मराठी साहित्य – विविधा ☆ हरवले ते…. ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ हरवले ते…. ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

सतत पूर्वीचे दिवस आठवणे,त्या आठवणीत गुंतून पडणे,वर्तमानातल्या सगळ्याच गोष्टीना सतत नावे ठेवणे हे खरंतर माझ्या स्वभावाचा भाग कधीच नव्हते. पण…..!

पण गेलं वर्षभर ठाण  मांडून बसलेला आणि अद्यापही जायचं नाव न घेणारा कोरोना, त्याचा विषारी प्रसार, आणि त्यामुळे झालेली जीवघेणी पडझड, परके होऊन गेलेले आपलेच जगणे, प्रत्येकाच्या मनावरचं भितीचं सावट, आणि अपरिहार्यतेमुळे मनात भरुन राहिलेली अस्वस्थता हे वास्तव स्विकारायला आणि पचायलाही जसजसं जड होत चाललं तसतसं वर्तमानात जगणारं माझं मन हरवलेल्या भूतकाळाचा वेध घेऊ लागलं. हे असं सार्वत्रिक, तीव्रतर हताशपण यापूर्वीच्या आयुष्यात मी कधी अनुभवलंच नव्हतं. आजची ही आपल्या आस्तित्वाचीच अनिश्चितता मला विचार करायला प्रवृत्त करणारी ठरलीय.

माझं बालपण, कॉलेज जीवन, नंतरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं कित्येक वर्षांपूर्वीचं, पण कालपरवाच घडून गेल्यासारखं मला लख्ख आठवतंय. तेव्हाचा मी आणि आजचा मी कोणीतरी वेगळ्याच दोन व्यक्ती असल्यासारखी दोघांचीही जीवनशैली दोन ध्रुवांवरची वाटावी एवढी परस्पर भिन्न असल्याचं अगदी ठळकपणे जाणवतं आणि त्याचं आश्चर्यही वाटतं रहातं. अर्थात माझ्यापुरतं सांगायचं तर जीवनशैलीतले हळूहळू होत गेलेले हे सगळे बदल मी त्या त्या वेळी डोळसपणे स्वीकारलेले असल्यामुळे पूर्वीच्या जीवनशैलीची महत्वाची तत्त्वं आजही मी दुर्लक्षित केलेली नाहीयत.त्यामुळे त्याबद्दल स्वतःचं काही चुकल्याची रुखरुख नाही आणि समाधानवृत्तीतही काही फरक पडलेला नाही. पण तरीही आजूबाजूचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही ही बोच मात्र मनात सलते आहेच.

तेव्हा ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ आणि ‘ऋण काढून सण साजरे करू नयेत’हीच वृत्ती प्रत्येक घराचा, संसाराचा भक्कम पाया असे. कारणपरत्वे कुणाकडून नाईलाज म्हणून हात उसने पैसे घ्यायला लागलेच तर ते दिलेल्या वेळेत परत करता यावेत म्हणून हजार काटकसरी आणि तडजोडी करून आधी ते पैसे परत करायला प्राधान्य दिले जाई. तोवर जीवाला घोर असेच आणि शांत झोपही नसेच. अखेरचा श्वास घेताना कुणाचं ‘पै’चंही देणं नसावं म्हणजे तो जिंकला’ हा विचार आयुष्यभर प्राणापलिकडे जपला जाई. कर्ज काढून सण साजरे करणं तर खूप दूरची गोष्ट٫ पण नित्योपयोगी वस्तूंची खरेदीसुद्धा काटकसर करून पै पै साठवून मगच केली जाई. सुवर्णालंकार घालून मिरवण्याची हौस दर गुरूपुष्याला गूंजभर सोनं विकत घेऊन, ते विकत घेता आल्याच्या आनंदातच परस्पर भागवली जाई.

खरं तर हे सगळं कालबाह्य कधी झालं हे जगण्याच्या व्यापात कधी लक्षातच नाही आलं. बदल हळूहळू घडत गेले पण बहुतांश जणांनी ते फारसा विचार न करता सरसकट स्वीकारले. या बदलांना ठळकपणे सुरुवात झाली ती जागतिकीकरणानंतर बाजारयुग अवतरलं त्या क्षणापासून. या बाजारयुगाने निर्माण केलेला उपभोगाचा रंगीबेरंगी भुलभुलैय्या आणि ऐष आरामाचा हव्यास यांनी एक वेगळेच गारुड समाजमनावर निर्माण केलं. मग पूर्वीच्या काळातल्या चैनी गरजा केव्हा होऊन बसल्या समजलंच नाही. त्यामुळे पाय पसरायला अंथरूण खूपच कमी पडतंय असं वाटू लागलं. त्या अंथरुणाची लांबी वाढवण्यासाठी सहज उपलब्ध असणारी कर्जं काढून सुख आणि समाधान शोधण्याचा सहजसोपा मार्ग बिनदिक्कतपणे अनुसरला जाऊ लागला. ‘मूर्ख माणसं घरं बांधतात आणि शहाणी माणसं त्यात भाड्याने रहातात’ असं पूर्वी म्हणायचे. आता कर्ज काढून घर बांधणारे सूज्ञ आणि कर्जं न काढणारे मूर्ख समजले जाऊ लागले. कोरोना हे एक निमित्त, पण ती कर्जं आणि परतफेडीचे हप्ते म्हणजे ‘घी देखा लेकीन बडगा  नही देखा’ या उक्तीचा प्रत्यय देणारे ठरले. त्याक्षणी झालेला तूप-रोटी मिळाल्याचा क्षणिक आनंद कोरोना काळात काळवंडूनच गेला.आणि मग दरमहा मानगुटीवर बसलेलं हप्त्यांचं ओझं तथाकथित समाधानावर बसलेल्या बडग्यासारखंच वाटायला लागलं.

या सगळ्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रवेश झाला आणि कर्जांच्या हप्त्यांचं ओझं वाहणारं गाढव ठरला तो ‘सामान्य माणूस’, पूर्वीच्या काळी स्वतःच स्वतःभोवती आखून घेतलेल्या वर्तुळात समाधानी रहायचा. त्या सामान्य पण सुखी माणसाच्या सदऱ्याला या कर्जांच्या हप्त्यांमुळे जागोजागी ठिगळं लावावी लागल्याचं तीव्रपणे जाणवू लागलं.

पूर्वीच्या काळीही जीवघेणी संकटं येत होतीच. पण जगण्यातल्या अनपेक्षित अडचणींनी निर्माण केलेल्या त्या गंभीर परिस्थितीतही तग धरून रहाता येईल असं नीटनेटकं नियोजन वैयक्तिक पातळीवरच असायचं. सध्याच्या जीवनशैलीत ते नियोजनच गृहीत न धरल्यामुळे घेताना किरकोळ वाटणारे कर्जाचे हप्ते आता फेडताना मात्र डोईजड होऊन बसलेत.

आजच्या जगण्याला प्रचंड वेग आहे ते खरंच.पण किती आणि कुठवर धावायचं आणि तेही किती वेगानं हे स्वतःच योग्य वेळी ठरवण्याचं भान जीवघेण्या स्पर्धेत होणाऱ्या दमणूकीमुळे असं हरवूनच जातंय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्यासाठी जगायचं तो जगण्यातला आनंद हरवून आपला जगण्याशीच झगडा सुरू होतो आहे.

अशा परिस्थितीत जगण्याचं नेमकं भान न हरवता स्वतःचे प्राधान्यक्रम पुन्हा एकदा नीट तपासून पहाणं अगत्याचं आहे. हे झालं तरच हरवलेले आपले मोकळे श्वास पुन्हा अलगद गवसतील अन्यथा त्या श्वासांसारखाच जगण्याचा आनंदही हरवूनच नाही फक्त,तर विरुनच जाईल.

————————

अरविंद लिमये,सांगली.

(9823738288)

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

छंद नव्हे संगत पुस्तकाचे अंतरंग भाग ३

पुस्तकाच्या शेवटी एक श्वानधर्माचे उदाहरण वाचताना खरोखरच अचंबा वाटतो. ती गोष्ट

अरुणाचल प्रदेश ते‌ काराकोरम खिंड हे आठ हजार कि.मि. अंतर पार करण्यात सेनादलातील तीन अधिकाऱ्यांना कुत्र्याने कशी साथ दिली! गिर्यारोहण चालू झाले. भूतानमधील डोंगररांग दरीतून जाताना मॅस्टिफ जातीचे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या मागे लागले. दया आली आणि अधिकाऱ्याने त्याला आपल्या बरोबर घेतले त्याचे नाव द्रुग, (घोडेस्वार) ठेवले गेले. सिक्कीम मधून जाताना द्रुग वेगळ्या मार्गाने पळत जायला लागला. आणि बर्फ उकरायला लागला. पाहिले तर एका माणसाचे प्रेत होते. अधिकाऱ्यांनी हात जोडून पुन्हा त्यावर बर्फ टाकला. पुढे प्रवास गौरी शंकरच्या बेस कॅम्प जवळून २१ हजार फूट उंचीवरून झाला. नेपाळ पार करून कुमाउला पोहोचले. जानेवारी ते नोव्हेंबर त्यांचा प्रवास द्रुगच्या सहवासात आनंदात झाला.

शां. ना. दाते यांच्याकडे श्वान विश्वकोश आहे. कोणत्याही जातीच्या कुत्र्या बद्दल त्याच्या सर्व गुणधर्मांसह संपूर्ण माहिती ते क्षणात देत असत. त्यांचा 50 वर्षांचा परिचय व इतिहास आहे. त्यांच्या परिश्रमाचे आणि तपश्चर्येचे मूर्त रूप हे पुस्तक आहे.

कुत्र्याला बघून पळून जाणारी माणसे हे पुस्तक वाचून कुत्रा पाळण्याचा विचार करू लागले. आणि अनेकांनी प्रत्यक्षात आणले ही. आज दाते हयात नाहीत. पण त्यांचे ९६ पानांचे पुस्तक या रूपाने अमर आहेत.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

परिचय

बी.एससी, बीएड. २१ वर्षे हायस्कूल मध्ये नववी दहावी ला बीजगणित व सायन्स विषय शिकवले. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले.

बोर्डाच्या बीजगणित परीक्षक व शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षक एसएससी बोर्ड सेंटर कंडक्टर तीन वर्षे

छंद  वाचन, लेखन व पर्यटन

दरवर्षी दोन तीन दिवाळी अंकात कथा छापून येतात

☆ विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

ये ग ये ग चिऊताई! बाळाच्या अंगणी! तुला देईल चारा पाणी! माझी सोनुली राणी! असं म्हणताच माझा ५ वर्षांच्या नातवाने विचारले अंगण‌ म्हणजे काय ग आजी? फ्लॅटमध्ये रहात असल्यामुळे प्रश्न पडणे स्वाभाविकच.

अंगण म्हणजे काय हे सांगताना मी बालपणी अंगणात रमून गेले.

अंगण म्हणजे घराची शोभा. अंगणातील तुलसी  वृंदावन म्हणजे घराचं पावित्र्य. रेखीव रांगोळी काढलेल्या तुळशी समोर उदबत्तीचा सुगंध दरवळायला.याच अंगणात उंच मोरपिसाची टोपी घालून वासुदेव यायचा,माकडांचा खेळ रंगायच्या.बाहुला बाहुलीचे लग्न अंगणात लागायचे, वरमाई कोण आणि कोणाला वरमाईचा मान कोणाला द्यायचा याचं भांडण अंगणात जुंपायचे. दुपारी मुलींचे गजगे,काचकवडया,टिकरया तर संध्याकाळी मुलांचे  गोटया, विटीदांडू, लगोरी हे खेळ रंगायचे.अबोली चे गुच्छ,तळहाताएवढे जास्वंदीचे फूल, मंजिऱ्या मुळे घमघमणारी तुळस अंगणात असायची. गुढीपाडव्याला गुढी, आषाढीला पालखी सजवून वारी निघायची.नागपंचमीला उंच झोक्याची चढाओढ चालायची. अंगणात हंडी फोडली जायची. काल्याचा प्रसाद खायचा काय सुरेख चव असायची काल्याची!

नवरात्रात फेर धरून हादगा चालायचा, उंच स्वरात हादगा गाणी चालायची. खिरापत हातात पडताच मुली शेजारच्या अंगणात धावत जात.

दिवाळीत किल्ला तयार करून त्यावर शिवाजी महाराज विराजमान व्हायचे. सर्व मुले आपल्या घरातील मावळे किल्ल्यावर उभे करायचे व किल्ला सजवायचे.

उन्हाळ्यात अंगणात पथारी पसरून गप्पा.विनोद, गाणी यांना ऊत यायचा.. मन भरलं की रातराणीचा,मोगरयाचा सुगंध घेत झोपी जायचं.

मी अंगणाच्या आठवणीत एवढी रमून गेले की “आजी मला दूध दे ना गं!” असे तो म्हणताच मी एकदम भानावर आले.

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

Author: Hemant Bawankar - साहित्य एवं कला विमर्श

 ☆ विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आपण कधी कधी अगतिक आणि अहसाय होतो ना? त्या दिवशी माझी तशीच अवस्था झाली होती. डेंटिस्ट डॉक्टरांकडे त्या खुर्चीत मी बसले होते आ  ऽ ऽ वासून. माझ्या दाढेच्या पोकळीचे ख ss र करून कोरीव काम चालले होते. तेवढ्यात डॉक्टरांचा एक मित्र आला. माझ्या दाताचे ड्रिलिंग करता करता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

त्या मित्राचा मुलगा नुकताच M.B.B.S झाला होता आणिलगेच एका सरकारी दवाखान्यात जॉबही मिळाला होता. त्या आनंदा प्रित्यर्थ्य या मित्राला पेढे द्यायला तो आला होता.

बातमी चांगली होती म्हणजे काय खूपच चांगली होती. डिग्री मिळताच जॉब? वॉव! या मध्ये मी अस्वस्थ होण्यासारख – काहीच नव्हते. पण त्यांचे पुढचे बोलणे ऐकून माझा मेंदू हादरायला लागला.” आता काही काळजी नाही बघ. अरे, सरकारी दवाखान्यात काम असते कुठे आता? पण पगाराची निश्चिंती. अरे असा जावई मिळवायला आमच्या घरी रांग लागल रांग ! कपाटापासून गॅस शेगडी पर्यंत सगळ देतात जावयाला. आम्हाला काही चिंता नाही बघ.”

हे ऐकल्यावर त्याची मेडिकल कॉलेजला अॅडमिशन कशी झाली असेल ? तो पास कसा झाला असेल याहीपेक्षा त्याच्याकडे पेशंट आला तर त्याचे कसे व्हायचे या विचाराने माझ्या दाढेची पोकळीच काय मेंदूही हादरायला लागला.

मुलाचे बारावीचे वर्ष म्हणजे सगळे घरदार अलर्ट. मुलांवर घारीसारखी नजर असते पालकांची. त्याचे कॉलेज किती ते किती? कलासच्या वेळा कोणत्या? त्यानुसार आई आपल्या कामाचे नियोजन करत असते. एका मैत्रिणीच्या मुलाचा हा अनुभव. क्लासच्या एका परीक्षेमध्ये त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले होते. पण त्या सरांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्याचा तपासलेला पेपर त्याला न दाखवता त्याला त्यांनी ही उत्तरं बघून लिहिलीस हे कबूल कर नाहीतर तुला घरी सोडणार नाही अशी तंबी दिली. तो सारखे सांगत होता मी अभ्यास करून, नबघता पेपर सोडवलाय. पण सरांना ते काही केल्या पटत नव्हते. तासभर बिचारा उभा! सर काही केल्या त्याला घरी जाऊ देईनात. त्याला खूप भूक लागली होती. शेवटी कळवळून तो सरांना म्हणाला,” सर, तुम्ही सांगता म्हणून म्हणतो मी पेपर बघून सोडवला.” कॉपी न करता त्याला तसे बोलावे लागल. इकडे मुलगा घरी आला नाही म्हणून आई काळजीत. आल्यावर त्याने खरे कारण सांगितले तरी तिलाही ते पटेना. या मानसिक दोलायमान अवस्थेत त्याचे आठ दहा दिवस अस्थिरतेत गेले. आता तोच मुलगा आपल्या मेरिटवर हिमतीवर चांगली नोकरी मिळवून परदेशात स्थिर झालाय. काय विचार करायचा आपण आणि काय निष्कर्ष काढायचा यातून?

आपण मोठ मोठे अभिनेते इतके पाहतो की त्यांनी मेडिकलच शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ते सोडून देऊन अभिनया कडे वळले आणि ते क्षेत्र गाजवल. कोणी इंजिनियरींगची डिग्री मिळवून गायनाकडे वळले आणि प्रसिद्ध गायक बनले. या लोकांनी सांगितलेले समर्थन न पटण्यासारखे असते. एका गरीब, हुशार, होतकरू मुलाला तुमच्या शिक्षणाचे पैसे तरी द्यायचे ना, त्याचे आख्खे घर वर आले असते. त्याची बुद्धि आणि वेळ धडपड करण्यात जाऊन त्याचे आयुष्य कष्टात काळजी करण्यात गेले नसते. कितीतरी मुली सुद्धा बारावीला चांगले मार्क्स पडले म्हणून मुलींच्या कोट्यामधून इंजिनियरींगला अॅडमिशन मिळवतात आणि लग्न झाल्यावर आमच्याकडे नोकरी केलेली आवडत नाही म्हणून घरी बसतात. हे आधी नाही का समजत? पण कोण, कुणाला आणि कसे सांगणार ?

असे आपल्या अवती भोवती कितीतरी प्रश्न निर्माण होत असतात. डोक्याभोवती पिंगा घालून आपल्याला त्रस्त करत असतात. आपणच का विचार करत रहातो असेही वाटते. कितीतरी गोष्टी काही केल्या पटत नाहीत. तरी आपण गप्प बसतो.

बघा, पटलं तर

व्हय म्हणा.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

इथून पुन्हा जगदीश्वरच्या मंदीराकडे येताना एका महत्वाच्या पायरीकडे लक्ष जाते, ते म्हणजे ‘हिरोजी इंदूळकर’ ह्यांच्या. हिरोजींनी मोठ्या हिकमतीने, निष्ठेने रायरीच्या डोंगराचा ‘रायगड’ असा कायापालट केला आणि महाराजांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो सार्थ केला. महाराज जेव्हा हा दुर्ग बघायला आले तेव्हा हिरोजींनी सोन्यासारखा घडवलेला बेलाग ‘रायगड’ पाहून प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना विचारले “तुम्हाला काय इनाम हवे?” त्यावर हिरोजी म्हणाले “मला सोने नाणे इनाम काही नको. फक्त मंदिराकडे येणार्‍या भक्तांस माझ्या नावाची पायरी दिसेल अशी ठिकाणी ती बांधण्याची परवानगी द्यावी!”

स्वामीनिष्ठ हिरोजींना मानाचा मुजरा करून पुढे आम्ही गाठले ते टकमक टोक! स्वराज्यातील गुन्हेगारांना, विश्वासघातक्यांना इथून कडेलोटाची कठोर शिक्षा दिली जात असे. पण इथेही काही पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा कडेलोट करून कड्याच्या टोकावरच कचरा केला आहे. असो.

इथेच घडलेली एक ऐकायला मजेशीर पण प्रत्यक्षात थरारक कथा नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे, महाराज ‘टकमक’ टोकावर आले असताना त्यांच्यावर छत्री धरणारा एक सेवक वार्‍याच्या झंझावातबरोबर हवेत उडाला. सुदैवाने त्याने छत्री घट्ट पकडून ठेवल्याने तो हवेवर तरंगत, भरकटत, अलगदपणे शेजारील निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाचे नाव निजामपूर छत्रीवाले असे ठेवण्यात आले. बसने पुण्यास परतीच्या मार्गावर असताना मला ह्या गावाचे नावंही एका फाट्यावर वाचायला मिळाले.

टकमक टोकावरून आमची वरात पुन्हा होळीच्या माळावर आली आणि तिथून महाराजांच्या पुतळ्यामागे असलेल्या राजदरबार, सदर पाहायला निघाली. हा परिसर मात्र चांगलाच भव्य आहे. दरबारात सिंहासनावर बसलेल्या महाराजांचा मेघडंबरी पुतळाही आहे. पण इथे काही फुटांवरून दर्शन घ्यावे लागते, अगदी जवळ जायला आता मनाई आहे. ह्याला कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी कुणा समाजकंटकांनी तलवारीचा तुकडा तोडून पळविला होता.

त्यामागे आले असता दिसतात ते म्हणजे महाराजांचा राजवाडा, राण्यांचे महाल, शयनगृह इ. इथे मात्र सर्व भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. नुसतीच जोती पाहून महालांची ऊंची कशी कळणार? आपण नुसत्या कल्पनेचे महाल उभारायचे. राजवाड्याची एकंदर भव्यता मात्र जाणवल्यावचून राहत नाही. येथील एका बाजूच्या मेणा दरवाजाने तुम्हाला गंगासागर तलाव आणि मनोर्‍यांकडे जाता येते तर दुसर्‍या बाजूने धान्य कोठार व तसेच पुढे उतरून ‘रोप वे’च्या वरच्या स्थानका कडे जाता येते.

एव्हाना दोन वाजल्यामुळे जनतेला भूक लागली होती. सर्वजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते जे थोड्याच वेळात ‘रोप वे’ ने दोघे जण घेऊन आले. मेणा दरवाज्याच्या बाहेरील मोकळ्या जागेत अंगतपंगत मांडून पोळी, फ्लॉवर-मटार-बटाटा अशी तिखट रस्सा भाजी, बटाट्याची सुकी भाजी, पापड आणि ‘गिरीदर्शन’ क्लबतर्फे ‘चितळे’ श्रीखंड अशा चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर गंगासागर तलावाचे मधुर पाणी पिऊन आम्ही ‘दुर्गदुर्गेश्वर रायगडा’चा निरोप घेतला.

आता उर्वरीत दोन-तृतीयांश ‘रायगडा’चे दर्शन कधी मिळते आहे ह्याची मी रांगेत उभा राहून वाट पाहतो आहे. जगदीश्वर मजवर कृपा करो आणि हा योगही लवकर जुळून येवो, हीच प्रार्थना!

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वासुदेव ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ वासुदेव ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

डिसेंबर / जानेवारीतील  मस्त थंडी.  रविवारची सुट्टी. पहाटे चारच्या साखर कारखान्यातला  पहिल्या शिफ़्टच्या भोंग्याने हलकीशी जाग आलेली असते. तरीही मस्त पडलेल्या थंडीमुळे आणि सुट्टीमुळे आणखी जरा वेळ झोपावेसे वाटते. बाबांची फिरायला जायची गडबड, त्यांचा मला उठवायचा अयशस्वी प्रयत्न आणि त्याच सुमारास जोरात हार्न वाजवत शेरी नाल्यावरून धडधडत  जाणारी  सह्याद्री एक्स्प्रेस. तशातही अजून चारच तर वाजतायत, मस्त थंडीत  पडून राहावंसं वाटण तस सहाजिकच ना ? एव्हान त्या भोंग्यातून सभोवार पसरलेला आणि आता नाकालाही सवय झालेला मळीचा वास,  त्या थंडीत अंगावर असलेली मऊ दुलई  डोक्यावरून घ्यायला  भाग पाडतो. मग परत छानशी डुलकी केव्हा लागते ते कळतच नाही.

थोड्यावेळाने जाग येते ते बाजूच्या गल्लीतून येणा-या  गाण्याच्या आवाजाने, एकदम खड्या आवाजात,योग्य लयीत गाणे म्हणत वासुदेव आलेला असतो.  काय माहीत पण मला या वासुदेवाचे लहानपणापासुन  आकर्षण वाटत आले आहे .  त्याची चाहुल लागली की मी  लगेच उठून ब्रश करून  घरातल्या बाल्कनीत  उभा रहायचो

डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात धोतर  कमरेभोवती  उपरणे, एका हातात डमरू तर दुसर्‍या हातात टाळ, काखेेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या तसेच रंगीबेरंगी माळा,  कपाळ व कंठावर चंदन किंवा गंधाचे टिळे अशा वेशभूषेत वासुदेव  यायचा आणि पाच दहा मिनिटात सभोवतालचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकायचा

नाही कुणी जागं झोपलं पहारा

दु:खी जीव तुला देवाचा सहारा

तुझ्यासाठी देव वासुदेव झाला

वासुदेव आला हो वासुदेव आला

या  गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगितल्या जात. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात.

वासुदेव हरी वासुदेव हरी |

सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी |

सीता सावली माना दान करी वासुदेवा |

श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||

वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने शिवाजीने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत असा इतिहास सांगतो

अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्या बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.

आपली कला सादर करून कुणी काही दान, पैसे, धान्य दिल तर हा वासुदेव ते घेऊन आपला पुढे निघायचा

आज हा वासुदेव  कदाचित अजूनही  सांगली , कोल्हापूर , सातारा किंवा आजूबाजूच्या  खेडोपाड्यात  येत असेलही पण मुंबईसारख्या  शहरात त्याचे दर्शन दुर्मिळच होत चालले आहे

म्हणतात ना

बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो

पैशापायी माणूस मरतो, पैशावर जगतो

 

वासुदेवाची ऐका वानी, जगात न्हाई राम रे

दाम करी काम येड्या दाम करी काम रे

 

पण आज ही  कला/ आपला सांस्कृतिक वारसा दुर्मिळ होत चाललाय. अजूनही आशा वाटते की कदाचित या गजबजलेल्या मुंबईतही एका रविवारच्या सकाळी  वासुदेव येईल आणि म्हणेल

  जागा हो माणसा संधी ही अमोल

  तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं

  घालतील वैरी अचानक घाला |

 वासुदेव आला हो वासुदेव आला….

देवा माझ्या द्वारी या हो

(गाणी संग्रहित)

अमोल

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

ह्यापुढे आम्ही पोहोचलो ते एका अतिशय ऐतिहासिक महत्वाच्या जागी तो म्हणजे होळीचा माळ. इथे गडावरील होळीचा सण साजरा व्हायचा आणि इथेच महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. तिथल्या छत्रपतींच्या भव्य पुतळ्यापुढे नतमस्तक झाल्यावर जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी स्वत:चे अवघे आयुष्य ओवाळून टाकणार्‍या, जिवाची बाजी लावून परक्या शत्रूचा तसेच घरभेद्यांचाही नि:पात करणार्‍या, प्रसंगी महाघोर संकटांना शौर्याने तोंड देऊन स्वत:ची, अवघ्या रयतेची, स्वदेशाची आणि स्वधर्माची अस्मिता जपणारे आणि उजळवून टाकणारे श्रीमान योगी जिथे राजसिंहासनावर बसले त्याच भूमीवर आपण उभे आहोत ही जाणीव मनाला गहिवर आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणते.

होळीच्या माळावरून चालत पुढे आम्ही बाजारपेठ मध्ये आलो. आता ह्या ठिकाणी घरांची फक्त जोती शिल्लक आहेत. इथे घोड्यांवरून मालाची खरेदी-विक्री चालायची असे म्हणतात. काही इतिहासतज्ञ असेही म्हणतात की ही बाजारपेठ नसून गडावर मुक्कामास असलेल्या सरदारांची / भेटीस आलेल्या खाशांच्या राहण्याची सोय म्हणून बांधलेली घरे आहेत.

बाजारपेठेतून पुढे आल्यावर एका मावशींकडे कोकम सरबत पिण्याचा मोह आवरला नाही. मावशींकडे “तुमचे गाव कोणते? आता धंदा’पाणी’ कसे सुरू आहे?” अशी विचारणा केल्यावर “पायथ्याचं हिरकणवली आमचं गाव. अजून पूर्वीइतके पर्यटक येत नाहीत.” म्हणाल्या. “इथून भवानीकडा किती लांब आहे?” असे विचारण्याचाच अवकाश त्यांनी गडाची सगळी कुंडलीच माझ्यासमोर मांडली.  ? “गड पूर्ण बघायला किमान तीन दीस लागतील, गडावर इतकी तळी आहेत, तितकी टाकं आहेत”,

त्याचजोडीला “दारूगोळ्याच्या कोठारावर इंग्रजांचा तोफगोळा पडून मोठा स्फोट झाला आणि पुढे बारा दिवस गड जळत होता”, अशी काही दारुण ऐतिहासिक माहिती बाईंकडून ऐकायला मिळाली. त्यांचा नवरा किंवा घरातील कुणीतरी गाईडचे काम करणारे असावे अशी मला शंका येते न येतेस्तोवरच एक कुरळ्या केसांचा पुरुष तिच्याकडे आला आणि म्हणाला “चल, लवकर पाणी पाज”. हयालाच मी थोड्या वेळापूर्वी पर्यटकांच्या एका चमूला माहिती देताना पहिले होते. सुशिक्षित काय किंवा अशिक्षित काय बायकोच शेवटी नवर्‍यास पाणी पाजणार!!  ?? असो.

इथून पुढे थोडे चालत आम्ही जगदीश्वर मंदिरापाशी आलो. महाराज रोज पूजेसाठी इथे येत असत. त्यामुळे मंदीराच्या बाहेर पादत्राणे उतरवूनच आत जावे. थोड्या भग्नावस्थेतील नंदीचे दर्शन घेऊन गाभार्‍यात प्रवेश करावा. शंकराच्या पिंडीचे दर्शन घ्यावे आणि आजूबाजूची गर्दी विसरून दोन मिनिटे डोळे मिटून शांत बसावे.

चिरेबंदी मंदिराची रचना भव्य असून एका चिर्‍यावर संस्कृत श्लोक कोरलेला आहे. हा चिरा भिंतीमधील इतर चिर्‍यांपेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे असेही म्हणतात की हा चिरा मूळ घडणीतील नसून नंतरच्या काळात बसवण्यात आला असावा.

मंदिराच्या मागील बाजूसच छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. ह्या पवित्र जागी माथा टेकवून सर्व भक्तमंडळी धन्यधन्य होतात. रणजीत देसाईंच्या पुस्तकातील ‘श्रीमान योगी’ इथे समाधीस्थ असले तरी सर्व हिंदूंच्या हृदयसिंहासनावर अजून जागृत राज्य करीत आहेत ह्याची जाणीव होते. महाराजांच्या समाधीमागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. इथूनच थोड्या दूर अंतरावर लिंगाण्याचा सुळका आव्हान देत उभा दिसतो. त्याच्या मागेच राजगड-तोरणा ही दुर्गजोडी अस्पष्ट का होईना पण दिसते. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मात्र स्पष्टपणे दिसते. समाधीच्या डाव्या बाजूस पहिले तर ‘कोकणदिवा’ दृष्टीस पडतो.

“मरावे परी कीर्तीरूपी उरावे”

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१९ च्या दिवाळीत पंढरपूर क्षेत्री जाऊन जवळजवळ दीड तास दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो असताना मी विचार करीत होतो की ‘इतका वेळ रांगेत घालवणे उचित आहे का? देवालयाला बाहेरूनच नमस्कार करायला काय हरकत आहे?’ पण मग विचार केला की देवाचे दर्शन हे सहजपणे न होता हे असेच कष्टसाध्य असले पाहिजे. नुसते पैसे भरून काही मिनिटांत होणारे सुलभ दर्शन “देखल्या देवा दंडवत!” सारखे झटपट समाधान देईलही कदाचित पण त्याने देवदर्शनाची आस फिटेल का? सरतेशेवटी एकदा पांडुरंगाच्या सगुण मूर्तीसमोर उभा राहिलो आणि मात्र डोळ्याचे पारणे फिटून धन्यधन्य झालो! कदाचित मंदिरातील, गाभार्‍यातील वातावरणाचा, आवाजाचा कुठेतरी मनावर खोलवर परिणाम होत असावा. “स्थानं खलु प्रधानं” असे म्हटले आहे ते काय उगीच नव्हे. थोडाफार असाच परिणाम नुकताच पुन्हा एकदा अनुभवास आला जेव्हा मी रायगडावरील ‘महाराजां’च्या स्फूर्तिदायक मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा.

१६ जानेवारी २०२१ रोजी मी रात्री 10:30 वाजता ‘गिरीदर्शन’च्या ‘रायगड’ ट्रेकच्या बसमध्ये उत्साहाच्या भरात चढलो आणि लक्षात आले की मी मास्क आणि उन्हाळी टोपी ह्या दोन्ही आवश्यक गोष्टी घरीच विसरलो आहे. JJ असो. बस हलली असल्याने आता काही करणेही शक्य नव्हते. बसमध्ये मात्र सर्वत्र तरुणाई भरली होती त्यामुळे उत्साहाचे वारे संचारले होते. मग माझ्या शेजारी बसलेल्या मेकॅनिकल इंजींनीयरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असलेल्या चिंचवडच्या सर्वेश बरोबर ओळख काढून गप्पा सुरू केल्या. “कोविद मुळे लेक्चर्स ऑफलाइन झाली नाहीत आणि ऑनलाइनही नियमितपणे होत नाहीत” असे गार्‍हाणे गात बिचारा जेरीस आलेला होता. कुठेतरी आयुष्यात बदल हवा म्हणून तो ट्रेकला आला होता. असो.

रात्री साधारण साडेतीन वाजता पाचाड गावातील एकांच्या मुक्कामस्थळी पोहोचलो. लगेचच घरच्या सारवलेल्या ओसरीवर पसरून सर्व पुरुषांनी ताणून दिली आणि मुली घरातील एका खोलीमध्ये विसावल्या. पुढील तीन-चार तासच जेमतेम झोपायला मिळणार होते. पण तासभर झाला असेल नसेल, आमच्या शेजारीच कांबळी टाकून झाकलेल्या एका दुरडीखाली ठेवलेल्या कोंबड्याने बांग द्यायला सुरुवात केली. त्याला आजूबाजूच्या त्याच्या साथीदारांनी सुरात सूर मिसळून साथ द्यायला सुरुवात केली. त्याच जोडीला दुरडीमध्येच असलेल्या कोंबड्याच्या पिल्लांनीही चिवचिवायला सुरुवात केली. एखाद्याच्या “झोपेचे खोबरे होणे” ह्याऐवजी झोपेचे कुकुच्च्कू होणे असा वाक्प्रचार प्रचलित करून ‘अखिल कोंबडे पक्ष्या’चा निषेध करावा असे ठरवून मी झोपेची आराधना करायला लागलो.

सकाळी साडेसहाला उठून पहिले तर ‘रोप वे’च्या पाळण्याच्या ट्रिप सुरू झालेल्या दिसल्या. लगेच आवरून आम्ही हॉटेल ‘मातोश्री’ मध्ये पोहे-चहाचा भरपूर नाश्ता करून पायथ्याशी पोहोचलो आणि आमच्या दुहेरी ‘लेग वे’ ने चढाईस प्रारंभ केला.

रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी लोटली होती. त्यामुळे गडाची संपूर्ण माहिती देणार्‍या गाईडनाही काम मिळत होते. पायथ्याची सर्व दुकाने एव्हाना सजली असल्याने मला उन्हाळी टोपी लगेच विकत घेता आली. मास्क मात्र कोणीच घातलेला नव्हता, त्यामुळे मीही तो घेण्याच्या फंदात पडलो नाही. काही पायर्‍या चढून पहिल्या बुरूजापाशी थांबलो. स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगडच्या दर्शनाला आलेल्या भक्तांच्या भावना अनावर होऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा उत्स्फूर्त घोषणा सतत उठत होत्या. तिथल्या दुकानातच महाराजांची प्रतिमा असलेला ‘जाणता राजा’ लिहिलेला भगवा झेंडा मिळत होता. त्यासोबत फोटो काढून घेण्याची सर्वजण धडपड करीत होते. काहीजण तो झेंडा हातात घेऊन धावत गड चढून जात होते.

आपल्या आवडत्या राजाला मानाचा मर्दानी मुजरा देण्याची व भेटण्याची केवढी विलक्षण आतुरता!!

मजल दरमजल करीत चढत असताना आमच्या मध्येच पाठीवर पायरीचे तासीव अवजड दगड लादलेली गाढवे ही गड चढत होती. एका पाथरवटाला विचारले तर कळले की एका दिवसात एक गाढव तीन फेर्‍या मारते. हे ऐकून मात्र ह्या कष्टाळु प्राण्याचे भारीच कवतिक वाटले. इथे आम्ही कसाबसा एकदा हा गड चढउतार करून मोठा पराक्रम गाजवणार होतो! अर्थात रायगडच्या पायर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी चढाईच्या वेळेत उन्ह अजिबात लागत नव्हते व त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. एक पर्यटक मोबाईलवर मोठयाने गाणी ऐकत गड उतरत होता त्याला आमच्या चमूतील एकाने ताबडतोब बंद करायला लावला. सुमारे दोन-सव्वादोन तासांत आम्ही वर पोहोचलो.

प्रथम दर्शन झाले ते महादरवाज्याचे. काही वर्षांपूर्वीच बसवलेला हा 16 फूटी भव्य दरवाजा खरोखर बघण्यासारखा आहे. त्यानंतर स्वागत करतो ते ‘हत्ती तलाव’. “हत्ती तलावात शिरला तर कसं बाहेर येईल?” तर ह्याचे उत्तर “ओला होऊन!” हा विनोद मला आठवला. पण रायगडावरील ह्या तलावात जर हत्ती शिरला तर तो खात्रीने पायाचे तळवेही न ओलावता कोरडा ठणठणीत बाहेर येईल इतका हा शुष्क पडला आहे. पावसाचे पाणीही गळतीमुळे ह्यात टिकत नाही. पूर्वी केलेल्या गळती-प्रतिबंधक योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. इथून थोडे वर आल्यावर ‘शिरकाई’ देवीचे मंदिर लागते.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

 ☆ विविधा ☆ बहुरंगी बहुढंगी माय मराठी.. ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

“भाषा” म्हणजे काय? त्याची उत्पत्ती, व्याख्या,ई ,क्लिष्ट चर्चेत न शिरता व्यावहारिक वापराचा विचार करुया.

भाषेची नाळ जोडली जाते ती “बोलणे” शी. बोलणे म्हणजे तरी काय? तर अभिव्यक्ती विचारांची आणि भावनांची मौखिक अभिव्यक्ती.

“देहबोली” हे पण अभिव्यक्तीचे माध्यम आहे, पण भाषाविरहित. मौखिक अभिव्यक्ती माणुस सोडुन ईतर प्राणिमात्रांमध्येही असते, कुत्र्यांचे भुंकणे, गाईम्हशींचे हंबरणे, वाघांची डरकाळी, भुंग्यांचा गुंजारव,पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे डराव डराव, पालीचे चुकचुकणे, थी त्यांची भाषा असते असे म्हणतात.

माणसाने भाषेचा वापर केंव्हा, कसा सुरू केला यासाठी यासाठी मानवी उत्क्रांतीचा अभ्यास तर नक्कीच करावा लागेल. पण तूर्तास भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आहे, सर्वश्रेष्ठ वरदान आहे असे अनुभवाने सिध्द केले आहे.

आपला भारत बहुभाषिक देश,.तरीही भाषा म्हटले की आवर्जुन प्राधान्य दिले जाते ते मातृभाषेलाच, मायबोलीलाच.

आपली मायमराठी, महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी, समृध्द आणि संपन्न भाषा असे गर्वाने म्हणावेसे वाटते, तिच्या विविध रंगांचा, प्रत्येक रंगातील विभिन्न छटांवर  धावता दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न. उदाहरणे अनेक देता येतील पण शब्दसंख्येवरील मर्यादेमुळे तो मोह टाळावा आहे.

महाराष्ट्रातील मराठी म्हटले तरी वर्हाडी, कोल्हापुरी, सोलापुरी, खानदेशी, कोकणी, पुणेरी, मुंबईची, मराठवाड्याची असे अनेक रंग, आणि ढंग आढळतात. हिंदीची घुसखोरी, दुहेरी क्रियापदांमधे वापर अशी नागपुरी. फेटा घातलेली, थोडीशी रांगडी, कानडी शिडकावा म्हणजे कोल्हापुरी, वरुन काहीशी कडक वाटली तरी आतुन प्रेमळ, तिथल्या नारळासारखीच कोकणी, त्यातही मालवणी वेगळीच, वाक्यात किमान २, ४ शब्द ईंग्रजी किंवा हिंदी अगदी मस्त अशी मुंबईची, सोलापुरी तर न्यायची धाटणी, अन् सांस्कृतिक पगडी घातलेली पुणेरी, अनेक रंगातील अनेक छटा असल्या तरी प्रत्येकाचा बाज तेवढाच आकर्षक, तेवढाच रुबाबदार.

काळाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की बदलत्या काळाबरोबर शिक्षण,सांस्कृतिक जडणघडण, रीती रिवाज जसे बदलत गेले तसे भाषेचा पेहरावाही बदलणे स्वाभाविक होते, फार मागे जाऊया नको, २०व्या शतकात वापरले जाणारे अनेक शब्द आज कालबाह्य झाले आहेत. जसे, सदरा, पोलके, शेगडी, आणि ईतर अनेक, आजच्या आधुनिक मराठीत अनेक शब्द ईतर भाषेतून येऊन इतके रुळले आहेत कीअमराठी आहेत हे नविन पिढीला पटत नाही.

प्रत्येक व्यवसायाची पेशाची  भाषेची खासियत वेगवेगळी असते, वकील, डॉक्टर, शिक्षक, नोकरदार, कारखानदार,व्यापारी,.प्रत्येक पेशात परत बारीकसारीक फेरफार असतातच,व्यापारी म्हटला तरी_कपडे,सोनेचांदी, भांडी,किराणा,धान्य,ई प्रमाणे,भाषा बदल होतोच,

राजकारण,समाजकारण,यातील भाषा वेगळी,तर संरक्षणदल,पोलिस दल इथली वेगळीच.

नैसर्गिक भेद किंवा इतरही काही कारण असेल पण स्त्री पुरूष यांच्या भाषेचा पोतही खुप वेगळा असतो, भाषा ही केवळ मौखिक अभिव्यक्ती ची मक्तेदारी नाही, लिखीत अभिव्यक्ती साहित्य क्षेत्रात लेखनाच्या रणांगणावर भाषेची भूमिका सरसेनापती असते, लेखकाच्या लेखनाचे यशापयश भाषेवरच अवलंबून असते,

साहित्य मग ते कोणतेही, कोणाचेही, कशाशीही संबंधित असो, त्याप्रमाणे लेखकाला शब्दरूपी शस्त्र वापरावे लागते, संत साहित्यात टाळचिपळी, तर बालसाहित्यातील चेंडुफळी असते.

कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, अतिलघु, लघुत्तम,लघु,दीर्घ,रहस्य,ई कथा,ललित,सामाजिक,धार्मिक, अध्यात्मिक, ई लेख, प्रवासवर्णन, विविध काव्यप्रकार,अशा बहुविध साहित्य प्रकाराप्रमाणे, भाषेचा रंगढंग बदलत जातो,आणि आमची मराठी मायेच्या ममतेने  सर्वांना आकंठ दुग्धपान देते.

कुठेतरी वाचलेले आठवते, “भाषा सरस्वती त्यांच्यापुढे शब्द घेऊन ऊभी रहाते, आणि शब्दही माझा वापर केंव्हा करणार याची चातकासारखी वाट पहातात” धन्य ते साहित्यिक आणि त्यांच्या अजरामर कलाकृती, अशांपैकीच एक मान्यवर  कवि कुसुमाग्रज त्यांना कोटी कोटी प्रणाम,  शब्दरूप फुलांची ही माला सविनय,सादर अर्पण.

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

पुणे,

मो 9403862565,  9209301430

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ विविधा ☆ आद्य नाट्यशास्त्रकार श्री भरतमुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

(27 फेब्रुवारी माघ पौर्णिमा निमित्ताने)

आपला भारत देश हा अनेक ऋषी, मुनिंच्या परंपरेने आणि ज्ञानाने समृद्ध झाला आहे. बहुतेक सर्व मुनिनी वेद, अध्यात्म, यज्ञ, याग, कर्मकांड, विज्ञान इ.अनेक विषयांवर विस्तृत विवेचन केले आहे.पण “नाट्यशास्त्र” या विषयावर सुबद्धविवेचन करणारे मुनि म्हणजे भरतमुनि होय.

भरतमुनि – कलर पेन्सिल पेंटींग – श्री मिलिंद महाबळ (साभार) 

भरतमुनिंचा कालखंड निश्र्चित नाही. साधारणपणे इ.स.पू. ४०० ते १०० असा मानला जातो. “दशरूपक विधान”  या ग्रंथाच्या १८ व १९ व्या अध्यायात नाट्यशास्त्र हा विषय आला आहे.संगीत हा विषय २८ व्या अध्यायात आहे. ६ व ७ या अध्यायात रससिद्धांत सांगितला आहे .शृंगार,वीर,करुणा,भय,हास्य,बिभत्स, अद्भुत, शांत आणि रौद्र हे ९ रस सांगितले आहेत.

त्यांच्या नाट्यशास्त्रातील ठळक मुद्दे :-

१)  नाटकाचा विषय प्रख्यात कथेवर असावा.(उदा.रामायण, महाभारत, कृष्णलीला इ.)

२) ५ ते १० अंक असावेत.

३)  दोन अंकाच्या मध्ये “विष्कंभक” (निवेदक)असावा

४)  आवश्यक तेवढीच पात्रे असावीत.कथेला पूरक तेवढीच.

५)  अभिनय ४ प्रकारचा सांगितला आहे-१)अंगिक(Body language) 2) वाचिक (oral) 3)  सात्त्विक (expressions) 4) आहार्य म्हणजे ( with essential property)

६) कथानक रंजक हवे, क्रौर्य नको, प्रवाही असावे, सुखान्त

७) पात्रांचे चित्रण व्यवस्थित समजेल असे असावे.

८) रंगमंच किती,कसा असावा हे सविस्तर सांगितले आहे.

९) सर्व ९ रस शक्यतो यावेत.

१०) नाटकाचा उद्देश- मनोरंजन,कलादर्शन, लोकांना आनंदी करणे, संदेश/ बोध देणे.

याशिवाय प्रेक्षागृह कसे असावे ? कोणी कोठे बसावे ?

अभिनेता, दिग्दर्शक, कपडेपटवाला इ.लोकानी कसे कष्ट घ्यावेत ?

या सर्वांचा सविस्तर विचार मांडला आहे. विषय खूप मोठा आहे, परंतु  त्या काळात मांडलेल्या सूचना आजही मानल्या जातात. भरतमुनिंची जयंती संस्कार भारती दरवर्षी  माघ पौर्णिमेस साजरी करते. त्यांना वंदन करून मी इथे थांबतो.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares