☆ “माळ्यावरचे ओझे…” – लेखक : श्री विजय लिमये ☆ श्री मोहन निमोणकर ☆
युरोपात, अमेरिका मध्ये ज्या वस्तूंची तुम्हाला गरज नाही त्या वस्तू आपापल्या गेटसमोर टॅग लाऊन ठेऊन देतात, ज्यांना गरज आहे त्यांनी त्या घेऊन जाणे. आता भारतातही काही ठिकाणी माणूसकीची भिंत कल्पना उभारली गेली आहे. जिथे तुम्हाला नको असलेल्या वस्तू ठेवता येतात आणि ज्यांना गरज आहे ते लोक घेऊन जातात. आता काही एनजीओ सुध्दा ही सेवा कार्य करीत आहेत.
मी पैज लावून सांगतो, आपल्या देशातील असे एकही घर नाही जिथे माळे विविध वस्तूंनी खचाखच भरलेले नाहीत. माळे खाली केले तर त्यातून नाना तर्हेच्या वस्तू मिळतात. एकंदरीत हे माळे अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठीच वापरले जातात.
थोडा विचार करूया, सर्वांच्या लक्षात येईल, जी वस्तू आपण मागील तीन वर्षात एकदाही वापरलेली नाही ती आपण आपल्या उर्वरित आयुष्यात एकदा सुद्धा वापरणार नाही. मग अश्या वस्तू माळ्यावर साठवून ठेवण्याचा काय उद्देश असणार आहे? घरातील एकूण सामानापैकी पन्नास टक्के सामान आपण विविध कारणांनी वापरणार असतो, ज्याचा मी वर सांगितल्याप्रमाणे तीन वर्षातून एकदा तरी उपयोग होतो, बाकीचे सामान आपण केवळ असुदे, लागेल कधीतरी या आशेने उगीच साठवून ठेवतो.
तमाम भारतीयांना विनाकारण अनेक वस्तू साठवण्याची सवय आहे. एका नातेवाईकाचा पुण्यातील वाडा पाडून अपार्टमेंट करण्याचे ठरले, तेव्हा वाड्यातून मोठा ट्रक भरून जुने सामान निघाले, जे आताच्या जमान्यात भंगार या सदरात मोडले. पितळ व तांब्याची भांडी, स्टीलचे अनेक तांबे, गंज, व विविध आकाराची भांडी, चमचे, वाट्या, पेले, भाजी, आमटी वाढण्यासाठीचे डाव आणि मोठे चमचे. या शिवाय पूर्वीचे पत्र्याचे चौकोनी डबे, तेलाचे मोकळे डबे, तांब्याचा बंब, विविध आकाराची घमेली, जुन्या सुटकेस, ट्रँक, अश्या नानाविध वस्तू निघाल्या. या वस्तू मागील दोन पिढ्यांनी विनाकारण साठवून ठेवलेल्या होत्या, ज्या येणाऱ्या काळानुसार कालबाह्य झालेल्या होत्या. आजोबांनी व वडिलांनी जे सामान पोटाला चिमटा देऊन जमवले, नातवाने ते सर्व किलोच्या भावात विकले, त्यांनी ते त्यांच्या जमान्यात विकले असते तर आताच्या कैकपट जास्त किंमत मिळाली असती.
मध्यम, उच्चमध्यम, व श्रीमंत वर्गातील महिलांची घरातील कपाटे साड्या व ड्रेसेसनी इतकी खचाखच भरलेली असतात, तरीही त्या कपड्यांच्या बाबतीत असमाधानीच असतात आणि कपड्यांची कपाटे नेहेमी अपुरीच पडतात. दुसरीकडे, अश्याही महिला आहेत ज्यांना अंग झाकण्यापुरताही कपडा मिळत नाही.
आजही लग्न व इतर समारंभात मोठयाप्रमाणात आहेराच्या वस्तू दिल्या व घेतल्या जातात, या सामानातील बऱ्याच वस्तूंची रवानगी थोड्याच दिवसात माळ्यावर होते. या सामानातील थोड्या फार वस्तू पुन्हा भेट म्हणून सरकवल्या जातात. वित्तीय लाभाचा विचार करता, हा खूप मोठा तोटाच आहे कारण आपला खूप पैसा अश्या तर्हेने अडकलेला राहतो. ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांना ते अडगळीत टाकावे लागते, आणि जे गरीब आहेत त्यांना चार भांडी जमवताना, रक्ताचे पाणी करावे लागते.
सेकंड होम घेणारे असेच असतात, त्यांच्या त्या सेकंड होम चा उपभोग रखवालदार घेतो. घरमालक वर्षातून जास्तीत जास्त दोन तीन वेळा त्या घरात येतो, मोजून तीन ते पाच दिवस राहून जातो. रखवालदार अथवा मुनीम, घर सांभाळणारा उरलेले तीनशे पन्नास दिवस त्या घराचा फुकट उपभोग घेतो.
जर तमाम भारतीयांनी हि माळ्यावरची कधीही न लागणारी अडगळ गरजवंतांना दिली तर मी सांगतो उत्पादन उद्योगात वीज वापर घटेल, वाहतुकीवरचा खर्च कमी होईल ज्यामुळे प्रदूषण किमान पाच टक्क्यांनी कमी होईल. जश्या चलनी नोटा तिजोरीत पडून राहिल्या कि चलन टंचाई होते, तीच गोष्ट अश्या वस्तू माळ्यावर पडून राहिल्याने होतो.
अनेक लोकांच्याकडे जुन्या गाड्या, सायकली विनाऊपयोग पडून असतात, केवळ वेळत न विकल्यामुळे, त्यांची किंमत वर्षसरताना कमी कमी होत जाऊन भंगार रूपात परिवर्तन होते. विविध सरकारी गाड्या, वस्तु, फर्निचर सुद्धा केवळ वेळेत लिलाव करून न विकल्यामुळे प्रचंड नुकसान होते, हे नुकसान आपल्यासारख्या करदात्यांच्या टॅक्स रूपात दिलेल्या पैशाचे असते, याची जाणीव सरकारदरबारी कुणालाही नसते.
आज, समाज परिवर्तनाची नितांत गरज आहे, निदान माळ्यावरच्या वस्तू तरी उदारतेने द्यायला शिका, कदाचित त्या चार सहा वस्तूनी कित्तेक लोकांचे संसार उभे राहतील. त्याचा पर्यावरणावर होणार भार हलका होण्यास मदत होईल.
मोह सोडा, इथून परलोकी काहीच घेऊन जायचे नाही, मग इतके ओझे जोपासायची काही गरज आहे का?
म्हणतात ना,
देणाऱ्याने देत जावे,… घेणाऱ्याने घेत जावे….
देणाऱ्याने देत जावे,… घेणाऱ्याने घेत जावे….
घेणाऱ्याने… घेता घेता… देणाऱ्याचे… हातचं घ्यावे।
चला तर एक माणूसकीची भिंत ऊभी करूयात.
धन्यवाद 🙏
लेखक : श्री विजय लिमये
मो. 9326040204
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आणि तू जेव्हा जातोस समोरून तेव्हा ढवळून काढते अंतःकरणाला माझ्या… आणि नसतोस दिसत तेव्हा तुझ्या विरहात एकेक आठवणींचा पापुद्र्यांचे फोपडे उन्मळून पडतात.. भळभळ वाहणाऱ्या जखमेवरची खपली पडून जावी तशी…. जसे कढत आसवांचे डोळ्यातून कढ ओघळत जावे तसे…. मी अचल.. मी निर्जीव… मला कुठे असावे भावनांचे कोमल अंत:करण.. असा असतो तुझा मुळी माझ्याबाबतीतला गैरसमज… पण तुला सांगू पाषाण हृदयाला सुद्धा प्रेमाचा फुटतो पाझर असचं म्हणतात सारे…. त्याचं अंतरग आतून असतयं मृदू नि कोमल… मी जरी वरून दिसली तशी राकट दगड, पण मी तशी नाहीए… स्व:ताची सुखदुःख नसली म्हणून काय झालं! माझ्या सानिध्यात जे जे म्हणून आले त्यांच्या त्यांच्या सुखदुःखात मीही सहभागी झाले! … माझ्या भावलेले त्यांच्या भावनांचे कंगोरे मला दिलेल्या अंर्तबाह्य रंगरंगोटीतून प्रकट करते झाले…. मग मला तू असं कसं म्हणू शकतोस कि भावनाहीन आहे म्हणून! … उलट मी तर म्हणते तूच खरा भावनाहीन आहेस… फक्त आपल्या मुसक्या आवळून लगाम दुसऱ्याच्या हाती सोपवून तू त्यांच्या तालावर नाचत सारं आयुष्य काढतोस… आणि तुझ्यावर स्वारहोणाऱ्याची सुख दुखाची ओझी वावगत राहतोस… तुला काय वाटतं हे तुला सांगावसं वाटलं तरी बोलायचं स्वातंत्र्य तुला कुठे असतं! … अगदीच असह्य होतं तेव्हा पुढच्या पायाच्या टापा उंचावून जोरजोराने खिंकाळत राहतोस! … समजणाऱ्याने कसं समजावं रे ते तुझे आनंदाचे पडसाद आहेत की दुःखाचे.! . की ज्याने त्याने लावून घ्यावेत आपल्या मन स्थितीनुसार मतितार्थ… आणि तसा तुला दुसऱ्याच्या सुखदु:खाशी काहीही देणंघेणं असते कुठे म्हणा? … डोळ्यावर झापड लावलेली असतात आणि ते फक्त तुला गंतव्यस्थानाचा मार्गच तेव्हढा दाखवतात… कानात वारू शिरलेला असल्याने तू उधळत निघतोस.. तहानभूक विसरून नि देहभान हरपून.. वायू गतीने दौडत जाणे इतकंच तुला ठाऊक असल्यानं तुला वारू म्हणूनही तुला ओळखतात एव्हढंच… याच्या पलीकडे काय? काहीही नाही… इतकचं काय अवतीभवती पाहणं तुझ्या नशीबीही नाही कोणंतरी आपल्यावर फिदा आहे याची तुला शुद्धही नाही! … माझ्या मनीचा मी राजा याच भावनेत तू कायमच गुरफटलेला… रस्त्यावरून जातोस तेव्हा तुझ्या तगडक तगडक पदरवाचा ध्वनी घुमतो तेव्हा त्या नादाची कंपने माझ्या शरीरावर उमटतात… शहारून जाते काया सारी… अन तुला बघायला मला डोळे नसले जरी संवेदनाचे अंर्तचक्षू तुला टिपून घेतात… एक आनंदाची लहर सगळ्या कायाभर लहरून जाते… एक गोड शिरशिरी ची अनुभूती येते… पण तुझं लक्ष असतं का तिकडे… खुळ्या मनाची समजूत घालता शब्दही किती पडती तोकडे…. प्रत्यक्षात तुला भेटता येणं शक्य नसलं तरी तुझ्या प्रतिमेवरच मी वेडी अभिसारिका होते… बघं तुला जमेल का काही क्षण माझ्याजवळ उभा राहता येतेय का? बघशील का मला क्षण एक टक लावून… जाणून घेशील का माझ्या डोळ्यात दडलेले भाव मनीचे… तुला ते नक्कीच आवडेल.. मग करशील मान डोलावून दुजोरा देशील.. याच केवळ एका प्रतिसादाची मी अपेक्षा करतेय… मुकी असली तरी गुज माझ्या मनीचे तुला कळावेत म्हणून धडपडतेय… बाकी काही नाही जमलचं तरी स्थित प्रज्ञा सारखे जागी निश्चल उभं राहणं का कुठं चुकलयं…
… त्या रस्त्यावरून रोज ठरल्या वेळी मी जात असताना केतकी खिडकीतून मला पाहत असे आणि एक दिवस अचानक तिची माझी नजरानजर झाली आणि केतकीने ती खिडकीच बंद करून घेतली… आणि मी पुन्हा इकडे तिकडे न पाहता सरळ रस्त्यावरून चालत पुढे निघून गेलो…
अहंकार हा डोळ्यात गेलेल्या एखाद्या कुसळासारखा असतो जोवर ते काढून टाकत नाही तोवर आपल्याला जग बघता येत नाही. अगदी तसंच दृष्टीवर अहंकाराचा जर पडदा असेल तर वास्तवापासून आपण नेहमीच दूर राहतो आणि ते आपल्यासाठी नुकसानकारक आहे.
अभिमान, अहंकार आणि आत्मविश्वास यामध्ये एका पुसटश्या रेषेइतकं अंतर आहे. आत्मविश्वास दृढ झाला की तो ही रेषा पार करून अभिमानाकडे वळतो. अति अभिमानाचा पगडा ती रेषा ओलांडून आत्मप्रौढी मिरवतो. आत्मप्रौढीमुळे अहंकार बळावतो. हळूहळू माणसाच्या नकळत होणारा हा बदल लक्षात येत नाही. माणूस आत्मकेंद्री बनतो. आत्मकेंद्रीपणा अहंकारात मोठी भूमिका बजावतो. सरते शेवटी अहंकार माणसाच्या विकासातला मोठा अडसर ठरतो. षड्ररिपू अहंकाराच्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले असतात ते या अहंकाराला खत पाणी घालतात. अहंकार हा व्यक्तिमत्त्वाचा मानसिक घटक आहे अशा अहंकाराचा झालेला उद्रेक माणसाची मानसिकताही भस्मसात करून टाकतो. माणसाचा अहंकार त्याला दृष्टीने आंधळा, मतीने भ्रमपूर्ण आणि गतीने थांबवत असतो. भले भले यशस्वी आणि समजदार लोक अहंकारामुळे चुकीचे निर्णय घेतात.
एका मर्यादेपलीकडे गेलेला हा अहंकार त्याला समाजापासून दूर लोटतो. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्या इतपतच तो असावा हे मोजमाप माणसाला न जमल्यानं अहंकाराचा अतिरेक होतो. जसा जसा अहंकार वाढत जातो तस तसा त्या माणसाच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या सृजनशीलतेवर, विचारशक्तीवर एक प्रकारचं पुट चढतं. अहंकारावर त्याला जर मात करता आली नाही तर मात्र तो सर्व सात्विक आनंदांना पारखा होतो. त्याच्या ठाई असलेल्या पैसा बुद्धी सौंदर्य सत्ता ह्या उत्तम मानल्या जाणाऱ्या गोष्टी नगण्य वाटू लागतात…
अहंकाराची कीड ही एक प्रकारची वाळवी आहे. ती सुबुद्ध माणसाचाही तोल घालवू शकते.
आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व असणे, कोणाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर मानणे, प्रत्येक क्षणोक्षणी स्वतःलाच वरचढ, श्रेष्ठ समजणे, बाकी सर्वांना कस्पटासमान, नीच समजणे. ही अहंकाराची लक्षणे… अहंकार म्हणजे स्वतःच्या गुणवत्तेच्या अतिरंजित दृष्टिकोनातून उद्भवणारा आनंद.
या अहंकारावर मात कशी करायची तर आत्मपरीक्षण करून आपल्याला अहंकार का आणि कशासाठी आहे हे आपणच शोधून काढलं पाहिजे.
स्वतःत बदल घडवून आणण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. मनःशांतीतला मोठा अडथळा हा अहंकार आहे हे वेळीच लक्षात आलं पाहिजे. आपण कितीही विद्वान असलो तरी प्रत्येक समोरच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखा असतं याची जाणीव व्हावी. सतत यश मिळणार याला प्रसंगी अपयश देखील चाखता आलं पाहिजे एकूण काय तर आपल्या क्षमतेवर आणि बुद्धिमत्तेवर दृढ विश्वास ठेवून अहंकाराला सीमित ठेवून सृजनशील व्हायला हवे…. यातच शहाणपण आहे.
(पूर्वसूत्र – आईच्या तोंडून हे ऐकताना सरसरून काटा आला होता माझ्या अंगावर आणि त्याच क्षणी ‘ हे गजानन महाराज कोण? ‘ हे जाणून घ्यायची उत्कट इच्छाही माझ्या मनात निर्माण झाली होती!)
ताई आयुष्यभर अतिशय स्वाभिमानाने जगली होती. आता आयुष्याची अखेरही स्वाभिमानानेच व्हावी अशीच तिची इच्छा होती. म्हणूनच तर पाणी नाका-तोंडात जायची वेळ आली तेव्हा हक्काचा आधार म्हणून तिने गजानन महाराजांना साकडं घातलं होतं आणि त्यांनीही तिचं गा-हाणं ऐकलं होतं. त्या पाच लाखांच्या लाॅटरी-बक्षिसाचा प्रसाद तिला देऊन त्यांनी तिच्या मनावरचं ओझं अलगद उतरवून ठेवलं होतं!
दुःखाचे, अडचणीचे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यांत येतात, पण त्या प्रतिकूल परिस्थितीचा मनापासून स्वीकार करून त्याला धैर्याने तोंड देतानाही स्वतःचं तत्त्व आणि सत्त्वही निष्ठेने जपणारी माणसं मात्र अपवादात्मकच असतात. माझी ताई आणि केशवराव यांनी ते जपलेलं होतं हे ताईच्या अखेरच्या दिवसांमधल्या ज्या दोन प्रसंगांवरून मला प्रकर्षानं जाणवलं, त्या प्रसंगांनाही माझी आई साक्षी होतीच. तिच्यामुळेच तर त्या दोघांची सत्वशील समाधानीवृत्ती अधोरेखित करणारे ते दोन प्रसंग मला समजू शकले. हे दोन्ही प्रसंग म्हणजे ताई आणि केशवराव या दोघांचीही गजानन महाराजांनी घेतलेली सत्त्वपरीक्षाच होती! आणि म्हणूनच ते दोघेही त्या कसोटीला कसे खरे उतरले हे आवर्जून सांगावेसे वाटते.
ही सत्त्वपरीक्षा सुरू झाली ती ताईला लॉटरीचं बक्षीस लागलं त्या क्षणापासूनच! या बक्षिसाच्या रकमेमुळे कॅन्सर ट्रीटमेंटच्या खर्चाची सगळी आर्थिक गरज परस्पर भागणार होती हे जसं खरं तसंच त्याच क्षणापासून ताईचा परतीचा प्रवास पुढे अधिकच वेगाने सुरू झाला हेही खरं! कारण ती पुढे मग हळूहळू थकतच गेली. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मलूलपणाचा लवलेशही नसायचा. तिच्या नजरेतल्या कृतार्थतेच्या रूपातलं एक वेगळंच समाधान तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेलं असे. पण तिच्या थकलेल्या शरीरावर मात्र त्याची कांहीच मात्रा चालत नसल्यासारखी ती असहाय्यपणे पडून असायची.
त्या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग. ती भिंतीकडे तोंड करून कुशीवर झोपलेली होती. शेजारीच केशवराव खुर्चीत पेपर वाचत बसले होते. लॉटरीचं बक्षिस लागल्यानंतरच्या आठवड्याभरातली ही गोष्ट. तेव्हा अजित ग्रॅज्युएशननंतर एका सीए-फर्ममधे आर्टिकलशिप करत होता. तो ऑफिसमधून त्या दिवशी परत आला तो एक वेगळाच निरोप घेऊन. आल्या आल्या आपल्या बाबांना तो त्याबद्दलच सांगू लागला. अजितच्या अगदी जवळच्या मित्राचे वडील जे प्रतिष्ठित व्यापारी होते, त्यांच्याकडून आलेला तो प्रस्ताव होता. तिकीट बॅंकेत भरून खात्यावर परस्पर पैसे जमा होताना टॅक्स वजा होऊन पाच लाखांऐवजी साडेतीन लाखच जमा होणार होते. त्याऐवजी बक्षिस मिळालेलं तिकीट घेऊन बक्षिसाचे पूर्ण पाच लाख रूपये द्यायला त्या मित्राचे वडील तयार होते. एरवी होणारी कराची वजावाट न होता त्यांच्या हातात पूर्ण रक्कम यावी हाच त्यांचा हेतू होता. स्वतःचे दोन नंबरचे पैसे चलनात आणण्याचा मार्ग म्हणून मध्यस्थामार्फत हे असे प्रकार सर्रास केले जातात हे मी ऐकून होतो, पण अशा व्यवहारांत आधी ते तिकीट त्या मध्यस्थाकडे सुपूर्द करावे लागते आणि ट्रेझरीकडून अपेक्षित रक्कम त्यांना मिळाली की त्यानंतरच ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे लाभार्थीला दिले जातात. पण या प्रस्तावानुसार ताईच्या कुटुंबाबाबतची सद्भावना आणि निकडीची गरज लक्षात घेऊन मित्राचे वडील बक्षिसाची पूर्ण रक्कम तिकीट ताब्यात मिळताच त्याच क्षणी यांना द्यायला तयार होते.
” हे बघ, तू घरी जाऊन तुझ्या बाबांशी हे सगळं बोलून घे आणि त्यांना लगेच माझी भेट घ्यायलाही सांग ” असं ते म्हणाले होते. भिंतीकडे तोंड करून पडून राहिलेल्या ताईने अजितचं बोलणं ऐकलं आणि ते संपताच केशवराव कांही बोलणार एवढ्यांत आपली मान इकडे वळवायचा कसाबसा प्रयत्न करीत क्षीण तरीही ठाम आवाजात ती म्हणाली,
” त्या पैशातल्या फक्त साडेतीन लाख रुपयांवरच आपला अधिकार आहेs.. बाकी पैसे आपले नाहीत. सरकारी नियमाप्रमाणे जे मिळतील तेवढेच पैसे आम्हाला पुरेत. त्यांना त्यांचे पैसे नकोत म्हणून सांग.. “
” अगं, निदान मी काय म्हणतो ते ऐकेपर्यंत थांबायचंस तरी. ” केशवराव हसत म्हणाले.
” तू अगदी माझ्या मनातलं बोललीयस. मी त्याला हेच सांगणार होतो. “
खरं तर गरजू आणि हतबल अवस्थेत कुणालाही मोह पडावा अशा या प्रस्तावाबद्दल त्या दोघांनाही क्षणभरसुद्धा विचार करावासा वाटला नव्हता हे महत्त्वाचं. त्या प्रतिकूल परिस्थितीतही योग्य आणि अयोग्य यातली सीमारेषा त्यांच्या बाबतीत कणभरसुद्धा पुसट झालेली नव्हती. लक्ष्मीचं सात्त्विक रूप आणि मायावी रूप यामधला फरक ओळखण्याइतकं त्या दोघांचंही मन त्याही परिस्थितीत सजग होतं हे मला जास्त महत्त्वाचं आणि कौतुकास्पदही वाटतं!
नेमक्या गरजेच्या क्षणी परमेश्वराकडून मिळालेला हा आधार त्या दोघांनीही किती समतोल मनाने आणि प्रामाणिकपणे स्वीकारलेला होता हे अधोरेखित करणारा असाच हा दुसरा प्रसंग…
बक्षिस मिळालेलं तिकीट बँकेत कलेक्शनसाठी द्यायची वेळ आली तेव्हा ताईचं बचत-खातं बँकेत उघडणं आवश्यक होतं. त्यावेळीही….. ौ
‘अशा परिस्थितीत ‘माझं खातं कशाला उघडायचं? ‘ असंच ती म्हणाली होती. ‘ते कां नको’.. याबाबतचे तिचे विषय अतिशय स्पष्ट होते.
” मी काय हो, आज आहे आणि उद्या नाही, पहाताय तुम्ही. मला या व्यवहारी गोष्टीत आता गुंतवू नका. तुमचं खातं आहेच त्या बँकेत. त्याच खात्यावर बक्षिसाचं तिकीट जमा करायचं. हे पैसे माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठीच मागितलेले होते. “
ताईने केशवरावांना निक्षून सांगितलं. एरवी व्यावहारीकदृष्ट्या विचार केला तरीही तिचं म्हणणं योग्यच होतं. ब्रँच मॅनेजर म्हणून काम करताना ‘डेथक्लेम सेटलमेंट’ साठी वारसदारांना करावी लागणारी यातायात मी उघड्या डोळ्यांनी अनेकदा पाहिलेली होती. तो त्रास आपल्या पश्चात आपल्या माणसांना होऊ नये अशीच ताईची इच्छा असणारच. आणि मलाही तेच योग्य वाटलं होतं. पण केशवरावांची याला तयारी नव्हती. आम्ही सर्वांनी परोपरीने सांगूनही त्यांनी अगदी टोकाच्या हट्टाने सेव्हिंग खातं उघडलं ते ताई आणि अजित यांच्याच जॉईंट नावावर. खात्यावर बक्षिसाचे पैसे जमा झाले तेव्हा ताई हॉस्पिटलमधे अखेरचे दिवस मोजत होती! त्यादिवशी केशवराव दवाखान्यांत गेले ते ताईच्या नावाचं बँक पासबुक सोबत घेऊनच. पासबुकावरचं तिचं नाव आणि तिच्या खात्यांत बक्षिसाची रक्कम जमा झाल्याची नोंद त्यांनी तिला आवर्जून दाखवली..!
‘गजानन महाराजांनी तिला दिलेला प्रसाद होता तो! म्हणून तो तिच्या नावावर जमा होणंच मला आवश्यक वाटलं. आत्ता या क्षणी तिला देण्यासारखं यापेक्षा अधिक मोलाचं माझ्याकडे दुसरं कांहीही नव्हतं. ‘ केशवराव म्हणाले होते! !
ईश्वरी कृपालोभ स्वीकारतानाही तो समतोल वृत्तीने कसा स्विकारावा याचे हे दोन्ही प्रसंग मूर्तिमंत उदाहरण होते! जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ हे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते माझ्या मनात ताजे आहेत!
ऋचा खूप छान विडिओज बनवते. सोशल मिडियावर तिला खूप लाईक्स मिळतात. ती सतत नवनवीन सामग्री युट्यूब, फेसबुक वर पाठवत असते. ती युट्यूबवर बोलते, तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. ती स्क्रिनवर दिसतेही सुंदर. तिला भेटल्यावर मला छान वाटलं. पण तिच्या चेहर्यावर काही आनंद नव्हता. हिरमुसलेला चेहरा. विचारात गढलेली, जणु स्वमग्न अशी ती. स्वत:वरच नाराज झाली होती. नंतर ती म्हणाली, “मला कळतंच नाही, मी का सतत सामग्री निर्मिती करते. पाकळ्यांमधे अडकलेल्या भुंग्यासारखी माझी अवस्था झाली आहे. सतत सामग्रीला लाईक्स हवेत. चांगले कमेंट्स हवेत. बघ्यांची संख्या वाढली पाहिजे. पुढचा व्हिडिओ चांगलाच झाला पाहिजे. या सगळ्याचा ताण येतोय. थांबायचा विचार करते. नेमकं त्याचवेळी प्रेक्षक संख्येत लक्षणीय वाढ होते. माझा उत्साह वाढतो. मी पुन्हा नवं देण्याच्या विचारात गुरफटते. मी सतत तणावात आहे. मला यातून बाहेर पडायचं आहे. “
जगभरात ऋचासारखे २०७ मिलियन पेक्षा जास्त आणि भारतात आठ कोटी पेक्षा जास्त कंटेट क्रिएटर्स म्हणजेच सामग्री निर्माता आहेत. पैकी ७५% जणांना ताण आहे. २२% लोकांना वारंवार ताणाचा सामना करावा लागतो. ७९% निर्मात्यांनी बर्नआऊटचा अनुभव घेतला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सामग्री निर्माता म्हणजे दिसतं तसं नसतं. एका सर्वेक्षणानुसार २०२७ मधे सामग्री निर्मिती क्षेत्रात ५०० अब्ज डाॅलर्सची वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या या क्षेत्राचं आकर्षण वाढतंच चाललं आहे. सगळ्याच वयोगटातील लोकांना करियर, प्रसिद्धी आणि यशासाठी हा मार्ग सहज सोपा आणि लोकप्रिय वाटतो. याचे समाधानकारक फायदे असू शकतात. पण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मानसिक ताण वाढत जाण्याची दाट शक्यता आहे.
३८ वर्षाच्या नसीम नजाफी अघदाम हिने कॅलिफोर्नियामधील यु ट्यूबच्या कँपसमधे जाऊन तिथल्या कर्मचार्यांवर गोळीबार केला. त्यात तीन जणं जखमी झाले. त्यानंतर तिनं आत्महत्या केली. तिचं असं म्हणणं होतं की, तिच्या सामग्रीकडे युट्यूबने दुर्लक्ष केलं. तिच्या सामग्रीमधे काटछाट केली. त्यामुळे तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
सामग्रीची निर्मिती करणं कठीण आणि आव्हानात्मक असतंच. वेळेवर विडीओ पोस्ट केला नाही तर लोक विसरतील, व्यवसाय ठप्प होईल याची चिंता लागून राहते. शिवाय प्रत्येकाला आकर्षणापोटी अनेक प्रश्न पडतात. जसं की, मी पण बनू का सामग्री निर्माता? विडिओज आत्तापासूनच करू की कसं? माझा विडिओ चांगला झालाय की नाही? किती हजार लोकांनी तो बघितला? मी पुढं कोणत्या विषयावर विडिओ करू? माझा व्हिडीओ ५० हजार तरी लोक बघतील ना? तो किती लोकांना आवडला? जर विडिओ अपेक्षेपेक्षा जास्त लोकांना आवडला तर ते आवडणं टिकवून ठेवण्याचा ताण. कमी लोकांना आवडला तर आवड वाढवण्याचा ताण. सामग्री निर्मात्याच्या आनंदाचं, दु:खाचं, ताणाचं बटन लोकांच्या आवडी निवडीच्या हिशोबानं चक्राकार फिरत राहतं. तिथं चालू बंद काही नाहीच. म्हणूनच स्वत:च्या यशावर, कौशल्यावर स्वत:च प्रश्न उपस्थित करणारा मानसिक आजार इंपोस्टर सिंड्रोम, सततच्या कामामुळं येणारा प्रचंड थकवा (क्रिएटर बर्नआऊट), अवास्तव दर्जा टिकवण्याची चिंता, इतर निर्मात्यांबरोबरची तुलना, सतत अपयशाची भीती अशा मानसिक आजारांना हे सामग्री निर्माते जणु निमंत्रणच देत असतात. सामग्री निर्माते मिस्टरबीस्ट सातत्यानं सुट्टी न घेता काम करतात. ट्विटरवर झालेल्या संवादात ते म्हणाले, “सुट्टी न घेता काम केल्याने ताण येतो. मी मानसिकदृष्ट्या मरत आहे. “
सामग्री निर्मात्यानी क्राफ्ट (वाचणे, लिहिणे.), कलेक्ट (चिंतन, मनन करणे), रिफ्लेक्ट (विडिओ निर्मिती करणे) हे टप्पे लक्षात ठेवावेत. आपण सामग्री देता देता थकतोय याचं भान असावं. स्वत:च्या मूल्यांचा विसर पडू देवू नये. प्रेक्षकांशी सहसंबंध प्रस्थापित करावेत. ताण किंवा चिंता निर्माण करणारे ट्रिगरिंग पाॅइंट माहीत करून घ्यावेत. याशिवाय नियमित विश्रांती घेणे. वास्तववादी ध्येय निश्चित करणे. संगीत ऐकणे. बाहेर फेरफटका मारणे. स्वत:चे ऊर्जा स्त्रोत शोधणे. मित्रांकडून सहकार्य घेणे. ध्यान, योग करणे. पुरेशी झोप घेणे. पौष्टीक जेवण करणे. कुटुंबासोबत वेळ घालवणे. गरजेनुसार समुपदेशकाचा सल्ला घेणे. आठवड्यातून एकदा स्वत:च्या कामगिरीचं विश्लेषण करणे. इ. गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात. ‘जिंका किंवा मरा’ याप्रमाणे ‘प्रकाशीत करा किंवा मरा’ असा टोकाचा मानसिक दबाव येऊ शकतो. रोमन जीवन तत्त्चज्ञानाचे अनुयायी स्टोईक लोक म्हणतात, ‘आपण आपल्या प्रतिक्रिया आणि आपली कृती यावरच नियंत्रण करू शकतो. ‘ त्यामुळं कंटेंट क्रिएटरच्या भाषेत लाईक्स, शेअर, फाॅलोअर्स संख्या अशा यशाच्या मागे लागू नये. शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य चांगलं ठेवावं. तरंच ना सामग्रीची चिंता. ना निर्मितीची.
☆ मी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन… ☆ श्री सुनील देशपांडे☆
बाबा आमटे यांचा ‘ज्वाला आणि फुले’ हा कवितासंग्रह कॉलेजच्या वयापासून अनेक वेळा वाचला आहे. परंतु २०१६ मध्ये ज्वाला आणि फुले मधील काव्यवाचनाचा कार्यक्रम मी करीत असताना त्यातील ‘संतांचे मृत्युपत्र’ या कवितेतील खालील ओळी सादर करीत असतानाच मी अस्वस्थ झालो.
देणार आहात का मेल्यावर,
तुम्ही तुमचे डोळे, हृदय
आणि शाबूत असेल ते ते?
शंकरावर लक्ष बेलपत्रे आपण वाहतो,
तसे लक्ष डोळे आणि लक्ष हृदये,
समाजपुरुषाला वाहण्याची शपथ
घेणार आहात का तुम्ही?
जाता जाता असे एक आंदोलन
उठलेले पाहण्याची इच्छा आहे.
१९६० ते ६४ या काळात लिहिलेल्या या कविता, अवयवदान देहदान हे शब्दही माहीत नसलेला तो काळ. परंतु या द्रष्ट्या विभूतीने त्या काळात पुरस्कार करून सुद्धा त्यांच्या हयातीत हे आंदोलन उभे राहिले नाही.
आतातरी कोणीतरी असे आंदोलन उभे केले पाहिजे. असा विचार करत असताना माझ्या अंतर्मनाने प्रश्न विचारला कोणीतरी म्हणजे कोण? मग तूच का नाही?
आणि मी निर्णय घेतला होय मीच! मग ठरवलेच. समाजाला लक्षावधी अवयवांचे दान व्हावे ही बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागायचं! प्रथम माझ्या पत्नीने मग माझ्या आईने व मुलांनी याला संमती दिली. ही संकल्पना मी माझ्या रोटरी क्लब पुढे मांडली. सर्वांनी एक मुखाने पाठिंबा दिला.
नाशिक ते गडचिरोली या रोटरीच्या विभागाचे प्रमुख म्हणजेच त्या वेळचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. महेश मोकाळकर व माजी प्रमुख रोटे. दादासाहेब देशमुख यांनीही ही कल्पना उचलून धरली. क्लब प्रेसिडेंट भास्कर पवार व इतर रोटरी सदस्य तसेच नाशिक येथील अवयवदान क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. भाऊसाहेब मोरे आणि इतर अनेक संस्थांनी आर्थिक सहकार्याचेही आश्वासन दिले आणि ‘अवयवदान वारी’ या नावाने हा समाज प्रबोधनासाठी पदयात्रा काढण्याचा पहिला प्रकल्प निश्चित करण्यात आला.
अवयवदानाचे प्रबोधन हा माझ्या अंतर्मनाचा हुंकार आहे!
गाडगे बाबा, तुकडोजी बाबा व आमटे बाबा ही माझी दैवते व त्यांचे विचार हे माझे आदर्श आहेत.
माझ्या दैवतांच्या विचारांच्या प्रेरणेतून व जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर हा संकल्प तडीस नेण्याचे ठरवले.
मी तसा साधासुधा मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला मध्यमवर्गीय माणूस. लहानपणापासून माझ्या आईने समाजसेवेचे काही संस्कार व वडिलांनी नकळत केलेले अंधश्रद्धाविरोधी संस्कार यातून मी मोठा झालो. कोयनानगर येथे जिल्हा परिषदे च्या जीवन शिक्षण विद्या मंदिर मध्ये ७वी पर्यंत प्राथमिक शिक्षण आणि तेथेच शिवाजी हायस्कूल मध्ये एसएससी पर्यंत शिक्षण घेतले. येथील शिक्षकांकडून वस्तुनिष्ठ विचारसरणीचे संस्कार माझ्यावर झाले. तसा मी फार हुशार असा नव्हतोच शिक्षणामध्येही मध्यम वर्ग सोडला नाही. जी काही बुद्धिमत्ता होती त्या बुद्धिमत्तेचा उपयोग सामाजिक विश्लेषण व स्वतःचे विचार निश्चित करण्यात झाला. त्यामुळे मी सतत विचार मग्नतेत बुडालेला असे.
पुढे कराड येथे सायन्स कॉलेज मधून बीएससी उत्तीर्ण झालो. त्यामुळे शास्त्रीय विचारसरणी व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची व्यक्तिमत्त्वात भर पडली.
हे सर्व संस्कार अगदी नकळत घडत होते. आता उतारवयात विचार करीत असताना या सर्वांची जाणीव होत आहे.
सोलापूर व पुणे या ठिकाणी सुरुवातीला नोकरी केली. त्याही वेळी १९७२ च्या दुष्काळात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी काही समविचारी विद्यार्थ्यांना एकत्र करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी साठी आणि काही आर्थिक मदतीसाठी निधी उभारला. साहित्य क्षेत्रातही आमचा एक समूह जमला होता आमच्या समूहातर्फे लघु अनियतकालिकांच्या चळवळी मध्ये ही सामील झालो होतो. नोकरी करून थोडेफार समाजकार्य करत होतो.
त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये लघुउद्योजक होण्यासाठी धडपडत होतो म्हणजे पडत पडत उभे राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळेला कुणीतरी सांगितलेला एक विचार ‘भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण भारताला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तरुणांनी उद्योजक बनले पाहिजे’ हा विचार डोक्यात ठेवून विविध व्यवसाय करत नाशिकमध्ये येऊन स्थिरावलो. अंबड एमआयडीसी मध्ये सुरुवातीला प्रिंटिंगचा व्यवसाय आणि नंतर केटरिंग आणि रेस्टॉरंट व्यवसाय यामध्ये स्थिरावलो. व्यवसायात स्थिरावत असतानाच पुन्हा समाजकार्यासाठी रोटरी क्लब मध्ये दाखल झालो. रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून घेत असतानाच २००९ मध्ये माझी चार पुस्तके प्रकाशित झाली.
तत्पूर्वी २००७ मध्ये रीडर्स डायजेस्ट या मासिकात ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ या नावाचा एक लेख वाचनात आला. त्या लेखामुळे अवयव दान या क्षेत्राची माहिती झाली. या क्षेत्रामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते अगदीच तुरळक किंवा नगण्य आहेत हे लक्षात आलं. या बाबतीत मी जसजशी माहिती गोळा करायला लागलो तसतशी या माहितीची योग्य ती दारे उघडताना दिसत नव्हती. अनेक ठिकाणी ठोठावल्यानंतर थोडी थोडी माहिती, तसेच इंटरनेटच्या माध्यमातून झालेली माहिती, डोंबिवलीच्या दधीचि देहदान मंडळाकडून उपलब्ध झालेली माहिती आणि आमच्या रोटरी मध्येच नागपूर मध्ये अवयवदानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. वानखेडे यांचे कडून मिळालेली माहिती या माहितीद्वारे या विषयाचा अभ्यास आणि प्रबोधन चालू केलं. त्यातच नाशिक येथील संवाद या संस्थेचा मी सचिव झालो. त्यामुळे रोटरी आणि संवाद या दोन माध्यमातून समाजप्रबोधनाचं कार्य स्थानिक पातळीवर सुरू केलं. २०१२-१३ या वर्षामध्ये मी रोटरी क्लब चा प्रेसिडेंट झाल्यावर या अवयवदान प्रबोधनासाठी काही कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे रोटरी आणि संवाद या दोन संस्थांच्या माध्यमातून मी हे कार्यक्रम सुरू ठेवले होते. संवाद या साहित्य चळवळी मार्फत मी बाबा आमटे यांच्या :ज्वाला आणि फुले’ या संग्रहातील कवितांचे काव्य वाचन करीत असे. त्यातील एका काव्य वाचनानंतर सुरुवातीला उल्लेख केलेला विचार डोक्यात येऊन त्यातून अवयवदान वारी या अवयवदान प्रबोधनाच्या पदयात्रेचा प्रारंभ झाला.
अवयवदान वारी म्हणजे
नाशिक ते आनंदवन व्हाया नागपूर अशी पदयात्रा होती.
दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी नाशिक येथील गाडगे बाबांच्या आश्रमापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. मजल दर मजल करीत साधारण पणे दर दिवशी सरासरी २५ कि. मी. प्रमाणे अंतर पार करीत ही यात्रा दिनांक ५ जानेवारी २०१७ रोजी तुकडोजी बाबांच्या कर्मभूमीत मोझरी मार्गे नागपूर येथे पोहोचली.
७ व ८ जानेवारी २०१७ रोजी नागपूर येथे रोटरी प्रांत ३०३० च्या ‘प्रांत परिषदेत ‘ सहभागी होऊन ही वारी ९ जानेवारी रोजी नागपूर येथून निघून १४ जानेवारी २०१७ रोजी बाबा आमटे यांच्या आनंदवन या कर्मभूमीत पूर्ण झाली.
वाटेमध्ये प्रत्येक मुक्कामी अवयवदान व देहदान या विषयी प्रबोधनपर कार्यक्रम अनेक शाळा महाविद्यालये व ग्रामसभा तसेच रोटरी मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले..
या पदयात्रेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांचे सहाय्याने व द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन मुंबई यांचे सहकार्याने करण्यात आले होते.
अवयवदान वारीत बरोबर रोटे. प्रियदर्शन बापट व श्री शरद दाऊतखानी हे संपूर्ण सहभागी झाले होते. एका दिवसात सरासरी २५ कि. मी. ची चाल झाली. माझी पत्नी सौ. रंजना देशपांडे पायलट कार चालवत आमची सर्वांची काळजीवाहक म्हणून संपूर्ण यात्रेत सहभागी होती.
नाशिक येथील शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कै(सौ) शारदा गायकवाड व त्यांचे पती श्री जालिंदर गायकवाड हे सुद्धा २० दिवस या पदयात्रेत सामील झाले होते. या पहिल्या नाशिक नागपूर आनंदवन पदयात्रेच्या नियोजनातून एकूण प्रत्यक्ष चाल १३४० कि. मी. झाली. (नियोजित १०८६), जनजागृती कार्यक्रम १२६, कालावधी ५२ दिवस, गावे ४५.
या संपूर्ण पदयात्रेचा अनुभव खूपच उत्साहवर्धक ठरला अगदी छोट्यात छोट्या खेडेगावा पासून ते नागपूर सारख्या मोठ्या शहरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जनसमूहा समोर, शेतकरी, कामगार, शिकलेले, अशिक्षित, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, आशा वर्कर्स, अनेक हॉस्पिटल मधले पेशंट अशा अनेक विविध प्रकारच्या व्यक्तींशी संपर्क आला. त्यांना समजेल अशा भाषेमध्ये अवयवदानाचे महत्त्व कसं विशद करायचं याचा अनुभव सुद्धा मिळाला. विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी म्हणजेच आजची तरुण पिढी यांना या विषयाची ओळख करून देण्याचा आणि त्यांच्या मनात या विषयासंबंधी कोण कोणते विचार आहेत हे समजून घेण्याचं भाग्य लाभलं. हा अनुभव खरोखरच अवर्णनीय आहे चालणं महत्वाचं नाही, पण चालता चालता ज्या सर्वसामान्य माणसाशी आपल्याला आपल्या विचारांनी आणि कृतीने जोडून घेता आलं तो अनुभव हाच जास्त महत्त्वाचा आहे हे उमगलं.
तशातच महाराष्ट्र शासनातर्फे २०१७ साली, जी अवयवदानाची प्रतिज्ञा राजपत्रा मध्ये मान्यताप्राप्त झाली त्याचे शब्दांकन करण्याचा मान मला मिळाला. या अद्वितीय अनुभवातून पार झाल्यानंतर मुंबई येथील दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन या संस्थेने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्या संस्थेशी जोडला गेलो आणि त्यांच्यातीलच एक झालो. दुसऱ्या पदयात्रेला फेडरेशनचे अनेक कार्यकर्ते सामील झाले आणि आम्ही दुसऱ्या पदयात्रेचे नियोजन केले. मुंबई ते गोवा या पदयात्रेमध्ये आम्ही दहा कार्यकर्ते सामील झालो आणि दुसरीही पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली.
पदयात्रेत १० जण सामील झाले. पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, प्रियदर्शन बापट, शरद दाऊतखानी, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे, अविनाश कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, म्हसकर, रणजित उंद्रे. संपूर्ण पदयात्रेचे नियोजन फेडरेशनचे सचिव श्री बागाईतकर यांनी उत्तम पद्धतीने केले व दिनांक २३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीत ही पदयात्रा संपन्न झाली
मुंबई (केईएम रुग्णालय ) ते गोवा (मडगाव ) पदयात्रा. एकूण चाल ८५० कि. मी. (नियोजित ८२६)
जनजागृती कार्यक्रम १४०,
कालावधी ५२ दिवस, गावे ५५
यानंतर कार्यकर्ते विचारू लागले आता यावर्षी कुठं आणि मग तिसऱ्या पदयात्रेचे नियोजन केलं पहिल्या पदयात्रे मध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ काबीज केला दुसऱ्या पदयात्रे मध्ये कोकण आणि गोवा पिंजून काढले. आता तिसऱ्या पदयात्रेचे नियोजन करताना आमच्या टार्गेटवर मराठवाडा होता औरंगाबाद हुन सुरू करून मराठवाड्यातले सातही जिल्हे पायाखालून घालून तुळजापूर येथे या पदयात्रेची सांगता झाली.
संपूर्ण मराठवाडा (औरंगाबाद – ते – तुळजापूर) या पदयात्रेसाठी
सप्टेंबर २०१८ पासून नियोजनास सुरुवात. दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या संपूर्ण सहकार्याने व सहभागाने आणि नियोजनातून ही सर्व पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेत एकूण सात पदयात्री सामील झाले होते श्री सूनील देशपांडे श्री प्रियदर्शन बापट श्री अविनाश कुलकर्णी श्री चंद्रशेखर देशपांडे श्री शैलेश देशपांडे श्री वसंत चिकोडे आणि श्री दयानंद मठपती. या पदयात्रेचे नियोजनही फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार व सचिव सुधीर बागाईतकर यांनी उत्तम तऱ्हेने केले व दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2018 या कालावधीत ही पदयात्रा संपन्न झाली (औरंगाबाद – जालना – बीड – परभणी – हिंगोली – नांदेड – लातूर – उस्मानाबाद – तुळजापूर)
मराठवाडा अवयवदान पदयामी, पदयात्रा, फेडरेशन आणि प्रबोधन
आता महाराष्ट्रातील फक्त पश्चिम महाराष्ट्राचा भाग शिल्लक राहिला होता. त्यामुळे चौथ्या पदयात्रेचे नियोजन करताना नाशिक ते बेळगाव असं करण्यात आलं. नाशिक, शिर्डी, नगर, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि बेळगाव. या मार्गाने जास्तीत जास्त ग्रामीण भागातून वाटचाल करीत अंतिम दिवशी बेळगावी पाहुणचार घेऊन केएलई या प्रतिथयश शिक्षण संस्थेतील वैद्यकीय महाविद्यालयात या पदयात्रेची सांगता करण्यात आली.
या चारही पदयात्रा मिळून संपूर्ण महाराष्ट्र पायाखालून घातला.
चौथी पदयात्रा नाशिक ते बेळगाव
७५० कि. मी.
५ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२० या एकूण चार पदयात्रा- एकूण चाल ३६४० कि. मी.
एकूण जनजागृति कार्यक्रम १२६+१४०+८५ + १५९ = ५०१
अशा ५०० कार्यक्रमां मधून एकूण ५०००० व्यक्तींपर्यन्त प्रत्यक्ष अवयवदानाचा संदेश पोहोचला. ४५+५५+४३+४२ = १८५ गावांमध्ये या विषयाच्या चर्चेची सुरुवात झाली. येथून पुढे त्या सर्व ठिकाणी प्रबोधनाचा विस्तार होईलच. अनेक कार्यकर्तेही त्यातून तयार होत आहेत, यातून या चळवळीला मोठे बळ मिळाले. इतरही संलग्न संस्था व कार्यकर्ते यांनी गावागावातून पदयात्रा काढून व आपल्या गावापासून बाजूच्या खेडेगावात जाऊन पदयात्रेच्या माध्यमातून या विषयाचे प्रबोधन करावे अशी अपेक्षा आहे. आपल्या शहरांमध्ये विविध कार्यक्रम, व्याख्याने, पथनाट्य व इतर कोणत्याही माध्यमातून सादरीकरण करून या मार्गाने या विषयाचे प्रबोधन करून जनतेमध्ये जागृती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा असे वाटते.
प्रसिद्धी माध्यमांनी या विषयाचे विविध लेख लेखमाला आणि विविध घटनांविषयी विवेचन करून आपापल्या माध्यमाद्वारे प्रयत्न करावा. संपूर्ण महाराष्ट्र पायाखालून घातल्यानंतर आलेल्या अनुभवातून आणि ज्ञानातून नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी आता दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन या संस्थेचा विस्तार जवळपासच्या राज्यातही करीत आहोत त्याच प्रमाणे या प्रबोधन कार्यक्रमासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतो आहोत. त्याचप्रमाणे मृत्युंजय ऑर्गन फौंडेशन या आमच्या नाशिक येथील सहयोगी संस्थेद्वारे विविध लोककलां मधून या अवयवदानाचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने लोक कलाकारांची एक स्पर्धा आयोजित केली होती. सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की ग्रामीण भागातील अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन पारितोषिकेही प्राप्त केली आहेत. ग्रामीण भागात या विषयाच्या जागृती बाबत होत असलेला बदल स्वागतार्ह व कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी उत्साह व बळ देणारा ठरत आहे.
अवयवदानाच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहे. परंतु आपल्याला आपला भारत देश जगामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये येईल इतपत तरी कार्य करायचे आहे. सध्या आपला देश अवयव दान करणाऱ्या देशांमध्ये शेवटच्या पाच क्रमांका मध्ये आहे खूप मोठा रस्ता पार करायचा आहे ही चाल फक्त पायाची नसून प्रबोधनाची आहे. पुढील पिढीला या विषयात जागृत करणे ही गोष्ट नजीकच्या भविष्यकाळात साध्य करायची आहे. ती होईल असा विश्वास धरायला हरकत नाही असे वाटते.
सुनील देशपांडे
१. संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक
२. उपाध्यक्ष, द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन, मुंबई.
३. सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन).
४. रोटरी प्रांत 3030 चे अवयव दान विषयावरील माजी समिती प्रमुख.
साहित्यरंग वाङ्मय मंडळ, वारजे आयोजित ‘कल्पनाविस्तार’ स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 🪻
पुरस्कार प्राप्त लेख ‘असेही पुनर्मिलन’ आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
विविधा
☆ “असेही पुनर्मिलन” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
“चला उतरा लास्ट स्टाॕप आला “कंडक्टर मोठ्याने ओरडला. त्यासरशी मी एकदम जागी झाले, तो झोपेत माझा स्टाॕप मागेच गेला होता अन् मी एका अपरिचित ठिकाणी उतरले. काय करावे काही सुचत नव्हते. बाकी पॕसेंजर भराभरा त्यांच्या मुक्कामी निघून गेले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. चहा घेऊन समोरच असलेल्या देवळात शिरले आणि समोर बघते तर……
सभामंडपाच्या पायऱ्या उतरून येणाऱ्या त्या बाईचा चेहरा अगदी ओळखीचा वाटला. मी जागेवरच थांबून पाहू लागले अन् आठवले ‘अरेच्चा ही तर आपली बालमैत्रीण प्रभा आहे’. तिला पाहून मला अतिशय आनंद झाला.
अचानक तिचेही माझ्याकडे लक्ष गेले. ती पण पहातच राहिली. एकदम ” नंदिनीऽऽ.. ??? नंदू ऽऽऽ “, अशा जोराने हाका मारत ती भराभर पायऱ्या उतरली आणि माझ्याजवळ येऊन तिने घट्ट मिठी मारली. ती आता ओक्साबोक्शी रडू लागली. ” अग, तुला भेटण्यासाठी मी किती तळमळत होते. आज देवालाच दया आली. त्याच्या दारातच तू पुन्हा भेटलीस. किती आनंद झालाय म्हणून सांगू ? कुठे होतीस ग इतके दिवस ?”
तिचं रडणं आणि बोलणं एकत्रच सुरू होतं. मी तिला शांत करीत खाली बसवलं, पाणी दिलं. ती खूप सावरली. मला जवळ घेत तोंडावरून हात फिरवत म्हणाली, ” नंदू, किती काळ लोटला ग आपल्या भेटीला. आता पुन्हा भेट होणारच नाही असं वाटत होतं. पण देवानंच आपली भेट घडवली. किती जीवाभावाच्या मैत्रिणी आपण, खूप आनंदात होतो. पण मला काय दुर्बुद्धी सुचली अन त्या खोटारड्या जयडीवर विश्वास ठेवला. तुझ्याशी अबोला धरला. नंतर मग खूप वाटलं तुझी माफी मागावी, पुन्हा एकत्र यावं, पण आपली भेटच झाली नाही. “
“प्रभा अगं जाऊ दे ना. विसर ते जुनं सगळं. ” हे ऐकून चिडलीच.
“कशी विसरू ? माझ्या चुकीनंच मी तुला गमावलं होतं ना? खरंच माझं तेव्हा खूप चुकलं होतं. मला माफ करशील ना ग नंदू ?” ती पुन्हा रडू लागली.
” हे बघ प्रभा, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना. मैत्रीत कसली माफी मागतेस ? आपली ती वेळच वाईट होती. मी तर केव्हाच सगळं विसरले आहे. तुला भेटून मात्र खूप खूप आनंद झाला. माझं उतरायचं गाव मागं गेल्यामुळं मी इथं आले हे फारच छान झालं. “
आता प्रभा पूर्ण सावरली. त्या गावातच तिचं घर होतं. आम्ही तिच्या घरी आलो. हसतखेळत रात्री जेवण झालं. मी आणि प्रभा झोपायला गेलो. झोप कुठली यायला ? इतक्या वर्षांच्या साचलेल्या गप्पा झाल्या. त्या भांडणाची उजळणी पण झाली.
आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी होतो. हे न बघवणाऱ्या मुली आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करायच्या. एकदा जयश्रीनं माझ्याबद्दल काहीतरी खोटंनाटं प्रभाच्या मनात भरवलं. प्रभा खूप चिडली. आमचं जोरात भांडण झालं. माझं म्हणणं ऐकून न घेताच ती निघून गेली. कायमचा अबोला धरला. पुढं बदलीमुळं ते परगावी गेले आणि आम्ही कायमच्या दुरावलो. कसलाच संपर्क झाला नाही. लग्नानंतर तर गावही दुरावला.
पण ही गोष्ट प्रभाच्या इतकी जिव्हारी लागलेली असेल याची कल्पनाच नव्हती. आत्ता भेटल्यावर सगळं मळभ दूर झालं. खूप आनंद झाला.
गप्पांमधे इतर मैत्रिणींच्या आठवणी निघाल्या. आमची मैत्रीण विजयाच्या मुलीच्या लग्नासाठी मी आधीच्या गावात उतरणार होते. मग दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर प्रभासुध्दा लग्नाला आली. तिथे आमच्या आणखी ३-४ मैत्रिणी आलेल्या होत्या. माझ्याबरोबर प्रभाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खूप आनंद झाला. आमच्या बालपणाच्या आठवणींचं कारंजं थुईथुई उडू लागलं. त्यात आम्ही चिंब झालो. पुन्हा एकदा लहान होऊन खूप हसलो खिदळलो. खूप मजा केली. भेटीचा पुरता आनंद घेतला. ही ‘पुनर्भेट’ आम्ही अतिशय मनापासून उपभोगली. आलं देवाजीच्या मना…. !
जपान सारख्या शांतता प्रिय देशात तुम्ही शांततेचे प्रतिक म्हणून उभे आहात. तुम्हांला सर्वजण “उशिकू बुद्धा”म्हणून ओळखतात. मनाच्या उर्जेसाठी सगळे तुमच्याजवळ येऊन बसतात जिथे जगाचा विसर पडावा असा तुमचा सहवास. भारतभूला जपान मध्ये “Homeland of Lord Goutam Budhdha” म्हणून ओळखले जाते. तुमच्यामुळे भारताबद्दल आदरयुक्त भावना त्यांच्या मनात आहे. ज्या भारतभूमी मध्ये तुम्ही वाढलात, अध्यात्मिक प्रगती केलीत, शांततेचा संदेश जगाला दिलात आणि लोप पावलात तिथं आज परिस्थिती पहा जरा. या भूमीचा गौरव सुजलाम् सुफलाम् सस्य शामलाम् असा होतो. ती भूमी आता रक्तरंजित झाली आहे. तुमची शांतता म्हणजे अन्याय पण सहन करा अशी कशी असेल? हिरोशिमा शहरावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी मारण्याची कुवत तुम्ही जपानी लोकांना दिलीत. इलेक्ट्राॅनिक्सच्या जगात भरारी मारल्यावर जमिनीवर पाय ठेवून चालण्याची वृत्ती तुम्ही त्यांचेत रूजविलीत. भारतात मात्र अनेक वेळा रक्तरंजित इतिहास निर्माण झाला. बॉम्बस्फोट होण्यापूर्वी तो होऊ नये म्हणून करावयाच्या विचारांची कुवत तुम्ही माणसांना कधी देणार? बॉम्बस्फोटाचा विनाश न ओढवता न्याय मिळविण्यासाठी दुसरे मार्ग अवलंबायची बुद्धी, अशा बुद्धीला साथ देण्याची सामाजिक मानसिकता तुम्ही कधी देणार?सर्वेपि सुखिनः सन्तु…. हा मूलमंत्र फक्त कागदोपत्रीच रहाणार का ?असे असंख्य प्रश्न तुम्हांला पाहून मनात येतात कारण त्यांची उत्तरे तुमच्या जवळ आहेत. सत्व, रज, तमाच्या पलिकडे गेलेले तुम्ही गुणातीत आहात. स्वतःच्या मनाची प्रगती कशी करावी हे तुमचे अध्यात्म सांगते पण अप्रगत मनांशी, बुद्धीशी लढताना अधर्माने वागावे लागते त्याचं काय? भगवद्गीता सांगते”कर्मण्येवाधिकारस्ते…. ” शांत रहा. फळाची अपेक्षा करू नका. असे सर्वांनी ठरविले तर या जगात देशाच्या संसाराचे रहाटगाडगे चालणार कसे?त्याच भगवद्गीतेत सांगितले आहे, “यदा यदाहि धर्मस्य…. “धर्माला ग्लानी आली की तुम्ही येणार. आता तुमच्या नावाला देखील आलीय ग्लानी पण तुम्ही कुठे आहात?तुम्हांला शोधत आहेत सर्व. एकाजागी थांबून फक्त आशिर्वाद देत आहात, तुम्हांला किंकाळ्या ऐकू येत नाहीत का ? तुम्ही घरदार सोडून निघून गेलात. हेच सर्वांच्या वाट्याला आहे का? निदान या प्रश्नांची उत्तरे द्या म्हणजे मार्गदर्शन करायला आला आहात हे तरी कळेल. मग कोणावर बाण मारायचा हे तरी स्पष्ट होईल. सर्वजण तुमची वाट पहात आहेत. तुम्ही शांतता सोडून न्याय वाटायला या….
कितीही कटू वाटले तरी एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे की, जीवन कितीही प्रवाही आणि अमर वाटत असले तरी त्याचा एक अविष्कार म्हणजे आपण मानव पूर्णतः मर्त्य आहोत. आपल्या जगण्याच्या धडपडीचा अविष्कार पुनर्जन्म नसून प्रजनन आहे. आपण माणूस म्हणून एकसंध नसून आपले शरीर हे विविध अवयवांनी बनलेल्या पेशींचा समूह आहे, त्या पेशी ज्या समान गुणसूत्रांनी संचालित होतात, त्या गुणसूत्रांचेच मूर्त रूप आपले शरीर असते. सर्व पेशी त्या गुणसूत्रांच्या एकेक अक्षराबरहुकून वागत असतात, त्या सूक्ष्म पेशींचा एकत्रित भव्य आविष्कार म्हणजे शरीर असते. शरीराचे अवयव म्हणजे मी नाही. पण सजीव शरीर तर मी आहे! घराचे छप्पर घर नसते, घराची फरशी घर नसते, घराच्या भिंती घर नसते, पण ह्या सर्वांनी मिळून घर तयार होते. तसे शरीरसुदधा! फरक येवढाच की, बाहेरून वस्तू आणून माणूस घर बनवतो तर शरीर आतूनच बाहेर वाढत जाते. या शरीरातील हृदयाची धडधड थांबणे म्हणजेच मृत्यू होय. जीवनाची असोशी आणि मृत्यूचे भय माणसाच्या मनात सतत असल्यामुळे माणसाने मृत्यूनंतरचे जीवन कल्पीले आणि वेदनारहित अमर आत्म्याचा जन्म झाला.
असा आत्मा अस्तित्वात नसल्यामुळे वास्तवात शरीर जर्जर झाले असेल तर त्याचा त्रास माणसाला होतो. अशा वेळेस घरातील जवळच्या सुहृद नातेवाईकांनाही त्याचा त्रास होत असतोच. पण बरेचदा आपलेपणाने तर कधी कर्तव्य बुद्धीने ते सगळे सहन करत असतात. जीवनभर स्वावलंबी जगल्यानंतर शेवटच्या काळात परावलंबी होणे हे कोणत्याही स्वाभिमानी माणसाला दुःखदायकच वाटत असते. अशावेळेला त्याने जर इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली तर ते चूक कसे ठरेल? पण अजूनही आपल्याकडे इच्छामरण म्हणजे आत्महत्या असे समजण्यात येते. म्हणून व्याधीग्रस्त माणसाला मरणाची वाट बघत व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. हा सहानुभूतीच्या नावाखाली रुग्णाला जिवंतपणे मरणयातना देणारा अनुभव क्रूरपणाचा नाही का?
हे लक्षात घेऊन न्यायालयाने वैद्यकीय इच्छापत्राला मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आता जबाबदारी वाढते ती इच्छामरणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांची. जर एखाद्याने इच्छापत्रात ‘विशिष्ट उपचारानंतर मला शांतपणे मरू द्यावे’, असे म्हटले असेल तर त्याचा सन्मानाने मारण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा. माणसाला सन्मानाने जगायला हवे असते तसेच सन्मानाने मरायलाही. पण या कायद्यामुळे आत्महत्याही कायदेशीर होईल आणि या कायद्याचा गैरवापर पैसाअडक्यासाठी केला जाईल, अशी भीती बाळगणे म्हणजे नदीला केव्हातरी मोठा पूर येईल आणि आपण त्यात बुडून वाहून जाऊ; म्हणून नदीकाठी घर बांधणे चुकीचे असे समजण्यासारखे आहे. कारण प्रत्येक कायदा हा दुधारी शास्त्रासारखा असतो. त्याचा वापर विधायक करावा की विघातक हे शेवटी आपल्यावर अवलंबून असते.
एवंच आजच्या धकाधकीच्या जीवनात जर एखाद्याने आयुष्य पूर्णपणे उपभोगले असेल आणि शेवटच्या काळात व्याधीग्रस्त होऊन खितपत मरण येण्यापेक्षा जर त्याने इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळाला पाहिजे. असेही मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करणे हे धर्मसंमत आहेच. तेव्हा आता शासकीय आणि सामाजिक पातळीवर न्यायालयाच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. तुम्हाला?🤔
एखाद्या कार्यक्रमात प्रमुख किंवा आमंत्रित व्यक्तींची ओळख करून देताना त्या ओळखीत काही चांगल्या गोष्टीच अपेक्षित असतात. अगदी तसा नियम नसला तरीही. पण अति उत्साहात काही गोष्टी घडतात.
एका फुटबॉल सामन्याच्या उद्घाटनाला एका राजकिय नेत्याला बोलवल होत. त्यांची ओळख पुढिल प्रकारे करण्यात आली.
या महाशयांची जशी ओळख आहे तसा हा माणूस नाहिच. आणि जसा हा माणूस आहे तसं यांना कोणीही ओळखत नाही. आपली खरी ओळख जाणिवपूर्वक लपवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. व पुढेही यशस्वी होतील.
या सामन्याच्या उद्घाटनाला जे महाशय बोलवले आहेत त्यांचा राजकिय प्रवास आणि फुटबॉल यांचा जवळचा संबंध आहे. खेळावे कसे हे त्यांना माहित नसले तरी तुडवले कसे जाते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केल्यापासून आज नावाला येईपर्यंत (खरंतर नावारुपाला असंच म्हणणार होतो. पण त्यांच्याकडे पाहून फक्त नावाला येईपर्यंत असच म्हणतो.) पक्षातीलच वेगवेगळ्या मान्यवरांनी वेळोवेळी त्यांना व्यवस्थित तुडवले आहे.
आपल्याच पक्षात आपली प्रचंड घुसमट होत आहे असं त्यांना पदोपदी वाटत असल्यानेच त्यांनी चारपाच वेळा वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला. पण हा पक्षप्रवेश सोहळा म्हणून कधीच झाला नाही. फुटबॉल मध्ये जस पास देतांना झालेल्या चुकीमुळे तो सहज प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पायात जातो, तसेच हे पक्षातील लोकांच्या चुकीमुळेच दुसऱ्या पक्षाच्या पायावर पोहोचले. प्रतिस्पर्धी असलेल्या काही थोड्याच लोकांनी यांना पायात घेण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असेल. थोडक्यात त्यांना तुडवतांना झालेल्या चुकीमुळे ते प्रत्येकवेळी दुसऱ्या पक्षात (पायाशी) गेले.
फुटबॉल, जस प्रत्येकाला तो आपल्या पायात असावा असं वाटत असलं तरी त्याला समोरच्याच्या जाळ्यात टाकण्यासाठीच धडपड असते तशीच धडपड यांच्या आयुष्यात आली आहे. कितीदा तरी यांना जाळ्यात ढकलण्याचा मनापासून आणि जोर लाऊन प्रयत्न झाला.
फुटबाॅलच्या मैदानात त्याला हात लागला की फाऊल असतो, त्याच पध्दतीने कोणत्याही परिस्थितीत आपला हात सगळ्यांनीच यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी डोक्याच्या वापर केला, पण हात लांब ठेवला. हात दाखवून अवलक्षण याच धर्तीवर हात लावून अवलक्षण कोणालाही नको होतं.
फुटबॉल मध्ये जसं काही चुका मुद्दाम केल्यातर यलो किंवा रेड कार्ड दाखवून एक प्रकारची तंबी दिली जाते, तशाच यांना वेगवेगळ्या नोटीस देऊन तंबी देण्यात आली आहे.
आज स्पर्धेच उद्घाटन करतांना तुडवण्यात काय मजा असते, याचा आनंद त्यांना घेता येईल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि यांचा परिचय थांबवून त्यांना मनोगत व्यक्त करायला बोलवतो…