मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपली संस्कृती” – लेखिका: ज्योति निंबाळकर ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपली संस्कृती” – लेखिका: ज्योति निंबाळकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात! ”

समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले.

पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली…

समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते –

“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav. ”

घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं!

 इंटरव्ह्यूचा दिवस :

शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात.

प्रिन्सिपल मिस्टर डिसूझा यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला.

आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

अचानक प्रिन्सिपलने विचारलं,

“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतोस? ”

समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं!

आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला… प्रिन्सिपलकडे गेला… वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला—

“परनाम गुरुजी! राम-राम! ”

क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली…

प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं.

“मिस्टर समीर, ” ते म्हणाले,

“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ती आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत. ”

आरव आनंदाने म्हणाला,

“माझी आजी शिकवते! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता. ”

प्रिन्सिपल म्हणाले,

“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे. ”

 घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या.

समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला.

“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच. ”

त्या दिवशी समीरला उमगलं—

सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो.

त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला—

“राम-राम, आई. ”

कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं.

 कथासार:

आधुनिक होणं चुकीचं नाही, पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.

इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत.

 तुमच्यासाठी प्रश्न:

आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे, असं तुम्हाला वाटतं का?

घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?  

* * * *

लेखिका : ज्योति निंबाळकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नो कम्प्लेंट डे!…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “नो कम्प्लेंट डे! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

नो कम्प्लेंट डे!

‘जीवनात काहीही तक्रार नाही’ दिवस

हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे.

कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे…

वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी फिक्स केलेला आहे.

खरं तर आपल्याकडे म्हणजे भारतात अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण फक्त त्या ‘डे’च्या दिवशीच नाही, तर संपूर्ण वर्षभर आपण त्या सर्व लोकांचा सन्मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे…

आपल्याकडे खरी गरज आहे ती स्ट्रेस फ्री डे, नो चिडचीड डे, अ‍ॅप्रीशिएशन डे आणि नो कम्प्लेंट डे सारखे ‘डे’ साजरे करण्याची…

आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही. कायम कसली तरी कम्प्लेंट करीत असतो. आज काय चहात साखरच कमी होती, भाजीत मीठच जास्त होतं, गाडीत पेट्रोलच नव्हतं, तिथे पंखाच नव्हता, त्याने मला विचारलंच नाही, मला बसायला खुर्चीच नव्हती, त्याने मला निमंत्रणच दिलं नाही, प्यायला थंडगार पाणीच नाही, पायात घालायला चांगले पॉलीश केलेले शूज नाहीत, चांगले कपडेच नाहीत, माझ्याजवळ अ‍ॅपलचा मोबाईलच नाही आणि बरंच काही… नुसती कम्प्लेंट, कम्प्लेंट आणि कम्प्लेंट!

अरे आपण कधी खूश राहणार? जे आहे त्यात खूश राहता येऊ शकत नाही काय?

एखादे दिवशी चहात साखर कमी झाली, म्हणून एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाही. झाली तर झाली कमी साखर, कुणी मुद्दामहून तर असं करीत नाही ना.

आपणच आपलं निरीक्षण करू या की, आपण किती गोष्टीवर उगीचच चिडचिड करतो. दिवसभरात किती कम्प्लेंटस करत राहतो आणि ठरवून टाकू की किमान एक दिवस तरी ‘नो कम्प्लेंट डे’ साजरा करु या.

खरं तर एरवी हे ‘डे’ वर्षातून एकदाच असतात. आपण मात्र नो कम्प्लेंट डे अगोदर महिन्यातून एकदा मग आठवड्यातून एकदा आणि सवय झाल्यावर मग रोजच्या रोज साजरा करू या. बघा मजा येईल.

पण

कृपया या मेसेज बद्दल कुणी कम्प्लेंट करू नये.

★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परतफेड…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

परतफेड…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता. तेव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जिवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकून त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीचं काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदलीमध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रचंड आटापिटा करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.

दुसऱ्या दिवशी लवजम्यासहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गीमधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकऱ्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देण्याकरता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थिकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.

त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत आला. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याकडे चौकशी केली की हा कोणत्या इयत्तेत शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं. त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.

त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंडच्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळलं की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे. त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षणदेखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.

ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता. आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणारे सर्व डॉक्टर, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसीमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.

बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धनिकाच्या त्याच मुलाचा जीव वाचवला होता. हा कुठेतरी प्रामाणिकपणाने, कृतज्ञ पणाने स्वतःच्या मुलाला वाचवल्याची परतफेड करण्याकरता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.

आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो.

तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल, तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.

म्हणून इतरांना मदत करा. नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी. आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मनातला कचरा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘मनातला कचरा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

मनावरील ताण कमी करण्यासाठी उत्तम उपाय!

