मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही एव्हाना त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावणसरी बरसायला सुरुवात झालेली होती.

औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायी सुद्धा जात आले असते. पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे कांही बांधकाम सुरु होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करीत होता. 

मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं, “काय रे, खाली आहे कां तुझी रिक्षा?” तो “हो” म्हणाला. मग मी त्याला विचारलं मला नेशील कां सवारी म्हणून?”

तो हो म्हणाला तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. मग माझ्या कडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, “काय रे बाबा, काय होतंय तुला? आणि तू रडतोयस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाहीये?”

ह्यावर तो उत्तरला, “सतत सुरु असलेल्या ह्या पावसाने मागील तीन दिवसांपासून भाडं मिळालेलं नाहीय, त्यामुळे रोजगार नाही, म्हणून पोटात तीन दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाहीय. आज तर अंगही दुखतंय. आताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे, आज तरी मला एखादी सवारी मिळू दे.” 

कांहीही न बोलता मी रिक्षा थांबवला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला ह्या रिक्षेवाल्याच्या मदतीला मुद्दामहून पाठविलं नसेल? कारण असं बघा की मला सुरु झालेला हा ऍलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरु झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधे आणवून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती, आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षेत सुद्धा कशाला बसलो असतो? 

मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, “देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षेवाल्याच्याच मदतीसाठी माझी योजना केली आहे ना?” मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, ‘हो.’ 

देवाचे आभार मानत मी माझ्या औषधांसोबतच त्या रिक्षेवाल्यासाठीही औषधं विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. 

ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षेवाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली, त्याच्या हाती रिक्षेचं भाडं म्हणून ३० रुपये ठेवले, गरम गरम छोले-पुरीचा पूड आणि त्याच्यासाठी घेतलेली औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, “हे बघ, छोले-पूरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या दोन गोळ्या घेऊन घे आणि उरलेल्या दोन गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे.”

रिक्षेवाल्याचा डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, “साहेबजी, देवाला तर मी केवळ दोन घास पोटांत पडू दे म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोले-पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले-पुरी खावी अशी इच्छा मनांत होती, आज देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्याने यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करवून घेतले अशी माझी समजूत आहे.” तो आणखी बरंच कांही बोलत होता, भरभरून. पण माझं त्याकडे लक्षच नव्हतं.

घरी आल्यानंतर माझ्या मनांत आलं, ‘त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते, रिक्षेवाल्यासाठी मी कांहीही घेऊ शकत होतो, सामोसे, भाजी किंवा जेवणाची थाळी, कांहीही. पण मी नेमकं छोले पुरीच कां घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला ते खरंच तसं आहेकां? देवानंच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल? माझं ऍसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं  आणि मी रिक्षा करणं ही, तो रिक्षेवाला म्हणतो त्या प्रमाणे दैवी योजना तर नसेल ना?’  

आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या साहाय्यासाठी धावून जातो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यास उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा (देवाचा) प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं चांगलं कार्य हे देवाने आपल्याकडून करवून घेतलं असं समजावं म्हणजे सत्कृत्याचा वृथा अभिमान होत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? 

याची कारणे : वयाच्या तिसऱ्या  टप्प्यातील मानसिक गोंधळ …… 

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:…

वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

— काही सुचवतात: “डोक्यात ट्यूमर”.  मी उत्तर देतो: नाही !

— इतर सूचित करतात: “अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे”.  मी पुन्हा उत्तर देतो नाही !

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:….   

– अनियंत्रित मधुमेह

 – मूत्रमार्गात संसर्ग;

 – निर्जलीकरण

हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही.  ५० वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात.  निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.  यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा– यासारख्या घटना घडतात. 

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण ५0% पेक्षा जास्त असते. तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय ५0 व्या वर्षी सुरू होते.  ५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो.  हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे.  जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं असं वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

निष्कर्ष:

५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही,  तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः

१) द्रव्य पिण्याची सवय लावा.  पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे;  संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.  महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे.  हे लक्षात ठेवा !

२) कुटुंबातील सदस्यांना इशारा:::  पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा. .. जर आपल्या हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणे आहेत.

जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका.  आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत:साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे. पन्नाशीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे !

लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.

(अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.) 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘नैसर्गिक हायलाईट्स…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

केसांच्या काळ्याभोर लाटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळुच लक्षात येते…..

देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची  

कालपरवापर्यंत ताई म्हणणारे अचानक काकू मावशी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते…..

किती छान ..  आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय . 

टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी निवडणे चालू असते. अचानक कशासाठी तरी उठावे लागते आणि बारीकशी कळ गुडघ्यात येते आणि हळूच लक्षात येते….

की हाय हील्स ऐवजी आज वाॅकिंग शूज घालावेत.  

टीव्ही वर मॅचमध्ये भारत जिंकतो आणि मुलांबरोबर जल्लोष करताना बारीकसा दम लागतो आणि हळूच लक्षात येते…..

आज जिमला जायला विसरले.  

बसमध्ये प्रवास करताना कुणी तरी पटकन उठून जागा देते आणि ‘ बसा मावशी ‘ म्हणते आणि हळुच लक्षात येते….

संस्कार शिकवणाऱ्या  माझ्यासारख्या आयाही आहेत तर.  

शाळेत घ्यायला गेले की अनेक छोटी कोकरे पाहून मन मस्त प्रफुल्लीत झालेले असते. आपली उंची क्राॅस करून गेलेले आपले कोकरू पुढ्यात उभे राहून म्हणते ‘ लक्ष कुठे आहे तुझे? ‘  आणि हळूच लक्षात येते….

कोकराला “हाय फाइव” द्यायची वेळ झाली आहे.   

एखाद्या काॅलेजजवळ पाय आपोआप रेंगाळतात. त्या तरूणाईचा उत्साह आणि मस्ती बघून मन पण उल्हसित होते..  पण हळूच लक्षात येते….

की आपण केलेली धमाल आपली मुलंही करू शकतात.   

देवाजवळ सांजवात लावताना, स्तोत्र म्हणताना आपोआप डोळे पाणावतात आणि हळूच लक्षात येते….

देव किती चांगला आहे व किती सुंदर त्याचे चमत्कार.  

कैरीचे लोणचे घालताना सगळे बाजूला ठेवून कैरीच्या करकरीत फोडी मीठाबरोबर पटकन तोंडात जातात. एखाद्या दातातून निघालेली कळ ‘ आई गं….’  आणि हळूच लक्षात येते….

लोणच्यात मीठ जरा जास्त झालंय या खेपेस.  

बाहेर पाऊस चालू असतो .. कुरकुरीत कांदा भजी गरम गरम सगळ्यांना खाऊ घालावी. स्वतः घेताना मात्र वाढलेले वजन हळूच लक्षात आणून देते..  नको इतकी, कारण….

पुढच्याच महिन्यात असलेल्या वर्गाच्या ३० वर्षाच्या रीयूनियनसाठी घेतलेल्या गाऊनमध्ये फिट व्हायचंय.  

काॅफीचा मग मात्र सांगत असतो..  कितीही वय झाले तरी तुझी माझी सोबत मात्र कायमकरता आहे….

घे बिनधास्त….

आणि मी गाणे गुणगुणायला लागते ….

दिल तो बच्चा है जी .. .. 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरी बाजू… — लेखिका : स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दुसरी बाजू… — लेखिका : स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

( १ )

आदित्य…आमच्या Society मधला एक उमदा, हरहुन्नरी तरुण…घरच्या उत्तम संस्कारात वाढलेला….

सहा महिन्यापासून अचानक केस वाढवायला लागला.. साहजिकच  लोकांच्या चर्चेला विषय….

हल्लीं मुलेही मुलींसरखे केस वाढवतात… छान Bow बांधतात… नवी Fashion आहे… असे काहीबाही कानावर पडत असेच..

परवा  अगदी रात्री उशिरा  भेटला…

“Hello काकू, कशी आहेस ?

” मी ठीक.. पण तुला मात्र पटकन ओळखले नाही. .. नव्या रुपात..”

” हो.. सध्या एका संस्थेशी जोडला गेलो आहे… केस दर सहा महिन्यांनी कॅन्सर रुग्णांना दान करतो.. ..अजून खूप कमावता नसल्याने आर्थिक लगेच शक्य नाही….. तर जे शक्य आहे तेवढे तरी !!

 

( २ )

परवा मी बस मधून गावात निघाले होते…

बसला तुफान गर्दी होती… अगदीं खचाखच भरलेल्या बसमध्ये नीट उभेही राहता येत नव्हते…

अशातच एक आजोबा S.N.D.T. ला चढले… साहजिकच ते उभेच होते….दहाच मिनिटे झाली आणि एक बाई उठल्या… एका College युवकापाशी गेल्या आणि  जोरात भांडायला लागल्या..

“काय रे, काही समजते का…हे आजोबा उभे आहेत आणि तू आरामात बसला आहेस?… कॉलेज, घरात हेच शिकवतात का तुला ? तुला नाही का उभे राहता येत? … झालं…सगळी बस त्याच्यावर तुटून पडली…बसच्या वेगापेक्षा लोकांच्या फटकाऱ्याचा वेग खूप जास्त होता!

तो बिचारा निमूटपणे उभा राहिला 

थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला व जाता जाता त्या बाईंना म्हणाला, ” काकू , पंधरा दिवसांपूर्वी माझे Appendix चे Operation झालेय… आज माझी महत्वाची परिक्षा होती की जी बुडली असती तर माझे पूर्ण Semester वाया गेले असते… सहज उभारणे शक्य नव्हते म्हणुन बसून होतो!”

एवढे बोलून झरकन उतरुन गेला….

 

( ३ )

तिच्या आईच्या मते ही पिढीच काहीशी अलिप्त… स्वतः मध्येच गुंग, थोडीशी मतलबी अशीच…

तिचा नवीन नोकरीचा पाहिला पगार हातात आला… आज ती घरी आली ती थिरकात्या पायानेच !!

” मावशी, रविवारी सगळया कामावर सुट्टी सांगा.”

” का ग बयो? काय आहे रविवारी?”

” अहो माझा पाहिला पगार झालाय…. तुम्ही , आई आणि मी मिळून मस्त आख्खा दिवसभर   लोणावळा फिरून , धमाल करून येऊ यात माझ्या या यशात तुमच्या दोघींचीही खूप मोठा वाटा आहे!!”

 

( ४ )

तो पक्का नास्तिक… त्यामूळेच ‘ देवपूजेशी ‘ त्याचा दुरान्वयेही संबध नाही….

ती ३०…३२ वर्षांची तरुण विधवा…एक ३-४ वर्षांचे छोटे बाळ पदरात… रोज एका ठराविक ठिकाणी ‘फुलंविक्रिचा’  धंदा करत असे..

रोज बाजारातून फुलांची खरेदी करणे, आणलेल्या वेगवेगळ्या फुलांचे  ढीग, फुलांचे हार, गजरे करणे. सोबतच बाळालाही सांभाळणे या सर्वात गुंतलेली असे….

तिचा रोजचा  ‘ One Woman Show ‘ चालू असे…..संध्याकाळी गिऱ्हाईक येत असत.. पण हिची जरा सुकलेली, मरगळलेली, तजेला नसलेली अशी फुले, हार बघून दुसरीकडे जात असत… हिला बरेचदा गिऱ्हाईकांकडून  फक्त सहानभूती, चुचकारे मिळत असे… शेवटी तिचा  फुलविक्रीचा धंदा हा तिच्या रोजी-रोटीचा प्रश्न होता!

त्या दिवशी तो तिच्या स्टॉलवर आला… उगीचच थोडी फुले विकत घेतली…. जरासा रेंगाळला आणि पिशवीतून एक स्प्रे बॉटल काढून तिला देत म्हणाला ,”मावशी, यातील थोडे थोडे पाणी  दर दोन तासांनी फुलांवर, हारांवर मारत जा म्हणजे फुले छान टवटवीत राहतील…. सुकणार नाहीत !!”

आता तिला विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो…

लेखिका :  स्मिता कुलकर्णी, पुणे.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ती’ आणि ‘ही’…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ती’ आणि ‘ही’… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मालिकेतील ‘ ती ‘ आणि जीवनातील ‘ ही ‘ यांचा काही मेळ बसत नाही 

 

मालिकेतील ‘ती’ नीटनेटकी राहते. 

स्वयंपाक घरात जरीच्या साड्या घालते. 

सण नसले तरी दागिने चढवते….. 

जीवनातील ‘ही’ केसाचा अंबाडा बांधते. 

स्वयंपाक घरात गाऊनमध्ये वावरते. 

सणालाही दागिने घालण्यास कानाडोळा करते.

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’

ह्यांचा काही मेळ बसत नाही ……. 

 

मालिकेतील’ ती’ला नवरा  प्रेमळ मिळतो.

वाढदिवशी स्वयंपाकघरात येऊन आलिंगन देतो. 

संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट पण करतो….. 

जीवनातील’ ही’ला नवरा नवर्‍यासारखा मिळतो. 

वाढदिवसाचे हिला लक्षात आणून द्यावे लागते .

संध्याकाळी हिला सर्वांच्या आवडीचा मेनू बनवावा लागतो. 

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..  

 

मालिकेतील ‘ती’ला सणाचे कोडकौतूक असतं.

सणाला ‘ती’ न दमता सर्व काही व्यवस्थित दिसतं. 

प्रत्येक सणाला संपूर्ण कुटुंब कार्यरत असतं….. 

जीवनातील ‘ही’ला सण आला की दमायला होतं. 

एक एक वस्तू  जोडतांना नाकीनऊ येतं. 

‘कोणी सण तयार केले ‘?ह्या विचाराने मन दमतं

मालिकेतील ‘ती’ जीवनातील ‘ही’ हयांचा काही मेळ बसत नाही…….  

 

मालिकेतील ‘ती’ भाम्रक जीवन दाखवत राहते. 

जीवनातील ‘ही’ त्यात स्वतःला चाचपडत राहते. 

मालिकेतील ‘ती’ काही न करता जिंकत राहते.

जीवनातील ‘ही’ सर्व करुन हारत राहते. 

मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..  

ह्यांचा काही मेळ बसत नाही…….. 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर‌ त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !) 

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंट मधुन राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे.

अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधुन मधुन भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव.

..

“शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सुचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.

असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.

..

मग जरा आजुबाजुला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहीलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळू हळू निघून गेला. मलाही हातुन एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.

..

पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातुन बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.

..

मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.

..

मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. 

..

ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजुंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.

..

ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)

..

“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.

..

माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला. 

..

माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.

हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो कि निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”

..

माझ्या चांगुलपणापायी झालेली हि शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे”

..

ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!!लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

 

वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे….!!!! 

 

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे….!!!! 

 

तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे….!!!! 

 

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे….!!!! 

 

कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे….!!!! 

 

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे….!!!! 

 

जातीच्या नावाने सवलती घेईन 

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे….!!!! 

 

मतदान करताना जात पाहीन

जातीयता  मात्र बंद झाली पाहिजे….!!!! 

 

कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात झाला पाहिजे….!!!! 

 

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

            हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्वर्गाच्या दारावर पोचल्यावर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्वर्गाच्या दारावर पोचल्यावर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

झाडावरून गळून पडलेलं, कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल वाऱ्याबरोबर हेलखावे खात हळुवार मातीवर पहुडलं…..

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला ?”

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा असफल प्रयत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

काही क्षण असेच गेले…

आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, “झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?”

म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. 

फुल म्हणालं, “निमिषार्धासाठी वाईट वाटलं..कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. 

पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा… कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं….. पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “

“तू आता स्वतंत्र झालास खरा, पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, “आता वारा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन… मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन… पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या रोपा वर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !”

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली… 

आपलं आयुष्यही असंच आहे….  आपलं जीवन ही तसेच – एक फूल आहे…. 

संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. 

मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर, जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. 

… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं….  नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो !

…. स्वर्गाच्या दारात उभे असताना काही आठवणी उफाळून आल्या… 

….जीवन सुंदर तर आहेच पण ते अर्थपूर्णही व्हावे !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटिवेशनल शिबिर आयोजित केलं होतं.

विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता,’आनंदाने कसं जगावं?’

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं.

प्रश्न अगदी साधा होता,

‘सुख म्हणजे काय?’

उत्तरं अगदी भन्नाट होती.

एकाने लिहीलं, निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख.

एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख.

एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर संडासला साफ होणं म्हणजे सुख.

एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख.

कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख.

तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख.

सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.

साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं,

प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे.

म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.

म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे.

म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे.

हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय.

आहे की नाही गंमत?

मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकित झाले.

हीच तर सुखाची गंमत आहे.

आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.

जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.

लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व.

केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय!

मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.

प्रत्येक गोष्टीत टेन्शन.

जागा शोधायचं टेन्शन.

कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन.

ऑफिसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.

त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं.

गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,

‘संसारसंगे बहु कष्टलो मी!’

केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.

मुलं मोठी  होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो.आणि गात्रं कुरकुर करू लागतात.

तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता!

माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले.

शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”

तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.काय झालं,  एक दिवस रात्री लघवी कोंडली.प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना.ओटीपोटावर भार असह्य झाला.मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो.अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली.

दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं, तर ते म्हणाले- युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा.युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले.म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं.वेदना असह्य होत होत्या.

ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती.शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं.आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली.त्या क्षणी माझ्या मनात विचार आला,

‘आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.’ “

परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.

हातपाय धडधाकट आहेत.

दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय?

 रामराय कृपाळु होऊन पावसा- पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?

घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे, हे सुख नव्हे काय?

’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठवतंय,

‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं?’

मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.

चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा.सारी निराशा झटकून टाका आणि आनंदाने जगू लागा.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

भूतकाळातील व वर्तमानातील

सर्व गोष्टी लक्षात राहणे

चष्म्याशिवाय बघता व वाचता येणे

कानाने सुमधुर संगीत व संवाद ऐकू येणे

बत्तिशी शाबूत असणे व

ऊस-चिक्की खाता येणे

सुंदर फुलांचा सुगंध घेता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

लिमलेटच्या गोळ्या व कॅडबरी खाता येणे

आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येणे

कुठल्याही कागदपत्रांवर

एकसारखी सही करता येणे

जिन्याच्या पायऱ्या आधाराशिवाय

पटापट उतरता येणे

डोक्यावरती केशसंभार

(फक्त त्याचा ) भार असणे

ही खरोखर साठीनंतरची श्रीमंती आहे

 

आपल्या गरजेपुरते निवृत्तीवेतन असणे

कर्जाचा कोणताही भार डोक्यावर नसणे

आपली मुलेबाळे आपल्या जवळ असणे

नातवंडांचे कोडकौतुक करायला मिळणे

मनात आले की सहलीला जाता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

शाळा-कॉलेजमधले

बालमित्र-मैत्रिणी संपर्कात असणे

नोकरीमधले सहकारी

अधूनमधून भेटणे

सहजच आठवण आली म्हणून

नातेवाईकांनी फोन करणे

आधुनिक काळातील सर्व

गॅझेट्स लीलया वापरता येणे

कुटुंबामध्ये सुसंवाद आनंद

व मनःशांती असणे

इतके सर्व असेल तर

हीच खरी

अगदी फुलटूस श्रीमंती आहे

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print