मराठी साहित्य – विविधा ☆ “नवीन वर्षाला सामोरे जाताना…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “नवीन वर्षाला सामोरे जाताना…☆ श्री जगदीश काबरे ☆

दर वर्षाप्रमाणे हे वर्ष संपत आले आहे आणि नवीन वर्षाचे द्वार किलकिले होत आहे, ही जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी मनात एक अनामिक हेलकावे खाणारी भावना निर्माण होते. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी जाग्या होतात, गेल्या बारा महिन्यांत आपण काय मिळवले, काय गमावले, कोणत्या गोष्टी साध्य झाल्या, कोणत्या राहिल्या, कोणावर रागावलो, कोणावर प्रेम केले, कोणते नातेसंबंध घट्ट झाले आणि कोणत्या नात्यांना तडे गेले, या सगळ्यांचे एक अदृश्य लेखांकन सुरू होते. मन एक विचित्र लेखापाल आहे. ते फक्त आर्थिक व्यवहारांचेच नाही तर भावनिक, नैतिक आणि आत्मिक व्यवहारांचेही हिशेब ठेवते. वर्ष संपतानाच ते ही सारी खाती उघडते आणि आपल्यासमोर ठेवते. मनाने मांडलेला हा लेखाजोखा पाहून धडाक्यात आपण कधी लाजतो, कधी हसतो, कधी खंतावतो, कधी पस्तावतो आणि कधी अभिमानाने छाती फुगावतोही. आत्मपरीक्षण हा एकमेव असा आरसा आहे जो कधी खोटं बोलत नाही; तो कितीही कठोर वाटला तरी त्यात आपली खरी प्रतिमा दिसते आणि हे आत्मपरीक्षणच नवीन वर्षाच्या स्वागताची खरी सुरुवात ठरते. नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे नाही; तर ते मनाला नवा अनुभव घेण्यासाठी, नव्या वाटांचे आमंत्रण स्वीकारण्यासाठी तयार करणारी घटना आहे. बदलाचा स्वीकार करत पुन्हा एकदा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा क्षण आहे.

दर वर्षाच्या अखेरीस जेव्हा कॅलेंडरची शेवटची पानं वाऱ्याने हलू लागतात, तेव्हा मनात एक अतिशय विचित्र पण गोडसं अस्वस्थपणं जन्माला येतं. वर्ष संपतंय, वेळ सरतोय, आपण कुठे येऊन पोहोचलो, आपण काय झालो, आपण कसे बदललो या सगळ्या प्रश्नांची एक शांत, पण अत्यंत खोल लाट मनावर आदळते. संपूर्ण वर्षभर आपण जगतो, धावतो, पडतो, उठतो, स्वप्नं पाहतो, जपत राहतो, चुकत राहतो, शिकत राहतो. पण या अखेरीच्या काही दिवसांत वेळ जणू मंदावतो आणि आपल्याला थांबवून म्हणतो, “स्वतःकडे एकदा नीट पाहिलंस का? ” वर्षभराच्या धांदलीत आपण स्वतःलादेखील भेटत नाही; पण वर्षाच्या या टप्प्यावर मात्र आपल्या अंतरंगाची दारं स्वतःच उघडू लागतात. आत्मपरीक्षण हा शब्द फक्त पुस्तकी नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाचे गाठोडे आहे. या क्षणी आपण नुसते विचार करत नाही; आपण स्वतःला पुन्हा एकदा नव्याने अनुभवत असतो. आपण काय होतो, आपल्याला काय व्हायचं होतं आणि काय झालो, काय व्हायचं आहे, या तीनही काळांचा संगम जणू एखाद्या पवित्र क्षणासारखा सामोरा येतो. हा क्षण हलका नसतो; तो आपल्या अस्तित्वाला खडसावणारा, पण त्याचबरोबर हळुवार स्पर्श करणारा असतो. हा क्षण सांगतो, “तू जगलास, पण आता जगण्याचा अर्थही समजून घे. “

निसर्गाच्या काळाचा प्रवासही याच वेळी आपल्या मनाला अधिक जाणवतो. सूर्याच्या भोवती पृथ्वीचे ३६५ दिवसांचे परिभ्रमण हे फक्त खगोलशास्त्राचे गणित नाही; ते आपल्या जीवनाशी घट्ट जोडलेले एक अविचल सत्य आहे. पृथ्वी एका स्थानी थांबत नाही, मग आपण का थांबावे? पृथ्वीचा प्रवास आपल्याला सांगतो की जीवन प्रवाही असलं पाहिजे… स्थिर नाही, धडपडणारं असलं पाहिजे… गोठलेलं नाही. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते, तशी आपणही दिवसभर आपल्या भावनांभोवती, जबाबदाऱ्यांभोवती, नात्यांभोवती फिरत असतो. पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते, तशी आपल्या आकांक्षा, स्वप्नं, उद्दिष्टं याभोवती आपण परिभ्रमण करत असतो. दिवस-रात्र तयार होणं म्हणजेच आपल्या भावना उचंबळणं आणि पुन्हा शांत होणं. ऋतूंचे फेरबदल हे मनाच्या बदलत्या अवस्थांचेच प्रतिबिंब आहेत. कधी आपल्यात वसंत फुलतो, नवी उमेद उगवते. कधी उन्हाळा तापतो, अडचणी वाढतात. कधी पावसाळा भावनांना भिजवतो, मन ओलाव्यात भिजून शांत होतं आणि कधी हिवाळा जणू मनाला गारठवतो, जिथे आपण स्वतःला झाकून घेतो, शांत राहतो, थंड विचारांतून नवे निर्णय जन्माला घालतो. बदलत्या ऋतूंमध्ये जगणं म्हणजे बदल स्वीकारणं. कालगणना म्हणजे निसर्गाने दिलेली वेळ मोजण्याची पद्धत नव्हे, तर बदलांना समजून घेण्याची कला आहे.

ही कालगणना आदिमानवाने निरीक्षणातून निर्माण केली. सूर्य कुठे उगवतो, कुठे मावळतो, चांदण्यांच्या हालचालींमध्ये काय लय आहे, पावसाचे ढग का येतात, समुद्रात भरती-ओहोटी कोणत्या क्षणी वाढते, या सगळ्या निसर्ग एक नैसर्गिक घटनांचे निरीक्षण करून काळगणनेचा पाया घातला गेला. ही काळाची शिस्त होती आणि माणसाने त्या शिस्तीत स्वतःच्या आयुष्याला वळण लावले. पृथ्वी स्थिर नाही, म्हणून वेळही स्थिर नाही. वेळ वाहते, तसंच जीवनही वाहतं. या वाहण्याच्या प्रवाहात वर्ष संपतं म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या महासागरात पुन्हा एकदा डुंबण्याची संधी मिळते.

या सर्व नैसर्गिक समन्वयाच्या पार्श्वभूमीवर माणसाने संकल्पांची निर्मिती केली. वर्ष संपतं म्हणून काही तरी बदल करायचा, स्वतःला सुधरायचं, काही हवं ते साध्य करायचं ही भावना माणसामध्ये हजारो वर्षांपासून आहे. आजही नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे जणू कोऱ्या पानावर लिहिण्याची संधी. पण हे पान नवीन असलं तरी हातातील अक्षरं तीच असतात. म्हणूनच जास्तीत जास्त संकल्प काही दिवसांत विरतात. संकल्प करण्याचं काम सोपं असतं, पण संकल्प टिकवणं कठीण असतं. कारण संकल्प हे क्षणिक प्रेरणेचे फलित असतात, तर त्यांना टिकवणारी गोष्ट म्हणजे शिस्त. प्रेरणा नाजूक असते; ती येते आणि जाते. शिस्त मात्र कठोर असते; ती येत नाही, ती निर्माण करावी लागते. जणू लहानसा धागा असतो दिसायला बारीक, पण त्याची पकड मजबूत असते. शिस्त म्हणजे स्वतःला सतत म्हणत राहणं. “मी करू शकतो… आणि मला हे करायचंच आहे. ” याचे स्वतःला सतत स्मरण करून देणं. आजच्या धावपळीत, ताणतणावात, मोबाईलच्या व्यसनात, अनियमित झोपेत, गोंधळलेल्या भावनांमध्ये शिस्त राखणं हेच कठीण होतं. म्हणूनच संकल्प टिकत नाहीत. आपले संकल्प हे मोसमी पावसासारखे सातत्य ठेवत नाहीत. ते सातत्याने पडणाऱ्या हलक्या रिमझिम पावसासारखे असले पाहिजेत. ज्यातून हळूहळू सवयी उगवतात, आणि सवयींमधून बदल फुलतो.

आत्मपरीक्षण म्हणजे आपल्यातल्या सत्याचा आपणच सामना करणे. ते आपल्याला सांगतं की, आपण कोठे चुकीचे वागलो, कुठे रागाने उत्तर दिलं, कुठे अहंकाराने नातं दुखावलं, कुठे आळसाने संधी गमावली, कुठे जिद्दीने यश मिळवलं, कुठे प्रेमाने नातं जपलं. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणे केलेला संवाद. हा संवाद कधी कधी वेदनादायक असतो; पण तितकाच मनाला शुद्ध करणाराही असतो. नदीत स्नान केल्यावर जसा ताजेपणा येतो, तसाच आत्मपरीक्षणानंतर विचार शुद्ध होतो. मन जड असलं तरी हलकं वाटू लागतं. आत्मपरीक्षण करताना आपण आपला स्वभाव, आपली चुकांची पद्धत, आपल्यातील कमकुवत बाजू, तसेच आपल्या चांगल्या गुणांचीही जाण ठेवतो. आपण कोणाला दुखावले असेल तर ती खंत आपल्याला जाणवते. कुणाचा उपकार राहिला असेल तर त्याची जाणीव होते. जे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही त्याची हुरहूर राहते पण पुन्हा प्रयत्न करण्याची उमेदही निर्माण होते. ज्या क्षणी आपण स्वतःला स्वीकारतो, त्या क्षणीच नवीन वर्षाची पहिली खरी सुरुवात होते.

खरेतर नवीन वर्षच नाही, तर प्रत्येक दिवस हा नवा असतो. पण वर्षाचा पहिला दिवस हा नवेपणाचे प्रतीक आहे. कारण संपूर्ण जग त्या दिवशी स्वतःला नव्याने परिभाषित करत असतं. जगण्याचा अर्थ पुन्हा शोधायची ही संधी आहे. या संधीचा स्वीकार करताना मनात एक स्वच्छ, निर्मळ आशा जन्माला येते. आशा म्हणजे जगण्यासाठी नव्या दमानं चालण्यासाठी प्रोत्साहित करणारं कारण! आशा नसती तर माणूस पडल्यावर उठला नसता. आशा म्हणजे मनाचा सूर्य. अंधाऱ्या दिवसांत हीच आशा आपल्याला उजेड देते. नवीन वर्ष म्हणजे या आशेचा प्रकाश अधिक तेजोमय होण्याचा क्षण!

या वर्षात आपण अनेक गोष्टी अनुभवल्या… काही चांगल्या, काही वाईट, तर काही कठीण, काही अप्रिय आणि काही सुंदरही. या सर्व अनुभवांकडे आपण कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टींचा आनंद घेणं सोपं असतं; पण अप्रिय गोष्टींनी दिलेल्या भानामुळे त्यांचं आभार मानणं हे आत्मपरीक्षणानं दिलेलं धैर्य असतं. दुखापत करणाऱ्या अनुभवांमध्येही ज्ञान असतं. अपयश आपल्याला शिकवतं, फसवणूक आपल्याला सावध करते, तुटलेली नाती आपल्याला मूल्यांची जाणीव करून देतात. या वर्षात कोणीतरी आपल्याला साथ दिली असेल, त्यांचे आभार मानणंही आत्मपरीक्षणाचाच भाग आहे. कधी कधी “धन्यवाद” आणि “माफ करा” या दोन शब्दांत शहाणपण दडलं असतं.

निसर्गाकडून आपण अजून एक मोठा धडा शिकू शकतो. निसर्ग कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी धरून ठेवत नाही. वसंत फुलतो, पण तोही जातो. पावसाळा येतो, पण थांबतो. थंडी कडक होते, पण हळूहळू हवीहवीशी वाटायला लागते तेवढ्यात तीही जाते. आपल्यालादेखील हेच शिकायचं आहे की, राग धरून ठेवायचा नाही, चिडचिड जपून ठेवायची नाही, दु:ख कायम मनात ठेवून कुढायचं नाही. भावना या ऋतूंप्रमाणे येऊ द्यायच्या, पण जड होऊ द्यायच्या नाहीत. नवीन वर्ष म्हणजे जुन्या भावनांचं ओझं हलकं करून पुढे सरकणं! जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही वर्ष बदलताना बदलते. गताकालच्या अनुभवामुळे आपण थोडे अधिक सहनशील होतो, थोडे अधिक समंजस होतो, थोडे अधिक शांत विचाराचे होतो. आपल्याला समजायला लागतं की, माणसं परिपूर्ण नसतात; आपणही नाही. त्यामुळे चुकाही होतात, पण सुधारण्याची इच्छा असेल तर काहीही शक्य आहे. मनात सकारात्मकतेचा ओलावा आला की, नातीही हिरवीगार होऊ लागतात. राग कमी होतो, शब्द सौम्य होतात, हसू सहज येऊ लागतं, आणि मनात शांततेचा झरा वाहू लागतो. ही शांतता म्हणजे नवीन वर्षाची सर्वात मोठी देणगी. यात निसर्गाची शिस्त आपल्याला दररोज शिकवत असते. सूर्योदय एका निश्चित वेळी होतो, सूर्यास्तही निश्चित वेळेला. चंद्राची कला निश्चित क्रमाने बदलते. वृक्ष ठरावीक ऋतूत पालवी धरतात. ही शिस्त पाळणं हा त्याचा स्वभावच आहे. माणसानेही हीच शिस्त रोजच्या जीवनात आणली तर तो केवळ यशस्वीच नाही तर अधिक संतुलित, समाधानी आणि शांत होईल. आरोग्य, आहार, वेळेचं नियोजन, मनाची स्थिरता, नात्यांची काळजी, कामातील सातत्य, ही सगळी शिस्त आपल्याला अंतर्बाह्य मजबूत करते.

या पार्श्वभूमीवर आपण नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण मनात एक स्वच्छ, निर्मळ आणि प्रेमळ भावना ठेवू शकतो. स्वतःला माफ करणं, इतरांना माफ करणं, भूतकाळाला स्वच्छ मनानं स्वीकारणं, भविष्याला घाबरून न जाता त्याला धीराने आणि धैर्यानेही सामोरं जाणं, यातच नवीन वर्षाचं खरं सौंदर्य दडलं आहे. आपण निसर्गाचा भाग आहोत, त्याच्यासारखं आपल्यालाही वाढता आलं पाहिजे, फुलता आलं पाहिजे. जगण्यासाठी आशा हवी, पण आशेला साथ देण्यासाठी आत्मविश्वास हवा, आत्मविश्वासाला दिशा देण्यासाठी संकल्प हवा आणि संकल्पाला टिकवण्यासाठी शिस्त हवी. या चारही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करणे होय.

या सर्व भावनांनी नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, शांती, आरोग्य, आनंद, प्रगती आणि समाधान घेऊन येवो. तुमच्या आयुष्यात निरंतर नवे विचार उगवोत, नवी स्वप्नं फुलोत, नवी ध्येयं ठरवून त्यांना पूर्ण करण्याची जिद्दही वाढत राहो. पृथ्वीप्रमाणे गतिमानता, सूर्याप्रमाणे तेज, चंद्राप्रमाणे शांती आणि ऋतूंसारखी बदल स्वीकारण्याची वृत्ती तुमच्या प्रत्येक दिवसात दुग्गोचार होत राहो. तुमच्या मनातील संकल्प केवळ शब्द राहू नयेत, तर कृती बनावेत; कृती सवयींत रुपांतरीत व्हाव्यात आणि त्या सवयीनी तुमचे जीवन अधिक सुंदर व्हावे. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात उजेड, उमेद, उर्जा आणि सौंदर्य घेऊन येवो—हीच मनःपूर्वक सदिच्छा.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विवाह : ‘संस्कार’ की इव्हेंट मॅनेजमेंट? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

विवाह : ‘संस्कार’ की इव्हेंट मॅनेजमेंट? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

एका लग्नसमारंभाला उपस्थित राहायचं म्हणून गेलो होतो. मोठया घरचं लग्न होतं. वधू वर उच्चशिक्षित होते. समाजातील उच्चभ्रू मंडळी कार्यक्रमासाठी हजर होती. होमाचा विधी सुरु होता. वधुवर होमाला प्रदक्षिणा करत होते. गुरुजींचा मंत्रघोष सुरु होता. दोन फोटोग्राफर एक फोटो काढणारा आणि दुसरा व्हिडीओ शूटिंग करणारा यांची धावपळ सुरु होती. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा लखलखाट चालू होता. होमाचा विधी आपल्याला कॅमेऱ्यात कशा प्रकारे बंदिस्त करता येईल याची धडपड चालली होती. त्यामुळे मध्येच गुरुजींना थांबावे लागत होते. त्याबद्दलची नाराजी गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. पण सगळ्यांपुढे गुरुजी अगतिक झालेले दिसत होते.

फोटोग्राफर्स वधूवरांना विविध सूचना देत होते. ” थोडं उजवीकडे बघा. मान सरळ आणि समोर. थोडं हसा. इ. ” वधूवरांना देखील त्या विधीपेक्षा त्या चाललेल्या चित्रीकरणात जास्त आनंद दिसत होता. माझ्या मनात आलं की या सगळ्या आधुनिकीकरणाच्या गडबडीत आपण आपल्या चांगल्या विधीपरंपरांची वाट लावली, नाही का? आपल्या हिंदू संस्कृतीत ज्यांना सोळा संस्कार म्हटलं जातं त्यातील एक संस्कार म्हणजे विवाह. तो एक सुंदर सोहळा आहे. सोहळा म्हटलं की कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येणं, आनंदाने त्यात सहभाग घेणं या सगळ्या गोष्टी आल्या. हा भावनांचा उत्सव असतो. अशा सोहळ्यात पूर्वी गाणी, गप्पा गोष्टी, जेवताना म्हणायचे श्लोक, नाव घेणे यासारख्या प्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढत होती. मुहूर्ताचे गहू दळले जात. घरातील गृहिणींची त्यासाठी होणारी लगबग, त्यातील पारंपारिक गाणी या सगळ्या गोष्टी कार्यक्रमाला एक वेगळा रंग आणत. पण आता हे सगळे प्रकार जणू कालबाह्य झाल्यासारखे दिसतात. त्यासाठी कोणाला वेळही नाही आणि त्यांची माहितीही नसते.

विवाह सोहळा स्मरणीय जरूर झाला पाहिजे. त्यासाठी उत्तम नियोजन जरूर झाले पाहिजे. त्यातील आठवणी देखील जपून ठेवल्याच पाहिजेत यात दुमत नाही. पण कुठेतरी लग्नविधी आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ घालता आला पाहिजे. पण हल्ली विधी कमी आणि उपचार जास्त असा प्रकार होत चालला आहे.

लग्नसोहळा असो की अन्य कोणताही कार्यक्रम, हल्ली त्याला दिखाऊपणाचे स्वरूप जास्त येऊ लागले आहे. या सगळ्या गोष्टी सोहळा कमी आणि इव्हेंट जास्त असा प्रकार होतो आहे. इव्हेंट मॅनेजमेंट या नावाचा स्वतंत्र प्रकारच हल्ली अस्तित्वात आला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे लग्न समारंभासाठी खर्चही वाढला आहे. मेहंदी, वधूवरांचे आणि अन्य जवळच्या नातेवाईकांचे मेकअप, थीम सॉंग्स या सगळ्या गोष्टींवर अवाढव्य खर्च होतो आहे.

पूर्वी घरातील लग्नसमारंभ वा अन्य कोणताही कार्यक्रम असला तर घरातील किंवा नात्यातील लोक एकत्र येऊन त्या कार्यक्रमाची जबाबदारी वाटून घेत असत. हल्ली कोणालाच वेळ नसतो. त्यामुळे एका दृष्टीने इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या गोष्टी या काळाची गरज आहेतच. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. सोहळा अधिक आकर्षक आणि देखणा होतो. इंग्रजी शब्द वापरायचा तर ‘ कॅची ‘ होतो. पण त्यातील नैसर्गिकपणा, गाभा कुठेतरी हरवून जातो.

अनेक नवीन गोष्टी या लग्नसोहळ्यासारख्या पारंपरिक कार्यक्रमात शिरल्या आहेत. त्या चांगल्या की वाईट हे जाणकारांनी ठरवावे. अशा गोष्टींमध्ये प्री वेडिंग शूट, वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये फोटो काढणे, लग्नाच्या आधी वधूवरांनी एकत्र येऊन डान्स करणे, ते डान्स बसवण्यासाठी आधी सराव करणे, त्यासाठी अगदी कोरिओग्राफरची मदत घेणे या गोष्टी होत असतात. एका लग्न समारंभात तर एका बाजूला विधी सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या पडद्यावर वधू-वरांचे प्री वेडिंग शूट दाखवण्यात येत होते. जमलेली सगळी मंडळी हे प्री वेडिंग शूट पाहण्यात मग्न होती. लग्नाचे जे विधी सुरू होते, त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. फक्त वधू वर, त्यांचे आई-वडील आणि गुरुजी एवढेच त्या सोहळ्यात मग्न होते. मला हा सगळा प्रकार विचित्र वाटला.

वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींच्या निमित्ताने वधुवर लग्नापूर्वीच अनेकदा एकत्र येत असतात. त्यातून कदाचित एकमेकांना अधिक जाणून घेणे, आवडीनिवडी समजून घेणे यासारख्या गोष्टींनाही मदत होत असावी. पण लग्नानंतर एकमेकांच्या सहवासाची जी उत्सुकता असते ती नक्कीच हरवत असावी. कसा असेल माझा जीवनसाथी? तो मला समजून घेईल का? अशा अनेक गोष्टींची उत्सुकता असते. मधुचंद्राचा रोमांचक कालावधी असतो परंतु या सगळ्या गोष्टी या आधुनिकतेच्या गडबडीत हरवत असाव्यात.

हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले एक छान गाणे आहे.

लाजून हासणे अन् हासून ते पहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

किती सुंदर ओळी! या गोष्टी जेव्हा दोघे अनोळखी असतात आणि एकमेकांच्या सहवासासाठी उत्सुक असतात तेव्हाच त्यातील गोडी अधिक असेल हे सुज्ञास सांगणे न लगे.

जे जे नवीन आणि आधुनिक तेथे सगळेच वाईट आहे असे नाही काळानुसार काही गोष्टी बदलायला हव्यातच आपणही जुन्या गोष्टी टाकून देऊन नवीन गोष्टींचा स्वीकार करायला हवा परंतु जुन्या गोष्टी सगळ्याच टाकाऊ नसतात किंवा सगळ्याच नवीन गोष्टी चांगल्या असतात असेही नाही म्हणून दोघांचा सुवर्णांमध्ये साधता आला पाहिजे हा जेव्हा होईल तेव्हा आपले जीवन अधिक, आनंदी, सुखी आणि समाधानी होईल. आपल्या मुलांच्या लग्नात खर्चाचे पारडे जड असावे की संस्कारांचा भाग महत्वाचा असावा हे संबंधितांनी विचारपूर्वक ठरवणे आवश्यक आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ते तीस सेकंद- – -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ ते तीस सेकंद — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

रोज व्यायाम करताना योग गुरु यांच्या तोंडून काही शब्द वारंवार ऐकायला मिळतात. त्यांचे ऐकल्याने फायदे होतात हेही अनुभवाने लक्षात आले आहे. आणि ते वेळोवेळी त्या बद्दल माहिती सांगत असतात. तसेच एक शब्द कायम त्यांच्या तोंडी असतो. तो म्हणजे तीस सेकंद. “थर्टी सेकंड होल्ड करेंगे”

योगासनांमध्ये कोणत्याही स्थितीत ३० सेकंद स्थिर राहण्याला विशेष महत्त्व आहे. सुरुवातीला आपण फक्त हालचाल करतो, पण जेव्हा आपण त्या स्थितीत थांबतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचे फायदे शरीराला मिळायला सुरुवात होते.

​३० सेकंद स्थिर राहण्याचे प्रमुख फायदे

​१. स्नायूंची लवचिकता वाढते (Flexibility)

​जेव्हा आपण ३० सेकंद एखादे आसन धरून ठेवतो, तेव्हा स्नायूंना ताणले जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे स्नायूंमधील कडकपणा कमी होऊन शरीर लवचिक बनते.

​२. रक्ताभिसरण सुधारते

​विशिष्ट स्थितीत थांबल्यामुळे शरीराच्या ठराविक भागावर दाब येतो किंवा तिथे रक्तपुरवठा अधिक होतो.

३० सेकंदांच्या काळानंतर जेव्हा आपण आसन सोडतो, तेव्हा त्या भागात ताजी आणि ऑक्सिजनयुक्त रक्त प्रवाह वाढतो.

३. मानसिक स्थिरता आणि संयम प्राप्त होतो.

​योगासन म्हणजे केवळ शारीरिक कसरत नाही. एकाच स्थितीत ३० सेकंद स्थिर राहिल्याने मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि चंचलता कमी होते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

​४. स्नायूंची ताकद

​स्वतःच्या शरीराचे वजन एका विशिष्ट स्थितीत ३० सेकंद पेलल्यामुळे स्नायूंची सहनशक्ती (Endurance) आणि ताकद वाढते.

५. श्वसनावर नियंत्रण

​आसनात स्थिर असताना संथ आणि दीर्घ श्वसन करणे सोपे जाते. ३० सेकंदांच्या या काळात फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचतो.

​तीस सेकंद ही खरी सुरुवात असते. ती सवय लागली की पुढे वेळ वाढवता येते. हे तीस सेकंद फक्त व्यायामासाठी महत्वाचे असतातच पण इतर बऱ्याच ठिकाणी महत्वाचे असतात. जसे….

​१. जीव वाचवण्यासाठी (Life-Saving Moments)

​अनेकदा अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत फक्त ३० सेकंदांचा उशीर किंवा तत्परता जीव वाचवू शकते.

​रस्ता ओलांडताना घेतलेला ३० सेकंदांचा निर्णय.

​हृदयविकाराचा झटका  वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत मिळणारी तातडीची मदत.

२. संधीचे सोने करण्यासाठी

​व्यावसायिक जगात ‘एलेव्हेटर पिच’ संकल्पना प्रसिद्ध आहे.  एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा गुंतवणूकदाराला भेटण्याची संधी मिळाली, तर  विचार मांडण्यासाठी फक्त ३० सेकंद असतात. हे ३० सेकंद  भविष्य बदलू शकतात.

​३. पहिला प्रभाव (First Impression)

​मानसशास्त्रांनुसार, आपण जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याबद्दलचे मत पहिल्या ३० सेकंदांतच बनवते.  पेहराव, बोलण्याची पद्धत आणि आत्मविश्वास या ३० सेकंदांत समोरच्यावर छाप पाडतो.

​४. खेळातील महत्त्व

​धावण्याच्या शर्यतीत किंवा फुटबॉल, कबड्डी सारख्या खेळांत शेवटचे ३० सेकंद पूर्ण खेळाचा निकाल बदलू शकतात. हारलेली टीम या काळात जिंकू शकते किंवा जिंकणारी टीम पराभूत होऊ शकते.

​५. डिजिटल युग आणि लक्ष (Attention Span)

​आजच्या सोशल मीडियाच्या काळात (Reels, Shorts) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त ३० सेकंद मिळतात. जर आशय पहिल्या ३० सेकंदांत आवडला नाही, तर लोक तो सोडून देतात.

ध्यानासाठी ३० सेकंद खूप लहान वाटू शकतात. पण मनाला शांत करण्यासाठी, भरकटलेल्या  मनाला वर्तमानात आणण्यासाठी ३० सेकंद अत्यंत महत्वाचे असतात.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात ३० सेकंदांचे ध्यान ‘माइंडफुलनेस ब्रेक’ म्हणून काम करते.

ध्यानात तीस सेकंदांचे महत्त्व खालीलप्रमाणे सांगता येईल:

​१. त्वरित तणावमुक्ती मिळते.

​जेव्हा आपण खूप कामात असतो किंवा चिंतेत असतो, तेव्हा फक्त ३० सेकंद डोळे मिटून दीर्घ श्वास घेतल्यास शरीरातील ‘कोर्टिसोल’ (Stress Hormone) पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे मज्जासंस्था शांत होते.

​२. मेंदूला ‘रिसेट’ करण्याची संधी मिळते.

​संगणक हँग झाल्यावर जसे आपण तो रिस्टार्ट करतो, तसेच ३० सेकंदांचे ध्यान मनासाठी ‘Reset Button’ सारखे काम करते. हे मनातील विचारांचा कोलाहल थांबवून  नवीन ऊर्जेने काम करण्यास तयार करते.

​३. एकाग्रता वाढते.

​एका कामावरून दुसऱ्या कामाकडे वळताना जर ३० सेकंद शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केले, तर आपली एकाग्रता वाढते. यामुळे कामात चुका होण्याचे प्रमाण कमी होते.

​४. भावनिक स्थिरता

​एखाद्या गोष्टीचा राग आला असेल किंवा खूप अस्वस्थ वाटत असेल, तर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी ३० सेकंद थांबून ध्यान केल्याने आपण अधिक समंजसपणे वागू शकतो. यालाच ‘The 30-Second Rule’ असेही म्हणतात.

​५. शिस्त आणि सवय

​ज्यांना १०-२० मिनिटे ध्यान करणे कठीण वाटते, त्यांच्यासाठी ३० सेकंद ही एक उत्तम सुरुवात आहे. ही लहान सुरुवातच पुढे जाऊन मोठ्या ध्यानाच्या सवयीमध्ये रूपांतरित होते.

​३० सेकंदांचे ध्यान कसे करावे?

आपण जे काही करत आहोत ते क्षणभर थांबवावे.

​श्वास घ्यावा, डोळे मिटावे, आणि एक खोल श्वास घ्यावा. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या हालचालीवर लक्ष द्यावे.

शरीरात कुठे ताण जाणवत असेल तर तो सैल सोडावा.

​असे ३० सेकंद करावे. मन बरेच शांत झालेले असते.  डोळे उघडावे आणि शांत मनाने आपल्या कामाला सुरुवात करावी.

​”ध्यान म्हणजे तासनतास बसणे नव्हे, तर प्रत्येक क्षणी जागरूक असणे होय.”

​आपण तासनतास वाया घालवतो, पण जेव्हा आपण या ३० सेकंदांची किंमत समजून घेतो, तेव्हा आपण वेळेचे योग्य नियोजन करायला शिकतो. “छोटी छोटी पावलेच मोठा प्रवास घडवतात,” तसेच हे छोटे छोटे सेकंदच आपले आयुष्य घडवतात. असे हे महत्वाचे तीस सेकंद, “वेळ कोणासाठी थांबत नाही ” आणि छोट्या काळाचा सदुपयोग कसा करावा हे शिकवतात.

याचे महत्व आपल्यापूर्वीच्या अनुभवी लोकांना नक्कीच समजले असणार. म्हणून ते आजही काही कृती करायला सांगतात. जसे – ताण, चिडचिड झाल्यावर सांगतात सावकाश पाणी पी, अंक मोज, उलटे अंक मोज, शांत बसा, तीन दीर्घ श्वास घ्या, भरकटलेले मन जागेवर आणण्यासाठी हलकेच थोपटणे, चुटकी वाजवणे या सारख्या तीस सेकंदाच्या महत्वाच्या कृती सांगत असतात. अशा अनेक कृती आहेत ज्या तीस सेकंदाचे महत्व सांगतात. आपणही या तीस सेकंदाच्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अजातशत्रू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ अजातशत्रू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कोणत्याही सजिवानं जनलोकात रुजायच, वाढायचं परोपकारी झाड बनायचं अशी खुणगाठ मनाशी बांधली असेल तर त्यान मातीशी आपली फारकत करून कसं चालेल? त्यासाठी त्यांना बीज होऊन मातीवरच पडायचं, मातीतच दडायचं, लपायचं. परिस्थितीच्या‌

बदलत्या हवामानानं योग्यवेळी पाऊस पाडायला हळूहळू दमदार सुरुवात केली की अंकुरायच, मातीतनं काढायचं डोकं वर आणि लुकलुकणा-या डोळ्यान बघायचं जगाकड बाहेरच्या, विशाल विस्तारलेल्या. मग आकाशाकड निरखून बघत ठरवायचं मला आहे तिथपर्यंत पोहोचायचं, तेव्हा कुठं थोडंसं यश पदरी पडू लागतं जगण्याचं. तसं जगणं साधं सोपं सरळ नाही. कारण ते जोडलं गेलंय निसर्गाशी. त्याने घालून दिलेले दंडक तंतोतंत पाळले गेले तुमच्याकडून तरच तुम्हाला आडवायची बिशाद नाही कुणाची. म्हणूनच तुमच्यात मुरलेला तुमचं अवखळ खट्याळपणा तुम्ही कधीच हरवू देवू नका. रोज काहीतरी जगण्याच्या नव्या सोज्वळ खोडी अमलात आणा. आणि जगून दखवा त्याच मार्गानं जगाला. निर्माण करा तुमच्या जगण्याच्या नव्या पाऊल वाटा. हळुवारपणे पण भक्कम पावलं टाकत चालण्यासाठी. मग बघा तुमच्या पदरी काय पडतं ते. पण हे करताना मातीवर तुम्ही रोवलेले तुमचे घट्ट पाय कधीच डळमळीत होऊ देऊ नका. कारण तिथेच तुमच्या पायांना आणि त्यांच्या नव्या चालीना नवे तरतरीत कोंब फुटतील, वाढतील भिडतील आकाशाला. मग त्यांच्यावर विसावतील नव्यान जगायला शिकणारी नवी पाखरं अनुभवी मार्गदर्शनासाठी. हे करताना मतीला माता समजून तिच्याच मांडीवर खेळत रहा. वाढत रहा, तिची करु नका प्रतारणा कधी. येवढ प्रामाणिक पणे केलं तर तुम्ही खरोखरंच जग जिंकाल आणि बनाल धरणीवरचे खरे अजातशत्रू

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आंघोळ ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😂 आंघोळ ! 🤠 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“मी परत बंब पेटवणार नाही, पाणी तापलंय तर पटा पटा अंघोळी उरकून घ्या! नाहीतर दिवाळीची पाहिली अंघोळ गार पाण्याने करावी लागेल, सांगून ठेवत्ये! “

मंडळी साधारण प्रत्येक वर्षी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला, आम्हां लहान मुलांना उठवतांना आमच्या आईचा हा धमकी वजा डायलॉग ठरलेला असायचा. अर्थात त्याचा फारसा परिणाम आम्हां मुलांवर त्याकाळी होत नसे हा भाग निराळा. अशावेळी फार फार तर आम्ही मुलं कूस बदलून पुन्हा डोक्यावर पांघरूण घेवून परत झोपायचा प्रयत्न करायचो इतकंच. मग आम्ही अगदीच उठत नाही म्हटल्यावर, आमच्या अंगावरची पांघरूणं काढून टाकणे, पायावर हळूच चापट्या मारणे अशा दुसऱ्या ऍकशन मोड मध्ये आमच्या आईची गाडी जायची! मग मात्र आमच्यापुढे अंथरुणातून उठण्या शिवाय पर्याय नसायचा.

धारण बहात्तर वर्षांपूर्वी प्रत्येक दिवाळीला थंडी नुसती पडायची नाही तर दातावर दात आपटेपर्यंत चक्क वाजायची. त्यावेळी थंडी पडणं आणि थंडी वाजणं या दोन्ही गोष्टीत शरीराला जाणवण्या इतका फरक नक्कीच होता. हल्लीचा पर्यावरण नामक राक्षस त्या काळापर्यंत तरी अस्तित्वात नव्हता असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे दिवाळीला भल्या पहाटे बंबातल्या गरम गरम पाण्याने अंघोळ करणं ह्या सारखं स्वर्ग सुख नव्हतं!

शिवाय तेंव्हा चाळीत दिवाळीला पाहिला ऍटोम बॉम्ब कोण फोडणार यात चाळीतल्या मुलांत जणू चुरस असायची. मग चाळीतला एखादा अत्रंगी मुलगा, पहाटे तीन साडेतीनलाच “कॅप्टन” नावाचा चौकोनी ऍटोम बॉम्ब फोडून अख्खी चाळ हादरवून लोकांना पहाटे उठवायला जणू हातभारच लावायचा म्हणा नां! पण तेंव्हाचा काळच वेगळा होता, त्यामुळे दिवाळीत पहाटे पहाटे फटाक्याच्या आवाजामुळे आपली झोपमोड झाली, असं चाळीतल्या कुठल्याच चाळकऱ्याला वाटत नसे. आजकाल लोकांना फटाके फोडायला काहीही कारण पुरत. त्या सर्व कारणांची चिकित्सा करायची म्हटली तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल! शिवाय हल्लीच्या पिढीची पहाटच अनेक कारणामुळे सकाळी आठ नऊच्या आधी होत नाही, त्याला आपण मनातल्या मनांत ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणण्याशिवाय दुसरं काय करू शकतो? असो!

मंडळी, जेंव्हा अंघोळीला अंघोळच म्हणत होते, त्या काळाबद्दल मी बोलतोय. “उठा उठा, दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली! ” असं अख्ख्या चाळभर, हातातल्या मोती साबणाने लोकांची दारं वाजवत, त्यांची दिवाळीच्या गुलाबी थंडीत झोपमोड करणारे आजोबा तेंव्हा टीव्हीवर अवतारयचे होते! बरं, अशी झोपमोड करून त्या आजोबांनी घरटी एक एक मोती साबण दिवाळी भेट म्हणून दिला असता, तर एक वेळ मी समजू शकलो असतो हॊ! पण हे आजोबा (पुणेरी असल्यामुळे? ) नंतर तो हातातला साबण पुढच्या दिवाळीच्या पहाटेस, परत त्याच कामासाठी वापरायला बहुतेक स्वतःच्या घरी घेवून जात असावेत. असं काही त्या ऍड मध्ये दाखवलं नव्हतं, पण दर दिवाळीला मोती साबणाची तीच तीच ऍड बघून, मीच आपला माझा स्वतःचा असा एक अंदाज बांधला इतकंच!

दुसरं असं की त्या वेळेस “दिवाळी पहाट” सारख्या कार्यक्रमांचे गल्लो गल्ली पेव फुटलेले नव्हते. त्यामुळे अशा एखाद्या कार्यक्रमाची निवेदिका लाडे लाडे, मान थोडी तिरकी करून मधाळ आवाजात “आपण सारे रसिक अभ्यंग स्नान करून आजच्या कार्यक्रमाची रंगत वाढवायला भल्या पहाटे (तिकीट काढून) आलात त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते! ” असं रंगात येवून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील अंघोळी सारख्या रोजच्या विधिला “अभ्यंग स्नानाचा” दर्जा देऊन त्याला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर नेवून ठेवायचा तो काळच नव्हता. तर उटणं आणि सुवासिक तेल लावून, बंबातल्या गरम गरम पाण्याने अंघोळ करून, नवीन कपडे घालून एकमेकांच्या घरी न बोलावता फराळ करायला जाऊन, दिवाळीचा उत्साह द्विगुणित करायचा तो काळ होता मंडळी! गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी! तर पुन्हा एकदा, असो!

अंघोळ! अगदी अनादी काळापासून स्नान या रोजच्या विधिला अंघोळ असा पर्यायवाचक शब्द कोणाच्या डोक्यातून आला आणि तो कधी पासून आपल्या मराठी भाषेत रूढ अर्थाने वापरायला सुरवात झाली, हा एक (नेहमी प्रमाणे) संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण ज्याने हा पर्यायवाचक शब्द शोधून काढला त्या मागे त्याचं स्वतःच असं एक तर्कशास्त्र असावं, असं मला वाटतं. मी जेंव्हा (व्याकरण दृष्ट्या नाही हे आधीच कबूल करतो) माझ्या पद्धतीने आणि अल्प बुद्धीने अंघोळ या शब्दाची फोड अं(मळ)+घोळ अशी करतो, तेंव्हा अंघोळ हा पर्यायवाचक शब्द एखाद्या नवऱ्याच्या सुपीक डोक्यातूनच आला असण्याची माझ्या डोक्यातली शंका आणखीनच बळावते! कसं ते सांगतो. जगातल्या तमाम नवरे मंडळीना, सुट्टी असो अथवा नसो मुळात अंघोळ करायचाच कंटाळा, खोटं वाटत असेल तर आपल्या धर्मपत्नीला विचारा! शिवाय घोळ या शब्दाचा आणि जगातल्या तमाम बायकांचा अत्यंत जवळचा संबंध, असं जणू प्रत्येक नवऱ्याचे ठाम मत! त्यामुळे “आज काय घोळ घालून ठेवलायस? ” हा आपापल्या बायकोला उद्देशून म्हटलेला डायलॉग दर दोन दिवसाआड प्रत्येक “सुखवस्तु” घरी ऐकायला येतोच येतो. म्हणजे एका अर्थी माझ्या शंकेला पुष्टीच मिळते, असं आपलं माझं प्रांजळ मत. आता आपण म्हणाल प्रांजळ मत म्हणजे? नेहमी तुम्ही ठाम मत असं म्हणता आणि आज एकदम प्रांजळ मत म्हणून स्वतःला मवाळ वर्गातले समजायला लागलात की काय? मंडळी उगाच गैरसमज नको, मी प्रांजळ हा शब्द मुद्दामच वापरला. म्हणजे असं बघा, या शब्दात जो “जळ” हा शब्द दडला आहे त्याचा अर्थ पाणी आणि रोज कुठलाही घोळ न घालता अंघोळ करतांना मी (निदान माझा तरी) संबंध बादलीभर जळाशी येतोच येतो, म्हणून मी आपलं प्रांजळ मत म्हटलं इतकंच!

वाचकहो, आता अंघोळ ह्या शब्दाबद्दल जास्त घोळ न घालता, हा शब्द पहिल्यांदा कुणी, कधी आणि कां वापरला या बाबतीतले माझं मत मांडणं मला यापुढे आणखी घोळात घालेल असं वाटत, म्हणून या संशोधनाचे सर्व हक्क, जे कधीच माझ्याकडे नव्हते, ते कुठलाही भाषा संशोधक घेवू शकतो असं माझं मीच जाहीर करतो आणि आणखी घोळ न घालता पुढील लेखाकडे वळतो.

हमामखाना! हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा. ही मध्यपूर्वेतील संकल्पना आणि वास्तू इस्लामी राज्यकर्त्यांनी आपल्याकडे आणली. तेंव्हा दोन प्रकारचे हमामखाने होते, एक राजघराण्यातील लोकांसाठी आणि दुसरा सामान्य लोकांसाठी. शाळेत असतांना जो थोडाफार इतिहास “कानावरून गेला” त्यातील सनावळीपेक्षा लक्षात राहिलेला हा एक शब्द. अर्थात आपल्या सगळ्यांचेच जन्म इतिहासकालीन नसल्याने, या दोहोतील कुठल्याच हमामखान्यात अंघोळ करण्याचे भाग्य आपल्यापैकी कुणालाच लाभले नाही. पण माझ्या पिढीतील ज्यांचे लहानपण माझ्या सारखे चाळीत गेले, त्या लोकांनी “सार्वजनिक नळावर” आमच्या “त्या हमामखान्यात” जरी अंघोळीला सुगंधी अत्तराचे हौद नव्हते तरी, उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ नळाखाली अंघोळ करायचा आनंद नक्कीच घेतला असेल! कारण मंडळी त्यावेळी घरातल्या नळाला तर सोडाच, पण सार्वजनिक नळाला सुद्धा चौवीसतास पाणी होतं हॊ! आजच्या सारखी पाण्याची “सिन्टेक्स” संस्कृती त्या वेळेस जन्माला यायची होती!

शिवाय हमामखाना हा शब्द तसा लक्षात राहण्याचे दुसरं कारण म्हणजे त्यावेळेस आम्ही रोज अंघोळीसाठी वापरत असलेला “हमाम” साबण. आज इतक्या वर्षांनी सुद्धा हमाम साबण बाजारात तग धरून आहे, पण त्यावेळच्या त्याच्या क्वालिटीची बातच निराळी होती, हे आपण सुद्धा तो तेंव्हा वापरला असेल तर मान्य कराल. आजच्या कलियुगात जरी हमामखाने नामशेष झाले असले तरी, कलियुगातल्या अब्जाधीशांच्या महालासमान हवेल्यातून हमामखान्याला लाजवील अशा प्रकारची न्हाणीघर असतात, हे आपण माझ्याप्रमाणे कुठल्यातरी व्हिडीओत नक्कीच बघितलं असेल!

शेवटी, अंघोळ ही कधी करावी, रोज करावी का नाही, गार पाण्याने करावी का गरम पाण्याने का कोमट पाण्याने आणि कोणी कोणाला कधी घालावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्या बाबत मी अधिकार वाणीने काही बोलावं इतका माझा अंघोळ या विषयातला अभ्यास नाही. पण जेंव्हा केव्हा तुंम्ही अंघोळ कराल ती “कावळ्यासारखी” कधीच करू नका, असं आपल्याला “मैसूर सॅंडल सोपची” शपथ घालून सांगतो आणि हे माझं अंघोळपुराण, आजचं माझं आंघोळीचं बादलीभर पाणी गार व्हायच्या आधीच संपवतो व रोजच्या अंघोळीला खरोखरचा पळतो!

मनाने आणि तनाने नेहमीच निर्मळ रहा!

शुभं भवतु!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “त्यादिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना कीं बँकेच्या नियमात बसेल तीच शिक्षा करणं आम्हाला शक्य होईल असं? शिवाय या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य अशी ‘देवाची यंत्रणा’ असतेच आणि तो पहात असतो सगळं असंही तुम्ही म्हणाला होतात. त्याच्या हातातल्या आवाज नसणाऱ्या काठीने आता तोच योग्य तो न्याय करेल असं तुम्ही सांगितलंत ते पटलं होतं मला. म्हणूनच हे तक्रार मागं घेत असल्याचं पत्र मी त्याच दिवशी लिहून ठेवलं होतं…!”आजोबा शांतपणे म्हणाले. भारावलेल्या अवस्थेत मी थक्क होऊन पहात राहिलो फक्त!!)

माझ्या समोरचा किचकट होऊन बसलेला अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न असा सहजासहजी सुटणं हे त्या क्षणापुरतं तरी मला स्वप्नवतच वाटलं होतं. आजोबांचे  आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नव्हते. पण या औपचारिकतेचा विचार मनात येण्यापूर्वीच त्या भारावलेल्या अवस्थेत एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी जागचा उठलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला. ते भांबावले. चटकन् दोन पावलं मागे सरकले…

“अहो.. कमाल करताय तुम्ही.. काय करताय हे?..”

“योग्य तेच तर करतोय आजोबा. आत्ता या खेरीज तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी दुसरं कांहीच करू शकत नाहीय. खरंच खूप आभारी आहे मी तुमचा…”

“आभार आम्ही तुमचे मानायला हवेत..” हातात चहाचा ट्रे घेऊन आलेली त्यांची मुलगी म्हणाली.” त्या घटनेचा बाबा खूप त्रास करून घेत होते. त्यांच्या जीवनमरणाचाच प्रश्न बनवला होता त्यांनी तो. आता तुम्ही समजावल्यामुळेच तर ते सावरलेत..”

त्यादिवशी आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते  बरंच कांही अनपेक्षितपणे मिळाल्याचं समाधान घेऊन. जे घडलं ते मनावरचं ओझं हलकं करणारं होतं हे खरंच, पण ते जसं आणि ज्या क्रमानं घडलं ते मलाच अचंबित करून गेलं होतं. मनातला अंधार जादूची कांडी फिरवावी तसा क्षणार्धात नाहीसा झाला होता आणि मनात भरून राहिलेल्या लख्ख प्रकाशात मला जाणवू लागला होता फक्त.. ‘तो’..! ‘त्या’च्या कृपालोभाशिवाय हे सगळं असं घडणं शक्य तरी होतं कां? या घटनेपर्यंतच्या, पावलोपावली अचानक समोर येत गेलेल्या असंख्य, अंधाऱ्या अशा टोकदार वळणांवर प्रत्येकवेळी मला सोबत करणाऱ्या ‘त्या’नेच मला या प्रकाशवाटेवर आणून सोडलेलं होतं! पण तरीही हे सगळं घडवत असताना स्वत: मात्र अलिप्त राहून त्याने  माझ्याचकडून सगळं करवून घेतलेलं होतं जसंकांही!

चार दिवसांपूर्वीच अतिशय अस्वस्थ मन:स्थितीत स्वत:ची निकड सोबत घेऊन प्रथमच सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दाराची बेल मी वाजवली होती तो क्षण, आणि जे आणि जसं मला हवं होतं ते सगळं स्वखुशीने स्वत:च माझ्या स्वाधीन करून आज सहस्त्रबुद्धे आजोबांनी मला अतिशय समाधानाने निरोप दिला होता तो क्षण, यामधले अस्वस्थ करणारे, माझी उलघाल वाढवणारे कितीतरी प्रसंग मनात जिवंत झाले पुन्हा! आज तेच सगळे प्रसंग पुन्हा जगताना त्यातला प्रत्येक क्षण, त्या त्या वेळी वखरेसाहेबांनी,

प्रभूदेसाईंनी आणि सहस्त्रबुध्दे आजोबांनीही माझ्या विचारांना दिलेल्या परस्परविरोधी दिशा, त्यामुळे माझ्या मनात निर्माण होत राहिलेली अस्वस्थता न् अनिश्चितता, आणि त्या त्या प्रत्येक क्षणी स्वतःच्या सोयीचा आणि स्वार्थाचा लवलेशही नसलेली, माझ्याकडून माझ्याही नकळत जपली गेलेली सकारात्मकता! हे सगळं माझं कर्तृत्त्व नसून त्या त्या नेमक्या क्षणी ‘त्या’ने दिलेली प्रेरणाच होती आणि मी फक्त निमित्तमात्र! हे असंच सगळं अगदी खरं होतं पण ते फक्त माझ्यापुरतं. बाकी कुणालाच,अगदी वखरेसाहेबांनाही यामागची माझी भावना आणि यातलं तथ्य याच तीव्रतेने जाणवणं आणि पटणं अपेक्षितही नव्हतंच!

आणि म्हणूनच  ‘आपलं काम झालंय. सहस्त्रबुद्धे आजोबांनी त्यांची तक्रार मागे घेतलीय आणि तसं पत्रही दिलंय’ एवढंच सांगून मी ते पत्र वखरे साहेबांच्या समोर ठेवलं तेव्हा स्वतःच्याच कानांवर विश्वास नसावा तसे ते आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिले.

“काय सांगताय..? कसं काय?..” त्यांनी विचारलं. कसं ते त्यांना मोजक्या शब्दांत मी सांगितलं तेव्हा मात्र प्रभूदेसाईंना ‘अॅडव्हायझरी मेमो’ द्यायची सूचना आणि गरज सहजपणे स्वीकारणं त्यांना थोडं कठीण गेलं. ते सहाजिकच होतं. पण सगळी पार्श्वभूमी त्यांना सांगितल्यानंतर तसा मेमो देण्याची गरज आणि अपरिहार्यता त्यांनी समजून घेतली आणि त्यामुळे पुढे प्रभूदेसाई स्वतःवर अन्याय झाल्याच्या भावनेने बरेच नाराजही झाले. तरी मुख्य म्हणजे अचानक उभ्या ठाकलेल्या आमच्यासमोरच्या या अकल्पित संकटातून आमची अर्थातच या सुखांताने पूर्णतः सुटका झाली होती! अर्थात या सगळ्या मागचा करता-करवता ‘तो’च होता हे इतर संबंधितांपर्यंत न पोचलेलं सत्य माझ्यासाठी मात्र मला उभारी देऊन गेलं होतं!!

मनावर कायमचा कोरला गेलेला हा प्रसंग या लेखनाच्या निमित्ताने पुन्हा जगताना प्रत्यक्षात न जाणवलेले अनेक दुवे मला प्रथमच जाणवले. प्रमोशननंतर माझं पुण्यातल्या झोनल ऑफिसला झालेलं पोस्टींग पुढे अनेक अर्थांनी माझ्या उर्वरित आयुष्याला अतिशय उत्कट समाधान आणि कृतार्थता वाटावी अशी वेगळीच कलाटणी देणारं ठरणार होतं जे त्याक्षणी माझ्यासाठी अज्ञातच होतं.आज जाणवतंय ते हेच कीं सहस्त्रबुद्धे आजोबांच्या संदर्भातला हा अनोखा अनुभव पुढे घडू पहाणाऱ्या अनपेक्षित अशा आनंददायी घटनांचं सूचन करणाराच तर होता! फक्त मला ते त्याक्षणी जाणवलं नव्हतं एवढंच!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “परत…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “परत…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

व्हाॅटस्ॲप वर आपण पाठवलेला एखादा मेसेज आपल्यालाच परत येतो. काही वेळा तो थोड्या वेळातच येतो, तर काही वेळा त्याला यायला वेळ लागतो. पण परत येतोच. हे मेसेजेस साधारण असतात. यात गुपित काहिही नसतं.

पण व्हाॅटस्ॲप यायच्या आधी आणि आता सुध्दा आपलाच आणि गोपनीय मेसेज आपल्यालाच परत मिळण्याचा अनुभव काही जणांना आला असेल. कुणाला सांगू नका किंवा सांगू नकोस अशी सुरवात करून दबक्या आवाजात खणखणीतपणे सांगितलेली गोष्ट कधीकधी आपल्यालाच परत ऐकायला मिळते. कधी त्यात कशाची भर पडते तर कधी काही वगळलं जातं. वर परत कुणाला सांगू नका याची जोड असतेच.

यावेळी आपले चेहर्‍यावरचे भाव कमालीचे निरागस असतात. ठेवावेच लागतात.

कुणाला सांगू नका. अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट दोन प्रकारची असते. एकतर ती खरंच कोणाला सांगायची नसते. आणि दुसरा प्रकार म्हणजे सगळ्यांनाच समजावी ही ईच्छा असते. पण मी सांगितली हे समजू नये असं वाटतं.

मग ती गोष्ट वरच्या दोनपैकी कोणत्या प्रकारची आहे हे आपणच ठरवतो. पहिल्या प्रकारची असेल तर एखाद्यालाच, जवळ कोणी नसतांना, त्याला जवळ करत सांगतो. त्यालाही आपण जवळचे आहोत याचा आनंद होतो. पण यात त्याच्या जवळचं पण कोणीतरी असेल याचा विसर पडतो.

दुसर्‍या प्रकारची असेल तर मग ती कुठे, कशी, आणि साधारण किती जणांना सांगावी हे ठरवतो. बर्याचदा ते ठरलेलंच असत, फक्त आपण सांगायच्या संधीची वाट बघत असतो. अशी संधी आली नाही तर ती आणतो.

कुणाला सांगू नका अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्या चेहर्‍यावर त्यावेळी योग्य ते भाव आणि प्रतिक्रिया असतात. पण नंतर मात्र ते कुुणाला सांगू नका यातलं नका हे ते सोयीस्कर विसरतात, आणि कुणाला सांगू… अशी त्यांची अवस्था होते.

आणि त्या अवघड वाटणार्‍या अवस्थेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग काढला जातो. आणि मग परत दबक्या आवाजात खणखणीतपणे ती गोष्ट पुढे सरकल्यावर थोड मोकळं वाटतं.

कुणाला सांगू नका यानंतर सांगीतलेल्या गोष्टीवर अरेच्या, काय सांगतोस, खरंच का, मला शंका होतीच, या सारखे अनेक उद्गार बाहेर पडतात. यात वाटत नाही तसं… , असं म्हणतांना आपल्याला काय वाटतं याची चर्चा होते.

कोणाला सांगू नका ही गोष्ट माणसांना सांगीतली तरी ती स्त्री वर्गात पोहोचते. आणि स्त्री वर्गात सांगीतली तरी ती पुरुष वर्गात पोहोचते.

यावर जाऊ देत… आपल्याला काय करायचय… यावर चर्चा संपलीतरी पुढे आपल्याच काही तरी करायचंय… याची कल्पना काही जणांना होते. कारण त्यांनी काही केलं नाहीतर हा बातमीचा प्रवाह थांबणार तर नाही नां, अशी शंका त्यांना येते. आणि मग ती बातमी तशाच विश्वासू व्यक्तीला त्याच पध्दतीने सांगून ते आपलं मन मोकळं करतातच, पण त्या बातमीला वाहण्यासाठी मोकळंपण करतात.

कोणाला सांगू नका. यात नात्यांचा भेद नसतो. नात्यातल्या, मित्रांच्या, शेजारच्या, वरवर ओळख असणाऱ्या, तोंड ओळख असणाऱ्या, किंवा ओळख नसणाऱ्या अशा सगळ्यांच्या गोष्टींचा समावेश त्यात असतो. बर्‍याचदातर अरे ते… ते नाही का… अरे तिथे कायम असतात… आठवत नाही का. असं म्हणत त्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न होतो.

कोणाला सांगू नका… ही कानातून पोटात गेलेली गोष्ट जास्तवेळ पोटात रहात नाही. ती परत तोंडातून बाहेर पडत कोणाच्यातरी कानातून त्याच्या पोटात जाते. आणि तिथून त्याच प्रकारे बाहेर पडते.

आत्ता मी काय सांगितलं यात खास असं काहीच नाही. आणि गोपनीय तर मुळीच नाही. त्यामुळेच कोणाला सांगू नका असं मुळीच म्हणणार नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पानझड… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पानझड… ☆ सौ शालिनी जोशी

पत्ता बोले वृक्ष से, सुनो वृक्ष वनराय

अबके बिछुडे ना मिले, दूर पडेंगे जाय

जीवनातलं एक शाश्वत सत्यच संत कबीर या दोह्यात नमूद करतात. पान वृक्षाला सांगते, वनराज वृक्षा ऐक. आता मी तुला सोडून जातो. पुन्हा न भेटण्यासाठी, दूर कुठेतरी मी पडून राहीन.

पानझडीच्या काळात प्रत्येक पानाला मातृवृक्षाचा वियोग सहन करावा लागतो. तो टाळणे ना झाडाच्या, ना पानाच्या हातात. निसर्ग नियमाप्रमाणे हे होत असते. खरंतर पान हा वृक्षाचा अवयव. अन्न तयार करून वृक्षाला जगविणारा. मग त्याच्यावर अशी वेळ का यावी? यामागे विज्ञान आहे. काही झाडे एकदम सगळी पाने गळून टाकतात. त्यांना पानझडी वृक्ष म्हणतात. पानगळल्यामुळे झाडाला प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ऊर्जा व पाण्याची बचत करता येते. कमी पानांमुळे पाण्याचे उसर्जन कमी होते. झाडांना पाणी कमी लागते व त्यामुळे झाडे स्वतःला जिवंत ठेवू शकतात. झाडांना ऊर्जा प्रकाश संश्लेषणातून मिळते. ही क्रिया सूर्यप्रकाशात हिरवी पाने करतात. पानातील क्लोरोफिलच्या मदतीने झाडे सूर्यप्रकाशात पाणी व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड च्या साह्याने साखर तयार करतात. पण पानझडीच्या वेळी क्लोरोफिल मुळात व खोडात साठवले जाते. त्यामुळे पानांचे कार्य थांबते आणि ती आधि पिवळी मग लाल दिसू लागतात. मग गळून पडतात. तयार असलेल्या ऊर्जेचा उपयोग फुलांच्या बहरासाठी म्हणजे प्रजननासाठी होतो. म्हणून पाणझड होते तेव्हा वृक्ष फुलांनी भरून परंपरारक्षणाचे काम करतात. रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या झाडाचा सुखद अनुभव आपण घेतो. पाने नसल्यामुळे पूर्ण शक्तीनिशी हे कार्य करून फुला फळांच्या बहरातून पुनर् निर्मिती होते. योग्य काळी परत नवीन पाने फुटतात. असे हे चक्र सुरू असते.

अशा प्रकारे पाने झाडांचा निरोप घेऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतात. आपल्या बळी देऊन झाडांना जगवतात. ‘उपजे ते नाशे’ हा जगाचा नियमच आहे. पण नाश आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळा गोंधळ माजला असता. नाश म्हणून नवनिर्मितीला शोभा आहे. तो नवसृजनाचा आनंद आपण भोगतो. फुलांनी भरलेले वृक्ष सृष्टीचे वैभव ठरतात.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका ☆ डाॅ. विष्णू वासमकर ☆

डाॅ. विष्णू वासमकर

? विविधा ?

☆ सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆ 

सुधीर रसाळ हे मराठी साहित्य आणि समीक्षाविश्वातील एक महत्त्वाचे नाव. सुमारे 60 वर्षे त्यांनी मराठी साहित्यव्यवहारात आपल्या समीक्षात्मक लेखनाने मोलाची भर घातली आहे. ‘कविता आणि प्रतिमा’ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक ग्रंथ 1982मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने साहित्याचा गांभीर्यपूर्वक विचार करणारा एक समीक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.   ‘काही मराठी कवी जाणिवा आणि शैली’, ‘वाङ्मयीन संस्कृती’, ‘मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप’, ‘मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्मक वाङ्मय’, ‘भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा’, ‘पार्थिवपूजक पु‌. शि. रेगे, ‘समीक्षा आणि समीक्षक’, ‘कवितायन : विंदा करंदीकर यांची कविता’, ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ इत्यादी अनेक समीक्षा ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. आजही त्यांचे लेखन चालू आहे. किंबहुना वयाच्या नव्वदीनंतरही ते तितक्याच निष्ठेने समीक्षालेखन करत आहेत. ‘संवादातून साहित्यशोध’  हा त्यांच्या मुलाखतींचा संग्रह प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी नुकताच पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने संपादित केला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा आपल्याला विचार करायचा आहे.

डॉ. सुधीर रसाळ

सुधीर रसाळ हे मर्मग्राही स्वायत्ततावादी समीक्षक आहेत . मराठी समीक्षेची सुरुवात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. मराठीतील इतर आधुनिक साहित्यप्रकारांप्रमाणेच  समीक्षेची बीजे प्राचीन काळात सापडत असली तरी 1872 नंतर मराठी समीक्षेने आधुनिक रूप धरायला सुरुवात केली, असे म्हणता येईल. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात साहित्याचा विचार प्रामुख्याने जीवनवादी आणि कलावादी दृष्टिकोनातून होत राहिला आहे. जीवनवादी समीक्षक साहित्याचा मानवी जीवनाच्या संदर्भात विचार करतात.  तर कलावादी समीक्षक साहित्याचा कलेच्या दृष्टीने विचार करतात. कलावादी समीक्षकांची मराठीमध्ये एक परंपरा दिसून येते. या परंपरेचे मर्ढेकरपूर्व आणि मर्ढेकरोत्तर असे दोन भाग होतात. मर्ढेकरपूर्व कालखंडात काही समीक्षक साहित्याचा कलावादी  दृष्टिकोनातून विचार करत असले तरी मर्ढेकरांच्यापासून साहित्याचा विचार निखळ कलावादी दृष्टिकोनातून होऊ लागला. मर्ढेकरोत्तर कालखंडात स्वतः मर्ढेकर, पु.शि.रेगे, वा. ल.कुळकर्णी, गंगाधर गाडगीळ, माधव आचवल, प्रभाकर पाध्ये आणि सुधीर रसाळ यांसारखे समीक्षक साहित्याचा कालावादी दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार करू लागले. मराठीतील कलावादी समीक्षकांवर पाश्चात्त्य साहित्यशास्त्रातील इमॅन्युअल कांट आणि विश्वचैतन्यवादी विचारवंत यांचा प्रामुख्याने प्रभाव दिसतो.

डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेवर सुरुवातीच्या काळात मराठीतील गंगाधर गाडगीळ आणि वा.ल. कुळकर्णी यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. नंतर अमेरिकेत विसाव्या शतकाच्या मध्यावधी कालखंडात उदयास आलेल्या ‘न्यू क्रिटीसिझम’ (नवी टीका) या  रूपवादी चळवळीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.  न्यू क्रिटिसिझम या चळवळीचे नाव जॉन क्रो  रॅन्सम यांच्या 1941 च्या ‘द न्यू क्रिटिक्स’ या पुस्तकावरून पडले आहे. आय. ए. रिचर्ड्स, क्लींथ ब्रुक्स, जॉन क्रो, डब्ल्यू के विमसॅट आणि मोनरो ब्रियर्डस्ली हे न्यू क्रिटीसिझमच्या चळवळीतील  प्रमुख विचारवंत होते.  साहित्याचे कार्य एक स्वयंपूर्ण एक सौंदर्यात्म वस्तू म्हणून कसे करते हे शोधण्यासाठी त्यांनी कवितेचे बारकाईने वाचन करण्यावर भर दिला. ही समीक्षापद्धती साहित्यकृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी केवळ ग्रंथाच्या अंतर्गत रचनेवर लक्ष केंद्रित करते. लेखक, इतिहास, समाज यांसारख्या बाह्य घटकांना ती महत्त्व देत नाही. भाषेतील गुंतागुंत, विरोधाभास आणि संदिग्धता यांचा ती बारकाईने अभ्यास करते. या पद्धतीचा मुख उद्देश साहित्यकृतीला एक स्वयंपूर्ण स्वतंत्र कलाकृती मानून तिचे विश्लेषण करणे  हा होता. या सर्वांच्या संस्कारातून सुधीर रसाळ यांची वाङ्मयीन भूमिका तयार झाली आहे.

1950 च्या दशकाच्या अखेरीस रसाळ यांचा पहिला समीक्षालेख प्रसिद्ध झाला. या लेखातून प्रकट झालेली त्यांची साहित्य विषयक सिद्धान्ताधिष्ठित भूमिका अधिक प्रगल्भ होत गेली ती जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी’ या ग्रंथातील समीक्षालेखनापर्यंत टिकून राहिलेली दिसते. सैद्धान्तिक लेखनाचे सातत्य त्यांच्या सर्व ग्रंथातून प्रत्ययाला येते. एखाद्या व्यक्तीच्या मनोभूमिकेत कालांतराने बदल होण्याची शक्यता असते. मात्र सुधीर रसाळ यांची भूमिका अविचल राहिली. सुधीर रसाळ यांचे महाविद्यालयीन शिक्षक हे बहुतांशी जीवनवादी होते. मात्र सुधीर रसाळ यांच्यावर स्वातंत्र्योत्तर काळातील नवकथा आणि गंगाधर गाडगीळ यांची समीक्षा यांचा प्रभाव अधिक राहिला. कलावादी भूमिकेत काही उणिवा असल्या तरी वाङ्मय व कला यांचा विचार सौंदर्यमूल्याच्या संदर्भातच केला गेला पाहिजे आणि कलाकृती म्हणूनच कलाकृतीला स्वीकारले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे . कलाकृती ही सौंदर्यनिर्मिती आणि सौंदर्यप्रत्यय देत असली तरी तिला इतर अंगेही असू शकतात आणि त्यांचे संस्कार आपल्यावर होऊ शकतात. परंतु हे संस्कार करणं हे त्या कलाकृतीचे उद्दिष्ट असू शकत नाही असे ते आग्रहाने आजही मांडतात. समीक्षेची निर्मितिप्रक्रिया सांगताना ते म्हणतात, “माझा विचार अंतर्गतदृष्ट्या सुसंगत असतो त्याचा  तात्त्विक समीक्षेकडून वाङ्मयाकडे नव्हे तर वाङ्मयाकडून तात्त्विक समीक्षेकडे प्रवास होत असतो. किंबहुना हा प्रवास दुहेरी असतो. एकीकडे तात्त्विक समीक्षा तुम्हाला मदत करीत असते. तर दुसरीकडे तिला आव्हान देणारी कलाकृती तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणत असते. या पद्धतीने प्रत्येक समीक्षकाचा समीक्षाविचार सिद्ध होत असतो. ही प्रक्रिया ज्या समीक्षाकाबाबत थांबते तो समीक्षक म्हणूनही थांबलेला असतो”. यातून समीक्षेतून निकष जसे सिद्ध होतात तसेच श्रेष्ठ दर्जाची साहित्यकृती चांगल्या साहित्यकृतीचे  निकष समीक्षेला देत असते, हे डॉ.रसाळ सुचवितात. गंगाधर गाडगीळ यांच्या संदर्भात लिहिताना स्वायत्ततावाद आणि कलावाद या दोन वेगळ्या संकल्पना ते मांडतात. त्यांच्या मते स्वायत्ततावादामध्ये अशी भूमिका घेतली जाऊ शकते की, वाङ्मय हे एकप्रकारचं सत्य असतं, वाड्मयामध्ये नैतिकता असू शकते. वाड्मयामध्ये जीवनाचा अर्थपूर्ण असे दर्शन घडवलं जाऊ शकतं आणि तरीही वाङ्मय हे स्वायत्त असतं. अमेरिकेतील न्यू क्रिटिसिझमच्या चळवळीतील साहित्यविचार जसा रसाळ यांना योग्य वाटतो तसाच गंगाधर गाडगीळांचा आशयाला महत्त्व देऊन मांडलेला कलावादी विचारही त्यांना योग्य वाटतो. अशी भूमिका स्वीकारून रसाळांनी केलेले समीक्षालेखन आपल्या वेगळेपणाने नजरेस भरते. डॉ. रसाळ यांची भूमिका जिला ते स्वायत्ततावादी भूमिका म्हणतात तिचे वेगळेपण असे की सामाजिकता आणि कलावाद या भूमिका तिला परस्परविरोधी वाटत नाहीत. डॉ. सुधीर रसाळ यांची ही भूमिका ललित साहित्याला योग्य न्याय देणारी भूमिका आहे, याचा प्रत्यय येत राहतो.

—-*—–

‘संवादातून साहित्यशोध’ या प्रा.बाळकृष्ण कवठेकर आणि लता मोहरीर यांनी संपादित केलेल्या डॉ. सुधीर रसाळ यांच्या मुलाखतींच्या संग्रहाचा प्रकाशन समारंभ छ. संभाजीनगर येथे रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त डॉ. सुधीर रसाळ यांच्या वाङ्मयीन भूमिकेचा डॉ. वि.दा. वासमकर यांनी घेतलेला शोध.

—-+—-

© डाॅ. विष्णू वासमकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पु. लं. चे एक अप्रतिम व्यक्तिचित्र… विनोददा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ पु. लं. चे एक अप्रतिम व्यक्तिचित्र… विनोददा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र – विनोद दा

पुलंच्या सिद्धहस्त लेखणीतून जे जे काही कागदावर उतरले, ते ते अजरामर झाले असेच म्हणावे लागेल. पुलंच्या अनेक व्यक्तीचित्रांशी आपण परिचित असतो. नारायण, हरीतात्या, सखाराम गटणे, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर, नामू परिट यासारख्या त्यांच्या अनेक व्यक्तीचित्रांशी मराठी माणसाचे हृदयाचे नाते जुळले आहे. ही माणसे आपल्याला आपल्यातीलच एक वाटतात. हे त्यांचे शब्दचित्र रेखाटतानाचे कौशल्य आहे. त्या कथा वाचताना किंवा पुलंच्या तोंडून ऐकताना, ती माणसे अक्षरशः जिवंत होतात आणि आपल्या मनात कायमचे स्थान पटकावतात. पुलंच्या सिद्धहस्त लेखणीचा परिसस्पर्श ज्या ज्या विषयांना झाला, त्यांचे सोने झाले. त्यांचे असेच एक फारसे परिचित नसलेले व्यक्तीचित्र आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

हे व्यक्तिचित्र आहे विनोद दांचे. ‘ वंगचित्रे ‘ हे त्यांचे पुस्तक वाचत असताना हे विनोद दा आपल्याला भेटतात आणि कायमचे आपल्या हृदयात स्थान मिळवतात. आपल्याकडे आपण आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीला दादा असे सर्वसाधारणपणे म्हणतो. परंतु बंगालमध्ये साधारणपणे ‘ दा ‘असे म्हणण्याचा प्रघात आहे. ‘ दा ‘ शब्दच कानाला किती गोड लागतो !

वयाची पन्नाशी उलटल्यानंतर पु ल देशपांडे १९७० मध्ये शांतिनिकेतनला गेले. तिथे अनेक दिवस राहिले आणि बंगाली भाषा त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘ गीतांजली’ चा अनुवाद करणारे वामन मंगेश दुभाषी उर्फ ‘ ऋग्वेदी ‘ हे पुलंचे आजोळचे आजोबा. त्यांच्याकडूनच रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य आणि बंगाली भाषेची आवड पुलंकडे आली. कोणतीही भाषा शिकायची तर ती जिथे बोलली जात असते तिथे जाऊन अनुभवावी, तिच्या विविध रूपांचा आस्वाद घ्यावा आणि त्यातून ती शिकावी अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणेच पुलं शांतिनिकेतनात राहिले. ते कोलकात्यासारख्या शहरात राहिले तसेच बंगालमधील खेड्यापाड्यांमधूनही हिंडले. त्यातूनच त्यांचे ‘ वंगचित्रे ‘ हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकातीलच एक प्रसंग आणि हे एक व्यक्तीचित्र आहे.

आपल्या शांतिनिकेतनमधील वास्तव्यात पुलंनी तिथली भाषा, संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केल्याशिवाय तेथील संस्कृती खऱ्या अर्थाने कळत नाही. पुलंनी शांतिनिकेतनमध्ये बराच काळ वास्तव्य केले. त्यातूनच त्यांची ‘ मुक्काम शांतिनिकेतन ‘ आणि ‘ वंगचित्रे ‘ ही पुस्तके जन्माला आली. अशाच एका प्रसंगी ते शांतीनिकेतनमध्ये हिंडत असताना कलाभवनातल्या बंगलीवजा वसतिगृहातल्या छतावर त्यांनी सुंदर म्युरल्स पाहिली. ती पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या सलील यांना त्यांनी त्याबद्दल विचारले. तेव्हा सलील यांनी ती म्युरल्स विनोद – दांनी काढली असे सांगितले. त्या उत्सुकतेपोटी पुलं आणि सलील विनोद दा यांना भेटायला गेले आणि मग त्या प्रसंगाचे सजीव चित्रणच पुलं यांनी केले आहे. तो प्रसंग आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पुलंच्या शब्दांमध्ये आहे.

विनोद दा ज्या वातावरणात बसले होते, त्याचं हे बोलकं चित्रण त्यांच्याच शब्दात…!

“अंधारातच दार उघडले गेले. हा चित्रकार अंधारात का बसला होता ते मला कळेना. तेवढ्यात एक मोलकरीण आली आणि तिने बटण ओढून दिवा लावला. काळोखातल्या रंगमंचावर प्रकाश पडावा आणि एकदम अनपेक्षित अशा प्रकारच्या देखाव्याने चकित व्हावे तसे मला झाले. एका ईझीचेअरवर काळा चष्मा घालून एक अतिशय सौम्यदर्शन वृद्ध गृहस्थ बसले होते. बराच वेळ ते तिथे बसलेले असावेत. समोर एक लहानशी तिपाई होती. तिच्यावर वीत सव्वावीत उंचीची एक मातीची मूर्ती घडत होती. बाजूला मातीचा गोळा होता. त्यामुळे अंधारातच ही शिल्पकलेची आराधना चाललेली असावी. भिंतीवर नाना प्रकारची चित्रे होती. आणि फडताळ पुस्तकांनी भरलेले होते…”

हे गृहस्थ म्हणजेच सुंदर म्युरल्स तयार करणारे सुंदर चित्रे काढणारे विनोद दा. त्यांनी सलील आणि पुलंची चौकशी केली. त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात…

“मी त्याच्याकडे पाहण्यातच गर्क होतो. किती विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्व ! बोलणं तर खडीसाखरेसारखं.  तप: पूत चेहरा. डोक्यावर पांढरे शुभ्र केस, सडसडीत देहयष्टी. अंगात शुभ्र कुडता, पायजमा. दोन-चार मिनिटातच मला त्यांच्या अंधत्वाचा विसर पडला. मी सहज त्यांनी केलेल्या म्युरल्सविषयी बोलणे काढले.

विनोद दा म्हणाले, ‘ खूप वर्षे झाली त्या म्युरल्सला. त्यावेळी थोडे थोडे दिसत असे मला. ‘  मग मला कळले की चित्रकलेचे वेड आणि डोळ्यांचे अधूपण घेऊनच विनोद दांनी जगात प्रवेश केला. कागदाच्या अगदी जवळ डोळे नेल्याशिवाय त्यांना दिसत नव्हते. त्याकाळी कुठलीही चित्रशाळा त्यांना प्रवेश देत नव्हती. तसल्या त्या अधूदृष्टीच्या बालचित्रकाराला सरकारी चित्र शाळेचे दरवाजे बंद होते.”

येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची महानता आणि द्रष्टेपण आपल्याला कळते. ” गुरुदेवांनी या मुलाची प्रतिभा पाहिली आणि त्याला जवळ घेतले. चित्रशाळा फक्त नियम जाणत होत्या. टागोरांना या मुलाच्या अधू डोळ्यातले तेज दिसत होते. त्यांनी त्याला रंग आणून दिले, कुंचले दिले आणि सांगितले,’ काढ तुला हवी तेवढी चित्रे. ‘ गुरुदेवांचा आधार लाभला नसता तर कुठली चित्रे काढणार होतो मी…! असे भावपूर्ण उद्गार विनोद दांनी काढले. “

त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात,” सत्तरीच्या घरातल्या वृद्धाकडून ते वाक्य ऐकताना काळजाचे पाणी झाले. सहा चौरस इंचाहून एका दमात अधिक पृष्ठभाग दिसू न शकणारे विनोद दा. त्यांनी मुकाबला घेतला तो विस्तीर्ण भिंतीशी त्या विस्ताराच्या इंचा इंचात डोळा घालून त्यांनी भव्य म्युरल्स उभे केले. सलीलच्या वडिलांनीच त्यांना लहानपणी गुरुदेवांपुढे आणल्यामुळे घोष कुटुंबावर त्यांचा विशेष लोभ. अनेक गोष्टी सांगत होते. मात्र गोष्टीवेल्हाळपणा नव्हता. बोलणे ही लोभस असून रेखीव. विनोद दा म्हणजे शांतिनिकेतनातल्या गेल्या ३०/४० वर्षातल्या कलासाधनेचा चालता बोलता इतिहास आहे. केवळ चित्रकलाच नव्हे तर महाभारत, रामायण या महाकाव्यांचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला आहे. शांतिनिकेतनातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी ऐकताना वाटत होते की केवळ कुंचल्यानेच नव्हे तर लेखणीने देखील हा माणूस काय सुरेख व्यक्तिचित्रे काढू शकला असता !”

“पूर्वी डोळे कागदाजवळ नेऊन का होईना पण दिसत होते. आता संपूर्ण अंधत्व. पण या अंधारात त्यांच्या प्रज्ञाचक्षुंपुढे आजही रंगरेषांचे विलास चालू असतात. आता त्यांनी शिल्पकलेशी मैत्री जमवली आहे. स्पर्शातून आकाराचा अंदाज घेत छोटी छोटी मृत्तिका शिल्पे घडवीत असत. दिवस आणि रात्र यांच्यात आता अभेद आहे. आता रात्र झाल्यावर झोपलेच पाहिजे ही सक्ती नाही आणि दिवसा काम केलेच पाहिजे ही देखील सक्ती नाही. आता मानू ती वेळ !”

पुढे एके दिवशी पुलंना कलाभवनाच्या वाटेवर विद्यार्थ्यांचा एक घोळका आढळला. ती मुले रंगसाहित्य घेऊन धावपळ करीत होती. पुलंनी थांबून पाहिले तर एका भिंतीपाशी विनोद दा उभे. भिंत हाताने चाचपीत म्हणायचे, ‘ इथे. ‘ बंगालीत विद्यार्थ्यांना छात्रच म्हणतात. मग एखादा छात्र किंवा छात्री तिथे वर्तमानपत्राचा एक कपटा चिकटवीत असे. पुन्हा विनोद दा भिंत चाचपीत म्हणायचे, ‘ इथे ‘. मग तिथे एक कपटा. असे काही कपटे चिकटवल्यावर विनोद दांनी हाताने त्या जागांना स्पर्श केला. एका शिष्याकडून खडू मागून घेतला आणि भिंतीवरच्या त्या कपट्यांना स्पर्श करीत सरसर सरसर रेखाकृती काढायला सुरुवात केली. केवळ स्पर्शाच्या आधाराने रेखली जाणारी ती चित्रे मुले मुली श्वास कोंडून पाहत होती. रेषा काढणाऱ्या त्या हातांना केवळ तपस्येतूनच मिळणाऱ्या आत्मविश्वासाचे वरदान होते. रेषा कुठे कापत नव्हती. थरथरत नव्हती. धीट रेषा, हातातले सामर्थ्य दाखवणाऱ्या रेषा. मनात रंगलेला चित्रपट इतका स्पष्ट होता की तो भिंतीवर रेखताना त्या भिंतीकडे डोळ्यांना दिसत असले तरी पाहण्याची गरज नसावी. तयार सतारियाची बोटे जशी पडद्याकडे न पाहता त्याच जागी पडतात त्याप्रमाणे त्या चित्राविषयी च्या चतु:सीमा स्पर्शून झाल्यावर प्रमाणबद्धतेत सुताइतकाही फरक नव्हता. लता मंगेशकरला जसे चेष्टेत सुद्धा बेसूर होणे अशक्य तसे विनोद दांच्या बोटांना प्रमाणहीन रेखाटन अशक्य. हाताच्या त्या हमखास हालचालीकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्या चित्रबंधाकडे मी अवाक् होऊन पाहत होतो. डोळ्यापुढे सदैव अंधाराचा पट असताना प्रकाशाची उपासना करणारा हा चित्रकार – चित्रकार कसला ? चित्रयोगी ! वार्धक्य, अंधत्व यांना परौते सरा असे म्हणणारा ! नव्या नव्या कल्पनांचे स्वागत करणारा ! पुढे पुलं म्हणतात, ” रवींद्रनाथांनी आपल्या बगीच्यात अशी ही अलौकिक रोपटी आणून लावली. त्याचे किती सुंदर वृक्ष झाले ! त्यातले आज काळाने काही नष्ट केले. पण जे काही आहेत त्यांच्या सावलीला मात्र पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. “

धन्य आहेत ते अशी सुंदर शब्दचित्रे रेखाटणारे पुलं, सुंदर म्युरल्स आणि चित्रे काढणारे विनोद दा आणि अशा व्यक्तींच्या जीवनाला आकार देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. या सर्वांना मनोमन प्रणाम !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares