मराठी साहित्य – विविधा ☆ वसंतोत्सव… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

वसंतोत्सव ☆ श्री प्रसाद जोग

२६ मार्च पासून वसंतोत्सवाला सुरवात झाली आहे.

सहा ऋतूंमधे वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात .दहा दिशांना बहरून टाकत येतो तो हा ऋतुंचा राजा. याच्या आगमनाच्या आधीच निसर्गाच्या सुगंधाच्या रूपाने याची चाहूल लागते .आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.

होळीपासून वाढत चाललेल्या गरमीमध्ये, रखरखाटात झाडे,वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव शोधत असतात.अश्या या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांवर अचानक एके दिवशी कोवळी कोवळी, हिरवीगार पोपटी पालवी फुलते  नुसती पालवीच नाही तर पळस रंगाची उधळण करायला लागतो,गुलमोहर  फुलतो ,बहावाचे घोस लटकायला लागतात, फुलेही बहरायला लागतात.

दयाळ, कोकीळ, भारद्वाज अश्या पक्षांना वसंत ऋतुत कंठ फुटेल आणि वसंताच्या आगमनाची वर्दी गोड आवाजात द्यायला सुरवात करतील.

या काळात दिवसाचा,उन्हाच्या काहिलीचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान झालेली असते. घामाने शरीराला थकवा, सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असतात, या काळात शारीरिक शक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे, फणस, काजू,कलिंगड, खरबूज करवंदे, जांभूळ,जाम अश्या सगळ्यातून भरभरून देत असते.

‘वसंत’या शब्दातच काही जादू असावी, कारण वसंत नांव असणाऱ्यांनी वसंतऋतुप्रमाणेच आपली आयुष्ये समृध्द केली आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

साहित्यातले वसंत 

वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला.

रंगभूमीवरील वसंत 

आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी,

संगीतातले  वसंत

आपल्या जादुई सुरवटींनी मनामनातले वसंत फुलवले वसंत देसाई,वसंत प्रभू ,वसंत पवार वसंत निनावे,वसंत आजगावकर, वसंत कानेटकर,वसंतकुमार मोहिते आणि वसंत अवसरे असे टोपण नाव घेऊन गाणी लिहिणाऱ्या शान्ता शेळके  यांनी.

अशा या ऋतुराज वसंता मुळे कविंना देखील स्फूर्ती येते आणि ते वसंताचा गौरव करताना वेगवेगळी गाणी लिहितात

वसंत ऋतू आला

आला वसंत देही, मज ठाउकेच  नाही

उपवनी गात कोकिळा

हृदयी वसंत फुलताना 

कुहू कुहू येई साद

साद कोकीळ घालतो कधी वसंत येईल

कोकीळ कुहू कुहू बोले

गा रे कोकिळा गा

मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ कोकिळे मला

ऋतुराज आज वनी आला ऋतुराज आज वनीं आला

बसंत की बहार आयी,

(नाट्क> मंदारमाला)

अजूनही खूप गाणी आहेत चला तर मंडळी आपणही वसंतऋतूचे स्वागत करूया त्याचा.आनंद साजरा करताना म्हणूया

चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो

चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो

पक्षी कूजन मधुर ऐकू ये, आसमंत हा गुंगुन जावा

फुलाफुलातून साद उमलते,

 

वसंत घ्यावा

वसंत घ्यावा

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “खेळताना रंग बाई होळीचा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ खेळताना रंग बाई होळीचा…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

(होळी – अध्यात्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या विषयीचा लेख.)

ऋतू वसंत आलेला

मास फाल्गुन सजला

रंग रंगीला गुलाल

माझ्या मनात रुजला

फाल्गुन म्हणजे गुलाल, गुलाल म्हणजे ऐश्वर्याचे, प्रेमाचे व त्यागाचे प्रतीक. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी, फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलीवंदन व फाल्गुन वद्य पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात. असा पाच दिवस चालणारा हा सण वर्षभर झालेल्या कामाचा ताण नाहीसा करून नूतन वर्षाचे स्वागत करण्यास उत्साह निर्माण करून देण्याचे काम करतो. या सणाला महाराष्ट्रात “शिमगा” व “होळी” तर उत्तर प्रदेशात “होरी” असे म्हणतात. ओरिसात भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात घालून झोका देतात. फाल्गुन शुद्ध १३ ते १५ अशा तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला ते “दोलोत्सव” म्हणतात. बंगाल प्रांतात “दोलायात्रा” तर दक्षिणेत “कामदहन” या नावाने संपन्न होणाऱ्या फाल्गुन पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

अध्यात्मिक दृष्टीकोन

या घटनांमुळे होळीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.

१) भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपुने बहीण होलीकेला आमंत्रित केले. मी तुला जाळणार नाही असा अग्नीने होलीकेला वर दिला होता. हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला होलीकेसह चितेवर बसवून ती पेटवली त्यात होलिका भस्म झाली कारण तिने मिळालेल्या वराचा दुरुपयोग केला होता. प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे लोकांना आनंद झाला त्याची स्मृती म्हणून लोक होळी पेटवतात.

२) रामाच्या राज्यात ढुंढा नावाची राक्षसीण होती “जर तू निष्पाप लोकांचा छळ केलास व ते तुला निंद्यवचने बोलली तर तुझी शक्ती क्षीण होईल”. असे ब्रह्मदेवांनी सांगितले. ढुंढा राक्षसीण लहान मुलांना पळवून ठार मारत असे तेव्हा लोकांनी तिला पळवून लावण्यासाठी होळी पेटवली व तिच्याभोवती दोन्ही हाताने बोंब ठोकून अपशब्द वापरले ढुंढा राक्षसीण पळून गेली. त्या आनंदा प्रित्यर्थ पेटविलेल्या होळीत पाणी ओतून लोकांनी ती राख एकमेकांच्या अंगावर शिंपडून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली.

३) कंसाज्ञेने आलेल्या पुतना राक्षसीचे स्तनपान करून श्रीकृष्णाने तिचा वध केला तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. आपला लाडका कृष्ण सुखरूप राहिल्याचा आनंद गोकुळातील लोकांनी पुतनेला जाळून, होळी पेटवून व्यक्त केला.

४) त्रिपुरा सुराचा मुलगा तारकासुर लोकांचा छळ करू लागला भगवान शंकराला होणाऱ्या मुलाच्या हातून तुझा नाश होईल असे ब्रह्मदेव तारकासुराला म्हणाले तेव्हा शंकर ध्यानमन अवस्थेत होते त्यांचा ध्यानभंग करण्यासाठी मदनांनी सोडलेल्या मदनबाणामुळे शंकरांनी मदनाला भस्म केले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता.

५) या दिवसाला महत्त्व आहे कारण श्रीराम आणि सुग्रीवाची भेट याच फाल्गुन पौर्णिमेला झाली.

६) होळीमध्ये रंग खेळताना भांगेची सेवन केले जाते त्यामागे एक अध्यात्मिक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी शंकरांनी जेव्हा विष प्राशन केले. तेव्हा त्यांच्या अंगाची लाही लाही होत असताना त्यांनी भांग पिली भांग ही वनस्पती थंड असल्यामुळे त्यांचा दाह कमी झाला म्हणून वाढत असलेल्या उष्ण दिवसांमध्ये होळी हा सण येतो आणि उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी या उत्सवात खास करून भांग पिली जाते.

सांस्कृतिक दृष्टीकोन

आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे. बाराही महिन्यामध्ये होणारे सणवार याला सांस्कृतिक महत्त्व आहे. निसर्गातील सर्व चांगल्या गोष्टींना आत्मसात करून त्याचे संगोपन व संवर्धन करायला लावणारी आपली श्रेष्ठ संस्कृती आहे.

पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक करावा लागे. दुसरे कुठलेच ईंधनाचे साधन नव्हते घरोघरी गाई गुरे असत. त्यामुळे दही दूध घरोघरी असावयाचे तसेच गाई गुरांच्या शेणापासून गोवऱ्या लावल्या जायच्या. त्या उन्हाळ्यात वाळवून त्याचा साठा करण्यासाठी एक शेणाचा ‘उडवा’ रचला जायचा(उडवा म्हणजे मधे गोवऱ्या गोल रचून गोलाकार त्याला शेणामातीने लिंपले जाई व पावसात भिजू नये म्हणून पूर्ण बंद केले जाई.अगदी एखाद्या छोट्याशा डेरेदार झोपडी सारखे ते दिसत असे त्याला गोवऱ्या काढण्यासाठी पुढच्या बाजूने एक माणूस आत जाईल असे तोंड ठेवले जाई.त्याला उडवा म्हणत.)अजूनही ग्रामीण भागात हे पहायला मिळते.त्यामध्ये त्या गोवऱ्या सुरक्षित ठेवल्या जायच्या. पावसाळा सुरू झाला की लाकूड मिळत नसे किंवा सर्व ओले असे त्यामुळे या गोवऱ्यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जायचा. त्याची तयार होणारी राख तिचा वापर भांडे घासण्यासाठी व्हायचा, किती ठिकाणी तर दात घासण्यासाठी देखील या राखुंडीचा वापर व्हायचा. झाडाच्या आळ्यामध्ये ही राख घातली जायची आणि त्यामध्ये नवीन बिया लावल्या जायच्या जेणेकरून नवीन रोपे लवकर तयार होतील हा उद्देश त्यामध्ये असायचा. होळीसाठी खास मुले घरोघरी जाऊन “होळीच्या गोवऱ्या पाच पाच गोवऱ्या नाही दिल्या तर…..”असे म्हणून बोंब मारतात. या जमवलेल्या गोवऱ्या पानगळ झालेली सारी पाने गोळा करून त्याची होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी याच होळीच्या राखेची धुळवड खेळली जाते ती राख एकमेकांच्या अंगाला फासली जाते.अजूनही होळीच्या राखे मध्ये. भोपळ्याचे वेल लावले जातात, कारल्याचे वेल लावले जातात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी कुठेही कधीही पुरणपोळी मिळायची नाही ती केवळ काही खास सणांना केली जायची त्यातलाच एक सण म्हणजे होळी. “होळी रे होळी पुरणाची पोळी”असे खास म्हटले जाते. पुरणपोळी खाण्यासाठी सर्वजण आतुरतेने होळीची वाट पाहायचे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

आगीपासून जीव अर्थहानी होऊ नये म्हणून या दिवशी आमचे पूर्वज अग्नीची प्रार्थना करत अशा अनेक घटनांची स्मृती म्हणून हा उत्सव संपूर्ण भारतात संपन्न करतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य होळीत टाकून नारळ अर्पण करतात व होळीत दूध टाकून तिचे विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी होळीच्या रक्षेला वंदन करून ती कपाळावर लावतात म्हणून या सणाला धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात फाल्गुन वद्य पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री-पुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्तरंगाने संगीताने व परस्परांतील प्रेम संबंधाने फुलले पाहिजे हा संदेश देण्यासाठी रंगपंचमी संपन्न केली जाते या मासातील पौर्णिमा व अमावस्या या तिथी १४ मन्वादी म्हणजे मन्वंतराच्या प्रारंभ तिथी आहेत दक्षिण हिंदुस्थानातील बहुसंख्य उत्सव या महिन्यात संपन्न केले जातात या पौर्णिमेला अशोक पौर्णिमा व्रत करतात या व्रतात पृथ्वी चंद्र व केशव यांची पूजा करतात गावातील तरुणांनी एकत्र जमून गाव स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करावा व त्याची होळी करावी परंतु लाकडांची होळी करू नये म्हणजे वृक्षहानी न होता गाव प्रदूषण व रोगमुक्त होईल अशी प्रथा आहे.होळी किंवा रंगपंचमीला अंगावर थंडगार पाण्याचे रंग उडवले जातात यातून ऋतूबदलाचा सुंदर संदेश दिला आहे तो म्हणजे आता थंडी संपली आहे उष्णतेच्या काहिलीत गरम पाणी हे आरोग्यास अपायकारक असते म्हणून होळी नंतर थंड पाण्याने स्नान करावे.आपले पूर्वज खूप श्रेष्ठ होते प्रत्येक ऋतुमानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सणवार निर्माण केले व त्यानुसार आपण वर्तन केल्यावर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक ऋतूचा आनंद घेता येऊ शकतो.