‘समीर’ (वय २८) हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. कामाचा प्रचंड ताण, डोक्यावर ३० लाखाचं गृहकर्ज आणि ऑफिसमधे बॉसचा जाच. समीर नेहमी चिडचिड करायचा. त्याच्या चेहऱ्यावर कधीच हास्य नसायचं. त्याला वाटायचं, “जगात फक्त मलाच दुःख आहे. “

तो रोज संध्याकाळी पार्कमध्ये जाऊन एका बाकड्यावर बसत असे. तिथेच समोरच्या बाकड्यावर एक ७०-७५ वर्षांचे आजोबा, ज्यांना सगळे ‘दामू काका’ म्हणायचे, बसलेले असायचे. दामू काका दिसायला एकदम साधे. पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी.

त्यांच्या हातात नेहमी एक ‘जाड काळ्या रंगाची डायरी’ आणि एक पेन असायचं.

ते कोणाशीच बोलायचे नाहीत. ते फक्त मान खाली घालून त्या डायरीत काहीतरी भरभर लिहीत असायचे. कधी कधी ते थांबायचे, आकाशाकडे बघून हसायचे आणि पुन्हा लिहायला लागायचे.

समीरला त्यांचा खूप राग यायचा. “काय म्हातारा आहे? घरात बसून देवाचं नाव घ्यायचं सोडून इथे येऊन काय कादंबरी लिहितोय? “

एक दिवस समीरचा बॉसशी खूप मोठा वाद झाला. समीरला रडू येत होतं. तो पार्कमध्ये आला आणि डोक्याला हात लावून बसला.

तेवढ्यात त्याला खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला.

दामू काका उभे होते.

काका शांतपणे म्हणाले, “बाळा, खूप ओझं झालंय का डोक्यावर? माझ्याकडे दे, मी हलकं करतो. “

समीर चिडला. “तुम्ही काय करणार? तुम्ही काय जादूगार आहात? जा. तुमचं काम करा. “

दामू काका हसले. त्यांनी आपली ती ‘काळी डायरी’ उघडली आणि पेन समीरच्या हातात दिलं.

“हे बघ, मी जादूगार नाही. मी फक्त एक ‘कचरा वेचणारा’ आहे.

लोक घरातला कचरा डस्टबिनमध्ये टाकतात, पण डोक्यातल्या कचऱ्याचं काय?

त्याचा वास येतो, तो सडतो आणि मग माणूस वेडा होतो.

माझं एकच काम आहे… लोकांच्या डोक्यातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

तुला ज्या गोष्टीचा त्रास होतोय, ज्याचा राग येतोय, ते सगळं या पानावर लिही. शिव्या दे, रड, ओरड… सगळं या कागदावर उतरव. “

समीरला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने पेन घेतलं आणि लिहायला सुरुवात केली.

बॉसचा राग, कर्जाचं टेन्शन, बायकोशी झालेला वाद, स्वतःचा अपयशीपणा…

समीर लिहीत गेला. १ पान, २ पानं… ४ पानं भरली.

लिहिता लिहिता समीरच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्याचा हात थरथरत होता.

पण जसं जसं तो लिहीत होता, तसं तसं त्याच्या छातीवरचं ओझं कमी होत होतं.

त्याला वाटलं, जणू कोणीतरी त्याच्या मनातला ‘विषारी वायू’ काढून घेतलाय.

लिहून झाल्यावर त्याने काकांकडे बघितलं.

काकांनी ती ४ पानं डायरीतून फाडली.

समीरला वाटलं ते वाचतील.

पण काकांनी खिशातून एक लायटर (Lighter) काढला.

आणि समीरच्या डोळ्यादेखत ती लिहिलेली ४ पानं… जाळून टाकली.

समीर ओरडला, “अहो! हे काय करताय? मी इतकं महत्त्वाचं लिहिलं होतं! “

दामू काका हसले आणि म्हणाले:

“बाळा, ते महत्त्वाचं नव्हतं, तो ‘कचरा’ होता.

एकदा कचरा घराबाहेर काढला की आपण तो जपून ठेवतो का? नाही ना?

मग मनातल्या वेदना कागदावर का जपून ठेवायच्या?

तू लिहिलंस… तुझं मन रिकामं झालं.

आणि मी जाळलं… म्हणजे त्या समस्या आता अस्तित्वातच नाहीत.

आता तू मोकळा आहेस. नवीन सुरुवात कर. “

समीरला त्या दिवशी खूप शांत झोप लागली.

त्यानंतर समीर रोज काकांकडे जायचा. काही ना काही लिहायचा आणि काका ते पान जाळून टाकायचे.

समीरच नाही, तर पार्कमधले अनेक लोक आता काकांकडे आपला ‘मानसिक कचरा’ टाकायला येत होते.

काका कोणाचंही गुपित वाचत नसत. ते फक्त जाळत असत.

सहा महिन्यांनंतर…

एक दिवस समीर पार्कमध्ये आला, पण दामू काकांचा बाकडा रिकामा होता.

दुसऱ्या दिवशीही ते आले नाहीत.

तिसऱ्या दिवशी समीरला समजलं की, रात्री झोपेतच दामू काकांचं निधन झालं.

समीर धावत काकांच्या घरी गेला.

तिथे काकांचा मुलगा सामान आवरत होता.

समीरने विचारलं, “त्यांची ती डायरी कुठे आहे? मला ती बघायची आहे. “

मुलाने कपाटातून ती ‘काळी जाड डायरी’ काढून समीरच्या हातात दिली.

समीरला वाटलं, यात काकांनी जगाचं रहस्य, काहीतरी मोठं ज्ञान लिहून ठेवलं असेल.

त्याने थरथरत्या हाताने डायरी उघडली.

पहिलं पान… कोरे (Blank).

संदुसरं पान… कोरे.

तिसरं… चौथं… शेवटचं पान…

संपूर्ण डायरी ‘कोरी’ होती.

त्या डायरीच्या शेवटच्या कव्हरवर काकांच्या अक्षरात फक्त एक ओळ लिहिलेली होती:

“माणसाने आठवणी ठेवाव्यात, पण जखमा नाही. मी माझं आयुष्य रोज जाळलं, म्हणूनच रोज नव्याने जगलो. “

समीरला समजलं की काका रोज संध्याकाळी डायरीत काय लिहीत होते?

ते काहीच लिहीत नव्हते.

ते फक्त दिवसभराच्या कटू आठवणी कागदावर उतरवून त्या जाळून टाकत होते.

त्यांनी कधीच दुःख ‘साठवून’ ठेवलं नाही, म्हणून ते ७५ व्या वर्षीही मुलासारखे हसत होते.

समीरने त्या दिवशी ती कोरी डायरी आपल्यासोबत घेतली.

लिहण्यासाठी नाही… तर हे आठवण्यासाठी की, “जगण्याचं पहिलं सूत्र म्हणजे विसरणे (Letting go). “

आपण मोबाईलची मेमरी फुल झाली की ‘क्लीन’ करतो, पण मनाची मेमरी कधीच क्लीन करत नाही. जुन्या भांडणांचं आणि अपमानाचं ओझं वाहून नेऊ नका.

रोजच्या रोज मनातला कचरा कागदावर उतरवा आणि जाळून टाका. ‘रिकामं मन हेच आनंदाचं घर असतं. ‘

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रील आणि लाईक्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रील आणि लाईक्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

‘स्नेहा’ (वय २८) ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Influencer) होती. तिचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स होते.

#स्त्रीशक्ती

तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं.

तिचा ६ वर्षांचा मुलगा, ‘आर्यन’, अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंट करायचे, “So cute! Best Mom-Son duo!”

पण कॅमेरा बंद झाला की स्नेहाचं रूप वेगळं असायचं.

 

त्या दिवशी रविवार होता.

स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला “मदर्स डे स्पेशल” (Mother’s Day Special) रील बनवायची होती.

थीम होती – ‘आईचं प्रेम: जगातील सर्वात सुरक्षित जागा.’

बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता, कारण बाबा बिजनेस ट्रिपवर गेले होते.

 

आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं.

“मम्मा… मम्मा… हे बघ ना. हे तुटलं. मला भीती वाटतेय, ते सोफ्याखाली गेलंय.”

स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली.

“आर्यन! तुला कितीदा सांगितलंय मी शूट करतेय? मध्ये मध्ये नको येऊ.

जा बाहेर खेळ. मी १० मिनिटात येते.

मला मूड खराब नकोय माझा. गेट आऊट!”

 

तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून ‘लॉक’ केला. जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये.

बिचारा आर्यन रडवेला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला.

 

रेकॉर्डिंग सुरू झालं.

बेडरूममध्ये स्नेहा कॅमेरासमोर अतिशय भावूक होऊन ॲक्टिंग करत होती.

बॅकग्राउंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं… “तुझसे नाराज नहीं जिंदगी…”

स्नेहा ओठांची हालचाल (Lip-sync) करत होती. डोळ्यातून खोटे अश्रू काढत होती.

कॅप्शन होतं: “माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते. तोच माझा श्वास आहे.”

 

ती १०-१५ मिनिटं त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने ५-६ रिटेक (Retakes) घेतले.

बाहेर हॉलमध्ये काय चाललंय, याचा तिला थांगपत्ता नव्हता.

 

इकडे हॉलमध्ये, आर्यन खेळता खेळता ‘स्टोर रूम’ कडे गेला.

तिथे एक जुनी, मोठी ‘लाकडी पेटी’ (Antique Trunk) ठेवली होती, जी स्नेहाने ‘व्हिंटेज शूट’ साठी आणली होती.

त्या पेटीचं झाकण उघडं होतं.

आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, “मी यात लपतो, मम्मा आली की तिला ‘धप्पा’ करेन.”

तो त्या मोठ्या पेटीत उतरला.

तो आत बसला… आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला.

त्या जुन्या पेटीचं जड झाकण “धडाम!” करून खाली पडलं.

त्या पेटीला बाहेरून ‘ऑटो-लॉक’ (Self-locking latch) होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं.

झाकण पडताच कडी अडकली. पेटी लॉक झाली.

 

आर्यन अंधारात घाबरला.

तो ओरडू लागला. “मम्मा! मम्मा! दार उघड! मी अडकलोय!”

तो पेटीवर हाताने बुक्क्या मारत होता. “धड… धड… धड…”

त्या पेटीत हवा जायला जागा नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला.

त्याचा श्वास गुदमरू लागला.

तो जीवाच्या आकांताने ओरडत होता… “मम्मा… वाचव… मम्मा…”

 

पण बेडरूममध्ये?

स्नेहाच्या कानात ‘एअरपॉड्स’ (Airpods) होते. ती गाण्यात मग्न होती.

आणि तसंही तिने दरवाजा साऊंडप्रूफ केला होता.

तिने आपलं ‘परफेक्ट रील’ बनवलं. ते एडिट केलं. फिल्टर लावला आणि ‘पोस्ट’ केलं.

काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडू लागला.

“Wow Sneha! You are truly a great mother!” अशा हजारो कमेंट्स आल्या.

 

स्नेहा खुश झाली.

ती रुमबाहेर आली. “आर्यन? कुठेय माझा बाळ?”

हॉल शांत होता.

तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल.

तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोफ्याखाली.

आर्यन कुठेच नव्हता.

ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला.

“माझा मुलगा खाली आलाय का?”

वॉचमन म्हणाला, “नाही मॅडम. कोणीच नाही आलं.”

 

स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली.

ती रडत रडत पुन्हा घरात आली.

अचानक तिची नजर त्या ‘स्टोर रूम’ कडे गेली.

तिथे ती जुनी पेटी ठेवली होती.

ती पेटी तिला थोडी हलल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली.

ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ती लॉक होती.

तिच्या काळजात धस्स झालं.

तिने कसं तरी करून, स्क्रू ड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं.

 

आणि…

स्नेहाने जी किंकाळी फोडली, ती पूर्ण इमारतीने ऐकली.

आत आर्यन पडला होता.

त्याचं शरीर निळं पडलं होतं.

त्याचे डोळे उघडे होते… आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती.

तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता.

त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती.

 

स्नेहा त्याला हलवू लागली. “आर्यन! उठ ना बाळा! मम्मा आली बघ! उठ ना!”

ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली.

डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली.

“I am sorry. He is gone. मृत्यू होऊन किमान २० मिनिटं झाली आहेत. गुदमरून जीव गेलाय (Asphyxia).”

 

पोलिस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं.

पोलिस इन्स्पेक्टर ‘जाधव’ तपासासाठी घरी आले.

त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलं?

त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला.

 

इन्स्पेक्टरने गॅलरी उघडली.

त्यात तो ‘शेवटचा व्हिडिओ’ (Raw Footage) होता, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता.

या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं. फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज (Ambient Sound) होता.

 

इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला.

व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती.

पण…

व्हिडिओच्या बॅकग्राउंडला, अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता.

 

“धड… धड… धड…” (पेटीवर मारल्याचा आवाज).

आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला, क्षीण आवाज…

“मम्मा… मम्मा… वाचव… मम्मा…”

 

स्नेहा कॅमेरासमोर ॲक्टिंग करत होती, “माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते…”

आणि त्याच क्षणी, बॅकग्राउंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता.

तिच्या कॅमेऱ्याने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने ‘एअरपॉड्स’ आणि ‘लाईक्स’ च्या नादात ऐकला नाही.

 

जेव्हा पोलिसांनी स्नेहाला तो ऑडिओ ऐकवला…

स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं.

“मी मारलं! माझ्या रीलने त्याला मारलं!

मी जगाला दाखवायला ‘प्रेम’ करत होते, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता!”

 

आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे.

ती कोणाशीच बोलत नाही.

ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतेय.

आणि अधून मधून ओरडते… “कट! कट! रिटेक घ्या! माझा आर्यन परत येईल!” पण आयुष्यात ‘रिटेक’ नसतात.

 

सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की, वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका आपल्याला ऐकू येत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा. कारण ‘लाईक्स’ (Likes) लाख मिळतील, पण गेलेला ‘जीव’ पुन्हा मिळणार नाही. मुलांसाठी ‘परफेक्ट आई’ सोशल मीडियावर नाही, तर घरात बना.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मान्यतेचे व्यसन” – लेखक  : अज्ञात  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मान्यतेचे व्यसन” – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

Validation Addiction — मान्यतेचं व्यसन

ती नवीन साडी नेसली.

फोटो काढला. स्टेटस टाकलं.

दर ५ मिनिटांनी फोन उघडून बघते..

किती views? किती replies?

 

त्याने नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला.

घरी येऊन शांत बसला.

पण ऑफिसमध्ये कोणी “well done” म्हटलं नाही म्हणून रात्रभर त्याचा mood off.

 

लहान मुलगा चित्र काढतो.

आई म्हणते, “छान आहे. ”

तो लगेच विचारतो — “खरंच? की फक्त बोलतेस? ”

 

ही सगळी एकच गोष्ट आहे —

Validation Addiction.

 

Validation म्हणजे काय?

इतरांनी आपल्याला मान्यता देणं.

आपण चांगले आहोत, सुंदर आहोत, यशस्वी आहोत —

हे बाहेरून ऐकायची गरज.

 

मान्यता हवी असणं नैसर्गिक आहे.

पण जेव्हा आपली किंमत फक्त वारंवार इतरांच्या शब्दांवर अवलंबून होते —

तेव्हा ती सवय व्यसन बनते.

 

आजची पिढी दुखावलेली नाही…

ती approval वर जगायला शिकली आहे.

 

Like कमी आले तर mood off.

Partner ने appreciate केलं नाही तर insecurity.

Boss ने कौतुक केलं नाही तर self-doubt.

 

आपण इतके बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून झालो आहोत की आतला आवाज ऐकणं विसरलो आहोत.

 

Validation Addiction ची मोठी समस्या काय?

ती आपल्याला कायम भुकेलं ठेवते.

 

आज १० लोकांनी कौतुक केलं तर छान वाटतं.

उद्या ८ लोकांनी केलं तर कमी वाटतं.

परवा ५ लोकांनी केलं तर दुःख होतं.

 

कारण व्यसन वाढत जातं.

 

मानसिक आरोग्यासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे —

स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेत शोधणं.

 

जर तुमचा आत्मविश्वास

like, comment, appreciation, promotion

यावर उभा असेल —

तर तो कायम हलणार.

 

खरी ताकद कुठे आहे?

Self-validation मध्ये.

 

स्वतःला विचारणं —

मी माझ्या मूल्यांनुसार वागलो का?

मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला का?

मी स्वतःच्या नजरेत ठीक आहे का?

 

जर उत्तर “हो” असेल,

तर बाहेरचं कौतुक बोनस आहे…

गरज नाही.

 

Validation Addiction मध्ये माणूस लोकांना खूश ठेवतो.

Self-respect मध्ये माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो.

 

आज depression चं एक मोठं मूळ म्हणजे आपण स्वतःला स्वतः मान्यता देत नाही. आपण स्वतःला टाळ्या देत नाही.

आपण स्वतःला “मी पुरेसा आहे” असं म्हणत नाही.

 

लक्षात ठेवा —

जगाचं approval बदलत राहील.

तुमची किंमत बदलत नाही.

 

मनाची मोठी सवय म्हणजे —

टाळ्यांची वाट पाहू नका…

स्वतःला शांतपणे मान्यता द्या.

 

कारण जेव्हा आत्मसन्मान आतून उभा राहतो,

तेव्हा बाहेरच्या टाळ्या फक्त आवाज असतात.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘देहावसान’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘देहावसान’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

प्रा. डॉ. लोपा मेहता, या मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्यांनी तेथील एनॅटॉमी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.

७८ व्या वर्षी त्यांनी ‘लिव्हिंग विल‘ तयार केले. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे —

‘जेव्हा शरीर साथ देणे बंद करेल, आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर उपचार करू नयेत.

ना व्हेंटिलेटर, ना ट्यूब, ना रुग्णालयातील निरर्थक धावपळ.

माझा शेवटचा काळ शांततेत जावा — जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य असेल.’

 

डॉ. लोपा यांनी केवळ हा दस्तऐवजच लिहिला नाही, तर मृत्यूविषयी एक संशोधन-पत्रही प्रकाशित केले. त्यात त्यांनी मृत्यू ही एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया आहे, असे स्पष्ट केले आहे.

त्यांचा मुद्दा असा की, आधुनिक वैद्यकशास्त्राने मृत्यूला स्वतंत्र संकल्पना म्हणून कधी पाहिलेच नाही. वैद्यकशास्त्राचा आग्रह असा राहिला, की मृत्यू नेहमी एखाद्या आजारामुळेच येतो, आणि जर आजारावर इलाज झाला, तर मृत्यू रोखता येतो.

पण शरीराचे विज्ञान त्याहून खूप खोल आहे.

 

त्यांचा युक्तिवाद असा आहे — शरीर हे अखंड चालणारे यंत्र नाही. ती एक मर्यादित प्रणाली आहे, ज्यात ठराविक जीवनशक्ती असते. ही ऊर्जा कुठल्यातरी टाकीमधून मिळत नाही, तर सूक्ष्म शरीरामार्फत मिळते.

हेच ते सूक्ष्म शरीर, ज्याचा अनुभव प्रत्येकाला येतो, पण जो दिसत नाही. मन, बुद्धी, स्मृती आणि चेतना — या सगळ्यांनी मिळून बनलेली ही प्रणाली आहे.

 

हे सूक्ष्म शरीर म्हणजे जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे. ही ऊर्जा संपूर्ण देहात पसरते, आणि शरीर जिवंत ठेवते. हृदयाची धडधड, पचनक्रिया, विचार करण्याची क्षमता — हे सगळे तिच्या आधारावर चालते.

पण ही शक्ती अमर्याद नाही. प्रत्येक शरीरात तिचे एक ठराविक प्रमाण असते. जसे एखाद्या यंत्रात बसवलेली फिक्स्ड बॅटरी— ना वाढवता येते, ना कमी करता.

“जितकी चावी भरली रामाने, तितके चालेल खेळणे” — असा प्रकार.

 

डॉ. लोपा लिहितात, की जेव्हा शरीरातील ही ऊर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळे होते. तोच क्षण म्हणजे देह स्थिर होतो, आणि आपण म्हणतो, “प्राण गेले. ”

ही प्रक्रिया ना आजाराशी संबंधित असते, ना कुठल्या चुकांशी. ही शरीराची अंतर्गत लय आहे — जी गर्भातच सुरू होते, आणि पूर्ण होऊन मृत्यूला पोहोचते.

या ऊर्जेचा खर्च प्रत्येक क्षणी चालतो — प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आपला जीवनावधी संपवतो. आणि जेव्हा संपूर्ण देहाचे “कोटे” पूर्ण होतात, तेव्हा शरीर शांत होते.

 

मृत्यूचा क्षण हा घड्याळाने मोजलेला नसतो. तो एक जीवनशास्त्रीय वेळ असतो — जो प्रत्येकासाठी वेगळा.

कुणाचे जीवन ३५ वर्षांत पूर्ण होते, तर कुणाचे ९० वर्षांत. पण दोघेही आपली पूर्ण वाटचाल करतात.

जर आपण त्याला पराभव किंवा जबरदस्ती मानले नाही, तर कुणीही अपुरे मरत नाही.

 

डॉ. लोपा यांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट धरते, तेव्हा केवळ रुग्णाचे शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंब थकते.

ICU मधील महिनाभराची श्वासोच्छ्वासाची किंमत कधी कधी आयुष्यभराच्या बचतीला नेस्तनाबूत करते.

नातेवाईक म्हणत राहतात — “अजून आशा आहे, पण रुग्णाचा देह कधीच सांगून गेलेला असतो — “आता पुरे”.

 

म्हणूनच त्या लिहितात — जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा फक्त मला KEM रुग्णालयात घेऊन या. जिथे मला खात्री आहे, की अनावश्यक हस्तक्षेप होणार नाही. उपचारांच्या नावाखाली दूरगामी त्रास दिला जाणार नाही. माझ्या शरीराला रोखले जाणार नाही — त्याला जाऊ द्या”*.

 

पण प्रश्न हा आहे — आपण आपल्यासाठी असे काही ठरवले आहे का?

आपले कुटुंब त्या इच्छेचा मान ठेवेल का? आणि जे मान ठेवतील त्यांना समाजात मान मिळेल का?

आपल्या रुग्णालयांत अशा इच्छेचा सन्मान आहे का, की अजूनही प्रत्येक श्वासावर बिल होणार आणि प्रत्येक मृत्यूवर दोषारोप?

 

हे इतके सोपे नाही. तर्क आणि भावना यांचा समतोल साधणे कदाचित सर्वात कठीण काम आहे.

जर मृत्यूला आपण शांत, नियत आणि शरीराच्या अंतर्गत गतीतून आलेली प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलो, तर कदाचित मृत्यूची भीती कमी होईल, आणि डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा जास्त वास्तववादी होतील.

 

माझ्या मते, मृत्यूशी लढणे थांबवायला हवे आणि त्याआधी जगण्यासाठी तयारी करायला हवी.

आणि जेव्हा तो क्षण येईल — तेव्हा शांतपणे, सन्मानाने त्याला सामोरे जावे.

 

बुद्धांच्या भाषेत — मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे.

  

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेमभावना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेमभावना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला ह्या फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डेवरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…

एकदा एक मूर्ख शायर

सूर्यास म्हणतो की….

 

भास्करा, कीव मजला

येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे

पाहिली आहे कधी ?

 

तेव्हा सूर्य उत्तर देतो…

 

आम्हासही या शायराची

कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास

रात्र यावी लागते.

 

प्रेम हे काय दिवस ठरवून

व्यक्त करायची चीज आहे ?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.

प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.

गदिमा म्हणून गेलेयत…

‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला…’

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की

‘जिथे सागरा धरणी मिळते

तेथे तुझी मी वाट पहाते’

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.

ही कोंडी शेवटी तो फोडतो,

(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)

 

‘लाजून हांसणे अन् हांसून ते पहाणे,

मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’

भेट झाल्यावर मात्र हृदयात

एक अनाहूत हुरहुर सुरू होते.

मग परत गदिमा मदतीला येतात,

 

‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’

 तोही आपल्या विश्वात नसतोच.

 

‘होशवालों को खबर

बेखुदी क्या चीज है,

इश्क किजे, फिर समझिये,

बंदगी क्या चीज है’

 

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय….

 ‘मी मनांत हसता प्रीत हसे,

हे गुपीत कुणाला सांगू कसे ?’

त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे.

तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू ) आहेत,

ती म्हणते,

 

‘नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी’

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे

नाहीत. मग तीच म्हणते,

 

‘ये मुलाकात इक बहाना है,

प्यार का सिलसिला पुराना है’

 

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर

 

‘घडी घडी मेरा दिल धडके,

हाय धडके, क्यू धडके’

ह्याची खात्री पटलीय पण

खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.

 

‘कहना है, कहना है,

आज तुमसे ये पहली बार,

तुम ही तो लायी हो,

 जीवन में मेरे

प्यार, प्यार, प्यार..’

 ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय.

तृप्त झालीय.

 

‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

शब्दरूप आले, मुक्या भावनांना’

आणि मग झाडांची पाने हलतांत. तो खूष.

 

‘जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,

झाली फुले कळ्यांची,

झाडे भरांत आली’

 

आणि तिनं चक्क होय म्हटलं.

हा गडाबडा लोळायचा बाकी.

 

‘तुम क्या जानो, मुहब्बत क्या है..:

 

‘कोकिळ कुहूकुहू बोले,

तू माझा तुझी मी झाले.’

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते:

‘तुज्ये पायान् रूपता काटां,

माज्ये काळजान् लागतां घांव’

आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.

 

दो लब्जों की है बस ये कहानी या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.

 

‘आज तू डोळ्यांत माझ्या,

 मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा,

 तू अशी जवळी रहा..’

 

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डेच्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

भारतीय संस्कृती आणि माय मराठी प्रेमी… नक्कीच सहमत असतील.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ळळळ ळळळ…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

‘ — हे अक्षर असलेली वणदार भाषा म्हणजे आपली मराठी!!

आणि ….

म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धीचा आम्हाला गर्व आहे!

अक्षर नसेल तर?

पळणार कसे…?

वळणार कसे…?

दुसर्‍यावर जळणार कसे?

भजी तळणार कशी?

सौंदर्यावर भाळणार कसे?

पोरं-टोरं तळ्यात-मळ्यात खेळणार कशी..?

तीळगूळ कसा खाणार?

टाळे कसे लावणार?

 

बाळाला वाळे कसे घालणार….?

खुळखुळा कसा देणार?

घड्याळ नाही, तर सकाळी डोळे कसे उघडणार?

घड्याळ बंद पडले, तर पळे कोण मोजणार?

वेळ पाळणार कशी?

मने जुळणार कशी?

खिळे कोण ठोकणार?

तळे भरणार कसे?

नदी सागराला मिळणार कशी……..?

मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा….

नाही उन्हाच्या झळा

नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा….!

कळी कशी खुलणार?

गालाला खळी कशी पडणार?

फळा, शाळा, मैत्रिणींच्या  गळ्यात गळा….

सगळे सारखे, कोण निराळा?

दिवाळी, होळी सणाचे काय……?

कडबोळी, पुरणपोळी  ओवाळणी पण नाही?

तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता?

भोळा सांब,

सावळा श्याम

जपमाळ नसेल तर कुठून रामनाम?

मातीची ढेकळे नांगरणार कोण?

ढवळे पवळे बैल जोततील कोण?

पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण?

निळे आकाश, पिवळा चाफा…

 

माळ्याच्या कष्टाने फळाफुलांनी बहरलेला मळा!

नारळ, केळ, जांभूळ, आवळा

काळा कावळा, पांढरा बगळा

ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा?

अळीमिळी गुपचिळी, बसेल कशी दातखिळी?

नाही भेळ,

नाही मिसळ,

नाही जळजळ

नाही मळमळ

नाही तारुण्याची सळसळ

 

कणीक मळली जाणार नाही, पोळ्या लाटल्या जाणार नाहीत…..

टाळ्या आता वाजणार नाहीत…..!

जुळी तिळी होणार नाहीत…….!

बाळंतविडे बनणार नाहीत……!

तळमळ कळकळ वाटणार नाही….!

काळजी कसलीच उरणार नाही…!

पाठबळ कुणाचे मिळणार नाही

सगळेच बळ निघून जाईल,

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.

काहीच कळेनासे होईल शिवाय!

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शिवदासी लता…” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शिवदासी लता” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

असे तीव्रतेने वाटत असे, की या दीदीला कुठेतरी एखादे दृढ आलंबन सापडले असले पाहिजे. एरवी प्रसिद्धीचे अन् लोकप्रियतेचे हे लोटच्या लोट अंगावरून जात असता एखादा माणूस केवळ खुळावून गेला असता.

एके दिवशी अचानकपणे पत्ता लागला. हे लोकप्रियतेचे चपेटे ज्या महापुरुषाच्या आश्रयाने दीदी सोसत्ये आहे, त्याचे नाव कळले.

बाळाकडून (हृदयनाथ मंगेशकर) समर्थभक्त देवांचे समर्थावतार घेऊन आलो – अभ्यासासाठी. पुस्तकाची पहिली पृष्ठे उलटायचे कारण पडले नाही. मधले संदर्भ हवे असत, तेवढ्यापुरता तो भाग उघडला, की माझे काम भागत असे. पण एकदा पुस्तकावर नाव कुणाचे आहे, हे पाहण्याचा फुकाचा चाळा करू गेलो. बाळाचे थोडे तिरके, अतिशय देखणे हस्ताक्षर नुसते पाहत बसणे, हेही एक सुखच आहे.

मुखपृष्ठ उलटले, तो आत अक्षरे दिसली :

“श्रीजगदंबेच्या कृपेने – ज्ञानेश्वरांच्या लेखणीने – समर्थांच्या वैराग्याने – शिवाजीमहाराजांच्या तरवारीने पवित्र झालेल्या या मंगल महाराष्ट्राचा तुला कधी ओढही विसर न पडो, हा आशीर्वाद. “

आणि खाली सही होती –

‘शिवदासी’

१९-१०-५५

चि. हृदय,

१९ व्या वाढदिवसानिमित्त’

 शिवदासी!

 शिवदास्याबद्दल मनी केवढा गौरव! छंदच जडायचा असेल, तर तो हा असा जडावा. तो श्रीमंत योगी अशा अलौकिक योग्यतेचा पुरुषोत्तम होता, की भल्याभल्यांनी त्याचे दास म्हणून मिरवण्यांत धन्यता मानावी! ते एक भावनिक समाधान असते. बऱ्या-वाइटाच्या लाटा भवताली आंदोळत असता मनाला आधार वाटत राहतो, की चिंतेचे कारण काय? ज्याचे दास म्हणून म्हणवितो, त्याने तर याहून अधिक विराटरूप अंगावर झेलून त्याचा भार सहज वाहिला होता!

दीदीचे हे शिवदास्य केवळ कौतुकापुरते नव्हे, याचा प्रत्यय येण्याजोगी एकदोन बरी निमित्ये घडली. शिवराय मंडळाने दादरच्या हेटकरी महाजन वाडीमध्ये शिवछत्रपतिविषयक प्रदर्शन भरवले होते. काही दुर्गांच्या प्रतिमा, छायाचित्रे, शिवजीवनातले चित्ररूप केलेले काही प्रसंग, शिवकालीन शस्त्रे, अशा नाना परी यत्नपूर्वक मिळवून मांडल्या होत्या. अनेक जवानांनी रात्रंदिवस कष्ट केले होते. मात्र त्यांच्या त्या श्रमांचा परिहार करता येईल, असे मंडळाजवळ काही नव्हते। पाचसातशे रुपये खर्चावेत, तेव्हा शिवछत्रपतींच्या नावाला साजेसे कवतिक करता आले असते.

एकदम विचार आला, की दीदीजवळ हात पसरावा. शब्द टाकताक्षणी दीदी मूठभर नोटा घेऊन बाहेर आली; आणि कार्यकर्त्यांच्या मुद्रा उजळून निघाल्या. पावती नेऊन देऊ जाता ती म्हणाली,

“करायची काय पावती? घरच्या कामासाठी कुणी पावत्या का फाडीत बसते? “

दुसरा प्रसंग –

सिंधुदुर्गावरून शिवछत्रपतींच्या पदमुद्रेचा ठसा घेऊन मुंबईस आलो. मनी गौरव दाटला होता, की या क्षणीं आपल्याजवळ एक अलौकिक वस्तु आहे. ज्याला तिचे मोल कळते, तो पाहतांक्षणी मोहरून उठेल. स्वतः शिवछत्रपतींच्या पावलाचा ठसा!

दीदीकडे जाऊन तो कसा मिळवला, इत्यादि सर्व फुशारक्या मारल्या. शेवटी म्हणालो,

“आणि या क्षणी तो ठसा माझ्याजवळ आहे! ”

अतिशय उतावीळ होऊन दीदी म्हणाली,

“खरे? कुठाय्? दाखवा ना! “

ठशावरची आवरणे सोडेतोवरही तिला धीर निघेना. ठसा अनावृत्त होताच तिने अत्यंत श्रद्धापूर्वक करस्पर्श करून हात भाळी टेकला, अन् एखाद्या लहान मुलीप्रमाणे धावत ठसा घेऊन आपल्या शयनगृहात गेली. तिथे तो उशाशी ठेवून दिला. किती वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग भराभरा ज्याला त्याला फोन करून सांगू लागली,

‘हाँ, जी, सुनिये, महाराज शिवछत्रपति का चरणचिन्ह – हाँ, उन्हींका – अभी मेरे पास है, वही तो बता रही हूँ -‘

मात्र आता सूक्ष्मपणे पाहता वाटू लागले आहे, ही स्वरदेवता अलिकडे अधिक गंभीरपणे जीवनाचा विचार करू लागली आहे.

ज्या वेडाने जनी-मीरा झपाटल्या होत्या, त्या दिशेने हे पाखरू भरारू लागले आहे! तिथवर झेप घ्यावी, जिथवर त्या दोघी पोचल्या होत्या. त्याही तर प्रापंचिक कर्दमातून वर उठल्या होत्या. तर मग आपल्यालाही ऐहिक व्यापांची खंत मानायचे कारण नाही. तुकारामाने भरवंसा देऊन ठेवला आहे –

मागे झाले नका पाहो । पुढे जमान आम्ही आहो ।।

जामिनकी त्या महावैष्णवाने स्वीकारली आहे, तेव्हा आता द्यावे स्वतःला झोकून त्या महासमुद्रामध्ये!

 

लेखक:गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares