मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास : महात्म्य!… १ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? विविधा ?

अधिक मास : महात्म्य!… १ श्री नागेश शेवाळकर

‌आपल्या संस्कृतीची काही खास पवित्र अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवा, दीपक! घरातील देवघरात, मंदिरातील गाभाऱ्यात तेवणारा दिवा जसा मंगलमय, पवित्र असतो तसाच तो चैतन्यदायी असतो. प्रज्वलित दिवा एक मंगलमय वातावरण निर्माण करतो. दिवा जेव्हा अंधाराचे निर्मूलन करतो तेव्हाच तो तेजोमय प्रकाशाचे स्वागत करतो. दिवा लावल्याशिवाय जशी देवपूजा संपन्न होत नाही तसेच सायंकाळी लावलेला दिवा एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो.

 दिवा दररोज सकाळी, सायंकाळी देवापुढे लावला जातो. षडरात्र, नवरात्र, दीपावली, नागदिवे/ देव दीपावली, पुरुषोत्तम मास आणि इतर अनेक सणांच्या निमित्ताने अहोरात्र नंदादीप तेवत ठेवण्याची आपली परंपरा आहे. अनेक घरांमध्ये सायंकाळी दिवा लावताना घरातील बालकांना देवापुढे बसवून प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेतून लहानपणापासून दिव्याचे महत्त्व बालकाच्या मनावर बिंबवले जाते. त्यातील काही ओळी…

‘दिव्या दिव्या दीपत्कार,

कानी कुंडल मोतीहार |

दिव्याला पाहून नमस्कार |

दिवा लावला देवापाशी,

उजेड पडला तुळशीपाशी|’

 ज्याप्रमाणे अनेक सणांमध्ये तबकात दीप घेऊन ओवाळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे अधिकमासात दिव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये देवाजवळ नंदादीप लावण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्या संदर्भातील काही आख्यायिका ‘अधिकमास महात्म्य’ या अंतर्गत अनेक ठिकाणी वाचायला मिळतात…

अधिक मासाची कहानी

 एकदा भगवान‌ नारायण जनहितार्थ तपश्चर्येत ध्यानमग्न असताना तिथे महर्षी नारद यांचे आगमन झाले. “नारायण… नारायण… ” हा स्वर नारायणांच्या कानी पडला. नारद मुनींचे आगमन झाले हे समजताच भगवान विष्णूंनी डोळे उघडले. त्यांनी विचारले,

“नारदमुनी, यावे. बसा. ‌आपल्या येण्याचे प्रयोजन‌ सांगावे. सारे कुशल आहे ना?”

“होय, ‌नारायणा! सारे काही कुशल आहे. एक प्रश्न विचारायचा आहे.”

“नारदमुनी, तुम्हाला कधीपासून परवानगी घ्यावी लागते? काय मनात आहे ते नि:संकोच विचारावे. “

“नारायण… नारायण…! देवा, दरवर्षी बारा महिने असतात परंतु प्रत्येक तीन वर्षानंतर तेरावा महिना‌ येतो. त्यामागे काही विशिष्ट संकेत आहेत का?”

“मुनी श्रेष्ठ, आपण खूप छान प्रश्न विचारला आहे. जगात सत्कर्म वाढले की कल्याण होते. उलट जगामध्ये वाईट गोष्टींचे प्रमाण वाढले की मग अधोगती सुरू होते. सद्य युगात दुष्कर्मांची संख्या वाढल्यामुळे पाप वाढत चालले आहे. तुम्ही म्हणता त्या बारा महिन्यांनी तक्रार केली होती, की सध्या सर्वत्र वाढलेले पाप आम्ही आमच्या पोटात घेत असतो परंतु ते आम्हाला सहन होत नाही. आम्ही आमच्या पोटात जमा असलेल्या पापाचा तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकत आहोत म्हणजे तितकाच पापाचा भार कमी होईल. त्याप्रमाणे त्या प्रत्येक महिन्याने तिसरा हिस्सा काढून‌ टाकला. काढून‌ टाकलेल्या पापाच्या हिश्श्यापासून नवीन मास उत्पन्न झाला अर्थात तेरावा महिना जन्माला आला. तो पापमय असल्याने त्याला मलमास किंवा‌ मलिनमास असे नाव मिळाले.

मलमासाला त्याच्या सोबतचे बारा महिने चिडवत होते, त्याची टिंगलटवाळी करत होते कारण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मलमास अयोग्य समजला जात असे. सूर्याची गती मोजताना मलमास गृहित धरला जात नसे. त्यामुळे मलमास दुःखी होत असे. मलमासाने मानवरूप धारण केले. काय करावे म्हणजे हे बारा महिने आपला दुस्वास करणार नाहीत, मलाही इतर महिन्यांप्रमाणे योग्य स्थान, प्रतिष्ठा मिळेल. अशा विचारात असताना त्याला वैकुंठपती श्रीविष्णुचे स्मरण झाले. मलमास वैकुंठात गेला. आसवं गाळत तो श्रीविष्णुला शरण गेला. भगवान विष्णुंची त्याने आराधना केली. विष्णू म्हणाले,

“वैकुंठात केवळ सुख आणि सुख असताना तू दुःखी का आहेस? काय झाले?” तेव्हा अधिकमासाने स्वतःचे दुःख नम्रतेने श्री मधुसूदनाला सांगितले. ते ऐकून माधव म्हणाले,

“ठीक आहे. आपण आता गोलोकात जाऊया. तिथे मुरलीधर कान्हा आहे. सकल भक्तांचे दुःख तो तत्काळ हरण करतो. चल. “

भगवान विष्णुंच्या पाठोपाठ मलमास गोलोकात गेला. तिथे श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. मलमासाचे आसवे थांबत नव्हती. ते पाहून श्रीकृष्णाने भगवान विष्णुला विचारले,

“महाविष्णू, हा मानव कोण आहे? हा सतत अश्रू का ढाळत आहे? याला कोणते दुःख आहे?” दामोदराचे प्रश्न ऐकून विष्णुंनी सारी परिस्थिती कृष्णाला कथन केली म्हणाले,

“हा पीडित मास माझ्याकडे आला. मी त्याचे सारे दुःख ऐकले. त्याचे दुःख केवळ तुम्हीच दूर करू शकाल म्हणून मी त्याला गोलोकात घेऊन आलो आहे. या दुःखिताचा तुम्ही उद्धार करावा, त्याच्या दुःखाचे हरण करावे. “

“महाविष्णू, हे चांगले केले. अगोदर तुम्हाला आणि नंतर मला शरण आलेल्या या मलमासाला मी माझे ‘पुरुषोत्तम’ हे नाव देतो. हा सर्व महिन्यांत श्रेष्ठ असेल. इतकेच नाहीतर माझे ऐश्वर्य ह्यास देतो. जसा मी सर्वत्र पवित्र, पूज्य आहे तसाच हाही पवित्र मानला जाईल. पुरुषोत्तम मासात भक्तगण जी धार्मिक कार्ये करतील त्याचे पुण्य फल त्यांना मिळेल. ” श्रीकृष्णाने मलमासाला जणू पुनर्जिवित केले, त्याला वरदान दिले. त्यामुळे आनंदित झालेला पुरुषोत्तम मास भगवान श्रीविष्णूंसह वैकुंठात परतला. त्याने तिथेच वास्तव्य केले…

००००

अधिकमास: दीप प्रज्वलन!

एकदा विष्णुपत्नी लक्ष्मीने पतीला विचारले, “श्रीहरी, मधुसूदना, मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की, अधिकमासात देवाजवळ दीप लावण्याचे किंवा लावलेल्या दिव्याचे रक्षण केल्याने कोणते फळ मिळते?”

विष्णू म्हणाले, “ऐक. अधिकमासात दीप लावण्याचा विधी आणि महत्त्व सांगतो…

अधिकमासाच्या प्रथम दिवशी सकाळी स्नानादि कार्ये आटोपून स्वच्छ केलेल्या, सजविलेल्या भूमीवर घट मांडावा. त्याच्यासमोर एक दीप ठेवावा, ज्यात सप्ततंतूंची वात घालून तूप किंवा तेल घालून यथाविधी पूजन करून दीप प्रज्वलित करावा. मनोभावे प्रार्थना करावी…

“हे परमेश्वरा, ही माझी दीपसेवा गोड मानून घ्यावी. ह्या दिव्यामुळे अंध:कार दूर होऊन कांतीही उजळून निघावी. ” याप्रमाणे पूजन केल्यामुळे गोदान, भूदानाचे पुण्य लाभते. दीप दान करणारास ज्याप्रमाणे सुकांती लाभते, त्याचप्रमाणे धनसंपदा लाभते, अखंड सौभाग्य मिळते. यासह विद्या प्राप्त होते, आयुरारोग्यासह समृद्धी मिळते, पुत्रपौत्र संतती लाभते, जो ब्राह्मण स्वतः दीप दान करतो त्याला ब्रम्हज्ञान प्राप्त होते, कुमारिकेस इच्छित पती मिळतो, सर्व दुःखांचे हरण होते, भीती दूर पळते, इतकेच नाही तर अधिकमासात जे कुणी दीप प्रज्वलनाच्या गोष्टी, महत्त्व सांगतात तेही पापमुक्त होतात… “

“श्रीहरी, अधिक मासातील दिव्याची अतिशय चांगली अशी माहिती सांगितली. ” लक्ष्मी समाधानाने म्हणाली.

००००

वेणीमाधव वात!

श्री लक्ष्मीने भगवान विष्णू यांना विचारले, “देवा, अधिक मासात ‘वेणीमाधव वातीचा’ दिवा लावतात. त्याबद्दल सांगावे. “

“महालक्ष्मी, हिंदू संस्कृतीमध्ये देवापुढे लावल्या जाणाऱ्या वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या घरात सकाळ, संध्याकाळ पूजेच्या वेळी दिवा लावला जातो ते घर पवित्र होते. सहा दिवस, दहा दिवस नंदादीप लावण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आहे. त्यामुळे अनेक संकटांचे निवारण होते, एकप्रकारचे चैतन्य निर्माण होते.

 दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक’ मासात देवापुढे वेणीमाधव ही वात प्रज्वलित करण्यात येते. वेणीमाधव वातीचा आकार इतर वातींच्या मानाने मोठा असतो. वेणीमाधव‌ वात लावण्यामागे अध्यात्मिक कारण आहे. वेणीमाधव वात ही नेहमी दिवा लावताना जी वात वापरल्या जाते तशी वात नसते. दररोज जी तुपाची फुलवात वापरण्यात येते त्या तेहतीस फुलवाती एकात एक माळून वेणीमाधव वात तयार होते. ती गुंफण एखाद्या वेणीसारखी दिसते म्हणून त्या वेणीस वेणीमाधव वात असे म्हणतात. हिंदू धर्मामध्ये तसेच अधिक मासामध्ये तेहतीस अंकाला धार्मिक महत्त्व आहे. तेहतीस हा अंक तेहतीस कोटी देवांचे अर्थात तेहतीस प्रकारच्या देवशक्तींचे प्रतिक मानल्या जातो. त्यामुळे तेहतीस फुलवातींची वात प्रज्वलित होताच मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. या ऊर्जेमुळे घरातील अपवित्रता, अघोरी शक्तींचे निर्मूलन होते, सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी भक्तांची मान्यता आहे. भक्त असेही मानतात की, ही वात लावल्याने निर्माण झालेली पवित्रता पुढील तीन वर्षे म्हणजे पुढील अधिक मास येईपर्यंत टिकून राहते.

ही वात वेणीमाधव म्हणून ओळखली जाते त्यामागे असलेले कारण म्हणजे, सृष्टीचे निर्माते आणि पालनकर्ते ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीच्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे वेणीमाधव वात होय!

वेणीमाधव वातीचे दुसरे महत्त्व असे की, यातील माधव म्हणजे श्री महाविष्णू! प्रयागराज येथे माधव अर्थात भगवान विष्णू, श्री महालक्ष्मीचे अर्थात आपले वास्तव्य आहे. श्री विष्णू यांना प्रयागराजचे व्दारपाल म्हणून ओळखले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे असे मानले जाते की, या सर्व गोष्टींमुळे वेणीमाधव ही वात आपल्या देवघरात लावल्याने मोठे पुण्य मिळते.

अधिकमासात किंवा धोंड्याच्या महिन्यात एकदा तरी वेणीमाधव वात देवघरात लावल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समाधान-आनंद मिळतो. ज्याप्रकारे त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळते तसेच पुण्य वेणीमाधव ज्योत देवघरात लावल्यामुळे प्राप्त होते.

“विष्णू देवा, खूप छान माहिती सांगितली आहे. आपण पाहतोय, वेणीमाधव वातीशिवाय भक्त इतरही वाती लावतात. “

“देवी, खरं आहे. तुमची निरीक्षण शक्ती चांगली आहे. मंजूळ वातही काही भक्त लावतात. हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे. वातीला वेगवेगळी नावे असली तरीही भक्तांचा भाव सारखाच असतो. “

“बरोबर आहे, देवा! खूप छान माहिती सांगितली. “

००००

मनीमाऊला मिळाली मुक्ती!

श्रीविष्णू लक्ष्मीला म्हणाले, “एक कथा सांगतो, सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. एकदा पुरुषोत्तम मासाचा योग साधून त्याने षोडशोपचारे पुजा करून दीप प्रज्वलित केला. दररोज सकाळ- संध्याकाळ दिव्याची पूजा, भजन करणे हा त्याचा नेम होता. त्याच्या घरी असलेल्या उंदरांना पकडण्यासाठी एक मांजर दररोज येत असे. एके रात्री ती मांजर नेहमीप्रमाणे त्याच्या घरात आली असता ब्राह्मण नेहमीप्रमाणे नाम घेत दिव्यासमोर बसलेला होता. दिव्यावर काजळी चढली असल्याने दिव्याचा प्रकाश मंद झाला होता. तितक्यात तिथे उंदीर आल्याचे पाहून टपून बसलेली मांजर उंदराकडे झेप घेत असताना तिचा पाय दिव्याला लागला. त्यामुळे दिवा हलला. परंतु त्यामुळे ज्योतीवर आलेली काजळी गळून पडली. दिव्याचे तेज फाकले. सकाळ होताक्षणी मांजर गतप्राण झालेली आढळली. देवी, नकळतपणे दिवा प्रज्वलित केल्यामुळे मांजराला मुक्ती मिळून ते मांजर वैकुंठाला पोहोचले. दुसरीकडे मनोभावे दीपपूजन करणारा सुशर्मा नावाचा ब्राह्मण समृद्ध झाला, पुत्रपौत्र प्राप्त झाले. उत्तम आरोग्य, सुख मिळून त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. “

“हे देवा, आपण खूप छान माहिती सांगितली आहे. त्यामुळे दिव्यासंदर्भात अजून काही ऐकण्याची लालसा उत्पन्न झाली आहे… “

००००

विमला नि सुशीला!

“लक्ष्मीदेवी, तुझी इच्छा जाणून एक कथा ऐकवतो…

अनेक वर्षांपूर्वी मथुरा नगरात शाकली नावाचा एक ब्राह्मण राहत होता. शुद्ध आचरण अशी त्याची ख्याती होती. त्याला विमला आणि सुशीला या नावाच्या दोन बायका होत्या. पुरुषोत्तम मासात एके दिवशी सुशीला पाणी आणण्यासाठी नदीवर गेली, तेव्हा तिला तिथे बरेच स्त्री पुरुष स्नान करताना दिसले. सुशीलेने घरी येऊन पतीला नदी स्नानाचे महत्त्व काय आहे ते विचारले. तेव्हा शाकलीने पत्नीला सांगितले, “श्री विष्णूला प्रिय अशा पुरुषोत्तम महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात दीप प्रज्वलित केला असता मोठे पुण्य लाभते. ” ते ऐकून सुशीला म्हणाली,

“पतिदेवा, तुम्ही सांगितलेला या मासाचा महिमा ऐकून संपूर्ण महिना मी दीप लावू इच्छिते. “

पत्नीची इच्छा जाणून शाकलीने तिला परवानगी दिली. सुशीलेने मोठ्या आनंदाने, भक्तिभावाने पूजा करून दीप प्रज्वलित के

ला. नंतर पतीला नमस्कार करून त्यांना जेवायला देऊन स्वतः जेवण केले. आपल्या सवतीने केलेले कार्य विमलेस आवडले नाही. तिच्या मनात सवतीमत्सर जागा झाला. ती विचार करू लागली, काय करावे म्हणजे हिच्या पुजेत व्यत्यय येऊन तिची मनोकामना पूर्ण होणार नाही. विमलेच्या मनात एक कुविचार जागृत झाला. घरात कुणीही नाही हे पाहून विमलाने तेवत असलेला दीप शांत केला, त्यातले तेलही काढून टाकले. नंतर उतावीळपणे काय होते हे पाहण्यासाठी बसून राहिली. बाहेरून आलेल्या सुशीलेला शांत झालेला दिवा दिसताच तिला अतोनात दुःख झाले. तिने श्रीविष्णुला प्रार्थना केली. रोज तसाच प्रकार घडत होता.

विमला जाता येता कधी पदराने, कधी फुंकर घालून, कधी सारे तेल काढून दीप शांत करुन सुशीलाच्या भक्तीमध्ये विघ्ने निर्माण करीत होती. तो प्रकार सुशीलाच्या लक्षात आला परंतु ती शांत राहिली. कुणासही काहीही बोलली नाही. तिने पूर्ण पुरुषोत्तम मासात दीप प्रज्वलन करून व्रताची सांगता केली. त्याचे पुण्य तिला लाभले. दुसरीकडे विघ्नकर्ती विमलालाही तिच्या पापाचे फळ मिळाले. तिची तीन मुले मृत झाली. तिला स्वतःला दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. काही काळानंतर तिलाही मरण प्राप्त झाले… “

“देवी, लक्ष्मी असे आहे, दीप लावण्याचे महत्त्व!”

“स्वामी, केवळ पुरुषोत्तम मासातच नाही तर दररोज मनोभावे दिवा लावणाऱ्या कुटुंबांवर आपला असाच आशीर्वाद असू द्या. “

“तथास्तु!” श्रीविष्णू म्हणाले.

क्रमशः…

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २३ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समाज स्थितीचे वर्णन

गाथेतील अभंग वाचत असता संत तुकारामांच्या काळी समाजस्थिती कशा प्रकारची होती याचाही आपल्याला काही अभंगांतून अंदाज येतो. आजच्या लेखात याच संदर्भातील काही अभंगांचा अभ्यास करावा असे मला वाटते.

समाजात फार अंदाधुंदी माजली होती. न्याय राहिला नव्हता. श्रेष्ठ मानला, जाणारा ब्राह्मण वर्ग त्यांचा नीती धर्म विसरला होता. अशा परिस्थितीचे वर्णन करणारा हा गाथेतील अभंग पहा—

हाती होन दावीती वेणा /

करिती लेकीची धारणा//

ऐसे धर्म जाले कली/

पुण्य रंक पाप बळी//

सोडिले आचार/

द्विजृाचहाड जाले चोर//

टिळे लपविती पातडी /

लेती विजार कातडी//

बैसोनिया तक्ता/

अन्योविण पीडिती लोका//

मुदबरव लिहिणे/

तेल तूप साबण केणे //

नीच्याचे चाकर/

चुकलिया खाती मार//

राजा प्रजा पिडी/

क्षेत्री दुश्चितासी तोडी//

वैश्य शुद्रादिक/

हे तो सहज नीच लोक//

* वघे बाह्यरंग/*

आत हिरवे वरी सोंग//

तुका म्हणे देवा/

काय निद्रा केली धावा//

समाजाची ही अशी अत्यंत हीनदीन अवस्था पाहून तुकाराम महाराज खेद व्यक्त करत आहेत आणि देवाला निद्रा सोडून धाव घेण्याचे साकडे घालत आहेत.

ते देवाला सांगतात, ” लग्नात लोक त्यांच्या कन्येचे पैसे(होन) घेतात आणि तिला सासरी पाठवतात. याचाच अर्थ चक्क तिचा विक्रय करतात. ज्याच्याकडून जास्त पैसे मिळतील त्याच्या गळ्यात ती सौभाग्यकांक्षिणी वरमाला घालणार. अत्यंत शोचनीय अशी बाब आहे ही. हा कलियुगात माजलेला अधर्म आहे. याने पुण्याचा क्षय होऊन पाप वाढत चालले आहे. ब्राह्मण आपला धर्म, सदाचार सोडून चहाड्याचोऱ्या करू लागले आहेत. कुंकवाचा टिळा लावणे, पंचांग बघणे सोडून देऊन यवनांप्रमाणे वेश धारण करणे त्यांनी सुरू केले आहे. न्यायाधीश न्यायाच्या आसनावर बसून न्याय असणाऱ्यांनाच शिक्षा ठोठवून पीडित करीत आहेत. पाकशाळेत (मुदबख) लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंचा जमाखर्च लिहिण्यात वेळ दवडत आहेत. ते नीच माणसांचे चाकर होऊन कामात झालेल्या क्षुल्लक चुकीसाठी मार खात आहेत. ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधीच दुःखी असताना क्षत्रिय राजे तिला लुटतात आणि पीडा देतात. वैश्य व शूद्रादिक लोक तर स्वभावतःच हलक्या मनोवृत्तीने वागत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगावे? अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा, अनाचार व ढोंगीपणा पसरला आहे. अंतरंगात मत्सर आणि वरून सोज्वळतेचे

सोंग या माणसांत भरले आहे. या दुष्टांना दंड देण्यासाठी अहो देवा तुम्ही या असा महाराज धावा करीत आहेत. ”

तुकाराम महाराजांना ब्राह्मणांकडून अशा प्रकारचा त्रास भोगावा लागला आहे. समाजातील त्यावेळच्या चातुर्वर्णी पद्धतीचा अर्थ विशेषतः या ब्राह्मण वर्गाने चुकीचा लावल्यामुळे, स्वतःला विद्वान समजून ते समाजातील दुबळ्या माणसांना अत्यंत हीन लेखत आणि त्यांचे जगणे असह्य करीत. यासाठीच अशा प्रकारचे अभंग रचून समाजात जागृती निर्माण करण्याचा तुकाराम महाराजांचा प्रयत्न असावा. या वर्ण व्यवस्थेसंबंधी असलेल्या हा अभंग पहा—

वेद विहित तुम्ही आई का हो कर्मे /

बोलतो ती वर्मे संतांपुढे//

चारी वर्ण जाले एकाचिये अंगी/

पाप-पुण्यभागी विभागीले//

प्रथम पाऊली पावविला पंथ/

आदी मध्य अंत भेद नाही//

आंबे बोरी वड बाभुळ चंदन/

गुणागुणभिन्न अग्नि एक//

तुका म्हणे मन उन्मन जो होय/

तोवरी हे सोय विधी पाळी//

तुकाराम महाराज म्हणतात, ” अहो लोकहो,

वेद प्रणित अवस्था काय आहे, ते तुम्ही ऐका. मी तुम्हा संतांपुढे ती सांगतो. एकाच देवापासून ब्राह्मणादी चार वर्ण निर्माण झाले आहेत. सर्व एकाच देवाची लेकरे आहेत. ते आपापल्या विहित कर्माने व पाप-पुण्याच्या भागाने वाटले गेले. सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान जो हरी त्याच्या ठिकाणी प्रारंभ, मध्य, आणि अंत नाही. आंबे, बोरी, वड, चंदन यांचा दृष्टांत देऊन महाराज सांगतात या वृक्षातील गुणांचे व दोषांचे अनेक भेद आहेत. पण जळल्यानंतर ते एकच होतात. सर्वांची एक राखच होते. मूळ हरीच्या ठिकाणीही आदि अंत, कर्ता कर्म फळ इत्यादी भेद नसतो. जोपर्यंत मनाची उन्मनी अवस्था होत नाही तोपर्यंत मनुष्याने वेदाने सांगितलेल्या विधी मार्गा ने चालले पाहिजे. थोडक्यात, ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र नीच ही भावना मनातून त्यागिली पाहिजे.

त्या काळात सिंहस्थ- पर्वणी असा एक काळ मानला जात होता. आजही पंचांगात आपल्याला सिंहस्थ काळ हा शब्द सापडतो. या काळात लग्न, मुंज अशी मंगल कार्ये होत नाहीत असे म्हणतात. आता बदलत्या काळानुसार सर्व लोक ही परंपरा पाळतातच असे नाही. या समस्त काळात त्यावेळी ब्राह्मण डोक्यावरचे व दाढीचे केस काढायचे. त्यावरून महाराजांनी हा अभंग रचला आहे. ते म्हणतात—-

आली सिंहस्थ पर्वणी/

न्हाव्या भटा झाली धणी //

अंतरी पापाच्या कोडी/

वरी वरी बोडी डोई दाढी//

बोडीले ते निघाले/

काय पालटले सांग वहिले//

पाप गेल्याची काय खूण/

नाही पालटले अवगुण//

भक्तीभावेवीण /

तुका म्हणे अवघा सीण //

सिंहस्थ पर्वणी आली म्हणजे क्षेत्रात जे भट व न्हावी असतात त्यांची चंगळ होते. अंतःकरणात कोट्यावधी पापे आहेत, आणि दाढी काढली व डोक्याचे मुंडन केले तर त्याचा काय उपयोग? नुसते केस निघाले, पण अंगातील अवगुण निघाले का? त्याची काय खूण आहे? तुकारामांना एवढेच सांगायचे आहे की, पांडुरंगाची श्रद्धेने भक्ती करण्या वाचून बाकीचे सर्व व्यवहार पिडादायीच आहेत.

चातुर्वर्ण व्यवस्था हीच त्यावेळची मुख्य समाज व्यवस्था होती. या व्यवस्थेतील लोकांच्या कर्मा विषयी आणि प्रारब्धाविषयी महाराज वेळोवेळी सांगतात.

पहा हो देवा कैसे जन/

भिन्नभिन्न संचिते //

एक नाही एका ऐसे/

दावी कैसे शुद्ध हीन//

पंचभूते एकी राशी/

सूत्रे कैसी ओळखावी//

तुका म्हणे जो जे जाती/

त्याची स्थिती तैशी ते//

देवा, हे लोक किती निरनिराळ्या प्रारब्धाचे आहेत. एका सारखा एक नाही. प्रारब्धाच्या योगाने काही चांगले आणि काही हीन अशी विविधता दिसते. सर्व सृष्टी पंचमहाभूतांच्या एकाच मूळ पदार्थाने बनली आहे, असे असताना नशिबाची भिन्नता कशी ओळखावी? जो जन्माप्रमाणे, कर्माप्रमाणे ज्या जातीचा असेल तशीच त्याची स्थिती असते. थोडक्यात ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा, वेदपठण करावे, क्षत्रियांनी देशाचे सीमा रक्षण करावे, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी गावाची साफसफाई करावी. समाजाची घडी उत्तम रीतीने बसण्यासाठी ही व्यवस्था होती, परंतु ब्राह्मण वर्गांनी त्याचे स्वरूप उच्च~नीच अशा प्रकारचे केले.

पुढील लेखात आणखी काही अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… २३ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “बाबा तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एक गोष्ट आहे. आता रात्र बरीच झालीय.. पण हे तुम्हाला आत्ताच सांगणं गरजेचं आहे. तुम्ही त्रास करून घेणार नसाल तरच सांगतो. ” सलिल म्हणाला.

“नाही त्रास करून घेणार. तू सांग.. काय झालंय?”

त्याने जे कांही सांगितलं ते ऐकून मी सून्न झालो. अक्षरशः गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो म्हणाला होता तसं पैशाने ज्याची भरपाई होऊच शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो!!)

महापुरामुळे घरी झालेल्या संपूर्ण विध्वंसाचं शक्य तितक्या मोजक्या शब्दात वर्णन करून तो म्हणाला होता,.. “बाबा आपल्या बंगल्यात ८. ५० फूट उंचीपर्यंत पाणी आलेलं होतं. घरात आता फक्त ओल मुरलेल्या भिंती आणि दिवसभर राबून घरातला सगळा चिखल उचलून बाहेर बागेत रचल्या नंतरचे चिखलमाखलेले फ्लोअर अशी अवस्था आहे. ते सगळं पुन्हा मिळवता येईल बाबा पण तुमचं लेखन… ” तो बोलायचा थांबला. त्याने न सांगताही मला अंदाज आला होता… “लाॅफ्टवर ठेवलेल्या माझ्या बॅगा ना.. ?”मी शांतपणे विचारलं.

“हो. त्या तुमच्या सर्व बॅगांमधे तुम्ही जपून ठेवलेलं पूर्वीपासूनचं तुमचं सगळं लेखन भिजून, कुजून लगदा झाल्याने टाकून द्यावं लागलंय बाबा… “

ऐकून मी सून्न झालो. त्या सर्व बॅगांपैकी कुठल्या बॅगेत काय आहे हे मला फक्त माहित होतं असं नाही तर ते तोंडपाठ होतं. माझ्या आजवरच्या सर्व कथांची मासिके, माझी नाटके, एकांकिका, बालनाट्ये यांची हस्तलिखिते, सेन्साॅर सर्टिफिकेटस्, मला मिळालेले सगळे लेखन-पुरस्कार, ‘प्राजक्त’ या मासिक पत्रिकेत दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन गेली अकरा वर्षे मी लिहित असलेल्या सदरलेखनाच्या छापील प्रतींचे गठ्ठे ज्यात ‘प्राजक्त’चे तोवरच्या माझ्या लेखांच्या एकूण १३२ छापील प्रतींचे अंक होते… आणि असंच बरंच कांही! सगळं एका रात्रीत स्वाहा झालं होतं!त्या सदरलेखांमधील जवळजवळ सर्वच आशयांवरून एकेक कथा, एकांकिका, किंवा एखादं दोन अंकी नाटकही.. अशा अनेक नव्या साहित्यकृतींना आकार देण्याचा माझा मनोदय होता. त्याचं नियोजन सुरू होतं आणि अचानक माझं सगळं अक्षरधनच पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने लुटून नेलं होतं!!

माझ्या खरंच ते जिव्हारीच लागलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली. आणि त्या अस्वस्थ मनःस्थितीत या विध्वंसात देवघरातील ती दत्ताची मूर्ती? ती.. तीही.. अशीच.. ? या विचाराचाच फटका बसावा तसा मी ताडकन् उठून बसलो. बाकी सर्वजण झोपले होते. सलिल/अनघा दोघांचं उद्याच्या घरस्वच्छतेच्या कामांच्या नियोजनाबद्दलचं बोलणं अस्पष्टसं कानावर आलं न् मी त्या दिशेला धाव घेतली. , !ती.. ती.. दत्तमूर्ती न् इतर सगळे देवही चिखलात वहात जाऊन रुतले गेले असतील तर? तेही चुकून त्या कचऱ्याच्या ढीगात टाकले गेले नसतील ना? नुसत्या कल्पनेनेच मी धास्तावलो.

“बाबा.. तुम्ही झोपला नाहीत अजून? असे घाबरलायत कां? काय झालंय?” मला पहाताच सलिलने विचारलं.

” मला सांग.. आपल्या देवघरातल्या देवांचं काय? ते पण वाहून गेलेत कां? ते.. ते.. चिखलाबरोबर त्या कचऱ्याच्या ढीगात तर टाकले गेले नसतील ना रे?” मी काकुळतीने विचारलं.

सलिलने अनघाकडे पाहिलं

“नाही बाबा… अहो, दिवसभराच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. बाबा.. एक आश्चर्य वाटेल अशी आनंदाची बातमी आहे. “

इतक्या सगळ्या विध्वंसातही आनंदाची बातमी?… मला कांही समजेचना.

“बाबा, घरातला निम्मा शिम्मा चिखल बाहेर बागेत टाकून झालाय. राहिलेला उद्या दिवसभरात टाकून होईल. पण आश्चर्य म्हणजे आपण देव मांडतो ते ते छोटं देवघर तिथंच तिरकं होऊन चिखलात रुतून राहिल्याने त्यातले देव आणि ती दत्तमूर्तीही त्यावरच विखुरलेले दिसले. मी ते देवघर आणि ती मूर्ती स्वच्छ धुवून तिथे घरच्या किचन कट्ट्यावर ठेवलीय बाबा… ” हे ऐकताच माझ्या अंगावर शहाराच आला एकदम.. ! माझं सगळं अक्षरधन वाहून गेलं तरी ‘तो’ आहे! मग आणखी काय हवं? मनाला झालेल्या त्या अनपेक्षित आनंदाने मी भारावून गेलो होतो. सगळं ‘त्या’च्यावर सोपवून होईल ते पहात रहायचं असं मनोमन ठरवलं आणि निश्चिंत झालो.. !!

अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. त्या निश्चिंत मनात आपल्याला या प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचे विचार सुरु झाले आणि झोप निघूनच गेली. मी झरकन् उठून शेजारच्या टीपाॅयवर ठेवलेला माझा मोबाईल उचलला. आजवर माझी नाटके आणि एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या मुंबई, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, नाशिक, अमरावती, नागपूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या सर्व संस्थांची व्हाॅटस् अॅप काॅन्टॅक्स उपलब्ध होती. मी लगेचच सर्वांना सविस्तर मॅसेज पाठवून पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी सादर केलेल्या माझ्या नाटक/एकांकिका यांच्या संहिता त्यांच्याकडे उपलब्ध असतील तर त्याची एक प्रत प्लीज मला पाठवावी अशी विनंती केली. मी यापेक्षा जास्त कांहीच करू शकत नव्हतो.

माझ्या या नाट्यसंहितांपेक्षाही माझ्यासाठी कणभर जास्तच महत्वाचं होते ते ‘प्राजक्त’ मधल्या जाने. २०१० ते जुलै २०१९ या जवळजवळ साडेनऊ वर्षातल्या माझ्या सदर लेखनाचे १३२ अंक पुन्हा मिळवणे. पण तो प्रश्न अजून अधांतरीच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ‘प्राजक्त’ च्या ऑफिसमधे फोन करून विचारणा केली. पुरापूर्वी कांही दिवस आधीच साफसफाई करताना कपाटांमधे जागा करण्यासाठी तिथे साठलेले सगळे जुने अंक त्यांनी रद्दीत विकून टाकले होते!

अखेर एक शेवटचा उपाय म्हणून त्या महिन्याच्या सदरासाठी लिहिलेल्या लेखाबरोबर मी एक जाहीर निवेदन पुढच्या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी लिहून दिलं. त्यात माझी नेमकी अडचण विशद करून प्राजक्तचे सुरूवातीपासूनचे अंक कुणाकडे उपलब्ध असतील तर मला कळवावे असं वाचकांना आवाहन केलं आणि मी त्याच्या झेरॉक्स कॉपीज् स्वखर्चाने काढून घेईन हेही लिहिलं. या सगळ्या सदरलेखनाला आजपर्यंत कितीतरी वाचकांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वेळोवेळी आवर्जून पाठवल्या होत्या. त्यांच्यापैकी अगदी एकाने जरी ते अंक जपून ठेवले असतील तर त्या अंकांची मला गरज आहे हे निवेदन दिल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोचणार कसं? हाच विचार ते निवेदन दिलं तेव्हा माझ्या मनात आलं. आणि ध्यानीमनी नसताना खरंच चमत्कार घडला! जादूची कांडी फिरावी तशी सगळी सूत्रं वेगाने हलत गेली आणि… !

दुसऱ्याच दिवशी सर्व नाट्यसंस्थांकडून मी पाठवलेल्या मेसेजेस् ना सकारात्मक उत्तरे आली आणि पुढे दोन-तीन दिवसात त्यापैकी काहींनी पीडीएफ् रुपात तर बाकीच्यांनी त्या संहितेची झेराॅक्स काॅपी मला पाठवून माझ्या हरवलेल्या अक्षरधनाची कांही प्रमाणात कां होईना भरपाई केली. हा एक सुखद धक्काच होता माझ्यासाठी! नंतर मधे आठदहा दिवसही उलटले नसतील आणि अचानक एक फोन आला.

“आपण अरविंद लिमये बोलताय ना?” आवाज अपरिचित. कांहीसा थकलेला. माधवनगरचे कुणी सुधाकर फाटक आजोबा बोलत होते.

“मी प्राजक्तमधलं तुमचं निवेदन वाचलं. त्यातले तुमचे लेख मला आवडतात. त्यामुळेच मी सभासद झाल्यापासूनचे म्हणजे साधारण २०१५पासूनचे सगळे अंक क्रमवार अॅरेंज करून ते जपून ठेवलेत. पण अट एकच. तुम्ही स्वतः येऊन ते घेऊन जायचे. त्यामुळे निदान आपली भेट तरी होईल. आणि हो.. त्याच्या झेराॅक्स काढायची तसदी नका घेऊ. आज माझे वय आहे ८५. मी प्राणपणाने जपलेले ते अंक योग्य माणसाच्या हाती गेल्याचं समाधान मला मिळतंय याचा मला आनंदच आहे… !” ते बोलत होते. मी थक्क होऊन ऐकत होतो. हे एवढंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी ‘प्राजक्त’चं मुद्रण कोल्हापूरला ज्या प्रेसमधे होत असे त्या प्रेसचे श्री. डबीर यांचाही निरोप आला. त्यांच्याकडून २०१० च्या आधीचेही सगळे अंक सेव्ह असल्याने त्यांनी ते पेनड्राईवमधे डाऊनलोड करून देण्याचे आश्वासन दिले.. !

जे मला कधीच परत मिळू शकणार नाही असं मला वाटलं होतं ते माझं सगळं अक्षरशः मला अचानक परत मिळणं हा चमत्कारच होता माझ्यासाठी !!

हे सगळं इतकं अनपेक्षित, इतकं सहज, आणि इतकं अल्पावधीत घडलं की हे एखादं सुखद स्वप्नच आहे असंच वाटत राहिलं! प्रतिकूल परिस्थितीत हे असं हवं ते हवं तसं मला बहाल करण्याची ‘त्या’ची किमया म्हणजे अंधारून आलेल्या मनात भरून राहिलेला मिट्ट काळोख क्षणार्धात उजळून टाकणाऱ्या लख्ख प्रकाशासारखी ‘त्या’च्या अलौकिक स्पर्शाची अनुभूती वाटली मला!

नुकतेच घडून गेल्यासारखे मला इतक्या वर्षांनंतरही स्वच्छ आठवणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातले हे दोन प्रातिनिधिक प्रसंग.. ! खरंतर तो आणि मी या विषयाशी संबंधित मनात घर करून राहिलेल्या अशा असंख्य आठवणींचा या प्रदीर्घ अशा सदरलेखनाच्या निमित्ताने मी घेतलेला वेध म्हणजे एकापरीने ‘त्या’चा स्पर्श जाणवलेल्या आजवरच्या आठवणीत साठलेल्या अनेक अनुभवांकडे माझे मागे वळून पहाणेच होते! यातून माझ्या नकळत्या वयापासून मी मनात जपलेला ‘तो’ आज वानप्रस्थात प्रवेश केलेल्या माझ्या आयुष्याच्या उतरत्या वळणावर उभ्या मला कसा दिसतो ते आता या सदराच्या पुढच्या समारोपाच्या भागात.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उंबरठा…” ☆ अर्चना देशपांडे ☆

अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “उंबरठा…” ☆ अर्चना सुरेश देशपांडे

उंबरठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो घराच्या मुख्य दाराच्या चौकटीला खालच्या बाजूला लावलेलं जाड उंच लाकूड. उंबरठ्याशिवाय घराला पूर्तता नसते, हा घराचा महत्वाचा भाग असतो.

माझ्या माहेरी घर मोठे होते. प्रत्येक खोलीला उंबरठा होता. पूर्वी अंगणात रांगोळी काढताना उंबरा धुऊन त्यावरही हळदी कुंकू घालून नमस्कार केला जायचा. उंबऱ्यावर गो पद्म, स्वस्तिक रांगोळी काढली जायची.

पूर्वीच्या काळी घर हेच स्त्रीचे विश्व होते. बाईने उंबरठा ओलांडून स्वकर्तुत्वाने काही करायचे म्हटले की तिला घरातून विरोध असायचा.

उंबरठा म्हणजे तिच्यासाठी लक्ष्मणरेषा. स्त्रिने घरातील लोकांच्या विरुद्ध उंबरठा ओलांडून बाहेर जाणे म्हणजे संस्काराची मर्यादा ओलांडली असे मानले जात असे.

नववधू घरात प्रवेश करताना उंबरठ्यावर ठेवलेले तांदळाचे माप ओलांडून मगच घरात प्रवेश करते. तिच्या दृष्टीने हा गृहप्रवेश खूप महत्त्वाच्या ठरतो.

धार्मिक दृष्टीने सुद्धा उंबरठा महत्त्वाचा मानला जातो. नरसिंह व लक्ष्मीचे स्थान त्या ठिकाणी असते. उंबरठा सहसा उंबराच्या झाडाच्या लाकडापासून बनवला जातो.

उंबरठा हा मर्यादेची जाणीव करून देतो. उंबरठ्याच्या आत सुरक्षतेची भावना असते. आपल्या संस्कृतीत उंबरठा म्हणजे संरक्षण, मर्यादा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर वास्तुशास्त्रानुसार उंबरठा नकारात्मक ऊर्जा रोखून धरतो.

हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा ही कल्पनाच इतिहास जमा झाली आहे. तिथे उंबरे नसतातच, अगदी असेल तर  कडापयाची लांबडी पट्टी बसवून घेतात.

माझ्या मते घराला उंबरा असावा. उंबरा पायाला क्षणभर थांबवतो आणि पाय थांबले की मन ही क्षणभर जागे होते. तो सांगतो जणू आता घरात प्रवेश करतो आहेस, बाहेरचा राग, अहंकार, कटुता दाराबाहेर ठेव आणि घरात प्रवेश करताना प्रेम, आदर, संयम व विनम्रता घेऊन ये.

उंबरठा आपल्याला मर्यादा शिकवतो. बाहेर किती ही मोठ्या पदावर असलास तरी घरी येताना माणूस म्हणून घरात प्रवेश कर.

सद्गुरु वामनराव पै सांगतात “माणसाने कुठे थांबायचे हे माणसाला कळायला हवे” खरं पाहता उंबरा हेच शिकवतो. पती, पत्नी, आईवडील आणि मुले, सासू-सून, बहीण -भाऊ, आजी आजोबा व नातवंडे या प्रत्येक नात्यात उंबरा म्हणजे मर्यादा असतात. हा उंबरा ओलांडला गेला तर नाती बिघडतात आणि हा उंबरा जपला तर आपुलकी राहते, घरात शांतता नांदते.

थोडक्यात दाराचा उंबरा घराचे रक्षण करतो तर मनाचा उंबरा नात्याचे बंध जोडून ठेवतो.

 

© अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चुकेल तो शिकेल” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “चुकेल तो शिकेल☆ श्री जगदीश काबरे ☆

एखाद्या व्यक्तीला “मी कधीच चुकत नाही” किंवा “माझी विचारसरणीच अंतिम सत्य आहे” अशी ठाम खात्री वाटू लागते, तेव्हा ती केवळ त्याच्या मतांवर ठाम असते असे नसून, तिच्या संपूर्ण मानसिक रचनेत एक प्रकारचा बंदिस्तपणा निर्माण झालेला असतो. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून ही अवस्था ‘cognitive rigidity’ म्हणजेच विचारांतील कठोरता दर्शवते. अशा व्यक्तीला नवीन माहिती, विरोधी मत किंवा आत्मपरीक्षण स्वीकारणे कठीण जाते, कारण त्यातून तिच्या ‘स्व’बद्दलच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. परिणामी, ती व्यक्ती एकाच विचाराच्या चौकटीत अडकून राहते आणि चकवा लागल्यासारखे त्याच प्रश्नाभोवती वारंवार फिरत राहते. हे वर्तन बाहेरून हट्टीपणासारखे दिसते, पण आतून ते असुरक्षिततेशी जोडलेले असते.

या प्रक्रियेमागे ‘confirmation bias’ ही एक महत्त्वाची मानसिक प्रवृत्ती कार्यरत असते. म्हणजे, माणूस आपले आधीचे मत बरोबर ठरवणारीच माहिती स्वीकारतो आणि विरोधी माहिती नाकारतो किंवा दुर्लक्ष करतो. त्यामुळे “मीच बरोबर आहे” ही भावना अधिकाधिक दृढ होत जाते. यात अहंकाराची जोड, व्यक्तीचे मत आणि तिची ओळख हे सगळे गुणावगुण एकरूप होतात. त्यामुळे मत चुकले आहे हे मान्य करणे म्हणजे स्वतःलाच कमी लेखणे, अशी भीती निर्माण होते. यामुळे व्यक्ती वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी आत्ममग्नतेत गुरफटते.

एखाद्या रुग्णाने “मला काहीच आजार झालेला नाही” असे ठरवले, तर तो निदान, तपासणी आणि उपचार या सगळ्यांपासून दूर राहतो. परिणामी आजार अधिक बळावतो. त्याचप्रमाणे, विचारांच्या पातळीवरही “मी चुकूच शकत नाही” ही धारणा व्यक्तीला आत्मसुधारणेपासून रोखते. ती स्वतःच्या विचारांकडे नव्या दृष्टीने पाहत नाही, त्यामुळे चुका सुधारण्याची संधीच नाकारली जाते. असे वास्तव नाकारणे, हा एक प्रकारचा मानसिक बचावात्मक प्रतिसाद असतो. याउलट, विवेकशीलता म्हणजे स्वतःच्या विचारांवरही प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणे ही बौद्धिक नम्रता प्रगतीसाठी अत्यावश्यक असते. माणूस चुकतो आणि आपणही चुकू शकतो, हे मान्य केल्यावरच तो नवीन शिकण्यास, बदल स्वीकारण्यास आणि अधिक व्यापक दृष्टिकोन विकसित करण्यास तयार होतो. डोळ्यावरचा धुरकट चष्मा पुसण्याची तयारी असणे हीच खरी प्रगतीची सुरुवात असते.

अशा पार्श्वभूमीवर, “मीच बरोबर” या आत्ममग्नतेत अडकलेली व्यक्ती केवळ स्वतःच्या बौद्धिक विकासालाच अडथळा ठरत नाही, तर व्यापक सामाजिक संवादालाही बाधा आणते. कारण संवादाचा गाभा हा परस्परांचे ऐकण्याची तयारी, स्वतःच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची क्षमता आणि सत्याच्या शोधात लवचिक राहण्याच्या वृत्तीमध्ये असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मतांना अंतिम सत्य समजते, तेव्हा ती प्रत्यक्षात सत्याच्या शोधापासून दूर जात असते आणि स्वतःच्या विचारांच्या प्रतिध्वनीतच अडकून पडते. खरी विवेकशीलता ही अचूकतेच्या दाव्यात नसून, चुकण्याची शक्यता मान्य करण्याच्या प्रामाणिकपणात आणि त्या चुकांमधून स्वतःला सतत सुधारण्याच्या धडपडीत असते. म्हणूनच बौद्धिक प्रगतीचा मार्ग हा आत्ममग्नतेतून नव्हे, तर शंकांना सामोरे जाण्याच्या धैर्य आणि आत्मपरीक्षणाच्या सवयीमधूनच उलगडत जातो, हे आपण जेवढ्या लवकर लक्षात घेऊ तेवढे बरे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि AI -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी आणि AI – ☆ विभावरी कुलकर्णी

माझे आत्ता पर्यंत जे व्यक्ती विशेष (थोडक्यात म्हणजे बावळटपणा किंवा मूर्खपणा) मी लिहिले आणि आपण वाचले त्यात अजून एक भर पडली. खूप दिवस AI नामक सर्वज्ञात असलेल्या जीन विषयी ऐकत होते. फारसा विश्वास नव्हताच! पण म्हंटले बरेच लोक प्रशंसा करत आहेत, तर बघावे हा जीन काय काय करतो? कारण नवीन नवीन शिकणे, विविध प्रयोग करणे हे जणू रक्तातच आहे.

आज एका वस्तूवर अडले. इमेज तर दिसली आणि उत्सुकता वाढली. म्हणून सर्वज्ञ AI कडे धाव घेतली, तर त्या वस्तुच्या फोटोत आणि याच्या उत्तरात काहीच साम्य नाही. शेवटी त्या विषयी योग्य माहिती घरातूनच मिळाली. म्हणजे आपण पूर्वेचा रस्ता विचारावा आणि AI ने आकर्षक पद्धतीने उत्तरेला नेऊन सोडावे. कालच एक वसंत कानेटकर लिखित एक प्रसिद्ध नाटक बघून आले. वाटलं AI ला कथानक विचारावे. तर मूळ विषय सोडून काहीही कथा येऊ लागल्या. पुन्हा शेवटी प्रश्न आहेच. मी अजून काही मदत करु शकतो का? दोन तास त्यात घालवले तरी इतक्या प्रसिद्ध नाटकाची कथा त्याने अजून सांगितलीच नाही. मग इतर गोष्टी लांबच!

मग या विषयी जे सध्याचे तंत्रज्ञान वापरतात म्हणजे आपलीच लेकरे, त्यांच्याशी चर्चा केली. तर असे कुठे विचारतात का? म्हणून त्यांनी वेड्यातच काढले. मग आमची चर्चा आणि मध्यंतरी काही वाचले होते ते आठवले.

AI विरुद्ध मानव (AI vs Human) हा सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातील सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने प्रगत होत असली तरी, मानवी बुद्धिमत्तेला तिचा पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

मानवी क्षमता सर्वश्रेष्ठ आहे. मुंबईतील ७७% प्रोफेशनल कामाचे मोठे निर्णय घेताना AI पेक्षा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतात.

AI ची उपयुक्तता: ७३% प्रोफेशनल AI चा वापर मसुदा तयार करण्यासाठी उपयुक्त मानतात, पूर्ण निर्णयासाठी नाही.

 AI मानवाची जागा घेणार नाही, तर मानवी क्षमतेत वाढ करेल. हे मानवी भावना आणि यंत्रांचे तर्कशास्त्र यांचे मिश्रण असेल.

एआयचे जनक जेफ्री हिंटन यांनीही एआयच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यामुळे नोकऱ्या जाण्याची भीती आहे.

एआय चॅटबॉट्सचा चुकीच्या कामासाठी वापर (उदा. डीपफेक) समाजासाठी घातक ठरू शकतो.

योग्य नियोजन आणि मर्यादित वापर केल्यास AI मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकते, परंतु मानवी विवेकबुद्धीला पर्याय नाही.

एआय आणि मानव यांच्यातील मुख्य फरक

मानव

माणूस सर्जनशील आहे.

उच्च कल्पना आणि भावनांवर आधारित निर्मिती करु शकतो. निर्णय क्षमता भावना, नैतिकता आणि अनुभव यावर आधारित असतात.

वेग व स्मृती मर्यादित असतात. संदर्भ हे नैसर्गिक समज व भावनांवर आधारित असतात.

AI

सर्वजनशीलता मर्यादित डेटा वर आधारित असते. वेग प्रचंड असतो. निर्णय क्षमता डेटा आणि अल्गोरिदमवर आधारित असते.

संदर्भ हे शिकवलेल्या माहितीवर आधारित असतात.

AI हे एक साधन आहे साध्य नाही.

आत्ता पर्यंत एवढेच समजले. अजून काही ज्ञानात भर पडेलंच! या कामी आपणही मदत कराल ना?

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खाणं आणि पिणं ! ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

🕺🤣 खाणं आणि पिणं ! 🤣😅  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

लेखाच शिर्षक वाचून खवय्ये आणि पिवय्ये (हा मी न पिता शोधलेला शब्द) हे दोघंही खूप खूष झाले असतील ! तशी या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती आणि पुढील काळात यातील खवय्यांची संख्या जरी डाएटच्या नवं नवीन फ्याडामुळे कमी होतं गेली तरी पिवय्यांची संख्या पुढील काळात वाढतीच राहील, हे सांगायला कोणी कुठलंही पेय प्यायची गरज नाही ! कारण न पिणारा किंवा पिणारी ही जमात हल्ली जवळ जवळ नामशेष होत चालली आहे. त्याची कारणं वगैरेचा उहापोह करण्यासाठी आणि “पिणं” या एका शब्दावर लिहायचं झालं तर त्यासाठी एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल ! आणि तो सुद्धा “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, हे व्होडका आणि डिस्टील वॉटर इतकं पारदर्शक सत्य आहे ! वाचकहो आता नमनाला एवढं तुम्हाला “हाय” करून झाल्यावर, (झाला नसलात तरी) मूळ विषयाकडे माझी गाडी वळवतो.

आज मी हा जो “खाणं” शब्द घेतला आहे त्याचा आपल्या हातांशी आणि तोंडाशी काडीचा संबंध नाही. त्याच काय आहे नां मंडळी, आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की आपल्या या “अभिजात मराठी भाषेत” (इतक्या वर्षांनी कां होईना, पण मिळाला बाबा एकदाचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठीला !) असे अनेक शब्द आहेत, की त्यातील एकेका शब्दाचे अनेक अर्थ होतात हे आपण सुज्ञ वाचक असल्यामुळे जाणताच. त्यामुळे खाणं हा शब्द वाचल्या वाचल्या आपल्या डोळ्यासमोर नाष्ट्यापासून आपल्याला आपल्या जेवणात असलेले आपले आवडीचे काही पदार्थ येणं, हे आपण खऱ्या अर्थाने खवय्ये नसालत तरी, स्वाभाविकच आहे. त्याला तुमचा इलाज नाही, पण मी “खाणं” या शब्दाचे आपल्याला जे अर्थ सांगणार आहे, त्याचा वर म्हटल्याप्रमाणे खऱ्या खाण्याशी काडीचा, अगदी टूथपीकइतका सुद्धा संबंध नाही ! त्यामुळे आपण थोडा डोक्याला ताण दिलात आणि पुढील लेख, डोक्यातील आणि डोळ्यासमोर आलेले खाण्याचे पदार्थ आणि मनांतली भूक काढून टाकून वाचलात, तर मी काय म्हणतोय ते आपल्या सारख्या प्रगल्भ वाचकांना नक्कीच कळेल. लेख वाचून झाल्या नंतरच आपण आपल्या रसना देवीला आपले आवडीचे खरं खाणं खाऊन तृप्त करावे अशी नम्र विनंती ! असो !

तर मंडळी, लहानपणी आपण सगळेच घरीदारी, शाळेत दंगामस्ती करत मोठे झालो हे जवळजवळ सगळेच वाचक मान्य करतील. त्यामुळे माझ्या पिढीतील (सध्या वय फक्त ७२!) त्या वेळच्या मास्तरांच्या हातचा मार मी कधीच खाल्ला नाही, हे असं कुणी म्हणणं निदान मला तरी न पटणार आहे. अर्थात “त्याकाळी” मुलींनी आणि मुलांनी केलेली दंगामस्ती यात, “हल्लीची” हिंसक दंगल आणि एखादा खरोखरचा निषेध मूक मोर्चा इतकं अंतर होत, हे ही तितकंच खरं. पण आत्ताची मुला मुलींची दंगामस्ती एकमेकांवर सर्वच बाबतीत कुरघोडी करण्यापर्यंत गेली आहे, हे ही एक आजच वास्तव आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून आपले आई, वडील अथवा शिक्षक कितीही प्रेमळ असले आणि त्यांच्या हातचा मार आपण कधीच खाल्ला नसेल असं आपण गृहीत धरलं तरी, आपल्याला त्यावेळेस त्यांच्या हातांच्या ऐवजी कडक “शब्दांचा मार” नक्कीच खावा लागला असेल, हे आपण आत्ता तरी नक्कीच मान्य करायला हरकत नसावी !

कधी कधी आपण एकटेच आपल्या विचारांच्या तंद्रित बाहेर पडलेले असतो. डोक्यात काही ना काही विचारचक्र चालू असतं, काहीतरी टेन्शन असतं, कसली तरी समस्या भेडसावतं असते. बाहेर पडल्यावर फिरून आल्यावर जरा बरं वाटेल, या एकाच उद्देशाने आपण निरर्थकपणे निघालेलो असतो. अशावेळी आपल्या विचारांची तंद्री भंग करणारी आपल्या नावाची हाक आपल्या कानावर पडते. आपण हाक आलेल्या दिशेने चमकून बघतो तर आपल्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. त्याच नांव आठवायचा आपण प्रयत्न करतो पण तो पर्यंत तो जवळ येताच, आपण उसन हसून “काय कसा आहॆस?” असं विचारून वेळ मारून नेतो. नंतरचा पाऊण एक तास, आपल्याला ज्या विषयात अजिबात इंटरेस्ट नाही असे अनेक वेगवेगळे विषय काढून तो आपलं डोकं “खाण्यात” घालवतो आणि आपण सुद्धा न रागावता नाईलाजाने मधून मधून त्याच्या भाषणाला प्रतिसाद देत असतो ! त्याला जरा घाईत आहे असं सुचवून देखील, तो अट्टाहासाने आपल्या डोक्याबरोबर आपला (बहुमूल्य?) वेळ सुद्धा “खात” असतो !

Other side of the grass is always greener ! ही इंग्रजी म्हण, काही काही लोकांच्या बाबतीत अगदी बररोब्बर लागू पडते मंडळी ! म्हणजे कसं असतं नां, स्वतःकडे सगळं काही असलं तरी दुसऱ्याकडे असलेली आणि आपल्याकडे नसलेली एखादी वस्तू बघून, त्याच्यावर हे अल्पसंतुष्ट लोकं उगाचच “खार” खात असतात. पण त्यात त्यांचच नुकसान आहे हे कळण्याच्या पलीकडे त्यांची विचारांची उडी तो “खार” खाण्याच्या नादात पोहचतच नाही, त्याला आपण तरी काय करणार ? एखाद्याचा असा “खार” खाण्याचा स्वभाव बदलणं हे महाकर्म कठीण !

एखाद्या कलेत अथवा कुठल्याशा विषयात थोडी फार पारंगत असलेली व्यक्ती त्याला किंवा तिला ती कला कोणी सादर करायला सांगितली, तर काहीतरी कारण सांगून तो किंवा ती उगाच “भाव” खात असते ! अशावेळी आपण त्याला किंवा तिला कितीही आग्रह केला, तरी ती किंवा तो अजिबात बधत नाही म्हणजे नाहीच ! या मागे त्याच किंवा तिच अर्थकारण सुद्धा असू शकत असं मग अनेक माणसांना तसं नसलं तरी, वाटून जातं. या अर्थकारणावरून मला काही काही लोकांचं आजकाल बोकाळलेले दुसरच खाणं आठवलं. म्हणजे कसं आहे नां मंडळी, हल्ली काही काही लोकं कुठल्याही कामात “मेरा क्या?” असा सवाल करून, तर कधी कधी असा सवाल न करताच चक्क “पैसे खातात !” आणि अशी एखादी अती खादाड व्यक्ती जर चुकूनमाकून ACB च्या जाळ्यात अडकली तर त्याला बोल लावणारे लोकं, कारण कळेपर्यंत ऑफिसात “शेण खाल्लं” असेल असं बोलायला मोकळे ! मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याच तोंड कसं धरणार? काय बरोबर नां?

एखाद्या भांडणाचं पर्यवसान हातघाईवर येण्या आधी जेंव्हा फक्त तोंडापर्यंत मर्यादित असतं तेंव्हा, दोन्ही भांडणारे गट एकमेकांना यथेच्छ “शिव्या खायला” घालतात ! अशावेळी झालेला “अपमान खाता” येत नाही आणि त्यासोबत आलेला राग सुद्धा खायचा म्हटलं तरी कोणी खाऊ शकत नाही. पण त्याला पर्याय म्हणजे अशावेळी आलेला राग आणि झालेला अपमान हे दोन्ही “गिळायची” सोय आपल्या अभिजात मराठी भाषेत आहे ! काही काही लोकं त्यांना आलेला राग व्यक्त करण्यात पण कमी पडतात आणि मग नाईलाजाने स्वतःचेच “दात ओठ” खात बसतात ! ही अशा लोकांची हतबलता मानली तरी त्याला सुद्धा काही लोकं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्यानं “कच खाल्ली” असं म्हणून मोकळे होतात, आता बोला !