होळी जेव्हा रचली जाते तेव्हा त्याच्या मध्य भागात एरंडाच्या झाडाची मोठी फांदी ठेवली जाते. केवढा मोठा शास्त्रीय विचार आहे पहा याच्यामागे. एक कथा मी ऐकलेली येथे सांगावीशी वाटते. आफ्रिकेतील जंगलामध्ये काही लोक झाडे तोडून तेथे घर उभारण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या दिवशी तेथे लाकडाचे खांब उभे करतात, दुसऱ्या दिवशी येतात तर सगळे खांब अस्ताव्यस्त पडलेले असतात ते पुन्हा उभे करतात पुन्हा दुसऱ्या दिवशी अस्ताव्यस्त केलेले असते. पुन्हा उभे करतात आणि रात्री डबा धरून बसतात तर वानरांची एक टोळी येते आणि सर्व अस्ताव्यस्त करत असते तिसऱ्या दिवशी रात्री ते लोक तिथे खिरीचे भांडे ठेवतात आणि त्यामध्ये विष घालतात ठरल्याप्रमाणे वानरांची टोळी येते आणि त्या खिरीच्या भांड्या भोवती येऊन थांबते. त्यांच्यापैकी सर्वात वयस्क वानर येऊन त्या खिरीचा वास घेते व नंतर जंगलात जाऊन एरंडाचे लाकूड आणून खिरीच्या भांड्यामधून फिरवते आणि मग ती खिर ते सर्व वानरं खातात आणि त्या खिरीतील विष नष्ट झालेले असते आपल्याकडे होळीमध्ये ही एरंडाची फांदी ठेवण्याचे कारण म्हणजे होळी जेव्हा पेटवली जाते तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वापरलेले असतात व नंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण त्याची धुळवड आपल्या अंगाला फासतात त्यामुळे त्याचा काहीही अपाय होऊ नये व त्यात एखादे विषारी द्रव्य असेल तर ते नष्ट व्हावे म्हणून एरंडाच्या झाडाची फांदी होळीमध्ये ठेवली जाते जेणेकरून त्याची राख त्या सर्व धूळवडीमध्ये मिसळली जाईल व कोणाला काही अपाय होणार नाही किती मोठा शास्त्रीय दृष्टिकोन यामागे आहे पहा.

समाजात जसे चांगले लोक असतात तसेच वाईट प्रवृत्तीचे देखील लोक असतात. मानवी मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर वाईट भावना असतील तर तो त्या कोणासमोर बोलून दाखवू शकत नाही आणि मग ती प्रवृत्ती मनामध्ये कुठेतरी घर करून राहते ते वाईट विचार मनातले बाहेर पडावेत म्हणूनही होळीची निर्मिती झाली असावी होळी समोर सर्वजण काहीही वाईट शिवीगाळ करू शकतात, बोंबाबोंब करू शकतात जेणेकरून मनातील अपप्रवृत्ती नष्ट होऊन मन स्वच्छ आणि निर्मळ होईल. एकूण काय माणसाला मन मोकळे करण्यासाठी या होळीची निर्मिती झाली असावी.

होलीकोत्सवा मागची ही मानसशास्त्रीय बैठक आहे हुताशनी हे तिचे नाव अर्थपूर्ण आहे हुत म्हणजे हवन केलेले आणि अर्पण केलेले आणि अशनी म्हणजे खाऊन टाकणारी आपल्या दुर्भावना होळीत अर्पण केल्या तर ती त्या खाऊन टाकते असा भाव. फाल्गुन पौर्णिमा वर्षाची शेवटची पौर्णिमा यानंतर जी पौर्णिमा येते ती नव्या वर्षातील पौर्णिमा म्हणून या वर्षातील शेवटच्या पौर्णिमेला मनातील दुष्ट भावना ओकून होळीमध्ये टाकाव्यात हाच या उत्सवा मागचा मूळ हेतू असावा.

आयुर्वेदात सांगितले आहे जिथे जिथे डाळी शिजवून वापरल्या जातात तिथे साजूक तूप नाजूकपणे वापरायचे नाही म्हणजे सढळ हस्ते पोळीवर घ्यावे म्हणजे डाळीने वाढणारे पित्त कमी होते पण तुपाने कोलेस्ट्रॉल वाढेल याचे काय? त्यासाठी आपण करतो कटाची आमटी या आमटीतील काळा मसाला, कढीपत्ता, तमालपत्र इत्यादी कोलेस्ट्रॉल कमी करते.आहे की नाही वैज्ञानिक दृष्टिकोन.

आहे होळी

खा पुरणपोळी

वाटी तुपाची

आमटी कटाची

नका करू काळजी

आरोग्याची

फक्त पूर्वजांचे ऐकावे सारे

जीवनात येईल सुखाचे वारे

असीम प्रेमाचे महत्त्व श्रीकृष्णाने वृंदावनात राधिकेसोबत रास करून होळी खेळली आणि सर्व जगाला पटवून दिले. जगात प्रेम ही भावना नसेल तर माणूस सुखाने आयुष्य जगू शकणार नाही त्याच्या आयुष्यात कुठेतरी प्रेमाचा ओलावा हा असलाच पाहिजे हा गोड संदेश श्रीकृष्णांनी गुलाल उधळून,रास खेळून साऱ्या जगाला करून दिला.

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धुळवड… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

धुळवड ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आज  न्युजपेपरला धुळवडीची सुट्टी. धुळवड म्हंटली की चटकन नजरेसमोर येतं ते गोकुळ. तो नटखट किशनकन्हैय्या आणी त्या कान्हावर  जिवाभावाचं मानसिक प्रेम करणा-या त्या गोपिका. त्यामुळे एका मैत्रीणीच्या खास आग्रहास्तव ब-याच जणांना खूप आवडलेली पोस्ट आज परत एकदा मांडते आहे.

श्रीकृष्ण म्हणजे युगाचा महानायक, युगंधर. श्रीकृष्णाची अनंत रुपे, वेगवेगळी नावे. त्याचं  सगळ्यांना सगळ्यातं भावलेलं नाव म्हणजे कान्हा.

कान्हा म्हंटलं की अगदी जवळचा, आपल्याला समजून घेणारा सखा.

श्रीकृष्ण जितका जितका आपण जाणायला, समजायला पुढे पुढे जावं तितका तितका तो मारुती च्या शेपटीसारखा अनाकलनीय वाटतो. पण त्या कान्ह्याला जाणून घ्यायची ओढ पण स्वस्थ बसू देत नाही हे खरे.

आजपासून वीस वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साली श्रीकृष्णाच्याच कृपेने श्रीकृष्ण कळायला सुरवात झाली. प्रख्यात लेखक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी हळूहळू माझ्यासारख्या वाचकांच्या. बुद्धीस झेपेल, पचेल, आकलन होईल असा माझा कान्हा उलगडायला सुरवात केली. तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की आपल्याला आपला हा मधुसुदन किती कमी कळलायं. हिमनगाप्रमाणं. जेवढा कळलायं त्यापेक्षाही त्याच्या कितीतरी पट जास्त कळायचा राहिलायं.

“युगंधर “आणल्याबरोबर एकदा सलग वाचून काढलं. तरीही आता परत एकदा “युगंधर” वाचायला सुरवात केल्यानंतर असं जाणवलं की आपल्याला आपला हा मुरलीधर परत नव्याने कळतोयं. ” युगंधर”हे खूप अप्रतिम पुस्तक श्री. शिवाजी सावंत ह्यांनी कृष्णप्रेमींसाठी लिहीलयं. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तकं. आणि जो एकदा हे पुस्तक हाती घेईल तो हमखास नेहमी उशालगत कायम वाचण्यासाठी जवळ बाळगणारचं.

खूप सुंदर कृष्णाची विविध रुपं ह्यामध्ये उलगडून दाखविली आहेत. ह्यामध्ये महाभारता दरम्यान घडलेल्या कित्येक घटकांचा उलगडा वाचायला मिळतो.

ह्या पुस्तकातून कळतं श्रीकृष्णाला सखे अनेक

गुरु दोन, भगिनी तीन, माता-पिता दोन, तसेच बहु पत्नी, कन्या, पुत्र होते सख्या मात्र दोनच एक राधा आणि दुसरी द्रौपदी. “राधा”ह्या शब्दाचा नव्यानेच अर्थ कळलायं युगंधर मधून. “रा” मँहणजे लाभो किंवा मिळो, आणि “धा” म्हणजे मोक्ष, जीवनमुक्ती.

खरचं युगंधरची निर्मीती ही श्रीकृष्ण लीलांपैकीच एक लीला असावी. त्याच्या कृपेशिवाय एवढा अद्भुत अविष्कार शक्यच नव्हता.

आज गोकुळाष्टमीच्या निमीत्ताने मी परत माझी रचना सादर करतेय.

  गजबजलेल्या गोकुळात होता कान्हाचा वास,

त्या कान्ह्याला मात्र सदा दुधालोण्याची आस,

सगळ्यांची नजर चुकवून हट्ट पुरवी राधा,

असे हा प्रेमाचा खेळ सिधासाधा ।।।

नव्हता ह्या खेळात दोघांचाही स्वार्थ,

एकमेंकांची काळजी घेणे एवढाच ह्यात अर्थ,

मात्र राधाशिवाय कृष्णाचे जीवन होते व्यर्थ,

राधाकृष्णानेच केले प्रेमाचे नाव सार्थ ।।।

राधा होती मोठी, कृष्ण होता तान्हा,

प्रेमरज्जूंनी बांधल्या गेले राधा अन कान्हा,

वयामुळे नाही आली कधीच प्रेमात बाधा,

अशी ही राधाकृष्णाच्या प्रेमाची अलौकिक गाथा ।।

कृष्णाला कळली राधेच्या प्रेमातील खरी आर्तता,

राधेशिवाय कधी होणारच नाही श्रीकृष्णाची पूर्तता,

राधाकृष्णाच्या प्रेमाची गोष्टच न्यारी,

जरी कृष्णावरती प्रेम करीती सारी ।।।

सोडीताच गोकुळ सा-यांना वाटे भिती,

कसे होईल आता, कोमेजेल का ही प्रिती,

शरीर होती भिन्न पण जुळले आत्म्यांचे सूर,

म्हणून कोसो अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर

म्हणून हे अंतरही नाही करु शकले ह्या प्रेमाला दूर ।।

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सखा… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “सखा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

माणूस माणसाशी बोलताना नकळत हातात हात घेतो. सहज कृती आहे ती. जसा सहज श्वास घेतो तसा सहज जगू शकतो का ? याचे उत्तर बहुधा नाही असेच आहे. जगणे सोपे व्हावे म्हणून प्रत्येकालाच एक मितवा हवा असतो. तो प्रसंगी मित्र , तत्वज्ञ किंवा वाटाड्या, मार्गदर्शक होवू शकेल असा कोणीही आपल्याला हवाच असतो. बरेचदा काय होते , आयुष्यातला प्रॉब्लेम जेवढा मोठा तेवढे समोरचे आव्हान मोठे वाटू लागते. आव्हान आपल्या अहंकारला सुखावण्यासाठीच असते. मुळात अहंकार नसतोच पण तो निर्माण केला जातो. यात मुख्य सहभाग त्या लोकांचा असतो जे त्यांना स्वत:ला आपले हितचिंतक मानतात. एखाद्या छोट्या गोष्टीला डोंगराएवढी करण्यात त्यांचा पुढाकार असतो,  Psychoanalyst, गुरु मंडळी, तत्ववेत्ते तुमच्या नसलेल्या problems ना अस्तित्व देतात नाहीतर त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागेल. अडचणीत जर कोणी आलेच नाही तर ते मदत कोणाला करणार? हा ही प्रश्न उरतोच. खरेतर नक्की काय शोधत असतो आपण? नेमके काय हवे असते आपल्याला? याचा विचार का करत नाही आपण? आपण जे पचायला सोपे ते आणि तेवढेच स्वीकारतो आणि जे पटत नाही ते सोडून देतो. बरेचदा सरावाने आपल्याला कळत जाते काय घ्यायचे आणि काय नाही,  पण त्यातही आपली कुवत आड येतेच.

आपण सारेच तसे अर्जुन असतो.आपापल्या कुरूक्षेत्रांवर लढण्यासाठी ढकलले गेलेले अर्जुन..आणि प्रत्येकाला कोणी कृष्ण भेटतोच असे नाही.म्हणून आपल्याला स्वतःमधला कृष्ण  चेतवावा लागतो परिस्थितीप्रमाणे.. कृष्णच का ??..तर कृष्ण ही वृत्तीची तटस्थता आहे.आपल्या वर्तनाचा त्रयस्थ राहून विचार करणारी.स्वतःला ओळखण्यासाठी त्रयस्थ व्हा..आरसा व्हा स्वतःचाच ..” प्रत्येकात कृष्ण असतोच .तो कोणाला सापडतो , कोणाला भासमान दिसतो , कोणी कृष्ण होतो तर कोणी कृष्णमय…” अर्जुनालाही कृष्णमय व्हावे लागले तेव्हाच त्याला महाभारतीय युद्धाची आवश्यकता , त्यासाठीचे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचे असणे उमजले…” कृष्णायन ”

पण कृष्णायन म्हणजे गीता नव्हे.स्वतःला ओळखणे , स्वतःच्या अस्तित्वाचा हेतू ओळखणे , स्वतःच्या कोषातून बाहेर काय आहे याची जाणिव होणे म्हणजे गीता.एखादा कोणी जेव्हा म्हणतो की तुझ्याकडे कोणतीच कसलीच प्रतिभा नाही..तेव्हा हा विचार करावा कृष्णाने सांगीतलेला..दुस-या कोणापेक्षा तुम्ही स्वतः स्वतःला जास्त ओळखू शकता..तुमची ताकद , तुमची मर्यादा तुम्हाला माहिती हवी..असे कोणी म्हणल्याने तुमच्याकडे काही येत नाही तसे जातही नाही.ते असतेच अंगभूत.. माऊलींनी देखील स्वतःचा स्वतःमध्ये लपलेल्या अर्जुनापासून विलग होऊन कृष्णरुप होण्याचा प्रवासच जणु ज्ञानेश्वरीत मांडला आहे. आपल्याला काय काय हवे आहे ह्याची बकेट लिस्ट  नक्कीच करावी. पण आपल्याकडे काय काय आहे आणि नाही  हे आपल्याला कळले आहे का ह्याची लिस्टही जरुर करावी आणि ह्या कळण्यातही किती वाढ झाली हे पण पहावे. आपल्याकडे असलेल्याचा वापर आपण कसा करतो यावर आपले व्यक्तिमत्व घडते. “माझ्याबाबतीच असे का होते”? “त्याला मिळू शकते तर मग मला का नाही”?  असे प्रश्न पडत असतील तर आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कळलेच नाही हे पक्के ओळखावे. आयुष्य अनुभवानी आपल्याला समृद्ध करत असते. आणि श्रीमंत ही ! आपले असमाधान आपल्या अपेक्षांना जन्म देते त्यामुळे असे असमाधानी असण्यापेक्षा अप्रगतच असणेच  बरे नाही का?

चोरी फक्त गरजा भागवण्यासाठीच केली जाते असे नाही होत.  काहीजण गरजा लपवण्यासाठीही चोर्‍या  करतात. उघडपणे केले तर समाज बहिष्कृत करेल या भितीने चोरुन करतात. काय हवे,  काय नको हेच साठत जाते नंतर. काय हवे आहे आणि का हवे आहे  ह्याचा विचारच करायला विसरतो आपण. हे नाही, हे सुध्दा नाही. असे सगळेच नाकारून पहा एकदा, सर्व नकार संपले. . . की एक आणि एकच होकार उरेल. हेच हवे असते आपल्याला.  हेच असते आपले खरे सत्य, सत्व आणि अस्तित्व. मानवी प्रयत्न , मानवी जीवन , मानवी आकांक्षा या सर्वांमध्ये ..यासाठी प्रयत्न करणा-या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा परिपाक आपल्याला मानवतेच्या छटांचे दर्शन घडवत राहतो….” पिंडी ते ब्रम्हांडी ” जे मनात उपजते तेच आपण अंगिकारतो.हिग्ज बोसाॅन , क्वांटम थिअरी , ब्लॅक होल या संकल्पना ज्ञानेश्वरांनी अभ्यासल्या होत्या  की नाही हे माहिती नाही पण  ” मी विश्वरुप आहे ” ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली.प्रत्येकाने आहे आणि नाही यामधला अवकाश समजून घेतला पाहिजे ही जाणिव जिथे उमगते…तिथे कृष्ण भेटतो. ….

घनसावळ्या….

अजूनही थिरकतात मीरेची पावलं

तुझ्या त्या मुरलीच्या स्वरांवर

आजही बावरी होते राधा

तुला कदंबाखाली शोधताना

राधा काय किंवा  मीरा काय

तुझीच रुपं अद्वैत 

तू जादुगार. ..

बांबूच्या  पोकळीत स्वर गुंफून त्यांना सजीव करणारा

तुझ्या वेणुच्या स्वरांतून जन्मतात मानवी देहाचे

षड्ज

तू निराकार , साकार ,सगुण, निर्गुण

तूच सर्वत्र

तूच आदिम तूच अंतिम सोहळा

हे घनसावळ्या. …….

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘तो’ म्हणजे अर्थातच देव..! त्याची माझ्या मनात नेमकी कधी प्रतिष्ठापना झाली हे नाही सांगता यायचं. की कशी झाली असेल हे मात्र सांगता येईल. ‘देव’ ही संकल्पना माझ्या मनात कुणीही जाणीवपूर्वक,अट्टाहासाने रुजवलेली नाहीये. ती आपसूकच रुजली गेली असणार. दत्तभक्त आई-वडील, घरातले देवधर्म, नित्यनेम, शुचिर्भूत वातावरण, हे सगळं त्याला निमित्त झालं असणारच. पण रुजलेला तो भाव सर्वांगानं फुलला तो कालपरत्त्वे येत गेलेल्या अनुभूतीमुळेच!

हे रुजणं, फुलणं नेमकं कधीपासूनचं याचा शोध घेता घेता मन जाऊन पोचतं ते मनातल्या सर्वात जुन्या आठवणीपर्यंत.मी दोन अडीच वर्षांचा असेन तेव्हाच्या त्या काही पुसट तर काही लख्ख आठवणी. आम्ही तेव्हा नृसिंहवाडीला होतो. वडील तेथे पोस्टमास्तर होते. सदलगे वाड्याच्या भव्य वास्तूच्या अर्ध्या भागात तेव्हा पोस्ट कार्यालय होतं. आणि आमच्यासाठी क्वार्टर्सही.वडील आणि आई दोघांचंही नित्य दत्तदर्शन कधीच चुकायचं नाही. रोजच्या पालखीला आणि धुपारतीला वडील न चुकता जायचे.बादलीभर धुणं आणि प्यायच्या पाण्यासाठी रिकामी कळशी बरोबर घेऊन आई रोज नदीवर जायची. धुतलेल्या कपड्यांचे पिळे आणि भरलेली कळशी घेऊनच ती पायऱ्या चढून वर आली की आधी दत्तदर्शन घ्यायची आणि मग उजवं घालून परतीची वाट धरायची.आम्ही सर्व भावंडे तिची वाट पहात दारातच ताटकळत उभे असायचो.त्या निरागस बालपणातली अशी सगळीच स्मृतिचित्रं आजही माझ्या स्मरणात मला लख्ख दिसतात.त्यातलं एक चित्र आहे आम्हा भावंडांच्या ‘गोड’ हट्टाचं! पोस्टातली कामं आवरून वडील आत येईपर्यंत आईने त्यांच्या चहाचं आधण चुलीवर चढवलेलं असायचं. तो उकळेपर्यंत आई देवापुढे दिवा लावून कंदील पुसायला घ्यायची.अंधारून येण्यापूर्वी कंदील लावला की रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू करायची. तोवर चहा घेऊन देवाकडे जाण्यासाठी वडिलांनी पायात चप्पल सरकवलेल्या असायच्या.

“मुलांनाही बरोबर घेऊन जा बरं. म्हणजे मग मला स्वैपाक आवरून, तुम्ही येईपर्यंत  जेवणासाठी पानं घेऊन ठेवता येतील” आईचे शब्द ऐकताच आम्हा भावंडांच्या अंगात उत्साह संचारायचा.

“चला रेs”  वडीलांची हाक येताच आम्ही आनंदाने उड्या मारत बाहेर पडायचो.त्या आनंदाचं अर्थातच देवदर्शनाची ओढ हे कारण नसायचं.त्या वयात ती ओढ जन्माला आलेलीच नव्हती. त्या आनंद, उत्साहाचं कारण वेगळंच होतं. वडिलांच्या मागोमाग आम्हा बालगोपालांची वरात सुरक्षित अंतर ठेवून उड्या मारत मारत सुरू होई.दुतर्फा पेढेबर्फीच्या दुकानांच्या रांगा आज आहेत तिथेच आणि तशाच तेव्हाही होत्या. रस्ताही आयताकृती घोटीव दगडांचा होता. ती दुकानं जवळ आली की माझी भावंडं मला बाजूला घेऊन कानात परवलीचे शब्द कुजबुजायची. मी शेंडेफळ असल्याने त्यांची हट्ट करायची वयं उलटून गेलेली आणि मी हट्ट केला तर वडील रागावणार नाहीत हा ठाम विश्वास. मग त्यांनी पढवलेली घोषणा ऐकताच नुसत्या कल्पनेनेच माझ्या तोंडाला पाणी सुटायचं.डोळे लुकलुकायचे.न राहवून आपल्या दुडक्या चालीने धावत जाऊन मी वडिलांचा हात धरून त्यांना थांबवायचा प्रयत्न करायचो.

“काय रे?”

“कवताची बलपी..”

“आधी दर्शन घेऊन येऊ. मग येताना बर्फी घेऊ.चलाs..” ते मला हाताला धरून चालू लागायचे. काय करावे ते न सुचून मी मान वळवून माझ्या भावंडांकडे पहायचो. त्यांनी केलेल्या खुणांचा अर्थ मला नेमका समजायचा. मी वडिलांच्या हाताला हिसडा देऊन तिथेच हटून बसायचो.आणि माझ्या कमावलेल्या रडक्या आवाजात..’ कवताची बलपी’ घेतलीच पायजे..’ अशा बोबड्या घोषणा देत रहायचो. वडील थांबायचे. कोटाच्या खिशात जपून ठेवलेला एक आणा न बोलता बाहेर काढायचे.’अवधूत मिठाई भांडार’ मधून कवठाची बर्फी घेऊन ती पुडी माझ्या हातात सरकवायचे. त्यांनी तो एक आणा देवापुढे ठेवायला घेतलेला असायचा हे त्या वयात आमच्या गावीही नसे. न चिडता,संतापता, आक्रस्ताळेपणा न करता, कसलेही आढेवेढे न घेता माझा हट्ट पुरवणाऱ्या वडिलांच्या त्या आठवणी माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. कारण त्या ‘गोड’ तर आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या आठवणींना दत्तमंदिराच्या परिसराची सुरेख,पवित्र, शुचिर्भूत  अशी सुंदर महिरप आहे.

देव म्हणजे काय हेच माहीत नसलेल्या वयातली ही त्याच देवाच्या देवळासंदर्भातली सर्वात जुनी आठवण! ‘त्या’ची गोष्ट सुरू होते ती त्या आठवणीपासूनच! देवाची खरी ओळखच नसणाऱ्या माझ्या त्या वयात वडिलांमागोमाग चालणाऱ्या माझ्या इवल्याशा पावलांना, जीवनप्रवासातील अनेकानेक कठोर प्रसंगात खंबीरपणे उभं रहायचं बळ ज्याच्यामुळे मिळालं ‘त्या’चीच ही गोष्ट!

माझी कसोटी पहाणारे कितीतरी प्रसंग पुढे आयुष्यभर येत गेले.अर्थात या ना त्या रूपात ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. पण त्या प्रसंगातही माझ्या मनातली त्याच्याबद्दलची श्रद्धा कधी डळमळीत झाली नाही. त्या अर्थानं सगळेच प्रसंग माझी नव्हे तर त्या श्रद्धेचीच कसोटी पहाणारे होते. त्यापैकी अनेक प्रसंगात मी माझ्या मनातली ‘देव’ ही संकल्पना मुळातूनच तपासून पहायलाही प्रवृत्त झालो आणि पुलाखालून बरच पाणी वाहून गेल्यानंतरच्या आजच्या या क्षणीही त्या पाण्याबरोबर वाहून न गेलेली ती श्रद्धा तितकीच दृढ आहे !

माझ्या आयुष्यातल्या या सगळ्याच अनुभवांबद्दल लिहायला मी प्रवृत्त झालो खरा, पण हे अनुभव जगावेगळे नाहीत याची नम्र जाणीव मला आहे. तुमच्यापैकी अनेकांना ते तसे आलेही असतील.अशांना माझे हे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील.जे नास्तिक असतील त्यांनी निदान हे लिहिण्यासाठी निमित्त झालेल्या माझ्या श्रद्धेमागची माझी निखळ भावना समजून घ्यावी हीच माफक अपेक्षा!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जंगलाला धडकी भरली आहे –  लेखक – श्री शेखर नानजकर ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? विविधा ? 

☆ जंगलाला धडकी भरली आहे –  लेखक – श्री शेखर नानजकर ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

आता सुट्ट्या लागतील. मुलं आणि त्यांचे पालक, दोघेही मुक्त होतील. प्रत्येकजण शहराच्या या धकाधकीपासून कुठेतरी दूर जाण्याचं ‘प्लॅनिंग’ करू लागेल. कोणी दुसऱ्या शहरात, आपल्या नातेवाईकांकडे जायचं ठरवेल. कोणाला कोकण बघायचं असेल. कुणी ट्रेक ठरवेल. कुणी हिमालयातलं प्लॅनिंग केलेलं असेल. कुणाला सह्याद्रीचं वेड असेल. कुणाला जंगलात जायचं असेल. कुणाला वाघ पाहायचा असेल. कुणी स्वत:ला फोटोग्राफर मानत असेल. कुणाला पक्षी ‘कॅच’ करायचे असतील, कुणाला टायगर ‘ओव्हर’ झाला असेल, म्हणून ‘मायक्रो’ फोटोग्राफीच्या मागे असेल… पण एक नक्की, की एक मोठा लोंढा आता निसर्गात घुसेल.

निसर्गात जाण्याची प्रत्येकाची कारणं थोडीफार वेगळी असू शकतील. पण एक कारण मात्र सामायिक असेल, ‘मज्जा करायची!’ म्हणजे काय करायचं, तर असं काहीतरी करायचं की ज्यानं सगळ्यांना ‘मज्जा’ आली पाहिजे. आणि मज्जा करणारा हिरो ठरला पाहिजे. मग त्यासाठी काहीही वेडे चाळे, आरडाओरडी, विदुषकी चाळे, असं काहीही चालतं. जेणेकरून आपण आकर्षणाच्या केंद्राबिंदूशी असलो पाहिजे. असे सगळे चाळे आणि तमाशे आता पाहायला मिळतील…..

इकडे निसर्गात काय चाललेलं असेल…. थंडीची हुडहुडी कमी झाली असेल. पानगळ जोरात सुरु झाली असेल. काही झाडांना नवीन पालवी फुटू लागली असेल. ओढ्याची धार पूर्ण आटलेली असेल. खाचखळग्यात पाणी साचून पाणवठे तयार झाले असतील. त्या स्वच्छ आणि नितळ पाण्यात निवळ्या फिरू लागल्या असतील. खडकांवर बसून बेडकं जमेल तितकं ऊन खात असतील. नखा एवढे मासे पाण्यात फेर धरू लागले असतील. ‘नावाडी’ किडा पाण्यावर पुढं मागं करत वेळ काढत असेल. पाणतळीच्या दगडांच्या सपाटीतून खेकडे नांग्या बाहेर काढत असतील. मधमाश्या आणि फुलपाखरं पाण्यावर घोंगावू लागली असतील. पाणतळीचं शेवाळ अजूनही हिरवं गारच असेल. मैदानावरची गवतं वाळून गेली असतील. पक्षी आता काटक्या शोधू लागले असतील.

वसंत आताशा सुरू होतोय. अजून झाडांना फुलं लागायची आहेत. काहींना कळ्या धरल्या आहेत. पण पक्षी आत्ता पासूनच घिरट्या घालू लागले आहेत. नर मादी एकमेकांना खुणवू लागले आहेत. आता पळस फुलेल, पांगारा फुलेल, कडूनिंब फुलेल, करवंदाना फुलं लागतील, जांभळाला फुलोरा येईल, बहावा पिवळा जर्द फुलेल. अंजनाच्या जांभळ्या फुलांनी हिरवाई की जांभळाई असा प्रश्न पडेल.

मधमाश्या घोंगावू लागल्या आहेत. कळ्यांची फुलं व्हायची वाट पाहू लागल्या आहेत. त्यांना त्यांची पोळी मधानं भरायची आहेत. अस्वलं त्याचीच वाट पाहत वेळ काढतायत. लिंबोण्या, जांभळं, करवंदं, आंबे… फळांचा नुसता खच पडेल. वानरं सुखावतील, सांबरं, भेकरं, गवे यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. उदमांजरं, जावडीमांजरं, साळींदरं नवीन बीळं उकरू लागतील.

येणार, येणार, वसंत येणार… फळाफुलांनी जंगलं भरून जाणार! पुरेसं पाणी, मुबलक फळंफुलं. आता मिलन, प्रजोपात्ती आणि त्याचं संगोपन! सगळं जंगल आनंदात आहे….!

आणि इतक्यात बातमी आली, दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या…… येणार येणार पर्यटकांचा लोंढा येणार… जंगलाची शांतता, एकांत, स्वच्छता… काय होणार त्याचं?

सगळ्यात आधी पाणवठे घाबरले! इतर सगळे जीव फक्त गरजेपुरतंच पाणी वापरायचे. फक्त प्यायला! आता माणूस येणार, त्याला खूप पाणी लागतं…. प्यायला पाणी, धुवायला पाणी, शिजवायला पाणी, खेळायला पाणी, नासायला पाणी… तो पाण्यात खेळणार, काहीही बुचकळणार, पाणवठ्यात काहीही फेकणार.. भांडी विसळणार, चुळा भरणार… मग त्या पाण्यातल्या जीवाचं काय? खरं तर या पाण्यावर पहिला हक्क त्यांचा! त्यांनी कुठं जायचं? पाण्यावर येण्याऱ्या पक्ष्यांनी कुठे जायचं? सगळ्या बाजूनं माणसंच राहायला असतील तर जंगलातल्या प्राण्यांनी पाणी कुठं प्यायचं? स्वच्छ, नितळ पाणवठा आता गढूळ होणार, खराब होणारं… त्याला रात्रंदिवस माणसं चिकटणार.. त्याचे नेहेमीचे सवंगडी त्याला भेटू शकणार नाहीत… एखाद्या बंदिवानासारखा पाणवठा आता माणसाच्या कैदेत रहाणार! पाणवठ्याला खूपच वाईट वाटू लागलं….. सुट्ट्या लागल्या… माणसं येणार…. पण तक्रार कुणापाशी करायची?

पायवाटांनाही दाटून आलं.. आत्ता पर्यंत पायवाटांवरून प्राणी जायचे, त्यांच्या खूरांच्या, पंज्यांच्या ठश्यांनी वाट सजायची.. सांबरांची, भेकरांची लेंडकं जागोजाग दिसायची… फळांनी, बियांनी वाटा सजून जायच्या… आता वाटांवर बुटांचे ठसे दिसतील, फळं, बिया, चिरडल्या जातील, प्राण्यांच्या पाउलखुणा पुसल्या जातील, लेंड्या चिरडल्या जातील, मुंगळ्यांची रांग वाटेवरून जात असेल तर ती चिरडून सपाट होईल. वाटेवर आडवी बांधलेली कोळ्यांची जाळी तटातट तुटतील, वाटेवर प्लास्टिक, चांद्या, सिगारेटी, त्यांची पाकीटे, बिसलरीच्या बाटल्या यांचा खच पडेल… जंगलातली जिवंत पायवाट एखाद्या कलेवरासारखी दिसू लागेल. पायवाटांना खूपच वाईट वाटू लागलं……. पण तक्रार कुणापाशी करायची?

झाडंही हेलावली. आत्तापर्यंत त्यांच्या अंगाखांद्यावर वानरं खेळत असायची, शेकरं उड्या मारत असायची, पक्षी उतरायचे, घरटी करायचे, अस्वलं झाडं येंगायची, वाघळं लटकायची, सरडे फिरायचे, मुंगळे रांगा लावायचे… आता माणसं येतील, झाडांवर चढतील, फुलं तोडतील, फळं तोडतील, फांद्या ओरबाडतील, काटक्या तोडतील, त्याच्या शेकोट्या करतील…. झाडांना जे, पक्ष्या – प्राण्यांना द्यायचं होतं ते माणूस खाऊन जाईल… त्याचा विध्वंस करेल…. सुट्ट्या लागल्या, कसं आवरणार या माणसाला? झाडं हिरमुसून गेली.. पण तक्रार कुणापाशी करायची?

दिवसभर पक्षी पाणवठ्याच्या चकरा मारायचे. धोबी यायचे, हळदे यायचे, स्वर्गीय नर्तक यायचे, होले यायचे, सातभाई यायचे, वंचक, सुतार, गरूड, शृंगी घुबडं, खाटिक, खंड्या, बंड्या, कितीतरी पक्षी दिवसरात्र पाण्यावर यायचे. त्यातले काही पाणवठ्यापाशीच राहायचे! आजूबाजूच्या कपारीत, फांद्यांमध्ये त्यांनी घरटी केली होती. काहींनी जोडीदार शोधले होते. दोघं मिळून घरट्यासाठी काड्या काटक्या गोळा करत होते. जंगलाच्या शांततेत आता पर्यंत फक्त त्यांचेच नाजूक स्वर तरंग उठवत होते. वसंताच्या आगमनानं पक्षीगण आनंदला होता, मोहोरला होता. इतक्यात बातमी जंगलात पसरली…. सुट्ट्या लागल्या… माणसांची झुंड निसर्गात घुसणार… अराडाओरडी होणार, जंगलात धूर पसरणार… माणूस पाणवठे काबीज करणार…. त्यात घाण करणार,,, पाणी नासवून टाकणार… आता पाणी कुठे प्यायचं? खंड्यानं कुठल्या पाण्यात बुचकळ्या मारायच्या…. मासे कसे धरायचे? वंचकानं कुठल्या पाणवठ्यात ध्यान लावायचं? पाण्यावरचे किडे धोब्यानं कुठे शोधायचे? दोन महिने तरी आता पाणी माणसाच्या ताब्यात रहाणार! अवघा पक्षीगण चिंतेत बुडाला….. पण तक्रार कुणापाशी करायची? साकडं कुणाला घालायचं?

ओढे आत्ताच आटलेत. आता पाणवठेही कमी कमी व्हायला लागतील. तसंही दिवसभर पाण्यावर जाताच येत नाही. जीवाची भीती असते प्राण्यांना! अंधार पडता पडता पाण्यावर यावं लागतं. रात्रभरात मधून मधून पाण्यावर जाता येतं, पण अंधार असे पर्यंतच! सूर्य बुडाला, थोडं कडूसं पडलं, की आळीपाळीनं प्राणी पाण्यावर जायचे. एकमेकांना टाळून जायचे. दिवसभराचा तहानलेला घसा पाण्यानं ओला करून घ्यायचे. पोट भरून पाणी प्यायचे. पुन्हा पाणी कधी मिळेल सांगता यायचं नाही. पण पाणी पिण्यासाठी पाणवठा त्यांची हक्काची जागा होती. तिथे शांतता होती, समाधान होतं!….. आणि त्यांच्याही कानावर ती बातमी आदळली….. सुट्ट्या लागल्या.. माणसांच्या झुंडी जंगलात घुसणार… पाणवठ्यांच्या बाजूनं मुक्काम करणार… रोज नवनवीन झुंडी….! रात्रभर शेकोट्या करणार, गाणी गाणार, नाचणार, आरडाओरडी करणार, धिंगाणा करणार… निरव शांततेच्या पाठीवर चाकूनं ओढल्यासारखे चरे ओढणार… दिवसभर जंगल तापणार, तहानतहान होणार. दिवसा तर पाण्यावर जाणं शक्यच नसतं, पण आता रात्री सुद्धा पाण्यावर कसं जायचं? तसाच धीर धरून कसाबसा पाण्यापाशी पोहोचलो आणि कुण्या माणसानं पाहिलं तर? आरडाओरडी होणार, लोक त्या प्राण्याच्या मागे पळणार, त्याचे फोटो का काय ते काढण्यासाठी धावपळ होणार… कदाचित काही लोक त्या प्राण्याला मारायलाही सरसावतील. जीव मुठीत धरून त्या प्राण्याला पळावं लागेल… मग तहानलेल्या त्या जीवाचं काय होणार? त्याला पुन्हा पाणी कधी मिळणार?…. नेमके हे उन्हाळ्याचे अवघड दिवस, आणि त्यातून हा जंगलात घुसणारा माणसांचा लोंढा… काय करावं? कुणाला सांगावं? सगळं प्राणी कुळ चिंतेत पडलं…. सुट्ट्या लागल्या… सुट्ट्या लागल्या…!  ओढ्यांचं धाबंच दणाणलं!…. पण तक्रार कुणापाशी करायची?

 जंगलाला धडकी भरली आहे…. आता सुट्ट्या लागल्या आहेत …..!

 लेखक – श्री शेखर नानजकर

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्या तीन चार दिवस झालेय विदर्भातील हवामान एकदम बदललयं.दिवसभर ऊनं असतं आणि अचानक संध्याकाळ झाली की जणू पूर्ण आभाळ घेरुन येतयं.अंधार पसरतो.सगळीकडे मळभ दाटल्यागतं उदास वाटू लागतं.मार्च एंडिंगच्या कामामुळे तसही संध्याकाळी सहा वाजतातच बँकेतून निघायला.

अशाच कालच्या संध्याकाळी स्कुटरवरुन परत येत असतांना अंधारुन आलं, सगळीकडे गच्च झालेल्या आभाळानं उदासलेलं वाटू लागलं. गार वारं वाहू लागलं. हवामान आणि वातावरणात सुध्दा एक प्रकारची नैराश्येची चादर पसरल्यागतं वाटतं होतं.

तेवढ्यात पावसाच्या पाण्याचे अलगद टपटप दोन तीन थेंब अंगावर पडले आणि काय सांगू ह्या अगदी इटुकल्या पिटुकल्या दोनचार पाण्याच्या थेबांनी वातावरणातील एकदम नूरच पालटला. गाडीने मस्त आपोआप स्पिड घेतला. हिंदी गाणे आठवायला लागले. आतापर्यंत गाडी चालवणे कंटाळवाणं वाटतं होतं ते अचानकच हवहवसं वाटू लागलं.अगदी “ए हँसी वादियाँ, ये खुला आसमाँ” गत फील आला बघा. ह्या पाण्याच्या दोनचार थेंबांनी अगदी जादूच करुन टाकली.आणि त्या क्षणी पाण्याला “जीवन” ह्या अर्थपूर्ण शब्दानी का संबोधतात हे परत एकदा नव्याने कळलं.

22 मार्च .”जागतिक जलदिन”

संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युएनओ च्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 साली “फर्स्ट वर्ल्ड वाँटर डे” घोषित केला.ह्याचं सगळं श्रेय डॉ. माधवराव चितळे ह्यांना जातं. त्यामुळेच 2015 साली जलदिनाच्या रौप्य महोत्सवाच्या निमीत्ताने त्यांना “स्टाँक होम” ह्या जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

मी एक शेतकरी पण असल्याकारणाने माझ्यालेखी खरोखरच पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.कारण शेतीचा श्रीगणेशा करतांना आधी ह्या पाण्याशिवाय,जीवनाशिवाय एक पाऊलही पुढे  टाकता येत नाही. आधी पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि मगच ह्या पाण्याचे स्त्रोत तयार होऊन शेतीला,पिण्यासाठी ह्याचा उपयोग होईल.

दुर्दैवाची गोष्ट तर अशी आहे की दिवसेंदिवस जंगल आणि रिकाम्या जमीनी कमीकमी होतात आहे आणि त्याची जागा अजस्त्र इमारती, सिमेंटची जंगल ह्यांनी घेतलीयं. लोकांना व सरकारला पाण्याचा व शेतात पिकणाऱ्या पिकापेक्षा निवा-याचा,घरांचा प्रश्न खूप मोठा वाटतोय. माझ्या बघण्यात असे कितीतरी लोकं आहेत की ज्यांच्याकडे राहत्या घराशिवाय दोन चार घरं,फ्लँट गुंतवणूक म्हणून रिकामी घेऊन पडलीय.मध्यंतरी एक छान आर्टीकल वाचायला मिळालं होतं. त्यात लिहीलं होतं राहण्यासाठी प्रत्येकाला एक घरच फक्त घेता येईल बाकी सगळी जमीन जंगलं, शेती, वेगवेगळी पिके ह्यासाठी वहिवाटीत आणता आली तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित.

अर्थात हे कोण्या एकट्याचे काम नव्हे. हे सरकार आणि त्यांना बरोबरीने साथ देणारी जनता असेल तरच हे शक्य आहे.कुठल्याही सरकारच्या आणि जनतेतील प्रत्येकाच्या मनात स्वार्थ, बुभूक्षिता सारखी हावरी वृत्ती ह्याबद्दल चीड निर्माण होऊन फक्त आणि फक्त देशप्रेमाची ज्योत मनात तेवत राहील तेव्हाच हे शक्य होईल. त्यामुळे सध्याची सगळी अवतीभवती ची परिस्थिती बघता आपण ह्या चांगल्या दिवसांचा,चांगल्या वृत्तीचा विचारही करु शकत नाही.

पाण्याचा स्त्रोत प्रदुषित न करणे,योग्य व आवश्यक तितकाच पाण्याचा वापर ह्या किमान गोष्टी तरी प्रत्येकाने पाळल्या तरच ठीक अन्यथा पाणी पाणी करीत सगळा -हास होण्याचा दिवस काही दूर नाही.

सरकारने चांगल्याचांगल्या योजनांसाठी प्रामाणिकपणे फंड उपलब्ध करून द्यावा, अधिकारी वर्गांनी प्रामाणिकपणे पणे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्या फंडाचा त्याच लोकोपयोगी कामासाठी विनीयोग करावा व जनता जनार्दनाने त्या दिलेल्या गोष्टींना जागून आपल्या देशाचा विकास व उन्नती कशी होईल ह्याकडे लक्ष पुरवावं. अशी त्रिमूर्ती ची एकजुट आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करेल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गाव बदलाचा ‘पाडोळी’ प्रयोग…” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “गाव बदलाचा ‘पाडोळी’ प्रयोग…” ☆ श्री संदीप काळे ☆

धाराशिवमध्ये ‘फॅमिली गाईड’च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपवून मी आता लातूरकडे निघत होतो. तितक्यात ज्येष्ठ पत्रकार, माझे मित्र योगेंद्र दोरकर (नाना) आले. सकाळपासून मी नाना यांची वाट पाहत होतो. चहापान झाल्यावर नाना मला म्हणाले, ‘‘मी मुंबईवरून माझे मित्र शेषराव रावसाहेब टेकाळे यांनी सुरू केलेला प्रोजेक्ट बघायला आलोय. महावितरणमध्ये ते इंजिनिअर होते. आता ते सेवानिवृत्त झालेत. त्यांनी त्यांच्या गावी सुरू केलेल्या ‘मागे वळून पाहताना’ या उपक्रमाला खास भेट देण्यासाठी मी आलोय. तो उपक्रम समजून घेऊन मलाही माझ्या गावात तसा उपक्रम सुरू करायचा आहे.’’

टेकाळे यांनी सुरू केलेला तो उपक्रम नेमका काय आहे? तो कशासाठी सुरू केला? त्याचे स्वरूप नेमके काय आहे, हे सगळे मी दोरकर नाना यांच्याकडून समजून घेत होतो. खरं तर मलाही तो उपक्रम पाहण्याची उत्सुकता लागली होती. आम्ही रस्त्याने निघालो. काही वेळामध्येच लातूर-बार्शी रोडवर असलेल्या ‘पाडोळी’ या गावात आम्ही पोहोचलो.

टेकाळे आमची वाटच पाहत होते. त्या उपक्रमाच्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होते. लहान मुलांसाठी इंग्रजी शाळा, मुलांना कुस्ती, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, तरुणांची स्पर्धा परीक्षा, महिला बचत गटाचे प्रशिक्षण हे सारे काही तिथे सुरू होते. समोर भारत मातेचे मंदिर होते. टेकाळे म्हणाले, ‘‘चला अगोदर भारत मातेचे पूजन करू या. मग तुम्हाला मी सर्व प्रोजेक्ट दाखवतो.’’

दर्शन घेऊन आम्ही तो सारा प्रोजेक्ट पाहत होतो. ती कल्पना जबरदस्त होती, तिथे होणारी सेवा अगदी निःस्वार्थपणे होती. ते पाहताना वाटत होते, आपण हे सर्व आपल्या गावी करावे. लहान मुले, महिला, तरुण, शेतकरी, वृद्ध माणसांसाठी एकाच ठिकाणी सर्वकाही शिकण्यासाठी, मनोरंजनासाठी, माहितीसाठी, नवीन स्वप्न पाहण्यासाठी जे जे लागणार होते, ते ते सर्व काही तेथे होते.

ही संकल्पना, हा उपक्रम नेमका काय आहे. हे सारे आम्ही टेकाळे यांच्याकडून समजून घेतले. जे गावाशी संबंधित आहेत, ज्यांनी गाव सोडून बाहेर आपल्या मेहनतीमधून साम्राज्य उभे केले, त्या, गावाशी नाळ जोडलेली असणाऱ्या प्रत्येकाला कुठे ना कुठे वाटत असते की आपण आता खूप मोठे झालो. आता आपण आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काहीतरी केले पाहिजे. त्या प्रत्येकासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे एक उतम उदाहरण होते. तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी दोरकर नाना यांच्यासारखे अनेक जण आले होते.

आम्ही प्रोजेक्ट पाहत होतो. तितक्यात आमची भेट विजय पाठक यांच्याशी झाली. पाठक रत्नागिरी जिल्ह्यातील होते. पाठक डीवायएसपी म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना त्यांच्या गावासाठी काहीतरी करायचे होते. यासाठी त्यांनी टेकाळे बंधू यांच्या पाडोळी येथील ‘मागे वळून पहा’ या उपक्रमास भेट दिली. भेटीमध्ये पाठक म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी आयुष्यभर गावाची पूजेच्या माध्यमातून सेवा केली. त्यांचीही इच्छा होती, गावासाठी काहीतरी करावे. आता हा उपक्रम मी माझ्या गावात सुरू करणार आहे.’’

मी ‘व्हिजिटर बुक’ पाहत होतो. तिथे रोज हा उपक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मी, दोरकर नाना, टेकाळे, त्यांचे भाऊ अशी आमची गप्पांची मैफल रंगली. ज्याला आपल्या माणसांविषयी, मातीविषयी आत्मियता असते. तेच या स्वरूपाचा उपक्रम राबवू शकतात हे दिसत होते.

पाडोळी जेमतेम दोन-अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव. पाडोळीच्या आसपास अशीच छोटी-छोटी बारा-पंधरा गावे असतील. पाडोळी, पिंपरीसह ही सर्व गावे या प्रोजेक्टचा भाग होती. राज्यातल्या कानाकोपऱ्यामधून या उपक्रमाला आपलेसे करणाऱ्यांची संख्याही खूप होती.

वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती करणाऱ्या पाच भावांनी ठरवले, आपण आपल्या गावासाठी चिरंतन टिकणारे काहीतरी करायचे‌ त्यांनी मनाशी हा चंग बांधला होता. जनक टेकाळे हे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम करायचे. तरुणाईला नेमके काय द्यायचे म्हणजे ते बुद्धीने मोठे होतील हे ठरवून त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केले.

सूर्यकांत टेकाळे, रमाकांत टेकाळे, जनक टेकाळे, शेषराव टेकाळे, शशिकांत टेकाळे हे पाच भाऊ, या पाच भावांमध्ये जनक आणि शेषराव हे दोघेजण शासकीय नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे. या दोघांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावले. आई-वडिलांना अपेक्षित असणाऱ्या कुटुंबासाठीचे कर्तव्यही पार पाडले.

आपल्या गावासह पंचक्रोशीत असणाऱ्या सर्व गावांसाठी आपण पाठीराखा बनून काम करायचे या भावनेतून त्यांनी ‘किसान प्रतिष्ठान’ची स्थापना केली. ‘किसान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी शहर आणि गावामधली पूर्णतः दरी कमी करायचे काम केले. कोणाची मदत न घेता पदरमोड करून या कामामधून हजारो शेतकरी आधुनिक शेतीकडे वळवले. युवक गावातून शहराकडे जाण्यासाठी स्वप्न पाहू लागले. सरकारी मानसिकतेमध्ये अडकलेली अनेक कामे तातडीने मार्गी लागू लागली.

या प्रोजेक्टच्या कामाची १९९७ ला सुरुवात झाली. पिंपरीला टेकाळे बंधूंच्या आई केवळाबाईंच्या नावाने जमीन होती. ती जमीन या उपक्रमासाठी कामाला आली. तिथे भारत मातेचे मंदिर उभारले गेले. ज्या भारत मातेसमोर प्रत्येक जाती धर्मातला माणूस येऊन हात जोडत नतमस्तक व्हायचा. तिथे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू झाले. आज त्या वाचनालयात चार हजार पुस्तके आहेत.

लोकांसाठी काहीतरी करायचे एवढ्यापुरते आता हे काम मर्यादित राहिलेले नव्हते, तर बेसिक लागणाऱ्या इंग्रजी मीडियमच्या शाळेपासून ते यूपीएससीच्या शिकवणीपर्यंतचा सगळा मेळ एकाच ठिकाणी बसवला गेला. ‘एव्हरेस्ट’ इंग्रजी स्कूलमध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा इंग्रजी भाषेची कास धरू लागला. ध्यानगृह, शिशुगृह, घोड्यावर बसण्यापासून ते गाडी चालवण्यापर्यंत सगळे विषय एकाच ठिकाणी शिकवणे सुरू होते.

स्वच्छता अभियानामध्ये पाडोळी गाव पहिले आले. असे अनेक सुखद धक्के या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या अनेक गावांना मिळू लागले. पाहता पाहता पंचक्रोशीत, जिल्हा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या उपक्रमाची माहिती पोहोचली. लोक पाहायला येऊ लागले. ‘मी माझ्या गावासाठी मागे वळून पाहिले पाहिजे’ मी माझ्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, ही मनामध्ये असलेली छोटीशी इच्छा हा प्रयोग जाऊन पाहिल्यावर विशाल रूप धारण करू लागते.

आम्ही प्रोजेक्टवर सगळीकडे फेरफटका मारत होतो. टेकाळे यांच्या आई केवळाबाई वय वर्षे ९२. त्यांच्या मुलाविषयी, तिथे झालेल्या कामाविषयी अभिमानाने सांगत होत्या. “गावकुसात असणाऱ्या बाईच्या आयुष्यात चूल आणि मूल या पलीकडे काहीही नसते. पण माझ्या मुलांनी दाखवून दिले, गावातली मुलगी, महिला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन तिचे कौशल्य दाखवू शकते. अभ्यासामध्ये हुशार असलेली मुलगी परदेशात जाऊन करिअर करू शकते. ज्या महिलेला घरच्या घरी चटणी बनवता येते ती जगातल्या बाजारपेठेत तिची चटणी विकू शकते. हे सगळे पाहायला पोराचा बाप पाहिजे होता, तो बिचारा खूप लवकर गेला,” असे म्हणत टेकाळे यांच्या आई चष्मा काढून अश्रूने भरलेले डोळे पुसत होत्या.

जनक आणि शेषराव या दोन भावांनी मिळून या कामाला प्रचंड गती दिली होती. हे दोघे जण शासकीय अधिकारी होते. आता सेवानिवृत्तीनंतर या दोघांनाही प्रचंड वेळ मिळतो, ज्या वेळेमध्ये त्यांनी तिथल्या कामाला अधिक गती दिली आहे.

जनक मला सांगत होते, प्रत्येकाला सतत वाटत असते, आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. सुरुवात काय करायची आणि सुरुवात केल्यानंतर त्याला गती कशी द्यायची, हा विषय होताच होता. आम्ही सुरुवातही केली आणि त्याला गतीही मिळवून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी आणि उद्योगाच्या प्रशिक्षणातून जेव्हा शेकडो युवक कामाला लागले. तेव्हा कळले की आपले काम किती मोठे झाले.

शेषराव टेकाळे (9594935546)  म्हणाले, ‘‘आमच्या वडिलांना सामाजिक आस्था जबरदस्त होती. लोकसेवा करायची तर त्याचा इतिहास झाला पाहिजे, हे ते सातत्याने सांगायचे. त्यातून मग आम्हाला प्रेरणा मिळाली.’’

मी, दोरकर नाना, टेकाळे बंधू, त्यांची आई, आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. तिथल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मुलांशी, महिलांशी, माणसांशी आम्ही बोलत होतो, ती माणसे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप समृद्ध झाल्याचे जाणवत होते. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या स्वयंपाकाचा मेनू आमच्यासमोर आला. जेवण झाले. आम्ही सर्वांचाच निरोप घेऊन निघालो. आईने माझ्या गालावर हात फिरवून कडकड बोट मोडले. “पुन्हा लवकर या भेटायला”, असा आग्रहही धरला.

आम्ही रस्त्याला लागलो. मी, दोरकर नाना गाडीमध्ये चर्चा करत होतो. जिथे आत्मियता आणि निःस्वार्थीपणा असतो तिथल्या कामाला चार चांद लागतात. असेच काम टेकाळे बंधूंनी त्यांच्या गावामध्ये उभे केले होते. केवळ पाडोळी, पिंपरी ही दोन गावे नाही तर शेकडो गावं या कामाचा आदर्श घेऊन कामाला लागले होते. जे हात गावातल्या मातीमध्ये मिसळून सुगंधित झाले, त्यांनी शहरांमध्ये त्या सुगंधातून कीर्ती मिळवली. अशा प्रत्येक हातालाही गावाच्या मातीची ओढ अजून निश्चितपणे आहे. आता खूप झाले, आपण ते मागे वळून पाहू. चांगले काम करण्यासाठी पुढाकार घेऊ.

तुम्हालाही तुमच्या गावाची ओढ निश्चित असेल. तुम्हालाही वाटत असेल, आपण आपल्या गावासाठी ‘मागे वळून पाहिले पाहिजे’, पण सुरुवात कशी करायची हे पाहायला एकदा तुम्हाला पाडोळीला नक्की जावे लागेल. बरोबर ना…!

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रीमंतांची चलती तेथे गरिबांची गळचेपी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “श्रीमंतांची चलती तेथे गरिबांची गळचेपी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

*श्रीमंतांची चलती येथे गरिबांची गळचेपी* ही ओळ मुळातच समाजातील विषमता दर्शवते. श्रीमंत आणि गरीब असे दोन निराळे भाग पाडते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीचे दर्शन घडवते. शिवाय श्रीमंत कसे पाॅवरफुल आणि गरीब कसे बिच्चारे, दुर्बळ असा एक मनोभेद अधोरेखित करते. नकळतच एकीकडे तिरस्कारयुक्त भावना आणि त्याचवेळी दुसरीकडे सहानुभूतीचा एक दृष्टिकोन आपोआपच तयार होतो.या ओळीत अवरोध आहे. उपहास आहे.

या विषयावर लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात एक सहज विचार आला की श्रीमंत कोणाला म्हणायचे आणि गरीब कोणाला म्हणायचे? श्रीमंत आणि गरीब यांच्या नक्की व्याख्या कोणत्या? ढोबळमानाने आपण असं म्हणूया जे धनवान आहेत, ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे, ज्यांच्या पायाशी जणू लक्ष्मी लोळण घेते ते श्रीमंत आणि ज्यांना सकाळ संध्याकाळच्या जेवणाची ही भ्रांत आहे, अन्न— वस्त्र— निवारा या प्राथमिक गरजांपासून जे वंचित आहेत ते गरीब.
यापेक्षा अधिक निराळ्या व्याख्याही असू शकतात. श्रीमंत ते आहेत ज्यांच्या हाती सत्ता आहे. आणि गरीब ते आहेत ज्यांना सत्ताधारींच्या हाताखाली गुलामगिरीचे जीवन जगावे लागत आहे आणि अशा अहंकारी, अरेरावी करणाऱ्या, सत्तेचा माज असलेल्या लक्ष्मीपुत्रांकडून गरिबांची मुस्कटदाबी होते, गळचेपी होते. लाचारी आणि मानहानीचे जीवन त्यांना जगावे लागते आणि अशा श्रीमंत माणसांच्या मनोवृत्तीमुळे ही दरी अधिकाधिक रुंदावत जाते.

तरीही नक्की कोण किती श्रीमंत आणि कोण किती गरीब हे एका व्यापक सामाजिक दृष्टीतून पाहिले तर ते ठरवणे ही कठीण आहे. ते बरंचसं भोवतालची परिस्थिती, त्या त्या समाजातलं त्यांचं असणं, जीवन पद्धती आणि गरजा यावरही अवलंबून आहे.म्हणजे बघा मी माझ्या मदतनीसाबरोबर माझ्या आर्थिक स्थितीशी तुलना केली तर मी श्रीमंत आहे पण मी माझी अंबानीशी तुलना केली तर गरीबच नाही का? थोडक्यात या आर्थिक स्थितीचं हे गणित काहीसं रिलेटिव्ह आहे.

तुलनात्मक आहे.

मी मुंबईत किंग जाॅर्ज हायस्कूल मध्ये काही काळ शिक्षिका होते. सातवीपर्यंतच्या मुलांना मी भाषा हा विषय शिकवत असे. त्यावेळी मी मुलांना *गरिबी* या विषयावर निबंध लिहायला दिला होता. एकीने लिहिलेला निबंध माझ्या अजूनही लक्षात आहे.

तिने लिहिले होते,

“नंदा माझी मैत्रीण आहे. ही माझी मैत्रीण खूप गरीब आहे. त्यांच्याकडे खूप जुन्या मॉडेलचा फ्रिज आहे. त्यांच्या हॉलमधला गालीचा फाटलेला आहे. त्यांच्या बंगल्यांच्या भिंतींना रंग लावलेला नाही आणि त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे.” आणि असे बरेच काही तिने लिहिले होते जे वाचून मला हसावे की रडावे समजेना. आणि मग जाणवले की श्रीमंतीतच वाढणार्‍यांना गरिबी कशी समजणार? गरिबी ही एक सोसण्याची स्थिती आहे. “जावे त्याच्या वंशा आणि त्यांनाच कळे” अशी परिस्थिती आहे.

तेव्हां श्रीमंतांची चलती येथे गरिबांची गळचेपी हा या मनोवृत्तीचा परिणाम आहे.

श्रीमंत नेहमीच पुढे जातात आणि गरीब मागे राहतात. *दाम करी काम* किंवा *रुपया भवती फिरते दुनिया* असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे नाही. कारण ती सत्य परिस्थिती आहे. पैशाने सारे काही विकत घेता येते. दुनिया उलट पालट करता येते. पैशाचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की कुठल्याही क्षेत्रातलं यश त्यांच्या मुठीत येऊ शकते. पैशाने मतं विकत घेता येतात, सत्ता बळकावता येते, पदवी, नोकरी मिळवता येते,काहीही प्राप्त करण्याचं उद्दीष्ट असू दे ते सहज साध्य होऊ शकते आणि अशा रीतीने पैशाला पैसा जोडला जातो.मात्र याच बाबतीत नेमकी निर्धन माणसाची गळचेपी होते. तो गुणी आहे, लायक आहे, पात्र आहे. केवळ निर्धनतेमुळे लाचार आहे. गरिबांसाठी मात्र परिस्थितीच्या मर्यादा आड येतात त्यांच्याभोवती सारीच विरोधातील प्रतिकूल परिस्थिती असते. आणि या प्रतिकूल परिस्थितीला ओलांडण्याची ताकद नसल्यामुळे जीवनात होणाऱ्या गळचेपीला पर्यायच न उरल्यामुळे सामोरं जावं लागतं.

जेव्हा आपण म्हणतो समाजात भ्रष्टाचार वाढलाय पण हा भ्रष्टाचार एकतर्फी नसतो. त्यात दोन घटक असतात एक देणारा आणि एक घेणारा. देणाऱ्याचा खिसा भरलेला असतो आणि घेणाऱ्याचा रिकामा. पुन्हा या घेणाऱ्यांमध्ये विविध वृत्ती जाणवते, काहींना एका रात्रीत श्रीमंत व्हायचे असते. पैशाचा लोभ असतो. भोगवादी वृत्ती साठी हा शॉर्टकट असतो. पण काही घेणारे मात्र खरोखरच लाचार असतात, त्यांना जीवनात अनेक संसारिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी केवळ,प्रचलीत स्पर्धेला तोंड देण्यासाठी, असहाय्यतेमुळे हे करावे लागत असेल. मनातल्या स्वप्नपूर्तींची गळचेपी किती सहन करायची या भावनेतूनही हे होत असेल. अर्थात हे समर्थनिय नाही. पण हे एक सामाजिक सत्य आहे हे नाकारता येत नाही.

गरिबांच्या गळचेपी विषयी काही भाष्य करताना मला सहजच एका प्रसंगाची आठवण झाली.

मी कॉलेजमध्ये होते. माझ्या कॉलेजच्या इमारती जवळ काही बांधकाम चालू होतं. आजूबाजूला खडी, सिमेंट, वाळूचा पसारा पडला होता आणि बरेच मजूर तिथे काम करत होते. त्यातला एक मजूर अत्यंत संतप्तपणे बोलत होता. त्याचे एक वाक्य जाता जाता माझ्या कानावर पडलं आणि ते आजही माझ्या आठवणीत आहे…

“ अरे मेरे भैय्या! हम सेठ के तो सेठ नही है लेकिन हमारे दिल के तो सेठ है ना? छोड दुंगा एक दिन मैं ये सब!”

कुठल्यातरी प्रचंड असंतोषातून हे वाक्य त्याच्या तोंडून त्याच्या मनातली आग ओतत होती.

आणि आता असंतोष या शब्दापाशी माझं मन येऊन ठेपतं. गळचेपीतूनच असंतोषाचा भडका उडतो.

श्रीमंत आणि गरीब यामधल्या दरीचा विचार करताना आणखी एक विचार मनात येतो.

श्रीमंतांचे वर्ग आहेत.

काही गर्भ श्रीमंत असतात, काहींना वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळतो तर काही मात्र शून्यातून स्वतःची धनराशी जमवतात. सर्वसाधारणपणे ज्यांना आयती संपत्ती मिळालेली असते ते उर्मट, अरेरावी, जुलमी, सत्तांध असतात (काही अपवाद असू शकतात)आणि ते नेहमीच त्यांच्यापेक्षा कमी आर्थिक बळ असलेल्यांवर रुबाब करतात. त्यांच्या जरुरीचा फायदा उठवतात, त्यांना ताब्यात ठेवतात. त्यांच्यावर हुकूम गाजवतात. पण बऱ्याचदा जे शून्यातून वर येतात त्यांना गरिबीची जाण असते आणि ते त्यांची गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्यात धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास,जिद्द, विरुद्ध दिशेने जाण्याची क्षमता असते. असे लोक उत्पादक ठरतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या श्रमिकांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव असते. त्यामुळे या दोघांमधल्या आर्थिक अंतराला मानवतेचे रूप मिळते. इथे देणारा —घेणारा आपुलकीच्या नात्याने जोडले जातात.

आपण नेहमी म्हणतो श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब गरीबच होत जातो. कधी मनाला प्रश्न विचारा असं का?

आपल्यावर लहानपणापासून असेच संस्कार झालेत.

*अंथरूण पाहून पाय पसरावेत*

*ठेविले अनंते तैसेच राहावे*

*हाती नाही बळ त्याने फुलझाड लावू नये*

या संस्कारांचा मनापासून आदर राखून मी म्हणेन की का नाही आपण आपले अंथरूण विस्तारावे?

का स्काय इज द लिमिट आपल्या स्वप्नांसाठी नसावे?

हातातले बळ वाढवण्याचा का नाही प्रयत्न करावा?

चांगल्या मार्गाने श्रीमंत होताच येत नाही.

तत्वांची प्रचंड गळचेपी करावी लागते.हाही एक समाजमान्य विचार.

क्षणभर लटक्या अस्मितांचे पडदे थोडे दूर सारून आपल्या अंगभूत गुणांचा विकास करून, समाजात एक छान आदर्श उदाहरण आपण रचू नाही का शकत?
मला असे सांगावेसे वाटते श्रीमंती विचारांची असावी.जो विचारांनी समृद्ध तो खरा श्रीमंत. आणि वैचारिक दारिद्र्य माणसाची दैना करते. गळचेपी करते.

जाता जाता एकच किस्सा सांगते. लेख लांबच चालला आहे याची कल्पना आहे तरी सुद्धा…

मी स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले म्हणजे गरिबीची झळ पोचली नाही पण श्रीमंतीचा तोराही अनुभवला नाही.

माझ्या वर्गात ज्योती ताम्हणे नावाची श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती. त्या बालवयात मला जगातली ती सर्वात भाग्यवान व्यक्ती वाटायची आणि माझ्या वाटेला का नाही असे भाग्य असेही वाटायचे. माझा नंबर पहिल्या पाचात असायचा तिचा पंधरावा विसावा असा असायचा. पण तरी वर्गात तिचा खूपच रुबाब असायचा. ती माझी वर्ग मैत्रीण होती पण मी तिच्या खास ग्रुप मध्ये नव्हते. खूप वेळा तिच्यापुढे मला न्यूनगंड जाणवायचा. मी तिच्या जीवन पद्धतीपर्यंत कधीच पोहोचू शकत नव्हते.मला दु:ख व्हायचे.

पण आज जेव्हा मी त्या वेळच्या माझ्या मानसिक स्थितीचा विचार करते तेव्हा जाणवतं की मी जर कधी काही हट्ट केला असेल त्यावेळी, तर वडिलांनी तेव्हां असे कधीच म्हटले नाही की,” बाबी आपल्याला हे परवडण्यासारखे नाही.”

मनातून त्यांना मी दुखावलं असेलही. पण ते म्हणायचे,” कर दुनिया मुट्टी मे ..अपना हात जगन्नाथ ही भावना ठेव मग तुझ्या जीवनातही अशी पहाट उगवेल.”

म्हणूनच, *श्रीमंताची चलती येथे गरिबांची गळचेपी* ही सामाजिक भावनाच बदलण्याची गरज आहे. गळचेपी न्युनगंडामुळे जाणवते.म्हणून थिंकटँक बदलला पाहिजे. सोपं नाही पण अशक्यही नाही.

मुळातच हा विषय परिसंवादाचा आहे या विषयाला दोन बाजू आहेत. एक नकारात्मक आणि एक सकारात्मक. कोणी कसा विचार करायचा हे व्यक्तीसापेक्ष आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“स्वतःची पायरी ओळखून वागायला शिका !”

असा उपदेश देणारे आणि तो ज्या व्यक्तीला योग्य प्रकारे कळेल असे घेणारे, असे दोघेही सांप्रतकाळी लोप पावलेले आहेत ! त्याला कारणं काहीही असतील, पण हे वाक्य ऐकून घेणाऱ्याला त्याकाळी या एका वाक्या मागील शब्दांचा मार इतका जिव्हारी लागायचा, की ती व्यक्ती एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे चांगल्या अर्थाने बंड करून उठे !

हल्ली असा शेलका उपदेश कोणी कोणाला द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण आजकाल सगळ्याच लोकांची मानसिकता वेगळ्याच पायरीवर गेल्यामुळे असं होत असावं ! मुळात वर म्हटल्या प्रमाणे असं कोणी कोणाला बोलायच्या भानगडीत हल्ली पडतच नाही, लोकं लगेच त्याच्या पुढची पायरी गाठून हात घाईवरच येतात आणि ताबडतोब मुद्द्यावरून गुद्यावर ! भांडण तंटा मिटवायची मधली कुठली तरी पायरी असते हे रागाच्या भरात विसरूनच जातात ! मग अशा वेळी त्या तंट्याचे पर्यवसान कशा प्रकारे होतं, हे आपण रोज पेपरात वाचत असतोच. जसं की, बापाने तरण्या ताठ्या मुलावर हात उचलला, म्हणून रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्या पर्यंतची पायरी गाठली किंवा एखाद्या मुलाने, आपल्या वडिलांनी नवीन मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या जन्मदात्यावरच चाकूने हल्ला करून, नको इतकी टोकाची पायरी गाठलेली असते ! असो !

“अहो काय सांगू तुम्हांला, या वयात सुद्धा, मी त्या अमुक तमुक देवळाच्या आठ हजार पायऱ्या चढलो बरं कां ! अजिबात कसला त्रास म्हणून झाला नाही बघा, सगळी त्याचीच कृपा !”

आपण कुठंतरी घाई घाईत महत्वाच्या कामाला, चाळीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जात असतो आणि आपल्याला एखाद्या पायरीवर उभं करून, चाळीतले अप्पासाहेब आपल्याला हे ऐकवत असतात. चाळीच्या दोन जिन्याच्या फक्त चाळीस पायऱ्या चढून वर आलेल्या अप्पाना, वरील वाक्य बोलतांना खरं तर धाप लागलेली असते, पण आपण सुद्धा, “हॊ का, खरंच कमाल आहे तुमची अप्पासाहेब, या वयातसुद्धा तुम्ही बाजी मारलीत बुवा !” असं बोलून आपली सुटका करून घेतो.  देव दर्शनाला कोणी किती पायऱ्या कुठे चढाव्या अथवा कुठे उतराव्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न. मी बापडा उगाच त्यांच्या श्रद्धेच्या पायऱ्यांच्या आड कशाला येऊ ? मग याच अप्पाकडून कधीतरी ऐकलेले “ईश्वर सर्वव्यापी आहे, फक्त तो बघायचा भाव मनी हवा, की त्याचे दर्शन झालेच म्हणून समजा !” हे त्यांचे वाक्य आठवते. पण मी स्वतःची पायरी ओळखून असल्यामुळे, अप्पासाहेबांना त्यांच्या या वाक्याची आठवण करून देत नाही इतकंच. उगाच कशाला आपण आपली पायरी सोडून बोला !

“शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये” असा उपदेश पूर्वीचे बुजुर्ग लोकं त्या काळच्या तरुण पिढीला करत ! हे सांगतांना त्यांनी स्वतः किती वेळा, किती कारणांनी कोर्टाची ती पायरी चढल्ये हे सांगण्याचे मात्र शिताफिने टाळत. एकंदरीतच कोर्टाची पायरी चढण्या मागे कुठलाच शहाणपणा नाही, उलट वेळ आणि पैशाचा नको इतका अपव्यय ती एक पायरी चढल्यामुळे होतो, हे खरं तर त्यांना यातून सांगायचं असावं ! या  सिद्धांता मागची कारणं काहीही असली तरी, काही वेळा काही भांडण तंट्यानी इतकी टोकाची पायरी गाठलेली असते, की ती सोडवण्यासाठी शेवटी दोन्ही वादी आणि प्रतिवादींना ती नको असलेली कोर्टाची पायरी चढल्या शिवाय गत्यंतरच उरत नाही ! मग स्वतःच्या सांपत्तीक पायरी प्रमाणे, ते वादी आणि प्रतिवादी दोन नामांकित वकील करून आपापली केस, कोर्टाच्या कंटाळवण्या पायरीवर सोडवायचा चंग बांधतात. त्यांना त्यांची कोर्टाची पायरी लखलाभ ! असो !

काही थोर लोकांनी समाजाबद्दलची बांधिलकी जपतांना, स्वतः वेगळ्या अर्थाने पायरीचा दगड बनून, अनेक जणांना यशाच्या शिखरावर बसवलेल आपण पाहिलं असेलच. अशा प्रकारचा “पायरीचा दगड” बनणे सर्वांनाच जमतं असं नाही.  त्यासाठी मुळात अशा दगडाची जडण घडणच वेगळ्या प्रकारची झालेली असावी लागते. अनेक न दिसणारे, छिन्नी हातोड्याचे घाव, अशा दगडांनी आपल्या आत झेलून लपवलेले असतात, याची आपल्या सारख्या सामान्य लोकांना कल्पनाच नसते. याच घावांना लक्षात ठेवून हे दगड, आपल्या पुढच्या पिढीला असे घाव सोसावे लागू नयेत म्हणून, अनेकांसाठी “पायरीचे दगड” बनून समाजऋण फेडायच कामं इमाने इतबारे, स्वतः अलिप्त राहून करत असतात ! समाजातील अशा महान व्यक्तींचा हा आदर्श, थोडया फार प्रमाणात जरी आपण डोळयांपुढे ठेवून, आपल्या कुवती प्रमाणे, समाजाच्या कल्याणासाठी छोटीशी का होई ना, पायरी बनायला कोणाला कुठलीच अडचण नसावी असं मला वाटतं !

मंडळी, मला स्वतःला असं वाटून काय उपयोग आहे म्हणा ? शेवटी, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, वैचारिक पातळीवरील पायरीचा प्रश्न आहे ! पण आपण सर्वांनीच, अगदी माझ्यासकट, अशी छोटीशी पायरी होण्याचा प्रयत्न करायला कोणाची हरकत नसावी, असं मला मनापासून वाटतं. बघा विचार करून !

शुभं भवतु !

ताजा कलम – आता थोडयाच दिवसात आपल्याला “पायरी हा ss पू ss स ss” अशा आरोळ्या कानावर यायला लागतील, तर त्यातील त्या “पायरीवर” पुन्हा कधीतरी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print