कविता म्हणजे भावनांच्या आकाशात उमटलेला शब्दांचा चंद्र…
ती कधी मनाच्या वेदनांना स्पर्श करते तर कधी आनंदाच्या क्षणांना सुंदर रंग देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हे केवळ शीर्षक नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक हळवा प्रवास आहे.
कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते ती मनाच्या भावनांना मिळालेली सुंदर अभिव्यक्ती असते.. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे बोलून व्यक्त करता येत नाहीत तेव्हा कविता आपल्या भावना अलगद शब्दांत उतरवते. “कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन मनांमधील नात्याची भावनांची आणि आठवणींची एक सुंदर सांगड होय.
तुझ्या कवितेत प्रेमाची कोवळी चाहूल असते… तुझ्या प्रत्येक ओळीत स्वप्नांचे मोर नाचत असतात… तुझे शब्द जसे मंद वाऱ्याच्या झुळुकीसारखे मनाला स्पर्शून जातात तसेच माझ्या कवितेत आयुष्याच्या अनुभवांचे गहिरे रंग असतात. माझ्या शब्दांत कधी संघर्षाची कहाणी असते तर कधी आठवणींच्या पावसात भिजलेले क्षण… या दोन्ही कविता जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्या जीवनाचे सुंदर गीत बनून जातात… तसेच
तुझ्या कवितेत प्रेमाचा गोडवा असतो तर माझ्या कवितेत आयुष्याचे अनुभव. तुझ्या ओळींमध्ये स्वप्नांची रंगीत दुनिया असते तर माझ्या शब्दांत वास्तवाची जाणीव… पण या दोन्ही कविता एकत्र येतात तेव्हा त्या जीवनाचा अर्थ अधिक सुंदर करून जातात.
कविता ही माणसाच्या मनाचा आरसा असते. मनात दडलेले भाव न सांगितलेली दुःखे, अपूर्ण स्वप्ने आणि निरागस आनंद हे सर्व कविता सहज व्यक्त करते. कधी एखादी कविता डोळ्यांत अश्रू आणते तर कधी तीच कविता जगण्याची नवी प्रेरणा देते म्हणूनच कविता ही केवळ साहित्य नसून ती आत्म्याची भाषा आहे.
कविता माणसाला संवेदनशील बनवते. आनंद, दुःख, विरह, मैत्री, निसर्ग, प्रेम अशा अनेक भावनांना कविता सहज व्यक्त करते… म्हणूनच कविता ही प्रत्येकाच्या जीवनातील एक जिवलग मैत्रीण आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात कविता माणसाला थोडा वेळ स्वतःकडे पाहायला शिकवते. ती मनाला शांतता देते आणि विचारांना नवी दिशा देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हा केवळ शब्दांचा प्रवास नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक सुंदर पूल आहे..
तुझ्या आणि माझ्या कवितेत फरक असला तरी त्यांचा उद्देश एकच असतो मनाला स्पर्श करणे. तुझ्या ओळींमध्ये चांदण्यांची कोमलता आहे तर माझ्या शब्दांत सूर्यकिरणांची ताकद…
तुझी कविता स्वप्न दाखवते आणि माझी कविता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडते. या दोन भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून जीवनाचा खरा अर्थ उमलतो.
आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या जीवनात कविता माणसाला स्वतःशी बोलायला शिकवते. ती मनाला शांतता देते.. विचारांना दिशा देते आणि भावनांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते. कविता माणसाला अधिक संवेदनशील, अधिक जिवंत बनवते… कविता ही मनाची भाषा आहे… ती जितकी तुझी आहे तितकीच माझीही… कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी कविता असते जी त्याच्या मनात कायम जिवंत राहते.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,
“कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन हृदयांची अव्यक्त कहाणी…
☆ काय बनायचं.. गाढव? की घोडा? – लेखक : श्री नाना पाटेकर☆ संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली.. आणि आता..
नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.
.. परीक्षेत १००% पाहिजेत..
.. कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे.
.. त्यानंतर Dance क्लास attend करायचा.
.. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे!!
.. मग drawing competition असते.
.. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.
–– Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.
–– एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.
— आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी.. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे, ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत… जरा शुद्धीवर आली की “what is square of 12? ” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
मुलांना एक प्रश्न विचारला होता — ” तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात? “
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात….. ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही… पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही… School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.
.. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर
लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले.. आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात
शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.
.. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात.
लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.
ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग…
vitamins, DHA, minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात.
… वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium, proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली – – आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन!!
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते.
संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही.
मित्र फक्त WhatsApp, face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते… ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात.
… ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते, त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.
… ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण-तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली.
… एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.
कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती…
.. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
– – अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
– – guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत.
… काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय… पण त्यात देशाचं नाही.. भांडवलदारांच हित साधला जातंय.
… पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील…
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? … असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात.
– – “निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत.
– – जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका.. प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल.. ह्याची सतत तपासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत.
अनावश्यक विषय शिकवत नाहीत.
– – चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
– – प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं? – –
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा…
टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता.
.. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय… गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती.
सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले-
“ या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का? ”
टागोर म्हणाले—
“चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची.
ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “
… टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात.
.. आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात!
– – मग एक रेस सुरु होते..
… आणि जगायचं राहून जातं!!
☆
लेखक : श्री नाना पाटेकर
संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझी ताई खूप हुशार. शिक्षण म्हंटल तर खूप नाही. पण स्मार्ट व नेहमी उत्साही, काही तरी वेगळे करणार. नेहमीच वेगळा विचार करणारी बदलत्या जगाबरोबर चालणारी “जून ते सर्वच सोनं ” असा समज व नवीन “आधुनिक सर्वच चांगलं किंवा खराब” या दोन्ही चा बरोबर विचार करून नवीन विचार मनात रुजवणे, तिला सहज जमत. एकतर विचार सरणी उत्तम, स्पष्ट, कुठेही ‘ confusion ‘नसते. तिच्या विचारात काल्पनिक भितीला कुठे जागाच नसते. जमलं तर उत्तम. नाही तर काही तरी केल्याचे समाधान. यश मिळेल, नाही तर अनुभव तर नक्कीच मिळेल ना. हा अनुभव कुठे तरी कामी येईल. असा विचार करणारी.
थोडी बिनधास्त, लोकांचा जास्त विचार न करणारी. त्यामुळे तिच्या कामात येणारे अडथळे कमी असतात. लोकांना भेटणे. त्यांचे विचार जाणून घेणे. व त्यावर विचार करणे जमते तिला. तिच्या प्रत्त्येक गोष्टी चे logic असते तिच्याजवळ. ते सांगताना भरपूर आत्मविश्वास सुंदर, योग्य शब्दात मांडणी, व आवाजात माधुर्य असतं. त्यामुळे तिचे विचार सहज पटतात. आपल्या मैत्रिणींमधे ती सर्वांची आवडती आहे. तिच्या गृप मधे विचारांना चालना देणे, दिशा देण्याचे काम ती छान करते. तिच्या घरी कामाला येणाऱ्या बायका खूप खूष असतात. काकू!! तुमच्याशी बोलून छान वाटत. अस म्हणतात. थोडक्यात तिचे विचार पटतात.
“अहो!! असं करून बघा तर, नक्की जमेल तुम्हाला. व आवडेलही. “हे तिचं ब्रीद वाक्य.
तिचे म्हणणे, आपलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले विचार, आपले बोलणे. तुमच्या बोलण्यात तुमचे विचार झळकतात. चेहऱ्यावर कपड्यांवर थोड्या वेळाकरिता लोक भाळतात. तुमचे कौतुक करतात. यापेक्षा चांगले सशक्त विचारांचा प्रभाव जास्त वेळ राहतो.
“Branded कपडे नसलेत तरी चालेल, Branded विचार असावेत असं ती नेहमी म्हणते. ”
विचार वेगळे असावे. नवीन असावे. थोडे चौकटीच्या बाहेर चे असावे. सर्वांना प्रोत्साहित करणारे असावे. व मुख्य म्हणजे सहज अंमलात आणता येतील असे असावे. ती ‘ वेगळी वाट ‘ नेहमी शोधावी.
कोणतीही वेगळी वाट धरायला वेगळा विचार मनात आला पाहिजे. विचार पटणारा असावा. जीवनात, आपल्या कार्य पध्दतीत सहज ‘ adjust ‘ होणारा असावा. जास्त बदलाव न करता एखादे काम करायला मन सहज तयार असते. वर्षानुवर्षे एकाच विचार पद्धतीने आपण काम करतो. अगदी रोजच्या स्वयंपाकात ही बदल करायला सुध्दा खूप जण तयार नसतात. काय माहिती आवडेल का? असा विचार करून ते पूढे पाऊल टाकायला धजत नाही. आणि वेगळ्या वाटेने जायची इच्छा मनात येण्याआधी सर्व दरवाजे बंद करतात.
वेगळ्या वाटेवर थोडं चालून तर बघावं. हा विचार मनात येणे म्हणजेच जून्या बंधनातून स्वतः ला मुक्त करणे आले. वर्षानुवर्षे असलेल्या सवयीला मुरड घालावी लागेल. तेंव्हाच नवीन काही तरी घडेल. आपल्या क्षमतेनुसार, असे प्रयोग करायला काय हरकत आहे. नवीन उर्जेचा संचार होईल. स्वतः बद्दल अभिमान वाटेल. एक चांगली गोष्ट दुसरी चांगली गोष्ट करायला प्रेरित करेल. कमी त कमी काही तरी केल्याचे समाधान मिळेल.
एकदा ताईने सांगितले. म्हणाली मला आठवत, आम्ही थाइलॅंडला जायचे ठरविले. तेथे पॅरा ग्लायडिंग हे टूर मधे करविणार होते. जेंव्हा पासून टूरचे ‘ booking ‘ झाले होते, मी रोज म्हणायचे, मी अजिबात करणार नाही. मला नाही जमणार. पण त्यावेळेस एका सत्तर वर्षांच्या बाईंनी अगदी सहज केले. व तिला बघून मी पण केले. आणि खूप आनंद झाला. काही तरी नवीन ‘ adventure ‘केल्या मुळे आत्मविश्वास वाढला. व मागच्या दोन महिन्यांत वाटणाऱ्या काल्पनिक भिती ने मी माझा वेळ, फक्त माझाच नाही, घरच्या सर्वांचाच वेळ किती खराब केला. त्याचे वाईट वाटले. तेंव्हा पासून ठरविले कुठे ही नाही म्हणायचे नाही.
सांगायचा उद्देश हा की, उगीच घाबरणे हा स्वभाव असतो. पण स्वतःला समजाविणे हे काम केल्यास, वेगळ्या वाटेने जाणे नक्की जमेल.
म्हणतात ना “Age is just a number. ”
काही तरी वेगळं कोणत्याही वयात करता येत. फक्त मी काय आहे?? आणि मी काय करू शकते??? या दोन्ही मधील ‘gap’. भरता आला पाहिजे.
“आता काय झालं सर्व. , देवाने जसे आयुष्य दिले तसे जगावे. , आता या वयात काय राहील आहे? हातापायांत त्राण राहिले नाही. त्यामुळे रोजचा दिवस जसा उगवेल तसा काढायचा. “हे असे विचार म्हणजे सर्व दरवाजे बंद करणे. नवीन विचारांना डोक्यात शिरूच द्यायचे नाही. अपयशाच्या भिती ने तडजोडीचे आयुष्य जगण्यात काय मजा??”
शांत बसून दिवस घालविणे, म्हणजे जून्या घटना त्याही आपल्या बरोबर जे चूक झाले, वाईट झाले, ते उगाळत बसायचे. कारण असेच विचार मनात लगेच येतात. आपणच आपल्या विचारांना ती संधी देतो. व स्वतः ला दुःखी, असहाय समजत जातो. .
वयामानाप्रमाणे हे सर्व होणारच आहे. पण बुध्दी जागृत आहे ना. अनुभव पाठीशी आहे. रिकामा वेळही आहे. प्रत्त्येक गोष्ट करायला धावायची गरजही नाही. तेंव्हा मी या सद्य परिस्थितीत काय करू शकते??? हा विचार मनात आला, तर दहा गोष्टी सहज सूचतात. त्यातील एक निवडून करणे. म्हणजेच वेगळी वाट शोधणे होय.
कुठे तरी वाचलेलं एक वाक्य मला खूप आवडतं
“The greatest lesson I have learned in life is that I still have lot to learn. ”
जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत राबराब राबणे, म्हणजे आयुष्य जगणे नव्हे. स्वतः च्या समाधानासाठी, आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे होय.
वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत. नवीन वेगळे रस्ते शोधले पाहिजेत.
नऊ आठची गाडी स्थानकात आली होती. ती ब्रिजच्या पायर्यांवरून धावत धावत हातातली पर्स आणि काही किरकोळ सामान सांभाळत कशीबशी गाडीपाशी येउन आत शिरली.
तेव्हाच तिला मी पाहिलं. जराशी उंच, सावळीच पण तजेलदार, सडपातळच पण भरीव वक्षस्थळे असलेली ती कशी माझ्या नजरेतच बसली. सुंदर नव्हती पण काहीतरी अपील होता तिच्यात. आणि काहीसे पिंगट आणि जरासे मोठे डोळे.
सारंच क्षणात हृदयाला भेदून गेलं होतं.
घंटी बज गयी. पण पुढे काय?
अरेच्चा! चढता चढता तिच्या मनगटावरचं घड्याळ निसटलं आणि त्याच क्षणी गाडी सुटली. मी ते घड्याळ उचललं.
दिवस खरोखरच सुंदर गेला. मनातल्या मनात तिचा विचार करताना आणि तिला पाहतानासुद्धा.
दुसर्या दिवशी नउ आठला मी रेल्वे स्थानकावर. ती आधीच आलेली होती.
निळी शिफॉनची साडी. त्यातून जाणवणारी तिची बारीक कमर आणि झिरपणारं पातळ पोट. मनात वाहणारे सगळे स्त्रोत बांधून ठेवले. तिच्या जवळ गेलो.
“हे घड्याळ. तुमचंच ना? काल गाडीत घाईघाईने चढत असताना निसटलं तुमच्या हातावरून. ”
तिनं अक्षरश:माझ्या हातून ते घड्याळ झपाट्याने घेतलं.
“अय्या! how sweet of you! खूप थँन्क्स. ”
धडधडत गाडी आली आणि गेलीही.
कसं आहे ना? आयुष्य म्हणजे सिनेमा,
कादंबरी, कथा काही नसते.
त्यादिवशी तिला मी पाहिले. ती मनात बसली. ती बेचैनी अनुभवली.
पन्नास वर्षानंतरही ती डिलीट नाही झालेली. आहे अजूनही मनात आहे. जशी पाहिली होती तशीच.
सध्या ती काय करत असेल?
कधीकधी गुपचूप चुपके चुपके मी उगीचच तिला फेसबुकवर शोधतोही.
☆ “चांगुलपणा अजूनही आहे.. म्हणूनच…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की …
दिवसाची सुरवात पेपर वाचून करायची जुनी सवय,
आजकाल राजकारण, भ्रष्टाचार, खून, फसवाफसवी, बलात्कार असल्याच बातम्यांचा भरणा असतो. चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात. आजही तसंच जास्तीत जास्त नकारात्मक बातम्या. वाचून उदास वाटायला लागलं. मोबाईलवर सर्फिंग केलं त्याचाही कंटाळा आला. मूड फ्रेश करण्यासाठी घराबाहेर पडलो. मनात आलं भाजी घेऊन जाऊ. बायकोला सरप्राईज. मंडईत पोचल्यावर मोबाइल घरीच विसरल्याचं लक्षात आलं. नशीब पाकीटात थोडी कॅश होती. ताज्या हिरवेगार भाज्या बघून मस्त वाटलं. बघता बघता अडीचशे रुपयांची भाजी खरेदी झाली. माझ्याकडं दोनशेच होते. भाजीवाल्याला विनंती केली की पन्नास नंतर देतो.
“ऑनलाइन करा” भाजीवाला.
“मोबाइल सोबत नाहीये. इथं जवळच राहतो. घरी गेलो की लगेच पैसे पाठवतो. तुमच्याकडून बऱ्याचदा भाजी घेतलीये”
“असेल. सगळे पैसे द्या नाहीतर पन्नासची भाजी कमी करा. ”भाजीवाल्याचं अरेरावीचं बोलणं ऐकून डोकं सटकलं. सगळी भाजी परत केली. भाजीऐवजी फळं घेऊ म्हणून नेहमीच्या फळविक्रेत्याकडे गेलो.
“नमस्कार. मामा, ”मी प्रतिसाद दिला. सगळ्यांशीच मामा आपुलकीनं, प्रेमानं बोलतात म्हणूनच त्यांच्याकडे गर्दी असते. दोनशे रुपये डोक्यात ठेवून फळं घेतली. पैसे देऊन निघालो. तेव्हा मामांनी हाक मारली.
“माऊली, पैसे घेऊन जा”
“बरोबर दोनशे झाले की.. ”
“बराबर हाय, तरिबी हे घ्या”मामांनी वीसची नोट हातात ठेवली.
“मामा, काय विशेष, एकदम डिस्काउंट”
“मागच्या येळेला तुमी वीस रुपये जास्त दिलं व्हतं. ”
“कधी???”
“पंदरा दिस झालं असतील”
“एवढी साधी गोष्ट लक्षात ठेवलीत. मानलं तुम्हांला, ग्रेट!!. मला तर माहितीपण नव्हतं”
“पण मला अन पांडुरंगाला माहित व्हतं ना. ”
मामांचं ऐकून नि:शब्द झालो. एकाच दिवशी भाजीवाला आणि माळकरी मामा दोन टोकाचे अनुभव. दोन व्यक्ती आणि वृत्ती.
आजकाल जिथं तिथं स्वार्थ आणि व्यवहार पाहिला जाण्याऱ्या काळातही मामांसारखे लोक आहेत. ज्यांच्यामुळेच अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे. त्यांच्या पुण्याईवरच जगरहाटी सुरू आहे. एवढं मात्र नक्की!! —
आजच मी आईला मातृदिनानिमित्त हा दगड भेट म्हणून दिला.
वास्तविक पेपरवेट आणि शोपीस याव्यतिरिक्त तसा काही याचा फारसा उपयोग नाही. पण या एका छोट्याशा भेटीने माझी एका गरजू आईला मदत होणार होती.
****
काही महिन्यापूर्वी मी एका आदिवासींनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली तीही प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी, प्रदर्शन संपायच्या फक्त काही मिनिटे आधी. जवळजवळ 25 एक तरी स्टॉल होते आदिवासींचे.
– – त्यात एका स्टॉल वर मला हा दगड सापडला बहुतेक माझ्याच नशिबात होता तो.
स्टॉल वर एक आई आणि तिचा मुलगा होता. स्टॉल जवळ जवळ रिकामाच होता.
एक अगदी अशिक्षित बाई होती स्टॉलवर पण खरोखरच तिच्या अंगात कला होती. तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता कारण आता तो मोकळा होता त्याला दिवाळीची सुट्टी लागली होती.
या स्टॉल मधून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा होता तिला.
आत्तापर्यंत तिने रंगवलेल्या दगडांचे फोटो होते त्या मुलाच्या मोबाईल मध्ये. लोकांचा पत्ता लिहून घेणे त्यांच्याकडून पैसे घेणे त्याचा हिशोब ठेवणे वगैरे काम चोख पणे करीत होता तो.
तिने रंगविलेल्या दगडांवर काही देवांची नावे होती शहरांची होती. अगदी आपण ऑर्डर दिली, सांगितले तर तुमच्या मित्रांचे देखील नाव रंगवून द्यायला तयार होती ती आई.
आणि त्यातला शेवटला न विकला गेलेला असा दगड जो बहुतेक माझ्याच नशिबात होता तो मी विकत घेतला.
आपल्याला देखील बागेत, रस्त्यात येता जाताना, प्रवासात, असे अनेक आकाराचे दगड दिसतात पण त्याला व्यवस्थितपणे रंगवून ते विकणे… वा खूपच कौतुकास्पद.
दगडांमधून अर्थार्जन… किती सुंदर कल्पना.
कल्पना आणि कला यांना योग्य रीतीने स्कोप/दिशा मिळणे गरजेचे आहे हेच खरे.
बीज एका मातीत रुजतं, वाढतं आणि मोठं होत राहतं आणि कालांतरानं तिथंच आणि त्याच मातीत मिसळून जातं. पण मानवी समाजातल्या मुलगी नावाच्या बीजाला एका मातीत वाढावं लागतं आणि मुळांसह उपटल जात दुस-या मातीत स्वत:ला गाडून घ्यावं लागतं… आणि तिथंही नुसतं रुजावं लागणार नसतं तर वाढावं लागतं… इतरांना सावली, फळं आणि आधार देण्यासाठी. या झाडाला दुसरी ओळख लगडलेली असते… एखादी नदी सागरात विलीन झाली की ती सागरच होऊन जाते, तशी!
पण मुलीचं एकाच मातीत रुजून तिथंच नष्ट होणा-या बीजापेक्षा किंचित बरं असतं… तिला नव्या मातीत एका आधीच वाढलेल्या झाडाचा आधार मिळतो… नव-याचा! किंबहुना या नात्यात नव-याचं हेच तर मुख्य काम असतं… अन्यथा त्याच्या संसाराची बाग फुलणार नाही!
जसं बाळाचं सर्वांत जवळचं जर कुणी असेल तर ती आई असते, तसे विवाहोत्तर आयुष्यात मुलीचं त्या नव्या घरात सख्खे जर कुणी असेल तर तो नवरा असतो… किंबहुना असावा लागतो. त्याच्या आधारे, त्याच्या साठी ती नवी नाती स्वीकारते आणि फुलवत राहते. रातराणी जसं फुलून येण्यासाठी चंद्र उगवण्याची प्रतीक्षा करत दिवस ढकलते, तशी नवपरिणिता नवरा घरी येण्याची वाट पहात राहते दिवसभर. कारण या अनोळखी जगात संवाद साधायचा तरी कुणाशी आणि किती? अर्थात, उलटत जाणारे दिवस हे सुसह्य करू शकतात… अनुभवाने नाती घट्ट किंवा ढिली होत जातात! अर्भकाला केवळ स्पर्शावरून समजतं… कुणाच्या खांद्यावर मान टाकली की झोप येते आणि जीवाला घोर रहात नाही!
ती याच मुलींची प्रतिनिधी. आईबापाचं नाव राखण्यासाठी त्यांचं नाव त्यागून नवं नाव, नवी भूमिका स्वीकारत जीवनाच्या रंगमंचावर एक पात्र जगून दाखवण्यासाठी उभी राहणारी.
लग्नाच्या धामधुमीत पहिले काही दिवस निघून गेले असतील… त्यात देवकार्य झालं असेल, एकदा सूनबाईला घेऊन घरी येऊन जा या आग्रहाखातर नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या असतील. आणि मग सर्वांच्या शोधक नजरांच्या पल्याड जाण्यासाठी दूर जावं लागलं असेल… मधुचंद्र म्हणजे केवळ एकांगी प्रवास नसतो… चंद्राच्या साक्षीने एकमेकांना प्रदक्षिणा घालत राहण्याच्या आणाभाका आणि कक्षा ठरवायचे हे दिवस!
नव-याकडून अनेक गोष्टी समजत जातात, नात्यांचे अर्थ, त्यांच्या सीमा, त्यांच्या बोलण्याचे, कटाक्षांचे मतितार्थ ध्यानात येतात. हे अगदी भरात आलेलं असताना, मोकळ्या आकाशाखाली तिच्या माथ्यावर मध्यान्हीचा सूर्य आग ओकून गेला… कपाळावरचं कुंकू मृत्यू नावाच्या रसायनाने रक्ताचा लाल रंग वागवू लागले!
त्याला निरोप देईपर्यंत सर्व काही लक्षात आलं… पण त्याला मूठमाती देऊन आपल्या देहाची माती घरी आणल्यावर, ज्यावर तांदळाचं माप ठेवलं होतं आणि ते माप हलकेच उलटवून जीवनाच्या अक्षता भूमीच्या स्वाधीन केल्या होत्या… तो उंबरा ओलांडताच समजलं की घरातल्या या गर्दीत आपलं कुणीच नाही! जे आहेत त्यांना आपलं मानावं लागणार आहे… कुणाच्याही आधाराशिवाय अर्धवट वाढलेल्या नाजूक वेलीला आभाळाकडे वाटचाल सुरु ठेवावी लागणार आहे!
ओले मूळ, खडकाचे अंग भेदी हे खरं असलं तरी काळाचा खडक भेदत राहणं म्हणजे प्रत्येक क्षणी बोटं रक्तबंबाळ करीत राहणे… खडक कित्येक वर्षांच्या अनुभवाने अधिकाधिक कणखर झालेला असतो. त्याला सुरुवातीला तर मूळाचा हा प्रयत्न म्हणजे केवळ गुदगुली वाटत असेल! अशी अनेक मूळं या खडकांनी सुकून गेलेली पाहिलेली असतात!
ती मात्र अजूनही तग धरून आहे. ती बाहेर पडते पण तिला घरी यावं लागतंच. तिचे आईबाप तिच्या माहेरी आहेत, तिला त्याच्या आईबापाला त्याची कमतरता जाणवू द्यायची नसते. तिला काही सांगायचं असतं… भिंती ऐकून घेतात पण काही प्रतिसाद देत नाहीत. रात्रीचा अंधार पूर्णवेळ हिच्या बंद पापण्यांआड उघड्या असलेल्या डोळ्यांकडेच तर पहात जागत राहतो! सूर्याचं पहिलं किरण दिसत नाही… कारण दमून गेलेल्या पापण्या उघडता उघडत नाहीत… त्यांच्यावर मनाचं आणि मणा-मणाचं ओझं असतं.
वेलीच्या पोटी एखादं फूल असेल तर त्याचा आधार मिळतो… पण इथं तर तेही नाही. जाणारा प्रत्येक क्षण नवीनवी आव्हानं समोर उभे करत राहतो. गर्दीतला हा एकांतवास नरकापेक्षाही भयावह. भावनांच्या आहारी जायचं की व्यवहाराच्या हा तिढा सुटता सुटत नाही. हे सोडलं तर पळून गेलेलं चालणारं नसतं आणि धरून बसलं की ओरखाडे सुरूच राहतात… खूप कठीण असतं हे… खूप कठीण असतं हे!
या अंधा-या गुहेचं प्रकाशाच्या बाजूला उघडणारं टोक या पावलांना कधी तरी गवसू दे… देवा!
आशेया… पहलगाम मध्ये सर्वस्व गमावून परत आली आहे… एक वर्ष म्हणजे आपल्यासाठी फार कमी कालवधी असला तरी तिच्यासाठी एक युग असेल… आणखी अशी किती युगं तिच्या नशिबी आहेत देवच जाणो! आपण केवळ प्रार्थना करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो तिला! ह्या ओल्या जखमा सुकाव्यात, त्यांवर आशेचं आवरण चढत जावं आणि एक नवं जग तिच्यासाठी आकाराला यावं!
☆ ‘गोपाळाची मुरली, गोरक्षाचा कल्याण’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज गुरुवार. जरा सावकाश उठायचे ठरवले होते; पण सवयीप्रमाणे लौकरच जाग आली. वातावरण आल्हाददायक होते. किंचित गारवा होता. आन्हिके, स्नान, संध्या, पूजा-अर्चना उरकून मन प्रसन्न झाले. सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो आणि पावले जंगली महाराजांच्या मंदिराकडे वळली.
मंदिराच्या द्वाराजवळील विक्रेत्याकडून हार-फुले घेतली आणि पायऱ्या चढून समाधीपाशी गेलो. समाधीवरील भरजरी चादर सूर्यप्रकाशात चमकत होती. निशिगंध, गुलाब आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता. उदबत्त्यांच्या धूम्ररेखा आवर्तने घेत वर चढत होत्या. समोरचे धूपपात्र धुमसत होते.
हार, फुले वाहून साष्टांग दंडवत घातला. एका कोपऱ्यात शुभ्र वस्त्रांतील, दाढी वाढवलेली, केशरी टोपीधारी एक वृद्ध ऋषितुल्य व्यक्ती ध्यानस्थ बसली होती. ते हिंदुमहासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रा. स. भट असावेत. त्यांनाही नमस्कार करून मी एका कोपऱ्यात ध्यानाला बसलो.
अर्ध्या तासाने बाहेर आलो. समोर ‘ओम चेंबर्स’ दिसत होते. अचानक आठवले — योगिनी सुमनताई ताडे सध्या इथेच त्यांच्या बहिणीकडे राहायला आहेत. वाटलं, आलोच आहोत तर त्यांनाही भेटून जावं.
ताईंच्या सदनिकेवर टकटक केली. दार एका शिष्येने उघडले.
“कोण पाहिजे?”
“सुमनमावशी आहेत का? मी त्यांच्या थोरल्या बहिणीचा जावई — दिवाकर. ”
“या, बसा. ताई खाली पाहुण्यांना निरोप द्यायला गेल्यात. येतीलच. ”
ताई नसताना घरात बसणे प्रशस्त वाटले नाही. म्हणून मी बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. खाली पदपथावर ताई एका प्रौढ, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या महिलेशी बोलत उभ्या होत्या. मोतिया रंगाची रेशमी साडी, मरून काठ, दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर, डोळ्यावर चष्मा आणि हातात बिल्वरांची झळाळी…
त्या व्यक्ती परिचित वाटत होत्या.
तेवढ्यात रिक्षा आली. त्या बाईंनी ताईंना निरोप दिला आणि रिक्षात बसल्या. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत दोघी एकमेकींना हात हलवत राहिल्या.
थोड्याच वेळात ताई वर आल्या. मला पाहताच उत्साहाने म्हणाल्या,
“अरे, जरा लौकर आला असतास तर एका थोर व्यक्तीची ओळख करून दिली असती!”
मी विचारले, “कोण होत्या त्या?”
ताई हसल्या.
“अरे, ती साक्षात भगवंताची मुरली होती!”
“म्हणजे?”
“माणिक वर्मा! श्रीहरीची मधुर मुरली!”
क्षणभर मी अवाक् झालो.
“साक्षात माणिकताई? त्या इथे कशा काय?”
ताई म्हणाल्या,
“काल रात्री त्यांचा फोन आला. म्हणाल्या — ‘उद्या भेटायला येऊ का? मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. ’”
“तुमच्याकडून?”
“हो. त्यांना ‘गोरक्षकल्याण’ रागातील काही दुर्मीळ चीजा शिकायच्या होत्या. कुठूनतरी त्यांना समजलं होतं की माझ्याकडे त्या आहेत. ”
मी आश्चर्यचकित झालो.
“पण तुम्ही गाणं शिकलात कधी?”
त्यावर ताई शांतपणे म्हणाल्या,
“मी कुणाकडेही शास्त्रीय संगीत शिकले नाही रे. हे सगळं संतांचा प्रसाद आहे. ”
आणि मग त्यांनी सांगितलेली कथा विलक्षण रोमांचकारी होती.
बेळगावला योगिनी कलावती देवींच्या सान्निध्यात त्या काही काळ होत्या. एकदा पाद्यपूजेनंतर आईंनी स्वतः घेतलेल्या केशर-वेलचीच्या दुधातील अर्धे दूध सुमनताईंना पाजले.
ताई सांगत होत्या,
“त्या क्षणापासून, कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, माझ्या मुखातून रागदारी उमटू लागली. एकच भजन अनेक रागांत गाता येऊ लागले. विविध चीजा, रचना सहज सुचू लागल्या. हीच संतकृपा. ”
हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.
ताई पुढे म्हणाल्या,
“पण खरी थोरवी माणिकताईंची आहे. संगीतविश्वात एवढं मोठं स्थान असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. अजूनही नवीन शिकायची तळमळ! सुरांच्या शोधात त्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडे आल्या — हीच त्यांची महानता. ”
त्यांचे शब्द ऐकता ऐकता माझे डोळे नकळत ओलावले.
इतक्यात दाराची बेल वाजली.
दार उघडले तर साक्षात माणिकताई समोर उभ्या!
मी गोंधळलोच.
त्या हसत म्हणाल्या,
“योगिनीताई, माझी पर्स इथेच राहिली वाटतं. त्या गोरखकल्याणच्या नादात विसरून गेले. ”
खरंच, पर्स गादीवरच पडली होती. मी ती त्यांच्या हातात दिली.
ताईंनी माझा परिचय करून दिला.
“हे दिवाकर. संगीताची फार आवड आहे यांना. ”
मी पटकन म्हणालो,
“ऐकण्याची आवड बरं का! गाता-वाजवता काही येत नाही. ”
त्यावर माणिकताई मनमोकळं हसल्या.
“असू द्या हो. आम्हाला रसिक श्रोतेच लागतात. श्रोते आहेत म्हणूनच आम्ही कलाकार आहोत. तेच आमचे अन्नदाते, तेच आमचे दैवत. ”
आम्ही दोघे खाली आलो. रिक्षा उभीच होती.
माणिकताई म्हणाल्या,
“या, तुम्हाला वाटेत सोडते. ”
मी संकोचत म्हणालो,
“नको ताई. मला समोरच जंगली महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. ”
त्या हसल्या. रिक्षा निघाली.
रिक्षा दिसेनाशी झाली…
आणि मी तिथेच उभा राहिलो — भारावलेला, स्तब्ध.
माझ्यासमोर साक्षात ‘गोपाळाची मुरली’ होती…
आणि त्या मुरलीच्या अंतर्यामी घुमत होता — ‘गोरक्षाचा कल्याण’!
(पावस निवासी परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अंतरंग शिष्या, वैकुंठवासी परमपूज्य *योगिनीताई ताडे* यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन वैशाख वद्य दशमी अर्थात मंगळवार दिनांक १२ मे २०२६ या दिवशी होता.. त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख)