राम राम असं मोठ्याने ओरडत एकमेकांचा हात पकडत त्यांनी जकात नाका पार केला. मी देखील झाडामागे अंधारात रोखून धरलेला श्वास सोडला. रात्रीचे चित्र काढणं एवढ काही सोप्प काम नाही हे माझ्या लक्षात आले व नंतर काही माझी चित्र पूर्ण करण्याची मानसिकता राहीली नाही. सगळा मूडच गेला आणि मी चित्राचे सामान घेऊन गूपचूप पणे परत शाळेत परतलो. 

दुसऱ्या दिवशी शाळेतला दांडेघरचा एक कामगार सर्व स्टाफला सांगू लागला, की रात्री शाळेच्या रस्त्यावर चित्रकाराचे भूत गावातल्या लोकांनी पाहिले….. 

…  भूत असा छोट्या खूर्चीवर बसला होता, लई मोठी हातभर लांब टोपी घातली होती. त्याचे पाय व हात खूप लाबंच्या लांब होते. ते पारशी भूत होते. लई जालीम, लई डेंजर. थोडक्यात वाचली मंडळी, नाहीतर मानगुटीवर बसला असता. 

लई डेंजर भूत होते. यापुढे रात्रीचे सावध रहा,असा सल्ला देखील त्याने दिला. मी देखील हो हो म्हणत  त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भारी गंमत वाटली. माणसे एखादी घटना अव्वाच्या सव्वा करून कसे सांगतात ते मी अनुभवले.

त्यादिवसापासून आता मी रात्रीची चित्रे काढतो पण घरात बसूनच. रात्री चित्र काढायला कधी बाहेर ऑन दी स्पॉट जात नाही. पण एक नाईटस्केपचा चांगला विषय चित्रित करायचा राहिला याचे शल्य मनात मात्र राहूनच गेले.

आज मागचा विचार करताना जाणवते हे चित्रकाराचे भूत अजब असते. त्याने एकदा पकडले की ते कधीही आपल्याला सोडत नाही. आजही डोंगररांगा, शेतीची हिरवळ, समुद्र, बोटी, झाडे, इमारती, टेबललॅन्डची पठारे, वाईची मंदीरे, घाट, महाबळेश्वरचे  सृष्टीसौंदर्य पाहिले की  मनात परत परत चित्रे काढण्याची उर्मी नव्याने दाटून येते व आपण चित्रवेडाने पछाडलेलो आहोत याची पुन्हा खात्री होते. या  चित्रकाराच्या भूताने आपल्याला पछाडल्यामूळे, झपाटल्यामूळे कितीतरी असामान्य कलाकृती आपल्या हातून घडून गेल्या. 

कितीतरी मोठी माणसे अनपेक्षितपणे आपल्या जीवनात आली. आपली आर्थिक परिस्थिती पार बदलून गेली. चित्रकाराच्या भूतामूळे आपले जीवनच पालटले. हे भूत तुमची ध्येये सतत आठवण करून देते व कामाला जुंपते. नवनव्या गोष्टी, संशोधन, साधना करण्यास भाग पाडते. त्यामुळे माणूस सतत उत्साही व कार्यमग्न राहतो.

आपण आपल्या कलेने वेडे झाल्याशिवाय जग आपल्याला शहाणे म्हणत नाही हेच खरे. 

आपण कोणत्याही क्षेत्रात असलो उदा.  लेखन, चित्रकला, शिल्पकला, खेळ, गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य,चित्रपट, शिक्षण, वकील, इंजिनियर्स, पत्रकारिता, डॉक्टर,सरकारी किंवा खाजगी नोकरीत असो किंवा स्वत:च्या उद्योग व्यापारक्षेत्रात असो.आपण कार्य करत असलेल्या त्या त्या क्षेत्रात स्वतःला झोकून पूर्णपणे आंतरबाह्य झपाटलो, पछाडलो तर काम उत्तम होते. 

हाती घेतलेले कार्य मनापासून,आनंदाने उत्साहाने पूर्ण करण्याची प्रक्रिया एन्जॉय करायला शिकलो,त्यातून सर्वांना आनंद घ्यायला व द्यायला शिकलो तर कार्यात सर्वांना यश हे १००% नक्की मिळणारच. 

म्हणून सर्वानांच ज्या त्या आवडत्या विषयातील भूताने पछाडलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. ज्यावेळी हे भूत आपल्याला पछाडते त्यावेळी आपली सर्व शक्ती वापरून खरोखर उत्तम कार्य करण्याची असामान्य प्रेरणा मिळते. स्वत:ला विसरून दिवसरात्र आवडीच्या क्षेत्रात यश संपादनासाठी झोकून घ्यावेसे वाटते.

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकाराचे भूत – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शैक्षणिक केन्द्र आहे. पण आज जी पाचगणीची खरी प्रगती  दिसत आहे ती खूप हळूहळू झाली आहे. उदा. पाण्याची सोय. ब्रिटीशांनी ज्यावेळी येथे शाळा बांधल्या, विद्यार्थी आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढू लागले तसतसे पाण्याचे संकटदेखील मोठे होत गेले. चाळीस पन्नासवर्षांपूर्वी पाचगणीत पाण्यासाठी फक्त विहिरींचाच वापर व्हायचा. गावात आणि खाजगी बंगल्यामध्ये आजही काहीजण विहिरीचे पाणी वापरतात पण त्यावेळी विहिरीनां दुसरा पर्यायच नव्हता. लाल दगडांमध्ये बांधलेल्या या विहिरींचे पाणी आयर्नयुक्त आणि चवदार असल्याने सर्वानां ते आवडायचे. वाईला धोमधरणाची निर्मिती झाली आणि नंतर धरणाचे पाणी पाचगणीला येवू लागले. सिडने पाईंटच्या तळमाळ्याजवळ पंपींग स्टेशन बांधले होते. तेथून पाणी प्रथम गार्डनच्या शेजारी शुद्धीकरणासाठी येई व नंतर  टेबललॅन्डच्या पायऱ्याजवळच्या टाकीतून संपूर्ण गावाला नळाने पाणीपुरवठा होई. पण हे सगळे प्रकार विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून असायचे. कधी कधी वीजपुरवठा नसला की पाण्याचा तुटवठा व्हायचा व स्थानिक रहिवाशानां परत विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणायला लागायचे व कपडे धुवायला टेबललॅन्डचे तळे किंवा गावविहीरीवर जावे लागत असे. (आता मात्र पाचगणीला महाबळेश्वरच्या वेण्णा लेक मधून पाणी पुरवठा होतो.)

माझ्या लहानपणी मोठे कुटूंब असल्याने कपडे धुण्यासाठी सगळे बहिणभाऊ गावविहिरीवर जायचो. तेथे भरपूर हुंदडायला मिळायचे म्हणून मदत करण्याचा, अभ्यास करण्याचा बहाणा करून कपड्यांच्या बादल्या घेऊन विहिरीवर जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. एका रविवारी मी गावविहिरीच्या परिसरात दप्तर घेऊन मनसोक्त टाईमपास करत होतो.

गावविहारीचा पूर्वेकडेचा रस्ता चालत गेलो की रेशीम केन्द्र व ओक्स हायस्कूल लागायचे. या ओक्स हायस्कूलच्या बाजूचा उताराचा रस्ता जरा मस्त वाटला म्हणून मी सहज चालत गेलो तर तेथे एक पत्र्याचे शेड मारलेले होते. आणि त्यामध्ये लोखंडी बीडाच्या बारचे चौकोनी पिलर्स उभे केले होते.

त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच जात होतो. हे ठिकाण स्मशानभूमीचे आहे हे लहान असल्यामूळे मला माहीतच नव्हते. कारण लहान असल्यामूळे मला कोणी नेले नव्हते.मी तेथे गेल्यावर मंत्रमुग्धच झालो. कारण त्या ठिकाणावरून समोर कमळगड, मांढरदेवीचा डोंगर व अफलातून दिसणारे कृष्णा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसत होते. त्या डोंगरावर नुकतीच पूर्वेकडचे सकाळची कोवळी उन्हे पडल्यामुळे डोंगराच्या रांगा व त्यावरील चढउतार, डोंगरांच्या सावल्या, घड्या,पाण्यात पडलेली प्रतिबिंबे. छोटी छोटी घरे, भाताची हिरवीगार शेती त्यातच चिखली व बारा वाड्यांचे खोरे, ती छोटी घरे पाहून मी परदेशातील स्वित्झर्लंडचा देखावा पाहतोय असे मला वाटू लागले व मी मनाने पूर्णपणे भारावूनच गेलो. हे दृश्य आपण कागदावर चित्तारायलाच पाहिजे असे मला खूप मनातूनच वाटू लागले. पाठीवरचे दफ्तर बाजूला ठेऊन त्यातील चित्रकलेची वही काढून त्या स्मशानभूमीच्या जाळण्याच्या लोखंडी चौकानावर बसून  पेन्सीलने चित्र काढण्याच्या कृतीत आणि त्या शांत वातावरणात मी इतका तल्लिन झालो की माझे दोन तास कसे गेले ते मला कळलेच नाहीत.

माझी चित्रसाधना अचानक झालेल्या नानांच्या आरडाओरड्यांमुळे भंग पावली. मी पाचगणीत एस.टी.स्टॅन्ड समोर जेथे राहायचो त्या इमारतीच्यावर लिंगाण्णा (नाना) पोतघंटे राहायचे, त्यांच्या एकत्र कुटुंबाचा शाळेचे कपडे धुण्याचा, इस्त्रीचा  ‘ दिपक ड्रायक्लिनर्स ‘ नावाचा व्यावसाय होता. पाण्याचा तुटवडा असल्याने ते स्मशानभूमीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका जिवंत झऱ्याच्या घाटावर नेहमी कपडे धुवायला यायचे.मला स्मशानभुमीत चित्र काढताना पाहून ते आश्चर्यचकीत झाले व घाबरले देखील  त्यांच्या आरडाओरड्यामूळे मी तेथून पळ काढला व उशीरा घरी पोहचलो.

नानांनी घरी आईला तुमचा मुलगा मसणवट्यात चित्र काढत बसला होता ही घटना सांगितली आणि त्यामूळे सगळे वातावरण तंग झाले. अशा या तंग वातावरणात मी घराच्या पाठीमागच्या दरवाजातून हळुवारपणे घुसत असतानाच माझे जंगी स्वागत झाले. माझी आई अशिक्षित व अडाणी होती. ती मनातून खूप घाबरली होती,तीला पक्की खात्री झाली होती की कोणत्या तरी चित्रकाराच्या भूताने मला धरले असणार. ते भूत माझ्या अंगात घुसल्यामूळेच मी सतत भटकत सारखी सारखी  चित्र काढत असतो. त्यामूळे आईने घरात दरवाजात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवले आणि मग माझ्या चेहर्‍यावरून भाकरीचा तुकडा,मीठ, मोहरी, मिरच्या ओवाळून ईश्वराला मोठ्याने साकडे घातले की इडापीडा टळो आणि चित्रकार भूताच्या तावडीतून माझ्या लेकाची सुटका होवो.

पण माझ्यावर काही फरक पडलाच नाही. या उलट दिवसेंदिवस वेळ मिळेल तसे कृष्णा व्हॅली, पांडवगड, कमळगड, नवरानवरीच्या डोंगरांच्या रांगा, चमकणारे धोम धरणाचे पाणी, यांची चित्रे काढण्याचे माझे प्रमाण वाढले. तासनतास त्या प्रदेशाची चित्रे काढणे त्या परिसरात फिरणे हा माझा आजही आवडीचा छंद आहे. एकंदर आईच्या दृष्टीने चित्रकाराच्या भूताने मला आंतरबाह्य पछाडलेले होते, झपाटले होते. मी एकदम वाया गेलो असे सर्वानां वाटायचे.

एकदा मात्र मोठ्ठीच गंमत झाली. ती कायम लक्षात राहण्याजोगी आहे म्हणून आज तुमच्याशी शेअर करतोय. पाचगणीत आर्ट गॅलरी करण्याचा माझा उद्देश होता,  त्या गॅलरीच्या दरवर्षी जागा बदलत असल्यामूळे  मी वेळोवेळी त्यात अपयशी ठरलो.सन २००० साली मी खूपच निराश झालो होतो कारण माझ्या  आयुष्याची वाताहात झाली होती. मोठी आर्थिक कुचंबणा झाली व नाईलाजाने मला पाचगणीच्या बिलिमोरीया  शाळेत कलाशिक्षकाची नोकरी पत्कारावी लागली. तेथे शाळेतच राहत होतो.

शाळेत शिकवत असलो तरी चित्रकाराचे भूत डोक्यातून जात नव्हतेच.बिलिमोरीया स्कूलचे लोकेशन  टेबललॅन्डच्या पायथ्याशी व सिडनेपॉईंटच्या (सध्याचे रविन हॉटेल )जवळ असल्याने मी जमेल तशी तेथून दिसणाऱ्या कृष्णा व्हॅलीची, शाळेच्या परिसराची, शाळेची मुख्य इमारत, डायनिंग हॉलची इमारत, प्राचार्यांचे, शाळेच्या मालकांचे निवासस्थान, रस्त्यांच्या वडांच्या झाडाची चित्रे रेखाटने सतत करत असायचो.

एकदा बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचा एक कॅटलॉग पोस्टाने आला होता. त्यात एका चित्राला जलरंगाचे पारितोषक मिळाले होते. त्या चित्रात रस्त्याच्या बाजूला एक खांबावरचा दिवा प्रकाशित होऊन छान पिवळा प्रकाश सर्वत्र पडला होता व त्या प्रकाशात इमारत, झाडे, माणसे खुपच छान दिसत होती.ते चित्र मला मनापासून खूपच आवडले. मग आपणही असे काही तरी रात्रीचा खांबावरून सुंदर पिवळा प्रकाश व सावल्या पडलेल्या आहेत, हा विषय घेऊन जबरदस्त ‘ नाईटस्केप ‘ करायचेच हा मी पक्का निर्धार केला व मग स्पॉटची पहाणी करत मी रात्रीचा फिरायला लागलो. त्यावेळी मी शाळेच्याच परिसरातच राहत होतो.अगदी कसून पहाणी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की बिलीमोरिया शाळेच्या प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यालगत असा  म्युनिसिपालीटीचाच एक उंच खांब आहे. तेथुन झाडांच्या रस्त्यावर पडलेल्या पिवळ्या प्रकाशामुळे छान सावल्या पडतात व तो परिसर चित्रित करण्याजोगा आहे. म्हणून मी त्याचा अभ्यास सुरु केला. रात्रीच्या ११ वाजल्यानंतर थोडा उशीरा गेलो तर गाड्यांची व माणसांची गर्दी देखील खूप कमी असते व निवांतपणे चित्र पुर्ण करता येईल हे माझ्या लक्षात आले.

– क्रमशः भाग पहिला

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print