काही काही लोकांच बरं असतं, म्हणजे ते लोकं कुठे बाहेर चालले आहेत आणि आपण जर त्यांना हटकून विचारलं की “कुठं पर्यंत?” तर ते लगेच उत्तर देतात “जरा हवा खाऊन किंवा ऊन खाऊन येतो!” आता या दोन्ही खाण्यामुळे त्यांच पोट नक्कीच भरणार नसतं, तरी हवा खाऊन किंवा ऊन खाऊन असे शब्द सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात आणि त्या मागचा खरा अर्थ, विचारणारा सुद्धा लगेच जाणतो हीच आपल्या अभिजात मराठीची खरी खासियत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये ! काही लोकं बोलतांना सांभाषणातले अधले मधले “शब्दच खातात. ” जर का अशा माणसाचा तो ड्रॉबॅक संभाषण कर्त्याला ठाऊक असेल तर ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला तो नक्की काय बोलतोय हे कळण जरा अवघडच जातं मंडळी !

वाचकहो, लेखाच्या शीर्षकातल्या पहिल्या “खाणं” या शब्दाचा माझ्या बुद्धीप्रमाणे आणि मला माहित असलेल्या न खाण्याच्या प्रकारांच्या उल्लेखाने उहापोह करून झाल्यावर, आता दुसऱ्या “पिणं” या शब्दाकडे मी कधी येतोय, याची वाट अनेक पिय्यकड लोकं घसा सुखा करून वाट बघत असतील ! पण त्यांच्या पदरी आज तरी निराशा येणार आहे आणि त्याला माझा ईलाज नाही मंडळी ! म्हणजे मी या लेखाच्या सुरवातीलाच आपल्याला क्लिअर केलं होतं, की “पिणं” या शब्दावर लेख लिहायचा झाल्यास तो लिहिण्यासाठी एखाद्या “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, काय आठवतंय का ? आणि न खाणं खायचा हा लेख वाचायच्या नादात आपण जर ते विसरला असाल, तर आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. लेखाचा पहिला परिच्छेद पुन्हा एकदा नीट वाचा ! आता तरी पटली खात्री तुमची ? मग आता मला सांगा, “पिणं” या शब्दावर मी लेख लिहावा असं ज्याला वाटतंय, तो मला त्याच्या घरी (अगदी कुठेही!) एखाद्या संध्याकाळी “व्यवस्थित बसायला” कधी बोलावतोय ? काय म्हणता, माझा पत्ता माहित नाही. अहो मंडळी, असं काय करता, लेखाच्या खाली माझं पूर्ण नांव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर पण दिला आहे. मग वाट कसली बघता ? पटकन तुमचा मोबाईल उचला आणि माझी तुमच्या बरोबरची अशी एखादी “व्यवस्थित संध्याकाळ” आजच बुक करा !

आपल्या फोनची वाट बघणारा

आपलाच,

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ अधिक मास ☆ शालिनी जोशी

यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे. रविवार तारीख १७ मे ते सोमवार दिनांक १५ जून २०२६ हा तो कालावधी. त्याविषयी थोडी माहिती.

भारतीय कालगणना चांद्र- सौर पद्धतीवरती आधारित आहे. म्हणजे महिन्यांची गणना चंद्राच्या गतीवर आणि ऋतूंची मांडणी सूर्याच्या गतीवर आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला एक महिना लागतो. तोच चंद्रमास- तिथी हे एकक. एका महिन्यात ३० तिथी होतात. अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून पुढील अमावस्येपर्यंत एक चंद्रमास होतो. हा साधारण २९•५ दिवसाचा असतो. म्हणून बारा महिन्यांचे २९•५ × १२ = ३५४ दिवस होतात. यानुसार सण ठरतात. चंद्र रोज वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो ते नाव त्या महिन्याला दिले जाते. उदाहरणार्थ चित्रा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तर तो चैत्र महिना. विशाखा नक्षत्राजवळ पौर्णिमेला असेल तो वैशाख.

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणारा काळ हा साधारण ३६५ दिवसांचा. हे सौर वर्ष. यानुसार ऋतू ठरतात. त्यामुळे दोन्ही पद्धतीत अकरा दिवसांचा फरक पडतो. सण दरवर्षी ११ दिवसांनी मागे सरकतात. हे असेच सुरू राहिले तर चैत्र हिवाळ्यात किंवा दिवाळी उन्हाळ्यात येईल. ऋतू आणि सण जुळणार नाहीत. ही विसंगती टाळण्यासाठी अधिक महिना ही संकल्पना. चांद्र वर्षात दोन वर्ष आठ महिन्यांनी, सण तीस दिवस मागे पडतात. म्हणून तिसऱ्या वर्षी एक अधिक महिना घेतला जातो. त्यामुळे सण व ऋतू यांचा मेळ बसतो. सूर्याच्या भासमान मार्गावर बारा राशी. प्रत्येक महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो. मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो तो चैत्र महिना असतो. मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश वैशाख महिन्यात. या बदलाला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात. काही वेळा अशी स्थिती येते की एका चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही म्हणजे संक्रांत येत नाही. ती पहिली अमावस्या संपण्यापूर्वी आणि दुसरी अमावस्या संपल्यानंतर येते. असा महिना अधिक ठरतो. उदाहरणार्थ आत्ताचा अधिक महिना जेष्ठ.

सूर्याचा वृषभ राशी प्रवेश शुक्रवार १५ मे ६:२१ मिनिटांनी आहे. नंतर अमावस्या रविवार तारीख १७ मे मध्यरात्री १:३१ ला संपते. आणि नंतरची अमावस्या १५ जून सकाळी८:२५ ला संपते. नंतर सूर्याचा वृषभ राशीतून मिथुन राशी प्रवेश होतो. म्हणजे या महिन्यात सूर्याचा राशी बदल नाही म्हणून हा अधिक मास. जेष्ठ अधिक मास आहे.

आणि पुढील नीजजेष्ठ आहे. सणवार नीज ज्येष्ठात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मागे आलेले सण पुढे जातात. उदाहरणार्थ गेल्यावर्षी १० जूनला असलेली वटपौर्णिमा २९ जूनला येणार. म्हणजे चंद्राचा महिना लहान व सूर्याचा मोठा तेव्हा अधिक मास.

अधिक टाकले म्हणून त्याला मलमास, अशुभ अपवित्र मानले गेले. तेव्हा तो व्यथित होऊन देवाकडे गेला. विष्णूला शरण गेला. विष्णूने श्रीकृष्णाकडे पाठवले. पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाने त्याला स्वीकारले. म्हणून तो पुरुषोत्तम मास झाला. पवित्र, व्रत- वैकल्याचा महिना झाला. मुलगी व जावई लक्ष्मीविष्णू मानून त्याना वाण देण्याची प्रथा आहे. एकंदरीत संयम, नम्रता, आदर यांनी युक्त होऊन कुटुंबासाठी, समाजासाठी श्रेयस्कर काही करणे हे या महिन्यातील कर्तव्य समजावे. सातत्य महत्त्वाचे. पुरुषाकडून पुरुषोत्तमाकडे वाटचाल हा अधिक मासाच्या व्रतांचा उद्देश समजावा.

विज्ञान दृष्टीने हा चंद्र, सुर्य, पृथ्वी यांचा खेळ आहे. सण आणि ऋतु यांच्यात एकवाक्यता केली आहे. आपली सौर-चांद्र पद्धत खगोलशास्त्रावर आधारित आहे. दोन्ही कालगणनांशी जुळणारी सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि खगोलीय सुत्रबद्धता असलेली अशी ही तर्कशुद्ध मांडणी आहे.

 (श्री. विनय जोशी आणि श्री. हेमंत मोने यांचे लेखावरून)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्र, अध्यात्म आणि उत्सवांचे अद्भुत सौंदर्य)

प्रस्तावना : निसर्गाशी मैत्री करणारी संस्कृती

जंबुद्वीपातील भरतखंड — आपले भारतवर्ष!

जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेली ही भूमी केवळ कृषिप्रधान नाही, तर विज्ञाननिष्ठ, अध्यात्मप्रधान आणि निसर्गपूजक आहे.

येथील ऋषी-मुनींनी जीवनाकडे केवळ भौतिक नजरेने पाहिले नाही; तर मानव, निसर्ग आणि विश्व यांच्यातील सूक्ष्म नाते अनुभवले.

ऋतुचक्राच्या लयीत, सूर्य-चंद्रांच्या गतीत आणि निसर्गाच्या स्पंदनांत त्यांनी जीवनाचे शाश्वत तत्त्व शोधले.

भारतीय संस्कृतीने प्रत्येक ऋतूला अर्थ दिला, प्रत्येक तिथीला पावित्र्य दिले आणि प्रत्येक दिवसाला उत्सवाचे रूप दिले.

मानवाचे आरोग्य, मानसिक संतुलन, सामाजिक ऐक्य आणि आत्मिक उन्नती जपण्यासाठी व्रत-वैकल्ये, उत्सव, पर्व आणि संस्कारांची निर्मिती झाली.

यातूनच जन्माला आला —

भक्तिरसाने ओथंबलेला, रंगांनी नटलेला आणि अध्यात्माच्या तेजाने उजळलेला चातुर्मास!

अधिकमास : भारतीय कालगणनेतील अद्भुत विज्ञान

यावर्षीचे महत्त्वाचे दिनविशेष

 ▫️अधिकमासारंभ : १७ मे २०२६

 ▫️अधिकमास समाप्ती : १२ जून २०२६

▫️चातुर्मासारंभ : २५ जुलै २०२६

▫️चातुर्मास समाप्ती : २१ नोव्हेंबर २०२६

अधिकमास म्हणजे नेमके काय?

भारतीय सण-उत्सव हे चांद्रगतीवर आधारित आहेत, तर ऋतुचक्र सूर्याच्या गतीवर अवलंबून आहे.

या दोन्ही कालगणनांचा अद्भुत मेळ भारतीय ज्योतिषशास्त्राने साधला आहे.

चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांतील सूक्ष्म फरक भरून काढण्यासाठी जो अतिरिक्त महिना येतो, त्याला ‘अधिकमास’ म्हणतात.

तर एखादा महिना लुप्त झाला तर त्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

दोन अधिकमासांमध्ये साधारणतः २७ ते ३४ महिन्यांचे अंतर असते.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिकमास म्हणून येऊ शकतात.

मार्गशीर्ष आणि पौष हे क्षयमास होऊ शकतात; परंतु माघ मास कधीच अधिक किंवा क्षय होत नाही, हे विशेष!

क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमासात सूर्य दोन राशींमध्ये प्रवेश करतो.

अशा वेळी त्या महिन्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

विशेष म्हणजे, एखाद्या वर्षी क्षयमास आला तर त्या वर्षी दोन अधिकमास येतात.

अधिकमासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास अशीही नावे आहेत.

हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे भारतीय कालगणनेचे विज्ञान आजही अचूक आहे — ही आपल्या पूर्वजांच्या प्रज्ञेची तेजस्वी साक्ष आहे.

अधिकमासाचे अध्यात्मिक महत्त्व

अधिकमास हा केवळ गणिती समतोल नाही;

तो आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचा पवित्र कालखंड आहे.

या महिन्यात अनेक जण विविध व्रते आणि संकल्प करतात —

▫️ उपवास

▫️ एकभुक्त / नक्तभोजन

▫️ मौनभोजन

▫️ अखंड नंदादीप

▫️ तांबूलदान

▫️ गंगास्नान

▫️ मंत्रजप

▫️ विष्णुसहस्रनाम पारायण

“ॐ नमो भगवते वासुदेवाय”

या मंत्राच्या अखंड जपाने वातावरणही भक्तिमय आणि पवित्र बनते.

या काळात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.

मनातील विकार धुऊन टाकून अंतःकरण अधिक निर्मळ करण्याचा हा आध्यात्मिक उत्सव आहे.

चातुर्मास : उत्सव, साधना आणि संस्कृतीचे महापर्व

आषाढातील शयनी एकादशी ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — हा चार महिन्यांचा कालखंड म्हणजे चातुर्मास.

हा काळ केवळ धार्मिक नसून ऋतुबदल, आरोग्य, पर्यावरण, शेती, अध्यात्म, कला आणि सामाजिक जीवन यांचा सुंदर समन्वय आहे.

आषाढ : भक्तिरसाचा प्रारंभ

🫟 कालिदास दिन

🫟 जगन्नाथ रथयात्रा

🫟 पंढरपूरची वारी

🫟 गुरुपौर्णिमा

🫟 दिव्याची आवस

आषाढात भक्तीचा पहिला वर्षाव मनावर होतो.

वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगात, विठ्ठलनामाच्या गजरात आणि पावसाच्या सरींत भक्तिरस दाटून येतो.

श्रावण : व्रत-वैकल्यांचा हिरवा महिना

श्रावण म्हणजे भक्ती, पावित्र्य आणि मंगलमयतेचा उत्सव!

🪻 रविवार — सूर्यपूजा

🪻 सोमवार — शिवआराधना

🪻 मंगळवार — मंगळागौरी

🪻 बुधवार-गुरुवार — बुध-बृहस्पती पूजन

🪻 शुक्रवार — जिवती पूजन

🪻 शनिवार — बलभीम दर्शन

याच महिन्यात येतात —

🪻 नागपंचमी

🪻 नारळी पौर्णिमा

🪻 राखी पौर्णिमा

🪻 स्वातंत्र्यदिन

🪻 गोकुळाष्टमी

🪻 पिठोरी अमावस्या

🪻 बैलपोळा

श्रावणातील हिरवाई जशी धरतीला सजवते, तशीच भक्ती मनालाही प्रसन्न करते.

भाद्रपद : गणरायाच्या आगमनाचा जल्लोष

🍁 हरतालिका

🍁 गणेश चतुर्थी

🍁 ऋषीपंचमी

🍁 गौरी आगमन

🍁 अनंत चतुर्दशी

🍁 पितृपक्ष

भाद्रपद म्हणजे भक्ती, कुटुंबभाव आणि परंपरेचा मंगल सोहळा.

“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घराघरांत आनंदाचे तरंग दाटून येतात.

अश्विन : शक्ती आणि प्रकाशाचा उत्सव

🔅 घटस्थापना

🔅 नवरात्रोत्सव

🔅 विजयादशमी

🔅 कोजागिरी पौर्णिमा

🔅 वसूबारस

🔅 दीपावली

या महिन्यात संपूर्ण भारत प्रकाश, उत्साह आणि मंगलमयतेने उजळून निघतो.

अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर धर्माचा विजय साजरा केला जातो.

कार्तिक : भक्तीचा परमोच्च क्षण

कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — चातुर्मासाची सांगता.

वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीचा महासागर दुमदुमतो.

असे मानले जाते की आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू या दिवशी जागृत होतात आणि पुन्हा विश्वकारभार सांभाळण्यासाठी सज्ज होतात.

चातुर्मास : भारतीय जीवनसंस्कृतीचा आत्मा

चातुर्मास म्हणजे —

✨ भक्तीचा महोत्सव

✨ ऋतुचक्राचा उत्सव

✨ निसर्गाशी संवाद

✨ कुटुंबसंस्कृतीचा उत्सव

✨ कला, संगीत आणि परंपरेची मेजवानी

या काळात प्रत्येक घर उत्सवांनी, पूजा-अर्चेने, भजन-कीर्तनांनी आणि स्नेहमेळाव्यांनी गजबजून जाते.

समारोप : परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे

हजारो वर्षांच्या चिंतनातून, अनुभवातून आणि विज्ञाननिष्ठ जीवनदृष्टीतून घडलेल्या भारतीय परंपरा या केवळ धार्मिक कर्मकांड नाहीत.

त्या आहेत —

☘️ निसर्गसंवर्धनाची शिकवण

☘️ आरोग्यसंरक्षणाची जीवनपद्धती

☘️ सामाजिक ऐक्याची वीण

☘️ आत्मिक उन्नतीचा मार्ग

म्हणूनच या समृद्ध, बहुरंगी आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण परंपरांची टिंगल किंवा कुचेष्टा करणे हे पुरोगामित्वाचे नव्हे, तर सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण ठरते.

भारतीय संस्कृती ही केवळ इतिहास नाही;

ती अखंड वाहणारी जीवनगंगा आहे —

ऋतूंप्रमाणे बदलणारी, पण मुळात शाश्वत असलेली!

🌼 मंगल शुभेच्छा 🌼

अधिकमास आणि चातुर्मासाचा हा चिरंतन उत्सव आपल्या जीवनात भक्ती, आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संकट हीच संधी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “संकट हीच संधी☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी जीवनात संकटे, आजार आणि अनपेक्षित घटना या अपरिहार्य आहेत; परंतु त्या क्षणी माणसाची मानसिक प्रतिक्रिया त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. एखादे संकट कोसळले किंवा गंभीर आजार झाला की “मलाच का? हे माझ्याच नशीबी आहे का आले?” असे प्रश्न पडणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होय… पण ही अंतर्मुखतेऐवजी आत्मदयेची छटा असलेली प्रतिक्रिया असते. या प्रश्नामागे अन्यायाची भावना आणि स्वतःला परिस्थितीचा बळी समजण्याची प्रवृत्ती दडलेली असते. ही मानसिकता दीर्घकाळ टिकली तर ती निराशावाद, हताशपणा आणि निष्क्रियता वाढवू शकते, कारण यातून समस्या सोडवण्याऐवजी परिस्थितीला दोष देण्याची सवय निर्माण होते. अशा वेळी व्यक्ती आपली उर्जा प्रश्न विचारण्यात खर्च करते, पण उत्तर शोधण्याचा प्रयत्न कमी पडते.

याउलट, “हे का घडले?” किंवा “यातून मी काय शिकू शकतो?” असा विचार हा अधिक रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो. या भूमिकेतून व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीकडे, निर्णयांकडे आणि सवयींकडे वस्तुनिष्ठपणे पाहू लागते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाल्यास त्यामागील कारणे—जसे की आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, किंवा वैद्यकीय दुर्लक्ष—यांचा विचार केल्यास भविष्यात त्यापासून बचाव करण्याचे मार्ग सापडू शकतात. संकटांच्या बाबतीतही तसेच आहे; चुकीचे निर्णय, अपुरी तयारी, किंवा बाह्य परिस्थिती यांचे विश्लेषण केल्यास पुढील वेळी अधिक सजगपणे वागता येते. ही वृत्ती केवळ समस्या समजून घेण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्तीला कृतीशील बनवते.

सामाजिक पातळीवरही ही दोन मानसिकता भिन्न परिणाम घडवतात. “माझ्याच वाट्याला का?” हा दृष्टिकोन व्यक्तीला स्वतःपुरता मर्यादित ठेवतो, तर कारणमीमांसा करणारी वृत्ती व्यापक संदर्भ समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, एखाद्या आजाराचा प्रसार झाला तर केवळ वैयक्तिक दु:खावर थांबण्याऐवजी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, स्वच्छता, जागरूकता यांसारख्या घटकांचा विचार केल्यास सामूहिक उपाययोजना शक्य होतात. त्यामुळे सकारात्मक वृत्ती ही केवळ वैयक्तिक विकासापुरती नसून सामाजिक प्रगतीसाठीही महत्त्वाची ठरते. याचा अर्थ असा नाही की “माझ्याच बाबतीत का?” हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे; तो मानवी भावनांचा नैसर्गिक भाग आहे. परंतु त्या प्रश्नात अडकून न राहता, पुढे जाऊन कारणांचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. संकटांना टाळता येत नाही, पण त्यातून शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी नक्कीच असते. त्यामुळे निराशावादी आत्मदयेपेक्षा विवेकाधिष्ठित, कृतीशील आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे हेच खऱ्या अर्थाने मानसिक परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीतून मार्ग काढताना अथक परिश्रम करण्याची जिद्द निर्माण होते. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares